केव्हाही फोनवर विचारलं- ‘कशी आहेस?’ की खळाळून हसत तिचं उत्तर येतं- ‘मज्जेत." या वेळी म्हणाली ,"सध्या ....... कॉलेजला सीएचबी वर अर्थशास्त्र शिकवतेय सिनीयर कॉलेजला. ........ मध्ये पण शिकवायला बोलावतायत. पण इथेच पर्मनंट व्हायचा प्रयत्न करतेय,". जयू आणि प्राध्यापिका? कल्पनाशक्तीला प्रचंड ताण दिला तरी हे दृश्य नजरेसमोर येत नाही.
एकच शाळा आणि जवळच राहत असल्याने जयूची ओळख सहावी-सातवीत असताना झाली असली तरी त्याआधीही जयू आणि तिची बहीण तिच्या आजोबांसह शाळेत जाता-येताना दिसत असत. त्या दोघी टम्म फुगलेल्या पाणीपुरीसारख्या गोलमटोल! घट्ट वेण्या- वर रिबीन लावून बांधलेल्या! कधीतरी जातायेता बोललो आणि मग रोजच शाळेत बरोबर जायला लागलो. ती मला एक वर्ष सिनीयर. भन्नाट प्रकरण.
संध्याकाळी आम्ही मुलं-मुली दोन टीम करून खेळत असू. खेळताना भांडणं झाली तर जयू मुलांशीही बिनधास्त मारामारी करत असे. भांडण आटपून घरी जाताना वळून पाहत ती ‘जा रे भाजक्या वांग्या, ए कोबीगड्डय़ा’ अशी खास विशेषणं वापरत असे. मस्तमौला म्हणतात तसं हे प्रकरण होतं. अभ्यास वगैरे करण्यात आयुष्यातले अनमोल क्षण ती व्यर्थ दवडत नसे. वाचनाचा तर तिला प्रचंड कंटाळा. फॅन्टम, चाचा चौधरी वगरे कॉमिक्स मी ‘धडाम, फटॅक’ अशा ‘साऊंड इफेक्ट’सह वाचायचे आणि तिने फक्त चित्रे पाहायची. पण त्यातली एखादी चौकट सुटली तर मात्र ती लोडाला टेकून ‘हे राहिलंय’ म्हणून सांगायची.
कलाकुसरीच्या वस्तू ती सुंदर करायची आणि आईला मदतही. तिला सातवी-आठवीतच सगळा स्वयंपाक करता यायचा. तिची ताई असेल तिच्याहून तीनेक वर्षांनी मोठी. गरीब गाय. बाबा रेल्वेत ऑफिसर. अगदी कडक स्वभावाचे! पानातली पोळी गरम नसली तर ताडकन् उठून जाणारे! ती त्यांना नीट सांभाळून घेत असे. आईला रक्तदाबापासून अनेक विकार. त्यात सतत काळजी करण्याचं व्यसन. सकाळ झाली की ‘आज पाणी येणार की नाही, ‘कामाला बाई येणार की नाही!" काळज्या सुरु. जयूला भाऊ नसल्याने आणि तिचे बाबा दिवसभर कामामुळे बाहेर असल्याने आम्हा मैत्रिणींचा अड्डा तिच्याच घरी असायचा. पत्ते, कॅरमपासून अंगणातल्या शिवाशिवीपर्यंत, डब्बापार्टीपासून एकत्र सर्कस, सिनेमा पाहण्याच्या प्लॅनपर्यंत सारे काही तिच्याचकडे होई. प्लॅन आखणे, ते सर्वाच्या गळी उतरवणे आणि त्याला लागणारे पैसे प्रत्येकीकडून विनासंकोच मागून घेणे, यांत ती तरबेज होती.
जयू सिनेमा फारच दंग होऊन पाहायची. ‘ये तो खुशी के आसू है पगले!’ यासारखे अपेक्षित डायलॉग ती स्वत:च जोरात खिदळत म्हणायची. परंतु मागून कोणी बोलत असेल तर त्यांना ‘अहो, आम्ही तुमचे डायलॉग ऐकायला नाही काढलं तिकीट!,’ असे खुशाल ओरडायची.
रस्त्याने जाता-येता भेटणाऱ्या प्रत्येकाशी (सर्वाबद्दल ती ‘अपडेट’ असे!) हसून बोललेच पाहिजे, असा तिचा दंडक होता. शिवाय ती त्या- त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीप्रमाणे विषय काढत असे. उदा. संसारग्रस्त बायकांना- ‘काय काकू, झाले का पापड?’, तर लहान मुलीला- ‘ए मश्त आहे हं ड्रेश तुझा!’ आणखी मोठय़ा मुला/मुलीला ‘कधी आहे परीक्षा तुझी?’ अगदी डॉक्टरांनाही- ‘त्या अमक्याला अपघात झाल्याचं कळलं का? मुंबईला नेलंय!’अशी माहिती पुरवत असे. वय, जात,लिंग, दर्जा अशी कोणतीही गोष्ट तिच्या या संवादाआड येत नसे. या संवादकौशल्यामुळे ती कुणाही अनोळखी व्यक्तीचं अख्खं खानदान माहीत करून घेई.
शेजारी वा ओळखीचे किल्ली त्यांच्याकडे ठेवून गावाला जात. ते परतायच्या दिवशी ही त्यांच्या घरी पाणी भरून ठेवी. कधी पोळ्याही करून ठेवी. गावाहून आल्यावर दमलेली असते बाई- याची तिला त्या वयातही जाण होती. (या तिच्या सवयीवर फिदा झालेलं एक घर आता तिचं सासर आहे. असो.) पुलंच्या ‘नारायण’सारखी ती मदत करी. पण ‘परोपकारी गंपू’सारखी निरपेक्ष नाही; तर तिला त्याची पावती कौतुकरूपाने हवी असायची. ‘त्यांनी नंतर तुला साधा चहाही विचारला नाही,’ म्हणून चिडवले की- ‘आपल्याला नसतेच अपेक्षा! पण पद्धत म्हणून काही असते की नाही?,’ म्हणत जयू फणफण करणार! शिवाय पुढच्या वेळेस- ‘चिकाची चव पण दिली नाहीत तुम्ही. या वेळेस मात्र विसरू नका,’ असं सरळ त्यांना सुनवायलाही ती कमी करायची नाही.
कॉलेजमध्येही ती गुटगुटीतच दिसे. त्यावरून ‘काय झालं, बाळ रडत होतं..’ असं ग्राईप वॉटरच्या जाहिरातीतल्यासारखं कुणी चिडवू लागलं की ‘एक कानाखाली दे त्याला,’ असं सणसणीत प्रत्युत्तर ती देत असे. पण त्यातल्याच एखाद्याशी नंतर तिला बोलताना किंवा नोट्सची देवाणघेवाण करताना पाहून मी थक्क होत असे. ‘एकटा मुलगा वाईट नसतो. पण ग्रुपमध्ये उगाचच तो असं वागतो,’ असं मानसशास्त्रीय कारण ती तेव्हा देई. रविवारी आम्ही तापीवर फिरायला जात असू तेव्हा ‘वाचलेल्या पुस्तकातल्या गोष्टी सांग,’ अशी तिची फर्माईश असे. तिला शेरलॉक होम्सच्या किंवा मतकरींच्या भयकथा आवडत. त्याच मग ती रंगवून इतरांना सांगे. रोजचा पेपरही ती वाचत नसे पण एकदा तिच्या कॉलेजमधली मैत्रीण अद्याप मी पु.लं वाचलेच नाहीत म्हणाली, तेव्हा ही मला डोळा मारत तिला म्हणाली..."अय्याss तू पु.लं वाचले नाहीस, मग जगण्याला अर्थ काय तुझ्या!!"
आम्ही काही दिवस समितीची शाखा घेत असू. तेव्हा तिच्या नेतेगिरीला रंग चढे. ती गायचीही छान. आमचे समितीत जाणे पुढे जमेनासे झाले तरी एक काकू आम्हाला पकडून नेहमी काहीतरी गळ घालत. त्या येताना दिसल्या रे दिसल्या की ही ‘खतरा’ असं ओरडून मला ओढत दिसेल त्या घरात शिरे. आणि त्या दिसेनाशा होईपर्यंत त्या घरी गप्पा ठोकीत बसे. (ते घर अर्थातच तिच्या ओळखीचे असे.) सार्वजनिक गणपती आणि नवरात्रात ती घरी सापडत नसे. रांगोळी काढण्यापासून महाप्रसादात वाढण्यापर्यंत, काकडआरतीपासून दांडिया खेळण्यापर्यंत सगळ्यात ती पुढे. गुलालात माखून मुलांमध्ये ती बिनधास्तपणे वावरत असे. गणपती उत्सवातील एका फॅन्सी ड्रेस स्पध्रेत तिने ‘वेडी’ची भूमिका केली होती. गर्दीतून स्टेजवर तिने अशी काही एन्ट्री घेतली, की अर्ध्या प्रेक्षकांनी दचकून किंकाळ्या फोडल्या. निवडणुका आल्या की आमच्या प्रभागातल्या आवडत्या उमेदवाराचा अगदी हिरीरीने प्रचार करायची आणि तो निवडून आल्यानंतर त्याच्या विजयमिरवणुकीत गाडीच्या टपावर त्याच्या शेजारी बसून वगैरे v ची खूण करत असे. (प्रभागातल्या सगळ्यांची खरं म्हणजे त्या उमेदवारापेक्षाही तिच्याशी जास्त ओळख असावी) मी तिला गंभीरपणे यात करिअर कर असे सुचवित असे. त्यावर "जाऊ दे ग, आम्ही मागून सतरंज्या उचलण्यातच हुशार" असे ती म्हणे.
एकदा कशावरून तरी तिला प्रचंड हसू आलं म्हणून गल्लीच्या कोपऱ्यावर खुशाल पोट धरून गुडघे खाली टेकवून हसत बसली. वर बाजूने जाणाऱ्या स्कूटरवाल्याच्या चमत्कारिक चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, ‘जा- जा काका तुम्ही. मी अगदी नॉर्मल आहे.’ सामाजिक संकेत नावाच्या प्रकाराशी तिला घेणंदेणं नव्हतं. ज्या क्षणी जे करावंसं वाटेल ते ती बिनधास्त करी. मात्र, परीक्षेचा निकाल जवळ आला की ती मला चोरून गणपतीला प्रदक्षिणा घालत असे. एकदा तिला असं करताना पकडल्यावर ती उलट मला म्हणाली, ‘याने चांगला व्यायाम होतो." मी त्यावरून पुढे तिला खूपदा चिडवलं होतं.
कधी मला पेरुची बर्फ़ी किंवा तत्सम नवा पदार्थ देई. ’दीड तास लागला आटवून करायला,"असे थकून म्हणे. मी तिला चिडवायला म्हणायचे ’या पेक्षा थेट नुसता गोड पेरूच का खाऊ नये...’ मग ती माझ्या अरसिकपणावर मला लेक्चर देई. कधी कुठल्यातरी ’चेन मार्केटिंग’ च्या जाळ्यात अडकून मला म्हणे ’ही पॉलिसी काढली ना तर आपल्याला अमुक जीबी जागा इंटरनेटवर फुकट मिळेल.’ मी विचारलं "बर, मग त्या जागेचं तू काय करणार? लोळणार की लोणचं घालणार?" की ती निरूत्तर होऊन कुरकूरत म्हणे ’मला वाटलंच तू टाचणी लावणार..."
कुणाला मेंदी काढून दे, कुठले तरी मणी आणून वॉलपीस कर, टाकाऊचे टिकाऊ कर असं तिचं सतत सुरू असायचं. ’तुझ्या वाचनाने फक्त तुला आनंद मिळतो पण अशा वस्तूंमुळे करणार्या आणि पाहणार्या दोघांनाही आनंद मिळतो’ असा तिचा बिनतोड युक्तीवाद असायचा. मी पुढे शिकायला बाहेर गेले तरी संपर्क होताच, घरी आले की मी आधी तिच्याकडे धाव घेई. एरवी ती मला तिच्या सुंदर अक्षरात आमच्या ’कोड’ भाषेत (अगदी प्रत्येक व्यक्तीच्या टोपणनावाचा वापर करून) लांबलचक पत्रे लिहायची. त्यात,’ राजीव गांधी कित्ती स्मार्ट दिसतो,नाही! ” इथपासून कोणाकडे लग्न ठरलं, तिने केलेलं रुखवत कसं सगळयांना आवडलं इथपर्यंत किंवा बप्पी लाहिरी चे ’मामामिया पॉम पॉम’ ह्याला काय गाणं म्हणतात का, या संतापापासून ते तिच्या कॉलेजच्या निवडणुकीतील राजकारणापर्यंत ’anything under the sky', मजकूर नुसता गळत असे.
जयूच्या बाबांना प्रथम वर्गाचा रेल्वेचा पास मिळे. प्रवासात ते त्यांचा लाडका पामेरिअन कुत्राही सोबत घेऊन जात. एकदा ती, तिची आई, आजी आणि हे श्वानमहाशय असे चौघे तिच्या काकांकडे निघाले होते. या सर्वाचे पास होते, पण आजीचे तिकीट काढायचे राहिले होते. हे लक्षात येताच जयू पळत गेली. तोवर इकडे गाडी सुटली. धावत येऊन कशीबशी तिने गाडी पकडली खरी; पण फलाट संपताना तिला बाकीची मंडळी खालीच चक्रावलेल्या अवस्थेत उभी असलेली दिसली. झाले! तिने गाडीची साखळी ओढली. गाडी थांबताच खाली उडी टाकून ती फलाटाकडे धावली. टी. सी. आणि रेल्वे पोलिस तिच्या मागे. त्यांना तिने ‘मेरा कुत्ता नीचे रह गया था,’ असे कारण सांगताच त्यांनी ‘ट्रेन क्या तुम्हारे.. ’ म्हणून ओरडायला सुरुवात केली. हीऽऽ गर्दी जमली. काकांच्या (तिचे बाबा) ओळखीच्या अधिकाऱ्यांमुळे तिची यातून कशीबशी सुटका झाली.
एके दिवशी रेल्वेस्टेशन कॅन्टीनवर भरदुपारी काही गुंडांनी हल्ला केला. कॅशच्या चाव्या देण्यास नकार दिल्याने जयूच्या बाबांना त्यांनी चांगलीच मारहाण केली. मुंबईला काही दिवस त्यांना उपचार घ्यावे लागले. शिवाय कोर्ट केस! तशात त्यांची बदली झाली! काकूंना आधीच बरेच आजार होते. या प्रसंगानंतर तर अतिताणामुळे त्या गेल्याच. अशातच ताईचे लग्न होऊन ती प्रसूतीसाठी माहेरी आलेली. काका आधीच धक्क्यात. मदतीला जवळचे कुणी नातेवाईक नाहीत. अशावेळी जयूच्या खंबीरपणाने आम्ही थक्क झालो. आम्ही मैत्रिणी आणि तिने मिळून घर सावरलं. आपल्या धाकटय़ा असण्याचा बाऊ न करता ती माय, मावशी सगळं काही झाली. घरातल्या कामांप्रमाणेच ती बाहेरचं कोणतंही काम बोलक्या स्वभावामुळे आणि ओळखींमुळे सहज करून टाकी. काम होत नसेल तर आत शिरून थेट मुख्य साहेबांशी बोलायलाही ती भीत नसे. स्वत:बरोबर ‘लगे हाथ’ इतरांचीही कामं करू देई. अगदी पोस्टात जातानाही ती शेजारीपाजारी विचारी- ‘टाकायचंय का काही पत्र?’ मोलकरणीकडचे लग्न असो, कॉन्व्हेंट शाळेतील जुन्या मत्रिणी / रेल्वेतील ख्रिश्चन मंडळींची ख्रिसमस पार्टी असो वा एखाद्या घरचे कुळाचार, मावंद- ती घरचं कार्य असल्यासारखी आपुलकीने व सहजतेने वावरे.
काकांनी आता जयूसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. ते भारी स्थळे पाहत. तेव्हा जयू म्हणायची, ‘यांची मुलगी बीकॉम सेकंड क्लास आणि जावई शोधताएत लॉर्ड फॉकलंड! रेल्वेतला नवरा हा तिचा ‘मि. राईट’ होता. का, तर प्रवासाला वर्षातून तीन पास आणि सहा पीटीओ मिळतात म्हणून! एखाद्या मुलाच्या (स्थळाच्या) घरी गेल्यावर तिचे ‘गृहकृत्यदक्ष्यत्व’ ठसवायला काका चक्क तिलाच चहा करायला सांगायचे. ती (आयुष्यात प्रथमच पाय ठेवलेल्या त्या घरात) वैतागून चहा करायची. पण लाजण्याबिजण्याच्या भानगडीत न पडता उलट त्या मुलाकडच्यांचीच मुलाखत घ्यायची. जणू काही जयूच त्या मंडळींना ‘बघायला’ आली आहे.
नंतर मात्र जयूने एका मैत्रिणीच्या भावाशी (रेल्वेशी प्रतारणा करून) प्रेमविवाह केला. सासर घरालगत होतं, म्हणजे बाबांची काळजी नाही. ती त्यांच्या मुलाच्या भूमिकेत शिरली. ज्यांच्याशी जमलं नाही त्यांच्याबद्दलचा राग वा विषाद तिच्या शब्दांत चुकूनही कधी डोकावत नाही. लग्नानंतर तिने आपलं वजन उतरवलं. सटरफटर नोकऱ्याही केल्या. पुढे मुलगी झाल्यावर मुलीसाठी वेळ हवा म्हणून नोकरी हा विषय बाजूला सारला. नवऱ्याच्या प्रोत्साहनाने तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं ,अर्थशास्त्राची तासिका तत्त्वावर प्राध्यापिका झाली! परंतु कायम केलं नाही तर सरळ शिक्षिका होईन शाळेच्या मुलांमध्ये रमेन म्हणायची. विद्यार्थ्यांचा उत्तम फीडबॅक तिनं मिळवला.
मधे फोनवर सांगत होती ’पी एच. डी करायच म्हणतेय.....’.तिने ग्रामीण बॅंकेपासून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपर्यंत कोणताही विषय घेतला तरी मला धक्का बसला नसता (त्यासाठी थेट ओबामाना भेटायलाही ती बिचकणार नाही. ती त्या मुलाखतीत विनोद करून त्यांना ’द्या टाळी’ सुद्धा म्हणेल आणि व्हाईट हाऊसच्या किचनमधे जाऊन चहा सुद्धा करून आणेल असे मी तिला गमतीने म्हणायचे. ’न्यूनगंड’ नावाचा शब्दच तिच्या डिक्शनरीत नाही.) मला आश्चर्य वाटतं ते याचं की तिचा हा कायापालट काही एका रात्रीत झालेला नाही, हे सगळ तिच्याआतच कुठेतरी विस्कळीत रूपात दडलेलं होतं पण तिला ते गवसत नव्हतं. अर्थात ही नवी ती मला जितकी भावते तेवढीच आधीची ती ही प्रिय होती...कारण आतून ती अजूनही तश्शीच आहे. ’परवाच्या अर्थसंकल्पावर मत काय मॅडम आपले?’ अशी मी चेष्टा करताच ’मी फक्त चॅनेल्सना ’बाईट’ देते’ असे म्हणत हसत होती.
सगळ्या जगात मी तिला सर्वात जास्त ओळखते असे ती माझ्याबद्द्ल नेहमी सांगते. पण ती तिला स्वतःला तरी कुठे ओळखू शकली होती! मी बाहेरुन तिचा कोषातून बाहेर पडण्याचा प्रवास पाहिला, तिच्या आत मात्र एक निसर्गदत्त फुलपाखरु सतत भिरभिरताना दिसायचं.
कृत्रिम मुखवटय़ांच्या आजच्या जगात दुर्मीळ असलेलं जयूचं निखळ हास्य, ‘कोण काय म्हणेल?’ याचा निरर्थक विचार न करता संवादाच्या पुलाने, मदतीच्या हाताने जग जोडून.. खरं तर स्वत:कडे ओढून घेण्याच्या तिच्या स्वभावामुळे ती मला जास्त प्रिय आहे. तिच्यातल्या उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या उसळत्या कारंजात तिच्या सहवासातला प्रत्येकजण तसाच चिंब होऊन जातो. आजची एका मुलीची आई असलेली जयू.. आतून अजूनही तश्शीच आहे! प्रफुल्लित, पारदर्शक आणि कायम मज्जेत!! माझ्या मनातले बरेच ’जीबी’ तिने कायमचे व्यापलेत आणि (तिच्या परवानगीने) आमच्या मैत्रीच्या पॉलिसीमुळे,आज इंटरनेटवर हे काही ’के.बी’ तिच्यासाठी.......!!
०८/०९/२०११
---------------------------
लोकसत्ता- लोकरंग ’सर्किट’ सदरात प्रसिद्ध झालेला लेख
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181045:2011-09-08-10-59-48&Itemid=1
---------------
वरचा लेख २०११ सालचा आहे. लोकसत्तेला याचं संपादित व्हर्शन पाठवण्याआधी तिला फोन केला. तुला आधी वाचायला पाठवू का, विचारलं. ती म्हणाली, "तू लिहिला आहेस नं, बस. मग आता थेट पेपरमध्येच वाचेन" मला नि:शब्द केलं तिनं. लेख प्रसिद्ध झाला त्यादिवशी काय काय प्रतिक्रिया आल्या ते नंतर मला फोनवर भरभरून सांगत होती.
दरम्यान आमची तशीच मस्ती, गप्पा कधी प्रत्यक्ष भेटीत, कधी फोनवर सुरु होत्या.
१७ डिसेंबर २०१७ - शाळेतले काही जण भेटणार होतो म्हणून एका वर्गमित्रासह आधी जयूकडे गेले मग तिच्यासह आम्ही शाळेत गेलो. कॉलेजमध्ये सीएचबी शिकवायचा कंटाळा आल्याने जयूने आमचीच शाळा जॉइन केली होती. मुलं ख्रिसमसपूर्व स्पर्धांच्या तयारीत होती. जयूभोवती "मिस मिस प्लिज सी धीस" करत गराडा घालत होती. मी निघताना मला म्हणाली, "उन्हाळ्यात मुलांना घेऊन माहेरी जाणार असशील तर माझं आणि मुलीचंही रिझर्वेशन कर. काकूला सर्प्राईज देते."
मी २०१८ च्या फेब्रुवारीच्या १ तारखेला म्हणजे दीडच महिन्यानी तिला फोन केला , रिझर्वेशन करतेय, करु नं तुमचंही. तर म्हणाली, "नको करूस. माझ्या सासूबाईंना बरं नाही, मलाही बरं नाही पण काळजीचं कारण नाही. किडनी स्टोनचंच आहे काहीतरी. औषध घेते आहे. पुढच्या वर्षी नक्की येईन" मी ट्रीटमेंटचं नीट विचारून नाराजीनेच फोन ठेवला.
दोन दिवसांनी एका वर्गमित्राचा ,ज्याला जयू राखी बांधत असे, फोन आला - जयू गेली. विश्वास बसेना. आपली जयू ?
तो हो म्हणाला. मी ताबडतोब निघाले. पुढचं सगळं निरर्थक आहे. ती आता या जगात नाही एवढंच सत्य आहे.