Tuesday, November 27, 2012

असं सासर शोधा बाबा

महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१२ (विदर्भविशेष) मधे प्रसिद्ध झालेला माझा लेख आणि कवितेचा भावानुवाद...(मूळ कविता साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्या संथाली कवयित्री निर्मला पुतुल यांची)



’नगारे की तरह बजते शब्द’ हे संथाली भाषेतील कवयित्री निर्मला पुतुल यांच्या एका कवितासंग्रहाचे नाव आणि तेच त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य देखील आहे. एका संवेदनशील उपवर निसर्गकन्येचे स्वप्नचित्र रेखाटणारी , ’उतनी दूर मत ब्याहना बाबा’ ही त्यांची (मूळ संथाली) कविता आपल्याला अंतर्मुख करून जाते. समृद्ध सहजीवन म्हणजे नक्की काय याचा, कुठलाही साहित्यिक आव न आणता सजगपणे शोध घेते. वैचारिक परिपक्वतेचा एक निकष शैक्षणिक गुणवत्ता असायला हवा असा शहरी अट्ठाहास आज सर्वत्र आढळून येतो. समृद्ध सहजीवनाच्या पाश्चात्य व्याख्या जगावर नकळत लादल्या गेल्याचे चित्र सगळीकडे दिसते. त्याला अनुसरूनच ’२९, ५-९", एम.बी.ए, ३ लाख’ अशा स्वरूपाच्या जाहिरातीतील माहितीभोवती वर्तुळ काढून जोडीदाराची निवड केली जाते. परस्परपूरकता, आस्वादकता, रसिकता, दोन कुटुंबांची सांगड, या बंधनाबरोबर आयुष्यात येणार्‍या इतर माणसांचा गुणदोषांसह सहज स्वीकार, रसरसून आणि समरसून एकमेकांसह जगण्याची आकांक्षा हे सगळं त्या छोट्याशा वर्तुळात कसं सामावणार! वैवाहिक आयुष्याकडेच नव्हे, एकूणच सकस जगण्याकडे आपले दुर्लक्ष होते आहे. जिंकण्याच्या शर्यतीमधे धावणार्‍यांना निसर्गाचे हुंकार ऐकू येईनासे झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर एक पारदर्शी मनाची ग्रामीण युवती आपल्या भावी सहचराकडून-सासरकडून ज्या प्रगल्भ अपेक्षा करते त्या आपल्याला स्तिमित करतात. ती खर्‍या अर्थाने आधुनिक आहे. ती केवळ स्वप्नाळू नाही, तिला वडिलांची, त्यांच्या कष्टाची जाणीव आहे. विवाहानंतर देखील माहेरी मायेची फुंकर घालता यावी ही तिची धडपड आहे. म्हणूनच ’खजुर का गुड बनाकर भेज सकू सन्देश’ किंवा ’शाम को लौट सको पैदल’ एवढ्याच दूर तिला जायचं आहे. ’पहाडीपर डूबता सूरज’ दिसू शकेल असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं, केवळ माणुसकीचा दागिना ल्यालेलं सासर तिला हवं आहे. मी आणि तो ,एवढच तिचं मर्यादित जग नाही. तिला माणसांची नांदती गजबज हवी आहे पण शहरी कोलाहल नको आहे. ’मान से भी ज्यादा जहा तेज दौडती हो मोटरगाडीया’ अशी शहरं तिला नको आहेत. श्रीमंतीच्या बेगडी हव्यासात आपलं कोवळं भावविश्व करपून जाऊ नये याचं भान ती जपते. ’काहिल निकम्मा’ , ’बात बात मे बात करे लाठी डंडे की’ असा मुजोर किंवा ’जिसके हाथोने कभी कोई पेड न लगाया हो’ असा रूक्ष पती तिला मुळीच नको आहे. ’कबूतर के जोड की तरह’ साथ देणारा, ’जो बजाता हो बासुरी सुरीली’ असा आगळा पती तिला हवा आहे.

या तरूणीचं आत्मभान चकित करणारं आहे. आयुष्याकडून असणार्‍या तिच्या निखळ पण स्पष्ट अपेक्षा, सुटू पाहणार्‍या माहेराची ओढ, तिच्यासारख्याच सृजनशील निसर्गावरचं तिचं प्रेम आणि त्यातून निर्माण झालेली, रूजवणार्‍या हातांनी सर्वार्थानं जगणं वाटून घेणार्‍या जोडीदाराची आस, अशा अनेक छटातून ते ठळक होत जातं. या सार्‍या छटांचे प्रतिबिंब सामावणार्‍या निर्मला पुतुल यांच्या कवितेचा हा मराठी भावानुवाद....

असं सासर शोधा बाबा

बाबा,
इतकं दूरचं सासर नका शोधू या लेकीसाठी
जिथे मला भेटायला यायला..
घरच्या गाई विकाव्या लागतील तुम्हाला..

नका पाठवू अशा जागी नांदायला
जिथे साध्यासुध्या माणसांपेक्षा दैवी शक्तीचं स्तोम असेल
नसेल जवळ एखादी गर्द वनराई, डोंगरातून झुळझुळत येणारी नदी...

अन अशा गावचं स्थळ तर पाहूच नका मला
जिथे फक्त सुसाट धावणार्‍या मोटारगाड्यांनाच माणसांपेक्षा मान असेल..
असतील केवळ गगनचुंबी इमारती आणि दडपून टाकणारी भलीथोरली दुकानं..

अशा पतीशी नका जोडू माझं नातं..
ज्याच्या घरकुलाला अंगण नसेल, कोंबडा आरवून जिथे पहाट होत नसेल..
आणि हिरव्यागार परसातून, मावळणारा केशरी सूर्य दिसत नसेल...

नका पाट लावू अशा भ्रताराशी माझा
जो हंड्या झुंबरांच्या हवेलीत झिंगत राहील
नाकर्ता असेल..
जत्रेतून मुली उचलून आणण्याचा नाद असेल ज्याला..
नीट पारखून घ्या बाबा,
रा-वाईट पाहून वाटेल तेव्हा बदलून घ्यायला
तो काही तांब्या नाही एखादा..

असा दादला तर निवडूच नका माझ्यासाठी
जो उठसूट हाणामारी करेल.. उगारेल मस्तवाल कुर्‍हाड नाहीतर सुरा
एवढ्या तेवढ्या कारणावरून..
मनात आलं तर जाईल निघून.. बंगाल, आसाम, काश्मीर वाट्टेल तिथे..

अशा मुलाला नका देऊ माझा हात
ज्याच्या हाताने एखादं रोपही रूजवलं नसेल..नसेल वाढवलं एकही झाड
नसेल दिली कुणाची साथ.. नसेल उचलला कुणाचा भार
आणि ’ह’ हाताचा, एवढं देखील लिहायला ज्याला येत नाही
अशा वरासाठी नका करू माझे हात पिवळे..


असं सासर शोधा...
जिथे सकाळी आलात तर परतू शकाल संध्याकाळी पायी..
कधी रडू आलं तर... पैलतीरावर नदीमधे स्नान करताना ऐकू यावं ते तुम्हाला..
आणि येता यावं धावत माझे डोळे पुसायला..
तुमच्या आवडीचा माझ्या हातचा एखादा पदार्थ धाडता यावा तुम्हाला..
माझ्या शेताचा वानवळा चाखायला पाठवता यावा तुम्हाला..
बाजाराला जाता येता गावचा कुणी भेटावा..
त्याच्याकडून कळावी तुमची खुशाली..
चितकबर्‍या गाईला पाडस झाल्याची गोंडस बातमी..
अशा गोकुळात संसार करता यावा
जिथे देवमाणसं नसली तरी जितीजागती माणसं नांदतील भोवताली...
जणू वाघ आणि शेळी एका जागी पाणी पितील...

अशा कारभार्‍याशी लावा माझं लगीन
जो पारव्याच्या जोडीसारखा सदैव माझ्या सोबत राहील..
घरी दारी शेतात राबेल बरोबरीनं
आणि रात्री वाटून घेईल सारं सुखदु:ख...
असा जोडीदार शोधा..
सुरेल अलगुजाची मुलायम साद घालणारा
दणदणारे ढोल ताशे वाजवण्यात तरबेज असणारा...
ऐन वसंतात माझ्या केसात माळायला
पळसाचं लालबुंद फूल घेऊन येणारा..

मी उपाशी असताना
एक घासही जाणार नाही ज्याला
असा नवरा शोधा बाबा मला.....

Wednesday, August 29, 2012

देवीचे अश्रू !!

"भारतात आर्थिक दारिद्र्याइतकेच भयानक अध्यात्मिक दारिद्र्य आहे", असे गांधीजींच्या भूमिकेचा पुरस्कार करणार्‍या एका लेखात पु.ल. देशपांडे यांनी म्हटले आहे. सर्वात प्राचीन संस्कृतीचा-संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या भारताची एकेकाळची अध्यात्मिक श्रीमंती इतकी लयाला जातेय ती केवळ अंधश्रद्धांमुळे. माणूस आज मंगळावर पोचलाय, मग उद्या तेथे मानवी वस्ती झाली तर तिथल्या मुलामुलींच्या पत्रिकेत "कडक पृथ्वी" असेल की काय! असे विनोदाने म्हटले जातेय. एकूणच भारतातल्या अध्यात्मिक दारिद्र्याचे पुरावे जनतेतील अफवांच्या रूपाने वृत्तपत्रामधील बातम्यांमधून पाहायला मिळतात.

काही वर्षांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्रात गणपतीने दूध प्यायल्याची चर्चा (तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेपर्यंत) रंगली होती. सप्तश्रृंगी गडावर एका मामा-भाचीने परस्परांशी लग्न केलं आणि त्यामुळे ते दोघे आंधळे झाले, अशा स्वरूपाच्या अफवा तर भोळ्याभाबड्या भक्तांमधे अधून मधून गावोगावी पसरतच असतात. गेल्या पौर्णिमेला एका बाईला सप्तश्रृंगी देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसले, झाले, देवीच्या दर्शनाला हीss गर्दी झाली. मागील आठवड्यात तामिळनाडूमधील काही अतिमागास जिल्ह्यांमधे "नुकतच जन्मलेलं बाळ बोलतय" या अफवेनंतर त्या बाळाच्या "दर्शनाला" सर्वधर्मीयांची जत्रा लोटली होती.

काही मंडळी म्हणतील दिसले अश्रू तर दिसले, प्यायले असेल देवाने दूध, बोललं असेल बाळ, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, आणि त्याने कुणाला काही अपाय होतो का? वरवर पाहता यात तथ्य वाटते पण श्रद्धेच्या नावाखाली पसर(व)लेल्या या अफवांचे समाजमनावर भयंकर दूरगामी परिणाम होतात. भोळेभाबडे लोक जेव्हा या गोष्टी खर्‍या मानतात तेव्हा दुसरीकडे ते करणी-जादूटोणाही खरा मानू लागतात. त्यातून बुवाबाजी वाढू लागते. गेल्या महिन्यात नागपूरच्या एक महिलेने एका बुवाच्या नादी लागून गुप्तधनासाठी पोटच्या पोरीला ठार मारून तिचे काळीज काढण्याचा अघोरी प्रकार केला आणि शेवटी जीव दिला. इंटरनेटच्या युगात जगाशी जोडले गेलेले मूठभर आधुनिक भारतीय एका बाजूला (त्यातही अमुक इ-मेल किंवा एसएमएस शंभर जणांना फॉरवर्ड करा आणि चमत्कार पाहा, नाहीतर देवाचा कोप होईल असल्या अंधश्रद्धा आहेतच) आणि खेडोपाडी रूजलेल्या डाकीण प्रथा , "बाहेरचं" उतरवणारे मांत्रिक, झाडूने मारून रोग बरे करणारे चमत्कारी बाबा-फकीर, अंगात संचार झाला असे भासवून भक्तांना लुटणारे भोंदू दुसरीकडे अशी आपल्या देशाची अवस्था आहे. रडणारी देवी, बोलणारे बाळ वगैरे पाहायला धावणारी मंडळी अशाच अंधश्रद्धेच्या बाजारातले आयते ग्राहक ठरत आहेत.

" उत्कट भव्य तेची घ्यावे । मळमळीत अवघेची टाकावे ।
निस्पृहपणे विख्यात व्हावे । भूमंडळी ।।"
असे रामदास स्वामींनी नीरक्षीर विवेक समजावताना म्हटले आहे. मात्र अफवांमुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नाजूक सीमारेषा ओळखण्याची लोकांची सारासार विचारशक्ती नष्ट होऊ लागते. स्लो पॉयझनिंगमुळे शरीर जसे आतून खचत जाते तसे या अफवांमुळे-अंधश्रद्धांमुळे समाजाचे आतून खच्चीकरण होते.(अफवांचा अतिरेक किती उत्पात घडवू शकतो ते "आसाममधील नागरिकांवर इतर राज्यात हल्ले होत असल्याच्या" अफवेने नुकतेच सिद्ध केले आहे.) धार्मिक भावनेचा फायदा घेऊन अफवा पसरवणारे लोक एक तर बनेल असतात, त्यातून ते स्वत:ची पोळी भाजून घेतात किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग. तर्काशी त्यांचा दूरवर संबंध नसतो. साधीभोळी जनता "विषाची परीक्षा कशाला घ्या" या भीतीपोटी त्या अफवांना बळी पडते. पुढच्या सामाजिक विध्वंसाची ती नांदी असते.

"वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारी आणि सुधारणावादी वृत्ती बाणवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे", असं आपली घटना सांगते. "अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याचे अशासकीय विधेयक दस्तुरकर यांनी मांडले. ७ जुलै १९९५ ला ते विधानपरिषदेत तर १६ डिसेंबर २००५ ला विधानसभेत मंजूर झाले. प्रत्यक्षात कायदा साधा चर्चेलाही आला नाही. अर्थात ' महाराष्ट्र नरबळी व अमानुष , अघोरी आणि अनिष्ठ प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११ ' हा सर्वधर्मीयांना लागू असलेला संकल्पित कायदा तरी तयार झाला. अंधश्रद्धेमुळे बळी जाणार्‍यांचे जीव वाचविण्यासाठी कृती न करता, वर्षानुवर्षे राजकीय नेते फक्त विचारच करतात याला काय म्हणावे" ,असे अंनिसचे प्रमुख दाभोळकर खेदाने म्हणतात. शिवाय इतर राज्यांचे काय? कायदे करायची धमक राहोच, कित्येक राजकीय नेत्यांच्या शासकीय व्यासपीठावरच बुवा-बाबांनी ठाण मांडले आहे.

एका प्रख्यात वृत्तपत्रातील बातमीनुसार, मध्यंतरी पाऊस पडावा म्हणून ' विशेष पूजा ' करण्याचा आदेश एका राज्य सरकारनं त्या राज्यातील सुमारे ३४ हजार मंदिरांना दिला होता. वरवर वाटते, पूजाच करायची ना, मग त्यात काय वाईट आहे? जीवनदान देणार्‍या वरूणदेवाला पूजेच्या रूपाने कृतज्ञता व्यक्त करणं ही भावना यामागे असेलही. एखादी व्यक्ती, संस्था खाजगी आयुष्यात पूजा करत असेल तर धर्मनिरपेक्ष देशातील नागरिकांना तो हक्क आहे पण "सरकारला" नक्कीच नाही. कराचा पैसा वापरला असा आक्षेप नको म्हणून पूजेचा खर्च मंदिरांनाच करायला सांगण्यात आला होता. मुळात प्रार्थनास्थळांजवळ पैसा येतो कुठून, जनतेकडूनच ना! वृक्षतोड, जमिनीची धूप इ. अवर्षणाची मानवनिर्मित कारणे समजून न घेता वर देवालाच साकडे घालण्याचा नैतिक अधिकार तरी माणसाला उरला आहे का? हाच सुमारे १७ कोटींचा खर्च ’कृत्रिम पाऊस’ पाडण्यासाठी का केला गेला नाही? हा निधी दुष्काळ निवारणासाठी का वापरला गेला नाही?
प्रार्थनास्थळांना देणग्या देताना लोकांनी त्या पैशाच्या स्वरूपात दिल्या तर त्याचा विनीयोग ते संस्थान सामाजिक कार्यासाठी करू शकेल, पण नवस फेडायचा म्हणून देवाला दागदागिन्यांनी मढवण्यात येते.( मग ते दागिने चोरीला का जाईना). एकीकडे किमान साठ टक्के भारतीय जनता दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगते आहे आणि दुसरीकडे देवालयांच्या तळघरातून कोट्यावधींचे दागिने पडून आहेत !! विशीष्ट प्रार्थनास्थळांच्या विश्वस्त मंडळावर वर्णी लागावी म्हणून राजकारण सुरू आहे. "एकाच परमेश्वराची आपण लेकरे" असे म्हणत तिकडे दर्शनासाठी वेगवेगळ्या ’किमतीच्या’ रांगा लागतायत. मुस्लीम धर्मातही जातीनिहाय वेगवेगळ्या मशिदी आहेत. ख्रिश्चन धर्मसुद्धा या भेदभावाला अपवाद नाही.

भक्ती कशी करावी ही वैयक्तिक बाब आहे पण ती डोळस असायला नको का? समाजविघातक अंधश्रद्धांना केवळ कायदा प्रतिबंध करू शकत नाही. विज्ञानवादी दृष्टीकोनाचा अंगीकार, विवेकबुद्धीचा वापर, प्रयत्नवादाचा स्वीकार आणि धर्मातील शिकवणुकीचा खरा अर्थ समजून घेण्याची इच्छा हाच त्यावरील ठोस उपाय आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय (जन्म, आयुष्यातील अतर्क्य घटना आणि मृत्यु) हे नियतीच्या किंवा निसर्गाच्या हाती आहे असे मानले तरी दैवावर हवाला न ठेवता अव्याहतपणे कर्म किंवा कृती करत राहणे हेच मानवाचे जीवीतकार्य आहे, याबाबत कोणत्याच धर्मात दुमत नाही.
"सातों दिन भगवान के, क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक, भूखा रहे फकीर"

Saturday, August 25, 2012

बापाचं नाव आणि एकाकी मातृत्व

"कायद्याने ज्‍याला बाप म्हणून सिद्ध करायची वेळ आली, त्‍याच्‍याकडून आता काय मागायचे," ही रोहित शेखरच्या आईच्या जखमी मनाची प्रतिक्रिया. एका आईची वेदना आणि बापाने आपले पितृत्व स्वीकारले नाही तरी किमान जगासमोर मान्य करावे यासाठी एका मुलाने दिलेली झुंज असा हा दुहेरी लढा ५ वर्षे चालला. गेल्या पंधरवड्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे (डी.एन.ए चाचणीच्या मुख्य पुराव्यानुसार) रोहित शेखर हा ज्येष्ट राजकीय नेते (माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल) एन. डी. तिवारी यांचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले. "एकल पालकत्व" अशा निभावणार्‍या कित्येक सामान्य स्त्रियांना मात्र आपल्या मुला/मुलीला "औरस" अपत्य म्हणून अशी ओळख देता येत नाही कारण त्यांच्या बापाला जगासमोर आणण्यासाठी झगडण्याइतका वेळ, पैसा आणि हिंमत त्यांच्याजवळ असतेच असे नाही. प्रश्न आहे तो मायबापाच्या दोन्ही भूमिका जर आईने सक्षमपणे पार पाडल्या असतील तरीही जगाला "बाप दाखवण्याची" गरज मुळात का भासते हा!

कोणतेही प्राथमिक वर्गाचे शालेय पुस्तक उघडा, त्यात एक तरी चौकोनी कुटुंबाचे चित्र असते. मुलांची आदर्श कुटुंबाची व्याख्या अशा चित्रातून तयार होत जाते. निकोप कौंटुंबिक नात्यासाठी घरात पित्याचे असणे आवश्यक असते हे कित्येक संशोधनातून सिद्ध झाले आहे. वडील हेच कित्येक मुलांचे "रोल मॉडेल" असतात, तर मुलगी भावी पतीमधे पित्याचे भावलेले गुण शोधत असते. तर अशा चित्रात "गायब असलेल्या" वडीलांबद्दल समाज जेव्हा त्या मुलांना वेडेवाकडे प्रश्न विचारू लागतो आणि मग हेच प्रश्न मुलं आईला विचारू लागतात तेव्हा अखेर ती स्त्री खचते, तिच्या या अवस्थेला तिच्याइतकाच जबाबदार असणारा पुरूष मात्र केवळ निसर्गाच्या कृपेने उजळ माथ्याने समाजात खुलेपणाने वावरत असतो. ही कुमारी माता किंवा टाकलेली बाई, म्हणून कुत्सीतपणे बोट दाखवणारा समाज "हा बिनलग्नाचा किंवा टाकलेला बाप" म्हणून कधी कुठल्या पुरूषाच्या वाटेला जातो काय?
भारतीय स्त्रिया "सिंड्रेला सिंड्रोम" मधे जगतात असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजेच त्या एका स्वप्नाळू जगात वावरत असतात ज्यात कुणी एक राजपुत्र येऊन तिला घेऊन जातो आणि मग दोघे सुखाने नांदू लागतात वगैरे. प्रत्यक्षात असं क्वचित घडतं. मुलीला दिवस गेले की बहुतेक वेळा हे तथाकथित "राजपुत्र" अंतर्धान पावतात. पोलिसी खाक्यामुळे नाईलाजाने "प्रकटले" तरी "तो मी नव्हेच" म्हणून हात झटकतात. आपल्याजवळ पुरेसे शिक्षण, कामाचा अनुभव एवढेच नव्हे तर साधे व्यवहारज्ञानही नाही एवढी अक्कल त्या मुलींना येईतो उशीर झालेला असतो. (याला दुसरी बाजू देखील आहे, चैनीची चटक लागलेल्या काही महिला पैशासाठी पुरूषांचा वापर करून घेतात, त्यामुळे अशा वर्तनाच्या महिलेला अपत्य झाल्यास ते स्वीकारणार कोण! परंतु अशा महिलांचे प्रमाण पीडीत महिलांच्या तुलनेने बरेच कमी आहे.)

लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण केले जाणे याकडे समाज अजूनही गांभीर्याने पाहत नाही. मुलीची त्यात एका अर्थी संमती होतीच ना, आता मनासारखे झाले नाही म्हणून हा कांगावा, असे म्हणताना हे सोयीस्करपणे का विसरले जाते की या संबंधांत पुरूष तितकाच दोषी असूनही होणार्‍या अपत्याच्या आयुष्याची थेट जबाबदारी फक्त स्त्रीवर येते? मग स्त्रीने स्वयंनिर्णयाने असो वा नाईलाजाने, अखेर एकटीने अपत्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर त्या स्त्रिच्या मुलांनी अशा "नाकर्त्या" बापाचे नाव लावलेच पाहिजे हा समाजाचा अट्टाहास का? कुलमाहात्म्य जपण्यासाठी आणि वारसाहक्कासाठी ? पण अशा नात्यात तर दोन्ही मिळणार नसते.

खरं तर स्त्री-पुरूषाचं नातं नैतिक असो वा अनैतिक, त्या नात्यातून जगात येणारा निष्पाप जीव कसा अपवित्र असू शकेल? अभिनेत्री नीना गुप्ताने याच प्रश्नाचे उत्तर मसाबा या मुलीला जन्माला घालण्याचा निर्णय घेऊन शोधले आणि ती वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू- व्हिवीअन रिचर्ड्सची मुलगी असल्याचे जगाला (कोणतेही पुरावे न देता) स्पष्टपणे सांगितले. रवीना टंडन, सुश्मिता सेन यांनी तर स्वयंनिर्णयातून मुली दत्तक घेऊन एकल मातृत्व स्वीकारले आहे. संजय ’लीला’ भन्साली या सिनेदिग्दर्शकाने आईच्या कष्टांना आदरांजली म्हणून तिचे नाव मधे लावले आहे. उच्चभ्रू आयुष्यातील प्रायव्हसीच्या कल्पनांमुळे भारतीय समाज ग्लॅमरजगतातील अशा घटनांकडे मात्र अलिप्तपणे पाहतो. (अर्थात समाजाचे प्रतिबिंब मानले जाणारे (!) मागील काही दशकातील कित्येक हिंदी सिनेमे बघा, त्यातल्या "मा" काबाडकष्ट करून मुलाला वाढवतात पण मुलगा उर्फ हीरो सिनेमाभर त्याच्या परागंदा बापाला शोधत असतो.)

सिनेमाचं सोडा, सर्वसामान्य स्त्रियांसाठी "एकाकी मातृत्व" निभावणे म्हणजे सामाजिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या आगीशी खेळ असतो. विधवांच्या बाबतीत वरवर तरी हळहळणारा (आणि मागे बर्‍याचदा खमंग चर्चा करणारा) समाज त्यांच्यासह परित्यक्ता-घटस्फोटीत महिला आणि त्यांच्या अपत्यांकडे शंकेखोरपणे पाहत असतो. अगदी शाळेतल्या प्रवेशापासून या प्रश्नाची धग जाणवायला सुरूवात होते. आता शाळांमधून आईचेही नाव लिहीणे अनिवार्य झाले असले तरी मुलाची ओळख त्याच्या वडिलांच्या नावाशिवाय अपूर्ण असते हे कठोर सामाजिक वास्तव आहे. सामाजिक चळवळीतले काही कार्यकर्ते (आणि "कोल्हाट्याचं पोर" हे आत्मवृत्त लिहून आपली वेदना जगासमोर मांडणारे कै. डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्यासारखे अपवाद) तेवढे न कचरता आईचे नाव लावतात.

मग पुरूषांना अकारण जाळ्यात अडकवणार्‍या, चोरट्या संबंधातून जन्माला आलेल्या पोटच्या नवजात अर्भकांना कचराकुंडीचा रस्ता दाखवणार्‍या पाषाणहृदयी स्त्रिया समाजात आढळून येत नाहीत का? येतात. घटस्फोटामुळे मूल नाईलाजाने आईच्या ताब्यात द्यावं लागून त्याचा विरह आजन्म सोसणारे दुर्दैवी बाप नसतात का? असतात. पण सर्वसाधारणपणे एकल मातृत्व जिद्दीने निभावण्याचा प्रयत्न करणार्‍या स्त्रियांचं प्रमाण पुरूषांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. बापाने अपत्याची जबाबदारीच नव्हे तर बाप असल्याचच नाकारल्याची कित्येक उदाहरणे आढळून येतात.

अनैतिक संबंधांचे समर्थन समाजाने करावे असे येथे अजिबात म्हणायचे नाही पण त्यातून जन्माला आलेल्या निरागस जीवांना "एक माणूस" म्हणून जगण्याचा अधिकार समाज कधी देणार? "बाई" चुकू शकते पण "आई" ही नेहमीच पवित्र असते, हे सत्य समजून घेण्याइतका आपला समाज कधी प्रगल्भ होणार? केलेल्या कृत्याची जबाबदारी न घेण्याचा भेकडपणा दाखवणारे बाप नाहीतरी असून नसून सारखेच तरीही असे किती रोहित समाजाला "बाप दाखवण्यासाठी" स्वत:च्या "भावनांचे श्राद्ध" घालत राहणार? निदान, जिने त्या जीवाची जबाबदारी स्वीकारण्याची धमक दाखवली तिचेच नाव लावणे ही त्या अपत्याची "खरी आणि पुरेशी" ओळख आहे हे समाज कधी मान्य करणार?

Saturday, July 21, 2012

ताडन की अधिकारी ?

"ढोर, गवार, पशु और नारी.. यह सब ताडन के अधिकारी".
सुंदरकांडाच्या कार्यक्रमात समस्त भाविक (स्त्रिया देखील) वाद्यांच्या गजरात हे वाक्य सहजपणे गातात. ’महापुरुषांच्या नजरेतून स्त्री’ या मंगला आठलेकरांच्या पुस्तकात तर जवळपास प्रत्येक धर्मग्रंथात अशा अर्थाची वाक्य असल्याचे संदर्भासह चर्चिले गेले आहे. त्यात बदल कोण करणार, कारण पोथीत लिहीलंच आहे तसं, म्हणजे ते योग्यच असायला हवं(!).
पतीकडून अशी मारहाण (ताडन) होण्यात काही विशेष आहे असे तर आजही मानले जात नाही. दिल्या दोन ठेवून तर काय होतं, बायकोच आहे त्याची आणि तो त्या जोडप्याचा खाजगी प्रश्न आहे असे म्हणून समाज मोकळा होतो. ह्याच समाजाचा एक भाग, पुरूषी मनोवृत्तीमुळे, एखाद्या बाईला ठोकून काढण्याचा, तिच्यावर अत्याचार करण्याचा आपल्याला जणू जन्मजात अधिकार आहे असं मानू लागतो तेव्हा ही गोष्ट अधिकच गंभीर होते. (आमीरच्या 'सत्यमेव जयते'चा एक संपूर्ण एपिसोड याविषयावर केंद्रित करण्यात आला होता.) स्त्रीने मर्यादशील असावं तरच संस्कृती टिकून राहते असं समाज मानतो. तालिबान्यांच्या मानाने भारतात आपण स्त्रियांना केवढं (!) स्वातंत्र्य "देतो" पण त्याचा स्त्रीने "दुरूपयोग" करू नये म्हणून तिच्यावर जरा वचक ठेवावा लागतो अशी उदार(?) भूमिका घेणार्‍या आणि स्त्रीने कसं, सीतेसारखं असावं अशी अपेक्षा करणार्‍या पुरूषांना आधी आपण प्रभू रामचंद्रांइतके आदर्श आहोत का हा प्रश्न का पडत नाही?

नुकतंच गुवाहाटीच्या एका पबमधे काही युवक युवतींनी पबमालकाशी भांडण केल्यामुळे त्याने त्यांना बारमधून हाकलून दिले. यातल्या एका तरूणीला १५-२० जणांनी घेरले आणि मारहाण, छेडछाड करून तिचा विनयभंग केला. या अत्याचारामागे कोणाचा खरा हात आहे, त्या तरूणीने मद्यप्राशन केले होते की नाही, यावर वाद-विवाद चालू आहेत. पण म्हणून विनयभंगासारखी कृती क्षम्य ठरूच शकत नाही. २००९ च्या सुरूवातीस एका संस्कृतीरक्षणाचा दावा करणार्‍या संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही मंगलोर येथे पबमधे नाचणार्‍या काही मुलींना बाहेर खेचत आणून मारले होते. मुलींनी वाटेल तसे कपडे घालून अचकट-विचकट हावभाव करीत नाचणे, दारू पिणे ही नक्कीच अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि मुलांनी? मुलांनीही असभ्य वर्तन करणे किंवा दारू पिणे ही तितकीच वाईट गोष्ट आहे. स्त्री असो वा पुरूष, बेताल वागण्याचे वैयक्तिक आणि सामाजिक दुष्परिणाम हे होतातच. मग हे संस्कृतीचे ठेकेदार अशा मुलांना-पुरूषांनाही का वठणीवर आणत नाहीत? शारिरीक प्रत्युत्तर मिळेल या भीतीने की पुरूषांना सगळं माफ आहे म्हणून? फक्त मुलींनाच धडा शिकवण्याची जबाबदारी ते काय पुण्याचे काम म्हणून घेतात?
गुवाहाटी केसमधे, नाहीतरी ती मुलगी पबमधे जाणारी म्हणजे वाया गेलेली होती, "संस्कृती बुडवणारी" होती म्हणून तिच्या विनयभंगाला गंभीर घटना न मानणारे, निषेध न करणारे तरी नेमकी कोणती संस्कृती जपत बसले आहेत? वाट चुकलेल्या मुलींना कानफटात लगावून सांगितले म्हणजे त्या ठिकाणावर येतात असे याचे समर्थन केले जात असेल तर तो अधिकार आणि ती जबाबदारी त्या मुलींच्या पालकांची आहे. समाजाने अशा घटनांविरूद्ध निव्वळ बघ्याची भूमिका घ्यावी असे अजिबात नाही. समाजाचे शुद्धीकरण करण्याची खरोखरच ज्यांना तळमळ आहे त्यांच्यासाठी अशा वर्तनाविरूद्ध कायदेशीर तक्रार करणे, वाट चुकलेल्यांना समुपदेशन करणे, केस कठीण असेल तर वैध मार्गाने समज देणे, शाळा-कॉलेजातून प्रबोधनपर कार्यशाळा घेणे असे इतरही मार्ग आहेत.

एखाद्या मुलीवर अत्याचार झाला तर तिच्याच वागण्यात काहीतरी खोट असेल असाही निष्कर्ष सर्रास काढला जातो. तिचे चारित्र्यहनन करणार्‍या पुरूषांजवळ स्वत:च्या चारित्र्याचे कोणते प्रमाणपत्र असते? गुवाहाटी प्रकरणात प्रत्यक्ष अत्याचार करणार्‍यांइतकेच निंदनीय कृत्य तब्बल अर्धातास ही "फुकटची मजा (?) बघणार्‍या" इतर लोकांनी केलं आहे. असेही नाही की आपल्याकडे फक्त व्यसनी, व्यभिचारी किंवा उच्छॄंखल स्त्रियांनाच अद्दल(!) घडवली जाते. तसे असते तर निदान साधे सरळ जीवन जगणार्‍या मुलींबाळींना अगदी शालेय जीवनापासून छेडखानीला, पुरूषी अत्याचारांना सामोरे जावे लागले नसते. सगळ्याच स्त्रिया आदर्शत्वाच्या पुतळ्या असतात आणि पुरूष राक्षस असतात असे नक्कीच नाही उलट स्त्रियांच्या प्रश्नाला बहुतांशी पुरूषांनीच तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून वाचा फोडली आहे. तरीही स्त्रियांवरील अत्याचारांचे देशभरात वाढत चाललेले प्रमाण (ते देखील नोंद झालेले- अन्यथा समाजाच्या, प्रतिष्ठेच्या भीतीने किती स्त्रिया मुकाट्याने अत्याचार सहन करतात त्याची गणतीच नाही) स्त्रियांची एकंदर सामाजिक स्थिती काय आहे ते सिद्ध करायला पुरेसे आहेत.
 
"स्त्री ही एक व्यक्ती आहे, तिला तिच्या इच्छेनुसार जगता-वागता यायला हवं. स्त्रीला पुरूषाच्या आधाराशिवाय जगता येण्याचा हक्क आहे आणि तिची तशी कुवतही आहे" असं लेखिका सुनीता देशपांडे यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात हे फक्त कणखर मनाच्या मोजक्या स्त्रियांच्या बाबतीत शक्य आहे. बाकी स्त्रियांसाठीचे नियम नेहमीच पुरूषांनी ठरवल्याचे इतिहास (आणि वर्तमानही) सांगतो. मुलीच्या जातीने कसं वागावं हे ऐकतच ती मोठी होते. पुरूषांना मोकाट सोडायचे आणि स्त्रियांना वेसण घालायची असा दुटप्पी "न्याय" आजही आहे. ताजे उदाहरण घ्यायचे तर उत्तरप्रदेशातील असार गावच्या ग्रामपंचायतीने या बाबतीत कडीच केली आहे. त्यांचा आदेश आहे की छेडखानीवर उपाय(?) म्हणून आता चाळीशीच्या आतील महिलांनी एकटीने बाजारात जायचे नाही (छेडखानी ही विकृती आहे, आणि विकृतीला वय-वेळ-स्थळ असे कोणतेच भान नसते हे यांना कोणी सांगायचे? त्यावर महिलांच्या संचारस्वातंत्र्यावर गदा आणणे हा उपाय कसा असू शकतो?) दुसरा आदेश असा की प्रेमविवाहांचे प्रमाण वाढते आहे म्हणून (फक्त) तरूणींनी मोबाईल वापरायचा नाही. उ.प्र. सरकार याविरूद्ध कारवाई करेल अशी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांना "आशा" आहे कारण या फतव्याला कायदेशीर आधार नाही. मात्र स्थानिक समाजाचा दबाव तो जारी करायला भाग पाडेल त्याचं काय? एकीकडे जिंद (हरियाणा) येथे महाखापपंचायतीने स्त्रीभ्रूण हत्येला खून मानले जावे असा अभिनंदनीय निर्णय घेतला आहे तर दुसर्‍या टोकाला असर-पंचायतीने स्त्रियांच्या "माणूस" म्हणून जगण्याच्या हक्कावर प्रश्नचिन्ह उमटवणारे फतवे काढले आहेत. लेखिका कविता महाजन यावर प्रहार करताना म्हणतात "खरं तर या पुरुषांविरुद्धच फक्त एक फतवा काढावा की त्यांनी यापुढे बायकांविरुद्ध अजिबात फतवे काढायचे नाहीत !!"

स्त्रियांनी काय घालावे- कसे वागावे हे ठरवणार्‍या समाजाचे संतुलन फक्त स्त्रिया सुधारल्याने कसे होऊ शकेल? हे खरे आहे की देहप्रदर्शन करणार्‍या कपड्यांमुळे, स्वैर वागणुकीमुळे स्त्रियांवरील अत्याचाराच्या शक्यता नक्कीच वाढतात, नुकतंच गहना वशिष्ट या मॉडेलने अपुर्‍या कपड्यात कमरेला तिरंगा ध्वज गुंडाळून नाच केला. साहजिकच तिला प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागले. येथे ती स्त्री आहे की पुरूष हा विचार न करता तिचा कडकडून निषेध होणे आवश्यकच होते. त्यामागे कुणीही देशाच्या अस्मितेच्या प्रतीकाच्या वाटेला जायची यापुढे हिंमत करू नये अशी जनतेची भावना होती.(मात्र ही गहना कोण- तिने नेमके काय केलेय हे माहीतही नसलेल्या बघ्यांनी गर्दीत शिरून तिला मारहाण करायची "संधी" सोडली नाही याला काय म्हणायचे!) त्याचबरोबर हे ही खरे की व्यवस्थित कपडे घालणार्‍या आणि यथायोग्य वर्तणूक असणार्‍या सभ्य स्त्रियांना देखील समाजाकडून सुरक्षिततेची, सन्मानाची कोणतीही हमी नाही. शिवाय सभ्य कपड्यांची व्याख्या ही परिस्थितीनुसार बदलते आणि स्वीकारली जाते. नऊवारी साडीच्या जमान्यात पाचवारी साडी नेसणार्‍या मुलींना "वाह्यात कुळबुडव्या" म्हटले जाई हे आता हास्यास्पद वाटते. (आज एकेकाळची सभ्य नऊवारी साडी आयटम सॉंगमधला कॉस्च्युम झालेली आहे.) टेनिसच्या मैदानावर सानिया मिर्झाचे मिनी स्कर्ट घालणे आवश्यक तर तसाच मिनीस्कर्ट एखाद्या मुलीने कॉलेजमधे घालणे (अजून तरी) अयोग्य मानले जाते. सानियाच्या पोशाखाविरूद्ध देखील जमातीचा फतवा निघाला होता पण सानियाने तो धुडकावून लावला, नाहीतर महिला टेनिस मधली भारताची एकमेव आशाही (स्कर्ट्च्या लांबीमुळे धडपडत) संपली असती.ते असो.

कुणी म्हणेल काळ कितीही बदलला तरी निसर्गनियमानुसार मूल फक्त स्त्रीलाच होऊ शकतं म्हणून नीतीमत्ता जपणं ही तिचीच काय ती गरज आहे, नाहीतर त्यात तिचीच नाचक्की आहे. ही अत्यंत सदोष विचारपद्धती आहे. झाकली मूठ सव्वालाखाची असणार्‍या आणि स्त्रीच्या नैतिकतेचा न्यायनिवाडा करण्याचा आपल्याला निसर्गदत्त अधिकार असल्याचा गैरसमज असणार्‍या "फतवेबहाद्दर" पुरूषांमुळे समाजाचे मोठे नुकसान तर होतेच आहे. पण स्त्री विषयक नियमावलीला, तिच्यावरील अत्याचाराला असलेले समाजाचे मूक पाठबळ यात सर्वाधिक दोषी आहे. पुरूषसत्ताक पद्धतीत स्त्रिया दुय्यम ठरतात तर एकेकाळच्या मातृसत्ताक पद्धतीमधे पुरूषांना नगण्य स्थान होते. ही दोन्ही टोके सोडून देऊन "मानवसत्ताक" समाजाकडे आपली वाटचाल व्हायला हवी आहे. समाज निकोप व्हायला हवा असेल तर एकच साधा नियम आहे, त्यातलं प्रत्येक मूल्य हे प्रत्येक माणसासाठी सारखं असायला हवं.. मग ती स्त्री असो वा पुरूष. त्यातच दांभिकपणा असला तर संस्कृतीरक्षणाचं कातडं डोळ्यावर ओढून काय साधणार आहे? प्रत्येक व्यक्तीवर घराघरातून-समाजातून समानतेचे संस्कार जोवर केले जात नाहीत तोवर अत्याचाराने किंवा नुसते स्त्रियांवर निर्बंध लादून, कोणतेही सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न कधीच सुटणार नाहीत.

मनातला खिसेकापू

"आपल्याला वस्तूची किंमत चांगली कळते पण कशाचंही मूल्य समजत नाही" असं ऑस्कर वाईल्डने म्हटलय. "किंमत" आणि "मूल्य" यातला फरक न समजणार्‍यांसाठी असेल, पुण्यातल्या "हॉटेल विश्व" मधे पाण्याच्या पेल्याच्या तळाशी खालच्या बाजूने लिहीलेले असायचे "हा ग्लास हॉटेल विश्व मधून चोरलेला आहे". "चुकून" हा ग्लास कुणी उचलून घरी घेऊन जाण्याच्या भानगडीत पडू नये म्हणून त्या हॉटेल व्यवस्थापनाने ही पुणेरी शक्कल लढवली असावी. एकीकडे या युक्तीची गंमत वाटली पण दुसरीकडे असे लिहावे लागावे याची एक भारतीय म्हणून खंत वाटली. परद्रव्याचा (वस्तूचा) मोह पाप मानणारी हिंदू संकल्पना असो, अस्तेय तत्त्वाचा पुरस्कार करणारे जैन आचारसूत्र असो किंवा "thou shall not steal" सांगणारी बायबलमधील आज्ञा.. सगळ्याचे सार एकच. मात्र बहुसंख्य भारतीयांच्या मनात आदरणीय असलेली "मूल्यं" आणि त्यांची व्यवहारातली "किंमत" यात मात्र प्रचंड तफावत आढळते. भारतात जागोजागी (अगदी धार्मिक स्थळीदेखील) "खिसेकापूंपासून सावध राहा" अशा पाट्या असतात. या सावधगिरीबरोबर एखादा खिसेकापू आपल्याच मनात तर राहत नाही ना याचा आपण शोध घ्यायला हवा आहे.

साधं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलाला, वर्गमित्राचा पेन त्याने न विचारता "उचलून" आणला म्हणून रागावणारे वडील स्वत: मात्र ऑफीसमधला पेन-स्टेशनरी सर्रास घरी आणत-वापरत असतील तर? मग प्रामाणिकपणाचे संस्कार मुलावर करण्याचा नैतिक हक्क त्यांना आहे? सरकारी कार्यालयांमधल्या वस्तू (वस्तूच नव्हे गाड्या आणि हाताखालची माणसे सुद्धा) "आपुलकीच्या" भावनेने घरी वापरायला-कामाला उचलून आणण्यात काही गैर आहे असे मुळात आपल्याकडे कित्येक सरकारी कर्मचार्‍यांना वाटत नाही. बर्‍याच शाळांमधल्या प्रयोगशाळेतला एखादा संगणक, फर्निचर प्राचार्य किंवा इतर अधिकार्‍यांच्या घरी वापरले जाते. खाजगी कंपन्यांमधे देखील कमी अधिक प्रमाणात "पराया माल अपना" मानण्याच्या घटना घडत असतात. रात्री जास्तीचे सरकारी काम करताना, ते काम पूर्ण होताच सरकारी मेणबत्ती फुंकून टाकायची आणि खाजगी कामासाठी स्वखर्चाने दुसरी मेणबत्ती पेटवायची इतक्या उदात्त पातळीवर पोचलेले मंत्रीगण स्वातंत्र्यानंतर याच देशात होऊन गेले. मात्र आज जनतेच्या विकासकामांचा निधी जिथे कित्येक राजकारणी उचलून नेतात तिथे सामान्य माणसाच्या उचलेगिरीबद्दल काय सांगावे. आपल्या भारतीय रेल्वेमधील डब्यांची अवस्था पाहा. आरसे, दिवे अगदी स्वच्छतागृहातले मग देखील उचलून न्यायचे लोक सोडत नाहीत. बसमधल्या प्रथमोपचार पेट्या गायब होतात. सार्वजनिक पाणपोईवरच्या "साखळदंडांना न जुमानता" पेले काढून नेले जातात. "राष्ट्रीय संपत्तीवर" आपलाही हक्क आहेच अशी त्यामागे "आपलेपणाची" भावना असावी बहुधा. "उचलेगिरी" हा भारतीयांचा फार मोठा अवगुण आहे. याचा अर्थ जगातल्या इतर देशातील सगळे लोक प्रामाणिक आहेत असा नव्हे पण तुलनेने उचलेगिरीत भारतीयांचा क्रमांक बराच वरचा आहे ही शोचनीय वस्तुस्थिती आहे.

गरिबी आणि त्यातून निर्माण होणारी अगतिकता हे याचे कारण असावे असे मुळीच नाही. गरिबी हेच कारण असते तर निदान सुखवस्तू लोकांना उचलेगिरी करायची काय गरज? पण असे होत नाही. परदेशात, विशेषत: युरोप- अमेरिकेत जाऊन आलेले पर्यटक तिकडच्या प्रामाणिकप्रणाची स्तुती करतात. मॉल नसतील तिथे वर्तमानपत्रे, भाजी, फळे किमतीच्या बिल्ल्यासह मांडून ठेवलेली असतात. स्थानिक लोक प्रामाणिकपणे त्या बिल्ल्यावर लिहीलेल्या किंमतीनुसार शेजारी ठेवलेल्या पेटीत पैसे टाकून वस्तू घेऊन निघून जातात. पर्यटन कंपन्यांचा अनुभव असा आहे की परदेशातील अशा घटनांचे कौतुक करताना कित्येक भारतीय पर्यटक नकळत स्वत: करत असलेली उचलेगिरी विसरून जातात. हॉटेलमधल्या टॉवेलपासून शक्य असेल त्यातले बरेच काही ते घरी घेऊन येतात. प्रवासी कंपन्यांकडून फक्त ब्रेकफास्ट-जेवण पुरवले जाते, अधेमधे भूक लागली तर कशाला खर्च करा, म्हणून काही पर्यटक एका वेळी खाऊ शकणार नाही एवढे पदार्थ मागवतात. त्यातून उरलेले वाटेत खायला म्हणून खुशाल रॅप करून हळूच खिशात टाकून नेतात. नायगारा फॉल्स सारख्या जगप्रसिद्ध ठिकाणी पुनर्वापर करता येतील असे रेनकोट्स दिले जातात. ते तिथे नंतर जमा करायचे असतात. काही पर्यटक ते "आठवण"(?) म्हणून घरी घेऊन येतात. कित्येक प्रवासी कंपन्या परदेशात कसे वागावे यासाठी हल्ली प्रवासपूर्व कार्यशाळा घेऊ लागल्या आहेत. पण आपल्याच देशात कसे वागावे याच्या कार्यशाळा कोणी आणि कुठे घ्यायच्या? संत-परंपरा असणार्‍या, थोर सांस्कृतिक मूल्ये जपणार्‍या आपल्या देशात ही उचलेगिरीची कीड समाजातल्या सगळ्या स्तरांमधे का झिरपत गेली असावी ?

देशप्रेमाचा आणि सामाजिक शिस्तीचा अभाव हे यामागचे एक महत्वाचे कारण आहे. एवढं चालायचच असा लोकांचा दृष्टीकोन होऊ लागला आहे. जपानमधे त्सुनामी नंतर जो उत्पात झाला तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. साहजिक बिलींग- सुरक्षा यंत्रणा बंद होत्या तरीही मॉल मधून खरेदी करणारे लोक हातातल्या वस्तू जिथल्या तिथे तशाच ठेवून शांतपणे बाहेर पडले. अशी सामाजिक शिस्त आणि सचोटी आपल्यामधे उतरणे फार गरजेचे आहे. सामान्य जनतेचं सोडाच, आपले सांस्कृतिक क्षेत्रही याला याला अपवाद नाही. परदेशी कथानकांची-चित्रपटाची जशीच्या तशी नक्कल करणे हा तर आपला जणू अधिकारच आहे. मग तो शोमन म्हणून नावाजलेल्या राजकपूरचा "चोरी चोरी" असो (त्यांनी तर नावातच कबुली देऊन टाकली) वा संजय भन्सालीचा "ब्लॅक". कधी कधी तर एकाच वेळी दोन संगीतकार एकाच विदेशी गाण्याची चाल उचलतात आणि मूळ चाल (म्हणजे पहिली चोरी) कुणाची यावर वाद घालतात. दुसर्‍याची कविता आपल्या नावावर खपवण्याचे प्रकार उघडपणे चालतात. एखाद्या शैलीचा-विचारांचा कलाकृतीवर-लेखनावर प्रभाव पडणे, प्रेरणा घेणे हे कलाकारांच्या बाबतीत घडणारच पण एरवी, हे अमुक एका कलाकृतीचे रूपांतर आहे असे स्पष्टपणे मान्य करण्याचा, मूळ निर्मात्याला त्याचे श्रेय देण्याचा मोठेपणा का दाखवला जात नाही? जेथे इतर साहित्यिकांचे वेचे वापरले आहेत तिथे त्यानुसार स्पष्ट उल्लेख असायला हवा. पण लक्षात कोण घेतो? किंवा लक्षात घ्यायचेच असते कुणाला. आत्म्याच्या पारदर्शतेचे दाखले देणार्‍या अभंगांमधे "तुका म्हणे" "नामा म्हणे" अशी संतांची "स्वाक्षरी" शेवटी असल्याने नाईलाजाने का होईना ते अभंग साहित्यिक खिसेकापूंपासून सुरक्षित राहिले आहेत.

उचलेगिरी ही चोरीच आहे ही जाणीव मुळात मनात भिनली पाहिजे. बर्‍याचदा "नाहीतरी कुणाला कळतय" म्हणून "कुणी पाहत नाही" म्हणून अशी उचलेगिरी सर्रास केली जाते तेव्हा ही बोधकथा आठवते. एका आश्रमातील शिष्य एका लहानशा पक्ष्याला पकडतो आणि गुरूंना विचारतो "मी याला मारू का? ".गुरू म्हणतात "अवश्य, पण कुणीही ते पाहता कामा नये". शिष्य त्या पक्ष्याला घेऊन निर्जन स्थळी जातो. तो पक्ष्याला मारणार तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की हा पक्षी पाहतो आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मी" पाहतो आहे. मनोमन गुरूला नमस्कार करून शिष्य त्या पक्ष्याला सोडून देतो. इथे गुरूइतकाच, आत्मज्ञान झालेला शिष्य श्रेष्ट ठरतो. ज्याचे आपण वरवर सुकृती म्हणून समर्थन करतो अशा आपल्या प्रत्येक कृतीकडे, या शिष्यासारखेच आत्मदीप पेटवून, योग्यायोग्यतेचा निकष लावून, आपण "स्वत:" पाहायला हवे.

वाल्या ते वाल्मिकी

वाल्या ते वाल्मिकी - चांगुलपणाच्या शोधाचा प्रवास

माणूस जन्मत:च चांगला किंवा वाईट नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. मात्र चुकांची कबुली देण्याचं धाडस त्याने दाखवलं तर आयुष्य त्याला आणखी एक संधी देऊ शकतं. बर्‍याचदा साधे सरळ जीवन जगणारे लोक क्षणिक उद्वेगात, रागाच्या भरात मोठी चूक करून बसतात आणि जन्मभरासाठी गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळी येतो. काही जण नशेमधे, काही जण आत्मसंरक्षणासाठी तर काही जण दबावामुळे असे काही कृत्य करतात ज्याचा त्यांना जन्मभर पश्चाताप करावा लागतो. शिक्षा भोगता भोगता त्यांच्यातले माणूसपण आतच विझू लागते. अट्टल गुन्हेगारांच्या संगतीत निर्ढावायच्या आत त्यांच्या आतल्या माणूसपणाला साद घालण्याचा प्रयत्न केला गेला तर तो प्रयत्न त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. गुन्हेगाराला माणूस म्हणून पुन्हा एकदा जगण्याच्या प्रवाहात आणू शकतो.
"वाल्मिकी प्रतिभा" ही रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेली नाटिका, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला त्याची ही कथा. या नाटिकेत क्रूर डाकूंची एक टोळी जंगलात वास्तव्य करीत असते. प्रथेप्रमाणे देवीपुढे नरबळी देण्यासाठी हे डाकू जंगलात वाट चुकलेल्या एका चिमुकल्या मुलीला पकडून आणतात. मला मारू नका-मारू नका असे ती मुलगी आर्तपणे विनवू लागते पण डाकूंना धुंदी चढली असते. ते तिला बळी देणार इतक्यात त्या कोवळ्या मुलीचा करूण चेहरा पाहून, त्या डाकूंच्या सरदाराचे मन एकदम द्रवते, तलवार फेकून तो त्या मुलीला हृदयाशी धरतो. इतर डाकू हे पाहून संतापतात आणि सरदाराला बोल लावतात. परंतु त्या क्षणी हृदयपालट झालेला सरदार आमूलाग्र बदलतो..वाटमारीचा धंदा सोडून त्या बालिकेचा सांभाळ करू लागतो. सरस्वती देवी प्रकट होऊन त्याला म्हणते "मीच या बालिकेचे रूप घेऊन तुझी परिक्षा पाहिली व त्यात तू उत्तीर्ण झालास", एवढे बोलून आपली वीणा सरदाराच्या हाती सोपवून सरस्वती अंतर्धान पावते. नाटिका संपते.

या नाटिकेचा प्रयोग मध्यंतरी पुण्यातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात झाला. त्याचे वेगळेपण म्हणजे यात भूमिका करणारे सगळे कलाकार कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी जेलमधले कैदी होते. या कैद्यांची राहायची-ने आण करण्याची व्यवस्था पुणे पोलिसांनी केली होती असा या बातमीत आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. यातील सरदाराची- मुख्य भूमिका करणारा कलाकार तर जवळपास १७ केसेसमधे अडकलेला गुंड. या कैद्यांना घेऊन ही नृत्यनाटिका बसवणार्‍या आलोकनंदा यांच्यामुळे या गुन्हेगाराचे मन:परिवर्तन झाले. ही नाटिका म्हणजे जणू त्याचीच कथा. एक मनस्वी व्यक्ती, एक उत्तम कलाकृती आणि त्या कलेचा गुन्हेगाराच्या हृदयातील मरू घातलेल्या भावनांना झालेला हळुवार स्पर्श, काय करामत करू शकतो त्याचेच हे उदाहरण!

मनाबरोबरच जीवनपरिवर्तनाचं उदाहरण ठरलेलं एक वृत्त येथे सांगायलाच हवं. चाळीतल्या मुलांबरोबर उनाडक्या करणार्‍या लक्ष्मण गोळेने वयाच्या १६व्या वर्षी भांडणातून एकावर वस्त-याने वार केला आणि तो तुरुंगात गेला. पुढे त्याच्यावर हाफ मर्डरसह जवळपास १९ गुन्हे दाखल झाले. घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. महात्मा गांधींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि तो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने हळूहळू स्वत:मध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. त्याची वर्तणूक पाहून त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्‍या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगीही झाली. चांगलं बनण्याचा प्रयत्न केवळ समाजाच्या साथीने यशस्वी होऊ शकतो असं म्हणणारा लक्ष्मण "it's never too late" या उक्तीचा प्रत्यय देतो.
लक्ष्मण तर गुन्हेगार असून बदलला. मुळात आपली कायद्याची प्रक्रिया इतकी संथ आहे की गुन्हा सिद्ध न झालेले कित्येक आरोपी केवळ खटला प्रलंबित आहे म्हणून नाईलाजाने तुरूंगात खितपत पडलेले असतात. याचा अर्थ ते निर्दोषच असतात असा नसला तरी तुरूंगातील वातावरणात छोट्या गुन्हेगार्‍यांना अट्टल गुन्हेगारांकडून मोठ्या गुन्ह्यांचे जणू प्रशिक्षणच मिळत असते. यामुळे त्यांच्या सुधारणेच्या शक्यता मावळू लागतात. अर्थात हे सगळ्या गुन्हेगारांना लागू होत नाही. क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या कसाब सारख्या नराधम गुंडांच्या वर्तणूकीत पश्चातापाचा लवलेशही आढळत नाही, अशा खुनशी गुन्हेगारांना मानवाधिकाराच्या नावाखाली माणसात आणण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणाच नव्हे तर त्यांच्या अमानुषतेचे बळी ठरलेल्या निरपराध जीवांचा घोर अपमान आहे. मात्र माणूसपणाची धुगधुगी उरली आहे असे ज्या गुन्हेगारांच्या वर्तनातून जाणवते त्यांना शिक्षा करणार्‍या हातांऐवजी पुनर्वसन करणार्‍या हातांचा आधार मिळायला हवा. तरच त्यांना आयुष्यात नव्याने उभं राहता येईल.

१९९४ चा मॅगसेसे पुरस्कारविजेत्या माजी महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांनी तिहार जेलचे रूपांतर तिहार आश्रमात करून हे सिद्ध करून दाखवले होते. पृथ्वीवरचा नरक म्हणावा अशा वातावरणातला, केवळ २५०० कैद्यांची क्षमता असूनही ८००० पेक्षा जास्त कैदी कोंबलेला तिहार तुरूंग अंमली पदार्थ, कमालीची अस्वच्छता, टोळीयुद्ध, माफिया कैद्यांचे साम्राज्य, हतबल अधिकारी आणि भ्रष्ट कर्मचारी यांच्या विळख्यात सापडला होता. किरण बेदींनी आधी कैद्यांशी सुसंवाद सुरू केला. तुरूंग पंचायत सुरू केली. ग्रंथालय सुरू केले, ध्यान-केंद्र सुरू केले, मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले, कैद्यांना पुढील शिक्षणाला प्रवृत्त करून मुक्त विद्यापीठाचे दालन सुरू केले, कैद्यांचे जीवनमान सुधारले. त्यांच्यातल्या माणसाला जागवले. किरण बेदींचे हे प्रयत्न कित्येक कैद्यांना नवजीवन देऊन गेले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तुरूंगाधिकार्‍यांनी या योजना राबवायला सुरूवात केली.

वाल्या ते वाल्मिकी हे दोन माणसांमधलं द्वंद्व नाही तर एकाच मनाचा अविष्कार असलेल्या दोन वृत्तींमधील द्वंद्व आहे. या द्वंद्वाची जाणीव होणे हीच माणसाच्या बदलण्याची सुरूवात असते मग तो माणूस आमूलाग्र बदलू शकतो. खरं तर परिवर्तन हा माणसाचा स्थायी भावच आहे. त्याचे प्रकट मन नकारात्मक विचार करत असते पण अप्रकट मनाची स्वत:ला बदलण्याची आस चांगुलपणाच्या पहिल्या पायरीवर त्याला घेऊन जाते. गरज आहे ती चांगलं बनण्याची त्याची धडपड समजून घेऊन समाजाने त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची.. त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट शोधायला मदत करण्याची. एखादी व्यक्ती, कला, पुस्तक, विचार, शैक्षणिक यश, शाबासकीची थाप, मायेचा शब्द... यापैकी कशातही हा टर्निंग पॉईंट दडलेला असू शकतो. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या एका संशोधनाने जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते पण आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून ते हादरले..बदलले.. इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल प्राईझ जगविख्यात आहे. तिहार तुरूंगातल्या एका सुशिक्षीत कैद्याचे हे शब्द किरण बेदी यांच्यावर लिहीलेल्या "आय डेअर" या पुस्तकात नोंदले गेले आहेत. तो आपल्या कैदी विद्यार्थ्यांना सांगत असे "भूतकाळात जे घडून गेले ते तुमच्या हातात नव्हते पण भविष्यकाळात तुमच्यातील माणुसकीच बाहेर यायला पाहिजे, तोच प्रयत्न आपण आता करायचा आहे".

Wednesday, June 27, 2012

पाऊस कवितेतला

पाऊस कवितेतला....पाऊस मनातला
पहिला पाऊस पडला आणि मृद्गंध दरवळला की बहुतेक प्रत्येक माणूस मृण्मय होत असावा.. पर्जन्याच्या रूप-गंध-स्पर्शाने कवी होत असावा. पाऊस ही चीजच इतकी विलोभनीय आहे की ती मनामनात अशा कविता सहजपणे लिहून जाते. (मात्र इतरांच्या कानांवर अत्याचार न करता त्या कविता स्वत:च स्वत:ला ऐकवायच्या असतात...) एरवी निसर्गाकडे पाहायला वेळ नसलेलं मन पावसाच्या आणि काव्याच्या सरीत न्हाऊन निघतं. आपल्यासारख्या सामान्यांची ही तर्‍हा, मग प्रतिभेचं देणं लाभलेल्या प्रज्ञावंत कवींना पावसाने आकृष्ट केलं नाही तरच नवल! हिरव्या वाटेवरचे, ना.धों. महानोर हे संवेदनशील निसर्गकवी. त्यांचा शब्द न शब्द हा ओला प्रत्यय देतो..
"मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले.. घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले..
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी... शिडकावा संथ येता पाने निळी कुसुंबी.."
पाऊस पडून गेल्यानंतरचे निसर्गाचे सौंदर्य कवी बा.भ.बोरकर शब्दबद्ध करतात तेव्हा आपणही ते निसर्गचित्र नकळत पाहू लागतो..
"पाऊस रात्री होऊन गेला रानामाळांवर सोन्याचे ऊन
अजून माती कोवळी ओली पानापानातून कालची धून.."
पाऊस कसा पडतो याचं पाणी-वाफ-बाष्पीभवन अशा रूक्ष शब्दांमधलं उत्तर आपल्याला माहीत आहे पण हेच सूत्र कवी ग.दि.माडगूळकर किती गोजिरवाण्या शब्दात मांडतात..
"नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर... अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर..
सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर... तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर...
डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन.. नदी तरंगत जाते पंख वार्‍याचे लेऊन...
पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा...पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा..."

पावसाचा आणि प्रिय व्यक्तीच्या आठवणीचा एक विलक्षण संबंध आहे. पाऊस पडण्यापूर्वीचं वातावरण काहीसं बेचैन करणारं असतं. पण पावसाच्या नुसत्या चाहुलीने आठवणींच्या सरी बरसू लागतात.. हीच मनोवस्था कवी मंगेश पाडगावकर अशा शब्दात गुंफतात
"संथ संथ सरकणारे पहिले वहिले पावसाळी ढग
गढूळ डोळ्यांच्या घरांचे मोर झाले अचानक..."
पावसाआधीची हुरहूर कवयित्री इंदिरा संतांच्या शब्दातून अचूक व्यक्त होते..
"ओथंबून आलेले पावसाळी आभाळ... घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ..
काहूर भरला व्याकूळ वारा.... मनोमनींच्या छेडतो तारा.. "
पावसाकडे तरूण मन काहीशा रोमँटिक भावनेने पाहतं. पावसाळी संदर्भाशिवाय प्रेमाला पूर्णत्व येत नाही.
"अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे.. उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहूर थरारते रानभर.. तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर" (कवी संदीप खरे) असे "त्याला" पावसाच्या साक्षीने वाटते तर "तिची" स्थिती कवयित्री शांता शेळकेंच्या शब्दात अलगदपणे उलगडते..
"वीज कडाडतां, भय दाटे उरीं ..एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग .."
मनस्वी माणसाच्या मनोवस्थेला कवी वा. रा. कांत "पाऊस जरि बाहिर पडतो ..आतून कुणीतरी भिजतो.." असे समर्पक शब्दरूप देतात.

काही आयुष्यांना गरिबीचा, अवहेलनेचा, विरहाचा शाप असतो, "जीवनाची" कडवट सत्य पचवलेल्यांना पाण्याची रूपं मोहं तरी कशी घालणार! पावसाच्या मार्‍यापासून आपला गळक्या छपराचा-गाडग्या-मडक्यांचा संसार जपू पाहणारी एखादी ती त्या पावसाला कशी कळवळून विनवते हे सांगून कवयित्री इंदिरा संत आपल्याला अंतर्मुख करतात. ती म्हणते..
"नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी अन दारात सायली.."
अशा वेळी चार्ली चाप्लीनचे शब्द आठवतात.. "मला पाऊस आवडतो कारण पावसात माझे अश्रू कुणाला दिसत नाहीत" कवी चंद्रशेखर गोखलेंनी चितारलेलं पाण्याचं हे रूप तर अंगावर काटा आणतं...
"पाण्याचं वागणं.. किती विसंगत... पोहोणार्‍याला बुडवून.. प्रेताला ठेवतं तरंगत.."
बळीराजासाठी पाऊस म्हणजे वरदान आणि अतिवृष्टी किंवा अवर्षण दोन्हीही शाप.. वाट पाहून डोळे शिणायच्या आत जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतकर्‍याचे डोळे आनंदाने पाणावतात. पेरणी होते. सृजनाचा हा उत्सव कवी वसंत सावंतांच्या या शब्दांनी साजरा होतो..तो अंकुर जणू म्हणतो..
"उरी नांगराचा रूते फाळ माझ्या.. भुईतून मी सारखा वाढतो
असा वाढताना नभोमाऊलीचा.. उमाळून पान्हाच मी चाखतो.."

पावसाचा प्रलयकारी अवतार सोडला तर त्याची सगळीच रूपं अतिशय मनोहारी असतात. काही गद्य माणसं असतात म्हणा... त्यांना पाऊस म्हटलं की चिखल, रबरबाट, निसरडं, तुंबलेली गटारं, नादुरूस्त छत्री, बंद पडलेली गाडी, शिंका, ओला वैताग हेच आठवतं....कुणी म्हणेल मुंबईच्या धावपळीत "मिठी " ओसंडून वाहिल्यावर आणि लोकल अडकल्यावर दुसरं काय आठवणार. हे खरं असलं तरी पाऊस या एका शब्दानेच बहुतेकांच मन निवतं आणि त्याच्या अनुभूतीने अगदी गारीगार होतं.. कल्पना करा..गरमागरम कांदाभजी- सोबत वाफाळता चहा- हातात एखादं छानसं पुस्तक किंवा एखाद्या आवडत्या गझलेचे-गीताचे सूर आणि खिडकीबाहेर निथळणारा पाऊस. सुख सुख म्हणतात ते हेच असावं. याहीपेक्षा रेनकोट न घालता, छत्री न घेता त्या पावसाला थेट जाऊन भेटून येण्यातला आनंद तर केवळ अवर्णनीय...
पावसाचा आणि मानवी भावनांचा अतिशय निकटचा संबंध आहे. भावना उत्कटपणे व्यक्त करण्याचं कदाचित पाऊस हे केवळ माध्यम असावं... मनातला गहिवर मेघांसारखा दाटून येतो आणि आनंदाश्रू किंवा दु:खाश्रूंच्या रूपाने ओघळतो-बरसतो म्हणूनच कुणी कवी असेही म्हणतो
"पाऊस ऋतुचे निमित्त करूनि दिसतो..
पाऊस पापणीआड कधिचा असतो.."

(पूर्वप्रसिद्धी- म.टा नागपूर)

अन्नब्रह्माचा अपमान

खवैयेगिरी की अन्नब्रह्माचा अपमान?
"एक और लड्डू ?" असे घाबरलेल्या चेहर्‍याने म्हणणार्‍या जावईबुवांची "इनो" ची जाहिरात आठवतेय? त्या जाहिरातीत "इनो" घेतल्यावर तेच जावईबुवा उत्फुल्ल चेहर्‍याने "हो ज्जाये लड्डू" म्हणत बाह्या सरसावतात. इनो घेऊ पण खाऊ म्हणणार्‍या आपल्या देशात खिलवण्यालाही खूप महत्व आहे. चांगलेचुंगले खाऊ घालूनच प्रेम व्यक्त करायची आपल्याला सवय झाली आहे. आग्रह खूप केला तरच पाहुणचार चांगला केला असे आपल्याकडे मानले जाते.
प्रख्यात साहित्यिक पु.लं.देशपांडे यांचा "माझे खाद्यजीवन" म्हणून एक सुंदर लेख आहे. खाण्याच्या त्या षोकामागे रसिकता आहे. पदार्थाबरोबरच त्याच्या रंग-रूप-रस-गंधाला दिलेली दाद आहे. सीमेवर रक्षण करत असताना अतिशय गारठून आत्महत्येचे विचार मनात येत असताना एका सैनिकाच्या हाती हा लेख पडला. असा खाद्यानुभव घेण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे या विचाराने त्याने सारे नैराश्य झटकून टाकले असे म्हणतात. विवीध प्रांतांचे खाद्यवैशिष्ट्य अनुभवण्याची कित्येकांना आवड असते. तर्‍हतर्‍हेचा स्वैपाक करून कुटुंबाला खाऊ घालण्यात गृहिणींना कृतार्थता वाटते. जागतिकीकरणाबरोबर लोकांच्या रूचीमधे बदल होऊ लागला आहे. २४ तास चालणारी फूड चॅनेल्स आवडीने पाहिली जाऊ लागली आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच पाचकांच्या जाहिरातींनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. "माणूस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो" याचे उत्तर आज तरी माणूस खाण्यासाठी जगतो, हेच आहे.

हीच खवैयेगिरी आता रसिकतेची मर्यादा ओलांडू लागल्याचे दिसते आहे. इंदौरजवळच्या एका ’ढाणी’ मधे आम्ही जेवायला गेलो असताना वीस एक पदार्थांनी गच्च भरलेले ताट त्यांनी (तिकीट सारखेच असल्याने) लहान मुलांसमोरही ठेवले. जेवण सुरू करण्यापूर्वीच आम्ही त्यातले पदार्थ कमी करण्याची विनंती केली. ते चकित झाले पण त्यांनी केले काहीच नाही. मोठया माणसांनाही एवढे पदार्थ खाणे शक्य नव्हते. न राहवून आम्हीच ते काढून ठेवले आणि मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली. त्यावर ते म्हणाले की आमच्याकडे (उत्तर भारतात) विचारून वाढणे हा पाहुण्यांचा अपमान समजला जातो(!) देशभरात कित्येक उपहारगृहांमधे रोज असे कितीतरी अन्न वाया जात असणार!
आपल्याकडे एकूणच (उत्तर भारतातच नव्हे) आग्रहाचा आणि मानपानाचा अजब संबंध लावला गेला आहे. "घर म्हणून" थोडंसं अन्न उरवण्यासाठी जास्त रांधण्याची देखील काही घरी पद्धत असते. उरलेल्या अन्नापासून थालीपीठासारखे पौष्टिक पदार्थ करून ते अन्न संपवले जाते, निदान गरीबांना दिले जाते, की सरळ टाकून दिले जाते? "आमच्याकडे सकाळची भाजी संध्याकाळी चालत नाही", "आम्ही मोजून स्वयंपाक करत नाही" असं कौतुकाने सांगितलं जातं. यात काही गैर नाही पण उरलेल्या अन्नाचे काय केले जाते? एखादेवेळेस गमतीखातर पैज लावून खवय्यांची स्पर्धा ठेवली जाते. तेवढे अन्न जिरवण्याची ताकद असलेल्या मंडळींनी ते खायला हरकत नाही. काही जण संकोची स्वभावाचे असतात तेव्हा थोडा आग्रह करण्यात वेगळीच आपुलकी आणि आनंद असतो पण बर्‍याचदा त्याचा अतिरेक होतो. अखेर ते अन्न पानात टाकून दिले जाते.


पंगतीत फार आग्रह होतो त्यापेक्षा "स्वरूची भोजन" ही नामी कल्पना आहे असे आधी वाटायचे पण ही बुफेची पद्धत मोजक्या लोकांसाठी ठीक आहे. समारंभात आपल्याकडे शेकडो लोक जेवायला बोलावले जातात. पुन्हा पुन्हा रांगेत जाण्यापेक्षा आत्ताच सगळे ताट खच्चून भरून घ्यावे असे लोकांना वाटते. खाण्याचे किती प्रकारचे स्टॉल्स समारंभात होते हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे ताटात पंजाबी भाज्या, मराठी झुणका-भाकर, बंगाली मिठाई खर्‍या अर्थाने "समरस" झालेले असतात. हे कमी की काय म्हणून चायनीज पदार्थ, चाट, आईस्क्रीम.. यादी संपत नाही आणि ताटातले पदार्थ देखील! साहजिक ते तसेच टाकून दिले जातात. उत्तम दर्जाचे पण मोजके पदार्थ करण्याचा पायंडा पाडणे आणि खाऊ शकू एवढेच पानात वाढून घेणे खरच इतके कठीण आहे?

आपल्या देशात कित्येक लोक अर्धपोटी झोपत असतात, गरिबी-कुपोषणामुळे बालमृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. (एकात्मिक बालविकास योजना अपुरी पडते आहे) कुपोषणामुळे भारतातील जवळपास 42 टक्के मुले आरोग्यपूर्ण नाहीत, ही वस्तुस्थिती चिंतेत टाकणारी आहे, असे पंतप्रधानांचे या वर्षारंभीचे (१०-१-१२) वक्तव्य आहे. असे असताना अन्न टाकून देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे काय? कुणी काय आणि किती खावे हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अन्नाची नासाडी हा नक्कीच सामाजिक प्रश्न आहे. शेगाव संस्थानच्या भक्तनिवासातील भोजनालयात भोजन सुरू असताना एक जण एक पाटी घेऊन थोडा थोडा वेळ प्रत्येक टेबलजवळ थांबतो. "हा प्रसाद आहे, उष्टे टाकून त्याचा अपमान करू नये" अशा आशयाचा मजकूर त्यावर असतो. आमटे परिवाराच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीतील भोजनालयाबाहेर, अन्न वाटप केंद्राकडे खुरडत जाणार्‍या कुपोषित बालकाचा फोटो लावला आहे. (या फोटोस पुलित्झर पारितोषिक मिळाले असून बालकाची अन्नान्न दशा पाहून व्यथित झालेल्या त्या फोटोग्राफरने अखेर आत्महत्या केली असेही तेथे लिहीले आहे) तो फोटो पाहिल्यानंतर कुणी अन्न वाया घालवण्याची शक्यता नाही. परंतु अशा फोटोतून संदेश द्यावा लागावा यातच सारं आलं.

गांधीजी पाणी पिताना तहान भागेल एवढेच पाणी पेल्यात घेत असत. अन्नाच्याही बाबतीत हा संस्कार होणे अत्यावश्यक आहे. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" इतका अलिप्त विचार श्लोकांमधून आपल्याकडे रूजवला गेला. गोळवलकर गुरूजींसारख्या संवेदनशील व्यक्ती देशातील उपाशी जनतेच्या विचाराने विकल होऊन एकभुक्त राहत असत. "मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझिया हातूनी देशसेवा, म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा" असा असामान्य विचार करणारे लोकही आपल्याच देशातले. "कशासाठी- पोटासाठी" म्हणणारा चाकरमानी एवढा उदात्त विचार करू शकत नसला तरी त्याला अन्नाची आणि त्यासाठी कराव्या लागणार्‍या कष्टांची किंमत आहे. मात्र प्रतिष्टेच्या नावावर अन्न उधळून देणारे काही धनदांडगे एकीकडे आणि अन्नाला मोताद समाज दुसरीकडे हे चित्र देखील आपल्याच देशातले आहे. स्वत:च्या भुकेबरोबरच इतरांच्या भुकेची जाणीव ठेवून वेळप्रसंगी घासातला घास दुसर्‍याला देणे ही आपली संस्कृती आहे. आपला प्रवास प्रकृतीकडून संस्कृतीकडे होण्याएवजी विकृतीकडे तर होत नाहीये ना!

पूर्वप्रसिद्धी- मातृभूमि

Wednesday, May 16, 2012

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते - अंधारलेल्या गर्दीत उजेडाचा शोध

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचे दोन भाग एव्हाना प्रसारित झाले आहेत. स्टार प्लस वाहिनीबरोबरच खेडोपाडी पोचलेल्या दूरदर्शनवर देखील या कार्यक्रमाचे प्रसारण होत असल्याने हा शो संपूर्ण भारतात गाजतो आहे. ह्या कार्यक्रमाची संकल्पना ‘सामाजिक मुद्यावरील टॉक शो’ अशी आहे. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव, तज्ञांचे मत व चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप तर केवळ समस्या न मांडता त्यावर उपाय सुचवणे हे याचे खास वेगळेपण आहे. शो चा अव्वल दर्जा बघता आमीरने त्याचे "परफेक्शनिस्ट" हे बिरूद सार्थ केले आहे.

 कार्यक्रमाची वेळ, शीर्षकगीत, भारताच्या ब्रीदवाक्याचा नाव म्हणून वापर, प्रादेशिक भाषांचा-वेबसाईटचा वापर करून कार्यक्रमाची पोच वाढवण्याचा प्रयत्न, अशा प्रत्येक गोष्टीत "आमिर टच" दिसून येतो. त्यांच्या पडद्यामागील टीमने या कार्यक्रमासाठी केलेलं संशोधन आणि सत्यजित भटकळ यांचं हृद्य दिग्दर्शन हे या कार्यक्रमाचं वैशिष्टय. टीव्हीवर पहिल्यांदाच कार्यक्रम करत असल्याने आमीरच्या देहबोलीत तरूणांसारखा उत्साह व ताजेपणा आहे. कार्यक्रमात आपल्या हास्याने गंभीर परिस्थिती एकदम हलकीफुलकी करण्याचे कसब आणि संवाद साधण्याची हातोटी त्याच्यात आहे. प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याचं सामर्थ्य तर कार्यक्रमाच्या संकल्पनेतच दडलं आहे.
२४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर पूर्वीही अशा चर्चा सादर झाल्या आहेत. पण त्या कार्यक्रमांचे सादरीकरण बटबटीत असते. त्या मानाने "सत्यमेव जयते" अतिशय संयत पण परिणामकारक ठरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या KBC नंतर भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करू शकण्याचे सामर्थ्य आमिरच्या सच्चेपणात आहे. आमिरनेही काही बाजारू चित्रपट, अनावश्यक वाद निर्माण केले आहेत, दुसर्‍या विवाहाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या खाजगी आयुष्यातील सच्चेपणाबद्दल त्याचे कुटुंबियच सांगू शकतील परंतु गेल्या काही वर्षात आमिरच्या चित्रपटातून त्याने हाताळलेले विषय, वादग्रस्त पुरस्कार समारंभांपासून त्याचे लांब राहणे, मराठी शिकण्याचा मनापासून प्रयत्न करणे,"अतुल्य भारत" या दर्जेदार जाहिराती मानधन न घेता करणे अशा कृतींमुळे आमिरची एक सकारात्मक प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे हा शो अधिक खराखुरा वाटतो. एसएमएस मधून मिळालेल्या पैशांचा देणगीसाठी विनीयोग होत असल्याने या कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली आहे.


अर्थात या कार्यक्रमामागे केवळ सामाजिक प्रश्न सुटण्याविषयी आमिरची कळकळ नाही कारण यातून आमिरला करोडोंनी पैसा मिळणार आहे. पण फक्त तेवढाच उद्देश असता तर आमिर कुठलाही पठडीतला लोकप्रिय कार्यक्रम देऊ शकला असता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमिरने प्रेक्षकांच्या प्रती आपले उत्तरदायित्व सिद्ध केलंय. तरीही ज्यांना आमिरचा हा प्रयत्न कृत्रिम वाटतो त्यांनी एवढाच विचार करावा की कमीत कमी आमिर खान एवढे काम तरी करत आहे, ज्या बद्दल आपण नुसत्या गप्पा ठोकत असतो.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागातच "स्त्री भ्रूण हत्येचा" ज्वलंत प्रश्न हाताळला गेला. तो प्रश्न भारताच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक सामाजिक स्तराचा असल्याने त्याची आच सर्वदूर पोचली. दुसर्‍या भागात "बालकांचे लैंगिक शोषण" या मुद्याने समाजाची एक दुखरी नस समोर आणली. दाहक वस्तुस्थितीची स्पष्ट जाणीव करून देणे हाच पर्याय या शो ने निवडला आहे. 

"It is easy in the world to live after the world's opinion; it is easy in solitude to live after our own; but the great man is he who in the midst of the crowd keeps with perfect sweetness the independence of solitude." (Ralph Waldo Emerson)

दुर्दैवाने भारतीयांना प्रत्येक प्रश्नासाठी एक "मसीहा" लागतो. केवळ एका एपिसोडमधे हे प्रश्न जादूसारखे सुटणार नसले तरी त्याची उत्तरे शोधण्यासाठी ज्या "मसीहा" ची गरज भारतीयांना असते तो आता ते आमिरमधे शोधू लागतील. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तो संपविण्याची जबाबदारी अण्णांचीच आहे असे जोवर लोक मानत आहेत आणि त्याची सुरूवात स्वत:पासून करायचे टाळत आहोत तोवर काही बदलणार नाही. आमिरच्या कार्यक्रमानंतर देखील लोक त्याच्याकडून अशाच अवास्तव अपेक्षा करू लागतील.

कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता राजस्थान सरकारला आमिरचे "फास्ट ट्रॅक कोर्ट" सुरू करण्याचे आवाहन गांभीर्याने घ्यावे लागले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी आमिरला भेटून त्यासंबंधी कार्यवाही केली. "स्त्री भ्रूण हत्या" हा प्रश्न जुनाच आहे, आमिरने हा मुद्दा मांडेतो असे कोर्ट सुरू करावे असे राजस्थान सरकारला आपणहून का वाटले नाही? सामाजिक प्रश्नांवरील उपायांसाठी देखील आता ग्लॅमर-जगताला साकडं घालायची गरज भासणार का! असं असेल तर अशा प्रश्नांविरूद्ध लढण्यात सामान्य कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य खर्ची का घालावं!
बाल-मजुरी पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक विषय या शो च्या निमित्त्याने उचलले जातील. निदान काही प्रमाणात त्यावर कार्यवाही होईल. भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची अपेक्षा या कार्यक्रमाकडून आहे."ऑल इज वेल" अशी स्थिती येण्याइतका चमत्कार हा शो करू शकेल असे मुळीच नाही परंतु भारतीयांच्या मनातली मरू घातलेली संवेदनशीलता जरी या निमित्त्याने जागी झाली तरी "सत्यमेव जयते" मागचा उद्देश सफल होईल.

Saturday, May 5, 2012

मैं ’माधुरी दीक्षित’ बनना चाहती हूँ

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. शहाण्याने कलाक्षेत्राची पायरी चढतानाही दहादा विचार करावा."मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ" या नावाचा कलाक्षेत्रातील "स्ट्रगलर्स" च्या आयुष्याची आणि स्वप्नांची चित्तरकथा सांगणारा एक सिनेमा मागे येऊन गेला. त्यातल्या मुख्य भूमिकेतील अंतरा माळीचं नाव सुद्धा कित्येकांना आज आठवत नसेल. नवोदित कलाकार पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवून एक-दोन चित्रपट, मालिकांमधे चमकून कायमचे पडद्याआड जातात. त्यांच्या जागी पुन्हा नवे चेहरे दिसू लागतात. कलाक्षेत्रातील धडपडीला "स्ट्रगल" म्हटले जाते. आज नावारूपाला आलेल्या कोणत्याही कलाकाराला तो चुकलेला नाही. शाहरूख खानचे दिल्लीमधे एक छोटेसे घड्याळाचे दुकान होते, अक्षय कुमार एक आचारी होता तर विद्या बालन लहानमोठ्या जाहिरातींमधून काम करत होती. पण प्रत्यक्षात या क्षेत्रात धडपडणार्‍यांपैकी जेमतेम ५ टक्के यशस्वी होतात. बाकीचे व्यथित जिणे जगत राहतात.

पूर्वी ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका नकारात्मक होता की कलाक्षेत्रात जाणे म्हणजे वाया जाणे मानले जाई. नाटकात काम करायचे म्हणजे घरातून पळून वगैरे जायला लागायचे. तुलनेने आता या क्षेत्राला प्रचंड वलय लाभले आहे. प्रसिद्धीचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, रातोरात स्टार बनवणार्‍या या जादुई कलानगरीने तरूणाईला भुरळ घातली नाही तरच नवल. या वलयामागे दूरचित्रवाणी आणि त्यावरील "रीऍलिटी शो" चा मोठा हात आहे. त्यातील स्पर्धकांना परिक्षकांच्या "माईंड ब्लोईंग, फॅंटास्टिक, आपने तो ओरिजनल से भी अच्छा परफॉर्म किया" अशा कॉमेंट्समुळे स्वर्ग दोन बोटे उरतो. त्यांचे आईवडील भरून पावतात.
याचा अर्थ अशा स्पर्धांमधे भाग घेऊ नये असे नव्हे, या निमित्त्याने "गॉडफादर" नसणार्‍या गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पण कलाक्षेत्रातील प्रवासाची ही केवळ सुरूवात आहे हे आधी समजून घ्यायला हवे. प्रत्यक्षात असे क्वचित होते. प्रेक्षकांसाठी ते फक्त दोन घटकेचे मनोरंजन असते आणि कलाकारांसाठी थेट आयुष्याचा प्रश्न. लता-आशा यांनी कलेसाठी आयुष्य झोकून दिले आणि त्या अजरामर झाल्या. तेवढी चिकाटी या स्पर्धकांकडे नसते आणि असली तरी या क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की तुमच्यात काही अभूतपूर्व गुण असतील तरच एखादी सुनिधी चौहान किंवा श्रेया घोषाल बनू शकते. नाहीतर पहिला इंडीयन आयडॉल अभिजीत सावंत सध्या काय करतोय? नंतरच्या इंडीयन आयडॉल्सची तर नावेही आठवत नाहीत.
नाट्यक्षेत्रातून अनेक उत्तम कलाकार पुढे आले. चरित्र अभिनेते म्हणून त्यांनी नाव कमावले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या त्यातले किती यशस्वी झाले? प्रसिद्धीचे परमोच्च शिखर पाहिलेल्या बालगंधर्वांसारख्या थोर कलावंतांनाही शेवटी उपेक्षेचे जिणे वाट्याला आले. काही अपवाद सोडले तर मधल्या पिढीतल्या बहुतेक नाट्यकलाकारांनी हिंदी चित्रपटातून फुटकळ भूमिका करत तडजोडी केल्या. मराठी चित्रपटात नायक म्हणवणार्‍या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या गुणी नटांनीही हिंदीमधे मिळतील त्या नगण्य भूमिका केल्या.

अमिताभ बच्चन यांना सुद्धा मधल्या काळात अपयशाने झोडपून काढले पण उत्तम अभिनयगुण, संस्कार, परिश्रम आणि जिद्द यांच्या आधारे त्यांनी तोल ढळू न देता महानायकपद पुन्हा खेचून आणले. परंतु हा अपवाद, त्या वेळचे तथाकथित सुपरस्टार राजेश खन्ना, विनोद खन्ना आज कुठे आहेत! शाहरूखसारखा सहज अभिनय किंवा आमीर खानसारखा परिपूर्णतेचा ध्यास नसलेल्या नव्या अभिनेत्यांना(अगदी स्टारपुत्रांना देखील) त्यांच्या भवितव्याची खात्री नाही. नुसते गॉगल उलटसुलट करून अमाप लोकप्रियता मिळवणार्‍या रजनीकांतसारखे, दैव सगळ्यांवर फिदा नसते (शिवाय अशा भूमिकांमधून "कलेचे समाधान" वगैरे मिळण्याचा काही संबंध नाही)
अभिनेत्रींची अवस्था तर अधिकच वाईट होते. नायिकाप्रधान चित्रपट आधीच कमी, त्यात आपल्याकडे विवाहित अभिनेत्रीला प्रेक्षक नाकारतात. त्या भितीने त्यांचे विवाहाचे वय लांबणीवर पडते. "झाडामागून पळण्याचे" वय संपले की करियरच्या उतारावर त्या एकेकाळच्या आपल्याच नायकांच्या आई-बहिणीच्या भूमिका करतात किंवा एखाद्या बड्या हस्तीशी लग्न करून कायमच्या पडद्याआड जातात नाहीतर वैफल्यग्रस्त होतात. हॉलीवूडमधेच नव्हे अगदी मराठी चित्रसृष्टीत देखील कित्येक नायिकांच्या शोकांतिका त्यांच्या आत्मचरित्रातून उमटल्या आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका करून आजही स्वत:ची छाप पाडणारी शबाना आझमी किंवा नृत्यकला आणि सौंदर्याचे वलय जतन करणारी हेमामालिनी एखाददुसरीच. नव्या इनिंगसाठी भारतात परतलेल्या माधुरीने आता सशक्त भूमिका स्वीकारल्या नाहीत तर तिला देखील "मैं कभी माधुरी दिक्षित थी" असेच म्हणावे लागेल.
नवीन अभिनेत्रींची स्थिती याहून अवघड आहे. खुद्द हेमामालिनीच्या मुलीलाही अखेर चित्रसृष्टीला रामराम ठोकावा लागला. केवळ दिसायला बरी आहे म्हणून काही मुलींना मॉडेलिंगचे अल्पजीवी जग खुणावायला लागते आणि चित्रपटक्षेत्र तर जणू आपली वाटच पाहत थांबलं आहे असं त्यांना वाटू लागतं. सौंदर्यस्पर्धांमधून अभिनेत्री होऊ पाहणार्‍यांचे नवे लोंढे येतच राहतात. "भूमिकेची गरज" या नावाखाली त्या अंगप्रदर्शन करायलाही तयार होतात. त्यातल्या ५ टक्के कॅटरिना, प्रियंका किंवा करीना कपूर बनू शकल्या तरी उरलेल्या ९५% जणींच भवितव्य काय? या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही हे यश टिकवून ठेवण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागतात तेवढी तयारी आणि कास्टींग काऊचला तोंड देण्याची क्षमता किती जणींमधे असते?

तात्कालिक यश मिळाले तरी त्यामागून येणारे अपेक्षांचे ओझे पेलण्याइतकी प्रतिभा आणि मायानगरीतील अस्थिरतेला स्वीकारण्याची मानसिक कणखरता ज्यांच्यात नाही त्यांनी कलाक्षेत्राच्या वाटेला जाऊ नये. याचा अर्थ कुणी कलाकार होऊच नये का? आर्थिक समृद्धी हेच कलाकाराच्या यशाचं माप असावं का? हाडाच्या कलावंताची तडफड फक्त त्यालाच कळते. गुरू ठाकूर यांनी ही वेदना परिणामकारक शब्दात "नटरंग" मधे मांडली आहे.
" ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला, थोर उपकार...
तुज चरणी लागली वरणी, कशी ही करणी करू साकार
एकला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग...
 नटरंग उभा, ललकारी नभा, स्वर ताल जाहले दंग "

पण जगण्यासाठी शेवटी व्यावसायिक तडजोड करावीच लागत असेल तर मग कलेच्या प्रेमाचा उरबडवेपणा कशाला! कलाकार म्हणून यशस्वी होण्यासाठी उपजत उत्तम कलागुण तर हवेतच. पण त्याला व्यासंगाची-वाचनाची-अभ्यासाची-रियाजाची डूब आणि व्यावहारिकतेची जाण असायला हवी. शाळा-महाविद्यालयातील एखाद्या नाट्यस्पर्धेत, गायनस्पर्धेत बक्षिस मिळाले म्हणजे आता कला हेच माझं करियर असा "चला मुरारी हीरो बनने" छापाचा स्वप्नाळू विचार न करता या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला हवं. आपल्या व्यक्तिमत्वासमोर वस्तुस्थितीचा आरसा धरला तर सगळी खरी उत्तरे मिळतात. कलाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी रंगमंचावर किंवा पडद्यावर आपला मुखडाच झळकला पाहिजे हा अट्टाहास सोडला तर या क्षेत्रात करण्यासारखं खूप आहे. नवे प्रयोग होत आहेत. गायन-वादन-अभिनय क्षेत्रात तांत्रिक बाजूंचे महत्त्व वाढले आहे. छायाचित्रीकरण, लेखन, संपादन, दिग्दर्शन, नेपथ्य, ग्राफीक्स, ध्वनीमुद्रण, पेहराव-दागिने डिझाईनींग, मेकअप कला, आहार-फिट्नेस सल्ला, स्वर-साथ, कार्यक्रमांचे आरेखन, इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये प्रचंड नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यासाठी आवश्यक असणारं व्यावसायिक, तांत्रिक प्रशिक्षण घेऊन त्याला अंगभूत कलेची जोड दिली तर आर्थिक यशाबरोबरच निर्मितीचं आणि आवडीच्या क्षेत्रामधे काम करण्याचं समाधान मिळेल. सच्च्या कलाकाराला अशा स्वानंदापेक्षा आणखी काय हवं!

Sunday, April 22, 2012

शाहरुखचा अपमान की देशाची सुरक्षा

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानला गेल्या गुरूवारी अमेरिकेतील विमानतळावर चौकशीसाठी सुमारे दोन तास ताटकळत ठेवण्यात आलं. भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवताच अमेरिकेने दूतावासामार्फत माफी मागून हा विषय गुंडाळला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.एम.कृष्णा यांनी ’अपमान करून मग माफी मागायची’ ही अमेरिकेची सवय यापुढे खपवून घेतली जाणार नाही अशी ताकीद दिली. खरे तर या घटनेमधील ’अपमानास्पद’ वागणूक हा भाग तेवढा आक्षेपार्ह आहे आणि त्यावर नाराजी व्यक्त करायलाच हवी परंतु आवश्यकता वाटल्यास चौकशी करणे हा अमेरिकेच्या सुरक्षा धोरणाचा भाग आहे आणि तेथे ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत.

’माय नेम इज खान’ अशी परिस्थिती असल्याने शाहरूख खानला ही वागणूक मिळाली असे अजिबात नाही. विशेष सामाजिक कार्याबद्दल रॅमन मॅगसेसे हा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणार्‍या नीलिमा मिश्रा यांना अमेरिकेतील संस्थांकडून बोलावणे आले होते. त्यांना तर आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्याचे कारण देऊन व्हिसाच नाकारला गेला. अमेरिकन वकिलातीतील अधिकाऱ्यांनी त्यांना 'काय असतं हे रॅमन मॅगसेसे?' असा उद्दाम प्रश्न विचारला होता. खुद्द भारताचे माजी राष्ट्रपती कलाम यांना विमानतळावर चौकशीसाठी अडकवण्यात आले होते. हा मात्र भारताचा धडधडीत अपमान होता कारण देशपातळीवरील अशा उच्चपदस्थ व्यक्तींची माहिती अमेरिकेच्या सुरक्षाविषयक डाटाबेसमधे नक्कीच असायला हवी होती. तरीही असे घडले यात अमेरिकेचा श्रेष्ठत्वाचा अहंकार दिसून येतो. याचा भारताने कडकडून निषेध केला आणि तो करायलाच हवा. शाहरूख खानच्या बाबतीत तसे नाही, एक कलाकार म्हणून तो कितीही प्रसिद्ध असला तरी अमेरिकेच्या दृष्टीने तो केवळ एक सर्वसामान्य भारतीय नागरिक आहे. शाहरूखने सुद्धा नाईलाजाने का होईना या घटनेला किरकोळ म्हणून स्वीकारताना म्हटले की भारतीय तार्‍यांना आपल्या वलयातून जमिनीवर उतरावेसे वाटले की त्यांनी अमेरिकेला जावे, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.

यातला उपहासाचा भाग व्यक्तिश: योग्य असला तरी एक देश म्हणून अमेरिका स्वत:च्या सुरक्षाव्यवस्थेला किती महत्व देते हे या घटनेवरून कळते. याउलट आपल्याकडे अमेरिकन अथवा युरोपियन सेलेब्रिटी आली की त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नाही असे होते. समजा ब्रॅड पिट आणि ऍंजेलिना जोली हे हॉलीवूड कलाकार विमानतळावर उतरले तर त्यांच्या तपासणीपेक्षा त्यांच्याबरोबर फोटोसेशन करण्याची जास्त घाई उडते. अमेरिकेने शाहरूखखानला जशी वागणूक दिली तसेच आपण त्यांच्या कलाकारांशी वागले पाहिजे असे म्हणण्याचा येथे उद्देश नाही, सुरक्षेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे त्याला प्राथमिकता दिली गेलीच पाहिजे.

या बाबतीतील ढिसाळपणामुळे नेपाळसह इतर अनेक मार्गांनी भारतातील घुसखोरांची संख्या वाढते आहे. इतकेच नव्हे तर बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना रेशन कार्ड देखील मिळतात आणि ते बेमालूमपणे भारताचे नागरिक म्हणून वावरू लागतात. अबू सालेम सारख्यांना बनावट पासपोर्ट मिळतो. भारताच्या हद्दीत चीनच्या सैन्याच्या घुसखोरीचे सत्र अद्याप सरूच आहे. चीनच्या हेलिकॉप्टरने हिमाचल प्रदेशमध्ये सात किलोमीटर आतमध्ये घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. इंडो-तिबेट पोलिसांनी केंद्रीय गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात १६ मार्च रोजी घुसखोरी झाल्याची माहिती दिली आहे. या वाढत्या घुसखोरीमागील पाकिस्तानी हद्दीतील भारतविरोधी दहशतवादी तळ आणि चीनची वाढती लष्करी ताकद, या गोष्टी आपल्यासाठी चिंतेच्या आहेत, असे लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी नुकतेच एका परिसंवादात स्पष्ट केले आहे.

९/११ नंतर अमेरिकेमधे घातपाताची एकही मोठी घटना घडवून आणणे दहशवाद्यांना शक्य झाले नाही ते जगाच्या प्रत्येक कृतीकडे डोळ्यात तेल घालून शंकेखोरपणे पाहण्याच्या अमेरिकेच्या धोरणामुळेच. उलट अमेरिकेनेच ड्रोन हल्ल्यामधे ओसामा बिन लादेनचा खात्मा करून अमेरिकेच्या वाटेला जाणार्‍याचे काय हाल होतात हे जगाला दाखवून दिले. याच्या अगदी विरूद्ध परिस्थिती भारतात आहे. संसदेवरील हल्ला, विमान अपहरण, देशातील प्रमुख शहरांमधे घडणार्‍या बॉंबस्फोट मालिका अशा घटना अजून एकामागोमाग घडतच आहेत. निवृत्त मेजर जनरल दत्ता यांच्या मते भारतात २६/११ सारखा मुंबईत घडलेला हल्ला पुन्हा घडू शकतो. करकरे, कामटे यांच्यासारख्या निधड्या छातीच्या पोलीस अधिकार्‍यांना योग्य सूचना, वेळेवर कुमक आणि उत्तम दर्जाची बुलेटप्रूफ जाकीटे व हत्यारे मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचवता आले असते. भारताच्या सागरी सुरक्षेचे वाभाडे काढणार्‍या या घटनेत हाती लागलेला कसाब हा अतिरेकी आजही भारतीय पाहुणचार झोडतो आहे.

या हल्ल्यानंतर सुरक्षाविषयक काही चांगली पावले जरूर उचलली गेली. फोर्स वन हे एनएसजी कमांडो पथक तैनात झाले, रॅपीड ऍक्शन फोर्स निर्माण झाले. याशिवाय पाकिस्तानचा देशांतर्गत तसेच सीमापार दहशतवादात हात असल्याचे पुरावे जगासमोर आणून पाकिस्तानवर दबाव आणण्याची परराष्ट्र नीती भारताने स्वीकारली पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. गुप्तहेरखात्याची दिरंगाई, गुन्हा घडल्यावर निर्णय घेताना अधिकार्‍यांवर असणारा राजकारण्यांचा दबाव, राजकारण्यांनी मतपेटीवर डोळा ठेवून देशहितापेक्षा स्वहिताला दिलेले प्राधान्य आणि संथ न्यायप्रक्रिया या मर्यादांमुळे भारतात राष्ट्रीय सुरक्षेला आवश्यक तेवढे महत्व दिले जात नाही असे दिसून येते.

कुठे एखादी काच जरी फुटली तरी त्या गोष्टीकडे गंभीर घटना म्हणून पाहिले जावे ही अमेरिकेची ९/११ नंतरची सुरक्षा प्रणाली "ब्रोकन विंडो सिस्टम" म्हणून ओळखली जाते. "वुई आर रेडी टू लीड वन्स मोअर" असे विधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर बराक ओबामा यांनी अमेरिकेसह जगाला उद्देशून केले होते. कडक सुरक्षा नसती तर या केवळ वल्गना ठरल्या असत्या. आपण आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत, कडेकोट सुरक्षेविना ती दिवास्वप्ने ठरतील. शाहरूख खानला अमेरिकी अधिकार्‍यांनी दोन तास रखडवले म्हणून अमेरिकेवर नुसतीच आगपाखड करायची की त्यांच्या सुरक्षायंत्रणेचा काटेकोरपणा लक्षात घेऊन त्यातून आपण योग्य तो बोध घ्यायचा हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तावातावाने "बाईट" देणार्‍या मंत्र्यांनी ठरवणे आता गरजेचे आहे.

Wednesday, April 4, 2012

भारतीय स्त्री आणि राजकारण


"बहुमताने निवडून आलेल्या नगरसेविका xxxताई यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत." सत्कारसभेत घोषणा होते. ताई उठतात, डोक्यावरचा पदर सारखा करतात, नजर धरणीला भिडवतात आणि कापर्‍या आवाजात म्हणतात,"मी आपल्या सर्वांची आभारी आहे, धन्यवाद." मग त्यांचे पतीराज माईक हातात घेतात आणि ताईंच्या वतीने भाषण ठोकतात. महिलांच्या नावावर पुरुषांनीच खरा कारभार चालवावा याचे हे सर्रास दिसणारे चित्र. हळूहळू यात बदल होऊ लागला असला तरीही राजकारणात प्राथमिक पातळीवर मात्र अशा अनेक चाचपडणार्‍या ताई आहेत. बहुतेक जणी आपल्या घरातील पुरूषांची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजीखुशीने स्वत:चा प्यादे म्हणून वापर करू देत आहेत. ही संधी त्यांना महिलांचा विकास किंवा उन्नती व्हावी म्हणून दिली गेली नसून महिला राखीव मतदारसंघांमुळे नाईलाजाने मिळाली आहे. एरवी निवडणुकात खुल्या प्रवर्गात महिला उमेदवारांची संख्या कमीच आढळते. कॉंग्रेस किंवा भा.ज.प सारख्या महिला आरक्षणाला (वरवर तरी) पाठिंबा दाखवणार्‍या पक्षांकडूनही महिलांना जास्त प्रमाणात उमेदवारी दिली जात नाही. मतदार म्हणून सुद्धा निर्णयाचा अधिकार फार कमी स्त्रियांना आहे. बहुतेक वेळा घरातल्या पुरुषांचा कल असेल त्या पक्षाला मतदान करणे हा पर्यायच त्या निवडताना दिसतात.

राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्य जनतेचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. त्यामुळे महिला त्यातल्या पैशाच्या,सत्तेच्या खेळातील गळेकापू स्पर्धेत उतरायला कचरतात आणि "उतरवल्या गेल्याच" तर त्यांचे महत्व सहीपुरते असते. विवीध समितींच्या सभांमधे लोकनियुक्त महिला प्रतिनीधींचे पती किंवा इतर पुरूष नातेवाईक खुर्च्या बळकावून बसतात आणि या महिलांना बसायला मिळणे सुद्धा अवघड होते ही वस्तुस्थिती आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर एका महाशयांनी आपल्या उमेदवार पत्नीच्या नावाशेजारी सरळ स्वत:चेच फोटो छापून घेतले होते. माजघरातील राबडीदेवींना थेट मुख्यमंत्रीपदी बसवणार्‍या लालूजींना आपण आदर्श मानतो असे ही वर सांगायला ते विसरले नव्हते.

भारतातील लोकशाही जगात सर्वात मोठी आहे परंतु राजकारणातील महिलांच्या सहभागाबाबत जगभरातील संसदांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार भारताचा क्रमांक १०५ वा आहे. युगांडा, टांझानिया अशा मागासलेल्या देशांसह पाकिस्तानसुद्धा या बाबतीत भारताच्या पुढे आहे. लोकसभेत व राज्यसभेत महिलांचे प्रतिनिधित्व जेमतेम १० ते ११ टक्के आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधे महिला आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत पोचले ही जमेची बाजू असली तरी संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठीचे विधेयक गेल्या १६ वर्षांपासून मंजूर झालेले नाही. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष अशा पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय राजकारणात स्त्रियांचे महत्व आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. १९२५ मधे सरोजिनी नायडूंनी कॉंग्रेसचे प्रतिनिधीत्व केले, इंदिरा गांधी १९६६ मधे पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. देशाच्या अतिशय महत्वाच्या पदावर एक धडाडीची स्त्री आपली छाप उमटवू शकली ते पं.नेहरूंनी आपल्या मुलीला आपला राजकीय वारस मानून सर्वार्थाने घडवले म्हणूनच. सर्वसामान्य भारतीय स्त्रियांचे त्या प्रतिनिधीत्व करत नव्हत्या. राष्ट्रपतीपदावरील प्रतिभाताई सोडल्या तर पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात देखील आजवर राज्यपातळीवर नेतेपदावर पोचू शकलेली सुप्रिया सुळेंसारखी एखादीच स्त्री आहे.(उद्या कुणा एकाची निवड करायची वेळ आली तर चुलतभावासाठी त्याग करायचे औंदार्यही त्यांना दाखवावे लागू शकेल) कुणाही प्रथितयश राजकीय नेत्याची सून किंवा मुलगी नसूनही स्वप्रज्ञेवर राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करणार्‍या स्त्रियांची संख्या एकंदरीत नगण्य़ आहे. पक्षातील पुरूषी वर्चस्वाला स्त्रिया सहसा आव्हान देऊ शकत नाहीत. स्वत:चा नवीन पक्ष काढला तरच या स्त्रिया आपले नेतृत्वगुण सिद्ध करू शकतात. जयललीता किंवा ममता बॅनर्जींचे उदाहरण बोलके आहे.

बहुतेक राजकीय पक्षात महिला कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. सुषमा स्वराज, वृंदा कारंत, मेहबूबा मुफ्ती किंवा शीला दीक्षित यासारख्या मोजक्या महिलांचे अपवाद वगळले तर ज्या महिलांमधे विशेष क्षमता असते त्या महिलांना फारतर महिला गटापुरते नेतृत्व किंवा महिलांशी संबंधित प्रश्नापुरते (उद: दारूबंदी..खरे तर हा प्रश्न पुरूषांच्या अधिक जवळचा आहे) व्यासपीठ दिले जाते. महागाईसारख्या गृहिणींशी संबंधित समस्यांना शस्त्र म्हणून सत्ताधार्‍यांविरूद्ध वापरण्यासाठी या महिला आघाड्यांचा वापर केला जातो. यात गैर काही नसले तरी यापलीकडच्या मुद्यांसाठी पक्षाचे नेतृत्व करण्याची मुभा महिला कार्यकर्त्यांना अपवादानेच मिळते. पक्षश्रेष्ठी अगदी महिला असली तरीही, आणि ते जर पुरूष असतील तर मग राजकारणात वर्चस्व पुरूषांचेच.

राजकारणात थोडीफार संधी मिळालेल्या स्त्रिया त्यात मुरल्या की आपण पुरूषांपेक्षा मागे नाही हे दाखवून देत आहेत. निदान काही महिला तरी स्वकर्तृत्वावर सत्तेची सूत्रं हळूहळू हाती घेऊ लागल्या आहेत. दादा-भाईंप्रमाणेच मोठमोठाले फ्लेक्स लावून काही स्त्रिया भाषणबाजी करताना दिसू लागल्या आहेत. राजकारणाची ही अपरिहार्यता असलीच तर ती स्त्रियांनीही स्वीकारली आहे. मात्र अवगुणांच्या बाबतीतही काही स्त्रिया राजकारणाला कुरण मानणार्‍या कित्येक पुरूष नेत्यांच्या तुलनेत मागे नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते. मायावती, कनीमोळीवरील भ्रष्टाचारांच्या आरोपातील आकडे डोळे फिरवणारे आहेत. बर्‍याच उच्चपदावरील स्त्रिया पक्षांतर्गत राजकारणात इतर प्रतिस्पर्धी स्त्रियांचे पाय ओढण्यात पुढे असतात.

तरीदेखील मूल्यांची चाड तुलनेने स्त्रियांमधे बर्‍यापैकी शाबूत आहे आणि म्हणूनच त्यांचा राजकारणातला वाढता सहभाग गढूळलेल्या राजकारणाचे काही अंशी शुद्धीकरण करू शकेल. केवळ लोकशाहीच्याच नव्हे तर सामाजिक सक्षमीकरणासाठी स्त्रियांना समान राजकीय प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे आणि निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढवणे आवश्यक आहे. समाजाने आजवर दडपून ठेवलेला त्यांचा न्याय्य हक्क त्यांना देणे म्हणजे उपकार नव्हेत. असे घडले तर आज पुरूषाचे बोट धरून ते नेतील त्या दिशेने धडपडत चालणार्‍या स्त्रिया लवकरच (संसदेत अद्याप न मिळालेल्या) आरक्षणाच्या कुबड्या फेकून स्वबळावर आपली दिशा निश्चित करू शकतील. हा बदल भारतीय राजकारणाला निश्चितच सुदृढ करेल.

Photo Courtesy - Google
for noncommercial use

Tuesday, March 27, 2012

ग्रेस



ग्रेस गेले. त्यांच्या साहित्यातल्या लखलखत्या अक्षर प्रतिमांनी पुन्हा पुन्हा चकित होणे एवढच त्यांच्या शब्दांवर प्रेम करणार्‍या रसिकांच्या हातात उरलय. एकीकडे "समजायला अतिशय कठीण", "निव्वळ शब्द-अभियांत्रिकी" अशी टीका ग्रेस यांच्या काव्यावरती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या झाली आहे तर दुसरीकडे त्या गूढार्थाच्या शोधात कविताप्रेमी रमून गेले आहेत. ग्रेस स्वत: देखील म्हणत "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही." अनेकदा वाटतं की ग्रेस संपूर्ण कळतातच असं नाही, किंबहुना बहुतेक वेळा  अजिबात कळत नाही पण एखादी प्रतिमा, एखादा शब्द वाचकाला असा काही भारुन टाकतो की तो खुळावल्यासारखा त्या कवितेच्या मागे मागे जात राहतो. तिच्याबरोबरच कुठल्याशा गूढ डोहात सूर मारुन हाती लागलेले अर्थाच्या शक्यतांचे शिंपले चाचपडतो. त्यातून मोती निघाला तर मात्र त्या कवितेतून मुक्ती नाही. 

इन्ग्रिड बर्मन या अभिनेत्रीविषयी वाचलेल्या ’शी इज इन ग्रेस’ या प्रतिक्रियेने संमोहित होऊन माणिक सीताराम गोडघाट्यांनी 'ग्रेस' हे साहित्यिक नाव धारण केले असं म्हणतात. "संध्याकाळच्या कविता " या इ.स. १९६७ साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहामुळे चर्चेत आलेल्या ग्रेस यांचं वेगळेपण हे केवळ त्यांच्या शब्दातच नाही तर अवघ्या व्यक्तिमत्वात होतं. "राजपुत्र आणि डार्लिंग","चंद्रमाधवीचे प्रदेश","सांध्यपर्वातील वैष्णवी" मधल्या कवितांमधूनच नव्हे तर ललितलेख संग्रहांच्या अर्पणपत्रिकेपासून ते जाणवतं.
"मितवा" च्या सुरूवातीला ते लिहीतात " हे आत्मवैराण अवतरण मी तुला देत नाहिये; मितवा मी अर्पण करतोय;
अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना."
तर "मृगजळाचे बांधकाम" अर्पण करताना ते लिहीतात "अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पण (ही) यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ असतात काय ? संभवतात काय ?" ’वार्‍याने हलते रान’ या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना गतवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तरीही रसिकप्रेमाचे वलय लाभले ते त्यांच्या कवितेला.

त्यांच्या कवितेवर भाष्य करावे एवढी माझी प्रज्ञा आणि प्राज्ञा नाही. आकलन आणि अनाकलनीयतेच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा मोह पाडणारे या कवितेत आहे तरी काय असा प्रश्न मात्र प्रत्येक रसिक मनाला नक्कीच पडत असेल.
शब्दचित्र उभे करणारी प्रतिभा हे ग्रेस यांचे वैशिष्ट्य..
"अन पाणवठ्याच्या पाशी खचलेला एकच वाडा
मोकाट कुणाचा तेथे कधी हिंडत असतो घोडा"

किंवा "घर थकलेले संन्यासी हळु हळु भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते"

किंवा "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता"
अशा ओळी आधी त्या स्थळी आणि नकळत कवितेच्या आशयाकडे आपल्याला घेऊन जातात..

"दुःखाचा महाकवी " असं ज्यांना म्हटलं गेलं त्या कवीच्या कवितेतले दु:ख वास्तव आणि स्वप्न याच्या गुंत्यात आपल्याला अडकवते. एक समीक्षक म्हणतात,"त्यांच्या कवितेतली दु:खाची नक्षी वाचकाला भूल घालते, दु:ख नव्हे" परंतु मला वाटतं त्यांनी मांडलेली दु:खाची रूपं आपल्याला स्वा-नुभवाच्या पातळीवर अस्सल वाटू लागतात. दु:खाच्या प्रतिमा तर थेट मनाच्या तळाला जाऊन भिडतात.

"दु:ख भराला आले म्हणजे चंद्र नदीवर येतो
पाण्याचे ही अस्तर सोलून बिंब तळाला नेतो"

किंवा ग्रेस यांचे नाव काढताच आठवणार्‍या या ओळी..
"पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने"

किंवा "पक्षी पक्षी व्याकुळ व्याकुळ रूतवुनि काटा उर अभंग
दग्ध मुलीचे विदग्ध हसणे संध्येपाशी एक तरंग"
अशी विकल स्थिती असो.

कविता आपल्या अनुभवविश्वाला चाटून जाते तेव्हा ती कळल्यासारखी वाटते, ती संपूर्णपणे कळणे कदाचित कवीलाच शक्य आहे पण ग्रेसच्या कवितेतून झिरपणारे औदासिन्य आपल्या मनात अलगद पोचते
.
"अशी ही उदासी मला घेरणारी , जडावातल्या केशराची कळी
तिथे मावळे सूर्य माझा विरागी, जिथे फाटलेली दिसे पोकळी"

किंवा "वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करूण उभे की, सांज निळाईतले"

आणि या ओळीतले करूण सत्य तर प्रत्येकालाच पटणारे
"नाहीच कुणी अपुले रे , प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी ,हृदयाला स्पंदविणारे"

ग्रेस यांच्या काही कवितांमधून सौंदर्यपूर्ण शब्दरचनेबरोबरच लोककथा, पुराणातले संदर्भ प्रतिमांच्या रूपाने समोर येतात. संस्कृती आणि सृजनामधला दुवा सांधतात. त्यातल्या नावीन्याने, लयबद्धतेने आपणही नादावतो.
"न्हात्याधुत्या कुंवारणी नदीपाशी दंग
पैंजणाने नादावती सोनियाचे अंग"

किंवा "केरळी चंदनी वारा तू सांग एवढे साधे
मोगरी चांदणे टिचले की तुझ्या बिल्वरी राधे"

किंवा "असुनी तुझा मी तुझी दूरता तुला झाकितो काल
सांग उर्मिले, कुणी बांधिले नयनी चंद्रमहाल"

या सगळ्या प्रतिमांच्या शब्दकळांमधे आपण केव्हाच गुरफटून जातो..

मात्र या सगळ्यापलीकडली जी देहातीत भावना ग्रेस यांच्या कवितेच्या गाभ्याशी दिसते.. त्याबद्दलचे माणसाला असलेले कुतूहल आणि त्याला मिळणारे परिणामकारक शब्दांचे कोंदण आपल्याला त्या कवितेशी अक्षरश: जखडून टाकते..

"मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकु येतो पावा"

हे वाचताना आपण स्तब्ध होतो. सृजनाचा स्त्रोत मात्र अखंड वाहत राहणार हे कविता सांगते या ओळीतून
"ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया"

ग्रेस यांच्या कवितेचा शोध त्यांच्याबरोबर संपणारा नाही आणि तो संपत नाही यात त्या कवितेची दुर्बोधता नव्हे तर अलौकिकत्व सामावले आहे असे मला वाटते. ग्रेस यांना कवितेतून खुद्द कवितेला हेच सांगायचं असेल का !....
"मी खरेच दूर निघालो ,तू येऊ नको ना मागे
पाऊस कुठे तरी वाजे, हृदयाचे तुटती धागे"

Tuesday, March 13, 2012

जपान


उगवत्या सूर्याचा देश- जपान
त्सुनामी आणि प्रलयकारी भूकंपाच्या धक्क्यातून जपान वेगाने सावरतो आहे. हुंदक्यांपासून हिमतीकडे जपानचा प्रवास सुरू आहे अशा तेथे परतलेल्या मूळ भारतीय नागरिकांच्या प्रतिक्रीया आहेत. पुनर्वसनासाठी अनेक स्तरावर यशस्वी प्रयत्न केल्याची ग्वाही त्यांचे पंतप्रधान नोडा यांनी दिली आहे. त्सुनामीच्या तडाख्याने जपान देश कोलमडला त्या घटनेला ११ मार्च २०१२ ला एक वर्ष पूर्ण झालं. भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेले अणुभटट्यांमधील स्फोट आणि किरणोत्सर्ग यामुळे घबराट पसरली होती. १९ हजाराहून अधिक नागरिक या घटनेत मृत्यु पावले. ही नैसर्गिक आपत्ती होती पण त्याआधी देखील एका मानव-प्रणित विनाशाला जपानला तोंड द्यावं लागलं होतं. अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमावर तर ९ ऑगस्टला नागासाकीवर अणुबॉंब टाकला. जपान बिनशर्त शरण आला. दुसरं महायुद्ध थांबलं. परंतु अणुबॉंबमुळे सुमारे सत्तर हजार माणसं मृत्युमुखी पडली तर नंतर त्याच्या दुष्परिणामांनी दोन लाखांहून अधिक माणसे दगावली. त्याचे मानसिक, आर्थिक परिणाम त्या देशाची राखरांगोळी करून गेले. मात्र जगाच्या सहानुभूतीचा फायदा घेत- अमेरिकेच्या नावाने बोटे मोडत- सूडाचे राजकारण करण्यात धन्यता न मानता त्या राखेतून जपानने फिनीक्स पक्षासारखी भरारी घेतली हा इतिहास सर्वश्रुत आहे.

आपत्तीला तोंड देऊन पुन्हा प्रगतीकडे झेप घेण्याची जपानी जिगर आपल्याला थक्क करते. भारताची स्वातंत्र्यप्राप्ती आणि जपानची महायुद्धातील पराभवानंतरची नवनिर्मिती या साधारण एकाच कालखंडातल्या घटना. मग आपलं बाळ अजून रांगतच आहे आणि त्यांच्या बाळाने सळसळत्या तारूण्यात पदार्पण केलं ते का! यामागचं गुपित जपानकडून आता तरी आपण जाणून घ्यायला हवं. संकटात माणसाचा खरा कस लागतो असे म्हणतात, अंधारातही जो चोरीचा मोह टाळतो त्यालाच प्रामाणिक म्हणायला हवे. त्सुनामी नंतर ज्या बातम्या येत होत्या त्या खरोखर विलक्षण वाटाव्या अशा आहेत. जपानी लोकांच्या सामाजिक वर्तनाचा तो हृद्य आविष्कार आहे. भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी जे लोक निरनिराळ्या दुकानात खरेदी करत होते , त्यांच्या लक्षात आले की वीजपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हा लोकांनी ज्या वस्तू उचलून घेतल्या होत्या त्या परत त्या त्या ठिकाणी नेऊन ठेवल्या. कोणीही कोणत्याही प्रकारची चोरी करण्याचा किंवा दुकानातून माल लुटण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांना रस्त्यात अडकून पडावे लागले तरी कोणीही सिग्नल तोडण्याचा किंवा पुढे घुसण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे आपत्तीव्यवस्थापन कोणत्याही गोंधळाविना, चेंगराचेंगरीविना, अफवांनी भयभीत न होता तत्परतेने सुरू झाले. या साध्या उदाहरणांवरून जपानकडून आपण खूप काही शिकायला हवं आहे असं प्रकर्षाने जाणवतं.

आज आपण चिनी वस्तूंनी काबीज केलेली बाजारपेठ पाहतो पण त्या वस्तूंच्या गुणवत्तेची आपल्याला मुळीच खात्री नसते. या उलट "मेड इन जपान" या शब्दाचा दुसरा अर्थ जणू गुणवत्ता असा होतो. केवळ व्यवसायातच नव्हे तर दैनंदिन जीवनात, शाळा-महाविद्यालयात, कचेरीत, अगदी घरातदेखील जपलेली गुणवत्तापूर्ण जीवनशैली हे जपान्यांचे वैशिष्ट्य आहे. तिचं नाव ’काईझेन’. काम अधिक चांगले, सोप्या पद्धतीने, कमी श्रमात, कमी वेळेत व कमी खर्चात करता यावे म्हणून जे बदल केले जातात ते म्हणजेच काईझेन. या निरंतर सुधारणेचा ध्यास चपराशापासून अधिकार्‍यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत प्रत्येक जपानी व्यक्तीला आहे पण तो भावनेपुरताच मर्यादित नाही तर कृतीतून दिसतो. याउलट भारतीयांचे देशप्रेम त्यांच्या भावनांमधून ओथंबून वाहते, प्रत्यक्ष कृतीत फारसे दिसत नाही. जपानी माणसांचे देशप्रेम अंत:प्रेरणेतून निर्माण झालेले आहे. ते घोषणांमधून नव्हे तर प्रत्येक बाबतीतील "सुनियोजितता, सुव्यवस्था, स्वच्छता, सद्व्यवहार आणि स्वयंशिस्त" या पंचसूत्रीतून सहजगत्या प्रकट होते. रत्न, तलवार आणि आरसा या ३ गोष्टींना जपानमध्ये महत्व आहे. रत्न हे समृद्धीचे, तलवार हे सामर्थ्याचे तर आरसा हे आत्मपरिक्षणाचे प्रतीक आहे.

जपान हा देशच मुळी एका धाग्यात बांधला गेला आहे. उदाहरण द्यायचे तर तेथे देशभरच्या सगळ्या शाळांतून एकच धडा एकाचवेळी शिकवला जातो. त्यामुळे देशभर कोणत्याही दिवशी त्या त्या वर्गातील मुलेमुली सारखेच शिक्षण घेत असतात. जपानचे सरकार शिक्षणाचे धोरण विचारपूर्वक राबवते. त्यामुळेच आज शंभर टक्के साक्षर, नुसता साक्षर नव्हे तर सुशिक्षित असलेला जपानी समाज प्रगतीपथावर पोहोचला आहे. भारताप्रमाणेच तेथेही प्रामुख्याने स्त्रिया मुलांना वाढवतात. त्यासाठी आधी स्त्री सुशिक्षीत असणे गरजेचे आहे, नव्हे तिने शिक्षित असलेच पाहिजे असे ठरवून स्त्री-शिक्षणावर भर दिलेला आहे. इंग्रजीच्या आक्रमणाला दाद न देता जपानी भाषेने आपला समृद्ध वारसा जपला आहे. सगळे शिक्षण, अगदी उच्च तांत्रिक शिक्षणही जपानीत आणले गेले. बाहेरचे ज्ञान स्वतःच्या भाषेत आणताना शब्दांचा क्लिष्ट अनुवाद माथी मारण्याचा अट्टाहास न करता कितीतरी आधुनिक शब्द जसेच्या तसे जपानीत आणून त्यासाठी सरळ वेगळी लिपी वापरात आणली गेली आहे. जपानच्या सक्षमीकरणात भाषेच्या, शिक्षणपद्धतीच्या एकजिनसीपणाचा महत्त्वाचा वाटा आहे.

जपानमधे बराच काळ वास्तव्य केलेल्या प्रसिद्ध मराठी लेखिका सानिया यांचे जपानविषयीचे निरीक्षण नोंद घेण्यासारखे आहे. त्या निरीक्षणातच जपानच्या प्रगतीशील, विजीगिषु वृत्तीचे मर्म आढळून येते. सानिया म्हणतात "जपानी भाषेमध्ये ‘वाताशी’ या शब्दाचा अर्थ ’मी’ असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ’वाताशी’ या शब्दाचा उपयोग करतात. जिथे मी आवश्यक असतो तिथेही ‘वाताशी’ शिवायच क्रियापद वापरता येते. ’वाताशी’ कमीतकमी वापरणारी जपानी माणसे ’मी’पेक्षा सतत ’आम्ही’ असा विचार करत असतात. व्यक्तीपेक्षा कुटुंब, समूह, समाज, देश अधिक महत्त्वाचा असे त्यांनी मानले आहे. जपानमधे राहताना हे पावलोपावली दिसते." याचा अर्थ जपानमधे सगळे सत्पुरूषच राहतात असे नाही पण जगात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या मोजक्या देशांपैकी हा एक आहे. औद्योगिकीकरणातून निर्माण होणार्‍या चंगळवादी जीवनशैलीच्या प्रभावामुळे जपानी जनजीवनात देखील आंतरिक अस्वस्थता काहीशी वाढू लागली आहे. अधूनमधून काही अप्रिय घटना घडतायत परंतु काय चुकते आहे, तरूणांचे प्रश्न काय आहेत, मूल्ये का बदलतायत याचा सर्वांगानी विचार केला जातो. त्यामुळे एक प्रकारची शांतता, विश्वास जनमानसात भिनलेला असतो.

परिवर्तनाची सुरूवात अंतर्मनापासून होते हे जपानी लोकांना कळले आहे, आपल्याकडे अनेक थोर पुरूषांनी हे तत्त्व आचरणात आणले आहे पण सर्वसामान्य जनतेत ते तत्त्व जपानसारखे का रूजू शकले नाही याचा विचार व्हायला हवा. अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते. कित्येक आपत्तींच्या काळोखातून उमेदीचा-प्रगतीचा झळाळता सूर्य जपानमधे पुनश्च, निरंतर उगवतो आहे या अर्थी त्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.

Saturday, March 3, 2012

स्वच्छतेचा संस्कार


मध्यप्रदेशातील बैतुल मधल्या एका खेड्यातील अनीता नावाच्या महिलेला सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने तब्बल दोन लाख रू.चा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. घरात स्वच्छतागृह बांधल्याशिवाय मी नांदायला येणार नाही असे नवर्‍याला बजावून अनीता घर सोडून गेली आणि त्याने ग्रामपंचायतीच्या मदतीने स्वच्छतागृह बांधल्यावरच ती परतली. तिच्या या ठाम भूमिकेमुळे आपापल्या घरी देखील स्वच्छतागृह असायला हवे याची जाणीव गावातील इतर महिलांना झाली आणि गावात एक महत्वाचा आरोग्यविषयक बदल घडून आला. २१ व्या शतकात असे पुरस्कार द्यावे लागणं ही आपल्या देशासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट नाही.

स्वच्छतेचा संस्कार आपल्या देशात रूजलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचा लोकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जाशी काही संबंध नाही. परवाच रेल्वेप्रवासात पाहिले.. एक आधुनिक तरूण जोडपे आणि त्यांची दोन लहान मुलं, ती मुलं गाडीत इकडे तिकडे हात लावत असल्याने "अरे ते सगळं "डर्टी’ आहे" म्हणत त्यांची आई सारखी "हँड सॅनिटायझर लोशन" चे थेंब त्यांच्या हातावर टाकत होती. त्यांच्या बाबांनी एका स्थानकावर चहा पिऊन प्लास्टीकचा कप आणि मुलांनी वेफर्सची रिकामी पाकीटं तिथेच खाली टाकली. जेवणाआधी बाबांनी मुलांना कटाक्षाने हात धुवून यायला सांगितले पण जेवणे झाल्यावर बर्थ स्वच्छ पुसून त्या आईबाबांनी सगळा कचरा गाडीतून बाहेर फेकून दिला. स्वच्छतेची व्याख्या फक्त स्वत:पुरतीच मर्यादित का? रेल्वेप्रवासच नव्हे कार्यालये, कचेर्‍या, बगीचे, इस्पितळे, बसस्थानक अगदी विमानतळावरसुद्धा लोक असे वागताना दिसतात. म्हणूनच अशा जागरूक अनीतांना पुरस्कार देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

सकाळी रेल्वेरूळांच्या कडेला बसलेले लोक पाहून, स्वातंत्र्य मिळून आपल्याला नक्की किती वर्ष झालीत याचा विचार पडावा की विषाद वाटावा अशी मनस्थिती होते. कानाला मोबाइल, छपरावर डिश(टीव्ही) पण घरात स्वच्छतागृह नाही ! केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर मुंबईसारख्या शहरांमधल्या कित्येक वसाहतींमधे देखील हेच चित्र आहे. ते बदलायचे कुणी? शासनाने? काही वर्षांपूर्वी गरीब कुटुंबांना शौचालये बांधण्यासाठी शासकीय अनुदान मिळत होते. लोकांनी बांधकाम केले देखील पण अनुदानाची रक्कम हातात पडताच ती कडबा ठेवायची खोली झाली. शासनाच्या ‘गुड मॉर्निंग पथकां’नाही लोकांनी जुमानले नाही.(त्या पथकातील काही सदस्यांच्या घरीही स्वच्छतागृहे नव्हती).खुद्द शासकीय कचेर्‍यांचीच अवस्था काय वर्णावी! कित्येक सरकारी कचेर्‍यात फाईलींचा रंग ओळखू येणार नाही एवढी धूळ साठलेली असते, जळमटे तशीच असतात. काही अपवाद वगळता "पर्मनंट" झालेले सफाई कर्मचारी चहा प्यायला गेलेले असतात.

हे चित्र कायद्याने बदलायचे? देशातल्या प्रत्येक शाळेत गेल्या वर्षाच्या अखेरपर्यंत पक्के स्वच्छतागृह बांधा, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. प्रत्यक्षात कित्येक राज्यांमध्ये हे झालेच नाही. महाराष्ट्रात १३ टक्के शाळांत मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. केवळ शाळेत स्वच्छतागृह नाही, म्हणून कित्येक पालक मुलींना शाळेत पाठवत नाहीत. स्वच्छतागृह तर सोडाच शाळांचे वर्ग, परिसर महिनोन महिने झाडलेले नसतात. एकीकडे विद्यार्थ्यांसाठी "हात धुवा" अभियान राबवले जाते. त्यासाठी मंत्री येतात, आयोजनात जेवढा खर्च होतो त्यात काही शाळांमधे स्वच्छतागृहे बांधून होतील. मग हे चित्र पोलीसांनी बदलायचे? पोलीस वसाहतींनाच कचराकुंड्यांची, सांडपाण्याची सुविधा नसते. लोकांना पकडून समज द्यायची म्हटली तर बर्‍याच पोलीसदादांना आधी स्वमुखातली पानाची पिंक कुठे टाकावी असा प्रश्न पडेल आणि दंड करायचा म्हटला तर भ्रष्टाचाराची एक नवी पद्धत सुरू होण्याची भीती नाकारता येत नाही. मग काय हे चित्र निवडणूक आयोगाने बदलायचे? निदान निवडणूक लढवणार्‍यांनी तरी शौचालये बांधावीत, या हेतूने निवडणूक, ग्रामविकास खात्याने उमेदवारांना शौचालय प्रमाणपत्र आणण्याची अट घातली होती पण मध्येच ही अट रद्द झाली. निर्मल ग्राम सारखे पुरस्कार दिले गेले पण पुस्काराचे कौतुक ओसरेतो काही गावे पुन्हा पूर्वपदाला पोहोचली.

आपल्या देशात मोबाइल फोनची संख्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे आणि देशातील स्वच्छतागृहांची संख्या जेमतेम ३६ टक्के असावी ही विसंगती लाजिरवाणी आहे. चकचकीत परदेशांचे कौतुक करताना आपण आपल्या देशात असे का वागत नाही हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा आहे. गाडगेबाबांचं नाव हे फक्त योजनेला तोरण म्हणून शोभावं? घर अगदी स्वच्छं हवं मग बाहेर कचरा का चालतो? कळत नाही म्हणून? चुकून? काही कायदा, दंड नाही म्हणून? जाणीवच नाही की दुसऱ्याचा विचार नाही म्हणून? अनीता सारख्यांकडून प्रेरणा घेऊन अस्वच्छतेचं चित्र बदलण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. कोणत्याही स्वच्छता अभियानामध्ये शासकीय सहभागाबरोबर लोकचळवळीचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान हे केवळ स्वच्छतागृहांपुरते मर्यादीत नसून परिसर स्वच्छ ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी या ही गोष्टी त्यात येतात. सुरूवातीची पायरी म्हणजे लोकांचे मतपरिवर्तन... त्यातल्या त्यात शाळेत शिक्षकांकडून मिळालेले स्वच्छतेचे धडे मुले सहजतेने अंगीकारतील आणि ते सहजच पालकांपर्यंत जाऊन पोहचतील. त्यामुळे एकूणच समाजाच्या मानसिकतेत बदल होऊन स्वच्छतेचा आग्रह धरला जाईल. हे अवघड असले तरी अशक्य नाही.

वैयक्तिक पातळीवर आपण ३ आर (3 R) चा शक्य तेवढा स्वीकार करायला हवा. रिड्यूस (कमी वापर), रीयूज (पुनर्वापर) आणि रिसायकल (पुनर्चक्रीकरण) तरच आपल्याला स्वच्छ भारतात राहायला मिळण्याची शक्यता आहे. पुलंनी एका लेखात म्हटले आहे," देशाची खरी ओळख म्हणजे तिथली सार्वजनिक स्वछतागृहे". देशप्रेम ही काही प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनाची वाट पाहून प्रदर्शित करण्याची गोष्ट नाही. स्वच्छ लखलखीत परिसरात देशप्रेमाचे प्रतिबिंब आपोआप उमटते.

(पूर्वप्रसिद्धी- मातृभूमि)

Thursday, February 16, 2012

मरण


आपुले मरण पाहिले म्या डोळां

माणूस सर्वात जास्त कशाला घाबरत असेल तर मरणाला!
"मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं, म्हणालं, काय हा मनुष्य आहे ?"
या ओळी चारोळीकार गोखल्यांच्या असाव्यात. असे मृत्युंजयी क्वचितच पाहायला मिळतात. उद्या तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्ही या दिवशी मरणार आहात तर!!! काय प्रतिक्रीया असेल तुमची? ही कवीकल्पना नाहीये, प्रथितयश वृत्तपत्रात मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार आता तरूणपणीच तुमची मरणवेळ तुम्हाला कळू शकेल. माणूस आयुष्यभर मृत्यूचा विचार करत असतो. कधी ज्योतिषाचा आधार घेऊन तो आयुष्यरेषेवर नजर ठेवून असतो, तर कधी विज्ञानाच्या साथीने, तरीही ते गूढ कायम राहिले आहे. ब्रिटनच्या ग्लास्गो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मात्र माणसाच्या शरीरातील डीएनएद्वारे त्याचे आयुर्मान तरुणपणीच समजू शकेल असा दावा केला आहे. मानवी शरीरात असलेल्या 'टेलोमेरेस'च्या लांबीवरून माणसाची 'मरणवेळ ' सांगता येऊ शकेल. सध्या हा प्रयोग केवळ पक्ष्यांवर करण्यात आला असल्याने मानवावर प्रयोग केल्यानंतरच त्याची सत्यता पडताळता येईल.

आधीच मरणवेळ कळणं म्हणजे जणू क्रिकेटमधलं मॅच फिक्सींग ! खेळणार्‍यांनी लुटूपुटीचा खेळ खेळायचा, बघणार्‍याने मात्र समरसून बघायचा. मरणाची वेळ, तारीख समजली तर अवघं जगणच लुटूपुटीचं होऊन जाईल."जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय" हे कवी तांब्यांनी सांगितलेलं सत्य माहीत असूनही माणसाच्या आयुष्यातील आनंद आणि दु:ख एकाच गोष्टीशी निगडीत असतं, ती म्हणजे 'मृत्यू'. बहिणाबाई सांगून गेल्यात, 'जनम- मरण एका श्वासाचे अंतर.' तरीही माणूस नात्याच्या पाशात, मालमत्तेत, संशोधनात, व्यासंगात, कलेच्या रसात, प्रपंचात जीव गुंतवतो. मृत्यु समोर दिसला की मात्र भल्याभल्यांचे मुखवटे गळून पडतात हे माकडिणीच्या गोष्टीतून कळतं. बिरबल एका माकडिणीला तिच्या पिल्लासह हौदात ठेवून तो हौद पाण्याने भरू लागतो. हौद भरू लागताच ती पिल्लाला डोक्यावर उचलून घेते. पण तिच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागताच ती पिल्लाला पायाखाली ठेवून त्यावर उभे राहून आपला जीव वाचवू पाहते. येथे ती माकडीण हे जीवनाच्या आसक्तीचे प्रतीक आहे. माणसाला जगात सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे त्याचा जीव, हेच या कथेचे सार आहे.

परंतु हाच परमप्रिय जीव तुम्ही अमुक दिवशी गमावणार आहात असे कळले तर काय होईल! आयुष्य म्हणजे कथा, कादंबरी किंवा दूरदर्शनवरची मालिका नव्हे. त्यात प्रेक्षकांच्या आग्रहाच्या नावाखाली मेलेली पात्रं परत जिवंत करण्याचे चमत्कार घडत असतात. केवळ मालिकांमधले ’काशी’ किंवा ’मिहीर’च नव्हे, कादंबरीतला हॅरी पॉटर मरणार काय या भीतीने जगभरातली बच्चेकंपनी हादरली. ‘शेरलॉक होम्स’च्या बाबतीत त्याच्या फॅन्सची अवस्था तीच होती. ‘हिज लास्ट बो’ या कादंबरीत तो मरतो असं दाखवलं होतं. शेवटी ‘रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ लिहून त्याला जिवंत करावं लागलं. खर्‍या आयुष्यात अशी "संजीवनी बुटी" मिळत नसली तरीही आपण जगाला हवे आहोत या भ्रमात माणूस त्यात रंग भरत राहतो. मरणवेळ कळली तर या सार्‍याचा बेरंग होईल. समजा स्वत:ची मरणवेळ दूर असली पण अतिशय जवळच्या व्यक्तीची मरणवेळ जवळ असली तरी माणूस कोसळून पडेल.

आज मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे. अथक वैद्यकिय व वैज्ञानिक प्रयोगानंतर मानवाने हे यश मिळवले आहे. अमरत्वाच्या आगीत अश्वत्थाम्यासारखं होरपळावसं वाटत नसलं, तरी शतायुषी होण्याची आस त्याच्या मनातून सहजी जात नाही. मात्र दुर्धर रोगाने पीडीत, कोमात गेलेल्या किंवा समाजानी उपेक्षिलेल्या कित्येकांना इच्छा मरण हवं आहे. अशांची मरणवेळ दूर असेल तर आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अर्थात मृत्युच्या भयावर मात केलेल्या, जीवनाची क्षणभंगुरता उमगलेल्या संतमहात्म्यांना, समाजासाठी जीवन उधळून टाकणार्‍या सुहृदांना, देशासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या शूरवीरांना कदाचित मरणवेळ कळल्याने फरक पडणार नाही. त्यांनी एका ध्येयासाठी "तुजसाठी मरण ते जनन" म्हणत जीव ओवाळून टाकलेला असतो. जन्माला येणार्‍या प्रत्येकाचं जगणं शाश्वत नसलं तरी मरण शाश्वत असतं, पण ते कधी हे कळलं तर, सामान्य माणसाच्या जगण्यातली मात्र सगळी गंमतच निघून जाईल. आहे ते आयुष्य सकारात्मक जगून कारणी लावावं हे भान असणं सोपं नसतं. त्यामुळे आयुष्य केवळ "उपभोगण्या" साठी आहे अशी त्याची धारणा होईल.

जगबुडीची नुसती अफवा उठली तरी त्याचा कित्येकांवर मानसिक परिणाम झाल्याच्या बातम्या आपण वाचतो, २१ डिसेंबर २०१२ हा विश्वाचा अंतिम दिवस असल्याच्या खुळचट चर्चा माध्यमातून झडल्या, तरीही त्यात आपण सगळेच संपणार आहोत असं काहीसं विचीत्र समाधान असतं. परंतु मरणवेळ प्रत्येकाची वेगळी असेल, मी गेलो तरी जगरहाटी सुरूच राहणार आहे हे स्वीकारणं अधिक अवघड होईल. ती जवळ असेल ते "ओरबाडून" जगू लागतील, स्वप्न पाहाण्यातली मौज हरवून बसतील, "आपुले मरण पाहिले म्या डोळां" अशी त्याची अवस्था होईल. ज्यांची मरणवेळ दूर असेल ते बेदरकार, बेपर्वा बनतील. मरणवेळ कळली तर आशीर्वाद पोकळ होतील, "जपून राहा" या गोड शब्दांना अर्थ उरणार नाही.
मृत्युच्या गूढपणातच जीवनाचे सौंदर्य दडले आहे. विज्ञानाच्या अतिरेकी प्रेमापायी माणसाने ते गूढ उलगडले तर बाकी उरेल फक्त जीवनाचे कुरूप वास्तव... मग त्यापेक्षा एका शायराने म्हटल्याप्रमाणे मृत्युच का सुंदर वाटू नये!

" दो कदम चलने को तैयार ना था कोई, आज काफिला बनकर साथ चले जा रहे थे
आज पता चला "मौत" इतनी हसीन होती है यारों , कमबख्त हम तो युही "जिए" जा रहे थे "

Thursday, February 9, 2012

वाचीत जावे


प्रसंगी अखंडीत वाचीत जावे

जगज्जेत्या अलेक्झांडरचा पराक्रमी सरदार शत्रूची छावणी उद्ध्वस्त करून परतला व अलेक्झांडरला अभिमानाने म्हणाला, "शत्रूचे सैनिक, राजवाडे, पागा सगळे आम्ही बेचिराख केले; फक्त एक ग्रंथालय तेवढे यातून वाचले." अलेक्झांडर म्हणाला " ग्रंथ म्हणजे मानवी संस्कृतीच्या जतन संवर्धनाचे मूळ ! तेच त्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवून आलात ! मग काय नष्ट केलेत तुम्ही!" ग्रंथसंगाचे महत्त्व सांगणारी ही घटना एका लेखात उद्धृत केली होती. मानवी संस्कृतीच्या उंचीचे मोजमाप होते ते वाचनसंस्कृतीने. जागतिकीकरणामध्ये जग झपाट्याने बदलतेय, त्याचे परिणाम सर्व गोष्टींवर होत आहेत. वाचनसंस्कृती त्याला अपवाद नाही. इलेक्‍ट्रॉनिक जगामध्ये तरुण पिढी वाचत नाही अशी खंत व्यक्त केली जाते. लिखाणात जसे बोरूपासून कीबोर्डपर्यंत तंत्र बदलत गेले तसे वाचनातही बदल होणारच. "केवळ पुस्तकातून वाचणे" म्हणजे वाचन असे न मानता आज इंटरनेट, मोबाईल, किंडलच्या माध्यमातून वाचन केले जात आहे. वाचायला वेळ नाही म्हणून वाचन टाळण्यापेक्षा ह्या बदलाची नोंद घेतली तर वाचनसंस्कृतीला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे.

मात्र हे पुरेसे नाही. काय वाचावे याचे भान भावी पिढीला असणे-देणे गरजेचे आहे. तरूणाईला एकूण ग्रंथप्रेमापेक्षा प्रेमग्रंथात जास्त रस आहे. एसएमएस, टाईमपास इ-मेल फॉरवर्डस वाचणे किंवा केवळ अभ्यासक्रमात असलेली पुस्तके वाचणे म्हणजे वाचन नव्हे. तुमची संगत कशी आहे, हे बघून तुम्ही कसे असाल याबद्दलचं मत लोक तयार करतात. अगदी तसंच पुस्तकांबाबत आहे. तुम्ही कुठलं पुस्तक वाचता, हे बघून तुमच्या ज्ञान आणि विचारांची किती खोली आहे, याची कल्पना येते. आज तुमच्याकडे जगात काय चाललं आहे याची सखोल माहिती असेल तर कुठलेही क्षेत्र सर करणे अवघड नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे नशीब नव्हे तर "पुस्तकं" उभी असतात. लहानपणापासून पुस्तकांबरोबरीने वर्तमानपत्र, वेगवेगळ्या विषयांवरची मासिकं वाचण्याचीही सवय असायला हवी. मग स्पर्धात्मक परीक्षांना बसताना आयत्यावेळी सामान्य ज्ञानाचं पुस्तक शोधण्याची गरज भासत नाही.

नव्या पिढीवर चांगले वाचनसंस्कार नाहीत असे म्हणताना मुळात आपण त्यांना ते दिले का याचा विचार करायला हवा. ईडिअट बॉक्स (दूरदर्शन) किंवा थाड्थाड गोळ्या घालुन शत्रुला संपवायला शिकवणारे व्हिडिओ गेम्स याच्या आभासी दुनियेत वाढ्णारी मुलं पाहून पालक धास्तावतात. यावर संस्कार हाच उपाय, उत्तम साहित्याच्या वाचनाची सवय असेल तर तो आपसूक घडतो. धर्मग्रंथ समाजमन घडवतात तर संत साहित्य पुरोगामी डोळस विचार करायला शिकवते. चरित्रं, वंचितांच्या साहित्यातून आत्मभानासह माणूस जागा होतो तर कविता जीवनाला लय देतात. विनोदी साहित्य,विडंबने खिलाडू वृत्तीने जगायला शिकवतात तर प्रवासवर्णनातून जगाकडे विहंगम दृष्टीने बघता येते. थेट किंवा अनुवादाच्या माध्यमातून पोचणारे वैश्विक साहित्य इतर संस्कृतींशी आपला परिचय करून देते,जाणीवा प्रगल्भ करते. आपल्या देशाचाच नव्हे तर जागतिक उलथापालथींचा इतिहास, वर्तमान केवळ वाचनाच्या मदतीनेच आपल्याला समजू शकतो. साहित्य ललित आहे की वैचारिक, स्त्रियांसाठी आहे की पुरूषांसाठी, आहे रे गटाचे आहे की नाही रे गटाचे असे भेद न मानता ते सकस असावे या निकषावर त्याचा मोकळेपणे स्वीकार केला तर जगणे समृद्ध होईल. क्षणभर हे सगळं बाजूला ठेवलं तरी वाचनामुळे जगण्यात एक ’गंमत येते’ आणि ती फक्त आपली -आपल्यासाठी असते, म्हणून तरी वाचून पाहायला हवं.

विचारांना दिशा देणारं शब्दभांडार मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आवर्जून व्हायला हवा. निबंध ही पाठ न करता वाचनातून भिनलेल्या विचारांची अभिव्यक्ती आहे हे जाणवले तर मुलांना लिहावेसेही वाटू लागेल. भेट म्हणून पुस्तक देणे, खास प्रसंगी पुस्तके विकत घेणे, स्वत: वाचणे, जमल्यास वाचून दाखवणे ही पालकांची जबाबदारी आहे. शक्य असल्यास तुमचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह असावा, नसल्यास निदान वाचनालयाचं सभासदत्व घ्यायला हवं. पुणे शहरात पहिले ग्रंथालय झाले तेव्हा लोकहितवादींनी "ग्रंथ म्हणजे हजार जिव्हा" असे म्हटले होते. आजच्या ग्रामीण जीवनात सुधारित तांत्रिक युगाचा परिणाम दिसू लागला आहे. मोबाईल, डिश टीव्ही सगळीकडे दिसत आहेत, त्या मानाने वाचनालयांची वानवा आहे. प्रत्येक गावात एक तरी वाचनालय असणे, वृत्तपत्रं पोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जगाचा अभ्यास करत असताना स्वतःची ओळख होईल. आपण कुठे आहोत, कुठे जायचे आहे याची दिशा निश्चीत होईल. विकासाला वय नसते, त्यामुळे तुम्ही प्रौढ असलात तरी वाचनाचा व्यासंग वाढवत राहिले पाहिजे. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथोत्सवाची गरज आहे. ‘पुस्तक भिशी’ सारख्या योजनांची गरज आहे. समाजातील सर्व स्तरावर ज्ञानाची भूक जागृत व्हायला हवी,ती शमवायला गावोगावी पुस्तके पोहोचायला हवी. दर्जेदार प्रकाशकांनी एकत्र येऊन यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. चंद्रपूरला नुकतेच साहित्य संमेलन झाले. या निमित्ताने भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनातून विविध लेखकांची, विविध विषयांवरची सुमारे तीन कोटी रुपयांची पुस्तक खरेदी झाल्याचे वृत्त उभारी देणारे आहे.

या वाचनाच्या धडपडीतून काय साध्य करायचे हे समर्थ रामदास स्वामींनी पूर्वीच सांगितले आहे...
"दिसा माजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी शिकवावे | शहाणे करुन सोडावे सकल जन ||"
आपण काही ’चला, आता आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करुया’ असल्या भाबड्या भावनेने वाचत नसतो. पण आपल्याही नकळत पुस्तकं आपल्याला केवळ शिकवत नाहीत, ती जोजवतात, रमवतात, शब्दलालित्याने चकित करतात, आपले बोट धरून अनोख्या विश्वाची सफर घडवून आणतात, मित्र बनतात, एकटेपणातही साथ देतात, सर्वार्थाने घडवतात, श्रीमंत करतात.

पूर्वप्रकाशित- मातृभूमि