Thursday, January 1, 2026

मुलाखत - मा. तारा भवाळकर


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रख्यात त्रैमासिक ’दौत लेखणी’ साठी मी घेतलेली , ज्येष्ठ सहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत. 

( डॉ. तारा भवाळकर या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक. त्यांनी नाट्यविषयक संशोधन, लेखन तसंच स्त्री जाणिवांचा वेध घेणारंही विपुल लेखन केलं आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन हा त्यांचा ध्यास आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश तसंच मराठी ग्रंथकोश या कार्यात त्यांचं विशेष योगदान आहे. )
पूर्वअनुमती घेऊन ताराताईंशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांनी मोकळेपणाने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

------------------------------------------ 

प्रश्न : अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बहुतेक वेळी वादग्रस्त ठरते. सोशल मिडियावर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. तुम्ही लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहात. बहुविध क्षेत्रात तुम्ही मौलिक संशोधन आणि लेखन कार्य केलेलं आहे. साहित्यक्षेत्रात तुम्हाला सन्मानाचं स्थान आहे. या पातळीवरून बघताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं ? 

मा. तारा भवाळकर : पूर्वी संमेलनाध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक पद्धत होती. इच्छुक लोकांनी अर्ज करायचे आणि मग साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ज्याला अधिक मतं मिळतील त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करत. नंतर अशी राजकीय पद्धतीने निवडणूक घेण्याऐवजी अध्यक्षांची निवड सन्मानाने व्हावी व जाणकार लोकांनी ती करावी हा विचार पुढे आला. साहित्य महामंडळाने, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी एकत्र येऊन अध्यक्ष निश्चित करायचा अशी पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. माझ्या मते ही पद्धत जास्त योग्य आहे. इंग्रजीत सांगायचे तर ’इलेक्शन पेक्षा सिलेक्शन’ किंवा ’निवडणुकीपेक्षा निवड’ ही अधिक सन्मानाची आहे कारण मागून मिळवणं हे कलावंत किंवा साहित्यिकाच्या दृष्टीने फारसं स्पृहणीय नाही. 

तशी प्रक्रिया सुरू झाली म्हणून मी अध्यक्ष होऊ शकले. निवडणुकीला उभं राहून मत मागायची पद्धत असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते कारण साहित्यिकांनी /कलावंतांनी अर्ज करून काही मिळवणं, याच्या मी विरोधात आहे. 

माझी निवड झाल्यानंतर विरोधाचे सूर माझ्यापर्यंत तरी पोचलेले नाहीत. साहित्य महामंडळासह, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांच्या पाठिंब्याने माझी एकमताने निवड झाली , त्यांच्या अध्यक्षांची मला रीतसर पत्र आली त्यामुळे मी ते अध्यक्षपद स्वीकारलं. माझ्यासाठी हा आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावरचा एक अपघात होता. 😊

मला हे अनपेक्षित होतं कारण मी कोणत्याही गटातटात नव्हते. ती माझी प्रवृत्ती नाही आणि मला तेवढी उसंतही मिळाली नाही. अध्यक्षपद मिळाल्याने अगदी आनंदाने उड्या माराव्या असं  वाटलं नाही पण खोटं का बोला, आयुष्याच्या या टोकाला आल्यावर एवढे लोक आपल्याला लक्षात ठेवतायत याचं मला समाधान नक्कीच वाटलं. त्याबद्दल मी या क्षेत्राची कृतज्ञ आहे.  

-------------------------------------------

प्रश्न :  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात तुमच्यासह अवघ्या सहा लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामागे काय कारण असावं? ताकदीने लिहिणार्‍या लेखिका कमी आहेत की हा भेदभाव आहे की हे नकळतपणे, निर्हेतुकपणे घडलं असावं ! 

मा. तारा भवाळकर : 

आपली सगळी व्यवस्था पुरूषप्रधान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ’मेल डॉमीनेटींग सोसायटी’ आहे. स्त्रियांचं साहित्यक्षेत्रातलं काम मुळीच कमी नाही , मी तर म्हणेन अगदी लोकपरंपरेतल्या स्त्रिया सुद्धा अधिक सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या होत्या, आहेत आणि त्याच्याबद्दल मी पुष्कळदा बोलले आहे, लिहिलं आहे. त्यामुळे स्त्रिया कमी पडतात असं नाही, त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदच काय, मला कोणत्याही गावातून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची पत्रिका आली की त्यात हेच दिसतं म्हणजे अगदी स्त्रियांच्याच संस्था वगळल्या तर एकूणच औषधाला आपली एखादी स्त्री असते. ते ही नाव सगळ्यात शेवटी, प्रतिनिधी म्हणून. कुटुंबव्यवस्थेत सुद्धा स्त्रियांचा निर्मितीत मोठा सहभाग असतो पण त्यांना पदं देताना ही प्रवृत्ती दिसते. बायका शिकल्या सवरल्यात त्यामुळे एखादं तरी नाव असायला हवं म्हणून असतं, फारतर सल्लागार समितीत एखाददुसरं नाव असतं. स्त्रियांकडे गौणत्वाने पाहाणं इतकं नेहमीचं आहे. त्या काही बरं करू शकतात हे स्वीकारणं अवघड असल्याने अध्यक्षपदीही स्त्रियांची नावं कमीच दिसतात. बायका आपल्या नावाचा आपणहून आग्रह धरत नाहीत.

आता इंदिरा संतांचंच उदाहरण घ्या. त्यावेळी निवडणूक पद्धत होती. त्या काही स्वत: अर्ज भरणार्‍यांपैकी नव्हत्या. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी अर्ज भरला पण ऐनवेळी त्यांना डावललं गेलं. बोलेल त्यांचे चणे विकले जातात, न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही. स्वत:हून पुढे येऊन एकतर स्त्रिया बोलत नाहीत आणि बोलल्याच तरी त्यांची बर्‍याचदा उपेक्षा केली जाते. 

प्रश्न : मग आता लायक लेखिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळी अ.भा. संमेलनं असावीत का? किंवा काय पर्याय असावा? 

मा. तारा भवाळकर : 

वेगळी संमेलनं तर मला अजिबात मान्य नाहीत. अशा संमेलनांना मी हळदीकुंकवाचे कार्यक्रम म्हणते. राजकीय पक्षांच्या स्त्री संघटनांचे कार्यक्रम म्हणजे साड्या वाटणं, पैसे वाटणं, ते संमेलन नाही. अर्थात स्त्रियांची स्वत:ची भगिनी मंडळं, महिला मंडळं साहित्यविषयक असे काही कार्यक्रम घेत असत ,घेतात पण अ. भा. स्तरावर महिलांची वेगळी आघाडी असावी हे मला मान्य नाही. आपला समाज जर लोकशाहीवादी असेल तर त्यात प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतंत्र स्थान आणि अधिकार आहे, त्यासाठी स्त्री ही व्यक्ती आहे हे आधी मान्य केलं पाहिजे. सरस नीरस ठरवण्याच्या स्पर्धेत तिला स्थान असावं पण राखीव जागा नको. अर्थात हे माझं मत आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतर कुणाचं मत वेगळं असूच शकतं.

--------------------------------------

प्रश्न : तुम्ही अध्यक्षपदी असलेल्या साहित्य संमेलनाच्या तुमच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख नव्हता यावर काहींनी टीका केली. भाषणातल्या काही मुद्द्यांची  प्रशंसा झाली. — या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं पाहाता? 

मा. तारा भवाळकर : 

तटस्थपणे, कारण समाजामध्ये सर्व गोष्टी सर्वांना कायम मान्य होतातच असं नाही. मी कुणाचाही अवमान केला नाही. त्यांच्या पदांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. भारताचे सन्माननीय पंतप्रधान /राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. माझं भाषण माझ्या शब्दात यूट्यूब वर पण आहे आणि लिखित स्वरूपात संमेलनात ते प्रसिद्ध झालं आले तेव्हा कोणीही हे शब्द तिथे बघू शकतात. राज्याचे सांकृतिक प्रतिनीधी म्हणून आलेल्या पूर्वपरिचयातील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ही टीका झाली असावी. लोकभाषेत सांगायचं तर लोक रस्त्याच्या मधून चाललं तरी नावं ठेवतात आणि कडेकडेने चाललं तरी नाव ठेवतात. सरळ चाललं तर धट, वाकडं चाललं तर अवलक्षण. मी सरळ चालणारी आहे. शिवाय तिथे भाषण करायचंय याची मला कल्पना नव्हती, ८७ वर्षाच्या बाईकडून जो उल्लेख झाला ,खरं तर सन्मानपूर्वकच, कारण जाणीवपूर्वक नावाचा उल्लेख करणं किंवा न करणं हे मनातही नव्हतं, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तरीही समाजात सर्व प्रकारची माणसं असतात, कुणाला काही गोष्टी पटल्या असतील कुणाला नसतील, त्यांचं ते स्वातंत्र्य मी मान्य केलंय. प्रशंसेबद्दल स्वाभाविकपणे आनंद वाटला. समाधान वाटलं. 

----------------------------

प्रश्न : साहित्य संमेलनाध्यक्षाची भूमिका तुमच्या मते नेमकी काय असते? त्यांच्याकडून साहित्यक्षेत्रातून सर्जनशील नेतृत्वाचीही अपेक्षा असते का? हे पद फक्त अडीच दिवसाचं उत्सवमूर्तीपद म्हणजेच औपचारिक प्रतिष्ठेचं आहे की त्यात खऱ्या अर्थाने काही बदल घडवण्याची क्षमता असते?

मा. तारा भवाळकर : 

साहित्य संमेलनाध्यक्षाला कुठलेही वैधानिक म्हणजे कायदेशीर अधिकार नाहीत. साहित्य संमेलनात कार्यक्रम काय ठेवावे, समजा एखादा परिसंवाद ठेवायचा झाला तर कुठल्या विषयावर ठेवावा,  कुठल्या वक्त्यांना ,कवींना बोलवावं हे अधिकार अध्यक्षाला नाहीत. आता हे ही अधिकार नसतील तर एका वर्षाच्या कारकीर्दीत तो काय काय करणार ! बरं, यासाठी कोणतंही बजेट किंवा अर्थसाहाय्य नसतं. अर्थात संमेलनासाठी त्यांनी माझी व्यवस्था केली, अगदी सन्मानाने केली. मुळात साहित्यक्षेत्रात पन्नास साठ वर्ष घालवलेल्या माणसाने त्या एका वर्षात काय करावं ! 

परंतु साहित्यविषयक आस्था निर्माण होईल असं वातावरण त्या काळामध्ये नक्कीच निर्माण होतं. चार माणसांच्या गाठीभेटी होतात. भाषणं होतात, मुलाखती होतात. यानिमित्ताने माझी भूमिका मला मांडता आली. वयोमान आणि प्रकृतीमुळे माझ्याच्याने प्रवास फार झाला नाही पण ज्यांना आस्था वाटली ते लोक माझ्या घरी आले, माध्यमांनी मुलाखती घेतल्या, विविध संस्थांनी भाई वैद्य, विखे पाटील असे मोठमोठे पुरस्कार घरी येऊन दिले. हा सन्मान मराठी साहित्य विश्वाने मला दिला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य माणसांनी दिला. याबद्दल कृतज्ञ आहे. 

आमच्या भागातील सर्व, अगदी सर्व, राजकीय, सामाजिक विचारधारांची मंडळी माझ्या घरी येऊन आदरपूर्वक भेटून गेली. समाजाच्या सर्व स्तरांमधल्या मंडळींनी, आमच्याकडच्या शेतकरी आणि कामगार संघटना, रोटरी सारख्या संस्था, वाचनालयं, प्रशासकीय संस्था, स्वच्छता कामगारांपासून कलेक्टर आणि आमचे पालकमंत्री सगळ्यांनी येऊन भेट घेतली. आत्ताच अबुधाबीच्या लोकांनी माझा व्हिडिओ केला कारण राज्यातच नव्हे देशविदेशात माझं भाषण पोचलं आहे. लंडनहून माझ्यासाठी एक काम आलं आहे, अमेरिकेहून फोन येऊन गेला. माध्यमांमुळे जगाच्या पाठीवर पोचता आलं. 

मी प्राथमिक स्तरापासून परदेशी विद्यापीठापर्यंत शिकवण्याचं काम केलेली एक शिक्षिका आहे. नोकरीच्या काळात पदं येतात आणि जातात पण मुळात मी मास्तर आहे, आता तुझ्यासमोरही मी मास्तरकीच करतेय 😊 

अनेक लायक व्यक्ती आहेत, होऊन गेल्यात याची जाणीव आहे. मी ज्यांना मानते ते लक्ष्मणशास्त्री जोशी. तेव्हा आजची माध्यमं नव्हती पण त्यांच्या ग्रंथांमधून ती माणसं आजही मार्गदर्शन करत असतात. 

-----------------------

प्रश्न - अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या अध्यक्ष म्हणून संमेलनाचं सूप वाजल्यापासूनचा प्रवास तुम्ही सांगितलात. याशिवाय एकूण प्रवास कसा होता !

मा. तारा भवाळकर : 

मी आयुष्यात काहीही ठरवून केलं नाही. किंवा तो आळस असेल. आयुष्याला प्रामाणिकपणे सामोरी गेले, अध्यक्षपदाला सुद्धा. लेखनही मी ठरवून केलं नाही. त्या त्या वेळेला लेखनात काही विषयात रमले, जेव्हा रमावंसं वाटलं नाही तेव्हा सोडून दिलं, मग मागे वळून पाहिलं नाही. उदा: लोकांनी मला लोकसाहित्याच्या गाठोड्यात बांधलं आहे पण माझा प्रेमाचा ,आस्थेचा विषय आहे नाटक. नाट्यविषयक वाचन, नाटक शिकवणं, १४ वर्ष अभिनय केला, पुरस्कार मिळवले, नाट्यसंस्था स्थापली, नाटकं बसवली, चर्चा केल्या, नाट्यलेखन केलं, नाट्यस्पर्धा घेतल्या. भालबा केळकरांच्या पीडीए च्या चालीवर सांगलीला एडीए स्थापन केली.अजूनही कार्यकर्ते त्याचं काम करतात. त्यात मी कृतीशील कार्य केलं, सर्व स्तरांवर. तेव्हा मी प्राध्यापक होते, प्राध्यापकाच्या आयुष्यात पीएचडी नावाचं प्रकरण येतं. सांगलीत होते. त्यानिमित्ताने विष्णुदास भावे पहिले नाटककार, त्यांनी नाटक केलं म्हणजे काय केलं या कुतूहलातून मी वाचत गेले. लोकांशी बोलत गेले. तेव्हा यांच्या नाटकांवर बरेच आक्षेप होते, ते यक्षगानातून आलं, गोव्यातून आलं इ..... शोधत गेले. 

७५ मध्ये अभिनयाचं रौप्यपदक मिळाल्यावर मी नाटक सोडलं, सूत्र सोपवली. कार्यकर्ते आजही संपर्कात आहेत पण त्यांच्यात ढवळाढवळ करत नाही. सहसा खुर्च्या सोडवत नाहीत पण मला खुर्चीत बसायला आवडत नाही. शिकवणं ..खडू, फळा, विद्यार्थी हा माझा आनंदाचा भाग होता. पदाची अपेक्षा नव्हती. म्हणून प्राचार्यपद नाकारलं. आता पाठ दुखते म्हणून खुर्ची लागते 😊

सुरूवातीला लागले ती शारीरिक शिक्षणाची शिक्षिका म्हणून. हा कोर्स केला होता त्यामुळे हल्लीच्या भाषेत पीटी टीचर म्हणून नोकरी करत करत बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून महाविद्यालयाच्या परीक्षा देत होते. पदव्या बदलत गेल्या त्यानुसार नोकरी बदलत गेली. त्यामुळे शब्दश: ग्राऊंड लेव्हलपासून एम ए पीएचडी मार्गदर्शक पदापर्यंत सर्व स्तरावर शिकवत गेले. एरिझोना स्टेट विद्यापीठातही गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवलं. या सगळ्याची अपूर्वाई न वाटता कर्तव्याचा भाग वाटला. 

विष्णुदासांच्या, संशोधनाच्या निमित्ताने बराच प्रवास केला, दक्षिण हिंडले. कोकणात दशावतार, कर्नाटकात यक्षगान, भोसल्यांची नाटकं... उसना बॉक्स कॅमेरा घेऊन तिकीट काढून हिंडत दक्षिणेत सर्व लोककलांचा अभ्यास केला. आताच्या भाषेत प्रयोगसिद्ध लोककलेचा. त्यातून अभिजात नाटक घडत गेलं आहे. माझा जन्म ऐशी वर्षापूर्वीच्या शेतकरी कुटुंबात, खेडयातल्या एकत्र कुटुंबात त्यामुळे ग्रामीण संस्कृती,दळण, कांडण, गाणी हे लोकजीवन जवळून पाहिलं. यातून मी घडत आले. 

मोठेपणी आपण सैद्धांतिक अभ्यास करतो तेव्हा ही जी सामग्री जमा झालेली असते त्याचे अर्थ लागतात. प्रॅक्टीकल आधी मग थेअरी. नाटकाच्या उगमाची मीमांसा हा माझ्या प्रबंधाचा विषय, त्याला मिळालेला पुरस्कार, माझं संशोधन हे सगळं नाटकाशी संबंधित आहे. नाट्य हा संस्कृतीचा मोठा भाग आहे, लोकसंकृती ही काही वेगळी आहे असं मला वाटत नाही, नाटकातून मी त्याचा सैद्धांतिक अभ्यास केला. त्यासाठी चांगलं अनौपचारिक मार्गदर्शक मिळत गेलं.

--------------------------------

प्रश्न : संमेलनाध्यक्षपदावरून तुम्ही साहित्यिक स्वायत्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी याकडे कसं पाहता ? साहित्यामध्ये समाजकारण असतंच. साहित्यात राजकारण असावं का? 

मा. तारा भवाळकर : 

समाजात अनेक विचारधारांची माणसं, संघटना असतात. एखाद्या संघटनेला वाटेल हे पूरक आहे,  एखाद्या संघटनेला वाटेल हे विरोधी आहे. हे कायम होत असतं. राजकारणाशी साहित्यिकाचा संबंध असू नये असं मी म्हणणार नाही पण माणूस म्हटल्यावर त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती असते. माणूस ज्या परिसरात, वातावरणात वाढला असेल त्या आचार विचारांचे संस्कार त्याच्यावर घडत जातात. त्यातून ती व्यक्ती लिहीत जाते, वाचत जाते. त्यामुळे साहित्यिकांच्यामध्ये राजकीय विचारधारा असू शकते. प्रश्न असा आहे, त्याच्या साहित्यामध्ये आणि साहित्यिक आचरणामध्ये तिने ढवळाढवळ करावी की नाही. 

साहित्यात राजकारण करू नये असं मला वाटतं, कारण तो एक संस्कृतीचा भाग आहे.  संस्कृतीचं लक्षण सर्वसमावेशकता आणि समाजाला उन्नतीकडे नेणं आहे, अवनतीकडे नेणं नाही. जसा कला हा संस्कृतीचा भाग आहे तसा भाषा हा संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. भाषेमुळॆ संस्कृतीचा विकास होतो किंवा ती टिकते आहे. साहित्य हा संस्कृतीचाच भाग आहे त्यामुळे साहित्यक्षेत्र निर्लेप असावं असं मला वाटतं.

-----------------------

प्रश्न : भाषेचा उल्लेख तुम्ही केलात. मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावरून गदारोळ झाला.  शासनाला आपला निर्णय स्थगित करावा लागला. कोवळ्या वयात मुलं अनेक भाषा व्याकरणाशिवाय सहज शिकू शकतात असं समर्थकांचं मत होतं तर काहींना ते मुलांवरचं ओझं वाटलं. याविषयी तुमची भूमिका काय आहे?  

मा. तारा भवाळकर : 

एक मास्तर म्हणून आणि प्राथमिक स्तरावरही मी शिकवलेलं असल्याने मला वाटतं इतक्या लहान वयात ही सक्ती मुळीच नसावी. पहिलीतलं मूल पाच-सहा वर्षाचं असतं. त्याला ४/५ तास एका जागी मुळात बसवून ठेवणं, त्याचं अवधान केंद्रित करणं, त्याची शारीरिक,मानसिक,बौद्धिक वाढ करणं हे सोपं आहे का! शाळा, दप्तर, पुस्तक, पेन्सील या सगळ्या गोष्टी त्याला नव्या असताना त्याच्यावर भाषा लादणं हा शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने त्याच्यावर अत्याचार आहे. मूल दहा वर्षाचं होईतो मातृभाषेशिवाय कुठल्याही भाषेतून संवादही होऊ नये.  

लहान वयात मुलं भाषा शिकू/ बोलू शकतात म्हणजे काय तर त्यांना व्यवहारातली जुजबी भाषा बोलता येते, मुलभूत असं काहीही त्यांना कळण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो. पाचवीनंतर त्यांना इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवाव्या. शिवाय शिकवायच्याच असल्या तर त्यांना शेजारभाषा का शिकवू नये !

सांगली मिरजकडची माणसं दोन्ही भाषा बोलतात. नागपूरचे लोक कितीतरी हिंदी शब्द वापरतात. दोन प्रदेशांच्या सीमारेषेवरचा भाग हा द्वैभाषिक असतो. अधिकृतपणे आहे. अनेक ठिकाणी म्हणजे कर्नाटक,. महाराष्ट्रात आहे, बडोद्याला आहे म्हणजे तिथे मराठी माध्यमाचीही शाळा आहे आणि गुजराथी आहे. कर्नाटकामध्ये आमच्या बेळगाव धारवाड या भागांमध्ये , सांगलीमध्ये कन्नड मिडीयमच्या शाळा होत्या आजही एखादी आहे. 

आपण मध्यमवर्गीय चिमटीएवढे लोक आपल्या दृष्टीने विचार करतो पण समाज निरनिराळ्या स्तरात विभागलेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने ,कामासाठी माणसं स्थलांतरित होत असतात. श्रमकरी माणसं, बांधकाम करणारी माणसं यांच्या पोरांनी काय करायचं ! दहा-बारा वर्षापर्यंत कन्नड मध्ये बोलणारी मुलं महाराष्ट्रात आली तर त्यांनी मराठी भाषा कशी शिकायची. शेजारभाषेचा मुद्दा उचलला गेला होता पण अडचण कुठे येते तर शिक्षक नेमणं, त्यांचं पगारपाणी याची. तो मोठा मुद्दा आहे.

दुसरी गोष्ट, ज्यांना ठराविक भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी ती ती भाषा शिकवणार्‍या संस्था आहेत. भाषाच काय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात गणिताच्या परीक्षा देता येतात. सगळ्या पोरांवर सब घोडे बारा टक्के म्हणत सगळं न लादता त्यांना निवडीची संधी द्यावी. या भाषांचे स्वतंत्र वर्ग असतात, पुस्तकं असतात, परीक्षाप्रणाली असते. मी हिंदी प्रबोध, प्रवीण, पंडीत, अनुवाद पंडीत सगळ्या परिक्षा दिल्या. त्यातून हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’चं भाषांतर मी केलं. बिहारमधल्या एखादया कलेक्टरची महाराष्ट्रात नेमणूक झाली तर त्याला मराठी अभ्यासक्रम शिकावा लागतो. महाराष्ट्रातल्या माणसाला जर प्रशासकीय पदावर बंगालमध्ये जायचे असेल तर त्याला बंगालीचा अभ्यासक्रम करावा लागतो. 

तेव्हा अभ्यासक्रमाच्या मुक्त व्यवस्था असलेल्या संस्थांना आधी सहकार्य करा मग वरच्या स्तरावर जा. 

उलट काय होतंय , मराठी शाळा बंद करायच्या, शाळांच्या इमारती पाडून संकुलं करायची, मास्तरांचे पगार वेळेवर होत नाहीत, अनुदान नाहीत, ६६ हजार मराठी शाळा गेल्या पाच वर्षात बंद झाल्या, यातून विकास होतो का? अभिजात वगैरे दर्जा मिळाला हे सगळं ठीक आहे पण निष्पन्न काय ! 

------------------

प्रश्न : यातून निष्पन्न काय हा विचार करताना भाषेपासून काहीसा दुरावलेला आजचा युवक डोळ्यासमोर येतो आहे. तो फारसा वाचत नाही असं दिसतं किंवा मी म्हणीन तो प्राधान्याने बरंच (पॉडकास्ट) ऐकतो आणि (व्हिडिओ) बघतो. वेगवेगळे विचारप्रवाह याच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचतात. हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य, पुरेसं  आहे की काळाबरोबर होणारे अपरिहार्य बदल म्हणून ते स्वीकारावं की त्याने पुन्हा वाचनाकडे वळावं म्हणून प्रयत्न, प्रयोग करायला हवेत ?

मा. तारा भवाळकर : 

वाचन कशासाठी करायचं? काहीतरी नवीन माहिती व्हावी म्हणून किंवा ज्ञान व्हावं म्हणून. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान केव्हा होतं, त्या माहितीवर स्वतंत्र विचार केला तर. हे एकदा लक्षात आलं की मुलं ते करतात. माझ्या संपर्कात जी तरूण मुलं आहेत ती तंत्रज्ञान वापरून ऐकतात, बघतात पण त्यांना स्वत:ला तिथे काही सादर करावंसं वाटतं. माझा विभाग (अकाउंट) तिथे असावा, असं त्यांना वाटतं. मग त्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो. बोलावं लागतं. आता बोलताना ते कुठली भाषा वापरणार तर ते खिचडी भाषा वापरतात. मग माझ्यासारखा मास्तर त्याला म्हणतो की ही कोणती भाषा आहे. तर तो म्हणतो, ही आमच्या जनरेशनची भाषा आहे. मग त्याला मी म्हणते की तुझ्या जनरेशनला आता तूच शिकव की चांगली भाषा कशी हवी. तुला इंग्रजीत बोलायचंय का, मग त्यावर प्रभुत्व हवं, मराठी असेल तर त्यावर. माझ्या कक्षेतल्या मुलांना हे पटतंय आणि ती मुलं हे करतायत. 

शेवटी हे आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. ते ब्लॉग लिहीतात, पॉडकास्ट करतात. माध्यमं बदलत राहतात. राहणार. केवळ पाठांतर हेच माध्यम होतं एके काळी. लिपी नंतर आली, सगळ्यांना ती लिपी शिकायची सोय केव्हा उपलब्ध झाली? शाई-कागद केव्हा उपलब्ध झाले?  ज्ञानेश्वरांच्या काळात कागद दुर्मिळ होता. इसवीसनाच्या सहाव्या शतकात हॅन्डमेड पेपर म्हणजे हाताने तयार करायचा जाड  कागद उपलब्ध झाला. मुद्रणकला किती उशीरा आली. साहेब आल्यावर ! पोर्तुगीज आल्यावर! नुसतं लेखन वाचन आपण म्हटलं तरी त्यासाठी लागणार्‍या साहित्याचा आपण विचार करतो का! मुद्रणसाहित्यानंतर दृकश्राव्य साधनं आली. एकूण लिहिण्यावाचण्याची माध्यमं बदलत राहणार. 

माणूस हा आळशी प्राणी आहे 😊 आता हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा त्याला ऐकणं बरं वाटतं. 

------------------

प्रश्न : पुन्हा एकदा साहित्य संमेलनाकडे वळते. याचा एक आराखडा असतो, त्यात कोणते नवे प्रवाह यावेत असं तुम्हाला वाटतं?  तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कार्यक्रमांविषयी विचारणा झाली नाही असं तुम्ही म्हणालात सुरूवातीलाच पण विचारलं असतं तर तुम्ही कोणते विषय निवडले असते ? आगामी संमेलनातील विषयांबाबत तुम्हाला काही विचारणा झाली आहे का ?

मा. तारा भवाळकर : 

नाही, यंत्रणा ऐकत नाहीत असा अनुभव आहे. शिवाय विषय, गरजा काळानुसार बदलत असतात. संयोजकांना जेव्हा वाटेल की काही नवीन द्यावं तेव्हा ते देतील  नवे विषय, लोकांनी सुचवायला हवं ते. नुसता अध्यक्ष फार काही करू शकत नाही. माझ्याच काळात मला विषय विचारण्यात आले नव्हते तर आता पुढच्या काळात कसे विचारतील! 😊

------------------------------

प्रश्न : तुम्ही ठरवून काही करत नसलात तरी तुमची चाळीसहून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आपण मुलाखत निश्चित करत असताना तुमची व्यग्रता लक्षात आली. आजवर इतक्या उर्जेने काम करत आलात ,तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं?  सध्या काही नवे लेखनप्रकल्प सुरु आहेत का? 

मा. तारा भवाळकर : 

नवे प्रकल्प करण्याइतकी ताकद आता माझ्यात नाही. मी मघाशी सांगितलं तसं आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर मला हे अध्यक्षपद मिळालं आहे. साहित्यक्षेत्रात बरीच वर्ष काम केलं आहे. या वर्षभर मला सगळ्यांनी इतकं गुंतवून ठेवलंय की आता मी सर्व पातळ्यांवर थकले आहे 😊

शेवटी एकच सांगते, आता माझ्याकडून किंवा आमच्या पिढीकडून अपेक्षा करू नका, तुम्ही तरूण मंडळी काहीतरी नवीन निर्माण करा. 

------------------

मुलाखतकार - मोहिनी महेश मोडक


Sunday, August 31, 2025

Excelsior

माझ्या शाळेतल्या म्हणजे ’सेंट अलॉयसिस हायस्कूल’ मधल्या आमच्या वर्गाचं भव्य रियुनियन ठरलं होतं. काही जणांशी संपर्क होता तर काही जण अनेक वर्षांनी भेटले. आमच्या वर्गातला एक बॅकबेंचर आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट पद्धतीने झकास व्यवस्था केली होती. सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. स्नॅक्स स्टॉलवर शाळेबाहेर मिळणारे चिंचगोळे, रावळगाव टाईप चॉकलेट, गावातल्या प्रसिद्ध घाशीलाल बटाटेवड्यापासून पार्श्वभूमीवर वाजणार्‍या ’मैने प्यार किया’ आणि ’बोनीएम’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर मागे लावलेला. तोच का ते पुढे सांगते. त्यातले काहीसे बावळट पण अश्राप वाटणारे आमचे अवतार पाहताना गंमत वाटत होती. आईने हनुवटी धरून भांग पाडून दिलेली मुलं आणि दोन बो किंवा रिबिन बांधून हाताची घडी घालून बसलेल्या मुली. फोटोत आमच्या मागे शाळेची भव्य इमारत. 

रेल्वेचं आशियातलं दोन नंबरचं यार्ड असल्याने ऑफीसर्स क्लब, आखीव रस्ते, ब्रिटीश पद्धतीची अलिशान क्वार्टर्स असणारा अतिशय कॉस्मोपॉलिट्न आणि खानदेशातला तालुका असल्याने शेतीमातीत रमणारा, भरीत भाकरी, वरण बट्टीवाला अहिराणी हेलातला गल्लीबोळांचा, ग्रामीण बाज असे दोन्ही प्रवाह तापी नदीबरोबर वाहते ठेवणारं आमचं गाव. त्या गावात ही कॉन्व्हेंट १८७४ साली स्थापन झालेली. गेल्या वर्षी दीडशे वर्ष पूर्तीचा सोहळा साजरा करणार्‍या या शाळेच्या दर्जाची एकही शाळा त्या सुमारास आसपासच्या जिल्ह्यातही नव्हती.  

मला वाटतं मीच नव्हे आपण प्रत्येक जण आज जे जे काही आहोत किंवा नाही आहोत, त्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात आपली शाळा आहे, असते. तिथलं वातावरण, शिक्षक, संस्कृती, वर्गमित्र-मैत्रिणी, शाळेतल्या घटना, तिथले अनुभव ,अगदी इमारत सुद्धा, हे सगळं आपल्या आत रूजून आपण घडत जातो.  

त्यातून माझी शाळा त्या काळच्या इतर शाळांपेक्षा आणि आजच्या बाजारू कॉन्व्हेंटपेक्षा खूप वेगळी होती. विशेष कोणतीही देणगी, जास्तीचे खर्च न आकारता शाळा व्यवस्थित शासनमान्य पद्धतीने चालत असे. तिथली कडक शिस्त, नेटका ऐटबाज गणवेश, मुलामुलींना एका बाकावर बसवणे हा इतर शाळांमधल्या मुलांसाठी असूयेचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा. तेव्हा चांगल्या रेल्वे वसाहती सोडल्या तर साधारण आगगाडीच्या डब्यांसारख्या एकामागेएक तीन खोल्या असलेली , बाहेरून रंग उडालेल्या भिंतींची, रात्री पिवळे बल्ब लावणारी, बाहेरच्या खोलीत लोखंडी कॉट आणि एखादी पत्र्याची खुर्ची असलेली , मागच्या अंगणात झाडाखाली बंब आणि सरपण ठेवलेली बहुतेक सगळी बुजरी बैठी घरं. शाळा एकदम चकाचक, स्वच्छ, देखणी जणू वेगळ्याच विश्वातली. 

मिशनरी शाळा असल्याने प्रवेश करताच उजवीकडे ’मदर मेरी’ चा पुतळा दिसे. डावीकडे  सायकल स्टँडजवळ साथी नावाच्या हसर्‍या नेपाळी चौकीदाराचं घर, दोन्ही हाताला तीन मजली प्रशस्त इमारती, मध्ये भव्य सभागृह आणि मागे विस्तीर्ण क्रीडांगण. प्राचार्यपदी सिस्टरची नेमणूक होई. अभ्यासक्रमात बायबलवर आधारित असलेले ’मॉरल सायन्स’ शिकावे लागे. नाताळला विशेष कार्यक्रम होत. कॅरोल्स गायली जात. येशूजन्माच्या सजावटीच्या स्पर्धा होत. जयंत सर ’जिंगल बेल’ च्या ट्यूनवर सांताक्लॉज होऊन हो हो करत नाचत येत आणि आमच्यावर खाऊची उधळण करत. हे सगळं हिंदू वा अन्यधर्मीयांच्या सणवारांच्या आड येत नसे. गणपती, शारदा बसवण्याच्या अनुभवाला मात्र आम्ही मुकलो. अर्थात कोणत्याही शिक्षणसंस्थेचे चालक, विश्वस्त ज्या धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे असतात त्याचा प्रभाव त्या संस्थेवर असणं नैसर्गिक आहे. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा केली म्हणून गदारोळ का केला जातो किंवा सरस्वती देवीला विद्येचं प्रतीक मानून कोणत्याही कार्यक्रमाआधी पूजन करणं यात तथाकथित पुरोगाम्यांनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे हे मला कळत नाही. .

------------------

कॉन्व्हेंट असली तरी डावीकडच्या इमारतीत मराठी व उजवीकडे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरत. ’वर्गभेद’ तेव्हाही काही अंशी होता. इंग्रजी माध्यमाची काही मुलं मराठी माध्यमाच्या मुलांकडे इंग्रज ’नेटीव्हांकडे’ पाहत तसे पाहत. बर्‍याच घरातले भाऊ आमच्या शाळेच्या इंग्रजी माध्यमात आणि बहिणी मात्र मराठी माध्यमात शिकत असत. हा ’लिंगभेद’ ही कळू लागला होता. धर्मांतरित ख्रिश्चन मंडळींसाठी मराठी चर्च आणि मूळ ख्रिश्चन अँग्लोइंडियन मंडळींचं वेगळं चर्च असे. हा धार्मिक भेदही जाणवत असे. तरीही शाळेत सर्व धर्माची, जातीची मुलं एकत्र शिकत, खेळत. 

बहुतेकांचे वडील रेल्वेत नोकरी करत. रेल्वेचं स्वत:चं केंद्रीय विद्यालय (हल्लीचं सीबीएसई) होतं तरीही अधिकार्‍यांचं प्राधान्य आमच्या शाळेला असे. वडिलांच्या पदानुसार प्रवासासाठी कोणत्या वर्गाचा पास मिळतो हा तेव्हा ’स्टेट्स सिंबॉल’ असला तरी आर्थिक स्तर मैत्रीच्या आड येत नसे. बाबांना इथल्या शिस्तीचं कौतुक वाटे. मला ओरडा बसू नये म्हणून ते घरी असले तर माझ्या बुटांना चकचकीत पॉलीश करून ठेवत. दुसर्‍या तुकडीत कायम पहिल्या येणार्‍या मुलाचे वडिल जमिनदार आहेत म्हणून तो पहिला येतो, असं मी त्यांना एकदा सांगितल्यावर ’त्यापेक्षा तो तुझ्यापेक्षा हुशार आहे हे तू का मान्य करत नाहीस’ असं म्हणून त्यांनी मला निरूत्तर केलं होतं. 

शाळेत एखाद्याशी मैत्री जुळली तर जन्मभर टिकते कारण ती मैत्री होते तेव्हा आपण ’कुणी’च नसतो. गाईडच्या कॅम्पसाठी नववीतल्या आम्ही विद्यार्थिनी रेल्वेने वसईला गेलो होतो. सर्वांना आरक्षण मिळू शकलं नव्हतं. अन्य तुकडीतल्या एकीबरोबर मला बर्थ शेअर करावा लागला. त्या रात्री आमची जी काय गट्टी जमली ती आजतागायत तशीच आहे. शाळेने जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी दिले, त्यातले बहुतेक आजही संपर्कात आहेत. कधी महिनामहिना बोलणं होत नाही, कधी वाढदिवस ते वाढदिवस बोलणं होतं पण एका फोनवर अर्ध्या रात्री उठून येतील असे त्यातले काही.. नवरा चेष्टेने म्हणतो, "सर्दी झाल्याचं टाक तुमच्या शाळा ग्रुपवर, एअर-अ‍ॅम्ब्युलंस घेऊन येतील..."

------------

शाळेच्या दोन्ही माध्यमातले दहाव्या वर्गातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी ग्रीन, रेड, ब्लू आणि यलो हाऊसचे प्रमुख असत. प्रत्येक हाउसला दर महिन्यात एक एक कामगिरी दिली जात असते. उदा: स्वच्छतेकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांचा गणवेश पूर्ण आणि नीटनेटका आहे की नाही याची तपासणी करणे, अवांतर उपक्रम आयोजित करणे वगैरे. असेंब्ली संपवून ’कम सप्टेंबर’ सारख्या झकास संगीताच्या तालावर आपापल्या वर्गात रांगेने जाताना मूड प्रसन्न होई. एका हॉलमध्ये, सभागृहात चित्रकलेच्या बानाइतकर सरांनी अतिशय रेखीव युरोपियन पद्धतीची भव्य म्युरल्स काढली होती. ती सतत नजरेला पडून चित्रकला आवडू लागली. नीट समजावी म्हणून ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. हस्तकलेशी मात्र पत्रिका जुळली नाही. 

शाळेत पहिली घंटा म्हणजे असेंब्लीसाठी जमायची सूचना असायची. दुसर्‍या घंटेला आपण आहोत त्या ठिकाणी पुतळा होऊन थांबावं लागे. आपोआप शाळा चिडीचूप होई. तिसर्‍या घंटेला एक शब्दही न बोलता रांगेत जाऊन आम्ही उभे राहत असू आणि शाळेचे दार बंद होत असे. त्यानंतर कुणालाही आत सोडले जात नसे किंवा अघटित घडल्याशिवाय बाहेर जाता येत नसे. इतर शाळांची मुलं केव्हाही गावभर फिरत किंवा मधल्या सुट्टीत पळून जात. शाळेच्या असेंब्लीत किंवा एरवीही कुणी गोंधळ केला तर पीटीचे सर येऊन त्याला शब्दश: बडवत असत. पीटी शिकवण्यापेक्षा ते या कामासाठीच नेमले असावेत. ’हा बॉईज, एक बात का खयाल रखो’ असं ओरडून म्हटल्याशिवाय त्यांना पुढे बोलता येत नसे. एकूण गर्ल्सना काही सांगावं लागत नसावं.

अर्थात इतक्या कडेकोट बंदोबस्तातही मुलांचा वात्रटपणा जमेल तसा सुरू असे. शाळेतल्या सर, मिस (शिक्षिका) यांना टोपणनावं ठेवणे इ. शिवाय  शाळेत मजा ती काय! प्रसाधनगृहात शाळेतल्या विशिष्ट सर आणि मिसची नावे बदाम काढून लिहिणे वगैरे नेहमीचे प्रकार होतेच. इतर रूक्ष शाळांच्या तुलनेने इथले वातावरण रंगीबिरंगी होते. शिक्षिकांना पोशाखाचे बंधन नव्हते. ऐशी-नव्वदचं दशक असूनही काही ख्रिश्चन, पारशी, पंजाबी शिक्षिका स्कर्ट मिडी सारख्या पेहरावात, लिपस्टीक लावून येत. त्यांच्या पोशाख, मेकअप, पर्फ्यूमवर चर्चा करणं हा मुलींचा आवडता उद्योग असे. (आता मात्र तिथे शिक्षिकांना साड्या व त्याही एकसारख्या नेसाव्या लागतात.) इतर शाळांत गॅदरिंगच्या नाचात मुली आयब्रो पेन्सीलने मिशी काढून आणि डोक्याला फेट्यासारखी ओढणी गुंडाळून ’सजना’,’पिया’चा रोल करत. आमच्या शाळेत तसं कधीतरी होत असलं तरी मुलगे मुली एकत्रही नाचत. गावात अनेकांना हा सांस्कृतिक धक्का असल्याने ते शाळेला नावं ठेवत. मी हायस्कूलमध्ये असताना बोनीएमच्या ’रास्पुतीन’ की ’डॅडी कूल’ वर दहावीच्या मुलामुलींनी जोडीने, शेवटी आरके स्टुडिओ पोझ घेत जे इंग्रजी नृत्य केलं ते पाहून आ वासला होता. 

मुलगा-मुलगी शेजारी बसवले की बोलणार नाहीत असा तर्क असावा मात्र एकदा भीड चेपल्यावर मुलं मुली एकमेकांशी तितकीच बडबड करत. काही मोजकी अपरिहार्य टीनएजर प्रेमप्रकरणं आणि दोन चार वाह्यात मुलांचा अपवाद वगळता एकमेकांची मित्र होत. मुलांकडे कायम पुरूष म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून नकळत पाहायला शिकवलं ते याच शाळेनं. 

नववीत माझ्याशेजारी बसणारा मुलगा अगदी अबोल, साधा. अभ्यासात त्याला मी मदत करायचे पण मला पुस्तकांचं ओझं न्यायचा कंटाळा येई. मी त्याला चतुराईने पटवलं की पहिल्या ४ तासांची पुस्तकं तू आणत जा, शेवटच्या ४ तासांची मी. शेवटच्या ४ मधले ३ तास क्राफ्ट, चित्रकला, गाईड, पीटी वगैरे असल्याने वर्षभर मला एखादंच पुस्तक न्यावं लागे. दहावीनंतर तो मुलगा कुणालाही भेटलेला नाही. कधी भेटलाच तर मला त्याला उगीचच सॉरी म्हणायचं आहे.      

---------------------------

मैत्रिणी बर्‍याच असल्या तरी आम्ही तीन जणी हटकून एकत्र डबा खात असू. त्यातली एक माझ्याबाबत विशेष पझेसिव्ह होती. वर गाईड कॅम्प निमित्ताने उल्लेख केला आहे तिच्याशी माझी वाढती मैत्री पाहून हिने मला ’अब तेरे बिन जी लेंगे हम’ टाईप लांबलचक पत्र लिहीलं होतं. तिला मी तूच माझा पहला प्यार असल्याची खात्री पटवल्यावर ती शांत झाली. ते पत्र आठवून आता तिलाही खूप हसू येतं. आम्ही तिघी आजही जवळच्या मैत्रिणी आहोत. 

तर हायस्कूलला असताना डबा ग्रुपमधली ती तिसरी गुजराथी मैत्रिण म्हणाली ’आता ९ वी पासून माझी शाळा बंद, माझं राजस्थानला लग्न करणार आहेत.’ मला धक्का बसला. तिच्या वडिलांचं उत्तम चालणारं उपाहारगृह होतं. मी तिरीमिरीत थेट त्यात शिरून त्यांना भेटले. ’हे कसं चुकीचं आहे’ असं माझ्या तेव्हाच्या कुवतीनुसार कळवळून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. ’वो जाने दो बेटा, बर्फी खाओ’ म्हणत एकीकडे गल्ला मोजत त्यांनी हसून माझी बोळवण केली. विशेष म्हणजे तिलाही या निर्णयाचं दु:ख वगैरे झाल्याचं दिसलं नाही. त्यानंतर ती आजतागायत भेटलेली नाही. याउलट शिकण्याची आवड असलेली, आईविना जगणारी एक निर्धन मैत्रिण काही तरी निमित्त होऊन जळून वारली. तिचं आकस्मिक जळणं हे गूढच राहिलं. तिला रेल्वे हॉस्पीटलला भेटायला गेले तेव्हा जे काही पाहिलं त्यानंतर कितीतरी रात्री झोपच आली नाही.         

शाळेत इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे जो फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडला होता त्यामागे कारण एकच .. त्यात होत्या आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.

आम्हाला त्या तीन वर्ष क्लासटीचर म्हणून लाभल्या. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. त्या मराठी शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. ह्रस्व ,दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. कुणाचं उद्धृत वापरलं आणि नाव लिहिलं नाही तर ती चोरी असते, शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय सांगत. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतंच आवडायला लागलं. मग दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ती वाचल्याचं काहीतरी तीर मारल्यासारखं ऐटीत सांगितलं होतं. 

शाळेत अ‍ॅंग्लोइंडियन ख्रिश्चन मुलांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा ’बो’ लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचं बक्कल तुटलं म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आलं नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळलं, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावलं,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे.

दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावलं. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे नुसत्या वाचून दाखवल्या.पहिलीत ताठ उभं राहून टिळकांवर भाषण केल्यापासून वक्तृत्वाची भीती मेली होती पण इंग्लीशमधे !! जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती एकदम कमी झाली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, बोरकर, विंदा’ इ.च्या सोप्या किंवा बालकवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

’टिट्बिट्स’ नावाचं एक मासिक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. खेळ वगळता कोणत्याही स्पर्धेत, गॅदरिंगमधे मी भाग घेतला नाही असं कधी झालंच नाही. एके वर्षी काही कारणाने मी ऑडीशन देऊ शकले नाही. नंतर जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे नुसतं हात हलवत विहरत जायचं. एकही संवाद नाही. शिवाय ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. ते नाटक झालं, मी जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या म्हणाल्या ते नेमकं नाही पण त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. अशाही अनुभवाची एक गंमत असते.आवडीच्या प्रत्येक स्पर्धेत भाग मात्र घेत राहायचा "

माझी एक मैत्रिण छान नाचायची. तिने एकदा गॅदरिंगसाठी ठेक्याचं हवं म्हणून कुठलं तरी भप्पी लाहिरीचं गाणं निवडलं. मिसने तिला ऑडीशनमध्येच रिजेक्ट केलं. ती रागावली ,रडली. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात का? ते तुझ्या वयाला शोभणारे नाहीत, असल्या गाण्यांवर बाहेरही कुठे नाचायचं नाही. शास्त्रीय नृत्य शिक, वेस्टर्नही शिक पण कॉमनसेन्स वापरून वगैरे त्यांनी दुसर्‍या दिवशी तिला जवळ बोलावून समजावलं.

एका सुट्टीनंतर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर ’पेपर उडून गेले’. गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, जोरदार वारा आला आणि बरेचसे पेपर भुर्र उडाले. तेव्हा सोशल मिडिया असता तर त्यांचं किती ट्रोलींग झालं असतं कल्पना करवत नाही. अर्थात प्रिन्सिपल सिस्टरची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या-गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. त्या सरांच्या अद्भुत कौशल्यामुळे मला फाडफाड गणितं येऊ लागली. दहावीत गणितात दीडशेपैकी केवळ एक मार्क गमावला, याचं श्रेय त्यांच्याइतकंच जोशी मिसचं आणि थोडं त्या पेपर उडवणार्‍या वार्‍याचंही.

या सगळ्याचा परिणाम असेल, दहावीत तालुक्यात मुलींमधून पहिली आले. यानिमित्त मला आणि वर्गात दुसरा आलेल्या माझ्या एका वर्गमित्राला त्यांनी छोटीशी पार्टी दिली. त्यांच्या घरी. आजवर आईबाबांबरोबर कुणाकडे तरी जाणार्‍या मला हे फार भारी वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत बरंच काय काय खायला ठेवलं होतं. वर्गातल्या दोन टीचभर मुलांसाठी! 

मला अप्रूप वाटलं. त्यांच्या घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. स्वत: सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. घरी एकट्या असून सदासतेज, समाधानी, आनंदी. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरंच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते.

--------------------------

रियुनियनला आम्ही त्यांना सन्मानाने घेऊन आलो. त्यांनी सगळ्यांशी प्रेमाने गप्पा मारल्या. त्या आता थकल्या आहेत पण त्या आहेत ही भावनाही खूप उबदार आहे. 

त्या भेटल्याच नसत्या तर... ! Excelsior हे बोधवाक्य (शब्द) कृतीत आणणार्‍या या शाळेत आईबाबांनी मला घातलं नसतं तर! निम्नमध्यमवर्गीय घराबाहेरचं आणि मध्यमवर्गीय वाड्याबाहेरचं जग कदाचित कळलं नसतं. जन्मभर पुरेल इतका आत्मविश्वास मिळाला नसता. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, गाव असो, भोवतालची माणसं असो, भूमिका घेणं असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. आपल्या कक्षा रूंदावण्याची आणि त्याचबरोबर मर्यादांचा स्वीकार करण्याची हिंमत झाली नसती. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळली नसती. एका टप्प्यावर पुढे सगळा अंधार दिसत असताना, नैराश्य या शब्दाचा वाराही न लागता, there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. 


Monday, June 30, 2025

’मिसेस’ आणि गरम गरम फुलके

’मिसेस’ हा आरती कादव दिग्दर्शित हिंदी चित्रपट ’झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये ’अ‍ॅमेझॉन प्राईम’ वर प्रदर्शित झालेल्या जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट ’द ग्रेट इंडियन किचन’ चा ’मिसेस’ हा रिमेक आहे. मूळ सिनेमा हिंदी व काही दाक्षिणात्य भाषांमध्ये डब झाला असला तरी उत्तरेतील प्रेक्षकांपर्यंत फारसा पोचला नव्हता. ती उणीव ’मिसेस’ने भरून काढली.  

मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. ’हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्‍या प्रत्येकाला  ’मिसेस’ भानावर आणतो. 

मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्‍यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्‍याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. 

आता या कथानकातून ध्वनीत होणार्‍या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. पण म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्‍याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"   

महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्‍या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. 

हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत.”-असा त्यांचा दावा. 

वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा’ योग्यच आहे पण इमोशनल अ‍ॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. आवडो की नावडो स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्‍या न करता जमेल तेवढंच करियर करतात. त्यातूनही परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात. 

अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्‍यांसाठ हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्‍या तरूणांसाठी आहे. 

हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉