( डॉ. तारा भवाळकर या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक. त्यांनी नाट्यविषयक संशोधन, लेखन तसंच स्त्री जाणिवांचा वेध घेणारंही विपुल लेखन केलं आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन हा त्यांचा ध्यास आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश तसंच मराठी ग्रंथकोश या कार्यात त्यांचं विशेष योगदान आहे. )
पूर्वअनुमती घेऊन ताराताईंशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांनी मोकळेपणाने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.
------------------------------------------
प्रश्न : अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बहुतेक वेळी वादग्रस्त ठरते. सोशल मिडियावर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. तुम्ही लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहात. बहुविध क्षेत्रात तुम्ही मौलिक संशोधन आणि लेखन कार्य केलेलं आहे. साहित्यक्षेत्रात तुम्हाला सन्मानाचं स्थान आहे. या पातळीवरून बघताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं ?
मा. तारा भवाळकर : पूर्वी संमेलनाध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक पद्धत होती. इच्छुक लोकांनी अर्ज करायचे आणि मग साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ज्याला अधिक मतं मिळतील त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करत. नंतर अशी राजकीय पद्धतीने निवडणूक घेण्याऐवजी अध्यक्षांची निवड सन्मानाने व्हावी व जाणकार लोकांनी ती करावी हा विचार पुढे आला. साहित्य महामंडळाने, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी एकत्र येऊन अध्यक्ष निश्चित करायचा अशी पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. माझ्या मते ही पद्धत जास्त योग्य आहे. इंग्रजीत सांगायचे तर ’इलेक्शन पेक्षा सिलेक्शन’ किंवा ’निवडणुकीपेक्षा निवड’ ही अधिक सन्मानाची आहे कारण मागून मिळवणं हे कलावंत किंवा साहित्यिकाच्या दृष्टीने फारसं स्पृहणीय नाही.
तशी प्रक्रिया सुरू झाली म्हणून मी अध्यक्ष होऊ शकले. निवडणुकीला उभं राहून मत मागायची पद्धत असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते कारण साहित्यिकांनी /कलावंतांनी अर्ज करून काही मिळवणं, याच्या मी विरोधात आहे.
माझी निवड झाल्यानंतर विरोधाचे सूर माझ्यापर्यंत तरी पोचलेले नाहीत. साहित्य महामंडळासह, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांच्या पाठिंब्याने माझी एकमताने निवड झाली , त्यांच्या अध्यक्षांची मला रीतसर पत्र आली त्यामुळे मी ते अध्यक्षपद स्वीकारलं. माझ्यासाठी हा आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावरचा एक अपघात होता. 😊
मला हे अनपेक्षित होतं कारण मी कोणत्याही गटातटात नव्हते. ती माझी प्रवृत्ती नाही आणि मला तेवढी उसंतही मिळाली नाही. अध्यक्षपद मिळाल्याने अगदी आनंदाने उड्या माराव्या असं वाटलं नाही पण खोटं का बोला, आयुष्याच्या या टोकाला आल्यावर एवढे लोक आपल्याला लक्षात ठेवतायत याचं मला समाधान नक्कीच वाटलं. त्याबद्दल मी या क्षेत्राची कृतज्ञ आहे.
-------------------------------------------
प्रश्न : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात तुमच्यासह अवघ्या सहा लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामागे काय कारण असावं? ताकदीने लिहिणार्या लेखिका कमी आहेत की हा भेदभाव आहे की हे नकळतपणे, निर्हेतुकपणे घडलं असावं !
मा. तारा भवाळकर :
आपली सगळी व्यवस्था पुरूषप्रधान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ’मेल डॉमीनेटींग सोसायटी’ आहे. स्त्रियांचं साहित्यक्षेत्रातलं काम मुळीच कमी नाही , मी तर म्हणेन अगदी लोकपरंपरेतल्या स्त्रिया सुद्धा अधिक सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या होत्या, आहेत आणि त्याच्याबद्दल मी पुष्कळदा बोलले आहे, लिहिलं आहे. त्यामुळे स्त्रिया कमी पडतात असं नाही, त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदच काय, मला कोणत्याही गावातून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची पत्रिका आली की त्यात हेच दिसतं म्हणजे अगदी स्त्रियांच्याच संस्था वगळल्या तर एकूणच औषधाला आपली एखादी स्त्री असते. ते ही नाव सगळ्यात शेवटी, प्रतिनिधी म्हणून. कुटुंबव्यवस्थेत सुद्धा स्त्रियांचा निर्मितीत मोठा सहभाग असतो पण त्यांना पदं देताना ही प्रवृत्ती दिसते. बायका शिकल्या सवरल्यात त्यामुळे एखादं तरी नाव असायला हवं म्हणून असतं, फारतर सल्लागार समितीत एखाददुसरं नाव असतं. स्त्रियांकडे गौणत्वाने पाहाणं इतकं नेहमीचं आहे. त्या काही बरं करू शकतात हे स्वीकारणं अवघड असल्याने अध्यक्षपदीही स्त्रियांची नावं कमीच दिसतात. बायका आपल्या नावाचा आपणहून आग्रह धरत नाहीत.
आता इंदिरा संतांचंच उदाहरण घ्या. त्यावेळी निवडणूक पद्धत होती. त्या काही स्वत: अर्ज भरणार्यांपैकी नव्हत्या. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी अर्ज भरला पण ऐनवेळी त्यांना डावललं गेलं. बोलेल त्यांचे चणे विकले जातात, न बोलणार्याचं सोनंही विकलं जात नाही. स्वत:हून पुढे येऊन एकतर स्त्रिया बोलत नाहीत आणि बोलल्याच तरी त्यांची बर्याचदा उपेक्षा केली जाते.
प्रश्न : मग आता लायक लेखिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळी अ.भा. संमेलनं असावीत का? किंवा काय पर्याय असावा?
मा. तारा भवाळकर :
वेगळी संमेलनं तर मला अजिबात मान्य नाहीत. अशा संमेलनांना मी हळदीकुंकवाचे कार्यक्रम म्हणते. राजकीय पक्षांच्या स्त्री संघटनांचे कार्यक्रम म्हणजे साड्या वाटणं, पैसे वाटणं, ते संमेलन नाही. अर्थात स्त्रियांची स्वत:ची भगिनी मंडळं, महिला मंडळं साहित्यविषयक असे काही कार्यक्रम घेत असत ,घेतात पण अ. भा. स्तरावर महिलांची वेगळी आघाडी असावी हे मला मान्य नाही. आपला समाज जर लोकशाहीवादी असेल तर त्यात प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतंत्र स्थान आणि अधिकार आहे, त्यासाठी स्त्री ही व्यक्ती आहे हे आधी मान्य केलं पाहिजे. सरस नीरस ठरवण्याच्या स्पर्धेत तिला स्थान असावं पण राखीव जागा नको. अर्थात हे माझं मत आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतर कुणाचं मत वेगळं असूच शकतं.
--------------------------------------
प्रश्न : तुम्ही अध्यक्षपदी असलेल्या साहित्य संमेलनाच्या तुमच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख नव्हता यावर काहींनी टीका केली. भाषणातल्या काही मुद्द्यांची प्रशंसा झाली. — या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं पाहाता?
मा. तारा भवाळकर :
तटस्थपणे, कारण समाजामध्ये सर्व गोष्टी सर्वांना कायम मान्य होतातच असं नाही. मी कुणाचाही अवमान केला नाही. त्यांच्या पदांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. भारताचे सन्माननीय पंतप्रधान /राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. माझं भाषण माझ्या शब्दात यूट्यूब वर पण आहे आणि लिखित स्वरूपात संमेलनात ते प्रसिद्ध झालं आले तेव्हा कोणीही हे शब्द तिथे बघू शकतात. राज्याचे सांकृतिक प्रतिनीधी म्हणून आलेल्या पूर्वपरिचयातील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ही टीका झाली असावी. लोकभाषेत सांगायचं तर लोक रस्त्याच्या मधून चाललं तरी नावं ठेवतात आणि कडेकडेने चाललं तरी नाव ठेवतात. सरळ चाललं तर धट, वाकडं चाललं तर अवलक्षण. मी सरळ चालणारी आहे. शिवाय तिथे भाषण करायचंय याची मला कल्पना नव्हती, ८७ वर्षाच्या बाईकडून जो उल्लेख झाला ,खरं तर सन्मानपूर्वकच, कारण जाणीवपूर्वक नावाचा उल्लेख करणं किंवा न करणं हे मनातही नव्हतं, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तरीही समाजात सर्व प्रकारची माणसं असतात, कुणाला काही गोष्टी पटल्या असतील कुणाला नसतील, त्यांचं ते स्वातंत्र्य मी मान्य केलंय. प्रशंसेबद्दल स्वाभाविकपणे आनंद वाटला. समाधान वाटलं.
----------------------------
प्रश्न : साहित्य संमेलनाध्यक्षाची भूमिका तुमच्या मते नेमकी काय असते? त्यांच्याकडून साहित्यक्षेत्रातून सर्जनशील नेतृत्वाचीही अपेक्षा असते का? हे पद फक्त अडीच दिवसाचं उत्सवमूर्तीपद म्हणजेच औपचारिक प्रतिष्ठेचं आहे की त्यात खऱ्या अर्थाने काही बदल घडवण्याची क्षमता असते?
मा. तारा भवाळकर :
साहित्य संमेलनाध्यक्षाला कुठलेही वैधानिक म्हणजे कायदेशीर अधिकार नाहीत. साहित्य संमेलनात कार्यक्रम काय ठेवावे, समजा एखादा परिसंवाद ठेवायचा झाला तर कुठल्या विषयावर ठेवावा, कुठल्या वक्त्यांना ,कवींना बोलवावं हे अधिकार अध्यक्षाला नाहीत. आता हे ही अधिकार नसतील तर एका वर्षाच्या कारकीर्दीत तो काय काय करणार ! बरं, यासाठी कोणतंही बजेट किंवा अर्थसाहाय्य नसतं. अर्थात संमेलनासाठी त्यांनी माझी व्यवस्था केली, अगदी सन्मानाने केली. मुळात साहित्यक्षेत्रात पन्नास साठ वर्ष घालवलेल्या माणसाने त्या एका वर्षात काय करावं !
परंतु साहित्यविषयक आस्था निर्माण होईल असं वातावरण त्या काळामध्ये नक्कीच निर्माण होतं. चार माणसांच्या गाठीभेटी होतात. भाषणं होतात, मुलाखती होतात. यानिमित्ताने माझी भूमिका मला मांडता आली. वयोमान आणि प्रकृतीमुळे माझ्याच्याने प्रवास फार झाला नाही पण ज्यांना आस्था वाटली ते लोक माझ्या घरी आले, माध्यमांनी मुलाखती घेतल्या, विविध संस्थांनी भाई वैद्य, विखे पाटील असे मोठमोठे पुरस्कार घरी येऊन दिले. हा सन्मान मराठी साहित्य विश्वाने मला दिला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य माणसांनी दिला. याबद्दल कृतज्ञ आहे.
आमच्या भागातील सर्व, अगदी सर्व, राजकीय, सामाजिक विचारधारांची मंडळी माझ्या घरी येऊन आदरपूर्वक भेटून गेली. समाजाच्या सर्व स्तरांमधल्या मंडळींनी, आमच्याकडच्या शेतकरी आणि कामगार संघटना, रोटरी सारख्या संस्था, वाचनालयं, प्रशासकीय संस्था, स्वच्छता कामगारांपासून कलेक्टर आणि आमचे पालकमंत्री सगळ्यांनी येऊन भेट घेतली. आत्ताच अबुधाबीच्या लोकांनी माझा व्हिडिओ केला कारण राज्यातच नव्हे देशविदेशात माझं भाषण पोचलं आहे. लंडनहून माझ्यासाठी एक काम आलं आहे, अमेरिकेहून फोन येऊन गेला. माध्यमांमुळे जगाच्या पाठीवर पोचता आलं.
मी प्राथमिक स्तरापासून परदेशी विद्यापीठापर्यंत शिकवण्याचं काम केलेली एक शिक्षिका आहे. नोकरीच्या काळात पदं येतात आणि जातात पण मुळात मी मास्तर आहे, आता तुझ्यासमोरही मी मास्तरकीच करतेय 😊
अनेक लायक व्यक्ती आहेत, होऊन गेल्यात याची जाणीव आहे. मी ज्यांना मानते ते लक्ष्मणशास्त्री जोशी. तेव्हा आजची माध्यमं नव्हती पण त्यांच्या ग्रंथांमधून ती माणसं आजही मार्गदर्शन करत असतात.
-----------------------
प्रश्न - अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या अध्यक्ष म्हणून संमेलनाचं सूप वाजल्यापासूनचा प्रवास तुम्ही सांगितलात. याशिवाय एकूण प्रवास कसा होता !
मा. तारा भवाळकर :
मी आयुष्यात काहीही ठरवून केलं नाही. किंवा तो आळस असेल. आयुष्याला प्रामाणिकपणे सामोरी गेले, अध्यक्षपदाला सुद्धा. लेखनही मी ठरवून केलं नाही. त्या त्या वेळेला लेखनात काही विषयात रमले, जेव्हा रमावंसं वाटलं नाही तेव्हा सोडून दिलं, मग मागे वळून पाहिलं नाही. उदा: लोकांनी मला लोकसाहित्याच्या गाठोड्यात बांधलं आहे पण माझा प्रेमाचा ,आस्थेचा विषय आहे नाटक. नाट्यविषयक वाचन, नाटक शिकवणं, १४ वर्ष अभिनय केला, पुरस्कार मिळवले, नाट्यसंस्था स्थापली, नाटकं बसवली, चर्चा केल्या, नाट्यलेखन केलं, नाट्यस्पर्धा घेतल्या. भालबा केळकरांच्या पीडीए च्या चालीवर सांगलीला एडीए स्थापन केली.अजूनही कार्यकर्ते त्याचं काम करतात. त्यात मी कृतीशील कार्य केलं, सर्व स्तरांवर. तेव्हा मी प्राध्यापक होते, प्राध्यापकाच्या आयुष्यात पीएचडी नावाचं प्रकरण येतं. सांगलीत होते. त्यानिमित्ताने विष्णुदास भावे पहिले नाटककार, त्यांनी नाटक केलं म्हणजे काय केलं या कुतूहलातून मी वाचत गेले. लोकांशी बोलत गेले. तेव्हा यांच्या नाटकांवर बरेच आक्षेप होते, ते यक्षगानातून आलं, गोव्यातून आलं इ..... शोधत गेले.
७५ मध्ये अभिनयाचं रौप्यपदक मिळाल्यावर मी नाटक सोडलं, सूत्र सोपवली. कार्यकर्ते आजही संपर्कात आहेत पण त्यांच्यात ढवळाढवळ करत नाही. सहसा खुर्च्या सोडवत नाहीत पण मला खुर्चीत बसायला आवडत नाही. शिकवणं ..खडू, फळा, विद्यार्थी हा माझा आनंदाचा भाग होता. पदाची अपेक्षा नव्हती. म्हणून प्राचार्यपद नाकारलं. आता पाठ दुखते म्हणून खुर्ची लागते 😊
सुरूवातीला लागले ती शारीरिक शिक्षणाची शिक्षिका म्हणून. हा कोर्स केला होता त्यामुळे हल्लीच्या भाषेत पीटी टीचर म्हणून नोकरी करत करत बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून महाविद्यालयाच्या परीक्षा देत होते. पदव्या बदलत गेल्या त्यानुसार नोकरी बदलत गेली. त्यामुळे शब्दश: ग्राऊंड लेव्हलपासून एम ए पीएचडी मार्गदर्शक पदापर्यंत सर्व स्तरावर शिकवत गेले. एरिझोना स्टेट विद्यापीठातही गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवलं. या सगळ्याची अपूर्वाई न वाटता कर्तव्याचा भाग वाटला.
विष्णुदासांच्या, संशोधनाच्या निमित्ताने बराच प्रवास केला, दक्षिण हिंडले. कोकणात दशावतार, कर्नाटकात यक्षगान, भोसल्यांची नाटकं... उसना बॉक्स कॅमेरा घेऊन तिकीट काढून हिंडत दक्षिणेत सर्व लोककलांचा अभ्यास केला. आताच्या भाषेत प्रयोगसिद्ध लोककलेचा. त्यातून अभिजात नाटक घडत गेलं आहे. माझा जन्म ऐशी वर्षापूर्वीच्या शेतकरी कुटुंबात, खेडयातल्या एकत्र कुटुंबात त्यामुळे ग्रामीण संस्कृती,दळण, कांडण, गाणी हे लोकजीवन जवळून पाहिलं. यातून मी घडत आले.
मोठेपणी आपण सैद्धांतिक अभ्यास करतो तेव्हा ही जी सामग्री जमा झालेली असते त्याचे अर्थ लागतात. प्रॅक्टीकल आधी मग थेअरी. नाटकाच्या उगमाची मीमांसा हा माझ्या प्रबंधाचा विषय, त्याला मिळालेला पुरस्कार, माझं संशोधन हे सगळं नाटकाशी संबंधित आहे. नाट्य हा संस्कृतीचा मोठा भाग आहे, लोकसंकृती ही काही वेगळी आहे असं मला वाटत नाही, नाटकातून मी त्याचा सैद्धांतिक अभ्यास केला. त्यासाठी चांगलं अनौपचारिक मार्गदर्शक मिळत गेलं.
--------------------------------
प्रश्न : संमेलनाध्यक्षपदावरून तुम्ही साहित्यिक स्वायत्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी याकडे कसं पाहता ? साहित्यामध्ये समाजकारण असतंच. साहित्यात राजकारण असावं का?
मा. तारा भवाळकर :
समाजात अनेक विचारधारांची माणसं, संघटना असतात. एखाद्या संघटनेला वाटेल हे पूरक आहे, एखाद्या संघटनेला वाटेल हे विरोधी आहे. हे कायम होत असतं. राजकारणाशी साहित्यिकाचा संबंध असू नये असं मी म्हणणार नाही पण माणूस म्हटल्यावर त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती असते. माणूस ज्या परिसरात, वातावरणात वाढला असेल त्या आचार विचारांचे संस्कार त्याच्यावर घडत जातात. त्यातून ती व्यक्ती लिहीत जाते, वाचत जाते. त्यामुळे साहित्यिकांच्यामध्ये राजकीय विचारधारा असू शकते. प्रश्न असा आहे, त्याच्या साहित्यामध्ये आणि साहित्यिक आचरणामध्ये तिने ढवळाढवळ करावी की नाही.
साहित्यात राजकारण करू नये असं मला वाटतं, कारण तो एक संस्कृतीचा भाग आहे. संस्कृतीचं लक्षण सर्वसमावेशकता आणि समाजाला उन्नतीकडे नेणं आहे, अवनतीकडे नेणं नाही. जसा कला हा संस्कृतीचा भाग आहे तसा भाषा हा संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. भाषेमुळॆ संस्कृतीचा विकास होतो किंवा ती टिकते आहे. साहित्य हा संस्कृतीचाच भाग आहे त्यामुळे साहित्यक्षेत्र निर्लेप असावं असं मला वाटतं.
-----------------------
प्रश्न : भाषेचा उल्लेख तुम्ही केलात. मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावरून गदारोळ झाला. शासनाला आपला निर्णय स्थगित करावा लागला. कोवळ्या वयात मुलं अनेक भाषा व्याकरणाशिवाय सहज शिकू शकतात असं समर्थकांचं मत होतं तर काहींना ते मुलांवरचं ओझं वाटलं. याविषयी तुमची भूमिका काय आहे?
मा. तारा भवाळकर :
एक मास्तर म्हणून आणि प्राथमिक स्तरावरही मी शिकवलेलं असल्याने मला वाटतं इतक्या लहान वयात ही सक्ती मुळीच नसावी. पहिलीतलं मूल पाच-सहा वर्षाचं असतं. त्याला ४/५ तास एका जागी मुळात बसवून ठेवणं, त्याचं अवधान केंद्रित करणं, त्याची शारीरिक,मानसिक,बौद्धिक वाढ करणं हे सोपं आहे का! शाळा, दप्तर, पुस्तक, पेन्सील या सगळ्या गोष्टी त्याला नव्या असताना त्याच्यावर भाषा लादणं हा शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने त्याच्यावर अत्याचार आहे. मूल दहा वर्षाचं होईतो मातृभाषेशिवाय कुठल्याही भाषेतून संवादही होऊ नये.
लहान वयात मुलं भाषा शिकू/ बोलू शकतात म्हणजे काय तर त्यांना व्यवहारातली जुजबी भाषा बोलता येते, मुलभूत असं काहीही त्यांना कळण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो. पाचवीनंतर त्यांना इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवाव्या. शिवाय शिकवायच्याच असल्या तर त्यांना शेजारभाषा का शिकवू नये !
सांगली मिरजकडची माणसं दोन्ही भाषा बोलतात. नागपूरचे लोक कितीतरी हिंदी शब्द वापरतात. दोन प्रदेशांच्या सीमारेषेवरचा भाग हा द्वैभाषिक असतो. अधिकृतपणे आहे. अनेक ठिकाणी म्हणजे कर्नाटक,. महाराष्ट्रात आहे, बडोद्याला आहे म्हणजे तिथे मराठी माध्यमाचीही शाळा आहे आणि गुजराथी आहे. कर्नाटकामध्ये आमच्या बेळगाव धारवाड या भागांमध्ये , सांगलीमध्ये कन्नड मिडीयमच्या शाळा होत्या आजही एखादी आहे.
आपण मध्यमवर्गीय चिमटीएवढे लोक आपल्या दृष्टीने विचार करतो पण समाज निरनिराळ्या स्तरात विभागलेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने ,कामासाठी माणसं स्थलांतरित होत असतात. श्रमकरी माणसं, बांधकाम करणारी माणसं यांच्या पोरांनी काय करायचं ! दहा-बारा वर्षापर्यंत कन्नड मध्ये बोलणारी मुलं महाराष्ट्रात आली तर त्यांनी मराठी भाषा कशी शिकायची. शेजारभाषेचा मुद्दा उचलला गेला होता पण अडचण कुठे येते तर शिक्षक नेमणं, त्यांचं पगारपाणी याची. तो मोठा मुद्दा आहे.
दुसरी गोष्ट, ज्यांना ठराविक भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी ती ती भाषा शिकवणार्या संस्था आहेत. भाषाच काय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात गणिताच्या परीक्षा देता येतात. सगळ्या पोरांवर सब घोडे बारा टक्के म्हणत सगळं न लादता त्यांना निवडीची संधी द्यावी. या भाषांचे स्वतंत्र वर्ग असतात, पुस्तकं असतात, परीक्षाप्रणाली असते. मी हिंदी प्रबोध, प्रवीण, पंडीत, अनुवाद पंडीत सगळ्या परिक्षा दिल्या. त्यातून हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’चं भाषांतर मी केलं. बिहारमधल्या एखादया कलेक्टरची महाराष्ट्रात नेमणूक झाली तर त्याला मराठी अभ्यासक्रम शिकावा लागतो. महाराष्ट्रातल्या माणसाला जर प्रशासकीय पदावर बंगालमध्ये जायचे असेल तर त्याला बंगालीचा अभ्यासक्रम करावा लागतो.
तेव्हा अभ्यासक्रमाच्या मुक्त व्यवस्था असलेल्या संस्थांना आधी सहकार्य करा मग वरच्या स्तरावर जा.
उलट काय होतंय , मराठी शाळा बंद करायच्या, शाळांच्या इमारती पाडून संकुलं करायची, मास्तरांचे पगार वेळेवर होत नाहीत, अनुदान नाहीत, ६६ हजार मराठी शाळा गेल्या पाच वर्षात बंद झाल्या, यातून विकास होतो का? अभिजात वगैरे दर्जा मिळाला हे सगळं ठीक आहे पण निष्पन्न काय !
------------------
प्रश्न : यातून निष्पन्न काय हा विचार करताना भाषेपासून काहीसा दुरावलेला आजचा युवक डोळ्यासमोर येतो आहे. तो फारसा वाचत नाही असं दिसतं किंवा मी म्हणीन तो प्राधान्याने बरंच (पॉडकास्ट) ऐकतो आणि (व्हिडिओ) बघतो. वेगवेगळे विचारप्रवाह याच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचतात. हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य, पुरेसं आहे की काळाबरोबर होणारे अपरिहार्य बदल म्हणून ते स्वीकारावं की त्याने पुन्हा वाचनाकडे वळावं म्हणून प्रयत्न, प्रयोग करायला हवेत ?
मा. तारा भवाळकर :
वाचन कशासाठी करायचं? काहीतरी नवीन माहिती व्हावी म्हणून किंवा ज्ञान व्हावं म्हणून. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान केव्हा होतं, त्या माहितीवर स्वतंत्र विचार केला तर. हे एकदा लक्षात आलं की मुलं ते करतात. माझ्या संपर्कात जी तरूण मुलं आहेत ती तंत्रज्ञान वापरून ऐकतात, बघतात पण त्यांना स्वत:ला तिथे काही सादर करावंसं वाटतं. माझा विभाग (अकाउंट) तिथे असावा, असं त्यांना वाटतं. मग त्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो. बोलावं लागतं. आता बोलताना ते कुठली भाषा वापरणार तर ते खिचडी भाषा वापरतात. मग माझ्यासारखा मास्तर त्याला म्हणतो की ही कोणती भाषा आहे. तर तो म्हणतो, ही आमच्या जनरेशनची भाषा आहे. मग त्याला मी म्हणते की तुझ्या जनरेशनला आता तूच शिकव की चांगली भाषा कशी हवी. तुला इंग्रजीत बोलायचंय का, मग त्यावर प्रभुत्व हवं, मराठी असेल तर त्यावर. माझ्या कक्षेतल्या मुलांना हे पटतंय आणि ती मुलं हे करतायत.
शेवटी हे आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. ते ब्लॉग लिहीतात, पॉडकास्ट करतात. माध्यमं बदलत राहतात. राहणार. केवळ पाठांतर हेच माध्यम होतं एके काळी. लिपी नंतर आली, सगळ्यांना ती लिपी शिकायची सोय केव्हा उपलब्ध झाली? शाई-कागद केव्हा उपलब्ध झाले? ज्ञानेश्वरांच्या काळात कागद दुर्मिळ होता. इसवीसनाच्या सहाव्या शतकात हॅन्डमेड पेपर म्हणजे हाताने तयार करायचा जाड कागद उपलब्ध झाला. मुद्रणकला किती उशीरा आली. साहेब आल्यावर ! पोर्तुगीज आल्यावर! नुसतं लेखन वाचन आपण म्हटलं तरी त्यासाठी लागणार्या साहित्याचा आपण विचार करतो का! मुद्रणसाहित्यानंतर दृकश्राव्य साधनं आली. एकूण लिहिण्यावाचण्याची माध्यमं बदलत राहणार.
माणूस हा आळशी प्राणी आहे 😊 आता हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा त्याला ऐकणं बरं वाटतं.
------------------
प्रश्न : पुन्हा एकदा साहित्य संमेलनाकडे वळते. याचा एक आराखडा असतो, त्यात कोणते नवे प्रवाह यावेत असं तुम्हाला वाटतं? तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कार्यक्रमांविषयी विचारणा झाली नाही असं तुम्ही म्हणालात सुरूवातीलाच पण विचारलं असतं तर तुम्ही कोणते विषय निवडले असते ? आगामी संमेलनातील विषयांबाबत तुम्हाला काही विचारणा झाली आहे का ?
मा. तारा भवाळकर :
नाही, यंत्रणा ऐकत नाहीत असा अनुभव आहे. शिवाय विषय, गरजा काळानुसार बदलत असतात. संयोजकांना जेव्हा वाटेल की काही नवीन द्यावं तेव्हा ते देतील नवे विषय, लोकांनी सुचवायला हवं ते. नुसता अध्यक्ष फार काही करू शकत नाही. माझ्याच काळात मला विषय विचारण्यात आले नव्हते तर आता पुढच्या काळात कसे विचारतील! 😊
------------------------------
प्रश्न : तुम्ही ठरवून काही करत नसलात तरी तुमची चाळीसहून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आपण मुलाखत निश्चित करत असताना तुमची व्यग्रता लक्षात आली. आजवर इतक्या उर्जेने काम करत आलात ,तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं? सध्या काही नवे लेखनप्रकल्प सुरु आहेत का?
मा. तारा भवाळकर :
नवे प्रकल्प करण्याइतकी ताकद आता माझ्यात नाही. मी मघाशी सांगितलं तसं आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर मला हे अध्यक्षपद मिळालं आहे. साहित्यक्षेत्रात बरीच वर्ष काम केलं आहे. या वर्षभर मला सगळ्यांनी इतकं गुंतवून ठेवलंय की आता मी सर्व पातळ्यांवर थकले आहे 😊
शेवटी एकच सांगते, आता माझ्याकडून किंवा आमच्या पिढीकडून अपेक्षा करू नका, तुम्ही तरूण मंडळी काहीतरी नवीन निर्माण करा.
------------------
मुलाखतकार - मोहिनी महेश मोडक


