Saturday, August 15, 2026

मेड इन इंडिया - ए टायटन स्टोरी

मोझार्ट कोण होता हे माहीत नसणार्‍या भारतीयांनाही मोझार्टची सिंफनी क्र. २५ गुणगुणता येते कारण ती आहे टायटन घड्याळांच्या जाहिरातीची ट्यून. पुन्हा  ऐकायचीय?   

अर्थात तिचे भारतीयकरण केले आहे त्या काळात जाहिरात-संगीत क्षेत्रात काम करणार्‍या ए.आर.रहमाननी. ’देश का नमक’ खाल्लेल्या प्रत्येक मध्यम- उच्चमध्यमवर्गीय भारतीयाकडे एक तरी टायटन घड्याळ असते किंवा त्याला ते घ्यायचे असते. कारण एकच - ते ’टाटा’चे उत्पादन आहे. ग्राहकांना ’Count on Us’ म्हणण्याची हिंमत असलेला टाटा समूह म्हणजे विश्वास, गुणवत्ता आणि सचोटी मग तो चहा असो की स्टील, मोटार असो की हॉटेल. दागिने असो वा घड्याळ. 

मुळात घड्याळ्याच्या व्यवसायाकडे वळावे असे टाटांना का वाटले, त्यावर काय विचारमंथन केले, या मार्गात कोणत्या अडचणी आल्या, त्यावर कसे उपाय शोधले आणि अखेरीस २५ वी सिंफनी गुणगुणत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशी घड्याळ भारतीयांच्या मनगटांवर कसे झळकू लागले याची चित्तरकथा म्हणजे अमेझॉन प्राईमवर गाजलेली मालिका - मेड इन इंडिया - ए टायटन स्टोरी. 

कुणीही हे वाचून म्हणेल हा तर माहितीपटाचा विषय आहे. गेल्या काही वर्षात आर्थिक घोटाळे, वैज्ञानिक यश, क्रीडा क्षेत्रातील संघर्ष किंवा राजकीय इतिहास यांवर आधारित अनेक दर्जेदार मालिका भारतीय OTT  प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या असल्या तरी एका घड्याळ कंपनीच्या स्थापनेवर आधारित मालिका कितपत रंजक ठरू शकेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. त्यातून यात ना शिव्यांचा मसाला ना टिपिकल खलपात्र ना समलैंगिक पात्र ना कामुक दृश्य आणि नायक तर बरचसं टक्कल असलेला  ’जेन एक्स’ मधला साधासुधा गृहस्थ. परंतु ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर ही फक्त घड्याळनिर्मितीची गोष्ट नाही याची प्रेक्षकांना खात्री पटली.

मग काय आहे, तर हे भारतीय मूल्याधारित उद्योगविश्वातले एक महत्त्वाचे पर्व आहे, ही विचारी माणसांची आणि त्यांच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेची गोष्ट आहे  . 

मालिकेत त्रुटी शोधायच्या म्हटल्या तर नक्कीच सापडतील, जसे महत्त्वाच्या व्यावसायिक निर्णयांना वेळ लागतो, ते इथे चुटकीसरशी घेतल्यासारखे दाखवले आहेत. उद्योगविश्वाशी परिचित असलेल्या प्रेक्षकांना हे खटकते. अर्थात मालिकेची किमान गती राखण्यासाठी तसे करणे भाग आहे हे ही कळते.

कलात्मक स्वातंत्र्य मान्य केले तरी काही प्रसंगांमध्ये मालिका फारच आदर्शवादी वाटते. उदा: पहिल्याच प्रसंगात संपावर गेलेले कर्मचारी ,पावसात उभे राहून घोषणा देत असतात. मालिका ज्यांच्याभोवती केंद्रित आहे ते देसाई आधी छत्र्या विकत आणून त्यांना वाटतात मग वरच्या मजल्यावरच्या बोर्ड मिटिंग मध्ये उपस्थित होतात. असं घडलंच नसेल असं नाही पण  देसाईंमधलं चातुर्य, माणूसपण, व्यवस्थापकीय कौशल्य, अडचणीवर तोडगा काढण्याची क्षमता सगळं काही एकत्र दाखवून एकाच प्रसंगात त्यांची व्यक्तिरेखा उभी करण्याची लेखकांना घाई झाल्यासारखी वाटते . त्यामुळे हा आणि असे काही प्रसंग कृत्रिम वाटतात. वास्तविक व्यावसायिक जगातील गुंतागुंत, स्पर्धा आणि नफ्याची अपरिहार्यता त्यापुढे नगण्य ठरते. 

तीन लेखकांनी मिळून या रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित मालिकेची पटकथा लिहिली आहे. ही मालिका काही प्रमाणात विनय कामत लिखित पुस्तकावर आधारित आहे. पुस्तक मात्र टायटन घड्याळांच्या कहाणी पुरते मर्यादित नाही. पटकथा लेखक विक्रम भागवत यांनी पुस्तकाची मालिकेशी तुलना केली आहे. त्यांच्या मते ," पुस्तकात  टायटन घड्याळे, तनिष्क दागिने, फास्टट्रॅक आणि स्कीन ह्या सर्वांचा मागोवा घेत एक औद्योगिक साम्राज्य कसे उभे राहिले याचा लेखकाने वेध घेतला आहे. मालिकेच्या तुलनेने पुस्तकात मानसिक आंदोलने, किंवा संघर्ष यांना स्थान नाही." 

या मालिकेचा काळ १९७० ते १९९० चा. मोबाईल, इंटरनेटपूर्व शांत काळ. त्या वेळचे भारताचे वास्तववादी चित्रण बघताना गंमत वाटते. दक्षिण भारतीय सिनेमात कॅमेरा इतका गरागरा फिरताना पाहण्याची आपल्याला सवय आहे की इथे तो ’पॉज’ झाला की काय असे वाटू शकते. जुन्या मुंबईचे रस्ते, कार्यालयातले निवांत वातावरण, जुने कारखाने, उत्पादन प्रक्रिया, साध्या कपड्यातली माणसं, त्या काळातील मानसिकता यातल्या कॅमेर्‍याने एकदम अस्सल उभी केलेली आहे. रेट्रो काळ नजरेला जाणवावा म्हणून असेल, मंद पिवळसर प्रकाश मालिकेत वापरला आहे त्यामुळे काही वेळा अति कलात्मक सिनेमा पाहत असल्यासारखे निरूत्साही वाटू लागते. मग एखादी चमकदार घटना घडते आणि आपली नजर बॅकलाईटऐवजी मुख्य दृश्यावर खिळते. त्या काळातल्या गाण्यांचाही घटनेच्या मूडनुसार खुबीने वापर करण्यात आला आहे. 

मालिकेची दृश्यभाषा लोभस आहे. दिग्दर्शकाने घड्याळ तयार करण्याची रूक्ष प्रक्रिया एखादी कलाकृती घडवावी तशी सादर केली आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेतील सूक्ष्म तपशीलही सिनेमॅटिक रूपात अवतरतात. यासाठी केलेल्या संशोधनाला दाद द्यायला हवी. 

१९७८ च्या सुमारास मुंबईच्या घड्याळांच्या बाजारपेठेत परदेशातून तस्करी केलेल्या घड्याळांचे वर्चस्व असायचे. टाटाचे कार्यकारी अधिकारी झर्क्सेस देसाई यांच्यावर डबघाईला आलेल्या टाटा प्रेसला पुनरुज्जीवित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती , परंतु त्याऐवजी त्यांच्या डोक्यात एक प्रतिष्ठित, स्वदेशी घड्याळाचा ब्रँड निर्माण करण्याची कल्पना खरं तर किडा आला. हल्लीचे ’मोटीव्हेशनल स्पीकर्स’ उठता बसता उचकवतात तसा किडा नव्हे. बुद्धीमत्ता, नवीन मार्ग शोधण्याची क्षमता, समस्यांकडे संधी म्हणून पाहण्याची नजर, बदलत्या जगाची जाण आणि मोठे बदल घडवून आणायची हिंमत यातून निर्माण झालेली पॅशन.

जेआरडी टाटांच्या पाठिंब्याने, देसाई आणि टीमने पूर्णपणे 'मेड इन इंडिया' घड्याळ तयार करण्याचा निश्चय केला. टाटांनी तर याचा इतका ध्यास घेतला की जोपर्यंत भारतीय बनावटीचे मनगटी घड्याळ प्रत्यक्षात अवतरत नाही तोपर्यंत त्यांनी परदेशी बनावटीचे घड्याळ वापरायचे नाही असे ठरवले. मात्र हे सोपे नव्हते. कोणत्याही व्यवस्थापनाचे ( मॅनेजमेंटचे) तीन एम म्हणजे मॅन ( माणसे) , मनी (पैसा ) आणि मटेरियल. हे उभे करताना  कुशल अधिकारी  मिळवणे, कामगारांना या नव्या तंत्राचे प्रशिक्षण देणे, क्वार्ट्झ घडयाळांचे वेगळेपण ग्राहकाला पटवणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाला पोचणे अशी अनेक आव्हाने या टीमसमोर होती. ती त्यांनी कशी पेलली हे बघताना आपण या मालिकेत गुंतून जातो.  

स्थानिक महिलांना कामगार म्हणून संधी मिळते तेव्हा आपल्यालाही आनंद होतो. 

फ्रेंच व्यावसायिकासमोर टायटन घड्याळ चुकीची वेळ दाखवते तेव्हा जेआरडींची अवस्था पाहून आपणही ओशाळतो. 

घड्याळ परिपूर्ण स्थितीत बाजारात अवतरते तेव्हा आपलाही उर भरून येतो. 

खमकी मेघा आणि बुजर्‍या गौरवचे लग्न होते की नाही याची आपल्यालाही चिंता लागून राहते. 

जेव्हा मेघाला कळते की मार्केटिंग प्रमुखपदी तिच्याऐवजी अन्य कुणी आहे तेव्हा ती दुखावली जाईल याची काळजी वाटते. 

अर्थात भिंतीवरचे घडयाळ आणि मनगटी घड्याळ दोन्हीची तुलना करून एकामुळे दुसर्‍याचे  मूल्य कमी होत नाही हे गौरव तिला सहजपणे समजावून सांगतो. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या कॉर्पोरेट जगात असे घडते तर! 

ही ब्रँड स्टोरी" असली तरी एका अर्थी "व्हिजन स्टोरी" सुद्धा आहे. ही मालिका पाहिल्यानंतर कित्येकांनी टायटन ब्रँडकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्याचे मान्य केले आहे. 

यात सर्वाधिक लक्षात राहतो तो झर्क्सेस देसाई या पात्रात अक्षरश: घुसलेला अभिनेता जिम सरभ. जिमला आपण ’पद्मावत’, ’गंगूबाई काठियावाडी’ सारख्या अनेक चित्रपटातून हटके भूमिकांमध्ये पाहिलेले आहे.  त्यांनी उभे केलेले  ’देसाई’  या मालिकेचा प्राण आहे. त्यांना पल्लेदार संवाद नाहीत, परंतु जिमने देसाईंमधला आत्मविश्वास, सकारात्मकता आणि नेतृत्वक्षमता हे तीनही पैलू अत्यंत प्रभावीपणे साकारले आहेत. ह्या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे आहेत. कमालीची जिद्द आणि काहीसा वेडेपणा देसाई मध्ये आहे. त्याचवेळी इतक्या मोठ्या पदावर असूनही आयुष्यात साधे आनंद शोधणार्‍या  त्याच्या स्वभावातल्या सौम्य छटा सुद्धा आपल्याला मोहून टाकतात. मग ते त्याने नाराज सहकार्‍याला खुलवणं असो की किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तो चाखून पहाणं असो.  

“नो डिस्कशन ओन्ली डेमोन्स्ट्रेशन”. हे देसाईचं तत्व. करून दाखवण्याची जिगर ही खासियत. चांगली टीम असल्याशिवाय एकट्याला हे शक्य नाही याची जाण आणि योग्य व्यक्ती पारखण्याचे कौशल्य हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य.  

जिमप्रमाणेच नसीरुद्दीन शाह यांची जे.आर.डी. टाटा यांच्या भूमिकेसाठी केलेली निवड अचूक आहे. ऑस्कर पुरस्कारांमध्ये आता पात्रयोजना विभागाचाही समावेश करण्यात आला आहे इतके कास्टींग मह्त्वाचे मानले जाते. आपल्या सहकाऱ्यांची उमेद वाढवणे, प्रसंगी टीका करणे, पण ती जिव्हारी लागणार नाही तर जोमाने काम करायला प्रवृत्त करेल याची काळजी घेणे असे उद्योगमहर्षी जेआरडी त्यांनी फार कन्व्हिन्सिंग पद्धतीने उभे केले आहेत. आकाश बन्सलच्या भूमिकेतील वैभव तत्त्ववादी व इतर सहकलाकारांनीही भूमिका चोख वठवल्या आहेत. स्वतंत्र व्यक्तिमत्व असूनही देसाईच्या आयुष्यात विरघळून गेलेल्या ,नमिता दुबेने साकारलेल्या त्यांच्या पत्नीचा पडद्यावरचा वावर उत्फुल्ल आहे. 

ही धीमी लोकल आहे. दर दहा मिनिटांनी धक्कादायक वळण दाखवण्याचा ताण यात नसल्याने ही मालिका प्रेक्षकाचे बोट धरून  फिरता फिरता मध्येच कट्ट्यावर बसून गप्पा माराव्यात तशी सावकाशपणे कथानक उलगडते. प्रत्येक निर्णयाआधी केलेला सखोल विचार, प्रत्येक अपयशामुळे साहवी लागलेली वेदना आणि प्रत्येक यशाआधी केलेली धडपड आपल्यासमोर ठेवते. एकूण ही कॉफी पीत निवांतपणे पाहावी अशी मालिका आहे. सुरुवातीला "हॅ ..किती संथ आहे" म्हणत अनेकांनी पहिली दहा-पंधरा मिनीटे पाहून म्हणत मालिका बंद केली मग चर्चा होऊ लागताच पुन्हा पाहायला सुरुवात केली आणि थेट बिंज वॉच केल्याचे कबूल केले. 

मोठे ब्रँड्स एका दिवसात उभे राहत नाहीत. त्यांच्या मागे दूरदृष्टी, परिश्रम असतात. धाडसी निर्णय घेण्यासाठी लागणारे मनोधैर्य असते. हे मनोधैर्य निर्माण होण्यासाठी आवश्यक असते freedom of failure. "अपयशाचा केवळ स्वीकार नव्हे ते अपयश आपल्याला यशासारखे साजरे करता आले पाहिजे म्हणजे पुन्हा प्रयत्न करायला आपण बिचकत नाही."- देसाईच्या तोंडी असलेले हे संवाद म्हणजे  मला या मालिकेचे मध्यवर्ती सूत्र वाटते. 

प्रत्येक स्टार्टअप कंपनीच्या व्यवस्थापनाने, उद्यमशील वृत्तीच्या प्रत्येकाने , खरे तर प्रत्येक देशाभिमानी भारतीयाने आवर्जून पाहावी अशी ही आपल्या आयुष्यात गुणात्मक बदल घडवणारी ’टायटन स्टोरी’. 

#TitanStory #TitanWatches #MadeinIndia

Published in Daut Lekhani - Column 'OTT katta' August 2026

Monday, July 6, 2026

मराठी साहित्यातील विडंबनकाव्य : झेंडूची फुले ते तेंदूची पाने

अनुकरण किंवा नक्कल करणे ही माणसाची जन्मजात प्रवृत्ती आहे. मुलाला थोडेफार कळू लागताच त्याच्या ठायी या प्रवृत्तीची लक्षणे दिसायला लागतात. मूल बऱ्याच गोटी अनुकरणानेच शिकत असते. कधी मोठ्या मंडळींनी शिकविल्यामुळे तर कधी स्वयंस्फूर्तीनेही त्याची अनुकरणप्रवृत्ती वाढीस लागत असते. पक्षी आवाज कसे करतात, हम्मा कशी हंबरते, आजोबा कसे चालतात, बाबा कसे ओरडतात इ. मुले 3 ऱ्या 4 थ्या वर्षापासून हुबेहूब करून दाखवतात. विडंबनाचे मूळ या जन्मजात मानवी प्रवृत्तीत शोधता येण्यासारखे आहे. वेडावण्यामुळे एकीकडे जशी गंमत वाटते, तसेच आणखीही महत्त्वाचे कार्य साधते. वेडावणे ही सक्रिय टीका असते. ती दोषदिग्दर्शनही बिनतोडपणे करते. बेडावण्यामुळे मूळ व्यक्तीला आपल्यातील अतिरेकाची जाणीव होते. 

वाङ्मयीन क्षेत्रालाही हाच न्याय लागू होतो.  विडंबन हे वांग्मयीन वेडावणेच म्हणाना. तिथेही अती झाले की हसू येते नि नक्कल करण्याची उबळ येते .अनुकरण विनोदाच्या पातळीवर व बुद्धिनिष्ठ असत. चोखंदळ वाचकालाच ते आस्वाद्य होत. ज्याच विडंबन केल तो साहित्यिक खेळाडू वृत्तीचा असेल तर त्यालाही गंमत वाटते व तो आपले दोष सुधारतो अस रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याची किमया विडंबन कलेत असते

विडंबन करणे सोपे नाही. त्याचा कान तयार असायला हवा नि साहित्यदृष्टी चांगलीच चोखंदळ हवी. आविष्कारपद्धतीचा थेट अनुकार करणे भाषाप्रभुत्वावाचून साधत नाही व आशयाचा नेमका वेध घेऊन त्याचा मर्मभेद करणे हे मूळ कर्त्याच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास असल्यावाचून जमत नाही. काही नेहमीचे दाखले घेऊन हे अधिक स्पष्ट करता येईल. नाटकातली वेड्याची भूमिका कोणी वेडा वठवू शकणार नाही, तिथे वेडेपणाचा प्रतिभास (Illusion) निर्माण करणारा शहाणाच हवा. विडंबनकार मूळ कृतीचा प्रतिभासच उभा करीत असतो. वरवर पाहिल तर सर्कशीतला विदूषक वेड्यावाकड्या उड्या मारून हसवतो आहे अस वाटत; पण ती आपली विदूषकी वठविण्यासाठी तो चांगलाच कसरतपटू असावा लांगतो. इंग्रजीत Set a thief to catch a thief, असा वाक्प्रचार आहे. कारण चोरीच्या वाटा चोराला माहीत असतात. तद्वतच मूळ कर्त्याच्या वाटा विडंबनकाराला नेमक्या माहीत असाव्या लागतात.

ज्याला विडंबन काव्य म्हणतात अशी 20 तरी उदाहरणे एकनाथांच्या काव्यात मिळतील तरीसुद्धा हास्ययुक्त दोष दर्शन हा विडंबनाचा ठळक हेतू तेथे नाही. भारुड इ. लेखनाचे पर्यावसान विनोदात होत नसून वेदांत मांडण्यात म्हणजे गांभीर्यात होते त्यामुळे विडंबनाचा मागवा घेताना साधारणतः १९०० च्या पुढच्या काळाचा विचार करता येईल .त्यात कुलकर्णी लीलामृत हे एक ठळक विडंबन काव्य 1913 मध्ये आले पांडवप्रतापच्या धरतीवर शेटजी प्रताप म्हणून विडंबनात्मक ओवी ग्रंथ आलेला आहे .पण तो फारसा प्रसिद्ध झाला नाही मोरोपंती आर्यावर्तीचा थाट सही सही , गंगना मोगरे यांनी उपवास काव्यात आणलेला आहे. खाडीलकरांच्या विद्या हरण व मानापमान या नाटकातील पदे लोकप्रिय झाल्यानंतर त्यातील शब्दरचनेचा अप्रयोजकपणा व तानाबाजीचा अतिरेक माधवराव जोशी यांना खुपला. त्यांच्या थट्टेखोरपणाला जाग आली आणि त्यांनी विनोद या नाटकात खाडिलकारी पदांची विडंबनेच पदे म्हणून घातली. उदाहरणार्थ- ’माता दिसली समरी विहरत’ या सुप्रसिद्ध पदाचे”माता बसली स्वगृही रखडत,  घाशीत ताट तव्यासी पळशी’ हे त्यांचे विडंबन उत्कृष्ट उतरले आहे पण यात सर्वात खळबळ उडवून देणारी झेंडूची फुले उमलली आणि मग महाराष्ट्रात विडंबन गीतांचे पीकच आले अर्थात त्यातही दाण्यापेक्षा तणच उदंड होते.  

त्याच अस झाल : १९२० सालाच्या सुमारास काव्याकाशातले गोविंदाग्रज- बालकवींसारखे तेजस्वी तारे निखळून पडले. काही काळ अंधारल्यागत झाले, त्त्यातून काही रवि-किरण एकमेका साह्य करीत काव्याचा सुपंथ धरून पुढे सरसावले, मग काव्यक्षेत्रात सामुदायिक शेतीसारखा प्रयोग सुरू झाला. मराठीत खंडकाव्ये नाहीत ? लिहा खंडकाव्ये. गझला नाहीत ? लिहा गझला. सुनीते नाहीत ? खरडा सुनीते. बिलापिका नाहीत ? काढा गळे ! पुन्हा यांच्यातलेच टीकाकार या प्रयोगाची प्रशंसा करून पत-पुरवठा करीत होते. असा मोठा विचित्र फड सजला ! पण हे खुद्द आ० अत्र्यांनींच नेटके लिहून ठेवले आहे, ते त्यांच्याच शब्दांत देणे बरेः

"... काव्यांत क्रांति घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रांत परस्पर-प्रशंसा-संघ स्थापन झाले. तेव्हां त्यांचे ते नियम, तीं ध्येयें, त्या मंडळाच्या साप्ताहिक बैठका, तो नावि- न्याचा व वैशिष्ट्टयाचा पुरस्कार…एकीकडे संस्कृतप्रचुर जडजंबाल शब्दालंकार घेऊन सोवळी मंडळी सिद्धः तर दुसरीकडे फारसी जडजवाहीर घेऊन ओवळी मंडळी सज्ज |

काव्यदेवतेची ही विचित्र कुचंबणा पाहून अत्र्यांची जन्मजात विनोदबुद्धी जागृत झाली आणि आपल्या काव्यदैवतांच्या अवमूल्यनाच्या चिडीतून त्यांची टीकाबुद्धी उफाळून आली. या दोहोंचा जोड जमून जी अजोड साहित्यकृती पैदा झाली, तीच 'झेंडूची फुले'!

एक उदाहरणपाहूया , काळ लक्षात घ्या १३ एप्रिल १९५२ ची ही कविता आहे. श्री. राजगोपालाचारियर मद्रासचे मुख्यप्रधान म्हणजे आताचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रतिक्रियेदाखल लिहिलेली ही कविता

म्हातारा इतुका न- अवघे पाऊणशे वयमान

म्हातारा इतुका न, परि हा बनला फिरुनि जवान,  दिल्ली सोडुनि गल्लीचा हा झाला पंतप्रधान !

चष्मा काळा शोभे डोळां डोइस टक्कल छान , हातीं सोटा पंडित मोठा बृहस्पतीवर ताण !

संन्यासाचें सत्रा वेळां आणी हा अवसान , वैराग्याची वस्त्रे हातीं, संसारावर ध्यान !

सीतेसाठीं जसा धांवला लंकेला हनुमान,  मद्रासेला तसा करी हा दिल्लीहुन उड्डाण !

गांधीजींचा व्याही होता जीनांचा मेहमान , सुपीक मेंदूतून निघालें ह्याच्या पाकिस्तान !

सत्य-अहिंसा-मंत्राने हा करितो कारस्थान ,ह्या चाणक्यापासुन राखीं भारतास भगवान्

विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतीची स्मृती ताबडतोब मनात जागी होणे ही त्याच्या यशस्वितेची प्राथमिक कसोटी. अर्थात त्यासाठी मूळ कृतीही सर्वप्रसिद्ध असावी लागते. मूळ कविता आणि तिची अनुकृती यांतल्या ओळी समांतर रीतीने समोरासमोर उभ्या राहतात व तुलनेतून त्यांच्या आशयातली विसंगती जाणवून हसू येते. विडंबनाचे रोपटे असे परोपजीवी आहे. दुसऱ्या कोणत्या तरी कवितेवर कलम केल्यावाचून ते जीव धरीत नाही.

शां. शं. रेग्यांचा 'एक विडी आहे माझ्या खोल खिशात दडून' हा चरण ऐकला की 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून' हा मंगेश पाडगावकरांचा चरण जरूर आठवतो. केशवकुमारांची 'परिटा, येशिल कधी परतून ?' ही ओळ ऐकली की, रे. टिळकांची 'पांखरा, येशिल का परतून !' ही ओळ आठवते.  'पाखरा' कवितेचं विडंबन - 

परिटास-

परिटा येशिल कधी परतून ? 

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून ! उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून !

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून ! सदऱ्यांची या इस्तरिनें तव चाळण पार करून !

खमिसांचीं हीं धिरडीं खरपुस भट्टिमधे परतून ! तिच्या भरजरी पैठणिची या मच्छरदाणि करून !

गांत्रांतिल कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून ! रुमाल जरिचे आणि उपरणीं महिनाभर नेसून ! 

सणासुदीला मात्र वाढणें घेइ तुझें चोपून ! परिटा येशिल कधी परतून 

कवी थोडे, कवडे फार' हा प्रकार कोठल्याही काळी खराच असतो. त्यामुळे बांडगूळवजा निरर्थक संकेतांची भरमसाट वाढ होऊन मूळचा काव्यवृक्ष वthण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा रीतीने संकेता- तिरेक झाला की विडंबनकाराला खाद्य मिळते. साहित्यक्षेत्रातील प्रथितयश लेखक फाजील आत्मविश्वासामुळे किंवा दुर्लक्ष, घाई वा निष्काळजीपणा यांमुळे दोषास्पद बनतात, तर नवशिके अतिउत्साहीपणे नव्याचे भाट बनतात. या प्रतिगामी आणि पुरोगामी प्रवृत्तींना योग्यगामी वास्तवाची जाण विडंबनकार आणतो. 

केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांने लिहिलेली  ‘आम्ही कोण?’ ही कविता विख्यात आहे. यात त्यांनी स्वत:विषयी किंवा एकूणच कवीविषयीचा दृष्टिकोन केवढ्याआत्मविश्वासाने प्रकट केलाय पाहा. 

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥

विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।

दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

आता याचं तितक्याच ताकदीने अत्र्यांनी केलेंलं विडंबन पाहू. 'क-हेचे पाणी' या आत्मचरित्रात अत्रे म्हणतात, “आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.” त्यातूनच झेंडूच्या फुलांची निर्मिती झाली आहे. 

आम्ही कोण  - या कवितेत केशवसुत प्रतिभावंत कवीबद्दल बोलतायत तर अत्रे  यमक्या कवीबद्दल बोलतायत. आजच्या फेसबुकवरच्या काही कुडमुड्या कवींनाही हे लागू होईल. 

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।

फोटो, मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥

किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।

चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥

ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।

ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥

डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।

त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥

---------------

केशवकुमारांनी म्हणजेच अत्र्यांनी 'रसिकांना चेतवणी' देताना, माझ्या फुलांचे काहीही करा; रागाने चुरगळलीत तरी हरकत नाही, पण 'तळींचे खोबरे' खायला मात्र विसरू नको, असे म्हटले आहे. 'हे तळीचे खोबरे' म्हणजे जन्मजात विनोदबुद्धीचा विलास. विनोदबुद्धीच्या विलासामुळेच 'झेंडूची फुलें' एकमेवा- द्वितीय ठरलेली आहेत. विडंबनाची निमित्ते कालांतराने विसरली जातात, ती आस्वाद्य राहात नाहीत; पण हे 'तळीचे खोबरे' म्हणजेच विनोदबुद्धी त्याला स्वतंत्र मूल्य प्राप्त करून देते. असं झेंडूची फुलेंच्या ४ ऑगस्ट १९७२ मध्ये लिहिलेल्या प्र्स्तावनेत स. गं. मालशे म्हणतात. अत्र्यांचे मन:पूत कौतुक केल्यावर ते हे ही म्हणतात की -

"नवलेखकांना दहशत वाटावी असा दरारा केशवकुमार म्हणजे अत्र्यानंतर कोणी निर्माण केला असेल तर पुलंनी-  आणखी एक रस, अंगु स्थान विद्यापीठ यासारख्या त्यांच्या लेखनात गद्यशैलीची अचूक अनुकरणे असून समीक्षेचा पडीकपणा आणि एकूण साहित्य क्षेत्रातील सांकेतिकतेत याचा मार्मिक उपहार केलेले आहे. पुलं हे कवी नव्हते याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी कविता लिहिली नाही पण विडंबन पाहता त्यांच्यातल्या काव्यप्रतिभेची चुणूक सहजपणे दिसते. "

एक भन्नाट उदाहरण म्हणजे कवी मंगेश पाडगांवकरांच्या एका कवितेचं पुलंनी केलेलं विडंबन. पाडगावकर बरीच वर्षं 'लिज्जत पापड' कंपनीच्या जाहिरातींसाठी कविता लिहीत असत. कवितांचा पापडांशी किंवा त्या कंपनीशी काही संबंध नसे, मात्र कवितेच्या निमित्तानी लोक जाहिरातही वाचतील, या अपेक्षेनी कंपनीनी हे धोरण राबवलं होतं.. तर, १९७८ सालच्या 'ललित' नियतकालिकाच्या जून महिन्याच्या अंकात "आनंदाचा घनू" ही त्यांची कविता छापून आली :

आनंदाचा घनू...

बरसला अंगावरी  आज आनंदाचा घनू...

आज मन गगनात आणि गगन मनात    माझे प्राण इंद्रधनू...

रंग श्रवणासि आले         सूर सुवासिक झाले    झाली बासरीच तनू...

नभ झाले मनभोर      मनभर निळे मोर        आणि आतुरल्या धेनू...

कोसळला प्राणभर     सावळा हा अनावर     जैसा देवकीनंदनू...

याचं पु.ल.देशपांडेंनी विडंबन केलं, ते 'ललित'च्याच जुलैच्या अंकात, ललितने मूळ कविता पान २८वर, अन् विडंबन पान २९वर छापलं..

"पाऊसू पापडू आणि एकू गीतू"

{कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांना त्याच्या 'लिज्जत' पुरस्कृत "आनंदाचा घनू" या वर्षा(सन) गीताला 'सलाम' करून}

भूमिका : चुलीवर भाजत टाकलेला पापड आणि वहीवर जुळवत टाकलेली कविता ह्या, महिला गृहउद्योग व काव्योपासना अशा द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीच्या पापडाची आणि कवितेची अवस्था काय झाली, ते टिपण्याचा एक नम्र प्रयत्न.

येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू

आले माझिया मनात आपणही गीत पाडू !

साला बादचा शिरस्ता पाळतात कविजनू

येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू !

शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू...

- घनू, इंद्रधनू, प्राणू, मोरू, देवकीनंदनू,

मनू, गगनू, श्रवणू आणि बासरीची तनू

शब्द टप्पोरे टप्पोरे बोंडे कापसाची जणू !

पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू,

स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू?

घनू गरजो, बरसो, भरो विहिरी गटारू

दिसो घनघोर घटा, गळो छप्परू टप्परू !

हाती धरिताचि पेनू गळे शाईतुनी गीतू...

- गीतातल्या पावसाशी माझी जडलीसे प्रीतू !

झरे कवितेची ओळू, होते गीताचीच शाई !

- सॉरी, शाईचेच गीत - किंवा कशाचे काहीही !

हंबरत्या धेनूबिनू, पंख पिसारून मोरू

मेघूबिघू यथासांग, रांग धरूनिया तरू...

- आणि अचानक कैसा धूर कोंदला खोलीतू !

राही अधुरे अयाई माझे पावसाचे गीतू...

आली जाग एकाएकी नाकी शिरताचि घाणू -

करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू !

कसा वाटोळा वाटोळा स्वर्णवर्णाचा लिज्जतू...

झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू !

- झड पावसाची आली, इथे गीतही भिज्जतू,

आता कुणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू ?

(कवयित्री - सौ.तरंगिणी ठिपके)

प्रिय संपादक महाराज,

अलीकडेच क-हाड - पुणे एष्टीत आम्हाला ही कविता लिहिलेला कागद सापडला. कवयित्रींच्या क-हाड कवयित्री संमेलनात पावसामुळे भिजलेल्या -आणि काव्यगायनाचा चान्स न मिळाल्यामुळे भाजलेल्याही- भावना ध्यानात घेऊन ही कविता आपल्या लोकप्रिय मासिकात छापावी अशी विनंती आहे. 

...आणखीही अश्या ब-याच कवितांचे कागद त्याच एष्टीत सापडले आहेत; पाठवू का ?

आपला नम्र

पु. ल. देशपांडे

-------------------------------------------

पण मंगेश पाडगावकरांनी स्वत:सुद्धा विडंबनं केली आहेत. 

१७ व्या शतकातले संत समर्थ रामदास यांचा दासबोध आपल्याला माहित आहेच. मंगेश पाडगावकरींनी त्या धर्तीवर म्हणजेच विडंबनरुपात लिहिलेल्या 'उदास'बोधात पाडगावकर काय म्हणतात पाहा.

आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।

अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।

त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥

या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?

लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥

-------------

वात्रटिका हा ही या जातकुळीचा काव्य प्रकार ,हे एखाद्या प्रसिद्ध कवितेचं विडंबन नसून एखाद्या घटनेवरचं उपरोधिक किंवा मार्मिक भाष्य़ असतं. तुम्हाला नक्कीच रामदास फुटाणे यांचं नाव आठवलं असेल. राजकीय उपहासपर असलेलं एकूणच काव्यलेखन फार सजगतेनं समजून घ्यावं लागतं. फ. मु. शिंदे त्यंच्याविषयी म्हणतात- आडात नुस्तं वाकून पाहिल्यानं फार तर पारवे उडतील; तळाचा ठाव लागणार नाही. तळात नेऊन सोडणं हे फुटाणे यांच्या विडंबनलेखनाचं ध्येय आहे. लोकजीवन रसातळाला नेणारं राजकारण 'पदोपदी' खेळलं जात आहे. तो 'खेळ' आणि त्यानं होणारा खेळखंडोबा दाखवण्यासाठी गारुड्याच्या भूमिकेनं डमरू वाजवावं लागतं. 

म्हणूनच फुटाणे यांची रचना प्रासंगिक अथवा तात्कालिक नसून ती वर्तमानाच्या विरूपाची लोकरचना आहे. वर्तमान सांगणं ही प्रेरणा मानली तर वर्तमानातलं सांगणं ही प्रतिज्ञा असते. फुटाणे यांची, त्या प्रतिज्ञेची लोकरचना आहे ! 

रामदास फुटाणे यांच्या लोकरचना विडंबनाच्या, विनोदाच्या, व्यंगाच्या अंगानं येणं स्वाभाविक आहे. कृतिविडंबन, रूपविडंबन तसंच शैलीविडंबन अशा त्रिधारा इथं एकाच प्रवाहानं खळाळताना दिसतील. 

महानोर यांच्या गीताच्या अंगानं त्यांनी एका घटनेचं फार चांगलं विडंबन साधलं आहे. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ट्रान्सपोर्टचा संप घडला. जकात रद्द करून संप संपवला. कधी रद्द केल्यानं तर कधी परस्पर फस्त केल्यानं ज'कात' नेहमीच गुप्त गळून पडत आलेली आहे.

शंकर बनात सचिवालयात प्रत्येकाची मान हलली 

म्युनिसिपालिटीची ही नार, डोळे मोडीत चालली 

"मी रात टाकली मी कात टाकली, मी लक्ष लक्ष रुपयांची जकात टाकली"

मूल्यांची पडझड तशी चालूच असते. तथापि 'चालू' गोष्ट मूल्यवान करण्याचं राजकारण घडू लागलं की विनोद आणि विचार एक होऊन, एकवटून दंभस्फोट घडवून आणतात. मर्मभेदाचं भाष्य त्यातून व्यक्त होत जातं. याचं उदाहरण आपल्याला 'वर्षा ' या  कवितेत दिसतं. 

एकमेकांना ढकलण्याची मनामनात ईर्षा आहे 

वर्षावर्षाला बदलतो म्हणून बंगला सुद्धा 'वर्षा' आहे !

रामदास फुटाणे यांच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या साध्या आणि सुगम भाषेत आहे. फुटाणे यांची व्यंगभावाची कविता ही भाष्यकविता आहे. रयतेच्या अंगानं ते भाष्य कवी मांडत असतो म्हणून तो जनहितदक्ष असतो. प्रत्येक सरकारची काही तरी 'स्कीम' येते आणि जनताच 'स्लीम' होत जाते. गल्ल्यावरचे मात्र गल्लेलठ्ठ होतात हे भाकरीच्या पापडालाही कळतं !

"झुणका म्हणाला भाकरीला- "अॅरोबीक करतेस ? फारच स्लीम दिसतेस."

भाकरी म्हणाली- "महागाईचा तवा रोजच माझ्या उशाला, 

टी.बी. च्या पेशंटला अॅरोबीक कशाला ?"

समाज आणि राजकारण, राजकारण आणि सत्ता, सत्ता आणि नीती, नीती आणि विवेक, विवेक आणि विचार, विचार आणि व्यवहार, व्यवहार आणि व्यतिरेक, व्यतिरेक आणि अन्वय, यांची रूपं रामायणातल्या ठिपक्याच्या सोनेरी हरिणासारखी इतकी झपाट्यानं पालटताना दिसतात की मती मूढ व्हावी.  ती रूपं बघा कवितेत कशी येतात

मतपेटी

येता निवडणूक जवळ । नेता दिसे शुभ्र धवल । हवे बहुजन बळ। जिंकण्यासाठी ॥ 

हा ह्या जातीचा नेता। तो त्या जातीचा नेता। सर्वांना हाती घेता। यश दारी ॥ 

हा तळातील बीसी। तो गाळातील ओबीसी । खेळती लेझीम ते दारासी। आनंदाने ।। 

मंत्रिमंडळात मात्र। बी. सी. ओबीसी. अपात्र। तेथे पन्नास टक्के पात्र। असू नये ॥ 

राखीव जागा ज्यांना दिल्या। त्यांना होती हो गुदगुल्या। मिळतील त्यांच्या फुल्या। मतपेटीत ॥ 

ज्यांचा गुंता नाही सुटत। जे जे प्रश्न असती बिकट । ते ते ठेवावे भिजत। कुजविण्या ।।

रुपातल्या विरूपाचे बारकावे टिपणं तरलतेनंच घडू शकतं. त्या तरलतेचा प्रत्यय देणं हे फुटाणे यांच्या व्यंगदृष्टीचं वैशिष्ट्य आहे असं फ. मु. शिंदे ’भारत कधी कधी माझा देश आहे’ या नावापासूनच अतरंगी वाटणार्‍या फुटाणॆ यांच्या काव्यसंग्रहाच्या प्र्स्तावनेत आवर्जून सांगतात. 

'वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या कवितेचं पाणी खोल आहे' अस पु. ल. देशपांडे म्हणतात तेव्हा त्यंनी भाष्याच्या सखोलतेवर बोट ठेवलेलं असतं.  खोलात शिरायचं असेल तर किनारे सोडले पाह्यजे; तरच विरूपाच्या लोकरचनेचा तळ गाठता येतो. याचा दाखला त्यांची सुप्रसिद्ध कविता देते - भारत कधी कधी माझा देश आहे. 

भेदाभेदांनी पोखरलेल्या देशाचं अंतिमतः काय होत असतं हे इतिहासानं कित्येकदा दाखवून दिलेलं आहे. तरीही वेदनामय वर्तमान बदलत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, राष्ट्रप्रेम ही मूल्यं दांभिकतेत दग्ध होतात तेव्हा, त्या सर्व प्रवृत्तींचा दंभस्फोट करणारा नवा उपहास शब्दांकित होतो. त्या उपहासाचे अनेक पदर इथं सापडतात. उपरोधाचा तीव्र स्वर त्यातूनच उमटत राहातो. देशाशी काहीच देणंघेणं नसलेल्यांच्या राष्ट्रभक्तीतला खोटेपणा हेरणं ही प्रस्तुत व्यंगभावातली अर्थपूर्णता आहे.

भारत कधी कधी माझा देश आहे 

आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत 

माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही 

त्यामुळे अन्य जाती-धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही 

माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे 

माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांताप्रांताची जुंपणार आहे 

जुंपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील 

पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील 

पुन्हा नव्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील

त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील खुर्चीवर बगळे बसतील 

पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ

'हम सब एक है हिंदु-मुस्लिम भाई भाई हिंदु-सीख भाई भाई हिंदु-इसाई भाई भाई

मराठीचं माहेरघर असलेली ही नगरी. मराठीच्या वैभवाची अनेक सांस्कृतिक प्रतीकं अभिमानानं जतन करून ठेवणारी पुण्यनगरी. तिचा वर्तमान दंगलग्रस्त, तिची संस्कृती जमीनदोस्त, ही खंत इथं आहे. इथली ज्ञानाची परंपरा भाटगिरीत भव्यता मानू लागल्यानं, सत्तेचं राजकारण वरचढ होऊन बसलं. उत्सव आणि दंगल सत्तेला सारखेच प्रिय असतात, हा केवढा विरोधाभास !

म्हणूनच पुणे या कवितेत फुटाणे लिहितात 

ज्ञानी सत्तेचे भाट झाले ,पहिलवान बारमध्ये शिरले 

लक्ष्मीच्या आक्रमणापुढे, सरस्वतीचे दास हरले ।।

एकावर एक फ्लॅट उभे, वाडे पायाखाली पुरले 

उत्सव किंवा दंगलीसाठी, गणपतीपुरतेच पुणे उरले ।।

---------------------------------------------------------

विडंनबकाव्याचा प्रवास नव्या विडंबनकारांनी सुरु ठेवला पण मूळ कवितेच्या, कवीच्या शैलीच्या विडंबनाऐवजी आपल्या मनातल्या भावना मूळ कवितेतल्या मुख्य शब्दांच्या आजूबाजूला पेरून विडंबन कविता करण्याचं पेव फुटलं. दिवस तुझे हे फुलायचे ...च्या जागी दिवस तुझे हे फुगायचे हे विकसनशील महिला वर्गाला म्हणण्यात आलं. किंवा मराठी भाषेची वंचना कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा आधार घेऊन मांडण्यात आली. त्याचंच मायबोली.कॉमवर विशाखा कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेलं एक उदाहरण पाहूया.

ओळखतंय का कुणी मला ? विचारतीय मायबोली 

दीन झालीय वाणी तिची मान होती खाली ॥

थोडं ऐका सांगते काही कंठ आला दाटून 

हरवलंय ते वैभव कोणी देता का रे शोधून ॥

शब्द, अक्षरे, गमभन साधी बोली ही विसरले 

दूध वाघिणीचे मात्र, सारे घटाघटा प्यायले ॥

दिवस सरले, वर्षे गेली  'ती'ची जादू टिकली 

सहज मग जाईल कशी ओठी प्रत्येकाच्या रुळली ॥

चार मायेच्या माणसांमुळे अजून आहे टिकून 

अस्तित्वाच्या लढाईसाठी ‌द्यायचे आता झोकून ॥

खचले नाही हरले कधी वाटते एकच खंत

माझ्याकरिता थोडं कधी व्हाल का हो व्यक्त ॥

अंतर आपले वाढले तरी, जागवा मराठी बाणा

 हात हाती घेऊन फक्त 'मायबोलीसाठी' लढ म्हणा ॥

-------------------

यात आशय उत्तम आहे. मूळ कवितेच्या गण व मात्रांच्या नियमांशी , वृत्ताशी , नादाशी आणि खटक्याशी  प्रतारणा होऊ नये याचा प्रयत्न आहे पण झेंडूच्या फुलांच्या दर्जाच्या जवळपास जाणार्‍या या कविता नाहीत.  

ब्लॉगर प्रसाद शिरगावकरांनी मात्र त्यांच्या साधंसोपं.कॉम वर प्रकाशित केलेल्या ’नाच रे चोरा’ या ऑनलाईन विडंबन संग्रहात काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची चपखल बसणारी विडंबनं सादर करतात. बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या काळातली आहेत. विडंबित गीतातही व्यक्तिगत चिखलफेक टाळावी असं ते म्हणतात. हा प्रमाद अत्र्यांकडून माधव ज्यूलियन यांच्याबाबत घडला होता. त्यनंतर त्यंनाच अपराधी वाटले व त्यांनी आपल्या एका कार्यक्रमात माधव ज्यूलियन यांना सन्मानाने बोलावले.  मात्र राखून ठेवलेल्या सीटवर नेमका एका स्न्हेह्यांचा मुलगा येउन बसल्याने आपल्याला जागा नाही हे पाहून ते अधिकच रागावून निघून गेले आणि विडंबनकाव्यामुळे निर्माण झालेली दरी तशीच राहिली. 

शिरगावकर म्हणतात, काव्याचा हेतु जर नवनिर्मिती आणि व्यक्तिगत अनुभवाची अभिव्यक्ती हा आहे, तर तोच हेतु विडंबनाचाही असावा. या हेतूने त्यांनी लिहिलेल्या विडंबनगीतांपैकी हे एक . मध्यमवर्गीय दांपत्याच्या संसारातली भातुकली कधीच संपत नाही हे सांगणारं गाणं.

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना

त्या राजाचा उडतो गोंधळ कामाला जाताना

रोज रोजची सुरूच आहे त्यांची अशी कहाणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राजाला कळते आता आपली धडगत नाही

कर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही

स्टेशन वरती उरून जाते एक उदास विराणी

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

-----------------------

 सखी बैल आला मारका

आता तरी पळशील का? पळशील का? अशा स्वरूपाच्या त्यांच्या गमतीदार रचना आहेत पण प्रतिभेने स्तब्ध व्हावं असा सध्याचा एकमेव विडंबनकार म्हणजे तंबी दुराई या नावाने म.टा मध्ये दीड दमडी हे मिश्कील सदर लिहिणारे श्रीकांत बोजेवार. विदर्भात दिग्रस इथे जन्मलेल्या आता मुंबईकर असणार्‍या बोजेवार यांनी संत एकनाथ महाराजांच्या ‘नवरा नको गं बाई, मला दादला नको गं बाई’ या भारुडाला आजच्या राजकीय गोंधळाची दिलेली स्वैर फोडणी ऐकूया.

आरा आरा आरा! 

काय झालं रं मतदारा?

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

काल फलाणीकडं आज बिस्तानीकडं

परवा काशीबाईकडं, तेरवा मस्तानीकडं

मागचं झाकलं का, पुढचं पडतंय उघडं

या हेकडीच्याचं सगळंच वाकडं तिकडं

याला कुठं धरावा, या  ... ला टोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

काल म्हणं कुणाचं तरी घड्याळ फुटलं

एका काट्यानं दुसऱ्या काट्याला लुटलं

तिसऱ्यानं चवथ्याला शब्दानं पार कुटलं

याच्या घरी झोपलं आन् त्याच्या घरी उठलं

याला कुठं टांगावा, सदऱ्याला भोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

कोण कुणाचा कुणाकडे गेला पत्ता नाही

सगळेच बिगरीतले एकालाही यत्ता नाही

जनमनाच्या खुर्चीवर काडीची सत्ता नाही

अन् लोकसेवेची कवडीची माल मत्ता नाही

एका जनार्दनी सांगतो, कुणाला लाजच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

असे विडंबनकार सध्या दुर्मिळ झाले आहेत. मुळात चांगले कवीच दुर्मिळ झाले आहेत. 

स्त्री म्हटली की आक्रोश, वेदना, पाऊस म्हटला की नक्षी पक्षी अशा ठराविक प्रतिमा , त्यांना मिळणारे लाईक्स , या नार्सिसिझममध्ये गुतंतल्याने अभ्यासोनि प्रकटावे हेअपवाद वगळता आता दिसत नाही. 

सोशल मिडियामुळेसाहित्यक्षेत्रातली सुमारांची सद्दी वाढली आहे. आपण ही वाचक म्हणून परिघापलिकडे जाऊन वाचतो का हे स्वत:ला विचारायला हवं आहे. या पार्श्वभूमीवर विडंबन कशाला म्हणू नये हे ही आपल्याला कळावं यासाठी ’एका अनामिकाने ’खोडसाळ’ या नावाने झेंडूच्या फुलांऐवजी ’तेंदूची पाने’ नाव घेऊन मनोगत या वेबसाईटवर एक जबरदस्त उदाहरण दिले आहे. या उदाहरणानेच ’झेंडूच्या फुलांपासून  सुरू केलेला विडंबनकाव्याचा प्रवास तेंदूच्या पानावर पोचला आहे.

'स्वयंवर झाले सीतेचे' या गदिमांच्या रामायणातील गीताची इथे फक्त  चाल वापरली आहे. ते त्याचे विडंबन नाही हे लक्षात घ्या. तर या गीतात खोडसाळ म्हणतात. 

साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे

पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे

उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही

नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही

फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही

तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई

कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा

अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा

अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?

कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता

साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

---------

आता इतकी चर्चा विडंबनावर केल्यावर मलाही स्फुरण चढले होते त्यात आषाढी एकादशी आली आणि सुमार अभंगांना उत आला. टाळ चिपळया खेळ मेळ तीच प्रतीके घातलेले साचेबद्ध अभंग. लोहा लोहे को काटता है या न्यायाने या दरवर्षीच्या वैतागाला मी दिलेले हे अभंगोत्तर 

आज सारे कवी अभंगात दंग  | बघे पांडुरंग वैतागुनि

शब्द पंढरीत तुकडे शोधिती  | यमक साधिती एकदाचे

विठ्ठलाचा टिळा गुगलाचा मॅप | लोणकढी थाप  मारुनिया 

देऊळ राऊळ तन मन धन | रचती मोजून शब्दविटा

शब्दांच्या राशीत सापडेना भाव  | तरी त्याला नाव अभंगाचे

तरीही येईना अभंगाला गोडी | वरई, खिचडी  खाई कवी

सजविण्या रूप  घाली कॅलिग्राफी  | एआय फोटोग्राफी  फेसबुकी

लाईक ऐवजी   हा हा हा चुकुनी | केल्याने मोहिनी   ब्लॉक झाली


Monday, June 22, 2026

नर्मदे हर - अमरकंटक

 

’भारतीय साहित्य की मूलदृष्टी एवं समकालीन वैचारिक परिदृश्य’ हा अभ्यास वर्ग जूनमध्ये अमरकंटकला ठरला. इतक्या दूर जावं की नं जावं विचारत पडले पण अनायासे नवीन शिकण्याची आणि बघण्याची संधी गमवायची नव्हती. महेशला सुट्टी असल्याने घरची काळजी नव्हती. निकिताची कंपनीही होती पण एकाही गाडीचं आरक्षण उपलब्ध नाही. शिवाय थेट गाडी नाही. गुगल करून आकडेमोड केली आणि म्हटलं ’देख लेंगे’. काळजी करायला ही काही कुटुंबाची ट्रीप नव्हती. केळकर सरांनी नागपूरहून अमरकंटकला कारने जाऊया म्हटल्यावर निदान जाण्याचा प्रश्न सुटला. बरोबर सँडविच, ठेपले घेतले होते. जंगलातल्या डोंगरावर असलेल्या या स्थळाच्या माथ्यावर पोचायचं होतं. हजारएक मीटर उंचीवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर मैकल, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात कुठेशी अमरकंटक वसलेलं आहे,  ते भारतातलं अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं एवढीच माहिती या स्थानाबद्दल होती. त्याचं एक कारण तिथलं नर्मदानदीचं उगमस्थान. तर निघालो. 

नागपूरच्यापुढे पेंच अभयारण्य पार करून जबलपूरमार्गे घटीया, बिछीया अशी याकारांत गावं ओलांडत कार जात होती. मध्यप्रदेशातली खेडी अपेक्षेपेक्षा स्वच्छ, बरीच घरं पांढर्‍या रंगात रंगवलेली अशी नेटकी पाहून आश्चर्य वाटलं. जसजसं अमरकंटक जवळ येऊ लागलं, तसतसं परिसरातली घनदाट वनराई , वनराई नसून जंगल आणि मोहक वाटणार्‍या डोंगररांगा गूढ वाटू लागल्या. रस्त्यातून सुर्र्कन जाणारे ससे आणि लांबून चमकणारे कोल्ह्याच्या पिल्लांचे डोळे दिसू लागले. समोरुन दहा-पंधरा मिनीटांनी एखादीच गाडी येत होती. मागे एकही दिसत नव्हती. इथे गाडी बंद पडली तर ! पुन्हा मनात.. ’देख लेंगे’

नऊ साडेनऊ तासांनी अभ्यासवर्गाच्या जागी म्हणजे अमरकंटकजवळच्या भव्य इंदिरा गांधी जनजातीय विश्वविद्यालयात पोचलो. सोय उत्तम होती. शुद्ध गोड हिंदी बोलणार्‍या आयोजकांनी स्वागत केलं. गरमागरम जेवलो. एक एक गाड्या येऊ लागल्या होत्या. दमल्याने अनौपचारिक काव्य संमेलनात श्रोता म्हणून सहभागी व्हायचंही त्राण उरलं नाही. गाडी घ्यायला येईतो बरं दिसणार नाही म्हणून दोन तीन कविता ऐकल्या. इंदोरच्या वाणीने (महिला) स्वत: गाऊन सुंदर स्वरचित शारदास्तवन सादर केलं. मग एका प्राध्यापकांनी एक न-कविता सादर केली. ’आदमी दौ कौडीका’ असं ध्रुवपद आलं की ते 'आदमी?' म्हणत आणि आम्ही कोरसमध्ये ’दो कौडीका’ म्हणायचो. ती कविता संपल्यावर मनोमन हुश्श् केलं. केळकर सरांनी झकास वात्रटिका आणि निकिताने एक जोशपूर्ण कविता गाऊन सादर केली. दरम्यान न-कवितावाले ’एक और नज्म’ का काहीतरी म्हणत पुन्हा सरसावले तेव्हा ’देख लेंगे’ चा धोका न पत्करता मी चतुराईने गाडीत जाऊन बसले.  

भव्य विद्यापीठ परिसरातल्या तिमजली ट्रान्झिट क्वार्टरमध्ये राहण्याची व्यवस्थित सोय केलेली होती पण आम्ही दोघी म्हणजे एकूण चार कौड्या तिथे पोचेतो वीज गेलेली. साहजिक लिफ्ट बंद. एक बेडूक उडी मारून अंगावर. मग आमचा कलकलाट. टॉर्च लावायचा तर मोबाईलपण एका काडीवर आलेला. पुन्हा एकदा मनात ’देख लेंगे’ म्हटलं. पण काय देखणार कारण अंधार गुडुप. तेवढ्यात वीज आली . ट्न्न आवाज करुन जीव भांड्यात पडला. हलका पाऊस पडून गेल्याने  हवेत रात्री गारवा होता त्यामुळे शांत झोप लागली. 

सकाळी ठरल्या वेळी कुलदीप घ्यायला आला. न्याहारी करून अभ्यासवर्गाच्या सभागृहात पोचलो. देशभरातून सत्तरेक लोक आले होते. महिला कमी होत्या. बीजभाषण उत्तम झाले. पाठोपाठ एक एक सत्र सुरू झाली. उत्तम हिंदीतून सगळे वक्ते अभ्यासपूर्ण बोलत होते. निकीताला इतकी हिंदी ऐकायची सवय नसल्याने एका सूचनेचा तिने अर्थ विचारला. ’वॉशरूम इज अपस्टेअर्स’ हा अर्थ ऐकताच ती हसत बसली. 

’भारतीय साहित्य की मूलदृष्टी’, ’भारतीय साहित्यपर वैश्विक प्रभाव’, ’समकालीन वैचारिक परिदृश्य’ इ, विषयांवर सविस्तर आणि दीर्घ उद्बोधन व नंतर प्रश्नोत्तरं होत होती. (अभ्यासवर्गाचा दर्जेदार आशय हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) भोजनव्यवस्था चांगली होती पण मेसचं असल्याने असेल सगळ्या मसाल्यांची चव एकसारखी होती. कोफ्ता करी असो वा आलूवडा वा दाल, डोळे मिटले तर काय खातोय हे ओळखू यायचं नाही त्यामुळे आपण फारच आध्यात्मिक झालो काय असं वाटू लागलं. खरं तर हा प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नव्हतं, तर साहित्य, निसर्ग, अध्यात्म आणि शांतता याचा एकजिनसी अनुभव होता. (कदाचित म्हणूनच पदार्थांची चव एकसारखी लागत असावी 😊 ) 

रविवारी कितीतरी दिवसांनी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. न्याहारी करून पुन्हा सत्रांना सुरुवात झाली. कालच्या विषयांचे उर्वरित मुद्दे व सारांश असं आजचं स्वरूप होतं. प्रत्येक सत्राआधी विस्तृत पुस्तक परिचय होता. बंगालच्या ’आनंदमठ’ पासून आंध्रातील प्रख्यात ’पोतन्ना’ भागवतापर्यंत विविध पुस्तकं जवळून कळली. तेलंगणाच्या एका विद्वानांनी पोतन्ना भागवत त्यातल्या वृत्तबद्ध रचनांच्या उदाहरणासह त्यांच्या द. भारतीय हेलातल्या हिंदीमध्ये इतकं भन्नाट सादर केलं की तेलुगुतले काही संदर्भ समजत नसूनही सगळे दंग होऊन ऐकत राहिले. 

समारोपीय सत्र संपताच एकमेकांचे संपर्क नोंदवून, जेवून, सामान डिकित टाकून सर्वांचा निरोप घेतला. 

------------

रात्री एक वाजता बिलासपूरहून ट्रेन होती. तिथे पोचायला साडेआठला पेंड्रा रोड नामक स्टेशनपासून गाडी होती. मधल्या वेळात अमरकंटक दर्शन करायचं ठरलं. गीतांजलीचं आरक्षण अद्याप वेटिंग होतं. ती काळजी दर्शवताच सोबतचे दिनेशजी म्हणाले, "मोहिनीजी, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते." त्यामुळे ’देख लेंगे’ म्हणत विद्यापीठ सोडलं. वाटेत दोन तीन मंदिरामध्ये दर्शन घेतलं. जलेश्वर महादेव हे मंदिर बारावं ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करत होतं. एक भाग छत्तीसगडमधला लागे तर पुढचा भाग म. प्रदेशातला त्यामुळे आता नेमकं कोणत्या राज्यात आहोत हे पाहणं सोडून दिलं. एक गोष्ट कॉमन होती. निसर्गाची समृद्धी. दर्शनार्थी टिपीकल उत्तर भारतीय. भांगात सिंदूर भरलेल्या आणि ब्रोकेडच्या चकचकीत साड्यांमधल्या बायका. हाताशी लागतील ते कपडे घातलेले पुरूष. स्वस्त फिल्मी कपड्यातल्या सावळ्या तरूण मुली. भडक रंगवलेल्या मंदिरांच्या परिसरात जिकडे तिकडे लाल चुनरींच्या गाठी बांधलेल्या. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल फोन आणि देवाला पार्श्वभूमीवर ठेवून सेल्फी काढायची धडपड. एक माणूस तर डोकं पिंडीवर टेकलेलं आणि बुबुळ फोटो काढणार्‍याकडे फिरवलेलं अशा चमत्कारिक स्थितीत बराच वेळ होता. बटबटीत सजावट, भक्तांचं मोठमोठ्याने बोलणं, घंटा बडवणं, बाहेर खेळणी, जांभळं, पूजेचं सामान विकणार्‍यांचा कोलाहल यामुळे प्रसन्न वाटेना. 

अनुपपूर जिल्ह्यातल्या अमरकंटकमध्ये प्रवेश करताना मात्र पर्यटनातून आलेली समृद्धी आणि वेगळीच शांतता जाणवू लागली. टोकदार डोंगरांच्या माथ्यावरचं ईश्वरी आलय या अर्थाने अमरकंटक नाव पडल्याचं सांगतात. कालिदासाच्या साहित्यात याचा ’अमरकुटा’ असा उल्लेख आहे, ज्याचा अमरकंटक अपभ्रंश झाला असंही ऐकलं. शिव-पार्वतीने इथे तपस्या केली होती असं मानतात त्यामुळे याला तीर्थराज मानलं जातं. नर्मदेबरोबरच हे सोन आणि जोहिला या नद्यांचंही उगमस्थान असल्याचं तिथे गेल्यावर कळलं. यातली जोहिला बघण्याचा काही योग आला नाही. या नद्यांविषयी एक आख्यायिका कळली ती थोडक्यात -

अमरकंटक नावाच्या राजाला नर्मदा नावाची सुस्वरूप मुलगी होती. राजाने तिचा विवाह शोण ‍(सोन !) राजाशी ठरवला. विवाहाच्या वेळीच त्यांची प्रत्यक्ष भेट होणार होती. परंतु आपला मृत्यू जवळ आल्याची राजाला जाणीव झाल्याने त्याने घाईघाईने नर्मदेला राज्याभिषेक करून राज्यकारभार तिच्या हाती सोपवला. राजा निवर्तला. कालांतराने आधीच ठरलेला विवाह पार पडावा म्हणून प्रतीकात्मक आपली अंगठी झोला (जोहिला !) नावाच्या दासीबरोबर तिने शोण राजाकडे पाठवली. झोला दासीच नर्मदा आहे असं समजून त्यानं तिचं प्रेमाने स्वागत केलं. झोला धूर्त होती. संधीचा फायदा घेऊन तिने विवाह उरकून घेतला. इकडे वाट पाहून नर्मदेने शोण राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. झोलाने तिची ओळख नाकारली. खिन्न मनाने नर्मदा तिथून निघाली पण परत न जाता मैकल पर्वतावर ध्यानस्थ बसून शंकराला प्रार्थना केली. त्या समाधीत नर्मदा देहरूपाने विरघळली आणि पाण्याच्या रूपाने खाली वाहू लागली. नर्मदा नदी झाली.. भारतातील सर्वात प्राचीन नदी. चंद्रवंशातल्या पुरुखा राजाने तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न केले. त्याने मागितलेल्या वराप्रमाणे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठवले. अशीही तिच्या उत्पत्तीविषयी आणखी एक कथा ऐकली. 

नर्मदेवरच पीएचडी केलेल्या दिनेशजींचं वाक्य आठवलं- गंगा धर्म का, जमुना प्रेम का, नर्मदा भक्ती का, गोदावरी तप का प्रतीक है. 

Pataleshwar Temple | Sonmuda

साहजिक अमरकंटकचं मुख्य आकर्षण म्हणजे नर्मदा उगम कुंड पण केळकर सरांच्या ताईच्या ओळखीतून सोबत आलेल्या वाटाड्याच्या सूचनेनुसार आधी युनेस्को हेरिटेजच्या अंतर्गत आलेल्या कलचुरी काळातील पाताळेश्वर मंदिरात गेलो. हे तत्कालिन शंकराचार्यांनी ११ व्या शतकात राजाच्या साहाय्याने वसवलेलं मंदिर. दहाव्या शतकात हा प्रदेश चेदी शासकाच्या ताब्यात होता. आजही त्या काळातली मंदिरं आणि इतर भग्नावशेष दृष्टीस पडतात. 

या परिसरातलं कुंड हेच मूळ उगमस्थान असं काही स्थानिक म्हणतात पण त्याला मान्यता नाही असं वाटाड्या म्हणाला. या मंदिरांची वास्तुकला पाहण्यासारखी आहे. सुबक दगडी बांधकाम, कोरीव शिल्पं पण आत दिवे नसल्याने गडद अंधार्‍या गाभार्‍याच्या जाळीला डोळे लावून विष्णू आणि शिवलिंगाचं दर्शन घेतलं. 

परिसरातच एका भल्या मोठ्या पिंपळपारावर मोबाईल चार्जिंगला लावून बसलेल्या साधूबुवाशेजारी बसून कॉफी घेतली. 'नदीष्ट' मध्ये लेखकाला भेटणार्‍या माणसांसारखी अनेक माणसं इथे वावरत असणार. त्यात ही तर नर्मदामैय्या. या माणसांसाठी ही नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती पोषणकर्ती आहे, सोबती आहे. काहींसाठी  गुरू आहे, कुणासाठी साधना आहे तर कुणासाठी उपजीविकेचं साधन. 

रस्ता ओलांडून शुभ्र कमानीतून समोरच्या नर्मदा मंदिर परिसरात प्रवेश केला. सर्वत्र घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण होतं. डावीकडे धर्मशाळा, उजवीकडे उगम-परिसर. हे देवीचं ३९वं शक्तीपीठ असून त्याला ‘चंद्रिकापीठ’ म्हणतात. कमानीपाशी दोन मध्यमवयीन, देखण्या, केशरी वस्त्रातल्या, तेजस्वी म्हणता येतील अशा बायका दिसल्या. केस अगदी बारीक कापलेले. जवळ एकेक काठी आणि पिशवी होती. 'वॉल्डन' लिहिणार्‍या थोरोचा ’simplify, simplify’ हा मंत्र आचरत निसर्गाशी तादात्म्य पावल्या असाव्यात, इतक्या निश्चिंत, प्रसन्न दिसत होत्या.  

Narmadamaiya udgam mandir | Kund | ShreeYantra  

काही थकलेले पण चेहर्‍यावर अतीव समाधान असलेले परिक्रमावासी दिसत होते. त्यांच्यासाठी कुणी उलट जाऊ नये म्हणून एका रेषेच्या पलीकडे वेगळॆ प्रवेशद्वार व निर्गमन स्थान होते कारण परिक्रमा करताना नर्मदा नदी नेहमी परिक्रमावासीयाच्या उजव्या हाताला असावी असा नियम आहे. नर्मदा ही भारतातील एकमेव अशी नदी आहे जिची पूर्ण परिक्रमा केली जाते. अमरकंटकच्या या उगमापासून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपरिक नियम आहे. 

हा कुंड परिसर पूर्ण पांढर्‍या संगमरवरात बांधलेला आहे. पण पाण्यात टाकलेल्या चढावामुळे पाणी गढूळ दिसत होतं. तेच काही जण बाटल्यात भरून घेत होते. मी फक्त पाण्याला स्पर्श करुन डोळ्याला लावलं आणि नमस्कार करून मैयाच्या दर्शनाला

गाभार्‍यात गेले. बाहेर एक छोटा दगडी हत्ती आहे. त्याखालून गेलं की पापं नष्ट होतात असा समज आहे. अभ्यासवर्गात दिल्ली विद्यापीठाच्या एका प्राध्यापिकेनं ती कशी त्याखालून जाऊ शकली वगैरे वर्णन केलं असल्याने उत्सुकता होती. बारीक माणसाची आणि लहान मुलांची पापं लगेच नष्ट होत होती तर जाड किंवा वयस्कर माणसं मध्येच अडकून पापासकट परतत होती. काहींना तर नातेवाईक ओढून काढत होते. एकूण स्थिती पाहून आम्ही पापं तशीच ठेवायचा निर्णय घेतला. प्रसाद विकत घेतला , निकिता आणि मी एका भिंतीवर लिहिलेलं नर्मदाष्टक चालीत म्हटलं आणि बाहेर आलो. अभ्यासवर्गातली आणखी काही मंडळी बाहेर भेटली. 

लगतच भीमाने वनवासात असताना बांधलेलं कमळाचं तळं होतं. किनारा अस्वच्छ , जलपर्णी वाढलेली पण तळं मात्र सुंदर होतं. नाव इंद्रदमन. ते इंद्रियदमन असावं असं मी मनाशी ठरवून टाकलं.   

वेळेअभावी कपिलधारा दूधधारा धबधबा पाहण्याचा विचार एकमताने रद्द केला. (हॅ, मग काय पाहिलं !) ४० वर्षांपासून (हे जरा अतीच वाटलं) निर्माण स्थितीत असलेल्या श्रीयंत्राला भेट दिली. त्याचं प्रवेशद्वार हा आता अमरकंटकचा आयकॉन झालं आहे. त्याचा टॉप व्ह्यू सुरेख होता. अजूनही ते अपूर्ण आहे. पुढे गर्द झाडीतून प्रवास करत सोनमूडा इथे पोचलो. 

इथून सोन नदीचा उगम पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. डोंगरांच्या कुशीतून उगम पावणाऱ्या या नदीचं दृश्य देखणं होतं पण नदीचा प्रवाह उन्हाने आटून अधेमध्ये बारीक धाराच दिसत होत्या. माकडांना चुकवत शंभर फूट खाली व्ह्यू पॉईंटला जाऊन पाहिलं तर अफाट पसरलेलं विविध हिरव्या छटा ल्यालेलं अफाट जंगल आणि त्यातच विलीन होत चाललेला सूर्याचा केशरी गोल. पुन्हा वर चढून कमानीबाहेर आलो. वाटाड्याच्या भावाचं समोरच विविध वस्तू भांडार होतं. त्याची पुतणी धावत येऊन काकाला बिलगली. गल्ल्यावर निवांत बसलेल्या तिच्या आईने जेठजींकडे लक्ष जाताच घाईने डोक्यावर पल्लू ओढला. 

पुढच्या वळणावर 'माई की बगिया' हे रमणीय ठिकाण वाटाड्याने दाखवलं. स्थानिक श्रद्धेनुसार नर्मदामैया इथे खेळायला येई. फुलझाडं, औषधी वनस्पती आणि हिरवाईने नटलेला हा परिसर अतिशय शांत होता. गर्दीही कमी होती. 

------------

एव्हाना आमचा सिंड्रेला टाईम झाल्याने वाटेत ठरल्या ठिकाणी वाटाड्याला सोडलं. विस्तीर्ण पठारावर लांब एक कार दिसत होती. तिथून डावीकडे वळलात की खाली पेंड्रा रोड रेल्वे स्थानकाकडे जाता येईल असं सांगून ’नर्मदे हर’ म्हणत तो उतरला. पठार संपले पण रस्त्याचा अंदाज येईना. ’देख लेंगे’ म्हणत डावीकडे वळलो आणि रस्ता लागला. डोंगररस्त्यांमधून जाताना पुन्हा एकदा जंगलाचं मनोहारी दर्शन घडलं. साग, साल, बांबू आणि अनामिक..बहुधा औषधी वनस्पतींची (असं वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणतात ) उभी झाडं दाटीने दिसत होती. वळणाचा रस्ता संपतच नव्हता. बरोबर जातोय का हे पाहावं तर जंगलात इंटरनेटने आणि मग बॅटरीने केव्हाच साथ सोडलेली. आगे भी जाने ना तू - पीछे भी जाने ना तू अशी भुलभुलैया गत झालेली. निकिता बहुतेक हनुमान चालीसा किंवा भीमरूपी... काही तरी पुटपुटत होती. माहित नाही का, पण मी निश्चिंत होते. परिक्रमा म्हणजे केवळ धार्मिक प्रवास नसून आत्मशोध आणि अहंकार गळून पडण्याचा प्रवास आहे असं म्हणतात. परिक्रमा न करताच, आत्मशोध वगैरे नाही पण आमचा अहंकार थोड्या वेळासाठी गळून पडला असावा. मग परिक्रमेचा अनुभव काय असेल ! पादचारी परिक्रमावासींना तर दंडवतच !

एकदाची एक गाडी समोरून आली आणि त्या चालकाने बहुधा रस्ता योग्य असल्याची खात्री दिली पण त्याच्या गालात तोबरा असल्याने आम्हाला पुन्हा शंका आली. रस्त्यात अधूनमधून माकडांचे कळप, वळणावळणाचे घाटरस्ते दिसत होते. हिरवीगार झाडं आता अंधारामुळे काळपट दिसू लागली. चुकून एखादा माणूसप्राणी किंवा गाडी दिसताच थांबून टाळ्या पिटून आम्ही 'ओ भैया.. इधर इधर.. पेंड्रा ? पेंड्रा?' ओरडायचो व तो ’बरोबर’ अशी खूण करायचा, अखेर गाडी पेंड्रा रोड स्टेशनला पोचली. 

हे जेमतेम एका प्लॅटफॉर्मचं, एखादी चुकार गाडी येणारं, एखादे रामूकाका बसलेलं ,इवलं पत्र्याचं छत असलेलं स्टेशन असणार असं समजून केळकर सरांचा निरोप घेऊन आत शिरलो तर ते चक्क आधुनिक स्टेशन निघालं. kiosk वर तिकिट काढलं तोवर बाकी मंडळी पण अशीच वाटचाल करत येऊन पोचली. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर दिल्लीला जाणारी मंडळी होती. एकमेकांना हात हलवून आम्ही 'कल हम कहा तुम कहा' भावनेने दोन्ही तीरांवरून ओरडून माफक गप्पा मारल्या. दरम्यान आमची गाडी आली. आरक्षण नव्हतं. पुन्हा ’देख लेंगे’. टीटीई येताच मी अपडाऊन अनुभवातले विनम्र भाव चेहर्‍यावर आणून काय ते खरं सांगितलं. त्याने बरं असा हात केला. पुढच्या गीतांजलीचं आरक्षण अजूनही वेटिंग होतं. मला मी गीतांजलीच्या दारातल्या पॅसेजमध्ये उकीडवी बसलेली दिसू लागले. ती काळजी दर्शवताच दिनेशजी पुन्हा म्हणाले, "कहाँ ना, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते." ”वो ’आगे’ अभी पास मे आ गया ना", हे शब्द मी गिळले.

काळोखामुळे बाहेरचं काही दिसत नव्हतं. आता उस्लापूर नामक अगम्य स्टेशनला पोचलो. तिथून बिलासपूरला जायचं होतं. सांगली-मिरजेसारखं हे जुळं प्रकरण होतं. रिक्शात फिल्मी गाणी ऐकत दिनेशजी, पांडेजी, मी आणि निकिता बिलासपूरला पोचलो. नागपूरसारखं मोठं शहर आहे ते. भव्य स्टेशन पाहून तर सीएसटीची आठवण झाली. कँटीनला मिळेल ते जेवलो आणि वेटिंग रूमला आराम करत गीतांजलीची वाट पाहू लागलो. गाडी दोन तास उशीरा आल्याने झोपेने वटारलेल्या डोळ्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान आरक्षण कन्फर्म झालं होतं. खरं आहे, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते. नर्मदे हर !