Showing posts with label ती. Show all posts
Showing posts with label ती. Show all posts

Monday, March 13, 2023

अर्धनारीनटेश्वर - समानतेकडून परस्परपूरकतेकडे


ललनांनो

नका येत जाऊ तुम्ही सत्कार सोहळ्याला

शाल, श्रीफळाचं तबक घेऊन .. 

दीप प्रज्ज्वलन करतेवेळी

नका उभ्या राहत जाऊ

समईपाशी काडेपेटी धरून ..

नका वाचत जाऊ मानपत्र..

विचारा स्वत:ला आपलं सोहळ्यातलं स्थान

तो प्रेक्षणीय होण्यापुरतंच ?

मग नका सामील होऊ त्यात..

सुंदर मुलींनो

एवढं करून तर पाहा

आणि बघा 

हे जग बदलून जाताना..


कवी नीलेश रघुवंशी यांच्या हिंदी कवितेचा मी केलेला हा मराठी अनुवाद. नुकत्याच होऊन गेलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने ही कविता आठवली. दरम्यान एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे मात्र ही सगळी कामं मुलगे आणि मुली मिळून करत होते. पाहून छान वाटलं. इथे कित्येकांना वाटेल, बघा, आता कुठे राहिलंय असं काही. द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत. या देशातली सर्वात लहान सरपंच २१ वर्षांची तरूणी आहे. खेळ, सेनादल, संशोधन, कोर्पोरेट, सेवाक्षेत्र सर्वत्र महिलांचा वावर आहे. त्यांचेही सत्कार होतात. त्या वक्ता म्हणून येतात, आयोजक असतात. अपवादात्मक असल्या तरी काही महिला तर बाईपणाचा फायदा देखील उपटतात. आता आणखी काय समानता हवी आहे ! कशाला हवाय महिला दिन! 

तरीही ही कविता कालबाह्य झालेली नाही कारण ती सोहळ्यापलीकडचंही काही सांगू पाहते आहे. दिखाऊपणाच्या आहारी गेलेल्या शोभेच्या बाहुल्यांचे कान धरते आहे त्याचबरोबर दैनंदिन जीवनातल्या स्त्रियांच्या स्थानाबद्दल व स्थितीबद्दलही बोलते आहे.


पेटीएमने वेगवेगळ्या वयोगटातील तीस सुशिक्षीत स्त्री-पुरूषांसह एक अनोखा प्रयोग केला. ’टचिंग हार्ट्स’ने प्रदर्शित केलेला हा व्हिडिओ सध्या चर्चिला जातो आहे. एका रेषेत उभं करून त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. उत्तर ’हो’ असेल तर एक पाऊल पुढे जायचे आणि ’नाही’ असेल तर एक पाऊल मागे यायचे असे सहभागींना अगोदरच सांगण्यात आले होते. प्रश्न सुरू झाले. 

वयाच्या दहाव्या वर्षापूर्वी तुम्ही सायकल चालवायला शिकला होतात का? 

तुम्ही शाळेत संगीत शिकला होतात का?

तुम्ही एखाद्या तरी खेळाचे प्रशिक्षण घेतले आहे का?

तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करता येतात का?

प्रश्न इथवर आले तेव्हा स्त्री-पुरूष एक दोन पावले मागे पुढे उभे होते.

तुम्ही इतरांसाठी चहा, नाश्ता तयार करता  का?

या प्रश्नानंतर मागच्या काही स्त्रिया एक पाऊल पुढे व पुढचे काही पुरूष एक पाऊल मागे गेले. तरी अजूनही त्यांच्यात फार अंतर नव्हते. पुढचे प्रश्न सुरू झाले.

घरातली बिलं तुम्ही भरता का?

सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहित आहे का?

तुम्हाला तुमच्या पगाराचे ब्रेक-अप माहित आहे का?

तुम्ही सही करता त्या प्रत्येक अर्थविषयक कागदपत्राबाबत तुम्हाला नीट माहिती असते का?

कुणाचाही सल्ला व मदत न घेता तुम्ही तुमच्या नावावर एखादे वाहन खरेदी केले आहे का?

तुम्ही कुणाच्याही मदतीशिवाय एखादी विमा पॉलीसी  घेतली आहे का?

तुम्ही शासकीय अंदाजपत्रक समजून घेता का? 

तुम्ही तुमच्या कमाईचे आर्थिक नियोजन एकट्याने करता का ?

म्युच्युअल फंड आणि एसाआयपी मधला फरक तुम्हाला सांगता येईल का?

तुम्ही तुमचे किंवा कुटुंबाचे आर्थिक निर्णय स्वत: घेऊ शकता का? 

प्रश्न संपले तेव्हा अपवाद वगळता बहुतेक पुरूष बरीच पावले पुढे गेले होते व स्त्रिया बरीच पावले मागे आल्या होत्या. त्यांच्यात प्रेक्षकांचे डोळे उघडतील एवढं अंतर पडलं होतं.

हे खरं आहे की काही स्त्रियांना अर्थशास्त्र आवडत नाही परंतु बहुसंख्य स्त्रिया ते काम आपलं नसून पुरूषांचं आहे असं मानतात. निर्णयाचे अधिकार बहुतांशी पुरूषांकडे असल्याने पुरूष आपल्या कमाईबरोबरच घरातील सगळी, अगदी कमावत्या स्त्रीच्या आर्थिक व्यवहारांचीही जबाबदारी घेतात. बहुतेक बायका ’हे ’ सांगतील तिथे सही करतात. इथे विश्वास असणं वेगळं आणि आणि एक सक्षम ,स्वतंत्र व्यक्ती म्हणून आर्थिक व्यवहाराकडे डोळसपणे पाहणं वेगळं.आता स्वत:ला पुन्हा प्रश्न विचारूया. कुठे आहे स्त्री-पुरूष समानता ! 

काही पुरूष ’आमच्याकडे आहे की समानता, घरातल्या बायकांना आम्ही सगळं स्वातंत्र्य दिलंय’ असं म्हणतात. मुळात स्वातंत्र्य देणारे हे कोण बुवा , ते जसे पुरूष जन्माला येताना घेऊन आले आहेत तसेच बायका देखील. ’माझा मुलगा- सून दोघं नोकरी करतात पण मुलगा सुनेला घरकामात बरीच ’मदत’ करतो’ असं कुणी कौतुकाने सांगत असलं की ऐकायला छान वाटतं. पण  घरकाम हे मुळात सुनेचं काम आहे हे इथे गृहित धरलेलं असतं. यातील तर्कदुष्टता अनेकांच्या लक्षातही येत नाही. 


समानतेच्या व्याख्येबाबत गोंधळ झाल्याने काही जण भरकटताना दिसतात. एका विवाहात वराने वधूकडून मंगळसूत्र घालून घेतले. लिंगभाव समानतेचा संदेश देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थी ’टाय आणि साडी डे’ ला साडी नेसून आले. यातून त्यांना अभिप्रेत असलेला संदेश गेला का! अजिबात नाही. तसं असतं तर गेली अनेक वर्ष सुटसुटीत वाटतं म्हणून मुली पुरूषी म्हटले जाणारे पोशाख घालत आहेत, मग तर समानता केव्हाच यायला हवी होती. समानता कपड्याच्या लांबीवर अवलंबून नसते हे न समजलेल्या मुलींबरोबरच, मुक्त वागण्याच्या नावाखाली सिगारेट, दारू पिणार्‍या मुलींची संख्याही वाढत चाललेली आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. परंतु हे तितकेच चिंताजनक आहे जेवढे एखाद्या मुलाने किंवा पुरूषाने सिगारेट किंवा दारू पिणे. समजा यामुळे कॅन्सर होणार असेल तर तो मुलगा-मुलगी असा भेदभाव करून शिरकाव करत नाही. मुलींच्या वागणुकीमुळे संस्कृती बुडणार असेल तर पुरूष कसेही वागल्यानेही ती तरणार नाही. परंतु समाजाला स्त्रीच्या चारित्र्याची जेवढी काळजी आहे तेवढी पुरूषाच्या चारित्र्याची नाही. का! त्याला मूल होत नाही म्हणून! समाजाच्या प्रत्येक घटकाचे चारित्र्यनिर्माण सारखेच महत्वाचे आहे या जाणीवेला समानता म्हणता येईल.


खरं म्हणजे संवेदनशीलता, कणखरता हे मानवी गुण आहेत. निसर्गाने स्त्री-पुरूषांच्या शरीररचनेत फरक केला आहे. काही अंशी शारिरिक क्षमतांबाबतही परंतु माणूस म्हणून कोणताही भेद ठेवलेला नाही त्यामुळे बाकीचे फरक समाजनिर्मित आहेत.  पिढ्यानपिढ्या संवेदनशीलता जपावी लागल्याने, अपत्यसंगोपनामुळे स्त्रियांमधला तो गुण वाढीस लागला. घरचं ’सगळं’ नीट सांभाळून तू हवं ते कर, अशी परवानगी(!) हल्ली स्त्रियांना दिली जाते. साहजिक ती जेव्हा अर्थार्जनासाठी घराबाहेर पडते तेव्हा तिच्या मनात आपले घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना असा अपराधभाव असतो. याउलट पुरूषाला पिढ्यानपिढ्या ’रडतोस काय मुलीसारखा’ म्हणत स्वत:तील संवेदनशीलतेला आवर घालण्याचं बंधन घालण्यात येतं. त्याच्यावर सतत मर्द असण्याचं, यशस्वी होण्याचं दडपण असतं. परिणामी त्याच्यातील कणखरभाव वाढीस लागतो.

परिस्थितीनुसार कित्येक स्त्रिया कणखरतेचा आणि कित्येक पुरूष संवेदनशीलतेचा प्रत्यय देतात. तेव्हा हे गुण येतात कुठून! ते त्यांच्यातच असतात पण सुप्तावस्थेमध्ये. स्वत:मधील हे दोन्ही गुण ओळखून त्याचा हवा तेव्हा हवा तसा वापर करण्यासाठी अनुकूल स्थिती जो समाज देऊ शकतो त्याच समाजाला आमच्याकडे ’स्त्री-पुरूष’ समानता आहे’ असं म्हणण्याचा अधिकार आहे. तरच लिंगभाव समानतेकडून परस्पर-पूरकतेकडे स्त्री-पुरूष वाटचाल करू शकणार आहेत.  

अर्धनारीनटेश्वराचे प्रतीक पूजणार्‍या आपल्या समाजाला याची आठवण राहावी हेच महिलादिनाचे खरे प्रयोजन. 

https://www.evivek.com/Encyc/2023/3/13/Women-s-Day-From-Equality-to-Complementarity.html?fbclid=IwAR2q3RHVIjmNFwYt24aLk2Z3JYhwZ9tNOugp-lyHj-HyxUKLOAPpbWmXfEk


Saturday, March 11, 2023

ठरवून केलेला उपमर्द !

कर्नाटकातील बेंगळुरू येथील आयपीएस अधिकारी डी. रूपा आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. सिंधुरी यांनी तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना आपले फोटो शेअर केले आणि त्यामुळे सेवा आचार नियमांचे उल्लंघन झाले आहे असा डी. रूपा यांचा आरोप आहे. ते फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करून रुपा यांनी सिंधुरी यांच्या विरोधात वक्तव्य केल्यावर प्रकरण न्यायालयात पोचले आहे. कोणतीही चौकशी समिती नेमण्याआधीच या दोघींची व रूपा यांचे आएएस पती मुनीश यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दोघींना आधीच्या पदावरून काढण्यात आले असून नवे पद मात्र देण्यात आलेले नाही. गंभीर घटनांबाबत कारवाई करताना बर्याचदा दिरंगाई करणार्या प्रशासनाने ही कारवाई इतक्या तत्परततेने का केली असावी ! या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, "हा दोन बायका आणि अधिकार्यांमधला वाद आहे." वैयक्तिक फोटो शेअर करताना पदाचे आणि नियमांचे भान राखायलाच हवे तरीही इथे काही प्रश्न उपस्थित होतात. बहुतेक माध्यमांनी या भांडणाचा ’कॅटफाईट’ असा उल्लेख केला आहे. ’बायकांनी नळावर एकमेकींच्या झिंज्या उपटत केलेले भांडण’ या अर्थी साधारणपणे असा शब्द इंग्रजीत वापरला जातो. उच्चस्तरीय परिक्षा उत्तीर्ण करून या स्थानावर पोचलेल्या पुरुष अधिकार्यांमध्ये असे काही घडले असते तर मुख्यमंत्री आणि माध्यमांच्या दृष्टीने तो फक्त दोन अधिकार्यांमधला वाद ठरला असता की दोन ’पुरुष’ अधिकार्यांमधला ?

’कॅटफाईट’ या माध्यमांच्या आवडत्या शब्दासारखेच आपल्याकडील राजकारण्यांचे आवडते वाक्य म्हणजे ’आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत’. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर करताना विरोधकांचा समाचार घेताना हे वाक्य वापरले होते. डान्सबारबंदी आणणार्या आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित यांनी "आबांच्या कार्यकर्त्याला जर हात लागणार असेल तर आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत" असे भाषणात सुनावले होते. मशिदीवरील भोंगे प्रकरणात अबू आझमींनी प्रत्युत्तरात हेच वाक्य वापरले. किती उदाहरणे सांगावी !
स्त्री सन्मान करणार्या शाहू-फुले-आंबेडकर-कर्वे यांची नावे घेतल्याशिवाय ज्यांचे भाषण पूर्ण होत नाही त्यांच्या हे गावीही नसावे की आपले वक्तव्य अयोग्य आहे. बांगडी हा भारतीय स्त्रीचा दागिना आहे. आज शहरी स्त्रीसाठी तो घालणे न घालणे हा वैयक्तिक आवडीचा भाग असला तरी ’बांगडी’ हा शब्द बायकांशी थेट निगडीत आहे.
या देशातआत्मभान जागे असलेल्या अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. तरीही ’बांगड्या भरणे’ म्हणजे कर्तृत्वशून्यता, पळपुटेपणा असे का मानले जावे !
दुर्दैव म्हणावे की विनोद, पुरुषसत्ताक मानसिकता समाजात इतकी भिनली आहे की बहुतेक राजकीय पक्ष्यांची महिला आघाडीच विरोधी नेत्याला ’बांगड्यांचा आहेर’ पाठवण्यात आघाडीवर असते. विरोधकाची अवहेलना करण्याच्या नादात आपण आपलाच अपमान करत आहोत हे ही त्यांच्या लक्षात येऊ नये!
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करताना ‘सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा’ असे वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यंतरी केले होते. यावर टीका होऊ लागताच "सुळे यांच्यासह अन्य महिलांविषयीही माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे" असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी निदान दिलगिरी व्यक्त केली किंवा त्यांना करावी लागली पण आपल्या बोलण्यातले संदर्भ कालबाह्य व चुकीचे आहेत याचा अनेक नेत्यांना पत्ताच नसतो. नारायण राणे यांना वांद्रे पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी पराभूत केले होते. राणे यांच्यावर टीका करताना अजितदादा पवार म्हणाले, "मुंबईत त्यांना चक्क महिलेने हरविले".पुरुषाने पुरूषाचा केलेला पराभव ही हार आहे पण महिलेने केलेला पुरूषाचा पराभव म्हणजे नामुष्कीच, नाही का!
काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ’हनुमान चालीसा’ प्रकरणात "मर्द असाल तर मला अडवून दाखवा" असे आव्हान नारायण राणे यांनी दिले होते. "मर्द असाल तर समोर या" असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले होते. ’मर्द असाल तर’ हे या काही वर्षातले राजकारण्यांचे सर्वात आवडते सलामीचे वाक्य आहे. पुढच्याच वाक्यात तमाम माताभगिनींना अभिवादन करणार्य़ांना आपल्या या शब्दप्रयोगात काहीच खटकू नये !
आपल्या प्रखर भावना व्यक्त करायला ’हिंमत असेल तर’ असा लिंगभावापलीकडचा शब्द त्यांना किंवा त्यांच्या बॅकऑफीसला सुचू नये !
अशा शब्दांचा गर्भितार्थ समजून घेऊन त्याचा वापर निदान महिलांनी टाळायला हवा तर तसेही नाही. तिथे नेमकी समानता आहे. "मर्द असाल तर कोर्टात माझ्याविरोधात लढा" असे अंजली दमानिया एकनाथ खडसेंना म्हणतात. "मर्द असाल तर देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका" असे अमृता फडणवीस म्हणतात. "मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करु नका " असे ऋता आव्हाड म्हणतात.
पदाला अपेक्षित असलेली कामगिरी हिरीरीने पार पडत असताना, स्त्रीत्वाचा कोणताही उपमर्द झालेला नसताना ’बाई’ असल्याचे कवच अकारण ओढून घेण्याची आवश्यकता यांना का वाटत असावी !
याचे कारण समाजाच्या नेणीवेत आजही रूतून बसलेला लिंगभेद. स्त्री किंवा पुरूष म्हणून जन्माला येण्यावर व्यक्तीचे लहानमोठेपण अवलंबून नसते. हे जग फक्त पौरूषावर तरणार नसून स्त्री-पुरूषांच्या परस्परपूरकतेवर त्याचे अस्तित्व आणि सौंदर्य अवलंबून आहे. हे समजून घेऊन समाजाला ज्यांनी दिशा द्यायची त्याच नेत्यांनी आणि माध्यमांनी अभावितपणे किंवा हेतूपुरस्सर अशी जुनाट प्रतीके, शब्दयोजना वापरल्याने लिंगभेदाला उलट प्रोत्साहन मिळते. त्याहून गंभीर बाब म्हणजे सर्वसामान्यांना ते ’नॉर्मल’ वाटू लागते. माध्यमांच्या मांडणीचा व राजकीय व्यक्तींच्या बोलण्याचा समाजावर थेट प्रभाव पडत असतो. त्यांचे अनुयायी नकळत तीच भाषा बोलू लागतात, तेव्हा आपल्या जबाबदारीचे भान त्यांनी राखायलाच हवे. लिंगभाव समानतेचे धोरण कागदावरून कृतीत येईल तेव्हा येवो ,आधी ते किमान शब्दात तरी यायला हवे. तसे घडले तर कोणत्याही व्यक्तीला माणूसपणाच्या पातळीवर समानतेने आणि आदराने वागवणे इतके अवघड होणार नाही. अन्यथा महिला दिन नुसते येतील, जातील आणि ’पुरुषांनी घरी भांडी घासण्यावरून’ केलेले केविलवाणे विनोद आजच्या युगातही ह्या ह्या च्या इमोजींसह फॉरवर्ड होत राहतील.

Published in महाराष्ट्र टाईम्स ’मैफल’ शनिवार ११ मार्च २०२३

Monday, November 21, 2022

ज्यूस

 

’ज्यूस’ हा २०१७ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झालेला फिल्मफेअर विजेता लघुपट तुम्ही पाहिला आहे का! 

एका मध्यमवर्गीय स्त्रीची तेरा मिनीटात सांगितलेली ही अंतर्मुख करणारी कथा आहे. एका संध्याकाळी एका घरी मित्रपरिवार सहकुटुंब जमलेला आहे. सगळे पुरुष मित्र बाहेरच्या खोलीत कुलर लावून ड्रिंक्स घेत, स्टार्टर्स खात, गप्पा मारत ऐसपैस बसले आहेत. मुलं बेडरुममध्ये खेळत आहेत.आहेत. मित्रांच्या बायका मंजू (शेफाली छाया) म्हणजेच यजमानीण बाईला हातभार लावायला म्हणून तिच्या काहीशा कोंदट स्वयंपाकघरात जमल्या आहेत. कामाच्या धांदलीमुळे, गॅसवर सतत पदार्थ शिजत असल्यामुळे आणि ४,५ बायकांची गर्दी झाल्याने आत प्रचंड उकडते आहे.

काम सुसह्य व्हावे म्हणून मंजूने माळ्यावरून काढलेला टेबलफॅन जेमतेम सुरु होऊन बंद पडला आहे. बायका हवालदिल झाल्या आहेत. मंजू बाहेर येऊन "पंखा सुरू होत नाहीये, जरा बघता का" असं नवर्‍याला हलक्या आवाजात सांगते. तो ’हो’ म्हणून पुन्हा गप्पांमध्ये दंग होतो. यांच्या गप्पांचे विषय म्हणजे ऑफीसमधल्या सह्कारी महिलेबद्द्ल गॉसीप, पाचकळ विनोद, आंतरराष्ट्रीय राजकारणाची आपल्याला खूप समज असल्याचे भासवणार्‍या चर्चा तर आत बायकांचे गप्पांचे विषय म्हणजे घर, स्वयंपाक, मूल झाल्यावर नोकरी सोडणे योग्य आहे की नाही वगैरे. विषयांमधला फरक नोंद घेण्यासारखा आहे.

इकडे आतला उकाडा वाढत चालला आहे. स्वैपाक होत आल्यावर यातली एक बाई बेडरूममध्ये डोकावून आपल्या लहान मुलीला "आता खेळ पुरे, आधी तुझ्या भावांना वाढ" असं जरबेच्या आवाजात सांगते. हे ऐकून मंजूच्या डोक्यात तिडिक गेलेली आहे. बाहेरून नवर्‍याच्या "मंजू, आता जेवायचं बघ जरा" अशा हाका सुरु आहेत. आतल्या बायकांपैकी एक तरुण बाई गर्भवती आहे. तिने नोकरी सोडली नाही तर तिच्या बाळाकडे कोण बघणार हा विषय सुरु आहे. आपण नाही का मुलांसाठी नोकरी सोडली, असं एक बाई म्हणताच मंजू उद्वेगाने विचारते, "जे आपण केलं ते हिनेही केलंच पाहिजे का?" मंजू पुढे उपहासाने म्हणते " अर्थात डायपर तर आईनेच बदलला पाहिजे, वडील हातातला रिमोट सोडून ते काम कसे करतील!" 


हा तिचा तिसरा आणि शेवटचा संवाद आहे. बाकी सगळं तिची नजर बोलते. आधी थंड, मग असहाय्य, मग क्रुद्ध. आता तिला हे सगळं असह्य झालेलं आहे. ही एक घटना नव्हे, पुरुषसत्ताक पद्धतीत घुसमटलेलं अवघं जगणंच. मंजू खाटकन गॅस बंद करते. फ्रीजमधला ज्यूसचा जार घेऊन बाहेर येते. कुलरच्या झोतात एका खुर्चीवर पुरुषांमध्ये येऊन बसते. तिच्या अचानक येण्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नवरा आश्चर्याने व काहीशा रागाने तिच्याकडे बघतो आहे. ग्लासमध्ये ज्यूस ओतून भरल्या डोळ्यांनी एक तीव्र आणि अर्थपूर्ण कटाक्ष ती नवर्‍याकडे टाकते आणि डोळे मिटून जगाची पर्वा न करता शांतपणे थंडगार ज्यूसचा एक एक घोट घेऊ लागते. इथे लघुपट संपतो. मंजू भांडत नाही, ओरडत नाही, कुणाला काहीही ऐकवत नाही. तिला काय म्हणायचं आहे हे तिच्या नजरेवरुन नवर्‍याला कळतंच पण आपल्यालाही त्या मूक स्फोटामागची धग, तडफड आतपर्यंत जाणवते. 

हा लघुपट फक्त स्क्रीनवर नाही तर थोड्या फार फरकाने बहुसंख्य मध्यमवर्गीय घरात घडत असतो. आर्थिक स्थितीनुसार जागा, सोयी कमी जास्त असतात पण आत बायका राबतायत आणि पुरुष एकत्रीकरणाचा आनंद घेत आहेत हे चित्र सर्वत्र दिसते. अर्थात याला अपवाद असू शकतात आणि यावर आक्षेपही. 

शहरी सुशिक्षित घरातल्या  लहान कुटुंबात हल्ली पुरुष मदत करताना दिसतात, काही पुरुष भाजी, किराणा, खाद्यपदार्थ किंवा आवश्यक वस्तू आणून देणे किंवा ऑनलाईन मागवणे या स्वरुपाची मदत करताना दिसतात. क्वचित एखादा विशेष पदार्थ करतात. बायकोला यापेक्षा जास्त मदत केली तर लोक नावं ठेवतीला अशी भीती काही पुरुषांना वाटते. न पेक्षा या सकारात्मक बदलाचं निश्चितच स्वागत करायला हवं परंतु माझा नवरा, भाऊ किंवा वडील मदत करतात म्हणजे आता सगळंच बदललं आहे असा निष्कर्ष काढणं बालीशपणाचं ठरेल. 

मुळात ’मदत’ या शब्दातच गोम आहे. आपण एखाद्याला मदत करतो म्हणजे ते काम ज्याचे आहे त्याचा भार हलका करतो. इथे आपली भूमिका संपते. परंतु त्या कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवरच असते. जोवर जबाबदारीचा निम्मा वाटा उचलला जात नाही तोवर त्याला न्याय्य श्रमविभागणी म्हणता येणार नाही. 

मुख्य आक्षेप हा असतो की पुरुषांनाही बाहेर राबावंच लागतं न! त्यांना पण त्यांचं काम करताना कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून ’ज्यूस’ मध्ये दाखवलंय तसं स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. निम्न व मध्यमवर्गीय स्त्रियांना मात्र अव्याहत चालणार्‍या कामातून उसंत मिळत नाही. त्यांच्या कामाला सुट्टी अशी नाहीच. सगळी कामे इतरांवर ढकलून स्वत: काहीही न करणार्‍या आयतोबा स्त्रियाही असतात. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मध्यमवर्गात मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांना त्याचा उपयोग कमावण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी करावासा वाटतो. त्यासाठी सासरचे ’परवानगी’ तर देतात पण तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. या दडपणामुळे सवड काढून त्या कुठे गेल्याच तर राहिलेली कामं त्यांच्या डोळयासमोर नाचू लागतात. थोडक्यात हे तुझंच काम म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो, त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्‍या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड वैताग येऊ शकतो. 

याउलट घरकाम, स्वैपाक हे बाईचंच काम असल्याचं पुरुषांबरोबरच कित्येक बायकांच्याही मनात इतकं खोलवर रुजलेलं आहे की त्यांनी ’राबणं’ हे आपलं प्राक्तन म्हणून स्वीकारलेलं असतं. खेड्यात नवर्‍याच्या बरोबरीने शेतात काम करून दमून आलेली स्त्री घरी परतल्यावर लगबगीने भाकरी थापायला घेते. ऑफीसमधून येताना भाजी ,वस्तू घेत थकून आलेली मध्यमवर्गीय स्त्री  कुकर लावायला घेते एवढाच काय तो फरक. तिच्या दिमतीला मिक्सर, मायक्रोवेव्ह सारख्या सुविधा आल्याने ’तिला असतंच काय काम! ’ असा अनेकांचा ग्रह असतो. गृहिणी असेल तर मग तिच्याकडे काय, वेळच वेळ असतो असा सार्वत्रिक समज असतो. प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने गृहित धरण्याचा तिला अधिक त्रास होतो. कधीतरी तिचा ’मंजू’चा झाला तसा उद्रेक होतो. त्याचे दूरगामी परिणाम मुलांवर, घरावर, नातेसंबंधांवर आणि अखेर समाजावर होताना दिसू लागले आहेत. 

नुकतेच गौरी-गणपती पार पडले. एक मध्यमवयीन मैत्रिण म्हणाली ,"माझ्याच्याने आता ही दगदग सहन होत नाही पण घरी इतक्या वर्षांची प्रथा आहे ती मोडणं मनाला बरं वाटत नाही. इतर नातलग बायका ’मदत’  करतात, तरीही सगळी तयारी करणं, इतक्या जणांची सोय करणं, नैवेद्यासह सगळं यथासांग पार पांडणं याने मी इतकी थकून जाते की मला वैद्यकीय उपचार घ्यायची वेळ येते. त्यामुळे सणवार जवळ आले की माझ्या पोटात खड्डाच पडतो." काही सुपरवुमन व्हायच्या आकांक्षेने पछाडलेल्या स्त्रियांचा अपवाद वगळला तर हे प्रातिनिधीक चित्र म्हणता येईल. सुजाण स्त्रिया यावर जमतील तसे उपाय शोधतात. अनावश्यक कर्मकांडाला परिस्थितीनुसार फाटा देतात, काही गोष्टी विकत आणण्यात कमीपणा मानत नाहीत. एखादी गोष्ट राहिली, पर्फेक्ट झाली नाही तरी त्रास करून घेत नाहीत, आपल्यावाचून घराचं अडत नाही याची खंत न करता मुलांना स्वावलंबी बनवतात. पण अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अद्याप कमी आहे. शिवाय त्यांना बेजबाबदार, आळशी वगैरे विशेषणं स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. 

बहुतेक पुरुष मात्र यावर उपाय शोधण्याऐवजी ’तू दुर्गा तू अन्नपूर्णा, तू अमुक ..... तुला वंदन’ असे मढवलेले मेसेज सोशल मिडीयावर पाठवले की आपण स्त्रियांना आणि त्यांच्या कष्टांना पुरेसा आदर दर्शवला आहे असे मानून निश्चिंत होतात. (काही भाबड्या बायका पण खूष होतात आणि आणखी चार डबे घासायला काढतात.) 

हे कमी की काय म्हणून परवा एक मेसेजमध्ये वाचलं ’जाहिरातीत दागिने ल्यालेल्या, हसर्‍या, सुंदर स्त्रिया दाखवतात पण घरात दिवाळीची साफसफाई, फराळाची तयारी करताना घामेजलेली, केस विस्कटलेली स्त्री कुणीच दाखवत नाही’. इथपर्यंत तो मेसेज स्त्रियांच्या श्रमाकडे लक्ष वेधतोय असं वाटलं. पुढे लिहिलं होतं "नकोय त्यांना तुमची मदत, फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. एखादं ग्रिटींग, चॉकलेट त्यांच्यासाठी राखून ठेवा मग बघा दिवाळी कशी झक्कास जाते ते". 

धन्य आहे! तुम्ही कोण ठरवणारे की यांना मदत नकोय. नुसत्या शाब्दिक जाणीवेचं काय लोणचं घालणार! या ग्रिटींग, चॉकलेटच्या कौतुकाने बाईचा थकवा गायब होणार आहे का! आवडीनुसार काही वेगळं करायला तिला सवड मिळणार आहे का! निम्मी जबाबदारी घ्यायला हवी खरं तर तुम्ही. घरी केलेलेच लाडू आवडतात तर एकदा स्वत: अर्धा तास गॅसपाशी उभं राहून तूप सुटेस्तो पीठ भाजून पाहा. कामं ,फराळ करून दमलेल्या बायकांना त्या रात्रीचा स्वैपाक करून गरम, आयतं जेवायला वाढा. एका खोलीची पूर्ण सफाई करा. ती असेल खरी जाणीव. सुरुवात तर करा. (जे करतात त्या मूठभर मंडळींनी यातून स्वत:ला वगळावं) 

घरोघरच्या मंजूंना व्हॉट्सअ‍ॅपवरचे हारतुरे, कौतुकाचे भारे नको आहेत. प्रत्यक्ष साथ हवी आहे. कृतीतून सन्मान हवा आहे. घर सगळ्यांचं असेल तर कामंही सगळ्यांची असायला हवी इतका हा सोपा नियम आहे. आपली आवड, कौशल्य, वेळ, गरज याचा समन्वय साधून कामं वाटून घेतली तर घराघरातल्या मंजूलाही बाहेरच्या खोलीतल्या जगाकडे उघडणार्‍या खिडकीत बसून गप्पा मारता येतील. सर्वांबरोबर बसून 'ज्यूस' किंवा फराळाचा आस्वाद घेता येईल. अशी समाधानी मंजू जाहिरातीतल्या स्त्रीपेक्षा सुंदर दिसेल. 

published in Madhurima Divya Marathi November 2022

Tuesday, March 1, 2022

'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख


महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास म्हणजे गेल्या शतकातलं महाराष्ट्रातलं व्युत्पन्न चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ’चालतेबोलते विद्यापीठ’ असा त्यांचा उल्लेख बापूजी अणे करत. नवीन पिढीलाच काय आपल्या पिढीलाही त्यांची विद्वत्ता, व्यासंग, पांडित्यपूर्ण साहित्यनिर्मिती, ओजस्वी वक्तृत्व, मूलगामी राष्ट्रचिंतन, सांस्कृतिक-प्रबोधनाचं अतुलनीय कार्य याची फारशी माहिती नाही.
जन्मशताब्दी निमित्ताने महामहोपाध्याय बाळशास्त्रींच्या साहित्याचा परिचय नव्या पिढीला करून देणार्या 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथाचं लोकार्पण मुंबई इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झालं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
प्रख्यात वक्ते, अग्रणी लेखक श्री.आशुतोष अडोणी हे या ग्रंथाचे संपादक. बाळशास्त्रींनी ’भारतीय जीवनादर्श’च्या माध्यमातून रामायण व महाभारतातील व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. यातल्या स्त्री व्यक्तिरेखांबद्दलचं माझं आकलन मी लेखातून मांडलं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाज्ज्वल्य देशाभिमानी आणि वक्तादशसहस्रेषु म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळशास्त्री हरदास यांना महामहोपाध्याय, वेदान्ततीर्थ, काव्यतीर्थ, साहित्याचार्य अशा अनेक उपाध्यांनी का ओळखले जात असावे याची चुणूक दाखवणार्‍या त्यांच्या अनेक वाड्मयीन शिल्पांमध्ये ’भारतीय जीवनादर्श माला’चा समावेश होतो. बाळशास्त्रींनी यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने प्राचीन वाड्मयातील विशेषत: महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. श्रीमन्महाभारतावरील व्याख्यानांच्या सत्रात त्यांनी महाभारतीय स्वभावचित्रे उलगडताना गांधारी, कुंती व द्रौपदी अशा तीन स्त्रीरेखा चित्रित केल्या होत्या. पुढे त्याच मालिकेत सावित्री, कुंती यांचा त्यांनी समावेश केला. त्यांच्या रामायणावरील ग्रंथात ’एक स्वर्गीय पुष्प’ या शीर्षकांतर्गत सीतेचे स्वभावचित्र आलेले आहे. १९७५ हे स्त्रीवर्ष म्हणून घोषित करण्य़ात आले होते. त्याचे औचित्य साधून या सर्व स्त्रीस्वभावरेखांचा संग्रह ’भारतीय जीवनादर्श’ (भाग १) या नावाने प्रसिद्धीस आला. बाळशास्त्रींच्या सुविद्य पत्नी वीणाताई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "महाभारत हा इतिहास आहे की केवळ एक काव्य, त्यातील घटना खर्‍या आहेत की काल्पनिक याचा आपल्याशी संबंध येत नाही. जीवनाचा श्रेष्ठ ध्येयवाद निश्चित करणारा तो ग्रंथ आहे. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून ज्या अनेक व्यक्ती चित्रीत झाल्या त्यातील काही प्रमुख शास्त्रीबुवांच्या लेखणीनं रेखाटल्या आहेत. त्या आजही आपल्याला पथदर्शक ठरतील अशी त्यांची धारणा आहे." दुर्गुणांचा अतिरेक झाला तर विनाश अटळ असतोच पण सद्गुणांचा अतिरेक झाला तरीही कार्य नासतं हेच व्यासमहर्षींनी महाभारतातल्या विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे. या मुद्द्याचा विचार करता प्रस्तुत पुस्तकातील स्त्रीव्यक्तिरेखांमधील बहुतेक व्यक्तिरेखा धर्मकार्पण्य़ाच्या बळी ठरलेल्या दिसतात. धर्म आणि तत्त्वज्ञान यांनी सामर्थ्याला नियंत्रित करण्य़ाऐवजी सामर्थ्यच त्यांना नियंत्रित करू लागले. अधर्माचे तम दाटले आणि दिशा अंधारल्या. या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या या स्त्रीव्यक्तिरेखा एखाद्या विद्द्युल्लतेप्रमाणे भासतात. प्रथदर्शनी त्या हतबल वाटतात परंतु लेखकाचे अभ्यासपूर्ण विवेचन समजून घेत गेले की या स्त्रियांनी अधर्मशरणता ठामपणे नाकारत आपल्या धर्मशील आचरणाच्या तेजाने आपले केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर समाजमनदेखील झळाळून टाकलेले दिसते. स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. ’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ,रमन्ते तत्र देवत:’ हे आपले सांस्कृतिक गृहीतक मानले गेले. असे असले तरी प्रत्यक्षात वैर्‍यालाही देऊ नये अशी वागणूक या स्त्रियांना केवळ आप्तस्वकीयांनीच नव्हे तर त्या ज्यांना परमेश्वरस्वरूप मानत, ज्यांच्याशी या स्त्रियांचे आयुष्य गुंफले गेले होते अशा पतीनेही दिल्याचे चरित्रवर्णनात दिसून येते. अशा प्रसंगांच्या अग्नीपरिक्षेतून जाताना या स्त्रीव्यक्तिरेखांनी आपले स्त्रीत्व मात्र होरपळू दिले नाही हे बाळशास्त्रींच्या विवेचनातून प्रत्ययास येते. असामान्य गुणांच्या या शलाका त्यात लीलया उत्तीर्ण तर झाल्याच उलट त्यांच्या दिव्यत्वापुढे परिक्षा घेणारे खुजे ठरले. या स्त्रियांनी आपले स्त्रीत्व अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे नजर उचलून पाहणे सर्वसामान्यांना अशक्य व्हावे. ’महासती गांधारी’ या लेखातले बाळशास्त्रींचे सुरूवातीचेच वाक्य आपल्याला गांधारीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. ते लिहितात, ’दुर्योधनासारख्या कलिपुरूषाची माता आणि राजा धृतराष्ट्रासारख्या पाताळयंत्री खलपुरुषाची पत्नी होण्याचे दुर्दैव जिच्या वाट्याला आले ती महासती गांधारी भारतातील स्त्रीरत्नांच्या अग्रभागी शोभण्याच्या योग्यतेची आहे.’ श्रीशंकराची आराधना करून शतपुत्रप्राप्तीचा वर मिळवणारी गांधारी, ज्या अर्थी आपला पती सृष्टीच्या दर्शनसुखाला आचवला आहे त्याअर्थी त्याच्या सुखदु:खाशी एकरूप होणे हेच खरे विवाहबंधन मानून त्यासाठी आपले नेत्र कापडाने सदाचे झाकून घेणारी आणि त्याच्यासह आपला देह वनातील वणव्याच्या अग्नीत समर्पण करणारी दृढनिश्चयी आणि पतीपरायण गांधारी आपल्याला परिचित असते. परंतु आपल्या दिव्यदर्शी न्यायप्रियतेने वात्सल्याच्या स्वाभाविक मोहपाशावर मात करणा‍र्‍या गांधारीशी बाळशास्त्री आपला परिचय करू देतात. युद्धानंतर मृतावस्थेत धुळीत पडलेल्या दुर्योधनाकडे पाहून विलाप करणारी, ज्यांना धर्माचे आधारस्तंभ मानावे अशा पांडवांनी आपल्या पुत्रांना अधर्माने मारले हे पाहून चवताळून उठलेली, कुरूकुलनाशाला श्रीकृष्णाला जबाबदार संबोधून ’तुझ्या स्त्रियाही अशाच हतपुत्र व निहतबांधव अवस्थेत विलाप करतील’ असा घोर शाप देणारी विकलहृदयी माता हे गांधारीचं एक सर्वसामान्य रूप किंवा स्त्रीस्वभावाचे स्वाभाविक वैशिष्ट्य. राजसभेत संधीच्या वाटाघाटी चालू असताना न्याय व धर्म यांच्या नियमाप्रमाणे अर्ध्याच नव्हे तर सर्वच राज्याचे अधिपती पांडव असल्याचे- त्यांची मागणी न्याय्य असल्याचे दुर्योधनाच्या तोंडावर राजसभेला सुनावणारी गांधारी, युद्धाला प्रयाण करण्यापूर्वी दुर्योधन तिचा आशीर्वाद घ्यायला आला तेव्हा ’जिकडे धर्म त्या पक्षाचाच जय होईल’ असे तटास्थपणे ऐकवणारी गांधारी, ’काम-क्रोध जिंकील तोच पृथ्वी जिंकील आणि तोच राजधर्म आहे’ असा दुर्योधनाला भर सभेत उपदेश करणारी गांधारी, ही तिची असामान्य रूपे. तिला महाभारतात महाप्राज्ञा व दीर्घदर्शिनी अशी विशेषणे जोडलेली का आढळतात हे बाळशास्त्रींच्या लेखातून सप्रमाण स्पष्ट होते. ’राजमाता कुंती’ हा या पुस्तकातील दुसरा सविस्तर लेख. निर्जीव धनाप्रमाणे तिच्या पित्याने तिला कुंतिभोजाला देऊन टाकले. लहानपणी पित्याने व मोठेपणी श्वशुराने तिची वंचना केली. दुर्वासांनी तिला दिलेल्या वरदानामुळे औत्स्युक्यापोटी ज्यांना आवाहन केले ते सूर्यनारायण उपस्थित झाले आणि ’देवाचे दर्शन व्यर्थ न व्हावे’ या त्यांच्या आग्रहातून तिला तेजस्वी, कवचकुंडलमंडित कर्ण या पुत्राची प्राप्ती झाली. नकळत घडलेल्या या अपकृत्यामुळे लज्जित होऊन तिने त्या पुत्राचा त्याग केला. अर्जुनाने कर्णाला पहिल्या शस्त्रपरिक्षेत आव्हान दिले तेव्हा तिने कर्णाला ओळखले. त्याला भेटून तिने ’तू सूतपुत्र नाहीस, माझा पुत्र आहेस, कौन्तेय आहेस, तेव्हा तुझ्या बंधूंना संरक्षण दे’ अशा शब्दात त्याचा अनुनय केला. त्याच्या वधानंतर तरी त्याला सद्गती लाभावी यासाठी तिचे मातृहृदय तळमळत होते. कुंतीची ही कथा सर्वश्रुत आहे. बाळशास्त्री या राजमातेचे त्या पलिकडचे पैलू अधोरेखित करतात. अंत:करणात किंचितही सापत्नभाव न ठेवता माद्री या सवतीशी प्रेममय संबंध निर्माण करणारी कुंती, ’स्त्रीसंग केल्यास मरण ओढवेल’ या शापवाणीमुळे राजभोगाचा मोह सोडून पती पांडूला तपस्यामय जीवनात बरोबर राहू द्या म्हणून विनवणी करणारी कुंती, निपुत्रिकपणाच्या दुर्गतीतून पतीला वाचवण्यासाठी नियोग पद्धतीने तीन पुत्रांना जन्म देणारी व पतीनिधनानंतर माद्रीच्या दोन पुत्रांसह पांडवांचा ममत्वाने सांभाळ करणारी वत्सल विशालहृदयी कुंती बाळशास्त्रींनी या लेखातून चितारली आहे. ज्येष्ठ पुत्राच्या द्यूतप्रियतेमुळे राज्य गमावण्यापासून द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत झालेली अवहेलना पाहून तिचे अंत:करण शतश: विदीर्ण होऊन गेले परंतु त्याही स्थितीत तिने विजनवासात निघालेल्या द्रौपदीला खंबीर राहण्य़ाचे आवाहन करून धैर्याने निरोप दिला. तेरा वर्षे पुत्रवियोगाचे दु:ख भोगल्यावर अपमानाचा सूड घेऊन आपले पुत्र राज्य परत मिळवतील ही तिची रास्त अपेक्षा होती परंतु ते तर राहोच, आपले पुत्र केवळ पाच गावे मागून संधी करत आहेत हे कळताच प्रदीप्त होऊन उठलेली कुंती आणि तिचे ऐहिकापेक्षा पारलौकिकाचे आकर्षण बाळशास्त्रींनी अगदी नेमकेपणे मांडले आहे. आपल्या पुत्रांच्या हातून धर्म घडावा म्हणून शत्रूंनी केलेल्या उपहासाची, नालस्तीची आणि त्या विटंबनेचा सूड घेण्य़ाच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून दे, असा तेजोगर्भ निरोप श्रीकृष्णाला देणार्‍या कुंतीच्या वक्तव्यात पतित राष्ट्राचे उत्थापन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे असे बाळशास्त्री प्रतिपादित करतात. तरीही तिचे खरे वैशिष्ट्य त्यांना आढळते ते तिच्या अपूर्व त्यागात. वीरमाता म्हणून कर्तव्यपूर्ती करून युद्धात विजयी झाल्यानंतरही राजोपभोग घेण्याऐवजी पुढील कर्तव्य म्हणून कुंती, गांधारी व धृतराष्ट्र यांच्या शुश्रुषेत निमग्न राहिली. त्यांच्याचबरोबर तिने आपले शरीर वनातील वणव्यात समर्पित केले. कुंतीच्या जीवनप्रवासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात खर्‍या आर्यस्त्रीजीवनाची प्रचिती येते हे बाळशास्त्रींच्या वाक्यावाक्यातून प्रत्ययाला येते. आर्य स्त्रीच्या तेजस्वितेचा कुंती हा देदिप्यमान आणि दाहक असा अविष्कार त्यांनी प्रस्तुत केला आहे. युधिष्ठीराच्या धर्मकार्पण्याचे कुंतीहून अधिक करूणास्पद बलिदान म्हणजे द्रौपदी. अग्नीपासून उत्पन्न झालेल्या तेजस्विनी द्रौपदीच्या व्यक्तिवैशिष्ट्याची बीजे बाळशास्त्रींना तिच्या वैचित्र्यपूर्ण जन्मकथेत तर पुढील महाभारताची बीजे तिने तिच्या स्वयंवरात लक्ष्यवेधाचे आव्हान स्वीकारणार्‍या कर्णाला सूतपुत्र म्हणून रोखताना केलेल्या वक्तव्यात आढळतात. द्यूतात पराजय झाल्यानंतर रजस्वला स्थितीतील द्रौपदीची झालेली घोर विटंबना, तिचा करूण विलाप आणि पतींसह सर्व आप्तस्वकीय खाली माना घालून बसलेले असताना श्रीकृष्णानी केलेले तिचे लज्जारक्षण, विराटपर्वातील कीचकवध हा महाभारतातील भाग सर्वपरिचीत आहे. यापलिकडची ओजस्वी, क्षत्राणी द्रौपदी बाळशास्त्री रेखाटतात. या घटनांनंतर युधिष्ठीर आणि भीमाला अग्नीज्वालेसमान प्रखर वृत्तीच्या द्रौपदीने त्यांचे अंत:करण जळेल, त्यांच्या अस्मितेला चेतवेल असे स्फुल्लिंगासारखे तप्त, खडे बोल सुनावून निरूत्तर केले. गांधारीने तिला वर मागावयास सांगितला तेव्हा तिने युधिष्ठीराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला, धृतराष्ट्राने दुसरा वर माग म्हटले तेव्हा बाकी ४ पांडवांचे शस्त्रास्त्रांसहित स्वातंत्र्य मागितले आणि तिसरा वर माग म्हटल्यावर त्या महामानिनीने ’लोभ धर्माचा नाश करतो, स्वतंत्र झाल्यावर माझे पती स्वकर्तृत्वाने गेलेले वैभव परत मिळवतील’ असे क्षात्रधर्माला शोभणारे उत्तर दिले. द्रौपदीची व्यक्तिगत जीवनातली गृहकृत्यदक्ष वागणूक आणि तिचे सहजीवनासंबंधीचे विचार या लेखात तिच्या आणि सत्यभामेच्या संवादातून समोर येतात. तत्कालानुसार पती हाच परमेश्वर हे केंद्रस्थानी ठेवून या विचारांची मांडणी केलेली असली तरी त्या संवादातून झळकणारे तिचे अष्टपैलूत्व आणि आत्यंतिक परिपक्वता आपल्याला नतमस्तक करते. समकालीन गृहकलहांमधील अनेक प्रश्नांची उत्तरे द्रौपदीच्या प्रगल्भ विचारपद्धतीतून सहज मिळू शकतात. तिच्या व्यक्तिमत्वाचे हे असामान्यत्व बाळशास्त्री उलगडतात तेव्हा तिचा समावेश बाळशास्त्रींनी भारतीय जीवनादर्श मालिकेत का केला असावा याचे उत्तर मिळते. सीता व द्रौपदीची तुलना करताना बाळशास्त्रींनी म्हटले आहे," सीतेचे महनीय सद्गुण महासती द्रौपदीइतकेच उज्ज्वल आहेत, दोघीही अयोनिजा आहेत, परंतु त्यांच्या भाग्यरेषेत मात्र भिन्नता आहे. सीतेची दु:खे श्रीरामचंद्रांच्या दिव्य कर्तव्यनिष्ठेतून उद्भवली आहेत त्यामुळे दु:खाग्नीत देखील कर्तव्यपूर्तीसाठी बलिदान घडत असल्याचे समाधान सीतेला लाभले." सीता आणि रामचंद्रांचा देह जरी वेगळा असला तरी त्यांची हृदये एकरूप होती. त्यांचे रम्य दंपतीजीवन बाळशास्त्रींनी वर्णिले आहे. कैकेयीच्या वरानुसार भरताला राज्य मिळावे म्हणून श्रीरामचंद्रांना वनवास पत्करावा लागला तेव्हा तिच्या आदर्श वर्तनाने आणि चारित्र्याच्या दिव्यतेने जगाला भारले, प्रत्येकाच्या अंत:करणात तिच्याविषयी आदराची भावना उत्पन्न झाली. तिच्या वादकौशल्याचे, बुद्धीमत्तेचे आणि धर्मशास्त्रातील पांडित्याचे यथोचित वर्णन बाळशास्त्रींनी केले आहे. लोकापवाद टाळण्य़ासाठी व राजसिंहासनाची इभ्रत राखण्यासाठी श्रीरामाने गरोदर स्थितीतील सीतेचा जेव्हा परित्याग केला तेव्हा त्यांच्या कर्तव्यपालनामागील अगतिकत्व समजून घेण्याइतकी तिच्या हृदयातील विशालता बाळशास्त्रींच्या वर्णनातून अनुभूत होते. लवकुशांच्या जन्मानंतर तिचा स्वीकार करण्यापूर्वी अग्नीदिव्य करण्याची अट तिला श्रीराम निरुपायाने घालतात तेव्हा मात्र आपले निष्कलंकत्व पटवून देतानाच ती देवी वसुंधरेला आपल्या उदरात आश्रय देण्याचे स्वाभिमानी आवाह्न करते. देवी सीतेच्या दैवी चारित्र्याचा तितकाच भव्यदिव्य अविष्कार बाळशास्त्रींच्या लेखणीने घडवला आहे. या वर्णनांमधील अनेक स्तिमित करणार्‍या घटना या दंतकथा असू शकतात. मूळ कथानकावर थर पडत गेलेले असू शकतात. उदा: ज्ञात स्त्रोतांनुसार भारतात लोखंडी उपकरणे इ.स.पू. चौथ्या शतकापासून आढळतात पण प्रगत लोखंडाचा प्रभाव गुप्तकालीन म्हणजे इ.सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातला ठरतो. परंतु या स्त्रियांच्या संबंधित कथानकांमध्ये विशिष्ट धनुष्याचे उल्लेख येतात. त्यामुळे याकडे रुपक अर्थाने पाहणे तर्कसंगत ठरते. आचार्य विनोबा भावे यांनीही महाभारतातील गीतेला केवळ धार्मिक ग्रंथ न मानता कौरव आणि पांडवांमधील द्वंद्व म्हणजे आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं एक कविकल्पित रूपक मानलं आहे. बाळशास्त्रींच्या स्त्रीव्यक्तिरेखांच्या आयुष्यात देखील माणूस आणि मूल्य यांच्यामधला चिरंतन लढा सातत्याने दिसून येतो. या लढ्यात आपल्या मूल्यांशी सदैव प्रामाणिक राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍य़ा या स्त्रिया विलक्षण ठरतात. त्यासाठी त्यांनी जे सोसले, जो त्याग केला त्याचे वर्णन बाळशास्त्रींनी अत्यंत उत्कटपणे केले आहे. या स्त्रियांना आपल्या कर्तव्याचे भान आहे तितकीच हक्कांची जाण आहे. जीवनाची ओढ आहे तितकीच विवेक आणि मूल्यांच्या बदल्यात मिळणार्‍या अशाश्वत सुखसमृद्धीबद्दल अनासक्ती आहे. त्यांचे पती अनेकदा हे भान विसरले परंतु या तेजस्वी स्त्रियांनी आपले पाय सत्याच्या भूमीवर कायम स्थिरपणे रोवून ठेवले. प्रसंगी त्यांनी जगण्याच्या पारंपरिक मर्यादा अमान्य केल्या आहेत. स्वत:चे नवे क्षितिज निर्माण केले आहे. जसजशी यातील एक एक स्त्री आपल्या समोर बाळशास्त्रींच्या लेखणीतून तळपत सामोरी येते तसतसे तिच्या प्रतिभ दर्शनाने आपण दिपून जातो. पुस्तकातील इतर लेख तुलनेने लहान पण तितकेच अर्थगर्भ आहेत. सावित्री उपाख्यानाच्या कविला सर्वश्रेष्ठ महाकवि मानणार्‍या डॉ. विंटरनिट्झ यांच्या विचारांचे दाखले बाळशास्त्रींनी वेळोवेळी काही लेखात दिले आहेत. जडवादी पाश्चात्य मनावर ज्या भारतीय विचारांनी मोहिनी घातली आहे त्यात सावित्रीचा आदर्श सर्वोच्च आहे असे बाळशास्त्री म्हणतात. मद्रदेशाची राजकन्या असूनही ऐश्वर्यशील जीवनाचा मोह तिच्या अंत:करणात उत्पन्न झाला नाही तसेच मृत्युसारखी भयानक गोष्ट देखील तिच्या विलक्षण चारित्र्याच्या ध्येयवादाला बाधा उत्पन्न करू शकली नाही. बाळशास्त्रींच्या शब्दात सांगायचे तर, ’जीवनाचे चंदन जितके उगाळले जाईल तितका त्याचा परिमल अधिक दरवळेल हाच भारतीय स्त्रीजीवनाच्या व्रताचा विषय असलेल्या सावित्रीच्या जीवनाचा अर्थ आहे.’ पती सत्यवानावर मृत्युदेवतेने आपले पाश फेकल्यानंतर ऋजुता, बुद्धीचातुर्य, वाक्पटुत्व आणि दिव्यतेने तिने प्रत्यक्ष मृत्युला जिंकले. आपल्या कृतीने सावित्री भारतीय स्त्रियांच्या पूजास्थानी पोचली. सावित्रीची आत्मसाधना अलौकिक आहे. सावित्रीचे उपनिषद हे ज्ञानोपनिषद आहे त्याचबरोबर यावरील लेखातील बाळशास्त्री लिखित संवाद स्त्रीत्वाच्या केवळ पतीपरायणतेचा नव्हे तर तिच्या चातुर्याचा तसेच पतीपत्नीतील अनुबंधाच्या मांगल्याचा साक्षात्कार घडवणारे आहेत. उदा: द्यायचे झाले तर, तिला ’पतीच्या जीवनाव्यतिरिक्त हवा तो वर माग’ असे सांगणार्‍या मृत्युशक्तीच्या अधिष्ठात्याला सावित्री उत्तर देते, "मातृभावना ही स्त्रीजीवनाचे सांदीकोपरे व्यापून राहणारी भावना आहे. क्षत्रियाच्या कुळाला योग्य असे बलवान आणि पराक्रमी पुत्र मला असते तर मला समाधान लाभले असते." म्रुत्युदेवतेने तसा आशीर्वाद देताच तिला पेचात पकडत सावित्री विचारते," आपण मला शतपुत्रांची माता होशील असा वर दिला परंतु पतीचे जीवित देण्य़ास मात्र आपण सिद्ध नाही. आर्यधर्मानुसार माझ्या पात्तिव्रत्याला कलंक लागणार नाही असे मातृत्व मला मिळण्याची शक्यता कशी आहे?" या शब्दांनी भानावर आलेल्या देवाधिदेवांना मग मृत्युच्या पाशातून सत्यवानाची मुक्तता करणे भाग पडते. . नलदमयंतीआख्यानातील लावण्यवती विदर्भकन्या दमयंती तसेच शाकुंतलोपाख्यानातील दुष्यंताच्या प्रतारणेने घायाळ झालेली मानिनी शकुंतला, पुत्राला रणोत्साही करणारी महाभारतातील माता विदुला, या तिघींबाबत मात्र बाळशास्त्रींनी विवेचनाऐवजी रंजनवादी कथाकाराची भूमिका घेतल्याचे दिसते त्यामुळे कुंती, सीता, गांधारी, सावित्री आणि द्रौपदीइतके त्यांचे दिव्यत्व मनावर ठसत नाही. तरीही अंतिमत: बाळशास्त्रींच्या लेखणीने (होमरच्या ’इलियड आणि ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांपेक्षा सात पटीने) मोठ्या अवकाशाच्या- महाभारताच्या पार्श्वभूमीवरील या स्त्रियांच्या जीवनाचे आदर्शत्व ज्या अंगभूत प्रतिभेने अधोरेखित केले आहे त्यातून, मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही ज्याला व्यास कवेत घेत नाहीत अर्थात, ”व्यासोत्छिष्टं जगत्सर्वं’ या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आपल्या साहित्यात रामायण (आदर्शवादी) आणि महाभारत (वस्तुनिष्ठ) असे दोन साहित्यप्रवाह मानले जातात. बाळशास्त्रींनी या दोन्ही प्रवाहांच्या अंतर्गत गोफाची अतिशय व्यासंगी नजरेने नोंद घेतलेली दिसते. त्या ताण्याबाण्यात विणल्या गेलेलं भारतीय स्त्रीजीवनातील आदर्शांची संयमी तरीही परखडपणे केलेली मांडणी एक समाजशास्त्रीय, मनोवैज्ञानिक घटित असल्यामुळे अभ्यासनीय ठरते. विचारातील निस्संदिग्धतेमुळे मुख्य व्यक्तिरेखेबाबतचे समकालीन वास्तव मांडताना तसेच त्यांचे आदर्शत्व अधोरेखित करताना संस्कृती जतन- संवर्धनाच्या नावाखाली तत्कालिन परिस्थितीचे किंवा कोणत्याही व्यक्तिरेखांचे अकारण समर्थन किंवा उदात्तीकरण बाळशास्त्रींनी केलेले नाही. आदर्श व्यक्तिकडूनही मानव्याचा अनुस्यूत भाग असलेले काही अपराध होतात त्याला या स्त्रिया अपवाद नाहीत परंतु कसोटीच्या क्षणी त्यांचे असामान्य वर्तन त्यांना जीवनादर्शाच्या पातळीवर घेऊन जाताना दिसते. पौराणिक संदर्भात लिहिताना ललित शैलीचा अतिरेक, त्यामुळे होणारा सत्याचा अपलाप, भारतीय इतिहासातले-संस्कृतीतले सारे कसे महन्मंगल असे मानण्यातला बाळबोधपणा यापासून त्यांची विद्वतापूर्ण शैली दूर राहिली आहे. त्यांच्या प्रतिपादनांना व्यासंगाची, ज्ञानाची आभा आहे. ’साहित्यिक’ हा शब्द वाटेल तसा वापरला जाण्य़ाचा आजचा काळ. त्याचा बावनकशी अर्थ समजून घ्यायचा तर हे पुस्तक वाचायलाच हवं. बाळशास्त्रींची शैली हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांचा लेखनकाळ लक्षात घेता आजच्या सोशल मिडीयावरील मिंग्लीशच्या तुलनेत त्याची भाषा एखाद्या घरंदाज, भारदस्त व्यक्तिमत्वासारखी संस्कृतप्रचुर क्वचित दुर्बोध तरीही अतिशय आकर्षक वाटते. उदा: निषधाधिपती नलाबद्दल ते लिहितात,’ब्रह्मण्य, वेदवेत्ता, महान धनुर्धर, विजितेंद्रिय व सत्यवादी अशा या राजाची शाश्वत कीर्ती प्राचीन भारताच्या इतिहासात स्थिरपद झालेली असून पुण्यश्लोक पुरुषश्रेष्ठांच्या प्रात:स्मरणीय मालिकेत त्याला पहिले स्थान लाभले आहे.’ त्यांची एकेक विशेषणे कलदार नाण्य़ासारखी खणखणीत नाद करतात. श्रीराम-सीतेचे वनवासातील सुरुवातीचे रम्य सहजीवन बाळशास्त्रींनी अतिशय अलवारपणे रेखाटले आहे. श्रीराम सीतेला सभोवतालची माहिती देत आहेत, आपल्या पराक्रमांबद्दल सांगत आहेत आणि सीता आपल्या प्राणसख्याचे शब्द मनोभावे श्रवण करित आहे हा प्रसंग सांगताना सीतेच्या मुखावरील भावाचे वर्णन बाळशास्त्री त्यांच्या मोहक शैलीत असे करतात,’ सर्वांगाचे कान करुन आपल्या हृदयसंपुटात श्रीरामांचा प्रत्येक शब्द जपून साठवीत असताना अभिमानाच्या नव्या नव्या लहरींनी जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाची सहधर्मिणी म्हणवण्य़ाचे भाग्य लाभलेल्या त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर तांडव चालवले आहे हे दृश्यच किती हृदयंगम व अविस्मरणीय आहे.’ भरसभेत ओढून आणलेल्या द्रौपदीचा आक्रोश बाळशास्त्रींच्या लेखणीतून प्रकट होतो तेव्हा कारुण्यरसाबरोबरच तिचे शुचित्व आणि तिच्या धर्मविषयक संकल्पना अवघ्या काही शब्दांच्या योजनेतून ते लीलया साकार करतात, ’युधिष्ठीर धर्मबंधनाने बांधलेले आहेत. धर्म अत्यंत सूक्ष्म असून त्याचे रहस्य विचक्षणांनाही कळत नाही. या स्थितीतदेखील माझ्या पतींचे गुण सोडून त्यांच्या परमाणूएवढ्या सूक्ष्म दोषांचे अविष्करण करण्य़ाची माझी इच्छा नाही.’ परंतु बाळशास्त्री शैलीच्या मोहात गुरफटलेले नाहीत. लेखाच्या मुळात हिर्‍यासारख्या तेजस्वी गाभ्याला त्यांची शैली पैलू पाडते इतकेच. दुर्गाबाईंच्या शब्दात सांगायचं तर बासरी वाजवणारा बासरीत आपला श्वास ओततो तेवढ्याच आत्मीयतेने बाळशास्त्री हरदासांनी या स्त्रीव्यक्तिरेखा चितारल्या आहेत. महासती गांधारी, राजमाता कुंती, द्रौपदी, सावित्री, विदर्भकन्या दमयंती, विदुला, सीता आणि मनिनी शकुंतला या आदर्शवत् स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे बाळशास्त्रींच्या सिद्धहस्त लेखणीतून उजागर होतात. या स्त्रियांचे थोरपण हे त्यांच्या सम्राज्ञीपदात नसून जीवन ही केवळ आत्म्याची गतिमानता आहे हे जाणून घेऊन त्यातील आव्हानांना सामोरे जाऊन त्यातही अनंताचे दर्शन घेण्यात आहे, हे बाळशास्त्री दाखवून देतात. स्त्रीजातीचे सनातन तेज आणि विवशता टिपताना तत्कालिन राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध बाळशास्त्री घेतात. त्यातून त्या समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. अर्वाचीन समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.
---------------------------



Tuesday, December 29, 2020

कोविड- सरते वर्ष आणि भारतीय महिला

 २०२० हे वर्ष अवघ्या जगात प्रचंड उलथापालथ करून आता निरोपाच्या उंबरठ्यावर उभे आहे. कोविड प्रादुर्भावानंतर अनेकांनी जानेवारीत लिहायला घेतलेल्या डायर्‍या मार्चनंतर कोर्‍या सोडल्या किंवा अनेकांचे हाती घेतलेले संकल्प अपुरे राहिले. आधी लॉकडाउन आणि नंतरच्या अनलॉकचे समाजावार, अर्थव्यवस्थेवर, नातेसंबंधांवर खोलवर परिणाम झालेत. या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाने भारतीय महिलांना काय दिले आणि काय हिरावून नेले याचा हा लेखाजोखा. 

भारतात आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ७०% आहे. वेगवेगळ्या श्रेणींचा विचार केला तर नर्सेस आणि सुईणी यांचे प्रमाण तब्बल ८८.९% इतके आहे. कोविडशी लढा देताना या क्षेत्रातील बहुसंख्य महिलांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण महिला सरपंचांनीही आपल्य स्तरावर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. खरे तर प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका या महिलांना होता. दुय्यम लेखले गेल्याने भारतीय स्त्रीच्या आरोग्याबाबत समाजात आजही अनास्था दिसून येते. अशा परिस्थितीतही कोविडचा संसर्ग झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांच्या मृत्यूदरातला फरक चकित करणारा आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 73 टक्के पुरुष आहेत. महिलांमध्ये असणाऱ्या X क्रोमोझोममुळे त्यांच्याबाबत या विषाणूचा धोका कमी होत असावा याशिवाय भारतीय महिलांमध्ये पुरुषांपेक्षा ध्रूमपानाचे प्रमाण खूपच कमी असल्याने कॅन्सर, श्वसनसंस्थेचे आजार किंवा हृदयरोग यांचा धोकाही कमी असतो, ही त्यामागील कारणे असू शकतात असे अभ्यासकांचे मत आहे. 

मिशेल टेरटिल्ट या जर्मनीतल्या माईनहाईन विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ सध्या कोरोना संकटाच्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यामते येत्या काळात वाढत्या बेरोजगारीचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होणार आहे. एरवी मंदीची पहिली झळ पुरुषांना लागते कारण ते अर्थव्यवस्थेची मदार असलेल्या क्षेत्रात काम करतात तर महिला मात्र शिक्षण, आरोग्य, शेती आणि सेवा क्षेत्रात जास्त प्रमाणात काम करत असतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका याच व्यवसायांना जास्त बसत असल्याने महिलांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शेतीचा विचार केला तर ८० टक्के जमीन पुरुषांच्या नावे मात्र शेतातील ८० टक्के कामे स्त्रिया करतात. दुसर्‍याकडे शेतमजुरी किंवा औद्योगिक क्षेत्रात मजुरीचे काम करणार्‍या महिलांना, अगदी गर्भवती महिलांना सुद्धा वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मुलाबाळांसह पायपीट करत आपले गाव गाठावे लागले. उद्योग बंद झाल्याने कंत्राटीपद्धतीने दिल्या जाणाऱ्या पगारी रजांच्या धोरणाचा लाभ देखील त्यांना मिळू शकला नाही. बेताची पण दुहेरी कमाई असलेल्या अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये महिलांनी नोकरी गमावण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात करताना सुरुवात महिलांपासून केली. महिला घराच्या पोशिंद्या नसतात असे समाज आजही मानतो हे यावरून सहज लक्षात येईल. परंतु विजिगीषु वृतीच्या महिला राज्य ते राष्ट्रीय स्तरावर मास्क तयार करणार्‍या बचतगटांपासून ऑनलाईन क्लासेसपर्यंत आणि गृहोद्योगांपासून मधापासून वाईन तयार करणार्‌या विविध उद्योगापर्यंत विविध स्टार्टअप्स स्वत: सुरु करून परिस्थितीवर मात करत आहेत.  


अर्थात अनेक पुरुषांनीही नोकर्‍या गमावल्या आहेत किंवा पगारकपातीला तोंड दिले आहे. सतत घरी राहावे लागल्याने जिथे जागेची अडचण आहे, कुटुंबात जास्त सदस्यसंख्या आहे अशा घरातून विसंवाद, त्रागा वाढू लागला. खासगीपणावर मर्यादा आल्या. शाळाही बंद झाल्या. याची परिणीती म्हणजे बाललैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झालेली वाढ. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सहजसाध्य नसल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, विशेषत: ग्रामीण भागात, आधीपासूनच असलेले औदासिन्य आणि त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले. देशातील सर्वात जास्त बालविवाह होणार्‍या ७० जिल्ह्यात महाराष्ट्रातील १७ जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील २५ % विवाह हे बालविवाह असल्याचे वास्तव अतिशय गंभीर आहे. ज्येष्ठ किंवा एकट्या महिलांना असुरक्षित अवस्थेत दिवस काढावे लागल्याने नैराश्य, मनोविकाराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. 


२०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. घरातल्या महिलांना काहीवेळा मानसिक छळ तसेच लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे --लागले आहे. नारी समता मंचच्या अहवालानुसार लॉकडाऊनमध्ये १०% टक्के महिलांचा अमानुष छळ झाला. अर्थात सर्वेक्षण ऑनलाईन केल्याने इंटरनेट परवडू शकणारा सुशिक्षित वर्गच यात सहभागी होऊ शकला, १०% महिलांनी ’हिंसेत वाढ झाली आहे का’ हा रकाना रिकामा सोडला आहे. हे मौन पुरेसे बोलके आहे. शक्य ती कामे ऑनलाईन करण्याचे प्रमाण वाढल्याने महिलांविषयक सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या वर्षाच्या अखेरीस या संदर्भात आलेली सकारात्मक बातमी म्हणजे महिला व बालकांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, यासाठी राज्यसरकार 'शक्ती कायदा’ करणार आहे. या विधेयकानुसार बलात्कार, अॅसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी फाशीची शिक्षा प्रस्तावित केली आहे. याशिवाय समाजमाध्यमांवरून धमकावणे, बदनामी करणे, खोट्या तक्रारी करणे या नवीन गुन्ह्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २० मार्चला घडलेली एक मह्त्वाची व आश्वासक घटना म्हणजे निर्भयाला तब्बल ८ वर्षांनी मिळालेला न्याय. महिला वकील सीमा कुशवाहा यांनी प्रतिकूल स्थितीला ताकदीनिशी तोंड देत हा लढा अखेर जिंकला.


२०२० च्या मधल्या काळात हाताला काम नसल्याने सतत घरात पडून असलेल्या व्यसनी पुरुषांच्या अरेरावीमुळे व आर्थिक चणचणीमुळे दारिद्र्यरेषेखालील महिला मेटाकुटीला आल्या. 

त्यांच्या तुलनेने आपण सुखाचे चार घास खाऊ शकतो यात समाधान मानणार्‍या मध्यमवर्गीय महिलांनी सुरुवातीला हौस म्हणून नवनवे पदार्थ कुटुंबियांना खाऊ घातले. नंतर मात्र सततच्या फर्माईशींमुळे आणि स्वयंपाकाचा बोजा वाढल्याने त्या वैतागून गेल्या. गृहिणी असलेल्या महिलांनी नवरा-मुले आपापल्या कामाला गेल्यानंतर मिळणारा हक्काचा मोकळा वेळ गमावला. 

अर्थात या काळ्या ढगांना रुपेरी कडाही आहेत. भारतीय बायका दररोज सहा तास घरकाम करतात, तर पुरुषांचा हा वेळ आहे फक्त ५२ मिनिटे. 'करोना'मुळे घरात अडकून पडल्यामुळे हा वेळ चक्क वाढला, म्हणजेच मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि परिस्थितीची गरज म्हणून का होईना पुरुषांनी घरकामाला हातभार लावायला सुरुवात केली. मार्च ते डिसेंबर या काळात ’गरज- हौस- कौतुक- वैताग- जमल्यास मदत- वेळच नाही’ असे पुरुषांचे घरकामातील मदतीबाबत उत्क्रांतीचे टप्पे असले तरी किमान घरकाम कमीपणाचे नाही तसेच मदतनीस महिलांना किती कष्टाची कामे करावी लागतात याची जाणीव मात्र नक्कीच निर्माण झाल्याचे चित्र आता दिसते आहे. कामाचे वाटप करु शकलेल्या अनेक महिलांना आपले जुने छंद जोपासता आले. कुटुंबाला वेळ देता आला. नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेली मुले घरी राहत असल्याने आनंद आणि समाधानाचा अनुभव घेता आला.


मनोरंजन क्षेत्राला या वर्षी आर्थिक फटका बसला असला तरी महिलाकेंद्री विषय असलेले चित्रपट यशस्वी होण्याचे प्रमाण या वर्षी लक्षणीय आहे. ’गुल मकाई’ हा मलाला युसूफजाईच्या जीवनावरील चित्रपट वगळता दीपिका पदुकोनचा स्त्रियांवर होणार्‍या अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित ’छपाक’, संसारातल्या जबाबदार्‍यांमुळे कबड्डीपासून दुरावलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या महिला खेळाडूच्या कमबॅक वरील ’पंगा’, मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ’शकुंतलादेवीं’चा विद्या बालन अभिनीत बायोपिक, जान्हवी कपूरने साकारलेली कारगिल गर्ल ’गुंजन सक्सेना’, स्त्रियांना गृहित धरण्याबाबत भाष्य करणारा तापसी पन्नूचा ’थप्पड’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट यंदा गाजले. भारतीय महिलांनी याही वर्षी नवनव्या क्षेत्रात आपले नाव कोरले. क्रीडाक्षेत्रात मणीपूर पोलिस विभागातील बालादेवी ही एखाद्या नामवंत (स्कॉटीश जायंट रेंजर्स) फूटबॉल क्लबशी करार करणारी पहिली भारतीय महिला ठरली. डॉ. माधुरी कानिटकर यांची भारतीय सैन्यदलातल्या ३ र्‍या महिला लेफ्ट्नंट जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मिशन मंगळच्या पदाधिकारी रितू करिधल यांनी फोर्ब्सच्या सेल्फमेड महिलांच्या वार्षिक यादीत स्थान पटकावले. शिक्षण क्षेत्रात धुमाकूळ घालणार्‍या बायजू रवींद्रन यांच्या पत्नी व सहसंस्थापक दिव्यांका गोकुळनाथ यांनी २८०० करोड रु.चे रेव्हेन्यू टार्गेट साध्य केले. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची याच वर्षी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. कमला यांच्या मूळ भारतीय तमिळ आईची त्यावर प्रतिक्रिया होती ‘अनेक गोष्टी करणारी तू पहिलीच असणार आहेस. मात्र, तू शेवटची नसशील, याची खात्री द्यायला हवी.’ 

कठीण परिक्षा घेणार्‍या सरत्या वर्षाने जाता जाता ननवर्षाच्या शुभेच्छांसह भारतीय महिलांनाही हाच संदेश दिला असावा.  


*(लेखातील टक्केवारी ही युनेस्को, वर्ल्ड बॅंक तसेच नारी समता मंच सर्वेक्षण अहवालांनुसार दिलेली आहे)

-Published in Divya Marathi -Madhurima - 29/12/21


Friday, November 20, 2020

बदलत्या जाहिराती.. बदलती ’ती’

 

या कोविड काळातली टाळेबंदी सुसह्य व्हावी म्हणून नव्वदच्या दशकातल्या ’रामायण’ मालिकेचे पुन:प्रसारण करण्यात आले होते. त्यात सीतेची भूमिका करणार्‍या दीपिका चिखलीयाला पाहून तेव्हाच्या सात्विक, सरधोपट जाहिराती आठवल्या. "मान गएँ दीपिकाजी, आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोकों." मग स्मार्ट गृहिणी असणार्‍या सर्फच्या ’ललिताजी’ आठवल्या. ’भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे’ म्हणत जाहिरातींमध्ये हळूहळू छानसा बदल होत गेलाय हे ही जाणवले. आता शुभ्र कपड्यांमुळे कमावलेल्या आत्मविश्वासाने आपल्या रिक्षाचालक वडिलांची आपल्या बॉसशी ओळख करुन देणारी एखादी आधुनिक तरुणी, कार्यालयात लाच देऊ पाहणार्‍याला आपले कपडेच नाही तर चारित्र्यही लख्ख आहे हे ठणकावून सांगणारी कर्तबगार अधिकारी स्त्री किंवा 

अमुक डिटर्जंट वापरुन वॉशींग मशीनमध्ये कपडे कसे धुवायचे हे मुलीबरोबरच मुलालाही शिकवणारी तडफदार आई रिन, टाईड किंवा एरिअलच्या जाहिरातीतून दिसू लागली आहे. 

अर्थात धुणी- भांडी करणे किंवा करवून घेणे, घराची स्वच्छता करणे, कुटुंबियांच्या चेहर्‍यावर हास्य फुलेल असा रुचकर पण आरोग्यपूर्ण स्वयंपाक करणे, कुटुंबियांची काळजी घेणे (आणि हे सगळे करुन पाठ वगैरे दुखली तर अमुकतमुक कंपनीचा बाम चोळून पदर खोचून पुन्हा कामाला उभे राहणे) ही कामे मुख्यत: बाईची हे गृहितक अद्याप तसेच आहे. घरातला पुरुष सहृदयी असेल तर तो तिला फार तर ’मदत’ करतो. आतापर्यंत ’बायको गेली माहेरी (तरच) काम करी पीतांबरी' हे प्रसंगापुरते म्हणणार्‍या बर्‍याच पुरुषांनी टाळेबंदीमध्ये मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि हाताशी बर्‍यापैकी वेळ असल्याने बायको घरात असूनही घरकामाला चक्क हातभार लावला.


काहींनी समाजमाध्यमांवर त्यावरुन विनोद व्हायरल केले असले तरीही किमान मध्यमवर्गी समाज बदलतोय असे चित्र दिसू लागले. टाळेबंदी शिथिल झाल्यावर, व्यवहार पुन्हा सुरु झाल्यानंतर, विशेषत: ज्या घरातील स्त्रिया नोकरी/व्यवसाय आणि घरकाम अशी दुहेरी कसरत करतात, त्यातील किती पुरुषांनी घरकामात मदत करणे अजूनही सुरु ठेवले आहे हा मात्र संशोधनाचा विषय ठरेल. या पार्श्वभूमीवर घरगुती-उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये जाणवलेला महत्वाचा सकारात्मक बदल म्हणजे कपडे धुणे किंवा घरकाम हे ’फक्त’ बायकांचे काम नाही हे निदान सूचित करायला त्यांनी सुरुवात केली आहे. 

या संदर्भात आजची डचेस ऑफ ससेक्स- मेगन मर्केल हिचा मध्यंतरी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ बराच गाजला. त्यात तिने या गृहितकांबद्दल अतिशय मार्मिक भाष्य केले आहे. ती अवघी ११ वर्षाची असताना वर्गातील एका मुलाने एका डिटर्जंटच्या जाहिरातीतील शब्दांवरुन हे केवळ मुलीं/ स्त्रियांचे काम असून ते त्यांचे समाजातले (दुय्यम) स्थानही आहे, अशा अर्थाचा शेरा मारला. ती अस्वस्थ झाली. असा चुकीचा संदेश समाजमनावर बिंबवणार्‍या त्या जाहिरातीच्या विरोधात अमेरिकेच्या तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन पासून त्या उत्पादनाच्या निर्मात्यापर्यंत अनेकांना तिने पत्रे लिहिली. विशेष म्हणजे याची दखल घेतली जाऊन ’प्रॉक्टर अ‍ॅंड गॅम्बल’ कंपनीच्या त्या जाहिरातीतले शब्द बदलले गेले. लिंग-समानतेबाबत फक्त विचार पुरेसा  नाही, ती संकल्पना आचरणातही उतरायला हवी, हे ऋजु शब्दात परंतु निक्षून सांगणारी मेगन या व्हिडिओमध्ये तिच्या शाही लग्नाच्या व्हिडिओपेक्षा जास्त देखणी दिसते. मेगनच्या पिढीच्या भारतीय स्त्रीचेही आत्मभान जागे होते आहे, ती चौकटीपलिकडे जाऊन विचार आणि कृती करु लागली आहे. या वस्तुस्थितीचा प्रभाव थोड्या प्रमाणात का होईना आजच्या जाहिरातींवर पडू लागल्याचे दिसते आहे. 

मुंबईच्या चंदना हिरन या २२ वर्षीय तरुणीने ’फेअर अ‍ॅंड लव्हली’ च्या जाहिरातीतील ’फेअर’ या वर्णभेदी शब्दावर आक्षेप घेतला व तो गाळला जावा म्हणून change.org वर सह्यांची मोहिम राबवली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. याच सुमारास जॉर्ज फ्लोईडची वर्णद्वेषातून हत्या झाल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया जगभरातून येत होत्या. हिंदुस्थान युनिलिव्हरने अखेर आपल्या या उत्पादनाचे नामांतर ’ग्लो अ‍ॅंड लव्हली’ असे केले. इंग्रज देश सोडून गेले असले तरी जेत्यांचा रंग म्हणून गोरेपणाच्या आकर्षणाने भारतीयांच्या मनाला असे काही कह्यात घेतले आहे की सर्वसाधारण भारतीयांना, त्यातूनही स्त्रियांना आपल्या मूळ गव्हाळ किंवा सावळ्या भारतीय वर्णाचा अकारण न्यूनगंड वाटतो. गोरेपणा म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य अशी वर्णभेदाचा पुरस्कार करणारी व्याख्या समाजमनावर बिंबवू पाहणार्‍यांना उत्पादनाच्या नावातून गोरेपणाचा उल्लेख अखेर काढून टाकावा लागला. उजळ होत जाणार्‍या रंगछटा दाखवणारे कार्ड देखील त्यांनी पाकीटातून काढून टाकले. याआधीही निवियाने जाहिरातीसाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये white is purity म्हणजेच गोरेपणा म्हणजे शुद्धता असे अत्यंत आक्षेपार्ह वाक्य वापरले होते. वर्णभेदी म्हणून आरोप झाल्यावर कंपनीने क्षमा मागून ते मागे घेतले असले तरी समाजाच्या मनात ते आजही रुतून बसले आहे. चांगला जोडीदार, मनासारखी नोकरी, हवी ती संधी मिळवायची असेल, तर आत्मविश्वास हवा आणि त्यासाठी तुम्ही गोरंच असायला हवे हे अशा जाहिराती ठासून सांगत होत्या. ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपये होता, तो तब्बल ४०० अब्जांवर जाऊन पोचला आहे. दरम्यान शाहरुख खान सारखे प्रसिद्ध सिनेनट जाहिरातीत तालमीतले प्रशिक्षक बनून कुस्तीपटू मुलांच्या दिशेने गोरेपण बहाल करणार्‍या ’मर्दोवाल्या क्रीम’ची ट्यूब फेकत ’तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून गोरेपणासाठी बायकी उत्पादनं काय वापरता” म्हणत या नवीन क्रीमचा प्रचार करत होते. हे सगळे बघता केवळ जाहिरातीतून नव्हे तर उत्पादनाच्या नावातून जरी सामाजिक विषमता ध्वनीत होत असेल तर संबंधित कंपनीला ते नाव बदलवायला भाग पाडण्याची किमया आज एका जनहित याचिकेने करुन दाखवली आहे.  #AllShadesAreLovely सगळ्या वर्णछटा सुंदर असतात, हे अधोरेखित करणारी ही मोहिम एका बलाढ्य कंपनीला स्त्री सौंदर्याचे कृत्रिम मापदंड बदलवायला भाग पाडू शकली, हे ही नसे थोडके. 

परंतु एक समाज म्हणून आपण मेगन किंवा चंदनाइतक्या गंभीरपणे जाहिरातीतून नकळत दिल्या जाणार्‍या संदेशांकडे पाहतो का! ते चुकीचे असल्यास आपल्याला खटकतात का! खटकल्यास आपण किमान वैयक्तिक स्तरावर याबाबतीत बदल करतो का, हे प्रश्न आता तरी आपण स्वत:ला विचारायला हवे आहेत. 

तांत्रिकदृष्ट्या भारतामध्ये टीव्हीवर जाहिराती दाखविण्यास १९७८ पासून सुरुवात झाली. या काळामधल्या जाहिरातीतल्या स्त्रिया कमालीच्या गृहकृत्यदक्ष असत. ते साहजिकही होते कारण स्त्रियांचे नोकरीसाठी, कामासाठी घराबाहेर पडण्याचे प्रमाण तेव्हा अत्यंत कमी होते. नव्वदच्या दशकात आणि जागतिकीकरणानंतरही घरगुती उत्पादनांचे आणि बाईचे नाते अबाधित राहिले असले तरी संसारी स्त्रीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर केलेली कॅडबरीजच्या मनोवेधक जाहिरातीतल्या क्रिकेट खेळाडूची उत्फुल्ल वृत्तीची प्रेयसी अनेकांना भावली. ही जाहिरात कलात्मकरित्या चित्रीत केली असली तरी कर्तृत्ववान पुरुष आणि त्याच्यावर भाळणे किंवा त्याचा संसार निगुतीने सांभाळणे या दोनपैकी एक भूमिका करणारी सुस्वरुप स्त्री अशा पठडीतल्या जाहिरातींची संख्या वाढू लागली. अपवाद वगळता बाईचे जाहिरातीत असणे आयपीएल मधल्या ’चीयरलीडर्स’सारखे अपरिहार्य ठरु लागले. सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीत बाईच दिसणार हे अपेक्षित असले तरी हळूहळू दाढीचे रेझर, बाईक, सिगारेट, सूट अशा पुरुष वापरत असलेल्या उत्पादनाशी संबंधित जाहिरातीतही बाई दिसणे अत्यावश्यक झाले. शिवाय या बायका मादक आणि आकर्षक असणे तसेच पुरुष कमावलेल्या पिळदार शरीराचे, ’मॅचो’ असणे अनिवार्य झाले. त्याच्या पौरुषत्वाला आव्हान देणारी एक तरी कमनीय युवती बाजूला त्याला लगटून दिसू लागली आणि जाहिरातीच्या शेवटी ती त्याच्यावर फिदा होऊ लागली. मग ते उत्पादन म्हणजे पुरुषांची अंतर्वस्त्रे असोत किंवा एखादी कार. विशेषत: डिओच्या जाहिराती तर स्त्रियांना आकर्षित करणे हे पुरुषांना जगाच्या पाठीवर करण्यासारखे एकमेव काम असल्यासारख्या केल्या जाऊ लागल्या. नुसत्या सुवासाने धुंद होऊन डिओ लावलेल्या अनोळखी पुरुषामागे धावत सुटलेल्या बायका जाहिरातीतून दिसू लागल्या. तुलनेने सर्जनशीलतेचा प्रत्यय देत ’मेन विल बी मेन’ म्हणत काही खुसखुशीत जाहिरातींनी स्त्रीविषयी पुरुषांचे नैसर्गिक आकर्षण अतिशय संयत पण मिश्कील पद्धतीने सादर केले असले तरी हे अपवाद. बहुसंख्य बटबटीत जाहिरातींनी बाईच्या शरीराचे वस्तुकरण तर केलेच परंतु लिंगभाव ही माणसांसाठी असलेली गोष्ट एव्हाना उत्पादनांशी जोडली गेली. २०१२ साली व्यायामाच्या उत्पादनांशी संबंधित कंपनीच्या पोस्टरमध्ये म्हटले होते 'cheat on your girlfriend not on your workout' म्हणजेच एकवेळ तुमच्या प्रेयसीला फसवा पण व्यायामाशी प्रतारणा करु नका. वादग्रस्त ठरल्यावर ही जाहिरात मागे घेण्यात आली. 

या जाहिराती अशा असण्यामागचे कारण म्हणजे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा. गेल्या दशकातल्या युनेस्कोचा अहवालानुसार येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची आदर्श स्थिती येण्याची शक्यता नाही. याचा अर्थ ती स्थिती आणण्यासाठी समाजाला निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वसामान्य भारतीय स्त्री ही ‘सेक्सडॉल’ नाही आणि कुटुंबासाठी चोवीस तास राबणारी ‘महान त्यागमूर्ती’ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मध्ये कुठेतरी स्वत:साठीदेखील जगू पाहणारी एक ‘हाडामासाची’ व्यक्ती आहे हे समजून घ्यावे लागेल. स्त्रियांना कर्तृत्व गाजवता यावे यासाठी संधींची समानता आवश्यक असते त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागेल. बीएसई वरील नोंदीनुसार विविध उद्योगसमूहांमध्ये ३२३ व्यवस्थापकीय पदांपैकी फक्त ८ पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत तर त्यावरील ५४% कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकही स्त्री नाही. मग सर्वसामान्य स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल काय बोलावे! साहजिक पितृसत्ता अधोरेखित करणार्‍या जाहिरातींची रांग सहजासहजी संपत नाही. 


जाहिरातविश्वात काम करणार्‍या स्त्रिया हे सारे मूकपणे का स्वीकारतात याचे कारण देखील तेथील पितृसत्ताच आहे. कंपनीच्या प्रमुखपदी असणारी मंडळी जाहिरातीचे स्वरुप व अपेक्षा निश्चित करतात आणि जाहिरातविश्वातली बलाढय मंडळी त्यानुसार जाहिरातीची संकल्पना ठरवतात. स्त्रिया येथे बहुतेक करुन मदतनीस किंवा मॉडेलच्या भूमिकेत असतात. निर्णयाच्या अधिकारापर्यंत फार कमी जणी पोचू शकतात. शिवाय समाजात रुजलेल्या धारणा तशाच राखून स्त्री आणि पुरुषाला आपापल्या पारंपरिक भूमिकाच योग्य असल्याचे सांगत राहणे बाजाराला व्यावहारिक दृष्टीने जास्त सोपे असते. याचा अर्थ स्त्रियांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत पुरुषांनी किंवा पुरुषांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत स्त्रियांनी असूच नये का? त्यांच्यातील स्वाभाविक आकर्षण किंवा सामाजिक नात्यांना जाहिरातीत संदर्भ म्हणून वापरले जाऊ नये का? अर्थातच हवे परंतु तारतम्य बाळगून. ’एक हीरा आपके हीरे के लिए’ असे संयतपणे सांगणार्‍या जाहिराती हे सहजपणे करत आहेत. समाजाच्या वैचारिक चाकोरीत बदल केला आणि तो रुचला नाही तर उत्पादनाच्या विक्रीवर त्याचा घातक परिणाम होण्याची जोखीम पत्करणे व्यावसायिकांना परवडणारे नसते तरीही आता कूर्मगतीने का होईना जाहिराती बदलू लागल्या आहेत. हे धाडस करु लागल्या आहेत. 


स्त्रीची आणि पुरुषांचीही जाहिरातीतली रुपे बदलताना दिसू लागली आहेत. आजवर फक्त कुटुंबाचा विचार करणारी स्त्री स्वत:चा विचार करतानाही दिसू लागली आहे. कोलगेटच्या ताज्या जाहिरातीत एक देखणी वयस्कर विधवा स्त्री आपल्या कुटुंबियांसह बाहेर जेवायला गेली आहे. तिचे लक्ष उपहारगृहाच्या दरवाज्याकडे आहे. तो येतो. तिने निवडलेला समवयस्क सहचर. आपल्या अनामिकेतली अंगठी दाखवत ती आपल्या कुटुंबियांची त्याच्याशी काहीशा संकोचाने तरीही आत्मविश्वासाने आणि हसतमुख चेहर्‍याने ओळख करुन देते. क्षणभर अचंबित झालेले कुटुंबिय स्वत:ला सावरुन टाळ्या वाजवून तिच्या या निर्णयाचे स्वागत करतात. जाहिरातीत एकही संवाद नाही फक्त देहबोली सगळे काही पोचवते. खरंच, असं का असू नये! असा विचार करायला प्रेक्षकाला भाग पाडते. स्कूटीच्या जाहिरातीतल्या तारका ‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन?’ (सगळी धमाल नेहमी मुलांच्याच वाट्याला का!) असा थेट सवाल करु लागल्या आहेत. विशेष म्हणजे स्त्रीला

कायम ठराविक रुपरंगात आणि मोजमापात सादर करणारी बार्बी सुद्धा बदलते आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त जागतिक पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशी हिच्या नावाच्या बार्बी डॉलचा समावेश नुकताच बार्बी शिरोज या खास बाहुल्यांच्या मालिकेत करण्यात आला. अशाप्रकारच्या मान्यतांमुळे अपंगत्वाकडे लोक सहानुभूतीने नाही तर आदराने आणि सह-अनुभूतीने पाहू लागतील, असे मानसी म्हणते. या बाहुलीलाही मानसीसारखेच कृत्रिम अवयव (पाय) लावण्यात आले आहेत. मॅटल टॉईज इंडियाचे ​​विपणन प्रमुख याबाबत म्हणतात “प्रत्येक मुलीमध्ये तिचे स्वप्न साध्य करायची जिद्द असते. त्यांना या बाहुलीमुळे आणखी प्रेरणा मिळॆल असा आम्हाला विश्वास आहे." 

बोर्नव्हिटा किंवा कॉम्प्लान किंवा कोणतीही पोषणाचा दावा करणारी पूड ही फक्त उंची वाढण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी आहे हे या नव्या जाहिराती सांगू लागल्या आहेत. निर्मनुष्य रस्त्यात गाडी बंद पडल्यावर स्वत: गाडी चालवू शकत असूनही कावर्‍याबावर्‍या झालेल्या आईला धीर देणारी आणि जॅक लावून शांतपणे स्वत: चाक बदलणारी षोडशा यात दिसू लागली आहे. मुलाला स्पर्धेसाठी नुसते तयार न करता जाहिरातीतली आई सुद्धा त्याच्यासोबत धावू लागली आहे. दागिन्याच्या जाहिरातीत एकल पालकत्व निभावणार्‍या स्त्रीशी विवाह करताना तिचा नवा जोडीदार तिच्या रुसलेल्या मुलीला सहजपणे उचलून घेऊन सप्तपदी चालू लागला आहे. विवाह जुळवणार्‍या संस्थांच्या वेबसाईटच्या जाहिराती देखील बदलत आहेत. केवळ जात, उंची, रुप, पगार याभोवती न घुटमळता स्वभाव जुळणे जास्त महत्वाचे असते हे त्या सांगत आहेत. अशाच एका जाहिरातीतली वृद्ध आई मुलाला रागावून विचारते की तुझ्या कमाईत आपलं व्यवस्थित चाललेलं असताना ती नोकरी करतेच कशाला! त्यावर नवपरिणीत बायकोची खंबीरपणे बाजू घेणारा मुलगा म्हणतो, ‘तिला आवडतं, म्हणून’. बाईने नोकरी करायची ती केवळ घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी या जुन्या विचारांना ही जाहिरात छेद देते. टूथपेस्टच्या एका जाहिरातीत मुलांमध्ये फुटबॉल खेळायला गेलेली मुलगी पडते तेव्हा मुलगे तिची खिल्ली उडवतात, तिला हसतात तेव्हा ती सुरेख हसून विचारते, तुम्हाला भीती नक्की कशाची वाटतेय, माझ्या पडण्याची की तुमच्या हरण्याची? कॉर्नफ्लेक्सच्या


जाहिरातीतले बाबा आई घरी नसली तरी मुलीला नाश्ता करायला लावून मगच शाळेत पाठवताना तर दुसर्‍या जाहिरातीत ते तिची वेणी घालण्य़ाचा प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. पूर्वी ज्या साबणाच्या जाहिरातीमध्ये बायका जीव खाऊन कॉलर घासताना आणि कपडे शुभ्र झाल्याचे पाहून त्यांचे नवरे आणि मुलं खूष होताना दाखवले जात, त्याच साबणाच्या जाहिरातीमध्ये आज कपडे खराब होण्याची तमा न बाळगता चिखलात बंद पडलेली रुग्णवाहिका ढकलणार्‍या बायका दिसत आहेत. सॅनिटरी पॅड ही लपतछपत काळ्या पिशवीतून विकत आणायची वस्तू नसून ती एक मासिक आणि आवश्यक खरेदी आहे, मासिक धर्म ही नैसर्गिक घटना आहे हे सांगणार्‍या जाहिराती बायकांना जन्मभराच्या संकोचापासून मुक्त करत आहेत. कोणत्याही व्यवसायात बाजारात टिकून राहण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असलेला नफा शेवटी ग्राहकाकडून मिळतो. हा ग्राहक समाजाचाच एक भाग असतो ज्यात सुमारे पन्नास टक्के महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या बदलत्या मानसिकतेची नोंद ग्राहकानुययी माध्यमांना आणि जाहिरात विश्वाला घ्यावी लागते आहे. हे सुचिन्ह आहे.


मात्र या बदलाची गती फार मंद आहे. जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर म्हणतात, ‘जाहिराती दोन प्रकारच्या असतात. ‘आयडेंटिफिकेशन’ म्हणजे जाहिरातीतली व्यक्ती म्हणजे आपणच आहोत असे भासवणाऱ्या आणि ‘अस्पिरेशनल’ म्हणजे या जाहिरातीतल्या कुणासारखं तरी आपणही असावं, असं वाटायला लावणाऱ्या." जाहिरातींचे स्वरुप वेगाने बदलावे असे वाटत असेल ग्राहकांना स्वत:ला आमूलाग्र बदलावे लागेल तरच त्याचे प्रतिबिंब जाहिरातीतून उमटेल. लिंगभावविषयक समतेची जाणीव समाजात जितकी रुजेल तितकी जाहिरातींच्या स्क्रिप्ट्सना अर्थकारण आणि समाजकारण याचा समन्वय साधायची प्रेरणा मिळेल. यासाठी सर्वप्रथम स्त्रियांना स्वत:मध्ये बदल करावे लागतील. कायम त्यानेच बिल द्यावे, त्याने आपल्याला सुरक्षित ठेवावे, अडचण आली तर त्यानेच पुढे व्हावे, सदैव स्त्री दाक्षिण्य दाखवावे, त्यानेच सांभाळ करावा अशा अपेक्षा लवचिक कराव्या लागतील. अन्यथा यातून जोपासली जाणारी स्त्रियांची परावलंबनाची आणि पुरुषांची स्वामित्वाची भावना आणि त्यातून निर्माण होणारा अहंभाव तसाच राहील आणि तोच जाहिरातीतून वर्षानुवर्षे झळकत राहील. शोभेच्या बाहुलीचे अल्पकाळ कौतुक होते पण तिला सन्मान मिळत नाही. सन्मान मिळवण्यासाठी स्त्रियांना आपले जागे झालेले आत्मभान जोपासत राहावे लागेल. स्त्री सौंदर्य म्हणजे केवळ तिचे शरीर आणि रंगरुपच नव्हे तर तिचा आत्मविश्वास ही नवी व्याख्या या नव्या जाहिराती रुजवू पाहत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी स्त्रियांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. हे जग फक्त स्त्रियांचे किंवा पुरुषांचे नाही, दोघांचे मिळून तयार झालेले आहे हे आपल्या मुलाला आणि मुलीला स्पष्टपणे सांगावे लागेल. याचा अर्थ स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपल्या नात्यातला गोडवा, नजाकत गमवावी असे नाही मात्र रूढ चौकटींना नवे आयाम अवश्य द्यायला हवे तरच जाहिरातींना सुपरवुमनचे उदात्तीकरण सोडून स्त्रीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचा शोध घ्यावासा वाटेल. आपल्या व्यंगचित्रातून नेहमी ’सामान्य माणूस’ रेखाटणार्‍या आर.के.लक्ष्मण यांना ’तुम्ही कधी सर्वसामान्य स्त्रिया का रेखाटत नाही?’ असे एकदा विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले, कारण स्त्रिया असामान्य असतात. समाजात आणि पर्यायाने जाहिरातीत बदल घडवायचा असेल तर स्त्रीला तिच्या असामान्यत्वाचे भान सदैव राखता आले पाहिजे. ते नेमके कसे हे ही कविता अचूकपणे सांगते आहे. (मूळ हिंदी कविता - कवी नीलेश रघुवंशी , मराठी अनुवाद - मोहिनी मोडक)

लावण्यवतींनो

थांबवा तुम्ही सभा-समारंभात मिरवणं

तबकात शाल, श्रीफळ घेऊन

किंवा

दीप प्रज्ज्वलन होईतो 

देखाव्यासारखं नुसतं उभं राहणं

काडेपेटी हातात धरुन ....


नका मंचावर चढत जाऊ

फक्त मानपत्राच्या वाचनापुरतं

नका भासू देऊ

आपलं तिथलं अस्तित्व 

केवळ मोहक आणि प्रेक्षणीय...

 

लावण्यवतींनो

असं एकदा पाहा तर करुन

बदलून जाईल हे जग सारं

बदलून जाईल हे अवघं विश्व


- मोहिनी महेश मोडक

(This article is published in sakal diwali ank 2020 All editions)

Monday, October 15, 2018

मी टू

#MeToo बाबत काही आक्षेप निदर्शनास आले. ’हे सगळं प्रसिद्धीसाठी’, ’आता दाद न देणार्या पुरुषांना आयुष्यातून उठवण्यासाठी’, ’आताच बरं ह्यांना हे आठवलं’, ’यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये मग उगाच कशाला’, ’तक्रार करायची ना.. इथे लिहून काय उपयोग आहे’, ’हे पेज थ्री बायकांचं फॅड आहे’, तिथल्या तिथे कानफटात वाजवायची नंतर गळे काढण्यापेक्षा’, वगैरे वगैरे.
शोषितांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि बहुतेक आक्षेपही महिलांच्या बाबतीत आहेत म्हणून तूर्त फक्त महिलांबद्दल.. पण हे सर्व शोषितांना लागू व्हावं.
संमतीचे आणि लादलेले लैंगिक संबंध यातली सीमारेषा निश्चित करणे तसे अवघड आणि व्यक्तीसापेक्ष. A date went wrong असंही घडण्याची शक्यता असते.अशा वेळेस No हा एकमेव शब्द पुरेसा ठरायला हवा.

काही स्वार्थी, संधीसाधू बायका प्रसिद्धीसाठी किंवा सूड घेण्यासाठी असा आरोप करत असतील हे अगदी शक्य आहे. यात तथ्य आहे. पण
आपली समाजधारणा अशी काही आहे की यात त्या महिलेची आरोपीइतकीच किंबहुना जास्तच बदनामी होते. ती खरोखर पीडित असो वा नसो. हे माहित असताना केवळ प्रसिद्धीसाठी हा उद्योग करायला किती जणी धजावतील? त्यांचं प्रमाण नक्कीच अत्यंत कमी असेल. गुन्ह्यांच्या प्रोबॅबिलिटीचा विचार करता केवळ या कारणामुळे या चळवळीत सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीकडे शंकेने पाहणं अन्यायकारक ठरणार नाही का?
यात सगळ्य़ा आर्थिक उच्चवर्गीय महिला दिसतायत म्हणून ते फॅड ठरत नाही. सोशल मिडीयावर व्यक्त होण्य़ासाठी जुजबी तांत्रिक माहिती, भाषेचं ज्ञान आणि इंटरनेटची उपलब्धता असावी लागते. त्यामुळे तळागाळातल्या बायका तिथवर पोचून व्यक्त होऊ शकत नाहीत. याचा अर्थ त्यांना हे प्रश्न भेडसावत नाहीत असा होत नाही. उलट सामाजिक उतरंडीवर शेवटच्या स्तरावर असल्याने त्यांच्या समस्या याहून गंभीर असण्याची शक्यता जास्त आहे.
तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायला, वाचा फोडायला लागणारी शारीरिक आणि मानसिक ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच असं नाही. कालांतराने धीर एकवटता येऊ शकतो. जुन्या झाल्या म्हणून जखमा तशाच राहू द्यायच्या का? की तेव्हा प्रतिकार केला/करता आला नाही म्हणून आता त्याविरोधात बोलायची मुदत संपली? हे जर नकळत्या स्थितीत, बालपणी, अपंग व्यक्तिबाबत घडलं असेल तर विरोध नेमका कसा करणं अपेक्षित होतं? यातून काही निष्पन्न झालं नाही तरी आजवर कुढत राहिलेल्या कित्येक जणींना, नावानिशी/ निनावी व्यक्त होता आल्याने त्यांचं मन हलकं झालं असेल तर तो एक महत्वाचा मानसोपचार ठरेल. भूतकाळाची ओझी फेकून नव्याने जगण्याचा तो एक उमदा प्रयत्न ठरेल.
’हे जरा अती होतं आहे’ असं वाटणार्यांनी फक्त रोजच्या वर्तमानपत्राकडे नजर टाकावी. त्यातल्या बातम्यांमधील घटनांपेक्षा प्रत्यक्षात नोंदच न झालेल्या गुन्ह्यांची संख्या प्रचंड असते. तक्रार करायची, हा सल्ला तर्कसंगत असला तरी कितपत उपयोगी आहे हे कोर्टाची किंवा पोलिसस्टेशनची पायरी चढून पस्तावलेली कोणतीही व्यक्ति सांगेल. तरीही तक्रार करायला हवी परंतु तेवढे मनोबल आपली समाजरचना देते आहे का याचाही विचार व्हावा. एकच ताजे उदाहरण देते. परवा येथील एका कोचिंग क्लासच्या संचालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तिने हे मैत्रिणींना सांगितले तेव्हा त्यांनाही असाच अनुभव आल्याचे कळले. विद्यार्थिनीने पालकांसह पोलिस स्टॆशन गाठले. संचालकाच्या जातीतील वरिष्ठ लोकांनी चक्रे फिरवून पालकांवर दबाव आणला, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे त्यांच्या मनावर बिंबवले आणि पालक तक्रार न करताच घरी परतले.
मुळात हा पुरुषांविरुद्धचा लढा अजिबात नाही. बहुतेक स्त्रियांच्या प्रश्नांना पुरुषांनीच उत्तरं शोधली किंवा त्यासाठी पाठिंबा दिला आहे, असं इतिहास सांगतो. लैंगिक अत्याचाराविरोधात, अन्यायी, मग्रूर, लंपट वृत्तीच्या विरोधात हा शोषितांनी उठवलेला आवाज आहे. कर नसेल तिथे डर कशाला, ज्यांची नावे यात आली आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्य़ाची पूर्ण संधी मिळावी. तोवर त्यांच्याबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल ग्रह करुन घेणे तितकेच अन्यायकारक आहे. 

तरुण वयात मुलींना छेडणं हे समाजात चक्क नॉर्मल मानलं जातं. मित्रांमध्ये आपले पौरुष सिद्ध करण्याचा तो कित्येकांना सोपा मार्ग वाटतो. कालांतराने ते चूक होतं याची जाणीवही होते. दरम्यान काही गंभीर घटना घडली असेल आणि ती घडल्यानंतर त्याबद्दल पश्चाताप होत असेल तर शोषण करणार्यांनी क्षमा मागण्याचा मोठेपणा दाखवावा. करून सवरून संभावितासारखं वावरणाऱ्याना या घडामोडींमुळे चाप आणि धाक बसावा.
सर्वात महत्वाचं #MeToo उच्चारु देखील न शकणारे म्यूट झालेले अनेक आवाज सभोवती आहेत याचं भान यावं.
ज्यांना हे सगळं प्रकरणच निरर्थक वाटतं त्यांनी याकडे सरळ दुर्लक्ष करावं पण निदान कुचेष्टा करु नये.
ज्यांना यात तथ्य वाटतं त्यांनी आत्मपरिक्षण करावं.
ही चळवळ काही दिवसांनी कदाचित मंदावेल पण याद्वारे समाज निकोप होण्याकडे काही पावलं टाकत असेल तर त्यात शेवटी आपलं भलंच आहे.
यावर अनेक विनोद व्हायरल होत आहेत. एका मर्यादेपर्यंत सोशल मिडियावर पसरलेलं काहीसं नकारात्मक सावट कमी व्हायला यामुळे मदत होते आहे पण आपण जर स्वत:ला संवेदनशील समजत असू तर खरोखर जी व्यक्ति त्या वेदनांमधून गेली आहे तिचा अपमान होणार नाही, तिची खिल्ली उडवली जाणार नाही याची काळजी घ्यायला नको का!

Friday, September 8, 2017

ब्लॉग ’ती’ चा - चोखेर बाली

’धूल तब तक स्तुत्य है जब तक पैरों तले दबी है ...
उड़ने लगे ..आँधी बन जाए ..तो आँख की किरकिरी है ..चोखेर बाली है।’
 ब्लॉगवरच्या या सलामीच्या वाक्याने ज्यांना ठसका लागला त्यांनी तो वाचायच्या भानगडीत पडू नये. ’आता काही राहिलं नाही बरं का पूर्वीसारखं, स्त्रियांना आम्ही आता सग्गळं स्वातंत्र्य ’दिलय’’ असं म्हणण्यातला विरोधाभास न समजणार्‍यांना देखील हा ब्लॉग झेपणारा नाही. रवींद्रनाथ टागोर यांच्या ’चोखेर बाली’ या कादंबरीतल्या बिनोदिनी या तरुण विधवेचे, परित्यक्तांचे किंवा एकूणच स्त्रियांचे मुलभूत प्रश्न अद्यापही तेच आहेत हे किमान मनातल्या मनात मान्य असणार्‍यांसाठी हा ब्लॉग आहे. असे अनेक स्त्रीविषयक सामाजिक सल थेटपणे मांडणारा, तिच्या समस्यांना बिनधास्त वाचा फोडणारा, त्या प्रश्नांचा खणखणीतपणे उहापोह करणारा त्याचबरोबर दर्जेदार साहित्य वाचल्याची अनुभूती देणारा सुप्रसिद्ध सामुदायिक हिंदी ब्लॉग म्हणजेच ’चोखेर बाली’ किंवा 'आँख की किरकिरी'.
 http://sandoftheeye.blogspot.in/

२००८ मध्ये सुजाता यांनी सुरू केलेला हा ब्लॉग विविध सामाजिक संदर्भात स्त्रियांच्या भूमिकेवर, स्त्रियांकडे बघण्य़ाच्या दृष्टीकोनावर प्रखर भाष्य करतो, त्या विषयाशी निगडीत पैलूंची तर्कशुद्ध, सर्वंकष, समंजस चर्चा करतो. यावरचे काही लेख पुरुषांनी देखील लिहीले आहेत. विचार करायला बाध्य करणं हे या ब्लॉगचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. हा ब्लॉग वाचकांना सुन्न करतो, कधी घशात आवंढा आणतो, तर कधी आशा पल्लवित करतो. दिल्ली हायकोर्टाने सैनिकी सेवेत महिलांना स्थायी कमीशन देण्याच्या सरकारला दिलेल्या आदेशाचं इथे स्वागत होतं. सख्ख्या नातेवाईकाने केलेल्या बलात्कारातून गर्भवती झालेल्या अश्राप मुलीला कायद्याने न्याय मिळवून दिला तरी तिच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाचं काय, असा खडा सवाल एका लेखात विचारला जातो.
द्विलिंगी समाजरचनेपलीकडे जाऊ पाहताना, ’गे किंवा लेस्बियन प्राईड परेड’ हा केवळ फॅशनचा भाग आहे का, विपन्नावस्थेत असलेल्या तृतीयपंथी लोकांना पुरोगामी लैंगिक अस्मितेत स्थान मिळते आहे का? असे परखड प्रश्न या ब्लॉगवरच्या आणखी एखाद्या लेखातून विचारले जातात. स्त्रियांनी काय परिधान करावे, काय करु नये हे कायम पुरुष ठरवत आले आहेत. केरळ सारख्या पुरोगामी राज्यात स्त्रियांना उत्तरीय (शरीराचा वरील भाग झाकणारा कपडा) वापरण्य़ाची परवानगी नव्हती. कालांतराने ती तत्कालिन उच्चवर्णीय स्त्रियांना मिळाली तर त्रावणकोरच्या महाराजांनी सामाजिक उतरंडीच्या सर्वात तळाला असलेल्या स्त्रियांना २६ जुलै १८५९ ला ही परवानगी दिली. स्त्रियांनी या अवमानजनक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी तब्बल पन्नास वर्ष लढा दिला. स्त्रियांचे ’अनुचित’ पोशाख हे त्यांच्यावरील अत्याचाराचं एकमेव कारण मानणार्‍यांना आर. अनुराधाने लिहीलेला हा लेख थेट आरसाच दाखवतो.
हा ब्लॉग म्हणजे केवळ आक्रंदन नाही. यात तर्कसंगत विवेचन आहे. निरिक्षणं आहेत. स्त्री पुरुषातील असमान आणि अन्यायकारक श्रमविभागणीचं विश्लेषण सुजाता एका लेखात अगदी नेमक्या शब्दात करते. "भारतीय परिवार संरचना के अध्ययन से बाज़ार ने स्त्री श्रम का बहुत शातिर तरीके से इस्तेमाल किया। औरतों को अपने पे-रोल पर सीधे रखने में नियोक्ताओं को जो पचड़े हो सकते हैं, मातृत्व अवकाश, बच्चा पालन अवकाश, बीमारी- तीमारदारी वगैरह उन सबसे भी मुक्ति हो जाती है। घरेलू औरतों की यह ज़रूरत कि खाली वक़्त में बैठे-बैठे (?) चार पैसे कमाए जा सकें, का फायदा औरत को कितना हुआ यह एक शोध का मुद्दा है क्योंकि इस तरह हाथ में आए चार पैसे भी उसी पितृसत्तात्मक परिवार संरचना को बनाए रखने में खप जाते हैं".

केवळ आपापल्या खिडकीतून दिसणार्‍या अवकाशाच्या तुकड्य़ाला अख्खं आकाश समजणार्‍या स्त्रियांना उद्देशून प्रतिभा कटिय़ार लिहीते "हम नहीं जानते कि हम नहीं जानते और इस न जानने को उम्र भर जीते जाते हैं।" या लेखाला ती ’अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफर के हम हैं’ असं सूचक शीर्षक देते. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात लग्न करुन आणलेल्या कित्येक भारतीय स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या भोगांबद्दल सांगून सुधा ढींगरा लिहीतात, "क्या आप चाहती हैं कि आप के बच्चों में हिंसक प्रवृत्ति पनपे | नहीं न.. तो उठिए..जागृती का पहला कदम उठाएँ...अपने ही घर में बहू या बेटी पर किसी मर्द का हाथ उठने से पहले उसके साथ खड़ी हो जाएँ और बचाएँ अपनी भावी पीढ़ी को ग़लत संस्कारों से"
सायबर जगात विखुरलेले स्त्रियांचे हुंकार, त्यांच्या वेदना या ब्लॉगवर एकत्र येतात. लिंगभेदावर घणाघाती प्रहार करतात. अनेक दबलेल्या आवाजांना, घुसमटीला व्यासपीठ मिळवून देतात. स्त्रीला तिच्या स्वत्वाचा शोध घ्यायला उद्युक्त करतात. गेल्या वर्षी एका आंतरराष्ट्रीय स्त्री परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, women don’t have problem in speaking, they have problem in being heard. त्यामुळे बहुतेक लेखांचा पवित्रा काहीसा आक्रमक आहे, उच्चरवात दाद मागणारा आहे. असा स्त्रीवादी आवाज अनेकांना ऐकवत नाही. ’असलं काही’ वाचून आपल्या घरची चौकटीतली ’ती’ बिथरेल की काय या भीतीने काही जण ’हा ब्लॉग म्हणजे रेड लाईट एरिया आहे’ अशी टीकाही करतात. परंतु हे लेखन म्हणजे स्त्रियांनी पुरुषांविरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही. या ब्लॉग लेखिकांना केवळ मानवसत्ताक समाज अपेक्षित आहे. संघर्ष करत, ठेचकाळत पुढे जाताना स्त्री आणि पुरुषांना हातात हात घालून प्रवास करता येईल अशा नव्या वाटेकडे निर्देश करताना या ब्लॉगवरची एक कवयित्री नीलिमा, स्पष्टपणे आवाहन करते..
"कैसे बिफर जाता है तुम्हारा वजूद ...जब ठुकरा देती हूं मैं
तुम्हारे फैसले.. जो लिए थे तुमने मेरे बारे में
कैसा तड़फडाता है तुम्हारा सुपोषित अहम.. जब मैं करती हूं अनपेक्षित प्रश्न
तुम्हारे उन आकलनों पर.. जो टिके थे तुम्हारे तजुर्बे की शय पर
ठीक उस पल चट्टानों के मजबूत छाती से गुजर.. बनाती है नदी अनजान पगडंडियां
और नदियों की छाती पर तिर आता है पुल..
तुम चाहो तो हम मिल सकते हैं..
बहती हुई नदी के इंद्रधनुषी पुल पर... प्रिय !! 

Friday, July 7, 2017

ब्लॉग ’ती’ चा -प्रस्तावना

तरुण भारत - आकांक्षा पुरवणीत ’ब्लॉग ’ती’चा’ हे माझे नवे सदर नुकतेच सुरू झालेय  
स्त्रिया लिहीत असलेल्या विविध विषयांवरील ब्लॉग्जवर प्रकाशझोत टाकणारं हे सदर. या सदरातील हा पहिला लेख.. 


डायरी म्हणजेच रोजनिशी लिहीणं, हा पूर्वी अनेकांसाठी सवयीचा भाग होता. टांग्याचे भाडे तीन आणे झाले किंवा सुमतीला आज पहाटे कन्यारत्न प्राप्त झाले, अशा काही गद्य नोंदी आजोबा-पणजोबांच्या रोजनिशींमध्ये सापडतात, तेव्हा गंमत वाटते. डायरीलेखनाचे स्वरूप पुढे बदलत जाऊन ते अगदी खाजगी होत गेले असले तरी हे लेखन बरेचसे मध्यम, उच्चमध्यमवर्गातील पुरूषांपुरते मर्यादित होते. स्त्रीसाक्षरता वाढत गेली तसतशी आधी ओव्या, लोकगीतांमधून व्यक्त होणारी स्त्री कथा, कवितातून व्यक्त होऊ लागली. काही बंडखोर अपवाद वगळता तिचे विषय साधारण घर, मातॄत्व, निसर्ग याभोवती फिरायचे. तिची डायरीदेखील याहून वेगळी नसावी. ९० च्या दशकात इंटरनेट अर्थात आंतरजालाचा पसारा वाढत गेला आणि सहस्त्रक संपता संपता डायरीला एक नवीन भावंडं आलं ते म्हणजे ब्लॉग. डायरी म्हणजे स्वत:शीच गुणगुणणं, आपल्याच मनाशी गुजगोष्टी करणं तर ब्लॉग किंवा ऑनलाईन डायरी म्हणजे उंच कड्यावरून जगाला घातलेली साद. प्रतिध्वनी-प्रतिसाद येवो न येवो, मुक्तपणे व्यक्त होण्याची असोशी हीच ब्लॉगलेखनामागची उर्मी असते. जगभरातल्या स्त्रियांच्या बरोबरीने अनेक भारतीय स्त्रियादेखील या तंत्राच्या मदतीने उत्स्फूर्तपणे लिहू लागल्या आहेत.

बहुतेक ब्लॉग हे अनुभवावर, निरीक्षणांवर आधारित असतात. तंत्रज्ञानाची जोड देऊन ते अधिक आकर्षक रूपात सादर केले जातात. उदा : इटलीजवळच्या ब्लू ग्रोटो (नीलकुहर) बद्दल एखादीने वर्णनात्मक ब्लॉग लिहिला आणि तिच्या शब्दांना पानावरील रंगसंगतीसह फोटो, व्हिडीओची जोड दिली तर तोच ब्लॉग केवळ वाचनीय न राहता प्रेक्षणीय होतो. छापील पुस्तकांच्या तुलनेने हे या माध्यमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्याची सोय असल्याने काही विषयांवर उत्तम विचारमंथन होते. ‘मायबोली’ किंवा ‘मिसळपाव’ सारख्या वेबसाईट्सवरील लेखांवरच्या टोपणनावाने केलेल्या सखोल, अभ्यासपूर्ण चर्चा हा एक नवाच साहित्यप्रकार म्हणायला हवा. या चर्चांमध्ये तरूणींची संख्या भरपूर दिसते. गेल्या ३,४ वर्षात फेसबुक सारख्या समाज माध्यमांचे गारूड वाढत गेल्याने जगभरातील अनेक नव्या नवलाईच्या ब्लॉगलेखिका त्याकडे ओढल्या गेल्या आणि त्यांचे ब्लॉगलेखन मंदावले किंवा संपले. अर्थात सोशल माध्यमांवरची अभिव्यक्ती ही तात्पुरती, वरवरची असण्याचा आणि टाईमलाईनवरील माहितीच्या ढिगात कालांतराने गडप होण्याचा धोका असतो. त्यामुळे ब्लॉगचे महत्त्व अबाधित राहिले आहे. हे ओळखून असलेल्या ब्लॉगलेखिका आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी उलट समाजमाध्यमांचा अधिक प्रभावीपणे वापर करून घेत आहेत.

कुणी wordpress.com ,blogspot.com सारख्या संकेतस्थळांच्या (वेबसाईट) माध्यमातून ब्लॉग लेखन करतं तर कुणी ब्लॉगलेखकांचे समूह तयार करून स्वत:च्या वेबसाईट्सद्वारे लेखन करतं. याला स्थळ, काळ, लिंग, भाषा, देश याचं बंधन नाही, कारण आंतरजाल हे वैश्‍विक माध्यम आहे. तरीही मुळात लेखनाची सुरूवात पुरूषाच्या तुलनेने बर्‍याच उशीरा करणारी स्त्री हे मधलं अंतर भरून काढताना धापा टाकत लिहीते आहे की ठामपणे व्यक्त होते आहे, विचारांचा परिघ विस्तारते आहे की त्याच मुद्द्यांकडे नव्या नजरेने पाहते आहे, पुरूषाशी स्पर्धा करते आहे की परस्परपूरकतेबद्दल बोलते आहे हे या सदरातून जाणून घेणं रंजक ठरेल.

असं म्हणतात की स्त्रिया दिवसभरात २०,००० शब्द बोलतात तर पुरूष केवळ ७०००. म्हणजेच स्त्रिया अधिक संवादी असतात. साहजिकच ब्लॉगलेखन हे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण असतं तसच निचरा करण्याचं एक माध्यमदेखील. देशोदेशीच्याच नव्हे तर आपल्या देशातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या ब्लॉगलेखनातली साम्यस्थळं कुठली, वैशिष्ट्य कोणती, त्यांच्या ब्लॉगचे शीर्षक अमुकच का, हेसुद्धा या सदरातून जाणून घेऊया. पाककृती-पेहरावापासून पर्यटनापर्यंत, पालकत्वापासून सामाजिक प्रश्‍नांपर्यंत, राईट टू पी पासून जागतिक स्तरावरील वर्ण-लिंगभेदापर्यंत, कवितेच्या अभिव्यक्तीपासून पुस्तकसमीक्षेपर्यंत, बालपणीच्या आठवणींपासून भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लींच्या चित्रणापर्यंत तिच्या ब्लॉगलेखनातलं विषयांचं वैविध्य समजून घेऊ या. भावुक मांडणी करता करता खड्या आवाजात पुरूषांची कानउघाडणी करताना, हलक्या फुलक्या स्फुटलेखनापासून वेदनेचे पीळ उलगडत अन्यायाचा जाब विचारताना, मखमली भावनिक हिंदोळ्यांवरून उतरून प्रखर वास्तवाला सामोरे जाताना बदलत जाणारा विविध ब्लॉगलेखिकांच्या मांडणीचा स्वर टिपून घेऊ या. 

सकाळी वर्तमानपत्र घरी आलं की ते सर्वात आधी ताब्यात घेणार्‍या आणि त्यात महिला विषयक पुरवणी असेल तर तिची घडी न उलगडता तशीच चिमटीत उचलून बाजूला ठेवून देणार्‍या गटात मोडणारे पुरूष स्त्रियांच्या ब्लॉगलेखनाकडे नेमकं कशा प्रकारे पाहतात, ते त्याचे वाचक होतात का, त्यावर ते व्यक्त होतात का असं बरच काही या सदराच्या निमित्त्याने जाणून घेऊया.

हिंदी भाषेतील आद्य ब्लॉगलेखिका पद्मजाचा पहिला ब्लॉग ‘कही अनकही’ २००३ मध्ये सुरू झाला. आता तो ‘चोखेर बाली’ या नावाने ओळखला जातो. पद्मजाचा उल्लेख करताना ठकुराईनच्या धर्तीवर ‘ब्लॉगराईन’ ही अजब उपाधी संबंधित साईटवर वाचताना मजा वाटली. आपण मात्र सरळ ब्लॉगलेखिका असंच म्हणूयात. स्त्रियांच्या ब्लॉगविश्‍वाची ही सफर जगाकडे पाहणारी नवनवी कवाडं उघडेल याची मला खात्री आहे.