#Sakal #या_जगण्यावर #ध्यासपंथ
वांगणी रेल्वे स्थानकाच्या दिशेने एक गाडी धडाडत येते. अंध आईचा हात धरुन चालणारं एक मूल अचानक फलाटावरुन रुळावर पडतं. तेवढ्यात त्या रुळांवरुन मयूर शेळके धावत येतो. झपकन त्या मुलाला उचलून फलाटावर टाकतो आणि त्याचा जीव वाचवतो. हे कमी की काय म्हणून रेल्वे प्रशासनाने दिलेल्या ५०,००० रु.च्या बक्षीसातले निम्मे पैसे तो त्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देतो. नॅन्सी मिस्त्री ही सुरतची परिचारिका कोरोनाबाधिंताच्या सेवेच्या आड आपले गरोदरपण येऊ देत नाही. मागच्या लाटेत पोटचा पोर गमावलेले अहमदाबादचे मेहता मुलाची १५ लाखांची एफडी इतर रुग्णांच्या उपचारासाठी वापरतात. नागपूरचे ८५ वर्षांचे दाभाडकर तर ’आपलं जगून झालंय, इतरांचं सगळं बाकी आहे’ या समर्पण भावाने रुग्णालयातला स्वत:चा बेड देऊन टाकतात आणि अनंतात विलीन होतात. किती उदाहरणं द्यावी! यांच्या दर्शनाने विझू लागलेलं समाजमन उजळून निघतं. जगाला समपातळीवर आणणार्या या आपत्तीने आपलं बरंच काही हिरावून नेलं असलं तरी आपल्याजवळही देण्यासारखं खूप काही शिल्लक आहे हे जाणवू लागतं.
कोरोनाच्या तडाख्यामुळे मनावर चरे उमटत असतानाही जगणं थांबलेलं नाही. धावत सुटलेल्या जगाला या आपत्तीने स्वल्पविराम मात्र दिला. अंतर्मुख केलं. आपल्या खर्या गरजा किती, खरी नाती कोणती आणि आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काय याचा विचार करायला भाग पाडलं. निसर्गचक्र मंदावलं नाही. भुई भेगाळली तरी पळसाला नेहमीसारखाच लालबुंद फुलोरा आला. नियमांच्या बंधनात का होईना विवाहासारखी मंगलकार्य, इवल्या जीवांचं आगमन सगळं अव्याहत सुरु राहिलं. वठलेल्या खोडातून बाहेर डोकावणार्या कोवळ्या पोपटी पालवीसारखी माणसाची जीवनेच्छा टिकून राहिली. कुणासाठी ती केवळ तग धरुन राहिली तर कुणासाठी ती पुन्हा तरारुन वर आली. बहरत राहिली. काय वेगळेपण असावं या दुसर्या प्रकारच्या माणसांचं! सिग्मंड फ्रॉइडने म्हटलं होतं, "वेगवेगळ्या विचारांच्या, कुवतीच्या काही माणसांना एकत्र करा आणि उपाशी राहायला लावा. भुकेच्या वाढत्या तीव्रतेबरोबर सगळे आव, भेद गळून पडतील, माणसं एका स्तरावर येतील आणि उरेल फक्त भूक!!" याउलट स्वतःवर विश्वास असलेली, खर्या अर्थाने सुजाण असणारी, जगण्याचा उद्देश गवसलेली माणसं अत्यंत प्रतिकूल स्थितीतही सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहू शकतात, मार्ग शोधू शकतात, स्थिरचित्तपणे निर्णय घेऊ शकतात हे ’लोगोथेरपी’चे जनक डॉक्टर फ्रँकल यांनी दाखवून दिलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या अमानुष छळछावणीतून बाहेर पडल्यावर अशी माणसं निराशेच्या गर्तेत तर गेली नाहीच, त्यांनी अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला.
गीतेतल्या ’कर्मयोग्या’च्या व्याख्येत चपखल बसणार्या अशा नि:शंक लोकांमुळे आपली जगण्यावरची श्रद्धा अबाधित राहते. ही माणसं स्वतःच स्वतःची प्रेरणा असतात, ती इतरांना नकळत बळ देतात, दिशा देतात. उसवलेलं जग माणुसकीच्या धाग्याने सांधत जातात. त्यांची नावं सोनू सूदपासून रतन टाटांपर्यंत काहीही असू शकतात. कधी ही माणसं निनावी असतात. त्यांच्या बातम्या येत नाहीत. वैद्यकीय, वित्तीय, सुरक्षा विभागातले जिगरबाज कोरोना योद्धे, प्रयोगशील शिक्षक, जेवणाची सुट्टी न घेता ऑक्सीजन रिफील करणारे कामगार, हाडाचे संशोधक, तळमळीचे समुपदेशक, प्रेक्षकांचं मन रमवणारे सर्जनशील कलाकार, धडपडे क्रियाशील उद्यमी, निरपेक्ष समाजसेवक, अपरात्री देखील ओ देणारे मित्र, हतबल न होता कोंड्याचा मांडा करणार्या गृहिणी अशा कोणत्याही रुपात ती भेटतात. त्यांच्या परिघात येणार्यांना लागण होते पण ती उर्जेची.
आपापलं उद्दिष्ट्य शोधून या मांदियाळीत प्रत्येक जण आपल्या परीने सामील होऊ शकतो. स्वत:च्या क्षमता तपासून एकमेकांच्या जगण्याला उमेदीचं तोरण लावण्याची संधी कोरोनाच्या संकटातही दार ठोठावते आहे. तिचं स्वागत करुया.
- मोहिनी
सकाळ सदर - या जगण्यावर May2021
लेख १