Showing posts with label चिमटे. Show all posts
Showing posts with label चिमटे. Show all posts

Monday, January 16, 2023

डीपी छान आहे


माणसाच्या आयुष्यातले सर्वाधिक आवडते तीन जादुई शब्द कोणते ते आपल्याला माहित आहेतच. त्यातून ते जर हव्या त्या व्यक्तीने उच्चारले तर माणसाला स्वर्ग दोन बोटे उरतो. व्यवहारचतुर माणसांच्या आयुष्यातले ते तीन शब्द ’बिल मी देतो/देते’ असे असू शकतात. एखाद्या गृहिणीसाठी मुलांच्या तोंडून आलेले ’अमुक मस्त झालंय’ हे ते तीन शब्द असू शकतात पण हल्ली यच्चयावत माणसांना आवडणारे तीन शब्द म्हणजे - ’डीपी छान आहे’.

समाजाच्या विचारात, माणसाच्या स्वभावात होणारे बदल फार संथ गतीने होत असले तरी त्याचा डीपी (डिस्प्ले किंवा प्रोफाईल पिक्चर) सतत बदलत असतो ( अपवादांनी स्वत:ला वगळून घ्यावे) लिंक्ड-इन सारख्या समाजमाध्यमावर ती व्यक्ती व्यावसायिक जीवनात फारच यशस्वी आहे असे भासवणारा औपचारिक रुपातला डीपी वापरला जातो. टिंडर सारख्या डेटिंग स्थळी तर स्वाईप उजवीकडे करायचे की डावीकडे हे डीपीवरून ठरत असल्याने डीपी फारच आकर्षक वाटेल याची विशेष काळजी घेतली जाते. आपली महत्वाची ओळख म्हणजे चेहरा म्हणून यूजरने डीपी वापरण्याचा संकेत आता बहुतेक सर्व मोठ्या वेबसाईटवर असला तरी यूजर तिथला डीपी काहीसा निष्काळजीपणे निवडतो. डीपी डीपी खेळण्याची खरी मजा लोकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर लुटता येते. हा दर्शनी बदल असला तरी त्यातून काय दाखवायचे हा हेतू मात्र तिथे अढळ असतो.
AIM ने 1997 मध्ये AOL द्वारा एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप सादर केले होते तिथून या डीपी प्रकरणाला सुरुवात झाली. आधार कार्डवर खरा आणि पॅन कार्डवर बरा दिसणारा माणूस डीपीच्या कृपेने समाजमाध्यमावर देखणा दिसू लागला. साहजिकच डीपीमुळे व तो हवा तेव्हा बदलायची सुविधा असल्याने समाजमाध्यमाचे आकर्षण वाढत गेले. इतके की उद्या डीपीची सुविधा बंद झाली तर कित्येक लोक कदाचित समाजमाध्यम वापरणे सोडून देतील.
याबाबत पाश्चात्य समाजमाध्यम अभ्यासकांनी काही निष्कर्ष काढले आहेत. उदा: आशियाई लोकांना आपला डीपी प्रेक्षणीय स्थळाच्या पार्श्वभूमीवर असणे आवडते तर अमेरिकन लोकांना डीपीतून आपली छबी दाखवायला आवडते. पेन्सिल्वानिया विद्यापीठाने मध्यंतरी साठ हजार प्रोफाईल्सची पाहणी केली. यूजरच्या म्हणजेच माध्यम वापरणार्या माणसाच्या स्वभावाचे व विचारपद्धतीचे प्रतिबिंब त्याच्या डीपीमध्ये आढळून येते असा त्या पाहणीचा निष्कर्ष सहज पटण्यासारखा आहे. यूजरचे सामान्यत: ५ प्रकार असतात. ते काय पोस्ट करतात किंवा काय लाईक करतात यावरून हे प्रकार कुणालाही ओळखू येतील.
साधेसरळ किंवा स्वकोषातले, नकारात्मक विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे, सावध भूमिका घेणारे आणि बिनधास्त हे ते ५ प्रकार.
सकारात्मक मंडळींना रंगीबिरंगी फोटो, आपण केंद्रस्थानी असलेले ग्रुप फोटो डीपी म्हणून आवडतात.
नकारात्मक मंडळी डीपीमध्ये शक्यतो आपला चेहरा दाखवत नाहीत. मॉडर्न आर्ट सारखे काहीतरी अतर्क्य, अंधुक फोटो किंवा अगम्य तत्त्वज्ञानाचे संदेश ते डीपी म्हणून निवडतात.
स्वत:च्या प्रतिमेबद्दल दक्ष असलेल्या लोकांचा डीपी नेहमी नीटनेटका, क्रॉप केलेला असतो. या सावध लोकांचा मनात काय चालले आहे याचा त्यातून अजिबात पत्ता लागत नाही.
साधे किंवा स्वकोषातले लोक स्वत:ऐवजी मुला-नातवंडांचे किंवा त्यांच्यासह, आईवडिलांचे, देवादिकांचे किंवा फुलांचे फोटो डीपी म्हणून वापरतात.
ही मंडळी नकळतपणे तर बिनधास्त लोक ठरवून त्यांच्या त्या त्या वेळच्या भावस्थितीनुसार डीपी बदलत असतात. बिनधास्त लोक सकाळी पाहावे तर भारतभूषण सारखे , संध्याकाळी पाहावे तर रणवीर सिंग सारखे असू शकतात. त्यांचे त्यांनाही काही सांगता येत नाही.
या शिवाय स्वप्रेमात बुडालेले म्हणजेच नार्सिसिस्ट लोक नाटकी वाटावेत असे खास काढून घेतलेले डीपी वापरतात. त्याकडे लोकांचे लक्ष जात नसल्यास ते बैचैन होऊन डीपी बदलत राहतात. तरी पाहिला नाही तर ते तो स्टोरी किंवा स्टेटसला टाकतात.
या पलिकडे जाऊन एखाद्या मह्त्वाच्या सामाजिक घटनेशी आपले नाते दर्शवण्यासाठी काही जण डीपीचा वापर करतात. उदा: स्वातंत्र्यदिनाला डीपी म्हणून आपला राष्ट्रध्वज लावणे, आवडत्या नेत्याचा फोटो लावणे, सामना जिंकल्यास त्या खेळाडूचा फोटो लावणे अनेकांना आवडते. एखाद्या गंभीर घटनेची प्रतिक्रिया म्हणून काळा रंग दर्शवणारा डीपी ठेवणे किंवा ’मी कर भरला’,’मी लस घेतली’ किंवा ’बेटी बचाओ’ यांसारख्या बॅनरचा वापर प्रो-पिक सह करणे हा आपली सामाजिक संवेदनशीलता घरबसल्या प्रदर्शित करण्याचा सोपा मार्ग मानला जातो.
आपल्या भारतीय नजरेतून डीपीकडे बघितले तर आणखी काही वेगळे आणि गमतीदार निष्कर्ष काढता येतात.
बहुसंख्य भारतीय पुरुषांना विशेषत: तरुणांना डीपी मधून आपले सामाजिक स्थान दाखवायला म्हणजेच आपण कुणीतरी खास असल्याचे दाखवायला आवडते. बहुतेक भारतीय स्त्रियांना आपल्याइतके खूष जगात कोणी नाही असे दाखवायला आवडते. पुरुषांना हसणे थोडे कमीपणाचे वाटते. प्रसिद्ध ब्रँडच्या मॉडेलच्या चेहर्यावर असतात तसे निर्विकार, सुतकी भाव त्यांच्या चेहर्यावर असतात. त्यांनी लावलेल्या गॉगल किंवा भारी घड्याळाकडे, ते टेकून उभे असलेल्या कारकडे लोकांनी नीट पाहावे अशी त्यांची आंतरिक इच्छा असते. ते डीपीत झाडी, डोंगार, सूर्याकडे किंवा इमारतीकडे एकंदरीत भलतीकडेच पाहताना दिसतात.
याउलट बहुतेक स्त्रिया कॅमेर्याकडे थेट, रोखून बघतात. डीपी हसरा आहे ना, निदान आपण मजेत, चांगल्या आणि शक्य तितक्या बारीक दिसत आहोत ना याची त्यांनी खात्री केलेली असते. मध्यमवर्गीय तरुणींना सुरक्षिततेची भीती किंवा फेसबुकवरच्या आत्या- मामा- काकूंची आपल्यावर एक गुप्त नजर असल्याचे जाणवत असते, त्यामुळे त्या डीपीतून संस्कारी दिसण्याचा प्रयत्न करतात.
हा ताण नकोसा वाटला तर तरुण मंडळी इन्स्टाग्रामवर पळते. तिकडे जाऊन नेमके काय करायचे हे अद्याप फेसबुकी आत्या, मामा, काकूंना फारसे माहित नसल्याने त्या तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे तिकडे कॉलेजमधल्या ’ऑफ’ तासाला असते तसे मुक्त वातावरण असते. तिकडे डीपी वर एक तरी ओळ लिहावी लागते. त्या ओळीचा आणि फोटोचा संबंध नसतो. उदा: एकाच्या फोटोवर लिहिले होते ’मै नही तो कौन बे’ (हे सध्याचे प्रसिद्ध रॅप गाणे आहे) दुसरीच्या फोटोवर लिहिले होते ’लव्ह द लाईफ यू लिव्ह, लिव्ह द लाईफ यू लव्ह. ’ म्हणजे नेमके काय असले निरर्थक प्र्श्न तिकडे विचारायचे नसतात. वाक्यासह ढीगभर हॅशटॅग वापरावे लागतात. त्यात #पार्टी, फ्रेंड्स, धमाल, न्यू इयर, बेस्टी वगैरे लिहायचे असते. मुले मात्र एकमेकांना बेस्टू बिस्टू म्हणत नाहीत. इंस्टाग्रामवर मैत्रिणीला बेस्टी न म्हणणे हा दंडनीय अपराध असतो. असे सगळे केल्याने आपण ’कूल’ असल्याचे सिद्ध होते. म्हणजे काय ते विचारु नये.
पुरुष एकमेकांच्या डीपीकडे पाहतात त्यापेक्षा कितीतरी बारकाईने स्त्रिया एकमेकींच्या डीपीचे निरिक्षण करतात. एकमेकींना बदाम देऊन वाऊ, सुंदर वगैरे म्हणतात. त्या डीपी बदलतात तेव्हा हे प्रतिसाद परत आहेरात आले नाहीत तर पुढच्या वेळी फक्त ’नाईस पिक’ अशी कोमट आणि बोथट प्रतिक्रिया देतात. जवळच्या मैत्रिणी एकमेकींना ’परवाच्या डीपीमधलं कानातलं कुठून घेतलं गं’ असे प्रश्न विचारू शकतात. जिला विचारणा झाली तिचे तो डीपी लावण्याचे सार्थक झालेले असते. निरिक्षणात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या थोर स्त्रिया तर ’तुझ्या कालच्या डीपीमध्ये मागे उभ्या असलेल्या तुझ्या मैत्रिणीच्या ब्लाउजचे डिझाईन छान होते, कुठे शिवलं तिने’ असेही बिनदिक्कत विचारू शकतात. असे केल्यास आपण रिकामटेकडे ठरू की काय या शंकेने पुरुष डीपी सारख्या क्षुल्लक गोष्टीकडे लक्ष नसल्याचे दाखवतात. प्रतिक्रिया दिलीच तर ते मैत्रिणीला ’सुंदर- ऑसम’ सारख्या गोड, कमी ओळख असल्यास ’छान- प्रसन्न’ सारख्या सावध आणि मित्राला ’कुठे फिरतोय बे रिकाम्या’ या सारख्या खडूस शब्दात देतात. मित्राच्या डीपीमधल्या कारच्या मॉडेलची नोंद मात्र त्यांच्या मनात झालेली असते.
एकूण काय ,जगाने आपल्याकडे ज्या नजरेने पाहावे असे आपल्याला वाटते तसा डीपी आपण सगळे वापरतो. त्यासाठी कुणी पाठीशी आयफेल टॉवर किंवा ताजमहाल घेतात, कुणी सोबतीला प्रसिद्ध व्यक्ती घेतात तर काही जण फोटो फिल्टर वापरतात, पण त्यातले ’आपण’ किती खरे असतो!
तेव्हा डीपीला एखाद्या पाकीटावर चिकटवलेल्या तिकिटापेक्षा जास्त महत्व देऊ नये. त्या तिकिटाचा/ त्यावरील छापाचा आणि पाकीटात जे काय असते त्याचा एकमेकाशी जितका संबंध असतो तितकाच डीपीतून दिसणारी व्यक्ती आणि मुदलातली खरी व्यक्ती यांचा आपसात संबंध असतो. लोक डीपीच्या आहारी जातील म्हणूनच कदाचित संत चोखोबांनी "का रे भुललासी वरलिया रंगा" म्हणून ठेवले असावे.
तरीही जर एखाद्या व्यक्तीशी खूप दिवसात संपर्क नसल्याने काय बोलावे प्रश्न पडला असेल, एखादा मित्र/मैत्रिण/ जोडीदार नाराज असेल तर हे तीन शब्द त्यांना पाठवा आणि जादू बघा -ते शब्द म्हणजे अर्थातच ’डीपी छान आहे’.

Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Friday, June 10, 2022

दोन माणसांचा गुळांबा


म्हणजे काय! दोन माणसांपुरता? एवढाच करायचा तर इतका कुटाणा कशाला, असं तुम्हाला वाटत असेल. तर ते तसं नाही.

ही #गुळांबा कसा करावा याची रेसिपी नसून न-रेसिपी आहे. 🫢
ये उन दिनोंकी बात है जेव्हा उन्हाळी वाळवणं किंवा विशेष पदार्थ अजूनही सासूबाईच करत असत.
एका उन्हाळ्यात त्या परगावी गेल्यानं यंदाच्या गुळांब्याचं काय करायचं हा प्रश्न समोर उभा राहिला.
आपण अत्यंत हुशार असून ’त्यात काय मोठंसं’ असं मी स्वत:ला सांगितलं आणि सासूबाईंना सर्प्राईज द्यायचं ठरवलं.
सुरुवातीच्या दिवसात असले झटके बहुतेक सगळ्याच नवविवाहितांना येत असतात 😁 तर ते असो.
तेव्हा फेसबुक वगैरे नसल्याने एका रविवारी मी घरातलं मंगला बर्वेंचं ’अन्नपूर्णा’ पुस्तक बाहेर काढून त्याबरहुकूम सगळी तयारी केली.
सगळे त्यात दिल्याप्रमाणे केले.
पितळी पातेल्यात रटरटणार्या त्या सोनेरी तांबूस गुळांब्याकडे बघताना कैरी किसताना हाताला थोडंस लागल्याचं दु:ख विरून गेलं.
दरम्यान सासूबाईंचा फोन (अर्थात ट्रिंग ट्रिंग वाला) आला.
हा विषय वगळून मी त्यांच्याशी बोलत बसले.
मध्येच पळत येऊन डावाने ढवळून गुळांब्याची कन्सीस्टन्सी तपासून गेले.
अजून तरी तो सैल वाटत होता.
फोन सुरुच राहिला, गुळांबा सैल वाटत राहिला.
फोन संपला तरी गुळांबा सैल वाटत राहिला. 🤔
चांगला दाट झाल्यासारखे वाटल्यावर केव्हातरी अंदाजाने मी गॅस बंद केला.
माझा पहिलावहिला गुळांबा गार झाल्यावर खूष होऊन मी बरणीत भरायला घेतला पण त्यात घातलेला डाव पातेले सोडेचना. 🙄
मग मी खाली बसून बरणी घट्ट धरून ठेवली आणि कुठल्यातरी गडबडीत असलेल्या नवर्याला थांबवून त्यांच्या मदतीने पातेल्यातलं मिश्रण त्यात शक्तीनिशी लोटलं.
उरलेलं चाटून पाहिलं तर ते अप्रतिम खमंग लागत होतं.
थोड्या वेळाने नॉर्मल होईल याची उगाचच खात्री होती.
मग ताजं लोणी कढवलं. गरम पोळी पानात घेतली.
आता गुळांबा घेऊन त्यावर साजूक तूप घालून लहानपणापासून प्रिय असलेली चव अनुभवायची होती.
बरणीत चमचा घातला तर तो बिचारा वाकडा झाला पण आतला ऐवज घेऊन बाहेर यायचं नाव घेईना. 🤨
मग मात्र जाड डाव आत खुपसला.
पुन्हा नवर्याला बोलावून बरणी मागच्या बाजूने घट्ट धरून ठेवायला लावली आणि डावभर गुळांबा दोन्ही हातांनी ओढून बाहेर काढला.
चिक्कीकडे झुकलेलं ते प्रकरण लागत बाकी भारी होतं.
दरम्यान एकदा अचानक जेवायला ओळखीच्या एक काकू आल्या.
शेवटी काहीतरी गोड हवं म्हणून ’वाढ गं जरासा गुळांबा वगैरे काहीतरी’ म्हणाल्या. मी भीत भीत वाढला.
त्यांना कवळी असल्याने ती आत बहुतेक गुळांब्यासह खडखडू लागली असावी. गुळांब्याचा नीट आनंद न घेता आल्याने वैतागून
किंवा तो बरणीतून काढण्याची आम्हा ’दोघांची’ सर्कस पाहून
त्यांनी त्याचं नामकरण ’दोन माणसांचा गुळांबा’ असं केलं. 😬
त्या नन्तर एका लग्नात त्या भेटल्या तेव्हा म्हणाल्याच, "झाला की नाही यंदाचा ’दोन माणसांचा गुळांबा’ करून !".
तर दोन नव्हे पण चमच्याने सहज निघणारा ’एका माणसाचा गुळांबा’ करुन झालेला आहे.
फोटोत किंचित सरसरीत वाटत असला तरी निवल्यावर तो अगदी व्यवस्थित झालाय बरं का! 😃
तुमचा झाला का तयार? एका माणसाचा गुळांबा !!

Monday, May 30, 2022

एका पुस्तक प्रकाशनाची गोष्ट

 मी कार्यक्रमाच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी आवडती लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्या नवलेखकाच्या नातलगांनी आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्यातली खुर्ची धरली. एव्हाना स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान छान मुद्दे मांडायला सुरुवात केली होती. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय नेमका प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने ओघवत्या शैलीत सांगितली. बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक यथातथा किंवा बंडल आहे. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि पुढचा गिअर टाकून अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने स्तुती न करुन करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही रोखठोक सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.

उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, लेखकाच्या नात्यातल्या असाव्यात. त्या दिवशी काहीतरी सणवार असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊया, या हिशेबाने खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखकाचे मित्र, रविवारची दुपार जरा बरी गेल्याने तेवढाच एक दिवस कटला, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. दरम्यान नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती सेट आहे ना हे चाचपण्यात तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व
’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’
तत्सम काहीतरी यमक जुळवले. ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेली मंडळी दिसतात तसे ते होते. त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले.
’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे) सादर करतो’,
असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला. ते पुढे म्हणाले,
’लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’.
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (उत्सवमूर्ती लेखकांनी) नोकरीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं.
म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या,
" मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत."
जर यांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं, असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’यांचे (लेखक) गुण किती सांगावे (त्यांना आठवेना) तितके कमीच.’ लेखकाशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात.
डॉक्टर, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबद्ध व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलं. लेखकाच्या संस्थेतल्या साहित्याची आवड असलेल्या एक म्याडम. त्या स्टेजवर जायच्या कल्पनेने गांगरलेल्या दिसत होत्या. चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करत म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. लेखकाच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या.
’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (!)
नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’
असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते म्हणून आम्ही पण इतर श्रोत्यांबरोबर इमानेइतबारे टाळ्या वाजवल्या.
लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. ती बहुतेक त्याचे लोलक मोजत असणार.
आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार. लेखकानी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. आम्हाला कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही.
निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले.
तोवर मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.
लेखकांचे कुणी नातलग आभारप्रदर्शनाला उभे राहिले. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्यावर लेऊन ते उभे राहताच मी
’आभाराचा भार कशाला अन् शब्दांचे हार कशाला’
या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी मनात म्हणत त्याच पुन्हा ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्यांनी त्या ओळी म्हटल्याच.
या ओळी न म्हणणारा आभारवाला दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला लेखकाच्या दिशेने धावले. आम्ही मैत्रिणीच्या दिशेने धावलो. हौशी लेखक आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत (डायरेक्ट) ’साहित्तिक’ झाले. प्रकाशन सोहळा समाप्त झाला.
---------
आता एवढ्या खर्चिक प्रकरणापेक्षा फ्री एफबी लाईव्ह येणं आणि तीन तास ते प्रकाशन प्रकरण अटेंड करण्यापेक्षा लाईव्ह कवितेला लाईक ठोकून पुढे स्क्रोल करणं यातलं दुसरं कित्तीतरी सोपं आहे. शिवाय सध्याच्या लॉकडाऊन क्र. य आणि भविष्यातील कोरोनोत्तर काळात प्रकाशनापासून बहुतेक सगळंच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. कवितावाले निदान ५-१० मिनीटात तुम्हाला मोकळं करतात. गद्यवाले एकदा आले की तास-तासभर सोडणार नाहीत (वि.सू :हाय, नमस्कार, वॉचींग असं लिहून नंतर पळून जाणार्यांना ते ओळखून असतात) त्यामुळे गद्य मंडळींची बाजू घेण्यात तसा काहीही अर्थ नाही. (हे वाचणारे तुम्ही बावनकशी कॅटेगरीवाले आहात, ’ते’ वेगळे आहेत तेव्हा मला उगाच अनफ्रेंड करु नये 🙂 ) तुम्ही पूर्ण पोस्ट वाचावी म्हणून हे कन्क्लुजन शेवटी लिहिलं. बाकी कै नै.

Monday, April 20, 2020

पिंकीपॉलिसी


सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच आपापल्या घरातल्या मदतनीसांना ’मिस’ करतायत. आम्हाला मात्र आमच्याकडे कामाला असलेल्या पिंकीची आठवण येते ती वेगळ्या कारणासाठी. तिने आम्हाला एक असा मंत्र दिलाय की जगणं एकदम सोपं झालंय. आम्ही त्याला #पिंकीपॉलिसी म्हणतो. :-)
------------------------------------ 

’काय गं तू, दोन दिवस आली नाहीस. आधी कळवलं पण नाहीस तू.’
’हो नं, मला दोन दिवस जमलंच नाही यायला आणि मी कळवलं पण नाही.’
’पण मागच्या वेळेला म्हटलं होतं नं मी, निदान फोन करुन कळवत जा म्हणून..’
’हो नं, मागच्या वेळेला म्हटलं होतं तुम्ही’
’मग तरीही केलाच नाहीस तू फोन’
’हो नं, केलाच नाही मी फोन’

एव्हाना माझा संयम संपून मी माझ्या कामाला तरातरा निघून जाते आणि पिंकी शांतपणे कुंचा हातात घेऊन झाडू लागते. पिंकी आमच्याकडे घरकामाला येते. म्हणजे आपण तिला पिंकी म्हणूया. तिशी-पस्तीशीची, बेताच्या उंचीची, काहीशा गबदुल शरीराची, पाण्यात काम करावं लागतं म्हणून घोट्याच्या बरीच वर साडी गुंडाळणारी, ठीकठाक नाकीडोळी असलेली सावळी पिंकी. साधारणत: दुपारी दुबुक दुबुक चालत येते, तिला वाटेल तेव्हा आणि नाही येत नको वाटेल तेव्हा. दहावी झाली म्हणते. सहसा शुद्ध भाषेत बोलते. काम करत असताना टीव्हीवर जाहिरात दिसली तर खांद्यावर कुंचा किंवा हातात बादली घेऊन संपेपर्यंत टक लावून बघते. तिच्या घरी डिश टीव्ही आहे. ती रात्री रोज हिंदी 'सिरेल' आठवणीने बघते. बाकी जगाशी तिला घेणंदेणं नाही. राहत्या गावाइतपतच तिचा भूगोल मर्यादित आहे. तिच्या वॉर्डाच्या नगरसेवकाचं नाव तेवढं तिला माहित आहे. तिचं जीके इथेच संपतं.

तर तिच्या हातात कुंचा पाहून माझी वेलकम सिनेमातली ’कंट्रोल ..मोहिनी ..कंट्रॊल’ अवस्था होते. मी तिला २९५ व्या वेळेस म्हणते
’अगं आधी कपडे भिजव, मग झाडपूस कर, मग भांडी घास, तोवर कपडे मुरतात, तुझंच काम सोपं होतं. किती वेळा सांगू.’
’हो नं, तुम्ही नेहमी सांगता’
’बरं, मी कपडे भिजवून ठॆवावे तर तू केव्हा येणार, येणार की नाही खात्री नसते’
’हो नं, माझी खात्री नसते’
मी पुन्हा कामाला मनात आकडे मोजत तिथून जाते. इकडे पिंकीने कपडे भिजवले असतील याची खात्री नसतेच.
पण पिंकीच्या अशा स्टँडमुळे तिच्यासमोर दुर्वास मुनी देखील शांत झाले असते. तुम्ही लाख भांडायचं ठरवा पिंकीशी, ती ’स्थितप्रज्ञ दर्शन’ किंवा ’स्थितप्रज्ञाची लक्षणं’ असलं काही न वाचताच कोळून प्याली आहे. ती उर्मट नाही, ती मूर्खही नाही. ती न्यूट्रल गिअर मध्ये जगते. तिला मी अखेर शरण जाते याचा नवरोबांना फार आनंद होतो. मग ते अधूनमधून चहा केला आणि ती काम करत असेल तर तिचाही करतात. असं इतर घरात होत नसावं. तिला तेव्हा स्पेशल वाटतं. ती ओच्याला हात पुसून आत येते ,पंखा मोठा करते आणि त्याखाली निवांत फतकल मारुन त्यांना बशी मागते आणि फुर्र करुन चहा पिते. साहेबांची कपबशी विसळून टाकते. मी तिला चहा देते तेव्हा ती फक्त आपली कपबशी विसळून कामाकडे वळते. चहा करणे हे बाईमाणसाचे कामच आहे, असे भाव तिच्या चेहर्‍यावर असतात. सणावारी जेवताना आमटीचा घोट घेऊन ती माझ्याकडे एक सूचक (म्हणजे कायच्या काय गुळचट लागतंय हे) कटाक्ष टाकते. तिला त्यात ठेचा हवा आहे हे मला कळते.
’इतकं तिखट खाऊ नये पिंकी’ या माझ्या अनावश्यक वाक्यावर ती
’हो नं इतकं तिखट खाऊ नाई’
म्हणत शांतपणे आमटीत ठेचा मिसळते. ती तिच्या नादात जगते .तिचं एरवी अन्नाकडे लक्ष नसतं. पैशाकडे नसतं. कपडे धुताना चुकून खिशात किंवा घरात कुठे सापडले तर ५ रू असो की ५००, ती आणून हातात देते.

दारुड्या नवर्‍याच्या मारहाणीला विटून लहान मुलासह ती माहेरी परत आली आहे. तिची आई समजूतदार असल्याने तिला पुन्हा त्याच्या तोंडी न देता घरी राहू दिले गेले आहे. आई इतर घरी कामाला जाते. वडिलांना सुदैवाने व्यसन नाही. भाऊ कोणत्याच कामावर टिकत नाही, मग गावभर उंडारतो. त्याने घरी राहू दिल्याच्या बदल्यात पिंकी त्याची आणि घरची बहुतेक कामं करते. दमून आजारी पडते. सारखं पाण्यात काम म्हणून सर्दी होते. मग ती दांड्या मारते. मला हे बघवलं नाही की मी तिला, भावाला तरी आपली कामं स्वत: करायला लाव, असं सांगते. पिंकी ’हो, सांगते’ म्हणते. तिला त्याशिवाय पर्याय नाही हे आम्हा दोघींना माहित असते. तिचा मुलगा कधी तिच्याबरोबर आला आणि खाऊ घेऊन टीव्ही समोर बसला की ’आमच्या टीव्ही वर मामा फक्त ’गाने अन् पिच्चर’ लावतो’ असं सांगतो. मी तिला आमच्या घरातला पेपर तरी वाचत जा म्हणते पण चळवळी आणि राजकारण समजलं तरी तिच्या जगण्य़ात फरक पडणार आहे का या विचाराने अस्वस्थ होते. त्यापेक्षा आपण तिच्याशी कसं वागतो यावर तिची आणि कदाचित तिच्या मुलाची नजर तयार होणार आहे, फरक पडलाच तर त्याने पडणार आहे या विचाराशी मी येऊन थांबते. नकारात्मक बातम्यांनी आपलं डोकं खराब झालेलं असताना तिचा कोरा चेहरा पाहून she doesn't know that she doesn't know हेच बरं आहे असं मला वाटू लागतं.
मग वाटतं आपल्याला तरी सगळं जग कळलं आहे का? कळू शकणार आहे का?
जगात कुणाच्या तरी दृष्टीने आपलाही आयक्यू आणि भूगोल पिंकीएवढाच असू शकेल. जाऊदे.
तिला बचत करायला मात्र शिकवली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आरडीत पैसे जमा करायला हवे एवढे तिला कळते. पगाराचे बहुतेक पैसे, बोनसचे पैसे ती जमा करते.

मी घरी नसते तेव्हा बाहेरुन आल्यावर घर व्यवस्थित पुसलेले नाही आणि कोपरे नीट झाडलेले नाहीत हे मला दिसते. तेव्हा तिचा कपडे धुण्य़ाचा म्हणजे दोनदा पाण्य़ातून कपडे बुचकळून काढून थोडा झटका देऊन गळत्या धारेसह दोरीवर भिरकावण्याचा प्रकार सुरू असतो. मी तिला आत बोलावून ३४३ व्यांदा सांगते.
’हे बघ, स्वत:भोवती गिरकी घेऊन जितकं झाडलं जाईल तितकच तू झाडलयंस, कोपर्‍यात केर तसाच आहे.’
’हो नं तसाच आहे’
’आणि नीट पुसण्याचा तर प्रश्नच नाही’
’हो नं, आज मी नीट पुसलंच नाही’
’मग झाड नीट’
’हो झाडते’
’आता ओल्या फरशीवर कसं झाडशील?’
’हो नं ओल्या फरशीवर कसं झाडणार!’
’जाऊदे, मी घेईन नंतर कोपरे झाडून. उद्यापासून झाडत जा आता नीट’
’हो, घ्या झाडून, उद्यापासून झाडत जाईन नीट’

या पिंकी पॉलीसीने आमचं लाईफ सोप्प करुन टाकलंय. डेल कार्नेगी किंवा रॉबीन शर्मा वाचून किंवा शिवानीदीदीचे व्हिडिओ पाहून मला जे जमलं नाही ते सगळं या पिंकी पॉलीसीमुळे जमू लागलं. यामुळे प्रश्न सुटतोच असं नाही तरी वाद नाही की ताण नाही.
उदा: मुलाने वैतागून म्हटलं," अर्र भेंडीच का आज, किती बोर भाज्या करतेस ग तू"
तर पूर्वीची मी- "मी तरी रोज काय वेगवेगळ्य़ा भाज्या करणार, सगळ्या भाज्या खायला हव्या, उद्या होस्टेलला गेल्यावर काय करशील, ज्यात त्यात पनीर मी बिलकुल घालणार नाही. मुळात ही भेंडी पण तुला पंजाबी मसाला आवडतो म्हणून तो घालून केलीय तरी काय कुरकूर आहे. स्वत: करत जा म्हणजे कळेल, पानात पहिलं वाढलं तेवढं मुकाट्याने खायचं ...ब्ला ब्ला ब्ला...."
आताची मी - ’हो नं, आज भेंडीच केली मी’

नवरोबांशी वाजणं बंद झालं नसलं (नाहीतर मज्जा काय) तरी वादंग संपले.
उदा: पाडव्याला गुढी उभारणे
पूर्वीची मी- ११ वाजायला आले, लोकांनी गुढ्या उभारुन दोन तास झाले तरी आपली गुढी अजून उभारलेली नाहीये. आता जेवणं झाल्यावर दुपारी उभारणार का! ५ मि. च्या कामासाठी किती वेळा आठवण करुन द्यायची. मुळात दर वेळी का आठवण करायची मी. स्वत:हून कधी एक गोष्ट करायची नाही. मी आज गोड करायला विसरले तर चालेल का? मग मी म्हणू का आठवण का नाही केली. ब्ला ब्ला ब्ला....
पूर्वीचे नवरोबा- नवर्‍यानेच गुढी उभारली पाहिजे असं ब्रह्मवाक्य कुठे लिहिलं आहे का? एवढी टाईम्स स्क्वेअरला एकटी फिरणारी तू (हे ध्रुवपद म्हणजे एक वेगळी स्टोरी असते) तुला साधी गुढी उभारायला माझ्यावर अवलंबून कशाला असायला पाहिजे! समजा ११ नंतर उभारली गुढी, तर पाडवा होत नाही की काय साजरा..ब्ला ब्ला ब्ला...
आताची मी- गुढी उभारायची राहिलीय, ११ वाजायला आले.
आताचे नवरोबा- हो नं, ११ वाजायला आले. उभारतो.
विषय समाप्त. 

लॉकडाऊनमुळे घरातले वादविवाद वाढले असतील, असतील काय असणारच. मग ही पिंकी पॉलीसी वापरुन पाहा. :-)

Wednesday, February 5, 2020

लेखकराव alias ’साहित्तिक’

मी अगदी योग्य वेळेला हॉलमध्ये प्रवेश केला. जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी नागपूरची  लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. सुटले! इकडे वधूपित्याने म्हणजे पुस्तक लिहिणार्‍या नवलेखककाकांच्याच्या मुलाने आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्‍यातली खुर्ची धरली. स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान मुद्दे मांडले. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने सांगितली. 

बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक एकदम बंडल असून लेखक अद्याप साहित्याच्या बालवाडीत आहे. रिटायर झाल्यानंतर त्यांना कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या कथांचं पुस्तकबिस्तक काढून खूश करायची आयडिया पोराला सुचली असावी. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती कशी असावी असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं डोंबलाचं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने न बोलून करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखक-काकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही स्पष्ट सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.


उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, काकांच्या नात्यातल्या असाव्यात. संक्रांतीचे दिवस असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊ या, या हिशेबाने त्या खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखककाकांचे रिटायर मित्र दिसत होते. रविवारची दुपार जरा बरी गेल्याने - तेवढाच एक दिवस कटला न बा, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्‍यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती तशीच राखण्याकडे तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व ’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’ तत्सम काहीतरी यमक जुळवले. ह्यांचे नक्कीच ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असणार.

त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले. ’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ आहेत) सादर करतो’, असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला.’भावनेविना लेखन शक्य नसते. त्यामुळे लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’ अशी मांडणी केली. 
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (किती तो आत्मविश्वास!)) काकांनी (उत्सवमूर्ती लेखक- काका) नोकरीसाठी मदत केल्याबाबत त्यांचे आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं. म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत दमदार पावलं टाकत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या," मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत." 
जर या काकांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’काकांचे गुण किती सांगावे (त्यांना एकही आठवेना) तितके कमीच.’ काकांनी बालपणी खेळवलं असणार. त्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात. 

डॉ, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबंद्ध व्यक्तिला आमंत्रित करण्यात आलं. काका ज्या संस्थेतून रिटायर झाले तिथल्या मराठीच्या म्याडम. माझ्या व शेजारी बसलेल्या मैत्रिणीच्या पोटात गोळा आला. म्याडम चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करुन ओठांवरून जीभ फिरवून म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. काकांच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या. ’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (ऑ!) नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’ असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते असा इशारा कळून आम्ही श्रोते इमानेइतबारे टाळ्या वाजवत होतो.

प्रमुख पाहुणी लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. त्यामुळे ती उर्ध्व लागल्यासारखी दिसू लागली. आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार काकांना. काकांनी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. मला तर कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही. निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले. दरम्यान मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्‍या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.

काकांचा मुलगा आभारप्रदर्शनाला उभा राहिला. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्‍यावर लेऊन तो उभा राहताच मी ’आभाराचा भार कशाला अन शब्दांचे हार कशाला’ या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्याने त्या ओळी म्हटल्याच. या ओळी न म्हणणारा आभारवाला आमच्या विदर्भात दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो वेळात वेळ काढून आलेले बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला काकांच्या दिशेने धावले. आम्ही लेखिका- मैत्रिणीच्या दिशेने धावलो. 
काका आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत डायरेक्ट ’साहित्तिक’ झाले. 

Sunday, December 15, 2019

नसतोस घरी तू जेव्हा..

सोमवारची धावपळीची सकाळ. रोजच्यासारखी पीकेव्ही मधून फिरुन आले. तिथे आज मस्त दाट धुकं होतं, परत येईतो त्यात उगवत्या सूर्याचा केशरट प्रकाश मिसळला होता, मुख्य चौकात दोन मैत्रिणी अचानक भेटल्या, एक मोर अगदी जवळून दिसला आणि तिथल्या पुलावरच्या भाजीवालीकडे ताजी कोथिंबीर फारच स्वस्त मिळाली, चला आता कोथिंबीर समोसे करता येतील, त्यामुळे दिल एकदम गार्डन गार्डन हो गया था. छान मूडमध्ये घरात शिरताना वळून फाटक बंद करायला गेले. समोर कुणीतरी नवीन भाडेकरु बाई राहायला आली आहे. तिने ’आली मोठी स्टाईलमारु, माझ्याकडे नसतो फिराबिरायला रिकामा वेळ पण घर पाहा माझं, चकाचक असतं’ असा मला लुक कम कॉम्प्लेक्स देऊन गॅलरीवर हातातल्या कापडाचे फटके मारणं सुरू ठेवलं. सायन्स के बोझ का मारा लेक एका क्लासहून आला होता आणि दुसर्‍या क्लासला जायच्या गडबडीत होता. आधी घाईने त्याला नाश्ता करुन दिला. तेवढ्या गोंधळात जोकरच्या जागी कोणता नवा कलाकार घेतलाय याचा व्हिडिओ त्याच्या फोनवर त्याच्या आग्रहास्तव हातातल्या चिमट्यात पातेलं तसंच पकडून पाहिला. त्याला बाय करून वाचायच्या राहिलेल्या कालच्या पुरवण्या जमा करुन ठेवल्या. आजच्या हेडलाईन्स पाहिल्या. समोरच्या बाईचा फटक्यांचा म्हणजे साफसफाईचा आवाज ऐकून अचानक आपले अंगण पाचोळ्याने भरल्याचे आठवले आणि तरातरा झाडायला गेले. अंगण चकाचक झाल्यावर तिच्या गॅलरीकडे हळूच एक कटाक्ष टाकला पण ते पाहायला ती एरवी गॅलरीतच पडीक असलेली बयाबाई नेमकी गॅलरीत थांबली नव्हती, जाऊदे. मग आजची कामं क्रमाने आठवत मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ’त्याची’ कडकडून आठवण आली....  म्हणजे मोबाईलची.

चार्जिंगला लावलेला नव्हता. उशीखाली राहिला का! नाही. लेकाच्या टेबलवर नव्हता. किचनमध्ये.. नाही. पेपरच्या ढिगाखाली! नाही. मी अंगण झाडलं तिथे कुठे.. कचर्‍याच्या डब्यात नाही ना टाकला पाचोळ्याबरोबर! ते पण उपसून पाहिलं.. नाही. हे पाहा, मी फिरुन येताना अशी गाडी आत आणली मग शूज काढले मग .. ज्या क्रमाने जे केलं तसा अ‍ॅक्शन रिप्ले केला. पण नाही. . ट्रॅक पँटच्या खिशात! नाही. वाटेत खिशातून नाही ना पडला. की फिरताना पीकेव्ही मध्ये कुठे पडला. पण पडला तरी आवाज न यायला तो काय रुमाल आहे का! कुणीतरी आवाज देऊन सांगितलं असतं की. आणि आज चालताना मी गाणी ऐकली नाहीत म्हणजे नेला होता की नाही मुळात?

तेवढ्यात सासूबाई गडबडीने माझ्याजवळ येत म्हणाल्या, ’आज मोबाईल डोक्याशी ठेवून झोपू नकोस, नासाने सांगितलंय, कॉसमॉस किरणं मध्यरात्री पृथ्वीवर येणार आहेत, (तुझ्या आधीच सरकलेल्या) मेंदूला चांगलं नाही म्हणे. हे बघ मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलं आहे’. मी त्यांना २३५ व्यांदा शांतपणे सांगितलं की हे काही खरं नसतं.
’अगं पण नासाने का सांगितलं मग.’
’नासाबिसाने काही सांगितलेलं नसतं ओ, लोक नासा, नाना पाटेकर असली नावं टाकून काय वाटेल ते लिहितात.’
’पण लोक उगाच कशाला असं करतील!’
माझे म्हणणे फारसे न पटून त्या पुन्हा नासा किंवा नाना पाटेकरांनी आणखी काय काय म्हटलंय ते वाचण्यात गढून गेल्या. मी त्यांना थांबवून त्यांच्या फोनवरुन स्वत:ला फोन लावला आणि गुप्तहेरासारखी दबकी पावलं टाकत टवकारलेल्या कानांनी घरभर हिंडले. घरात कुठेही रिंग ऐकू येईना, वरुन हे ऐकू आलं ’इस समय आपको कोई उत्तर नही दे रहा है, कृपया थोडी देर बाद पुन: प्रयास करे’

चोर कशाला देणार म्हणा उत्तर. म्हणजे, अरे देवा! चोरीला गेला असेल की काय माझा मोबाईल! त्यातून नवा कोरा. जुना अगदीच हँग व्हायला लागला, इतका की लोक दयार्द्र नजरेने पाहू लागले म्हणून नुकताच घेतलेला. लेटेस्ट. चांगला ४८ एमपी कॅमेरा असलेला. नवर्‍याला ’भला इसकी रॅम मेरे रॅम से जादा कैसे’ असा हेवा वाटायला लावणारा.
काय काय महत्वाचं होतं त्यात, ते कुणाच्या हाती लागेल का! महत्वाचे आयडी पासवर्ड कोड भाषेत लिहुन स्वत:लाच मेल करुन ठेवलेत. पण इतके कोड भाषेत की मलाच आपण हे काय लिहिलंय ते काही वेळेला कळत नाही तर इतरांना काय कपाळ कळणार! (परवा नेटबँकिंगच्या पासवर्डचं असंच झालं, आठवेचना. सुरक्षिततेतची खबरदारी म्हणून पासवर्ड सेव्ह्ड ठेवला नव्हता. कोड भाषा कळेचना मग स्वत:शी क्वीझ खेळत बसण्यापेक्षा ’फर्गेट पासवर्ड?’ला शरण गेले. त्यात त्याने जो गुप्त प्रश्न विचारला त्याचंही उत्तर आठवेना, मेमरी आहे का खोकं असं झालं अगदी, शेवटी ओटीपी बीटीपी, दादा, पुता करून एकदाचा तो पासवर्ड नवा केला. आता पुन्हा तो लक्षात ठेवा. पासवर्ड कसा असावा यावर लेक्चर देणं सोपं, तो लक्षात ठेवणं महाकठीण.चला, निदान कॉंटँक्ट्सचं बॅकअप आहे. पण केव्हाचं तर १९४२ सालचं म्हणजे नंतर अ‍ॅड केलेलेल कॉंटँक्ट्स गेले की!! अ‍ॅप्स पण पुन्हा इन्स्टॉल करावे लागतील. करु काय ते पण आजच्या कामांचं कसं करायचं! आणि मेल ऑटोलॉगइन आहे. बापरे, असा कसा मॅडसारखा ऑटो मोड ठेवला मी, लोकांना सायबर सिक्युरिटीचं ब्रह्मज्ञान देता देता. पण ओके, त्याचा आधी पासवर्ड बदलते लॅपटॉपवरुन. चोर भी क्या याद करेगा! काही हाती नाही लागू देणार त्याच्या. अर्र पण इतर काही फ्री अ‍ॅप्सचे अ‍ॅक्सेस मिळतीलच आणि गॅलरीला पण लॉक नाही. फोटोचा गैरवापर केला तर! त्याला शिकवीन चांगलाच धडा. फिंगर लॉक आहे की, फिकर नॉट. बरं आत्ता फोन ब्लॉक करावा का! पोलीस कम्प्लेंट करावी तर काही तर आठवायला हवं नं! IMEI ट्रॅकर साठी तो पण आठवत नाहीये. डायरीत लिहिलाय वाटतं. नाही दिसतंय! अ‍ॅमॅझॉनच्या ऑर्डर इनव्हॉइस मध्ये मिळेल की. अरे वा अपना दिमाग भी चाचा चौधरी की तरह कंम्प्यूटरसे तेज चलता है. शंभर प्रश्न डोक्यात फिरु लागले.

मग आठवलं, नवरोबांचा फोन दसर्‍याच्या झेंडू खरेदीच्या गडबडीत कुणीतरी मारला तेव्हा त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली होती. दुसर्‍या दिवशी ते अपेक्षेने पोलीस स्टॆशनला गेले तर डंग डंग आवाज करत फिरणार्‍या पंख्याखाली धूळभरल्या खुर्चीत बसलेल्या एका पोलिसाने त्यांनाच उलट विचारलं, लागला का काही तपास फोनचा. एकूण पोलिस फार काही करतील अशी आशा ठेवणं वेडेपणाचं होतं. चला पुन्हा रिंग करुन पाहू, न जाणो पीकेव्हीतल्या कुणी तरी स्वत:जवळ उचलून ठेवला असेल. जगात चांगले लोक नक्कीच जास्त आहेत. रिंग जात राहिली आणि चक्क... नवरोबांचं अगदी गोड, हळू आवाजात ’हॅलो’ ऐकू आलं. युरेका ! म्हणजे फोन या बुवाकडे आहे तर, चला. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण अ‍ॅ, हं किंवा ’काय आणायचंय’ च्या ऐवजी हॅलो ! आणि इतका गोड आवाज!

’माझा फोन तुझ्याकडे कसा आणि मी इतक्या रिंग दिल्या तेव्हा का नाही उचललास?’
’कामात होतो, आत्ता व्हायब्रेट झाला तेव्हा लक्ष गेलं. ते मी सकाळी, हे ते .. तू आधीच उठलीस अलार्मच्या, तर अलार्म बंद करुन जाता जाता तुला आणून द्यायला फोन खिशात ठेवला आणि चुकून तो माझ्याबरोबर आला.’
’तो चुकून आला!’
’नाही म्हणजे मी चुकून आणला.’
’मग असं कर्तरी प्रयोगात बोल ना!’
पुन्हा गोड स्माईल (स्वत:ची चूक असल्यामुळे अतिदुर्मिळ योग)
एकूण माझा मोबाईल आता पन्नास किमी लांब गेलेला होता आणि दुपारी दोन शिवाय परत मिळणार नव्हता.
माझ्या बाजूने इतकी शांतता पाहून त्यांनी विचारलं, ’खूप महत्वाचं काम राहून जाईल का तुझं? तुझा दहा हजार करोडचा टर्नओव्हर एकद्म खालीबिली येईल का! तसं असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था अर्जंट पाठवायची’. मी बीपी न वाढू देता म्हटलं, ’मी करीन लॅपटॉपवरुन काम. जाऊ दे.’

मी कामाला लागले. नेहमीपेक्षा दुप्पट वेगात काम झालं कारण उगाच इकडे तिकडे मोबाईलमध्ये डोकावण्याचा वेळ वाचला. कामाव्यतिरिक्त थोडं लेखन झालं. घरातलं काम आटोपलं. कालचं राहिलेलं एक काम सुद्धा पूर्ण झालं. कालच्या बाकी राहिलेल्या पुरवण्यातले काही लेख वाचून झाले. वेळच होत नाही हे जे आपण म्हणतो ते केवळ या कर्णपिशाच्चामुळे हे अगदी पटलं. खूप महत्वाचं काम असेल तर मी ’रीड ओन्ली’ मोड वर असते पण आपण उत्तर दिलं नाही तरी कामाशिवाय नासा आणि नाना पाटेकर छाप निरर्थक पोस्ट स्क्रोल करण्यात वेळ जातोच नकळत. त्यात ’थंड केलेल्या लिंबाचे परिणाम’ छाप मंद पोस्ट किंवा ’बायकांनी बुरखा घालावा म्हणजे त्या सुरक्षित राहतील’ छापाच्या मूर्ख पोस्ट वाचून टाळकं सरकतं ते वेगळच. नेट ऑफ करणं किंवा सोशल मिडिया उपास बिपास असले उपाय माझ्या अजिबात कामाचे नाहीत कारण माझं काम ऑनलाईनच करावं लागतं, रोजचे टास्क पण व्हॉट्सअ‍ॅप वरच असतात आणि चेक करुन तिथेच पुढचं लिहिलं जातं. पण या निमित्ताने बॅकअपच्या बाबतीत आपण अजून काही गोष्टी (इतरांना नेह्मी मारे सांगतो त्याच) लक्षात घ्यायला हव्या आहेत हे जाणवलं. गुगल ड्राईव्हवर प्रत्येक मह्त्वाच्या गोष्टीची कॉपी ठेवलीय की नाही हे चेक करायला हवं आहे हे नीटच कळलं. (ठेवली आहे, पण अपडेट केलीय का!) मोबाईल मला कंट्रोल करायला लागलाय हे ही लक्षात आलं. मोबाईल स्वेच्छेने काही वेळ बाजूला ठेवणं वेगळं, ते मला बर्‍यापैकी जमायला लागलं असलं तरी ’मोबाईल नाहीच आहे’ अशा परिस्थितीतही काही वेळ जगता येणं मुश्कील है लेकिन नामुमकीन नही याची पण खात्री पटली. हे चुकून झालेलं मॉक ड्रील बरीच अक्कल शिकवून गेलं.

२ वाजले. मोबाईलसह त्याला ’चुकून घेऊन जाणारा बुवा’ घरी पोचला. आज दुधी भोपळ्याची भाजी असूनही त्याच्या चेहर्‍यावरचे स्मित हास्य लोप पावले नाही.
’काय मग कसा गेला अर्धा दिवस! तुझ्याशी संपर्क न झाल्याने शहा आणि मोदींचे काही निर्णय पेंडिंग तर नाही ना राहिले!’
मी ते काही मनावर न घेता.. ’छान गेला, भरपूर कामं झाली माझी. एकदोन कामं अडून राहिली खरी पण त्यामुळे काही प्रलय नाही आला. ती आता करता येतील.’
’अरेच्चा, मला वाटलं की तू आता तुझी किती अडचण झाली याचा नॉनस्टॉप पाढा वाचणार. इतकी कूल राहिलीस म्हणजे नवलच आहे.’
आता त्यांना कशाला सांगा की एक तर या मोबाईलविना जगण्याच्या शॉर्ट ट्रेलरबद्दल मला त्यांचे खरं तर आभारच मानायला हवेयत आणि दुसरं ,सर्वात महत्वाचं ,पुढे माझ्याकडून ’चुकून’ असं काही झालं तर तेव्हा वापरायला हे ’कार्ड’ राखून ठेवलेलं बरं ना! :-)

Thursday, August 15, 2019

श्रावण आणि जेवण

परवा श्रावणातल्या जिवतीचं म्हणून मैत्रिणीने जेवायला बोलावलं होतं. तिच्या हातची पुरणपोळी खास असते. कुणी कुमारिका पण यायची होती पण
शाळेच्या भानगडीत तिचं म्हणे जमलं नाही (मी जमवलंच. आयतं जेवण्याची मजा काही और असते हे तुम्हाला मी सांगायला नकोच.) तर इतकी रुचकर पुरणपोळी मिस करणार्या कुमारिकेवरुन आमच्या लहानपणीच्या बर्याच आठवणी निघाल्या.
तेव्हा कुमारिका म्हणून जेवायची बरीच आमंत्रणं येत. लहान असले तरी मी वाढणार्या बाईचं नीट निरिक्षण करत असे. त्या कर्तव्यभावनेने पदार्थ पानात पटकत असतील तर मी पुन्हा त्या घरी जात नसे. एका खास आजींकडे बोलावलं की मात्र धाराच्या जाहिरातीतला मुलगा त्याचे भोकराएवढे डोळे विस्फारून ’जलेबी!!!’ असं म्हणायचा तसं माझं व्हायचं. मग मी अगदी नवीन झगा वगैरे घालून, ’पानात काही टाकायचं नाही’ टाईप आईच्या सूचनांना हो हो करून धावत त्यांच्याकडे पोचत असे. जेमतेम दोन खोल्यांचं पण नेटकं घर. गोर्यापान, बेताच्या उंचीच्या, मोठं लालचुटूक कुंकू लावणार्या, फुलांचं सुरेख लुगडं नेसलेल्या त्या प्रसन्नवदना आजी कानडी हेल काढून ’आलीस! ये हो’ म्हणत माझं गोड हसून स्वागत करायच्या. लाकडी पाट, पाण्याचा पेला, सुबक रांगोळी अशी तयारी असायचीच. मी पाय धुवून येऊन बसले की त्या मला कुंकू लावून, दक्षिणा देऊन, बाकी पदार्थ वाढून गरम पुरणपोळ्या करायला बैठ्या ओट्यावर बसायच्या. एकीकडे त्या घोसाळ्याची गरमागरम, खुसखुशीत भजी तळायला घेत तर दुसरीकडे काठोकाठ पुरण भरलेली गोलमटोल पोळी मऊ हाताने सरसर लाटत आणि सोनेरी रंगावर टम्म भाजून तशीच माझ्या पानात ठेवून तीवर तुपाची धार धरत. मी त्यांच्या हालचाली पाहण्य़ातच दंग होऊन जाई. मग वाढता वाढता त्या माझी शाळेची बिळेची चौकशी करत, काय हवं नको विचारत. सट्ट जेवून मी अगदी खुशीत उड्या मारत घरी येत असे.
तेच आजीच्या दुसर्या एका मैत्रिणीकडे बोलावणं आलं की मी नाक उडवत असे. पण त्या आजी खूप गोड होत्या आणि माझा गालगुच्चा घेऊन त्या मला काहीतरी छान वस्तू देत असत त्यामुळे त्या मोहाने का होईना मी जायचे. त्यांचं घर मोठं आणि अगदी मोकळं होतं. त्यांची सून नोकरी करायची.स्वयंपाकाला बाई होती. तिने केव्हातरी केलेले अगोड श्रीखंड, वातड पुर्या आणि गोटा झालेली अळणी भजी एक वाजेतो गारढोण होत असत. या आजी काही लोड न घेता मी येईतो पेपर वाचत बसत. त्यांची नात अबोल होती. मी गेले की ती पलंगावर लांब बसून पाय हलवत माझं नुसतं निरिक्षण करायची, तिचे बाबा लंच ब्रेकमध्ये आलेले असले तर अतिशय शुष्क आवाजात ’काय म्हणते शाळा’ असा एक औपचारिक प्रश्न विचारून उत्तराची वाट न पाहता भिंतीकडे बघत मुकाट्याने जेवत राहायचे, मग कुणीच काही बोलायचे नाही, जुन्या पंख्याचा कंटाळवाणा आवाज येत राहायचा आणि डायनिंग टेबलवर आधीच झाकून ठेवलेल्या ताटात आजी त्या गार गार पदार्थांचा आग्रह करायच्या जे माझ्या घशाखाली उतरत नसत. पुढे पिना, बांगड्यांचे आकर्षण संपले तसं मी त्यांचं आमंत्रण टाळू लागले.
एक नातलग पण मला नेहमी बोलावत, रूचकर स्वैपाक करत आणि प्रेमाने गरम गरम वाढत सुद्धा परंतु त्यांचे मिस्टर म्हणजे आजोबा मला फार पीडत असत. म्हणजे तसं तर जगालाच पीडत असत. ते वयाच्या मानाने फारच खुटखुटीत होते आणि याचा त्यांना कोण अभिमान. मग ते सतत, माझं वय काय असेल सांग पाहू, दात बघ माझे, अजून अक्रोड फोडून खाऊ शकतो.. इ. बोलत असत. मी वय साठ म्हटले की खूश होऊन, ’हॅ, सत्तर पूर्ण. किती?’ मी- ’सत्तर’. ’वाटत नाही की नाही!’ मी-’अज्जिबात नाही’. पण दरवेळा हीच प्रश्नोत्तरं. मला वैतागून एकदातरी त्यांचे ’शंभर’ वय सांगावेसे वाटायचे पण मग आपले आमंत्रण बंद झाले तर काय घ्या म्हणून मी आपली माना डोलवत अक्रोडकथा ऐकत बसायचे.
लग्नानंतर जेवायची बरीच आमंत्रण यायला लागली. सुरूवातीला ओळख व्हावी म्हणून मी आपली सगळीकडे जात असे. नंतर (काही घरी) माझे जमेनासे झाले. का ते वाचा. एका घरी त्या बाईंना मला (एकदाचे) जेवू घालून ऑफिसची वेळ गाठायची असायची. त्या तशा चटपटीत आणि सुगरण होत्या पण कर्मकांडं आणि नोकरी या घोळात त्यांचा कल उरकण्याकडे जास्त असायचा. मी बरीच वेगाने जेवते तरीही मला त्यांची बॉडी लँग्वेज पाहून बकाबका जेवावे लागायचे. माझेही सकाळचे क्लासेस असायचे त्यामुळे मी म्हणून पाहिलं, की मी रविवारी येत जाईन तर त्या शुक्रवार आणि त्याच्याशी निगडीत पुण्यावर(!) ठाम होत्या. जरा तिखट लागले की भर्रकन पाणी देत, फटाफटा पाठ ठोकत, घड्याळाकडे एक डोळा ठेवून भराभरा वाढत. मला आपण पुण्य़ातल्या हॉटेलमध्ये जेवत असून आपल्या पाठीला वेटिंगवाल्यांचे डोळे टोचत असल्याचा किंवा कुणीतरी ’बापरे हिचा तर अजून भात खाऊन व्हायचाय, किती जेवते ही बया’ असं काही तरी पुटपुटत असल्याचा फील येई आणि घास घशात अडकत असे.
दुसर्या एका घरी त्या बाई फारच सुंदर स्वैपाक करत, निगुतीने वाढत. केळीच्या पानावर वाफवलेले शुभ्र कळीदार सुबक उकडीचे मोदक ही तर त्यांची खासीयत. त्या सासवासुनांचे आपसात मात्र अजिबातच पटत नसे. मग जेवणपूर्व काळात सासूबाई मला त्यांच्या खोलीत नेऊन सुनेच्या 'अजून हिला अंदाज म्हणून नाही...’ आणि जेवणोत्तर सूनबाई त्यांच्या खोलीत नेऊन सासूबाईंच्या ’आता शुगर असताना खायचं कशाला यांनी इतकं गोड’ टाईप तक्रारी कुजबुजत्या स्वरात ऐकवत. मला कोणतीच पार्टी निवडून चालणार नसल्याने मी गंभीर चेहर्याने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेई पण मत मात्र मोदकांना देई. पुढे सासूबाई देवाघरी आणि सूनबाई त्यांच्या सुनेकडे पुण्याला गेल्या. आता पुढील एपिसोड पाहण्य़ासाठी त्यांच्याकडच्या पुण्याच्या आमंत्रणाची मला प्रतीक्षा आहे.
एका सुगरण बाईंनी मात्र मला चांगलंच जेरीस आणलं. त्यांना सार्या मुलुखाची घाई. माणसं उठून आन्हिक आवरतायत तोवर या बाई स्वैपाक करून नैवेद्य दाखवून मोकळ्या. मला मात्र वेळ द्यायच्या त्यांच्या नवर्याच्या सोयीनुसार म्हणजे एक वाजता. सोबत आणखी एखादे मेहूण असे. त्या सगळं छान गरम करून या मंडळींना वाढत असत आणि मला मानाचं म्हणून ते रामप्रहरी दाखवलेल्या नैवेद्याचं ताट समोर ठेवत. बरं, ते पण इतकं वाढलेलं की पुन्हा काही मागायची सोयच नाही. त्यातल्या पालेभाजीने गारगुट्ट होऊन पापुद्रा धरला असे. भाताची मूद कुडकुडीत झालेली असे. त्यावरचे वरण वाळून त्रिकोणी होत असे. कढीचे आळून पिठले झालेले असे. पापड कोशिंबीरीतून ओघळलेल्या पाण्य़ात भिजून मान टाकून निजलेला असे. त्या ऐवजी पोळीचाच पापड झालेला असे आणि कोरडा लाडू बोटाने सरकवला तरी ताटात डंगडंग करीत धावत असे. बाकी लोक मात्र वाफाळत्या भातात ताजे वडे कुस्करत, गरमागरम कढीचे भुरके मारत, लुसलुशीत लाडूंच्या आग्रहाला नको नको, पुरे पुरे करत माझ्या जखमेवर मीठ चोळत असत. शेवटी मी नाना हिकमती लढवून ते आमंत्रण कायमचे परतवून लावण्य़ात आता यशस्वी झालेय. हे सगळं लिहिल्यानंतर आता मला नवी आमंत्रणं येण्याची शक्यता तशीही फारच कमी. 😃
अर्थात मी कुणाला बोलावलं तर हे सगळं लक्षात ठेवून टाळते. वरच्या काही उदाहरणांच्या तुलनेने कर्मकांडाचा उगाच बाऊ न करता मोजका पण सुग्रास स्वैपाक करणार्या, या मैत्रिणीसारखं मायेने वाढणार्या किंवा त्या मऊ हातांच्या कानडी आजींसारख्या माऊलींच्या आठवणी तुलनेने खूप जास्त आहेत. (म्हणूनच तर जग सुंदर आहे) 🙂

Tuesday, July 9, 2019

रंगात काय आहे

स्थळ- आमच्या डॉ.चे घर, आमच्या घरापासून अगदी जवळच
मी आणि सासरे (त्यांना जरा बरं नाही म्हणून इथे आलेलो) बाहेरच्या खोलीत धूळ नसलेल्या २ खुर्च्यांवर अवघडून बसलेलो असतो. आजूबाजूला बर्‍यापैकी पसारा, जुन्या कॉम्प्युटर्सचे भाग इकडे तिकडे कोंबलेले. कोपर्‍यात रद्दी आणि त्यावर गेल्या जन्मी प्यायलेल्या चहाचा कुणाचा तरी रिकामा कप.
आम्ही येऊन दहा मि. झाल्यावर एक पोरगेलासा तरुण बाहेर येऊन ’आ रहे है’ असं सांगून त्या पसार्‍यातली एक हार्ड डिस्क घेऊन गाडीला किक मारून कुठे तरी जातो. पुढची दहा मिनीटं आम्ही जाळीतून बाहेरची वाहनं बघत बसतो. एक जाडजूड बाई आतून संथपणे डुलत डुलत येऊन पुन्हा एकदा ’आ रहे है’ असं सांगून डुलत डुलत परत जातात. पुन्हा दहा मिनीट रस्त्यावरची ’गंमत’ पाहणं क्रमप्राप्त.
आता पायजमा आणि अंगाभोवती टॉवेल अशा वेषातले खुद्द डॉ. अवतरतात आणि ’आ रहा हू’ सांगून आत गुप्त होतात. आतून थोडे चमचे, बशीचे टिंडींग टुडुंग आवाज येतात. लहान मुलाने भोकाड पसरल्याचा आवाज येतो. एव्हाना मला आपल्याला पण बरे नाही असे वाटू लागते.
तोवर डॉक्टर बरा जामानिमा करून बाहेर येतात. तिसरी खुर्ची उपलब्ध नसल्याने दाखवायला आलेल्या मुलीसारखे दरवाज्यात ओठंगून उभे राहतात आणि आम्हाला स्माईल देत विचारतात ’क्या बोलते’
’कलसे जरा अंग दुख रहा है, रातभर नीट नींद नही हुई, जरा कसकस लग रही है, खानेेकी इच्छा नही हो रही है’ असे तपशील सासरे पुरवतात. डॉक्टर त्यांना न्याहाळत म्हणतात ’बराबर है, मौसम ही ऐसा चल रहा है’. सासर्‍यांना आपल्या तब्येतीचे असे जनरलायझेशन आवडत नाही. ते म्हणतात ’कलसेच होने लगा, बाकी घरमे किसिको कुछ नही हुआ’. डॉक्टर आता गावातील ओपन नाले, सांडपाणी, जंतु प्रादुर्भाव यावर मतप्रदर्शन करतात. माझ्याकडे पाहून म्हणतात ’अंकल की पिढी सकस खाके स्ट्रॉंग बनी है, अपनी तो ये उमर मे क्या हालत होगी’. मला त्यांनी त्याच्या वयोगटात ओढलेले अजिबात आवडत नाही मग मी त्यांना मूळ विषयाकडे वळवते. डॉक्टर नाईलाजाने जरा जवळ येऊन सासर्‍यांकडे निरखून पाहतात आणि जीभ काढून दाखवा म्हणतात. त्यांना बराच वेळ अ‍ॅ sss करायला लावून डॉक्टर हनुवटी खाजवत बुद्धमुद्रेने मनाशी काही विचार करतात. मध्येच आम्हाला विसरून रस्त्यावरची गंमत पाहू लागतात. मला हा चेंगटपणा आता असह्य व्हायला लागलेला असतो. अचानक डॉक्टर रेल्वे स्थानकावर आलेल्या नवीन सुविधेबद्दल बोलू लागतात. ते प्रवासी महासंघाचे सक्रीय सदस्य असल्याने रेल्वे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय असतो. लालू रेल्वेमंत्री असतानाचे बदल आणि गोयल यांच्यामुळे झालेले बदल यावर त्यांचं तौलनिक मत ते मांडू लागतात. मला आता कंटाळून रडावंसं वाटतं. ’बीपी चेक करायचं का’ असं म्हणून मी त्यांना पुन्हा मूळ विषयाकडे आणते. ’आपका बीपी ये उमर मे नॉर्मल होना चाहिए’ असं ते म्हणतात तेव्हा मी रागावून ’मेरा नही अंकलका’ असं सांगते. यावर काही न बोलता ते एकदम आत गडप होतात.
मला आता आत जाऊन त्यांना गदागदा हलवावेसे वाटते तोवर ते ३ पुड्या घेऊन बाहेर येतात. त्यात ३ रंगांच्या गोळ्या असतात. दरवाजात पुन्हा मुलीची पोझ घेऊन ते एक एक पुडी उघडत ’सुबह, खाने के बाद आणि सोने से पहले’ असे वर्गीकरण समजावू लागतात. सासरे इतक्या लांबून रंग नीट न दिसल्याने ’नीली सुबह लेनेकी ना या पीली’ असं विचारतात. डॉक्टर ’लाल’ असं उत्तर देतात. ’फिर नीली कब’ याला ते ’रात को’ म्हणतात. ’खाने से पहले कौनसी, पिली?’ ’नही खाने के बाद पिली’ असा डॉक्टर-पेशंटचा चिवडा चालू होतो. अखेर तीनही पुड्या नीट बांधून ते सरपटी थ्रो करतात, आम्ही कॅच करतो. मी पर्स काढते. त्यावर डॉक्टर ’अगला पिछ्ला हिसाब एकदम ले लेंगे ना, क्या जल्दी है’ म्हणून मला नकार देतात आणि मघाचा रेल्वेचा विषय कंटिन्यू करतात. मी उठून माझ्या मनाने काही पैसे त्यांच्या हातातच देते. न मोजता ते पुन्हा बुद्धमुद्रेने खिशात ठेवून देतात. ते आता रेल्वे ट्रॅक सोडून ’बच्चे क्या बोलते’ असं विचारतात. तेवढं बोलून आम्ही जायला उठतो. वयोमानानुसार जरा गोंधळ झाल्याने सासरे दरवाजातून मागे वळून पुन्हा एकदा पुड्या उघडून ’नीली, पीली, लाल’ चे क्वीझ खेळतात. दरम्यान महत्प्रयासाने लक्षात ठेवलेला रंगांचा क्रम आता मी पण विसरलेले असते.
घरी जाऊन सासरे जेवतात. कोणत्यातरी रंगाची गोळी घेऊन झोपतात आणि संध्याकाळी टुणटुणीत होऊन फिरायला जातात. डॉ चं नाव काय ? नावात आणि रंगात काय आहे असं शेक्सपियर आणि मोहिनीने अनुक्रमे म्हटलं आहे.
#HappyDoctor'sDay😊 #LovingFamilyDoctor

Friday, March 15, 2013

अरे स्वैपाक स्वैपाक !!


पूर्वी गप्पा ठोकायला आम्हा मैत्रिणींना जगातला कोणताही विषय चालायचा. आता हे माझं काय झालय!! परवा फोनवर मैत्रिण ’काय करतेयस’ म्हणाली, माझ्या डोक्यात ’उद्या काय भाजी करावी, मुलांना सॅंडविच द्यावे का डब्यात- नको, सारखा ब्रेड बरा नाही, तूप संपत आलं आहे- कढवायला हवं, तत्सम गद्य विचार होते. ते ऐकून ती हसत सुटली, म्हणाली," अब आया ना ऊंट पहाड के नीचे". खरच आहे, मी इतकी ’स्वयंपाकग्रस्त’ का आणि कशी झाले? इतर अनेक कामं मी करते, पण त्यापैकी ’अन्न’ या विषयाचाच विचार सर्वात जास्त का करायला लागले? माझ्या मते मी किंवा ती मैत्रिणच नव्हे, बहुतेक सगळ्या स्तरातल्या बायका आणि फक्त बायकाच (विशेषत: भारतीय किंवा एकूणच अशियाई!!) सतत हा विचार करत असतात. उद्याच्या भाकरीला पीठ नसलेल्या बाईपासून, हाताशी स्वैपाकी असलेल्या बाईपर्यंत सगळ्या... का? कुटुंबावरच्या प्रेमामुळे? (बेटा, मैने तुम्हारे लिए आज गाजर का हलवा बनाया है!!), पारंपरिक कर्तव्य म्हणून? (तुमच्याकडून होत नाही मग आता सूनबाई आणा!!), नैसर्गिक आवडीतून? (बाहुली-भातुकली वगैरे!!) कुटुंबात कौतुक होतं म्हणून (तुझ्यासारखी पुरणपोळी कुण्णालाच जमत नाही!!) की सामाजिक अपरिहार्यतेतून? की ही सगळीच कारणं मिळून!!

भुकेच्या वेळेस स्त्री-पुरूषापैकी जो कोणी घरी उपलब्ध आहे, किंवा कमी दमलेला आहे किंवा वेळ, उत्साह आणि कौशल्य यातल्या किमान दोन गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याने स्वैपाक करावा इतकं हे साधं-सोपं का असू नये असे माझे बाणेदार विचार होते. आजही आहेत, पण त्यांना जळमटं लागलीयत. सुरूवातीला मात्र ’स्वयंपाक’ हा प्रकार धाडकन अंगावर आला तरी मी त्याची दखल घेतली नाही. आधी रवा तुपावर छान भाजून घ्यायचा मग उकळतं दूध घालून ढवळायचा आणि रव्याइतकीच साखर घालून शेवटी एक वाफ आणायची.. झाला शिरा, हाय काय, नाय काय !! नवीन घरात नव्या सुनेने, म्हणजे मी, सासरच्यांना खूष-बिष करावं असं वाटण्याच्या स्वप्नाळू दिवसात हा उद्योग करून पाहिला होता, पण ते प्रकरण कढईला जे बिलगून बसलं की हलेचना..काही दिवसांनी जावेला डब्यात ’बिथरलेल्या रवा वडी’ सारखा दिसणारा तो तपकिरी पदार्थ सापडला. ’तो नक्की काय आहे, कुणी दिला, डबा तर आपलाच आहे’ वगैरे चर्चा आपण त्या गावचेच नसल्याच्या अलिप्ततेने मी ऐकली. नंतर गणपती आले. माझ्या ’पॅचवर्क’ केलेल्या गलेलट्ठ उकडीच्या मोदकाला ’काय गं बाई आकार, हेंगाडाच्या हेंगाडा’ असे आजेसासूबाईंनी म्हटले त्याकडेही मी दुर्लक्ष केले. पुढे एकदा साबुदाण्याच्या थालीपीठाने तवा सोडायला नकार दिल्याने आमची थोडी झटापट झाली. त्यातून निर्माण झालेल्या आकारांमुळे नवर्‍याने त्या पदार्थाचे ’साबुदाण्याचा अमीबा’ असे नामकरण केले. अशा लहानमोठ्या अपघातांनाही मी मनावर घेतले नाही. पण एकदा जावेकडचे कोणीतरी जेवायला येणार होते. माझ्या अतिआत्मविश्वासावर विसंबून तिने झणझणीत पातोड्याच्या भाजीचा घाट घातला. पाहुणे जेवायला बसले, पातेल्याचे झाकण काढले तर काय! आत पातोड्या आणि रस्सा यांचे मिलन होऊन दोघे एकरूप झाले होते. पळीतला तो लगदा पाहून ,धरणी पोटात घेईल तर बरे, असे मला झाले. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण असावा, म्हणजे माझ्या पाककला-क्रांतीची बीजं आधीच्या दुर्घटनांमधे रोवली गेली होतीच. आता मात्र स्वयंपाक नावाच्या शत्रूवर विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा मी पण केला.

तोवर माझा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमालीचा नकारात्मक होता. ताटातील पदार्थांपेक्षा हातातील पुस्तकाचा फडशा पाडण्यात मला जास्त रस होता. युरोप-अमेरिकेची खाद्यसंस्कृती ही खरतर किती सुट्सुटीत आहे, त्यामुळे बाईलाही जगायला वेळ उरतो असे कळत्या वयापासून वाटायचे. बाबांना जुजबी स्वयंपाक येत असे. पण तो योग आईला बरे नसताना, किंवा विशेषत: त्यांचे भांडणबिंडण झाले तरच यायचा. मीठ आणि भरपूर मोहन घातलेले गव्हाचे पीठ तरातरा घट्ट भिजवून खरपूस भाजलेले पुरीएवढे खुसखुशीत गाकर (भांडणाची पार्श्वभूमी असेल तेव्हा ते करपत देखील) आणि ताकातले-लसूण, मिरचीच्या चरचरीत फोडणीतले खमंग पिठले, ते फारच झकास आणि झटपट करत. दादाला तर शेफ व्हायचे होते पण त्या व्यवसायाला तेव्हा एवढे ग्लॅमर नसल्याने त्याचा बेत बदलला. आपल्या बाsरीक कांदा चिरण्याचा, मसाल्याच्या चमचमीत भाज्यांचा, एकही डाग न पाडता पापड भाजण्याच्या कौशल्याचा त्याला अभिमान वगैरे होता. मी वा वा म्हणत, त्याला खतपाणी घालून सोयीस्करपणे मदतनीसाच्या भूमिकेत असायचे. नोकरी करू लागल्यावर मात्र मी आईचा त्रास कमी व्हावा म्हणून फुलके करायला शिकले. ते कसे कोण जाणे, टम्म फुगायचे आणि त्याखाली माझे पाककलाविषयक सारे अज्ञान लपायचे. स्वयंपाक यायला फारसं काही डोकं लागत नाही, जरा लॉजीक वापरायचं आणि करायचं, काय त्यात मुली वेळ वाया घालवतात वगैरे तेव्हाची माझी मतं..

परंतु माणूस शेवटी खाण्यासाठी जगतो (हे साहित्य-तंत्रज्ञान-कलाबिला एरवी ठीक आहे) हे मला लवकरच कळून चुकले. हे मान्य की रूप-रस-गंधाने अन्न अधिक आकर्षक करणं, ते रांधून प्रेमाने खाऊ घालणं या सगळ्यात एखाद्या जमून आलेल्या मैफिलीसारखा अपूर्व आनंद असतो! तरी त्या हौशीचे कर्तव्यात होणारे रूपांतर नेहमीच आनंददायी कसे असेल! पुरूषाने मुख्यत: आर्थिक भार सांभाळायचा आणि बाईने घर, हेच मान्य असण्याच्या काळातल्या (तसं हे पडद्याआड आजही समाजाला मान्यच आहे) आपल्या आईचे अवघे आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात, चुलीपुढे किलोकिलोच्या पोळ्या बडवण्यात करपून गेल्याची खंत जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या तेव्हा म्हणे त्यांनी आपले ’सुपरमॉम’पण स्पष्ट करण्यासाठी एका मुलाखतीत म्हटले होते, "राजकारणाच्या धबडग्यातून वेळ मिळाला तर इतर कुठल्याही कामापेक्षा चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला जास्त आवडतं". माध्यमांनी त्यातला फक्त ’तर’च्या पुढचा भाग छापून शेवटी ’व्हाईट व्हाऊस’ पेक्षा स्वैपाकघरातच स्त्री रमते हे बिंबवलं. मतदारांनी ते सिद्धही केलं. तथाकथित पुढारलेल्या अमेरिकेची ही स्थिती मग कित्येक जुनाट रिवाजांचे चाळ संस्कृती-संस्कृती म्हणून पायात बांधून नाचणार्‍या भारताबद्दल काय बोलायचे.

थोडक्यात स्वैपाक ही आपल्याला लोकांच्या पोटातून त्यांच्या हृदयापर्यंत पोचवणारी एक सुरेख आणि जीवनावश्यक कला असली तरी ते काम बाईनेच का करायचे बुवा, याचा एक सूक्ष्म राग मनात होता आणि आहे. कधीतरी या पुरूषांनी मित्राशी बोलता बोलता दचकून ’अरे बुवा, उद्यासाठी वाटाणे भिजत घालायला विसरणारच होतो’ या काळजीने स्वैपाकघराकडे तिडबिडत धावण्याचा अनुभव घ्यावा तेव्हा त्यांना यामागचे बाईचे कष्ट समजतील असे मला नेहमीच वाटायचे. पण मोजके अपवाद वगळता या पिढीत ते शक्य नाही, निदान पुढल्या पिढीत काही बदल घडेल. अगदी हल्लीचे प्रसिद्ध शेफ निलेश लिमये किंवा संजीव कपूर हे देखील घरी बायकोच्या हातचंच जेवत असल्याचा आवर्जून उल्लेख करतात. किमान सुटीच्या दिवशी घरातील सगळे मिळून मेन्यू ठरवत आहेत, त्याची तयारी करत आहेत आणि एकत्र जेवून मागचे आवरत आहेत, ही चित्रे म्हणजे अपवादात्मक घरे वगळता दिवास्वप्ने आहेत. नवरा ’उंची-पैसा-शिक्षण’ वगैरे सगळ्या बाबतीत वरचढ असावा अशा सामाजिक धारणेच्या, आडातच नसलेली समानता जगण्याच्या पोहर्‍यात येणार तरी कशी आणि कधी! तोवर स्वैपाक हे काम घरगुती म्हणून दुय्यम आणि म्हणून बायकी मानले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न केले नाही तरी बाईला काही ते चुकत नाही. तेव्हा वस्तुस्थिती स्वीकारायची ती या उक्तीनुसार : God, give us grace to accept with serenity the things that cannot be changed, courage to change the things which should be changed and the wisdom to distinguish the one from the other.

~ Reinhold Niebuhr
एवीतेवी आपणच करायचे तर यात आपली दादागिरी... आपलं ताईगिरी म्हणजे बाईगिरी तरी चालावी !! तर नवर्‍याला नेमकी स्वयंपाकात बर्‍यापैकी गती, वेळ आली तर म्हणजे उदाहरणार्थ माझ्या कोणत्याही परिक्षेच्या काळात चटणी-आमरसासकट सगळा स्वैपाक तो तयार ठेवत असल्याने ’आपल्यावाचून अडण्याचा’ आनंद नाहीच उलट मी त्याची आजन्म ऋणी झाले आहे. शिवाय त्याला वर्षातून दोनचारदा ’दालफ्राय’, ’भरली कारली’ इ. करायचा उत्साह येतो, मग आपण सगळे चिरूनबिरून, अगदी कढई तापत ठेवून द्यायची मग ’स्वत:’ फोडणी-मसाले घालणार, ओटाभरून सांडलवंड करणार. आपण ते हसतमुखाने आवरायचे. ’काय मग, जमलय की नाही तुझ्यापेक्षा मस्त?’ अशा अर्थाने भुवया उंचावून उंचावून विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास दाद वगैरे द्यायची. खरं म्हणजे यात फार हुरळून जाण्यासारखे काही नाही पण (इतरांच्या) बहुसंख्य नवर्‍यांचा या बाबतीतला आनंद बघता, आणि त्यांना चहा सुद्धा कसा हातात लागतो हे कधी कौतुकाने तर कधी करवादून सांगणार्‍या बायका बघता आपण बरेच नशीबवान आहोत असे मला वाटू लागले आहे. निदान पुढच्या पिढीतल्या सुनेने असा लेख लिहू नये म्हणून मुलीबरोबरच, मुलाला व पुतण्याला देखील आवश्यक तेवढा स्वैपाक यायलाच हवा यावर माझा कटाक्ष आहे.

तर आता पदरी पडून ’पवित्र’ झालेल्या माझ्या पाककलेला टीव्ही वरचे रेसिपीचे कार्यक्रम, वेबसाईट्सची कृपा, पुस्तकांची मदत आणि काही तज्ज्ञ मैत्रिणींच्या टिप्स या भांडवलावर भलतेच स्फुरण चढले आहे. घरच्यांचे गिनीपिग करून त्यात प्रयोगांची भर पडते आहे. यंत्रांनी बरीच कामे सोपी केली आहेतच पण मनापासून केलं (सुरूवातीच्या ’का?’ चे उत्तर अद्याप न सापडल्याने) की कशात काहीही घालून पदार्थाला चव येते हे मला थोडेफार कळू लागले आहे. चायनीज, मेक्सीकनच नव्हे तर पंजाबी, राजस्थानी, गुजराती चवींबरोबरच पौष्टेकपणाचा टच देण्यासाठीच्या युक्त्या माहित झाल्या आहेत. उदा: सुरण, लाल भोपळा यासारख्या विचीत्र भाज्या मुलं खात नाहीत (बालपणी कोण खातं नाहीतरी!!) मग त्या उरलेल्या भाजीत पिठं-कांदा मिसळून चटकदार भजी करून खपवायची असा अनुभवी बायकांचा बेरकीपणा मी देखील उचलला आहे. त्यामुळे कधीकधी खरीखुरी भजी-पराठे केले तरी नवरा संशयाने त्यात काय घातलेय हे निरखून पाहत असतो हा भाग अलाहिदा!

कहर म्हणजे ’माझी आई’ या निबंधात मुलांनी ’she is a wonderful cook' असे माझे वर्णन केल्यावर तर एखाद्या सुमार दर्जाच्या अभिनेत्रीला ऑस्कर मिळावे तसे काहीसे मला वाटू लागले आहे. त्यामुळे आता पदार्थ हवा तसा ’घडला’ नाही तरी बिघडणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते. उलट नेहमीसाठी खाली उतरलेला ऊंट आता म्हणतोय, "या ना एकदा जेवायला..!!" :)