Showing posts with label बदल. Show all posts
Showing posts with label बदल. Show all posts

Wednesday, February 1, 2023

साहित्य संमेलन आणि तरूणाई

वर्धा येथे होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नसंच तयार करून मी काही स्थानिक, काही परिचयातील ,काही समाजमाध्यमातून ओळख झालेल्या तरुण तरूणींशी संवाद साधला. 

कला-वाणिज्य पदवी, एलएलबी, अभियांत्रिकी इ. शाखांचे हे विद्यार्थी आहेत. काही स्पर्धा परिक्षा देणारे, काही नोकरी करणारे आहेत. 

काही जणांना कसले तरी संमेलन वर्ध्याला होते आहे हे माहित होते तर काहींना याचा पत्ता नव्हता. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आहेत  हे माहित होते तसेच त्यांच्याविषयी माहिती होती. एकदोघांना वर्धा संमेलनात पुस्तकांच्या स्टॉल्सला भेट द्यायची होती. एका यूट्यूबरने’तिथे व्हिडिओ करू दिला तर मी जाईन’, असे उत्तर दिले.

एकीने सांगितले, " मला एकदा कवीकट्ट्यावर संधी मिळाली होती. त्यात कवींची इतकी गर्दी होती की माझा नंबर कधी येईल या गडबडीत मी  इतर कार्यक्रम पाहू शकले नाही. "

एकाने त्याच्या गावातील संमेलनात एक कार्यशाळा केल्याची आठवण सांगितली. परिसंवादांबाबत बहुतेकांना फारशी माहिती किंवा रस नव्हता. 


यंदाचे संमेलन अगोदरच झाले असून त्याचे अध्यक्ष  नागराज मंजुळे होते व त्यात त्यांनी भाषेच्या शुद्धतेविषयी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे एक जण म्हणाला. 

मंजुळ्यांचे ते वक्तव्य संमेलनातले नसून ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’ मधले होते असे मी सांगितले. 

एकीने विचारले ,"गेल्या महिन्यात मुंबईला झालं ते काय होतं मग?" ’ते राज्य सरकारने आयोजित केलेले ’विश्व मराठी संमेलन’ होते असे मी सांगितले. 

"मग वर्ध्याचे आयोजक कोण आहेत ?" यावर मी ’अखिल भारतीय साहित्य महामंडळ’ असे सांगितले. 

यावर काही जणांनी ’अशी एकूण किती संमेलने असतात’ असे विचारले.  

’विद्रोही संमेलने असतात. जाती धर्मनिहाय असतात. बाल, कुमार, युवा, शिक्षक, कामगार आणि स्त्रियांचीही असतात. बोलीभाषांची असतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या स्तरावर अशी संमेलने आयोजित करत असतात. अ.भा.साहित्य महामंडळ ही महाराष्ट्रातील चार प्रादेशिक संस्थांची शिखरसंस्था आहे म्हणून या संस्थेच्या संमेलनाची अधिक चर्चा असते’, असे मी सांगितले.

प्रश्नसंच त्यांनी तयार केला असून उत्तरे मी देते आहे असे या संवादाचे स्वरूप उलट झाले होते.

हे तरूण समस्त मराठी युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करतात असा माझा दावा नाही पण त्यांच्या प्रतिक्रिया चिंतनीय आहेत. प्रस्थापित साहित्य संमेलनांविषयी युवा पिढीला अनास्था वाटते,  हे सत्य त्यांच्या संमेलनातील जेमतेम उपस्थितीवरून सहज लक्षात येईल. संमेलने बहु झाली या स्थितीमुळे ते गोंधळले आहेत. या वेगळ्या चुली नसून हे साहित्याचेच उपप्रवाह आहेत, हे त्यांना समजावून सांगण्याचे आव्हान आणि जबाबदारी त्या त्या आयोजकांची आहे.  

तरूणांचा वरचा वर्ग इंग्लीश बेस्ट सेलर्स, गॉसिप मासिकं वाचतो. ती ही किंडलवर. संमेलन वगैरे त्यांच्या गावीही नाही. मध्यमवर्गी तरूण समाज माध्यमावर काय ते वाचतात, बघतात. वेब मालिका पाहतात. करियरचं दडपण त्यांना वाचनाकडे गांभीर्याने पाहू देत नाही. निमशहरी किंवा खेडेगावात पदवी घेत असलेल्यांना दर्जेदार शिक्षणाअभावी किंवा आर्थिक तणावामुळे सकस साहित्याची गोडी लागत नाही. लागली तरी पदरमोड करून संमेलनास जाणे त्यांना परवडत नाही.  

मग साहित्य संमेलनाला जाणारे लोक नेमके कोण असतात? 

पन्नाशीला पोचल्यावर स्थैर्य आलेले किंवा निवृत्त मध्यमवर्गीय पुस्तकप्रेमी, भाषाविषयाचे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, समाज माध्यमावर लाईक मिळू लागल्याने आपल्या कविता, लेखनावर संमेलनाच्या मान्यतेची मोहोर लागावी अशी आकांक्षा असलेली मंडळी, उपस्थिती अनिवार्य असलेले आयोजक संस्थेशी संबंधित लोक, स्वागताध्यक्षांचे निकटवर्तीय आणि प्रतिकूल स्थितीतही साहित्यविश्वाच्या संपर्कात असलेले मूठभर तरूण. 

तरूणांशी बोलल्यावर जाणवले की साहित्य संमेलने युवकांना आपली वाटावी व सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रस्थापितांच्या विचार पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे.

पहिला बदल म्हणजे कागदावर छापून येते तेच साहित्य नसते हे स्वीकारायला हवे. साहित्य म्हणजे भोवताल टिपणे. त्याचे स्वरूप छापील पुस्तकांव्यतिरीक्त  स्कीट्स, विविध सादरीकरणांची संहिता, समाज माध्यमावरील लेखन, ब्लॉग्ज, व्ही-लॉग्ज, मुलाखती किंवा मीम असेही असू शकते. 

चांगल्या साहित्यनिर्मितीसाठी संमेलनांतर्गत आयोजित पटकथा, गीत-गजल-ब्लॉग लेखन, डिजिटल पब्लीकेशन यासारख्या कार्यशाळांना अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रचारावर भर द्यावा.  संमेलनातील निरर्थक वादांपेक्षा वृत्तपतत्रातून या विषयीच्या बातम्या प्राधान्याने याव्यात. 

अगम्य विषयावरील परिसंवादात, हितसंबंध जपण्यासाठी अनेक वक्त्यांची वर्णी लावून श्रोत्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातो. अपवाद वगळता निवडीला गुणवत्तेचा निकष आहे की नाही अशी शंका यावी असे सुमार वक्ते, रटाळ कवी रसिकांच्या वेळेचा अपव्यय करताना दिसतात. यावर अंकुश यावा.

संमेलनपूर्व राजकीय कलगीतुरे हे देखील तरूणांनी संमेलनांकडे पाठ फिरवण्याचे मह्त्वाचे कारण आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता मागे घेतला असला तरी त्यांनी राजकीय हस्तक्षेपाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. संमेलनासाठी निर्धारित सरकारी निधी वाढावा म्हणजे संमेलनाला राजकीय नेत्यांच्या अधीन राहावे लागणार नाही. राजकीय सहकार्य अवश्य असावे पण राजकीय विश्लेषक नसलेल्या साहित्यिकांनी व्यासपीठाचा वापर आपल्या राजकीय भूमिकेच्या प्रदर्शनासाठी करू नये. राजकीय हेव्यादाव्यांचा वीट आलेल्या तरूणाईला इथेही फक्त तेच ऐकवायचे असेल तर त्यांनी संमेलनाला का यावे ! 

या तरूणांशी बोलताना लक्षात आले की त्यांच्या विरोधातील आधीच निष्कर्ष ठरवलेले तथ्यहीन विषय संमेलनातील परिसंवादासाठी घेतले तर त्यांना ते आवडणार नाहीत. उदा:  समाजमाध्यमांचे नकारात्मक परिणाम वगैरे. त्यांचे म्हणणे, आम्हाला मोबाईलच्या अतिवापरावरून उपदेश करणारी मधली पिढी स्वत:च व्हॉट्सअ‍ॅपच्या आहारी गेली आहे तेव्हा त्यांनी दुटप्पी वागू नये. आमची पिढी ऐकणारी आणि (व्हिडीओ, रील्स) बघणारी पिढी आहे. वाचन म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचणे एवढेच नव्हे. जग पॉडकास्ट किंवा ऑडियोबुक्स आणि चॅट-जीपीटीपर्यंत पोचले असताना बहुसंख्य संमेलनांचे आयोजक एक तर ’स्वामी- मृत्युंजय, पुलं-वपु” मध्ये किंवा दुसरीकडे नकारात्मकतेत व अभिजन-बहुजन वादात अडकून पडलेले दिसतात. 

याचे प्रतिबिंब समाजमाध्यमावरही पडत असले तरी लोकल ते ग्लोबल असा त्याचा प्रचंड आवाका आहे. माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात समाजमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे. तिथे अनेक लेखनविषयक स्पर्धा होत असतात. तरूणांचे साहित्य कट्टे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप वर आहेत. कला प्रदर्शनाचे कट्टे इन्स्टाग्राम व यूट्यूबवर आहेत. अधिक गंभीर चर्चा रेडीट व कोरावर घडत आहेत. इथे सुमार लिहिणारे अनेक असतील पण बोलीभाषेत उत्तम लिहिणारे निमशहरी लेखक इथे आहेत तसेच प्रमाण भाषेत सकस लिहीणारे शहरी तरूणही. त्यांची ताकद, त्यांची प्रतिमा त्यांना आलेल्या संमेलनाच्या आमंत्रणावर ठरत नसून त्यांची लेखणी ठरवते. इथे थेट प्रतिसाद मिळतो तशी टीकाही झेलावी लागते. संमेलनांनी आपल्या कक्षा रूंदावून या सार्‍याला सामावून घेतले तर तरूणांचाही संमेलनांकडे ओढा वाढेल. 

लोकशाही व्यवस्था बदलण्याचे आणि विचाराची पोच अमर्यादित स्तरावर नेण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याने यावरील चांगल्या लेखनाला साहित्याचा दर्जा दिला जावा अन्यथा नुकत्याच लोकप्रिय होऊ लागलेल्या ताज्या टवटवीत सोशल मिडिया संमेलनांनाच काय ते भवितव्य उरेल व जुन्या पठडीतली संमेलने कालबाह्य ठरतील. 

वर्धा संमेलनातील कार्यक्रम बघता यातील बहुतेक अपेक्षांना न्याय देण्याचा आयोजकांनी मनापासून प्रयत्न केलेला दिसतो आहे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर संमेलनात पहिल्यांदा चर्चा घडते आहे. मुद्रित माध्यमांच्या संपादकांनी समाजमाध्यमाबद्दल बोलणे, लेखकांनी थेट व्यक्त होणे, मुक्तसंवाद, परिसंवादात वंचित समाजाच्या साहित्यापासून ललितेतर साहित्यापर्यंत व प्रबोधन परंपरेपासून अनुवाद व स्त्री-पुरुष तुलनेपर्यंतचे  वैविध्य हे संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. चांगल्या साहित्यविषयक चळवळी हे समाजाच्या जिवंतपणाचेच नव्हे तर सक्रियतेचे लक्षण आहे. अशा उपक्रमांमधून समाजातले साचलेपण दूर होते. वैचारिक जळमटे दूर होऊन नव्या विचारांची वाट मोकळी होते. दक्षिण भारतीय , हिंदी व बंगाली साहित्यवर्तुळात हे घडताना दिसते आहे.

मराठी साहित्यक्षेत्रात देखील कोणत्याही संमेलनाचे मंडप काढल्यानंतर पुरस्कारांचा मोह, वैयक्तिक महत्वाकांक्षा, उत्सवप्रियता, लागेबांधे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन जागल्याचं काम करणारे साहित्यिक आणि रसिकांचे निखळ साहित्यप्रेम तळाशी उरायला हवे. जागतिक बदलांचे वारे इथवर पोचायला हवे तरच तरुणांना साहित्य संमेलने हवीशी वाटतील आणि आणि ती त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील.

https://www.evivek.com/Encyc/2023/2/1/Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan-2023-and-youth.html?fbclid=IwAR15eOevuHKKYhrIyOtn04ZlhwM6qyrhDorFmn9-VUHyg8MxvM4pIP8kNag

साप्ताहिक विवेक - साहित्य संमेलन विशेष अंकातील ’युवाकट्टा’ या सदरातील लेख 

Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Wednesday, February 9, 2022

WIne is NOTfine


 किराणा दुकानात जाणे हा विनोदाचा विषय होईल असं कधी वाटलं होतं का! पण झालाय. हजार स्क्वे. फुटाहून मोठ्या किराणा दुकानात आता वाईन मिळणार म्हटल्यावर समाजात तीन गट पडले आहेत. पहिला गट विरोधकांचा, दुसरा विवि म्हणजे विरोधकांच्या विरोधकांचा (कारण दारुचं समर्थन कसं करणार!) आणि तिसरा बिनबुडाचा म्हणजे निर्णय कोणत्या सरकारने घेतला यावरून पहिल्या किंवा दुसर्या गटाची री ओढणार्यांचा. त्यामुळे तिसर्या गटाला बाजूला ठेवून आपण या प्रकरणाकडे पाहूया. विवि म्हणतात- "वाईन ही दारु नव्हे, ती पिऊन कुणी झिंगून पडत नाही. ते महागडं उच्चभ्रूंचं पेय आहे, सर्वसामान्यांना त्याने ढिम्म फरक पडत नाही. दारुशिवाय इतर प्रश्न जास्त महत्वाचे आहेत, ते आधी सोडवा" वगैरे वगैरे..

बरं! पण महत्वाच्या आणि मुलभूत गरजांपेक्षा वर्षाला साधारण ५०० कोटी रू. दारूवर खर्च करणारा महाराष्ट्र पाहिला, खेड्यापासून महानगरांपर्यंत भरभरुन वाहणारे गुत्ते आणि बार पाहिले, ’संध्याकाळी बसूया’ हेच जीवितकार्य समजणारे कित्येक निरुद्द्योगी तरुण पाहिले आणि व्यसनमुक्ती आणि दारुबंदीसाठी वर्षानुवर्षे लढणार्या कार्यकर्त्यांशी बोललं, तर हा किती महत्वाचा प्रश्न आहे ते सहज लक्षात येईल. अपघात, अत्याचार, गुन्हेगारीच्या बहुसंख्य घटनांमागे दारूने सटकलेलं डोकं कारणीभूत असतं हे कुणाला अमान्य नसावं.
मात्र विविंच्या मते "मुदलात वाईन दारू नाहीच. वाईन म्हणजे फळांचा रस किंवा ’तुमचं’ द्राक्षासव" मग सरळ तुलनेने स्वस्त आणि पोषक ज्यूस प्यायचा सोडून लोक उगाचच महागड्या वाईन का बरं पीत असतील! कारण फळांच्या रसापलीकडचं काहीतरी म्हणजेच अल्कोहोल नामक चटक लावणारं प्रकरण त्यात आहे. पण यांच्या मते- "दारु म्हणजे व्हिस्की किंवा रम सारखं हार्ड ड्रींक, ज्यात ४०-५० टक्के अल्कोहोल असतं. वाईन मध्ये फक्त ५ ते १५ टक्के अल्कोहोल असल्यावर त्यामुळे नशा कशी येईल!"
यांना इतकंच सांगावसं वाटतं की बीयर, वाईन ही दारुच्या व्यसनाकडे नेणारी पहिली पायरी आहे. तिथेच थांबणारे आस्वादक संयमवीर किंवा वीरांगना मोजक्याच. आपली सुरुवात अशाच पेयांनी आणि गंमत, कुतूहल, पीअर प्रेशर, स्टाईल, क्रेझ वगैरे कारणांनी झाल्याचे बहुसंख्य हार्ड ड्रिंक घेणार्यांना मान्य असते. एरवी एकदा का त्यातलं अल्कोहोल खेचू लागलं की त्याची ठराविक पातळी राखल्याविना त्या माणसाची तगमग होऊ लागते. बिचारी वाईन त्या पातळीपर्यंत न्यायला पुरी पडत नाही, पडली तर परवडत नाही त्यामुळे एकच प्याला ऐवजी हार्ड ड्रिंकचा दुसरा, तिसरा प्याला रिचवला जातो. कालांतराने प्याले मोजायच्या अवस्थेत ती व्यक्ती राहत नाही. यानंतर मद्यपीसह संबंधित व्यक्तींना जे आर्थिक, शारीरिक, मानसिक परिणाम भोगावे लागतात त्यापेक्षा समाजातले इतर प्रश्न कसे मह्त्वाचे आहेत वगैरे पळवाटा काढून काही साध्य होणार नाही. त्याने दारू घातक असते हे सत्य बदलणार नाही.
अनेक विदेशी संस्कृतींमध्ये विशेषत: थंड हवेच्या प्रदेशात मेहमानोंका स्वागत वाईनने करण्याचा रिवाज आहे. वर्षातले १०-११ महिने उन्हाने त्रासलेल्या आपल्या विकसनशील देशात असा रिवाज नाही. मूठभर ग्लोबल मंडळींची ती वैयक्तिक आवड असली तरी आपली (एक दोन राज्य वगळता) भौगोलिक किंवा (बहुराष्ट्रीय कंपनी, आतिथ्य-पर्यटन व्यवसायासारखे) अपवाद वगळता सामाजिक निकडही नाही. आपल्याकडे मेहमानोंका स्वागत गुटख्याने करायला बंदी असताना वाईनला स्वागताची तोरणं लावली जातायत हा विरोधाभास का ! गुटखा खाण्याचे प्रमाण शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढायला लागल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. याचा अर्थ एखाद्या हानीकारक उत्पादनाच्या सहज उपलब्धतेमुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता वाढते हे शासनाला मान्य आहे. मग वाईनची उपलब्धता वाढवताना हे भान कुठे गडप झालं असावं?
अरे हो, हे सगळं शेतकर्यांच्या फायद्यासाठी चाललंय, नाही का! कसं ते मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांचा फायदा करायचा असेल, तर फळं, द्राक्षाला हमी भाव जाहीर करावा. आवश्यकतेनुसार पाणी, वीज उपलब्ध करून द्यावी. प्रत्यक्षात सरकार कोणतंही असो, बहुतेक वेळा लॉबींगमुळे उत्पादकाऐवजी प्रक्रिया व विक्री करणार्यांच्या हितालाच प्राधान्य दिलं गेलं आहे. हे कमी की काय म्हणून आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरचं उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आलं आहे. मद्य स्वस्त म्हणजे विक्री जास्त. प्या लेको, करा चैन!
विंदा म्हणतात तसं
'औचित्याच्या फोल विवेका! जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने'
ही जनतेची अवस्था होईनाका, सरकारला 100 कोटी ऐवजी दुप्पट महसूल मिळणार. कोरोनामुळे तिजोरीवर आलेला ताण कमी करण्याचे हे खरंच किती नामी उपाय आहेत. गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा हवाला देत सत्तेवर येणारं सरकारच ते अंमलात आणणार असेल तर दारुमुळे उद्ध्वस्त होणार्या कुटुंबांनी दाद कुठे मागायची!
याचा अर्थ दारू पिणारे सगळे लोक दुर्जन वगैरे असतात असा नव्हे, सगळेच ’दारुडे’ सुद्धा नसतात. आपल्या आनंदासाठी मर्यादित प्रमाणात वाईनसह विविध प्रकारच्या दारूचा नियमित किंवा प्रासंगिक आस्वाद घेणारे मोजके चोखंदळ रसिक समाजात आहेत. अर्थात नियमित पिण्याने होणारी आरोग्यहानी ती व्यक्ती टाळू शकत नाहीच पण त्यांना काही सांगायला जावं तर ते ’हाय कंबख्त तूने पी ही नही !’ म्हणणार.
दुसर्या बाजूला अत्यंत विकल मनोवस्थेमुळे कुणी दारू पीत असेल किंवा ज्या कामाची पांढरपेशा समाज कल्पनाही करू शकत नाही असे काम करावे लागण्याच्या अपरिहार्यतेमुळे किंवा असह्य शारीरिक दमणुकीमुळे एखादा मजूर दारु पीत असेल तेव्हा त्याला नैतिकतेचे डोस पाजायचा आपल्याला निश्चितच अधिकार नाही. परंतु कोणत्याही प्रकारच्या अपेयपानाला कुणी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न करत असेल तर त्यांना जाब विचारायचा अधिकार नक्कीच आहे.
वाईन /दारू या आधी मिळत नव्हती का, होती. आहेत की त्यासाठी मुबलक खास दुकानं. पण ’त्या’ दुकानात जाऊन डॉक्टर ब्रँडी घेतानाही लाजणारा एक वर्ग आहे. त्यांची भीड चेपावी आणि नवे ग्राहक निर्माण व्हावे अशी आता सरकारची अपेक्षा असल्याने तिकडे अडकून पडलेल्या वाईनला मुक्त द्वार देण्यात आलं असावं. जोवर एखाद्याच्या पिण्यामुळे संबंधितांना, समाजाला काही त्रास होत नाही तोवर ते त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. परंतु ती व्यक्ती देखील आपल्या घरातल्या लहान मुलांना पेला ’ऑफर’ करणार नाही. अगदी (दारूच नसलेल्या!) वाईनचा सुद्धा! याचाच अर्थ समज येईपर्यंत अशा पेयांपासून मुलांनी दूर राहावे अशी गरीब-श्रीमंत, अजाण-सुजाण, पिणार्या- न पिणार्या सगळ्याच पालकांची धडपड असते.
तरीही किराणा दुकानात एखाद्या सरबताच्या बाटलीसारखी वाईन सहज उपलब्ध करणे हा तिला सहज- स्वीकृती मिळावी म्हणून आधी राजमान्यता आणि पाठोपाठ समाजमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यातून कोवळ्या पिढीला नकळत दिला जाणारा ’इट्स ओके टू ड्रिंक’ हा संदेश गंभीर आहे. हे न्यू नॉर्मल एक प्रकारचं स्लो पॉयझनींग आहे. आधीच बदलत्या काळाने पालकांसमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. त्यात आता पालकांबरोबर मॉलमध्ये खरेदीला आलेल्या लहान मुलांनी या रंगीत बाटली कडे बोट दाखवून कुतूहल व्यक्त केले तर पालकांनी नेमकं काय उत्तर देणं अपेक्षित आहे याविषयीही सरकारने पालकांचं प्रबोधन करावं.
समाज म्हणजे सिनेमा नव्हे जिथे बारीक अक्षरात ’दारु पिणे हानीकारक आहे’ अशी तळटीप देऊन टाकली की ’चार बोतल व्होडका काम मेरा रोजका’ किंवा ’अभी तो पार्टी शुरु हुई है’ म्हणत पडद्यावर हवा तो धिंगाणा घालायची मोकळीक मिळते. तेव्हा याविरोधात विवेकी कृती करुया. कितीही अहितकारक निर्णय लादले गेले तरी पालक म्हणून मुलांना त्याच्या परिणामांचे भान देत राहूया. वाईन उपलब्ध असलेल्या किराणा दुकानात खरेदी करणे टाळूया. या काळ्य़ा ढगाला रुपेरी किनार म्हणजे काही व्यापारी संघटनांनी आपल्या सभासदांना स्वत:च्या प्रतिष्ठानात वाईन विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. कोवळ्या मुलांसह अवघ्या समाजाला आकर्षित करू पाहणार्या आणि चोरपावलांनी व्यसनाच्या वाटेवर नेऊ पाहणाऱ्या या न्यू नॉर्मलच्या निषेधाचा स्वर इतका तीव्र करूया की त्यापुढे ’चीअर्स’चे आवाज क्षीण व्हावे.

Published in Divya Marathi Madhurima 9Feb

Sunday, August 8, 2021

जेता

 कुठून येते ही उर्जा?


ज्या लक्ष्यपूर्तीसाठी कित्येक वर्षे तहान भूक हरपून मेहनत करायची, तो सुवर्णक्षण पुढ्यात असताना प्रतिक्रियांची पर्वा न करता अत्युच्च त्याग करायचा, ही जोखीम मोठीच. खेळाडूंमध्ये कुठून येत असेल हा अदम्य विश्वास? या कृतीमागे आंतरिक कौल असतो, की समयोचित तत्परता? देशातील कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर डोक्यावर सांभाळत अशी कृती करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही असतात असे काही जीव, जे जीवापाड परिश्रमांसमोरही मनाच्या प्रामाणिकतेशी सलगी करतात. एखादा सामना हरताना त्यांनी क्षणार्धात जगाला जिंकून घेतलेले असते. त्यागमूर्तींची यादी संपत नाही. आत्मबळ पेरणारी अशी व्यक्तिमत्वे देशाचाच गौरव वाढवितात. निवडक दाखल्यांचा उजाळा माणुसकीच्या उद्घोषाला प्रेरक ठरेल.

१९८८ चे सेउल ऑलिंपिक. कॅनडाचा लॉरेन्स लेमिक्स अटीतटीच्या नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेला होता. स्पर्धा सुरु असताना दुसर्‍या एका शर्यतीतली नाव उलटलेली पाहून तो चक्क आपली शर्यत सोडून नौकेसह त्यांच्या मदतीला धावला. या गोंधळामुळे स्पर्धा संपली तेव्हा तो २२ व्या स्थानावर होता पण त्याला विशेष पदक देऊन गौरवण्यात आले. 

१९९८ चे हिवाळी ऑलिंपिक. नॉर्वेचा बिजॉर्न डेहेल पुरुषांची क्रॉस कंट्री स्कीइंग स्पर्धा जिंकला. केनियाने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. केनियाच्या फिलिप बॉईटसाठी जिंकणे तर दूरच, १० किमी अंतर पार करणे हेच मुळात मोठे आव्हान होते. बिजॉर्नने आपला पदकग्रहण सोहळा फिलिप्स अंतिम रेषा ओलांडेतो थांबवला. त्याचे स्वागत केले आणि मगच पदक स्वीकारले.

२०१६ चे रिओ ऑलिंपिक. न्युझीलंडची निकि हॅम्ब्लेन आणि अमेरिकेची अ‍ॅबे अगोस्तीनो महिलांच्या ५००० किमी रॅलीच्या पात्रता फेरीतच एकमेकींना अडकून पडल्या. अ‍ॅबेला चांगलीच दुखापत झाली होती पण दोघींनी एकमेकींना आधार, प्रोत्साहन देत कसेबसे पण पूर्ण अंतर पार केले. शेवटी पोचूनही त्यांची निवड करण्यात आली. 

२०२१ चे टोकोयो ऑलिंपिक. उंच उडीच्या अंतिम स्पर्धेत इटलीचा जिअनमार्को तंबेरी आणि कतारचा मुताझ इसा बरशीम यांच्यात सुवर्णपदकासाठी स्पर्धा सुरु होती. दोघांनीही सारखीच उंची गाठली त्यामुळे टायब्रेक झाला. पुढच्या ३ संधींबाबत असेच घडले. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारचे सुवर्णपदक निश्चित होते तरीही त्याने सुवर्णपदक जिअनमार्कोशसह वाटून घेतले.  

’जो जीता वोही सिकंदर’ हेच जगाचे खेळाकडे पाहण्याचे साधारण सूत्र आहे. या पार्श्वभूमीवर ही सगळी उदाहरणे वेगळेच काही सांगत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवून कर्णधार अजिंक्य राहणे त्यांच्या घरी पोचला. अतिउत्साही क्रिकेट चाहते हे यश साजरे करण्यासाठी ’कांगारु’चे प्रतीक असलेला केक घेऊन गेले. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे तेव्हा हा केक कापून मी त्यांचा अनादर करणार नाही असे अजिंक्यने नम्रपणे स्पष्ट केले. खेळाच्या गाभ्याशी इतक्या निखळ, सच्च्या प्रेरणा असू शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशी आज परिस्थिती आहे. 

खेळात अधिकाधिक अर्थकारण गुंतल्यापासून बहुतेक खेळाडूंना जिंकायचे आहे ते आर्थिक लाभासाठी. विशेषत: लीग स्वरुपाच्या खेळात तर खेळाडूंवर बोली लावली जाते त्यामुळे कसे जिंकावे यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. उत्तेजक द्रव्यांची मदत घेतली जाते. मॅच फिक्सींगपासून अनेक नियमबाह्य प्रकार सर्रास केले जातात. ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामत याने मध्यंतरी एका ऑनलाइन चॅरिटी सामन्यादरम्यान बुद्धीबळातील माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता. नंतर कामतला आपण संगणकाच्या मदतीने फसवणूक केल्याची कबुली द्यावी लागली. खेळात कायम जिंकावे असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातून मिळणारी प्रचंड प्रसिद्धी हे यावरून लक्षात येईल. 

जिंकायलाच हवे असे वाटण्यामागचे तिसरे आणि सर्वाधिक भावनाप्रधान कारण आहे राष्ट्रप्रेम. क्रिकेट जणू धर्म असलेल्या आपल्या देशात क्रिकेटखेळाडूंना जवळपास देव मानून मनात त्यांची प्रतिष्ठापना करणारे चाहते सामना हरल्यावर त्याच खेळाडूंचे पुतळे करून जाळायला मागेपुढे पाहात नाही. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तर जणू मैदानावरचे युद्ध मानले जाते. तिथली हार-जीत ही संघाची नव्हे तर देशाची हार-जीत मानली जाते. देशाची अब्रू खेळाच्या मैदानावर जणू पणाला लागते. ऑलिंपिकमधल्या एकेका पदकाच्या प्राप्तीकडे तर अवघा देश डोळे लावून बसलेला असतो. खेळाडू तिथे देशाचे प्रतिनिधी म्हणूनच जात असतात. मीराबाई चानूने कास्यपदक मिळवले तरी ते फक्त तिचे पदक नसते. देशाच्या आकांक्षांच्या पूर्ततेचे ते प्रतीक असते. खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ईर्षा असणे, विजिगीषु वृत्ती असणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु पदक मिळवायच्या, जिंकायच्या दडपणामुळे जिंकण्याच्या मार्गापेक्षा आणि खेळापेक्षा मह्त्व मिळते ते फक्त ’जिंकण्याला’. कोणताही देश याला अपवाद नाही. उदा: खोर्‍याने पदके मिळवणार्‍या चीनमध्ये यशस्वी खेळाडू ’निर्माण’ करणार्‍या राष्ट्रीय क्रीडासंस्थांमध्ये परतीचा मार्ग बंद झालेली अनेक बालपणं भरडली जातात कारण ’जिंकण्याला’ पर्याय नसतो.

या सगळ्या चौकटीला छेद देणारे काही असे काही प्रसंग घडतात जिथे कुणीच हरत नाही फक्त ’खेळ’ जिंकतो. केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई 2012 मधील स्पेन क्रॉस कन्ट्री स्पर्धेच्या शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेच्या जवळ आला होता. त्याने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. अचानक अंतिम रेषा समजून तो एक मीटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या हे लक्षात येताच त्याने आधी ओरडून नंतर सरळ ढकलुन त्याला अंतिम रेषेपर्यंत पोचविले. पहिला येण्याची संधी ’घालवली’ असे इव्हानला वाटले नाही कारण अबेल पहिला आलेलाच होता. त्याच्या गोंधळाचा फायदा घेऊन सुवर्णपदक पटकावणे इव्हानला शक्य होते पण त्याने तसे न करता आपली हार स्वीकारली. इथे खरे तर तो माणूस म्हणून जिंकला. अशा खेळाडूंमुळे ते ज्या देशाचे प्रतिनीधीत्व करतात तो देश पदकतालिकेवर कोणत्याही क्रमांकावर असला तरी जेताच असतो. पूर्ण प्रयत्नांती खेळाडू जिंकला की हरला याइतकेच त्याच्यातला ’माणूस’ जिंकला हे आपण महत्वाचे मानायला हवे. या ऑलिंपिकमधील बॅडमिंटनच्या सामन्यात सिंधूच्या हातून रजतपदक गेल्यानंतर लगेच ’तिने आता निवृत्त व्हावे’ अशी टीका काही जणांनी सुरु केली. याच सिंधूने मागील ऑलिंपिकमध्ये कॅरोलिना मरिनकडून पराभव झाल्यानंतर तिने आनंदाच्या भरात फेकलेली रॅकेट विचलीत न होता शांतपणे उचलून तिच्या हतात दिली होती. सगळे क्रीडाजगत तिच्या या समंजस कृतीकडे कौतुकाने पाहत होते. अथक मेहनतीनंतरही केवळ तिने मिळवलेल्या पदकाचा रंग बदलला म्हणून तिच्या या उमदेपणाचा आपल्याला विसर पडू नये. खेळाडूंच्या मनाची मशागत इतक्या नेमकेपणाने  झाली असेल तर प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज जिंकतो आणि पर्यायाने राष्ट्र जिंकते. राष्ट्र ही सामूहिक संकल्पना आहे पण राष्ट्रप्रेम ज्यातून सिद्ध होते ती कृती मात्र वैयक्तिक असते. जिंकण्याची ही आगळीवेगळी व्याख्या आणि खिलाडूवृत्ती अशा मोजक्या खेळाडूंपर्यंतच मर्यादित न राहता नागरिकांपर्यंत झिरपायला हवी. 

क्रीडामानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम खेळाडूंची मानसिकता ओळखून त्यानुसार कोणते बदल उपकारक ठरतील याचा सतत अभ्यास करत असत. शारिरिक प्रशिक्षणाइतकेच महत्व ते मानसिक प्रशिक्षणाला देत असत. इतरांचं अगदी विरुद्ध पक्षाचं सुद्धा जे चांगलं असेल ते स्वीकारणं आणि त्यांचा अनुभव, मत, ज्ञान यांचा आदर करणं आपण शिकलो तरच वैयक्तिक आणि गटाचा विकास शक्य आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते म्हणत ,"चुरशीची स्‍पर्धा असतांना मैत्र आणि नाती ही प्रेमाने आणि संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्‍सर, शत्रूत्‍व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्‍हणजे मग आयुष्‍य ख-या अर्थाने संपन्‍न होत असते. हे सारेच स्‍पर्धात्‍मक खेळांतून शिकता येते. ते पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांनीही शिकून घेऊन आपल्‍या वागण्‍याने पुढच्‍या पिढीवर संस्‍कार करायचे असतात." 

हे शिकता आले, आचरणात आले, तर 'सहनाववतु' म्हणजेच आमचा कुटुंब म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आणि अंतिमतः विश्व म्हणून एकत्रित विकास होवो, या प्रार्थनेला अर्थ लाभेल. आपण 'हे विश्वची माझे घर' असे मनाच्या तळाशी स्वीकारलेले असते; परंतु ही भावना तिथेच राहते. ती व्यवहारात येत नाही. तसे असते, तर प्रत्येक देशाला विकासकामांपेक्षा जास्त खर्च संरक्षण व्यवस्थेवर करावा लागला नसता. परंतु खेळ इथे दुवा म्हणून काम करु शकेल. ज्यातून संवादाची संधी निर्माण होऊ शकेल. वैश्विक शांतता निर्माण व्हावी आणि देशांमध्ये परस्पर सामंजस्य वाढावे, हेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट्य असते. खेळात जिंकण्याची मौज काही वेगळीच; पण माणूसपणाची सरशी तितकीच महत्त्वाची आहे. ते भान रुजवणे, हेच खेळाचे साध्य आहे. यासाठी अगदी सोपा नियम मार्क ट्वेन त्यांच्या मार्मिक शैलीत सांगून गेले आहेत. "It's good sportsmanship to not pick up lost golf balls while they are still rolling". कतारच्या बरशीमने सुवर्ण पदकात इटलीच्या तंबेरीला वाटा देत घेतलेली उंच उडी, स्टेडियम पार करून कित्येकांच्या मनापर्यंत पोचली. अशी अद्भूत उर्जेची उदाहरणे पाहता 'नहीं जिता वो भी सिकंदर' म्हणायला हवे कारण तो जगातील मानसिक परिपक्वतेचा, विवेकाचा विजय ठरतो. 

published in महाराष्ट्र टाईम्स- संवाद पुरवणी -8 Aug 2021

Saturday, April 10, 2021

The Great Indian Kitchen च्या निमित्ताने

"माझी बायको जेव्हा किचनमध्ये काम करते ना, ते तिच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं." आमचे एक स्नेही परवा कौतुकाने सांगत होते. ते आणि त्यांची बायको प्रथितयश डॉक्टर. कामाच्या व्यग्रतेमुळे रोजचा स्वैपाक, सगळं घरकाम करायला मदतनीस आहेत. कधीतरी बदल, छंद, मुलांची एखादी फर्माईश पुरी करायला म्हणून ती तिच्या अद्द्यावत किचनमध्ये जाते तेव्हा तिचं आनंदात असणं अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी मेनू ठरवणं, निगुतीने पूर्वतयारी करणं, मन लावून पदार्थ रांधणं, आपल्या माणसांना आग्रह करून प्रेमाने खाऊ घालणं यातला आनंद अगदी अपूर्व असतो.
एखाद्या पुरुषासाठीही असा बदल म्हणजे मेडिटेशन असू शकतं. परंतु या कामाची जोडी बाईशी लावायचं इतकं कंडिशनिंग झालंय की आपल्या नात्यातल्या स्त्रियांबद्दलच्या आपल्या आठवणी सुद्धा बहुतेक वेळा त्यांची खासियत असलेल्या विशिष्ट पदार्थांशी निगडीत असतात. जुन्या हिंदी सिनेमातल्या आयांना तर आपण कायम, अपने हाथोंसे बनाया हुआ गाजर का हलवा किंवा मूली के पराठे त्यांच्या मुलांना खाऊ घालताना पाहत आलो आहोत.
प्रत्यक्षात जेव्हा हे काम तुझंच म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो आणि त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो.

घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्या पुरुषांना त्यांचे काम करताना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. अपवाद वगळता बहुतेक पुरुष या संधीचा मनापासून लाभ घेतात.
A woman must have money and a room of her own if she is to write fiction या व्हर्जिनिया वुल्फच्या वाक्याकडे, हक्काचा अवकाश मिळाल्याशिवाय स्त्रियांना आवडीच्या क्षेत्रात आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर करता येत नाही, अशाही अर्थाने पाहता येईल. अशी मुभा स्त्रियांना क्वचित मिळते. मिळाली तरी तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, आम्ही तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. घरकामाच्या बाबतीत ’आता कुठे राहिलंय असं काही, उलट शेफ म्हणून पुरुषच जास्त दिसतात, आमचा मुलगा करतो सुनेला ’मदत’, शिवाय आता हवं ते विकत मिळतं, यंत्र असतातच हाताशी’ असं वाटणार्या मंडळींनी आपल्या पांढरपेशा खिडकीतून गगनचुंबी इमारतींपासून खेडोपाडी पसरलेल्या आपल्या महाकाय देशात कृपया नीट डोकावून पाहावं.
शेतावर मजुरी करुन खोपट्यात थकून परतलेले अशिक्षीत जोडपे असो किंवा आपापल्या ऑफीसमधून दमून घरी पोचलेले सुक्षिक्षित जोडपे, रात्रीच्या जेवणाचे आणि उद्याच्या डब्याचे काय करायचे याची चिंता आणि तजवीज करण्याची जबाबदारी आजही प्रामुख्याने बाईवर असते. बाईला बरेचदा वैताग येतो तो प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने तिला गृहित धरण्याचा. तिला तिचा अवकाश न मिळण्याचा. हे गृहित धरणं नंतर फक्त स्वैपाक किंवा घरकामापुरतं मर्यादित राहत नाही. याच वेदनेकडे Jeo Baby या दिग्दर्शकाला प्रेक्षकांचं लक्ष वेधायचं आहे.

ॅमेझॉन प्राईमवरील त्यांचा The great Indian kitchen हा मल्याळम सिनेमा व्यवस्थेपुढे मान तुकवू न शकणार्या एका संवेदनशील भारतीय स्त्रीची व्यथा उघड करुन दाखवतो. पार्श्वभूमी केरळची असल्याने यात सातत्याने दिसणारा आणि मग बोचणारा स्वैपाक, भवताल, केरळी पद्धतीचा असला तरी तपशीलात माफक बदल करुन ही कथा भारतातल्या कोणत्याही प्रांताला लागू होऊ शकते. त्यामुळे यातल्या नायिकेलाच काय कोणत्याही पात्राला नाव नाही. केरळी कुटुंबातली नवविवाहित स्त्री, तिचा नवरा, सासूसासरे यांच्याबरोबरच स्वयंपाक किंवा एकूणच घरकाम हे ही या सिनेमातलं एक महत्वाचं पात्र. ते पात्र चिरणे, कापणे, खवणे, सोलणे, तळणे, झाडणे, आवरणे, विसळणे, धुणे, पुसणे अशा न संपणार्या कृतींच्या त-हत-हेच्या आवाजातून सिनेमाभर सतत बोलत राहतं. या पात्राला सिनेमात इतकं फूटेज आहे की एका टप्प्यावर या अंतहीन कामामुळे त्या सुनेच्या दिनचर्येचा भाग असलेला वैताग आणि कंटाळा आपणही अनुभवायला लागतो. तरीही आपण तिची कथा खिळून पाहत राहतो कारण त्या क्षणापासून दिग्दर्शकाचा सिनेमा आपला सिनेमा झालेला असतो. त्याच्या कॅमेर्याची आणि आपली वेव्हलेंग्थ जुळलेली असते.

एक साधी सुशिक्षित नृत्यशिक्षिका तरुणी एका लहान गावातल्या शिक्षकाशी विधीवत लग्न करुन त्याच्या मोठ्या, सुखवस्तू पण जुन्या पद्धतीची रचना असलेल्या घरात येते. स्वयंपाक, घरकाम इतकंच नव्हे तर नवर्याला प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देणं, हे बाईचं प्राक्तन म्हणून स्वीकारलेल्या द्विपदवीधर सासूची तिला नव्या संसारात सुरुवातीला मदत होते. मुलीची प्रसूती जवळ आल्याने नाईलाजाने सासूला घराचा रामरगाडा नायिकेवर सोपवून जावं लागतं. तिची मुलगी (नायिकेची नणंद) निर्णय घेण्याचा हक्क असलेल्या मोजक्या स्त्रियांपैकी एक असल्याचे केवळ एका संवादातून, तिच्या देहबोलीतून सहज लक्षात येतं.
नायिकेच्या कामाला खंड नसतो. तिला बदली मदतनीस उपलब्ध असते ती केवळ ’त्या’ दिवसात. ती ही अर्थातच स्त्री. अंगण झाडले जाते, पडवी नियमित पुसली जाते, दिवे सवयीने घासले, पेटवले जातात, तव्यावर एकामागोमाग दोसे पसरवले जातात, सांबाराला फोडण्या दिल्या जातात, भात वैरला जातो, भाज्या चिरल्या जातात, बादली कचर्याने भरत जाते आणि कुपात रिकामी होत राहते. आपलं ताट उचलणं तर राहोच पण ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. चहा, नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण, पैपाहुणे... स्वैपाक तिन्हीत्रिकाळ शिजत राहतो आणि मूक होत गेलेल्या नायिकेला ’च’ पीडत राहतो. असे ’च’ घरोघरी असतात. कपडे हाताने धुणंच योग्य नाहीतर मशीनमुळे ते लवकर विरतात, आपल्याकडे सांबार आणि चटणी दोन्हीही लागतंच, ह्यांना चटणी पाट्यावरच वाटलेली आवडते, भात कुकरपेक्षा चुलीवरचाच चांगला लागतो. आणि हे सगळं असंच्च. रोज. अव्याहत.

हल्ली चुलीवरच्या स्मोकी चवीच्या स्वैपाकाचं अप्रूप आहे. चवीने जेवणार्याला वैविध्य हवंच असतं पण ही हौस पुरवायला चुलीपासून सुटका झालेल्या बायकांना पुन्हा चुलीकडेच जावं लागतं. जात्यावरच्या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं. आजही आपल्याकडे एखाद्या बाईच्या वाट्याला येणारं घरच्यांचं कौतुक हे तिच्या इतर क्षेत्रातल्या कर्तृत्वापेक्षा बहुतांशी तिच्या स्वयंपाक व घरकामाच्या गुणवत्तेवर जास्त अवलंबून असतं.. स्त्रीच्या अन्नपूर्णा या रुपाचं असं सोयीनुसार उदात्तीकरण केलं जातं. याविषयी एका लेखकाचा भावनाबंबाळ लेख समाजमाध्यमावर मध्यंतरी बराच फिरत होता.
ह्या लेखकाला त्यांच्या एका चाहत्या जोडप्याने घरी जेवायला बोलावले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य झाले. जेवणाचे बहुतेक पदार्थ दर्जेदार उपाहारगृहातून मागवण्यात आले होते. त्यांचा आस्वाद घेत जोडप्याने त्यांच्याशी अनेक विषयांवर मनापासून गप्पा मारल्या. लेखकरावांना असे तयार पदार्थ मागवणे अजिबात रुचले नाही. ही कसली संस्कृती, त्याऐवजी घरी केलेली साधी मुगाची खिचडी जरी खाऊ घातली असती तरी मला बरे वाटले असते अशी त्यांनी टिप्पणी केली. आता अशा मानसिकतेचे काय करावे! एक तर पाहुण्यांना बोलावले की कुणी फक्त मुगाची खिचडी करणार नाही. केलीच तर ती कुणी करायची अर्थात घरच्या बाईने. या बाईंना अन्नपूर्णेची नेहमीची भूमिका करण्याऐवजी आवर्जून आमंत्रित केलेल्या लेखकाबरोबर चर्चा करण्यात जास्त स्वारस्य होते हे स्वीकारणं लेखकाला एवढे अवघड का वाटावं! हळव्या, विचारी म्हणवणार्या सुबुद्ध लोकांच्या बायकांकडून इतक्या पठडीतल्या अपेक्षा असतील तर सर्वसामान्यांबद्दल काय बोलावं!

तर या सगळ्या ’च’ मुळे येणारा ताण, ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जाणं नायिकेच्या आत कुठेतरी धुमसू लागतं. नवर्याच्या दृष्टीने तुंबलेलं, गळणारं सिंक म्हणजे स्वैपाकघरातला अगदी क्षुल्लक प्रश्न. पण त्या सांडपाण्याच्या वासातून तिच्या मनाची सुटका होणं अवघड होतं. नवर्याबरोबर एकांतातही तो वास.. घरकाम नावाचं अदृश्य पात्र, तिच्या मेंदूत दबा धरून बसलेलं असतं. नुसत्या यांत्रिक क्रियेचा तिटकारा आल्याने त्याने आपल्या थकल्या जीवाला आधी किमान खुलवावं ही साधी अपेक्षा ती व्यक्त करते. ती पूर्ण होणं तर दूरच त्याला तिच्यात शेजे आणि पेजेच्या गरजेपलिकडे काही रस नाही हे तो स्पष्टपणे सांगतो. नायिका दुखावते. तिची घुसमट इथे थांबत नाही.
तिच्या नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला ठाम नकार, त्यातच मासिक पाळीचं स्तोम, शबरीमाला पार्श्वभूमीवर तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट डिलिट करण्याचा नवर्याचा आदेश, व्यवस्थेला शरण गेलेल्या तिच्या आईचीही तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एकामागोमाग घडणार्या अशा घटनांमुळे तिच्या मनात धुमसणार्या ठिणग्या पेट घेऊ लागतात आणि एका क्षणी याचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. तिथे आपण श्वास रोखून धरतो. सिनेमा फार ग्रेट नाही पण तो थेट भिडतो. Nimisha Sajayan आणि Suraj Venjaramoodu या मुख्य पात्रांचा जिवंत अभिनय, प्रत्ययकारी चित्रण, बांधीव पटकथा यामुळे तो आणखी प्रभावी ठरतो.

सिनेमा बघताना वाचल्याचं आठवलं, गेल्या पिढीचे लेखक जयवंत दळवी यांनी आपल्या आईचं अवघं आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात राब राब राबण्यात करपून गेल्याची कबुली एका लेखात दिली होती. हे गेल्या पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण असले आणि आता परिस्थिती काही अंशी बदलली असली तरी या कामावरची ’दुय्यम’ आणि ’बायकी’ ही लेबल्स पुसली गेलेली नाहीत. "निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला तर चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला सर्वात जास्त आवडतं" हे हिलरी क्लिंटन यांचं वाक्य तेव्हाच्या काही अमेरिकन माध्यमांनी ’तर’च्या पुढच्या वाक्याची हेडलाईन करुन बाई शेवटी स्वैपाकघरातच रमू शकते, अशा पद्धतीने सादर केलं होतं. भारतीय समाजाला तर हे मनातून मान्यच आहे. ’किचन पॉलीटिक्स’ या एकमेव विषयाभोवती घुटमळणार्या सुमार मालिकांना मिळणारी अफाट लोकप्रियता त्याचे निदर्शक आहे.
काही उदार मंडळींची प्रगती ’बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी’ या धर्तीवर ’अडायला नको म्हणून मुलाला जुजबी स्वैपाक आला पाहिजे’ इथपर्यंत झाली आहे. पण मुलीच्या जातीला मात्र तो व्यवस्थित आला’च’ पाहिजे याबाबत त्यांचे दुमत नाही.

मुळात स्वैपाक किंवा घरकाम हे केवळ जीवनावश्यक कर्तव्य नाही तर आयुष्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून सौंदर्य आणि अर्थ प्राप्त होतो त्यापैकी ती एक महत्वाची कृती आहे. उपलब्ध वेळ, आवड, कौशल्य आणि गरज याचा समन्वय साधून एकमेकांना हातभार लावत ती करणं ही घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमध्ये अचानक याची जाणीव झाल्याने जबाबदारी वगैरे म्हणणं जरा जास्त होईल, पण अनेक पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना स्वैपाकात, घरकामात ’मदत’ केली. काहींनी त्यावरून विनोद व्हायरल केले. बायकांना विनोदाचं वावडं नसतं पण पुरुषांनी हे काम करण्यात विनोद आहे असं अजूनही समाजाला वाटणं हाच मुळात एक विनोद आहे.
सामाजिक संस्थांच्या पाहणीनुसार अनलॉकबरोबर यातील बहुतेकांचा उत्साह मावळला आणि ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये कामाची व श्रमाची असमान विभागणी पूर्ववत झाली. या सिनेमाच्या नावात ’किचन’ असलं तरी सिनेमा सांगू पाहतोय ते व्यवस्थेबद्दल.
अशा मानसिकतेबद्दल. घरोघरच्या मातीच्या चुलींबद्दल. सिनेमापुरतं बोलायचं तर नायिकेने अमुक स्टँड घ्यायला हवा होता, तमुक करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया येत राहतील. आपण काय करायला हवं याचा विचार करायला मात्र हा सिनेमा आपल्याला भाग पाडतो.

published in Media Watch portal

Tuesday, February 9, 2021

लेका सांगे ब्रह्मज्ञान

 


"आमची मुलं अवांतर काही अजिबात वाचत नाहीत!" आजच्या बहुतेक पालकांची ही तक्रार असते. मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेल्या आपल्या मुलाच्या वयात शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला होता हे आठवून वैतागणार्‍या वडिलांना आपल्या वयाचे असताना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता हे ही आठवत असतं. तेव्हा मुलांनी खूप वाचावं अशी अपेक्षा करताना वाचनाच्या बाबतीत आपण किती पाण्यात आहोत, काय आणि किती वाचतो या्चा विचार पालकांनी करायला हवा. ’तुम्ही सध्या काय वाचता?’ या प्रश्नाला (अपवाद वगळता) बहुतेकांचं उत्तर ’हॅ हॅ हॅ, वेळच होत नाही हल्ली वाचाबिचायला’ हे असतं. नाही म्हणायला लॉकडाऊनमध्ये बर्‍याच जणांनी वाचनाकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न केला पण घरातली कामं बरीच वाढल्याने तो उत्साह हळूहळू मावळायला लागला. 


या पार्श्वभूमीवर एखादी ट्विंकल खन्ना लेकीसोबत रोज पंचवीस पानं वाचायचा संकल्प करुन त्या दोघींचा वाचतानाचा फोटो social media वर शेअर करते तेव्हा साधारणपणे पहिली प्रतिक्रिया उमटते -’तिच्याकडे छप्पन नोकर असतील कामाला मग काय वेळच वेळ!’ खरं तर ’मिसेस फनीबोन्स’ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारी ट्विंकल एक प्रसिद्ध लेखिका, ब्लॉगर, उत्तम वाचक आणि यशस्वी व्यावसायिक आहे. "पाहिलेलं किंवा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळेच मी अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले असले तरी लेखिका म्हणून यशस्वी ठरले आहे", असं ती म्हणते. वाचावंसं न वाटण्याचं किंवा वाचन कमी होण्यामागचं खरं कारण ’वेळ नाही’ हे नाही हे आपल्यालाही मनातून मान्य असतं. माहितीच्या महापुरात तग धरताना जग हळूहळू समजून घेण्याविषयीची कमी झालेली असोशी आणि वाचनातून मिळणार्‍या आनंदापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून विनासायास होणार्‍या रंजनाचे वाढते आकर्षण हे त्यामागचे कारण आहे. मुलांवर या माध्यमांचा पगडा पालकांपेक्षा जास्त असल्याने याचा परिणाम त्यांच्या वाचनावर होणार हे स्वाभाविकच. 

मग या अपराधी भावनेतून देण्याघेण्याच्या ब्लाउजपीससारख्या चार मोफत पीडीएफ इकडून तिकडे फॉरवर्ड केल्या म्हणजे आपली वाचनविषयक जबाबदारी संपत नाही. उलट त्यातून लेखक, प्रकाशकाच्या पोटावर पाय येण्याची शक्यता असते. बाहेर जेवायला हजारएक रुपये खर्च करणार्‍या पण दोनशे रुपयाचं पुस्तक विकत घेताना खळखळ करणार्‍या, ह्ल्ली ’चांगले’ लेखक सापडत नाहीत अशी ओरड करणार्‍या पालकांना आज एका क्लिकवर जागतिक साहित्य उपलब्ध आहे. अरविंद गुप्तांसारख्यांनी बालसाहित्याचा खजिना ऑनलाईन खुला केलेला आहे. मुळात आपण वाचन हे ज्ञान मिळवण्यासाठी, स्वत:चा विकास घडवण्यासाठी, स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी, अमुक तमुक अशा भव्यदिव्य कारणासाठी करण्याचा जितका प्रयत्न करतो तितके आपण वाचनापासून दूर जातो. वाचन निर्हेतूक असावं. असं वाचन आपच आत मुरत जातं. बाकी ज्ञानबिन, यशबिश मिळालंच तर ते त्याचे साईड इफेक्ट्स आहेत.अजिबात किंवा फारसं न वाचताही आयुष्यात आनंदी, समाधानी, यशस्वी असलेले लोक अर्थातच आहेत पण वाचन हे स्वत:साठी करायचं असतं हे कळलं आणि त्या प्रक्रियेतला निर्भेळ आनंद गवसला की वाचन आपसूक होत जातं. 

"काळ चंद्र सूर्यांच्या झांजा वाजवत पुढे चालला होता.." एका वाक्यात असं अद्भुत लिहिणार्‍या गेल्या पिढीतल्या ह.ना.आपटयांपासून, "discomfort is good. In discomfort we are real” असं रोखठोक लिहिणार्‍या गेल्या वर्षीच्या बुकरविजेत्या मारिएके रिज्नेवेल्डपर्यंत, काहीही निरुद्देश वाचताना जे धक्के, तरंग, विलक्षण क्षण अनुभवायला मिळतात ते अलौकिक असतात. त्यात अनेक उत्तरं नकळत सापडत जातात. ती आपली मालमत्ता असते. अर्थात काय वाचावं याबाबत मतभिन्नता असू शकते पण "तुम्ही जर चारचौघांसारखं चाकोरीतच वाचन केलं तर तुमचे विचारही चारचौंघांसारखेच राहतील" असं मुराकामी बजावतात. तेव्हा वाणसामान गुंडाळलेल्या कागदांपासून वेब कंटेंटपर्यंत सरसनिरस न ठरवता वाचत जाणं आणि एका ट्प्प्यावर आपला कल कळला की त्यानुसार निवडक वाचन करणं या वाचनाच्या पायर्‍या म्हणता येतील. प्रत्येक पायरीवरची मौज अनुभवत पालकांना पुढे जाता आलं तर त्यांना मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. तरुणपणी आपण उत्तम वाचक होतो म्हणणार्‍या अनेक मराठी पालकांच्या वाचनाच्या कल्पना त्याच पठडीत अडकून पडलेल्या दिसतात. ’श्यामची आई’ वाचताना आजची पिढी गहिवरुन येणार नाही, स्वामी-मृत्युंजय तिला कृत्रिम आणि भाबडं वाटू शकेल, अत्रे-पुलंचे विनोद काळ बदलल्यामुळे डोक्यावरुन जाऊ शकतील, बोरकर-कुसुमाग्रज फारच ’डिफिकल्ट’ वाटू शकतील, विद्रोही साहित्य एकसुरी वाटू शकेल. पालकांनी हे समजून घ्यावं. काय उत्तम ते सांगत राहावं परंतु मुलांचं वाचन जगाबरोबर बदलू द्यावं. पालक स्वत: छापील पुस्तकांना प्राधान्य देत असले तरी मुलांच्या वाचनाच्या पद्धती ई- बुक, ऑडिओ बुक, किंडल, व्लॉग (v-log) अशा बदलत जात आहेत, त्यांच्या वाचनाचं माध्यम मराठीच राहणार नाहीये हे ही त्यांनी स्वीकारावं. 

’फेरारी की सवारी’ या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. वडिल मुलाला पाठीमागे बसवून स्कूटरवरुन वेगाने जाताना घाईगडबडीत सिग्नल तोडतात. तो त्यांचा नेहमीचा रस्ता असल्याने परिचयाचा हवालदार त्यांना टोकत नाही. आपल्याकडून सिग्नल तोडला गेल्याचे लक्षात येताच वडिल परत फिरतात आणि हवालदाराला दंडाची पावती करायला सांगतात. हवालदार ’जाने दो साब, किसीने नही देखा’ असं म्हणतो. त्यावर वडिल म्हणतात,’लेकिन मेरे बच्चेने देखा ना! बच्चा जो देखेगा वही सिखेगा’ पालकत्वाचं सार कदाचित या वाक्यात आहे. वाचनही त्याला अपवाद नाही. थोडक्यात मुलांनी वाचायला हवं असेल तर नाक मुरडण्याऐवजी ट्विंकलकडून प्रेरणा घेऊन त्यांना पुस्तकांचं सान्निध्य द्यावं लागेल, वाचनातला आनंद आपल्याला त्यांच्या सोबतीने नव्याने शोधावा लागेल. 

(published in Divya Marathi - Madhurima - 9 feb 2021)

Friday, November 20, 2020

बदलत्या जाहिराती.. बदलती ’ती’

 

या कोविड काळातली टाळेबंदी सुसह्य व्हावी म्हणून नव्वदच्या दशकातल्या ’रामायण’ मालिकेचे पुन:प्रसारण करण्यात आले होते. त्यात सीतेची भूमिका करणार्‍या दीपिका चिखलीयाला पाहून तेव्हाच्या सात्विक, सरधोपट जाहिराती आठवल्या. "मान गएँ दीपिकाजी, आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोकों." मग स्मार्ट गृहिणी असणार्‍या सर्फच्या ’ललिताजी’ आठवल्या. ’भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे’ म्हणत जाहिरातींमध्ये हळूहळू छानसा बदल होत गेलाय हे ही जाणवले. आता शुभ्र कपड्यांमुळे कमावलेल्या आत्मविश्वासाने आपल्या रिक्षाचालक वडिलांची आपल्या बॉसशी ओळख करुन देणारी एखादी आधुनिक तरुणी, कार्यालयात लाच देऊ पाहणार्‍याला आपले कपडेच नाही तर चारित्र्यही लख्ख आहे हे ठणकावून सांगणारी कर्तबगार अधिकारी स्त्री किंवा 

अमुक डिटर्जंट वापरुन वॉशींग मशीनमध्ये कपडे कसे धुवायचे हे मुलीबरोबरच मुलालाही शिकवणारी तडफदार आई रिन, टाईड किंवा एरिअलच्या जाहिरातीतून दिसू लागली आहे. 

अर्थात धुणी- भांडी करणे किंवा करवून घेणे, घराची स्वच्छता करणे, कुटुंबियांच्या चेहर्‍यावर हास्य फुलेल असा रुचकर पण आरोग्यपूर्ण स्वयंपाक करणे, कुटुंबियांची काळजी घेणे (आणि हे सगळे करुन पाठ वगैरे दुखली तर अमुकतमुक कंपनीचा बाम चोळून पदर खोचून पुन्हा कामाला उभे राहणे) ही कामे मुख्यत: बाईची हे गृहितक अद्याप तसेच आहे. घरातला पुरुष सहृदयी असेल तर तो तिला फार तर ’मदत’ करतो. आतापर्यंत ’बायको गेली माहेरी (तरच) काम करी पीतांबरी' हे प्रसंगापुरते म्हणणार्‍या बर्‍याच पुरुषांनी टाळेबंदीमध्ये मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि हाताशी बर्‍यापैकी वेळ असल्याने बायको घरात असूनही घरकामाला चक्क हातभार लावला.


काहींनी समाजमाध्यमांवर त्यावरुन विनोद व्हायरल केले असले तरीही किमान मध्यमवर्गी समाज बदलतोय असे चित्र दिसू लागले. टाळेबंदी शिथिल झाल्यावर, व्यवहार पुन्हा सुरु झाल्यानंतर, विशेषत: ज्या घरातील स्त्रिया नोकरी/व्यवसाय आणि घरकाम अशी दुहेरी कसरत करतात, त्यातील किती पुरुषांनी घरकामात मदत करणे अजूनही सुरु ठेवले आहे हा मात्र संशोधनाचा विषय ठरेल. या पार्श्वभूमीवर घरगुती-उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये जाणवलेला महत्वाचा सकारात्मक बदल म्हणजे कपडे धुणे किंवा घरकाम हे ’फक्त’ बायकांचे काम नाही हे निदान सूचित करायला त्यांनी सुरुवात केली आहे. 

या संदर्भात आजची डचेस ऑफ ससेक्स- मेगन मर्केल हिचा मध्यंतरी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ बराच गाजला. त्यात तिने या गृहितकांबद्दल अतिशय मार्मिक भाष्य केले आहे. ती अवघी ११ वर्षाची असताना वर्गातील एका मुलाने एका डिटर्जंटच्या जाहिरातीतील शब्दांवरुन हे केवळ मुलीं/ स्त्रियांचे काम असून ते त्यांचे समाजातले (दुय्यम) स्थानही आहे, अशा अर्थाचा शेरा मारला. ती अस्वस्थ झाली. असा चुकीचा संदेश समाजमनावर बिंबवणार्‍या त्या जाहिरातीच्या विरोधात अमेरिकेच्या तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन पासून त्या उत्पादनाच्या निर्मात्यापर्यंत अनेकांना तिने पत्रे लिहिली. विशेष म्हणजे याची दखल घेतली जाऊन ’प्रॉक्टर अ‍ॅंड गॅम्बल’ कंपनीच्या त्या जाहिरातीतले शब्द बदलले गेले. लिंग-समानतेबाबत फक्त विचार पुरेसा  नाही, ती संकल्पना आचरणातही उतरायला हवी, हे ऋजु शब्दात परंतु निक्षून सांगणारी मेगन या व्हिडिओमध्ये तिच्या शाही लग्नाच्या व्हिडिओपेक्षा जास्त देखणी दिसते. मेगनच्या पिढीच्या भारतीय स्त्रीचेही आत्मभान जागे होते आहे, ती चौकटीपलिकडे जाऊन विचार आणि कृती करु लागली आहे. या वस्तुस्थितीचा प्रभाव थोड्या प्रमाणात का होईना आजच्या जाहिरातींवर पडू लागल्याचे दिसते आहे. 

मुंबईच्या चंदना हिरन या २२ वर्षीय तरुणीने ’फेअर अ‍ॅंड लव्हली’ च्या जाहिरातीतील ’फेअर’ या वर्णभेदी शब्दावर आक्षेप घेतला व तो गाळला जावा म्हणून change.org वर सह्यांची मोहिम राबवली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. याच सुमारास जॉर्ज फ्लोईडची वर्णद्वेषातून हत्या झाल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया जगभरातून येत होत्या. हिंदुस्थान युनिलिव्हरने अखेर आपल्या या उत्पादनाचे नामांतर ’ग्लो अ‍ॅंड लव्हली’ असे केले. इंग्रज देश सोडून गेले असले तरी जेत्यांचा रंग म्हणून गोरेपणाच्या आकर्षणाने भारतीयांच्या मनाला असे काही कह्यात घेतले आहे की सर्वसाधारण भारतीयांना, त्यातूनही स्त्रियांना आपल्या मूळ गव्हाळ किंवा सावळ्या भारतीय वर्णाचा अकारण न्यूनगंड वाटतो. गोरेपणा म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य अशी वर्णभेदाचा पुरस्कार करणारी व्याख्या समाजमनावर बिंबवू पाहणार्‍यांना उत्पादनाच्या नावातून गोरेपणाचा उल्लेख अखेर काढून टाकावा लागला. उजळ होत जाणार्‍या रंगछटा दाखवणारे कार्ड देखील त्यांनी पाकीटातून काढून टाकले. याआधीही निवियाने जाहिरातीसाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये white is purity म्हणजेच गोरेपणा म्हणजे शुद्धता असे अत्यंत आक्षेपार्ह वाक्य वापरले होते. वर्णभेदी म्हणून आरोप झाल्यावर कंपनीने क्षमा मागून ते मागे घेतले असले तरी समाजाच्या मनात ते आजही रुतून बसले आहे. चांगला जोडीदार, मनासारखी नोकरी, हवी ती संधी मिळवायची असेल, तर आत्मविश्वास हवा आणि त्यासाठी तुम्ही गोरंच असायला हवे हे अशा जाहिराती ठासून सांगत होत्या. ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपये होता, तो तब्बल ४०० अब्जांवर जाऊन पोचला आहे. दरम्यान शाहरुख खान सारखे प्रसिद्ध सिनेनट जाहिरातीत तालमीतले प्रशिक्षक बनून कुस्तीपटू मुलांच्या दिशेने गोरेपण बहाल करणार्‍या ’मर्दोवाल्या क्रीम’ची ट्यूब फेकत ’तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून गोरेपणासाठी बायकी उत्पादनं काय वापरता” म्हणत या नवीन क्रीमचा प्रचार करत होते. हे सगळे बघता केवळ जाहिरातीतून नव्हे तर उत्पादनाच्या नावातून जरी सामाजिक विषमता ध्वनीत होत असेल तर संबंधित कंपनीला ते नाव बदलवायला भाग पाडण्याची किमया आज एका जनहित याचिकेने करुन दाखवली आहे.  #AllShadesAreLovely सगळ्या वर्णछटा सुंदर असतात, हे अधोरेखित करणारी ही मोहिम एका बलाढ्य कंपनीला स्त्री सौंदर्याचे कृत्रिम मापदंड बदलवायला भाग पाडू शकली, हे ही नसे थोडके. 

परंतु एक समाज म्हणून आपण मेगन किंवा चंदनाइतक्या गंभीरपणे जाहिरातीतून नकळत दिल्या जाणार्‍या संदेशांकडे पाहतो का! ते चुकीचे असल्यास आपल्याला खटकतात का! खटकल्यास आपण किमान वैयक्तिक स्तरावर याबाबतीत बदल करतो का, हे प्रश्न आता तरी आपण स्वत:ला विचारायला हवे आहेत. 

तांत्रिकदृष्ट्या भारतामध्ये टीव्हीवर जाहिराती दाखविण्यास १९७८ पासून सुरुवात झाली. या काळामधल्या जाहिरातीतल्या स्त्रिया कमालीच्या गृहकृत्यदक्ष असत. ते साहजिकही होते कारण स्त्रियांचे नोकरीसाठी, कामासाठी घराबाहेर पडण्याचे प्रमाण तेव्हा अत्यंत कमी होते. नव्वदच्या दशकात आणि जागतिकीकरणानंतरही घरगुती उत्पादनांचे आणि बाईचे नाते अबाधित राहिले असले तरी संसारी स्त्रीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर केलेली कॅडबरीजच्या मनोवेधक जाहिरातीतल्या क्रिकेट खेळाडूची उत्फुल्ल वृत्तीची प्रेयसी अनेकांना भावली. ही जाहिरात कलात्मकरित्या चित्रीत केली असली तरी कर्तृत्ववान पुरुष आणि त्याच्यावर भाळणे किंवा त्याचा संसार निगुतीने सांभाळणे या दोनपैकी एक भूमिका करणारी सुस्वरुप स्त्री अशा पठडीतल्या जाहिरातींची संख्या वाढू लागली. अपवाद वगळता बाईचे जाहिरातीत असणे आयपीएल मधल्या ’चीयरलीडर्स’सारखे अपरिहार्य ठरु लागले. सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीत बाईच दिसणार हे अपेक्षित असले तरी हळूहळू दाढीचे रेझर, बाईक, सिगारेट, सूट अशा पुरुष वापरत असलेल्या उत्पादनाशी संबंधित जाहिरातीतही बाई दिसणे अत्यावश्यक झाले. शिवाय या बायका मादक आणि आकर्षक असणे तसेच पुरुष कमावलेल्या पिळदार शरीराचे, ’मॅचो’ असणे अनिवार्य झाले. त्याच्या पौरुषत्वाला आव्हान देणारी एक तरी कमनीय युवती बाजूला त्याला लगटून दिसू लागली आणि जाहिरातीच्या शेवटी ती त्याच्यावर फिदा होऊ लागली. मग ते उत्पादन म्हणजे पुरुषांची अंतर्वस्त्रे असोत किंवा एखादी कार. विशेषत: डिओच्या जाहिराती तर स्त्रियांना आकर्षित करणे हे पुरुषांना जगाच्या पाठीवर करण्यासारखे एकमेव काम असल्यासारख्या केल्या जाऊ लागल्या. नुसत्या सुवासाने धुंद होऊन डिओ लावलेल्या अनोळखी पुरुषामागे धावत सुटलेल्या बायका जाहिरातीतून दिसू लागल्या. तुलनेने सर्जनशीलतेचा प्रत्यय देत ’मेन विल बी मेन’ म्हणत काही खुसखुशीत जाहिरातींनी स्त्रीविषयी पुरुषांचे नैसर्गिक आकर्षण अतिशय संयत पण मिश्कील पद्धतीने सादर केले असले तरी हे अपवाद. बहुसंख्य बटबटीत जाहिरातींनी बाईच्या शरीराचे वस्तुकरण तर केलेच परंतु लिंगभाव ही माणसांसाठी असलेली गोष्ट एव्हाना उत्पादनांशी जोडली गेली. २०१२ साली व्यायामाच्या उत्पादनांशी संबंधित कंपनीच्या पोस्टरमध्ये म्हटले होते 'cheat on your girlfriend not on your workout' म्हणजेच एकवेळ तुमच्या प्रेयसीला फसवा पण व्यायामाशी प्रतारणा करु नका. वादग्रस्त ठरल्यावर ही जाहिरात मागे घेण्यात आली. 

या जाहिराती अशा असण्यामागचे कारण म्हणजे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा. गेल्या दशकातल्या युनेस्कोचा अहवालानुसार येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची आदर्श स्थिती येण्याची शक्यता नाही. याचा अर्थ ती स्थिती आणण्यासाठी समाजाला निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वसामान्य भारतीय स्त्री ही ‘सेक्सडॉल’ नाही आणि कुटुंबासाठी चोवीस तास राबणारी ‘महान त्यागमूर्ती’ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मध्ये कुठेतरी स्वत:साठीदेखील जगू पाहणारी एक ‘हाडामासाची’ व्यक्ती आहे हे समजून घ्यावे लागेल. स्त्रियांना कर्तृत्व गाजवता यावे यासाठी संधींची समानता आवश्यक असते त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागेल. बीएसई वरील नोंदीनुसार विविध उद्योगसमूहांमध्ये ३२३ व्यवस्थापकीय पदांपैकी फक्त ८ पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत तर त्यावरील ५४% कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकही स्त्री नाही. मग सर्वसामान्य स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल काय बोलावे! साहजिक पितृसत्ता अधोरेखित करणार्‍या जाहिरातींची रांग सहजासहजी संपत नाही. 


जाहिरातविश्वात काम करणार्‍या स्त्रिया हे सारे मूकपणे का स्वीकारतात याचे कारण देखील तेथील पितृसत्ताच आहे. कंपनीच्या प्रमुखपदी असणारी मंडळी जाहिरातीचे स्वरुप व अपेक्षा निश्चित करतात आणि जाहिरातविश्वातली बलाढय मंडळी त्यानुसार जाहिरातीची संकल्पना ठरवतात. स्त्रिया येथे बहुतेक करुन मदतनीस किंवा मॉडेलच्या भूमिकेत असतात. निर्णयाच्या अधिकारापर्यंत फार कमी जणी पोचू शकतात. शिवाय समाजात रुजलेल्या धारणा तशाच राखून स्त्री आणि पुरुषाला आपापल्या पारंपरिक भूमिकाच योग्य असल्याचे सांगत राहणे बाजाराला व्यावहारिक दृष्टीने जास्त सोपे असते. याचा अर्थ स्त्रियांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत पुरुषांनी किंवा पुरुषांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत स्त्रियांनी असूच नये का? त्यांच्यातील स्वाभाविक आकर्षण किंवा सामाजिक नात्यांना जाहिरातीत संदर्भ म्हणून वापरले जाऊ नये का? अर्थातच हवे परंतु तारतम्य बाळगून. ’एक हीरा आपके हीरे के लिए’ असे संयतपणे सांगणार्‍या जाहिराती हे सहजपणे करत आहेत. समाजाच्या वैचारिक चाकोरीत बदल केला आणि तो रुचला नाही तर उत्पादनाच्या विक्रीवर त्याचा घातक परिणाम होण्याची जोखीम पत्करणे व्यावसायिकांना परवडणारे नसते तरीही आता कूर्मगतीने का होईना जाहिराती बदलू लागल्या आहेत. हे धाडस करु लागल्या आहेत. 


स्त्रीची आणि पुरुषांचीही जाहिरातीतली रुपे बदलताना दिसू लागली आहेत. आजवर फक्त कुटुंबाचा विचार करणारी स्त्री स्वत:चा विचार करतानाही दिसू लागली आहे. कोलगेटच्या ताज्या जाहिरातीत एक देखणी वयस्कर विधवा स्त्री आपल्या कुटुंबियांसह बाहेर जेवायला गेली आहे. तिचे लक्ष उपहारगृहाच्या दरवाज्याकडे आहे. तो येतो. तिने निवडलेला समवयस्क सहचर. आपल्या अनामिकेतली अंगठी दाखवत ती आपल्या कुटुंबियांची त्याच्याशी काहीशा संकोचाने तरीही आत्मविश्वासाने आणि हसतमुख चेहर्‍याने ओळख करुन देते. क्षणभर अचंबित झालेले कुटुंबिय स्वत:ला सावरुन टाळ्या वाजवून तिच्या या निर्णयाचे स्वागत करतात. जाहिरातीत एकही संवाद नाही फक्त देहबोली सगळे काही पोचवते. खरंच, असं का असू नये! असा विचार करायला प्रेक्षकाला भाग पाडते. स्कूटीच्या जाहिरातीतल्या तारका ‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन?’ (सगळी धमाल नेहमी मुलांच्याच वाट्याला का!) असा थेट सवाल करु लागल्या आहेत. विशेष म्हणजे स्त्रीला

कायम ठराविक रुपरंगात आणि मोजमापात सादर करणारी बार्बी सुद्धा बदलते आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त जागतिक पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशी हिच्या नावाच्या बार्बी डॉलचा समावेश नुकताच बार्बी शिरोज या खास बाहुल्यांच्या मालिकेत करण्यात आला. अशाप्रकारच्या मान्यतांमुळे अपंगत्वाकडे लोक सहानुभूतीने नाही तर आदराने आणि सह-अनुभूतीने पाहू लागतील, असे मानसी म्हणते. या बाहुलीलाही मानसीसारखेच कृत्रिम अवयव (पाय) लावण्यात आले आहेत. मॅटल टॉईज इंडियाचे ​​विपणन प्रमुख याबाबत म्हणतात “प्रत्येक मुलीमध्ये तिचे स्वप्न साध्य करायची जिद्द असते. त्यांना या बाहुलीमुळे आणखी प्रेरणा मिळॆल असा आम्हाला विश्वास आहे." 

बोर्नव्हिटा किंवा कॉम्प्लान किंवा कोणतीही पोषणाचा दावा करणारी पूड ही फक्त उंची वाढण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी आहे हे या नव्या जाहिराती सांगू लागल्या आहेत. निर्मनुष्य रस्त्यात गाडी बंद पडल्यावर स्वत: गाडी चालवू शकत असूनही कावर्‍याबावर्‍या झालेल्या आईला धीर देणारी आणि जॅक लावून शांतपणे स्वत: चाक बदलणारी षोडशा यात दिसू लागली आहे. मुलाला स्पर्धेसाठी नुसते तयार न करता जाहिरातीतली आई सुद्धा त्याच्यासोबत धावू लागली आहे. दागिन्याच्या जाहिरातीत एकल पालकत्व निभावणार्‍या स्त्रीशी विवाह करताना तिचा नवा जोडीदार तिच्या रुसलेल्या मुलीला सहजपणे उचलून घेऊन सप्तपदी चालू लागला आहे. विवाह जुळवणार्‍या संस्थांच्या वेबसाईटच्या जाहिराती देखील बदलत आहेत. केवळ जात, उंची, रुप, पगार याभोवती न घुटमळता स्वभाव जुळणे जास्त महत्वाचे असते हे त्या सांगत आहेत. अशाच एका जाहिरातीतली वृद्ध आई मुलाला रागावून विचारते की तुझ्या कमाईत आपलं व्यवस्थित चाललेलं असताना ती नोकरी करतेच कशाला! त्यावर नवपरिणीत बायकोची खंबीरपणे बाजू घेणारा मुलगा म्हणतो, ‘तिला आवडतं, म्हणून’. बाईने नोकरी करायची ती केवळ घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी या जुन्या विचारांना ही जाहिरात छेद देते. टूथपेस्टच्या एका जाहिरातीत मुलांमध्ये फुटबॉल खेळायला गेलेली मुलगी पडते तेव्हा मुलगे तिची खिल्ली उडवतात, तिला हसतात तेव्हा ती सुरेख हसून विचारते, तुम्हाला भीती नक्की कशाची वाटतेय, माझ्या पडण्याची की तुमच्या हरण्याची? कॉर्नफ्लेक्सच्या


जाहिरातीतले बाबा आई घरी नसली तरी मुलीला नाश्ता करायला लावून मगच शाळेत पाठवताना तर दुसर्‍या जाहिरातीत ते तिची वेणी घालण्य़ाचा प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. पूर्वी ज्या साबणाच्या जाहिरातीमध्ये बायका जीव खाऊन कॉलर घासताना आणि कपडे शुभ्र झाल्याचे पाहून त्यांचे नवरे आणि मुलं खूष होताना दाखवले जात, त्याच साबणाच्या जाहिरातीमध्ये आज कपडे खराब होण्याची तमा न बाळगता चिखलात बंद पडलेली रुग्णवाहिका ढकलणार्‍या बायका दिसत आहेत. सॅनिटरी पॅड ही लपतछपत काळ्या पिशवीतून विकत आणायची वस्तू नसून ती एक मासिक आणि आवश्यक खरेदी आहे, मासिक धर्म ही नैसर्गिक घटना आहे हे सांगणार्‍या जाहिराती बायकांना जन्मभराच्या संकोचापासून मुक्त करत आहेत. कोणत्याही व्यवसायात बाजारात टिकून राहण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असलेला नफा शेवटी ग्राहकाकडून मिळतो. हा ग्राहक समाजाचाच एक भाग असतो ज्यात सुमारे पन्नास टक्के महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या बदलत्या मानसिकतेची नोंद ग्राहकानुययी माध्यमांना आणि जाहिरात विश्वाला घ्यावी लागते आहे. हे सुचिन्ह आहे.


मात्र या बदलाची गती फार मंद आहे. जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर म्हणतात, ‘जाहिराती दोन प्रकारच्या असतात. ‘आयडेंटिफिकेशन’ म्हणजे जाहिरातीतली व्यक्ती म्हणजे आपणच आहोत असे भासवणाऱ्या आणि ‘अस्पिरेशनल’ म्हणजे या जाहिरातीतल्या कुणासारखं तरी आपणही असावं, असं वाटायला लावणाऱ्या." जाहिरातींचे स्वरुप वेगाने बदलावे असे वाटत असेल ग्राहकांना स्वत:ला आमूलाग्र बदलावे लागेल तरच त्याचे प्रतिबिंब जाहिरातीतून उमटेल. लिंगभावविषयक समतेची जाणीव समाजात जितकी रुजेल तितकी जाहिरातींच्या स्क्रिप्ट्सना अर्थकारण आणि समाजकारण याचा समन्वय साधायची प्रेरणा मिळेल. यासाठी सर्वप्रथम स्त्रियांना स्वत:मध्ये बदल करावे लागतील. कायम त्यानेच बिल द्यावे, त्याने आपल्याला सुरक्षित ठेवावे, अडचण आली तर त्यानेच पुढे व्हावे, सदैव स्त्री दाक्षिण्य दाखवावे, त्यानेच सांभाळ करावा अशा अपेक्षा लवचिक कराव्या लागतील. अन्यथा यातून जोपासली जाणारी स्त्रियांची परावलंबनाची आणि पुरुषांची स्वामित्वाची भावना आणि त्यातून निर्माण होणारा अहंभाव तसाच राहील आणि तोच जाहिरातीतून वर्षानुवर्षे झळकत राहील. शोभेच्या बाहुलीचे अल्पकाळ कौतुक होते पण तिला सन्मान मिळत नाही. सन्मान मिळवण्यासाठी स्त्रियांना आपले जागे झालेले आत्मभान जोपासत राहावे लागेल. स्त्री सौंदर्य म्हणजे केवळ तिचे शरीर आणि रंगरुपच नव्हे तर तिचा आत्मविश्वास ही नवी व्याख्या या नव्या जाहिराती रुजवू पाहत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी स्त्रियांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. हे जग फक्त स्त्रियांचे किंवा पुरुषांचे नाही, दोघांचे मिळून तयार झालेले आहे हे आपल्या मुलाला आणि मुलीला स्पष्टपणे सांगावे लागेल. याचा अर्थ स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपल्या नात्यातला गोडवा, नजाकत गमवावी असे नाही मात्र रूढ चौकटींना नवे आयाम अवश्य द्यायला हवे तरच जाहिरातींना सुपरवुमनचे उदात्तीकरण सोडून स्त्रीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचा शोध घ्यावासा वाटेल. आपल्या व्यंगचित्रातून नेहमी ’सामान्य माणूस’ रेखाटणार्‍या आर.के.लक्ष्मण यांना ’तुम्ही कधी सर्वसामान्य स्त्रिया का रेखाटत नाही?’ असे एकदा विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले, कारण स्त्रिया असामान्य असतात. समाजात आणि पर्यायाने जाहिरातीत बदल घडवायचा असेल तर स्त्रीला तिच्या असामान्यत्वाचे भान सदैव राखता आले पाहिजे. ते नेमके कसे हे ही कविता अचूकपणे सांगते आहे. (मूळ हिंदी कविता - कवी नीलेश रघुवंशी , मराठी अनुवाद - मोहिनी मोडक)

लावण्यवतींनो

थांबवा तुम्ही सभा-समारंभात मिरवणं

तबकात शाल, श्रीफळ घेऊन

किंवा

दीप प्रज्ज्वलन होईतो 

देखाव्यासारखं नुसतं उभं राहणं

काडेपेटी हातात धरुन ....


नका मंचावर चढत जाऊ

फक्त मानपत्राच्या वाचनापुरतं

नका भासू देऊ

आपलं तिथलं अस्तित्व 

केवळ मोहक आणि प्रेक्षणीय...

 

लावण्यवतींनो

असं एकदा पाहा तर करुन

बदलून जाईल हे जग सारं

बदलून जाईल हे अवघं विश्व


- मोहिनी महेश मोडक

(This article is published in sakal diwali ank 2020 All editions)

Saturday, June 20, 2020

स्क्रोल

मैत्रिणीने खपून केलेल्या एका नव्या, आकर्षक रेसिपीची पोस्ट दिसते. आपण कमेंट करतो- टेम्प्टिंग दिसतेय. कशी केलीस गं! ती सुखावून उत्तर देते - नक्की करुन पाहा. लिंक पाठवते. आपण स्क्रोल करतो. भूक असह्य होऊन थेट झाडाची पानं खायला सुरूवात केलेल्या एका विमनस्क, स्थलांतरित मजुराचा व्हिडिओ दिसतो. शूट करणारी बाई त्याला ’जेवण आणून देते, पानं नको खाऊस’ म्हणत असते. शहारा येतो. शब्द गोठतात. आपण कमेंट करण्याऐवजी नुसती सॅड इमोजी टाकतो. स्क्रोल करत जातो. एक मीम समोर झळकतं. त्यात सलीम अनारकलीला म्हणत असतो- उठ अनारकली, तुला आत्मनिर्भर व्हायचंय.आपण इमेज डाउनलोड करुन घेतो, आणखी कुणाला तरी पाठवून त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायला. आणखी स्क्रोल करतो. वीसवर नेमकी किती शून्य याचा हिशेब न येणार्‍यांच्या तावातावाने लिहिलेल्या पोस्ट वाचून हसतो. मित्रयादीतलं कुणीतरी फेसबुक लाईव्ह येऊन गेलेलं असतं. आपण थोडं पाहतो, पहिली कविता बरी, दुसरी रटाळ आणि अस्थानी वाटू लागते. काहीच कमेंट, प्रतिक्रिया न देता आपणपुढे स्क्रोल करतो. न्यूज चॅनेलच्या पेजवर बातमी दिसते- कोर्ट म्हणतंय- कुणी स्वत: येऊन रुळावर झोपलं तर संभाव्य अपघात टाळणं कोर्टाच्या हातात नाही. रक्तमाखल्या भाकर्‍या डोळ्य़ासमोर येतात. त्याखाली शिवराळ भाषेतल्या शिव्याशापांच्या, सरकारच्या समर्थनातल्या, विरोधातल्या कमेंट्सचा खच पडलेला असतो. ते नको होऊन आपण अजून स्क्रोल करतो. पाच महिन्याच्या कोरोना झालेल्या गोड बाळाला खुळखुळा दाखवणार्‍या पीपीई सूटमधल्या डॉक्टरचा फोटो दिसतो. नकळत आपण लाईक देतो. खालोखाल चार मोठ्या संस्थांच्या सर्वेक्षणानुसार याही परिस्थितीत भारतीय नागरिक जगात सर्वाधिक आशावादी असल्याची पोस्ट वाचून आपल्याला एकदम बरं वाटू लागतं. स्क्रोल करणं बंद करुन आपण मोबाईल बाजूला ठेवतो. कामाला लागतो. असं स्वीच ऑन- स्वीच ऑफ जमलंच पाहिजे असं स्वत:ला बजावतो. आपल्या मनातला स्क्रोल सुरुच राहतो. ऑनलाईन काम बरंच बाकी राहिलेलं असतं. ठरलेला वेबिनार पण अटेंड करायचा असतो. कपबशा सिंकमध्ये तशाच पडून असतात. बीप वाजतो.. व्हॉट्सअ‍ॅपवर मघाची रेसिपी मैत्रिणीने पाठवलेली असते. सोपी वाटते, नाहीतरी मुलांना सारखं काय खायला द्यावं प्रश्नच असतो. पण बेकिंग पावडर शिल्लक आहे ना घरात! भयंकर महत्वाचा प्रश्न पडतो. मनात बॅकस्क्रोल होतं. तो झाडाची पानं खाणारा मजूर दिसतो. अनवाणी चालणारे चिमुकले दिसतात. कुठे कुठे पुरे पडणार आपण ! ते ही इतक्या लांबून ! खूप अपुरी आहे आपण दिलेली मदत आपल्या अवाढव्य लोकसंख्येपुढे. त्यापेक्षा आपण काही दिवस बातम्यांपासून लांब राहायचं ठरवतो. This shall pass soon असे स्वत:ला पुन्हा एकदा सांगतो. मनोविश्लेषकांनी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, परिस्थिती हातात नसली तरी तिला प्रतिसाद कसा द्यायचा ते आपल्या हातात आहे, हे स्वत:ला आणखी एकदा समजावतो. Thank God.. बेकिंग पावडर थोडी का होईना शिल्लक असते. आपण नक्की कसे असतो ? निर्ढावलेले, हतबल की व्यवहारी ! मनातला स्क्रोल संपत नसतो.

Friday, April 10, 2020

दिवे : यांचे - त्यांचे - माझे - आपले


काळोख पडला की सर्वात आधी आपण काय करतो, तर दिवे लावतो. मग तो दिवा वीजेवर चालणारा असेल, ती देवघरातली समई असेल, मोबाईलचा टॉर्च सुद्धा असेल. प्रकाश आपल्याला धीर देतो, त्याच्या उजेडात सगळं स्वच्छ दिसू लागलं की आपण शांत होतो. कोरोनाच्या कभिन्न सावल्या एव्हाना आपल्या देशावरही पडू लागल्या आहेत. सर्व स्तरावर त्या रोखण्याचे निकराने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच आपल्या पंतप्रधानांनी घरासमोर दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं. काहींना प्रतीकात्मकतेपेक्षा आता फक्त कृतीवर भर द्यायला हवाय असं वाटलं तर बहुतेकांनी मात्र या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद दिला. हातावर पोट असलेल्या व्यक्तींपासून उद्योगपती रतन टाटांपर्यंत अनेकांनी मनोभावे दिवा लावला.
दिवा लावायचा होता तो सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी- ती झाली का? नक्कीच. बरेच जण आपापल्या घरासमोर, गॅलरीत येऊन शेजार्‍यापाजार्‍यांशी बोलले, हसले, काही जणांनी घराघरांवर लखलखणारे दिवे आपापल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले. काहींनी सोशल मिडियावर जरा त्रागा केला पण त्यापैकी संकल्पनेला विरोध नसलेल्यांनी दिवे लावले.
दिवा लावायचा होता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी- वैद्यकीय क्षेत्रातले, शासकीय कर्तव्य बजावणारे, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, पोलिस, समाजसेवक, ज्यांच्याकडे दिवा लावायलाच काय चटणीवर घ्यायलाही तेल नाही किंवा लॉकडाऊनमुळे मिळवणं शक्य नाही अशांची काळजी घेणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते.. यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी.
तर दिवे लागले. वरवर सगळं रुटीन चालू असलं तरी कदाचित आपण सगळे जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, अशा वेळी आपण एकटे नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, ही उमेद देऊन गेले.

आता पुढे काय!
सोशल मिडीयावर राजकीय दंभ मिरवत हमरीतुमरीवर येऊन वादावादी करणारे सोफापटू, टाळ्य़ा वाजवण्याऐवजी थाळ्य़ा वाजवत जत्थ्याने मिरवणुका काढणारे थोर लोक, शासकीय आदेश धुडकावून अकारण बाहेर हिंडणारे अतिहुशार नागरिक, छद्म विज्ञानावर आधारित पोस्ट उपरोधिक आहे एवढीही समज नसल्याने ती अभिमानाने फॉरवर्ड करणारे भाबडे जीव, स्वयंघोषित कोरोना तज्ज्ञ- ग्रीड तज्ज्ञ, सामाजिक विलगीकरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय समोर दिसत नसतानासुद्धा लॉकडाऊनमुळे देशाची कशी वाट लागणार आहे याबद्दल घरबसल्या टीका एके टीका करत राहणारे स्वयंप्रकाशित अर्थ तज्ज्ञ.... अशी ज्ञानदीप पाजळणारी बरीच मंडळी सभोवती दिसत असल्याने खंत वाटत असली तरी प्रत्यक्षात माणुसकीने वागणार्‍यांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे पाहून बरं वाटतंय. मग तो गरीब रुग्णाची राहिलेली इच्छा म्हणून त्याला मासे-भात भरवणारा चेन्नईचा डॉक्टर असेल किंवा एखाद्या पालावर अन्नाची पाकिटे वाटणारा अनाम तरुण. स्वयंसेवी संस्थांचे, संघाचे कार्यकर्ते असतील किंवा लंगर मध्ये मुस्लीम बालकांच्या भोजनाची सोय करणारे शीख बांधव. मदत करताना आपल्यालाही लागण होण्याचा धोका पत्करुन, विरुद्ध राजकीय कल, वैचारिक भिन्नता हे सगळं बाजूला ठेवून या जैविक युद्धात आपल्या समाजासोबत ठामपणे उभे असलेले असे निरलस नागरिक प्रत्यक्ष कृतीतून दिवा लावतायत. उजेड पेरतायत.

यात आपल्या परीने आपणही सामील आहोत का?
आपल्या घरच्या मदतनीसांना पगारी रजा देणं, व्यावसायिक असलो तर कर्मचार्‍यांना पगारी रजा देणं किंवा शक्य असेल तिथे घरुन काम करण्य़ाचा पर्याय देणं, जे रोजंदारीविना किंवा आपल्या घरी पोचू न शकल्याने अडकून पडले आहेत त्यांची पोटापाण्याची सोय करणार्‍यांना आर्थिक बळ देणं. इतकं तर प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार करु शकतो ना!
ते ही करुन झालं?
आता आपलं कसं होणार याची चिंता अनेकांना विशेषत: खाजगी उद्योगक्षेत्राला सतावते आहे. नोकरी टिकेल ना! व्यवसाय पुन्हा पहिल्यासारखा उभा होईल ना! अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.
कुटुंबाला वेळ देता येत असल्याच्या नवलाईचं रुपांतर आता रुटीनमध्ये झालंय. लहान घरं असलेल्यांना घरात सतत माणसं असल्याने अडचण होऊ लागली आहे. अशा स्थितीत घरुन काम करणं अवघड व्हायला लागलंय. मनसोक्त आराम करुन झाला, नातलगांशी, जुन्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारुन झाल्यात, आता पुढच्या कॉल मध्ये नव्याने बोलायचं काय असे प्रश्न पडू लागलेत. आवडीचे मेनू चाखून झालेत, राहिलेले सिनेमे, वेब सिरीज पाहून झालेत. खरं तर आता मनोरंजनात जास्त वेळ घालवला की अपराधी वाटायला लागलंय. एकूण वरवर आपण खूष असल्याचं दाखवत असलो, एकमेकांना मीम्स पाठवत असलो तरी आतून आपण घाबरलेलो आहोत. मग वस्तुस्थितीचा स्वीकार करुन कोणालाही दूषणं न देता, येत्या काळाला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का!
त्यासाठी घरात सतत सोबत असलेल्या व्यक्तींमध्ये तणाव वाढू नये यासाठी शब्द जपून वापरायला हवे आहेत. सोशल मिडियावर तावातावात प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याला प्राधान्य द्यायला हवे आहे. काळ कठीण आहे पण अशा वेळीच परिपक्वतेची कसोटी असते. आपण आजवर माणूस म्हणून जसं घडलो आहोत ते योग्य आहे ना हे तपासायची, आपल्या आतला दिवा लख्ख करण्याची ही संधी आहे. नैराश्य वाटत असेल तर ते मान्य करणं ही त्यातून बाहेर पडण्य़ाची पहिली पायरी आहे. एकदा ते कळलं तर संगीत, वाचन, अध्यात्म, सकारात्मक विचार, व्यायाम, कुटुंबासह केलेली एखादी अ‍ॅक्टिव्हिटी, ऑनलाईन समुपदेशकांची मदत अशा पर्यायांच्या साहाय्याने या नकारात्मकतेतून बाहेर पडणं अवघड असलं तरी अशक्य नाही.

कोरोनाने जगाला वेढलं आहे ,या पार्श्वभूमीवर भविष्यात काम करण्याच्या पद्धती, ग्राहकाची मानसिकता, गरजा यात आणि त्यामुळे एकूणच उद्योग-व्यवसायक्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.
या बदलांसाठी आपण तयार आहोत का?
ASK (अ‍ॅटिट्यूड-स्कील- नॉलेज) या त्रयीच्या साथीने प्रगती होते हे सत्य मात्र अद्यापही बदललं नाही मग या उरलेल्या ब्रेकचा उपयोग आपण त्यासाठी नक्कीच करु शकतो. या ब्रेकमध्ये काही नवीन स्कील्स शिकता येतील, एखादा वेगळा विषय नीट समजून घेता येईल, आपले व्यावसायिक संबंध संवादी राहून दृढ करता येतील, अशा काळात साधलेला संवाद अधिक चांगली प्रतिमानिर्मिती करणारा ठरेल. आजवर शिकलेलं रिचवण्यासाठी आणि पचवण्य़ासाठी या वेळेचा वापर करुन आपण स्वत:ची मानसिक आणि बौद्धिक स्थिती सावरु आणि उंचावू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक महत्वाच्या नेत्यांनी कारावासात असताना जागतिक दर्जाची साहित्यनिर्मिती केलेली आहे. आपला तेवढा व्यासंग, आवाका नसला तरी आपल्याच घराच्या चार भिंतीत कैद असल्याने आपल्या वकुबानुसार आपल्या सर्जनशीलतेला वाव नक्कीच देता येईल, उद्योग-व्यवसायातील नव्या कल्पनांवर खोलवर विचार करता येईल. असं म्हणतात व्यावसायिकाने किमान पुढच्या ५ वर्षांचं नियोजन करावं. सध्या पुढचं सगळं इतकं संदिग्ध असताना ते कसं करणार! परवा सॅटर्डे क्लबच्या आमच्या एका ’झूम’ मिटिंग मध्ये वक्ते आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांनी याबाबत छान उदाहरण दिलं. जसं धुक्यात गाडी चालवताना आपण हेडलाईटच्या झोतात अंदाज घेत हळू हळू थोडं पुढे जात राहतो तसंच आपल्याला करावं लागणार आहे. वेगात निघालो तर पुढे दरीही असू शकते. हे सगळं केवळ व्यावसायिकांना नाही तर नोकरी करणार्‍यांना, गृहिणींना, विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. केवळ व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या पलिकडे मोबाईलचा वापर करुन आपण बरंच काही करु, शिकू शकतो हे एव्हाना बहुतेकांच्या लक्षात आलंय. याकडे संधी म्हणून पाहूया. माझंच उदाहरण द्यायचं तर ऑनलाईन ट्रेनिंग देण्याबाबत मी काहीशी निरुत्साही होते. वेबिनार अनेकदा अटेंड केले असले तरी स्वत: शिकवताना प्रत्यक्षात वाटणारी सहजता, थेट संवादातून येणारा नेमकेपणा त्यात नाही असं मला वाटायचं. आता शिकणारे यासाठी मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तयार झाले आहेत मग ऑनलाईन तीच सहजता असणं शक्य असल्याचा प्रकाश डोक्यात पडला आहे.

कोरोनानंतरचा समाज अतिशय वेगळा असू शकेल. त्या समाजाचा भाग म्हणून देखील आपल्याला स्वत:मध्ये बदल करावे लागणार आहेत. भातात एक मटारदाणा घातला तरी आता तो पुलाव वाटतोय, पण सध्या जरी आपण ९० च्या दशकात गेल्यासारखं आणि साधं सोपं जगतोय असं वाटत असलं तरी ही उपरती तात्पुरती आहे हे आपल्याला माहित आहे. लॉकडाऊन संपताच सगळे जण जे काय मिस केलं त्यावर तुटून पडणार आहेत. मी माझ्या पातळीवर यावर नियंत्रण ठेवू शकेन का! फार अर्जंट असं काही नसतं हे कळलंय तर जरा ’माईंडफुलनेस’ कडे लक्ष देऊ शकेन का! भांडी घासणार्‍या पुरुषांवरच्या विनोदांपलिकडे जाऊन बर्‍याच भारतीय पुरुषांना घरकामाला हातभार लावण्याची चांगली सवय लागलीय ती ते जपू शकतील का! विकसीत, विकसीनशील सगळे स्तर भेदून जग आता नाईलाजाने एका पातळीवर आलंय. बदलतंय. मग लॉकडाऊन संपल्यानंतर मी पुन्हा पूर्वीचीच व्यक्ती तर होणार नाही ना! नसेन, तर हे ही दिवा लावणंच आहे.

https://www.esakal.com/blog/mohini-modak-article-about-corona-279022

Sunday, February 9, 2020

अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा - शेगाव

महाप्रसाद वितरण


शेगावच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाने Industry Institute Meet #IIM20 चं आयोजन केलं होतं. प्रशस्त, सर्व सुविधायुक्त इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि कुशल प्राध्यापकवर्ग यामुळे या संस्थेनं चांगलं नाव कमावलं आहे. या आधीही काही ना काही निमित्ताने माझं या महाविद्यालयात जाणं झालंय परंतु यावेळेस ’मीट’च्या आयोजनाचा भाग म्हणून निमंत्रितांना शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानची ’अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा’ बघण्याची संधी मिळाली. तिथे जायला एरवी परवानगी नसते.

महाविद्यालय असो की दवाखाना, मंदिर परिसर असो की भक्तनिवास, संस्थानच्या प्रत्येक प्रकल्पाप्रमाणेच ही पाकशाळा उत्कृष्ट असणार हे गृहीत धरलं होतं. संस्थानच्या सर्व प्रकल्पातले सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी आणि दर्शनार्थी मिळून दररोज तब्बल पन्नास हजार लोकांसाठी नाश्ता आणि दिवसाचे तसेच रात्रीचे भोजन (महाप्रसाद) या एकाच पाकशाळेतून पुरवलं जातं. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सकाळी आणि संध्याकाळी केवळ २ तासात हे काम पूर्ण होतं.
SAP चा वापर करणारं माझ्या माहितीत तरी हे एकमेव धार्मिक संस्थान आहे. गुणवत्तेची आयएसओ प्रमाणपत्र कुठे टांगलेली दिसत नाहीत पण झाडा-निसर्गाच्या सान्निध्यातल्या या विविध महाकाय प्रकल्पातल्या कोणत्याही रस्त्यावर एका पानाचाही कचरा किंवा अव्यवस्था दिसत नाही. काटेकोरपणाचं उदाहरण द्यायचं तर पाकशाळेच्या आवारात तयार अन्नाचे कंटेनर घेऊन जाण्यासाठी उभ्या असलेल्या गाड्यांचे ऑईल वगैरे गळले तर परिसर खराब होऊ नये म्हणून प्रत्येक गाडीच्या इंजिनखाली ट्रे ठेवलेले होते. भव्य पाकशाळेत प्रवेश करताना बाहेर ठेवलेल्या सपाता घालणे अनिवार्य होते. केस झाकलेले, स्वच्छ गणवेशातले कर्मचारी आपापली कामे शिस्तबद्ध पद्धतीने करत होते. सेंट्रल पाईपलाईन मधून गॅसची नळी प्रत्येक पाक-यंत्राला जोडलेली होती. आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या भोजनाची, पन्नास हजार माणसांच्या क्षुधाशांतीची तयारी सुरु होती.
एकाच वेळी शिर्यासाठी रवा भाजला जात होता, जिलब्या पाकात पडत होत्या, मोठ्य़ा फ्रीजच्या आकाराची इडलीपात्रं वाफाळत होती, तूप लावलेल्या शेकडो पोळ्या यंत्राद्वारे झपाझप तयार होत होत्या, प्रचंड आकाराच्या कुकरमध्ये भात शिजत होता, कढी, डाळभाजी मोठाल्या यांत्रिक कढयांमधून ढवळली जात होती. या सगळ्य़ाला एका वेळी लागणारे मसाले, शिधा मोजून पाकीटांमधून त्या त्या पदार्थाच्या नावाच्या कप्प्यात रचलेले होते. त्यामुळे तिखट, मीठ कमी जास्त होण्याचा प्रश्नच नाही.

कायझनमधील ’प्लेस फॉर एव्हरीथिंग- एव्हरिथिंग इन प्लेस’ हे तत्त्व इथे अचूक वापरलं जातं. प्रसादाचे लाडू यंत्राद्वारे कागदात पॅक केले जात होते. तयार अन्न ठेवण्य़ासाठी लागणारे स्टीलचे मोठाले कंटेनर पूर्णपणे निर्जंतुक केले जात होते. संपूर्ण प्लांट मध्ये कुठेही तेलाचा डाग, खरकटे नावालाही नाही, कुठेही सांडलवंड नाही. तिथे तयार होणारे भोजन सेवणारी व्यक्ती कुणी का असेना, सर्वांना सारखं, उत्तम दर्जाचं, आरोग्यपूर्ण अन्न मिळालं पाहिजे याकडे व्यवस्थेचा कटाक्ष आहे.
यंत्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवान उत्पादन, काही पाकक्रियांसाठी ऑटोमेशनचा वापर, तयार अन्नाची डीजिटल फूड लॅबद्वारे तपासणी असे इंडस्ट्री २.०, इंडस्ट्री ३.० आणि अल्प प्रमाणात ४.० तिथे एकाच वेळी पाहायला मिळालं. माणूस आणि यंत्रांचा सतत संबंध येत असल्याने कर्मचार्यांच्या सुरक्षिततेची आणि साधनसामग्रीचा अपव्यय होणार नाही याची किती काळजी घेतली जाते हे बघता आलं. भाज्या धुणे, बटाटे सोलणे यासारख्या कामांसाठी यंत्रांचा वापर होत असला तरी भाज्यांमध्ये अळ्या/कीड असू शकते हे लक्षात घेऊन त्या चिरण्यासाठी मात्र महिला कर्मचारी होत्या. भजनं गुणगुणत त्यांची कामं सुरु होती. स्वच्छ केलेल्या भाज्या हारीने लावून ठेवलेल्या होत्या. हा विभाग मुख्य पाकशाळेपासून वेगळा होता. "अन्नं ब्रह्मेति व्यजानात्" अर्थात अन्न हेच ब्रह्म आहे या भावनेतून पाकशाळेचं संपूर्ण काम सुरु आहे.
तळघरांमध्ये सोन्याचांदीच्या राशी रचण्याऐवजी लोकांचा (देणगीचा) पैसा पूर्णपणे लोकांसाठी वापरला जावा हा संस्थानचा उद्देश आहे. त्यातूनच संस्थान वेगवेगळे समाजोपयोगी प्रकल्प पारदर्शक पद्धतीने चालवतं. ’योजक: तत्र दुर्लभ’ परंतु इथे मात्र तसं नाही. प्रकल्पातल्या प्रत्येक कामाच्या नियोजनाला वेळ लागला तरी चालेल पण एकदा का ते कृतीत आलं की ते परिपूर्ण असावं याबाबत व्यवस्थापन आग्रही असल्याचं सोबतच्या प्राध्यापकांनी आवर्जून सांगितलं.

खरं तर ’डिस्कव्हरी’ वरच्या मालिकेत याहून अत्याधुनिक फूड प्रोसेसिंगच्या चित्रफीती आपण नेहमी पाहतो तरीही कोणताही व्यावसायिक हेतू नसूनही अतिशय व्यावसायिक पद्धतीने, प्रसिद्धीपासून दूर, निस्वार्थ भावनेने, एका लहानशा गावात इतक्या मोठ्य़ा स्केलवर केलं जाणारं हे काम पाहून भारावून जायला होतं. दर्शनासाठी वेगवेगळ्या किंमतीच्या रांगा, देवस्थानातली अस्वच्छता, व्यवस्थापनातली अनागोंदी किंवा एकूणच अध्यात्माचा बाजार पाहून व्यथित झालेलं मन असे नंदादीप आजही शांतपणे अव्याहत तेवत आहेत हे पाहून खरोखर निवतं.