ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथील पापविमोचक येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यावर वीज कोसळली. उत्तराखंडमध्ये महापुरात केदारनाथाचे मंदिर पाण्याखाली गेले. ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्यांना त्या वीजेत आणि पाण्यातही त्याचेच रूप दिसत असल्याने त्यांच्या श्रद्धेवर ओरखडा उमटला नाही. विचारपूर्वक ईश्वर नाकारणाऱ्यांसाठी ही केवळ नैसर्गिक उलथापालथ, तर सर्वसामान्य माणूस मात्र श्रद्धा-अश्रद्धेबाबत साशंक होतो आणि समाधान घालवून बसतो. अंधश्रद्धेच्या आहारी जातो किंवा ईश्वराचा तिटकारा करू लागतो. कारण ईश्वराला कोणत्या ना कोणत्या प्रतीकाच्या स्वरूपातच पाहण्याचा त्याचा अट्टाहास.
सगुण प्रतीकांमधे ईश्वर शोधणे संतांना देखील मान्य नाही. समर्थ म्हणतात,
धातु, पाषाण, मृत्तिका। चित्रलेप, काष्ठ देखा । तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडिली ।
प्रतीकांच्या मनावरील पगड्यामुळे पारंपरिक, पौराणिक कथा एक प्रकारच्या धार्मिक दडपणातून ऐकल्या जातात. त्याला अभ्यासाची जोड नसली की, त्यातून सहजपणे आध्यात्माचा बाजार मांडला जातो. याउलट काहींना धार्मिक ग्रंथांमधले सगळेच बाळबोध, विसंगत किंवा अतार्किक वाटू लागते. ईसापच्या कथांमधले प्राणी बोलतात हे आपण स्वीकारतो, कारण त्यातला आशय आणि बोध आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. याच न्यायाने पौराणिक कथांना सत्य-असत्याचे, श्रद्धा-अश्रद्धेचे किंवा तर्काचे निकष लावण्यापेक्षा त्यातले तथ्य आणि प्रतीकांमागच्या संकल्पना समजाव्यात.' देवीला आठ हात? काहीतरी काय!' असे प्रतीकाबाबत नकारात्मक बोलताना संगणकाच्या भाषेतलं मल्टीटास्कींग मात्र आपण सहज स्वीकारतो. या अष्टभुजांमागे 'जो जे वांछील तो ते लाहो' हा संदेश असू शकतो असा विचार देखील आपण करू शकतो.
भारतीय आध्यात्मिक अभ्यासक रामायणाचं विश्लेषण वेगवेगळ्या कोनांतून करतात. काहींनी रामाला विवेकाची, सीतेला मनाची, दशानन रावणाला अनंत विकारांची आणि हनुमानाला योगसाधनेची उपमा दिली आहे. ते म्हणतात मनरूपी सीतेचं ज्यावेळी विकाररूपी रावण हरण करतो, त्या वेळी मन आणि विवेक यांचे पुनर्मिलन योगसाधना घडवते. विनोबांनी महाभारताला रूपक म्हणून अभ्यासले. शरीर म्हणजे कुरूक्षेत्र,त्यातील चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचं द्वंद्व म्हणजेच तामसी कौरव आणि सात्त्विक पांडव यांच्यात सुरू असलेलं युद्ध.
बुद्धिवाद आणि आध्यात्म हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. सत्त्व आणि सालपट यातला फरक ओळखण्याचा , प्रतीकांमागचा संकेत आणि संदर्भ जाणून घेण्याचा नीरक्षीरविवेक जिथे वाढतो त्याच समाजाची प्रगती होऊ शकते. ईश्वराच्या रूपाबद्दलचे किंतु-परंतु विरण्यासाठी आधी स्वत:ची तर नीट ओळख व्हायला हवी. 'स्व-रूप' या शब्दातच ते उत्तर दडलं असेल का?
No comments:
Post a Comment