एका सहित्य संस्थेचा ’भारतीय साहित्य की मूलदृष्टी एवं समकालीन साहित्य’ हा अभ्यास वर्ग जूनमध्ये अमरकंटकला ठरला. इतक्या दूर जावं की नं जावं विचारत पडले पण निकिताची कंपनी मिळाली. ती म्हणाली चल गं, जाऊया. मग केला प्लॅन पण एकाही गाडीचं आरक्षण उपलब्ध नाही. शिवाय थेट गाडी नाही. पण म्हटलं ’देख लेंगे’. काळजी करायला ही काही कुटंबाची ट्रीप नव्हती. केळकर सर नागपूरहून अमरकंटकला कारने जाणार म्हटल्यावर जाण्याचा प्रश्न सुटला. बरोबर सँडविच , ठेपले घेतले होते. जंगलातल्या डोंगरावर असलेल्या या स्थळाच्या माथ्यावर पोचायचं होतं.
नागपूरच्या पुढे पेंच अभयारण्य ओलांडून जबलपूरमार्गे घटीया, बिछीया अशी याकारांत गावं ओलांडत कार जात होती. मध्यप्रदेशातली खेडी अपेक्षेपेक्षा चांगली, स्वच्छ, बरीच घरं पांढर्या रंगात रंगवलेली अशी नेटकी पाहून आश्चर्य वाटलं. जसजसं अमरकंटक जवळ येऊ लागलं, तसतसं परिसरातली घनदाट वनराई , वनराई नसून जंगल आणि मोहक वाटणार्या डोंगररांगा गूढ वाटू लागल्या. रस्त्यातून सुर्र्कन जाणारे ससे आणि लांबून चमकणारे कोल्ह्याच्या पिल्लांचे डोळे दिसू लागले. समोरुन दहा-पंधरा मिनीटांनी एखादीच गाडी येत होती. मागे एकही दिसत नव्हती. इथे गाडी बंद पडली तर ! पुन्हा मनात.. ’देख लेंगे’
नऊ साडेनऊ तासांनी अभ्यासवर्गाच्या जागी म्हणजे इंदीरा गांधी जनजातीय विश्वमहाविद्यालयात पोचलो. सोय उत्तम होती. शुद्ध गोड हिंदीत गरमागरम जेवणाने स्वागत झालं. दमल्याने अनौपचारिक काव्य संमेलनात श्रोता म्हणून सहभागी व्हायचंही त्राण उरलं नाही. गाडी घ्यायला येईतो एक दोन कविता ऐकल्या इंदोरच्या वाणीने (महिला) स्वत: गाऊन सुंदर स्वरचित शारदास्तवन सादर केलं. मग एका प्राध्यापकांनी एक न-कविता सादर केली. केळकर सरांनी झकास वात्रटिका आणि निकिताने एक छानशी कविता गाऊन सादर केली. दरम्यान न-कवितावाले पुन्हा सरसावले तेव्हा ’देख लेंगे’ चा धोका न पत्करता मी गाडीत जाऊन बसले.
भव्य विद्यापीठ परिसरातल्या ट्रान्झिट क्वार्टरमध्ये राहण्याची व्यवस्थित सोय केलेली होती पण तिथे पोचतो तो अंधार गुडुप. वीज गेलेली. साहजिक लिफ्ट बंद. एक मेंढक/ बेडूक उडी मारून अंगावर. पोटात खड्डा पडला. टॉर्च लावायचा तर मोबाईलपण एका काडीवर आलेला. पुन्हा एकदा मनात ’देख लेंगे’ म्हटलं. तेवढ्यात वीज आली . ट्न्न आवाज करुन जीव भांड्यात पडला. पाऊस पडून गेल्याने रात्री गारवा होता त्यामुळे शांत झोप लागली.
सकाळी ठरल्या वेळी कुलदीप घ्यायला आला. न्याहारी करून अभ्यासवर्गाच्या सभागृहात पोचलो. देशभरातून सत्तरेक लोक आले होते. महिला कमी होत्या. बीजभाषण उत्तम झाले. पाठोपाठ एक एक सत्र सुरू झाली. उत्तम हिंदीतून सगळे वक्ते बोलत होते. निकीताला इतकी हिंदी ऐकायची स्वय नसल्याने एका सूचनेचा तिने अर्थ विचारला. ’वॉशरूम इज अपस्टेअर्स’ हा अर्थ ऐकताच ती हसत बसली. ’भारतीय साहित्य की मूलदृष्टी’, ’भारतीय साहित्यपर वैश्विक प्रभाव’, ’समकालीन वैचारिक परिदृश्य’ इ, विषयांवर सविस्तर आणि दीर्घ उद्बोधन व नंतर प्रश्नोत्तरं होत होती. अभ्यासवर्गाचा दर्जेदार आशय हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. भोजनव्यवस्थाही उत्तम पण मेसचं असल्याने असेल सगळ्या मसाल्यांची चव एकसारखी होती. कोफ्ता करी असो वा वडा, डोळे मिटले तर काय खातोय हे ओळखू यायचं नाही पण आयोजक फार प्रेमाने विचारपूस करत होते.
खरं तर हा प्रवास हा केवळ पर्यटन नव्हतं, तर साहित्य, निसर्ग, अध्यात्म आणि शांतता याचा एकजिनसी अनुभव होता. (कदाचित म्हणूनच पदार्थांची चव एकसारखी लागत असावी :-) )
रविवारी कितीतरी दिवसांनी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. न्याहारी करून पुन्हा सत्रांना सुरुवात झाली. कालच्या विषयांचे उर्वरित मुद्दे व सारांश असं आजचं स्वरूप होतं. प्रत्येक सत्राआधी पुस्तक परिचय होता. ’आनंदमठ’ पासून आंध्रातील प्रख्यात ’पोतन्ना’ भागवतापर्यंत विविध पुस्तकं जवळून कळली. तेलंगणाच्या एका विद्वानांनी पोतन्ना भागवत त्यातल्या वृत्तबद्ध रचनांच्या उदाहरणासह त्यांच्या द. भारतीय हेलातल्या हिंदीमध्ये इतकं भन्नाट सादर केलं की तेलुगुतले काही संदर्भ समजत नसूनही सगळे दंग होऊन ऐकत राहिले.
समारोपीय सत्र संपताच एकमेकांचे संपर्क नोंदवून, जेवून, सामान डिकित टाकून सर्वांचा निरोप घेतला.
रात्री एक वाजता बिलासपूरहून गाडी होती. तिथे पोचायला साडेआठला पेंड्रा रोड नामक स्टेशनपासून गाडी होती. मधल्या वेळात अमरकंटक दर्शन करायचं ठरलं. विद्यापीठातून तिकडे जाताना वाटेत दोन तीन मंदिरामध्ये दर्शन घेतलं. जलेश्वर महादेव हे मंदिर बारावं ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करत होतं. वाटेत एक विभाग छत्तीसगडमधला लागे तर पुढचा भाग म. प्रदेशातला त्यामुळे आता नेमकं कोणत्या राज्यात आहोत हे पाहणं सोडून दिलं. एक गोष्ट कॉमन होती. निसर्गाची समृद्धी. दर्शनार्थी टिपीकल उत्तर भारतीय. भांगात सिंदूर भरलेल्या आणि ब्रोकेडच्या चकचकीत साड्यांमधल्या बायका. हाताशी लागतील ते कपडे घातलेले पुरूष. स्वस्त फिल्मी कपड्यातल्या तरूण मुली. मंदिरांच्या परिसरात जिकडे तिकडे लाल चुनरींच्या गाठी बांधलेल्या. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल फोन आणि देवाला पार्श्वभूमीवर ठेवून सेल्फी काढायची धडपड. एक माणूस तर डोकं पिंडीवर टेकलेलं आणि बुबुळ फोटो काढणार्याकडे फिरवलेलं अशा चमत्कारिक स्थितीत बराच वेळ उभा होता. बटबटीत रंग, भक्तांचं मोठमोठ्याने बोलणं, घंटा बडवणं, बाहेर खेळणी, जांभळं, पूजेचं सामान विकणार्यांचा कोलाहल यामुळे प्रसन्न वाटेना.
अमरकंटकमध्ये प्रवेश करताना मात्र पर्यटनातून आलेली समृद्धी जाणवू लागली. टोकदार डोंगरांच्या माथ्यावरचं ईश्वरी आलय या अर्थाने अमरकंटक नाव पडल्याचं सांगतात. कालिदासाच्या साहित्यात याचा ’अमरकुटा’ असा उल्लेख आहे, ज्याचा अमरकंटक अपभ्रंश झाला असंही ऐकलं. शिव-पार्वतीने इथे तपस्या केली होती असं मानतात त्यामुळे याला तीर्थराज मानलं जातं. अनुपपूर जिल्ह्यात हजार मीटर उंचीवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरील मैकल, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेलं अमरकंटक हे भारतातलं अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं एवढीच माहिती या स्थानाबद्दल होती. त्याचं एक कारण हे नर्मदानदीचं उगमस्थान मानलं जातं हे ही माहित होतं पण हे सोन आणि जोहिला या नद्यांचंही उगमस्थान असल्याचं तिथे गेल्यावर कळलं. यातली जोहिला बघण्याचा काही योग आला नाही.
या नद्यांविषयी एक आख्यायिका कळली ती थोडक्यात - अमरकंटक नावाच्या राजाला नर्मदा नावाची सुस्वरूप मुलगी होती. राजाने तिचा विवाह शोण (सोन !) राजाशी ठरवला. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीच त्यांची प्रत्यक्ष भेट होणार होती. परंतु आपला मृत्यू जवळ आल्याची राजाला जाणीव झाल्याने त्याने घाईघाईने नर्मदेला राज्याभिषेक करून राज्यकारभार तिच्या हाती सोपवला. राजा निवर्तला. कालांतराने आधीच ठरलेला विवाह पार पडावा म्हणून प्रतीकात्मक आपली अंगठी झोला (जोहिला !) नावाच्या दासीबरोबर तिने शोण राजाकडे पाठवली. झोला दासीच नर्मदा आहे असं समजून त्यानं तिचं प्रेमाने स्वागत केलं. झोला धूर्त होती. संधीचा फायदा घेऊन तिने विवाह उरकून घेतला. इकडे वाट पाहून नर्मदेने शोण राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. झोलाने तिची ओळख नाकारली. खिन्न मनाने नर्मदा तिथून निघाली पण परत न जाता मैकल पर्वतावर ध्यानस्थ बसून शंकराला प्रार्थना केली.
त्या समाधीत नर्मदा देहरूपाने विरघळली आणि पाण्याच्या रूपाने खाली वाहू लागली. नर्मदा नदी झाली. ही भारतातील सर्वात प्राचीन नदी समजली जाते
दिनेशजींचं वाक्य आठवलं- गंगा धर्म का, जमुना प्रेम का, नर्मदा भक्ती का, गोदावरी तप का प्रतीक है.
साहजिक अमरकंटकचं मुख्य आकर्षण म्हणजे नर्मदा उगम कुंड पण केळकर सरांच्या ओळखीतून सोबत आलेल्या वाटाड्याच्या सूचनेनुसार आधी युनेस्को हेरिटेजच्या अंतर्गत आलेल्या कलचुरी काळातील मंदिरात गेलो. हे तत्कालिन शकराचार्यांनी ११ व्या शतकात राजाच्या साहाय्याने वसवलेलं मंदिर. दहाव्या शतकात हा प्रदेश चेदी शासकाच्या ताब्यात होता. आजही त्या काळातमी मंदिरं आणि इतर भग्नावशेष दृष्टीस पडतात. चंद्रवंशातल्या पुरुखा राजाने तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न केले. त्याने मागितलेल्या वराप्रमाणे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठवले. अशी तिच्या उत्पत्तीविषयी कथा सांगितली जाते
या परिसरातलं कुंड हेच मूळ उगमस्थान असं काही स्थानिक म्हणतात पण त्याला मान्यता नाही असं वाटाड्या म्हणाला. या मंदिरांची वास्तुकला पाहण्यासारखी आहे. सुबक दगडी बांधकाम, कोरीव शिल्पं पण आत दिवे नसल्याने जाळीला डोळे लावून विष्णू आणि शिवलिंगाचं दर्शन घेतलं.
परिसरातच एका भल्या मोठ्या पिंपळपारावर मोबाईल चार्जिंगला लावून बसलेल्या साधूबुवाशेजारी बसून कॉफी घेतली. रस्ता ओलांडून शुभ्र कमानीतून समोरच्या नर्मदा मंदिर परिसरात प्रवेश केला. सर्वत्र घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण होतं. डावीकडे धर्मशाळा, उजवीकडे उगम-परिसर. याशिवात या परिसरात अनेक प्राचीन मंदिरं आहेत. हे देवीचं ३९वं शक्तीपीठ असून त्याला ‘चंद्रिकापीठ’ म्हणतात.
वाटेत काही थकलेले पण चेहर्यावर अतीव समाधान असलेले परिक्रमावासी दिसत होते. त्यांच्यासाठी कुणी उलट जाऊ नये म्हणून एका रेषेच्या पलीकडे वेगळॆ प्रवेशद्वार व निर्गमन स्थान होते कारण परिक्रमा करताना नर्मदा नदी नेहमी परिक्रमावासीयाच्या उजव्या हाताला असावी असा नियम आहे. (फोटोत आम्ही त्या रेषेच्या अलिकडे पलीकडे उभे आहोत) नर्मदा ही भारतातील एकमेव अशी नदी आहे जिची पूर्ण परिक्रमा केली जाते. अमरकंटकच्या या उगमापासून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपारिक नियम आहे.
हा कुंड परिसर पूर्ण पांढर्या संगमरवरात बांधलेला आहे. पण पाण्यात टाकलेल्या चढावामुळे पाणी गढूळ दिसत होतं. तेच काही जण बाटल्यात भरून घेत होते. मी फक्त पाण्याला स्पर्श करुन डोळ्याला लावलं आणि नमस्कार करून मैयाच्या दर्शनाला गाभार्यात गेले. बाहेर एक छोटा दगडी हत्ती आहे. त्याखालून गेलं की पापं नष्ट होतात. अभ्यासवर्गात दिल्लीच्या एका प्राध्यापिकेनं ती कशी त्याखालून जाऊ शकली वगैरे वर्णन केलं असल्याने उत्सुकता होती. बारीक माणसाची आणि लहान मुलांची पापं सहज सरपटत जात असल्याने लगेच नष्ट होत होती तर जाड किंवा वयस्कर माणसं मध्येच अडकून पापासकट परतत होती. काहींना तर नातेवाईक ओढून काढत होते. एकूण स्थिती पाहून आम्ही पापं तशीच ठेवायचा निर्णय घेतला. प्रसाद विकत घेतला , निकिता आणि मी एका भिंतीवर लिहिलेलं नर्मदाष्ट्क म्हटलं आणि बाहेर आलो. अभ्यासवर्गातली आणखी काही मंडळी बाहेर भेटली.
लगतच भीमाने वनवासात असताना बांधलेलं कमळाचं तळं होतं. किनारा अस्वच्छ , जलपर्णी वाढलेली पण तळं मात्र सुंदर होतं. नाव इंद्रदमन. ते इंद्रियदमन असावं असं मी मनाशी ठरवून टाकलं.
वेळेअभावी कपिलधारा दूधधारा धबधबा पाहण्याचा विचार रद्द केला. ४० वर्षांपासून (हे जरा अतीच वाटलं) निर्माण स्थितीत असलेल्या श्रीयंत्राला भेट दिली. त्याचं प्रवेशद्वार हा आता अमरकंटकचा आयकॉन झालं आहे. त्याचा टॉप व्ह्यू सुरेख होता. अजूनही ते अपूर्ण आहे. पुढे गर्द झाडीतून प्रवास करत सोनमूडा इथे पोचलो.
इथून सोन नदीचा उगम पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. डोंगरांच्या कुशीतून उगम पावणाऱ्या या नदीचं दृश्य मन मोहून टाकत होतं पण नदीचा प्रवाह उन्हाने आटून बारीक धाराच दिसत होत्या. माकडांना चुकवत शंभर फूट खाली व्ह्यू पॉईंटला जाऊन पाहिलं तर खाली अफाट पसरलेलं विविध हिरव्या छटा ल्यालेलं अफाट जंगल आणि त्यातच विलीन होत चाललेला सूर्याचा केशरी गोल. पुन्हा वर चढून कमानीबाहेर आलो. वाटाड्याच्या भावाचं समोरच विविध वस्तू भांडार होतं. त्याची पुतणी धावत येऊन काकाला बिलगली. गल्ल्यावर निवांत बसलेल्या तिच्या आईने जेठजींकडे लक्ष जाताच घाईने डोक्यावर पल्लू ओढला. पुढच्या वळणावर 'माई की बगिया' हे रमणीय ठिकाण वाटाड्याने दाखवलं. स्थानिक श्रद्धेनुसार नर्मदामैया इथे खेळायला येई. फुलझाडं, औषधी वनस्पती आणि हिरवाईने नटलेला हा परिसर अतिशय शांत होता. गर्दीही कमी होती.
वाटेत ठरल्या ठिकाणी वाटाड्याला सोडलं. विस्तीर्ण पठारावर लांब एक कार दिसत होती. तिथून डावीकडे वळलात की पेंड्रा रोड रेल्वे स्थानकाकडे जाता येईल असं सांगून ’नर्मदे हर’ म्हणत तो उतरला. पठार संपले पण रस्त्याचा अंदाज येईना. ’देख लेंगे’ म्हणत डावीकडे वळलो आणि रस्ता लागला. डोंगररस्त्यांमधून जाताना पुन्हा एकदा जंगलाचं मनोहारी दर्शन घडलं. साग, साल, बांबू आणि अनामिक..बहुधा औषधी वनस्पतींची (असं वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणतात ) उभी झाडं दाटीने दिसत होती. वळणाचा रस्ता संपतच नव्हता. बरोबर जातोय का हे पाहावं तर जंगलात इंटरनेटने केव्हाच साथ सोडलेली. आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू अशी भुलभुलैया गत झालेली. निकिता बहुतेक हनुमान चालीसा किंवा भीमरूपी... काही तरी पुटपुटत होती. माहित नाही का पण मी निश्चिंत होते. परिक्रमा म्हणजे केवळ धार्मिक प्रवास नसून आत्मशोध आणि अहंकार गळून पडण्याचा प्रवास आहे असं म्हणतात. शुलपाणीच्या घनदाट जंगलातील भिल्लांचे अनुभव अनेकांनी नोंदवले आहेत. आम्हाला परिक्रमा न करताच ही गत झाली तर परिक्रमेचा अनुभव काय असेल ! पादचारी परिक्रमावासींना तर दंडवतच !
एकदाची एक गाडी समोरून आली आणि त्या चालकाने रस्ता योग्य असल्याची खात्री दिली पण गालात तोबरा असल्याने आम्हाला पुन्हा शंका आली. रस्त्यात अधूनमधून माकडांचे कळप, वळणावळणाचे घाटरस्ते दिसत होते. हिरवीगार झाडं आता अंधारामुळे काळपट दिसू लागली. चुकून एखादा माणूसप्राणी किंवा गाडी दिसताच थांबून आम्ही ओ भैया.. इधर इधर.. पेंड्रा पेंड्रा ओरडायचो व तो ’बरोबर’ अशी खूण करायचा, अखेर गाडी पेंड्रा रोड स्टेशनला पोचली.
एका प्लॅटफॉर्मचं एखादी चुकार गाडी येणारं एखादे रामूकाका बसलेलं ,इवलं पत्र्याचं छत असलेलं स्टेशन असणार असं समजून केळकर सरांचा निरोप घेऊन आत शिरलो तर ते नॉर्मल आधुनिक स्टेशन निघालं. तिकिट काढलं तोवर बाकी मंडळीपण अशीच वाटचाल करत येऊन पोचली. पलीकडे दिल्लीला जाणारी मंडळी होती. एकमेकांना हात हलवून आम्ही दोन्ही तीरांवरून ओरडून माफक गप्पा मारल्या. दरम्यान आमची गाडी आली. आरक्षण नव्हतं. पुन्हा ’देख लेंगे’. टीटीई येताच मी अपडाऊन अनुभवातले विनम्र भाव चेहर्यावर आणून काय ते खरं सांगितलं. त्याने पण मग दुर्लक्ष किया. पुढच्या गीतांजलीचं आरक्षण अद्याप वेटिंग होतं. ती काळजी दर्शवताच सोबतचे दिनेशजी म्हणाले, "मोहिनीजी, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा नही करते."
काळोखामुळे बाहेरचं काही दिसत नव्हतं. आता उस्लापूर नामक अगम्य स्टेशनला पोचलो. आता बिलासपूरला जायचं होतं. सांगली-मिरजेसारखं हे जुळं प्रकरण होतं. रिक्शात फिल्मी गाणी ऐकत दिनेशजी, पांडेजी, मी आणि निकिता बिलासपूरला पोचलो. नागपूरसारखं मोठं शहर आहे ते. स्टेशन पाहून तर सीएसटीची आठवण झाली. कँटीनला जेवलो आणि वेटिंग रूमला आराम करत गीतांजलीची वाट पाहू लागलो. गाडी दोन तास उशीरा आल्याने झोपेने वटारलेल्या डोळ्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान आरक्षण कन्फर्म झालं होतं. खरं आहे, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते. नर्मदामैया की जय!

