Monday, June 22, 2026

नर्मदे हर - अमरकंटक

 एका सहित्य संस्थेचा ’भारतीय साहित्य की मूलदृष्टी एवं समकालीन साहित्य’ हा अभ्यास वर्ग जूनमध्ये अमरकंटकला ठरला. इतक्या दूर जावं की नं जावं विचारत पडले पण निकिताची कंपनी मिळाली. ती म्हणाली चल गं, जाऊया. मग केला प्लॅन पण एकाही गाडीचं आरक्षण उपलब्ध नाही. शिवाय थेट गाडी नाही. पण म्हटलं ’देख लेंगे’. काळजी करायला ही काही कुटंबाची ट्रीप नव्हती. केळकर सर नागपूरहून अमरकंटकला कारने जाणार म्हटल्यावर जाण्याचा प्रश्न सुटला. बरोबर सँडविच , ठेपले घेतले होते. जंगलातल्या डोंगरावर असलेल्या या स्थळाच्या माथ्यावर पोचायचं होतं. 

नागपूरच्या पुढे पेंच अभयारण्य ओलांडून जबलपूरमार्गे घटीया, बिछीया अशी याकारांत गावं ओलांडत कार जात होती. मध्यप्रदेशातली खेडी अपेक्षेपेक्षा चांगली, स्वच्छ, बरीच घरं पांढर्‍या रंगात रंगवलेली अशी नेटकी पाहून आश्चर्य वाटलं. जसजसं अमरकंटक जवळ येऊ लागलं, तसतसं परिसरातली घनदाट वनराई , वनराई नसून जंगल आणि मोहक वाटणार्‍या डोंगररांगा गूढ वाटू लागल्या. रस्त्यातून सुर्र्कन जाणारे ससे आणि लांबून चमकणारे कोल्ह्याच्या पिल्लांचे डोळे दिसू लागले. समोरुन दहा-पंधरा मिनीटांनी एखादीच गाडी येत होती. मागे एकही दिसत नव्हती. इथे गाडी बंद पडली तर ! पुन्हा मनात.. ’देख लेंगे’

नऊ साडेनऊ तासांनी अभ्यासवर्गाच्या जागी म्हणजे इंदीरा गांधी जनजातीय विश्वमहाविद्यालयात पोचलो. सोय उत्तम होती. शुद्ध गोड हिंदीत गरमागरम जेवणाने स्वागत झालं. दमल्याने अनौपचारिक काव्य संमेलनात श्रोता म्हणून सहभागी व्हायचंही त्राण उरलं नाही. गाडी घ्यायला येईतो एक दोन कविता ऐकल्या इंदोरच्या वाणीने (महिला) स्वत: गाऊन सुंदर स्वरचित शारदास्तवन सादर केलं. मग एका प्राध्यापकांनी एक न-कविता सादर केली. केळकर सरांनी झकास वात्रटिका आणि निकिताने एक छानशी कविता गाऊन सादर केली. दरम्यान न-कवितावाले पुन्हा सरसावले तेव्हा ’देख लेंगे’ चा धोका न पत्करता मी गाडीत जाऊन बसले.  

भव्य विद्यापीठ परिसरातल्या ट्रान्झिट क्वार्टरमध्ये राहण्याची व्यवस्थित सोय केलेली होती पण तिथे पोचतो तो अंधार गुडुप. वीज गेलेली. साहजिक लिफ्ट बंद. एक मेंढक/ बेडूक उडी मारून अंगावर. पोटात खड्डा पडला. टॉर्च लावायचा तर मोबाईलपण एका काडीवर आलेला. पुन्हा एकदा मनात ’देख लेंगे’ म्हटलं. तेवढ्यात वीज आली . ट्न्न आवाज करुन जीव भांड्यात पडला. पाऊस पडून गेल्याने  रात्री गारवा होता त्यामुळे शांत झोप लागली.   

सकाळी ठरल्या वेळी कुलदीप घ्यायला आला. न्याहारी करून अभ्यासवर्गाच्या सभागृहात पोचलो. देशभरातून सत्तरेक लोक आले होते. महिला कमी होत्या. बीजभाषण उत्तम झाले. पाठोपाठ एक एक सत्र सुरू झाली. उत्तम हिंदीतून सगळे वक्ते बोलत होते. निकीताला इतकी हिंदी ऐकायची स्वय नसल्याने एका सूचनेचा तिने अर्थ विचारला. ’वॉशरूम इज अपस्टेअर्स’ हा अर्थ ऐकताच ती हसत बसली. ’भारतीय साहित्य की मूलदृष्टी’, ’भारतीय साहित्यपर वैश्विक प्रभाव’, ’समकालीन वैचारिक परिदृश्य’ इ, विषयांवर सविस्तर आणि दीर्घ उद्बोधन व नंतर प्रश्नोत्तरं होत होती. अभ्यासवर्गाचा दर्जेदार आशय हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. भोजनव्यवस्थाही उत्तम पण मेसचं असल्याने असेल सगळ्या मसाल्यांची चव एकसारखी होती. कोफ्ता करी असो वा वडा, डोळे मिटले तर काय खातोय हे ओळखू यायचं नाही पण आयोजक फार प्रेमाने विचारपूस करत होते. 

खरं तर हा प्रवास हा केवळ पर्यटन नव्हतं, तर साहित्य, निसर्ग, अध्यात्म आणि शांतता याचा एकजिनसी अनुभव होता. (कदाचित म्हणूनच पदार्थांची चव एकसारखी लागत असावी :-) ) 

रविवारी कितीतरी दिवसांनी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. न्याहारी करून पुन्हा सत्रांना सुरुवात झाली. कालच्या विषयांचे उर्वरित मुद्दे व सारांश असं आजचं स्वरूप होतं. प्रत्येक सत्राआधी पुस्तक परिचय होता. ’आनंदमठ’ पासून आंध्रातील प्रख्यात ’पोतन्ना’ भागवतापर्यंत विविध पुस्तकं जवळून कळली. तेलंगणाच्या एका विद्वानांनी पोतन्ना भागवत त्यातल्या वृत्तबद्ध रचनांच्या उदाहरणासह त्यांच्या द. भारतीय हेलातल्या हिंदीमध्ये इतकं भन्नाट सादर केलं की तेलुगुतले काही संदर्भ समजत नसूनही सगळे दंग होऊन ऐकत राहिले. 

समारोपीय सत्र संपताच एकमेकांचे संपर्क नोंदवून, जेवून,  सामान डिकित टाकून सर्वांचा निरोप घेतला. 

रात्री एक वाजता बिलासपूरहून गाडी होती. तिथे पोचायला साडेआठला पेंड्रा रोड नामक स्टेशनपासून गाडी होती. मधल्या वेळात अमरकंटक दर्शन करायचं ठरलं. विद्यापीठातून तिकडे जाताना वाटेत दोन तीन मंदिरामध्ये दर्शन घेतलं. जलेश्वर महादेव हे मंदिर बारावं ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करत होतं. वाटेत एक विभाग छत्तीसगडमधला लागे तर पुढचा भाग म. प्रदेशातला त्यामुळे आता नेमकं कोणत्या राज्यात आहोत हे पाहणं सोडून दिलं. एक गोष्ट कॉमन होती. निसर्गाची समृद्धी. दर्शनार्थी टिपीकल उत्तर भारतीय. भांगात सिंदूर भरलेल्या आणि ब्रोकेडच्या चकचकीत साड्यांमधल्या बायका. हाताशी लागतील ते कपडे घातलेले पुरूष. स्वस्त फिल्मी कपड्यातल्या तरूण मुली. मंदिरांच्या परिसरात जिकडे तिकडे लाल चुनरींच्या गाठी बांधलेल्या. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल फोन आणि देवाला पार्श्वभूमीवर ठेवून सेल्फी काढायची धडपड. एक माणूस तर डोकं पिंडीवर टेकलेलं आणि बुबुळ फोटो काढणार्‍याकडे फिरवलेलं अशा चमत्कारिक स्थितीत बराच वेळ उभा होता. बटबटीत रंग, भक्तांचं मोठमोठ्याने बोलणं, घंटा बडवणं, बाहेर खेळणी, जांभळं, पूजेचं सामान विकणार्‍यांचा कोलाहल यामुळे प्रसन्न वाटेना. 

अमरकंटकमध्ये प्रवेश करताना मात्र पर्यटनातून आलेली समृद्धी जाणवू लागली. टोकदार डोंगरांच्या माथ्यावरचं ईश्वरी आलय या अर्थाने अमरकंटक नाव पडल्याचं सांगतात. कालिदासाच्या साहित्यात याचा ’अमरकुटा’ असा उल्लेख आहे, ज्याचा अमरकंटक अपभ्रंश झाला असंही ऐकलं. शिव-पार्वतीने इथे तपस्या केली होती असं मानतात त्यामुळे याला तीर्थराज मानलं जातं. अनुपपूर जिल्ह्यात हजार मीटर उंचीवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरील मैकल, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेलं अमरकंटक हे भारतातलं अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं एवढीच माहिती या स्थानाबद्दल होती. त्याचं एक कारण हे नर्मदानदीचं उगमस्थान मानलं जातं हे ही माहित होतं पण हे सोन आणि जोहिला या नद्यांचंही उगमस्थान असल्याचं तिथे गेल्यावर कळलं. यातली जोहिला बघण्याचा काही योग आला नाही. 

या नद्यांविषयी एक आख्यायिका कळली ती थोडक्यात - अमरकंटक नावाच्या राजाला नर्मदा नावाची सुस्वरूप मुलगी होती. राजाने तिचा विवाह शोण  (सोन !) राजाशी ठरवला. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीच त्यांची प्रत्यक्ष भेट होणार होती. परंतु आपला मृत्यू जवळ आल्याची राजाला जाणीव झाल्याने त्याने घाईघाईने नर्मदेला राज्याभिषेक करून राज्यकारभार तिच्या हाती सोपवला. राजा निवर्तला. कालांतराने आधीच ठरलेला विवाह पार पडावा म्हणून प्रतीकात्मक आपली अंगठी झोला (जोहिला !) नावाच्या दासीबरोबर तिने शोण राजाकडे पाठवली. झोला दासीच नर्मदा आहे असं समजून त्यानं तिचं प्रेमाने स्वागत केलं. झोला धूर्त होती. संधीचा फायदा घेऊन तिने विवाह उरकून घेतला. इकडे वाट पाहून नर्मदेने शोण राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. झोलाने तिची ओळख नाकारली. खिन्न मनाने नर्मदा तिथून निघाली पण परत न जाता मैकल पर्वतावर ध्यानस्थ बसून शंकराला प्रार्थना केली.

त्या समाधीत नर्मदा देहरूपाने विरघळली आणि पाण्याच्या रूपाने खाली वाहू लागली. नर्मदा नदी झाली. ही भारतातील सर्वात प्राचीन नदी समजली जाते

दिनेशजींचं वाक्य आठवलं- गंगा धर्म का, जमुना प्रेम का, नर्मदा भक्ती का, गोदावरी तप का प्रतीक है. 


साहजिक अमरकंटकचं मुख्य आकर्षण म्हणजे नर्मदा उगम कुंड पण केळकर सरांच्या ओळखीतून सोबत आलेल्या वाटाड्याच्या सूचनेनुसार आधी युनेस्को हेरिटेजच्या अंतर्गत आलेल्या कलचुरी काळातील मंदिरात गेलो. हे तत्कालिन शकराचार्यांनी ११ व्या शतकात राजाच्या साहाय्याने वसवलेलं मंदिर. दहाव्या शतकात हा प्रदेश चेदी शासकाच्या ताब्यात होता. आजही त्या काळातमी मंदिरं आणि इतर भग्नावशेष दृष्टीस पडतात. चंद्रवंशातल्या पुरुखा राजाने तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न केले. त्याने मागितलेल्या वराप्रमाणे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठवले. अशी तिच्या उत्पत्तीविषयी कथा सांगितली जाते 

या परिसरातलं कुंड हेच मूळ उगमस्थान असं काही स्थानिक म्हणतात पण त्याला मान्यता नाही असं वाटाड्या म्हणाला. या मंदिरांची वास्तुकला पाहण्यासारखी आहे. सुबक दगडी बांधकाम, कोरीव शिल्पं पण आत दिवे नसल्याने जाळीला डोळे लावून विष्णू आणि शिवलिंगाचं दर्शन घेतलं. 

परिसरातच एका भल्या मोठ्या पिंपळपारावर मोबाईल चार्जिंगला लावून बसलेल्या साधूबुवाशेजारी बसून कॉफी घेतली. रस्ता ओलांडून शुभ्र कमानीतून समोरच्या नर्मदा मंदिर परिसरात प्रवेश केला. सर्वत्र घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण होतं. डावीकडे धर्मशाळा, उजवीकडे उगम-परिसर. याशिवात या परिसरात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. हे देवीचं ३९वं शक्तीपीठ असून त्याला ‘चंद्रिकापीठ’ म्हणतात. 


वाटेत काही थकलेले पण चेहर्‍यावर अतीव समाधान असलेले परिक्रमावासी दिसत होते. त्यांच्यासाठी कुणी उलट जाऊ नये म्हणून एका रेषेच्या पलीकडे वेगळॆ प्रवेशद्वार व निर्गमन स्थान होते कारण परिक्रमा करताना नर्मदा नदी नेहमी परिक्रमावासीयाच्या उजव्या हाताला असावी असा नियम आहे. (फोटोत आम्ही त्या रेषेच्या अलिकडे पलीकडे उभे आहोत) नर्मदा ही भारतातील एकमेव अशी नदी आहे जिची पूर्ण परिक्रमा केली जाते. अमरकंटकच्या या उगमापासून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपारिक नियम आहे. 

हा कुंड परिसर पूर्ण पांढर्‍या संगमरवरात बांधलेला आहे. पण पाण्यात टाकलेल्या चढावामुळे पाणी गढूळ दिसत होतं. तेच काही जण बाटल्यात भरून घेत होते. मी फक्त पाण्याला स्पर्श करुन डोळ्याला लावलं आणि नमस्कार करून मैयाच्या दर्शनाला गाभार्‍यात गेले. बाहेर एक छोटा दगडी हत्ती आहे. त्याखालून गेलं की पापं नष्ट होतात. अभ्यासवर्गात दिल्लीच्या एका प्राध्यापिकेनं ती कशी त्याखालून जाऊ शकली वगैरे वर्णन केलं असल्याने उत्सुकता होती. बारीक माणसाची आणि लहान मुलांची पापं सहज सरपटत जात असल्याने लगेच नष्ट होत होती तर जाड किंवा वयस्कर माणसं मध्येच अडकून पापासकट परतत होती. काहींना तर नातेवाईक ओढून काढत होते. एकूण स्थिती पाहून आम्ही पापं तशीच ठेवायचा निर्णय घेतला. प्रसाद विकत घेतला , निकिता आणि मी एका भिंतीवर लिहिलेलं नर्मदाष्ट्क म्हटलं आणि बाहेर आलो. अभ्यासवर्गातली आणखी काही मंडळी बाहेर भेटली. 

लगतच भीमाने वनवासात असताना बांधलेलं कमळाचं तळं होतं. किनारा अस्वच्छ , जलपर्णी वाढलेली पण तळं मात्र सुंदर होतं. नाव इंद्रदमन. ते इंद्रियदमन असावं असं मी मनाशी ठरवून टाकलं.

   

वेळेअभावी कपिलधारा दूधधारा धबधबा पाहण्याचा विचार रद्द केला. ४० वर्षांपासून (हे जरा अतीच वाटलं) निर्माण स्थितीत असलेल्या श्रीयंत्राला भेट दिली. त्याचं प्रवेशद्वार हा आता अमरकंटकचा आयकॉन झालं आहे. त्याचा टॉप व्ह्यू सुरेख होता. अजूनही ते अपूर्ण आहे. पुढे गर्द झाडीतून प्रवास करत सोनमूडा इथे पोचलो. 

इथून सोन नदीचा उगम पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. डोंगरांच्या कुशीतून उगम पावणाऱ्या या नदीचं दृश्य मन मोहून टाकत होतं पण नदीचा प्रवाह उन्हाने आटून बारीक धाराच दिसत होत्या. माकडांना चुकवत शंभर फूट खाली व्ह्यू पॉईंटला जाऊन पाहिलं तर खाली अफाट पसरलेलं विविध हिरव्या छटा ल्यालेलं अफाट जंगल आणि त्यातच विलीन होत चाललेला सूर्याचा केशरी गोल. पुन्हा वर चढून कमानीबाहेर आलो. वाटाड्याच्या भावाचं समोरच विविध वस्तू भांडार होतं. त्याची पुतणी धावत येऊन काकाला बिलगली. गल्ल्यावर निवांत बसलेल्या तिच्या आईने जेठजींकडे लक्ष जाताच घाईने डोक्यावर पल्लू ओढला. पुढच्या वळणावर 'माई की बगिया' हे रमणीय ठिकाण वाटाड्याने दाखवलं. स्थानिक श्रद्धेनुसार नर्मदामैया इथे खेळायला येई. फुलझाडं, औषधी वनस्पती आणि हिरवाईने नटलेला हा परिसर अतिशय शांत होता. गर्दीही कमी होती. 


वाटेत ठरल्या ठिकाणी वाटाड्याला सोडलं. विस्तीर्ण पठारावर लांब एक कार दिसत होती. तिथून डावीकडे वळलात की पेंड्रा रोड रेल्वे स्थानकाकडे जाता येईल असं सांगून ’नर्मदे हर’ म्हणत तो उतरला. पठार संपले पण रस्त्याचा अंदाज येईना. ’देख लेंगे’ म्हणत डावीकडे वळलो आणि रस्ता लागला. डोंगररस्त्यांमधून जाताना पुन्हा एकदा जंगलाचं मनोहारी दर्शन घडलं. साग, साल, बांबू आणि अनामिक..बहुधा औषधी वनस्पतींची (असं वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणतात ) उभी झाडं दाटीने दिसत होती. वळणाचा रस्ता संपतच नव्हता. बरोबर जातोय का हे पाहावं तर जंगलात इंटरनेटने केव्हाच साथ सोडलेली. आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू अशी भुलभुलैया गत झालेली. निकिता बहुतेक हनुमान चालीसा किंवा भीमरूपी... काही तरी पुटपुटत होती. माहित नाही का पण मी निश्चिंत होते. परिक्रमा म्हणजे केवळ धार्मिक प्रवास नसून आत्मशोध आणि अहंकार गळून पडण्याचा प्रवास आहे असं म्हणतात. शुलपाणीच्या घनदाट जंगलातील भिल्लांचे अनुभव अनेकांनी नोंदवले आहेत. आम्हाला परिक्रमा न करताच ही गत झाली तर परिक्रमेचा अनुभव काय असेल ! पादचारी परिक्रमावासींना तर दंडवतच !


एकदाची एक गाडी समोरून आली आणि त्या चालकाने रस्ता योग्य असल्याची खात्री दिली पण गालात तोबरा असल्याने आम्हाला पुन्हा शंका आली. रस्त्यात अधूनमधून माकडांचे कळप, वळणावळणाचे घाटरस्ते दिसत होते. हिरवीगार झाडं आता अंधारामुळे काळपट दिसू लागली. चुकून एखादा माणूसप्राणी किंवा गाडी दिसताच थांबून आम्ही ओ भैया.. इधर इधर.. पेंड्रा पेंड्रा ओरडायचो व तो ’बरोबर’ अशी खूण करायचा, अखेर गाडी पेंड्रा रोड स्टेशनला पोचली. 

एका प्लॅटफॉर्मचं एखादी चुकार गाडी येणारं एखादे रामूकाका बसलेलं ,इवलं पत्र्याचं छत असलेलं स्टेशन असणार असं समजून केळकर सरांचा निरोप घेऊन आत शिरलो तर ते नॉर्मल आधुनिक स्टेशन निघालं. तिकिट काढलं तोवर बाकी मंडळीपण अशीच वाटचाल करत येऊन पोचली. पलीकडे दिल्लीला जाणारी मंडळी होती. एकमेकांना हात हलवून आम्ही दोन्ही तीरांवरून ओरडून माफक गप्पा मारल्या. दरम्यान आमची गाडी आली. आरक्षण नव्हतं. पुन्हा ’देख लेंगे’. टीटीई येताच मी अपडाऊन अनुभवातले विनम्र भाव चेहर्‍यावर आणून काय ते खरं सांगितलं. त्याने पण मग दुर्लक्ष किया. पुढच्या गीतांजलीचं आरक्षण अद्याप वेटिंग होतं. ती काळजी दर्शवताच सोबतचे दिनेशजी म्हणाले, "मोहिनीजी, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा नही करते."  


काळोखामुळे बाहेरचं काही दिसत नव्हतं. आता उस्लापूर नामक अगम्य स्टेशनला पोचलो. आता  बिलासपूरला जायचं होतं. सांगली-मिरजेसारखं हे जुळं प्रकरण होतं. रिक्शात फिल्मी गाणी ऐकत दिनेशजी, पांडेजी, मी आणि निकिता बिलासपूरला पोचलो. नागपूरसारखं मोठं शहर आहे ते. स्टेशन पाहून  तर सीएसटीची आठवण झाली. कँटीनला जेवलो आणि वेटिंग रूमला आराम करत गीतांजलीची वाट पाहू लागलो. गाडी दोन तास उशीरा आल्याने झोपेने वटारलेल्या डोळ्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान आरक्षण कन्फर्म झालं होतं. खरं आहे, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते. नर्मदामैया की जय! 


Tuesday, February 10, 2026

थोडं ’अ‍ॅनालॉग’ पण जगूया

 मुलांच्या आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निबंध माझ्याकडे परीक्षणाला आले होते. गंमत म्हणजे ९ स्पर्धकांपैकी ५ जणांचे बरेचसे मुद्दे सारखे. कारण ही होती ’ए-आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची कमाल. चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अन्य एखाद्या जनरेटीव्ह ए-आयला विषय द्यायचा, उत्तर कॉपी पेस्ट करायचं की झालं. हाय काय नाय काय !

नुकतंच वकीलांच्या एका अनौपचारिक सभेत एक ज्येष्ठ वकील महोदय भाषण देत होते. खरं तर वाचून दाखवत होते. पहिलं वाक्य संपताच ते अनवधानाने म्हणाले ’फुलस्टॉप’ आणि त्यांनी जीभ चावली. सगळे हसू लागले. भाषण ए-आयकडून लिहून घेतलं होतं हे उघड झालं होतं. एका उच्चपदस्थ व्यक्तीची ही स्थिती मग तुम्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल ! 

अर्थात तुमच्यासारख्या काही मुलांना  ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कुठे करायचा हे समजलं आहे. चेन्नईच्या कार्तिकला ए-आयच्या मदतीने बुद्धिबळात आणखी पुढे जाता आलं. वेगळ्या पद्धतीने खेळाकडे पाहता आलं. कोल्हापूरची ईशा गोष्टी लिहिते. ए-आयने तिला गोष्टीची सुरूवात आणि शेवट करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया दिल्या. नागपूरच्या स्मिताला गणिताची भीती वाटायची. ए-आय आधारित अ‍ॅपने तिची भीती गेली, उलट तिला गणित शिकताना मजा वाटू लागली. जळगावचा अतुल तर ए-आयच्या मदतीने जर्मनचे धडे शालेय वयापासूनच स्वत:चे स्वत:  गिरवतो आहे. 

अनेक शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ए-आय आधारित प्रकल्प सादर केले आहेत. बेंगळुरूचा अर्जुन पाण्याची बचत करणारा प्रकल्प घेऊन पुढे आला, तसंच काही विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि शेतीविषयक प्रश्नांवर ए-आय आधारित उपाय सुचवले आहेत. एका विद्यार्थिनीने मुलींच्या सुरक्षेसाठी एक अलार्म फीचर ए-आय अ‍ॅपसाठी सुचवलं. बातम्यांमध्ये हे प्रकल्प पाहून असं जाणवतं की भारतीय मुलं केवळ तंत्रज्ञान वापरत नाहीत, तर ए-आय च्या मदतीने समाजातल्या विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

AI म्हणजे एक प्रकारचा संगणकीय मेंदू जो माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून शिकतो. जसं आपण चुका करत शिकत जातो तसंच ए-आय देखील अनुभवातून शिकत अधिक अचूक होत जातो. जगभरातील  मुलं नकळत ए-आय सोबत मोठी होत आहेत. तुम्ही ज्या जगात वाढत आहात ते जग तुमच्या आई-वडिलांच्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागत होती; चार पुस्तकातून संदर्भ मिळवावे लागत होते. आज मात्र ए-आयला एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर तो सोप्या भाषेत समजावून सांगतो. . ए-आय शेफ नामक मशीनमध्ये पदार्थ घाला, मेनू निवडा आणि स्वयंपाक तयार. ऑनलाइन शिक्षण, प्रोजेक्ट्स, त्रुटी शोधणं, गृहपाठ करणं, माहिती शोधणं, भाषा शिकणं, लेखन करणं, संवाद लिहिणं, मोठ्या ग्रंथाचा गोषवारा काढणं, ग्राफिक्स, व्हिडिओ, चित्रकला, संगीत, कोडिंग, रोबोटिक्स हे सगळं या तंत्रज्ञानामुळे सहजसाध्य झालं आहे. 

इथपर्यंत ठीक आहे पण आईबाबांना वेळ नसतो किंवा काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत तेव्हा गप्पा सुद्धा मारता येतात त्याच्याशी.  तुम्हाला वाटतं, ए-आय किती छान आहे. तो माझी वर्गात पहिला येणार्‍या मुलाशी तुलना करत नाही, एखादे वेळी कमी मार्क मिळाले म्हणून माझ्यावर रागावत नाही. मी किती हुशार आहे, चांगला आहे याबद्द्ल उलट माझं कौतुक करतो. मग मी का करू नको त्याच्याशी मैत्री ? 

उत्तर सोपं आहे. 

त्याला भावना नाहीत. त्याला तुमचं भलं कशात आहे ते समजत नाही. आजी आजोबा, दादा ताई, आईबाबांसारखं तुमच्यावर त्याचं प्रेम नाही. वॉशींग मशीनचं काम काय असतं, कपडे धुणं. त्याच्याशी आपण गप्पा मारतो का, मैत्री करतो का? नाही, कारण ते केवळ यंत्र आहे. ए-आयला भाषेची समज असल्याने, सखोल ट्रेनिंग दिलेलं असल्याने त्याला तुमच्याशी माणसासारखं बोलता येतं पण शेवटी ते ही एक प्रकारे यंत्रच आहे. अलेक्सा ,सीरी या व्यक्ती नाहीत, ती यंत्रांची नावं आहेत. ए-आय मैत्रीचा आभास निर्माण करू शकतं, तुमच्या भावना ओळखून तुम्हाला आवडेल असा प्रतिसाद देऊ शकतं पण त्यात वैयक्तिक भावनांचा ओलावा नसतो, मायेचा स्पर्श नसतो, काळजी नसते. त्याची उत्तरं किंवा कृती म्हणजे फक्त एक तांत्रिक क्रिया असते. त्यामुळे त्याच्याशी मैत्री बित्री करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.  

ए-आयचा फक्त वापर करावा. तो ही योग्य पद्धतीने आणि मर्यादेत. 

२०२४–२५ मध्ये अनेक राज्य सरकारांनी डिजिटल आणि ए-आय आधारित शिक्षण पद्धतींचा प्रयोग सुरू केला. काही शाळांमध्ये तो शिक्षकांना मदत करणाऱ्या साधनासारखा वापरला जाऊ लागला आहे. शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओ, आराखडे, प्रेझेंटेशन, उदाहरणं मॅजिकस्कूल सारख्या विविध ए-आय टूल्सच्या मदतीने शिक्षक तयार करू लागले आहेत. मुलांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. मात्र  काही पालक आणि शिक्षकांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ए-आय तयार आणि त्वरित उत्तरं देत असल्याने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती कमी होऊ लागली आहे कारण मेंदूला काम करायची सवयच राहत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी ए-आय कडून तयार केलेला मजकूर जसाच्या तसा सादर केल्याचं दिसू लागलं. 

समजा तुम्हाला एक कागद आणि पेन्सील देऊन एखादा सीन काढायला सांगितला, तर? डोळे मिटा ,विचार करा ,काढा चित्र... 

९० % मुलं काय चित्र काढतील? डोंगर, सूर्य, उडते पक्षी, खाली नदी, बाजूला झोपडी. हो नं? वेगळं काही नाही. असं का, कारण चौकटीबाहेरचा विचार करण्याची आपली क्षमता ए-आय आणि मोबाईल सारख्या गॅजेट्सच्या अती वापराने कमी होत चालली आहे. 

भारतीय भाषांमध्ये AI उपलब्ध होणं ही खूप मह्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. मराठीत, हिंदीत किंवा इतर भाषांत प्रश्न विचारता येत असल्याने तुम्हाला शिकणं सोपं झालं आहे. मात्र काही ए-आय साधनांमध्ये ती माहिती अपुरी किंवा चुकीची असते. वाक्यरचना, व्याकरण विचित्र असतं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की ए-आय ने दिलेली माहिती तपासून पाहण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. पुस्तकं, शिक्षक आणि ए-आय — या तिन्हींचा संगम असेल, तरच शिकणं परिपूर्ण ठरेल. कल्पना, भावना आणि अनुभव मुलांचे असतील, ए-आय फक्त साधन म्हणून काम करेल कारण संपूर्ण काम त्याला करायला लावलं तर सर्जनशीलतेला मर्यादा येऊ शकतात. 

ए-आय वापरायचं आहे ते आपला मदतनीस म्हणून , मालक म्हणून नव्हे, केवळ कॉपी पेस्ट साठी नव्हे,  

त्यासाठी कोणत्या वयात कोणतं तंत्रज्ञान योग्य- हे आधी समजून घेऊया. 

१०–१२ वर्षं :   शाळेतल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अ‍ॅप्स, गृहपाठासाठी जनरेटीव्ह ए-आय, शैक्षणिक व्हिडिओ, काही मजेदार गेम्स मर्यादित प्रमाणात.

१३–१५ वर्षं :  अभ्यास, कौशल्य शिकणं, भाषा शिकणं, थोडं मनोरंजन (मर्यादेत), वेळेचं भान महत्त्वाचं.

या वयापर्यंत पालकांसह, आईबाबांबरोबर बसून हे सगळं शिकणं, समजून घेणं, ते तंत्रस्नेही नसतील तर त्यांना सांगून त्यांच्यासमवेत हे करण्ं अपेक्षित आहे.  

१६–१८ वर्षं :  व्यावसायिक कौशल्य शिकणं, जबाबदारीनं वापर करण्यासाठी स्वतः नियम ठरवणं, करिअरसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अभिप्रेत आहे.

वय वाढतं तसं स्वातंत्र्य वाढतं पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. 

हे नीट माहीत असलेली मुलं सुद्धा ए-आय आणि गॅजेट्सच्या आहारी जातात. कारण..

* FOMO ( fear of missing out) - हे वापरलं नाही तर या आधुनिक जगातल्या घडामोडी मला कळणार नाहीत. मी मागे पडेन अशी भीती वाटू लागते.

* ’बोर होतंय’ म्हणणार्‍या मुलांना फोन, टॅब हातात घ्यायला सोपा. क्षणात एक नवं ,मोहक, वेड लावणारं विश्व समोर उभं राहतं. 

* सोशल मिडियावरच्या “लाईक”, “कमेंट”, “शेअर” यामुळे आपण कुणीतरी विशेष आहोत असं भासू लागतं. 

यामुळे ए-आय फीचर वापरून तयार केलेले फोटो, पोस्ट शाळकरी मुलं, मुली सोशल मिडियावर ट्रेंडच्या नावाखाली टाकतात. सायबर गुन्हेगार त्यांना हेरतात. संवाद वाढवून विश्वास संपादन करतात आणि मग त्या फोटो, माहितीचा गैरवापर होतो. कधी सेक्सटिंगसाठी, कधी धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तर कधी भुरळ घालून लैंगिक शोषणासाठी. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण खाजगी डाटा अनोळखी व्यक्तीला कधीही द्यायचा नाही, खोट्या इंप्रेशनसाठी अनोळखी मित्र विनंती स्वीकारायची नाही, फोटो पब्लिक शेअर करायचे नाहीत हे तुम्ही सुद्धा समजून घेणं ही आजची गरज आहे. 

ए-आय आधारित ऑनलाईन गेमिंगचं वेड आणि वरच्या लेव्हलवर जायचा नाद, त्यासाठी लागणारे पैसे आणि त्यातून चक्क आपल्याच घरात मुलांनी केलेल्या चोर्‍या अशा गुन्ह्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. 

काही अ‍ॅप्स मुलांकडून माहिती गोळा करतात, हे लक्षात आल्यानंतर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. 

ए-आयच्या अतिरेकी वापरामुळे प्रत्येक देशाचं सरकार मुलांच्या डिजिटल सेफ्टीवर गांभीर्याने विचार करू लागलं आहे. फ्रान्सने १५ वर्षांखालील सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे. चीनने विद्यार्थ्यांना गेमिंग अ‍ॅप्स वापरण्याला ठराविक तासच परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील शासनाने विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापराविषयी कडक नियम पारित केले आहेत. सगळे युरोपियन देश स्क्रीन टाइम मर्यादा, डेटा सुरक्षाविषयी सजग झाले आहेत. कारण सगळ्यांना कळलंय — स्क्रोल करण्यात वेळ घालवला तर मुलांचं भविष्य कधीही घडणार नाही. उद्या तुम्हीच विचाराल, ही स्थिती येईतो तुम्ही काय केलंत ? 

भारतामध्येही काही महत्त्वाचे नियम आहेत—  मुलांसाठी अयोग्य अससेल्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी IT Rules २०२१ आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा २०२३ अद्यावत करण्यात आला आहे. मुलांनो, हे कायदे, या चर्चा तुमच्याविरुद्ध नाहीत, तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आहेत.

ए-आय चा एक गंभीर सामाजिक दुरूपयोग म्हणजे चुकीची माहिती आणि बनावट सामग्री. ए-आय वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओ आणि आवाज (डीपफेक) याचं प्रमाण वाढतं आहे. पंतप्रधान  मोदींचे गरबा खेळतानाचे, ट्रम्प बरोबर नाचतानाचे डीपफेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते बनावट असल्याचं ओळखायला शिकलं पाहिजे. कितीही मज्जा वाटली तरी ते शेअर करण्याचा मोह टाळला पाहिजे. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे दिसतं आहे ते अधिकृत सोर्सकडून आलं आहे का, हे अस्सल वाटत असलं तरी बनावट (डीप फेक) तर नाही नं, ही शंका कायम मनात आली पाहिजे. फॅक्ट चेक साठी अल्ट न्यूजसारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून माहितीची सत्यता तपासता येईल. 

ए-आयची नकारात्मक बाजू बातम्यांमधून जास्त दिसत असल्यामुळे पालक घाबरून जातात, गॅजेटच्या अतिवापरावरून घरात वादविवाद सुरु होतात. तुम्हाला काही चुकीची माहिती तर मिळणार नाही, फसवणूक तर होणार नाही, सायबर गुन्हेगारांचं तुम्ही सावज तर ठरणार नाही याची त्यांना सतत भीती असते. त्यांना तुमचं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. बाहेर खेळायला जाणं कमी झाल्याने तुमच्या वाढत्या वजनाची चिंता वाटते. वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे  तुमचे थकलेले डोळे , सतत स्क्रीनवर येणार्‍या माहितीच्या महापुराने शिणलेला मेंदू ,अपुरी झोप यामुळे त्यांना तुमच्याविषयी चिंता वाटते.  

अमेरिकेतल्या जेनेल हॉफमन नावाच्या आईने यावर एक उपाय शोधला होता. आपल्या १३ वर्षाच्या मुलाला मोबाईल फोन देताना तिने त्याला काही अटी लिहिलेलं पत्र दिलं होतं. त्या अटी आजच्या ए-आय जगातल्या तुम्हा मुलांनी समजून घ्याव्यात. 

* हा फोन तुला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून काही काळासाठी दिलेला आहे. तुझं वागणं अयोग्य वाटलं तर तुझ्याशी चर्चा करून आम्ही तो परत घेऊ.

* ऑनलाईन काही चुकीचं दिसलं तर तू लगेच आम्हाला सांगायला हवंस. तुझे पासवर्ड आम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 

* फोन लांब ठेवून मित्रांना प्रत्यक्ष भेटणं, मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंगला जाणं, सहलीला जाणं, निसर्गात, पुस्तकात रमणं, आमच्याशी गप्पा मारणं, हसणं, एखादी कला शिकणं जगण्यासाठी करियर इतकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात डिजिटल जगातून वेळ काढून थोडं ’अ‍ॅनालॉग’ही जगता आलं पाहिजे. 

भारतीय संस्कृतीत ज्ञानासोबत विवेक, संयम आणि दायित्व यांना महत्त्व आहे. ए-आय वापरताना ही मूल्यं अधिकच महत्त्वाची ठरतात. तंत्रज्ञान माणसाला वेगवान करू शकतं, पण त्याला दिशा माणसालाच द्यावी लागते. तुम्ही वयाच्या अशा वळणावर आहात जिथे संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. ए-आय ने करियरची नवी दालनं उघडली आहेत, पण त्याचबरोबर विचारपूर्वक वापराची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचं वय कुतूहलापोटी नको ते करून पाहण्याचं आहे. ते अगदी स्वाभाविक आहे पण इथेच तोल सावरायचा आहे. 

त्यासाठी काही तांत्रिक बंधनं स्वत:वर घालून घ्या किंवा तुमच्या आईबाबांना नेट नॅनी, कॅनोपी सारखे पॅरंटल कंट्रोल अ‍ॅप्स, वॉचर सारखे डिव्हाईस मॉनीटरींग अ‍ॅप वापरायला सांगा. चॅट-जीपीटी मध्ये तुमचा मेल आयडी कौटुंबिक खात्याशी जोडता येतो, तुमच्या चॅटवर यामुळे आईबाबांचे नियंत्रण राहील. फॅमिली लिंक अ‍ॅपद्वारे तुमचा जेमिनाय अ‍ॅक्सेस त्यांना मर्यादित करता येईल. यामागे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा हेतू नसून ही तुमची जपणूक आहे हे लक्षात घ्या.

योग्य मार्गदर्शन, प्रश्न विचारण्याची सवय आणि मूल्यांची जाण असेल, तर ए-आय तुमच्यासाठी केवळ तंत्रज्ञान न राहता उज्ज्वल भविष्याकडे नेणारा महामार्ग ठरू शकतो.

ए-आयसह चालताना डोळे उघडे ठेवणारी, मन जिज्ञासू ठेवणारी आणि माणुसकी जपणारी पिढीच खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडवेल. पटतंय का ! 

यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे. लेखाच्या सुरुवातीच्या उदाहरणातले वकील महोदय चुकून ’फुलस्टॉप’ म्हणाले होते. ए-आय वापरताना कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नवोदितांना शिकवायचं आहे.     

#AIEthics #ResponibleNetizen

- Published in February 2026 in #Mulanche_Masik

Monday, January 26, 2026

महिलोन्नती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन


संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती किंवा अध्यात्म नव्हे. समाजप्रबोधन हा त्याचा गाभा असतो. ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग माणसाच्या अंतरात्म्यापासून सुरू होतो हे महाराष्ट्रातली संतपरंपरा कायम सांगत आली आहे. तुकडोजी महाराज त्यापुढे जाऊन म्हणतात, ’कशास फिरतो व्यर्थ, तुझे गावच नव्हे का तीर्थ!’ 

गावाची उन्नती, गावकर्‍यांच कल्याण यातच त्यांचं अध्यात्म सामावलेलं होतं. ते राष्ट्रसंत ठरले कारण त्यांनी व्यक्ती पासून समष्टीपर्यंत जाताना गाव, समाज, राष्ट्र आणि माणूसपण अशा सर्व पातळ्यांवर विचार मांडला. त्यांच्या साहित्याने आणि वाणीने समाजाला सतत एक प्रश्न विचारला —आपण माणूस म्हणून, समाज म्हणून खरंच पुढे चाललो आहोत का?”** इथेच ते थांबले नाहीत तर  त्यांनी समाजाला परिवर्तनाचा मार्गही दाखवला आहे.

खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी भारतभर राष्ट्रधर्माचा विचार पेरला. केवळ प्रबोधनच केलं नाही तर १९४२ च्या ब्रिटीशांविरूद्ध झालेल्या क्रांती आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 'देश हा देवची पवित्र । कायदा त्याचे व्यवस्था सूत्र' यावर भर दिला. इतका व्यापक विचार करणार्‍या राष्ट्रसंतांच्या नजरेतून देशाचा अर्धा भाग असलेल्या महिलांची उन्नती हा मुद्दा सुटला असता तरच नवल! म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात - 

'महिलेविण विश्व न झाले, काय होते पुरुषाने केले' 

राष्ट्रसंतांना हे स्पष्ट दिसत होतं की, ज्या समाजात स्त्री दुर्लक्षित, अशिक्षित, परावलंबी आहे, तो समाज कितीही प्रगतीची भाषा बोलत असला तरी आतून पोकळ असतो. त्यासाठी त्यांनी आपल्या साहित्यातून महिलोन्नतीची वाट दाखवली. ग्रामगीतेत या नावाचा एक स्वतंत्र अध्याय लिहीला.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर स्त्रियांनी कसं वागावं हेच समाज सांगत आलेला आहे  पण तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून समाजपुरुषाला खणखणीत शब्दात सांगितलं आहे की स्त्रियांशी कसं वागावं, तिच्याविषयी नेमका काय विचार करायला हवा, तिला कसं वागवायला हवं. हेच  त्यांच्या साहित्याचं वेगळेपण आहे. 

-------------

१९७५ साल हे युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. ८ मार्च हा महिला दिन निश्चित झाला आणि महिलांच्या प्रश्नांकडे जगाचं आणि आपल्या देशाचंही लक्ष वेधलं गेलं. मला नवल वाटतं की या घडामोडींच्या कितीतरी आधी १९६८ साली देह सोडून गेलेल्या तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून हे प्रश्न मांडले होते आणि ते ही उत्तरांसकट. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे शब्द कुठेही न वापरता स्त्रीशक्ती काय आहे हे त्यांना कळलं होतं, तिचं सामर्थ्य आणि जगाला जन्माला घालणारा आणि त्याची जोपासना करणारा तिच्यातला मातृभाव कळला होता. इतक्या जवळून की तुकडोजी महाराजही भावनाविवश होऊन म्हणतात-  

तिच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने 

आणि म्हणूनच या जगातलं मांगल्य, सौंदर्य जिच्या अस्तित्वामुळे आहे त्या स्त्रीची उन्नती म्हणजे समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची  उन्नती असं मुलभूत चिंतन राष्ट्रसंतांनी मांडलं. 

संती माऊलीचे रूप दिले , तरीच ते देवपणासी पावले ....       पण माउली तिथेच राहिली . 

स्त्री जर अज्ञानात, भीतीत आणि बंधनांत अडकलेली असेल, तर तिच्या हातून घडणारी पुढची पिढीही त्याच मर्यादांत अडकते. ते लिहितात

देवाने निर्मिली ही क्षिती,  तिचे उदरी खाणी किती 

परि माऊली जैसी प्रेमळ दीप्ती,  कोठेच नाही 

महाराज म्हणतात. ती घरातल्या संस्कारांची शिल्पकार आहे. 

'गर्भापासून तिचे संस्कार, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. '

इथे पुत्रीची घडण लिहिलं नाहीये. पुत्राची. पुत्राला जर तिने चांगला पुरूष व्हायला शिकवलं तर समाजातल्या कितीतरी स्त्रीविषयक समस्या कमी होतील. आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणार्‍या स्त्रीशी कसं वागायचं हे पुरूषांना कळत नाही. एकमेकांना मदत करण्यात कमीपणा नाही, तिलाही तिचा अवकाश आणि पंख मिळाले पाहिजेत हे एका आईनेच आज मुलाला सांगणं आवश्यक आहे. मुळात बायकांमध्ये एक उपजत शहाणपण होतं. फक्त हे शहाणपण दाखवायला त्यांना बाहेर वाव मिळाला नाही. मिळाला तर एक स्त्री कमाल करू शकते हे त्यांनी जाणलं होतं. 

प्रल्हादाची कयाधू , छत्रपती शिवरायांची चे जिजाई, श्रीरामांची कौसल्या, श्रीकृष्णाची देवकी यांनी अक्षरश: युगपुरूष घडवले आहेत ही एका स्त्रीची ताकद आहे. आजच्या सायबर पालकत्वाची आव्हानं पेलणं तिला सहज शक्य आहे. 

------------

परंतु तिच्या ताकदीची जाणीव तिला स्वत:ला आणि समाजाला म्हणावी तशी नाही आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, त्या अर्थाने आज साक्षरता बरीच वाढली आहे पण शिक्षण म्हणजे विचारांची मशागत. माणसाची बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण अशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. हाच विचार राष्ट्रसंत सोप्या भाषेत मांडताना म्हणतात - स्त्रीने शिकावं, विचार करावा,  प्रश्न विचारावे, अंधपरंपरेला आव्हान द्यावे, त्याज्य गोष्टी नाकाराव्या, योग्य-अयोग्याचा विवेक ठेवावा

शिक्षणामुळे स्त्रीला —स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, आपले हक्क समजतात, आपल्यावर अन्याय झाला आहे, हे ओळखण्याची दृष्टी मिळते. अन्यथा वो जानतेही नही की वो जानते नही , और इस ना जानने को उम्रभर जिये जाते है 

काही जणांना वाटतं की वैदिक काळात होत्याच की स्त्रिया उच्चशिक्षित. ते गार्गी मैत्रेयीचे दाखले देतात. हो नक्कीच होत्या पण इस. पाचशे ते हजार मध्ये भारतावर सातत्याने होणार्‍या बाह्यआक्रमणांमुळे तिचं विवाहाचं वय कमी झालं, शिक्षणाची दारं बंद झाली आणि स्त्री माजघराकडे वळली. सुरक्षेच्या आणि योनीशुचितेच्या काळजीपोटी तिच्यावर बंधनं आली. बाईच्या जातीने कसं वागावं याचे नियम समाजापुरूषाने ठरवले. म्हणूनच ’द सेकण्ड सेक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकात लेखिका सीमान द बोव्हा म्हणते स्त्री कधी जन्माला येत नाही ती स्त्री म्हणून घडवली जाते. अगदी घरातल्या आईचंही मुलगा कसा वाढतो आहे इकडे फार लक्ष नसतं पण मुलीच्या जातीने कसं वागलं पाहिजे यावर तिचा कटाक्ष असतो. परिणामी प्रश्न तसेच राहतात. 

--------------------

आता कुठे राहिलंय तसं काही,  केवळ विशीतली सहर शेख  मोबाईल च्या स्क्रीनवर ’कैसा हराया’ म्हणताना दिसते. दुसरीकडे सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसतात. स्त्रिया सायकलपासून विमानच काय अगदी युद्धनौकाही चालवतात मग अजून काय समानता बाकी आहे , कोणती प्रगती शिल्लक आहे ? 

याचंच उत्तर शोधण्यासाठी पेटीएम या कंपनीने मध्यंतरी एक प्रयोग केला होता. 

एका मोठ्या खोलीत मध्यभागी एक रेषा आखून त्यावर तीस ते पन्नास वयोगटातल्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांना त्यांनी उभं केलं. त्यांना सांगितलं तुम्हाला स्पीकरवर प्रश्न ऐकू येईल , उत्तर हो असेल तर एक पाऊल पुढे जायचं, नाही असेल तर एक पाऊल मागे जायचं. मग प्रश्न सुरू झाले आणि ते पुढे मागे जाऊ लागले. सुरूवातीचे प्रश्न साधारण असे होते - वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी तुम्ही दुचाकी चालवायला शिकलात का, महाविद्यालयापर्यंत तुम्ही एक तरी खेळ नियमित खेळलात का , तुमचे कपडे तुम्हाला इस्त्री करता येतात का, घरातली बिलं तुम्ही भरता का, तुमचं स्वत:चं नेट्बँकिंग अकाऊंट आहे कां,  सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला तुमचं पोट भरण्यापुरता स्वतःसाठी दोन वेळेचा स्वयंपाक करता येतो का ? 

इथपर्यंत स्त्री-पुरूषांमध्ये फार अंतर नव्हतं मग पुढचे प्रश्न आले, तुमचं वाहून तुम्ही स्वतः खरेदी केलं आहे का, वेळ पडल्यास स्वत: दुरूस्त करता का? काही खरेदी करायचं असल्यास तुम्ही कधी एकट्याने निर्णय घेता का ? एकट्याने बाहेरगावी जाता का? स्वत: नियोजन करून तुमचे तिकीट तुम्ही काढता/मॅनेज करता का? तुमच्या घराच्या पाटीवर तुमचं नाव आहे का? इ. इ.

अंतर वाढलं असेल की कमी झालं असेल याचं उत्तर सहज लक्षात येईल. म्हणजेच मोठे बदल झाले असले तरी खूप लहान लहान मुलभूत बदल अजून बाकी आहेत. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. 

---------------

स्त्रियांनी आपल्या कक्षा रुंदाव्यात हे सांगताना आणखी एक मह्त्वाचा विचार राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून मांडला तो म्हणजे ग्रामजीवनात स्त्रीचा सक्रिय सहभाग. याचा अर्थ कागदावर महिला सरपंच आणि खुर्चीवर तिचा पती असा सहभाग नव्हे. ** राष्ट्रसंतांचं साहित्य हे केवळ वैचारिक नाही, तर अत्यंत कृतीशील आहे. त्यातून त्यांनी स्त्रियांना —  ग्रामसभेत सहभागी होण्याचं , स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यामध्ये पुढाकार घेण्याचं, स्वयंशिस्त आणि स्वावलंबन विकसित करण्याचं आवाहन केलं आहे. .त्यांच्या मते, स्त्रीला निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवून खरा ग्रामविकास होऊच शकत नाही.आज आपण पंचायतराज, महिला आरक्षण याबद्दल बोलतो; पण राष्ट्रसंतांनी हे बीज अनेक दशकांपूर्वी पेरलं होतं. 

त्यांनी लिहिलं आहे, स्त्रियांच्या संघटना असाव्यात. तीळगूळ समारंभ, हळदी कुंकू, शारदोत्सव, संमेलन सभा कीर्तन कथा व्हाव्यात. हल्ली सामूहिक स्वरूपाचे असे काही कार्यक्रम राजकीय पक्ष किंवा मनोरंजन वाहिन्या घेतात. त्यात कुणी सेलेब्रिटी कलाकार असतात. त्यांनी येऊन नाचायचं, बायकांनी येऊन गाण्यांवर नाचायचं, आयोजकांनी त्यांना अत्यंत सुमार प्रश्न विचारायचे. अजूनही उखाणे स्पर्धा, थाळी सजवणे, मॅचिंग स्पर्धा यातून हे कार्यक्रम बाहेर न पडल्याने यातून कवडीचंही सक्षमीकरण होत नाही. यापेक्षा कलाधारित स्पर्धा, दर्जेदार सादरीकरण, बचतगटांचे स्टॉल्स, चांगली भाषणं यावर भर द्यावा.

याची कल्पना असल्यासारखं महाराजांनी पुढे लिहीलं आहे- स्त्रियांनी बाहेर पडावं, एकत्र यावं, आत्मभान वाढवावं, त्यासाठी वाचनालयात महिला विभाग सुरू व्हावेत. 

राष्ट्रसंत तिला कधीच “बिचारी स्त्री” म्हणत नाहीत. ते म्हणतात —स्त्री सक्षम आहे, फक्त तिच्या क्षमतेवर समाजाने विश्वास ठेवायला हवा. सन्मान हा तिचा अधिकार आहे. सन्मान म्हणजे महिला दिनाला ;तू दुर्गा तू लक्ष्मी’ असल्या पोस्ट फॉरवर्ड करणे नव्हे , सन्मान म्हणजे — तिचं मत ऐकणं,  तिच्या श्रमांना किंमत असणं, तिच्या निर्णयांना विचारात घेणं. परप्रकाशी चंद्रापेक्षा तिला स्वयंप्रकाशी काजवा होऊ देणं. तिला तिचा हक्काचा वाटा देणं.  

 शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी आठवतात इथे. एका सभेत भेगाळलेल्या पायांच्या , रापलेल्या हातांच्या, डोळ्यात भीती आणि कुतूहल घेऊन बसलेल्या शेतकरी स्त्रियांना त्यांनी विचारलं, " बाईच्या जन्माला आलो याचा कधी आनंद झाला का ?" त्यावर एका बाईने अचानक एक ओळ म्हणून दाखवली "बाईच्या जल्मा नको घालू शिरीहारी , रात अन दिस परायाची ताबेदारी"  

यावरूनच जोशींनी  शेतकरी संघटनेच्या ’स्वातंत्र्याच्या कक्षा’ या संकल्पनेचा पाया घातला.  त्यानंतरच्या चांदवड अधिवेशनानंतर स्त्रियांमध्ये इतकी उमेद आली की एकीनं आपला अनुभव सांगितला- मालक म्हनलं आंगुळीचं पानी काड. म्या म्हनलं तुमचं तुमी काडा , हातचं काम टाकून मी काय बी करनार न्हाई" यातून पुढचं पाऊल नव्वदच्या दशकातलं ’ लक्ष्मी मुक्ती ’ आंदोलन . यात दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी जिचा एका चमच्यावरही अधिकार नव्हता त्या आपल्या पत्नीच्या नावे जमिनीचा सातबारा करून दिला. 

याच धर्तीवर अविकसित समाजातील स्त्रियांना विकासापर्यंत त्यांना न्यायचं तर त्यांना आधी त्यांच्या परिस्थितीची , हक्कांची जाणीव करून द्यायला हवी हे भान तुकडोजी महाराजांना होतं.

-----------

अंधश्रद्धा आणि जुनाट रूढींचे स्त्रीच्या उन्नतीतील मोठे अडथळे दूर व्हावेत हे राष्ट्रसंतांनी ठामपणे मांडलं आहे. त्यांना ठाऊक होतं की, स्त्रीच्या पायात बेड्या घालणारी वृत्ती बहुतेक वेळा धर्माच्या आडून येते, पण ती धर्म नसते — ती अज्ञान असते.ज्या रूढी — स्त्रीला दुय्यम वागणूक देतात,  तिला पाप-पुण्याची भीती दाखवतात,  तिच्या प्रश्नांना “मर्यादाभंग” ठरवतात त्यांना ते विरोध करतात. त्यांच्या लेखनात वारंवार जाणवतं जिथे जिथे धर्म काही रूढींमुळे माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल, तिथे तिथे त्यांची चिकित्सा आवश्यक आहे. स्त्रीच्या बाबतीत तर त्यांचा हा विचार आणि स्वर अधिक तीव्र होतो. 

बहुतेक धर्मग्रंथात स्त्रीच्या दुय्यमत्वाचा कधी स्पष्ट तर कधी नकळत उल्लेख येतो. 

अगदी राजकारणातही सर्वत्र "आम्ही बांगड्या भरल्या नाहीत". "मर्द असशील तर माझ्याशी लढ"  अशी भाषा आपण ऐकतो. लोक शिव्या देताना सर्रास आई बहिणीचा उद्धार करतात. सोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्त्रीच्या, अभिनेत्रीच्या, स्त्री खेळाडूच्या किंवा राजकारणातील स्त्रीच्या पोस्ट खालच्या किंवा बातमी खालच्या कॉमेंटचा दर्जा पाहिला तर आपला सर्व साधारण समाज स्त्रियांकडे आजही कशा नजरेने पाहतो ते सहज कळेल. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांचा महिलोन्नतीचा विचार दुर्दैवाने आजही तितकाच गरजेचा आहे. त्यांचं साहित्य आपल्याला जाणवून देतं की 

* स्त्री उन्नती ही तात्पुरती योजना नाही, ती मानसिकता आहे जी मातांना आपल्या मुलांमध्ये पेरायची आहे. 

* ती कायद्याने नाही, तर संस्कारांनी रुजते तसे संस्कार द्यायचे आहेत.

* ती केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीनेच  साकार होऊ शकते, हे स्व:त:च्या वार्तनातून ठसवायचं आहे.

----------------

व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन , असं हल्लीच्या आधुनिक मुली विचारतात. महाराजांनी तर हे त्याआधीच लिहून ठेवले आहे - "जे जे सुख असेल पुरुषांना महिलांचेही ते असावे अभिन्नपणे ". महाराज पुढे म्हणतात - रथाची दोन्ही चाके मजबूत करावी. माता अशा आदर्श असल्या तर त्यांच्या पोटी येणारे आदर्श संतान भारताचा वैकुंठ घडवतील.... 

शेवटी ते स्त्रीपासून स्त्रीतत्वापर्यंत जात हे ही सांगून जातात

जिकडे जातील तिकडे, स्त्रीच आहे मागेपुढे, अंतरी बाहेरी प्रकृतीचे वेढे,  जिवापाडे पडले हे 

पुरूष आणि प्रकृतीरूपी स्त्रीचं हे चिरंतन नातं समानतेचा नव्हे परस्परपूरकतेचा संदेश देतं आहे. हाच आभाळाएवढा संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून दिला, भजन कीर्तनातून त्याचा पुनरुचार केला. स्वत:चा उल्लेख करताना मात्र ते विनम्रतेने स्वत:विषयी लिहितात ’तुकड्या म्हणे’ 



 ----------------------------


परिसंवाद - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, अकोला,  जानेवारी २०२६