एखाद्या कवीची एखादी कविता आवडते. एखाद्या कवीच्या कवितेतला एखादा चमकदार शब्द आवडतो पण एखादा कवी अख्खाच्या अख्खा आवडतो. त्या कवीची प्रत्येक कविता आणि त्यातला प्रत्येक शब्द झपाटून टाकतो, असं तुमचं कुणाच्या बाबतीत होतं का? माझं असं #बाकीबाब म्हणजे बा.भ.बोरकरांच्या बाबतीत होतं. त्यांच्या कविता आरपार शिरतात. अर्थाचे कंगोरे वगैरे शोधत बसायचं दडपण नसल्याने, कवीला नेमकं काय म्हणायचंय बॉ! असले प्रश्न पडत नसल्याने, त्यांची कविता शब्दश: भेटते. ती वाचायची चीज नसून जगायची, भोगायची, अनुभवायची चीज आहे हे लख्ख कळतं.
’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे..
कड्या कपारीमधूनी घट फुटती दुधाचे’
वाचलं तेव्हा गोव्याला जाण्याआधीच मी गोवा ’पाहिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष गेले तेव्हा बहुतेक अनुभव म्हणजे ’देजावू’ मोमेंट होते. आधीच कुठेतरी ’पाहिलेले’.
’कुठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे..
एक त्यातले लुचे आईला सटीक कांती गोरे गोरे’
असं काही चित्रवाही ते कवितेतून रेखाटतात तेव्हा त्या कड्यावर चढून बकरीच्या शुभ्र गोजिरवाण्या पिलाच्या मऊशार अंगाला आपण केव्हाच स्पर्श केलेला असतो.
इकडे कुणाला कोसळत्या, खळाळत्या पावसाचा अनुभव नाही, पण
’लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय
थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय’
असा निळाईत रंगलेला पाऊस त्यांच्या नुसत्या शब्दांमधून चिंब करतो.
सौंदर्यपूजक, प्रकाशपूजक बोरकर तमाचे स्त्रोत्र लिहितानाही सृजनाशी नातं जोडतात.
’घटका घटका काळोखातच बसून असतो असा
उरातला गोंजारत नवख्या शब्दांचा कवडसा’
त्यांच्या या ओळी वाचाव्यात आणि स्वत:सह स्तब्ध बसून राहावं.
’मध्यरात्री नभघुमटाखाली शांतीशिरी तम चवर्या ढाळी
त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती..’
असं काही वाचल्यावर यावर काही लिहू नये, त्याने मनावर पाण्यावरच्या तरंगासारखा उमटलेला अलवार भाव डहुळेल, त्यावर ओरखडे पडतील असं वाटतं.
स्त्री-सौंदर्याची आसक्ती जेव्हा त्यांच्या शब्दातून ओसंडून वाहते तेव्हा आपण त्यातल्या प्रियकराचे डोळे झालेलो असतो. इतका हळूवार रोमँटिक, चितारी मराठीत दुसरा नसावा.
’पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुके..
वाटले त्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे’
किंवा
’नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय
नको गोठवू ओठात दाट अमृताची साय’
किंवा
’तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या जलबिंदूंपरी
त्रिभुवन हे डळमळले गं’ (थेट त्रिभुवन, अधलं-मधलं काहीच नाही !!)
किंवा
’केशी तुझिया फुले उगवतील.. तुला कशाला वेणी’ किंवा... पुरे.
बोरकरांचे अर्थगर्भी शब्द नुसते वाचावे, रिचवावे, समीक्षा वगैरे करुन चावून चोथा करु नये. मग मिटल्या डोळयांना ’ती’ दिसते.
अनुरक्तीतल्या सौंदर्यात आणि विरक्तीतल्या देखणेपणात नेमका काय फरक असतो हे सुद्धा हा कवी काय ताकदीने दाखवतो!
’ओळखतील जे मला आणि मज दावितील मम यथार्थ ओळख,
कणकण माझ्या देतील किंवा अवघ्या ब्रह्मांडाची पारख’
किंवा
’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनही जी स्वस्तिपद्मे रेखती’
असं अंतर्बाह्य देखणेपण जगाला लाभेल तेव्हा लाभो पण आपल्याला निदान ती नजर तरी लाभेल का!
बोरकरांची कविता वैयक्तिक अनुभवापासून वैश्विक अनुभूतीपर्यंत कमाल वेगाने झेपावते. मूक करते.
’या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे,
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे...
तेथ जाया वेग-वेडी पारजाची वाट आहे,
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे.’
निर्व्याज भावनांच्या पखाली वाहणार्या या शब्दप्रभूला ’नाही पुण्य़ाची मोजणी नाही पापाची टोचणी’ म्हणत स्थितप्रज्ञ होणं सहजसाध्य असलं तरी ’अनंता तुला कोण पाहू शके’ अशी अमूर्ताची ओढ आहेच.
जगण्यातले सगळे विभ्रम त्यांच्या उत्कट शब्दांच्या रुपातून असे आपल्या आत, बाहेर सगळीकडे विखुरलेले असताना, त्यांच्या कवितांचा ’दिडदा दिडदा’ नाद मनात सतत निनादत असताना त्यांच्या वेगळ्या स्मृती जागवायच्या तरी कशा!
नितांत सुंदर... माझे गुरू प. पू. डॉ. पारनेरकर यांचे आवडते कवी. तू म्हणते तसे त्या कविता अनुभवायची आणि नि:शब्दतेने श्वासात भरून घ्यावयाची आहे.
ReplyDeleteउत्तम विवेचन , मुळात बकिबाब बोरकरांची कविता एवढी उत्कट , चित्रमयी, की वाचक त्यात गुंतून जातो . उत्तुंग प्रतिभा !!
ReplyDelete