जम्मूच्या रघुनाथंदिरापासून रामेश्वरम् पर्यंतचे उभे आणि सोमनाथ ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचे आडवे असे श्रद्धेचे धागे एकत्र गुंफून भारत नावाचं महावस्त्र विणलं गेलं आहे अशा अर्थाचं एक वाक्य वाचलेलं आठवतंय. बनारस -प्रयागराज- अयोध्या प्रवासामुळे त्यातल्याच एका जरतारी धाग्याला स्पर्श करता आला.
आवरून चेक आऊट करून आम्ही १२ आणि आमची लाडकी ९७११ अयोध्येकडे निघालो. आमचा भडकू चालक एव्हाना आम्हाला आणि आम्ही त्याला सरावलो आणि एकत्र नांदू लागलो होतो. मस्तपैकी अंताक्षरी खेळलो. (त्याच्याबरोबर नव्हे) ह आल्यावर मावशी ’हरीच्या घरी एक रंगीत काठी’ वगैरे म्हणणार आणि मी उषा उत्थुपचं ’हरी ओम हरी’ असा विजोड प्रकार होऊ नये म्हणून श्लोक बिक चालणार नाही ही अट घातली. जिथे ’ शिवतांडव स्तोत्रं’ वगैरे म्हटली तिथे बिचार्या मावशीला ’अखियोंसे गोली मारे लडकी कमाल रे’ वगैरे ऐकून मनात ’शिव शिव’ म्हणावं लागत असणार. जिजाजी मधूनच ठेवणीतली जुनी गाणी काढत होते. मामी, रोहिणीताई, स्वातीवहिनी तयारीत होत्या.आम्हा मर्त्य जीवांकडे दयार्द्र कटाक्ष टाकून दादा स्वप्ननगरीत गेला होता. मामा ठरलेलं अक्षर विसरून भलतीच गाणी सुचवत असला तरी पक्का खेळाडू होता. मिलींदला जगात एकच चाल येत असल्याने त्याने कोणतंही गाणं सुचवलं तर आधी ते गाणं ओळखून मग मूळ चालीत गायचं अशी सर्कस करत भेंड्या लावायला मजा आली. गाणी, गप्पा आणि खाणं यात केव्हा अयोध्येत शिरलो कळलंच नाही.
अयोध्या गाव लहानसं वाटलं. इमारती, रस्ते, हॉटेल्स, टुमदार घरं सगळं स्वच्छ, चकाचक आणि नव्याने वसवलेलं वाटत होतं. मनुनिर्मित नगरी आता मोदीनिर्मित नगरी झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. अर्थात प्रयागराजला जागोजागी झळकणारे मोदी-योगी इथे एकाही फलकावर दिसले नाहीत. शब्दामृतने ’पंचशील’ या हॉटेलला बुकींग केलं होतं. सवयीने हॉटेलची वेबसाईट लॅपटॉपवर पाहिली. त्यात पंचशील स्पेलिंगचा शेवटचा एल बहुतेक फॉन्ट साईज अॅडजस्ट न झाल्याने एकटाच तिसर्या ओळीत लटकताना पाहून हॉटेलचा एकूण आनंद असणार असं वाटलं होतं. पण हॉटेल एकदम मस्त लग्झरियस निघालं. इथलं जेवण सुद्धा उत्तम होतं अर्थात बनारसला खाण्याचा जो उत्साह होता तो सतत कचोर्या, छोले, पनीर, नान, सूप, ज्यूस, लस्सी पाहून कमी झाला होता आणि 'उदरभरण नोहे..' वर गाडी आली होती. इकिगाईने एका वेळेला भुकेच्या ८० % च खावं असं सांगितल्याचंही आता आठवू लागलं होतं. तर समोर वाढलं ते खानपान आटोपून शरयूतीरी निघालो. हंपीचा अपवाद वगळला तर फिरायला जाण्य़ापूर्वी तिथे नदी, तळं, समुद्र असा काहीतरी जलस्रोत आहे ना याची नेहमीच खात्री करते. इथे तर गंगा-यमुना आणि आता शरयू नदी. You never touch the same river again असं म्हणतात या अर्थाने रामस्पर्श झालेली शरयू आज नसणार पण रामाचं सान्निध्य लाभलेली शरयू तर तीच आहे. ज्येष्ठ स्नेही श्रीपादजी कोठे यांच्या 'नदी' कवितेतल्या काही आवडलेल्या ओळी, रामायणातल्या उलथापालथींना साक्ष असलेल्या शरयूचीच रूपं आहेत असं वाटतं.किती खेळली इथे पाऊले किती नांदली इथे राऊळे
किती पिढ्यांची किती युगांची इथे दाटली किती वादळे
कधी नर्मदा कधी गोदा तू कधी तू कृष्णा, सरस्वती तू
भगीरथाच्या कर्तृत्वाची शिव जटेतील गंगाही तू
कृष्णसख्याची होते यमुना रामासाठी शरयू जीवन
विठ्ठलपायी गिरकी घेता भीमा होते पतीत पावन
कुठे आरती मानसपूजा कुठे भक्तीची पवित्र धारा
कुठे तुझ्यातच मिळून जातो काजळकाळा कृतघ्नपारा
सांजघडीची पायवाट तू चराचराचा आर्त नाद तू
देवाघरची भाग्यशलाका पृथ्वीवरली सार्थकता तू
शरयूतीरी आम्ही पोचलो तेव्हा आरतीची तयारी सुरू होती. गंगाआरतीसारखीच यथासांग आणि नेत्रदीपक आरती झाली. रोषणाई केलेल्या कमानींखाली रेशमी पिवळ्या,केशरी पोशाखात उभ्या असलेल्या पुजार्यांच्या हस्ते. झगमगत्या दीपमाळा उंचावत लयबद्ध तालबद्ध. गंगाआरतीचा थाट, तशी अफाट गर्दी मात्र इथे अजिबात नव्हती आणि पात्रातून आरती अनुभवण्याची सोयही. तरीही त्या गार वार्यात, अंधारात चमचमणार्या ज्योतींनी ओवाळली जाणारी शरयूमाता बघत राहावी असं वाटलं. हे ’इव्हेंट’ पर्यटनाला चालना देण्यासाठी असले तरी फार सुंदर सादर केले जातायत. स्वच्छ काठावरच्या स्वच्छतागृहांपैकी एकावर ’for Transgenders only' अशी पाटी पाहून ’भारत बदल रहा है’ याची चुणूक दिसली.
बाहेर पडताना रंगीत प्रकाशझोतांमध्ये न्हाऊन निघालेल्या ’रामजी की पैडी’ चं सुंदर दृश्य दिसलं. श्रीराम इथूनच शरयूस्नानासाठी जात या मान्यतेनुसार शरयूतीरावरच्या घाटांच्या रांगेला ’रामजी की पैडी’ नाव दिलेलं आहे. सगळे एकत्र जमेतो पैडीवरची वर्दळ बघत राहिले.
इ-रिक्शांनी परत निघालो. प्रशस्त ’धर्ममार्ग’ पार करताना दुतर्फा रामायणातल्या मह्त्वाच्या घटनांवर आधारित म्युरल्स चितारलेली दिसली. आपल्याकडे भिंती, फ्लायओव्हर खाली जी बटबटीत चित्रं काढतात त्या तुलनेने ही फारच दर्जेदार आहेत. वाटेत ’भारतरत्न लता मंगेशकर’ चौकात सरस्वतीच्या वीणेची प्रतिकृती स्थापन केलेली दिसली. ’पंचशील’ मध्ये सुग्रास जेवून (80 %) आपापल्या खोलीकडे निघणार तोच आयोजकांनी एका व्याख्यानाची घोषणा करत श्री, व सौ. आफळे यांना मंचावर आमंत्रित केलं. मऊ गादी बोलावत असल्याने क्षणभर वैताग आला, त्यात परतीच्या रेल्वेचं काही खरं दिसत नसल्याने मिलींदच्या मदतीने हवाईमार्गाचे पर्याय शोधायचे होते. पण आफळयांकडून ’राम मंदिर निर्माणाचा प्रवास’ ऐकल्यावर अयोध्या ट्रीप सार्थकी लागली असं वाटलं. मटेरियल मॅनेजमेंटचे आयआयटीयन पुण्याचे डॉ. जगदीश आफळे श्रीराम जन्मभूमी न्यासाने नियुक्त केलेले प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांची पत्नी माधुरी यादेखील मंदिर शिल्पकलातज्ञ आहेत. सध्या त्या मंदिराचा ’देणगी विभाग’ सांभाळतात. या आधी तीन वर्ष हे दांपत्य अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तारक म्हणून कार्यरत होतं. आफळे यांना देश-परदेशातील मोठ्या बांधकाम प्रकल्प उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे.आता हा पावणेतीन एकरात पसरलेला विशाल प्रकल्प. ३६० फूट उंच आणि २६५ फूट रूंद श्रीराममंदिर तर साकार झालं. संकल्पित योजनेनुसार मंदिराचे ३९४ खांब, १२ दरवाजे. गूढ मंडप, रंगमंडप, नृत्य मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप, सीता व अन्य देवतांची मंदिरे त्यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वाला जात आहेत. प्रत्येक खांबावर १२ ते १६ मूर्ती आहेत आणि एक मूर्ती घडवायला कारागिरांना १५ दिवस लागतात. हजार वर्ष टिकेल या गुणवत्तेचं व दर्जाचं मंदिर तयार करण्याचा संकल्प असल्याने या सगळ्यासाठी किमान अडीच वर्ष अजून लागणार आहेत. मंदिर उभारणीला एल अॅंड टी सारख्या कंपन्या, सीबीआरआय, एनजीआरआय सारख्या संस्था, अनेक आयआयटीयन्सनी मोलाची मदत केल्याचं त्यांनी नम्रपणे सांगितलं. रामलल्लाच्या प्रकाशतिलकामागची lens ची वैज्ञानिक करामत उलगडली. निर्माण कार्यात आलेल्या अडचणी कशा सोडवत गेले ते ही सांगितलं. पहिल्याच पावसात मंदिर गळत असल्याच्या बिनबुडाच्या आरोपाचाही संयतपणे समाचार घेतला. ’मी’ आणि ’मोदीजी’ किंवा मी आणि ’योगीजी’ किंवा माझे कर्तृत्व असा उल्लेख त्यांनी एकदाही केला नाही.
मातीत हात घातल्याशिवाय शेतीवर बोलू नये पण आफळे १९९२ च्या कारसेवेत स्वत: सहभागी होते. साहजिक १६ व्या शतका्त बाबराने केलेल्या रामजन्मभूमी विध्वंसापासून न्याय्य मार्गाने मंदिरनिर्मितीपर्यंतचा प्रवास त्यांनी भावुकपणे कथन केला. मुघल आक्रमकांकडून जन्मभूमी परत मिळवण्यासाठी हिंदूंनी लढलेली अनेक लहानमोठी युद्ध, संघर्ष, हिंदू धर्म टिकवण्यात शिखांनी दिलेलं योगदान याचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. कंबोडिया, थायलंड, त्रिनिनाद ते इस्लामाबाद जवळच्या सैदपूर पर्यंत पसरलेली राममंदिरं ’रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणार्यांना किमान ’राम’ ही संकल्पना अस्तित्वात असल्याचा आणि प्राचीन असल्याचा पुरावा देतात. तरीही रामाचा जन्म अयोध्येतच झाला याचा आजच्या कायद्याच्या चौकटीतला पुरावा उपलब्ध नाही. परंतु धार्मिक ग्रंथातले अनेक संदर्भ व मुख्यत: गुरुनानकजींनी रामजन्मभूमी दर्शनासाठी १५१०-११ मध्ये अयोध्या यात्रा केल्याचा उल्लेख यावरून तिथे रामजन्मभूमी मानल्या जाणार्या स्थळाचं अस्तित्व न्यायालयाने मान्य केलं.
आफळे यांना ऐकताना ५०० वर्ष देशभराने आस्थेचं प्रतीक मानलेला श्रीराम आपल्याच जन्मभूमीत कसा निर्वासितासारखा राहिला याची तीव्रता जाणवली. त्याच्या स्वगृही प्रतिष्ठापनेसाठी जीवाच्या आकांताने वर्षानुवर्षे धडपडणार्या कार्यकर्त्यांना-कारसेवकांना खच्ची करणार्यांना, ’मंदिर वही बनायेंगे’ ची टर उडवणार्यांना रामजन्मभूमी खटल्यात संवैधानिक मार्गाने मिळालेला न्याय ही खरी चपराक आहे.
आफळे बोलणं थांबवून ’प्रश्न विचारु शकता’ म्हणाले. अद्भुत काही अनुभवल्यानंतर एक तर बोलून तो अनुभव डहळवू नये. बोलायचंच असेल तर त्याला वर्ख लावता यावा. पण काही जणांनी ’मंदिरात जायला गेटपासून किती वेळ लागेल’ असले वर्हाडी भाषेत ’मॅटावानी’ प्रश्न विचारायला सुरूवात केल्यावर आफळे यांना भेटायची इच्छा असूनही आम्ही उठलो. शिवाय पहाटे उठून रामलल्लाचं दर्शन घ्यायचं होतं. मामेभाऊ कौस्तुभ तिथे मंदिर लोकार्पणापर्यंत गाभारा प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याच्याशी मामाचं बोलणं झाल्याने त्याने आम्हाला सकाळी सहा वाजेच्या शृंगार आरतीला उपस्थित राहण्याची दुर्लभ संधी सहज मिळवून दिली.
पहाटे शुचिर्भूत होऊन आम्ही मंदिराकडे निघालो. आमच्या चालकाने आम्हाला मंदिराजवळच्या रिक्षास्थानकापाशी सोडलं. एकच रिक्षा असल्याने पुन्हा लहान होत अक्षरश: मामाच्या मांडीवर बसून मंदिरापाशी पोचले. इथले बहुसंख्य रिक्षाचालक मुस्लीम आहेत. हिंदूंबरोबरच अनेक स्थानिक मुस्लीमांच्या हाताला राममंदिरामुळे काम मिळालं आहे.
सकाळचे सव्वापाच वाजले असतील. उतरून पाहते तो साधेसे प्रवेशद्वार, सुरक्षारक्षक, कर्मचार्यांची गडबड. लख्ख स्वच्छता. रस्त्यावर लहान लहान पक्की दुकानं दिवे लावून विक्रीच्या तयारीत असलेली. रीतीप्रमाणे श्रीरामाचा तिलक लावून घेतला. प्रशस्त ऑफीसमध्ये मोबाईल जमा केले. मावशीसाठी व्हीलचेअर ठरवली. अडीचशेपैकी दर ५० मीटरवरच्या तंबूत आमच्या आरती पास, आधारकार्ड वगैरे कागदपत्रांची तपासणी होत होती. आमच्या आग्रहामुळे व्हीलचेअरवर (भयंकर संकोचून) बसलेली मावशी ’एवढं मी सहज चालले असते’ असं पुन्हा पुन्हा म्हणत होती. मामा, मामी, ताई, दादा वेगळ्या मार्गाने पुढे सरकत होते. मावशीसकट व्हीलचेअर ढकलणारा व त्याच्यामुळे मी मधल्या अंतरात धावत होतो. वेगामुळे हलकं वाटत असणार आणि लवकर पोचलो तर पुढची फेरी मिळायची आशा असणार. एकीकडे मी त्याची शब्दश: धावती मुलाखत घेत होते. त्याने आय-कार्ड लावलं असूनही तुम्हारा नाम क्या है बसंती, रोज सरासरी किती दर्शनार्थी येतात, तुम्ही किती फेर्या करता, आधी काय करायचे वगैरे. मंदिराजवळ चपला काढल्या, हरवलो तर तिथे भेटू इ. ठरवलं होतं. स्वच्छ मार्गिका आणि चोख बंदोबस्त होता. यहा परिंदा भी पर नही मार सकता म्हणावे इतका.आता मुख्य मंदिर दृष्टीपथात आलं. टीव्हीवर लोकार्पण सोहळ्यात पाहिलं होतं तसंच बदामी रंगाचं, रेखीव, कोरीव, सुघड आणि भव्य. रँपवरून धावत आम्ही गाभार्याकडे गेलो. आत अन्य दर्शनार्थी आरतीची प्रतीक्षा करत उभे होते. जातीचा उल्लेख गरजेचा नसलेले, हिंदू या एकाच नात्याने जोडलेले. भारताच्या किंवा जगाच्याही कानाकोपर्यातून आलेले. सगळे शांतपणे उभे होते. योग्य जागा पकडून मंदिराचे कोरीव खांब, अप्रतिम छत, प्रकाशरचना बघेतो सहा वाजले. गाभार्याचा रेशमी पडदा हळूहळू सरकला आणि हसर्या राजस सावळ्या रामचंद्राचे दर्शन होताच हात जोडून सर्वांनी एकमुखाने ’जय श्रीराम’ म्हटलं. मूर्तीच्या पायथ्याशी आजवर तंबूत ठेवलेल्या मूळ मूर्ती स्थापित आहेत. दर्शन घेताना स्वत:च्याही नकळत डोळ्यात पाणी आलं. कुणाचं कारण धार्मिक असेल, कुणाचं भावनिक, कुणाला कारसेवेची परिणती पाहून भरून आलं असेल तर कुणाच्या डोळ्यात पराभूत मानसिकतेतून बाहेर येऊन सन्मानाचं प्रतीक पाह्ण्यातला आनंद झरत असेल. मावशी ओल्या डोळ्यांनी स्तोत्र म्हणत होती.वाद्याच्या गजरात आरती सुरु झाली. दोन पुजारी दोन्ही बाजूनी चवर्या ढाळत होते. षोडशोपचारे पूजा, आरती होताच तीर्थ प्रसाद वाटण्यात आला. आरती फिरवली. पुन्हा रामनामाचा गजर झाला आणि मूर्तीकडे पुन्हा पुन्हा पाहत आम्ही बाहेर पडलो. आरतीचं शूटींग दररोज दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असल्याने उद्याच्या दर्शनयादीत असलेल्या आमच्या टीममधल्या अर्ध्या मंडळींना मामा मामीचा फोटो कौस्तुभकडून आधीच पोचला होता.बाकी सगळे वेगळ्या मार्गाने बाहेर पडणार असल्याने प्रसाद खिडकीशी जाऊन मी सगळ्यांसाठी प्रसाद मागितला तेव्हा तिथला कर्मचारी म्हणाला ,’अपने हाथोंसे ले तो ही वो प्रशाद है’ पण मग दिला त्याने. पंचशीलला उतरताना आमच्या मुस्लीम चालकाने वेळेवर मंदिरालगत पोचवल्याबद्दल त्याला धन्यवाद देताना मावशी मनापासून म्हणाली, ’अल्ला तुमको बहुत आशीर्वाद देगा’.
अयोध्या रक्षणासाठी हनुमानाचे इथे वास्तव्य होते अशी मान्यता असलेल्या हनुमानगढीला मला जाता येणार नव्हते. कनकभवन यादीत नव्हतं. राणी कैकेयीने सीतेला, रामाशी विवाह झाल्यानंतर हे भवन भेट दिलं असं मानलं जातं. बाकी मंडळी नंतर हनुमानगढीला गेली पण प्रचंड गर्दीमुळे बाहेरूनच नमस्कार करून त्यांना परतावं लागलं. आता संध्याकाळी सूर्यकुंड आणि तिथला लेझर शो पाहायचा होता पण अयोध्या-अहमदाबाद विमानाचं ऐनवेळी तिकिट मिळालं त्याची वेळ आधीची असल्याने ते शक्य झालं नाही.Ayodya Airport |
अयोध्या विमानतळ छोटंसं टुमदार, बदामी रंगाचं. रचना बाहेरून एखाद्या मंदिरासारखीच. चेक इनच्या रांगेत दादा व माझ्यामागे एक कमंडलूवाले साधुबुवा, एक भगवं पागोटेवाले काका, त्यांच्यामागे एक मुस्लीम कुटुंब ,एक सेना अधिकारी, एक आठ्यायुक्त स्कर्टबाला. जिकडे तिकडे चिकार गर्दी. फारच घरगुती वातावरण होतं. आधुनिक एसटी स्थानकच. विमान सुटायची वेळ आली तरी लोक कुठेही हिंडत होते. तरूण चटपटीत क्रू पुकारा करून करून थकून जात होता.
आफळे म्हणाले त्यानुसार सगळं मंदिर संकुल अडीच वर्षात पूर्ण होईल. तेव्हा मुलं आणि महेशसह पुन्हा यायचा विचार टेक ऑफ आधी बकेट लिस्टमध्ये टाकला. भारत म्हणजे बैरागी, गारूडी, हत्तींचा गचाळ देश ही प्रतिमा अस्पष्ट झाली असली तरी नष्ट नाही. या कात टाकलेल्या स्पिरिच्युअल टुरिझम मुळे मात्र ती बरीचशी पुसली जाईल. मंदिर लोकार्पणाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या अफाट आगामी प्रकल्पांबद्दल वाचलं. हॉस्पीटलपासून मनोरंजन नगरी ते विद्यापीठापर्यंत त्यात इतकं काही आहे की धार्मिक आस्था आणि अस्मितेबरोबरच किंवा त्यापलिकडे 'राममंदिर हवं कशाला' याचं उत्तर शोधलं तर सहज मिळेल. तरीही काही आपपरभाव मनात उरत असेल तर रामलल्लाचं दर्शन घ्यावं आणि त्या निर्व्याज हास्यात किंतुपरंतु विरून जाण्याची प्रचिती घ्यावी
No comments:
Post a Comment