Showing posts with label निर्गुण. Show all posts
Showing posts with label निर्गुण. Show all posts

Monday, May 31, 2021

उष:काल

 


उष:काल #सकाळ #या_जगण्यावर

अथांग समुद्राकडे शांतपणे पाहत उभं राहिलं की मनात काय येतं! निसर्गाचं अद्भुत रुप पाहून आपण स्तिमित होतो. त्याच्या विराटपणापुढे आपलं खुजेपण जाणवून मूक होतो. मग लक्ष जातं सागराच्या भरती- ओहोटीकडे. त्यात प्रतिबिंबीत होणार्या सूर्याच्या उदय-अस्ताकडे. द्वैताच्या जगाकडे. आपल्याकडे रात्र अवतरु लागली असली तरी दुसर्या बाजूला दिवस उजाडतो आहे या सत्याकडे. दृश्य बाजू हेच तात्कालिक सत्य वाटत असलं तरी तेव्हाही विरुद्ध बाजू अस्तित्वात असतेच. या दोन्ही बाजू एकमेकींना पूर्णत्व देतात. द्वैत हा निसर्गाचा स्वभाव आहे. विश्वाचा नियम आहे. त्यामुळेच विश्वाचा तोल सांभाळला जातो आहे.
खेळात सुद्धा एका पक्षाची हार ही विरोधी पक्षाची जीत असते. साधर्म्य म्हटले की वैधर्म्य आलेच. आजार आणि आरोग्य, कटूता आणि गोडवा, दु:ख आणि आनंद, भीती आणि निर्भयावस्था, निर्मोह आणि मोह, पानगळ आणि पालवी, झोप आणि जाग ते अगदी मृत्यु आणि जन्म असं हे द्वैताचं अफाट जग आहे. नाणं एकच, बाजू दोन. प्रेम आणि द्वेष, मीलन आणि विरह, नायक आणि खलनायक या द्वैतभावाचा प्रत्यय व्यावसायिक चित्रपट सुद्धा देतात. नाहीतर फक्त चांगल्या माणसांनी भरलेल्या जगात बिचार्या हीरोला करण्यासारखं काही कामच उरलं नसतं. 'द डार्क नाईट' या गाजलेल्या चित्रपटात एक प्रसंग आहे. नायक बॅटमॅन आणि खलनायक जोकरची निकराची झुंज सुरु असते. निर्णायक क्षणी जोकर म्हणतो," मी तुला कधीच संपवू शकत नाही कारण तू नसशील तर मी करु तरी काय! You complete me." जोकरचा हा प्रसिद्ध संवाद एक चिरंतन सत्य सांगतो. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. मग या दोन प्रवृत्ती दोन व्यक्तींमध्ये असोत की एकाच व्यक्तीच्या अंतरंगात. त्या एकमेकींविना अपूर्ण आहेत. एकीशिवाय दुसरीच्या अस्तित्वाला अर्थ नाही. जसा दु:खाशिवाय सुखाला नाही किंवा अपयशाशिवाय यशाला नाही.

जगभरात ही द्वैताची संकल्पना वेगवेगळ्या प्रतीकांद्वारे मांडली गेली आहे. अर्धनारीनटेश्वर हे भारतीय संस्कृतीतले प्रतीक. पुरुष आणि प्रकृती ही सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेतील दोन भिन्न पण परस्परपूरक तत्त्वं. यिन-यांग हे उर्जेचं वर्तुळ म्हणजे द्वैताचं चिनी प्रतीक. त्यांच्या मान्यतेनुसार यिन हा भाग नकारात्मकतेचं तर यांग हे सकारात्मकतेचं द्योतक. विश्वाचं वर्तुळ इंग्रजी एससारख्या रेषेने विभागलेलं असून एका वेळी यापैकी एका बाजूचं वर्चस्व असतं, विरुद्ध तरीही परस्परावलंबी अशा या दोन्ही बाजू मिळून विश्वाची लय सांभाळतात, संतुलन राखतात असं ते मानतात. यांग या सृजनाच्या, आशेच्या भागात विनाशाचं, निराशेचं तर यिन या विनाशाच्या भागात सृजनाचं, आशेचं एक सूक्ष्म बीज बिंदूरुपाने दर्शवलेलं असतं. अगदी अशीच प्रतिमा कुसुमाग्रजांच्या कवितेत रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल अशा तेजस्वी शब्दात सामोरी येते.
द्वैताचा पूर्णत्वाशी म्हणजेच अद्वैताशी असलेला हा संबंध जसजसा उलगडत जाईल तसतसं आपल्या आयुष्यातल्या उलथापालथींना आपण संयतपणे, अधिक समंजसपणे हाताळू शकू. भयभीत झालेल्या सभोवतालाला This too shall pass हे सांगू शकू. ज्या परिस्थितीला आपण बदलू शकत नाही तिचा स्वीकार करण्याचं आपल्याला बळ मिळो, जी परिस्थिती आपण बदलू शकतो ती बदलण्याचं धैर्य लाभो आणि या दोन्हीतला फरक समजून घेण्याची शहाणीव आपल्यात निर्माण होवो, ही चित्तशांती प्रार्थना आपल्या मनात रुजवू शकू. आपल्याला निवडीचा नसेल पण प्रयत्न करण्याचा अधिकार अवश्य आहे. पृथ्वीवर आपल्या बाजूला सध्या अंधार आहे, नंतर नियमानुसार प्रकाश येईलच, तो येतोच पण म्हणून वाट बघत न बसता माणसाने वीजेचा शोध लावलाच नं!
नाणं आत्ता आपल्याला हव्या त्या बाजूला पडलं नाही तरी द्वैताच्या जगाच्या संकेतानुसार 'अपना टाईम आयेगा' हे नक्की. त्यासाठी प्रयत्नवादाच्या हाताने नाणेफेक मात्र करत राहावी लागेल.

Monday, May 24, 2021

मनात घर करणारं घर

 


मे महिना म्हटलं की हमखास आजोळचं घर डोळ्यासमोर येतं. मामाने गाव बदललं. माया तीच असली तरी लहानपणच्या उन्हाळी दिवसांचा मनाला थंडावा देणारा आठव आजोळच्या, आता अस्तित्वातही नसलेल्या, जुन्या घरातच अजून अडकून पडला आहे. अंगाखांद्यावर अशा आठवणी खेळवणारी वास्तू कधी ना कधी थकते, खचते, संपते पण आयुष्यात कितीही स्थित्यंतरं झाली तरी मनात घर करुन कायम राहते. आजूबाजूच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जगाशी आपली नाळ जुळवून ठेवण्यासाठी, आपलं अवकाश शोधण्यासाठी आपण कधी हौसेने तर कधी नाईलाजाने घरं बदलत जातो. नोकरी, व्यवसाय, बदलतं सामाजिक स्थान, हिस्सेवाटे, बदली, विवाह, वार्धक्य, आपत्ती... ज्याची त्याची कारणं वेगळी असतात. स्वत:चं घर उभं करण्यात उमेदीची बरीच वर्ष निघून जातात. अखेर ते हाती येतं पण तोवर त्यातल्या पिल्लांना आपापल्या घरट्यांचे वेध लागलेले असतात.

नुकत्याच येऊन गेलेल्या वादळात कष्टाने उभे केलेल्या अनेक घरांचे पत्रे उडून गेले. जुजबी सामान सामावून घेणार्या नुसत्या चार भिंतींचे छपराविना उजाड फोटो बातमीसोबत होते. ते पाहून पोटात तुटलं. जग दुरावलं तरी घराचा आधार माणसाला आश्वस्त करत राहतो पण संकटाच्या थैमानाला बाहेर थोपवून धरणारं ते घरच कोलमडतं तेव्हा सावरणं कठीण होतं. गेल्या वर्षभरापासून आपला बहुतेक काळ घराच्या कुशीत व्यतीत होतो आहे. अशा विदारक परिस्थितीतही साथ देणारं घर, मग ते लहान- मोठं, टुमदार- अलिशान कसंही असो, त्याचं स्थान थेट आपल्या काळजात असतं. तिथे आपली वाट पाहणारं, आपलं यश साजरं करणारं, अपयशाच्या क्षणी जवळ घेणारं, कुणी तरी असतं. गंमत म्हणजे आपल्या राहत्या घरावर आपलं इतकं प्रेम असलं तरी आपलं स्वप्नातलं घर मात्र बर्याचदा वेगळच असतं. अगदी सरसकट वर्गीकरण नाही करता येणार पण गावातल्या बहुतेक लोकांना आटोपशीर अपार्ट्मेंटचं अप्रूप असतं तर शहरातल्या बहुतेकांना खेड्यामधले घर कौलारु साद घालत असतं. चंद्रमौळी घरांबद्दल त्यांच्या मनात एक रोमँटीसीझम असतो. पण चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या छपरातून चंद्र, चांदणं दिसतं, म्हणजेच ज्याचं छत फाटकं आहे असा अर्थ लक्षात येतो तेव्हा मनात चर्र होतं.
केरळमध्ये प्रवास करत असताना असंच एक स्वप्नातलं घर प्रत्यक्ष पाहिलं होतं. एखादं देखणं निसर्गचित्रं सजीव होऊन समोर यावं तसं. नदीला अगदी बिलगून असलेलं, आधुनिकतेचा स्पर्शही न झालेलं सताड उघड्या दाराचं सुबक खोपटं.
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ तुकडोजी महाराजांच्या या रचनेसारखं साधं, प्रसन्न, स्वागतशील.
हिरव्या रंगाच्या कितीतरी छटांनी वेढलेलं. फुलांनी डवरलेलं अंगण आणि त्या इवल्याशा घराला कवेत घेऊन आपल्या झावळ्यांनी थोपटणार्या नारळी फोफळी. अनिमिषपणे हे सारं पाहत असताना त्या घराला किती गैरसोयी, निसर्गाचे किती प्रकोप सहन करावे लागतात हे सांगून नावाड्याने आम्हाला जमिनीवर आणून सोडलं.
तसं पाहिलं तर घर म्हणजे दगड-विटा-मातीची एक निर्जीव वस्तू. पण त्यात राहणार्या माणसांची वृत्ती, भावना, विचार, परस्पर व्यवहार मिळून त्या घराचं व्यक्तिमत्व तयार होतं. त्याला चेहरा मिळतो. त्याच्यात प्राण फुंकला जातो. मग काही घरं सच्ची वाटतात तर काही दिखाऊ. काही उबदार वाटतात तर काही रुक्ष. काही हवीहवीशी तर काही टाळावीशी. आपलं घर नेमकं कसं आहे ! घर कसं असायला हवं हे हळूवारपणे सांगणारी 'घराचं मनोगत' नावाची एका अनाम कवीची मूळ इंग्लीश कविता मनाला स्पर्शून गेली.
या कवितेतलं घर म्हणतं -
" मला असं घर व्हायला आवडेल
जिथे मुलांच्या मित्रमंडळींना वाटेल अगदी घरच्यासारखं
जिथे ते निवांत पाय पसरुन बसू शकतील
आपल्या हाताने माठातून किंवा फ्रिजमधून
पाणी घेऊन पिऊ शकतील.. बिनदिक्कत
जिथे त्यांना कुणीही विचारणार नाही,
"तुझं 'आडनाव' काय?"...
असं घर.. जिथे त्यांना कोणी कशावरुनही जोखणार नाही
जे त्यांना स्वीकारेल सहजतेने, आपुलकीने
घरी, दारी, शाळा-कॉलेजमध्ये काहीही घडलं तरी
ते सांगायला जिथे त्यांना हक्काने धावत यावंसं वाटेल
मला असं घर व्हायला आवडेल... "
आपलं घर आहे का असं?

Monday, May 17, 2021

ऐकलंत का

 


#sakal #ya_jaganyavar #aiklat_ka

एका स्नेह्यांच्या मुलीची एका प्रख्यात चॅनेलवरच्या गाण्याच्या कार्यक्रमात निवड झाली. विशिष्ट गाणं आणि प्रशिक्षक मिळावा म्हणून सगळे पालक तिथल्या समन्वयकापाशी भुणभूण करायचे. निर्णय त्याच्या हातात नसला तरी हा समन्वयक सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा. चौकशा करणार्यांना ’बघून सांगतो हं’ आणि तक्रार करणार्यांना ’सांगून बघतो हं’ एवढी दोनच उत्तरं अगदी गोड हसून द्यायचा. त्याच्या चतुराईचा आणि गमतीचा भाग सोडला तर आपल्यालाही माहीत आहे की बर्याचदा बोलणार्याला फक्त त्या क्षणी आलेला राग, उद्वेग, किंवा नैराश्य व्यक्त करायचं असतं. प्रत्युत्तराऐवजी आपलं ऐकून घ्यावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपण मात्र अनेकदा एखादी व्यक्ती याच अपेक्षेने आपल्याला काही सांगू लागली की त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत " हे तर काहीच नाही.. आमच्याकडे तर ...." वगैरे बोलून, सांगणार्यावर नकळत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो.
’तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥’ पण सोशल मिडियाच्या कृपेने पृथ्वीतलावर बोलणार्यांची तोबा गर्दी झाली आहे. ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता मात्र मंदावली आहे. वाचन हे प्रकारचं श्रवणच. एकदा एकाने आपला केक खातानाचा फोटो सोशल मिडियावर टाकला आणि सोबत ’आज माझा वाढदिवस नाही, किती जण हे नीट वाचतात ते पाहण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे’ अशी पुस्ती जोडली. अपवाद वगळता बहुतेक प्रतिक्रिया ’वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देणार्याच होत्या. दुसर्या बाजूला, सध्याची विदारक परिस्थिती लक्षात घेता अनेक जण ’माझ्याशी केव्हाही मोकळेपणाने बोला’ असं आवाहन सोशल मिडियावर करताना दिसतात. त्यांचा हेतू उदात्त असतो पण भावनिक शेअरिंगसाठी आभासी जगापेक्षा प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा वेळ, लक्ष आणि सहस्पंदन अपेक्षित असतं. 'women don't have problem in speaking, they have problem in being heard' असं एका आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या ते याच अर्थाने. स्त्रियांच्या बाबतीत समाजपुरुष सोयीनुसार आणि बहुतेक वेळा, स्वत:ला हवं तेवढंच ऐकत आलेला आहे.
समोरचा माणूस कंटाळवाणं, निरर्थक बोलत असेल तर गोष्ट वेगळी, एरवी चांगला श्रोता ही आता दुर्मिळ प्रजाती होऊ लागली आहे. काही जण तर समोरचा बोलत असताना मोबाईल स्क्रोल करत त्याला ’तुमचं चालू द्या’ अशी खूण करतात. स्क्रीनमध्ये नजरा गाडलेली तरुणाई संवादकौशल्याला मुकण्याची भीती वाटते. नजरेला नजर देऊन ऐकणं हे त्यात आलंच. स्क्रीनवरच्या शब्दचित्रांच्या महापुरात वाचलेल्या, ऐकलेल्या एखाद्या विशेष मुद्द्यापाशी थबकून तो मनात मुरवत त्या आकलनाचा आनंद घेणं अवघड होत चाललं आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी हे जसे वाणीचे टप्पे आहेत तसे लक्षपूर्वक ऐकणं, बोलणार्याच्या भावनिक पातळीवर जाऊन श्रवण मग मनन हे ऐकण्याचे टप्पे. हे टप्पे समजून घेतले तर आपलं श्रवणकौशल्य विकसित होईल.
बरं, पण ते विकसित करून करायचं काय, याचं उत्तर ’व्हर्जिन’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन देतात. त्यांच्या आत्मिक आणि व्यावसायिक प्रगतीचं श्रेय ते स्वत:च्या श्रवणकौशल्याला देतात. ऐकून घेणार्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. फक्त व्याख्यातेच नव्हे, सफाई कामगारापासून उच्चपदस्थ अधिकार्यापर्यंत प्रत्येकाजवळ सांगण्यासारखं काही ना काही असतं. ते ऐकताना अनुभवाचं एक नवं विश्व आपल्यासमोर उलगडत जातं. वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो, अंतर्दृष्टी गवसते. केवळ यशस्वी होण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीही लक्षपूर्वक ऐकणं आणि त्यातलं मह्त्वाचं वाटेल त्याची नोंद घेत, शिकत, पुढे जात राहणं आवश्यक असतं. कान देऊन ऐकणारी व्यक्ती आयुष्यात कमी चुका करते आणि व्यवसायात तर या क्षमतेचा प्रचंड उपयोग होतो, असं ते म्हणतात.
तुम्हाला जर कुणाचंच ऐकण्यात रस नसेल तर तुमचं ऐकण्यात जगालाही रस वाटणार नाही इतकं हे साधं समीकरण आहे. ’(सिर्फ) मेरी आवाज सुनो’ च्या जगात इतरांचं जाऊ देत आपला आतला आवाज तरी आपण नीट ऐकतो आहोत का!

sakal -ya jaganyawar- May21

Monday, May 10, 2021

ठहराव

 


#या_जगण्यावर #सकाळ #ठहराव

आजवर आपण खूप धावलो. साहजिकच आपली प्रवासाची साधनं, आपली संवादाची साधनं, आपल्याला लागणारी यंत्र फक्त वेगाची ’सबसे तेज’ भाषा बोलत होती. आपल्याला लागणार्या रोजच्या वस्तू सुद्धा ’झटपट आराम’, ’बस दो मिनट मे तैयार’, ’बंटी, तुझा साबण स्लो आहे का’ असं म्हणत आपल्या बरोबरीने पळत होत्या. ’फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट’ हे जमलं तरच या जगात ’हॉट सीट’ मिळते रे बाबा, हे सांगत आपण मुलांनाही धावायला शिकवत होतो. कोरोनाआपत्तीने या शर्यतीला करकचून ब्रेक लावला आहे किंवा खरं तर लादला आहे. चढावर अचानक ब्रेक लावला की आपण आपोआप घरंगळत मागे येतो. तसे मागे येताना आपण आपल्याच जगण्याकडे नवलाईने बघायला लागलो आहोत. मग जाणवतं की वर चढण्याच्या धावपळीत वाटेतले अनेक सुंदर थांबे बघायचे राहून गेले. निगुतीने करायच्या बर्याच गोष्टी राहून गेल्या. कितीतरी छंद अपूर्ण राहिले. मोठ्या सुखाच्या शोधात आयुष्यात येऊन गेलेल्या किंवा अजूनही भोवताली असलेल्या लहान लहान सुखांकडे आपलं दुर्लक्ष होत गेलं.
एक लोककथा आहे. गळ्यात लोखंडी साखळी घालून एक माणूस परीस शोधायला निघाला. वाटेतला प्रत्येक दगड त्या साखळीला लावून ती सोन्याची होते का हे बघत आणि नसेल तर तो दगड फेकत भराभर पुढे जात राहिला. त्या नादात ती साखळी केव्हा आणि कोणत्या दगडामुळे सोन्याची झाली हे त्याला कळलंच नाही. त्याच्यासारखीच आपल्याला घाई होती, इतकी की आपण श्वास सुद्धा पुरेसा दीर्घ घेत नव्हतो. १९८० च्या सुमारास सुरु झालेली स्लो फूड चळवळ आतापर्यंत फारशी महत्वाची वाटत नव्हती. भौतिक समृद्धी आणि आंतरिक समाधानाचा समन्वय साधण्याऐवजी भव्यदिव्य यश म्हणजे सुख हे जणू आपण ठरवून टाकलं होतं. त्या टप्प्यावर पोचेतो आपली ’भव्यदिव्य’ची व्याख्या पुन्हा बदलत होती त्यामुळे नेमकं कुठे थांबायचं हे कळेनासं झालं होतं. आता मागे येता येता आपण नोंद न घेतलेले सुखाचे चिमुकले स्त्रोत लख्ख दिसू लागले आहेत. एखाद्या कलेच्या अद्वितीय अविष्कारापासून नि:शब्द शांततेपर्यंत, विज्ञानातल्या एखाद्या रहस्याचा स्वत:ला उलगडा होण्यापासून एखाद्या अनामिक पक्षाची शीळ ऐकण्यापर्यंत, एखाद्या पुस्तकातल्या शब्दाने, विचाराने झपाटून जाण्यापासून हळव्या स्पर्शापर्यंत, मृद्गंधाच्या दरवळापासून बाळाच्या निरागस हास्यापर्यंत, मदतीसाठी पुढे केलेल्या हातापासून टाळीसाठी पुढे केलेल्या हातापर्यंत ते कुठेही विखुरलेले असू शकतात. याचे निकष प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे वेगळे असतात आणि ते वेगळे असण्यातच मजा आहे पण शोधण्याची असोशी मात्र तीच आहे. अशी छोटी सुखं खिसा भरलेला किंवा हलका असला तरी तितकीच तृप्ती देतात पण केव्हा! तो अनुभव, तल्लीनतेमधलं ते सौंदर्य मनातल्या अवकाशात मुरवत त्याचा तब्येतीने आस्वाद घ्यायला वेळ असेल तरच. स्वच्छ, शांत मन आणि अशा रुपेरी क्षणांच्या स्वागतासाठी सताड उघडं ठेवलेलं त्याचं दार, एवढं यासाठी पुरेसं आहे. याने जग वगैरे बदलत नाही पण आपण जगण्याच्या प्रेमात नक्कीच पडतो.
एका प्रसिद्ध सिनेमातलं दृश्य आहे. नायक नायिका एका पर्यटन स्थळावर गेले आहेत. कडयावर निवांत बसून ती त्याच्या साक्षीने सूर्यास्त बघते आहे. त्याच्या हातात तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची यादी आहे. त्याचं म्हणणं असतं- सूर्यास्त सगळीकडे सारखाच तर दिसतो, त्यात किती वेळ घालवायचा, अंधार पडेल मग बाकीची स्थळं बघणं राहून जाईल, चल निघूया. त्याच्या हातातल्या यादीचे तुकडे करुन दरीत भिरकावत ती म्हणते, "लाईफमें कुछ ना कुछ तो छुटेगाँही, तो जहाँ है, वही का मजा लेते है." जिथे आहोत तिथेच भिरभिरणारी सुखाची इवलीशी फुलपाखरं बघायला हवी असलेली उसंत आता आपल्याला मिळालीय. अर्थात हा ब्रेक आहे. आकाशातल्या चंद्राच्या कला बघण्यात आणि तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारण्यात कितीही मौज वाटत असली तरी शेवटी भाकरीच्या चंद्रामागे प्रत्येकाला अपरिहार्यपणे धावावंच लागणार आहे पण आधीसारखं उर फाटेस्तो नाही, एवढं एव्हाना आपल्याला कळलंय. गती हवीच पण किती! तोल राखता येईल आणि जगण्यात कुतूहलाने डोकावत रमतगमत पुढे जाता येईल एवढीच.

sakal-ya jagnyavar -May 21

Monday, May 3, 2021

प्रेरणा


 #Sakal #या_जगण्यावर #ध्यासपंथ

वांगणी रेल्वे स्थानकाच्या दिशेने एक गाडी धडाडत येते. अंध आईचा हात धरुन चालणारं एक मूल अचानक फलाटावरुन रुळावर पडतं. तेवढ्यात त्या रुळांवरुन मयूर शेळके धावत येतो. झपकन त्या मुलाला उचलून फलाटावर टाकतो आणि त्याचा जीव वाचवतो. हे कमी की काय म्हणून रेल्वे प्रशासनाने दिलेल्या ५०,००० रु.च्या बक्षीसातले निम्मे पैसे तो त्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देतो. नॅन्सी मिस्त्री ही सुरतची परिचारिका कोरोनाबाधिंताच्या सेवेच्या आड आपले गरोदरपण येऊ देत नाही. मागच्या लाटेत पोटचा पोर गमावलेले अहमदाबादचे मेहता मुलाची १५ लाखांची एफडी इतर रुग्णांच्या उपचारासाठी वापरतात. नागपूरचे ८५ वर्षांचे दाभाडकर तर ’आपलं जगून झालंय, इतरांचं सगळं बाकी आहे’ या समर्पण भावाने रुग्णालयातला स्वत:चा बेड देऊन टाकतात आणि अनंतात विलीन होतात. किती उदाहरणं द्यावी! यांच्या दर्शनाने विझू लागलेलं समाजमन उजळून निघतं. जगाला समपातळीवर आणणार्‍या या आपत्तीने आपलं बरंच काही हिरावून नेलं असलं तरी आपल्याजवळही देण्यासारखं खूप काही शिल्लक आहे हे जाणवू लागतं. 

कोरोनाच्या तडाख्यामुळे मनावर चरे उमटत असतानाही जगणं थांबलेलं नाही. धावत सुटलेल्या जगाला या आपत्तीने स्वल्पविराम मात्र दिला. अंतर्मुख केलं. आपल्या खर्‍या गरजा किती, खरी नाती कोणती आणि आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काय याचा विचार करायला भाग पाडलं. निसर्गचक्र मंदावलं नाही. भुई भेगाळली तरी पळसाला नेहमीसारखाच लालबुंद फुलोरा आला. नियमांच्या बंधनात का होईना विवाहासारखी मंगलकार्य, इवल्या जीवांचं आगमन सगळं अव्याहत सुरु राहिलं. वठलेल्या खोडातून बाहेर डोकावणार्‍या कोवळ्या पोपटी पालवीसारखी माणसाची जीवनेच्छा टिकून राहिली. कुणासाठी ती केवळ तग धरुन राहिली तर कुणासाठी ती पुन्हा तरारुन वर आली. बहरत राहिली. काय वेगळेपण असावं या दुसर्‍या प्रकारच्या माणसांचं! सिग्मंड फ्रॉइडने म्हटलं होतं, "वेगवेगळ्या विचारांच्या, कुवतीच्या काही माणसांना एकत्र करा आणि उपाशी राहायला लावा. भुकेच्या वाढत्या तीव्रतेबरोबर सगळे आव, भेद गळून पडतील, माणसं एका स्तरावर येतील आणि उरेल फक्त भूक!!" याउलट स्वतःवर विश्वास असलेली, खर्‍या अर्थाने सुजाण असणारी, जगण्याचा उद्देश गवसलेली माणसं अत्यंत प्रतिकूल स्थितीतही सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहू शकतात, मार्ग शोधू शकतात, स्थिरचित्तपणे निर्णय घेऊ शकतात हे ’लोगोथेरपी’चे जनक डॉक्टर फ्रँकल यांनी दाखवून दिलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या अमानुष छळछावणीतून बाहेर पडल्यावर अशी माणसं निराशेच्या गर्तेत तर गेली नाहीच, त्यांनी अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. 

गीतेतल्या ’कर्मयोग्या’च्या व्याख्येत चपखल बसणार्‍या अशा नि:शंक लोकांमुळे आपली जगण्यावरची श्रद्धा अबाधित राहते. ही माणसं स्वतःच स्वतःची प्रेरणा असतात, ती इतरांना नकळत बळ देतात, दिशा देतात. उसवलेलं जग माणुसकीच्या धाग्याने सांधत जातात. त्यांची नावं सोनू सूदपासून रतन टाटांपर्यंत काहीही असू शकतात. कधी ही माणसं निनावी असतात. त्यांच्या बातम्या येत नाहीत. वैद्यकीय, वित्तीय, सुरक्षा विभागातले जिगरबाज कोरोना योद्धे, प्रयोगशील शिक्षक, जेवणाची सुट्टी न घेता ऑक्सीजन रिफील करणारे कामगार, हाडाचे संशोधक, तळमळीचे समुपदेशक, प्रेक्षकांचं मन रमवणारे सर्जनशील कलाकार, धडपडे क्रियाशील उद्यमी, निरपेक्ष समाजसेवक, अपरात्री देखील ओ देणारे मित्र, हतबल न होता कोंड्याचा मांडा करणार्‍या गृहिणी अशा कोणत्याही रुपात ती भेटतात. त्यांच्या परिघात येणार्‍यांना लागण होते पण ती उर्जेची. 

आपापलं उद्दिष्ट्य शोधून या मांदियाळीत प्रत्येक जण आपल्या परीने सामील होऊ शकतो. स्वत:च्या क्षमता तपासून एकमेकांच्या जगण्याला उमेदीचं तोरण लावण्याची संधी कोरोनाच्या संकटातही दार ठोठावते आहे. तिचं स्वागत करुया.


- मोहिनी

सकाळ सदर - या जगण्यावर May2021

लेख १ 


Monday, October 1, 2018

हयवदन


परवा एक व्हिडिओ पाहिला. आईचा मृत्यु झाला आहे. नवजात बाळ रडतं आहे. त्याला शांत करण्य़ाचा बरेच जण प्रयत्न करतात पण बाळाचं आक्रंदन सुरुच आहे. इतक्यात एक पुरुष त्या बाळाला छातीशी धरतो आणि बाळ हळूहळू रडायचं थांबतं. खाली ओळ लिहुन येते की मरणापूर्वी बाळाच्या आईचं हृदय काढून त्याचं प्रत्यारोपण या पुरुषाच्या शरीरात करण्य़ात आलं आहे. मग प्रश्न आला की त्या आईची किंवा कोणत्याही माणसाची ओळख म्हणजे त्याचं हृदय/मन की मेंदू/बुद्धी ? बाळाने आईच्या हृदयाचे ठोके ओळखले असं म्हणावं तर बाळाला ही उमज त्याच्या मेंदूतल्या सूचनांमधूनच आली. हा व्हिडिऒ पाहून नुकतच पुन्हा वाचनात आलेलं ’हयवदन’ आठवलं कारण मेंदू (बुद्धी/विचार) सर्वात श्रेष्ठ आणि तीच माणसाची ओळख हेच हे नाटक सांगतं.

हे समजावं म्हणून यात वापरली गेलेली शरीर आणि मस्तक अदलाबदलीची कल्पना भन्नाट. ही कल्पना थॉमस मॅनच्या ’द ट्रान्स्पोज्ड हेड्स’ वरुन घेतल्याचे लेखक गिरिश कर्नाड यांनी स्वत:च स्पष्ट केलंय. देवीला झोप येणं, मेलेली माणसं जिवंत होणं, बाहुल्यांनी चर्चा करणं हे सगळं अनाकलनीय वाटतं पण हे अर्थातच रुपक आहे. रामायण, महाभारत या महाकाव्यात किंवा पुराणात अशा घटनांचा संदर्भ असलेल्या अनेक कथा आहेत. अगदी इसापनीती, वेताळ पंचविशीमध्ये, कितीतरी लोककथांमध्ये सुद्धा असं घडतं. चिरंतन प्रश्न मांडणार्‍या या बोधकथेमध्ये अशा मिथकांचा वापर केल्याने भारतीय परंपरेतली प्रतीकं नवनाट्याशी जोडण्याचा कर्नाडांचा प्रयोग वेगळा ठरतो. त्यामुळे या नाटकाची विशेष चर्चा झाली असावी.

नाटकाच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे? अपूर्णतेचा शाप घेऊनच आपण जन्मतो. त्यावर मात करुन पूर्णत्वाचा धरलेला अंतहीन ध्यास म्हणजेच आपलं जगणं. या नाटकातल्या पद्मिनीला दोन्ही पुरूष आकर्षित करतात. एकाच्या रुपवान शरीरावर तर दुसर्‍याच्या तेजस्वी बुद्धीवर ती भाळते. मस्तक आणि धड यांची अदलाबदल झाल्यावर तर तिला देवदत्तची बुद्धी आणि कपिलचं देखणं शरीर असा पूर्ण पुरुष लाभतो. परंतु आता कपिलचं शरीर देवदत्तच्या बुद्धीनुसार वर्तन करतं, त्याचा कणखरपणा, चपळाई, क्षमता कमी होऊ लागतात. थोडक्यात अपूर्णत्व कायम राहतं. काहीही मिळालं,तरी काहीतरी ’मिसिंग’ असतंच. अगदी ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच. हा अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारी भावनिक आंदोलनं आणि कूटप्रश्न या नाटकात फार छान मांडले आहेत. मन आणि बुद्धीमधला अंतर्विरोध हा मुद्दा केवळ भारतीयांशी संबंधित नाही तर जागतिक आहे त्यामुळे या थिमवर लोकनाट्याचा बाज घेऊन सादर होणारं आणि नेपथ्य प्रकाशयोजनेचे अनोखे प्रयोग करणारं हे नाटक भारताबाहेर सुद्धा गाजलंय.

नाटक वाचलं, पाहिलं, समजून घेतलं तरी शेवटी प्रश्न उरतो की हे द्वंद्व आणि पूर्णत्वाचा शोध कधी संपणार की नाही. याचं उत्तर ईशावास्योपनिषदातल्या ’ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!’ या ओळीतच आहे. परंतु अपूर्णत्वातलं पूर्णत्व समजणं सोपं आहे, सापडणं कठीण. 

Thursday, June 19, 2014

वैश्विक नजर

'रोव्हर'च्या माध्यमातून मंगळावरून घेतलेले पृथ्वीचे प्रकाशचित्र वृत्तपत्रातून नुकतेच झळकले. अनेक आकाशगंगांपैकी एकीचा सूक्ष्मतम भाग असलेली पृथ्वी त्यात एखाद्या खसखशीच्या दाण्याएवढी दिसत होती. या पार्श्वभूमीवर माणसाचं अस्तित्व विश्वाच्या खिजगणतीतही नाही ही वस्तुस्थिती आहे. काळ धावतोय असे आपल्याला वाटते, खरं तर आपण धावत आहोत. काळ अनादि अनंत आहे. त्यामुळे आपली समज फक्त काही हजार वर्ष मागे आणि येत्या शेकडो वर्षांपर्यंत मर्यादित आहे. आपल्या आकलनापलिकडे असलेल्या अनेक गोष्टींच आपल्याला ज्ञान नाही.
माणसाने स्वत:चा 'अहं' अनाकलनीय असलेल्या ब्रह्मांडापेक्षा मोठा मानला आहे. त्या खसखशीच्या दाण्याकडे पाहतानाच नव्हे तर एखाद्या प्रपाताकडे, क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडे पाहतानाही हे विचार मनात येतात. याने खुजं वाटून घेण्यापेक्षा लीन व्हायला हवं. स्वत:त डोकावून पाहायला हवं.

सुरुवात धर्मापासून करुया. 'जगा आणि जगू द्या' हे सांगणारे धर्म खरं तर माणसानेच निर्माण केले, धर्माचा अर्थ 'जगण्याची एक सुगम पद्धत' असा मानला तर एकमेकांच्या पद्धतीवर आक्षेप घेण्याचं कारणच काय? परंतु धर्म व्यक्तीनिष्ठ होत गेले आणि व्यक्ती धर्मांध. देशाभिमान-धर्माभिमान ही मूल्यं नक्कीच महत्त्वाची, पण माझाच विचार योग्य, माझाच धर्म श्रेष्ठ, माझाच देव खरा, मी करेन तेच रास्त अशा अनेक पैलूंनी ह्या अहंकाराचे रूपांतर आचारविचारातल्या भ्रष्टाचारात होऊ लागले आहे. कूपमंडूक माणसांनी जातीपातीची झापडंच अजून काढली नाहीत, तर जगाकडे उघडणारी कवाडं त्यांना दिसणार तरी कशी ? एकीकडे माणसाने मंगळावर झेप घेतली, दुसरीकडे त्याचं खुजेपण वाढत चाललं आहे. या विरोधाभासाने विकल झालेल्या पृथ्वीची मनस्थिती कुसुमाग्रज नेमक्या शब्दात मांडतात..
’सूर्यमालेतील सारे ग्रह म्हणाले, 'वाहवा! हे धरे, तू धन्य झालीस निर्मुनीया मानवा'
ती वदे, 'हा मान मोठा-येथली पण संस्कृती(!)मंगळावर ते अमंगळ ना रिघावे केधवा..'

हे दुष्टचक्र भेदायचे तर जगाकडे विशाल वैश्विक नजरेतून पाहायला हवे. माणसांना आनंद देणारा धर्म हवाय, जगणं सोपं करणारा धर्म हवाय. मात्र धर्माचं स्वरूप गूढ आणि कर्मठ असंच राहिलं आहे. मानवाचा माणूस व्हावा हेच धर्माचे उद्दिष्ट असायला हवे. 'येक नाना प्रतिमा। दुसरा अवतार महिमा। तिसरा तो अंतरात्मा। चौथा तो निर्विकारी।' ईश्वर या संकल्पनेबद्दल समर्थांनी सांगितलेल्या आकलनाच्या या पायऱ्या चढता चढता माणसाला ही वैश्विक दृष्टी मिळू शकेल. ती मिळाली तर धर्मग्रंथातील उपदेश आणि आचरण यातली दरी कमी होऊ शकेल.
अध्यात्म जीवनोपयोगी नसेल, तर पुलं थेट म्हणतात, 'शस्त्रक्रियेच्या वेदना कमी करणारा, हुंगरी (अॅनेस्थेशिया)चा शोध हा मला कुठल्याही अध्यात्मिक सूत्रांपेक्षा श्रेष्ठ वाटतो.'

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याला सगुण पूजावे की निर्गुण 'जाणावे', यावर वितंडवाद घालण्याऐवजी जगातील सर्वोत्तम मूल्यांचा समुच्चय म्हणजेच 'ईश्वर' असे मानले तर? 'लिव्ह धीस प्लॅनेट बेटर दॅन यू फाऊंड इट' असे एका उद्योगसमूहाचे घोषवाक्य आहे. प्रत्येकाने किमान एवढा प्रयत्न केला तरी 'विश्वस्वधर्म सूर्ये पाहो' म्हणत, समाजाची उपेक्षा पचवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी शतकांपूर्वीच मागितलेले 'विश्वकल्याणाचे' पसायदान साकार होऊ शकेल.



(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)


यशस्वी नात्याचे आधारस्तंभ...


नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया. नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे. जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, 'टु बी इज टु बी रिलेटेड अँड टु बी रिलेटेड इज टु बी इन कॉन्फ्लीक्ट.' दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच. मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं; कारण ते निरपेक्ष नसतं.
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं. सगळं अनुकूल असेल तरच ते टिकून राहतं. अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही.

ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच; माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं. 'त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.'
निरीश्वरवादीदेखील चराचराशी नातं जोडतात. ईश्वर मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात. हे नातं निरपेक्ष असतं. कदाचित म्हणूनच या नात्याची असोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो. या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो. या नात्याला अनेक पदर असू शकतात. जगाच्या पसाऱ्यात आपण कुठेही हरवलो, तरी ज्या भूमीशी आपली नाळ जुळलेली असते तिची ओढ तशीच राहते, त्याला आपण माझं गाव, माझा देश अशी नावं देतो.
संतांना 'वृक्षवल्ली सोयरी' वाटू लागते. 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' भासू लागते. कितीतरी माणसं निसर्गाशी नातं जोडतात. एखाद्या रोपाचं रूजणं, फुलणं, तारकांनी खच्चून भरलेलं आकाश, वाऱ्याची झुळूक, खळाळत वाहणारं पाणी, यात कित्येकजण रमतात. कुणी विज्ञानातल्या कुतूहलांची उकल करण्याच्या पाशात स्वेच्छेने अडकतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही... साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' असा तो अनोखा, अनामिक बंध असतो. या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं; कारण यामागे अपार श्रद्धा असते. या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.

माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा आणि आश्वासक स्पर्श हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात. नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का? हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव. तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो. वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो. मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो. अवघं जगणं सुंदर होतं. आरती प्रभूंच्या शब्दात दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो.
 'अशी पांखरून छाया, लावोनिया माया। आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.'

महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

करा साजरा ‘आजचा क्षण’!


'या अठराव्या वाढदिवसाला मला नवी कोरी बाईक हवी म्हणजे हवी', लाडावलेल्या मुलाने आपल्या श्रीमंत वडिलांकडे लकडा लावला होता. वडिलांनी अट घातली, त्यासाठी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखव. मुलाने अट पूर्ण केली. वडील त्याला रोज एका छान पुस्तकातले उतारे वाचून दाखवत असत. वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी मुलाला आशीर्वाद दिला आणि सुंदर वेष्टन घातलेले ते पुस्तक भेट दिले. अपेक्षाभंगाने संतप्त झालेला मुलगा वडिलांचे बोलणे अजिबात ऐकून न घेता ते पुस्तक तिथेच फेकून घर सोडून निघून गेला.

कालांतराने त्याला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळली आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी तो घरी परतला. जगाचे अनुभव घेऊन आता तो समंजस झाला होता. कागदपत्रे बघता बघता त्याला वडिलांनी दिलेले पुस्तक सापडले. त्याने सहज पुस्तकाचे वेष्टन उघडले आणि त्यात त्याला बाईकची किल्ली अडकवून ठेवलेली दिसली. मुलाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते; पण आता उशीर झाला होता. एव्हरीवन इज गिफ्टेड, बट सम पिपल डू नॉट ओपन देअर पॅकेज, हे सांगणारी ही गोष्ट...

माणसाचं आणि नियतीचं नातं काहीसं असंच आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आकांक्षांना प्रयत्नांची जोड दिली, तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. मात्र ती आपल्याला अपेक्षित असलेल्या वेष्टनात असेलच असे नाही. आपल्या वाट्याला आलेल्या कित्येक गोष्टी केवळ वेगळ्या आवरणात असल्यामुळे आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. कवी अशोक नायगावकर म्हणतात, 'निसर्ग पाहायला म्हणून निघालो... गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती'... तशी आपली अवस्था असते.
कुणाला कलेची, कुणाला बुद्धिमत्तेची, कुणाला सर्जनशीलतेची, कुणाला रूपाची तर कुणाला असाधारण क्षमतेची, अशा वेगवेगळ्या देणग्या जन्मजात लाभलेल्या असतात. मात्र 'काय नाही' याची यादी करण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्यामुळे 'काय आहे' याकडे आपले दुर्लक्ष होते.
 'स्थिती आहे तैशापरी राहे। कौतुक तू पाहे संचिताचे॥'
म्हणणारे तुकाराम महाराज, काय गमावलंय यापेक्षा काय कमावलंय इकडे लक्ष द्या हेच सांगतात.

आनंदात चालणं व आपलं वेगळेपण शोधणं हा जगण्याच्या चकव्यातनं बाहेर पडायचा चांगला मार्ग आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार द्विधा मनाला शांत करतो आणि नि:शंक मनच प्रगती करू शकतं. ओशोंनी मनाची दोलायमान स्थिती सहज शब्दात मांडली आहे,
'मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!'
याचं कारण आपण उद्याच्या विचारात इतके हरवतो की 'आजचा क्षण' साजरा करायचा राहूनच जातो.तेव्हा आपल्याला मिळालेला आयुष्याचा सुंदर नजराणा स्वत: उघडून पाहायला हवा, आजच! आत्ता !

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)


आनंदाचा विचार म्हणजेच परमार्थ!


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २५ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

जगातला प्रत्येक जीव एकमेकाशी एका अदृश्य धाग्याने जोडला गेला आहे असं अध्यात्म सांगतं. आपण आज कुणाला काही दिले तर हे सूत्र पुढे जात राहते आणि एक दिवस ते आपल्याकडे परत येते. उर्जेची रूपे फक्त बदलतात तसेच काहीसे हे आहे. आपण धन, कृती किंवा ज्ञानरूपाने कुणाला काही देत असू तर ते आनंद किंवा समाधान अशा रूपात आपल्याकडे परत येते. म्हणूनच 'घर से मस्जिद है बहोत दूर... चलो कुछ यू कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए...'

दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणे म्हणजेच परमार्थ. यातून खरं तर आपण स्वत:लाच मदत करत असतो. त्यासाठी मनात स्वच्छ दातृत्वभाव हवा. मात्र आपला परमार्थाचा स्वार्थ साधण्याच्या नादात आपण याचकवृत्तीला खतपाणी तर घालत नाही ना, याचा विचार करायला हवा. वस्तुनिष्ठावादाची कट्टर पुरस्कर्ती, लेखिका ऍन रँड म्हणते, 'गरज हा लायकीचा पर्याय बनला तर समाजातली कार्यक्षमता संपून जाईल, शिवाय सर्वात गरजू, दुर्बल कोण हे सिद्ध करायची चढाओढ लागेल.' दान हे नेहमीच सत्पात्री असायला हवे.

स्वहिताचा म्हणजेच स्वार्थाचा विचार म्हणजे पाप आणि परमार्थाचा विचार म्हणजेच पुण्य हे आपल्यावर बिंबवले गेले आहे. त्यागाच्या चमत्कारिक कल्पनांनी भारावून, श्रीमंत होणे हे पाप मानले जाऊ लागले आहे. दुसऱ्याला आर्थिक मदत करायची असेल तर आधी स्वत: संपत्ती निर्माण करायला नको का? त्यासाठी स्वतंत्र विचार, कृती आणि बुद्धीची गरज असते. अशा अर्थाने स्वहित जपणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तीला स्वार्थी कसे म्हणता येईल? एखादी निस्संग व्यक्ती मोक्ष मिळावा अशी अभिलाषा करत असेल, तर तोही एक प्रकारचा स्वार्थच ना! केवळ देत राहणे म्हणजे परमार्थ नव्हे, तर आपले काम व्यवस्थित करणे हादेखील परमार्थच.

फुटक्या वस्तू अनाथालयाला देऊ करणारे किंवा काळ्या धनातील काही भाग देवस्थानाला देणगी देऊन मनातली टोचणी कमी करू पाहणारे परमार्थ साधत नसून, त्याचा केवळ आव आणतात. अशा भोंदूंना तुकाराम महाराज सांगतात,
स्वार्थ परमार्थ संपादिले दोन्ही। एकही निदानीं नव्हे त्यासी।
दोहों पेंवांवरी ठेवूं जातां हात। होय अपघात शरीराचा॥
जपानी लोक तलवार, रत्न आणि आरसा यांना मानतात. तलवार हे शारीरिक शक्तीचं, रत्न हे पैशाचं आणि आरसा हे स्वत:बद्दलच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. परमार्थासाठी शक्ती, धन आणि वृत्ती एकत्र आले तर उत्तमच. धनवृद्धी करण्याचा आपला मार्ग योग्य आहे की नाही हे आरसा सांगू शकेल. अशी धनवृद्धी समाजाला उपकारक असते आणि त्यातून नकळत परमार्थ साधला जातो. इतर मार्गांनीही परमार्थ साधणे शक्य आहे. गुरूद्वारांमध्ये 'कारसेवा' आचरली जाते. तिथला कचरा झाडणारी व्यक्ती अगदी करोडपती असू शकते किंवा अतिशय गरीब. तिथे प्रत्येकजण 'दाता' होण्याचे समाधान मिळवू शकतो. तेव्हा या जपानी आरशालाच विचारू या, आपण सच्चा स्वार्थ जपतो आहोत की ढोंगी परमार्थ जपून स्वत:लाच फसवतो आहोत?

प्रतीकांमागच्या संकल्पनांचा बोध !


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १८ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथील पापविमोचक येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यावर वीज कोसळली. उत्तराखंडमध्ये महापुरात केदारनाथाचे मंदिर पाण्याखाली गेले. ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्यांना त्या वीजेत आणि पाण्यातही त्याचेच रूप दिसत असल्याने त्यांच्या श्रद्धेवर ओरखडा उमटला नाही. विचारपूर्वक ईश्वर नाकारणाऱ्यांसाठी ही केवळ नैसर्गिक उलथापालथ, तर सर्वसामान्य माणूस मात्र श्रद्धा-अश्रद्धेबाबत साशंक होतो आणि समाधान घालवून बसतो. अंधश्रद्धेच्या आहारी जातो किंवा ईश्वराचा तिटकारा करू लागतो. कारण ईश्वराला कोणत्या ना कोणत्या प्रतीकाच्या स्वरूपातच पाहण्याचा त्याचा अट्टाहास.

सगुण प्रतीकांमधे ईश्वर शोधणे संतांना देखील मान्य नाही. समर्थ म्हणतात,
धातु, पाषाण, मृत्तिका। चित्रलेप, काष्ठ देखा । तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडिली ।
प्रतीकांच्या मनावरील पगड्यामुळे पारंपरिक, पौराणिक कथा एक प्रकारच्या धार्मिक दडपणातून ऐकल्या जातात. त्याला अभ्यासाची जोड नसली की, त्यातून सहजपणे आध्यात्माचा बाजार मांडला जातो. याउलट काहींना धार्मिक ग्रंथांमधले सगळेच बाळबोध, विसंगत किंवा अतार्किक वाटू लागते. ईसापच्या कथांमधले प्राणी बोलतात हे आपण स्वीकारतो, कारण त्यातला आशय आणि बोध आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. याच न्यायाने पौराणिक कथांना सत्य-असत्याचे, श्रद्धा-अश्रद्धेचे किंवा तर्काचे निकष लावण्यापेक्षा त्यातले तथ्य आणि प्रतीकांमागच्या संकल्पना समजाव्यात.' देवीला आठ हात? काहीतरी काय!' असे प्रतीकाबाबत नकारात्मक बोलताना संगणकाच्या भाषेतलं मल्टीटास्कींग मात्र आपण सहज स्वीकारतो. या अष्टभुजांमागे 'जो जे वांछील तो ते लाहो' हा संदेश असू शकतो असा विचार देखील आपण करू शकतो.

भारतीय आध्यात्मिक अभ्यासक रामायणाचं विश्लेषण वेगवेगळ्या कोनांतून करतात. काहींनी रामाला विवेकाची, सीतेला मनाची, दशानन रावणाला अनंत विकारांची आणि हनुमानाला योगसाधनेची उपमा दिली आहे. ते म्हणतात मनरूपी सीतेचं ज्यावेळी विकाररूपी रावण हरण करतो, त्या वेळी मन आणि विवेक यांचे पुनर्मिलन योगसाधना घडवते. विनोबांनी महाभारताला रूपक म्हणून अभ्यासले. शरीर म्हणजे कुरूक्षेत्र,त्यातील चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचं द्वंद्व म्हणजेच तामसी कौरव आणि सात्त्विक पांडव यांच्यात सुरू असलेलं युद्ध.
बुद्धिवाद आणि आध्यात्म हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. सत्त्व आणि सालपट यातला फरक ओळखण्याचा , प्रतीकांमागचा संकेत आणि संदर्भ जाणून घेण्याचा नीरक्षीरविवेक जिथे वाढतो त्याच समाजाची प्रगती होऊ शकते. ईश्वराच्या रूपाबद्दलचे किंतु-परंतु विरण्यासाठी आधी स्वत:ची तर नीट ओळख व्हायला हवी. 'स्व-रूप' या शब्दातच ते उत्तर दडलं असेल का?

कुठे असते दुःख दडलेले?


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ११ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

आपण एखाद्याच्या दु:खात सहज सहभागी होतो पण त्याच्या सुखात खरच असूया बाजूला ठेवून सहभागी होऊ शकतो का? की त्यात कुठेतरी आपले दु:ख दडलेले असते? आपण आनंदात असताना कधीही हा विचार करत नाही की हे सगळं सुख माझ्याच वाट्याला का यावं? तेव्हा आपण हर्षोल्हासात मग्न असतो. त्या आनंदाचा पुरेपूर उपभोग घेत असतो. वेदना किंवा दु:ख वाट्याला आलं तर मात्र मनात पहिला विचार येतो तो, 'मीच का?', 'हे माझ्याच बाबतीत का घडतं?' प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात, 'जीवनात घडणाऱ्या सर्व घटना या आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, बाह्य परिस्थितीमुळे किंवा संभाव्यताशास्त्राच्या (probability) नियमानुसार घडतात.' वाट्याला आलेल्या सुखाचं श्रेय बहुतेक लोक स्वकर्तृत्वाला, स्वयंनिर्णयाला देतात; मात्र पदरी आलेल्या दु:खाची जबाबदारी सोयिस्करपणे दैवावर ढकलतात. तेव्हा त्यांना अचानक ईश्वराची आठवण होते. परंतु 'सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद। कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद॥'

खरं तर जगातल्या कुरूपतेमुळेच सौंदर्य या शब्दाला अर्थ आहे. सगळे नेहमी छान छान, सुंदर, मनाजोगे घडत गेले तर कालांतराने जगण्यात कुठलेच आव्हान न उरल्याने नीरसता येईल. जगात अंधार नावाची गोष्टच नाही, प्रकाशाच्या अभावाला आपण ते नाव दिले आहे. तसेच कदाचित सुखाच्या अभावाला आपण दु:ख मानतो. कशाला सुख मानायचे आणि कशाला दु:ख हे नीट कळले नाही आणि त्यासाठी फक्त ऐहिक निकष वापरले तर 'मै फकीरोसे भी सौदा करता हू अक्सर...। जो एक रूपए मे लाख दुवाए देता है' अशी आपली परिस्थिती होते. 'सुख दु:खे समे कृत्वा। लाभा लाभौ जयाजयौ॥' हे गीतेतील वचन 'सुखामुळे हुरळून जाऊ नका आणि दु:खामुळे खचून जाऊ नका,' असे सांगते. प्रत्यक्षात सुख दु:खाचा तटस्थपणे स्वीकार करणे आपल्याला शक्य होत नसले तरी गीतेने सांगितल्याप्रमाणे कर्म करत राहणे तर शक्य आहे ना!

भुकेल्या पोटाला उपदेश नाही, भाकरी हवी असते. त्यामुळे सकारात्मक असंतोष हवाच; कारण त्यातच प्रयत्नांचे आणि प्रगतीचे बीज रूजते. आपल्या आवाक्यात असलेल्या गोष्टीत आपले सुख आणि आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टीत आपले दु:ख दडलेले असते. यावर प्रयत्नवादी राहून आपला आवाका वाढवणं हाच उपाय आहे..
लो.टिळकांनी एक सोपे उदाहरण दिले आहे. तहान लागल्यावर प्यायला मिळणारे पाणी हे जर सुख असेल तर मनुष्य पाण्यात बुडाला तेव्हा तो सुखात बुडाला असे आपण का म्हणत नाही? म्हणूनच ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो म्हणतो त्याप्रमाणे इंद्रिय सुखापेक्षा मनाचे सुख आणि त्याहीपेक्षा बुद्धीचे सुख श्रेष्ठ आहे.

शरीराला क्लेश होत असताना मन प्रसन्न आणि सुखी ठेवण्याची ताकद प्रार्थनेत आहे. 'मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण॥' एकदा मनाचे आणि बुद्धीचे सुख गवसले की कितीही मोठे दु:ख आले तरी ते पेलण्याची क्षमता निर्माण होते. त्याचे कारण शोधून त्यावर मात करण्याची ईर्षा जागी होते आणि पुढच्या वाटचालीत दगडाला अडखळून पडण्याऐवजी त्याच दगडावर उभे राहून दूरवर नजर टाकता येते.

अंतरात्म्याची तार मौनातच...


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ४ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

' बोलणाऱ्याचे चणे विकले जातात , न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही ' असा आजचा काळ. साहजिकच शब्दांच्या वापराला प्रचंड महत्त्व आलं आहे. माध्यमातून माहितीचा भडिमार शब्दरूपानेच आपल्यावर होत असतो. या शब्दबंबाळ , वेगवान जगात आपणही सतत बोलत राहतो. क्वचित एकटं बसायची वेळ आलीच तर आपण स्वत:ला मोबाइल किंवा तत्सम यंत्राच्या स्वाधीन करतो.

आपण बोलतो ते काहीतरी मिळावं म्हणून. याउलट ' शून्य ' होण्यातला निर्गुण आनंद अनुभवलेले महापुरुष केवळ करूणेने बोलतात. ते मौनाचे सामर्थ्य जाणतात. अर्थाचा विचार केला तर मौन म्हणजे नि:शब्दता. परंतु मौन ही एक तन्मय मानसिक अवस्था आहे. आयुष्याच्या कोलाहलात सहसा ऐकू न येणारा आपला आतला सच्चा आवाज ऐकायचा असेल तर मौनाला पर्याय नाही. अंतरात्म्याची तार केवळ मौनातच छेडली जाऊ शकते आणि हे ज्याला साध्य झालं त्याचं अवघं जगणं झंकारून उठतं.
 ' न सांगताच तू मला उमगते सारे , कळतात तुलाही मौनातील इशारे...
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध , कळण्याचा चाले कळण्याशी संवाद '
कवी सुधीर मोघ्यांच्या या ओळी प्रेमाभोवती गुंफलेल्या असल्या तरी संत व ईश्वराच्या नात्यालाही त्या चपखल लागू होतात. मौन म्हणजे अंतर्मुखता , उमज , संयम , निग्रह , निर्लेपता! संत ज्ञानेश्वर ईश्वराशी ' बोलतात ' ते ' शब्देविण संवादु दुजेविण अनुवादु... ' अशा मौनातूनच. मौनाशिवाय मनन नाही , चिंतन नाही , नवनिर्मिती नाही.

एकदा एक प्रांतप्रमुख प्रवासाला निघाला. वाटेत लाओत्सु यांचा आश्रम होता. त्यांना वंदन करावे आणि जमेल तेवढे ज्ञान ओंजळीत घ्यावे या हेतूने तो आश्रमात आला. ' राज्यकारभारात व्यस्त झाल्यामुळे माझ्याजवळ सत्संगासाठी वेळ उरत नाही. मला आपण एक-दोन वाक्यात धर्माचे सार सांगू शकाल का ?' त्याने लाओत्सुंना विनंती केली. लाओत्सु उत्तरले ' अवश्य सांगेन! हे सारं फक्त एका शब्दात सामावलं आहे. ' तो चकित झाला. ' कोणत्या ?' लाओत्सु म्हणाले , ' मौन. ' त्याने विचारले , ' मौनाचे उद्दिष्ट काय ?' लाओत्सु म्हणाले , ध्यान. ' आणि ध्यान म्हणजे ?' लाओत्सु पुन्हा म्हणाले मौन. ज्यांना मौन साधलं त्यांचं निरीक्षण केलं तर जाणवतं त्यानंतर निर्मिलेली प्रत्येक गोष्ट , बोललेला प्रत्येक शब्द भयमुक्त असतो , खरा असतो , त्यात लोभ नसतो , अस्वीकृतीचा त्रागाही नसतो.

परा , पश्यन्ति , मध्यमा व वैखरी अशी वाणीची चार स्थित्यंतरं मानली जातात. विचारांचे बीज ज्या चेतनेमुळे रूजते ती परा , त्याला आलेलं मूर्त स्वरूप म्हणजे पश्यन्ति , त्याचं शब्दरूप म्हणजे मध्यमा व त्याचा उच्चार म्हणजे वैखरी. अव्यक्ताकडून व्यक्ताकडे होणाऱ्या या प्रवासात आपण जे बोलू इच्छितो त्याला
Is it true? Is it kind? Is it necessary?
हे प्रश्न विचारले तर वाणीला विवेकाची जोड मिळेल. मौन साधू शकलो नाही तरी त्या संकल्पनेच्या आपण जवळपास पोहोचू शकू. कवी सुमित्रानंदन पंत यांच्या शब्दात सांगायचं तर ,
 ' न जाने , खद्योतों से कौन , मुझे पथ दिखलाता तब मौन!
अहे सुख-दुःख के सहचर मौन! नहीं कह सकता तुम हो कौन! '

आनंदाचे डोही..


' हास्य ' या शब्दाला समाजात फारसं गंभीरपणे घेतलं जात नाही. तथाकथित विद्वान मंडळींच्या चेहऱ्यावर ते क्वचितच दिसतं. खरं तर माणसाचा स्वत:पासून समष्टीकडे होणारा प्रवास हास्यामुळे कितीतरी सोपा आणि आनंदी होऊ शकेल. फेंग शुई या चिनी वास्तुशास्त्राच्या प्रसिद्धीमुळे ' लाफिंग बुद्ध ' कित्येक घरांतून ​दिसतात. असं म्हणतात की चीनमधल्या त्यांग राजवटीच्या काळात ' पु ताई ' नावाचा हा थुलथुलीत पोटाचा भिक्ष एका झोळीत धान्य, सोनंनाणं आणि खाऊ घेऊन, हे सारं वाटत वाटत भटकंती करत असे. लहान मुलं त्याची फार लाडकी. विशेष म्हणजे ज्यांना यातलं काहीच मिळत नसे तेसुद्धा त्याच्या दर्शनानेच
' जब आवे संतोष धन, सब धन धूरि समान ' या उक्तीनुसार तृप्त होत असत.

' आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे ' या ओळीत तुकाराम महाराजांना यत्र तत्र सर्वत्र आनंदच दिसतो. सगुणातही, निर्गुणातही आणि त्याच्या विलयातही. आनंदाचे मूळ डोहात म्हणजेच अंतरंगात आणि पर्यायाने तो उमटतो तरंगात म्हणजेच बहिरंगात. आध्यात्मिक उंची गाठलेले हे संत स्वत:च आनंदमय झालेले असतात. वेगवेगळ्या धर्मांचे प्रेषित एकांतवासात जात आणि त्या चिंतनातून लाभलेले विचारधन वाटायला पुन्हा समाजात येत. त्यांच्या हृदयातील आनंदाच्या झऱ्याला ते समाजात मुक्तपणे वाहू देत. इतक्या मुक्तपणे की हे जग, निसर्ग त्याचाच भाग होऊन जावे. आपल्याला होणारा आनंद हा असा चिरंतन का असू शकत नाही? कारण आपण आनंद मोठमोठ्या गोष्टीत शोधत बसतो. कधी त्याला वस्तूंची नावं देतो तर कधी ’मोक्ष’ वगैरे म्हणतो. पण आनंद आपल्या आसपास असतो. लहान सहान गोष्टीत दडून बसतो.

आनंद वाटल्याने अधिक वाढतो याचा अनुभव घेण्यासाठी एक स्वच्छ मन (हे अशक्य नाही) आणि आनंदासाठी सताड उघडे ठेवलेले त्याचे दार, एवढे पुरेसे आहे. सगळं आपल्याला हवं तसं घडल्याने होतो तो सहेतुक आनंद आणि जगातल्या सौंदर्यात आणि हास्यात आपण काही भर घालू शकलो, तर होतो तो निर्हेतुक आनंद.
एक परकीय कथा नुकतीच वाचनात आली. पहाटे फिरून येताना एका व्यक्तीला एका घराच्या अंगणात झुडुपात अडकलेले सुरळी केलेले वर्तमानपत्र दिसले. घराचे दार बंद होते. त्या लोकांना हे वर्तमानपत्र कदाचित सापडणार नाही तेव्हा मदत करावी म्हणून त्याने ती सुरळी त्या घराच्या पडवीच्या दिशेने फेकली. मात्र त्याचा नेम चुकला आणि ती सुरळी जाऊन पडली थेट पडवीजवळच्या उंच झाडाच्या बेचक्यात. मग तो आपल्या घरी गेला आणि थोड्या वेळाने बाजारातून तसेच वर्तमानपत्र आणि काही ताजी फुलं घेऊन त्या घरी गेला. ' तुम्हाला विनोदबुद्धी आहे असं गृहीत धरून सांगतो, ' म्हणत त्याने सगळा प्रकार मोकळेपणे सांगितला आणि त्या मंडळींच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली.

परिस्थितीचा सहज स्वीकार करणं आणि विवेक वापरून अशा लहानसहान कृतीतून आनंद वाटणं हे नेहमीच इतकं सोपं असू शकतं. संत निकोलसचं ' सांताक्लॉज ' नावाने विख्यात असलेलं, नाताळच्या रात्री हळूच येऊन, भेटी देऊन, चिमण्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारं रूप म्हणजेसुद्धा एक प्रकारचा ' लाफिंग बुद्ध ' च. आपण स्वत: इतकं करू शकलो नाही; पण यांना शोधून यांच्या झोळीत भर घालू शकलो तर आपल्यात लपलेला ' लाफिंग बुद्ध ' आपल्याला सापडेल.

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २८ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

काय आहे अंतिम सत्य?


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २१ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

' या जगात संपूर्णतया चूक असं काहीच नसतं, अगदी बंद पडलेलं घड्याळही दिवसातून दोनदा योग्य वेळ दाखवतंच ना! ' असं पाऊलो कोएलो या लेखकाने म्हटलंय. या वाक्यातली खोच माणसाच्या आस्तिक किंवा नास्तिक असण्यालाही लागू पडते. काळाच्या कोणत्या तुकड्यावरून, कोणत्या बाजूला उभे राहून आणि कोणत्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीकडे पाहतो त्यानुसार आपली भूमिका ठरते. ईश्वराविषयीच नव्हे, कोणत्याही स्वरूपातील श्रद्धा म्हणजे ' आस्तिकता ' आणि ' डोळे झाकून एखादी गोष्ट स्वीकारायला दिलेला नकार ' म्हणजे ' नास्तिकता '. परंतु हे शब्द प्रामुख्याने ईश्वरनिष्ठेशीच जोडले गेले आहेत. ' माणसातला देव ' शोधणाऱ्या व्यक्तीला नास्तिक म्हणता येणार नाही. नवस बोलून देवाशी देण्याघेण्याचे ठरवणाऱ्याला आस्तिक कसे म्हणता येईल? विवेक महत्त्वाचा असतो. धर्मातील तत्त्वांवर बऱ्याचदा त्याच्या अनुयायांचा अहंकार मात करतो; तसेच काहीसे या बाबतीत घडताना दिसते.

खलील जिब्रानच्या एका लघुकथेमधे एक आस्तिक आणि एक नास्तिक विद्वानांचा वाद होतो. दोघेही तावातावाने सभेत आपापली बाजू मांडतात. सभा संपते. परंतु त्याचा परिणाम होऊन आस्तिक विद्वान नास्तिक होतो. जवळचे सारे धार्मिक ग्रंथ जाळून टाकतो. तर नास्तिक विद्वान देवालयात जाऊन आजवरच्या पापांसाठी देवाची क्षमा याचना करू लागतो; तो आस्तिक होतो. ज्यांच्या निष्कर्षांमागे वैश्विक विचार नसतो, अशा आततायी आणि संभ्रमित आस्तिक/नास्तिकांचे व्यक्तिश: आणि समाज म्हणूनही नुकसान होते. मूल्यबैठक नसलेले विज्ञान विध्वंसाच्या दिशेने जाऊ शकते; तर तर्कसंगत नसलेली श्रद्धा अंधश्रद्धेला जाऊन भिडू शकते. ज्यांच्या आस्तिक/नास्तिकतेला अभ्यासाचं आणि चिंतनाचं पाठबळ आहे, त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या-त्या भूमिकेमुळे अधिकाधिक उन्नत होते. त्याला अध्यात्मिक प्रगती म्हणायचे की वस्तुनिष्ठ विकास हे त्यांनीच ठरवायचे. गांधीजींच्या आस्तिकतेला सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरिण या भूमिका बदलतानाही दिसतात; पण त्यामागे सर्वंकष विचार, विशिष्ट अनुभूती असते. सुरुवातीला आपल्या कवितेतून ' तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन ' असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारतात, तेव्हा कवितेचे उत्तर असते.. ' स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही | उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||'

प्रख्यात विचारवंत रिचर्ड डॉकिन्स एका टप्प्यावर स्वत:ला ' अज्ञेयवादी ' मानू लागले. ' देवाच्या अस्तित्वाचं ज्ञान मला अजून झालेलं नाही त्यामुळे मी नास्तिकही नाही, ' अशी त्यांची भूमिका होती. गौतम बुद्धांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकजण सत्याचा शोध घेता घेता ज्ञानी झाले. आस्तिकता असो वा नास्तिकता; तो या सत्यशोधनाच्या मार्गावरचा एक थांबा आहे. अंतिम सत्य नव्हे. आपल्यासारख्यांना किमान या थांब्यापर्यंत पोचायचे असेल तर त्यासाठी वैचारिक घुसळण व्हायला हवी. वैयक्तिक अनुभवांवर आधारलेली आपलीच भूमिका योग्य असा अट्टाहास नसावा. हा प्रवास ज्ञानाच्या दिशेने होत असल्याने त्यात आपले आणि पर्यायाने मानवजातीचे कल्याणच आहे.
 ' तुका म्हणे होय मनासी संवाद,
आपुलाचि वाद आपणासी।
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही,
मानियेलें नाही बहुमत।। '

मीपण फोडिता फुटेना


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

उसळणाऱ्या लाटांचे रौद्र रूप पाहात एखाद्या महासागराच्या तीरावर किंवा खळाळत कोसळणाऱ्या एखाद्या महाकाय प्रपातासमोर आपण उभे असलो तर निसर्गाचे हे विराट रूप पाहून आपण स्तिमित होतो, स्तब्ध होतो. आपल्या आयुष्याची पत आणि प्रत काहीही असली तरी या भव्यतेपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याला आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. एका अर्थी ' मी ' आपल्यापासून बाजूला होतो. परंतु ही भावना बऱ्याचदा क्षणभंगुर असते.
' जीवन त्यांना कळले हो। मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो।। ' असे कवी बा. भ. बोरकर सांगून जातात. दासबोधात सांगितलेले ' मी पणा ' चे हे परिणामदेखील आपल्याला उमजत असतात. ' मीपणे मीत्री तुटे। मीपणे प्रीती आटे। मीपणे लगटे। अभिमान अंगी।। मीपणे विकल्प उठे। मीपणे कलह सुटे। मीपणे संमोह फुटे। ऐक्यतेचा।। ' आपल्याला हेदेखील मान्य असते... ' मीपण कोणासिच न साहे। ते भगवंती कैसेनि साहे। म्हणौनि मीपण सांडूनि राहे। तोचि समाधानी।। ' मात्र भल्याभल्यांचा ' मी ' पणा सुटत नाही, तिथे आपल्यासारख्यांचं काय! आपण रोजच्या आयुष्याकडे वळताच, दूर नेऊन सोडून दिलेल्या मांजराच्या पिल्लासारखा, हा ' मी ' पुन्हा मूळ जागी परत येतो. समर्थ रामदास म्हणतात, ' मीपण शस्त्रे तुटेना। मीपण फोडिता फुटेना। मीपण सोडिता सुटेना। काही केल्या।। '

मग ' मी या सगुण-निर्गुणाचाच एक सूक्ष्मतम अंश आहे ' या दृष्टीने ' मी ' कडे पाहिले तर कदाचित त्याचा सकारात्मक स्वीकार करणे शक्य होईल. जपानी भाषेमधे ' वाताशी ' या शब्दाचा अर्थ ' मी ' असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ' वाताशी ' या शब्दाचा उपयोग करतात. जिथे ' मी ' आवश्यक असतो तिथेही ' वाताशी ' शिवायच क्रियापद वापरता येते, असे निरीक्षण लेखिका सानिया नोंदवतात. ' मी ' पासून ' आम्ही ' पर्यंतचा प्रवास हेच तर जपानच्या प्रगतीचे मर्म नसावे? मात्र हे वैयक्तिक स्तरावर सोपे नाही. ' मी पणा ' सोडणं दूरच, ' मी ' शोधायचा प्रयत्न केला तरी ' बुरा जो देखन मै चला बुरा न मिलया कोय। दिल खोजा जो मै अपना मुझसे बुरा न कोय।। ' या संत कबीरांच्या दोह्यातून त्याचे खरे रूप दिसते. ' मी ' शोधावासा वाटणं ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी असावी आणि ' मी पणा ' सुटणं ही अंतिम.

रात्रीच्या सुमारास एक मित्र दुसऱ्या मित्राला घ्यायला रेल्वे स्थानकावर आला. घरी जाताना सिग्नलचा लाल दिवा पाहताच त्याने गाडी थांबवली. चौकात चिटपाखरूही नव्हते. मित्र म्हणाला, ' कोणीच पाहत नाहीये, चल की! ' तेव्हा तो म्हणाला, ' अरे, आपण तर पाहत आहोत ना? '
 ' मी ' सुटला नाही, पण ' जागा ' असला तर हेही नसे थोडके.

नेमके काय हवे ?


' जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते ; ती म्हणजे ' प्रयोजन ;.कुठेसे हे वाचले' या जगण्याचे काय करू ?' हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात येतच असतो . त्याचे उत्तर शोधण्याची धडपड म्हणजेच आयुष्य . माणूस समाजाशी इतका जोडला गेलेला असतो की हे प्रयोजन कालांतराने वैयक्तिक राहात नाही . देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी , सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते , ' आपण राज्य नीट चालविले नाही , तर तो कुणा एका व्यक्तीचा नाकर्तेपणा असणार नाही , सबंध देशाचा असेल .' स्वातंत्र्यानंतर भारताने आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने , पहिली पावले साधारणपणे एकाच वेळी टाकली . उद्दिष्ट्य नजरेसमोर असलेल्या जपानने वेगाने प्रगती केली ; आपण अजून चाचपडत आहोत , त्याचे कारण हेच असावे . स्वत : च्या मूलभूत गरजा भागवणे यालाच ध्येय मानले तर माणूस आणि प्राण्यात फरक तो काय ?

जगण्यासाठी पैसा हवाच ; पण पैसा हेच प्रयोजन उरले तर त्या नादात आपण आयुष्यच तर विकून टाकत नाही ना , हे भानही हवे . ' मी , माझे घर आणि नोकरी ' याच परिघात फिरणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर करावे तरी काय असा बिकट प्रश्न पडतो . साहित्य , संगीत , खेळ , समाजकारण अशा जीवनाच्या विवीध अंगांना भिडणाऱ्या मंडळींना या इवल्याशा आयुष्यात ' करावे तरी काय काय ' असा प्रश्न पडतो .
सामाजिक कार्यकर्ते डॉ . अभय बंग म्हणतात , ' एक प्रश्न सोडविणे हा जीवनातील सर्वात उज्ज्वल क्षण असतो . प्रश्न दिसतात , ते पाहिले पाहिजेत . हाक कानी पडते , ती ऐकली पाहिजे . आपल्या कर्तृत्वाने जग बदलून जाईल , असे वाटले पाहिजे . एखादे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करून तर पाहा .' एक मुलगा भरतीबरोबर किनाऱ्यावर येऊन पडलेले मासे एक एक करून पुन्हा समुद्रात फेकत होता . हे दृश्य बघणाऱ्या एकाने त्याला विचारले , ' या हजारो माशांपैकी दोन - चार माशांना जीवदान देऊन असा काय फरक पडणार आहे ?' त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फेकत म्हटले , ' या माशाला विचारा , काय फरक पडतो ते .'

प्रत्येकजण अशा चिमुकल्या प्रयत्नांनी किमान आपापले जग नक्कीच सुंदर बनवू शकतो . ' जगण्याचे प्रयोजन ' भारतीयांसह साऱ्या जगाला समजावून सांगणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता . मनुष्याच्या वृत्ती - प्रवृत्ती , गुण - अवगुण , स्वार्थ - परमार्थ , लौकिक - अलौकिक अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह करणारा हा ग्रंथ , ' जगावे का ' याचे उत्तर अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या मानवजातीला देतो . वय , विचार , अनुभव , परिस्थिती यानुसार उद्दिष्ट्यप्राप्तीचे साधन बदलत राहते . एखाद्या गावाला जाताना आपण वाहनाचा वापर करतो आणि इच्छित स्थळी पोचल्यावर ते सोडून देतो . त्या वाहनात आणि मार्गात आपण फार गुंतून पडत नाही . सगुण जीवनात असे करणे सहजी जमत नाही . मात्र बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद म्हणतो , ' यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे , हे मी सांगू शकणार नाही . पण स्वतःला ओळखून स्वतःला , स्वतःसाठी , स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय .'

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ७ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

गुंतता गुणांकात...


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २९ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

आयटी क्षेत्रातल्या नोकरीमुळे पायाला चाक लागलेला माझा एक तरुण नातलग. दौरे , प्रोजेक्टची डेडलाईन या सगळ्यात श्वास घ्यायची त्याला फुरसत नाही. त्याचं म्हणणं , ' तुज सगुण म्हणू की निर्गुण रे ' असले प्रश्न पडायचं का त्याचं वय आहे ? आणि असलंच तरी या निवृत्तीनंतर किंवा फावल्या वेळात करायच्या गप्पा आहेत. ' त्याला विचारलं , हा विषय जर तुझ्या ' कॉर्पोरेट ट्रेनिंगचा ' भाग असेल तर वाटेल ना तुला त्यात रस ?'

कॉर्पोरेटक्षेत्रात पूर्वी कर्मचाऱ्यांचा ' आय क्यू ' ( बुद्ध्यांक) वाढावा (पर्यायाने उत्पादनक्षमता वाढेल) म्हणून प्रयत्न केले जात. मग ' ईक्यू ' ( इमोशनल कोशंट-भावनांक) वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र या क्षेत्रात इतक्या वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींची सरमिसळ असते , की त्यातच कामाचा ताण , वैयक्तिक-कौटुंबिक प्रश्न , या सगळ्यात भोवंडून गेलेले काही जीव आत्महत्येच्या टोकालाही जातात. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा ' स्पिरीच्युअल कोशंट ' म्हणजेच ' एसक्यू ' किंवा ' आध्यात्मिक गुणांक ' वाढावा म्हणून कंपन्या प्रशिक्षण देऊ लागल्या आहेत. एकदम जादू होऊन ' आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन ' वगैरे त्यातून कळले नाही तरी आतली तगमग कमी होण्यासाठी याची निश्चितच मदत होते. जगातल्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांची , धार्मिक विचारप्रवाहांची , ध्यान संकल्पनेची ओळख करून दिली जाते. बाकी अभ्यास पुढे तुमचा तुम्ही करणे अपेक्षित असते. खरंतर घराघरातील धर्मग्रंथांत , अक्षर वाङ्मयात , वडीलधाऱ्यांच्या संस्कारात एसक्यूचा अभ्यासक्रम ठासून भरलाय. याशिवाय पूर्वी कीर्तन-भारूड-प्रवचनं अशी माध्यमं वापरली जात. मात्र हीच गुटी कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या आधुनिक वेष्टनामधून दिली किंवा एखाद्या लेखकाने इंग्लिश पुस्तकातून दिली तर ती लगेच तरुणाईला आवडू लागते. तसे का होईना , पण या एसक्यूकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे. आपली अस्तित्वशक्ती काय असावी ? ती ' सगुण , निर्गुण की त्याचा संगम ' हे कोडेही मग उलगडता येईल.

सगुण नाशवंत आणि निर्गुण शाश्वत हे तर्कदृष्ट्या सर्वांना मान्य असते. पण म्हणून सगुणाचे सौंदर्य आणि निर्गुणाची गूढ ओढ दोन्ही कमी होत नाही. आध्यात्मिक गुणांक (एसक्यू) जसजसा वाढत जाईल तसतसा सगुणाच्या प्रेमाचा आनंद घेताना ' शेवटी हे तर प्रतीक आहे , मग तरी आपण यात का गुंततो आहोत ? या सगळ्या उपचारांना खंरच काही अर्थ आहे का ?' अशी संभ्रमावस्था हळूहळू दूर होऊ शकते. कुणी मानसपूजा करावी , कुणी षोडशोपचारे , कुणी एखाद्या प्रकल्पासाठी जीवन झोकून कार्याने पूजा बांधावी , कुणी उत्सव साजरा करावा , कुणी तेजाला वंदावे , कुणी मूर्तीला. नितळ , स्वच्छ मनाला सगुणाची जडलेली सवय म्हणजे अपराध वाटत नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात ' अद्वैती तो नाही माझे समाधान। गोड हे चरणसेवा तुझी॥ '

आयक्यूसारख्या शास्त्रीय कसोट्या आध्यात्मिक गुणांकाला लावता येणार नाहीत. कृतीला असलेली विचारांची बैठक किती पक्की हा मात्र चांगल्या एसक्यूचा निकष असू शकतो. एसक्यूबरोबर मानसिक स्वास्थ्य वाढते आणि प्रसन्नतेचा शिडकावा होतो हे निर्विवाद.

अस्तित्वाचा शोध


लहानपणी चांगलं, वाईट यातला भेद समजायला सोपे व्हावे म्हणून मोठी मंडळी, 'असं केलं तर देवबाप्पा रागावेल' असा धाक घालतात. देवघरात पाहून हा देवबाप्पा म्हणजे 'अमूक अमूक' असे चित्र, प्रतिमा किंवा मूर्ती डोळ्यासमोर येते. वेद-उपनिषदांनी ईश्वर या संकल्पनेला रूपरेषा दिली तर पुराणकथांनी त्याला विविध आकार दिले. देवबाप्पाचे हे आकार मनामनात मूर्त स्वरूपात इतके कोरले गेले आहेत की या आकारांची मनावरची पकड सैल करून निराकाराकडे प्रवास करणं अवघड आहे. निर्गुणाचा शोध घ्यायचा तर माध्यम हवे आणि ते तर सगुण असते. असा हा पेच आहे.

या प्रवासाची सुरुवात क्लिष्ट आहे. सगुणाच्या सुरक्षित दृश्यकोषाला भेदून निर्गुणाच्या अवकाशाला गवसणी घालायचे काम सोपे कसे असणार! गरुडाच्या मादीची पिल्लांना पहिला आणि शेवटचा धक्का देताना अशीच मनोवस्था असते. आपल्या पिल्लाला ती हळूहळू घरट्याच्या कडेला सरकवत नेते. उंचावर बांधलेल्या त्या घरट्याच्या खाली, वर, सभोवताली, पिल्लू पडलेच तर त्याला झेलायला हवेशिवाय दुसरं काही नसतं. पण त्या धक्क्यातून सावरताना ते पिल्लू पहिल्यांदा पंख पसरणार असतं. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी त्याला आपल्या पंखांचं महत्त्व कळायला हवं. मादी एक एक करून पिल्लांना धक्का देते आणि उंच आकाशातली त्यांची गरूडभरारी नजरेत साठवून घेते.
सगुणाकडून निर्गुणाकडे होणारा प्रवास काहीसा असाच असतो. भयमुक्तीचा हा क्षण कुणाला एखाद्या उंच पर्वतशिखरावर झेंडा रोवताना गवसतो, कुणाला बंगी जंप करण्यासाठी स्वत:ला खोल दरीत लोटून देताना गवसतो, कुणाला अशक्यप्राय अंतर धावून, पोहून पार करताना गवसतो, कुणाला हृदयाचा वेध घेणाऱ्या एखाद्या अनवट सुरावटीत, कुणाला एखाद्या संशोधनाच्या ध्यासात, कुणाला आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून समाजकार्याला वाहून घेण्याच्या निर्णयात तर कुणाला प्रपंचात राहूनही राग-द्वेषासारख्या विकारांवर नियंत्रण ठेवता येण्याची शक्ती मिळण्यात गवसतो.

या सगळ्या कृतींमधे एक साम्य आहे. सर्वत्र आढळणाऱ्या ईश्वरी अंशाचा असा विविध स्वरूपात अनुभव घेता येणं ही आनंदाची परमावधी आहे. विज्ञान त्याला तेजस्वरूप किंवा ऊर्जास्त्रोत मानते, निरीश्वरवादी त्याला निसर्गस्वरूप मानतात, तर ईश्वरवादी त्याला आत्मस्वरूप मानतात. शोध तेजाचा असो, निसर्गातल्या गुपितांचा असो वा आत्म्याचा; हा प्रवास अलौकिक आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जातानाचा विलयबिंदू कळत नाही; कारण मानवी अस्तित्व या दोहोंचा सुरेख संगम आहे. जसे एखादे फूल. फुलाचा नुसता आकार किंवा नुसता सुगंध पुरेसा नाही. रूप-रंग आणि सुगंध हे सारे मिळूनच फुलाला अस्तित्व प्राप्त होते. पूर्णत्व मिळते. बालकाचा गोंडसपणा त्याच्या लडिवाळ रूपाबरोबरच त्याच्या निरागस हास्यात असतो. सगुणाची मिठी सैल करायची म्हणजे त्याचा त्याग करायचा असे नाही तर त्याच्यातच अडकणाऱ्या मनाला या सुगंधाची, हास्याची ओळख करून द्यायची आहे.
 मूर्त तू मानव्य का रे, बालकाचे हास्य का? या इथे अन त्या तिथे रे,सांग तू आहेस का?


(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २२ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

आनंद हा चंदनासारखा


शाळकरी वयाच्या भाचीने सहज प्रश्न केला, ' जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? ' तिच्या वयाचा विचार करता तिला ऐहिक श्रीमंतीच अभिप्रेत होती. त्यामुळे तिला उत्तर दिले, ' वॉरन बफे किंवा बिल गेट्स. ' त्यावर तिचा प्रश्न, ' ते इतके श्रीमंत कसे? '... चिमुकल्यांचे प्रश्न कधी कधी आपल्याला अंतर्मुख करून जातात. लक्ष्मी हे धनवृद्धीचं केवळ प्रतीक मानायचं, की तिला पुराणकथांचे संदर्भ देऊन देवीच्या स्वरूपात बघायचं? वैभवाप्रति कृतज्ञता म्हणून सोनं-नाण्याचं पूजन करायचं की सतत काम करत राहून ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ' म्हणत खऱ्या अर्थाने लक्ष्मी वाढवायची? थोडक्यात, लक्ष्मी या संकल्पनेचा सगुण स्वीकार करायचा की निर्गुण? सगुण स्वीकारात आपसूक लीनता येते. पण निर्गुण स्वीकार करणाऱ्या आणि जगभरात व्यवसाय नेणाऱ्या नारायण मूर्तींसारख्या लोकांवरही तिचा वरदहस्त आहे आणि सगुण स्वीकार करणाऱ्या कित्येक धनदांडग्यांकडे तिने अचानक पाठही फिरवलेली आहे. सरस्वती देवीला सगुण स्वरूपात न अनुभवताही जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या रूपात तिचीच उपासना केली आणि आपल्या शोधांनी मानवजातीचं कल्याण केलं.

खरं तर लक्ष्मीतत्त्व असो वा सरस्वतीतत्त्व; ते आपल्या ' मनगटात, बुद्धीत आणि आत्म्यात, ' म्हणजे आपल्यातच सामावले आहे. या तत्त्वाचे आणि मानवाचे अद्वैत आहे. परंतु सगुण म्हटले की ते ' दिसते ', अनुभवल्यासारखे भासते. निर्गुण म्हटले की ते शोधावे लागते, उलगडावे लागते. कदाचित म्हणूनच सगुणाचा स्वीकार सार्वत्रिकरित्या सहजपणे होतो. निर्गुणाचा स्वीकार म्हणजे अश्रद्धा असा एक अपसमज आहे. मात्र संतसाहित्यापासून या निर्गुण स्वरूपाचाच पाठपुरावा केलेला आढळून येतो.
' मनें कल्पिला विषयो सोडवावा। मनें देव निर्गुण तो वोळखावा।
मनें कल्पितां कल्पना ते सरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥ '
या श्लोकात समर्थ हेच अधोरेखित करतात. ईश्वरतत्त्वाची मनाने रचलेली प्रतिमा, मनाचीच कल्पना सोडून द्यावी. ईश्वरतत्त्वाचे निर्गुण स्वरूप जाणून घ्यावे. द्वैत मानले की ' तो ' आणि ' मी ' हा भेद आला. द्वैत सोडले की तोच मी हे जाणवते; पण या जाणिवेत अहंभाव नसावा. मन नितळ करून साऱ्या स्वनिर्मित कल्पना दूर कराव्या.

एका मंदिरात गीतेतील निवडक श्लोकांचे इंग्रजी भाषांतर कोरलेले आहे. त्यात निर्गुण शब्दाचे भाषांतर 'व्हॉईड ऑफ गुण' असे लिहिले होते. समर्थांच्या शब्दांच्या पार्श्वभूमीवर ' गुण ' म्हणजे जणू कल्पनेचेच कंगोरे. सज्जन सहवासाने हे कंगोरे वितळवणे सोपे होते, तशी बुद्धी निर्माण होते. ज्यांना सगुण साधनेने ऊर्जा मिळते, पुजेच्या उपचारांनी मांगल्याची अनुभूती मिळते, सण-वार साजरे करण्यातून आयुष्यात चैतन्य फुलल्यासारखे वाटते त्यांनी अवश्य सगुण स्वरूपात त्या ईश्वरतत्त्वाची आराधना करावी. त्या आराधनेतून मिळणारा आनंद उत्सवाच्या रूपाने एकमेकांना वाटला जातो. आनंद हा चंदनासारखा असतो. त्याचा टिळा दुसऱ्याला लावताना आपली बोटेही सुगंधाने माखून निघतात. मात्र त्याचबरोबर या साऱ्या बाह्यकृतींपलीकडे असलेल्या निर्गुण ईश्वरतत्त्वाचा शोध घेणे थांबवू नये. समाधानाचे, मन:शांतीचे केंद्र अंतिमत: तेथेच आहे.


(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)