Showing posts with label बदल. Show all posts
Showing posts with label बदल. Show all posts

Monday, January 26, 2026

महिलोन्नती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन


संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती किंवा अध्यात्म नव्हे. समाजप्रबोधन हा त्याचा गाभा असतो. ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग माणसाच्या अंतरात्म्यापासून सुरू होतो हे महाराष्ट्रातली संतपरंपरा कायम सांगत आली आहे. तुकडोजी महाराज त्यापुढे जाऊन म्हणतात, ’कशास फिरतो व्यर्थ, तुझे गावच नव्हे का तीर्थ!’ 

गावाची उन्नती, गावकर्‍यांच कल्याण यातच त्यांचं आध्यात्म सामावलेलं होतं. ते राष्ट्रसंत ठरले कारण त्यांनी व्यक्ती पासून समष्टीपर्यंत जाताना गाव, समाज, राष्ट्र आणि माणूसपण अशा सर्व पातळ्यांवर विचार मांडला. त्यांच्या साहित्याने आणि वाणीने समाजाला सतत एक प्रश्न विचारला —आपण माणूस म्हणून, समाज म्हणून खरंच पुढे चाललो आहोत का?”** इथेच ते थांबले नाहीत तर  त्यांनी समाजाला परिवर्तनाचा मार्गही दाखवला आहे.त्यांच्या प्रश्नाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा घटक आहे — **स्त्री** कारण समाजाचा तो जवळपास निम्मा भाग आहे. म्हणूनच तुकडोजी महाराज थेट म्हणतात - 

महिलेविण विश्व न झाले, काय होते पुरुषाने केले 

राष्ट्रसंतांना हे स्पष्ट दिसत होतं की, ज्या समाजात स्त्री दुर्लक्षित, अशिक्षित, परावलंबी आहे, तो समाज कितीही प्रगतीची भाषा बोलत असला तरी आतून पोकळ असतो. त्यासाठी त्यांनी आपल्या साहित्यातून महिलोन्नतीची वाट दाखवली. ग्रामगीतेत या नावाचा एक स्वतंत्र अध्याय लिहीला.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर स्त्रियांनी कसं वागावं हेच समाज सांगत आलेला आहे  पण तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून समाजपुरुषाला खणखणीत शब्दात सांगितलं आहे की स्त्रियांशी कसं वागावं, तिच्याविषयी नेमका काय विचार करायला हवा, तिला कसं वागवायला हवं. हेच  त्यांच्या साहित्याचं वेगळेपण आहे. 

-------------

१९७५ साल हे युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. ८ मार्च हा महिला दिन निश्चित झाला आणि महिलांच्या प्रश्नांकडे जगाचं आणि आपल्या देशाचंही लक्ष वेधलं गेलं. मला नवल वाटतं की या घडामोडींच्या कितीतरी आधी १९६८ साली देह सोडून गेलेल्या तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून हे प्रश्न मांडले होते आणि ते ही उत्तरांसकट. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे शब्द कुठेही न वापरता स्त्रीशक्ती काय आहे हे त्यांना कळलं होतं, तिचं सामर्थ्य आणि जगाला जन्माला घालणारा आणि त्याची जोपासना करणारा तिच्यातला मातृभाव कळला होता. इतक्या जवळून की तुकडोजी महाराजही भावनाविवश होऊन म्हणतात-  

तिच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने 

आणि म्हणूनच या जगातलं मांगल्य, सौंदर्य जिच्या अस्तित्वामुळे आहे त्या स्त्रीची उन्नती म्हणजे समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची  उन्नती असं मुलभूत चिंतन राष्ट्रसंतांनी मांडलं. 

संती माऊलीचे रूप दिले , तरीच ते देवपणासी पावले ....       पण माउली तिथेच राहिली . 

स्त्री जर अज्ञानात, भीतीत आणि बंधनांत अडकलेली असेल, तर तिच्या हातून घडणारी पुढची पिढीही त्याच मर्यादांत अडकते. ते लिहितातम्हणतात 

देवाने निर्मिली ही क्षिती,  तिचे उदरी खाणी किती 

परि माऊली जैसी प्रेमळ दीप्ती,  कोठेच नाही 

महाराज म्हणतात. ती घरातल्या संस्कारांची शिल्पकार आहे. गर्भापासून तिचे संस्कार, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. इथे पुत्रीची घडण लिहिलं नाहीये. पुत्राची. पुत्राला जर तिने चांगला पुरूष व्हायला शिकवलं तर समाजातल्या कितीतरी स्त्रीविषयक समस्या कमी होतील. आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणार्‍या स्त्रीशी कसं वागायचं हे पुरूषांना कळत नाही. एकमेकांना मदत करण्यात कमीपणा नाही, तिलाही तिचा अवकाश आणि पंख मिळाले पाहिजेत हे एका आईनेच आज मुलाला सांगणं आवश्यक आहे. मुळात बायकांमध्ये एक उपजत शहाणपण होतं. फक्त हे शहाणपण दाखवायला त्यांना बाहेर वाव मिळाला नाही. मिळाला तर एक स्त्री कमाल करू शकते हे त्यांनी जाणलं होतं. 

प्रल्हादाची कयाधू , छत्रपती शिवरायांची चे जिजाई, श्रीरामांची कौसल्या, श्रीकृष्णाची देवकी यांनी अक्षरश: युगपुरूष घडवले आहेत ही एका स्त्रीची ताकद आहे. आजच्या सायबर पालकत्वाची आव्हानं पेलणं तिला सहज शक्य आहे. 

------------

परंतु तिच्या ताकदीची जाणीव तिला स्वत:ला आणि समाजाला म्हणावी तशी नाही आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, त्या अर्थाने आज साक्षरता बरीच वाढली आहे पण शिक्षण म्हणजे विचारांची मशागत. माणसाची बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण अशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. हाच विचार राष्ट्रसंत सोप्या भाषेत मांडताना म्हणतात - स्त्रीने शिकावं, विचार करावा,  प्रश्न विचारावे, अंधपरंपरेला आव्हान द्यावे, त्याज्य गोष्टी नाकाराव्या, योग्य-अयोग्याचा विवेक ठेवावा

शिक्षणामुळे स्त्रीला —स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, आपले हक्क समजतात, आपल्यावर अन्याय झाला आहे, हे ओळखण्याची दृष्टी मिळते. अन्यथा वो जानतेही नही की वो जानते नही , और इस ना जानने को उम्रभर जिये जाते है 

काही जणांना वाटतं की वैदिक काळात होत्याच की स्त्रिया उच्चशिक्षित. ते गार्गी मैत्रेयीचे दाखले देतात. हो नक्कीच होत्या पण इस. पाचशे ते हजार मध्ये भारतावर सातत्याने होणार्‍या बाह्यआक्रमणांमुळे तिचं विवाहाचं वय कमी झालं, शिक्षणाची दारं बंद झाली आणि स्त्री माजघराकडे वळली. सुरक्षेच्या आणि योनीशुचितेच्या काळजीपोटी तिच्यावर बंधनं आली. बाईच्या जातीने कसं वागावं याचे नियम समाजापुरूषाने ठरवले. म्हणूनच ’द सेकण्ड सेक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकात लेखिका सीमान द बोव्हा म्हणते स्त्री कधी जन्माला येत नाही ती स्त्री म्हणून घडवली जाते. अगदी घरातल्या आईचंही मुलगा कसा वाढतो आहे इकडे फार लक्ष नसतं पण मुलीच्या जातीने कसं वागलं पाहिजे यावर तिचा कटाक्ष असतो. परिणामी प्रश्न तसेच राहतात. 

--------------------

आता कुठे राहिलंय तसं काही,  केवळ विशीतली सहर शेख  मोबाईल च्या स्क्रीनवर ’कैसा हराया’ म्हणताना दिसते. दुसरीकडे सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसतात. स्त्रिया सायकलपासून विमानच काय अगदी युद्धनौकाही चालवतात मग अजून काय समानता बाकी आहे , कोणती प्रगती शिल्लक आहे ? 

याचंच उत्तर शोधण्यासाठी पेटीएम या कंपनीने मध्यंतरी एक प्रयोग केला होता. 

एका मोठ्या खोलीत मध्यभागी एक रेषा आखून त्यावर तीस ते पन्नास वयोगटातल्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांना त्यांनी उभं केलं. त्यांना सांगितलं तुम्हाला स्पीकरवर प्रश्न ऐकू येईल , उत्तर हो असेल तर एक पाऊल पुढे जायचं, नाही असेल तर एक पाऊल मागे जायचं. मग प्रश्न सुरू झाले आणि ते पुढे मागे जाऊ लागले. सुरूवातीचे प्रश्न साधारण असे होते - वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी तुम्ही दुचाकी चालवायला शिकलात का, महाविद्यालयापर्यंत तुम्ही एक तरी खेळ नियमित खेळलात का , तुमचे कपडे तुम्हाला इस्त्री करता येतात का, घरातली बिलं तुम्ही भरता का, तुमचं स्वत:चं नेट्बँकिंग अकाऊंट आहे कां,  सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला तुमचं पोट भरण्यापुरता स्वतःसाठी दोन वेळेचा स्वयंपाक करता येतो का ? 

इथपर्यंत स्त्री-पुरूषांमध्ये फार अंतर नव्हतं मग पुढचे प्रश्न आले, तुमचं वाहून तुम्ही स्वतः खरेदी केलं आहे का, वेळ पडल्यास स्वत: दुरूस्त करता का? काही खरेदी करायचं असल्यास तुम्ही कधी एकट्याने निर्णय घेता का ? एकट्याने बाहेरगावी जाता का? स्वत: नियोजन करून तुमचे तिकीट तुम्ही काढता/मॅनेज करता का? तुमच्या घराच्या पाटीवर तुमचं नाव आहे का? इ. इ.

अंतर वाढलं असेल की कमी झालं असेल याचं उत्तर सहज लक्षात येईल. म्हणजेच मोठे बदल झाले असले तरी खूप लहान लहान मुलभूत बदल अजून बाकी आहेत. 

---------------

आणखी एक मह्त्वाचा विचार राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून मांडला तो म्हणजे ग्रामजीवनात स्त्रीचा सक्रिय सहभाग. याचा अर्थ कागदावर महिला सरपंच आणि खुर्चीवर तिचा पती असा सहभाग नव्हे. ** राष्ट्रसंतांचं साहित्य हे केवळ वैचारिक नाही, तर अत्यंत कृतीशील आहे. त्यातून त्यांनी स्त्रियांना —  ग्रामसभेत सहभागी होण्याचं , स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यामध्ये पुढाकार घेण्याचं, स्वयंशिस्त आणि स्वावलंबन विकसित करण्याचं आवाहन केलं आहे. .त्यांच्या मते, स्त्रीला निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवून खरा ग्रामविकास होऊच शकत नाही.आज आपण पंचायतराज, महिला आरक्षण याबद्दल बोलतो; पण राष्ट्रसंतांनी हे बीज अनेक दशकांपूर्वी पेरलं होतं. 

त्यांनी लिहिलं आहे, स्त्रियांच्या संघटना असाव्यात. तिळगुळ समारंभ, हळदी कुंकू, शारदोत्सव, संमेलन सभा कीर्तन कथा व्हाव्यात. हल्ली सामूहिक स्वरूपाचे असे काही कार्यक्रम राजकीय पक्ष किंवा मनोरंजन वाहिन्या घेतात. त्यात कुणी सेलेब्रिटी कलाकार असतात. त्यांनी येऊन नाचायचं, बायकांनी येऊन गाण्यांवर नाचायचं, आयोजकांनी त्यांना अत्यंत सुमार प्रश्न विचारायचे. अजूनही उखाणे स्पर्धा, थाळी सजवणे, मॅचिंग स्पर्धा यातून हे कार्यक्रम बाहेर न पडल्याने यातून कवडीचंही सक्षमीकरण होत नाही. यापेक्षा कलाधारित स्पर्धा, दर्जेदार सादरीकरण, बचतगटांचे स्टॉल्स, चांगली भाषणं यावर भर द्यावा.

याची कल्पना असल्यासारखं महाराजांनी पुढे लिहीलं आहे- स्त्रियांनी बाहेर पडावं, एकत्र यावं, आत्मभान वाढवावं, त्यासाठी वाचनालयात महिला विभाग सुरू व्हावेत. 

राष्ट्रसंत तिला कधीच “बिचारी स्त्री” म्हणत नाहीत. ते म्हणतात —स्त्री सक्षम आहे, फक्त तिच्या क्षमतेवर समाजाने विश्वास ठेवायला हवा. सन्मान हा तिचा अधिकार आहे. सन्मान म्हणजे महिला दिनाला ;तू दुर्गा तू लक्ष्मी’ असल्या पोस्ट फॉरवर्ड करणे नव्हे , सन्मान म्हणजे — तिचं मत ऐकणं,  तिच्या श्रमांना किंमत असणं, तिच्या निर्णयांना विचारात घेणं. परप्रकाशी चंद्रापेक्षा तिला स्वयंप्रकाशी काजवा होऊ देणं. तिला तिचा हक्काचा वाटा देणं.  

 शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी आठवतात इथे. एका सभेत भेगाळलेल्या पायांच्या , रापलेल्या हातांच्या, डोळ्यात भीती आणि कुतूहल घेऊन बसलेल्या शेतकरी स्त्रियांना त्यांनी विचारलं, " बाईच्या जन्माला आलो याचा कधी आनंद झाला का ?" त्यावर एका बाईने अचानक एक ओळ म्हणून दाखवली "बाईच्या जल्मा नको घालू शिरीहारी , रात अन दिस परायाची ताबेदारी"  

यावरूनच जोशींनी  शेतकरी संघटनेच्या ’स्वातंत्र्याच्या कक्षा’ या संकल्पनेचा पाया घातला.  त्यानंतरच्या चांदवड अधिवेशनानंतर स्त्रियांमध्ये इतकी उमेद आली की एकीनं आपला अनुभव सांगितला- मालक म्हनलं आंगुळीचं पानी काड. म्या म्हनलं तुमचं तुमी काडा , हातचं काम टाकून मी काय बी करनार न्हाई" यातून पुढचं पाऊल नव्वदच्या दशकातलं ’ लक्ष्मी मुक्ती ’ आंदोलन . यात दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी जिचा एका चमच्यावरही अधिकार नव्हता त्या आपल्या पत्नीच्या नावे जमिनीचा सातबारा करून दिला. 

-----------

अंधश्रद्धा आणि जुनाट रूढींचे स्त्रीच्या उन्नतीतील मोठे अडथळे दूर व्हावेत हे राष्ट्रसंतांनी ठामपणे मांडलं आहे. **त्यांना ठाऊक होतं की, स्त्रीच्या पायात बेड्या घालणारी वृत्ती बहुतेक वेळा धर्माच्या आडून येते, पण ती धर्म नसते — ती अज्ञान असते.ज्या रूढी — स्त्रीला दुय्यम वागणूक देतात,  तिला पाप-पुण्याच्या भीती दाखवतात,  तिच्या प्रश्नांना “मर्यादाभंग” ठरवतात त्यांना ते विरोध करतात. त्यांच्या लेखनात वारंवार जाणवतं जिथे जिथे धर्म काही रूढींमुळे माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल, तिथे तिथे त्यांची चिकित्सा आवश्यक आहे. स्त्रीच्या बाबतीत तर त्यांचा हा विचार आणि स्वर अधिक तीव्र होतो. 

बहुतेक धर्मग्रंथात स्त्रीच्या दुय्यमत्वाचा कधी स्पष्ट तर कधी नकळत उल्लेख येतो. 

अगदी राजकारणातही सर्वत्र "आम्ही बांगड्या भरल्या नाहीत". "मर्द असशील तर माझ्याशी लढ"  अशी भाषा आपण ऐकतो. दुर्दैवाने बायका पण एखाद्याला निषेध म्हणून चोळी बांगडी पाठवतात तेव्हा त्यांना आपण आपलाच अपमान करतो आहोत हे ही कसं कळत नाही?  लोक शिव्या देताना सर्रास आई बहिणीचा उद्धार करतात. सोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्त्रीच्या, अभिनेत्रीच्या, स्त्री खेळाडूच्या किंवा राजकारणातील स्त्रीच्या पोस्ट खालच्या किंवा बातमी खालच्या कॉमेंटचा दर्जा पाहिला तर आपला सर्व साधारण समाज स्त्रियांकडे आजही कशा नजरेने पाहतो ते सहज कळेल. स्त्रियांनी काय घालावं हे समाजाने ठरवू नये तसंच आपल्या पोशाख आणि देहबोलीतून आपण काय संकेत देतो आहोत आणि त्या समूहाची वैचारिक इयत्ता काय आहे याचं भान स्त्रियांनी ठेवणं गरजेचं आहे. हे भान असलेल्या स्त्रियांनाही अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येक मातेने आपल्या मुलाला स्त्री सन्मान शिकवला पाहिजे. त्याला स्त्रियांकडे पाहण्याची स्वच्छ नजर दिली पाहिजे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांचा महिलोन्नतीचा विचार दुर्दैवाने आजही तितकाच गरजेचा आहे. त्यांचं साहित्य आपल्याला जाणवून देतं की 

* स्त्री उन्नती ही तात्पुरती योजना नाही, ती मानसिकता आहे जी मातांना आपल्या मुलांमध्ये पेरायची आहे. 

* ती कायद्याने नाही, तर संस्कारांनी रुजते तसे संस्कार द्यायचे आहेत.

* ती केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीनेच  साकार होऊ शकते, हे स्व:त:च्या वार्तनातून ठसवायचं आहे.

----------------

व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन , असं हल्लीच्या आधुनिक मुली विचारतात. महाराजांनी तर हे त्याआधीच लिहून ठेवले आहे - "जे जे सुख असेल पुरुषांना महिलांचेही ते असावे अभिन्नपणे ". महाराज पुढे म्हणतात - रथाची दोन्ही चाके मजबूत करावी. माता अशा आदर्श असल्या तर त्यांच्या पोटी येणारे आदर्श संतान भारताचा वैकुंठ घडवतील.... 

शेवटी ते स्त्रीपासून स्त्रीतत्वापर्यंत जात हे ही सांगून जातात

जिकडे जातील तिकडे, स्त्रीच आहे मागेपुढे, अंतरी बाहेरी प्रकृतीचे वेढे,  जिवापाडे पडले हे 

पुरूष आणि प्रकृतीरूपी स्त्रीचं हे चिरंतन नातं समानतेचा नव्हे परस्परपूरकतेचा संदेश देतं आहे. हाच आभाळाएवढा संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून दिला, भजन कीर्तनातून त्याचा पुनरुचार केला. स्वत:चा उल्लेख करताना मात्र ते विनम्रतेने स्वत:विषयी लिहितात ’तुकड्या म्हणे’ 

 ----------------------------


परिसंवाद - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, अकोला,  जानेवारी २०२६

Sunday, August 31, 2025

Excelsior

माझ्या शाळेतल्या म्हणजे ’सेंट अलॉयसिस हायस्कूल’ मधल्या आमच्या वर्गाचं भव्य रियुनियन ठरलं होतं. काही जणांशी संपर्क होता तर काही जण अनेक वर्षांनी भेटले. आमच्या वर्गातला एक बॅकबेंचर आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट पद्धतीने झकास व्यवस्था केली होती. सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. स्नॅक्स स्टॉलवर शाळेबाहेर मिळणारे चिंचगोळे, रावळगाव टाईप चॉकलेट, गावातल्या प्रसिद्ध घाशीलाल बटाटेवड्यापासून पार्श्वभूमीवर वाजणार्‍या ’मैने प्यार किया’ आणि ’बोनीएम’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर मागे लावलेला. तोच का ते पुढे सांगते. त्यातले काहीसे बावळट पण अश्राप वाटणारे आमचे अवतार पाहताना गंमत वाटत होती. आईने हनुवटी धरून भांग पाडून दिलेली मुलं आणि दोन बो किंवा रिबिन बांधून हाताची घडी घालून बसलेल्या मुली. फोटोत आमच्या मागे शाळेची भव्य इमारत. 

रेल्वेचं आशियातलं दोन नंबरचं यार्ड असल्याने ऑफीसर्स क्लब, आखीव रस्ते, ब्रिटीश पद्धतीची अलिशान क्वार्टर्स असणारा अतिशय कॉस्मोपॉलिट्न आणि खानदेशातला तालुका असल्याने शेतीमातीत रमणारा, भरीत भाकरी, वरण बट्टीवाला अहिराणी हेलातला गल्लीबोळांचा, ग्रामीण बाज असे दोन्ही प्रवाह तापी नदीबरोबर वाहते ठेवणारं आमचं गाव. त्या गावात ही कॉन्व्हेंट १८७४ साली स्थापन झालेली. गेल्या वर्षी दीडशे वर्ष पूर्तीचा सोहळा साजरा करणार्‍या या शाळेच्या दर्जाची एकही शाळा त्या सुमारास आसपासच्या जिल्ह्यातही नव्हती.  

मला वाटतं मीच नव्हे आपण प्रत्येक जण आज जे जे काही आहोत किंवा नाही आहोत, त्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात आपली शाळा आहे, असते. तिथलं वातावरण, शिक्षक, संस्कृती, वर्गमित्र-मैत्रिणी, शाळेतल्या घटना, तिथले अनुभव ,अगदी इमारत सुद्धा, हे सगळं आपल्या आत रूजून आपण घडत जातो.  

त्यातून माझी शाळा त्या काळच्या इतर शाळांपेक्षा आणि आजच्या बाजारू कॉन्व्हेंटपेक्षा खूप वेगळी होती. विशेष कोणतीही देणगी, जास्तीचे खर्च न आकारता शाळा व्यवस्थित शासनमान्य पद्धतीने चालत असे. तिथली कडक शिस्त, नेटका ऐटबाज गणवेश, मुलामुलींना एका बाकावर बसवणे हा इतर शाळांमधल्या मुलांसाठी असूयेचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा. तेव्हा चांगल्या रेल्वे वसाहती सोडल्या तर साधारण आगगाडीच्या डब्यांसारख्या एकामागेएक तीन खोल्या असलेली , बाहेरून रंग उडालेल्या भिंतींची, रात्री पिवळे बल्ब लावणारी, बाहेरच्या खोलीत लोखंडी कॉट आणि एखादी पत्र्याची खुर्ची असलेली , मागच्या अंगणात झाडाखाली बंब आणि सरपण ठेवलेली बहुतेक सगळी बुजरी बैठी घरं. शाळा एकदम चकाचक, स्वच्छ, देखणी जणू वेगळ्याच विश्वातली. 

मिशनरी शाळा असल्याने प्रवेश करताच उजवीकडे ’मदर मेरी’ चा पुतळा दिसे. डावीकडे  सायकल स्टँडजवळ साथी नावाच्या हसर्‍या नेपाळी चौकीदाराचं घर, दोन्ही हाताला तीन मजली प्रशस्त इमारती, मध्ये भव्य सभागृह आणि मागे विस्तीर्ण क्रीडांगण. प्राचार्यपदी सिस्टरची नेमणूक होई. अभ्यासक्रमात बायबलवर आधारित असलेले ’मॉरल सायन्स’ शिकावे लागे. नाताळला विशेष कार्यक्रम होत. कॅरोल्स गायली जात. येशूजन्माच्या सजावटीच्या स्पर्धा होत. जयंत सर ’जिंगल बेल’ च्या ट्यूनवर सांताक्लॉज होऊन हो हो करत नाचत येत आणि आमच्यावर खाऊची उधळण करत. हे सगळं हिंदू वा अन्यधर्मीयांच्या सणवारांच्या आड येत नसे. गणपती, शारदा बसवण्याच्या अनुभवाला मात्र आम्ही मुकलो. अर्थात कोणत्याही शिक्षणसंस्थेचे चालक, विश्वस्त ज्या धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे असतात त्याचा प्रभाव त्या संस्थेवर असणं नैसर्गिक आहे. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा केली म्हणून गदारोळ का केला जातो किंवा सरस्वती देवीला विद्येचं प्रतीक मानून कोणत्याही कार्यक्रमाआधी पूजन करणं यात तथाकथित पुरोगाम्यांनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे हे मला कळत नाही. .

------------------

कॉन्व्हेंट असली तरी डावीकडच्या इमारतीत मराठी व उजवीकडे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरत. ’वर्गभेद’ तेव्हाही काही अंशी होता. इंग्रजी माध्यमाची काही मुलं मराठी माध्यमाच्या मुलांकडे इंग्रज ’नेटीव्हांकडे’ पाहत तसे पाहत. बर्‍याच घरातले भाऊ आमच्या शाळेच्या इंग्रजी माध्यमात आणि बहिणी मात्र मराठी माध्यमात शिकत असत. हा ’लिंगभेद’ ही कळू लागला होता. धर्मांतरित ख्रिश्चन मंडळींसाठी मराठी चर्च आणि मूळ ख्रिश्चन अँग्लोइंडियन मंडळींचं वेगळं चर्च असे. हा धार्मिक भेदही जाणवत असे. तरीही शाळेत सर्व धर्माची, जातीची मुलं एकत्र शिकत, खेळत. 

बहुतेकांचे वडील रेल्वेत नोकरी करत. रेल्वेचं स्वत:चं केंद्रीय विद्यालय (हल्लीचं सीबीएसई) होतं तरीही अधिकार्‍यांचं प्राधान्य आमच्या शाळेला असे. वडिलांच्या पदानुसार प्रवासासाठी कोणत्या वर्गाचा पास मिळतो हा तेव्हा ’स्टेट्स सिंबॉल’ असला तरी आर्थिक स्तर मैत्रीच्या आड येत नसे. बाबांना इथल्या शिस्तीचं कौतुक वाटे. मला ओरडा बसू नये म्हणून ते घरी असले तर माझ्या बुटांना चकचकीत पॉलीश करून ठेवत. दुसर्‍या तुकडीत कायम पहिल्या येणार्‍या मुलाचे वडिल जमिनदार आहेत म्हणून तो पहिला येतो, असं मी त्यांना एकदा सांगितल्यावर ’त्यापेक्षा तो तुझ्यापेक्षा हुशार आहे हे तू का मान्य करत नाहीस’ असं म्हणून त्यांनी मला निरूत्तर केलं होतं. 

शाळेत एखाद्याशी मैत्री जुळली तर जन्मभर टिकते कारण ती मैत्री होते तेव्हा आपण ’कुणी’च नसतो. गाईडच्या कॅम्पसाठी नववीतल्या आम्ही विद्यार्थिनी रेल्वेने वसईला गेलो होतो. सर्वांना आरक्षण मिळू शकलं नव्हतं. अन्य तुकडीतल्या एकीबरोबर मला बर्थ शेअर करावा लागला. त्या रात्री आमची जी काय गट्टी जमली ती आजतागायत तशीच आहे. शाळेने जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी दिले, त्यातले बहुतेक आजही संपर्कात आहेत. कधी महिनामहिना बोलणं होत नाही, कधी वाढदिवस ते वाढदिवस बोलणं होतं पण एका फोनवर अर्ध्या रात्री उठून येतील असे त्यातले काही.. नवरा चेष्टेने म्हणतो, "सर्दी झाल्याचं टाक तुमच्या शाळा ग्रुपवर, एअर-अ‍ॅम्ब्युलंस घेऊन येतील..."

------------

शाळेच्या दोन्ही माध्यमातले दहाव्या वर्गातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी ग्रीन, रेड, ब्लू आणि यलो हाऊसचे प्रमुख असत. प्रत्येक हाउसला दर महिन्यात एक एक कामगिरी दिली जात असते. उदा: स्वच्छतेकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांचा गणवेश पूर्ण आणि नीटनेटका आहे की नाही याची तपासणी करणे, अवांतर उपक्रम आयोजित करणे वगैरे. असेंब्ली संपवून ’कम सप्टेंबर’ सारख्या झकास संगीताच्या तालावर आपापल्या वर्गात रांगेने जाताना मूड प्रसन्न होई. एका हॉलमध्ये, सभागृहात चित्रकलेच्या बानाइतकर सरांनी अतिशय रेखीव युरोपियन पद्धतीची भव्य म्युरल्स काढली होती. ती सतत नजरेला पडून चित्रकला आवडू लागली. नीट समजावी म्हणून ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. हस्तकलेशी मात्र पत्रिका जुळली नाही. 

शाळेत पहिली घंटा म्हणजे असेंब्लीसाठी जमायची सूचना असायची. दुसर्‍या घंटेला आपण आहोत त्या ठिकाणी पुतळा होऊन थांबावं लागे. आपोआप शाळा चिडीचूप होई. तिसर्‍या घंटेला एक शब्दही न बोलता रांगेत जाऊन आम्ही उभे राहत असू आणि शाळेचे दार बंद होत असे. त्यानंतर कुणालाही आत सोडले जात नसे किंवा अघटित घडल्याशिवाय बाहेर जाता येत नसे. इतर शाळांची मुलं केव्हाही गावभर फिरत किंवा मधल्या सुट्टीत पळून जात. शाळेच्या असेंब्लीत किंवा एरवीही कुणी गोंधळ केला तर पीटीचे सर येऊन त्याला शब्दश: बडवत असत. पीटी शिकवण्यापेक्षा ते या कामासाठीच नेमले असावेत. ’हा बॉईज, एक बात का खयाल रखो’ असं ओरडून म्हटल्याशिवाय त्यांना पुढे बोलता येत नसे. एकूण गर्ल्सना काही सांगावं लागत नसावं.

अर्थात इतक्या कडेकोट बंदोबस्तातही मुलांचा वात्रटपणा जमेल तसा सुरू असे. शाळेतल्या सर, मिस (शिक्षिका) यांना टोपणनावं ठेवणे इ. शिवाय  शाळेत मजा ती काय! प्रसाधनगृहात शाळेतल्या विशिष्ट सर आणि मिसची नावे बदाम काढून लिहिणे वगैरे नेहमीचे प्रकार होतेच. इतर रूक्ष शाळांच्या तुलनेने इथले वातावरण रंगीबिरंगी होते. शिक्षिकांना पोशाखाचे बंधन नव्हते. ऐशी-नव्वदचं दशक असूनही काही ख्रिश्चन, पारशी, पंजाबी शिक्षिका स्कर्ट मिडी सारख्या पेहरावात, लिपस्टीक लावून येत. त्यांच्या पोशाख, मेकअप, पर्फ्यूमवर चर्चा करणं हा मुलींचा आवडता उद्योग असे. (आता मात्र तिथे शिक्षिकांना साड्या व त्याही एकसारख्या नेसाव्या लागतात.) इतर शाळांत गॅदरिंगच्या नाचात मुली आयब्रो पेन्सीलने मिशी काढून आणि डोक्याला फेट्यासारखी ओढणी गुंडाळून ’सजना’,’पिया’चा रोल करत. आमच्या शाळेत तसं कधीतरी होत असलं तरी मुलगे मुली एकत्रही नाचत. गावात अनेकांना हा सांस्कृतिक धक्का असल्याने ते शाळेला नावं ठेवत. मी हायस्कूलमध्ये असताना बोनीएमच्या ’रास्पुतीन’ की ’डॅडी कूल’ वर दहावीच्या मुलामुलींनी जोडीने, शेवटी आरके स्टुडिओ पोझ घेत जे इंग्रजी नृत्य केलं ते पाहून आ वासला होता. 

मुलगा-मुलगी शेजारी बसवले की बोलणार नाहीत असा तर्क असावा मात्र एकदा भीड चेपल्यावर मुलं मुली एकमेकांशी तितकीच बडबड करत. काही मोजकी अपरिहार्य टीनएजर प्रेमप्रकरणं आणि दोन चार वाह्यात मुलांचा अपवाद वगळता एकमेकांची मित्र होत. मुलांकडे कायम पुरूष म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून नकळत पाहायला शिकवलं ते याच शाळेनं. 

नववीत माझ्याशेजारी बसणारा मुलगा अगदी अबोल, साधा. अभ्यासात त्याला मी मदत करायचे पण मला पुस्तकांचं ओझं न्यायचा कंटाळा येई. मी त्याला चतुराईने पटवलं की पहिल्या ४ तासांची पुस्तकं तू आणत जा, शेवटच्या ४ तासांची मी. शेवटच्या ४ मधले ३ तास क्राफ्ट, चित्रकला, गाईड, पीटी वगैरे असल्याने वर्षभर मला एखादंच पुस्तक न्यावं लागे. दहावीनंतर तो मुलगा कुणालाही भेटलेला नाही. कधी भेटलाच तर मला त्याला उगीचच सॉरी म्हणायचं आहे.      

---------------------------

मैत्रिणी बर्‍याच असल्या तरी आम्ही तीन जणी हटकून एकत्र डबा खात असू. त्यातली एक माझ्याबाबत विशेष पझेसिव्ह होती. वर गाईड कॅम्प निमित्ताने उल्लेख केला आहे तिच्याशी माझी वाढती मैत्री पाहून हिने मला ’अब तेरे बिन जी लेंगे हम’ टाईप लांबलचक पत्र लिहीलं होतं. तिला मी तूच माझा पहला प्यार असल्याची खात्री पटवल्यावर ती शांत झाली. ते पत्र आठवून आता तिलाही खूप हसू येतं. आम्ही तिघी आजही जवळच्या मैत्रिणी आहोत. 

तर हायस्कूलला असताना डबा ग्रुपमधली ती तिसरी गुजराथी मैत्रिण म्हणाली ’आता ९ वी पासून माझी शाळा बंद, माझं राजस्थानला लग्न करणार आहेत.’ मला धक्का बसला. तिच्या वडिलांचं उत्तम चालणारं उपाहारगृह होतं. मी तिरीमिरीत थेट त्यात शिरून त्यांना भेटले. ’हे कसं चुकीचं आहे’ असं माझ्या तेव्हाच्या कुवतीनुसार कळवळून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. ’वो जाने दो बेटा, बर्फी खाओ’ म्हणत एकीकडे गल्ला मोजत त्यांनी हसून माझी बोळवण केली. विशेष म्हणजे तिलाही या निर्णयाचं दु:ख वगैरे झाल्याचं दिसलं नाही. त्यानंतर ती आजतागायत भेटलेली नाही. याउलट शिकण्याची आवड असलेली, आईविना जगणारी एक निर्धन मैत्रिण काही तरी निमित्त होऊन जळून वारली. तिचं आकस्मिक जळणं हे गूढच राहिलं. तिला रेल्वे हॉस्पीटलला भेटायला गेले तेव्हा जे काही पाहिलं त्यानंतर कितीतरी रात्री झोपच आली नाही.         

शाळेत इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे जो फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडला होता त्यामागे कारण एकच .. त्यात होत्या आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.

आम्हाला त्या तीन वर्ष क्लासटीचर म्हणून लाभल्या. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. त्या मराठी शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. ह्रस्व ,दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. कुणाचं उद्धृत वापरलं आणि नाव लिहिलं नाही तर ती चोरी असते, शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय सांगत. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतंच आवडायला लागलं. मग दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ती वाचल्याचं काहीतरी तीर मारल्यासारखं ऐटीत सांगितलं होतं. 

शाळेत अ‍ॅंग्लोइंडियन ख्रिश्चन मुलांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा ’बो’ लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचं बक्कल तुटलं म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आलं नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळलं, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावलं,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे.

दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावलं. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे नुसत्या वाचून दाखवल्या.पहिलीत ताठ उभं राहून टिळकांवर भाषण केल्यापासून वक्तृत्वाची भीती मेली होती पण इंग्लीशमधे !! जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती एकदम कमी झाली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, बोरकर, विंदा’ इ.च्या सोप्या किंवा बालकवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

’टिट्बिट्स’ नावाचं एक मासिक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. खेळ वगळता कोणत्याही स्पर्धेत, गॅदरिंगमधे मी भाग घेतला नाही असं कधी झालंच नाही. एके वर्षी काही कारणाने मी ऑडीशन देऊ शकले नाही. नंतर जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे नुसतं हात हलवत विहरत जायचं. एकही संवाद नाही. शिवाय ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. ते नाटक झालं, मी जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या म्हणाल्या ते नेमकं नाही पण त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. अशाही अनुभवाची एक गंमत असते.आवडीच्या प्रत्येक स्पर्धेत भाग मात्र घेत राहायचा "

माझी एक मैत्रिण छान नाचायची. तिने एकदा गॅदरिंगसाठी ठेक्याचं हवं म्हणून कुठलं तरी भप्पी लाहिरीचं गाणं निवडलं. मिसने तिला ऑडीशनमध्येच रिजेक्ट केलं. ती रागावली ,रडली. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात का? ते तुझ्या वयाला शोभणारे नाहीत, असल्या गाण्यांवर बाहेरही कुठे नाचायचं नाही. शास्त्रीय नृत्य शिक, वेस्टर्नही शिक पण कॉमनसेन्स वापरून वगैरे त्यांनी दुसर्‍या दिवशी तिला जवळ बोलावून समजावलं.

एका सुट्टीनंतर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर ’पेपर उडून गेले’. गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, जोरदार वारा आला आणि बरेचसे पेपर भुर्र उडाले. तेव्हा सोशल मिडिया असता तर त्यांचं किती ट्रोलींग झालं असतं कल्पना करवत नाही. अर्थात प्रिन्सिपल सिस्टरची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या-गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. त्या सरांच्या अद्भुत कौशल्यामुळे मला फाडफाड गणितं येऊ लागली. दहावीत गणितात दीडशेपैकी केवळ एक मार्क गमावला, याचं श्रेय त्यांच्याइतकंच जोशी मिसचं आणि थोडं त्या पेपर उडवणार्‍या वार्‍याचंही.

या सगळ्याचा परिणाम असेल, दहावीत तालुक्यात मुलींमधून पहिली आले. यानिमित्त मला आणि वर्गात दुसरा आलेल्या माझ्या एका वर्गमित्राला त्यांनी छोटीशी पार्टी दिली. त्यांच्या घरी. आजवर आईबाबांबरोबर कुणाकडे तरी जाणार्‍या मला हे फार भारी वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत बरंच काय काय खायला ठेवलं होतं. वर्गातल्या दोन टीचभर मुलांसाठी! 

मला अप्रूप वाटलं. त्यांच्या घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. स्वत: सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. घरी एकट्या असून सदासतेज, समाधानी, आनंदी. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरंच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते.

--------------------------

रियुनियनला आम्ही त्यांना सन्मानाने घेऊन आलो. त्यांनी सगळ्यांशी प्रेमाने गप्पा मारल्या. त्या आता थकल्या आहेत पण त्या आहेत ही भावनाही खूप उबदार आहे. 

त्या भेटल्याच नसत्या तर... ! Excelsior हे बोधवाक्य (शब्द) कृतीत आणणार्‍या या शाळेत आईबाबांनी मला घातलं नसतं तर! निम्नमध्यमवर्गीय घराबाहेरचं आणि मध्यमवर्गीय वाड्याबाहेरचं जग कदाचित कळलं नसतं. जन्मभर पुरेल इतका आत्मविश्वास मिळाला नसता. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, गाव असो, भोवतालची माणसं असो, भूमिका घेणं असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. आपल्या कक्षा रूंदावण्याची आणि त्याचबरोबर मर्यादांचा स्वीकार करण्याची हिंमत झाली नसती. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळली नसती. एका टप्प्यावर पुढे सगळा अंधार दिसत असताना, नैराश्य या शब्दाचा वाराही न लागता, there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. 


Tuesday, May 20, 2025

इकिगाई

 

हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस

निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम दीर्घायुष्याचं जपानी रहस्य

जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.

* शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्यांचं रहस्य.

* उत्साही शरीर, उत्साही मन.

* तणावाचा फायदा घेण्याची कला.

* स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.

* लोगोथेरेपी आणि मोरिता थेरेपी.

* तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.

--------------

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वत:ला  ’आला बॉ अजून एक दिवस अंगावर’ असं म्हणता की ’अहा, सुरु झाला एक नवा कोरा दिवस’ असं म्हणता. तुमचं उत्तर दुसरं असेल तर तुम्हाला तुमची इकिगाई बहुतेक गवसली आहे. ती अधिक अचूक उमजावी म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं, तुमचं उत्तर जर पहिलं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. 

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिएँ, असं आपण म्हणतो. बहुसंख्य जपानी लोकांची जिंदगी मात्र लंबी आणि बडी दोन्ही असते, जपानमध्ये समाधानी, कार्यक्षम आणि दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जगाच्या तुलनेने जास्त आढळून येते. ओकिनावा भागात शतायुषी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. यामागे इकिगाई म्हणजेच जगण्याची सकारात्मक प्रेरणा आहे हे लक्षात आल्यावर लेखकद्वयीने अनेक शतायुषी जपानी लोकांच्या मुलाखती घेतल्या, चर्चा केली आणि त्यातून हे पुस्तक साकार झालं. यातली इकिगाईची जादू अनेकांना भावली आणि पुस्तकाचा जगभरात अनेक भाषातून अनुवाद होत गेला.

माणसाची सगळी धडपड अमरत्वाकडे पोचण्य़ासाठी असते. ययातिची प्रातिनिधीक कथा आपल्याला माहित आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र वेगाने अत्याधुनिक होत चालले आहे त्यामुळे आपली जिंदगी गेल्या पिढीच्या तुलनेने ’लंबी’ होत चालली आहे. रे कर्झवेल या संशोधकाच्या मते काही दशकात आपण खरोखरच हवे तितके जगू शकू पण बहुसंख्य जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कितीही प्रगती केली तरी आपल्या नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया १२० वर्षांनी थांबतेच त्यामुळे त्यापुढे जगणे शक्य नाही. 

मन, मेंदू आणि शरीर 

जपानबरोबरच जगात काही बेटांवरदेखील सुखी दीर्घायू माणसं आढळतात. संशोधनाअंती असा निष्कर्ष निघतो की यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणींचा घट्ट ग्रुप, उत्तम कौटुंबिक नातेसंबंध ,आहारात भाज्यांचं पुरेसं प्रमाण पुरेसं, भरपूर चालणं, तणावमुक्त जीवनशैली.

शरीर- 

प्रत्येक वेळी ८०% पोट भरेल इतकाच आहार घ्या. पोटभर जेवणे, आग्रह करकरुन वाढणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे मानले जात असले तरी शरीराला हानीकारक आहे. स्क्रीनटाईम शक्य तितका कमी करा, भरपूर चाला. लवकर निजा लवकर उठा. पुरेशी झोप घ्या. आपली दिनचर्या तपासा. शरीर उत्साही असेल तरच आपलं मन टवटवीत राहील. 

मेंदू- 

मन:शांती ही शरीरस्वास्थ्याइतकीच मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. चाकोरीत फिरणार्‍या मेंदूवर गंज चढतो आणि त्या व्यक्तीला हळूहळू जगण्याचा कंटाळा येऊ लागतो. मेंदू कार्यक्षम राखण्यासाठी नवीन विषयांचे वाचन, प्रशिक्षण, त्यावर चर्चा, बौद्धिक खेळ, नवनव्या लोकांना भेटणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे इ. आवश्यक आहे. मेंदूची कवाडे जगाकडे उघडणे गरजेचे आहे. त्याने जगण्यात चैतन्य येते, उत्साह येतो. 

मन- 

मोई म्हणजे जिवलगांचा कंपू. समान आवडीच्या, एकाच ध्येयासाठी काम करणार्‍या गटासह आपले जवळचे नाते आपल्याला जीवनाशीही नकळत बांधून ठेवते. मोई हा काहीसा आपल्या बीसीसारखा प्रकार आहे. मोईतले सदस्य दर भेटीत ठराविक पैसे जमा करतात आणि गरजेनुसार ते परतफेडीच्या अपेक्षेसह एखाद्या सहकार्‍याला देतात. यातून त्याला आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळतो.

आपल्या मनावर वेगवेगळे ताण असतात. हे ताण नीट हाताळू न शकणारे लोक अकाली प्रौढ दिसू लागतात. त्यातले काही ताण जगताना भेडसावणार्‍या गंभीर समस्या, अभाव, अडचणी, क्लेशदायक घटना, असुरक्षिततेची भावना, नात्यातला दुरावा, वियोग, पराजय इ. मुळे उद्भवतात. तर काही ताण आपल्यातले चिंतातूर जंतू स्वत:च निर्माण करतात. उदा: सोशल मिडियावर कमी लाईक्स आले म्हणून खंतावणे, इतरांशी सतत स्पर्धा करणे इ. 

मानसशास्त्रज्ञांच्या मते ’माईंडफुलनेस’ हा यावर उपाय आहे. प्रत्येक क्षणाचा समरसून आनंद घेण्याची क्षमता आपण जितकी वाढवू शकू तितकी आपण तणावावर आधिकाधिक मात करु शकू. हातून गेलेल्या गतकालाबद्दल हळहळ आणि हातात नसलेल्या भविष्याबद्दल हुरहूर वाटत राहिल्याने आजचा, आत्ताचा क्षण निसटून तर जात नाहीये ना याबाबत आपण सजग राहिलो ताण निश्चित कमी होईल. अर्थात हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल पण याची परिणीती एका निरामय आणि दीर्घायू जीवनात होईल हे नक्की. 

लोगोथेरपी ते इकिगाई

सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"भिन्न स्वभावाच्या/विचारांच्या काही माणसांना उपोषणाला बसवा. भुकेच्या तीव्रतेबरोबर आतला खरा माणूस बाहेर पडू लागेल. सगळी प्रचंड भुकेली माणसं शेवटी एकाच पातळीवर येतील.’ परंतु हिटलरच्या क्रूर छळछावणीतील वेगवेगळ्या अनुभवांमुळे माणसाची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत त्याच्या आत्मबलावर अवलंबून असते हे व्हिक्टर फ्रँकलने स्वत: अनुभवले, पाहिले होते त्यामुळे त्यांना हे पटले नाही. आत्मबल वाढवणारी लोगोथेरेपी त्यांनी विकसित केली. लोगो म्हणजे ग्रीकमध्ये अर्थ. लोगोथेरपी म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट्य, जीवनाचा अर्थ शोधणे. या थेरपीचे तीन टप्पे सांगितले जातात. 

पहिला टप्पा- कोणत्याही परिस्थितीत कार्यमग्न राहून अर्थपूर्ण काम करत राहणे. 

दुसरा टप्पा- यशाचे परिमाण आपले आपण ठरवणे. 

तिसरा टप्पा- परिस्थिती आपल्या हातात नसली तरी तिला कसा प्रतिसाद द्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते हे समजून घेणे. 

इकिगाई हे लोगोथेरपीच्या मार्गावरचे अंतिम ध्येय आहे. इकिगाई मन आणि मेंदूबरोबरच शरीरस्वास्थ्याचाही विचार करते. 

सापेक्षतावाद आपल्याला माहित आहे. तापलेल्या वस्तूला एक मिनिट स्पर्श करा. ते मिनिट युगांचं वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एक तास घालवला तर तो तास एका मिनीटातच संपल्यासारखा वाटेल. आपण कशात जास्त रमतो? आपण वेळेकडे कसे पाहतो, त्या त्या वेळेत कोणते काम निवडतो, ते किती कौशल्यपूर्ण त-हेने करतो, किती लक्षपूर्वक करतो, त्यात कसा आनंद मिळवतो याचा शोध घेतला तर आपल्याला आपली इकिगाई सापडणे सोपे होईल. एकदा एखादे कौशल्य आत्मसात झाले तर पुढचे ध्येय निश्चित करुन आपल्या ठराविक साच्यापलिकडचे एखादे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक कामे करणे हे खरे तर कसब नव्हे. मुळात आपण एकावेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता उलट कमी होते. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंदित करुन मन विचलित होऊ न देता ते पूर्ण केले तर अधिक चांगले परिणाम दिसून येतात. आपण इकिगाईच्या अधिक जवळ पोचतो.


Thursday, August 15, 2024

गाव कारागीर

 ’खेडय़ास देव निर्मि, नगरास निर्मि मनुज’ - शहर आणि गावे यांच्यातला फरक आचार्य विनोबा भावे यांनी अशा नेमक्या शब्दात सांगितला आहे.  याच्या गर्भितार्थाकडे पाहिले तर खेड्यातील एकेकाळची नैसर्गिक, परस्परावलंबी जीवनशैली आणि शहरातील कृत्रिम, यंत्राधारित जीवनशैली यातला फरक स्पष्ट होईल.  बलुतेदारी हा खेड्यातील अर्थव्यवस्थेचा व बर्‍याच अंशी स्वयंपूर्णतेचा कणा होता. कृषीसंस्कृतीच्या आसावरचे वेगवेगळे गाव-कारागीर म्हणजे खरे तर व्यावसायिक होते. दुर्दैवाने त्यातून जाती निर्माण झाल्या. समाजात भिनत गेलेला जातीभेद आणि बदलत्या काळाशी जुळवून घ्यायला आवश्यक असलेल्या सक्षमतेचा अभाव यामुळे बलुतेदारीला घरघर लागली. 

या पार्श्वभूमीवर गाव-कारागीरांची सद्यस्थिती, कामाचे स्वरुप, परंपरा, कालच्या-आजच्या पिढ्यांमधील विचारांचा फरक असे विविध कंगोरे घेऊन आकाराला आलेले मह्त्वाचे पुस्तक म्हणजे सीमा शेटे-रोठे लिखित ’गाव कारागीर’. कुंभार, चांभार, लोहार, सोनार, सूप -टोपल्या तयार करणारे बुरुड , सुतार, कातडं कमावून वाद्य तयार करणारे, रंगारी, धोबी, नाभिक, पाथरवट आणि कासार हे ते कारागीर.

लेखिकेचा लहान वयापासून ग्रामीण व कृषीसंस्कृतीशी निकटचा संबंध असल्याने या पुस्तकाला एखाद्या रुक्ष वृत्तपटाचे स्वरुप न येता आस्थेचे अस्तर लाभले आहे. गाव- कारागीरांशी नागरी व्यक्तीचा थेट संबंध फारसा येत नाही.  घरी मंगलकार्य ठरल्यास त्यासाठी लागणार्‍या सुपापासून जोडयांपर्यंत आणि ब्रँडेड दागिन्यांपासून आधुनिक फर्निचरपर्यंत सगळे काही ऑनलाईन विकत घेणार्‍यांचा तर नाहीच नाही. अशा मंडळींना अज्ञात असलेल्या एका श्रमिक जगताचा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेने सहजपणे वेध घेतला आहे.  प्रत्येक कारागीरीवर एक स्वतंत्र लेख असल्याने जिज्ञासू वाचकाला बरीच नवीन माहिती त्यातून मिळू शकेल. यातील काही लेखांमध्ये शेवटी केलेली टिप्पणी अंतर्मुख करते. या मिडिया वॉच’ प्रकाशित पुस्तकाला डॉ. श्रीकांत तिडके यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. गजानन घोंगडे यांचे सूचक मुखपृष्ठ वाचकाला आशयापर्यंत पोचवण्याचे लेखिकेचे काम सोपे करते. 

आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून काम केल्याचा तसेच विविध प्रकारच्या लेखनाचा अनुभव सीमा शेटे- रोठे यांच्या गाठीशी असल्याने पुस्तक संवादी व प्रभावी झाले आहे. ग्रामीण किंवा निमशहरी जीवनाबद्द्ल बर्‍याच शहरी मंडळींच्या हिरव्या- हळव्या- स्वप्नाळू कल्पना असतात. लेखिकेने रेखाटलेले कारागीरांचे शब्द- जीवन चित्र भाबडे, काव्यमय, काल्पनिक किंवा केवळ स्वत:च्या आकलनापुरते मर्यादित नाही.  ते कारागीरांच्या थेट मुलाखतीच्या स्वरुपात म्हणजे ’फ्रॉम द हॉर्सेस माऊथ’ असल्याने वास्तवतेच्या पायावर उभे आहे. हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. 

’ग्रामोद्धारा’चा विचार मांडताना विनोबांनी एक वस्तुनिष्ठ प्रश्न मांडला होता. तो म्हणजे -खेड्य़ातली लक्ष्मी जाते कुठे! ते म्हणत, " त्या वाटा बंद करा म्हणजे ती खेडयात राहील. ती बाहेर जाते ते या ५ मार्गांनी - बाजार, लग्न व्यवहार, सावकार, सरकार आणि व्यसने. मीठ मसाले रॉकेल सारख्या दोन चार गोष्टी सोडल्या तर सारे काही गावात तयार करता आले पाहिजे. परस्पर व्यवहार सुरू झाला तर ’महाग’ हा शब्द ही हद्दपार होईल." या संकल्पनेची व्यवहार्यता कदाचित अर्थतज्ज्ञच सांगू शकतील परंतु या ५ कारणांचा कारागीरांच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे याचे दाखले या पुस्तकातील लेखांमध्ये ठायी ठायी विखुरले आहेत. 

 ’पांढरीवर घर नाही आणि काळीवर वावर नाही’ म्हणजेच हक्काचे घर किंवा जमीन नाही, अशा शब्दातून या कारागीरांचा सल लेखिका उघड करते.  ’छिलताना हाताले लागते. बिबा लावायचा बस्स. दवाखाने आम्हाला परवडत नाही, पैसाबी नाही’ म्हणणारा बुरुड समाजाचा कारागीर यात आहे. सोनार, लोहार, सुतार, तांबट आणि शिल्पकार ही विश्वकर्म्याची पाच मुले आहेत, असा उल्लेख विश्वकर्मा ग्रंथात असल्याची मान्यता पाथरवट समाजात आहे. ’शासनाच्या योजना काही असतील तर  त्या आम्हाले माहित नाही’ ही या विश्वकर्म्त्याच्या लेकराची व्यथा आहे. त्याचे स्वत:चे लेकरु "दोन दोन किमी चालत शाळेला जाते, एकटं हायवेने जाते, ते घरी येईपर्यंत जीव धाकधुक करते" म्हणणार्‍या पाथरवट कारागीराची तगमगही या पुस्तकात व्यक्त होते.  

अशा रखरखीत परिस्थितीतही हे कारागीर आपल्या जीवावर सावली धरू शकतात ते प्रथा-परंपरा-रिवाजांच्या आधाराने.  त्यातूनच विश्वकर्मापूजन करुन कामाला लागण्याची कुंभारांची प्रथा या पुस्तकातून माहित होते. चर्मकार समाजात हुंडा दिला घेतला जात नाही, उलट नवरीला देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न सासरची मंडळी करतात हे वाचून नवल वाटतं. लोहार समाजात तर म्हणे वधूला  मोरपीस देऊन ’अशा सुंदर सुंदर जागी मी तुला घेऊन जाईन’ असे वचन वर देत असतो. समाजाची खूण म्हणून जन्मानंतर २१ व्या दिवशी बाळाच्या पाठीवर लोखंडाच्या छडीचा डाग देण्याची अजब प्रथाही काही लोहार पाळतात. गावात काही कार्य असले की ’चुलीला’ म्हणजे घरातील सर्वांना आमंत्रण देण्याची जबाबदारी नाभिकाची असे हे बहुतेकांना माहित असते. पूर्वी कोकणात घरोघरच्या कर्त्या पुरुषाला ओवाळणं हा कोकणातील परीट स्त्रियांचा मान असे तर विदर्भात लग्नकार्यात कंकण बांधण्याचा. बलुतेदारीने अशी व्यवहाराच्या पलीकडे जाऊन घातलेली नातेसंबंधांची आगळीवेगळी वीण या पुस्तकातून कळते तसेच ती विसविशीत होत चालल्याची कारागीरांना वाटणारी खंतही. 

कारागीरांच्या कामाशी संबंधित असलेले पण आपल्या नेहमीच्या बोलण्यातून अस्तंगत होत चाललेले कितीतरी शब्द या पुस्तकातून नव्याने भेटतात. उदाहरण द्यायचे तर लाकडी चाकाला आतून लोखंडी वाट आवश्यक असते. अरे हो, तिला ’धाव’ म्हणतात हे लोहारांविषयी वाचताना लक्षात येते. त्यांच्याशी संबंधित भट्टी, ऐरण, भाता, जंतरपट्टी , पकड यांसारखे शब्द किंवा चर्मकाराची रापी, आरी, सस्ती यासारखी आयुधं, बुरुडकामातून तयार होणारी रोजच्या वापरातली दवडी, लक्ष्मीपूजनाला मानाचा समजला जणारा फडा अशा कितीतरी शब्दांची लेखिकेने पुनर्भेट घडवली आहे. प्रत्येक कारागीर समाजात एक आराध्यदैवत असते. मग ते सोनार समाजाचे नरहरी सोनार असतील किंवा नाभिकांचे सेना महाराज.  विहित कर्माची सांगड आध्यात्माशी घालणारा सेना महाराजांचा साधासा अभंगही या पुस्तकात अवचित भेटतो.

आपल्या वाडवडिलांकडून आलेला कलेचा, कृतीपद्धतीचा वारसा सांभाळताना  तर दुसरीकडे नवनव्या आव्हानांना सामोरे जाताना होणारी गाव-कारागीरांची परवड संवेदनशील वाचकाला या पुस्तकाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगाचे दर्शन घडवते.  बलुतेदारीच्या काही अज्ञात पैलूंचे दर्शन होते.  जेवताना पानात काही टाकले तर त्यामुळे शेतकर्‍याच्या बैलापासून पाकसिद्धी करणार्‍या आईपर्यंत अनेकांची मेहनत आपण बुडवतो आहोत असा त्याचा अर्थ होतो, असे विनोबा का म्हणत त्याचा आपसूक खुलासा होतो. या दिवाळीत पणत्या, केरसुणी (फडा), सुपली इ. वस्तू रापलेल्या हातांकडून विकत घेताना हे पुस्तक आठवेल आणि  घासाघीस करावीशी वाटणार नाही हे निश्चित.  


Wednesday, February 1, 2023

साहित्य संमेलन आणि तरूणाई

वर्धा येथे होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नसंच तयार करून मी काही स्थानिक, काही परिचयातील ,काही समाजमाध्यमातून ओळख झालेल्या तरुण तरूणींशी संवाद साधला. 

कला-वाणिज्य पदवी, एलएलबी, अभियांत्रिकी इ. शाखांचे हे विद्यार्थी आहेत. काही स्पर्धा परिक्षा देणारे, काही नोकरी करणारे आहेत. 

काही जणांना कसले तरी संमेलन वर्ध्याला होते आहे हे माहित होते तर काहींना याचा पत्ता नव्हता. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आहेत  हे माहित होते तसेच त्यांच्याविषयी माहिती होती. एकदोघांना वर्धा संमेलनात पुस्तकांच्या स्टॉल्सला भेट द्यायची होती. एका यूट्यूबरने’तिथे व्हिडिओ करू दिला तर मी जाईन’, असे उत्तर दिले.

एकीने सांगितले, " मला एकदा कवीकट्ट्यावर संधी मिळाली होती. त्यात कवींची इतकी गर्दी होती की माझा नंबर कधी येईल या गडबडीत मी  इतर कार्यक्रम पाहू शकले नाही. "

एकाने त्याच्या गावातील संमेलनात एक कार्यशाळा केल्याची आठवण सांगितली. परिसंवादांबाबत बहुतेकांना फारशी माहिती किंवा रस नव्हता. 


यंदाचे संमेलन अगोदरच झाले असून त्याचे अध्यक्ष  नागराज मंजुळे होते व त्यात त्यांनी भाषेच्या शुद्धतेविषयी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे एक जण म्हणाला. 

मंजुळ्यांचे ते वक्तव्य संमेलनातले नसून ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’ मधले होते असे मी सांगितले. 

एकीने विचारले ,"गेल्या महिन्यात मुंबईला झालं ते काय होतं मग?" ’ते राज्य सरकारने आयोजित केलेले ’विश्व मराठी संमेलन’ होते असे मी सांगितले. 

"मग वर्ध्याचे आयोजक कोण आहेत ?" यावर मी ’अखिल भारतीय साहित्य महामंडळ’ असे सांगितले. 

यावर काही जणांनी ’अशी एकूण किती संमेलने असतात’ असे विचारले.  

’विद्रोही संमेलने असतात. जाती धर्मनिहाय असतात. बाल, कुमार, युवा, शिक्षक, कामगार आणि स्त्रियांचीही असतात. बोलीभाषांची असतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या स्तरावर अशी संमेलने आयोजित करत असतात. अ.भा.साहित्य महामंडळ ही महाराष्ट्रातील चार प्रादेशिक संस्थांची शिखरसंस्था आहे म्हणून या संस्थेच्या संमेलनाची अधिक चर्चा असते’, असे मी सांगितले.

प्रश्नसंच त्यांनी तयार केला असून उत्तरे मी देते आहे असे या संवादाचे स्वरूप उलट झाले होते.

हे तरूण समस्त मराठी युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करतात असा माझा दावा नाही पण त्यांच्या प्रतिक्रिया चिंतनीय आहेत. प्रस्थापित साहित्य संमेलनांविषयी युवा पिढीला अनास्था वाटते,  हे सत्य त्यांच्या संमेलनातील जेमतेम उपस्थितीवरून सहज लक्षात येईल. संमेलने बहु झाली या स्थितीमुळे ते गोंधळले आहेत. या वेगळ्या चुली नसून हे साहित्याचेच उपप्रवाह आहेत, हे त्यांना समजावून सांगण्याचे आव्हान आणि जबाबदारी त्या त्या आयोजकांची आहे.  

तरूणांचा वरचा वर्ग इंग्लीश बेस्ट सेलर्स, गॉसिप मासिकं वाचतो. ती ही किंडलवर. संमेलन वगैरे त्यांच्या गावीही नाही. मध्यमवर्गी तरूण समाज माध्यमावर काय ते वाचतात, बघतात. वेब मालिका पाहतात. करियरचं दडपण त्यांना वाचनाकडे गांभीर्याने पाहू देत नाही. निमशहरी किंवा खेडेगावात पदवी घेत असलेल्यांना दर्जेदार शिक्षणाअभावी किंवा आर्थिक तणावामुळे सकस साहित्याची गोडी लागत नाही. लागली तरी पदरमोड करून संमेलनास जाणे त्यांना परवडत नाही.  

मग साहित्य संमेलनाला जाणारे लोक नेमके कोण असतात? 

पन्नाशीला पोचल्यावर स्थैर्य आलेले किंवा निवृत्त मध्यमवर्गीय पुस्तकप्रेमी, भाषाविषयाचे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, समाज माध्यमावर लाईक मिळू लागल्याने आपल्या कविता, लेखनावर संमेलनाच्या मान्यतेची मोहोर लागावी अशी आकांक्षा असलेली मंडळी, उपस्थिती अनिवार्य असलेले आयोजक संस्थेशी संबंधित लोक, स्वागताध्यक्षांचे निकटवर्तीय आणि प्रतिकूल स्थितीतही साहित्यविश्वाच्या संपर्कात असलेले मूठभर तरूण. 

तरूणांशी बोलल्यावर जाणवले की साहित्य संमेलने युवकांना आपली वाटावी व सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रस्थापितांच्या विचार पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे.

पहिला बदल म्हणजे कागदावर छापून येते तेच साहित्य नसते हे स्वीकारायला हवे. साहित्य म्हणजे भोवताल टिपणे. त्याचे स्वरूप छापील पुस्तकांव्यतिरीक्त  स्कीट्स, विविध सादरीकरणांची संहिता, समाज माध्यमावरील लेखन, ब्लॉग्ज, व्ही-लॉग्ज, मुलाखती किंवा मीम असेही असू शकते. 

चांगल्या साहित्यनिर्मितीसाठी संमेलनांतर्गत आयोजित पटकथा, गीत-गजल-ब्लॉग लेखन, डिजिटल पब्लीकेशन यासारख्या कार्यशाळांना अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रचारावर भर द्यावा.  संमेलनातील निरर्थक वादांपेक्षा वृत्तपतत्रातून या विषयीच्या बातम्या प्राधान्याने याव्यात. 

अगम्य विषयावरील परिसंवादात, हितसंबंध जपण्यासाठी अनेक वक्त्यांची वर्णी लावून श्रोत्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातो. अपवाद वगळता निवडीला गुणवत्तेचा निकष आहे की नाही अशी शंका यावी असे सुमार वक्ते, रटाळ कवी रसिकांच्या वेळेचा अपव्यय करताना दिसतात. यावर अंकुश यावा.

संमेलनपूर्व राजकीय कलगीतुरे हे देखील तरूणांनी संमेलनांकडे पाठ फिरवण्याचे मह्त्वाचे कारण आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता मागे घेतला असला तरी त्यांनी राजकीय हस्तक्षेपाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. संमेलनासाठी निर्धारित सरकारी निधी वाढावा म्हणजे संमेलनाला राजकीय नेत्यांच्या अधीन राहावे लागणार नाही. राजकीय सहकार्य अवश्य असावे पण राजकीय विश्लेषक नसलेल्या साहित्यिकांनी व्यासपीठाचा वापर आपल्या राजकीय भूमिकेच्या प्रदर्शनासाठी करू नये. राजकीय हेव्यादाव्यांचा वीट आलेल्या तरूणाईला इथेही फक्त तेच ऐकवायचे असेल तर त्यांनी संमेलनाला का यावे ! 

या तरूणांशी बोलताना लक्षात आले की त्यांच्या विरोधातील आधीच निष्कर्ष ठरवलेले तथ्यहीन विषय संमेलनातील परिसंवादासाठी घेतले तर त्यांना ते आवडणार नाहीत. उदा:  समाजमाध्यमांचे नकारात्मक परिणाम वगैरे. त्यांचे म्हणणे, आम्हाला मोबाईलच्या अतिवापरावरून उपदेश करणारी मधली पिढी स्वत:च व्हॉट्सअ‍ॅपच्या आहारी गेली आहे तेव्हा त्यांनी दुटप्पी वागू नये. आमची पिढी ऐकणारी आणि (व्हिडीओ, रील्स) बघणारी पिढी आहे. वाचन म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचणे एवढेच नव्हे. जग पॉडकास्ट किंवा ऑडियोबुक्स आणि चॅट-जीपीटीपर्यंत पोचले असताना बहुसंख्य संमेलनांचे आयोजक एक तर ’स्वामी- मृत्युंजय, पुलं-वपु” मध्ये किंवा दुसरीकडे नकारात्मकतेत व अभिजन-बहुजन वादात अडकून पडलेले दिसतात. 

याचे प्रतिबिंब समाजमाध्यमावरही पडत असले तरी लोकल ते ग्लोबल असा त्याचा प्रचंड आवाका आहे. माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात समाजमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे. तिथे अनेक लेखनविषयक स्पर्धा होत असतात. तरूणांचे साहित्य कट्टे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप वर आहेत. कला प्रदर्शनाचे कट्टे इन्स्टाग्राम व यूट्यूबवर आहेत. अधिक गंभीर चर्चा रेडीट व कोरावर घडत आहेत. इथे सुमार लिहिणारे अनेक असतील पण बोलीभाषेत उत्तम लिहिणारे निमशहरी लेखक इथे आहेत तसेच प्रमाण भाषेत सकस लिहीणारे शहरी तरूणही. त्यांची ताकद, त्यांची प्रतिमा त्यांना आलेल्या संमेलनाच्या आमंत्रणावर ठरत नसून त्यांची लेखणी ठरवते. इथे थेट प्रतिसाद मिळतो तशी टीकाही झेलावी लागते. संमेलनांनी आपल्या कक्षा रूंदावून या सार्‍याला सामावून घेतले तर तरूणांचाही संमेलनांकडे ओढा वाढेल. 

लोकशाही व्यवस्था बदलण्याचे आणि विचाराची पोच अमर्यादित स्तरावर नेण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याने यावरील चांगल्या लेखनाला साहित्याचा दर्जा दिला जावा अन्यथा नुकत्याच लोकप्रिय होऊ लागलेल्या ताज्या टवटवीत सोशल मिडिया संमेलनांनाच काय ते भवितव्य उरेल व जुन्या पठडीतली संमेलने कालबाह्य ठरतील. 

वर्धा संमेलनातील कार्यक्रम बघता यातील बहुतेक अपेक्षांना न्याय देण्याचा आयोजकांनी मनापासून प्रयत्न केलेला दिसतो आहे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर संमेलनात पहिल्यांदा चर्चा घडते आहे. मुद्रित माध्यमांच्या संपादकांनी समाजमाध्यमाबद्दल बोलणे, लेखकांनी थेट व्यक्त होणे, मुक्तसंवाद, परिसंवादात वंचित समाजाच्या साहित्यापासून ललितेतर साहित्यापर्यंत व प्रबोधन परंपरेपासून अनुवाद व स्त्री-पुरुष तुलनेपर्यंतचे  वैविध्य हे संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. चांगल्या साहित्यविषयक चळवळी हे समाजाच्या जिवंतपणाचेच नव्हे तर सक्रियतेचे लक्षण आहे. अशा उपक्रमांमधून समाजातले साचलेपण दूर होते. वैचारिक जळमटे दूर होऊन नव्या विचारांची वाट मोकळी होते. दक्षिण भारतीय , हिंदी व बंगाली साहित्यवर्तुळात हे घडताना दिसते आहे.

मराठी साहित्यक्षेत्रात देखील कोणत्याही संमेलनाचे मंडप काढल्यानंतर पुरस्कारांचा मोह, वैयक्तिक महत्वाकांक्षा, उत्सवप्रियता, लागेबांधे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन जागल्याचं काम करणारे साहित्यिक आणि रसिकांचे निखळ साहित्यप्रेम तळाशी उरायला हवे. जागतिक बदलांचे वारे इथवर पोचायला हवे तरच तरुणांना साहित्य संमेलने हवीशी वाटतील आणि आणि ती त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील.

https://www.evivek.com/Encyc/2023/2/1/Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan-2023-and-youth.html?fbclid=IwAR15eOevuHKKYhrIyOtn04ZlhwM6qyrhDorFmn9-VUHyg8MxvM4pIP8kNag

साप्ताहिक विवेक - साहित्य संमेलन विशेष अंकातील ’युवाकट्टा’ या सदरातील लेख 

Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Monday, September 5, 2022

बिझनेस नेटवर्किंग

 ’हाऊ टू...’ प्रकारची अनेक पुस्तकं इंग्लीशमध्ये उपलब्ध आहेत. व्यवसायवृद्धी, व्यक्तिमत्व विकास किंवा व्यवस्थापनशास्त्र हे त्यातले लोकप्रिय विषय. त्यापैकी बर्‍याच प्रसिद्ध पुस्तकांचे मराठी अनुवाद देखील केले गेले आहेत. परंतु या सगळ्या पुस्तकातला ’you' आणि त्यातले संदर्भ हे अभारतीय आणि अर्थातच अमराठी असतात. नवोदित महाराष्ट्रीय उद्योजकाच्या मुलभूत समस्या समजून घेऊन त्यांची उकल करणारी पुस्तकं मराठीत फारशी नाहीत. 

श्री. विनीत बनसोडे हे ग्राफोलॉजिस्ट आणि नामवंत उद्योजकांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिकांच्या शेकडो कार्यशाळा घेत असताना तसेच सॅटर्डे क्लबच्या विविध शाखांमधील सदस्यांना याबाबत प्रशिक्षण देत असताना *’*बिझनेस नेटवर्किंग’* चे महत्व आणि सोप्या मराठीत या विषयावरील पुस्तकाची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवली. त्यातून त्यांचे ’बिझनेस नेटवर्किंग’ हे पुस्तक साकार झाले. कष्टाळू मधमाशांचे पोळे दर्शवणारे बोलके आणि आकर्षक मुखपृष्ठ लेखकाची नेटवर्किंगची व्याख्या अधिक स्पष्ट करते. (प्रकाशक- सुमंगल बुक कॉर्पोरेशन)

व्यावसायिकांना भेडसावणारे बरेचसे प्रश्न समान असले तरी आयात केलेल्या परदेशी पुस्तकातली पार्श्वभूमी, विचारसरणी, संस्कृती तसेच मानसिकता ’आपली’ वाटत नाही त्यामुळे तिथे दिलेली उत्तरे किंवा पर्याय प्रत्यक्षात फारसे लागू पडत नाहीत. भारतीय व्यवसायात मानवी भावना, परस्पर संबंध, विश्वास या गोष्टी अतिशय महत्वाच्या तर पाश्चात्य देशात व्यवहार आणि व्यावसायिक वृत्ती म्हणजे सब कुछ. महाराष्ट्रात पहिल्या पिढीचे अनेक उद्योजक तयार होत आहेत. त्यांचे पालक बहुतांशी नोकरी करणारे असल्याने व्यवसायातील संभाव्य अडचणींबद्दल अनभिज्ञ असतात. व्यवसायाला अनुकूल वातावरण घरात नसते. योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक नवउद्योजक निराश होऊन व्यवसाय सोडून देतात किंवा मोठी स्वप्ने बाजूला ठेवून पराभूत मनोवृत्तीने आपल्या लहानशा वर्तुळात रुटूखूटू व्यवसाय करत राहतात. 

यावर उपाय म्हणजे बिझनेस नेटवर्किंगचे कौशल्य शिकून आपला व्यावसायिक उत्कर्ष साधत राहणे. ’उत्तम व्यवसायासाठी नेटवर्किंग कसे करावे’ याचे अभ्यासक तसेच प्रशिक्षक असलेल्या बनसोडे यांनी आपल्या पुस्तकातून याविषयाचे अनेक पैलू उलगडले आहेत. हे पुस्तक नवोदितांना केवळ मदत करत नाही तर एक व्यावसायिक म्हणून आत्मपरिक्षण करायला भाग पाडते. 

बिझनेस नेटवर्किंग म्हणजे जास्तीत जास्त लोकांना भेटून उत्पादनाची विक्री करणे असा अनेकांचा गैरसमज असतो. यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार. त्या दृष्टीने व्यवसायाच्या विविध क्षेत्रातील अनुभवी तसेच यशस्वी लोकांना भेटत राहणे आणि त्यांच्याशी दृढ संबंध निर्माण करणे म्हणजे बिझनेस नेटवर्किंग. या हक्काच्या व्यक्ति तुमचे नाव जेव्हा कुणाला व्यावसायिक कारणासाठी सुचवतात तेव्हा तुमचे नेटवर्किंग योग्य दिशेने सुरू आहे असे समजायला हरकत नाही. याचबरोबर तुम्हाला इतरांनाही अशी मदत करायला हवी याचे भान असायला हवे. 

नेटवर्किंगसाठी जाताना तुम्हाला लगेच ग्राहक मिळणार आहे असे गृहीत धरू नये. तुमच्या व्हेंडर्सकडून तुम्ही ज्या अपेक्षा करता त्याच अपेक्षा तुमच्याकडून तुमचा ग्राहक करत असतो. अशा अनेक उपयुक्त सूचना या पुस्तकात स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत. ’पी हळद आणि हो गोरी’ या उक्तीनुसार पदार्पणातच उत्तुंग व्यावसायिक यशाची स्वप्ने पाहणार्‍या मुंगेरीलाल मंडळींना वास्तवाचे भान देणारी आणि संयम तसेच चिकाटीचे महत्व सांगणारी यातली चिनी बांबू संकल्पना  मुळातून वाचायला हवी. संपर्कक्षेत्र वाढवायचे असेल तर जगातल्या अर्ध्या व्यावसायिकांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त सहा टप्प्यात पोचू शकता. हे सहा दरवाजे एकामागोमाग एक उघडणारी किल्ली कुठे दडली असते, ती कशी वापरावी हे यात रंजक पद्धतीने सांगितले आहे. व्यावहारिक नफ्यापलिकडे विचार करता बिझनेस नेटवर्किंगचे इतर फायदेही यात सविस्तर मांडले आहेत

नेटवर्किंग संघटनेत तुमचा वावर कसा असावा, तुमची विश्वासार्हता कशी वाढवावी, अल्प काळासाठी भेटलेल्या व्यक्तिच्या कायम स्मरणात राहील असा स्वत:चा तसेच व्यवसायाचा परिचय प्रभावीपणे कसा करून द्यावा, आपली लहानशी यशोगाथा सुद्धा आत्मविश्वासाने कशी सादर करावी, आपलं वैशिष्ट्य म्हणजेच यूएसपी कसा ओळखावा, त्याचा वापर कुठे, कसा, करावा, उत्तम प्रतिमानिर्मिती कशी करावी, नेटवर्किंगमुळे दाट परिचय झालेल्या दिग्गज उद्योजकांनी किंवा तुमच्या ग्राहकांनी तुमच्या सेवा, उत्पादनाबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांचे व्यावसायिक महत्व काय, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, चांगल्या नेटवर्किंगमधून जॉईंट व्हेंचर्स कसे निर्माण होतात, त्याचे फायदे काय अशा विविध विषयांसंबंधी अनेक उपयुक्त कानमंत्र हे पुस्तक तुम्हाला देतं. 

या पुस्तकाचे वेगळेपण आहे ते तुम्हाला आरसा दाखवणार्‍या, प्रत्येक मुद्द्यावर आधारित प्रश्नावलीत. उदा: मॉलमध्ये साधारणपणे लोणच्याच्या कप्प्याजवळच पापड ठेवले जातात. मग व्यवसाय करताना तुम्ही तुमच्याशी संलग्न क्षेत्रातील व्यावसायिकांशी संबंध वाढवता आहात का? ते कसे वाढवावेत? अशी क्षेत्रे कोणती? प्रचंड स्पर्धा असलेल्या ठिकाणी (रेड मार्केट) टिकून राहण्यासाठी हातपाय मारत बसण्यापेक्षा तुमचा स्पर्धक अद्याप न पोचलेल्या जागी (ब्ल्यू मार्केट) आधी पोचण्याचा विचार तुम्ही करता का? अशा जागा कोणत्या? त्यासाठी स्वत:मध्ये कोणते बदल करावे लागतील? तुमचा मित्रपरिवार कसा आहे? तुम्ही तुमच्यापेक्षा कमी कुवतीच्या लोकांशी संबंध वाढवता की तुमच्यापेक्षा यशस्वी लोकांशी? तुम्हाला तुमचे मूल्य माहीत आहे का? ते वाढवण्य़ासाठी तुम्ही प्रयत्न करता का? ’सिर्फ नाम ही काफी है’ असा एखादा तरी ग्राहक तुम्ही मिळवू शकला आहात का? असल्यास तुम्ही त्याबद्दल कसे बोलता? या स्वरूपाची रोखठोक प्रश्नावली सोडवताना स्वत:ला परखड प्रश्न विचारण्याची तयारी हवी. तुमच्या यशाचे गमक तुम्हाला तुमच्याच प्रामाणिक उत्तरात निश्चित गवसेल.

श्री. बनसोडे यांचा व्यवसाय क्षेत्रातील प्रदीर्घ व आंतरराष्ट्रीय अनुभव लक्षात घेता या पुस्तकात प्रत्यक्ष केस-स्टडीजचा अंतर्भाव करणे त्यांना सहज शक्य होते. ही उणीव त्यांनी चपखल उदाहरणांनी काही अंशी भरून काढली आहे. एकूण महाराष्ट्रीय उद्योजकाच्या मनातला न्यूनगंड काढून त्याच्या व्यवसायाचे तारू भरकटू न देता प्रगतीची नवनवी क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी त्याला हे पुस्तक नक्की उद्युक्त करेल. सहज-सुगम भाषेतले हे पुस्तक उद्यमशील वृत्तीच्या व्यक्तिंसह प्रत्येक मराठी व्यावसायिकाच्या संग्रही असायला हवे. 

©मोहिनी मोडक


Wednesday, February 9, 2022

WIne is NOTfine


 किराणा दुकानात जाणे हा विनोदाचा विषय होईल असं कधी वाटलं होतं का! पण झालाय. हजार स्क्वे. फुटाहून मोठ्या किराणा दुकानात आता वाईन मिळणार म्हटल्यावर समाजात तीन गट पडले आहेत. पहिला गट विरोधकांचा, दुसरा विवि म्हणजे विरोधकांच्या विरोधकांचा (कारण दारुचं समर्थन कसं करणार!) आणि तिसरा बिनबुडाचा म्हणजे निर्णय कोणत्या सरकारने घेतला यावरून पहिल्या किंवा दुसर्या गटाची री ओढणार्यांचा. त्यामुळे तिसर्या गटाला बाजूला ठेवून आपण या प्रकरणाकडे पाहूया. विवि म्हणतात- "वाईन ही दारु नव्हे, ती पिऊन कुणी झिंगून पडत नाही. ते महागडं उच्चभ्रूंचं पेय आहे, सर्वसामान्यांना त्याने ढिम्म फरक पडत नाही. दारुशिवाय इतर प्रश्न जास्त महत्वाचे आहेत, ते आधी सोडवा" वगैरे वगैरे..

बरं! पण महत्वाच्या आणि मुलभूत गरजांपेक्षा वर्षाला साधारण ५०० कोटी रू. दारूवर खर्च करणारा महाराष्ट्र पाहिला, खेड्यापासून महानगरांपर्यंत भरभरुन वाहणारे गुत्ते आणि बार पाहिले, ’संध्याकाळी बसूया’ हेच जीवितकार्य समजणारे कित्येक निरुद्द्योगी तरुण पाहिले आणि व्यसनमुक्ती आणि दारुबंदीसाठी वर्षानुवर्षे लढणार्या कार्यकर्त्यांशी बोललं, तर हा किती महत्वाचा प्रश्न आहे ते सहज लक्षात येईल. अपघात, अत्याचार, गुन्हेगारीच्या बहुसंख्य घटनांमागे दारूने सटकलेलं डोकं कारणीभूत असतं हे कुणाला अमान्य नसावं.
मात्र विविंच्या मते "मुदलात वाईन दारू नाहीच. वाईन म्हणजे फळांचा रस किंवा ’तुमचं’ द्राक्षासव" मग सरळ तुलनेने स्वस्त आणि पोषक ज्यूस प्यायचा सोडून लोक उगाचच महागड्या वाईन का बरं पीत असतील! कारण फळांच्या रसापलीकडचं काहीतरी म्हणजेच अल्कोहोल नामक चटक लावणारं प्रकरण त्यात आहे. पण यांच्या मते- "दारु म्हणजे व्हिस्की किंवा रम सारखं हार्ड ड्रींक, ज्यात ४०-५० टक्के अल्कोहोल असतं. वाईन मध्ये फक्त ५ ते १५ टक्के अल्कोहोल असल्यावर त्यामुळे नशा कशी येईल!"
यांना इतकंच सांगावसं वाटतं की बीयर, वाईन ही दारुच्या व्यसनाकडे नेणारी पहिली पायरी आहे. तिथेच थांबणारे आस्वादक संयमवीर किंवा वीरांगना मोजक्याच. आपली सुरुवात अशाच पेयांनी आणि गंमत, कुतूहल, पीअर प्रेशर, स्टाईल, क्रेझ वगैरे कारणांनी झाल्याचे बहुसंख्य हार्ड ड्रिंक घेणार्यांना मान्य असते. एरवी एकदा का त्यातलं अल्कोहोल खेचू लागलं की त्याची ठराविक पातळी राखल्याविना त्या माणसाची तगमग होऊ लागते. बिचारी वाईन त्या पातळीपर्यंत न्यायला पुरी पडत नाही, पडली तर परवडत नाही त्यामुळे एकच प्याला ऐवजी हार्ड ड्रिंकचा दुसरा, तिसरा प्याला रिचवला जातो. कालांतराने प्याले मोजायच्या अवस्थेत ती व्यक्ती राहत नाही. यानंतर मद्यपीसह संबंधित व्यक्तींना जे आर्थिक, शारीरिक, मानसिक परिणाम भोगावे लागतात त्यापेक्षा समाजातले इतर प्रश्न कसे मह्त्वाचे आहेत वगैरे पळवाटा काढून काही साध्य होणार नाही. त्याने दारू घातक असते हे सत्य बदलणार नाही.
अनेक विदेशी संस्कृतींमध्ये विशेषत: थंड हवेच्या प्रदेशात मेहमानोंका स्वागत वाईनने करण्याचा रिवाज आहे. वर्षातले १०-११ महिने उन्हाने त्रासलेल्या आपल्या विकसनशील देशात असा रिवाज नाही. मूठभर ग्लोबल मंडळींची ती वैयक्तिक आवड असली तरी आपली (एक दोन राज्य वगळता) भौगोलिक किंवा (बहुराष्ट्रीय कंपनी, आतिथ्य-पर्यटन व्यवसायासारखे) अपवाद वगळता सामाजिक निकडही नाही. आपल्याकडे मेहमानोंका स्वागत गुटख्याने करायला बंदी असताना वाईनला स्वागताची तोरणं लावली जातायत हा विरोधाभास का ! गुटखा खाण्याचे प्रमाण शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढायला लागल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. याचा अर्थ एखाद्या हानीकारक उत्पादनाच्या सहज उपलब्धतेमुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता वाढते हे शासनाला मान्य आहे. मग वाईनची उपलब्धता वाढवताना हे भान कुठे गडप झालं असावं?
अरे हो, हे सगळं शेतकर्यांच्या फायद्यासाठी चाललंय, नाही का! कसं ते मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांचा फायदा करायचा असेल, तर फळं, द्राक्षाला हमी भाव जाहीर करावा. आवश्यकतेनुसार पाणी, वीज उपलब्ध करून द्यावी. प्रत्यक्षात सरकार कोणतंही असो, बहुतेक वेळा लॉबींगमुळे उत्पादकाऐवजी प्रक्रिया व विक्री करणार्यांच्या हितालाच प्राधान्य दिलं गेलं आहे. हे कमी की काय म्हणून आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरचं उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आलं आहे. मद्य स्वस्त म्हणजे विक्री जास्त. प्या लेको, करा चैन!
विंदा म्हणतात तसं
'औचित्याच्या फोल विवेका! जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने'
ही जनतेची अवस्था होईनाका, सरकारला 100 कोटी ऐवजी दुप्पट महसूल मिळणार. कोरोनामुळे तिजोरीवर आलेला ताण कमी करण्याचे हे खरंच किती नामी उपाय आहेत. गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा हवाला देत सत्तेवर येणारं सरकारच ते अंमलात आणणार असेल तर दारुमुळे उद्ध्वस्त होणार्या कुटुंबांनी दाद कुठे मागायची!
याचा अर्थ दारू पिणारे सगळे लोक दुर्जन वगैरे असतात असा नव्हे, सगळेच ’दारुडे’ सुद्धा नसतात. आपल्या आनंदासाठी मर्यादित प्रमाणात वाईनसह विविध प्रकारच्या दारूचा नियमित किंवा प्रासंगिक आस्वाद घेणारे मोजके चोखंदळ रसिक समाजात आहेत. अर्थात नियमित पिण्याने होणारी आरोग्यहानी ती व्यक्ती टाळू शकत नाहीच पण त्यांना काही सांगायला जावं तर ते ’हाय कंबख्त तूने पी ही नही !’ म्हणणार.
दुसर्या बाजूला अत्यंत विकल मनोवस्थेमुळे कुणी दारू पीत असेल किंवा ज्या कामाची पांढरपेशा समाज कल्पनाही करू शकत नाही असे काम करावे लागण्याच्या अपरिहार्यतेमुळे किंवा असह्य शारीरिक दमणुकीमुळे एखादा मजूर दारु पीत असेल तेव्हा त्याला नैतिकतेचे डोस पाजायचा आपल्याला निश्चितच अधिकार नाही. परंतु कोणत्याही प्रकारच्या अपेयपानाला कुणी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न करत असेल तर त्यांना जाब विचारायचा अधिकार नक्कीच आहे.
वाईन /दारू या आधी मिळत नव्हती का, होती. आहेत की त्यासाठी मुबलक खास दुकानं. पण ’त्या’ दुकानात जाऊन डॉक्टर ब्रँडी घेतानाही लाजणारा एक वर्ग आहे. त्यांची भीड चेपावी आणि नवे ग्राहक निर्माण व्हावे अशी आता सरकारची अपेक्षा असल्याने तिकडे अडकून पडलेल्या वाईनला मुक्त द्वार देण्यात आलं असावं. जोवर एखाद्याच्या पिण्यामुळे संबंधितांना, समाजाला काही त्रास होत नाही तोवर ते त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. परंतु ती व्यक्ती देखील आपल्या घरातल्या लहान मुलांना पेला ’ऑफर’ करणार नाही. अगदी (दारूच नसलेल्या!) वाईनचा सुद्धा! याचाच अर्थ समज येईपर्यंत अशा पेयांपासून मुलांनी दूर राहावे अशी गरीब-श्रीमंत, अजाण-सुजाण, पिणार्या- न पिणार्या सगळ्याच पालकांची धडपड असते.
तरीही किराणा दुकानात एखाद्या सरबताच्या बाटलीसारखी वाईन सहज उपलब्ध करणे हा तिला सहज- स्वीकृती मिळावी म्हणून आधी राजमान्यता आणि पाठोपाठ समाजमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यातून कोवळ्या पिढीला नकळत दिला जाणारा ’इट्स ओके टू ड्रिंक’ हा संदेश गंभीर आहे. हे न्यू नॉर्मल एक प्रकारचं स्लो पॉयझनींग आहे. आधीच बदलत्या काळाने पालकांसमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. त्यात आता पालकांबरोबर मॉलमध्ये खरेदीला आलेल्या लहान मुलांनी या रंगीत बाटली कडे बोट दाखवून कुतूहल व्यक्त केले तर पालकांनी नेमकं काय उत्तर देणं अपेक्षित आहे याविषयीही सरकारने पालकांचं प्रबोधन करावं.
समाज म्हणजे सिनेमा नव्हे जिथे बारीक अक्षरात ’दारु पिणे हानीकारक आहे’ अशी तळटीप देऊन टाकली की ’चार बोतल व्होडका काम मेरा रोजका’ किंवा ’अभी तो पार्टी शुरु हुई है’ म्हणत पडद्यावर हवा तो धिंगाणा घालायची मोकळीक मिळते. तेव्हा याविरोधात विवेकी कृती करुया. कितीही अहितकारक निर्णय लादले गेले तरी पालक म्हणून मुलांना त्याच्या परिणामांचे भान देत राहूया. वाईन उपलब्ध असलेल्या किराणा दुकानात खरेदी करणे टाळूया. या काळ्य़ा ढगाला रुपेरी किनार म्हणजे काही व्यापारी संघटनांनी आपल्या सभासदांना स्वत:च्या प्रतिष्ठानात वाईन विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. कोवळ्या मुलांसह अवघ्या समाजाला आकर्षित करू पाहणार्या आणि चोरपावलांनी व्यसनाच्या वाटेवर नेऊ पाहणाऱ्या या न्यू नॉर्मलच्या निषेधाचा स्वर इतका तीव्र करूया की त्यापुढे ’चीअर्स’चे आवाज क्षीण व्हावे.

Published in Divya Marathi Madhurima 9Feb

Sunday, August 8, 2021

जेता

 कुठून येते ही उर्जा?


ज्या लक्ष्यपूर्तीसाठी कित्येक वर्षे तहान भूक हरपून मेहनत करायची, तो सुवर्णक्षण पुढ्यात असताना प्रतिक्रियांची पर्वा न करता अत्युच्च त्याग करायचा, ही जोखीम मोठीच. खेळाडूंमध्ये कुठून येत असेल हा अदम्य विश्वास? या कृतीमागे आंतरिक कौल असतो, की समयोचित तत्परता? देशातील कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर डोक्यावर सांभाळत अशी कृती करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही असतात असे काही जीव, जे जीवापाड परिश्रमांसमोरही मनाच्या प्रामाणिकतेशी सलगी करतात. एखादा सामना हरताना त्यांनी क्षणार्धात जगाला जिंकून घेतलेले असते. त्यागमूर्तींची यादी संपत नाही. आत्मबळ पेरणारी अशी व्यक्तिमत्वे देशाचाच गौरव वाढवितात. निवडक दाखल्यांचा उजाळा माणुसकीच्या उद्घोषाला प्रेरक ठरेल.

१९८८ चे सेउल ऑलिंपिक. कॅनडाचा लॉरेन्स लेमिक्स अटीतटीच्या नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेला होता. स्पर्धा सुरु असताना दुसर्‍या एका शर्यतीतली नाव उलटलेली पाहून तो चक्क आपली शर्यत सोडून नौकेसह त्यांच्या मदतीला धावला. या गोंधळामुळे स्पर्धा संपली तेव्हा तो २२ व्या स्थानावर होता पण त्याला विशेष पदक देऊन गौरवण्यात आले. 

१९९८ चे हिवाळी ऑलिंपिक. नॉर्वेचा बिजॉर्न डेहेल पुरुषांची क्रॉस कंट्री स्कीइंग स्पर्धा जिंकला. केनियाने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. केनियाच्या फिलिप बॉईटसाठी जिंकणे तर दूरच, १० किमी अंतर पार करणे हेच मुळात मोठे आव्हान होते. बिजॉर्नने आपला पदकग्रहण सोहळा फिलिप्स अंतिम रेषा ओलांडेतो थांबवला. त्याचे स्वागत केले आणि मगच पदक स्वीकारले.

२०१६ चे रिओ ऑलिंपिक. न्युझीलंडची निकि हॅम्ब्लेन आणि अमेरिकेची अ‍ॅबे अगोस्तीनो महिलांच्या ५००० किमी रॅलीच्या पात्रता फेरीतच एकमेकींना अडकून पडल्या. अ‍ॅबेला चांगलीच दुखापत झाली होती पण दोघींनी एकमेकींना आधार, प्रोत्साहन देत कसेबसे पण पूर्ण अंतर पार केले. शेवटी पोचूनही त्यांची निवड करण्यात आली. 

२०२१ चे टोकोयो ऑलिंपिक. उंच उडीच्या अंतिम स्पर्धेत इटलीचा जिअनमार्को तंबेरी आणि कतारचा मुताझ इसा बरशीम यांच्यात सुवर्णपदकासाठी स्पर्धा सुरु होती. दोघांनीही सारखीच उंची गाठली त्यामुळे टायब्रेक झाला. पुढच्या ३ संधींबाबत असेच घडले. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारचे सुवर्णपदक निश्चित होते तरीही त्याने सुवर्णपदक जिअनमार्कोशसह वाटून घेतले.  

’जो जीता वोही सिकंदर’ हेच जगाचे खेळाकडे पाहण्याचे साधारण सूत्र आहे. या पार्श्वभूमीवर ही सगळी उदाहरणे वेगळेच काही सांगत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवून कर्णधार अजिंक्य राहणे त्यांच्या घरी पोचला. अतिउत्साही क्रिकेट चाहते हे यश साजरे करण्यासाठी ’कांगारु’चे प्रतीक असलेला केक घेऊन गेले. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे तेव्हा हा केक कापून मी त्यांचा अनादर करणार नाही असे अजिंक्यने नम्रपणे स्पष्ट केले. खेळाच्या गाभ्याशी इतक्या निखळ, सच्च्या प्रेरणा असू शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशी आज परिस्थिती आहे. 

खेळात अधिकाधिक अर्थकारण गुंतल्यापासून बहुतेक खेळाडूंना जिंकायचे आहे ते आर्थिक लाभासाठी. विशेषत: लीग स्वरुपाच्या खेळात तर खेळाडूंवर बोली लावली जाते त्यामुळे कसे जिंकावे यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. उत्तेजक द्रव्यांची मदत घेतली जाते. मॅच फिक्सींगपासून अनेक नियमबाह्य प्रकार सर्रास केले जातात. ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामत याने मध्यंतरी एका ऑनलाइन चॅरिटी सामन्यादरम्यान बुद्धीबळातील माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता. नंतर कामतला आपण संगणकाच्या मदतीने फसवणूक केल्याची कबुली द्यावी लागली. खेळात कायम जिंकावे असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातून मिळणारी प्रचंड प्रसिद्धी हे यावरून लक्षात येईल. 

जिंकायलाच हवे असे वाटण्यामागचे तिसरे आणि सर्वाधिक भावनाप्रधान कारण आहे राष्ट्रप्रेम. क्रिकेट जणू धर्म असलेल्या आपल्या देशात क्रिकेटखेळाडूंना जवळपास देव मानून मनात त्यांची प्रतिष्ठापना करणारे चाहते सामना हरल्यावर त्याच खेळाडूंचे पुतळे करून जाळायला मागेपुढे पाहात नाही. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तर जणू मैदानावरचे युद्ध मानले जाते. तिथली हार-जीत ही संघाची नव्हे तर देशाची हार-जीत मानली जाते. देशाची अब्रू खेळाच्या मैदानावर जणू पणाला लागते. ऑलिंपिकमधल्या एकेका पदकाच्या प्राप्तीकडे तर अवघा देश डोळे लावून बसलेला असतो. खेळाडू तिथे देशाचे प्रतिनिधी म्हणूनच जात असतात. मीराबाई चानूने कास्यपदक मिळवले तरी ते फक्त तिचे पदक नसते. देशाच्या आकांक्षांच्या पूर्ततेचे ते प्रतीक असते. खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ईर्षा असणे, विजिगीषु वृत्ती असणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु पदक मिळवायच्या, जिंकायच्या दडपणामुळे जिंकण्याच्या मार्गापेक्षा आणि खेळापेक्षा मह्त्व मिळते ते फक्त ’जिंकण्याला’. कोणताही देश याला अपवाद नाही. उदा: खोर्‍याने पदके मिळवणार्‍या चीनमध्ये यशस्वी खेळाडू ’निर्माण’ करणार्‍या राष्ट्रीय क्रीडासंस्थांमध्ये परतीचा मार्ग बंद झालेली अनेक बालपणं भरडली जातात कारण ’जिंकण्याला’ पर्याय नसतो.

या सगळ्या चौकटीला छेद देणारे काही असे काही प्रसंग घडतात जिथे कुणीच हरत नाही फक्त ’खेळ’ जिंकतो. केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई 2012 मधील स्पेन क्रॉस कन्ट्री स्पर्धेच्या शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेच्या जवळ आला होता. त्याने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. अचानक अंतिम रेषा समजून तो एक मीटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या हे लक्षात येताच त्याने आधी ओरडून नंतर सरळ ढकलुन त्याला अंतिम रेषेपर्यंत पोचविले. पहिला येण्याची संधी ’घालवली’ असे इव्हानला वाटले नाही कारण अबेल पहिला आलेलाच होता. त्याच्या गोंधळाचा फायदा घेऊन सुवर्णपदक पटकावणे इव्हानला शक्य होते पण त्याने तसे न करता आपली हार स्वीकारली. इथे खरे तर तो माणूस म्हणून जिंकला. अशा खेळाडूंमुळे ते ज्या देशाचे प्रतिनीधीत्व करतात तो देश पदकतालिकेवर कोणत्याही क्रमांकावर असला तरी जेताच असतो. पूर्ण प्रयत्नांती खेळाडू जिंकला की हरला याइतकेच त्याच्यातला ’माणूस’ जिंकला हे आपण महत्वाचे मानायला हवे. या ऑलिंपिकमधील बॅडमिंटनच्या सामन्यात सिंधूच्या हातून रजतपदक गेल्यानंतर लगेच ’तिने आता निवृत्त व्हावे’ अशी टीका काही जणांनी सुरु केली. याच सिंधूने मागील ऑलिंपिकमध्ये कॅरोलिना मरिनकडून पराभव झाल्यानंतर तिने आनंदाच्या भरात फेकलेली रॅकेट विचलीत न होता शांतपणे उचलून तिच्या हतात दिली होती. सगळे क्रीडाजगत तिच्या या समंजस कृतीकडे कौतुकाने पाहत होते. अथक मेहनतीनंतरही केवळ तिने मिळवलेल्या पदकाचा रंग बदलला म्हणून तिच्या या उमदेपणाचा आपल्याला विसर पडू नये. खेळाडूंच्या मनाची मशागत इतक्या नेमकेपणाने  झाली असेल तर प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज जिंकतो आणि पर्यायाने राष्ट्र जिंकते. राष्ट्र ही सामूहिक संकल्पना आहे पण राष्ट्रप्रेम ज्यातून सिद्ध होते ती कृती मात्र वैयक्तिक असते. जिंकण्याची ही आगळीवेगळी व्याख्या आणि खिलाडूवृत्ती अशा मोजक्या खेळाडूंपर्यंतच मर्यादित न राहता नागरिकांपर्यंत झिरपायला हवी. 

क्रीडामानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम खेळाडूंची मानसिकता ओळखून त्यानुसार कोणते बदल उपकारक ठरतील याचा सतत अभ्यास करत असत. शारिरिक प्रशिक्षणाइतकेच महत्व ते मानसिक प्रशिक्षणाला देत असत. इतरांचं अगदी विरुद्ध पक्षाचं सुद्धा जे चांगलं असेल ते स्वीकारणं आणि त्यांचा अनुभव, मत, ज्ञान यांचा आदर करणं आपण शिकलो तरच वैयक्तिक आणि गटाचा विकास शक्य आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते म्हणत ,"चुरशीची स्‍पर्धा असतांना मैत्र आणि नाती ही प्रेमाने आणि संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्‍सर, शत्रूत्‍व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्‍हणजे मग आयुष्‍य ख-या अर्थाने संपन्‍न होत असते. हे सारेच स्‍पर्धात्‍मक खेळांतून शिकता येते. ते पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांनीही शिकून घेऊन आपल्‍या वागण्‍याने पुढच्‍या पिढीवर संस्‍कार करायचे असतात." 

हे शिकता आले, आचरणात आले, तर 'सहनाववतु' म्हणजेच आमचा कुटुंब म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आणि अंतिमतः विश्व म्हणून एकत्रित विकास होवो, या प्रार्थनेला अर्थ लाभेल. आपण 'हे विश्वची माझे घर' असे मनाच्या तळाशी स्वीकारलेले असते; परंतु ही भावना तिथेच राहते. ती व्यवहारात येत नाही. तसे असते, तर प्रत्येक देशाला विकासकामांपेक्षा जास्त खर्च संरक्षण व्यवस्थेवर करावा लागला नसता. परंतु खेळ इथे दुवा म्हणून काम करु शकेल. ज्यातून संवादाची संधी निर्माण होऊ शकेल. वैश्विक शांतता निर्माण व्हावी आणि देशांमध्ये परस्पर सामंजस्य वाढावे, हेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट्य असते. खेळात जिंकण्याची मौज काही वेगळीच; पण माणूसपणाची सरशी तितकीच महत्त्वाची आहे. ते भान रुजवणे, हेच खेळाचे साध्य आहे. यासाठी अगदी सोपा नियम मार्क ट्वेन त्यांच्या मार्मिक शैलीत सांगून गेले आहेत. "It's good sportsmanship to not pick up lost golf balls while they are still rolling". कतारच्या बरशीमने सुवर्ण पदकात इटलीच्या तंबेरीला वाटा देत घेतलेली उंच उडी, स्टेडियम पार करून कित्येकांच्या मनापर्यंत पोचली. अशी अद्भूत उर्जेची उदाहरणे पाहता 'नहीं जिता वो भी सिकंदर' म्हणायला हवे कारण तो जगातील मानसिक परिपक्वतेचा, विवेकाचा विजय ठरतो. 

published in महाराष्ट्र टाईम्स- संवाद पुरवणी -8 Aug 2021

Saturday, April 10, 2021

The Great Indian Kitchen च्या निमित्ताने

"माझी बायको जेव्हा किचनमध्ये काम करते ना, ते तिच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं." आमचे एक स्नेही परवा कौतुकाने सांगत होते. ते आणि त्यांची बायको प्रथितयश डॉक्टर. कामाच्या व्यग्रतेमुळे रोजचा स्वैपाक, सगळं घरकाम करायला मदतनीस आहेत. कधीतरी बदल, छंद, मुलांची एखादी फर्माईश पुरी करायला म्हणून ती तिच्या अद्द्यावत किचनमध्ये जाते तेव्हा तिचं आनंदात असणं अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी मेनू ठरवणं, निगुतीने पूर्वतयारी करणं, मन लावून पदार्थ रांधणं, आपल्या माणसांना आग्रह करून प्रेमाने खाऊ घालणं यातला आनंद अगदी अपूर्व असतो.
एखाद्या पुरुषासाठीही असा बदल म्हणजे मेडिटेशन असू शकतं. परंतु या कामाची जोडी बाईशी लावायचं इतकं कंडिशनिंग झालंय की आपल्या नात्यातल्या स्त्रियांबद्दलच्या आपल्या आठवणी सुद्धा बहुतेक वेळा त्यांची खासियत असलेल्या विशिष्ट पदार्थांशी निगडीत असतात. जुन्या हिंदी सिनेमातल्या आयांना तर आपण कायम, अपने हाथोंसे बनाया हुआ गाजर का हलवा किंवा मूली के पराठे त्यांच्या मुलांना खाऊ घालताना पाहत आलो आहोत.
प्रत्यक्षात जेव्हा हे काम तुझंच म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो आणि त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो.

घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्या पुरुषांना त्यांचे काम करताना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. अपवाद वगळता बहुतेक पुरुष या संधीचा मनापासून लाभ घेतात.
A woman must have money and a room of her own if she is to write fiction या व्हर्जिनिया वुल्फच्या वाक्याकडे, हक्काचा अवकाश मिळाल्याशिवाय स्त्रियांना आवडीच्या क्षेत्रात आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर करता येत नाही, अशाही अर्थाने पाहता येईल. अशी मुभा स्त्रियांना क्वचित मिळते. मिळाली तरी तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, आम्ही तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. घरकामाच्या बाबतीत ’आता कुठे राहिलंय असं काही, उलट शेफ म्हणून पुरुषच जास्त दिसतात, आमचा मुलगा करतो सुनेला ’मदत’, शिवाय आता हवं ते विकत मिळतं, यंत्र असतातच हाताशी’ असं वाटणार्या मंडळींनी आपल्या पांढरपेशा खिडकीतून गगनचुंबी इमारतींपासून खेडोपाडी पसरलेल्या आपल्या महाकाय देशात कृपया नीट डोकावून पाहावं.
शेतावर मजुरी करुन खोपट्यात थकून परतलेले अशिक्षीत जोडपे असो किंवा आपापल्या ऑफीसमधून दमून घरी पोचलेले सुक्षिक्षित जोडपे, रात्रीच्या जेवणाचे आणि उद्याच्या डब्याचे काय करायचे याची चिंता आणि तजवीज करण्याची जबाबदारी आजही प्रामुख्याने बाईवर असते. बाईला बरेचदा वैताग येतो तो प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने तिला गृहित धरण्याचा. तिला तिचा अवकाश न मिळण्याचा. हे गृहित धरणं नंतर फक्त स्वैपाक किंवा घरकामापुरतं मर्यादित राहत नाही. याच वेदनेकडे Jeo Baby या दिग्दर्शकाला प्रेक्षकांचं लक्ष वेधायचं आहे.

ॅमेझॉन प्राईमवरील त्यांचा The great Indian kitchen हा मल्याळम सिनेमा व्यवस्थेपुढे मान तुकवू न शकणार्या एका संवेदनशील भारतीय स्त्रीची व्यथा उघड करुन दाखवतो. पार्श्वभूमी केरळची असल्याने यात सातत्याने दिसणारा आणि मग बोचणारा स्वैपाक, भवताल, केरळी पद्धतीचा असला तरी तपशीलात माफक बदल करुन ही कथा भारतातल्या कोणत्याही प्रांताला लागू होऊ शकते. त्यामुळे यातल्या नायिकेलाच काय कोणत्याही पात्राला नाव नाही. केरळी कुटुंबातली नवविवाहित स्त्री, तिचा नवरा, सासूसासरे यांच्याबरोबरच स्वयंपाक किंवा एकूणच घरकाम हे ही या सिनेमातलं एक महत्वाचं पात्र. ते पात्र चिरणे, कापणे, खवणे, सोलणे, तळणे, झाडणे, आवरणे, विसळणे, धुणे, पुसणे अशा न संपणार्या कृतींच्या त-हत-हेच्या आवाजातून सिनेमाभर सतत बोलत राहतं. या पात्राला सिनेमात इतकं फूटेज आहे की एका टप्प्यावर या अंतहीन कामामुळे त्या सुनेच्या दिनचर्येचा भाग असलेला वैताग आणि कंटाळा आपणही अनुभवायला लागतो. तरीही आपण तिची कथा खिळून पाहत राहतो कारण त्या क्षणापासून दिग्दर्शकाचा सिनेमा आपला सिनेमा झालेला असतो. त्याच्या कॅमेर्याची आणि आपली वेव्हलेंग्थ जुळलेली असते.

एक साधी सुशिक्षित नृत्यशिक्षिका तरुणी एका लहान गावातल्या शिक्षकाशी विधीवत लग्न करुन त्याच्या मोठ्या, सुखवस्तू पण जुन्या पद्धतीची रचना असलेल्या घरात येते. स्वयंपाक, घरकाम इतकंच नव्हे तर नवर्याला प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देणं, हे बाईचं प्राक्तन म्हणून स्वीकारलेल्या द्विपदवीधर सासूची तिला नव्या संसारात सुरुवातीला मदत होते. मुलीची प्रसूती जवळ आल्याने नाईलाजाने सासूला घराचा रामरगाडा नायिकेवर सोपवून जावं लागतं. तिची मुलगी (नायिकेची नणंद) निर्णय घेण्याचा हक्क असलेल्या मोजक्या स्त्रियांपैकी एक असल्याचे केवळ एका संवादातून, तिच्या देहबोलीतून सहज लक्षात येतं.
नायिकेच्या कामाला खंड नसतो. तिला बदली मदतनीस उपलब्ध असते ती केवळ ’त्या’ दिवसात. ती ही अर्थातच स्त्री. अंगण झाडले जाते, पडवी नियमित पुसली जाते, दिवे सवयीने घासले, पेटवले जातात, तव्यावर एकामागोमाग दोसे पसरवले जातात, सांबाराला फोडण्या दिल्या जातात, भात वैरला जातो, भाज्या चिरल्या जातात, बादली कचर्याने भरत जाते आणि कुपात रिकामी होत राहते. आपलं ताट उचलणं तर राहोच पण ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. चहा, नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण, पैपाहुणे... स्वैपाक तिन्हीत्रिकाळ शिजत राहतो आणि मूक होत गेलेल्या नायिकेला ’च’ पीडत राहतो. असे ’च’ घरोघरी असतात. कपडे हाताने धुणंच योग्य नाहीतर मशीनमुळे ते लवकर विरतात, आपल्याकडे सांबार आणि चटणी दोन्हीही लागतंच, ह्यांना चटणी पाट्यावरच वाटलेली आवडते, भात कुकरपेक्षा चुलीवरचाच चांगला लागतो. आणि हे सगळं असंच्च. रोज. अव्याहत.

हल्ली चुलीवरच्या स्मोकी चवीच्या स्वैपाकाचं अप्रूप आहे. चवीने जेवणार्याला वैविध्य हवंच असतं पण ही हौस पुरवायला चुलीपासून सुटका झालेल्या बायकांना पुन्हा चुलीकडेच जावं लागतं. जात्यावरच्या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं. आजही आपल्याकडे एखाद्या बाईच्या वाट्याला येणारं घरच्यांचं कौतुक हे तिच्या इतर क्षेत्रातल्या कर्तृत्वापेक्षा बहुतांशी तिच्या स्वयंपाक व घरकामाच्या गुणवत्तेवर जास्त अवलंबून असतं.. स्त्रीच्या अन्नपूर्णा या रुपाचं असं सोयीनुसार उदात्तीकरण केलं जातं. याविषयी एका लेखकाचा भावनाबंबाळ लेख समाजमाध्यमावर मध्यंतरी बराच फिरत होता.
ह्या लेखकाला त्यांच्या एका चाहत्या जोडप्याने घरी जेवायला बोलावले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य झाले. जेवणाचे बहुतेक पदार्थ दर्जेदार उपाहारगृहातून मागवण्यात आले होते. त्यांचा आस्वाद घेत जोडप्याने त्यांच्याशी अनेक विषयांवर मनापासून गप्पा मारल्या. लेखकरावांना असे तयार पदार्थ मागवणे अजिबात रुचले नाही. ही कसली संस्कृती, त्याऐवजी घरी केलेली साधी मुगाची खिचडी जरी खाऊ घातली असती तरी मला बरे वाटले असते अशी त्यांनी टिप्पणी केली. आता अशा मानसिकतेचे काय करावे! एक तर पाहुण्यांना बोलावले की कुणी फक्त मुगाची खिचडी करणार नाही. केलीच तर ती कुणी करायची अर्थात घरच्या बाईने. या बाईंना अन्नपूर्णेची नेहमीची भूमिका करण्याऐवजी आवर्जून आमंत्रित केलेल्या लेखकाबरोबर चर्चा करण्यात जास्त स्वारस्य होते हे स्वीकारणं लेखकाला एवढे अवघड का वाटावं! हळव्या, विचारी म्हणवणार्या सुबुद्ध लोकांच्या बायकांकडून इतक्या पठडीतल्या अपेक्षा असतील तर सर्वसामान्यांबद्दल काय बोलावं!

तर या सगळ्या ’च’ मुळे येणारा ताण, ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जाणं नायिकेच्या आत कुठेतरी धुमसू लागतं. नवर्याच्या दृष्टीने तुंबलेलं, गळणारं सिंक म्हणजे स्वैपाकघरातला अगदी क्षुल्लक प्रश्न. पण त्या सांडपाण्याच्या वासातून तिच्या मनाची सुटका होणं अवघड होतं. नवर्याबरोबर एकांतातही तो वास.. घरकाम नावाचं अदृश्य पात्र, तिच्या मेंदूत दबा धरून बसलेलं असतं. नुसत्या यांत्रिक क्रियेचा तिटकारा आल्याने त्याने आपल्या थकल्या जीवाला आधी किमान खुलवावं ही साधी अपेक्षा ती व्यक्त करते. ती पूर्ण होणं तर दूरच त्याला तिच्यात शेजे आणि पेजेच्या गरजेपलिकडे काही रस नाही हे तो स्पष्टपणे सांगतो. नायिका दुखावते. तिची घुसमट इथे थांबत नाही.
तिच्या नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला ठाम नकार, त्यातच मासिक पाळीचं स्तोम, शबरीमाला पार्श्वभूमीवर तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट डिलिट करण्याचा नवर्याचा आदेश, व्यवस्थेला शरण गेलेल्या तिच्या आईचीही तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एकामागोमाग घडणार्या अशा घटनांमुळे तिच्या मनात धुमसणार्या ठिणग्या पेट घेऊ लागतात आणि एका क्षणी याचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. तिथे आपण श्वास रोखून धरतो. सिनेमा फार ग्रेट नाही पण तो थेट भिडतो. Nimisha Sajayan आणि Suraj Venjaramoodu या मुख्य पात्रांचा जिवंत अभिनय, प्रत्ययकारी चित्रण, बांधीव पटकथा यामुळे तो आणखी प्रभावी ठरतो.

सिनेमा बघताना वाचल्याचं आठवलं, गेल्या पिढीचे लेखक जयवंत दळवी यांनी आपल्या आईचं अवघं आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात राब राब राबण्यात करपून गेल्याची कबुली एका लेखात दिली होती. हे गेल्या पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण असले आणि आता परिस्थिती काही अंशी बदलली असली तरी या कामावरची ’दुय्यम’ आणि ’बायकी’ ही लेबल्स पुसली गेलेली नाहीत. "निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला तर चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला सर्वात जास्त आवडतं" हे हिलरी क्लिंटन यांचं वाक्य तेव्हाच्या काही अमेरिकन माध्यमांनी ’तर’च्या पुढच्या वाक्याची हेडलाईन करुन बाई शेवटी स्वैपाकघरातच रमू शकते, अशा पद्धतीने सादर केलं होतं. भारतीय समाजाला तर हे मनातून मान्यच आहे. ’किचन पॉलीटिक्स’ या एकमेव विषयाभोवती घुटमळणार्या सुमार मालिकांना मिळणारी अफाट लोकप्रियता त्याचे निदर्शक आहे.
काही उदार मंडळींची प्रगती ’बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी’ या धर्तीवर ’अडायला नको म्हणून मुलाला जुजबी स्वैपाक आला पाहिजे’ इथपर्यंत झाली आहे. पण मुलीच्या जातीला मात्र तो व्यवस्थित आला’च’ पाहिजे याबाबत त्यांचे दुमत नाही.

मुळात स्वैपाक किंवा घरकाम हे केवळ जीवनावश्यक कर्तव्य नाही तर आयुष्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून सौंदर्य आणि अर्थ प्राप्त होतो त्यापैकी ती एक महत्वाची कृती आहे. उपलब्ध वेळ, आवड, कौशल्य आणि गरज याचा समन्वय साधून एकमेकांना हातभार लावत ती करणं ही घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमध्ये अचानक याची जाणीव झाल्याने जबाबदारी वगैरे म्हणणं जरा जास्त होईल, पण अनेक पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना स्वैपाकात, घरकामात ’मदत’ केली. काहींनी त्यावरून विनोद व्हायरल केले. बायकांना विनोदाचं वावडं नसतं पण पुरुषांनी हे काम करण्यात विनोद आहे असं अजूनही समाजाला वाटणं हाच मुळात एक विनोद आहे.
सामाजिक संस्थांच्या पाहणीनुसार अनलॉकबरोबर यातील बहुतेकांचा उत्साह मावळला आणि ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये कामाची व श्रमाची असमान विभागणी पूर्ववत झाली. या सिनेमाच्या नावात ’किचन’ असलं तरी सिनेमा सांगू पाहतोय ते व्यवस्थेबद्दल.
अशा मानसिकतेबद्दल. घरोघरच्या मातीच्या चुलींबद्दल. सिनेमापुरतं बोलायचं तर नायिकेने अमुक स्टँड घ्यायला हवा होता, तमुक करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया येत राहतील. आपण काय करायला हवं याचा विचार करायला मात्र हा सिनेमा आपल्याला भाग पाडतो.

published in Media Watch portal