किराणा दुकानात जाणे हा विनोदाचा विषय होईल असं कधी वाटलं होतं का! पण झालाय. हजार स्क्वे. फुटाहून मोठ्या किराणा दुकानात आता वाईन मिळणार म्हटल्यावर समाजात तीन गट पडले आहेत. पहिला गट विरोधकांचा, दुसरा विवि म्हणजे विरोधकांच्या विरोधकांचा (कारण दारुचं समर्थन कसं करणार!) आणि तिसरा बिनबुडाचा म्हणजे निर्णय कोणत्या सरकारने घेतला यावरून पहिल्या किंवा दुसर्या गटाची री ओढणार्यांचा. त्यामुळे तिसर्या गटाला बाजूला ठेवून आपण या प्रकरणाकडे पाहूया. विवि म्हणतात- "वाईन ही दारु नव्हे, ती पिऊन कुणी झिंगून पडत नाही. ते महागडं उच्चभ्रूंचं पेय आहे, सर्वसामान्यांना त्याने ढिम्म फरक पडत नाही. दारुशिवाय इतर प्रश्न जास्त महत्वाचे आहेत, ते आधी सोडवा" वगैरे वगैरे..
बरं! पण महत्वाच्या आणि मुलभूत गरजांपेक्षा वर्षाला साधारण ५०० कोटी रू. दारूवर खर्च करणारा महाराष्ट्र पाहिला, खेड्यापासून महानगरांपर्यंत भरभरुन वाहणारे गुत्ते आणि बार पाहिले, ’संध्याकाळी बसूया’ हेच जीवितकार्य समजणारे कित्येक निरुद्द्योगी तरुण पाहिले आणि व्यसनमुक्ती आणि दारुबंदीसाठी वर्षानुवर्षे लढणार्या कार्यकर्त्यांशी बोललं, तर हा किती महत्वाचा प्रश्न आहे ते सहज लक्षात येईल. अपघात, अत्याचार, गुन्हेगारीच्या बहुसंख्य घटनांमागे दारूने सटकलेलं डोकं कारणीभूत असतं हे कुणाला अमान्य नसावं.
मात्र विविंच्या मते "मुदलात वाईन दारू नाहीच. वाईन म्हणजे फळांचा रस किंवा ’तुमचं’ द्राक्षासव" मग सरळ तुलनेने स्वस्त आणि पोषक ज्यूस प्यायचा सोडून लोक उगाचच महागड्या वाईन का बरं पीत असतील! कारण फळांच्या रसापलीकडचं काहीतरी म्हणजेच अल्कोहोल नामक चटक लावणारं प्रकरण त्यात आहे. पण यांच्या मते- "दारु म्हणजे व्हिस्की किंवा रम सारखं हार्ड ड्रींक, ज्यात ४०-५० टक्के अल्कोहोल असतं. वाईन मध्ये फक्त ५ ते १५ टक्के अल्कोहोल असल्यावर त्यामुळे नशा कशी येईल!"
यांना इतकंच सांगावसं वाटतं की बीयर, वाईन ही दारुच्या व्यसनाकडे नेणारी पहिली पायरी आहे. तिथेच थांबणारे आस्वादक संयमवीर किंवा वीरांगना मोजक्याच. आपली सुरुवात अशाच पेयांनी आणि गंमत, कुतूहल, पीअर प्रेशर, स्टाईल, क्रेझ वगैरे कारणांनी झाल्याचे बहुसंख्य हार्ड ड्रिंक घेणार्यांना मान्य असते. एरवी एकदा का त्यातलं अल्कोहोल खेचू लागलं की त्याची ठराविक पातळी राखल्याविना त्या माणसाची तगमग होऊ लागते. बिचारी वाईन त्या पातळीपर्यंत न्यायला पुरी पडत नाही, पडली तर परवडत नाही त्यामुळे एकच प्याला ऐवजी हार्ड ड्रिंकचा दुसरा, तिसरा प्याला रिचवला जातो. कालांतराने प्याले मोजायच्या अवस्थेत ती व्यक्ती राहत नाही. यानंतर मद्यपीसह संबंधित व्यक्तींना जे आर्थिक, शारीरिक, मानसिक परिणाम भोगावे लागतात त्यापेक्षा समाजातले इतर प्रश्न कसे मह्त्वाचे आहेत वगैरे पळवाटा काढून काही साध्य होणार नाही. त्याने दारू घातक असते हे सत्य बदलणार नाही.
अनेक विदेशी संस्कृतींमध्ये विशेषत: थंड हवेच्या प्रदेशात मेहमानोंका स्वागत वाईनने करण्याचा रिवाज आहे. वर्षातले १०-११ महिने उन्हाने त्रासलेल्या आपल्या विकसनशील देशात असा रिवाज नाही. मूठभर ग्लोबल मंडळींची ती वैयक्तिक आवड असली तरी आपली (एक दोन राज्य वगळता) भौगोलिक किंवा (बहुराष्ट्रीय कंपनी, आतिथ्य-पर्यटन व्यवसायासारखे) अपवाद वगळता सामाजिक निकडही नाही. आपल्याकडे मेहमानोंका स्वागत गुटख्याने करायला बंदी असताना वाईनला स्वागताची तोरणं लावली जातायत हा विरोधाभास का ! गुटखा खाण्याचे प्रमाण शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढायला लागल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. याचा अर्थ एखाद्या हानीकारक उत्पादनाच्या सहज उपलब्धतेमुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता वाढते हे शासनाला मान्य आहे. मग वाईनची उपलब्धता वाढवताना हे भान कुठे गडप झालं असावं?
अरे हो, हे सगळं शेतकर्यांच्या फायद्यासाठी चाललंय, नाही का! कसं ते मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांचा फायदा करायचा असेल, तर फळं, द्राक्षाला हमी भाव जाहीर करावा. आवश्यकतेनुसार पाणी, वीज उपलब्ध करून द्यावी. प्रत्यक्षात सरकार कोणतंही असो, बहुतेक वेळा लॉबींगमुळे उत्पादकाऐवजी प्रक्रिया व विक्री करणार्यांच्या हितालाच प्राधान्य दिलं गेलं आहे. हे कमी की काय म्हणून आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरचं उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आलं आहे. मद्य स्वस्त म्हणजे विक्री जास्त. प्या लेको, करा चैन!
विंदा म्हणतात तसं
'औचित्याच्या फोल विवेका! जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने'
ही जनतेची अवस्था होईनाका, सरकारला 100 कोटी ऐवजी दुप्पट महसूल मिळणार. कोरोनामुळे तिजोरीवर आलेला ताण कमी करण्याचे हे खरंच किती नामी उपाय आहेत. गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा हवाला देत सत्तेवर येणारं सरकारच ते अंमलात आणणार असेल तर दारुमुळे उद्ध्वस्त होणार्या कुटुंबांनी दाद कुठे मागायची!
याचा अर्थ दारू पिणारे सगळे लोक दुर्जन वगैरे असतात असा नव्हे, सगळेच ’दारुडे’ सुद्धा नसतात. आपल्या आनंदासाठी मर्यादित प्रमाणात वाईनसह विविध प्रकारच्या दारूचा नियमित किंवा प्रासंगिक आस्वाद घेणारे मोजके चोखंदळ रसिक समाजात आहेत. अर्थात नियमित पिण्याने होणारी आरोग्यहानी ती व्यक्ती टाळू शकत नाहीच पण त्यांना काही सांगायला जावं तर ते ’हाय कंबख्त तूने पी ही नही !’ म्हणणार.
दुसर्या बाजूला अत्यंत विकल मनोवस्थेमुळे कुणी दारू पीत असेल किंवा ज्या कामाची पांढरपेशा समाज कल्पनाही करू शकत नाही असे काम करावे लागण्याच्या अपरिहार्यतेमुळे किंवा असह्य शारीरिक दमणुकीमुळे एखादा मजूर दारु पीत असेल तेव्हा त्याला नैतिकतेचे डोस पाजायचा आपल्याला निश्चितच अधिकार नाही. परंतु कोणत्याही प्रकारच्या अपेयपानाला कुणी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न करत असेल तर त्यांना जाब विचारायचा अधिकार नक्कीच आहे.
वाईन /दारू या आधी मिळत नव्हती का, होती. आहेत की त्यासाठी मुबलक खास दुकानं. पण ’त्या’ दुकानात जाऊन डॉक्टर ब्रँडी घेतानाही लाजणारा एक वर्ग आहे. त्यांची भीड चेपावी आणि नवे ग्राहक निर्माण व्हावे अशी आता सरकारची अपेक्षा असल्याने तिकडे अडकून पडलेल्या वाईनला मुक्त द्वार देण्यात आलं असावं. जोवर एखाद्याच्या पिण्यामुळे संबंधितांना, समाजाला काही त्रास होत नाही तोवर ते त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. परंतु ती व्यक्ती देखील आपल्या घरातल्या लहान मुलांना पेला ’ऑफर’ करणार नाही. अगदी (दारूच नसलेल्या!) वाईनचा सुद्धा! याचाच अर्थ समज येईपर्यंत अशा पेयांपासून मुलांनी दूर राहावे अशी गरीब-श्रीमंत, अजाण-सुजाण, पिणार्या- न पिणार्या सगळ्याच पालकांची धडपड असते.
तरीही किराणा दुकानात एखाद्या सरबताच्या बाटलीसारखी वाईन सहज उपलब्ध करणे हा तिला सहज- स्वीकृती मिळावी म्हणून आधी राजमान्यता आणि पाठोपाठ समाजमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. यातून कोवळ्या पिढीला नकळत दिला जाणारा ’इट्स ओके टू ड्रिंक’ हा संदेश गंभीर आहे. हे न्यू नॉर्मल एक प्रकारचं स्लो पॉयझनींग आहे. आधीच बदलत्या काळाने पालकांसमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. त्यात आता पालकांबरोबर मॉलमध्ये खरेदीला आलेल्या लहान मुलांनी या रंगीत बाटली कडे बोट दाखवून कुतूहल व्यक्त केले तर पालकांनी नेमकं काय उत्तर देणं अपेक्षित आहे याविषयीही सरकारने पालकांचं प्रबोधन करावं.
समाज म्हणजे सिनेमा नव्हे जिथे बारीक अक्षरात ’दारु पिणे हानीकारक आहे’ अशी तळटीप देऊन टाकली की ’चार बोतल व्होडका काम मेरा रोजका’ किंवा ’अभी तो पार्टी शुरु हुई है’ म्हणत पडद्यावर हवा तो धिंगाणा घालायची मोकळीक मिळते. तेव्हा याविरोधात विवेकी कृती करुया. कितीही अहितकारक निर्णय लादले गेले तरी पालक म्हणून मुलांना त्याच्या परिणामांचे भान देत राहूया. वाईन उपलब्ध असलेल्या किराणा दुकानात खरेदी करणे टाळूया. या काळ्य़ा ढगाला रुपेरी किनार म्हणजे काही व्यापारी संघटनांनी आपल्या सभासदांना स्वत:च्या प्रतिष्ठानात वाईन विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. कोवळ्या मुलांसह अवघ्या समाजाला आकर्षित करू पाहणार्या आणि चोरपावलांनी व्यसनाच्या वाटेवर नेऊ पाहणाऱ्या या न्यू नॉर्मलच्या निषेधाचा स्वर इतका तीव्र करूया की त्यापुढे ’चीअर्स’चे आवाज क्षीण व्हावे.
Published in Divya Marathi Madhurima 9Feb
No comments:
Post a Comment