Showing posts with label माणसं. Show all posts
Showing posts with label माणसं. Show all posts

Friday, May 31, 2024

सहजीवन ६०

देणेघेणे टाळून साधेपणाने लग्न करण्याची अट आम्ही मोडकांना पत्रातून कळवली होती. ती मान्य करताना भावी सुनेनंही नवं घर ’आपलं’ म्हणून स्वीकारताना कसा विचार करावा आणि कुटुंब म्हणजे काय याविषयी भाऊंनी अतिशय संयत आणि नेमक्या शब्दात पत्रोत्तर दिलं होतं. ते विचार फक्त पत्रातून छाप पाडायला नव्हते तर ते त्यांच्या जगण्याचा भाग आहेत याचा प्रत्यय मी (आणि मानसीही) सून म्हणून घेत आलो आहोत. एकंदरीत ते फक्त सासरे म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनच अतिशय कूल आहेत.

ते जितकं छान लिहितात तितकं उत्तम विनोदबुद्धीमुळे कोणत्याही मंचावर झकास बोलतातही पण असे प्रसंग क्वचित येतात कारण एखादं पद मिळावं, सामाजिक सन्मान मिळावा यासाठी धडपडणं हा भाऊंचा स्वभाव नाही. त्यांच्या संयतपणाला वैतागून सासूबाई (आई) कधीकधी ’एक नाही न दोन नाही, आपणच आपली एकट्याने बडबड करायची’ असं स्वगत पुटपुटतात हा भाग वेगळा !
त्यांचं वाचन, इंग्रजीचं आणि खरं तर आयुष्याचंही आकलन खोल आहे त्यामुळे त्यांच्याकडून ऐकण्यासारखं बरंच असतं. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर गप्पा मारता येतात. मी लहानपणी शाळेतून आल्यावर आईला इत्यंभूत हकीकत सांगत असे तसं महत्वाचं काही घडलं की घरी आल्यावर त्यांना आजही सांगत असते. ते ही उत्सुक चेहरा करून ऐकत असतात (सांगता कुणाला !) नातवंडंही त्यांना वेगळा फोन करून काहीबाही सतत सांगत असतात. त्यांच्या काही इब्लिस सहकार्यांचा, प्र. के अत्र्यांच्या भाषणाचा असे खास विषय निघाले की ते विशेष खुलतात. हातात दाढीचा ब्रश तसाच धरून अर्धी झालेली दाढी आणि कमरेला टॉवेल गुंडाळलेल्या स्थितीत तेव्हाचे सामाजिक, राजकीय गमतीदार किस्से सांगण्यात रंगून जातात.
आप्त-संबंधितांना जी काय मदत केली, करतायत त्याचा मात्र ते कधीही उल्लेख करत नाहीत. ते कुणाकडून तरी कळतं. आईवडिलांची शब्दश: सेवा करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. गरिबीतून वर येऊन निवृत्त सिव्हिल इंजिनीयर म्हणून स्वच्छ कारकीर्दीनंतरचं सुस्थिर आयुष्य जगताना जुन्या अप्रिय घटनांविषयी मनात कोणताही कडवटपणा कधी दिसला नाही. त्यांच्यातली अंगभूत शांतता या ’सोडून देण्यातून आली असावी. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली तेव्हा त्यांना गाढ झोपेतून उठवून ’चला, आपल्याला हॉस्पीटलला अॅडमिट व्हायचंय’ सांगितलं, त्यावर त्यांनी फक्त ’चला’ म्हटलं. कोणतेही प्रतिप्रश्न, त्रागा नाही.
एखादी टेस्ट करावी लागली तर तोंडून ’स्स’ ही ऐकू येत नाही. त्यांच्यासारखा प्राप्त परिस्थितीचा समजूतदार स्वीकार करता आला पाहिजे असं नेहमी वाटतं. सुरुवातीला एकदा जवळच्या भागातून जाताना महेशने सांगितलं ’हा पूल भाऊंनी बांधला आहे’. मी आश्चर्याने ’हो का, अरे वा, केव्हा, कधी’ वगैरे म्हणायच्या आत ’कामच होतं आमचं ते आणि मी म्हणजे टीम असते बांधणारी’ एवढं म्हणून त्यांनी विषय संपवला. पदाचा दुराभिमान ,त्यावर अवलंबून असलेल्या प्रतिष्ठेच्या व्याख्या यापासून ते कायम लांब राहत आले आहेत.
त्यांना आम्ही कधीही संतापताना, मोठ्या आवाजात बोलताना पाहिलेलं नाही. त्यामुळे आई-भाऊ चुकून कधी भांडत असले तर ते ही कळत नाही. आई कधी कधी रमीचा डाव (जो भाऊंना कंपलसरी रोज दुपारी खेळावा लागतो) अर्धवट टाकून तरातरा आत आल्या आणि भराभरा चहा ठेवला तर काहीतरी बिनसल्याचा अंदाज येतो. पण दुसर्या दिवशी पुन्हा दोघं तितक्याच शांतपणे टीव्हीवर पाच वाजेची चित्रगीतं पाहात रमी खेळताना दिसतात. (त्या खेळाचे सगळे नियम आई म्हणतात ते असतात). म्हातारपणी यांची मुलं पण अशीच गुणी वागतील या आशेवर मी व मानसी आहोत. 😃
आम्हा दोन्ही जोड्यांच्या भांडणात मात्र ते कायम आमच्या म्हणजे सुनांच्या बाजूने असतात. त्यांची मुलं आमची तक्रार करत असली तर ते नरो वा कुंजरोवा करत आढ्याकडे पाहतात. चूक मुलांची असली तर थंड चेहर्याने एखादा जोरदार सिक्सर लगावतात. नातलगांवर त्यांचा प्रचंड जीव आहे. त्या बाबतीत आमच्याकडून हयगय झाली तरच त्यांच्या चेहर्यावर आठी दिसते.
त्यांच्या आणि आईच्या समाधानी सहजीवनाचं मूळ दोघांच्या व्यक्तिमत्वांमधल्या वेगळेपणामध्ये असावं. भाऊ वर्क इज वर्शिपवाले तर आई पारंपरिक विचारांच्या. कोकणातली अगदी समुद्रकिनार्यालगतच्या घरातली मुलगी विदर्भातल्या विरूद्ध तापमानाच्या आणि रुक्ष वातावरणातल्या घरात आली त्याला आज ६० वर्ष पूर्ण झाली. उकडीच्या मोदकाला न सोडता त्यांनी तळणीच्या मोदकालाही सहज स्वीकारलं. तेव्हाच्या पद्धतीनुसार दहावीपर्यंतच शिक्षण झालं असलं तरी त्यांनी स्वत: बँकेचे व्यवहार करण्यापासून घराचा अर्थविभाग आणि नातलगांचा गोतावळा एकहाती समर्थपणे सांभाळला. आजही ते पाश घट्ट आहेत पण गुंता झालेले नाहीत.
आई म्हटली की पहिली आठवण तिची खासीयत असलेल्या पदार्थांची येते. त्यांच्यासारखे पाकातले लाडू, चकल्या, कोशिंबीरी आजही आम्हाला जमत नाहीत. मी पहिल्यांदा यांच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी साधा उपमा पण इतका चविष्ट केला होता की तेव्हा धड स्वयंपाक न येणार्या मला धस्सच झालं होतं. सुरुवातीला मी त्यांना नुसत्या भाज्या चिरून देत असे, आता त्या मला भाज्या चिरून देतात. पुढच्या महिन्यात येणार्या सणाला काय करायचं याची त्यांना या महिन्यापासूनच चिंता असते. त्या शेंगोळ्यांइतक्याच आवडीने पास्ताही खातात. तसं नको, असंच हवं वगैरे फारशा भानगडी नाहीत त्यामुळे त्यांचं (आणि त्यामुळे आमचंही) आयुष्य सोपं झालं आहे.
कोकणी शिडशिडीत वाण असल्याने त्यांचा कामाचा झपाटा आणि चटपटीतपणा अजूनही जोरदार आहे. त्यांना वयाची आठवण करून देऊन स्टुलावरून खाली उतरवावं लागतं. हळू चाला सांगावं लागतं. घरात कुणी अचानक आलं आणि नेमकं काही संपलेलं असलं तर त्या मी को... म्हणेपर्यंत चटकन साडी बदलून बाहेर पडलेल्या असतात आणि कांदा चिरेतो ...थिंबीर कोपर्यावरून आणलेली असते. चेंगटपणा त्यांना अजिबात आवडत नाही. कुणाला १२ ला जेवायला बोलावलं तर यांचा स्वयंपाक दहालाच तयार असे. सुनांच्या रेजिम मध्ये समजा मी ’गरम वाढू’ म्हणून भात लावायचा राहू दिला आणि घर आवरत बसले तर त्या अस्वस्थ होतात. आमची चुकून भांडणं झालीच तर ती अशा जागतिक कारणांवरून होतात. त्यामुळे कारण विसरून त्या दोन तासात पूर्ववत बोलू लागतात.
पहाटे उठून पोथी वाचन, जप, फुलं तोडणं, पूजा हे जितकं नियमित तितकं मैत्रिणींचा अड्डा जमवून व्हॉट्सअॅपवर प्लॅनिंग करून आठवड्याला किमान एक डबापार्टीही नियमित. ती नं झाल्यास ’कसं तरी’ होत असल्याने दवाखान्यात चक्कर मारावी लागते. भ्रमंतीच्या आवडीमुळे त्यांनी बहुतांश राज्य आणि लगतचे २,४ देश पाहिले आहेत. आता वयानुसार लांबचे प्रवास शक्य नसले तरी एक दिवसाच्या सहली अखंड सुरु असतात, तेच त्यांचं टॉनीक आहे. त्यांना भरभरून जगायला आवडतं. तरूणपणात जबाबदार्यांना प्राधान्य दिल्यानं करायचं राहून गेलेलं त्या उत्साहाने करत असतात. त्यांच्या प्लॅनमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त दुधावरच्या सायीचा, नातवंडांचा. आता त्यात नातसुनेची भर पडली आहे. आजी त्यांचाही वीक पॉइंट आहे.
छोट्या छोट्या गोष्टीत रमत असल्याने आईंना कंटाळा येत नाही. त्यांनी आजवर एकही टीव्ही मालिका पाहिलेली नाही, पाहत नाहीत हे तर त्यांच्या पिढीकडे बघता आठवं आश्चर्यच आहे. टीव्हीसमोर कधीतरी बसल्याच तर पाच मिनीटात ’सारखं आपलं शरद पवार आणि मोदी..बरं एक वेळ ते ठीक आहे पण रेल्वे बजेटची भाषणं ही काय तासंतास ऐकायची गोष्ट आहे का !’ असं भाऊंना उद्देशून पण स्वगत म्हणत त्या आत जातात. 🙂 टीव्ही सारखाच गॉसीप, हेवेदावे या गोष्टींशी त्यांचा संबंध नाही.
आम्हा दोन्ही सुनांना त्यांनी कोणतीही तुलना न करता कायम कृतीशील पाठिंबा दिला आहे. जे काय अवांतर कामधाम आम्ही करू शकलो/ शकतो आहोत ते त्यांच्या जीवावर. जुळ्यांच्या जन्मानंतर एक दोनदा मध्यरात्री जाग आली तर त्या आईच्या मायेने माझे पाय दाबत बसलेल्या होत्या. अशा अमूल्य आणि चिरंजीव आठवणींपुढे सगळे राग लोभ क्षुल्लक आणि क्षणिक वाटतात.
आई भाऊंच्या सहजीवनातही अनेक राग लोभाचे प्रसंग येऊन गेले असतील पण अशाच काही अनमोल आठवणींच्या बळावर त्यांनी त्याची साठी आज कृतार्थतेनं पार केली आहे. त्यांचं घरात असणं हीच आमची उर्जा आहे. त्यांचे आशीर्वाद आम्हाला सदैव लाभोत. त्यांचे हास्य कायम राहो ही आजच्या शुभदिनी प्रार्थना. दोघांनाही आम्हा सर्व कुटुंबियांकडून अधिक समृद्ध सहजीवनाच्या आणि निरामय आरोग्याच्या अनेकानेक शुभेच्छा आणि आदरपूर्वक नमस्कार 🙏💫

Tuesday, March 1, 2022

'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख


महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास म्हणजे गेल्या शतकातलं महाराष्ट्रातलं व्युत्पन्न चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ’चालतेबोलते विद्यापीठ’ असा त्यांचा उल्लेख बापूजी अणे करत. नवीन पिढीलाच काय आपल्या पिढीलाही त्यांची विद्वत्ता, व्यासंग, पांडित्यपूर्ण साहित्यनिर्मिती, ओजस्वी वक्तृत्व, मूलगामी राष्ट्रचिंतन, सांस्कृतिक-प्रबोधनाचं अतुलनीय कार्य याची फारशी माहिती नाही.
जन्मशताब्दी निमित्ताने महामहोपाध्याय बाळशास्त्रींच्या साहित्याचा परिचय नव्या पिढीला करून देणार्या 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथाचं लोकार्पण मुंबई इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झालं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
प्रख्यात वक्ते, अग्रणी लेखक श्री.आशुतोष अडोणी हे या ग्रंथाचे संपादक. बाळशास्त्रींनी ’भारतीय जीवनादर्श’च्या माध्यमातून रामायण व महाभारतातील व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. यातल्या स्त्री व्यक्तिरेखांबद्दलचं माझं आकलन मी लेखातून मांडलं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाज्ज्वल्य देशाभिमानी आणि वक्तादशसहस्रेषु म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळशास्त्री हरदास यांना महामहोपाध्याय, वेदान्ततीर्थ, काव्यतीर्थ, साहित्याचार्य अशा अनेक उपाध्यांनी का ओळखले जात असावे याची चुणूक दाखवणार्‍या त्यांच्या अनेक वाड्मयीन शिल्पांमध्ये ’भारतीय जीवनादर्श माला’चा समावेश होतो. बाळशास्त्रींनी यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने प्राचीन वाड्मयातील विशेषत: महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. श्रीमन्महाभारतावरील व्याख्यानांच्या सत्रात त्यांनी महाभारतीय स्वभावचित्रे उलगडताना गांधारी, कुंती व द्रौपदी अशा तीन स्त्रीरेखा चित्रित केल्या होत्या. पुढे त्याच मालिकेत सावित्री, कुंती यांचा त्यांनी समावेश केला. त्यांच्या रामायणावरील ग्रंथात ’एक स्वर्गीय पुष्प’ या शीर्षकांतर्गत सीतेचे स्वभावचित्र आलेले आहे. १९७५ हे स्त्रीवर्ष म्हणून घोषित करण्य़ात आले होते. त्याचे औचित्य साधून या सर्व स्त्रीस्वभावरेखांचा संग्रह ’भारतीय जीवनादर्श’ (भाग १) या नावाने प्रसिद्धीस आला. बाळशास्त्रींच्या सुविद्य पत्नी वीणाताई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "महाभारत हा इतिहास आहे की केवळ एक काव्य, त्यातील घटना खर्‍या आहेत की काल्पनिक याचा आपल्याशी संबंध येत नाही. जीवनाचा श्रेष्ठ ध्येयवाद निश्चित करणारा तो ग्रंथ आहे. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून ज्या अनेक व्यक्ती चित्रीत झाल्या त्यातील काही प्रमुख शास्त्रीबुवांच्या लेखणीनं रेखाटल्या आहेत. त्या आजही आपल्याला पथदर्शक ठरतील अशी त्यांची धारणा आहे." दुर्गुणांचा अतिरेक झाला तर विनाश अटळ असतोच पण सद्गुणांचा अतिरेक झाला तरीही कार्य नासतं हेच व्यासमहर्षींनी महाभारतातल्या विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे. या मुद्द्याचा विचार करता प्रस्तुत पुस्तकातील स्त्रीव्यक्तिरेखांमधील बहुतेक व्यक्तिरेखा धर्मकार्पण्य़ाच्या बळी ठरलेल्या दिसतात. धर्म आणि तत्त्वज्ञान यांनी सामर्थ्याला नियंत्रित करण्य़ाऐवजी सामर्थ्यच त्यांना नियंत्रित करू लागले. अधर्माचे तम दाटले आणि दिशा अंधारल्या. या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या या स्त्रीव्यक्तिरेखा एखाद्या विद्द्युल्लतेप्रमाणे भासतात. प्रथदर्शनी त्या हतबल वाटतात परंतु लेखकाचे अभ्यासपूर्ण विवेचन समजून घेत गेले की या स्त्रियांनी अधर्मशरणता ठामपणे नाकारत आपल्या धर्मशील आचरणाच्या तेजाने आपले केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर समाजमनदेखील झळाळून टाकलेले दिसते. स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. ’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ,रमन्ते तत्र देवत:’ हे आपले सांस्कृतिक गृहीतक मानले गेले. असे असले तरी प्रत्यक्षात वैर्‍यालाही देऊ नये अशी वागणूक या स्त्रियांना केवळ आप्तस्वकीयांनीच नव्हे तर त्या ज्यांना परमेश्वरस्वरूप मानत, ज्यांच्याशी या स्त्रियांचे आयुष्य गुंफले गेले होते अशा पतीनेही दिल्याचे चरित्रवर्णनात दिसून येते. अशा प्रसंगांच्या अग्नीपरिक्षेतून जाताना या स्त्रीव्यक्तिरेखांनी आपले स्त्रीत्व मात्र होरपळू दिले नाही हे बाळशास्त्रींच्या विवेचनातून प्रत्ययास येते. असामान्य गुणांच्या या शलाका त्यात लीलया उत्तीर्ण तर झाल्याच उलट त्यांच्या दिव्यत्वापुढे परिक्षा घेणारे खुजे ठरले. या स्त्रियांनी आपले स्त्रीत्व अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे नजर उचलून पाहणे सर्वसामान्यांना अशक्य व्हावे. ’महासती गांधारी’ या लेखातले बाळशास्त्रींचे सुरूवातीचेच वाक्य आपल्याला गांधारीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. ते लिहितात, ’दुर्योधनासारख्या कलिपुरूषाची माता आणि राजा धृतराष्ट्रासारख्या पाताळयंत्री खलपुरुषाची पत्नी होण्याचे दुर्दैव जिच्या वाट्याला आले ती महासती गांधारी भारतातील स्त्रीरत्नांच्या अग्रभागी शोभण्याच्या योग्यतेची आहे.’ श्रीशंकराची आराधना करून शतपुत्रप्राप्तीचा वर मिळवणारी गांधारी, ज्या अर्थी आपला पती सृष्टीच्या दर्शनसुखाला आचवला आहे त्याअर्थी त्याच्या सुखदु:खाशी एकरूप होणे हेच खरे विवाहबंधन मानून त्यासाठी आपले नेत्र कापडाने सदाचे झाकून घेणारी आणि त्याच्यासह आपला देह वनातील वणव्याच्या अग्नीत समर्पण करणारी दृढनिश्चयी आणि पतीपरायण गांधारी आपल्याला परिचित असते. परंतु आपल्या दिव्यदर्शी न्यायप्रियतेने वात्सल्याच्या स्वाभाविक मोहपाशावर मात करणा‍र्‍या गांधारीशी बाळशास्त्री आपला परिचय करू देतात. युद्धानंतर मृतावस्थेत धुळीत पडलेल्या दुर्योधनाकडे पाहून विलाप करणारी, ज्यांना धर्माचे आधारस्तंभ मानावे अशा पांडवांनी आपल्या पुत्रांना अधर्माने मारले हे पाहून चवताळून उठलेली, कुरूकुलनाशाला श्रीकृष्णाला जबाबदार संबोधून ’तुझ्या स्त्रियाही अशाच हतपुत्र व निहतबांधव अवस्थेत विलाप करतील’ असा घोर शाप देणारी विकलहृदयी माता हे गांधारीचं एक सर्वसामान्य रूप किंवा स्त्रीस्वभावाचे स्वाभाविक वैशिष्ट्य. राजसभेत संधीच्या वाटाघाटी चालू असताना न्याय व धर्म यांच्या नियमाप्रमाणे अर्ध्याच नव्हे तर सर्वच राज्याचे अधिपती पांडव असल्याचे- त्यांची मागणी न्याय्य असल्याचे दुर्योधनाच्या तोंडावर राजसभेला सुनावणारी गांधारी, युद्धाला प्रयाण करण्यापूर्वी दुर्योधन तिचा आशीर्वाद घ्यायला आला तेव्हा ’जिकडे धर्म त्या पक्षाचाच जय होईल’ असे तटास्थपणे ऐकवणारी गांधारी, ’काम-क्रोध जिंकील तोच पृथ्वी जिंकील आणि तोच राजधर्म आहे’ असा दुर्योधनाला भर सभेत उपदेश करणारी गांधारी, ही तिची असामान्य रूपे. तिला महाभारतात महाप्राज्ञा व दीर्घदर्शिनी अशी विशेषणे जोडलेली का आढळतात हे बाळशास्त्रींच्या लेखातून सप्रमाण स्पष्ट होते. ’राजमाता कुंती’ हा या पुस्तकातील दुसरा सविस्तर लेख. निर्जीव धनाप्रमाणे तिच्या पित्याने तिला कुंतिभोजाला देऊन टाकले. लहानपणी पित्याने व मोठेपणी श्वशुराने तिची वंचना केली. दुर्वासांनी तिला दिलेल्या वरदानामुळे औत्स्युक्यापोटी ज्यांना आवाहन केले ते सूर्यनारायण उपस्थित झाले आणि ’देवाचे दर्शन व्यर्थ न व्हावे’ या त्यांच्या आग्रहातून तिला तेजस्वी, कवचकुंडलमंडित कर्ण या पुत्राची प्राप्ती झाली. नकळत घडलेल्या या अपकृत्यामुळे लज्जित होऊन तिने त्या पुत्राचा त्याग केला. अर्जुनाने कर्णाला पहिल्या शस्त्रपरिक्षेत आव्हान दिले तेव्हा तिने कर्णाला ओळखले. त्याला भेटून तिने ’तू सूतपुत्र नाहीस, माझा पुत्र आहेस, कौन्तेय आहेस, तेव्हा तुझ्या बंधूंना संरक्षण दे’ अशा शब्दात त्याचा अनुनय केला. त्याच्या वधानंतर तरी त्याला सद्गती लाभावी यासाठी तिचे मातृहृदय तळमळत होते. कुंतीची ही कथा सर्वश्रुत आहे. बाळशास्त्री या राजमातेचे त्या पलिकडचे पैलू अधोरेखित करतात. अंत:करणात किंचितही सापत्नभाव न ठेवता माद्री या सवतीशी प्रेममय संबंध निर्माण करणारी कुंती, ’स्त्रीसंग केल्यास मरण ओढवेल’ या शापवाणीमुळे राजभोगाचा मोह सोडून पती पांडूला तपस्यामय जीवनात बरोबर राहू द्या म्हणून विनवणी करणारी कुंती, निपुत्रिकपणाच्या दुर्गतीतून पतीला वाचवण्यासाठी नियोग पद्धतीने तीन पुत्रांना जन्म देणारी व पतीनिधनानंतर माद्रीच्या दोन पुत्रांसह पांडवांचा ममत्वाने सांभाळ करणारी वत्सल विशालहृदयी कुंती बाळशास्त्रींनी या लेखातून चितारली आहे. ज्येष्ठ पुत्राच्या द्यूतप्रियतेमुळे राज्य गमावण्यापासून द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत झालेली अवहेलना पाहून तिचे अंत:करण शतश: विदीर्ण होऊन गेले परंतु त्याही स्थितीत तिने विजनवासात निघालेल्या द्रौपदीला खंबीर राहण्य़ाचे आवाहन करून धैर्याने निरोप दिला. तेरा वर्षे पुत्रवियोगाचे दु:ख भोगल्यावर अपमानाचा सूड घेऊन आपले पुत्र राज्य परत मिळवतील ही तिची रास्त अपेक्षा होती परंतु ते तर राहोच, आपले पुत्र केवळ पाच गावे मागून संधी करत आहेत हे कळताच प्रदीप्त होऊन उठलेली कुंती आणि तिचे ऐहिकापेक्षा पारलौकिकाचे आकर्षण बाळशास्त्रींनी अगदी नेमकेपणे मांडले आहे. आपल्या पुत्रांच्या हातून धर्म घडावा म्हणून शत्रूंनी केलेल्या उपहासाची, नालस्तीची आणि त्या विटंबनेचा सूड घेण्य़ाच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून दे, असा तेजोगर्भ निरोप श्रीकृष्णाला देणार्‍या कुंतीच्या वक्तव्यात पतित राष्ट्राचे उत्थापन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे असे बाळशास्त्री प्रतिपादित करतात. तरीही तिचे खरे वैशिष्ट्य त्यांना आढळते ते तिच्या अपूर्व त्यागात. वीरमाता म्हणून कर्तव्यपूर्ती करून युद्धात विजयी झाल्यानंतरही राजोपभोग घेण्याऐवजी पुढील कर्तव्य म्हणून कुंती, गांधारी व धृतराष्ट्र यांच्या शुश्रुषेत निमग्न राहिली. त्यांच्याचबरोबर तिने आपले शरीर वनातील वणव्यात समर्पित केले. कुंतीच्या जीवनप्रवासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात खर्‍या आर्यस्त्रीजीवनाची प्रचिती येते हे बाळशास्त्रींच्या वाक्यावाक्यातून प्रत्ययाला येते. आर्य स्त्रीच्या तेजस्वितेचा कुंती हा देदिप्यमान आणि दाहक असा अविष्कार त्यांनी प्रस्तुत केला आहे. युधिष्ठीराच्या धर्मकार्पण्याचे कुंतीहून अधिक करूणास्पद बलिदान म्हणजे द्रौपदी. अग्नीपासून उत्पन्न झालेल्या तेजस्विनी द्रौपदीच्या व्यक्तिवैशिष्ट्याची बीजे बाळशास्त्रींना तिच्या वैचित्र्यपूर्ण जन्मकथेत तर पुढील महाभारताची बीजे तिने तिच्या स्वयंवरात लक्ष्यवेधाचे आव्हान स्वीकारणार्‍या कर्णाला सूतपुत्र म्हणून रोखताना केलेल्या वक्तव्यात आढळतात. द्यूतात पराजय झाल्यानंतर रजस्वला स्थितीतील द्रौपदीची झालेली घोर विटंबना, तिचा करूण विलाप आणि पतींसह सर्व आप्तस्वकीय खाली माना घालून बसलेले असताना श्रीकृष्णानी केलेले तिचे लज्जारक्षण, विराटपर्वातील कीचकवध हा महाभारतातील भाग सर्वपरिचीत आहे. यापलिकडची ओजस्वी, क्षत्राणी द्रौपदी बाळशास्त्री रेखाटतात. या घटनांनंतर युधिष्ठीर आणि भीमाला अग्नीज्वालेसमान प्रखर वृत्तीच्या द्रौपदीने त्यांचे अंत:करण जळेल, त्यांच्या अस्मितेला चेतवेल असे स्फुल्लिंगासारखे तप्त, खडे बोल सुनावून निरूत्तर केले. गांधारीने तिला वर मागावयास सांगितला तेव्हा तिने युधिष्ठीराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला, धृतराष्ट्राने दुसरा वर माग म्हटले तेव्हा बाकी ४ पांडवांचे शस्त्रास्त्रांसहित स्वातंत्र्य मागितले आणि तिसरा वर माग म्हटल्यावर त्या महामानिनीने ’लोभ धर्माचा नाश करतो, स्वतंत्र झाल्यावर माझे पती स्वकर्तृत्वाने गेलेले वैभव परत मिळवतील’ असे क्षात्रधर्माला शोभणारे उत्तर दिले. द्रौपदीची व्यक्तिगत जीवनातली गृहकृत्यदक्ष वागणूक आणि तिचे सहजीवनासंबंधीचे विचार या लेखात तिच्या आणि सत्यभामेच्या संवादातून समोर येतात. तत्कालानुसार पती हाच परमेश्वर हे केंद्रस्थानी ठेवून या विचारांची मांडणी केलेली असली तरी त्या संवादातून झळकणारे तिचे अष्टपैलूत्व आणि आत्यंतिक परिपक्वता आपल्याला नतमस्तक करते. समकालीन गृहकलहांमधील अनेक प्रश्नांची उत्तरे द्रौपदीच्या प्रगल्भ विचारपद्धतीतून सहज मिळू शकतात. तिच्या व्यक्तिमत्वाचे हे असामान्यत्व बाळशास्त्री उलगडतात तेव्हा तिचा समावेश बाळशास्त्रींनी भारतीय जीवनादर्श मालिकेत का केला असावा याचे उत्तर मिळते. सीता व द्रौपदीची तुलना करताना बाळशास्त्रींनी म्हटले आहे," सीतेचे महनीय सद्गुण महासती द्रौपदीइतकेच उज्ज्वल आहेत, दोघीही अयोनिजा आहेत, परंतु त्यांच्या भाग्यरेषेत मात्र भिन्नता आहे. सीतेची दु:खे श्रीरामचंद्रांच्या दिव्य कर्तव्यनिष्ठेतून उद्भवली आहेत त्यामुळे दु:खाग्नीत देखील कर्तव्यपूर्तीसाठी बलिदान घडत असल्याचे समाधान सीतेला लाभले." सीता आणि रामचंद्रांचा देह जरी वेगळा असला तरी त्यांची हृदये एकरूप होती. त्यांचे रम्य दंपतीजीवन बाळशास्त्रींनी वर्णिले आहे. कैकेयीच्या वरानुसार भरताला राज्य मिळावे म्हणून श्रीरामचंद्रांना वनवास पत्करावा लागला तेव्हा तिच्या आदर्श वर्तनाने आणि चारित्र्याच्या दिव्यतेने जगाला भारले, प्रत्येकाच्या अंत:करणात तिच्याविषयी आदराची भावना उत्पन्न झाली. तिच्या वादकौशल्याचे, बुद्धीमत्तेचे आणि धर्मशास्त्रातील पांडित्याचे यथोचित वर्णन बाळशास्त्रींनी केले आहे. लोकापवाद टाळण्य़ासाठी व राजसिंहासनाची इभ्रत राखण्यासाठी श्रीरामाने गरोदर स्थितीतील सीतेचा जेव्हा परित्याग केला तेव्हा त्यांच्या कर्तव्यपालनामागील अगतिकत्व समजून घेण्याइतकी तिच्या हृदयातील विशालता बाळशास्त्रींच्या वर्णनातून अनुभूत होते. लवकुशांच्या जन्मानंतर तिचा स्वीकार करण्यापूर्वी अग्नीदिव्य करण्याची अट तिला श्रीराम निरुपायाने घालतात तेव्हा मात्र आपले निष्कलंकत्व पटवून देतानाच ती देवी वसुंधरेला आपल्या उदरात आश्रय देण्याचे स्वाभिमानी आवाह्न करते. देवी सीतेच्या दैवी चारित्र्याचा तितकाच भव्यदिव्य अविष्कार बाळशास्त्रींच्या लेखणीने घडवला आहे. या वर्णनांमधील अनेक स्तिमित करणार्‍या घटना या दंतकथा असू शकतात. मूळ कथानकावर थर पडत गेलेले असू शकतात. उदा: ज्ञात स्त्रोतांनुसार भारतात लोखंडी उपकरणे इ.स.पू. चौथ्या शतकापासून आढळतात पण प्रगत लोखंडाचा प्रभाव गुप्तकालीन म्हणजे इ.सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातला ठरतो. परंतु या स्त्रियांच्या संबंधित कथानकांमध्ये विशिष्ट धनुष्याचे उल्लेख येतात. त्यामुळे याकडे रुपक अर्थाने पाहणे तर्कसंगत ठरते. आचार्य विनोबा भावे यांनीही महाभारतातील गीतेला केवळ धार्मिक ग्रंथ न मानता कौरव आणि पांडवांमधील द्वंद्व म्हणजे आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं एक कविकल्पित रूपक मानलं आहे. बाळशास्त्रींच्या स्त्रीव्यक्तिरेखांच्या आयुष्यात देखील माणूस आणि मूल्य यांच्यामधला चिरंतन लढा सातत्याने दिसून येतो. या लढ्यात आपल्या मूल्यांशी सदैव प्रामाणिक राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍य़ा या स्त्रिया विलक्षण ठरतात. त्यासाठी त्यांनी जे सोसले, जो त्याग केला त्याचे वर्णन बाळशास्त्रींनी अत्यंत उत्कटपणे केले आहे. या स्त्रियांना आपल्या कर्तव्याचे भान आहे तितकीच हक्कांची जाण आहे. जीवनाची ओढ आहे तितकीच विवेक आणि मूल्यांच्या बदल्यात मिळणार्‍या अशाश्वत सुखसमृद्धीबद्दल अनासक्ती आहे. त्यांचे पती अनेकदा हे भान विसरले परंतु या तेजस्वी स्त्रियांनी आपले पाय सत्याच्या भूमीवर कायम स्थिरपणे रोवून ठेवले. प्रसंगी त्यांनी जगण्याच्या पारंपरिक मर्यादा अमान्य केल्या आहेत. स्वत:चे नवे क्षितिज निर्माण केले आहे. जसजशी यातील एक एक स्त्री आपल्या समोर बाळशास्त्रींच्या लेखणीतून तळपत सामोरी येते तसतसे तिच्या प्रतिभ दर्शनाने आपण दिपून जातो. पुस्तकातील इतर लेख तुलनेने लहान पण तितकेच अर्थगर्भ आहेत. सावित्री उपाख्यानाच्या कविला सर्वश्रेष्ठ महाकवि मानणार्‍या डॉ. विंटरनिट्झ यांच्या विचारांचे दाखले बाळशास्त्रींनी वेळोवेळी काही लेखात दिले आहेत. जडवादी पाश्चात्य मनावर ज्या भारतीय विचारांनी मोहिनी घातली आहे त्यात सावित्रीचा आदर्श सर्वोच्च आहे असे बाळशास्त्री म्हणतात. मद्रदेशाची राजकन्या असूनही ऐश्वर्यशील जीवनाचा मोह तिच्या अंत:करणात उत्पन्न झाला नाही तसेच मृत्युसारखी भयानक गोष्ट देखील तिच्या विलक्षण चारित्र्याच्या ध्येयवादाला बाधा उत्पन्न करू शकली नाही. बाळशास्त्रींच्या शब्दात सांगायचे तर, ’जीवनाचे चंदन जितके उगाळले जाईल तितका त्याचा परिमल अधिक दरवळेल हाच भारतीय स्त्रीजीवनाच्या व्रताचा विषय असलेल्या सावित्रीच्या जीवनाचा अर्थ आहे.’ पती सत्यवानावर मृत्युदेवतेने आपले पाश फेकल्यानंतर ऋजुता, बुद्धीचातुर्य, वाक्पटुत्व आणि दिव्यतेने तिने प्रत्यक्ष मृत्युला जिंकले. आपल्या कृतीने सावित्री भारतीय स्त्रियांच्या पूजास्थानी पोचली. सावित्रीची आत्मसाधना अलौकिक आहे. सावित्रीचे उपनिषद हे ज्ञानोपनिषद आहे त्याचबरोबर यावरील लेखातील बाळशास्त्री लिखित संवाद स्त्रीत्वाच्या केवळ पतीपरायणतेचा नव्हे तर तिच्या चातुर्याचा तसेच पतीपत्नीतील अनुबंधाच्या मांगल्याचा साक्षात्कार घडवणारे आहेत. उदा: द्यायचे झाले तर, तिला ’पतीच्या जीवनाव्यतिरिक्त हवा तो वर माग’ असे सांगणार्‍या मृत्युशक्तीच्या अधिष्ठात्याला सावित्री उत्तर देते, "मातृभावना ही स्त्रीजीवनाचे सांदीकोपरे व्यापून राहणारी भावना आहे. क्षत्रियाच्या कुळाला योग्य असे बलवान आणि पराक्रमी पुत्र मला असते तर मला समाधान लाभले असते." म्रुत्युदेवतेने तसा आशीर्वाद देताच तिला पेचात पकडत सावित्री विचारते," आपण मला शतपुत्रांची माता होशील असा वर दिला परंतु पतीचे जीवित देण्य़ास मात्र आपण सिद्ध नाही. आर्यधर्मानुसार माझ्या पात्तिव्रत्याला कलंक लागणार नाही असे मातृत्व मला मिळण्याची शक्यता कशी आहे?" या शब्दांनी भानावर आलेल्या देवाधिदेवांना मग मृत्युच्या पाशातून सत्यवानाची मुक्तता करणे भाग पडते. . नलदमयंतीआख्यानातील लावण्यवती विदर्भकन्या दमयंती तसेच शाकुंतलोपाख्यानातील दुष्यंताच्या प्रतारणेने घायाळ झालेली मानिनी शकुंतला, पुत्राला रणोत्साही करणारी महाभारतातील माता विदुला, या तिघींबाबत मात्र बाळशास्त्रींनी विवेचनाऐवजी रंजनवादी कथाकाराची भूमिका घेतल्याचे दिसते त्यामुळे कुंती, सीता, गांधारी, सावित्री आणि द्रौपदीइतके त्यांचे दिव्यत्व मनावर ठसत नाही. तरीही अंतिमत: बाळशास्त्रींच्या लेखणीने (होमरच्या ’इलियड आणि ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांपेक्षा सात पटीने) मोठ्या अवकाशाच्या- महाभारताच्या पार्श्वभूमीवरील या स्त्रियांच्या जीवनाचे आदर्शत्व ज्या अंगभूत प्रतिभेने अधोरेखित केले आहे त्यातून, मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही ज्याला व्यास कवेत घेत नाहीत अर्थात, ”व्यासोत्छिष्टं जगत्सर्वं’ या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आपल्या साहित्यात रामायण (आदर्शवादी) आणि महाभारत (वस्तुनिष्ठ) असे दोन साहित्यप्रवाह मानले जातात. बाळशास्त्रींनी या दोन्ही प्रवाहांच्या अंतर्गत गोफाची अतिशय व्यासंगी नजरेने नोंद घेतलेली दिसते. त्या ताण्याबाण्यात विणल्या गेलेलं भारतीय स्त्रीजीवनातील आदर्शांची संयमी तरीही परखडपणे केलेली मांडणी एक समाजशास्त्रीय, मनोवैज्ञानिक घटित असल्यामुळे अभ्यासनीय ठरते. विचारातील निस्संदिग्धतेमुळे मुख्य व्यक्तिरेखेबाबतचे समकालीन वास्तव मांडताना तसेच त्यांचे आदर्शत्व अधोरेखित करताना संस्कृती जतन- संवर्धनाच्या नावाखाली तत्कालिन परिस्थितीचे किंवा कोणत्याही व्यक्तिरेखांचे अकारण समर्थन किंवा उदात्तीकरण बाळशास्त्रींनी केलेले नाही. आदर्श व्यक्तिकडूनही मानव्याचा अनुस्यूत भाग असलेले काही अपराध होतात त्याला या स्त्रिया अपवाद नाहीत परंतु कसोटीच्या क्षणी त्यांचे असामान्य वर्तन त्यांना जीवनादर्शाच्या पातळीवर घेऊन जाताना दिसते. पौराणिक संदर्भात लिहिताना ललित शैलीचा अतिरेक, त्यामुळे होणारा सत्याचा अपलाप, भारतीय इतिहासातले-संस्कृतीतले सारे कसे महन्मंगल असे मानण्यातला बाळबोधपणा यापासून त्यांची विद्वतापूर्ण शैली दूर राहिली आहे. त्यांच्या प्रतिपादनांना व्यासंगाची, ज्ञानाची आभा आहे. ’साहित्यिक’ हा शब्द वाटेल तसा वापरला जाण्य़ाचा आजचा काळ. त्याचा बावनकशी अर्थ समजून घ्यायचा तर हे पुस्तक वाचायलाच हवं. बाळशास्त्रींची शैली हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांचा लेखनकाळ लक्षात घेता आजच्या सोशल मिडीयावरील मिंग्लीशच्या तुलनेत त्याची भाषा एखाद्या घरंदाज, भारदस्त व्यक्तिमत्वासारखी संस्कृतप्रचुर क्वचित दुर्बोध तरीही अतिशय आकर्षक वाटते. उदा: निषधाधिपती नलाबद्दल ते लिहितात,’ब्रह्मण्य, वेदवेत्ता, महान धनुर्धर, विजितेंद्रिय व सत्यवादी अशा या राजाची शाश्वत कीर्ती प्राचीन भारताच्या इतिहासात स्थिरपद झालेली असून पुण्यश्लोक पुरुषश्रेष्ठांच्या प्रात:स्मरणीय मालिकेत त्याला पहिले स्थान लाभले आहे.’ त्यांची एकेक विशेषणे कलदार नाण्य़ासारखी खणखणीत नाद करतात. श्रीराम-सीतेचे वनवासातील सुरुवातीचे रम्य सहजीवन बाळशास्त्रींनी अतिशय अलवारपणे रेखाटले आहे. श्रीराम सीतेला सभोवतालची माहिती देत आहेत, आपल्या पराक्रमांबद्दल सांगत आहेत आणि सीता आपल्या प्राणसख्याचे शब्द मनोभावे श्रवण करित आहे हा प्रसंग सांगताना सीतेच्या मुखावरील भावाचे वर्णन बाळशास्त्री त्यांच्या मोहक शैलीत असे करतात,’ सर्वांगाचे कान करुन आपल्या हृदयसंपुटात श्रीरामांचा प्रत्येक शब्द जपून साठवीत असताना अभिमानाच्या नव्या नव्या लहरींनी जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाची सहधर्मिणी म्हणवण्य़ाचे भाग्य लाभलेल्या त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर तांडव चालवले आहे हे दृश्यच किती हृदयंगम व अविस्मरणीय आहे.’ भरसभेत ओढून आणलेल्या द्रौपदीचा आक्रोश बाळशास्त्रींच्या लेखणीतून प्रकट होतो तेव्हा कारुण्यरसाबरोबरच तिचे शुचित्व आणि तिच्या धर्मविषयक संकल्पना अवघ्या काही शब्दांच्या योजनेतून ते लीलया साकार करतात, ’युधिष्ठीर धर्मबंधनाने बांधलेले आहेत. धर्म अत्यंत सूक्ष्म असून त्याचे रहस्य विचक्षणांनाही कळत नाही. या स्थितीतदेखील माझ्या पतींचे गुण सोडून त्यांच्या परमाणूएवढ्या सूक्ष्म दोषांचे अविष्करण करण्य़ाची माझी इच्छा नाही.’ परंतु बाळशास्त्री शैलीच्या मोहात गुरफटलेले नाहीत. लेखाच्या मुळात हिर्‍यासारख्या तेजस्वी गाभ्याला त्यांची शैली पैलू पाडते इतकेच. दुर्गाबाईंच्या शब्दात सांगायचं तर बासरी वाजवणारा बासरीत आपला श्वास ओततो तेवढ्याच आत्मीयतेने बाळशास्त्री हरदासांनी या स्त्रीव्यक्तिरेखा चितारल्या आहेत. महासती गांधारी, राजमाता कुंती, द्रौपदी, सावित्री, विदर्भकन्या दमयंती, विदुला, सीता आणि मनिनी शकुंतला या आदर्शवत् स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे बाळशास्त्रींच्या सिद्धहस्त लेखणीतून उजागर होतात. या स्त्रियांचे थोरपण हे त्यांच्या सम्राज्ञीपदात नसून जीवन ही केवळ आत्म्याची गतिमानता आहे हे जाणून घेऊन त्यातील आव्हानांना सामोरे जाऊन त्यातही अनंताचे दर्शन घेण्यात आहे, हे बाळशास्त्री दाखवून देतात. स्त्रीजातीचे सनातन तेज आणि विवशता टिपताना तत्कालिन राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध बाळशास्त्री घेतात. त्यातून त्या समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. अर्वाचीन समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.
---------------------------



Tuesday, January 5, 2021

हाँ तो मै कहाँ थी...

धावतपळत मी जस्ट सुटलेली झेलम एक्सप्रेस पकडली. नोकरी करत असतानाचे अपडाऊनचे दिवस. नेहमी स्टेशनवर किंवा माझ्याच गाडीत किंवा परतीची गाडी पकडण्य़ासाठी बस स्टँडपासून स्टेशनकडे धावणार्‍या आम्हा सर्वांबरोबर दिसणार्‍या त्या टपोर्‍या डोळ्यांच्या ख्रिश्चन मुलीने मला शाहरुख स्टाईल हात देऊन आत ओढले. आम्ही एकमेकींना छान स्माईल दिलं. मग चेहर्‍यावर करुण भाव आणून नेहमीची आयडिया करुन एक बरी फॅमिली पाहून मी बसायला जागा पटकावली. तिलाही बोलावलं. शेजारी बसल्याने आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती माझ्याच शाळेत मला दोन वर्ष सिनीयर होती हे कळलं. मग जुन्या शिक्षक-शिक्षिकांचे, इतरही बरेच विषय निघाले. तिलाही माझ्याबद्दल खूप उत्सुकता होती. आपण तिला सुझी म्हणूया. बॉयकट, जरा सावळा वर्ण असलेल्या, स्कर्ट किंवा मॉडर्न पद्धतीचा पंजाबी ड्रॆस घालणार्‍या आणि लालचुटुक्क लिपस्टीक लावणार्‍या या सुझीची आणि माझी त्या प्रवासात जी भयंकर गट्टी जमली ती आजतागायत तश्शीच टिकून आहे. 

आता सकाळी स्टॆशनवर निघताना ती मला हाक मारायची. माझी कायम धांदल असायची. त्यात माझी शिस्तप्रिय आई, ’मोहिनी मागे फिर, तुझा चमचा विसळायचा राहिला आहे’ असं काहीतरी प्रचंड घाईत असताना सांगायची. ’अग माझे आई, माझी गाडी चुकेल नं’ म्हटलं तरी, ’चुकू दे, त्याशिवाय तुला सवय लागणार नाही’ असं शांतपणे म्हणायची. सुझी फाटकात उभी राहून आमचे हे संवाद ऐकत हसत असायची. ’तेरेको ये लिपस्टिक वगैरे लगानेको टाईम कैसे मिलता रे’, असं मग मी रस्त्याने धावता धावता तिला विचारायचे. तिची इंग्लीशमिश्रित बंबईया हिंदी खासच असायची. उदा: ’रास्ते मे साला ये गायलोग कही भी बैठते, घूमते है तो आय गेट फ्रायटन्ड इसलिए मै गाडीच नई चलाती’.  

तिला झोपेची देणगी आहे. ’मेरेको जहाँ कही भी होरिझॉंटल किया, वही मै सो जाती’ असा तिचा प्रकार होता. गाडीत, वेटिंग रुममध्ये ती अशीच पटकन जरा तिरकी झाली की झोपून जायची त्यामुळे ती कायम फ्रेश असे. आमची कंपनी वेगवेगळी असल्याने आणि कामाच्या लोडप्रमाणे आमच्या परतण्याच्या वेळा कधी कधी जुळत नसत. मग दुसर्‍या दिवशी सांगायला आमच्याकडे, काल काय झाले, पवन भोत लेट आई, कर्नाटक कैसे अचानक रुक गयी, बोगी मे क्या गडबड हुई, वो मनमाडका मुछ्छड टीसी फिरसे मेरेको बोला की ये पास नही चलेगा वगैरे ढीगभर किस्से असत. तिला सविस्तर आणि संगतवार सांगायला आवडे. उदा: - ५.१२ को मैने कॉम्प्युटर शटडाऊन किया और बस पर्स हाथ मे ली तो ये साला डेरिक आके बोलता है, इतना पेज अर्जंट बनानेका है. इधर नवजीवन का टाईम होयेला. मैने फटाफट बनाया. ५.१७ को उसको दिया तो उसको उसमे एक गलती मिला. उसको क्या रे, घर जाके पैर दीवाल को लगाके टीव्ही देखनेका रहता खाली, बीबी बनाती खाना. बच्चो की पढाई भी वो ही लेती. हाँ, तो मै कहाँ थी!’ मी- ’डेरिक के पास’. मग ५.४५ पर्यंतचे नवजीवन चुकली, मुश्कील से कुर्ला मिली, वो मोटे अंकल कैसे गिर गये जीनेपे, वगैरे वगैरे धावते समालोचन ऐकवायची.

 मी कंटाळून मध्येच काही पुढचे विचारले की ते तिला आवडत नसे. ’रुक तू, हाँ, तो मै कहाँ थी!’, ’वो आर्थर हॅले के बाजू मे’. (एक अपडाऊनवाला मुलगा आम्हाला कव्हर दिसेल अशी मुद्दाम धरुन जाड जाड इंग्लीश पुस्तके वाचायचा. त्याला आम्ही आर्थर हॅले म्हणत असू. ’समझता भी है के खाली स्टाईल मारता है’ अशी तिला शंका होती.)
रोज नवी गाडी, नवे प्रवासी, नवे अनुभव, धमाल यायची. तिच्या बॉयकट आणि शर्ट ट्राऊजर मुळे मागून तिला पुरुष समजून एकदा ट्रॆनच्या दुसर्‍या बाजूने चढणार्‍या एका बाईने तिला ’भैया जरा हाथ देना तो’ असे म्हणून एक गाठोडे हिच्या डोक्यावरच ठेवून दिले होते. पास संपलेला आहे याची ट्यूब पेटली आणि तेव्हाच नेमका टीसी आला तर आम्ही क्लुप्त्या लढवत असू पण तेव्हा खिदकन हसून सुझी आम्हाला तोंडघशी पाडत असे. दरम्यान आम्हा दोघींना माझी आणखी एक जवळची मैत्रिण जॉइन झाली होती. एव्हाना आम्हाला एकमेकींच्या घरची, कंपन्यांची, त्यातल्या आमच्या डिपार्ट्मेंटच्या लोकांची इतकेच नव्हे तर त्यांच्या खानदानाची सुद्धा इत्यंभूत माहिती झाली होती’.

रविवारी सुझी लवकर उठून लालचुटुक्क लिपस्टिक लावून संडॆ मासला न चुकता जात असे. येताना भाजी घेऊन, मला भेटून घरी जात असे. मग चिकन खानेका आणि सोनेका असा तिचा सोपा कार्यक्रम असायचा. प्रवासात सोबत नसेल तेव्हा वाचन बरं म्हणून मी जवळ कायम पुस्तक ठेवायचे, क्या करती तू इतना पढके, आजूबाजू देखकेही तो कितना पढनेको मिलता है, असं तिचं सोपं प्रिन्सिपल. पुरणपोळी तिला खूप आवडायची म्हणून घरी केली की तिच्यासाठी मी डबा न्यायचे. माझं ख्रिस्मस लंच इतर ख्रिश्चन मैत्रिणींसह तिच्याकडे असायचं. तिची आई अप्रतिम डोनट्स बनवायची. जेवण मग थोडं म्युझिक, डान्स वगैरे. मजा यायची. ख्रिश्चन लग्नाच्या रिसेप्शनला ती सोबत असली तरच मी जायचे. भेटवस्तू देताना नवरा-नवरीला हलका किस करण्य़ाची त्यांची पद्धत मला झेपायची नाही मग मी तिच्या मागे लपून लांब हात करून भेट देऊन सटकायचे. गावात धर्मांतरित ख्रिशचन भरपूर. एक कॉलोनी अँग्लोइंडियन्सची. यांची चर्चेस वेगळी. त्यातून मराठी ख्रिशचन्सची चर्चेस अजून वेगळी. त्यांचं सर्कल वेगळं. जो भेद नको म्हणून धर्मांतर झालेलं तो भेद शेवटी तसाच. सुझीचं कुटुंब कॅथोलिक. प्रेयरशिवाय जेवण नाही. अगदी कट्टर धार्मिक, वडील नव्हते. मोठी बहिण त्यांच्या जागेवर नोकरीला लागली होती. धाकटी बहिण एक जुजबी नोकरी करत होती. धाकटा भाऊ शिकत होता. तशातच तिच्या धाकट्या बहिणीने एका मूळ यूपीतल्या हिंदू मुलाशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना तो मोठा धक्का होता. पांढर्‍या सॅटीनच्या झालरवाल्या गाऊन मधल्या, हातात गुलाबांचा बुके घेतलेल्या ब्राईड ऐवजी त्यांना लालजर्द शालू, सोनेरी ओढणी, हातात चुडा, भांगात सिंदूर, हातभर मेहंदी, मोठठं कुंकू अशा वेशातल्या वधूच्या रुपात बहिणीला बघवेना. जेनी रडली, संतापली, वो सुखी नही रहेगी म्हणाली. हळूहळू ते निवळलं. (आता त्या बहिणीचं कुटुंब हिंदूच असलं तरी ख्रिश्चनांच्या वरताण त्यांच्यामध्ये मिसळून गेलंय)

आपल्याकडे ख्रिश्चन लोक सैल चारित्र्याचे असतात असा फार गैरसमज आहे. एकदा स्टुडिओत लग्नासाठी फोटो काढायला गेली असताना फोटोग्राफरने तिला निगरगट्टपणॆ आप लोगोमे इतना चलता है’ म्हणत काही ऑड पोझेस द्यायला सुचवल्या. तिने खिन्न होऊन मला हे सांगितल्रे तेव्हा मला अतिशय वाईट वाटले. सुझीला जी स्थळं यायची त्यात शिकलेली फार कमी. ख्रिश्चनांमध्ये उच्चशिक्षित (तेव्हा) फार कमी, दारु पिणे नॉर्मल. इंग्लीशच्या जोरावर नोकर्‍या मिळून जात. चंकीफंकी हेअर स्टाईल, हातात गिटार असे ’मुलांचे फोटो’ पाहून ती वैतागायची. ’इन मिथुन चक्रवर्तीयोंमेसेही कोई सिलेक्ट करना पडेगा क्योंकी किसिको पटाना अपने बस की बात नही’ असं म्हणायची. मग तिला एक चांगले मुंबईचे स्थळ आले. मुलाला जssरा टक्कल होते पण शिक्षण, नोकरी उत्तम. बाकी माहिती काढली, ते ही उत्तम. ’ये कितना टकला है मॅन ..कैसा लगेगा जोडा रिसेप्शन के फोटोमे’ अशी तिला काळजी पडली. मी तिची बरीच समजूत घातली की ’शादी के बाद घने बालोवाला भी टकला हुआ तो तू क्या उसे छोड देगी! शादी क्या सिर्फ रिसेप्शनके फोटो अचछे आने के लिए करतेहै क्या’ वगैरे. अखेर तिने त्याला होकार दिला. तिची निवड सार्थ ठरली. माझे लग्न ठरले तेव्हा महेश टकला नसल्याचे तिला हायसे वाटले.

ता सगळे फोनवर. व्हॉट्सअ‍ॅप वर संपर्कात असतोच. एकदोनदा ठरवून आणि एकदा योगायोगाने आम्ही भेटलो. एकमेकींच्या घरी मात्र अजून जाणं झालं नाही पण तिचा फोन आला नाही असा माझाच काय , मुलांचा वाढदिवसही जात नाही. फोन उचलला की सुझी सुरु होते, "कैसी है रे! मै तो बस दिनभर जॉब, बॉस, टार्गेट, सब्जी, बच्चे.. खाली सोने के लिए घर आती रे, इस्से अच्छा ऑफीसमे ही सो जानेका! कल की बात, ५.१५ को मै उठी, हजबंड के लिए चाय बनाई, वो भी बनाता रे मेरे लिए लेकिन इतनी टेरिबल बनाता की काडेके माफिक. पीही नही सकते. फिर बोलता आज मेरा ऑफ है, पहले बोलता तो मै आधा घंटा जादा नही सोती थी क्या, सोना तो मेरी जान है. बॉंबेमे इन्सान को कहाँ सोनेको मिलता रे, अपना अपडाऊन बहोत आसान था, ऐ अब तेरी साँस मम्मी के जैसा टॊकती क्या रे, मोहिनी मागे फिर, ही ही ही, हाँ तो मै कहाँ थी..!!!.’

Monday, April 20, 2020

पिंकीपॉलिसी


सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच आपापल्या घरातल्या मदतनीसांना ’मिस’ करतायत. आम्हाला मात्र आमच्याकडे कामाला असलेल्या पिंकीची आठवण येते ती वेगळ्या कारणासाठी. तिने आम्हाला एक असा मंत्र दिलाय की जगणं एकदम सोपं झालंय. आम्ही त्याला #पिंकीपॉलिसी म्हणतो. :-)
------------------------------------ 

’काय गं तू, दोन दिवस आली नाहीस. आधी कळवलं पण नाहीस तू.’
’हो नं, मला दोन दिवस जमलंच नाही यायला आणि मी कळवलं पण नाही.’
’पण मागच्या वेळेला म्हटलं होतं नं मी, निदान फोन करुन कळवत जा म्हणून..’
’हो नं, मागच्या वेळेला म्हटलं होतं तुम्ही’
’मग तरीही केलाच नाहीस तू फोन’
’हो नं, केलाच नाही मी फोन’

एव्हाना माझा संयम संपून मी माझ्या कामाला तरातरा निघून जाते आणि पिंकी शांतपणे कुंचा हातात घेऊन झाडू लागते. पिंकी आमच्याकडे घरकामाला येते. म्हणजे आपण तिला पिंकी म्हणूया. तिशी-पस्तीशीची, बेताच्या उंचीची, काहीशा गबदुल शरीराची, पाण्यात काम करावं लागतं म्हणून घोट्याच्या बरीच वर साडी गुंडाळणारी, ठीकठाक नाकीडोळी असलेली सावळी पिंकी. साधारणत: दुपारी दुबुक दुबुक चालत येते, तिला वाटेल तेव्हा आणि नाही येत नको वाटेल तेव्हा. दहावी झाली म्हणते. सहसा शुद्ध भाषेत बोलते. काम करत असताना टीव्हीवर जाहिरात दिसली तर खांद्यावर कुंचा किंवा हातात बादली घेऊन संपेपर्यंत टक लावून बघते. तिच्या घरी डिश टीव्ही आहे. ती रात्री रोज हिंदी 'सिरेल' आठवणीने बघते. बाकी जगाशी तिला घेणंदेणं नाही. राहत्या गावाइतपतच तिचा भूगोल मर्यादित आहे. तिच्या वॉर्डाच्या नगरसेवकाचं नाव तेवढं तिला माहित आहे. तिचं जीके इथेच संपतं.

तर तिच्या हातात कुंचा पाहून माझी वेलकम सिनेमातली ’कंट्रोल ..मोहिनी ..कंट्रॊल’ अवस्था होते. मी तिला २९५ व्या वेळेस म्हणते
’अगं आधी कपडे भिजव, मग झाडपूस कर, मग भांडी घास, तोवर कपडे मुरतात, तुझंच काम सोपं होतं. किती वेळा सांगू.’
’हो नं, तुम्ही नेहमी सांगता’
’बरं, मी कपडे भिजवून ठॆवावे तर तू केव्हा येणार, येणार की नाही खात्री नसते’
’हो नं, माझी खात्री नसते’
मी पुन्हा कामाला मनात आकडे मोजत तिथून जाते. इकडे पिंकीने कपडे भिजवले असतील याची खात्री नसतेच.
पण पिंकीच्या अशा स्टँडमुळे तिच्यासमोर दुर्वास मुनी देखील शांत झाले असते. तुम्ही लाख भांडायचं ठरवा पिंकीशी, ती ’स्थितप्रज्ञ दर्शन’ किंवा ’स्थितप्रज्ञाची लक्षणं’ असलं काही न वाचताच कोळून प्याली आहे. ती उर्मट नाही, ती मूर्खही नाही. ती न्यूट्रल गिअर मध्ये जगते. तिला मी अखेर शरण जाते याचा नवरोबांना फार आनंद होतो. मग ते अधूनमधून चहा केला आणि ती काम करत असेल तर तिचाही करतात. असं इतर घरात होत नसावं. तिला तेव्हा स्पेशल वाटतं. ती ओच्याला हात पुसून आत येते ,पंखा मोठा करते आणि त्याखाली निवांत फतकल मारुन त्यांना बशी मागते आणि फुर्र करुन चहा पिते. साहेबांची कपबशी विसळून टाकते. मी तिला चहा देते तेव्हा ती फक्त आपली कपबशी विसळून कामाकडे वळते. चहा करणे हे बाईमाणसाचे कामच आहे, असे भाव तिच्या चेहर्‍यावर असतात. सणावारी जेवताना आमटीचा घोट घेऊन ती माझ्याकडे एक सूचक (म्हणजे कायच्या काय गुळचट लागतंय हे) कटाक्ष टाकते. तिला त्यात ठेचा हवा आहे हे मला कळते.
’इतकं तिखट खाऊ नये पिंकी’ या माझ्या अनावश्यक वाक्यावर ती
’हो नं इतकं तिखट खाऊ नाई’
म्हणत शांतपणे आमटीत ठेचा मिसळते. ती तिच्या नादात जगते .तिचं एरवी अन्नाकडे लक्ष नसतं. पैशाकडे नसतं. कपडे धुताना चुकून खिशात किंवा घरात कुठे सापडले तर ५ रू असो की ५००, ती आणून हातात देते.

दारुड्या नवर्‍याच्या मारहाणीला विटून लहान मुलासह ती माहेरी परत आली आहे. तिची आई समजूतदार असल्याने तिला पुन्हा त्याच्या तोंडी न देता घरी राहू दिले गेले आहे. आई इतर घरी कामाला जाते. वडिलांना सुदैवाने व्यसन नाही. भाऊ कोणत्याच कामावर टिकत नाही, मग गावभर उंडारतो. त्याने घरी राहू दिल्याच्या बदल्यात पिंकी त्याची आणि घरची बहुतेक कामं करते. दमून आजारी पडते. सारखं पाण्यात काम म्हणून सर्दी होते. मग ती दांड्या मारते. मला हे बघवलं नाही की मी तिला, भावाला तरी आपली कामं स्वत: करायला लाव, असं सांगते. पिंकी ’हो, सांगते’ म्हणते. तिला त्याशिवाय पर्याय नाही हे आम्हा दोघींना माहित असते. तिचा मुलगा कधी तिच्याबरोबर आला आणि खाऊ घेऊन टीव्ही समोर बसला की ’आमच्या टीव्ही वर मामा फक्त ’गाने अन् पिच्चर’ लावतो’ असं सांगतो. मी तिला आमच्या घरातला पेपर तरी वाचत जा म्हणते पण चळवळी आणि राजकारण समजलं तरी तिच्या जगण्य़ात फरक पडणार आहे का या विचाराने अस्वस्थ होते. त्यापेक्षा आपण तिच्याशी कसं वागतो यावर तिची आणि कदाचित तिच्या मुलाची नजर तयार होणार आहे, फरक पडलाच तर त्याने पडणार आहे या विचाराशी मी येऊन थांबते. नकारात्मक बातम्यांनी आपलं डोकं खराब झालेलं असताना तिचा कोरा चेहरा पाहून she doesn't know that she doesn't know हेच बरं आहे असं मला वाटू लागतं.
मग वाटतं आपल्याला तरी सगळं जग कळलं आहे का? कळू शकणार आहे का?
जगात कुणाच्या तरी दृष्टीने आपलाही आयक्यू आणि भूगोल पिंकीएवढाच असू शकेल. जाऊदे.
तिला बचत करायला मात्र शिकवली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आरडीत पैसे जमा करायला हवे एवढे तिला कळते. पगाराचे बहुतेक पैसे, बोनसचे पैसे ती जमा करते.

मी घरी नसते तेव्हा बाहेरुन आल्यावर घर व्यवस्थित पुसलेले नाही आणि कोपरे नीट झाडलेले नाहीत हे मला दिसते. तेव्हा तिचा कपडे धुण्य़ाचा म्हणजे दोनदा पाण्य़ातून कपडे बुचकळून काढून थोडा झटका देऊन गळत्या धारेसह दोरीवर भिरकावण्याचा प्रकार सुरू असतो. मी तिला आत बोलावून ३४३ व्यांदा सांगते.
’हे बघ, स्वत:भोवती गिरकी घेऊन जितकं झाडलं जाईल तितकच तू झाडलयंस, कोपर्‍यात केर तसाच आहे.’
’हो नं तसाच आहे’
’आणि नीट पुसण्याचा तर प्रश्नच नाही’
’हो नं, आज मी नीट पुसलंच नाही’
’मग झाड नीट’
’हो झाडते’
’आता ओल्या फरशीवर कसं झाडशील?’
’हो नं ओल्या फरशीवर कसं झाडणार!’
’जाऊदे, मी घेईन नंतर कोपरे झाडून. उद्यापासून झाडत जा आता नीट’
’हो, घ्या झाडून, उद्यापासून झाडत जाईन नीट’

या पिंकी पॉलीसीने आमचं लाईफ सोप्प करुन टाकलंय. डेल कार्नेगी किंवा रॉबीन शर्मा वाचून किंवा शिवानीदीदीचे व्हिडिओ पाहून मला जे जमलं नाही ते सगळं या पिंकी पॉलीसीमुळे जमू लागलं. यामुळे प्रश्न सुटतोच असं नाही तरी वाद नाही की ताण नाही.
उदा: मुलाने वैतागून म्हटलं," अर्र भेंडीच का आज, किती बोर भाज्या करतेस ग तू"
तर पूर्वीची मी- "मी तरी रोज काय वेगवेगळ्य़ा भाज्या करणार, सगळ्या भाज्या खायला हव्या, उद्या होस्टेलला गेल्यावर काय करशील, ज्यात त्यात पनीर मी बिलकुल घालणार नाही. मुळात ही भेंडी पण तुला पंजाबी मसाला आवडतो म्हणून तो घालून केलीय तरी काय कुरकूर आहे. स्वत: करत जा म्हणजे कळेल, पानात पहिलं वाढलं तेवढं मुकाट्याने खायचं ...ब्ला ब्ला ब्ला...."
आताची मी - ’हो नं, आज भेंडीच केली मी’

नवरोबांशी वाजणं बंद झालं नसलं (नाहीतर मज्जा काय) तरी वादंग संपले.
उदा: पाडव्याला गुढी उभारणे
पूर्वीची मी- ११ वाजायला आले, लोकांनी गुढ्या उभारुन दोन तास झाले तरी आपली गुढी अजून उभारलेली नाहीये. आता जेवणं झाल्यावर दुपारी उभारणार का! ५ मि. च्या कामासाठी किती वेळा आठवण करुन द्यायची. मुळात दर वेळी का आठवण करायची मी. स्वत:हून कधी एक गोष्ट करायची नाही. मी आज गोड करायला विसरले तर चालेल का? मग मी म्हणू का आठवण का नाही केली. ब्ला ब्ला ब्ला....
पूर्वीचे नवरोबा- नवर्‍यानेच गुढी उभारली पाहिजे असं ब्रह्मवाक्य कुठे लिहिलं आहे का? एवढी टाईम्स स्क्वेअरला एकटी फिरणारी तू (हे ध्रुवपद म्हणजे एक वेगळी स्टोरी असते) तुला साधी गुढी उभारायला माझ्यावर अवलंबून कशाला असायला पाहिजे! समजा ११ नंतर उभारली गुढी, तर पाडवा होत नाही की काय साजरा..ब्ला ब्ला ब्ला...
आताची मी- गुढी उभारायची राहिलीय, ११ वाजायला आले.
आताचे नवरोबा- हो नं, ११ वाजायला आले. उभारतो.
विषय समाप्त. 

लॉकडाऊनमुळे घरातले वादविवाद वाढले असतील, असतील काय असणारच. मग ही पिंकी पॉलीसी वापरुन पाहा. :-)

Friday, January 31, 2020

विद्याताई

 


जनसंवाद, पुणे आयोजित एका निबंधस्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. नंतर पुण्याला गेले तेव्हा आयोजक तपस्वी सरांना भेटले. ते म्हणाले, ’आली असतीस तर हे बक्षीस विद्याताईंच्या हस्ते मिळालं असतं”. मला थोडं वाईट वाटलं. अचानक ते म्हणाले, ’वेळ असेल तर आपण जाऊया का त्यांच्या घरी!’. पूर्वपरवानगी घेऊन आम्ही गेलो. विद्याताईंना प्रत्यक्ष, टीव्हीवर, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेलं पण ते सगळं वन वे. त्यांच्या हस्ते त्यांच्याच घरात बक्षीस स्वीकारताना खूप भारी वाटलं. साधं, शांत, नेटकं घर. विद्याताईंचा प्रसन्न वावर. आमच्याशी बोलताना त्या मध्येच बशीत काही खायला ठेवून कपडे वाळत घालायला गेल्या, एकीकडे गप्पा सुरु. म्हणजे त्यांच्या आणि तपस्वी सरांच्या. मी हो, नाही पलिकडे फार काही बोलल्याचं आठवत नाही. त्यांचं मृदु बोलणं, निर्व्याज हसणं, टीपॉय वरच्या ढिगातून चटकन एखादं पुस्तक काढून त्याचा संदर्भ देत काही सांगणं, सगळं मी गप्प बसून पाहत होते.

डावी असो वा उजवी, या स्तरावर पोचलेली फार कमी माणसं इतकी साधी, समंजस, दुसर्याचं शांतपणे ऐकून घेणारी आणि ठाम तरीही ऋजु असतात. समाजात बदल व्हावा असं ज्यांना मनापासून वाटतं त्यापैकी अनेकांचा स्वर आक्रस्ताळा, उर्मट आहे असं जाणवतं. त्यांनी विद्याताईंकडून एवढं उचललं तरी खूप फरक पडेल. आपलं मत तर्कसंगत, मुद्देसूद, स्निग्ध शब्दात आणि संयतपणे मांडलं तर ते स्वीकारलं जातं, किमान त्यावर निकोप चर्चा होऊ शकते, नाहीच पटलं/ मान्य केलं तरी दोन्ही बाजूंनी निदान विचार केला जातो मग वाचक/ श्रोते/ प्रेक्षक कोणत्याही विचारसरणीचे असोत. विद्याताईंनी विचार मांडण्याची ही जी पद्धत वापरली (ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं स्वाभाविक अंग होतं) त्यामुळे विरोधकही त्यांचा नकळत आदर करत असं मला वाटतं.

गेल्या वर्षी याच सुमारास लेखाच्या गाभ्याला मारक ठरेल असं वादग्रस्त शीर्षक हेतूपुरस्सर देऊन एका ऑनलाईन वाहिनीने त्यांचा लेख प्रकाशित केला. लेख न वाचताच केवळ शीर्षकावरुन निष्कर्ष काढून अनेकांनी मग विद्याताईंवर टीका केली. त्या लेखात आक्षेपार्ह असं काही नव्ह्तंच उलट परंपरेच्या चौकटी न मोडताही त्यातली स्त्रियांच्या एकत्रीकरणाची कल्पना उचलून धरुन एक सोपा, नवा विचार त्यांनी रुजवला होता. बहुतेक स्त्रियांनी आनंदाने तो विचार बर्याच अंशी स्वीकारलेला आहे असं आता दिसतंय. शनीचौथरा प्रवेशासाठी त्यांनी स्त्रियांना पाठिंबा देणं काही स्त्रीवादी कार्यकर्त्यांसह अनेकांच्या भुवया उंचावून गेलं. स्त्रियांना शेवटी कर्मकांडाकडेच ओढणार्या मंदिरप्रवेशाची गरज काय यावरुन दुफळी झाली. मुलभूत अधिकाराची जपणूक व्हायला हवी आणि विषय धार्मिक असला तरी स्त्रियांना स्वत:च्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हवा याबाबत विद्याताई आग्रही असल्याने त्यांची भूमिका याला सुसंगत अशीच होती. काही अपवाद वगळता विद्याताईंची भूमिका पटली नाही असं झालं नाही.
विद्याताईंनी स्त्री-पुरुष नात्याकडे पाहण्याची एक स्वच्छ नजर दिली. आपण ज्या समाजात वावरतो तिथे इतकं आदर्श काही घडत नाहीये याचा त्रास त्यामुळे आधीपेक्षा जास्त होऊ लागला पण बदल व्हायला वेळ लागतो, संयम लागतो हे ही त्यांनीच त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून शिकवलं. समानतेच्या व्याख्येबाबत सुरुवातीला गोंधळ असल्याने पुरुषांचा आणि त्यांच्यासह एकूणच समाजाचा राग राग करण्यापासून उगाचच्या बंडखोरीपर्यंत आणि तिथपासून ते संवादी राहून परस्परपूरकतेची आवश्यकता समजून घेण्यापर्यंतचा माझा प्रवास शेवटच्या टप्प्यात त्यांच्या विचारांचं बोट धरुन झाला. स्त्रियांच्या तुलनेने काहीसा कमी असला तरी पुरुषप्रधान व्यवस्थेचा त्रास पुरुषांनाही वेगळ्या प्रकारे भोगावा लागतो हे कळू लागलं. आत्मभानाइतकंच समाजभानही महत्वाचं असतं हे कळलं. विद्याताईंनी असं देणं अनेकांना दिलं आहे. कृतज्ञ आहे.

माणूसपण म्हणजेच विचारी मेंदू आणि संवेदनशीलता म्हणजेच माणुसकी यांच्याशी इमान राखत मी जगते आहे, असं म्हणणार्या विद्याताईंच्या स्मृतिला विनम्र अभिवादन.

Friday, June 15, 2018

शशिकाका


शशिकाका

प्रशांतचा अचानक "बाबा गेले" असा फोन आला तेव्हा मला काय बोलावे तेच सुचेना, मग त्याने काकूंना फोन दिला. त्या खूप शांतपणे काय घडलं, कसं घडलं सगळं बोलल्या. शशिकांतकाकांचं हे अचानक जाणं त्यांच्या आखीवरेखीव आयुष्य़ाला शोभेल असच होतं. ते अंथरूणावर खितपत पडून आहेत हे त्यांनाही आवडलं नसतं. तरीही आता ते या जगात नाहीत, आपल्यावर मनापासून माया करणारी , आपल्या लहानमोठ्य़ा कोणत्याही यशाचं भरभरून कौतुक करणारी व्यक्ती आपल्याला कायमची दुरावली याची खंत कायम राहील. ’कौन रोता है किसी और के खातिर.. सबको अपनीही किसी बात पे रोना आया..’ हेच कदाचित सत्य आहे.
काका गेले ते त्यांच्या नाशिकच्या फ्लॅट मधे. गेली बरीच वर्ष त्यांचं वास्तव्य तिथेच होतं पण माझ्या त्यांच्याशी निगडीत बहुतेक आठवणी .. खानदेशच्या, आठवले वाडयामधल्या. ८ ते १६ वर्ष वया दरम्यानच्या. आमच्या बाजूचच तिसरं घर कुलकर्णी काकांचं. फक्त एक खोली, त्यातच पार्टीशन घालून केलेली स्वैपाक खोली आणि जिन्याखालचं न्हाणीघर म्हणजे त्यांचं घर. खरं तर त्यांची रेल्वेमधली नोकरी अगदी चांगल्या दर्जाची पण तेव्हा ’राहते घर’ हे त्याचे निदर्शक नसे. पुढे त्यांनी गच्चीवर चांगला मोठा हॉल बांधला. तिथे आम्ही प्रचंड पत्ते खेळायचो आणि खेळताना खाणाखुणा केल्या म्हणून जोरजोराने भांडायचो. आवाज फारच वाढला की काका वर येत आणि चुटक्या वाजवत ’च्यला पॉत्ते बॉंद’ एवढच शांतपणे म्हणून आम्हाला रवाना करत. तोंडात तंबाखूचा बार असल्याने याहून अधिक बोलणं त्यांना शक्य होत नसावं. आम्ही दुसर्‍या दिवशी पुन्हा काल जणू काही घडलच नाही या अविर्भावात नव्याने खेळ (आणि भांडण) सुरू करत असू.

८० ते ९० च्या दशकातल्या त्या वाडा संस्कृतीतलं काकांचं व्यक्तिमत्व खूपच असामान्य आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटत असावा. त्यांचं वेगळेपण त्यांच्या घरापासून सुरू होई. बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट, त्यावर एकावर एक पसरलेला गाद्यांचा ढीग, एखादं स्टूल आणि घडीची पत्र्याची खुर्ची इतपत ’फर्निचर’ आणि ’पिवळे बल्ब’ असलेली बहुतेक घरं. त्यात त्यांचं छोटसंच पण अतिशय नीटनेटकं घर अगदी उठून दिसायचं. ’महाराष्ट्र टाईम्स’ची रद्दी अगदी काटकोनात रचलेली, गादीवरची चादर स्वच्छ आणि ताठ खोचलेली. खिडकीत चकचकीत पाण्य़ाचं तांब्याभांडं भरून ठेवलेलं, खिडकीला साडीचेच पण सुरेख रंगसंगती असलेले पडदे आणि त्याकाळी दुर्मिळ असलेला पुस्तकांनी खच्चून भरलेला भिंतीतला कप्पा. त्यातली पुस्तकं अर्थातच अगदी शिस्तबद्ध लावलेली. रेडिओवर किंवा नंतर टेपवर सतत छानशी भावगीतं, सिनेगीतं, नाट्यगीतं कायम सुरू असायची. या सगळ्य़ामुळे त्या घरात सतत एक प्रसन्नतेची झुळूक वावरत असायची. काकांना गाण्याची उत्तम समज होती, काकू देखील छान गात. विशेषत: आशाचे ’जीवलगा’ गावे तर त्यांनीच. त्यांचे माहेर पुण्याचे, शिक्षण ’स.प. महाविद्यालयातले’ त्या काळचे इंटर, त्यांची बहीण आक्का मराठी चित्रपटात काही सात्विक भूमिका केलेली. त्या ’स्त्री सखी’ मंडळात जात. इतर बायका ’शेवया करूया, पाटल्या नव्या केल्या का, ह्यांची महिनाभर ४-१२ च सुरू आहे’ वगैरे आपसात बोलायच्या, त्यापेक्षा काकूंच्या गप्पांचे विषय वैविध्यपूर्ण असत. प्रशांत देखील हरहुन्नरी आणि ’व्हॉईस ऑफ किशोरकुमार’ होता. हरितालिकेला किंवा कोणत्याही एकत्रीकरणात त्या दोघांची गाणी ऐकायची हे ठरलेलं. या संगीतमय वातावरणाचे श्रेय मात्र काकांचे. ते घरी असले की बहुतेक वेळा चष्मा लावून खिडकीशी सतत वाचताना दिसत किंवा गुणगुणत असत. सर्वसाधारण उंची, देशस्थी सावळा रंग, थोडेसे विरळ होत गेलेले मागे वळवलेले कुरळे केस, तोंडात तंबाखूचा बार त्यामुळे मुखरस सांभाळत मिश्कील बोलणारे, टापटीप परीटघडीच्या कपडयातले, हसरा चेहरा आणि रसिक वृत्तीमुळे कायम सतेज दिसणारे काका शेवटपर्यंत तसेच दिसायचे.

पहिलीत मी पहिले भाषण लो. टिळकांवर केले आणि मला बक्षीस मिळाले. घरी येताच मी आधी धावत जाऊन त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या पायरीवर ’सावधान’ पोझ मधे उभे राहून अख्खे भाषण खाडखाड म्हणून दाखवले. ही आठवण तेच मला नेहमी हसत हसत सांगत. पाचवी की सहावीत ’भुताळी जहाज’ हे भा.रा.भागवतांचे पुस्तक मी त्यांच्या कप्प्यातून काढून वाचायला मागितले आणि एका रात्रीत वाचून परत केले. यावर खूष होऊन त्यांनी त्यांचा पुस्तकांचा कप्पा मला खुला केला आणि माझं वाचन अधिक उत्साहाने सुरू झालं. सार्वजनिक वाचनालयात काकांनी काढलेलं गदिमांच अप्रतिम चित्र लावलेलं होतं, अजूनही असावं. काकांचा कुसुमाग्रज, ना.धों महानोर अशा कितीतरी मोठ्य़ा साहित्यिकांशी परिचय तसच वैयक्तिक पत्रव्यवहार होता. मला हे कळले तेव्हा ते सारे फार अद्भुत वाटले, आपल्याला शाळेत ज्यांचे धडे, कविता आहेत त्यांच्याशी काका प्रत्यक्ष बोलतात, पत्र पाठवतात म्हणजे किती ग्रेट! मग मी पण गिरीजा कीर यांना पत्र लिहून माझ्या तेव्हाच्या अकलेनुसार काही प्रश्न विचारले, आणि त्यांचे मोत्यासारख्या वळणदार अक्षरात मला चक्क उत्तर आले ते मी धावत जाऊन आधी काकांना दाखवले. त्यांनी मला खाऊसह शाबासकी दिली हे अजूनही आठवतं.

रेल्वेचा दुर्गोत्सव तिथे मोठ्य़ा प्रमाणावर होत असे. काकांचा त्यात सक्रीय सहभाग असायचा. निवेदन, कार्यक्रमाची आखणी, उत्तमोत्तम कलाकारांचे आगतस्वागत ही सगळी जबाबदारी ते सहज पार पाडायचे. अशा मंडळींशी संवाद साधायला जी सांस्कृतिक उमज असायला हवी त्यासाठी काकांसारखी दुसरी योग्य व्यक्ती नसावी. त्यांचे त्या कार्यक्रमातले, नाटकात काम केल्याचे बरेच फोटॊ पाहिल्याचे मला आठवते. तेव्हाची आजूबाजूची इतर ’वडील’ मंडळी ही फारच रूक्ष आणि साचेबद्ध. रेल्वेतल्या त्रासदायक नोकरीने सतत कावलेली असायची. ’काही अप काही डाऊन’ अशीच आर्थिक स्थिती आणि बोलण्य़ात फक्त ’रेल्वेचे विषय’. या सर्वांचे स्वभावाने रागीट असणे, मुले चुकून समोर आलीच तर त्यांच्यावर ’अभ्यासाला बस’ म्हणून डाफरणे आणि बायकोशी फक्त ’वाढ’ म्हणण्य़ापुरता संवाद (!) असणे हे अगदी सार्वत्रिक वैशिष्ट्य़ होते. या पार्श्वभूमीवर काका मला खूप वेगळे वाटत. त्यांची विनोदबुद्धी उत्तम आणि अंगात अभिनय असल्याने त्यांच्याकडून घेतलेली उधारी चुकावणारे, आजूबाजूचे काही नमुने यांच्या ते झकास नकला करत. प्रशांतसोबत काही ना काही हस्तकला करताना, काकूंशी त्यांना चक्क ’गप्पा’ मारताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटे. फिरायला किंवा बाहेर जाताना ते दोघे मागे पुढे न चालता सोबत जात असत. महालक्ष्म्यांची त्यांनी केलेली सजावट पाहण्य़ासारखी असे. इतर बायका ऐपत असली तरी ’करायच्या काय’ म्हणून लग्नात ’आलेल्या’ वायलच्या साड्या नेसत पण काकूंच्या साड्या मात्र सुंदर लेस लावलेल्या, प्लेन टवटवीत रंगांच्या आणि मऊ पोताच्या असत. त्यातलीच एक मागे भिंतीवर सोडून घरातलेच साहित्य वापरून काका नेत्रसुखद रचना करायचे. गणपतीतही काका सुरेख मखर करायचे. त्यांच्या घरची प्रसादाची खमंग वाटली डाळ आणि सढळ हस्ते तूप घातलेल्या बेसनाच्या लाडूची चव चाखण्य़ासाठी त्यांची विसर्जनाची वेळ गाठण्याची आमची कोण लगबग असायची. दिवाळीचे अभ्यंगस्नान झाले की आधी मी नवा ड्रॆस काका-काकूंना दाखवायला जायचे. मी नव्या फ्रॉकच्या घेराची दोन्ही टोके हातात धरून गिरकी मारायची आणि त्यांनी ’कंपलसरी’ माझे कौतुक करायचे असा आमचा रिवाजच होता.

 केव्हाही उठून त्यांच्या घरी जाणे आणि काका असले तर त्यांच्याशी काहीतरी हटकून बोलणे ही तशी साधी घटना असली तरी मुलांशी इतर काका मंडळी फारशी बोलत नसल्याने मला तिथे जायला विशेष आवडायचे. काकांचे बालपण अतिशय कष्टात गेले असे काकू नेहमी सांगायच्या पण भूतकाळाचे सावट त्यांच्या ’आज’ वर कधीच जाणवायचे नाही. सामाईक गोष्टींवरून वाड्य़ात जी अपरिहार्य भांडणे होत त्यात काकांचा स्वर कधी टीपेला गेल्याचे किंवा त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचे मला आठवत नाही. त्यांच्या बाजूचे म्हणजे ४ थे घर विचित्र वृत्तीचे, एका पाठॊपाठ एक अशा सात मुली झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले, सदा कलकलाट करणारे. त्या गृहस्थांचे पिऊन येणे आणि कुरापती काढून काकांना भांडायला सतत आमंत्रण देणॆ कधी थांबले नाही. या कटकटीला वैतागुन कुणीही चवताळून एकदा तरी त्यांच्यावर धावून गेला असता. ’मग आमच्यात फरक तो काय उरला’ असं म्हणणार्‍या काकांच्या समंजस, सुसंस्कृत, नीटनेटक्या व्यक्तित्वाची त्या वयात माझ्यावर छाप पडली ती कायमचीच.

मी शिकायला बाहेर पडल्यावर आमचा संपर्क काहीसा कमी झाला आणि तोवर काकांची नासिकला बदली झाली. सामाईक ओळखीचे कुणी भेटले तर एकमेकांच्या चौकशीपुरताच संबंध राहिला. पण अनेक वेळा त्या त्या सणाला, तशा घटनांच्या प्रसंगी काका-काकूंची आठवण यायची. १० वर्षांपूर्वी जीएसइ निमित्त्याने नासिकला जाणे झाले. फोन करून काकांकडे गेले, इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा झाल्या. प्रशांतचे जवळच घर होते, त्याच्या बायकोमुलीची ओळख झाली. बाहेर एकत्र जाणं झालं. काका स्वत: मला इंटरव्ह्यू च्या जागी पोचवायला आले आणि माझी निवड झाली हे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. माझे तिकीट रद्द करणे, दुसरे काढणे, मला स्टॆशनवर पोचवणे सगळं ते उत्साहाने, काळजीने, प्रेमाने करत होते. आमचा संपर्क पुन्हा पूर्ववत सुरू झाला. बहुतेक वेळा फोनवरच. दिवाळी, नव वर्ष अशा निमित्ताने मी फोन करायचे तर माझे लेख वाचल्यावर अधूनमधून त्यांचा फोन येई. त्यांची साहित्यिक आस्वादकता खूपच उत्तम, माझा लेख त्या दर्जाचा नसला तरी त्यात कौतुकाचा भागच सर्वाधिक असायचा याची मला जाणीव असायची.. एव्हाना त्यांचा पुस्तक संग्रह प्रचंड वाढला होता. वाचन अव्याहत सुरू असायचे. एकदा सहपरिवार त्यांच्याकडे जाऊन आले, तेव्हा त्यांनी नवर्‍याशी अवांतर बोलण्यापेक्षा बहुतेक वेळ माझे लहानपणापासूनचे किस्से सांगत नवरा वैतागेल इतके कौतुक केले. नंतर कामानिमित्ताने नासिकला एक दिवसाच्या धावपळीच्या ट्रीप्स झाल्या पण मुलांसाठी लगेच परतायच्या घाईत काकांना घरी भेटण्य़ाइतकी सवड मिळू शकली नाही.

गेल्या नासिक भेटीत ठरवले, की पुढच्या वेळेस कसेही करून भेटायला जायचे. बालपणीची उर्जादायी प्रतिमा मनात ठसल्याने काका, काकू आता थकले आहेत हे कदाचित लक्षातच आले नाही. ते गेल्याचा प्रशांतचा फोन आला तेव्हा हतबल वाटलं.. पोरकं झाल्यासारखं खोल काहीतरी कापत गेलं, आणि जाणवलं, देअर इज नॉट ऑलवेज अ टुमारो.

Wednesday, October 11, 2017

Big B


मूछें हो तो नत्थुलाल जैसी और सिर्फ कलाकार ही नही, आदमी हो तो अमिताभ जैसा :-)
आंबा आणि आईस्क्रीम न आवडणारे काही लोक या भूतलावर आहेत, पण अमिताभ आवडत नाही असं म्हणणारं कुणी माझ्या तरी ऐकण्या-पाहाण्यात नाही. (असल्यास ईश्वर त्यांना माफ करो :-) ) अप्रतिम अभिनय, जबरदस्त संवादफेक, उत्तम विनोदबुद्धी, देखणी देहबोली, काळजात रुतणारा आवाज, वेधक ड्रेस सेन्स, भाषेची अचूक जाण, पडदा भारून टाकण्याची क्षमता या सगळ्यासाठी अमिताभ एक कलाकार म्हणून आवडतोच, पण त्याहीपेक्षा पडत्या काळात आरोप, टीका होत असताना- आर्थिक तणावातही परिपक्वतेने वागणं, पुन्हा यशाच्या शिखरावर पोचल्यावर माज न करणं, या गुणांमुळे विशेष आवडतो.

सिनेमा ही फक्त गोष्ट सांगण्याची कला आहे. अमिताभने फक्त ’मासेस’वर नाही तर ’क्लासेस’वरही राज्य केलं. व्यावसायिक सिनेमाबरोबरच अमिताभचे काही पठडीबाहेरचे सिनेमे आणि अलिकडच्या काळात केलेले भूमिकांचे कमाल प्रयोग मला थक्क करतात. कलात्मकतेच्या नावाखाली प्रेक्षकांना पडद्यावरच्या अंधाराकडे डोळे फाडून बघायला लावणार्‍या सिनेमांच्या तुलनेत अमिताभचे सिनेमे हटके असत. व्यावसायिकता आणि कला याचा त्याने नेहमीच सुरेख मेळ घातला. हॉलीवूडची भ्रष्ट नक्कल करणारा बॉलीवूड हा शब्द वापरणं बंद केलं, उलट देशी सिनेमालाच ग्लोबल केलं. मुलभूत सुविधांच्या अभावामुळे वैतागलेल्या सामान्य ’जन्ते’ला आणि संध्याकाळच्या भाकरीची खात्री नसलेल्या पिटातल्या पब्लीकला अपार आनंदाचे कितीतरी क्षण दिले. त्यांच्या मनातल्या खदखदीला ’अ‍ॅंग्री यंग मॅन’च्या भूमिकेतून आऊटलेट दिलं. काळाची पावलं ओळखून बदलत्या जगाशी कनेक्ट राखत पुढे चाललेला हा टेक्नोसॅव्ही ’बडी’ समाजमाध्यमांवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता न होता तरच नवल. कित्येक समीक्षक  त्याला चांगला अभिनेता देखील मानत नाहीत पण याचा अर्थ ’मला अजून चांगलं काम करायला हवंय’ असं नम्रतेने म्हणायला जे विशाल मन हवं त्याचंही प्रत्यंतर अमिताभने अनेकदा दिलंय.

काही लोकांना त्यांचे सगळेच सिनेमे आवडले नसतील. खरंय, शोले, डॉन, दीवार ज्यांनी डोळे भरून पाहिला, त्यांना ’लाल बादशाह’ वगैरे कसा बघवणार पण दुसर्‍या इनिंगमध्ये पुन्हा उत्तम भूमिका करत त्याने अस्वस्थ झालेल्या रसिकांना नि:शंक केलं. त्याचे काही राजकीय लागेबांधे अनेकांना खटकले परंतु राजकीय चिखलफेकीत तो कधीच उतरला नाही. परिस्थिती पालटल्यावर मात्र त्याने स्वत:चंच एका ’प्रॉडक्ट’ मध्ये रुपांतर केलं. ’कुछ दिन तो गुजारिएँ गुजरात में’ पासून ’नवरत्न तेल’ पर्यंत यत्र तत्र सर्वत्र अमिताभ. काही जाहिराती बघताना आता त्याने थांबावं असंही वाटतं तोच त्या जाहिरातीची पंचलाईन तो अशी काही उच्चारतो की आपल्या चेहर्‍यावर पुन्हा स्मित येतंच.

कलाकार हा एक चांगला माणूस असला पाहिजे अशी अपेक्षा असली तरी ती काही अट नाही. अमिताभ माणूस म्हणून अनेक मूल्यांचा नुसता विचार करत नाही तर ते कृतीतही आणतो.
’केबीसी’ मध्ये हॉट सीटवर बसलेल्या रिक्षावाल्यापासून सेलेब्रिटी पर्यंत कुणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही असं त्याचं ’स्क्रिप्ट’च्या बाहेरचं सुसंस्कृत वागणं पाहिलं की इतरांना त्याची ’उंची’ का गाठता येत नाही ते सहज लक्षात येतं. रेखाविषयी कधीही जाहीर वाच्यता न करणं त्याच्या ’तहजीब’ला शोभतं. सार्वजनिक कार्यक्रमात दोघांची उपस्थिती असताना त्यांच्यावर फ्लॅश होणार्‍या कॅमेर्‍यांच्या सूचक नजरांनाही त्याने कधी खाद्य पुरवलं नाही. आई तेजी बच्चन यांच्यावर लिहीलेला ब्लॉग आणि नात काव्या नंदा हिला लिहिलेलं पत्रं हा माणूस स्त्रियांकडे कसं बघतो याची झलक  दाखवतात. ते पत्र ’पिंक’ या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग होता असंही म्हटलं जातं. असेना का, पण त्यातला आशय तर त्याच्या विचारांचाच आरसा आहे. त्याच्या ब्लॉगवरचे इतर लेख वाचले की हा आशय केवळ त्याच्या लेखणीतून उतरला आहे त्यासाठी त्याला भाडोत्री लेखणीची गरज नाही हे नक्कीच लक्षात येईल. या कवीपुत्रावर शब्द किती प्रसन्न आहेत याची त्या ब्लॉगवर, तो हरिवंशराय यांच्या कविता ज्या ताकदीने सादर करतो तेव्हा, कोणत्याही व्यासपीठावर चार शब्द बोलतो तेव्हा.. पदोपदी साक्ष पटते.

काही वेळेस सामाजिक प्रश्नांवर तो सावध भूमिका घेतो असाही आरोप होतो, तेव्हा गाढव- बाप- मुलगा ही गोष्ट आठवते. प्रसिद्धीबरोबरच टीका पचवण्याची ताकद त्याने कमावली आहे.
रूबाबदारपणे संयत वागणं हा तर त्याचा यूएसपी आहे. प्रेक्षकांच्या आयुष्यात केवळ आनंद पेरणार्‍या या महानायकाला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. :-)
#HappyBirthDayBigB

Tuesday, June 6, 2017

बापू

’लास्ट स्टेज.. लास्ट एकदम’
आम्ही घाबरुन- ’कुणाची?’
’आपले नाना ओ.. गंगाजल गंगाजल.. तुळशी.. घाला म्हटलं’
आम्ही -’कोणाला?’
’नानाच्या भावाला हो.. मुंबई मुंबई.. काय गर्दी ..जेमतेम भेट.. अ‍ॅ बापरे’
आम्ही अर्थ लावून घेतला. कोणतेतरी नाना शेवटचे श्वास घेत असून त्यांचा भाऊ मुंबईहून गाडीला भयंकर गर्दी असूनही कसाबसा पोचला आणि त्याची आणि नानांची भेट होताच नानांनी श्वास सोडला.
आम्ही असे अर्थ लावून घेत घेत या इसमाशी म्हणजे बापूंशी गेली अनेक वर्ष संवाद साधत आहोत. बापू घराजवळच राहतात. ते स्वत:वर फिदा असलेल्या जमातीतले आहेत. आयटीआय मध्ये शिक्षक होते, केव्हाच निवृत्त झाले आहेत. ’ड्रिल ड्रिल, कोपर्‍यात ए.. अस्सं, वायर वायर, अ‍ॅ बापरे’ असं करत त्यांनी कसं काय शिकवलं असेल आणि त्यातून विद्यार्थ्यांना काय कळलं असेल हे एक आम्हाला कोडंच आहे.
एकदा ते ओरडतच घरात आले.  ’हत्ती हत्ती ...पोसा.. पांढरा'
आम्ही गोंधळलेल्या अवस्थेत..'मुलांना काय.. नुसती चक्कर.. इंजिन.. इंजिन बंद. अ‍ॅ बापरे त्यापेक्षा भाड्याने.. भाड्याने मस्त..’
याचा अर्थ ’मुलगा कार घ्या म्हणतो आहे, त्याचे काय जाते, काम नसले तर कारचे इंजिन खराब होते म्हणून उगाच फिरवावी लागते. म्हणजे हे पांढरा हत्ती पोसणे आहे. त्यापेक्षा लागेल तेव्हा मस्तपैकी भाडयाने गाडी घेऊन फिरावे’ हुश्श.

बापू आता समाजसेवा करतात, म्हणजे असं त्यांना वाटतं. पत्नी निवृत्त शिक्षिका. साध्या, नीटनेटक्या. चारही मुलींची लग्नं आणि मुलाचा प्रेमविवाह झालेला. इकडे ही जोडी टुकीने राहते आहे.
बापू डाय करत नाहीत. ’वय वय ..तसंच मस्त.. डाय अ‍ॅलर्जी.. नस्ता ताप..अ‍ॅ बापरे’
त्यांच्या अंगावर भरघोस शुभ्र केस आहेत. कानातूनही डॊकावत असतात, तोंडात अधूनमधून तंबाखूचा बार असतो. सावळा चेहरा, खुरटी पांढरी दाढी, मध्यम बांधा. अंगावर पांढरट किंवा पिवळा बुशकोट, तपकिरी किंवा काळी पँट. तब्येत टकाटक कारण ’रोज फिरायला.. लांब.. फ्रेश फ्रेश दिवस.. तुम्ही दिसला नाही.. उशीर उशीर.. अ‍ॅ बापरे’

फिरणं झालं की चहा घेत त्यांचं पेपरवाचन असतं. ते फक्त स्थानिक राजकारणाच्या बातम्या वाचतात. तो त्यांचा ऑक्सीजन आहे. काहीच बातमी नसेल तर ते अस्वस्थ होतात की आता एवढया मोठया दिवसाचं करायचं काय. त्यांचा स्थानिक लाडका दलबदलू नेता ज्या पार्टीत, ती त्यांची पार्टी त्यामुळे त्यांचा ह.मु बदलत असतो. त्यांना स्वत:चे मत नाही, विचार नाही. बिनबुडाच्या गडूसारखे कधी ते घड्य़ाळाकडून, कधी इंजिनाकडून ,कधी धनुष्याकडून तर कधी पंजाकडून बोलतात. त्या नेत्याच्या वाढदिवसाला वृक्षारोपण, फळवाटप वगैरे करणारी जी मंडळी असते त्यात हे आघाडीवर असतात.
’पेशंट पेशंट, केळी.. सगळ्य़ांना केळी, सपरचंद काय महाग .. रुपया पडला म्हणे ..अ‍ॅ बापरे’
वास्तविक रुपया पडला म्हणजे नेमकं काय झालं हे पोटापुरती पुरेशी पेन्शन मिळवणार्‍या बापूंच्या गावी नसते. लोक म्हणतात ते आपणही म्हणायचे.
सामूहिक विवाह टाईप कार्यक्रम तर त्यांचा फेवरेट. त्याच्या आयोजन मिटींगला ते जातात. सोहळ्य़ाहून आल्यावर अशीच अगम्य वर्णनं करतात. त्यातून कुणीतरी भांडी, मंगळसूत्र आणि सफारी सूट मिळतो म्हणून कसं डबल लग्नाला उभे राहिले, यांनी त्यांना कसं शिताफीने पकडलं, मंत्री कसे लेट आले, प्रत्यक्ष जोड्या किती- दाखवल्या किती, वगैरे बहुमोल माहिती तुकड्यातुकड्यातून कळते.
’समाजसेवा.. या माध्यमातून.. आपलं काय. राहिले ४ ,६ वर्ष ...भजना पेक्षा कार्य कार्य.. काय? ..अ‍ॅ बापरे’
’बेटी बचाओ’ टाईप कार्यक्रम असेल तर ते भाषण वगैरे पण देतात. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी या तिघींची नावे घेऊन झाली की
’आज या समाजात.. मुलं फारेन.. आयटी का फायटी.. अग्नीला पोचतो का..मग जवाई मुल्गाच दुसरा.. कुस्ती...पोलीस.. रनिंगमध्ये मेडल पोरीलाच. ती आपली ही जिंकली नं..कप कप.. शिकवा खूप.. अ‍ॅ बापरे’
त्यांना मेडलवाल्या पोरी, स्पर्धेचं नाव, क्रीडाप्रकार वगैरे लक्षात असणं अशक्यच. इंग्लीशशी तर ३६ चा आकडा. स्वत:च्या पोरींना मात्र यांनी जेमतेम बारावी आटोपून उजवलेलं. मुलींना साध्या शाळेत आणि मुलाला खास कॉन्व्हेंटला शिकवलेलं. वंशाचा दिवा म्हणून फक्त मुलासाठी डिंकाचे लाडू करणारं यांच घर. तरी पोरी सुस्थळी नांदत पुढे शिकल्या आणि बापूंची छाती फुगायला कारण झाल्या.
तर अशा सगळ्या इव्हेंटचे फोटो काढून घेऊन ते छापून आणणे, मग तो पेपर काखोटीला मारुन चार घरी तो फोटो दाखवणे आणि कृतकृत्य होणे हा त्यांचा एक छंद आहे. कुणी कौतुक केले की
’ख्या ख्या.. उगीच आपलं हो.. समाजाच्या माध्यमातून.. प्रेम प्रेम  ..लोकांच प्रेम इतकं...अ‍ॅ बापरे’.

आता इतके भरीव कार्य करणार्‍याच्या वाढदिवसाला चार लोक ’हारार्पण’ करायला येणारच. त्यादिवशी बापू गुळगुळीत दाढी करुन, करकरीत कुर्ता घालून लोडाला टेकून बसतात. एखाद दुसरा गडी बुके घेऊन येतोच कारण चहानास्ता भरपूर उपलब्ध असतो. बुके घेतानाचा फोटॊ महत्वाचा.
’घ्या खा खा.. निमित्त निमित्तमात्र.. हॅ हॅ..बुके कशाला कशाला.. मिठाई पण.. अ‍ॅ बापरे’
मुलामुलींनी त्यांची सत्तरी जोरदार केली. भरपूर पाहुणॆ, हॉल, रोषणाई. जेवणाआधी भाषणं. त्यांचा जन्म ऑगस्टमधला म्हणून एका मित्राने त्यांना थेट क्रांतीसूर्य हे महान बिरुदच बहाल करुन टाकलं. मोठा केक त्यावर ७० मेणबत्त्या आणि मोठी सुरी. बर्थडे सॉंग वाजू लागले. बापू नाचू लागले. नातवंड ओरडली ’केक केक’. बापूंनी करवतीसारखी सुरी दोन्ही हातात धरुन केक कापायला सुरुवात केली. तोच मुली ओरडल्या, पप्पा फुंका. ५,७ मेणबत्त्या फुंकेतो बिचार्‍यांना धाप लागली. मग बाकी काम इतरांनी केले. बापूंनी भाषण केले. एरवी ते काय बोलतात हे बहुतेकांना कळत नाही त्यात भरुन आलेले डोळे आणि मन, धाप लागल्याने वेगाने घेतलेला श्वास यामुळे ते काय बोलतायत ते अजिबातच कळेना.
’जीवनाची जाणीव, उणीव की जाणीवेतलं जीवन.. बास बास.. इतिकर्तता.. शंभर वर्ष.. नको नको..अ‍ॅ बापरे’ इतकच कळलं. इतिकर्तता म्हणजे इतिकर्तव्यता असे असावे.
कोणत्यातरी सरकारी योजनेच्या अंतर्गत घराशेजारच्या खोलीत २ शिवणयंत्रे ठेवून त्यांनी २ गरजू बायकांना कामाला लावले. पुढे त्या बायका कंटाळून सोडून गेल्या तरी त्या रिकाम्या खोलीत सगळया शासकीय जयंत्या मयंत्या साजरा झाल्याच्या बातम्या बापू बिनदिक्कत छापायला पाठवून देत. त्यात कोणी भाषणात काय म्हटले याचे अजब वर्णन असे. नातलग बायकांची नावे ते अमकीने प्रस्तावना केली, तमकीने आभार मानले म्हणत छापत त्यामुळे पेपरात नाव आल्याच्या आनंदापोटी कुणी आक्षेपही घेत नसे. या बातम्यांच्या बळावर त्यांनी एक दोन पुरस्कारदेखील पदरात पाडून घेतले.

इतके सगळे करुनही समाजात आपल्याला हवे तसे स्थान अद्याप मिळाले नाही. मोठॆ मंत्री संत्री आले की आपल्याला शेवटच्या रांगेत बसावे लागते याची बापूंना रुखरुख असावी. शेतकर्‍यांसाठी काही तरी केल्याशिवाय हे घडणार नाही या भावनेतून ते एखाद्या मधल्या फळीतल्या स्वघोषित नेत्याला पकडून ते लगतच्या खेड्यात जाऊन शेळीपालनावर अगम्य भाषेत भाषणे देऊ लागले. मग त्यांनी एक लेख लिहिला आणि तो कसा लिहिलाय हे पाहा म्हणाले. त्यात शेळीपालनाचे फायदे १) शेती व्यत्रिक्त भरपूर कमाई २) पैसा खेळतो ३) मुलीचे लग्न ४) दारात गाडी
असे लिहिले होते. नशीब लेखात ’अ‍ॅ बापरे’ नसते. शेळीपालनामुळे मुलीचे लग्न कसे जमेल असे विचारायचे नाही. बापूंचे लॉजिकच खतरनाक. तो लेख अर्थात सर्व पेपरनी नाकारला. बापू खट्टू झाले पण तोवर त्यांना म्हशीचे दुधाचे उत्पादन वाढवणारी भुकटी विकणारा एक विक्रेता भेटल्याने ते आता त्या ’प्रकल्पा’त व्यस्त आहेत. ते ही जमले नाही तर आता निवडणुका येतीलच मग ’कार्यकर्ता.. प्रचार.. वेळ.. वेळ कुठे.. अ‍ॅ बापरे’
आयुष्यात धड कोणतीच क्रिया न केल्याने क्रियापदं त्यांच्यावर रुसली असावीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ती गायब असतात.

असे असले तरी बापू मनाने सरळ आहेत. आयुष्यात कुणी दिशा न दिल्याने वेळ घालवायची साधनं शोधतायत. लोकेषणेत मन रमवतायत. एके काळी मुलींवर अन्याय केला असला तरी सुनेला मात्र लेकीसारखे वागवतात. कुणाचे भले केले नाही तरी कुणाचे कधी वाईट करत नाही. म्हणून त्यांनी ’गाळलेल्या जागा’ भरत का होईना  बापूंशी संबंध आणि संवाद टिकवून ठेवासा वाटतो.

Sunday, September 11, 2011

जयू


केव्हाही फोनवर विचारलं- ‘कशी आहेस?’ की खळाळून हसत तिचं उत्तर येतं- ‘मज्जेत." या वेळी म्हणाली ,"सध्या .......  कॉलेजला सीएचबी वर अर्थशास्त्र शिकवतेय सिनीयर कॉलेजला. ........ मध्ये पण शिकवायला बोलावतायत. पण इथेच पर्मनंट व्हायचा प्रयत्न करतेय,". जयू आणि प्राध्यापिका? कल्पनाशक्तीला प्रचंड ताण दिला तरी हे दृश्य नजरेसमोर येत नाही. 

एकच शाळा आणि जवळच राहत असल्याने जयूची ओळख सहावी-सातवीत असताना झाली असली तरी त्याआधीही जयू आणि तिची बहीण तिच्या आजोबांसह शाळेत जाता-येताना दिसत असत. त्या दोघी टम्म फुगलेल्या पाणीपुरीसारख्या गोलमटोल! घट्ट वेण्या- वर रिबीन लावून बांधलेल्या! कधीतरी जातायेता बोललो आणि मग रोजच शाळेत बरोबर जायला लागलो. ती मला एक वर्ष सिनीयर. भन्नाट प्रकरण.
संध्याकाळी आम्ही मुलं-मुली दोन टीम करून खेळत असू. खेळताना भांडणं झाली तर जयू मुलांशीही बिनधास्त मारामारी करत असे. भांडण आटपून घरी जाताना वळून पाहत ती ‘जा रे भाजक्या वांग्या, ए कोबीगड्डय़ा’ अशी खास विशेषणं वापरत असे. मस्तमौला म्हणतात तसं हे प्रकरण होतं. अभ्यास वगैरे करण्यात आयुष्यातले अनमोल क्षण ती व्यर्थ दवडत नसे. वाचनाचा तर तिला प्रचंड कंटाळा. फॅन्टम, चाचा चौधरी वगरे कॉमिक्स मी ‘धडाम, फटॅक’ अशा ‘साऊंड इफेक्ट’सह वाचायचे आणि तिने फक्त चित्रे पाहायची. पण त्यातली एखादी चौकट सुटली तर मात्र ती लोडाला टेकून ‘हे राहिलंय’ म्हणून सांगायची.
कलाकुसरीच्या वस्तू ती सुंदर करायची आणि आईला मदतही. तिला सातवी-आठवीतच सगळा स्वयंपाक करता यायचा. तिची ताई असेल तिच्याहून तीनेक वर्षांनी मोठी. गरीब गाय. बाबा रेल्वेत ऑफिसर. अगदी कडक स्वभावाचे! पानातली पोळी गरम नसली तर ताडकन् उठून जाणारे! ती त्यांना नीट सांभाळून घेत असे. आईला रक्तदाबापासून अनेक विकार. त्यात सतत काळजी करण्याचं व्यसन. सकाळ झाली की ‘आज पाणी येणार की नाही,  ‘कामाला बाई येणार की नाही!" काळज्या सुरु. जयूला भाऊ नसल्याने आणि तिचे बाबा दिवसभर कामामुळे बाहेर असल्याने आम्हा मैत्रिणींचा अड्डा तिच्याच घरी असायचा. पत्ते, कॅरमपासून अंगणातल्या शिवाशिवीपर्यंत, डब्बापार्टीपासून एकत्र सर्कस, सिनेमा पाहण्याच्या प्लॅनपर्यंत सारे काही तिच्याचकडे होई. प्लॅन आखणे, ते सर्वाच्या गळी उतरवणे आणि त्याला लागणारे पैसे प्रत्येकीकडून विनासंकोच मागून घेणे, यांत ती तरबेज होती.
जयू सिनेमा फारच दंग होऊन पाहायची. ‘ये तो खुशी के आसू है पगले!’ यासारखे अपेक्षित डायलॉग ती स्वत:च जोरात खिदळत म्हणायची. परंतु मागून कोणी बोलत असेल तर त्यांना ‘अहो, आम्ही तुमचे डायलॉग ऐकायला नाही काढलं तिकीट!,’ असे खुशाल ओरडायची. 
रस्त्याने जाता-येता भेटणाऱ्या प्रत्येकाशी (सर्वाबद्दल ती ‘अपडेट’ असे!) हसून बोललेच पाहिजे, असा तिचा दंडक होता. शिवाय ती त्या- त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीप्रमाणे विषय काढत असे. उदा. संसारग्रस्त बायकांना- ‘काय काकू, झाले का पापड?’, तर लहान मुलीला- ‘ए मश्त आहे हं ड्रेश तुझा!’ आणखी मोठय़ा मुला/मुलीला ‘कधी आहे परीक्षा तुझी?’ अगदी डॉक्टरांनाही- ‘त्या अमक्याला अपघात झाल्याचं कळलं का? मुंबईला नेलंय!’अशी माहिती पुरवत असे. वय, जात,लिंग, दर्जा अशी कोणतीही गोष्ट तिच्या या संवादाआड येत नसे. या संवादकौशल्यामुळे ती कुणाही अनोळखी व्यक्तीचं अख्खं खानदान माहीत करून घेई. 

शेजारी वा ओळखीचे किल्ली त्यांच्याकडे ठेवून गावाला जात. ते परतायच्या दिवशी ही त्यांच्या घरी पाणी भरून ठेवी. कधी पोळ्याही करून ठेवी. गावाहून आल्यावर दमलेली असते बाई- याची तिला त्या वयातही जाण होती. (या तिच्या सवयीवर फिदा झालेलं एक घर आता तिचं सासर आहे. असो.) पुलंच्या ‘नारायण’सारखी ती मदत करी. पण ‘परोपकारी गंपू’सारखी निरपेक्ष नाही; तर तिला त्याची पावती कौतुकरूपाने हवी असायची. ‘त्यांनी नंतर तुला साधा चहाही विचारला नाही,’ म्हणून चिडवले की- ‘आपल्याला नसतेच अपेक्षा! पण पद्धत म्हणून काही असते की नाही?,’ म्हणत जयू फणफण करणार! शिवाय पुढच्या वेळेस- ‘चिकाची चव पण दिली नाहीत तुम्ही. या वेळेस मात्र विसरू नका,’ असं सरळ त्यांना सुनवायलाही ती कमी करायची नाही.
कॉलेजमध्येही ती गुटगुटीतच दिसे. त्यावरून ‘काय झालं, बाळ रडत होतं..’ असं ग्राईप वॉटरच्या जाहिरातीतल्यासारखं कुणी चिडवू लागलं की ‘एक कानाखाली दे त्याला,’ असं सणसणीत प्रत्युत्तर ती देत असे. पण त्यातल्याच एखाद्याशी नंतर तिला बोलताना किंवा नोट्सची देवाणघेवाण करताना पाहून मी थक्क होत असे. ‘एकटा मुलगा वाईट नसतो. पण ग्रुपमध्ये उगाचच तो असं वागतो,’ असं मानसशास्त्रीय कारण ती तेव्हा देई. रविवारी आम्ही तापीवर फिरायला जात असू तेव्हा ‘वाचलेल्या पुस्तकातल्या गोष्टी सांग,’ अशी तिची फर्माईश असे. तिला शेरलॉक होम्सच्या किंवा मतकरींच्या भयकथा आवडत. त्याच मग ती रंगवून इतरांना सांगे. रोजचा पेपरही ती वाचत नसे पण  एकदा तिच्या कॉलेजमधली मैत्रीण अद्याप मी पु.लं वाचलेच नाहीत म्हणाली, तेव्हा ही मला डोळा मारत तिला म्हणाली..."अय्याss तू पु.लं वाचले नाहीस, मग जगण्याला अर्थ काय तुझ्या!!"

आम्ही काही दिवस समितीची शाखा घेत असू. तेव्हा तिच्या नेतेगिरीला रंग चढे. ती गायचीही छान. आमचे समितीत जाणे पुढे जमेनासे झाले तरी एक काकू आम्हाला पकडून नेहमी काहीतरी गळ घालत. त्या येताना दिसल्या रे दिसल्या की ही ‘खतरा’ असं ओरडून मला ओढत दिसेल त्या घरात शिरे. आणि त्या दिसेनाशा होईपर्यंत त्या घरी गप्पा ठोकीत बसे. (ते घर अर्थातच तिच्या ओळखीचे असे.) सार्वजनिक गणपती आणि नवरात्रात ती घरी सापडत नसे. रांगोळी काढण्यापासून महाप्रसादात वाढण्यापर्यंत, काकडआरतीपासून दांडिया खेळण्यापर्यंत सगळ्यात ती पुढे. गुलालात माखून मुलांमध्ये ती बिनधास्तपणे वावरत असे. गणपती उत्सवातील एका फॅन्सी ड्रेस स्पध्रेत तिने ‘वेडी’ची भूमिका केली होती. गर्दीतून स्टेजवर तिने अशी काही एन्ट्री घेतली, की अर्ध्या प्रेक्षकांनी दचकून किंकाळ्या फोडल्या. निवडणुका आल्या की आमच्या प्रभागातल्या आवडत्या उमेदवाराचा अगदी हिरीरीने प्रचार करायची आणि तो निवडून आल्यानंतर त्याच्या विजयमिरवणुकीत गाडीच्या टपावर त्याच्या शेजारी बसून वगैरे v ची खूण करत असे. (प्रभागातल्या सगळ्यांची खरं म्हणजे त्या उमेदवारापेक्षाही तिच्याशी जास्त ओळख असावी) मी तिला गंभीरपणे यात करिअर कर असे सुचवित असे. त्यावर "जाऊ दे ग, आम्ही मागून सतरंज्या उचलण्यातच हुशार" असे ती म्हणे.

एकदा कशावरून तरी तिला प्रचंड हसू आलं म्हणून गल्लीच्या कोपऱ्यावर खुशाल पोट धरून गुडघे खाली टेकवून हसत बसली. वर बाजूने जाणाऱ्या स्कूटरवाल्याच्या चमत्कारिक चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, ‘जा- जा काका तुम्ही. मी अगदी नॉर्मल आहे.’ सामाजिक संकेत नावाच्या प्रकाराशी तिला घेणंदेणं नव्हतं. ज्या क्षणी जे करावंसं वाटेल ते ती बिनधास्त करी. मात्र, परीक्षेचा निकाल जवळ आला की ती मला चोरून गणपतीला प्रदक्षिणा घालत असे. एकदा तिला असं करताना पकडल्यावर ती उलट मला म्हणाली, ‘याने चांगला व्यायाम होतो." मी त्यावरून पुढे तिला खूपदा चिडवलं होतं. 
कधी मला पेरुची बर्फ़ी किंवा तत्सम नवा पदार्थ देई. ’दीड तास लागला आटवून करायला,"असे थकून म्हणे. मी तिला चिडवायला म्हणायचे ’या पेक्षा थेट नुसता गोड पेरूच का खाऊ नये...’ मग ती माझ्या अरसिकपणावर मला लेक्चर देई. कधी कुठल्यातरी ’चेन मार्केटिंग’ च्या जाळ्यात अडकून मला म्हणे ’ही पॉलिसी काढली ना तर आपल्याला अमुक जीबी जागा इंटरनेटवर फुकट मिळेल.’ मी विचारलं "बर, मग त्या जागेचं तू काय करणार? लोळणार की लोणचं घालणार?" की ती निरूत्तर होऊन कुरकूरत म्हणे ’मला वाटलंच तू टाचणी लावणार..." 
कुणाला मेंदी काढून दे, कुठले तरी मणी आणून वॉलपीस कर, टाकाऊचे टिकाऊ कर असं तिचं सतत सुरू असायचं. ’तुझ्या वाचनाने फक्त तुला आनंद मिळतो पण अशा वस्तूंमुळे करणार्‍या आणि पाहणार्‍या दोघांनाही आनंद मिळतो’ असा तिचा बिनतोड युक्तीवाद असायचा. मी पुढे शिकायला बाहेर गेले तरी संपर्क होताच, घरी आले की मी आधी तिच्याकडे धाव घेई. एरवी ती मला तिच्या सुंदर अक्षरात आमच्या ’कोड’ भाषेत (अगदी प्रत्येक व्यक्तीच्या टोपणनावाचा वापर करून) लांबलचक पत्रे लिहायची. त्यात,’ राजीव गांधी कित्ती स्मार्ट दिसतो,नाही! ” इथपासून कोणाकडे लग्न ठरलं, तिने केलेलं रुखवत कसं सगळयांना आवडलं इथपर्यंत किंवा बप्पी लाहिरी चे ’मामामिया पॉम पॉम’ ह्याला काय गाणं म्हणतात का, या संतापापासून ते तिच्या कॉलेजच्या निवडणुकीतील राजकारणापर्यंत ’anything under the sky', मजकूर नुसता गळत असे.

जयूच्या बाबांना प्रथम वर्गाचा रेल्वेचा पास मिळे. प्रवासात ते त्यांचा लाडका पामेरिअन कुत्राही सोबत घेऊन जात. एकदा ती, तिची आई, आजी आणि हे श्वानमहाशय असे चौघे तिच्या काकांकडे निघाले होते. या सर्वाचे पास होते, पण आजीचे तिकीट काढायचे राहिले होते. हे लक्षात येताच जयू पळत गेली. तोवर इकडे गाडी सुटली. धावत येऊन कशीबशी तिने गाडी पकडली खरी; पण फलाट संपताना तिला बाकीची मंडळी खालीच चक्रावलेल्या अवस्थेत उभी असलेली दिसली. झाले! तिने गाडीची साखळी ओढली. गाडी थांबताच खाली उडी टाकून ती फलाटाकडे धावली. टी. सी. आणि रेल्वे पोलिस तिच्या मागे. त्यांना तिने ‘मेरा कुत्ता नीचे रह गया था,’ असे कारण सांगताच त्यांनी ‘ट्रेन क्या तुम्हारे.. ’ म्हणून ओरडायला सुरुवात केली. हीऽऽ गर्दी जमली. काकांच्या (तिचे बाबा) ओळखीच्या अधिकाऱ्यांमुळे तिची यातून कशीबशी सुटका झाली. 

एके दिवशी रेल्वेस्टेशन कॅन्टीनवर भरदुपारी काही गुंडांनी हल्ला केला. कॅशच्या चाव्या देण्यास नकार दिल्याने जयूच्या बाबांना त्यांनी चांगलीच मारहाण केली. मुंबईला काही दिवस त्यांना उपचार घ्यावे लागले. शिवाय कोर्ट केस! तशात त्यांची बदली झाली! काकूंना आधीच बरेच आजार होते. या प्रसंगानंतर तर अतिताणामुळे त्या गेल्याच. अशातच ताईचे लग्न होऊन ती प्रसूतीसाठी माहेरी आलेली. काका आधीच धक्क्यात. मदतीला जवळचे कुणी नातेवाईक नाहीत. अशावेळी जयूच्या खंबीरपणाने आम्ही थक्क झालो. आम्ही मैत्रिणी आणि तिने मिळून घर सावरलं. आपल्या धाकटय़ा असण्याचा बाऊ न करता ती माय, मावशी सगळं काही झाली.  घरातल्या कामांप्रमाणेच ती बाहेरचं कोणतंही काम बोलक्या स्वभावामुळे आणि ओळखींमुळे सहज करून टाकी. काम होत नसेल तर आत शिरून थेट मुख्य साहेबांशी बोलायलाही ती भीत नसे. स्वत:बरोबर ‘लगे हाथ’ इतरांचीही कामं करू देई. अगदी पोस्टात जातानाही ती शेजारीपाजारी विचारी- ‘टाकायचंय का काही पत्र?’ मोलकरणीकडचे लग्न असो, कॉन्व्हेंट शाळेतील जुन्या मत्रिणी / रेल्वेतील ख्रिश्चन मंडळींची ख्रिसमस पार्टी असो वा एखाद्या घरचे कुळाचार, मावंद- ती घरचं कार्य असल्यासारखी आपुलकीने व सहजतेने वावरे.

काकांनी आता जयूसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. ते भारी स्थळे पाहत. तेव्हा जयू म्हणायची, ‘यांची मुलगी बीकॉम सेकंड क्लास आणि जावई शोधताएत लॉर्ड फॉकलंड! रेल्वेतला नवरा हा तिचा ‘मि. राईट’ होता. का, तर प्रवासाला वर्षातून तीन पास आणि सहा पीटीओ मिळतात म्हणून! एखाद्या मुलाच्या (स्थळाच्या) घरी गेल्यावर तिचे ‘गृहकृत्यदक्ष्यत्व’ ठसवायला काका चक्क तिलाच चहा करायला सांगायचे. ती (आयुष्यात प्रथमच पाय ठेवलेल्या त्या घरात) वैतागून चहा करायची. पण लाजण्याबिजण्याच्या भानगडीत न पडता उलट त्या मुलाकडच्यांचीच मुलाखत घ्यायची. जणू काही जयूच त्या मंडळींना ‘बघायला’ आली आहे.
नंतर मात्र जयूने एका मैत्रिणीच्या भावाशी (रेल्वेशी प्रतारणा करून) प्रेमविवाह केला. सासर घरालगत होतं, म्हणजे बाबांची काळजी नाही. ती त्यांच्या मुलाच्या भूमिकेत शिरली. ज्यांच्याशी जमलं नाही त्यांच्याबद्दलचा राग वा विषाद तिच्या शब्दांत चुकूनही कधी डोकावत नाही. लग्नानंतर तिने आपलं वजन उतरवलं. सटरफटर नोकऱ्याही केल्या. पुढे मुलगी झाल्यावर मुलीसाठी वेळ हवा म्हणून नोकरी हा विषय बाजूला सारला. नवऱ्याच्या प्रोत्साहनाने तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं ,अर्थशास्त्राची तासिका तत्त्वावर प्राध्यापिका झाली! परंतु कायम केलं नाही तर सरळ शिक्षिका होईन शाळेच्या मुलांमध्ये रमेन म्हणायची. विद्यार्थ्यांचा उत्तम फीडबॅक तिनं मिळवला. 
मधे फोनवर सांगत होती ’पी एच. डी करायच म्हणतेय.....’.तिने ग्रामीण बॅंकेपासून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपर्यंत कोणताही विषय घेतला तरी मला धक्का बसला नसता (त्यासाठी थेट ओबामाना भेटायलाही ती बिचकणार नाही. ती त्या मुलाखतीत विनोद करून त्यांना ’द्या टाळी’ सुद्धा म्हणेल आणि व्हाईट हाऊसच्या किचनमधे जाऊन चहा सुद्धा करून आणेल असे मी तिला गमतीने म्हणायचे. ’न्यूनगंड’ नावाचा शब्दच तिच्या डिक्शनरीत नाही.) मला आश्चर्य वाटतं ते याचं की तिचा हा कायापालट काही एका रात्रीत झालेला नाही, हे सगळ तिच्याआतच कुठेतरी विस्कळीत रूपात दडलेलं होतं पण तिला ते गवसत नव्हतं. अर्थात ही नवी ती मला जितकी भावते तेवढीच आधीची ती ही प्रिय होती...कारण आतून ती अजूनही तश्शीच आहे. ’परवाच्या अर्थसंकल्पावर मत काय मॅडम आपले?’ अशी मी चेष्टा करताच ’मी फक्त चॅनेल्सना ’बाईट’ देते’ असे म्हणत हसत होती. 

सगळ्या जगात मी तिला सर्वात जास्त ओळखते असे ती माझ्याबद्द्ल नेहमी सांगते. पण ती तिला स्वतःला तरी कुठे ओळखू शकली होती! मी बाहेरुन तिचा कोषातून बाहेर पडण्याचा प्रवास पाहिला, तिच्या आत मात्र एक निसर्गदत्त फुलपाखरु सतत भिरभिरताना दिसायचं.
कृत्रिम मुखवटय़ांच्या आजच्या जगात दुर्मीळ असलेलं जयूचं निखळ हास्य, ‘कोण काय म्हणेल?’ याचा निरर्थक विचार न करता संवादाच्या पुलाने, मदतीच्या हाताने जग जोडून.. खरं तर स्वत:कडे ओढून घेण्याच्या तिच्या स्वभावामुळे ती मला जास्त प्रिय आहे. तिच्यातल्या उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या उसळत्या कारंजात तिच्या सहवासातला प्रत्येकजण तसाच चिंब होऊन जातो. आजची एका मुलीची आई असलेली जयू.. आतून अजूनही तश्शीच आहे! प्रफुल्लित, पारदर्शक आणि कायम मज्जेत!! माझ्या मनातले बरेच ’जीबी’ तिने कायमचे व्यापलेत आणि (तिच्या परवानगीने) आमच्या मैत्रीच्या पॉलिसीमुळे,आज इंटरनेटवर हे काही ’के.बी’ तिच्यासाठी.......!! 
०८/०९/२०११
---------------------------
लोकसत्ता- लोकरंग ’सर्किट’ सदरात प्रसिद्ध झालेला लेख
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181045:2011-09-08-10-59-48&Itemid=1

---------------
वरचा लेख २०११ सालचा आहे. लोकसत्तेला याचं संपादित व्हर्शन पाठवण्याआधी तिला फोन केला. तुला आधी वाचायला पाठवू का, विचारलं. ती म्हणाली, "तू लिहिला आहेस नं, बस. मग आता थेट पेपरमध्येच वाचेन" मला नि:शब्द केलं तिनं. लेख प्रसिद्ध झाला त्यादिवशी काय काय प्रतिक्रिया आल्या ते नंतर मला फोनवर भरभरून सांगत होती.
दरम्यान आमची तशीच मस्ती, गप्पा कधी प्रत्यक्ष भेटीत, कधी फोनवर सुरु होत्या. 
१७ डिसेंबर २०१७ -  शाळेतले काही जण भेटणार होतो म्हणून एका वर्गमित्रासह आधी  जयूकडे गेले मग तिच्यासह आम्ही शाळेत गेलो. कॉलेजमध्ये सीएचबी शिकवायचा कंटाळा आल्याने जयूने आमचीच शाळा जॉइन केली होती. मुलं ख्रिसमसपूर्व स्पर्धांच्या तयारीत होती. जयूभोवती "मिस मिस प्लिज सी धीस" करत गराडा घालत होती. मी निघताना मला म्हणाली, "उन्हाळ्यात मुलांना घेऊन माहेरी जाणार असशील तर माझं आणि मुलीचंही रिझर्वेशन कर. काकूला सर्प्राईज देते." 
मी २०१८ च्या फेब्रुवारीच्या १ तारखेला म्हणजे दीडच महिन्यानी तिला फोन केला , रिझर्वेशन करतेय, करु नं तुमचंही. तर म्हणाली, "नको करूस. माझ्या सासूबाईंना बरं नाही, मलाही बरं नाही पण काळजीचं कारण नाही. किडनी स्टोनचंच आहे काहीतरी. औषध घेते आहे. पुढच्या वर्षी नक्की येईन" मी ट्रीटमेंटचं नीट विचारून नाराजीनेच फोन ठेवला. 
दोन दिवसांनी एका वर्गमित्राचा ,ज्याला जयू राखी बांधत असे, फोन आला - जयू गेली. विश्वास बसेना. आपली जयू ?
तो हो म्हणाला. मी ताबडतोब निघाले. पुढचं सगळं निरर्थक आहे. ती आता या जगात नाही एवढंच सत्य आहे.