माणसाच्या आयुष्यातले सर्वाधिक आवडते तीन जादुई शब्द कोणते ते आपल्याला माहित आहेतच. त्यातून ते जर हव्या त्या व्यक्तीने उच्चारले तर माणसाला स्वर्ग दोन बोटे उरतो. व्यवहारचतुर माणसांच्या आयुष्यातले ते तीन शब्द ’बिल मी देतो/देते’ असे असू शकतात. एखाद्या गृहिणीसाठी मुलांच्या तोंडून आलेले ’अमुक मस्त झालंय’ हे ते तीन शब्द असू शकतात पण हल्ली यच्चयावत माणसांना आवडणारे तीन शब्द म्हणजे - ’डीपी छान आहे’.
Monday, January 16, 2023
डीपी छान आहे
माणसाच्या आयुष्यातले सर्वाधिक आवडते तीन जादुई शब्द कोणते ते आपल्याला माहित आहेतच. त्यातून ते जर हव्या त्या व्यक्तीने उच्चारले तर माणसाला स्वर्ग दोन बोटे उरतो. व्यवहारचतुर माणसांच्या आयुष्यातले ते तीन शब्द ’बिल मी देतो/देते’ असे असू शकतात. एखाद्या गृहिणीसाठी मुलांच्या तोंडून आलेले ’अमुक मस्त झालंय’ हे ते तीन शब्द असू शकतात पण हल्ली यच्चयावत माणसांना आवडणारे तीन शब्द म्हणजे - ’डीपी छान आहे’.
Saturday, November 12, 2022
पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा
![]() |
1st Attempt |
होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.
मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"
आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"
इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं.
"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"
" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला.
मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली.
जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं. माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली. प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.
फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.
साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली.
पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.
"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.
"चला लवकर सगळे, बनलं जेवण" मुलांनी ऐटीत घोषणा केली.
"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"
"बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व यं पा क’ ते सांग"
व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय.
स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे 😊
Friday, June 10, 2022
दोन माणसांचा गुळांबा
म्हणजे काय! दोन माणसांपुरता? एवढाच करायचा तर इतका कुटाणा कशाला, असं तुम्हाला वाटत असेल. तर ते तसं नाही.






Monday, May 30, 2022
एका पुस्तक प्रकाशनाची गोष्ट
मी कार्यक्रमाच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी आवडती लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्या नवलेखकाच्या नातलगांनी आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्यातली खुर्ची धरली. एव्हाना स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान छान मुद्दे मांडायला सुरुवात केली होती. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय नेमका प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने ओघवत्या शैलीत सांगितली. बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक यथातथा किंवा बंडल आहे. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि पुढचा गिअर टाकून अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने स्तुती न करुन करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही रोखठोक सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.

Monday, April 20, 2020
पिंकीपॉलिसी
Wednesday, February 5, 2020
लेखकराव alias ’साहित्तिक’
मी अगदी योग्य वेळेला हॉलमध्ये प्रवेश केला. जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी नागपूरची लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. सुटले! इकडे वधूपित्याने म्हणजे पुस्तक लिहिणार्या नवलेखककाकांच्याच्या मुलाने आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्यातली खुर्ची धरली. स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान मुद्दे मांडले. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने सांगितली.
बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक एकदम बंडल असून लेखक अद्याप साहित्याच्या बालवाडीत आहे. रिटायर झाल्यानंतर त्यांना कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या कथांचं पुस्तकबिस्तक काढून खूश करायची आयडिया पोराला सुचली असावी. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती कशी असावी असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं डोंबलाचं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने न बोलून करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखक-काकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही स्पष्ट सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.
उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, काकांच्या नात्यातल्या असाव्यात. संक्रांतीचे दिवस असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊ या, या हिशेबाने त्या खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखककाकांचे रिटायर मित्र दिसत होते. रविवारची दुपार जरा बरी गेल्याने - तेवढाच एक दिवस कटला न बा, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती तशीच राखण्याकडे तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व ’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’ तत्सम काहीतरी यमक जुळवले. ह्यांचे नक्कीच ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असणार.
त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले. ’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ आहेत) सादर करतो’, असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला.’भावनेविना लेखन शक्य नसते. त्यामुळे लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’ अशी मांडणी केली.
प्रमुख पाहुणी लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. त्यामुळे ती उर्ध्व लागल्यासारखी दिसू लागली. आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार काकांना. काकांनी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. मला तर कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही. निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले. दरम्यान मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.
काकांचा मुलगा आभारप्रदर्शनाला उभा राहिला. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्यावर लेऊन तो उभा राहताच मी ’आभाराचा भार कशाला अन शब्दांचे हार कशाला’ या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्याने त्या ओळी म्हटल्याच. या ओळी न म्हणणारा आभारवाला आमच्या विदर्भात दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो वेळात वेळ काढून आलेले बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला काकांच्या दिशेने धावले. आम्ही लेखिका- मैत्रिणीच्या दिशेने धावलो.
काका आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत डायरेक्ट ’साहित्तिक’ झाले.
Sunday, December 15, 2019
नसतोस घरी तू जेव्हा..
चार्जिंगला लावलेला नव्हता. उशीखाली राहिला का! नाही. लेकाच्या टेबलवर नव्हता. किचनमध्ये.. नाही. पेपरच्या ढिगाखाली! नाही. मी अंगण झाडलं तिथे कुठे.. कचर्याच्या डब्यात नाही ना टाकला पाचोळ्याबरोबर! ते पण उपसून पाहिलं.. नाही. हे पाहा, मी फिरुन येताना अशी गाडी आत आणली मग शूज काढले मग .. ज्या क्रमाने जे केलं तसा अॅक्शन रिप्ले केला. पण नाही. . ट्रॅक पँटच्या खिशात! नाही. वाटेत खिशातून नाही ना पडला. की फिरताना पीकेव्ही मध्ये कुठे पडला. पण पडला तरी आवाज न यायला तो काय रुमाल आहे का! कुणीतरी आवाज देऊन सांगितलं असतं की. आणि आज चालताना मी गाणी ऐकली नाहीत म्हणजे नेला होता की नाही मुळात?
तेवढ्यात सासूबाई गडबडीने माझ्याजवळ येत म्हणाल्या, ’आज मोबाईल डोक्याशी ठेवून झोपू नकोस, नासाने सांगितलंय, कॉसमॉस किरणं मध्यरात्री पृथ्वीवर येणार आहेत, (तुझ्या आधीच सरकलेल्या) मेंदूला चांगलं नाही म्हणे. हे बघ मला व्हॉट्सअॅपवर आलं आहे’. मी त्यांना २३५ व्यांदा शांतपणे सांगितलं की हे काही खरं नसतं.
’अगं पण नासाने का सांगितलं मग.’
’नासाबिसाने काही सांगितलेलं नसतं ओ, लोक नासा, नाना पाटेकर असली नावं टाकून काय वाटेल ते लिहितात.’
’पण लोक उगाच कशाला असं करतील!’
माझे म्हणणे फारसे न पटून त्या पुन्हा नासा किंवा नाना पाटेकरांनी आणखी काय काय म्हटलंय ते वाचण्यात गढून गेल्या. मी त्यांना थांबवून त्यांच्या फोनवरुन स्वत:ला फोन लावला आणि गुप्तहेरासारखी दबकी पावलं टाकत टवकारलेल्या कानांनी घरभर हिंडले. घरात कुठेही रिंग ऐकू येईना, वरुन हे ऐकू आलं ’इस समय आपको कोई उत्तर नही दे रहा है, कृपया थोडी देर बाद पुन: प्रयास करे’
चोर कशाला देणार म्हणा उत्तर. म्हणजे, अरे देवा! चोरीला गेला असेल की काय माझा मोबाईल! त्यातून नवा कोरा. जुना अगदीच हँग व्हायला लागला, इतका की लोक दयार्द्र नजरेने पाहू लागले म्हणून नुकताच घेतलेला. लेटेस्ट. चांगला ४८ एमपी कॅमेरा असलेला. नवर्याला ’भला इसकी रॅम मेरे रॅम से जादा कैसे’ असा हेवा वाटायला लावणारा.
काय काय महत्वाचं होतं त्यात, ते कुणाच्या हाती लागेल का! महत्वाचे आयडी पासवर्ड कोड भाषेत लिहुन स्वत:लाच मेल करुन ठेवलेत. पण इतके कोड भाषेत की मलाच आपण हे काय लिहिलंय ते काही वेळेला कळत नाही तर इतरांना काय कपाळ कळणार! (परवा नेटबँकिंगच्या पासवर्डचं असंच झालं, आठवेचना. सुरक्षिततेतची खबरदारी म्हणून पासवर्ड सेव्ह्ड ठेवला नव्हता. कोड भाषा कळेचना मग स्वत:शी क्वीझ खेळत बसण्यापेक्षा ’फर्गेट पासवर्ड?’ला शरण गेले. त्यात त्याने जो गुप्त प्रश्न विचारला त्याचंही उत्तर आठवेना, मेमरी आहे का खोकं असं झालं अगदी, शेवटी ओटीपी बीटीपी, दादा, पुता करून एकदाचा तो पासवर्ड नवा केला. आता पुन्हा तो लक्षात ठेवा. पासवर्ड कसा असावा यावर लेक्चर देणं सोपं, तो लक्षात ठेवणं महाकठीण.चला, निदान कॉंटँक्ट्सचं बॅकअप आहे. पण केव्हाचं तर १९४२ सालचं म्हणजे नंतर अॅड केलेलेल कॉंटँक्ट्स गेले की!! अॅप्स पण पुन्हा इन्स्टॉल करावे लागतील. करु काय ते पण आजच्या कामांचं कसं करायचं! आणि मेल ऑटोलॉगइन आहे. बापरे, असा कसा मॅडसारखा ऑटो मोड ठेवला मी, लोकांना सायबर सिक्युरिटीचं ब्रह्मज्ञान देता देता. पण ओके, त्याचा आधी पासवर्ड बदलते लॅपटॉपवरुन. चोर भी क्या याद करेगा! काही हाती नाही लागू देणार त्याच्या. अर्र पण इतर काही फ्री अॅप्सचे अॅक्सेस मिळतीलच आणि गॅलरीला पण लॉक नाही. फोटोचा गैरवापर केला तर! त्याला शिकवीन चांगलाच धडा. फिंगर लॉक आहे की, फिकर नॉट. बरं आत्ता फोन ब्लॉक करावा का! पोलीस कम्प्लेंट करावी तर काही तर आठवायला हवं नं! IMEI ट्रॅकर साठी तो पण आठवत नाहीये. डायरीत लिहिलाय वाटतं. नाही दिसतंय! अॅमॅझॉनच्या ऑर्डर इनव्हॉइस मध्ये मिळेल की. अरे वा अपना दिमाग भी चाचा चौधरी की तरह कंम्प्यूटरसे तेज चलता है. शंभर प्रश्न डोक्यात फिरु लागले.
मग आठवलं, नवरोबांचा फोन दसर्याच्या झेंडू खरेदीच्या गडबडीत कुणीतरी मारला तेव्हा त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली होती. दुसर्या दिवशी ते अपेक्षेने पोलीस स्टॆशनला गेले तर डंग डंग आवाज करत फिरणार्या पंख्याखाली धूळभरल्या खुर्चीत बसलेल्या एका पोलिसाने त्यांनाच उलट विचारलं, लागला का काही तपास फोनचा. एकूण पोलिस फार काही करतील अशी आशा ठेवणं वेडेपणाचं होतं. चला पुन्हा रिंग करुन पाहू, न जाणो पीकेव्हीतल्या कुणी तरी स्वत:जवळ उचलून ठेवला असेल. जगात चांगले लोक नक्कीच जास्त आहेत. रिंग जात राहिली आणि चक्क... नवरोबांचं अगदी गोड, हळू आवाजात ’हॅलो’ ऐकू आलं. युरेका ! म्हणजे फोन या बुवाकडे आहे तर, चला. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण अॅ, हं किंवा ’काय आणायचंय’ च्या ऐवजी हॅलो ! आणि इतका गोड आवाज!
’माझा फोन तुझ्याकडे कसा आणि मी इतक्या रिंग दिल्या तेव्हा का नाही उचललास?’
’कामात होतो, आत्ता व्हायब्रेट झाला तेव्हा लक्ष गेलं. ते मी सकाळी, हे ते .. तू आधीच उठलीस अलार्मच्या, तर अलार्म बंद करुन जाता जाता तुला आणून द्यायला फोन खिशात ठेवला आणि चुकून तो माझ्याबरोबर आला.’
’तो चुकून आला!’
’नाही म्हणजे मी चुकून आणला.’
’मग असं कर्तरी प्रयोगात बोल ना!’
पुन्हा गोड स्माईल (स्वत:ची चूक असल्यामुळे अतिदुर्मिळ योग)
एकूण माझा मोबाईल आता पन्नास किमी लांब गेलेला होता आणि दुपारी दोन शिवाय परत मिळणार नव्हता.
माझ्या बाजूने इतकी शांतता पाहून त्यांनी विचारलं, ’खूप महत्वाचं काम राहून जाईल का तुझं? तुझा दहा हजार करोडचा टर्नओव्हर एकद्म खालीबिली येईल का! तसं असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था अर्जंट पाठवायची’. मी बीपी न वाढू देता म्हटलं, ’मी करीन लॅपटॉपवरुन काम. जाऊ दे.’
मी कामाला लागले. नेहमीपेक्षा दुप्पट वेगात काम झालं कारण उगाच इकडे तिकडे मोबाईलमध्ये डोकावण्याचा वेळ वाचला. कामाव्यतिरिक्त थोडं लेखन झालं. घरातलं काम आटोपलं. कालचं राहिलेलं एक काम सुद्धा पूर्ण झालं. कालच्या बाकी राहिलेल्या पुरवण्यातले काही लेख वाचून झाले. वेळच होत नाही हे जे आपण म्हणतो ते केवळ या कर्णपिशाच्चामुळे हे अगदी पटलं. खूप महत्वाचं काम असेल तर मी ’रीड ओन्ली’ मोड वर असते पण आपण उत्तर दिलं नाही तरी कामाशिवाय नासा आणि नाना पाटेकर छाप निरर्थक पोस्ट स्क्रोल करण्यात वेळ जातोच नकळत. त्यात ’थंड केलेल्या लिंबाचे परिणाम’ छाप मंद पोस्ट किंवा ’बायकांनी बुरखा घालावा म्हणजे त्या सुरक्षित राहतील’ छापाच्या मूर्ख पोस्ट वाचून टाळकं सरकतं ते वेगळच. नेट ऑफ करणं किंवा सोशल मिडिया उपास बिपास असले उपाय माझ्या अजिबात कामाचे नाहीत कारण माझं काम ऑनलाईनच करावं लागतं, रोजचे टास्क पण व्हॉट्सअॅप वरच असतात आणि चेक करुन तिथेच पुढचं लिहिलं जातं. पण या निमित्ताने बॅकअपच्या बाबतीत आपण अजून काही गोष्टी (इतरांना नेह्मी मारे सांगतो त्याच) लक्षात घ्यायला हव्या आहेत हे जाणवलं. गुगल ड्राईव्हवर प्रत्येक मह्त्वाच्या गोष्टीची कॉपी ठेवलीय की नाही हे चेक करायला हवं आहे हे नीटच कळलं. (ठेवली आहे, पण अपडेट केलीय का!) मोबाईल मला कंट्रोल करायला लागलाय हे ही लक्षात आलं. मोबाईल स्वेच्छेने काही वेळ बाजूला ठेवणं वेगळं, ते मला बर्यापैकी जमायला लागलं असलं तरी ’मोबाईल नाहीच आहे’ अशा परिस्थितीतही काही वेळ जगता येणं मुश्कील है लेकिन नामुमकीन नही याची पण खात्री पटली. हे चुकून झालेलं मॉक ड्रील बरीच अक्कल शिकवून गेलं.
२ वाजले. मोबाईलसह त्याला ’चुकून घेऊन जाणारा बुवा’ घरी पोचला. आज दुधी भोपळ्याची भाजी असूनही त्याच्या चेहर्यावरचे स्मित हास्य लोप पावले नाही.
’काय मग कसा गेला अर्धा दिवस! तुझ्याशी संपर्क न झाल्याने शहा आणि मोदींचे काही निर्णय पेंडिंग तर नाही ना राहिले!’
मी ते काही मनावर न घेता.. ’छान गेला, भरपूर कामं झाली माझी. एकदोन कामं अडून राहिली खरी पण त्यामुळे काही प्रलय नाही आला. ती आता करता येतील.’
’अरेच्चा, मला वाटलं की तू आता तुझी किती अडचण झाली याचा नॉनस्टॉप पाढा वाचणार. इतकी कूल राहिलीस म्हणजे नवलच आहे.’
आता त्यांना कशाला सांगा की एक तर या मोबाईलविना जगण्याच्या शॉर्ट ट्रेलरबद्दल मला त्यांचे खरं तर आभारच मानायला हवेयत आणि दुसरं ,सर्वात महत्वाचं ,पुढे माझ्याकडून ’चुकून’ असं काही झालं तर तेव्हा वापरायला हे ’कार्ड’ राखून ठेवलेलं बरं ना! :-)
Thursday, August 15, 2019
श्रावण आणि जेवण


Tuesday, July 9, 2019
रंगात काय आहे
मी आणि सासरे (त्यांना जरा बरं नाही म्हणून इथे आलेलो) बाहेरच्या खोलीत धूळ नसलेल्या २ खुर्च्यांवर अवघडून बसलेलो असतो. आजूबाजूला बर्यापैकी पसारा, जुन्या कॉम्प्युटर्सचे भाग इकडे तिकडे कोंबलेले. कोपर्यात रद्दी आणि त्यावर गेल्या जन्मी प्यायलेल्या चहाचा कुणाचा तरी रिकामा कप.
आम्ही येऊन दहा मि. झाल्यावर एक पोरगेलासा तरुण बाहेर येऊन ’आ रहे है’ असं सांगून त्या पसार्यातली एक हार्ड डिस्क घेऊन गाडीला किक मारून कुठे तरी जातो. पुढची दहा मिनीटं आम्ही जाळीतून बाहेरची वाहनं बघत बसतो. एक जाडजूड बाई आतून संथपणे डुलत डुलत येऊन पुन्हा एकदा ’आ रहे है’ असं सांगून डुलत डुलत परत जातात. पुन्हा दहा मिनीट रस्त्यावरची ’गंमत’ पाहणं क्रमप्राप्त.
आता पायजमा आणि अंगाभोवती टॉवेल अशा वेषातले खुद्द डॉ. अवतरतात आणि ’आ रहा हू’ सांगून आत गुप्त होतात. आतून थोडे चमचे, बशीचे टिंडींग टुडुंग आवाज येतात. लहान मुलाने भोकाड पसरल्याचा आवाज येतो. एव्हाना मला आपल्याला पण बरे नाही असे वाटू लागते.
’कलसे जरा अंग दुख रहा है, रातभर नीट नींद नही हुई, जरा कसकस लग रही है, खानेेकी इच्छा नही हो रही है’ असे तपशील सासरे पुरवतात. डॉक्टर त्यांना न्याहाळत म्हणतात ’बराबर है, मौसम ही ऐसा चल रहा है’. सासर्यांना आपल्या तब्येतीचे असे जनरलायझेशन आवडत नाही. ते म्हणतात ’कलसेच होने लगा, बाकी घरमे किसिको कुछ नही हुआ’. डॉक्टर आता गावातील ओपन नाले, सांडपाणी, जंतु प्रादुर्भाव यावर मतप्रदर्शन करतात. माझ्याकडे पाहून म्हणतात ’अंकल की पिढी सकस खाके स्ट्रॉंग बनी है, अपनी तो ये उमर मे क्या हालत होगी’. मला त्यांनी त्याच्या वयोगटात ओढलेले अजिबात आवडत नाही मग मी त्यांना मूळ विषयाकडे वळवते. डॉक्टर नाईलाजाने जरा जवळ येऊन सासर्यांकडे निरखून पाहतात आणि जीभ काढून दाखवा म्हणतात. त्यांना बराच वेळ अॅ sss करायला लावून डॉक्टर हनुवटी खाजवत बुद्धमुद्रेने मनाशी काही विचार करतात. मध्येच आम्हाला विसरून रस्त्यावरची गंमत पाहू लागतात. मला हा चेंगटपणा आता असह्य व्हायला लागलेला असतो. अचानक डॉक्टर रेल्वे स्थानकावर आलेल्या नवीन सुविधेबद्दल बोलू लागतात. ते प्रवासी महासंघाचे सक्रीय सदस्य असल्याने रेल्वे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय असतो. लालू रेल्वेमंत्री असतानाचे बदल आणि गोयल यांच्यामुळे झालेले बदल यावर त्यांचं तौलनिक मत ते मांडू लागतात. मला आता कंटाळून रडावंसं वाटतं. ’बीपी चेक करायचं का’ असं म्हणून मी त्यांना पुन्हा मूळ विषयाकडे आणते. ’आपका बीपी ये उमर मे नॉर्मल होना चाहिए’ असं ते म्हणतात तेव्हा मी रागावून ’मेरा नही अंकलका’ असं सांगते. यावर काही न बोलता ते एकदम आत गडप होतात.
#HappyDoctor'sDay😊 #LovingFamilyDoctor
Friday, March 15, 2013
अरे स्वैपाक स्वैपाक !!
भुकेच्या वेळेस स्त्री-पुरूषापैकी जो कोणी घरी उपलब्ध आहे, किंवा कमी दमलेला आहे किंवा वेळ, उत्साह आणि कौशल्य यातल्या किमान दोन गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याने स्वैपाक करावा इतकं हे साधं-सोपं का असू नये असे माझे बाणेदार विचार होते. आजही आहेत, पण त्यांना जळमटं लागलीयत. सुरूवातीला मात्र ’स्वयंपाक’ हा प्रकार धाडकन अंगावर आला तरी मी त्याची दखल घेतली नाही. आधी रवा तुपावर छान भाजून घ्यायचा मग उकळतं दूध घालून ढवळायचा आणि रव्याइतकीच साखर घालून शेवटी एक वाफ आणायची.. झाला शिरा, हाय काय, नाय काय !! नवीन घरात नव्या सुनेने, म्हणजे मी, सासरच्यांना खूष-बिष करावं असं वाटण्याच्या स्वप्नाळू दिवसात हा उद्योग करून पाहिला होता, पण ते प्रकरण कढईला जे बिलगून बसलं की हलेचना..काही दिवसांनी जावेला डब्यात ’बिथरलेल्या रवा वडी’ सारखा दिसणारा तो तपकिरी पदार्थ सापडला. ’तो नक्की काय आहे, कुणी दिला, डबा तर आपलाच आहे’ वगैरे चर्चा आपण त्या गावचेच नसल्याच्या अलिप्ततेने मी ऐकली. नंतर गणपती आले. माझ्या ’पॅचवर्क’ केलेल्या गलेलट्ठ उकडीच्या मोदकाला ’काय गं बाई आकार, हेंगाडाच्या हेंगाडा’ असे आजेसासूबाईंनी म्हटले त्याकडेही मी दुर्लक्ष केले. पुढे एकदा साबुदाण्याच्या थालीपीठाने तवा सोडायला नकार दिल्याने आमची थोडी झटापट झाली. त्यातून निर्माण झालेल्या आकारांमुळे नवर्याने त्या पदार्थाचे ’साबुदाण्याचा अमीबा’ असे नामकरण केले. अशा लहानमोठ्या अपघातांनाही मी मनावर घेतले नाही. पण एकदा जावेकडचे कोणीतरी जेवायला येणार होते. माझ्या अतिआत्मविश्वासावर विसंबून तिने झणझणीत पातोड्याच्या भाजीचा घाट घातला. पाहुणे जेवायला बसले, पातेल्याचे झाकण काढले तर काय! आत पातोड्या आणि रस्सा यांचे मिलन होऊन दोघे एकरूप झाले होते. पळीतला तो लगदा पाहून ,धरणी पोटात घेईल तर बरे, असे मला झाले. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण असावा, म्हणजे माझ्या पाककला-क्रांतीची बीजं आधीच्या दुर्घटनांमधे रोवली गेली होतीच. आता मात्र स्वयंपाक नावाच्या शत्रूवर विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा मी पण केला.
तोवर माझा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमालीचा नकारात्मक होता. ताटातील पदार्थांपेक्षा हातातील पुस्तकाचा फडशा पाडण्यात मला जास्त रस होता. युरोप-अमेरिकेची खाद्यसंस्कृती ही खरतर किती सुट्सुटीत आहे, त्यामुळे बाईलाही जगायला वेळ उरतो असे कळत्या वयापासून वाटायचे. बाबांना जुजबी स्वयंपाक येत असे. पण तो योग आईला बरे नसताना, किंवा विशेषत: त्यांचे भांडणबिंडण झाले तरच यायचा. मीठ आणि भरपूर मोहन घातलेले गव्हाचे पीठ तरातरा घट्ट भिजवून खरपूस भाजलेले पुरीएवढे खुसखुशीत गाकर (भांडणाची पार्श्वभूमी असेल तेव्हा ते करपत देखील) आणि ताकातले-लसूण, मिरचीच्या चरचरीत फोडणीतले खमंग पिठले, ते फारच झकास आणि झटपट करत. दादाला तर शेफ व्हायचे होते पण त्या व्यवसायाला तेव्हा एवढे ग्लॅमर नसल्याने त्याचा बेत बदलला. आपल्या बाsरीक कांदा चिरण्याचा, मसाल्याच्या चमचमीत भाज्यांचा, एकही डाग न पाडता पापड भाजण्याच्या कौशल्याचा त्याला अभिमान वगैरे होता. मी वा वा म्हणत, त्याला खतपाणी घालून सोयीस्करपणे मदतनीसाच्या भूमिकेत असायचे. नोकरी करू लागल्यावर मात्र मी आईचा त्रास कमी व्हावा म्हणून फुलके करायला शिकले. ते कसे कोण जाणे, टम्म फुगायचे आणि त्याखाली माझे पाककलाविषयक सारे अज्ञान लपायचे. स्वयंपाक यायला फारसं काही डोकं लागत नाही, जरा लॉजीक वापरायचं आणि करायचं, काय त्यात मुली वेळ वाया घालवतात वगैरे तेव्हाची माझी मतं..
परंतु माणूस शेवटी खाण्यासाठी जगतो (हे साहित्य-तंत्रज्ञान-कलाबिला एरवी ठीक आहे) हे मला लवकरच कळून चुकले. हे मान्य की रूप-रस-गंधाने अन्न अधिक आकर्षक करणं, ते रांधून प्रेमाने खाऊ घालणं या सगळ्यात एखाद्या जमून आलेल्या मैफिलीसारखा अपूर्व आनंद असतो! तरी त्या हौशीचे कर्तव्यात होणारे रूपांतर नेहमीच आनंददायी कसे असेल! पुरूषाने मुख्यत: आर्थिक भार सांभाळायचा आणि बाईने घर, हेच मान्य असण्याच्या काळातल्या (तसं हे पडद्याआड आजही समाजाला मान्यच आहे) आपल्या आईचे अवघे आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात, चुलीपुढे किलोकिलोच्या पोळ्या बडवण्यात करपून गेल्याची खंत जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या तेव्हा म्हणे त्यांनी आपले ’सुपरमॉम’पण स्पष्ट करण्यासाठी एका मुलाखतीत म्हटले होते, "राजकारणाच्या धबडग्यातून वेळ मिळाला तर इतर कुठल्याही कामापेक्षा चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला जास्त आवडतं". माध्यमांनी त्यातला फक्त ’तर’च्या पुढचा भाग छापून शेवटी ’व्हाईट व्हाऊस’ पेक्षा स्वैपाकघरातच स्त्री रमते हे बिंबवलं. मतदारांनी ते सिद्धही केलं. तथाकथित पुढारलेल्या अमेरिकेची ही स्थिती मग कित्येक जुनाट रिवाजांचे चाळ संस्कृती-संस्कृती म्हणून पायात बांधून नाचणार्या भारताबद्दल काय बोलायचे.
थोडक्यात स्वैपाक ही आपल्याला लोकांच्या पोटातून त्यांच्या हृदयापर्यंत पोचवणारी एक सुरेख आणि जीवनावश्यक कला असली तरी ते काम बाईनेच का करायचे बुवा, याचा एक सूक्ष्म राग मनात होता आणि आहे. कधीतरी या पुरूषांनी मित्राशी बोलता बोलता दचकून ’अरे बुवा, उद्यासाठी वाटाणे भिजत घालायला विसरणारच होतो’ या काळजीने स्वैपाकघराकडे तिडबिडत धावण्याचा अनुभव घ्यावा तेव्हा त्यांना यामागचे बाईचे कष्ट समजतील असे मला नेहमीच वाटायचे. पण मोजके अपवाद वगळता या पिढीत ते शक्य नाही, निदान पुढल्या पिढीत काही बदल घडेल. अगदी हल्लीचे प्रसिद्ध शेफ निलेश लिमये किंवा संजीव कपूर हे देखील घरी बायकोच्या हातचंच जेवत असल्याचा आवर्जून उल्लेख करतात. किमान सुटीच्या दिवशी घरातील सगळे मिळून मेन्यू ठरवत आहेत, त्याची तयारी करत आहेत आणि एकत्र जेवून मागचे आवरत आहेत, ही चित्रे म्हणजे अपवादात्मक घरे वगळता दिवास्वप्ने आहेत. नवरा ’उंची-पैसा-शिक्षण’ वगैरे सगळ्या बाबतीत वरचढ असावा अशा सामाजिक धारणेच्या, आडातच नसलेली समानता जगण्याच्या पोहर्यात येणार तरी कशी आणि कधी! तोवर स्वैपाक हे काम घरगुती म्हणून दुय्यम आणि म्हणून बायकी मानले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न केले नाही तरी बाईला काही ते चुकत नाही. तेव्हा वस्तुस्थिती स्वीकारायची ती या उक्तीनुसार : God, give us grace to accept with serenity the things that cannot be changed, courage to change the things which should be changed and the wisdom to distinguish the one from the other.
~ Reinhold Niebuhr
एवीतेवी आपणच करायचे तर यात आपली दादागिरी... आपलं ताईगिरी म्हणजे बाईगिरी तरी चालावी !! तर नवर्याला नेमकी स्वयंपाकात बर्यापैकी गती, वेळ आली तर म्हणजे उदाहरणार्थ माझ्या कोणत्याही परिक्षेच्या काळात चटणी-आमरसासकट सगळा स्वैपाक तो तयार ठेवत असल्याने ’आपल्यावाचून अडण्याचा’ आनंद नाहीच उलट मी त्याची आजन्म ऋणी झाले आहे. शिवाय त्याला वर्षातून दोनचारदा ’दालफ्राय’, ’भरली कारली’ इ. करायचा उत्साह येतो, मग आपण सगळे चिरूनबिरून, अगदी कढई तापत ठेवून द्यायची मग ’स्वत:’ फोडणी-मसाले घालणार, ओटाभरून सांडलवंड करणार. आपण ते हसतमुखाने आवरायचे. ’काय मग, जमलय की नाही तुझ्यापेक्षा मस्त?’ अशा अर्थाने भुवया उंचावून उंचावून विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास दाद वगैरे द्यायची. खरं म्हणजे यात फार हुरळून जाण्यासारखे काही नाही पण (इतरांच्या) बहुसंख्य नवर्यांचा या बाबतीतला आनंद बघता, आणि त्यांना चहा सुद्धा कसा हातात लागतो हे कधी कौतुकाने तर कधी करवादून सांगणार्या बायका बघता आपण बरेच नशीबवान आहोत असे मला वाटू लागले आहे. निदान पुढच्या पिढीतल्या सुनेने असा लेख लिहू नये म्हणून मुलीबरोबरच, मुलाला व पुतण्याला देखील आवश्यक तेवढा स्वैपाक यायलाच हवा यावर माझा कटाक्ष आहे.
तर आता पदरी पडून ’पवित्र’ झालेल्या माझ्या पाककलेला टीव्ही वरचे रेसिपीचे कार्यक्रम, वेबसाईट्सची कृपा, पुस्तकांची मदत आणि काही तज्ज्ञ मैत्रिणींच्या टिप्स या भांडवलावर भलतेच स्फुरण चढले आहे. घरच्यांचे गिनीपिग करून त्यात प्रयोगांची भर पडते आहे. यंत्रांनी बरीच कामे सोपी केली आहेतच पण मनापासून केलं (सुरूवातीच्या ’का?’ चे उत्तर अद्याप न सापडल्याने) की कशात काहीही घालून पदार्थाला चव येते हे मला थोडेफार कळू लागले आहे. चायनीज, मेक्सीकनच नव्हे तर पंजाबी, राजस्थानी, गुजराती चवींबरोबरच पौष्टेकपणाचा टच देण्यासाठीच्या युक्त्या माहित झाल्या आहेत. उदा: सुरण, लाल भोपळा यासारख्या विचीत्र भाज्या मुलं खात नाहीत (बालपणी कोण खातं नाहीतरी!!) मग त्या उरलेल्या भाजीत पिठं-कांदा मिसळून चटकदार भजी करून खपवायची असा अनुभवी बायकांचा बेरकीपणा मी देखील उचलला आहे. त्यामुळे कधीकधी खरीखुरी भजी-पराठे केले तरी नवरा संशयाने त्यात काय घातलेय हे निरखून पाहत असतो हा भाग अलाहिदा!
कहर म्हणजे ’माझी आई’ या निबंधात मुलांनी ’she is a wonderful cook' असे माझे वर्णन केल्यावर तर एखाद्या सुमार दर्जाच्या अभिनेत्रीला ऑस्कर मिळावे तसे काहीसे मला वाटू लागले आहे. त्यामुळे आता पदार्थ हवा तसा ’घडला’ नाही तरी बिघडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते. उलट नेहमीसाठी खाली उतरलेला ऊंट आता म्हणतोय, "या ना एकदा जेवायला..!!" :)