Showing posts with label अनुवाद-साहित्य. Show all posts
Showing posts with label अनुवाद-साहित्य. Show all posts

Friday, October 6, 2023

याचना

 याचना

रखरखत्या रवीगोलास

इवलीशी विचारे मुंगी

जरी देशी दाह जगाला 

लाही न माझिया अंगी

◽️

किती जीव जन्मती जगती

मग कशास क्षणभर तंटा 

हे रौद्र अदित सम्राटा 

अम्ही क्षुल्लक तू वरवंटा

◽️

तू भले सोड त्या ज्वाळा

कापेल त्राहीं ही धरिणी

व्याघ्राची भीती लांघुनिया

चरण्यासी निघेल हरिणी

◽️

विश्वाच्या विशाल उदरी 

बहू कृमी, जंत अन पाणी

दीप्तीने तुझ्याच उजळोनी 

झाडांस बिलगतील गाणी 

◽️

दूरवरुनी फुलव निखारे

वा अवचित दे जलधारा 

सुक्ष्मात जवळ घे वसुधा

बघ वारुळ विभ्रम सारा  

◽️

तू अजस्र खग किरणांनी

घे उचल पृथ्वीचा मोहर

मग टिपेल चंद्र बिलोरी

वैशाखी तमस मनोहर  

◽️

तू अधिपती सृष्टी दिठीचा

मी क्षुद्र टिंब सरपटते 

नमनासी वाहुनी साखर

प्रार्थनी क्षेम पुटपुटते…

◽️

- श्रीपाद अपराजित

Friday, July 15, 2022

Time

Time

It's in a haste.. always

It does wish to halt for a moment though..

to feel it's own existence


Then it hurriedly hides itself in the clouds

but gets restless n wanders desperately...

It dives deep in the sea

and the next moment 

emerges on it's surface as an impulsive tidal wave...


It settles on a lush green leaf 

as a dew drop...

then the bubble bursts

With the blink of an eye


It starves for ages in despair in an empty bowl..

The careless time...Tramples a kitten rudely on the

crowdy streets 

When it's giant wheel rotates

anonymous lives get literally ragged into pieces


It's aloof, neutral.. endears none

Where does it head to !

It doesn't wait for breastfeeded lips 

nor does it wait to pass over the skin ,over the hair

even over the heart..callously


It travels on and on and never returns

Does it really exist ?


Time.. everlasting ..Full of life...

When it's all over for one

It's just a beginning for the other...

When it pauses for us 

Is that a termination ! 

It's not...

We keep flowing 

With the wind 

with the dust 

with the light...


Then what does time mean to us ?

Just a little span of our existence...

Which ends 

With our senses 

with us.


(काळ या कवितेचा अनुवाद)

- Mohini Limaye Modak

----------------------------

 काळ?

अखंड सुरू असते त्याची लगबग

त्यालाही थांबायच असतं क्षणभर खरंतर

अनुभवायचं असतं त्याचं असलेपण


मग तो ढगात लपतो,पण भांबावून सैरैवैरा होतो.

समुद्राच्या खोल तळाशी जातो तर

उद्वीग्न लाट होउन आदळत येतो

बसतो हिरव्यागार पानावर

टप्पोरा थेंब होऊन कधीतरी थांबतो

तर त्याचा बुडबुडा फुटतो


भुकेल्या कटो-यात तडफडून अर्धमेला होतो

बेफिकीरीने कधी 

भररस्त्यात मांजरीच्या पिल्लाला तुडवून जातो

कधी फिरतात अफाट त्याची चाकं

आणि भरगर्दीत कुणी चिंध्या चिंध्या होतं


तो अलिप्त, तो तटस्थ, त्याला कुठलाच मोह नसतो

कुठे पोहचायचय त्याला?

थांबत नाही तो, दुधकोवळ्या ओठांसाठी

तो जातो त्वचेवरुन... केसांवरून....

ह्रदयावरून सुद्धा?

जातो फक्त! येत का नाही?.


काळ खरच असतो?

काळ अखंड जिवंत!  तरूण!

एकासाठी संपलेला असतांना

दुस-यासाठी दौडत असतो !

तो आपल्यासाठी थांबतो

म्हणजे का नष्ट होतो आपण?

आपण तर वहात राहतो

वा-याबरोबर ,धुळीत, प्रकाशात अखंड...


मग काळ खरच कोण असतो ?

की आपण आपल्यापुरता एक काळ असतो?

जो आपल्या सोबत संपतो.


- ऍड. मंदाकिनी पाटील


–--------


Wednesday, April 20, 2022

व्याकुळ कोंब

How quickly you finish

everything served on the plate

with restraint 

like a conquering emperor


Couldn't  you inhale

the aroma of the delicacies..

Couldn't  you savour them 

in delight !


Couldn't you acknowledge earnestly !

if not with words

with a gratifying glance at least !


Instead

you get up with a belch

wiping your mouth 

and 

the anguished tender sprout 

of my hunger

withers and dies within...


Translated by Mohini



 व्याकुळ कोंब


किती पटापट संपवलं

ताटातलं सगळं

निग्रहानं विजय मिळवणाऱ्या 

एखाद्या सम्राटासारखं 


साठवून घेता आला असता 

पुढ्यातल्या पदार्थांचा दरवळ

अन् लज्जतही अनुभवता आली असती खरंतर


देता आली असती

उत्स्फूर्त दाद

फक्त एका कृतार्थ नजरेने


तू तोंड पुसून उठतो

ढेकर देऊन तेव्हा

कोमेजून, मृतप्राय होतो 

जेमतेम उगवू पाहणारा

माझ्या भूकेचा व्याकूळ कोंब!


संघमित्रा खंडारे



Tuesday, March 1, 2022

'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख


महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास म्हणजे गेल्या शतकातलं महाराष्ट्रातलं व्युत्पन्न चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ’चालतेबोलते विद्यापीठ’ असा त्यांचा उल्लेख बापूजी अणे करत. नवीन पिढीलाच काय आपल्या पिढीलाही त्यांची विद्वत्ता, व्यासंग, पांडित्यपूर्ण साहित्यनिर्मिती, ओजस्वी वक्तृत्व, मूलगामी राष्ट्रचिंतन, सांस्कृतिक-प्रबोधनाचं अतुलनीय कार्य याची फारशी माहिती नाही.
जन्मशताब्दी निमित्ताने महामहोपाध्याय बाळशास्त्रींच्या साहित्याचा परिचय नव्या पिढीला करून देणार्या 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथाचं लोकार्पण मुंबई इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झालं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
प्रख्यात वक्ते, अग्रणी लेखक श्री.आशुतोष अडोणी हे या ग्रंथाचे संपादक. बाळशास्त्रींनी ’भारतीय जीवनादर्श’च्या माध्यमातून रामायण व महाभारतातील व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. यातल्या स्त्री व्यक्तिरेखांबद्दलचं माझं आकलन मी लेखातून मांडलं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाज्ज्वल्य देशाभिमानी आणि वक्तादशसहस्रेषु म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळशास्त्री हरदास यांना महामहोपाध्याय, वेदान्ततीर्थ, काव्यतीर्थ, साहित्याचार्य अशा अनेक उपाध्यांनी का ओळखले जात असावे याची चुणूक दाखवणार्‍या त्यांच्या अनेक वाड्मयीन शिल्पांमध्ये ’भारतीय जीवनादर्श माला’चा समावेश होतो. बाळशास्त्रींनी यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने प्राचीन वाड्मयातील विशेषत: महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. श्रीमन्महाभारतावरील व्याख्यानांच्या सत्रात त्यांनी महाभारतीय स्वभावचित्रे उलगडताना गांधारी, कुंती व द्रौपदी अशा तीन स्त्रीरेखा चित्रित केल्या होत्या. पुढे त्याच मालिकेत सावित्री, कुंती यांचा त्यांनी समावेश केला. त्यांच्या रामायणावरील ग्रंथात ’एक स्वर्गीय पुष्प’ या शीर्षकांतर्गत सीतेचे स्वभावचित्र आलेले आहे. १९७५ हे स्त्रीवर्ष म्हणून घोषित करण्य़ात आले होते. त्याचे औचित्य साधून या सर्व स्त्रीस्वभावरेखांचा संग्रह ’भारतीय जीवनादर्श’ (भाग १) या नावाने प्रसिद्धीस आला. बाळशास्त्रींच्या सुविद्य पत्नी वीणाताई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "महाभारत हा इतिहास आहे की केवळ एक काव्य, त्यातील घटना खर्‍या आहेत की काल्पनिक याचा आपल्याशी संबंध येत नाही. जीवनाचा श्रेष्ठ ध्येयवाद निश्चित करणारा तो ग्रंथ आहे. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून ज्या अनेक व्यक्ती चित्रीत झाल्या त्यातील काही प्रमुख शास्त्रीबुवांच्या लेखणीनं रेखाटल्या आहेत. त्या आजही आपल्याला पथदर्शक ठरतील अशी त्यांची धारणा आहे." दुर्गुणांचा अतिरेक झाला तर विनाश अटळ असतोच पण सद्गुणांचा अतिरेक झाला तरीही कार्य नासतं हेच व्यासमहर्षींनी महाभारतातल्या विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे. या मुद्द्याचा विचार करता प्रस्तुत पुस्तकातील स्त्रीव्यक्तिरेखांमधील बहुतेक व्यक्तिरेखा धर्मकार्पण्य़ाच्या बळी ठरलेल्या दिसतात. धर्म आणि तत्त्वज्ञान यांनी सामर्थ्याला नियंत्रित करण्य़ाऐवजी सामर्थ्यच त्यांना नियंत्रित करू लागले. अधर्माचे तम दाटले आणि दिशा अंधारल्या. या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या या स्त्रीव्यक्तिरेखा एखाद्या विद्द्युल्लतेप्रमाणे भासतात. प्रथदर्शनी त्या हतबल वाटतात परंतु लेखकाचे अभ्यासपूर्ण विवेचन समजून घेत गेले की या स्त्रियांनी अधर्मशरणता ठामपणे नाकारत आपल्या धर्मशील आचरणाच्या तेजाने आपले केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर समाजमनदेखील झळाळून टाकलेले दिसते. स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. ’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ,रमन्ते तत्र देवत:’ हे आपले सांस्कृतिक गृहीतक मानले गेले. असे असले तरी प्रत्यक्षात वैर्‍यालाही देऊ नये अशी वागणूक या स्त्रियांना केवळ आप्तस्वकीयांनीच नव्हे तर त्या ज्यांना परमेश्वरस्वरूप मानत, ज्यांच्याशी या स्त्रियांचे आयुष्य गुंफले गेले होते अशा पतीनेही दिल्याचे चरित्रवर्णनात दिसून येते. अशा प्रसंगांच्या अग्नीपरिक्षेतून जाताना या स्त्रीव्यक्तिरेखांनी आपले स्त्रीत्व मात्र होरपळू दिले नाही हे बाळशास्त्रींच्या विवेचनातून प्रत्ययास येते. असामान्य गुणांच्या या शलाका त्यात लीलया उत्तीर्ण तर झाल्याच उलट त्यांच्या दिव्यत्वापुढे परिक्षा घेणारे खुजे ठरले. या स्त्रियांनी आपले स्त्रीत्व अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे नजर उचलून पाहणे सर्वसामान्यांना अशक्य व्हावे. ’महासती गांधारी’ या लेखातले बाळशास्त्रींचे सुरूवातीचेच वाक्य आपल्याला गांधारीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. ते लिहितात, ’दुर्योधनासारख्या कलिपुरूषाची माता आणि राजा धृतराष्ट्रासारख्या पाताळयंत्री खलपुरुषाची पत्नी होण्याचे दुर्दैव जिच्या वाट्याला आले ती महासती गांधारी भारतातील स्त्रीरत्नांच्या अग्रभागी शोभण्याच्या योग्यतेची आहे.’ श्रीशंकराची आराधना करून शतपुत्रप्राप्तीचा वर मिळवणारी गांधारी, ज्या अर्थी आपला पती सृष्टीच्या दर्शनसुखाला आचवला आहे त्याअर्थी त्याच्या सुखदु:खाशी एकरूप होणे हेच खरे विवाहबंधन मानून त्यासाठी आपले नेत्र कापडाने सदाचे झाकून घेणारी आणि त्याच्यासह आपला देह वनातील वणव्याच्या अग्नीत समर्पण करणारी दृढनिश्चयी आणि पतीपरायण गांधारी आपल्याला परिचित असते. परंतु आपल्या दिव्यदर्शी न्यायप्रियतेने वात्सल्याच्या स्वाभाविक मोहपाशावर मात करणा‍र्‍या गांधारीशी बाळशास्त्री आपला परिचय करू देतात. युद्धानंतर मृतावस्थेत धुळीत पडलेल्या दुर्योधनाकडे पाहून विलाप करणारी, ज्यांना धर्माचे आधारस्तंभ मानावे अशा पांडवांनी आपल्या पुत्रांना अधर्माने मारले हे पाहून चवताळून उठलेली, कुरूकुलनाशाला श्रीकृष्णाला जबाबदार संबोधून ’तुझ्या स्त्रियाही अशाच हतपुत्र व निहतबांधव अवस्थेत विलाप करतील’ असा घोर शाप देणारी विकलहृदयी माता हे गांधारीचं एक सर्वसामान्य रूप किंवा स्त्रीस्वभावाचे स्वाभाविक वैशिष्ट्य. राजसभेत संधीच्या वाटाघाटी चालू असताना न्याय व धर्म यांच्या नियमाप्रमाणे अर्ध्याच नव्हे तर सर्वच राज्याचे अधिपती पांडव असल्याचे- त्यांची मागणी न्याय्य असल्याचे दुर्योधनाच्या तोंडावर राजसभेला सुनावणारी गांधारी, युद्धाला प्रयाण करण्यापूर्वी दुर्योधन तिचा आशीर्वाद घ्यायला आला तेव्हा ’जिकडे धर्म त्या पक्षाचाच जय होईल’ असे तटास्थपणे ऐकवणारी गांधारी, ’काम-क्रोध जिंकील तोच पृथ्वी जिंकील आणि तोच राजधर्म आहे’ असा दुर्योधनाला भर सभेत उपदेश करणारी गांधारी, ही तिची असामान्य रूपे. तिला महाभारतात महाप्राज्ञा व दीर्घदर्शिनी अशी विशेषणे जोडलेली का आढळतात हे बाळशास्त्रींच्या लेखातून सप्रमाण स्पष्ट होते. ’राजमाता कुंती’ हा या पुस्तकातील दुसरा सविस्तर लेख. निर्जीव धनाप्रमाणे तिच्या पित्याने तिला कुंतिभोजाला देऊन टाकले. लहानपणी पित्याने व मोठेपणी श्वशुराने तिची वंचना केली. दुर्वासांनी तिला दिलेल्या वरदानामुळे औत्स्युक्यापोटी ज्यांना आवाहन केले ते सूर्यनारायण उपस्थित झाले आणि ’देवाचे दर्शन व्यर्थ न व्हावे’ या त्यांच्या आग्रहातून तिला तेजस्वी, कवचकुंडलमंडित कर्ण या पुत्राची प्राप्ती झाली. नकळत घडलेल्या या अपकृत्यामुळे लज्जित होऊन तिने त्या पुत्राचा त्याग केला. अर्जुनाने कर्णाला पहिल्या शस्त्रपरिक्षेत आव्हान दिले तेव्हा तिने कर्णाला ओळखले. त्याला भेटून तिने ’तू सूतपुत्र नाहीस, माझा पुत्र आहेस, कौन्तेय आहेस, तेव्हा तुझ्या बंधूंना संरक्षण दे’ अशा शब्दात त्याचा अनुनय केला. त्याच्या वधानंतर तरी त्याला सद्गती लाभावी यासाठी तिचे मातृहृदय तळमळत होते. कुंतीची ही कथा सर्वश्रुत आहे. बाळशास्त्री या राजमातेचे त्या पलिकडचे पैलू अधोरेखित करतात. अंत:करणात किंचितही सापत्नभाव न ठेवता माद्री या सवतीशी प्रेममय संबंध निर्माण करणारी कुंती, ’स्त्रीसंग केल्यास मरण ओढवेल’ या शापवाणीमुळे राजभोगाचा मोह सोडून पती पांडूला तपस्यामय जीवनात बरोबर राहू द्या म्हणून विनवणी करणारी कुंती, निपुत्रिकपणाच्या दुर्गतीतून पतीला वाचवण्यासाठी नियोग पद्धतीने तीन पुत्रांना जन्म देणारी व पतीनिधनानंतर माद्रीच्या दोन पुत्रांसह पांडवांचा ममत्वाने सांभाळ करणारी वत्सल विशालहृदयी कुंती बाळशास्त्रींनी या लेखातून चितारली आहे. ज्येष्ठ पुत्राच्या द्यूतप्रियतेमुळे राज्य गमावण्यापासून द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत झालेली अवहेलना पाहून तिचे अंत:करण शतश: विदीर्ण होऊन गेले परंतु त्याही स्थितीत तिने विजनवासात निघालेल्या द्रौपदीला खंबीर राहण्य़ाचे आवाहन करून धैर्याने निरोप दिला. तेरा वर्षे पुत्रवियोगाचे दु:ख भोगल्यावर अपमानाचा सूड घेऊन आपले पुत्र राज्य परत मिळवतील ही तिची रास्त अपेक्षा होती परंतु ते तर राहोच, आपले पुत्र केवळ पाच गावे मागून संधी करत आहेत हे कळताच प्रदीप्त होऊन उठलेली कुंती आणि तिचे ऐहिकापेक्षा पारलौकिकाचे आकर्षण बाळशास्त्रींनी अगदी नेमकेपणे मांडले आहे. आपल्या पुत्रांच्या हातून धर्म घडावा म्हणून शत्रूंनी केलेल्या उपहासाची, नालस्तीची आणि त्या विटंबनेचा सूड घेण्य़ाच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून दे, असा तेजोगर्भ निरोप श्रीकृष्णाला देणार्‍या कुंतीच्या वक्तव्यात पतित राष्ट्राचे उत्थापन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे असे बाळशास्त्री प्रतिपादित करतात. तरीही तिचे खरे वैशिष्ट्य त्यांना आढळते ते तिच्या अपूर्व त्यागात. वीरमाता म्हणून कर्तव्यपूर्ती करून युद्धात विजयी झाल्यानंतरही राजोपभोग घेण्याऐवजी पुढील कर्तव्य म्हणून कुंती, गांधारी व धृतराष्ट्र यांच्या शुश्रुषेत निमग्न राहिली. त्यांच्याचबरोबर तिने आपले शरीर वनातील वणव्यात समर्पित केले. कुंतीच्या जीवनप्रवासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात खर्‍या आर्यस्त्रीजीवनाची प्रचिती येते हे बाळशास्त्रींच्या वाक्यावाक्यातून प्रत्ययाला येते. आर्य स्त्रीच्या तेजस्वितेचा कुंती हा देदिप्यमान आणि दाहक असा अविष्कार त्यांनी प्रस्तुत केला आहे. युधिष्ठीराच्या धर्मकार्पण्याचे कुंतीहून अधिक करूणास्पद बलिदान म्हणजे द्रौपदी. अग्नीपासून उत्पन्न झालेल्या तेजस्विनी द्रौपदीच्या व्यक्तिवैशिष्ट्याची बीजे बाळशास्त्रींना तिच्या वैचित्र्यपूर्ण जन्मकथेत तर पुढील महाभारताची बीजे तिने तिच्या स्वयंवरात लक्ष्यवेधाचे आव्हान स्वीकारणार्‍या कर्णाला सूतपुत्र म्हणून रोखताना केलेल्या वक्तव्यात आढळतात. द्यूतात पराजय झाल्यानंतर रजस्वला स्थितीतील द्रौपदीची झालेली घोर विटंबना, तिचा करूण विलाप आणि पतींसह सर्व आप्तस्वकीय खाली माना घालून बसलेले असताना श्रीकृष्णानी केलेले तिचे लज्जारक्षण, विराटपर्वातील कीचकवध हा महाभारतातील भाग सर्वपरिचीत आहे. यापलिकडची ओजस्वी, क्षत्राणी द्रौपदी बाळशास्त्री रेखाटतात. या घटनांनंतर युधिष्ठीर आणि भीमाला अग्नीज्वालेसमान प्रखर वृत्तीच्या द्रौपदीने त्यांचे अंत:करण जळेल, त्यांच्या अस्मितेला चेतवेल असे स्फुल्लिंगासारखे तप्त, खडे बोल सुनावून निरूत्तर केले. गांधारीने तिला वर मागावयास सांगितला तेव्हा तिने युधिष्ठीराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला, धृतराष्ट्राने दुसरा वर माग म्हटले तेव्हा बाकी ४ पांडवांचे शस्त्रास्त्रांसहित स्वातंत्र्य मागितले आणि तिसरा वर माग म्हटल्यावर त्या महामानिनीने ’लोभ धर्माचा नाश करतो, स्वतंत्र झाल्यावर माझे पती स्वकर्तृत्वाने गेलेले वैभव परत मिळवतील’ असे क्षात्रधर्माला शोभणारे उत्तर दिले. द्रौपदीची व्यक्तिगत जीवनातली गृहकृत्यदक्ष वागणूक आणि तिचे सहजीवनासंबंधीचे विचार या लेखात तिच्या आणि सत्यभामेच्या संवादातून समोर येतात. तत्कालानुसार पती हाच परमेश्वर हे केंद्रस्थानी ठेवून या विचारांची मांडणी केलेली असली तरी त्या संवादातून झळकणारे तिचे अष्टपैलूत्व आणि आत्यंतिक परिपक्वता आपल्याला नतमस्तक करते. समकालीन गृहकलहांमधील अनेक प्रश्नांची उत्तरे द्रौपदीच्या प्रगल्भ विचारपद्धतीतून सहज मिळू शकतात. तिच्या व्यक्तिमत्वाचे हे असामान्यत्व बाळशास्त्री उलगडतात तेव्हा तिचा समावेश बाळशास्त्रींनी भारतीय जीवनादर्श मालिकेत का केला असावा याचे उत्तर मिळते. सीता व द्रौपदीची तुलना करताना बाळशास्त्रींनी म्हटले आहे," सीतेचे महनीय सद्गुण महासती द्रौपदीइतकेच उज्ज्वल आहेत, दोघीही अयोनिजा आहेत, परंतु त्यांच्या भाग्यरेषेत मात्र भिन्नता आहे. सीतेची दु:खे श्रीरामचंद्रांच्या दिव्य कर्तव्यनिष्ठेतून उद्भवली आहेत त्यामुळे दु:खाग्नीत देखील कर्तव्यपूर्तीसाठी बलिदान घडत असल्याचे समाधान सीतेला लाभले." सीता आणि रामचंद्रांचा देह जरी वेगळा असला तरी त्यांची हृदये एकरूप होती. त्यांचे रम्य दंपतीजीवन बाळशास्त्रींनी वर्णिले आहे. कैकेयीच्या वरानुसार भरताला राज्य मिळावे म्हणून श्रीरामचंद्रांना वनवास पत्करावा लागला तेव्हा तिच्या आदर्श वर्तनाने आणि चारित्र्याच्या दिव्यतेने जगाला भारले, प्रत्येकाच्या अंत:करणात तिच्याविषयी आदराची भावना उत्पन्न झाली. तिच्या वादकौशल्याचे, बुद्धीमत्तेचे आणि धर्मशास्त्रातील पांडित्याचे यथोचित वर्णन बाळशास्त्रींनी केले आहे. लोकापवाद टाळण्य़ासाठी व राजसिंहासनाची इभ्रत राखण्यासाठी श्रीरामाने गरोदर स्थितीतील सीतेचा जेव्हा परित्याग केला तेव्हा त्यांच्या कर्तव्यपालनामागील अगतिकत्व समजून घेण्याइतकी तिच्या हृदयातील विशालता बाळशास्त्रींच्या वर्णनातून अनुभूत होते. लवकुशांच्या जन्मानंतर तिचा स्वीकार करण्यापूर्वी अग्नीदिव्य करण्याची अट तिला श्रीराम निरुपायाने घालतात तेव्हा मात्र आपले निष्कलंकत्व पटवून देतानाच ती देवी वसुंधरेला आपल्या उदरात आश्रय देण्याचे स्वाभिमानी आवाह्न करते. देवी सीतेच्या दैवी चारित्र्याचा तितकाच भव्यदिव्य अविष्कार बाळशास्त्रींच्या लेखणीने घडवला आहे. या वर्णनांमधील अनेक स्तिमित करणार्‍या घटना या दंतकथा असू शकतात. मूळ कथानकावर थर पडत गेलेले असू शकतात. उदा: ज्ञात स्त्रोतांनुसार भारतात लोखंडी उपकरणे इ.स.पू. चौथ्या शतकापासून आढळतात पण प्रगत लोखंडाचा प्रभाव गुप्तकालीन म्हणजे इ.सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातला ठरतो. परंतु या स्त्रियांच्या संबंधित कथानकांमध्ये विशिष्ट धनुष्याचे उल्लेख येतात. त्यामुळे याकडे रुपक अर्थाने पाहणे तर्कसंगत ठरते. आचार्य विनोबा भावे यांनीही महाभारतातील गीतेला केवळ धार्मिक ग्रंथ न मानता कौरव आणि पांडवांमधील द्वंद्व म्हणजे आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं एक कविकल्पित रूपक मानलं आहे. बाळशास्त्रींच्या स्त्रीव्यक्तिरेखांच्या आयुष्यात देखील माणूस आणि मूल्य यांच्यामधला चिरंतन लढा सातत्याने दिसून येतो. या लढ्यात आपल्या मूल्यांशी सदैव प्रामाणिक राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍य़ा या स्त्रिया विलक्षण ठरतात. त्यासाठी त्यांनी जे सोसले, जो त्याग केला त्याचे वर्णन बाळशास्त्रींनी अत्यंत उत्कटपणे केले आहे. या स्त्रियांना आपल्या कर्तव्याचे भान आहे तितकीच हक्कांची जाण आहे. जीवनाची ओढ आहे तितकीच विवेक आणि मूल्यांच्या बदल्यात मिळणार्‍या अशाश्वत सुखसमृद्धीबद्दल अनासक्ती आहे. त्यांचे पती अनेकदा हे भान विसरले परंतु या तेजस्वी स्त्रियांनी आपले पाय सत्याच्या भूमीवर कायम स्थिरपणे रोवून ठेवले. प्रसंगी त्यांनी जगण्याच्या पारंपरिक मर्यादा अमान्य केल्या आहेत. स्वत:चे नवे क्षितिज निर्माण केले आहे. जसजशी यातील एक एक स्त्री आपल्या समोर बाळशास्त्रींच्या लेखणीतून तळपत सामोरी येते तसतसे तिच्या प्रतिभ दर्शनाने आपण दिपून जातो. पुस्तकातील इतर लेख तुलनेने लहान पण तितकेच अर्थगर्भ आहेत. सावित्री उपाख्यानाच्या कविला सर्वश्रेष्ठ महाकवि मानणार्‍या डॉ. विंटरनिट्झ यांच्या विचारांचे दाखले बाळशास्त्रींनी वेळोवेळी काही लेखात दिले आहेत. जडवादी पाश्चात्य मनावर ज्या भारतीय विचारांनी मोहिनी घातली आहे त्यात सावित्रीचा आदर्श सर्वोच्च आहे असे बाळशास्त्री म्हणतात. मद्रदेशाची राजकन्या असूनही ऐश्वर्यशील जीवनाचा मोह तिच्या अंत:करणात उत्पन्न झाला नाही तसेच मृत्युसारखी भयानक गोष्ट देखील तिच्या विलक्षण चारित्र्याच्या ध्येयवादाला बाधा उत्पन्न करू शकली नाही. बाळशास्त्रींच्या शब्दात सांगायचे तर, ’जीवनाचे चंदन जितके उगाळले जाईल तितका त्याचा परिमल अधिक दरवळेल हाच भारतीय स्त्रीजीवनाच्या व्रताचा विषय असलेल्या सावित्रीच्या जीवनाचा अर्थ आहे.’ पती सत्यवानावर मृत्युदेवतेने आपले पाश फेकल्यानंतर ऋजुता, बुद्धीचातुर्य, वाक्पटुत्व आणि दिव्यतेने तिने प्रत्यक्ष मृत्युला जिंकले. आपल्या कृतीने सावित्री भारतीय स्त्रियांच्या पूजास्थानी पोचली. सावित्रीची आत्मसाधना अलौकिक आहे. सावित्रीचे उपनिषद हे ज्ञानोपनिषद आहे त्याचबरोबर यावरील लेखातील बाळशास्त्री लिखित संवाद स्त्रीत्वाच्या केवळ पतीपरायणतेचा नव्हे तर तिच्या चातुर्याचा तसेच पतीपत्नीतील अनुबंधाच्या मांगल्याचा साक्षात्कार घडवणारे आहेत. उदा: द्यायचे झाले तर, तिला ’पतीच्या जीवनाव्यतिरिक्त हवा तो वर माग’ असे सांगणार्‍या मृत्युशक्तीच्या अधिष्ठात्याला सावित्री उत्तर देते, "मातृभावना ही स्त्रीजीवनाचे सांदीकोपरे व्यापून राहणारी भावना आहे. क्षत्रियाच्या कुळाला योग्य असे बलवान आणि पराक्रमी पुत्र मला असते तर मला समाधान लाभले असते." म्रुत्युदेवतेने तसा आशीर्वाद देताच तिला पेचात पकडत सावित्री विचारते," आपण मला शतपुत्रांची माता होशील असा वर दिला परंतु पतीचे जीवित देण्य़ास मात्र आपण सिद्ध नाही. आर्यधर्मानुसार माझ्या पात्तिव्रत्याला कलंक लागणार नाही असे मातृत्व मला मिळण्याची शक्यता कशी आहे?" या शब्दांनी भानावर आलेल्या देवाधिदेवांना मग मृत्युच्या पाशातून सत्यवानाची मुक्तता करणे भाग पडते. . नलदमयंतीआख्यानातील लावण्यवती विदर्भकन्या दमयंती तसेच शाकुंतलोपाख्यानातील दुष्यंताच्या प्रतारणेने घायाळ झालेली मानिनी शकुंतला, पुत्राला रणोत्साही करणारी महाभारतातील माता विदुला, या तिघींबाबत मात्र बाळशास्त्रींनी विवेचनाऐवजी रंजनवादी कथाकाराची भूमिका घेतल्याचे दिसते त्यामुळे कुंती, सीता, गांधारी, सावित्री आणि द्रौपदीइतके त्यांचे दिव्यत्व मनावर ठसत नाही. तरीही अंतिमत: बाळशास्त्रींच्या लेखणीने (होमरच्या ’इलियड आणि ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांपेक्षा सात पटीने) मोठ्या अवकाशाच्या- महाभारताच्या पार्श्वभूमीवरील या स्त्रियांच्या जीवनाचे आदर्शत्व ज्या अंगभूत प्रतिभेने अधोरेखित केले आहे त्यातून, मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही ज्याला व्यास कवेत घेत नाहीत अर्थात, ”व्यासोत्छिष्टं जगत्सर्वं’ या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आपल्या साहित्यात रामायण (आदर्शवादी) आणि महाभारत (वस्तुनिष्ठ) असे दोन साहित्यप्रवाह मानले जातात. बाळशास्त्रींनी या दोन्ही प्रवाहांच्या अंतर्गत गोफाची अतिशय व्यासंगी नजरेने नोंद घेतलेली दिसते. त्या ताण्याबाण्यात विणल्या गेलेलं भारतीय स्त्रीजीवनातील आदर्शांची संयमी तरीही परखडपणे केलेली मांडणी एक समाजशास्त्रीय, मनोवैज्ञानिक घटित असल्यामुळे अभ्यासनीय ठरते. विचारातील निस्संदिग्धतेमुळे मुख्य व्यक्तिरेखेबाबतचे समकालीन वास्तव मांडताना तसेच त्यांचे आदर्शत्व अधोरेखित करताना संस्कृती जतन- संवर्धनाच्या नावाखाली तत्कालिन परिस्थितीचे किंवा कोणत्याही व्यक्तिरेखांचे अकारण समर्थन किंवा उदात्तीकरण बाळशास्त्रींनी केलेले नाही. आदर्श व्यक्तिकडूनही मानव्याचा अनुस्यूत भाग असलेले काही अपराध होतात त्याला या स्त्रिया अपवाद नाहीत परंतु कसोटीच्या क्षणी त्यांचे असामान्य वर्तन त्यांना जीवनादर्शाच्या पातळीवर घेऊन जाताना दिसते. पौराणिक संदर्भात लिहिताना ललित शैलीचा अतिरेक, त्यामुळे होणारा सत्याचा अपलाप, भारतीय इतिहासातले-संस्कृतीतले सारे कसे महन्मंगल असे मानण्यातला बाळबोधपणा यापासून त्यांची विद्वतापूर्ण शैली दूर राहिली आहे. त्यांच्या प्रतिपादनांना व्यासंगाची, ज्ञानाची आभा आहे. ’साहित्यिक’ हा शब्द वाटेल तसा वापरला जाण्य़ाचा आजचा काळ. त्याचा बावनकशी अर्थ समजून घ्यायचा तर हे पुस्तक वाचायलाच हवं. बाळशास्त्रींची शैली हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांचा लेखनकाळ लक्षात घेता आजच्या सोशल मिडीयावरील मिंग्लीशच्या तुलनेत त्याची भाषा एखाद्या घरंदाज, भारदस्त व्यक्तिमत्वासारखी संस्कृतप्रचुर क्वचित दुर्बोध तरीही अतिशय आकर्षक वाटते. उदा: निषधाधिपती नलाबद्दल ते लिहितात,’ब्रह्मण्य, वेदवेत्ता, महान धनुर्धर, विजितेंद्रिय व सत्यवादी अशा या राजाची शाश्वत कीर्ती प्राचीन भारताच्या इतिहासात स्थिरपद झालेली असून पुण्यश्लोक पुरुषश्रेष्ठांच्या प्रात:स्मरणीय मालिकेत त्याला पहिले स्थान लाभले आहे.’ त्यांची एकेक विशेषणे कलदार नाण्य़ासारखी खणखणीत नाद करतात. श्रीराम-सीतेचे वनवासातील सुरुवातीचे रम्य सहजीवन बाळशास्त्रींनी अतिशय अलवारपणे रेखाटले आहे. श्रीराम सीतेला सभोवतालची माहिती देत आहेत, आपल्या पराक्रमांबद्दल सांगत आहेत आणि सीता आपल्या प्राणसख्याचे शब्द मनोभावे श्रवण करित आहे हा प्रसंग सांगताना सीतेच्या मुखावरील भावाचे वर्णन बाळशास्त्री त्यांच्या मोहक शैलीत असे करतात,’ सर्वांगाचे कान करुन आपल्या हृदयसंपुटात श्रीरामांचा प्रत्येक शब्द जपून साठवीत असताना अभिमानाच्या नव्या नव्या लहरींनी जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाची सहधर्मिणी म्हणवण्य़ाचे भाग्य लाभलेल्या त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर तांडव चालवले आहे हे दृश्यच किती हृदयंगम व अविस्मरणीय आहे.’ भरसभेत ओढून आणलेल्या द्रौपदीचा आक्रोश बाळशास्त्रींच्या लेखणीतून प्रकट होतो तेव्हा कारुण्यरसाबरोबरच तिचे शुचित्व आणि तिच्या धर्मविषयक संकल्पना अवघ्या काही शब्दांच्या योजनेतून ते लीलया साकार करतात, ’युधिष्ठीर धर्मबंधनाने बांधलेले आहेत. धर्म अत्यंत सूक्ष्म असून त्याचे रहस्य विचक्षणांनाही कळत नाही. या स्थितीतदेखील माझ्या पतींचे गुण सोडून त्यांच्या परमाणूएवढ्या सूक्ष्म दोषांचे अविष्करण करण्य़ाची माझी इच्छा नाही.’ परंतु बाळशास्त्री शैलीच्या मोहात गुरफटलेले नाहीत. लेखाच्या मुळात हिर्‍यासारख्या तेजस्वी गाभ्याला त्यांची शैली पैलू पाडते इतकेच. दुर्गाबाईंच्या शब्दात सांगायचं तर बासरी वाजवणारा बासरीत आपला श्वास ओततो तेवढ्याच आत्मीयतेने बाळशास्त्री हरदासांनी या स्त्रीव्यक्तिरेखा चितारल्या आहेत. महासती गांधारी, राजमाता कुंती, द्रौपदी, सावित्री, विदर्भकन्या दमयंती, विदुला, सीता आणि मनिनी शकुंतला या आदर्शवत् स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे बाळशास्त्रींच्या सिद्धहस्त लेखणीतून उजागर होतात. या स्त्रियांचे थोरपण हे त्यांच्या सम्राज्ञीपदात नसून जीवन ही केवळ आत्म्याची गतिमानता आहे हे जाणून घेऊन त्यातील आव्हानांना सामोरे जाऊन त्यातही अनंताचे दर्शन घेण्यात आहे, हे बाळशास्त्री दाखवून देतात. स्त्रीजातीचे सनातन तेज आणि विवशता टिपताना तत्कालिन राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध बाळशास्त्री घेतात. त्यातून त्या समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. अर्वाचीन समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.
---------------------------



Thursday, July 22, 2021

बाकीबाब


एखाद्या कवीची एखादी कविता आवडते. एखाद्या कवीच्या कवितेतला एखादा चमकदार शब्द आवडतो पण एखादा कवी अख्खाच्या अख्खा आवडतो. त्या कवीची प्रत्येक कविता आणि त्यातला प्रत्येक शब्द झपाटून टाकतो, असं तुमचं कुणाच्या बाबतीत होतं का? माझं असं #बाकीबाब म्हणजे बा.भ.बोरकरांच्या बाबतीत होतं. त्यांच्या कविता आरपार शिरतात. अर्थाचे कंगोरे वगैरे शोधत बसायचं दडपण नसल्याने, कवीला नेमकं काय म्हणायचंय बॉ! असले प्रश्न पडत नसल्याने, त्यांची कविता शब्दश: भेटते. ती वाचायची चीज नसून जगायची, भोगायची, अनुभवायची चीज आहे हे लख्ख कळतं. 

’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे..  

कड्या कपारीमधूनी घट फुटती दुधाचे’ 

वाचलं तेव्हा गोव्याला जाण्याआधीच मी गोवा ’पाहिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष गेले तेव्हा बहुतेक अनुभव म्हणजे ’देजावू’ मोमेंट होते. आधीच कुठेतरी ’पाहिलेले’.

’कुठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे.. 

एक त्यातले लुचे आईला सटीक कांती गोरे गोरे’ 

असं काही चित्रवाही ते कवितेतून रेखाटतात तेव्हा त्या कड्यावर चढून बकरीच्या शुभ्र गोजिरवाण्या पिलाच्या मऊशार अंगाला आपण केव्हाच स्पर्श केलेला असतो.  

इकडे कुणाला कोसळत्या, खळाळत्या पावसाचा अनुभव नाही, पण 

’लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय

थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय’ 

असा निळाईत रंगलेला पाऊस त्यांच्या नुसत्या शब्दांमधून चिंब करतो.

सौंदर्यपूजक, प्रकाशपूजक बोरकर तमाचे स्त्रोत्र लिहितानाही सृजनाशी नातं जोडतात.  

’घटका घटका काळोखातच बसून असतो असा

उरातला गोंजारत नवख्या शब्दांचा कवडसा’ 

त्यांच्या या ओळी वाचाव्यात आणि स्वत:सह स्तब्ध बसून राहावं.

’मध्यरात्री नभघुमटाखाली शांतीशिरी तम चवर्‍या ढाळी

त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती..’ 

असं काही वाचल्यावर यावर काही लिहू नये, त्याने मनावर पाण्यावरच्या तरंगासारखा उमटलेला अलवार भाव डहुळेल, त्यावर ओरखडे पडतील असं वाटतं.

स्त्री-सौंदर्याची आसक्ती जेव्हा त्यांच्या शब्दातून ओसंडून वाहते तेव्हा आपण त्यातल्या प्रियकराचे डोळे झालेलो असतो. इतका हळूवार रोमँटिक, चितारी मराठीत दुसरा नसावा.

’पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुके.. 

वाटले त्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे’ 

किंवा

’नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय 

नको गोठवू ओठात दाट अमृताची साय’ 

किंवा 

’तव नयनांचे दल हलले गं

 पानावरच्या जलबिंदूंपरी 

त्रिभुवन हे डळमळले गं’ (थेट त्रिभुवन, अधलं-मधलं काहीच नाही !!) 

किंवा

’केशी तुझिया फुले उगवतील.. तुला कशाला वेणी’ किंवा... पुरे.

बोरकरांचे अर्थगर्भी शब्द नुसते वाचावे, रिचवावे, समीक्षा वगैरे करुन चावून चोथा करु नये. मग मिटल्या डोळयांना ’ती’ दिसते.

अनुरक्तीतल्या सौंदर्यात आणि विरक्तीतल्या देखणेपणात नेमका काय फरक असतो हे सुद्धा हा कवी काय ताकदीने दाखवतो!

’ओळखतील जे मला आणि मज दावितील मम यथार्थ ओळख, 

कणकण माझ्या देतील किंवा अवघ्या ब्रह्मांडाची पारख’ 

किंवा

’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती 

वाळवंटातूनही जी स्वस्तिपद्मे रेखती’ 

असं अंतर्बाह्य देखणेपण जगाला लाभेल तेव्हा लाभो पण आपल्याला निदान ती नजर तरी लाभेल का! 

 

बोरकरांची कविता वैयक्तिक अनुभवापासून वैश्विक अनुभूतीपर्यंत कमाल वेगाने झेपावते. मूक करते.  

’या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, 

अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे...

तेथ जाया वेग-वेडी पारजाची वाट आहे, 

शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे.’ 

निर्व्याज भावनांच्या पखाली वाहणार्‍या या शब्दप्रभूला ’नाही पुण्य़ाची मोजणी नाही पापाची टोचणी’ म्हणत स्थितप्रज्ञ होणं सहजसाध्य असलं तरी ’अनंता तुला कोण पाहू शके’ अशी अमूर्ताची ओढ आहेच. 

जगण्यातले सगळे विभ्रम त्यांच्या उत्कट शब्दांच्या रुपातून असे आपल्या आत, बाहेर सगळीकडे विखुरलेले असताना, त्यांच्या कवितांचा ’दिडदा दिडदा’ नाद मनात सतत निनादत असताना त्यांच्या वेगळ्या स्मृती जागवायच्या तरी कशा!



Monday, November 30, 2020

न नुरलेले निर्विष देणे


विनोद निखळ आणि मार्मिक असेल तर तो हसवता हसवता अंतर्मुख करतो. वैचारिक खुजेपण दूर करण्यासाठी, समाजात हळू हळू का होईना, सकारात्मक बदल घडवण्यासाठी विनोदाइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही. समाजाची विनोदबुद्धी आणि मनाचे उमदेपण बेताचे असेल तर मात्र ’ट्विट’मधला उपरोध लक्षात न आल्याने या वर्षाच्या सुरुवातीस मुंबई महापालिकेतून बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार्‍या निधी चौधरींसारखी परिस्थिती वाट्याला येते. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील विनोदाची गंगोत्री मानल्या जाणार्‍या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या (जून २९, १८७१ - जून १,१९३४) निर्विष आणि सहज आकलन होणार्‍या विनोदाची प्रकर्षाने आठवण होते. नवल म्हणजे त्यांच्या खुसखुशीत लेखनातून अधोरेखित झालेल्या सामाजिक विसंगतींचे बरेच संदर्भ तब्बल एका शतकानंतर आजही तंतोतंत लागू पडतात. पु.लं. देशपांडे यांच्या ’गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे ’सबकुछ पुलं’ असे कौतुक होत असताना पुलं गमतीने म्हणाले होते, "त्यामध्ये प्रेक्षक पण धरले नसावेत म्हणजे मिळवली." याच चालीवर कोल्हटकरांच्या विनोदाचा मासला द्यायचा झाला तर त्यांनी स्वत:च्या ’संगीत मूकनायक’ या नाटकाच्या १९०१ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत मिश्कीलपणे नमूद केले आहे ,"प्रस्तुत नाटक १८९७ साली लिहिले गेले आहे. ते संपूर्ण झाल्यावर तीन वर्षे नायकाप्रमाणेच मूक होऊन बसले होते." नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून एके काळी प्रचंड गाजलेल्या कोल्हटकरांचे आज विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक म्हणजे 'सुदाम्याचे पोहे'. ही वस्तुस्थिती बघता कोल्हटकरांचे साहित्यही आज जणू मूक होऊन बसले आहे. या वर्षी (२०२०) त्यांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्ताने न. चिं. केळकरांनी ’मराठी साहित्यातील विनोदपीठाचे आद्य आचार्य’ अशा शब्दात गौरवलेल्या या वैदर्भीय सारस्वताच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आणि विस्मृतीत जाऊ पाहणार्‍या साहित्यकृतींना बोलतं करण्यासाठी, हा लेखनप्रपंच. 


कोल्हटकरांनी विषयानुसार गंभीर किंवा विनोदी शैलीत, चिंतनाची डूब असलेले समीक्षालेख, पुस्तकपरीक्षणे, प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे, अभ्यासलेख आणि निबंध लिहिले. ’दुटप्पी की दुहेरी’ आणि ’श्यामसुंदर’ ह्या कादंबऱ्या लिहिल्या. गीतोपायन हा त्यांचा कवितासंग्रह. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या प्रसिद्ध महाराष्ट्रगीताची रचना त्यांचीच. त्यांचे प्रभावी साहित्य तत्कालिन वाङ्‍मयव्यवहाराला दिशादर्शक ठरले. कोल्हटकर ही व्यक्ती न राहता जणू संस्था बनले असे म्हणूनच म्हटले जात असावे. त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान त्यांना १९२२ साली कविसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद व १९२७ साली १३व्या साहित्यसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद देऊन करण्यात आला. ’भारतीय ज्योतिर्गणित’ ह्या ग्रंथाद्वारे या विषयातल्या आपल्या व्यासंगाची प्रचिती देत सांगलीला भरलेल्या ज्योतिष संमेलनाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांचा जन्म आणि १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे तर उच्चशिक्षण पुणे व मुंबईत झाले. त्यांचे वडील अमरावती येथे शिक्षक होते. एल.एल.बी नंतर कोल्हटकरांनी अकोला, खामगाव येथे व्यवसाय केला आणि १९०१ साली ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.एकूण जन्मापासून ते कारकीर्दीच्या आणि वयाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य विदर्भातच होते. 

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात ’काव्य स्वर्गीय असते तर विनोद हा प्रत्यक्ष जगण्याचा भाग (born on earth)’ असे म्हणणार्‍या मार्क ट्वेन यांनी विनोदाला प्रादेशिक गंध दिला तर ओ हेन्रींनी धक्कातंत्राचा उत्तम वापर करून आपल्या विनोदी व इतर कथा लिहिल्या. रशियन लेखक चेकोव्हनी कथालेखनाचा प्रारंभ विनोदी कथेनेच केला होता. कॅनडातील स्टीफन लीकॉक असतील किंवा इंग्लंडमधील पी. जी. वुडहाऊस, यांचे बोट धरूनच मराठीतील विनोदी साहित्याने आपली सुरुवातीची पाऊले टाकली आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीला, व्हॉल्टेअर, स्टर्न, पास्कल, ट्वेन इ. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रे अनुसरल्याचे खुलेपणाने मान्य करून कोल्हटकरांनी लेखन सुरु केले. त्याआधीच्या साहित्यात विनोद असलाच तर दुय्यम स्वरूपात किंवा तमाशासारख्या कलाप्रकारांपुरता मर्यादित होता.  ’सिगारेट सोडणं अत्यंत सोपं असतं, मी कित्येकदा सोडलीय’ किंवा ’अमेरिकेने भूगोल शिकावा म्हणूनच बहुधा परमेश्वर युद्ध घडवत असावा’ अशा सणसणीत कानपिचक्या देणार्‍या मार्क ट्वेन या आपल्या विनोद-बंधूप्रमाणे कोल्हटकरांचा विनोदही धारदार होता. अत्रे ज्यांना गुरुस्थानी मानत त्या राम गणेश गडकरी यांनी 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या अर्पण पत्रिकेत लेखनगुरु कोल्हटकरांबद्दल लिहिले आहे," माझ्या लेखनातले जे चांगले असेल ते आपलेच आहे व जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्ण उदारतेने कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार." गडकऱ्यांच्या विनोदाला कारुण्याचा स्पर्श होता तर ’माय आईज हॅव कम’ लिहिणार्‍या चिं. विं. जोशींच्या विनोदाला चेष्टेची झालर. विषयाचा तिरस्कार न वाटता त्याबद्दल अंत:करणात जिव्हाळा निर्माण होणे, हे उत्तम विनोदाचे लक्षण असल्याचे ’मुद्दे आणि गुद्दे’ मध्ये आचार्य अत्रे म्हणतात. बौद्धिक मेजवानी देणार्‍या कोल्हटकरांच्या विनोदात हे लक्षण पुरेपूर आढळते. 

अत्यंत सुधारक विचारांच्या कोल्हटकरांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर, र. धों कर्वे अशा कर्तृत्ववान पण समाजाने अव्हेरलेल्या व्यक्तींना कायम प्रोत्साहन दिले. 'समाजस्वास्थ्य' मध्ये आलेला एकमेव मृत्युलेख म्हणजे कोल्हटकरांवरचा! ’घंटानादाच्या कंपनांमधून निर्माण होणार्‍या उर्जेमुळे कोरोनाचे विषाणू मरून जाणार असल्याच्या’ अशास्त्रीय आणि विनोदी म्हणाव्या अशा पोस्ट्स आजही समूहमाध्यमांवर भाबडेपणाने व्हायरल होतात, राजकारण जातीभोवती घुटमळत राहते मग विसाव्या शतकाच्या सुरूवातीची सामाजिक स्थिती किती कठीण असेल! जातीभेदाच्या वेटोळ्यात पुरत्या अडकलेल्या समाजाबाबत कोल्हटकर लिहितात,‘‘आपला समाज व्यक्तींचा बनलेला नसून जातींचा व पोटजातींचा बनलेला आहे. अशा समाजांत ज्ञानाचा किंवा संयमनाचा प्रसार करणें अशक्य नसलें तरी अत्यंत दुर्घट असतें. सर्व जीवात्मे परमात्म्याचींच स्वरूपें आहेत या अभेदप्रतिपादक सिद्धांतास हिंदु धर्माच्या तात्त्विक अंगांत जरी महत्त्वाचें स्थान आहे तरी त्याच्या वर्णव्यवस्थारूप आचारात्मक अंगावर त्याचा थोडासुद्धां परिणाम झालेला दिसत नाहीं." कोल्हटकरांनी लिहिलेली शेकडो पत्रे आणि त्यातून हाताळलेले विषयवैविध्य पाहता ते त्या काळाचे एक रंजक भाषेतले सामाजिक दस्तावेजीकरण म्हणता येईल. मात्र या पत्रांमधील विषयांच्या केंद्रस्थानी त्यांचे माणूसपण आहे. 

कोल्हटकरांनी आपल्या वाङ्‍मयीन कारकीर्दीची सुरुवात ’संगीत विक्रम-शशिकला’ नाटकावरील टीकेने (१८९३) केली. न. चिं. केळकरांच्या ’तोतयाचे बंड’ या नाटकाच्या समीक्षेत त्यांनी नाट्यलेखनकले विषयी तर ’रागिणी’ या वामन मल्हार जोशी लिखित कादंबरीच्या समीक्षेत कादंबरीलेखनकले विषयी विवेचन केले आहे. त्यांची समीक्षा जडजंबाळ नसायची पण तर्कशुद्ध आणि सखोल असायची. मराठीतील स्त्री लिखित पहिले गद्य नाटक म्हणजे गिरीजाबाई केळकरांचे ‘पुरुषांचे बंड’. यालाही कोल्हटकरांची प्रस्तावना आहे. त्यांनी संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी, जन्मरहस्य, परिवर्तन, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य आणि मायाविवाह अशी पंचाक्षरी शीर्षकाची नाटके लिहिली. पैकी आठच रंगभूमीवर येऊ शकली. असे म्हणतात खुद्द कोल्हटकरांची सुद्धा खाडिलकर किंवा देवलांसारखी, रंगभूमी गाजवून टाकणारी एखादी तरी सांगितिका आपण लिहावी अशी मनीषा होती पण त्याच वेळेस ’सुदाम्याचे पोहे’ हा आपला हुकुमी एक्का असल्याचे ते जाणून होते. 


कोल्हटकरांनी १९०२ साली लिहिलेला 'साक्षीदार' हा आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. ’शपथेशिवाय तोंडून एकही शब्द न काढणारा’, काढलाच तर ’धादांत खोटे बोलणारा’, माणसाच्या पागोट्याचा रंग वगैरे बारीकसारीक तपशीलात कालापव्यय करणारा पण स्वत:चे नेमके वय सांगू न शकणारा, कायद्याला नाचवणारा, व्यावसायिक साक्षीदार त्यांनी खुबीने रंगवला. 
’जर्मनीच्या बादशहावर एक वर्षाने एक चमत्कारिक प्रसंग येणार आहे’, ’यंदा काही भागात पाऊस चांगला तर काही भागात कमी पडेल’ अशा ’धोरणी’ भविष्यकथनांची गमतीदार उदाहरणे देत स्वघोषित भविष्य़वेत्त्यांच्या लेखनातून टोप्या उडवल्या. 
त्यांचे ’कुलुपा’वरचे व संमेलनबाजीचे विडंबन असणारे ’चोरांच्या संमेलना’वरचे रुपक गाजले. ’गवई’ या लेखात गवयांच्या स्वभावातला विक्षिप्तपणा व गायनातील खोडींवरचे भाष्य, पोशाखी वृत्तीच्या गवयांना शाब्दिक चिमटे घेत ’जरीची टोपी व शालजोडी वापरावी म्हणजे गवयाचे तेज दुणावते. यजमानांशी शक्य तितके बेपर्वाईने वागावे. तबलजीस चुकवण्याचा प्रयत्न करावा व तो चुकत नसल्यास त्याच्याकडे धिक्काराने पाहावे.’ यासारखे दिलेले सल्ले, खास कोल्हटकरी शैलीचा नमुना म्हणता येतील. 
'म्हातारपणाचे फायदे' निबंधात म्हातारपणाकडे जितके खेळकरपणाने पाहता येईल तितके ते कमी क्लेशकारक वाटते हे जाणून ते म्हणतात, "ठेच लागून पडल्यास दात पडण्याची म्हाताऱ्यास मुळीच भीती नसते. त्याने सांगितलेली गप्प केवळ 'दंतकथा' आहे, असे त्याच्या तोंडावर कोणासही सांगता येत नाही. विस्मृतीमुळे पुष्कळदा आदल्या दिवशी वाचलेली गोष्ट दुसऱ्या लक्षात राहात नाही; त्यामुळे तेच ते पुस्तक त्याला दरखेपेस तितकेच मनोरंजक वाटू लागते व या रीतीने नवी नवी पुस्तके घेण्याचा उपद्व्याप व खर्च वाचतो. सर्वांत मोठा फायदा तो हा की, म्हाताऱ्यांशी तरुण मुली अगदी मोकळ्या व निष्कपट मनाने वागतात.'' अशा सर्व लेखमुष्टींची पुरचुंडी म्हणजेच ’सुदाम्याचे पोहे’.

कोल्हटकरांनी हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट आणि खुळचट प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा म्हणून आपले विनोदाचे हत्यार प्रतिगामींच्या वर्तनातील विसंगतीवर चातुर्याने चालवले. कर्मकांडाच्या अतिरेकावर टीका करताना कोल्हटकरांनी म्हटले आहे," दुष्काळात गरिबांस पोटास पुरेसे अन्न व पाठीस पुरेसे वस्त्र मिळत नसताना बायकांच्या लक्ष वाती तुपात जळत असतात. परकीयांनी आमची संपत्ती लुटून न्यावी पण आमच्यामधील पराक्रमी पुरुषांस ती परत खेचून आणण्यासाठी देशाची मर्यादा ओलांडण्याची सक्त मनाई? कोणत्याही कार्यास यश येण्यासाठी त्याच्या साधनांचे पूर्ण ज्ञान व त्यावर विश्वास असावा लागतो पण आपण मात्र प्रत्येक कार्याचा संबंध दैव, कर्म, ग्रह, घुबडे, मांजर, पाली अशा असंबद्ध गोष्टींशी लावतो." 

आपण प्रथेच्या बाजूचे असल्याचे भासवून त्या प्रथेतला फोलपणा वक्रोक्तीचा वापर करून दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. उदा: ’माझी भीष्मप्रतिज्ञा’ या निबंधात तत्कालिन लग्नपद्धतीवर कोरडे ओढताना प्रतिगामी ’उपवधू’ निवेदकाचे दिव्य विचार कोल्हटकर या शब्दात मांडतात, "मुलींना शिक्षण दिले म्हणजे त्यांना वल्लभास प्रणयपत्रिका पाठवता येऊन त्या वाममार्गास प्रवृत्त होतात अशी माझी पक्की समजूत असल्याने मी तिच्या बापास म्हटले, ती हे धडे विसरुन जाईल याची आपण काळजी घेऊ." आज ’मुली मोबाईलमुळे बिघडत असून त्यामुळे त्या पळून जाऊन लग्न करतात’ अशी मुक्ताफळे उधळणारे खासदार पाहिले की समाज आतून अजिबात बदललेला नाही फक्त साधने बदलली आहेत आणि कोल्हटकरांसारख्या लेखकाची अजूनही गरज नुरलेली नाही हेच ठळकपणे जाणवते. 

समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी ओळखलं. शिमग्यातील अश्लाध्य चालीरीतींवर त्यांनी उपहासाचा वापर करत यथेच्छ टीका केली. प्रवृतीपेक्षा निवृत्तीचे वर्चस्व वाढलेल्या समाजातल्या पापपुण्याच्या हास्यास्पद कल्पनांची ’चित्रगुप्ताचा जमाखर्च’ लेखातून रेवडी उडवली. ’उपासाच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर करायला’ पत्नीस सवडही न देणार्‍या पांडुतात्यांच्या तथाकथित निर्जळी एकादशीवर मिश्कील भाष्य़ करत तर कधी सनातनी आणि सुधारक अशी परस्पर विरोधी पात्रे उभी करून सनातनी समाजाच्या वर्तनातल्या विरोधाभासाचे आणि बेगडीपणाचे त्यांनी मनोज्ञ दर्शन घडवले. ’साहित्यपरिषदेची तयारी’ या निबंधात त्यांचा प्रतिगामी विचारांचा कथानायक लेखकराव होण्यासाठी परदेशातून कथावस्तू चोरतो. मूळ कथेनुसार शेवट करायचा तर सुधारकी जोडप्याला सुखात पडलेले दाखवण्याचे धर्मसंकट त्याच्यावर ओढवते. मग तो लेखक त्यांच्या गाडीचा अपघात करवतो आणि त्याच डब्यातील सनातन्यांच्या पुण्याईने ते जोडपे त्यातून वाचल्याचे दाखवून तो आपली कशी सुटका करवून घेतो या घटनाक्रमाचे खोचक पण मनोरंजक चित्रण कोल्हटकर लीलया करतात. 


"कोल्हटकरांच्या विनोदात्मक लेखनपद्धतीमध्ये व्यंगोक्ती, वक्रोक्ती, अतिशयोक्ती वगैरे मुख्य घटक असून हास्योत्पादन व तदद्वारा करमणूक व बोध हे तिचे परिणाम होत. कोल्ह्ट्करांच्या विनोदाचे हत्यार कल्पनेवर पडते. व्यक्तीवर ते उचललेही जात नाही." असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत न. चिं. केळकर लिहितात. "कवी हा संवादित्व शोधतो तर विनोदी लेखकाचे लक्ष विसंवादित्वावर असते." असा भेद केळकर त्यात स्पष्ट करतात पण कोल्हटकर जेव्हा याच विसंवादित्वाची मानसपुत्रांच्या माध्यमातून नेम साधून हजेरी घेतात तेव्हा "भाविक समाजाच्या दृष्टीने यातून काही भाग वगळले असते तर बरे झाले असते" असे केळकर सुचवतात. 
’विविध ज्ञानविस्तार’ मधील कोल्हटकरांच्या काही लेखांमुळे खवळलेल्या वर्गणीदारांनी संपादकांना धमक्या दिल्याची नोंद आहे. एकूण कुणी आपले दोष दाखवताच ’भावना दुखावणे’ हे आपल्या समाजाचे जुनेच दुखणे आहे. या संदर्भात कोल्हटकरांचे म्हणणे असे की ’आपली (आपल्या समाजाची) व्यंगे पाहून जसे अंत:करण तुटते तसे इतरांच्या व्यंगांनी तुटणे अशक्य आहे.’ 
’माझे टीकाकार’ या लेखात ’सुदामा’ या पात्रासंबंधी ते लिहितात, "माझ्या पुराणमताभिमानी वाचकांच्या शिव्याशापांचा उपसर्ग मला लागू नये म्हणून ’सुदामा’ नावाचा मानसपुत्र मी उत्पन्न केला आणि आपल्या काही वेडगळ चालींची उपयुक्तता सिद्ध करण्य़ाकरता भीरु लोक ज्या बालिश व हास्यास्पद कोट्यांचा अवलंब करतात त्या खुशाल सुदामाच्या तोंडी घालून दिल्या." समाजाची वाटचाल ही समाजातले सुबुद्ध लोक इष्ट-अनिष्ट गोष्टींबद्दल जो भाव बाळगतात त्यानुसार होते असे इमर्सनने म्हटले आहे. कोल्हटकरांनी बंडूनाना, पांडूतात्या या अजोड दुक्कलीचा प्रातिनिधीक वापर करत समाजाला विचार करायला भाग पाडले. सुदामा हा आपल्याला हिणवणारा हितशत्रू नसून आपली वैगुण्ये हसत हसत दाखवणारा आपला निस्सीम मित्र आहे, अशी वाचकाची अंतिमत: खात्री पटणे हेच ’सुदाम्याचे पोहे’ चे यश. 

प्रसिद्ध जर्मन कवी गटे याचे ब्रीदवाक्य ’सत्य, कर्तव्य व सौंदर्य’ असून त्यात मनुष्याच्या बौद्धिक, नैतिक व भावनात्मक ध्येयांचे सार आले आहे असे कोल्हटकर मानत. या तत्त्वांची कसोटी तत्कालिन समाजाला लावताना कोल्हटकरांना त्यात जे अंतर आढळले त्याचा आरसा समाजाला दाखवण्यासाठी त्यांनी विनोदाचा वापर केला. शाब्दिक कोट्यांचा आणि कल्पनाचमत्कृतीचा अतिरेक यामुळे क्वचित कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस आणि कृत्रिम झाला आहे असे त्यांचे टीकाकार म्हणत. पुलं कालबाह्य झाले आहेत किंवा कसे, वगैरे वाद समूहमाध्यमांवर झडत असतात. तेव्हा पुलंच्याही बर्‍याच मागच्या पिढीतल्या कोल्हटकरांच्या विनोदाचा आस्वाद आजचा वाचक घेऊ शकेल का याबाबत शंका असू शकते पण त्यांच्या निर्विष विनोदाने मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे आणि विवेकाने पाहायला शिकवले हे निर्विवाद. 

- मोहिनी महेश मोडक

----------------------------------------------------------------------------------------------- -----------------------------

संदर्भ - 

http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/bitstream/handle/123456789/7767/08_chapter%203.pdf?sequence=8&isAllowed=y

मराठी विनोदी कथा - संपादक डॉ. द. ता. भोसले 

सुदाम्याचे पोहे - श्री. कृ. कोल्हटकर

मराठी विश्वकोश

(Published in Maharashtra Times Diwali Ank 2020 )


 

Saturday, August 1, 2020

’गीतारहस्य’कार लो. टिळक

मंडालेच्या तुरुंगात असताना पत्नीच्या निधनाचे वृत्त कळले तेव्हा ८ जून १९१२ रोजी आपल्या भाच्याला लिहिलेल्या पत्रात लोकमान्य टिळक विकल होऊन म्हणतात, "माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला". त्याच वेळी अशा दु:खद प्रसंगी आपण मुलांजवळ नाही हे जाणवून ते पुढे असेही लिहितात," मुलांना अवश्य सांगा की, या दु:खामुळे विद्द्येची हानी होऊ देऊ नका. दु:ख करीत बसून कोणीही कालाचा दुरुपयोग करु नये." देशभक्ताचे मन समस्थितीतच राहिले पाहिजे हे सांगणारे टिळक श्रीमद्भगवद्गीतेने सांगितलेला कर्मयोग शब्दश: जगले याचा हा जणू पुरावाच. त्यांची विलक्षण बुद्धीमत्ता, व्यासंग, तब्बल वीसहून अधिक वर्षे आत्म्यात मुरलेला चिंतनविषय आणि त्यांनी अंगीकृत केलेली समस्थिती याचा परिपाक म्हणजे त्यांनी मंडालेच्या कारावासात सिद्ध केलेला ’गीतारहस्य’ हा ग्रंथ. एकांतवासाला आणि प्रतिकूल हवामानाला त्रासून किंवा नैराश्याने ग्रासून जिथे सर्वसामान्य कैदी आयुष्य संपवण्याचा विचार करत अशा ठिकाणी या कर्मयोग्याने भारतालाच नव्हे तर शतकाला भूषण व्हावा असा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. राजबंदी असले तरीही लेखनासाठी आवश्यक असलेले संदर्भग्रंथ सरकारी परवानगीचे सोपस्कार पार पाडून मागवणे, लेखनसामग्री उपलब्ध होईल तसतसे वाचन-मनन-चिंतन करुन व्यासंग व स्मरणशक्तीच्या बळावर, नुसत्या शिसपेन्सिलीने भव्यदिव्य स्वरुपाचे ग्रंथलेखन मधुमेहाच्या विकाराशी लढा देत करणे हे केवळ टिळकच करु जाणे.

कुमारवयापासून टिळकांनी भगवद्गीतेवरील अनेक भाष्ये वाचली होती. गीता पलायनवादाचा, संन्यासमार्गाचा पुरस्कार करीत नसून ’निष्काम भावनेने कर्म करा, आपले कर्तव्य पार पाडा, कर्ते व्हा’ हेच गीतेचे सार आहे, तेव्हा यावर भाष्य करावे अशी टिळकांची मनीषा होती. प्रत्येक संप्रदाय त्यांच्या विचारपद्धतीला अनुकूल असा गीतेचा अर्थ काढतो यावर टिळकांचा आक्षेप होता. टिळक भगवद्गीतेबद्दल असे म्हणतात की, ’गीतेमध्ये ज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे’. फळाची आशा न ठेवता कर्म करायचे तरी कशाला या संसारी मनुष्याच्या प्रश्नाला टिळक उत्तर देतात की,”फलाशा ठेवायची नाही म्हणजे फळाचा त्याग करायचा असे अजिबात नाही परंतु फळ मिळावे अशी आसक्ती धरायची नाही. कारण या आसक्तीमध्येच सर्व दु:खाचे मूळ आहे.’
युद्ध करण्याबाबत द्विधा मनस्थितीत असलेल्या अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे तर्कशुद्ध निरसन करुन भगवंत आपला गीतोपदेश संपवतात. ज्या भ्रान्त कल्पनेमुळे अर्जुन आपल्या क्षात्र धर्माविरुद्ध आचरण करण्यास तो निघाला होता, ती भ्रान्त कल्पना नष्ट होऊन स्वधर्माची व स्वकर्तव्याची त्याला जाणीव होते. तो संशयातीत होतो. ’तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्धाला सिद्ध होतो’ अशी भगवंतांना कबुली देतो. गीतेच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर ’द्विधा मनस्थिती ते नि:शंक समस्थिती हे दोन बिंदू सापडले की गणितशास्त्राच्या नियमाप्रमाणे मधली सरळ रेषा काढण्यास कठीण पडत नाही’ असे टिळकांनी नागपूर येथील मॉरीस महाविद्यालयात दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते. 

गीतारहस्य हा व्यावहारिक नीतीशास्त्राचा अध्यात्मज्ञानावर आधारलेला ग्रंथ आहे असे प्रतिपादन टिळक लेखनपूर्तीनंतरच्या त्यांच्या पत्रात करतात. ‘भगवद्गीता’ हा भारतीय अध्यात्माचा पायाभूत ग्रंथ मानला जातो मात्र एकूणच आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास निवृत्तीनंतर करायचा असतो, इतकेच नव्हे तर गीता ही निवृत्तिमार्ग सांगणारी आहे, अशी समाजधारणा आहे. सांसारिक कर्मे गौण मानून त्याकडे पाठ फिरवणाराच खरा ज्ञानी अशा चुकीच्या दृष्टिकोनामुळे समाजाचे, भारतीय संस्कृतीचे नुकसान होते आहे हे लक्षात घेऊन अशा विचारांचे खंडन करण्यासाठी ’संसारशास्त्र’ आणि निष्काम कर्मयोग शिकविणारा, ’वागावे कसे’ याचे मार्गदर्शन करणारा ’गीतारहस्य’ किंवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ टिळकांनी लिहिला. संसारात राहूनच कौशल्यपूर्वक कर्मे कशी करावी याची शिकवण, हेच गीतेचे रहस्य व महात्म्य असल्याचे लो. टिळकांनी जगभरातील तत्त्वचिंतनाशी तुलना करुन सोदाहरण सिद्ध केले आहे. एका अर्थी त्यांनी पश्चिमी तत्त्वज्ञानाला या लेखनाद्वारे आव्हान दिले आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळक लिहितात, "प्रत्येकाने सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणे हीच काय ती नीतीची पराकाष्ठा किंवा कसोटी असे जे मिल्ल,स्पेन्सर, काँट इ.अधिभौतिकवाद्यांचे म्हणणॆ, त्याचाही गीतेतील स्थितप्रज्ञाच्या बाह्यलक्षणात संग्रह झालेला असून गीतेत यापेक्षा काही जास्त नसते तरी ती सर्वमान्य झाली असती परंतु एवढ्यावरच न थांबता ज्ञान, संन्यास, कर्मव भक्ति यांच्या योग्य  मिलाफाने इहलोकी आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्याने पत्करावा याचाही गीतेत निर्णय केला आहे." अनेक शास्त्रग्रंथांना कवेत घेणार्‍या या ग्रंथाचे परमोच्च वैशिष्ट्य म्हणजे त्याची पांडित्यपूर्ण, तर्कसंगत, सूक्ष्म आणि सखोल मांडणी. ’गीतारहस्य’ची अनुक्रमणिकाच ग्रंथाचा आवाका स्पष्ट करते. विषयप्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, अधिभौतिक सुखवाद, सुखदु:खविवेक, अधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, कापिलसांख्यशास्त्र, विश्वाची उभारणी व संहारणी, अध्यात्म, कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, संन्यास व कर्मयोग, सिद्धावस्था व व्यवहार, भक्तिमार्ग, गीताध्यायसंगति, उपसंहार अशी पंधरा प्रकरणे यात आहेत. त्यानंतरच्या परिशिष्टातून गीतेचे महाभारत, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भागवत धर्म, बौद्ध ग्रंथ व ख्रिस्ती बायबल इ. संदर्भातील विवेचन अशी या ग्रंथाची विशाल व्याप्ती आहे. 

गीतारहस्य या ग्रंथाला अद्वितीय मानले जाण्यामागे टिळकांची विद्वत्ता हे सर्वाधिक महत्वाचे कारण तर आहेच पण त्याचबरोबर त्यातील कर्मयोग टिळकांनी आचरणात आणला म्हणून त्याचे विवेचन अधिक अस्सल उतरले आहे असे म्हणता येईल. या संदर्भात एक उदाहरण लेखाच्या सुरुवातीसच दिले आहे. पुढील दोन उदाहरणे हेच अधोरेखित करतात. मंडाले येथे टिळकांना कुलकर्णी नावाचे बंदी स्वैपाकी म्हणून दिले गेले होते. त्यांना एकदा बराच ताप असताना ते त्याही अवस्थेत स्वैपाक करत होते. टिळकांनी त्यावेळी त्यांना आराम करण्यास सांगून स्वैपाकाची जबाबदारी घेतली तेव्हा ’तुमच्या लेखनात व्यत्यय येईल’, असे कुलकर्णी म्हणाले. त्यावर टिळक म्हणाले होते, " तुम्हाला आजारी स्थितीत सोडून मी लेखन केले तर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगण्याचा खटाटोप व्यर्थच केला असे म्हणावे लागेल." कुलकर्णी यांनी अशा काही आठवणी नोंदवून ठेवल्या आहेत. पुढे मंडालेहून अखेर सुटका झाली. पुण्यास येऊन अनेक दिवस उलटले तरीही हस्तलिखिताच्या वह्या इंग्रज सरकारकडून परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. त्यावर टिळक म्हणाले होते, "वह्या सरकारच्या कब्ज्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, मी तो जसाच्या तसा लिहून काढीन." प्रवृत्तिपर प्रयत्नवाद आणखी काय वेगळा असतो! समर्थांच्या शब्दात सांगायचे तर 
आधी ते करावे कर्म । कर्ममार्गे उपासना ॥ उपासका सापडे ज्ञान । ज्ञाने मोक्षची पावणे ॥

स्वातंत्र्यपूर्व काळात निद्रिस्त झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम या ग्रंथाने केले. आज कोविड प्रादुर्भावामुळे जगभरात आर्थिक, मानसिक, राजकीय, वैचारिक स्तरावर प्रचंड उलथापालथ झाली आहे. सैरभैर झालेल्या समाजाला स्थिरचित्त होण्यासाठी, निष्काम कर्मयोग आणि कर्तव्याभिमुख होण्याचे भान समाजात रुजवून नवचेतना देण्यासाठी ‘गीतारहस्य’ सारख्या ग्रंथाचीच आवश्यकता आहे.
कोणीतरी त्राता येईल आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढेल अशा पिचलेल्या मनोवस्थेला समाज पोचतो आहे अशा वेळी त्याला ’गीतारहस्य’च तारु शकेल. या विद्वत्तापूर्ण ग्रंथाची अनेक भाषांतरे झाल्याने हा ज्ञानप्रवाह मराठी बरोबरच अन्य भाषकांनाही खुला झालेला आहे. मूळ ग्रंथ मराठीत का लिहिला याचे उत्तर देताना टिळक म्हणाले होते की, "मला गीतेचा कर्मयोग आधी माझ्या लोकांना शिकवायचा आहे. त्यांना कर्मयोगाचा विसर पडला आहे. त्याखेरीज उत्कर्ष होणे नाही, हेच मला त्यांना सांगायचे आहे."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#गीतारहस्य #लोकमान्यटिळक #मंडाले #कर्मयोग
#Geetarahasya #LokmanyaTilak #Karmayog
( संदर्भ -श्रीमद्भगवद्गीतारहस्य - बाळ गंगाधर टिळक, लो. टिळक दर्शन- भा.द.खेर ) 
Published in e-Vidarbha Hunkar dated 1/8/2020

Saturday, August 18, 2018

औदुंबर


'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन...
चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें..'

या तरल ओळी वाचताना ’I wandered lonely as a cloud..’ ही वर्ड्सवर्थची कविता आठवते. त्यातला ढग होऊन आपण बालकवींनी शब्दांच्या कुंचल्याने रेखाटलेलं विहंगम निसर्गदृष्य प्रत्यक्ष पाहत तरंगत आहोत असं काहीसं वाटतं. झर्‍याचा निळासावळा तर शेतांचा हिरवागार, अशा झळझळीत रंगांनी आपली नजर निवते. बालकवींच्या प्रासादिक शब्दांमधला नाद ऐकता येतो. निसर्गगंधच नव्हे तर हिरवळीचा मऊ आणि झर्‍याचा शीतल स्पर्श अनुभवता येतो.
दुसरीकडे हा अनुभवांच्या बेटांमधून वळसे घेत वाहत चाललेला जीवनाचा प्रवाह असल्याचं जाणवतं. कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवाह !

'पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे'

चिमुकली कौलारु घरं, उंच टेकडी, अडवीतिडवी पायवाट अशा सार्‍या निसर्गाच्या रेषा ठळक दिसत असतानाच रंगरेषातून साकारलेला सगुण निसर्ग हळूहळू एका गूढ प्रवासाला निघतो.. काळ्या डॊहाकडे. इथे काळा डोह हे मला जीवनाच्या प्रवाहाच्या शेवटाचं प्रतीक वाटतं. पहिल्या कडव्यातले रंग आता नाहीत. शेवटच्या टप्प्याकडे जाणारी वाट कितीही पांढरी असली तरी अंतिमत: काळ्या डोहात समर्पित होणारी. 
बालकवींच्या ’श्रावणमासी’ कवितेसारखा हर्ष या कवितेत मनात दाटून येत नाही. त्यांच्या ’फुलराणी’ कवितेत होणारा प्रेमोत्सुक आनंद सोहळा इथे नाही. बालकवी आणि साने गुरुजी यांच्यात मला काही साम्यस्थळं दिसतात. दोघांच्याही शब्दांचा पोत तलम आहे, साहित्यातून उमटणार्‍या भावना अतिशय मृदु आणि निरागस आहेत. जगरहाटीमध्ये दोघांच्याही प्रतिभेची घुसमट झाली आहे. संवेदनशीलतेला औदासिन्याचा शाप असतो असं म्हणतात. त्याच औदासिन्याचा काळिमा या डोहाला झाकोळून टाकतो आहे.

’झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’

या औदुंबराच्या प्रतिमेइतकी चकित करणारी शब्दकळा आणि चेतनगुणोक्ती अलंकाराचे दुसरे सुंदर उदाहरण नाही.  ज्या पाण्याला आपण जीवन म्हणतो त्यातच आता त्या काठाला रुजलेल्या औदुंबराची मुळं पसरलेली आहेत. ज्या वाक्याशी आपण शेवटी खिळून राहतो त्यात वर्णन केलेला  काळ्य़ा, गूढ डोहाचं सत्य उमगलेला औंदुबर मात्र निराश नाही. तो काळिमा ’शेवटचा दिस गोड व्हावा’ या अपेक्षेप्रमाणे बालकवींना गोड वाटतो आहे. हा गोडवा आत मुरवलेला औंदुबर निर्विकार आहे. सुरुवातीला हसर्‍या, सतेज रंगांकडून - मग शुभ्र पायवाटेवरुन अखेरीस काळ्य़ा डोहाकडे जाणार्‍या आयुष्याच्या प्रवासाकडे, निळ्या प्रवाहाकडे तो स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहतो आहे.

They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
या वर्ड्स्वर्थच्या शब्दांप्रमाणे ’औदुंबर’ ही मला ध्यानानंतरची आनंदमयी समाधी अवस्था निर्माण करणारी प्रतिमा वाटते. ’नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला’ असा मोद अनुभवणारी. कदाचित त्यामुळे बालकवींच्या या कवितेचं गारुड शंभर वर्षांनंतरही कायम असावं. 

त्यांच्याच शब्दांच्या आधारे सांगायचं तर ’सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे..’ म्हणता म्हणता
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून’  याचे भान या कवितेच्या अखेरीस येते.
हे भान आपल्याला देणारा औदुंबर जगण्याशी नातं नं तोडता, जळात पाय टाकून तरीही
निर्लेप होऊन निश्चल बसलेला आहे. 

-मोहिनी

Friday, July 6, 2018

रणांगण

 ’रणांगण’ वाचताना असे वाटू लागते जणू आपण ’नो मॅन्स लँड’वर (म्हणजे दोन देशांच्यामधली अशी जागा ज्यावर कोणत्याच देशाचा हक्क नाही) उभे आहोत. त्यातली ’राष्ट्रीयत्व’ या मुद्द्याची चिकित्सा आपल्याला हादरवून सोडते. रोकडे सवाल करते. मराठी साहित्याचा मानदंड मानली गेलेली, विश्राम बेडेकरांनी लिहिलेली ही (एकमेव) कादंबरी.

वैश्विक पटावरुन राष्ट्रीयत्वाकडे, माणसाच्या मनोव्यापारांकडे, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याची प्रगल्भ नजर देणारी त्याचबरोबर आपल्या वैचारिक खुजेपणाची जाणीव करुन देणारी. "समुद्र जमिनीच्या कुशीत शिरत होता, बोट जवळ जाऊ लागली तसतसे तिच्यावर दीपमाळेचे रोमांच उभे राहू लागले.." यासारख्या त्यातल्या शब्दप्रतिमा थक्क करतात. केवळ सव्वाशे पानांची कादंबरी त्यातल्या आशयामुळे आणि बेडेकरांच्या चित्रमय लेखनशैलीमुळे आपल्याला झपाटून टाकते.

’रणांगण’ १९३० च्या सुमारास घडते. पहिल्या महायुद्धाचे सावट आणि दुसर्‍या महायुद्धाची लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर ही कथा साकारली आहे. कथानायक चक्रधर इंग्लंडहून मुंबईमार्गे शांघायला जाणार्‍या बोटीवर जर्मन ज्यू असलेल्या हॅर्टाला भेटतो. दोघे प्रेमात पडतात. भारत ब्रिटिश अंमलाखाली असल्याने चक्रधर ब्रिटिश पारपत्र बाळगणारा तर हॅर्टा स्वदेशातून हद्दपार करण्यात आलेली. इंग्लंड-जर्मनी द्वेषभावनेमुळे तिला मुंबईतच नव्हे तर पॅलेस्टाईनला उतरण्याचीही परवानगी नसते. प्रेमाची परिणीती लग्नात होणे शक्य नाही याची जाणीव असलेल्या हॅर्टाला, बोटीवरचा प्रत्येक क्षण चक्रधरसह उपभोगायचा असतो. त्यात समर्पणाचा निस्संकोच आवेगही असतो. चक्रधर म्हणजेच तिचा ’बॉब’, मुंबईला उतरुन गेल्यावर विरहवेदनेने वैफल्यग्रस्त झालेली हॅर्टा अखेर आयुष्य संपवते.

परंतु ही कादंबरी केवळ या दोघांची अयशस्वी प्रेमकथा नाही. यात कातडीच्या रंगभेदाचे अडसर ओलांडून बोटीवरच्या सर्वांना लळा लावणा‍‍र्‍या चिमुकल्या लुईसारखी इतर पात्रे देखील आहेत. विवाह हाच प्रेमाचा चरमबिंदू आणि अंतिम ध्येय मानावे का? विश्व व्यापून उरणार्‍या प्रेमाला अशा मर्यादा घालता येतात? माणसाने कोणत्या सीमारेषा महत्वाच्या मानाव्यात? नैतिकतेच्या ? मग ती नीतीमूल्यं नेमकी कोणी, कोणत्या देशाने, कोणत्या धर्माने ठरवलेली असावी? की राष्ट्रीयत्वाच्या? वेगवेगळया वंश-धर्मांचे आणि देशांचे लोकही या बोटीवर होते मग समुद्रावर तरंगणार्‍या विश्वाच्या या लघुरुपाला राष्ट्रीयत्वाचे नेमके कोणते निकष लागू होतात? महायुद्धांमुळे अवघ्या जगाचं रुपांतर एका रणांगणात होतं, त्यांच्या प्रभाव आणि परिणामांमुळे निर्माण होणार्‍या अशा अनेक प्रश्नांचं काहूर आणि भावनांचं रण आपल्या मनात माजतं.

सखेद आश्चर्य म्हणजे जागतिकीकरणानंतरचं आजचं जग आणि दोन महायुद्ध्यांच्या दरम्यानचं या कादंबरीतलं जग, दोहोंतल्या भावभावना, अस्मिता आजही तितक्याच टोकदार आहेत. चकित करणारे भौतिक बदल घडले पण माणूस म्हणून आपण कितपत प्रगत झालो याचे उत्तर शोधायला ही कादंबरी बाध्य करते. वाचताना मला नकळत जावेद अख्तर यांच्या या ओळी आठवल्या.
पंछी, नदीयाँ, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके..
सरहदे इन्सानोंके लिए है, सोचो तुमने और मैने क्या पायाँ इन्साँ होके..



Thursday, February 22, 2018

औरत

औरत

रेगिस्तान की तपती रेत पर
अपनी चुनरी बिछा
उस पर लोटा भर पानी
और उसी पर रोटियाँ रख कर
हथेली से आँखो को छाया देते हुए
औरत ने
ऐन सूरज की नाक के नीचे
एक घर बना लिया |

© सुमन केशरी
____________
woman

Amidst the desert
She laid her dupatta
on the scorching sand.. 
Put a small pot of water
With a pile of chapatis over it..
And..

By soothing her burning eyes
with the palm shield
She.. the woman
built a house
right below 
the fiery sun
© Translated by Mohini Modak

Sunday, July 2, 2017

ज्ञानयोगी

हल्ली बहुसंख्य लोकांची धार्मिक, सामाजिक मतं ही त्यांनी इंटरनेट किंवा सोशल मिडीयावर वरवर वाचलेल्या सुमार पोस्टवर आधारित असतात. व्यासंगाशी, संशोधनाशी त्यांना घेणेदेणे नसते. जगाचं जाऊ द्या, अगदी आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला तरी इथल्या लोकपरंपरा, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा विषयांच्या खोलात कुणी फारसं शिरत नाही. मुळात त्यासाठी आटापिटा करायचा कशाला, त्याने जगण्य़ात असा काय फरक पडणार आहे असे प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर असामान्य प्रतिभेचे साहित्य संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे आपल्या साहित्यकृतींमधून देतात. हा शोध म्हणजे भावनिक अट्टाहास नसतो. तो समाजाच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध असतो. त्यातून समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. शिवाय या समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.

संबंधित इमेज

(pic- From google-  not for commercial purpose )

१ जुलै, अर्थात काल डॉ. ढेरे उर्फ अण्णा यांचा प्रथम स्मृतीदिन होता. या अनुषंगाने अण्णांनी वाई इथल्या सॅनिटोरियम मध्ये वैद्यकीय उपचारासाठी राहत असताना लिहीलेली, माणसाच्या आयुष्याचं प्रयोजन किती भव्य आणि उदात्त असू शकतं याची प्रचिती देणारी कविता त्यांच्या जीवनाचं सार सांगून जाते.
’ माझ्या क्षयी फुफ्फुसांना हवा अक्षयाचा श्वास ..आणि वितीच्या मेंदूला हवा अनंताचा ध्यास
परी आकाराची कारा, कशी सरावी क्षरावी.. आणि अ-क्षराची सुरा कशी अक्षरी भरावी?’

पुलं देशपाड्य़ांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ,"कपाळावर विद्वत्तेची आठी नसलेला आणि अकारण रसिकतेचा फाया कानात घालून न मिरवणारा ज्ञानयोगी म्हणजे डॉ. ढेरे" असं चपखल वर्णन केलं होतं. महाराष्ट्रीय सांस्कृतिक-सामाजिक इतिहास हा अण्णांचा केवळ ध्यास नव्हे श्वास होता. नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, आज्ञापत्र, "त्रिविधा' (गाणपत्य ,जैन आणि मुकुंदराज या ३ परंपरांचा आढावा घेणारं लेखन,) असे त्यांचे अनेक पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ आणि लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. नाणी, शिलालेख, प्राचीन मराठी, संतसाहित्य, स्थानमहात्म्यपोथ्या, मूर्ती-शिल्प, देवळे-राऊळे, वाक्प्रचार-म्हणी, व्युत्पत्ती, रुढी-उपचार-परंपरा- हा सर्व पसारा म्हणजे त्यांची अभ्यासाची सामुग्री. १९६२ च्या पुरात पुण्यातील घरात साठवून ठेवलेली ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतरही त्यांनी प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवले परंतु पुस्तकखरेदीत व्यत्यय येऊ दिला नाही. आज त्यांचा जवळपास ४०००० ग्रंथांचा संग्रह त्यांच्या विश्वस्त मंडळाने अभ्यासकांसाठी खुला केला आहे.

मध्यंतरी जय मल्हार ही पोशाखी धार्मिक मालिका अतिशय गाजली. त्याच्या टीआरपी पलिकडचा खरा खंडोबा समजून घ्यायचा असेल तर अण्णांचं ’दक्षिणेचा लोकदेव खंडोबा’ या ग्रंथातलं या दैवतावर त्यांनी केलेलं संशोधन वाचायला हवं. खंडोबाची उपासना ११ व्या शतकात कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, खंडॊबाची पत्नी म्हाळसा ही माळव्व या नावाने कर्नाटकात ओळखली जाते. खंडोबाची मुखवट्याने सजवण्य़ाची पद्धती , कानडीतल्या मारी या शब्दाशी नातं सांगते, ज्याचा मराठीत तोंड असा अर्थ होतो. मारितोंड म्हणजेच मार्तंड म्हणजेच मल्लारि. मल्लारीचं ७ कोटी सैन्य होते असा पोथीत उल्लेख आहे. कानडीत सात म्हणजे येळ आणि म्हणून ते नाव यळकोट यळकोट जय मल्हार असं खूप काही यातलं अण्णांचं विश्लेषण सांगतं. अण्णांचं साहित्य वाचताना आपण तत्कालीन भारतीय-महाराष्ट्रीय संस्कृतीच्या वाटांवरून फिरून येतो.

एकंदरीत या दैवतांशी, लोकसंस्कृतीशी अण्णा इतके एकरूप कसे त्याचं उत्तर त्यांच्या बालपणात लपलेलं आहे. १९३५ च्या सुमारास त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले तेव्हा अण्णा अवघे ५ वर्षाचे होते. त्यापुढचा आठ वर्षांचा काळ अवघ्या अण्णांनी पुण्य़ाजवळ त्यांच्या व्यतीत केला. आजीजवळ मौखिक परंपरागत ज्ञानाचे भांडार होते. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्‍या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, घरोघरची व्रतवैकल्ये, दाराशी येणारे भुत्ये, वासुदेव, पोतराज- अशा लोकसंस्कृतीचा खोलवर संस्कार अण्णांवर झाला. उपजत शहाणीव, बुद्धीमत्तेला पुढे व्यासंगाबरोबरच विवेकी, ऋजु व्यक्तिमत्वाची जोड मिळाली आणि त्यांची १०५ पुस्तकं प्रसिद्ध होऊ शकली.

त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या ’लज्जागौरी’ या पुस्तकात अण्णा दाखवून देतात - स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. आज आपण ज्या मूर्तीरूपात देवीची उपासना करतो ते रूप आदिमानवापुढे असणे शक्यच नव्हते. तेव्हा त्यामागे अध्यात्मिक भावनेचा संबंधही नव्हता. अण्णांचे हे प्रतिपादन पारंपरिक श्रद्धांना हादरा देणारं होतं, पण अण्णा लालित्य व मार्दवयुक्त भाषेत पुराव्यानिशी दाखवून देतात की विजापूरची लज्जगौरी, माहूरची रेणुकामाता किंवा कर्नाटकची यल्लमा या ठिकाणच्या देवता मूर्तीरूप नसून स्त्रीच्या सर्जनेंद्रियाच्या रूपात आहेत. त्यांच्या ’अमृतकन्या’ या पुस्तकात सीता, उमा, शकुंतला, प्रियंवदा, अनुसूया, यक्षप्रिया, वसंतसेना आणि राधा अशी ८ कन्याचित्रे आहेत. भवभूतींची सीता आणि वाल्मिकींची सीता या अगदी भिन्न आहेत, तर कालिदासांची शकुंतला आणि व्यासांची शकुंतला अगदी भिन्न आहेत हे कळल्यावर वाचकाला नवल वाटते.

अण्णांबद्दल लिहीताना त्यांच्या ’श्रीविट्ठल एक महासमन्वय ’ या पुस्तकाचा उल्लेख अपरिहार्य आहे. १२-१३ व्या शतकात म्हणजेच वारकरी पंथाच्या उत्कर्षकालात श्रीविठ्ठल हे सुप्रतिष्ठीत दैवत झाले होते. विठ्ठलाचे हेच रूप आपल्याला ज्ञात असते. मात्र अण्णा त्याच्याही मागे जाऊन विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतात. विठ्ठल मूलत: दक्षिणेकडील गोपजनांचा किंवा पशुपालकांचा म्हणजेच धनगरांचा देव. याचे पुरावे या पुस्तकात देत ’विठ्ठलाचे वैदिकीकरण’ ही जाणीवपूर्वक घडवलेली प्रक्रिया आहे हे त्यांनी सिद्ध केलं. लोकांच्या पूर्वापार श्रद्धांना वेगळॆच सत्य सप्रमाण सांगणारे अण्णांचं हे संशोधन अतिशय खळबळ माजवून गेले होते.

त्यांच्या अशा ग्रंथसंपदेमुळे वाचकांच्या मनातही आधुनिकता आणि संशोधकीय दृष्टी काही प्रमाणात रुजू शकली. आजच्या प्रखर धार्मिक संवेदनांच्या पार्श्वभूमीवर ज्यांना एखादे संशोधन मान्य नाही त्यांनी पुरावा समोर ठेवणे, तर्कशुद्ध संगती मांडणे असे मार्ग निवडायला हवे. त्याऐवजी सर्वसामान्य समाज ‘श्रद्धा’ हाच पुरावा मानतो, त्यांनी तसे मानावे याची काळजी काही नेतेमंडळी मुद्दाम घेतात. अण्णांनी मात्र सत्याशी कधीही तडजोड केली नाही. अण्णांच्या सांस्कृतिक व वाङ्मयीन योगदानाबद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहीलच. परंतु संयम आणि विवेक हरवत चाललेला आजचा समाज अण्णांच्या व्यासंगी-संशोधक वृतीतून, साहित्यकृतींमधून काही बोध घेईल का!

Tuesday, March 7, 2017

किरा- चेतनेचे स्फुल्लिंग

एका स्त्रीचं आंतरिक भान किती परिपक्व, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती देणारी एक अप्रतिम व्यक्तिरेखा म्हणजे ’किरा आर्गुनोव्हा’. आयन रॅंड या गाजलेल्या लेखिकेच्या ’वि द लिव्हींग’ या झपाटून टाकणार्‍या पुस्तकाची किरा ही नायिका. आयन रॅंड ही फक्त लेखिका नाही तर एक विचारधारा मानली जाते. रशियातल्या समूहवादाला झुगारून व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणार्‍या अमेरिकेत ती स्थायिक झाली. तिथे तिने निर्माण केलेल्या व्यक्तिवादी, वास्तववादी साहित्यकृतींपैकी एक म्हणजे ’’वि द लिव्हींग’. लेखिकेचे वैचारिक प्रतिबिंब म्हणजे ’किरा’. खरं तर १९३६ मध्ये म्हणजे जवळपास ८० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली, बरीचशी आत्मचरित्रात्मक किंवा स्वानुभवावर आधारित मानली गेलेली ही कादंबरी आहे. यातली ’चेतनेचे स्फुल्लिंग’ असलेली, व्यक्तिवादाचं तत्त्वज्ञान ठामपणे मांडणारी  किरा मात्र मला कालातीत वाटते. किराच्या संकल्पना निश्चित आहेत. ’जगणं म्हणजे काय? जगण्यातलं सौंदर्य म्हणजे काय?’ हे तिला नेमकं माहीत आहे. आजच्या स्त्रीला सुद्धा अप्राप्य वाटेल असा नि:शंकपणा, ठामपणा किरामध्ये आहे.  

तसं पाहिलं तर किरा म्हणजे कोणी असामान्य स्त्री नव्हे. जगाचा किंवा एखाद्या देशाचा इतिहास ढवळून किंवा उजळून टाकावा असं तिने काहीही केलं नाही. परंतु हेच तिचं वेगळेपण आहे. अवघं जग बदलून टाकण्याची, प्रत्यक्षात न पेलणारी, भव्यदिव्य स्वप्नं म्हणजे तिला वेडगळ कवीकल्पना वाटते. स्वत:च्या प्रतिभेच्या आणि बुद्धीमत्तेच्या बळावर स्वतःचं चिमुकलं पण परिपूर्ण असं जग निर्माण करण्य़ाची क्षमता दर्शनी नाजूक असलेल्या किराच्या मनगटात आहे. तिच्या भोवतीचं लहानसं जग बदलण्याची तिची स्वप्न वास्तववादी आहेत. त्यासाठी झोकून देण्याची तिची तयारी आहे. तिला जे मिळवायचय ते तिच्या क्षमतेवर. किरा मला भावते ती यामुळेच.

बोल्शेविक क्रांतीनंतर रशियात साम्यवादी सरकारचा एकछत्री अंमल सुरू झाला होता. लेनिनच्या मृत्युनंतर प्रतिस्पर्ध्यांना नामशेष करून स्टॅलिनने सत्ता स्वत:कडे घेतली. गुप्तहेर संस्थांमार्फत नागरिकांवर वचक ठेवून त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊन पहिल्या महायुद्धात रशियाबरोबरच जिंकलेल्या लहान देशांवर तो निरंकुश सत्ता चालवत होता. या कादंबरीत पडद्यामागचा सूत्रधार तोच आहे असे दिसत असले तरी यात रँडने साकारलेली किरा ही एकूणच ’सामर्थ्याच्या गैरवापराला नकार देणार्‍या, स्वत्व शाबूत असलेल्या मानवी मनोवृत्तीची’ प्रतिनिधी आहे. हे राजकीय अराजक माजलं तेव्हा आयन रॅंडने नुकतचं तारुण्यात पदार्पण केलं होतं. साम्यवादाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणारा समाज पाहिला, समाजल्याण आणि मानवतावादाच्या नावाखाली मूलभूत हक्कांची गळचेपी होताना पाहिली, त्या धगीत तीही होरपळून निघाली. या सगळ्य़ा भावभावनांचे पडसाद किराच्या व्यक्तिरेखेत उमटले आहेत. १९२२-२९ या काळात घडलेली ही कादंबरी केवळ अमुक एका काळातले आक्रंदन मांडत नाही, वेदनेचे भांडवल करत नाही. उलट वेदना महत्वाची नसून माणसाने त्याविरूद्ध दिलेला लढा, माणसाची विजिगीषु वृत्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे, ते मानवी अस्तित्वाचं वैशिष्ट्य आहे हेच सार्वकालिक तत्वज्ञान आयन रँडने किराच्या भूमिकेतून मांडलं आहे.

अत्यंत प्रतिकूल पार्श्वभूमीवर आपल्या आकांक्षा जपत राहणारी ’किरा’ हे या कादंबरीतलं एकमेव, खर्‍या अर्थाने जिवंत पात्र. कादंबरी सुरू होते तेव्हा राज्यक्रांती दरम्यान विस्थापित झालेलं तिचं कुटुंब पेट्रोग्राडला (सत्तांतरानंतर ’लेनिनग्राड’) नुकतच परत आलेलं असतं. लहानपणापासून निसर्गात भटकणं, वाहत्या नदीत तराफ्यांवर पाय रोवून सुसाट रोरावत जाणं या सगळ्यातून किराला एक गोष्ट गवसलेली असते ती म्हणजे ’एकटेपणातला आनंद’. याचा अर्थ ती माणूसघाणी असते असा नव्हे. नातलगांशी तिचे सौहार्दाचे संबंध असतात. क्रांतीपूर्वी सुखवस्तू आयुष्य उपभोगू शकलेल्या नागरिकांची आता बूर्झ्वा म्हणून हेटाळणी होत असते. आता साम्यवादी सत्तेच्या टाचेखाली आलेल्या या नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी झगडावे लागत असताना १८ वर्षांची किरा मात्र अभियंता होऊन बांधकामतज्ज्ञ होण्य़ाचे ध्येय बाळगून असते. त्यावेळॆस एखाद्या सभ्य सुसंस्कृत मुलीने हे क्षेत्र निवडणे म्हणजे गहजबच. "स्त्री म्हणून स्वत:च्या अंगभूत गुणांचा समाजासाठी उपयोग करून द्यायचा सोडून, तू हे भलतच, पुरूषी क्षेत्र का निवडते आहेस," असं व्हिक्टर हा तिचा साम्यवादी मावसभाऊ तिला जरबेने विचारतो. "आपल्या थोर श्रमिक देशाची सेवा करता यावी म्हणूनच तंत्रक्षेत्र निवडलस ना तू?" हा प्रश्न तंत्रशाळेत नव्याने भेटलेली साम्यवादी सहाध्यायी सोनिया देखील तिला विचारते. दोघांनाही ती शांतपणे एकच उत्तर देते." फक्त स्वत:ची आवड, पॅशन म्हणून हे शिकते आहे. बस्स. लाल म्हणजेच साम्यवादी सरकारसाठी किंवा समाजासाठी नव्हे." आजही कित्येक जणांना आपल्या आयुष्याबद्दल इतक्या नेमकेपणाने निर्णय़ घेता येत नाहीत. 

लिपस्टीक सारख्या प्रसाधनाकडे सुद्धा ’व्यक्तीवादी वस्तू’ म्हणून पाहणार्‍या या देशात, सामाजिक बांधिलकी, संपत्तीचं समान वाटप अशा देखण्य़ा शब्दांमागचा पोकळपणा किरा पुरेपूर ओळखून असते. जेव्हा तिचा तंत्रशाळेतला नितळ मनाचा पण कट्टर साम्यवादी मित्र आंद्रेई टॅगानोव्ह तिला विचारतो, "साम्यवादात चूक काय आहे? माणसाने माणसासाठी जगावं याहून जगण्याचं उत्तम ध्येय काय असू शकतं?" त्यावर किरा म्हणते, "हे म्हणणं सोपं आहे पण जे लोक हुशार, प्रतिभावंत, सर्वोत्तम आहेत त्यांना समान दर्जाच्या नावाखाली कर्तृत्वशून्य, लायक नसलेल्या लोकांच्या पातळीला का ओढून आणायचं? लाखो निस्तेज, खुरडणार्‍या आत्म्यांसाठी या उत्कट, उमद्या, जीवनाचा अर्थ समजलेल्या, खर्‍या अर्थाने माणूस असलेल्या लोकांचा बळी का द्यायचा? " तिचे हे अगदी विरूद्ध पण स्पष्ट विचार ऐकता ऐकता या प्रकाशशलाकेत आंद्रेईसह आपणही गुंतत जातो. किराने मांडलेलं हे तथ्य वास्तवात येऊन त्याची परिणिती १९९० साली रशियाची शकले होण्यात झाली हे आपण जाणतोच. आदर्शवाद हा दिसायला सुंदर असला तरी व्यवहार्य असतोच असे नाही. किराचा ’वास्तववाद’ हा मला तिच्या व्यक्तिमत्वाचा एक विलोभनीय पैलू वाटतो. साम्यवादाला कडाडून विरोध करणारी, ’हे तत्त्व राबवणारी माणसे नव्हे तर हा विचारच मुळात चूक आहे’ हे ठणकावून सांगणारी किरा निव्वळ वैचारिक मतभेद आहेत म्हणून आंद्रेईशी मैत्री मात्र तोडत नाही. तिला त्यापलीकडचा माणूस दिसतो. ती तो निखळ मनाने जपते. मला वाटतं ’माणसाने माणसासाठी कसं जगावं’ हे खरं तर किराला अधिक नीट उमगलेलं आहे. साहजिकच या पारदर्शी व्यक्तिमत्वाबद्दलचे आंद्रेईचे आकर्षण, तो साम्यवादी संघटनेत वरिष्ठ पदावर पोचल्यानंतरही वाढतच राहते.

परंतु किरा गुंतली असते लिओ केव्हालेन्स्कीमध्ये. साम्यवादयांच्या हेरगिरीला, कारवायांना न जुमानता तिला आसुसून भेटायला येणारा फरार प्रतिक्रांतिवादी, देखणा लिओ! सुरूवातीला एकमेकांच्या साथीने सगळ्य़ा अडचणींवर मात करू म्हणत एकमेकात रममाण झालेले हे दोन आशावादी जीव सगळीकडून होणार्‍या सरकारी मुस्कटदाबीमुळे घुसमटू लागतात. किरा मात्र त्यांची स्वप्नं उराशी धरून लिओला धीर देत राहते. गरीबी, अन्याय, आजार आणि अपमान याला कणखरपणे तोंड देणारी किरा आपल्याला चकित करते तशीच लिओलाही. लिओ म्हणतो, "माझी आता एकच आस आहे, ती म्हणजे आयुष्यात एखाद्या गोष्टीची तीव्र आस कशी बाळगावी असावी ते मला तुझ्याकडून शिकायचे आहे." साम्यवादी विचारसरणीच्या कोणत्याही संघटनेचं सदस्यत्व घेतलं तर सरकारकडून चार सोयी मिळायच्या, रेशनकार्डावर अन्न थोडं अधिक मिळायचं, घरभाडं कमी लागायचं परंतु आपल्या विचारांशी, मूल्यांशी प्रतारणा करण्य़ाच्या बदल्यात मिळणार्‍या या सवलती लिओ आणि किरा नाकारतात. दोघांना आपली जुजबी नोकरीही गमवावी लागते. बूर्झ्वा असल्याचा शिक्का कपाळी असल्याने नवी नोकरी मिळणॆ अशक्य होते. कसंबसं दोघं शिकत राहतात पण लिओ आता खचू लागतो. ’आपण पेकाटात लाथ मारू हाकलून दिलेली दोन कुत्री आहोत’ असं तो उद्वेगाने म्हणू लागतो. एवढं होऊनही त्यांचे परस्परांवरील प्रेम सुतराम कमी होत नाही.

किरा आणि आंद्रेईची तंत्रशाळेत अधूनमधून भेट होत राहते, पण इतकी उपासमार होत असतानाही स्वाभिमानी किरा कधीही आंद्रेई जवळ परिस्थितीचे रडगाणॆ गात नाही. त्यालाच ते जाणवते. तिच्या अंतर्मनातलं सौंदर्य तिच्या चेहर्‍यावर झळकत राहतं. तिच्या देहबोलीतून व्यक्त होत राहतं. त्याची भूल लिओहून अधिक आंद्रेईला पडते. आणि आपल्यालाही. मजुरीची कष्टाची कामे करत कदान्न खात राहिल्याने प्रकृती ढासळलेल्या लिओमध्ये क्षयाची लक्षणे दिसू लागतात. त्याला हवापालटासाठी पाठवता यावं म्हणून किरा जीवाचं रान करते. ’लाखो कामगार क्रांतिकाळात गेले, एक बूर्झ्वा मेला तर काय हरकत आहे’ अशा संवेदनाहीन शब्दात तिला आर्थिक आणि सरकारी मदतीची दारे बंद केली जातात. शेवटी लिओला जगवण्य़ासाठी तिला एकच मार्ग दिसतो- आंद्रेई. त्याबदल्यात ती त्याला शरीराबरोबरच प्रेमाची खोटी कबुली देते. तिच्या आणि लिओच्या नात्याची कल्पना नसलेला, किरावर निरातिशय पण अव्यक्त प्रेम करणारा आंद्रेई तिच्यावर सर्वस्व उधळून देतो. किरा प्रेम हे मूल्य जीवापाड जपणारी आहे त्यामुळेच तिच्या प्रेमासाठी ती ’स्व-पलीकडे’ पाहू शकली असावी. अनाथालयाची कळा आलेल्या त्या शहरात लिओ बरा होऊन किरासाठी परत येतो पण फक्त शरीराने. मनाने तो जणू मृतप्राय अवस्थेत असतो. 

तडफडत किंवा साम्यवाद्यांना शरण जाऊन रोज तिळ तिळ मरण्य़ापेक्षा काळाबाजार करून उरलेले ४ दिवस चैनीत जगणे परवडले या निष्कर्षाला पोचलेला लिओ विवेक बाजूला ठेवतो. किराच्या विरोधाला न जुमानता वाममार्गाला लागतो. त्याला आतून जगावसं वाटावं, आपल्या जबाबदारीपोटी तरी त्याची नैतिकता जागी राहावी म्हणून किरा त्याला लग्नाची गळ घालू लागते तेव्हा आधीच पूर्णत: खचलेला लिओ तिला म्हणतो, "तू जर मला थांबवू शकत नाहीयेस तर ’तो लाल कारकुनाने खरडलेला एक कागदाचा तुकडा’ मला कसा थांबवू शकेल?" इथे मला किराचा विस्मय वाटतो. लिओने लग्नाला होकार द्यावा म्हणून ती त्याच्यावर भावनिक दबाब टाकू शकली असती, स्त्रीसुलभ आक्रोश करू शकली असती पण किरा असामान्य आहे. कागदोपत्री नात्यापेक्षा मनाचे भावबंध तिच्यासाठी अधिक महत्वाचे आहेत, तितकेच लिओचे व्यक्तिस्वातंत्र्यदेखील.

साम्यवादी संघटनेचा वरिष्ठ अधिकारी या नात्याने लिओवर कारवाई करण्यासाठी आंद्रेईला लिओच्या घराच्या झडतीचा परवाना मिळतो आणि तिथल्या कपाटात त्याला त्याने किराला भेट दिलेले पोशाख, वस्तू दिसतात. सुरा खुपसल्यासारखं ते सत्य काळजात रूतलेला आंद्रेई मनाने कोलमडतो. एव्हाना तथाकथित साम्यवादाचा खोटा जयजयकार करणार्‍या सहकार्‍यांची वैचरिक अधोगती पाहणार्‍या आंद्रेईला साम्यवादाचा फोलपणा जाणवू लागलेला असतो. किरा विपरीत स्थितीतही साम्यवादाला शरण जात नाही हे पाहताना ’माणूस कसा असू शकतो, कसा असायला हवा हे मी तुझ्यात पाहतो’ हे तो तिला सांगतो. तिने आपल्याला वापरलं ते स्वार्थासाठी नाही तर केवळ लिओवरच्या तिच्या निस्सीम प्रेमाखातर हे त्याला कळतं तेव्हा किरा त्याच्या नजरेला अधिकच उंच भासू लागते. ’समाजहिताच्या नावाखाली वैयक्तिक भावनांचा चुराडा करण्य़ाचा हक्क साम्यवाद्यांना नाही’ हे रोखठोकपणे सांगणार्‍या किराने आंद्रेईच्याच नव्हे तर समूहवादी मानसिकतेच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे. किरा दुसर्‍या कुणाची असणं हे पहाडासारखं दु:ख अंगावर कोसळतं तेव्हा माणसाच्या वैयक्तिक भावना त्याचं विश्व कसं आणि किती व्यापून टाकतात हे त्याला लख्ख उमगतं. साम्यवादाने नाकारलेलं माणसाचं खासगीपण हाच त्याच्या जगण्याचा आधार आणि उर्जा असते हे सत्य मान्य करून आंद्रेई आपलं आयुष्य संपवतो. 

आपल्या पाठीमागे किरा आणि आंद्रेई यांच्यात निर्माण झालेल्या संबंधांबद्द्ल कळल्यावर किराने आपला विश्वासघात केला असं समजुन लिओ व्यथित होतो. परंतु त्या आधीच त्याने सॅनिटोरियम मध्ये ओळख झालेल्या स्त्रीच्यासोबत परदेशात जाऊन आयुष्य़ घालवायची बेगमी केलेली असते. इथे लिओ कणाहीन झाल्याचे स्पष्ट दिसते. किरा त्याला आंद्रेई बद्दल कोणतेही स्पष्टिकरण देत नाही कारण तिचा आत्मा निष्कलंक असतो. ’जर तू जिवंत असलास आणि विसरला नाहीस तर भेटू’ अशी अनिश्चितता त्यांच्या प्रत्येक भेटीच्या निरोपाच्या क्षणी स्वीकारणारी किरा आतून शांत राहते ती यामुळेच. ज्याच्या प्रेमासाठी आपण आपलं शील पणाला लावलं त्याने आपल्याला त्यागावं याचा खेद ती वाटून घेत नाही.  निरपेक्ष प्रेम कदाचित यालाच म्हणत असावेत. किरा स्त्रीवादी असती तर कदाचित या अन्यायाने पेटून उठली असती पण किरा स्त्री-पुरूष या भेदांच्या पलीकडे खुल्या मनाने पाहणारी, व्यक्तिवादी आहे कदाचित म्हणूनच ती या घटनाक्रमाकडे विद्ध मनाने पण वस्तुनिष्ठपणे पाहू शकली आहे. एकाकी किरा स्वप्नांची साथ सोडत नाही. वैध मार्गाने परवानगी मिळत नाही म्हटल्यावर छुप्या मार्गाने देशाबाहेर पळ काढण्याचा निकराचा प्रयत्न करते. अश्रू ओघळल्याने सुद्धा वेदना व्हाव्यात अशी कडाक्याची थंडी साहत रात्रभर चालत राहते. सीमेवरील साम्यवादी सरकारी पहारेकर्‍याची गोळी तिचा वेध घेते तेव्हा हाडं गोठवणार्‍या बर्फातून स्वातंत्र्याच्या दिशेने चालत राहिलेल्या किराचं शरीर कोसळतं पण आत्मा तसाच राहतो..अलांच्छित, अवध्य, अभंग आणि अविनाशी. 

नायिका म्हणून आपल्या नजरेसमोर किरा अचूक उभी करण्य़ात लेखिकेची साहित्यिक प्रतिभा महत्वाची आहेच परंतु किरा एक विचारदीप घेऊन उभी आहे आणि वाचनाअंती तो ती आपल्या सुपूर्द करते. त्यागमूर्ती म्हणून गृहीत धरल्या गेलेल्या, सामाजिक, धार्मिक अपेक्षांच्या दडपणाखाली घुसमटणार्‍या अनेक स्त्रियांना त्यांना काय हवं आहे याचा उच्चार करण्याचं, निर्णय घेण्याचं धैर्य किरा देऊ शकते. केवळ स्त्रियांनाच नव्हे तर झुंडशाहीमुळे दडपलेल्या गेलेल्या अनेक आवाजांना हुंकारण्य़ाचं बळ देण्य़ाची ताकद किरामध्ये आहे. खुज्या विचारांच्या काळोखात किरा तिच्या स्वयंप्रेरणॆने चमकत राहते आणि इतर अनेक आयुष्यांना कळत- नकळत प्रेरणा देत राहते. आपणही तिच्यासवे जगण्य़ातली मूल्यं प्रामाणिकपणे पण वास्तववादी भूमिकेतून जपण्यातलं सौंदर्य शोधायला लागतो. मग वाटायला लागतं, क्षणाचं असो वा दीर्घ, आयुष्य असावं तर किरासारखं, स्वतंत्र आणि अपराजित. 

Ref :
(We the living by Ayn Rand
marathi version - Manjiri Joshi)
मधुरिमा- दिव्य मराठी विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख

Saturday, March 19, 2016

कारागृहातील साहित्य

’शोला शोला रटते रटते लब पर आंच न आये
एक चिंगारी लब पर रख दो लब फौरन जल जाये’

संत कबीर यांचा हा सुरेख दोहा. अनुभूतीतून उमटणारं सच्चेपण मांडणारा. प्रतिभा जर प्रखर अनुभवाच्या मुशीतून गेली तर त्यातून निर्माण होणारं साहित्य अधिक तावून सुलाखून अविष्कृत होतं हे सांगणारा. कारागृहासारख्या विपरीत पार्श्वभूमीचा विचार केला तर अशा परिस्थितीत होणारी साहित्यनिर्मिती अस्सल असते. लेखकाच्या वैचारिक प्रकृतीनुसार वेगवेगळी असली तरी ती जीवनाला थेटपणे भिडते. बोथस या सहाव्या शतकातील रोमन तत्त्ववेत्त्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. त्या तुरूंगवासात लिहीलेलं ’कॉन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी’ हे कारागृहातलं पहिलं महत्वपूर्ण लेखन मानलं जातं. कारागृहातलं साहित्य( प्रिझन लिटरेचर) या विषयावरचं रिव्काह झिम या आयरिश लेखिकेचं ’consolations of writing' हे पुस्तक गेल्या जानेवारीत प्रकाशित झालं. कधी मृत्युच्या काळ्या छायेमधे तर कधी सश्रम यातना सहन करत तुरूंगवास भोगणार्‍या विख्यात व्यक्तीं यात व्यक्त झाल्या आहेत. यात सामाजिक मान्यता आणि मतांतरे यावरचं ऑस्कर वाईल्ड आणि जॉन बन्यान यांचं लेखन आहे, मादाम रोलंड तसेच अ‍ॅन फ्रँक यांचं बखरवजा लेखन आहे, जीन कॉसोचं हुकूमशाहीविरोधातील कवन आहे, प्रायमो लिव्हाईचं हत्याकांडाच्या सामाजिक परिणामांवरचं लिखाण आहे, ओ हेन्रीच्या भावनांचं प्रकटीकरण आहे. लेखक कोणत्या परिस्थितीत लिहीतो याने साहित्याच्या आस्वादात फरक पडतो का, एखाद्या रम्य स्थळी-घरी-किंवा अभ्यासिकेत बसून लिहीणे आणि कारागृहात सजा भोगत असताना लिहीणे यात नेमका काय फरक असतो? स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने लेखकाच्या मांडणी, शैली, भाषेला अधिक धार चढते का अशा प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत. काही उत्तरे व्यक्तीसापेक्ष असली तरी बंदिवासात लिहीलेलं साहित्य आणि जीवन हे एकमेकांच्या अतिशय निकट असतात, ते साहित्य गांभीर्याची डूब असलेलं आणि वास्तवाशी निगडीत असतं, हे यातलं समान सूत्र आहे.

हे सूत्र वैश्विक असलं तरी प्रस्तुत लेखात फक्त निवडक भारतीय लेखकांच्या कारागृहातील साहित्याचा विचार केला गेला आहे. भारतात विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात कारागॄहात असताना अनेक मान्यवरांनी अतिशय दर्जेदार, उत्तम साहित्यिक मूल्य असलेलं आणि वैविध्यपूर्ण लेखन केलेलं आहे. कारावासातल्या एकांतात स्वत:ला एकाकी वाटू न देता, निराश न होता तो वेळ मनन, चिंतन आणि लेखनाला देण्य़ाला या मंडळींनी प्राधान्य दिले, ते केवळ या सर्व व्यक्ती असामान्य होत्या म्हणूनच. स्वातंत्र्योत्तर काळातल्या कारागृहातील साहित्यनिर्मितीची पार्श्वभूमी ही त्यापेक्षा वेगळी होती आणि आहे. देशांतर्गत समस्यांमधून निर्माण झालेली अस्वस्थता त्या लेखनामधून जाणवते.

कारागृह म्हणजे प्रतिकूलतेचा कहर. अशा स्थितीत महाकाव्याची रचना महाकवी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. लालित्यपूर्ण पण ओजस्वी शब्दरचना, भावनांची उत्कटता, प्रासादिकता त्यांच्या साहित्यकृतींमधे नेहमीच आढळते पण त्याहीपलीकडे जाऊन सावरकरांची लेखणी मनाचा ठाव घेते ती तर्कशुद्धपणे मांडलेले स्पष्ट विचार आणि  खणखणीत अभिव्यक्तीमुळे. ’तुजसाठी मरण ते जनन तुजविण जनन ते मरण’ इतका दिव्य समर्पण भाव मातृभूमीप्रती व्यक्त करणार्‍या सावरकरांना ब्रिटिश सरकारने दोन जन्मठेपेची म्हणजे तब्बल पन्नास वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावून अंदमानच्या काळ कोठडीत डांबले. इथल्या अमानुष छळाला कंटाळून कित्येक कैदी आत्महत्या करीत किंवा विकल स्थितीत मरणाची याचना करत. सावरकरांना आठ बाय सहाच्या खोलीत डांबलेले होते. इतक्या विदारक स्थितीतही त्यांच्या प्रतिभेला काव्य स्फुरे. ’कमला’ आणि ’गोमंतक’ या महाकाव्यांची निर्मिती इथेच झाली. मृत्यूच्या दाढेत असूनही विजीगिषु वृत्तीने महाकाव्य लिहिणारे सावरकर हे जगातले एकमेव उदाहरण असावे. सावरकरांना काव्य सुचले तेव्हा त्यांनी जणू आभाळाला "माझा कागद होशील काय?' असे विचारले असणार अशी कल्पना करून लोककवी मनमोहन यांनी
"आभाळ म्हणाले ’नाही’ भूमीही म्हणाली ’नाही'।
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही"
अशी बोलकी कविता लिहीली आहे.
’कमला’ या काव्यसंग्रहातील
’अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची’
यासारख्या ओळीतून त्यांचा तेजस्वी ’राष्ट्रवाद’ प्रत्ययाला येतो.
अंदमानातली त्यांची शिक्षा दहा वर्षानंतर काहीशी शिथील झाली. लेखन साहित्य मिळू लागले. अंदमानातच सावरकरांनी उर्दू भाषेत गझलाही लिहिल्या होत्या, तब्बल 80 वर्षांनंतर या गझलांची त्यांच्याच अक्षरातली वही मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारकाला मिळाली. अंदमानच्या तुरुंगातले लेखनिक प्यारेलाल यांच्याकडे सावरकरांनी ही वही दिली होती. या गझलेत आनंद आहे, विषाद आहे पण निराशा नाही. काळ्या पाण्याची शिक्षा हे देशसेवेकडे जाणारे , भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी उचललेले पहिले पाऊल अशा भावभावनांचा समुच्चय म्हणजे या गझला. जगाच्या अंतिम दिवशी देखील मी उच्चरवाने हेच सांगत असेन की मी हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थान माझा आहे, असं सांगणारी सावरकरांची प्रतिभा आपल्याला विस्मयचकित करून जाते. ते लिहीतात
’यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयां मेरा,
मै बंदा हिंदवाला हूँ, या हिंदोस्तां मेरा पहले।’

सावरकरांच्या जाज्वल्य देशाभिमानाच्या, कडव्या राष्ट्रवादी भूमिकेच्या तुलनेत विनोबा भावे वेगळे, ’सब भूमी गोपालकी’ या विचारधारेचे प्रणेते. वैदिक परंपरेचे आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते विनोबा म्हणजेच विनायक नरहरी भावे यांच्या बाबतीत त्यांनी एरवी केलेंलं लेखन आणि कारागृहात केलेलं लेखन यात दर्जात्मक, भावनात्मक फरक नाही. लेखकाचं दैनंदिन आयुष्य आणि कारागृहातलं आयुष्य़ यात तफावत असेल तर त्यानुसार साहित्याचं आकलन बदलतं. विनोबांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांच आश्रमातलं साधं शुचिर्भूत सश्रम जीवन आणि कारगृहातलं जीवन यात फारसं अंतर नव्हतं. गरजा कमी म्हणजे इतक्या कमी की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. त्यांची शैली कधीच परिस्थितीनुसार बदलली नाही, ती कायम मॄदु होती. तरीही विनोबा म्हणत, तुरूंगाशिवाय इतकं आत्मपरिक्षण, इतकी अध्यात्मिक साधना झाली नसती. तुरूंगालाच तपोभूमी मानून त्यांनी साहित्यसेवा केलेली आहे. लेखणी आणि वाणीच नव्हे तर हा देहच सेवेचे एक साधन आहे अशी त्यांची भूमिका होती.
विनोबा म्हटले की सर्वप्रथम आठवते ती गीताई, आपल्या आईला सहज आकलन व्हावे या हेतूने सुलभ मायमराठीत श्रीमद्भगवद्गीतेचा विनोबांनी केलेला ओघवता अनुवाद. तांत्रिकदृष्टया विनोबांनी गीताई कारावासात असताना लिहीलेली नाही. परंतु ते धुळ्याच्या कारागृहात असताना १९३२ साली ती प्रसिद्ध झाली. झेंडा सत्याग्रहानंतर नागपूरच्या कारागृहात असताना त्यांनी ’ईशावास्य वृत्ती' हे पुस्तक लिहीलं. हे पुस्तक म्हणजे ’जगावं कसं’ याचा एक वस्तुपाठच आहे. जीवनशास्त्र खच्चून भरलेल्या ईशावास्य उपनिषदातील १८ मंत्रांची सहज उकल या पुस्तकात आहे. एका वाक्यात सांगायचं तर आपल्यात ’शहाणीव’ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. ’स्थितप्रज्ञ दर्शन’ हे विनोबांचं कारागृहातलं आणखी एक महत्वाचं साहित्य. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धी. गीतेतील आदर्श पुरूष विशेष. शिवणी कारागृहात दिलेल्या प्रवचनांचं हे संकलन. या पुस्तकाने आजच्या चंगळवादी जीवनामुळे सैरभैर झालेली मनं निश्चितच निवतील.
ब्रिटीशांविरूद्ध केलेल्या निदर्शनांमुळे ते धुळयाच्या कारागृहात डांबले गेले तेव्हा त्यांनी गीतेवर अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषॆत प्रवचने दिली. सानेगुरूजींसारख्या सिद्धहस्त व्यक्तिने ती टिपून घेतली, त्याचेच पुस्तक म्हणजे गीता प्रवचने. याचे श्रोते म्हणजे संतमहंतांबरोबरच कारागृहातले सेवक आणि इतर कैदी देखील. उपनिषदांचे उपनिषद असलेली गीता सांगताना या सार्‍यांचा श्रमपरिहार करण्य़ाची, आत्मपरिक्षणाला भाग पाडण्याची शक्ती विनोबांच्या निरूपणात होती. गीतेचं आणि त्यांचं नात त्यांच्या शब्दात सांगायचं तर ’गीताई माझी माऊली... मी तिचा बाळ नेणता, पडता रडता... घेई उचलुनि कडेवरी’. अर्थात विनोबांचा सर्वसंगपरित्यागाचा आनंद भोगणारा आत्मा जिवंतपणीच इतका मुक्त होता की त्यांना हा देह म्हणजेच एक प्रकारचा तुरूंग भासत असावा, या अर्थाने विनोबांचं सगळच साहित्य हे कारागृहातलं साहित्य म्हणायला हवं.

’गीता’ हाच प्राण असलेल्या विनोबांच्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील तुरूंगवासात असताना लिहीलेल्या ’गीतारहस्या’तून गीतेचे वेगळेच पैलू समोर येतात. याचे कारण विनोबा आणि टिळक यांची वैचारिक बैठक भिन्न होती. टिळकांचा गीतेकडॆ पाहण्य़ाचा दृष्टीकोन तर्कनिष्ठ होता तर गांधीच्या आणि विनोबांच्या गीता विवेचनानुसार , गीता हा नुसता धार्मिक ग्रंथ नसून आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं ते एक कविकल्पित रूपक. मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा टिळकांच्या ’गीतारहस्य’ ग्रंथाचा गाभा आहे. यात गीतेचा महाभारताशी असलेला संबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहेच त्याशिवाय गीतेचे अंतरंग व बहिरंग परीक्षण विवेचन स्वरूपात केलेले आहे.
बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारधारांची तुलना अशा अनेक विषयांवर यात लोकमान्यांनी विद्वत्तापूर्ण भाष्य केले आहे. टिळकांचा झंझावाती कार्यकाळ बघता तुरूंगवासामुळेच हा भव्य लेखनप्रकल्प पूर्ण होणे शक्य झाले असावे. त्याअर्थी ही इष्टापत्ती म्हणता येईल.

किंग्जफोर्ड या न्यायाधिशाने बंगालच्या फाळणीला विरोध करणार्‍या तरुणांना फटक्यांची शिक्षा सुनावली होती; साहजिकच या काळातले टिळकांचे अग्रलेख अधिकच जहाल होत गेले. न्यायमूर्ती दावर यांनी २२ जुलै १९0८ रोजी टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. मंडालेच्या तुरुंगात पोचेतो त्यांची सक्तमजुरीची शिक्षा एका ठरावाने रद्द होऊन साध्या कैदेची केली गेली, हा त्यातल्या त्यात दिलासा. मंडाले आणि काही काळ मेकटिलाच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘वेदांग ज्योतिष’ आणि ‘गीतारहस्य’ या दोन ग्रंथांचे लेखन केले. हिंदू धर्माचा इतिहास, भारताचा रामायणपूर्व इतिहास, शांकरदर्शन, प्रांतिक कारभार, हिंदू कायदा, शिवाजी महाराजांचे चरित्र अशा अनेक विषयांवर लिहीण्य़ाचा त्यांचा मानस होता. परंतु कैद साधी असली तरी हा तुरूंग किती भयानक होता त्याचा अनुभव त्यांच्यानंतर पाच वर्षांनी त्याच कारागृहात गेलेल्या सुभाषचंद्र बोस यांना आला. मंडालेची हवा इतकी खराब असताना एवढे बौद्धिक श्रम करणे लोकमान्यांसारख्या एखाद्या ज्ञानयोग्यालाच शक्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. लोकमान्यांनी परदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून गीतेवरचे भाष्य लिहिले आणि स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण केले. भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ होते, हे जागतिक संदर्भ देऊन सिद्ध करतानाच सर्वसामान्यांच्या जिज्ञासेला जागवेल आणि शमवेल अशा शब्दांत त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. लोकमान्यांनी भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते त्यामुळेच हा ग्रंथ इतका सरस सिद्ध झाला. निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला असला, तरी एकंदर सामाजिक परिस्थिती बघता आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची तितकीच आवश्यकता आहे.

पं. जवाहरलाल नेहरूंच्या कारागृहातील लेखनाचा पिंड मात्र अध्यात्मिक किंवा धार्मिक चिंतनाचा नव्हता. ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भात त्यांना विशेष रूचि होती. सुरूवातीला ब्रिटीशांच्या कलाकलाने घेऊन आपल्या मागण्या रेटून धरणार्‍या कॉंग्रेसने १९३२ मधे नेहरूंच्या नेतॄत्वाखाली खणखणीतपणे पूर्ण स्वराज्याची मागणी करून स्वतंत्रपणे झेंडा फडकावला. ब्रिटीशांनी यावर दडपशाहीचे तंत्र अवलंबले आणि नेहरूंची रवानगी तुरूंगात झाली. त्याआधी नेहरू नुकताच युरोप दौरा करून आले होते. सुमेरियन, युरोपियन संस्कृतीची निरीक्षणे आणि इतिहासाच्या दांडग्या अभ्यासातून नैनी व डेहराडून येथील तुरूंगात असताना विश्लेषकाच्या भूमिकेतून त्यांचं ’Glimpses over world history' हे जगाच्या इतिहासाचं ओझरतं दर्शन घडवणारं पुस्तक साकार झालं. हे पुस्तक त्यांनी त्यांच्या मुलीला, इंदिरा गांधींना उद्देशून लिहीलेल्या पत्रांच्या स्वरूपात आहे. प्राचीन भारतीय इतिहास किती समृद्ध होता याची जाणीव तोवर फक्त अभ्यासकांपुरती मर्यादित होती. या पुस्तकाच्या निमित्त्याने त्याचं दर्शन जगाला घडवता आलं.

याच तुरूंगवासातल्या पुढच्या काळात त्यांनी ’ Towards freedom' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहीलं. हे पुस्तक त्यांनी पत्नी कमला नेहरूंना अर्पण केलं आहे. पूर्ण स्वराज्याच्या मागणीची पार्श्वभूमी या शीर्षकामागे होती. नेहरूंची वैयक्तिक आणि कॉंग्रेसची एकूणच जडणघडण कशी होत गेली, नेहरूंवर असलेला गांधीजींचा प्रभाव आणि वेगळेपण, त्यांना टिळक तसेच ना. गोखले यांच्याबद्दल असलेलं वैचारिक आकर्षण अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यांनी यात केला आहे. नेहरूंची विचारपद्धती समजून घेण्य़ासाठी अभ्यासकांना हे पुस्तक महत्त्वाचे वाटते. या तुरूंगातल्या सुटकेबरोबरच हे पुस्तक विराम घेतं. १९४२ च्या ’चले जाव’ चळवळीतील सहभागामुळे नेहरूंवर कडक कारवाई होऊन त्यांना अहमदनगर येथील तुरूंगात ठेवण्यात आले. या सलग चार वर्षाच्या तुरूंगवासात नेहरूंनी पुढे अतिशय गाजलेले ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहीले. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा आलेख यात मांडलेला आहे. यात प्राचीन, मध्ययुगीन काळापासून ते १९४५ पर्यंतचा भारताचा इतिहास सामावलेला आहे. प्रचंड आवाका असलेल्या या ग्रंथलेखनासाठी मौलाना आझाद तसेच गोविंद वल्लभ पंत यांची नेहरूंना मोलाची मदत झाली. याशिवाय 'bunch of old letters' हे एस.गोपालन यांनी संपादित केलेलं, पं. नेहरूंच्या कारागृहातून लिहीलेल्या विवीध पत्रांचं संकलन हे देखील नेहरूंचं कारावासातलं लेखन म्हणता येईल. नेहरूंचे एरवीचे काहीसे राजेशाही पद्धतीचे ऐटबाज जीवन आणि ब्रिटीशांकडून त्यांना जहाल क्रांतीकारकांच्या तुलनेत मिळणार्‍या सवलती यामुळे त्यांना बंदिवासात लेखन करणं सहजसाध्य होतं असं मानलं जातं. परंतु पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीनंतर ब्रिटीशांचा प्रचंड रोष त्यांना पत्करावा लागला, शिवाय त्यांची पुस्तक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर थेट भाष्य करणारी असल्याने ब्रिटीश सरकारची करडी नजर आणि सहकार्यात अनेक अडचणी यावर मात करतच नेहरूंना आपलं लेखन पूर्ण करावं लागलं.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या महानुभावांच्या कारावासातल्या लेखनाने समाजाला जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणार्‍या आशयगर्भ साहित्याची अपूर्व भेट दिली.

कारावासाचा अर्थ फक्त गजामागचं कोंडलेलं जीवन इतकाच न घेता लेखन स्वातंत्र्यावरील बंधन, वैचारिक मुस्कटदाबी किंवा अभिव्यक्तीविरोध असा घेतला तर १९७५ मधील आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यकृतींना देखील कारागृहातील लेखन म्हणता येईल. आणीबाणीत अविष्कार स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास पत्करणारे महत्त्वाचे लेखक म्हणजे विनय हर्डिकर. या अनुभवावरचे त्यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. हेमिंग्वेच्या ‘फेअरवेल टू आर्म्स’ ही हेमिंग्वेची युद्धात निर्वासित झालेल्यांच्यावर लिहीलेली कादंबरी. या लेखनावरच्या चित्रपटातील एक प्रसंग हर्डीकरांनी लिहीला आहे. अर्धमेल्या अवस्थेतील एक बाई घोडागाडीतून जात आहे. तिच्या मांडीवर बाळ आहे. एका खड्ड्यातून गाडी जात असताना ते बाळ निसटून खाली पडतं. क्षणभर तिचा चेहरा वेदनेने पिळवटतो आणि परत निर्विकार होतो. संवेदना गोठलेल्या त्या आईला जीवाच्या आकांताने ते बाळ उचलून घ्यावंसं वाटत नाही. युद्धामुळे किंवा टोकाच्या सामाजिक परिस्थितीत कशी बधिरता येते असं दिग्दर्शकाने यातून दाखवलं. हर्डीकर म्हणतात की आपल्या लेखकांनी तर अनुभवाची धग सोसण्याआधीच आविष्कार स्वातंत्र्याचं, मुलभूत हक्काचं मांडीवरचं मूल खाली पडू दिलं.
शासकीय दबावतंत्राला तळपत्या शब्दात विरोध करणार्‍या दुर्गाबाई भागवत यांची आणीबाणी काळातील भाषणं व लेखांचे छोटेखानी पुस्तक ‘मुक्ता’ 1977 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्यात दुर्गाबाईंनी एरवी विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे तेंडुलकरांसारखे साहित्यिक सार्वत्रिक बंदी आल्यावर मूग गिळून गप्प का बसले, असा खडा सवाल केला आहे. याच पुस्तकात दुर्गाबाईंनी लेखनावर आलेल्या बंधनांना ठाम विरोध करताना म्हटलं आहे, ‘लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार-मुक्त विचार-हे मानले पाहिजेत.’

महाराष्ट्रातल्या ‘मुक्त साम्यवादी गटा’शी जोडले गेलेले, साठीच्या दशकात मराठी अनियतकालिकांमध्ये कवितालेखन करणारे एक महत्त्वाचे कवी तुळसी परब. त्यांच्या 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता या कारावासातील कविता म्हटल्या जातात. प्रेम आणि मृत्यु सारख्या जाणिवांवर असलेला सामाजिक आणि राजकीय अंकुश यातून दिसून येतो. बंदिवासातील दबावाचे वातावरण आणि त्यात होणारा कवीचा मानसिक कोंडमारा या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. आणीबाणीविरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या पुन:स्थापनेकरता संघर्ष करताना कारावास भोगणार्‍या अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या आठवणी, तसेच कारावासातील नोंदी स्फुट स्वरूपात ठिकठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. या संकलित स्वरूपात प्रसिद्ध झाल्यास या विषयाचा आणखी एक लुप्त पैलू उजागर होईल.
या उलट स्वातंत्र्योत्तर काळापासून आजवर जे साहित्यिक पुरस्कारांसाठी, अनुदान किंवा शिष्यवृत्तींसाठी लांगूलचालन करत शासनकर्त्यांना रूचेल पचेल अशीच साहित्यनिर्मिती करत आले त्यांनी मात्र आपले साहित्य स्वह्स्ते कारावासात डांबले असेच म्हणायला हवे.

आजही कारावासातल्या अनुभवांवर किंवा प्रत्यक्ष कारावासात साहित्यनिर्मिती होते आहे. अर्थात आज तुरूंगात डांबले जाणारे कैदी हे बहुतांशी गुन्हेगार किंवा आरोपी असतात, ती पूर्वीसारखी राजकीय नजरकैद नाही आणि त्या बंदिवासामागे पूर्वीसारखे उदात्त ध्येय नाही. साहजिकच उन्नत आंतरिक प्रेरणेतून, वैचारिक मंथनातून साकार झालेल्या तत्कालिन साहित्याची आणि आजच्या तुरूंगवासात केलेल्या लेखनाच्या गुणवत्तेची तुलना होऊ शकत नाही. आज जागतिकीकरणाने जगण्य़ाचे संदर्भच बदलून टाकले आहेत. तत्कालिन साहित्यातून विस्तारत गेलेला मानवतेचा विशाल पट संकोचत जाऊन विश्वमानवाचा प्रवास ’मी’ वर येऊन स्थिरावल्याचे चित्र दिसते आहे. या सार्‍या छटांचा परिणाम साहित्याच्या दर्जावर होत गेलेला दिसून येतो.

 क्षणिक रागाच्या भरात ज्यांच्या हातून विघातक कृती घडली आणि कैद वाट्याला आली अशा कित्येकांनी कालांतराने पश्चातापदग्ध मनस्थितीत कवितेतून भावनांना वाट करून दिली. त्या कवितांना प्रस्थापित साहित्यिक परिमाणात मोजता येणार नाही. अशा कवितांचे संकलन म्हणजे उत्तम कांबळे यांनी संपादित केलेला ’गजाआडच्या कविता' हा काव्यसंग्रह. उदाहरण द्यायचं झालं तर नोकरीत कायम करण्य़ाचं आमिष दाखवून शिक्षण संस्थेच्या चालकानं एका होतकरू तरूणाला पाच वर्ष फुकट राबवून घेतलं, वर डोनेशन या गोंडस शब्दाआड लाच घेतली आणि नंतर त्याच्या तोंडाला पाने पुसली. पुरावा नसल्याने पैसाही परत मिळेना तेव्हा संतप्त मनोवस्थेत या तरूणाने संस्थाचालकाचा खून केला. अशा घटना कवितेत कुठं कुठं झिरपताना दिसतात. मूल्यांना पायदळी तुडवून व्यवस्था पुढे जात असेल तर गुन्ह्यांकडे वळणारी पावले ही त्याची अपरिहार्यता तर नाही! ही सारी तगमग, असहाय्यता, उद्रेक सारं काही या कवितांमधून डॊकावतं. मराठीच नव्हे, तर अन्य भाषांतही असा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही. तुरुंगातले सगळेच कैदी दोषी असतात असं नाही. ""मी जेव्हा तुरुंग महा निरीक्षकपदाची सूत्रं स्वीकारली, तेव्हा ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत असे ६५ टक्के कैदी तुरुंगात होते, त्यांच्या खटल्यांचा निकाल लागायचा होता,‘‘ असं उद्धव कांबळे यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सांगितलं आहे. कायद्याने गुन्हेगार ठरलेल्या, किंवा खटला प्रलंबित झाल्याने अंधारलेलं आयुष्य जगणार्‍या अशा कित्येकांच्या काळजातल्या संवेदनशीलतेवर त्यांच्या कवितेने कवडसा पाडला आहे.

अस्तित्वाच्या प्रयोजनाचा शोध आणि त्यातून होणारा माणूसपणाचा बोध हे सत्र साहित्यात निरंतर सुरू राहील. कारागृहातल्या एकांतवासामुळे घडणारे आत्मपरिक्षण आणि गजाआडच्या जगातले अनोखे अनुभव यामुळे या शोधाला एक सत्यनिष्ठ आणि अधिक गहिरा आयाम लाभतो हे निर्विवाद.


(पूर्वप्रसिद्धी -तरुण भारत विशेषांक)
पं.नेहरुंच्या लेखनाबाबत चर्चा- संदर्भ- अभ्यासक श्री. राज कुलकर्णी