Monday, July 6, 2026

मराठी साहित्यातील विडंबनकाव्य : झेंडूची फुले ते तेंदूची पाने

अनुकरण किंवा नक्कल करणे ही माणसाची जन्मजात प्रवृत्ती आहे. मुलाला थोडेफार कळू लागताच त्याच्या ठायी या प्रवृत्तीची लक्षणे दिसायला लागतात. मूल बऱ्याच गोटी अनुकरणानेच शिकत असते. कधी मोठ्या मंडळींनी शिकविल्यामुळे तर कधी स्वयंस्फूर्तीनेही त्याची अनुकरणप्रवृत्ती वाढीस लागत असते. पक्षी आवाज कसे करतात, हम्मा कशी हंबरते, आजोबा कसे चालतात, बाबा कसे ओरडतात इ. मुले 3 ऱ्या 4 थ्या वर्षापासून हुबेहूब करून दाखवतात. विडंबनाचे मूळ या जन्मजात मानवी प्रवृत्तीत शोधता येण्यासारखे आहे. वेडावण्यामुळे एकीकडे जशी गंमत वाटते, तसेच आणखीही महत्त्वाचे कार्य साधते. वेडावणे ही सक्रिय टीका असते. ती दोषदिग्दर्शनही बिनतोडपणे करते. बेडावण्यामुळे मूळ व्यक्तीला आपल्यातील अतिरेकाची जाणीव होते. 

वाङ्मयीन क्षेत्रालाही हाच न्याय लागू होतो.  विडंबन हे वांग्मयीन वेडावणेच म्हणाना. तिथेही अती झाले की हसू येते नि नक्कल करण्याची उबळ येते .अनुकरण विनोदाच्या पातळीवर व बुद्धिनिष्ठ असत. चोखंदळ वाचकालाच ते आस्वाद्य होत. ज्याच विडंबन केल तो साहित्यिक खेळाडू वृत्तीचा असेल तर त्यालाही गंमत वाटते व तो आपले दोष सुधारतो अस रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याची किमया विडंबन कलेत असते

विडंबन करणे सोपे नाही. त्याचा कान तयार असायला हवा नि साहित्यदृष्टी चांगलीच चोखंदळ हवी. आविष्कारपद्धतीचा थेट अनुकार करणे भाषाप्रभुत्वावाचून साधत नाही व आशयाचा नेमका वेध घेऊन त्याचा मर्मभेद करणे हे मूळ कर्त्याच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास असल्यावाचून जमत नाही. काही नेहमीचे दाखले घेऊन हे अधिक स्पष्ट करता येईल. नाटकातली वेड्याची भूमिका कोणी वेडा वठवू शकणार नाही, तिथे वेडेपणाचा प्रतिभास (Illusion) निर्माण करणारा शहाणाच हवा. विडंबनकार मूळ कृतीचा प्रतिभासच उभा करीत असतो. वरवर पाहिल तर सर्कशीतला विदूषक वेड्यावाकड्या उड्या मारून हसवतो आहे अस वाटत; पण ती आपली विदूषकी वठविण्यासाठी तो चांगलाच कसरतपटू असावा लांगतो. इंग्रजीत Set a thief to catch a thief, असा वाक्प्रचार आहे. कारण चोरीच्या वाटा चोराला माहीत असतात. तद्वतच मूळ कर्त्याच्या वाटा विडंबनकाराला नेमक्या माहीत असाव्या लागतात.

ज्याला विडंबन काव्य म्हणतात अशी 20 तरी उदाहरणे एकनाथांच्या काव्यात मिळतील तरीसुद्धा हास्ययुक्त दोष दर्शन हा विडंबनाचा ठळक हेतू तेथे नाही. भारुड इ. लेखनाचे पर्यावसान विनोदात होत नसून वेदांत मांडण्यात म्हणजे गांभीर्यात होते त्यामुळे विडंबनाचा मागवा घेताना साधारणतः १९०० च्या पुढच्या काळाचा विचार करता येईल .त्यात कुलकर्णी लीलामृत हे एक ठळक विडंबन काव्य 1913 मध्ये आले पांडवप्रतापच्या धरतीवर शेटजी प्रताप म्हणून विडंबनात्मक ओवी ग्रंथ आलेला आहे .पण तो फारसा प्रसिद्ध झाला नाही मोरोपंती आर्यावर्तीचा थाट सही सही , गंगना मोगरे यांनी उपवास काव्यात आणलेला आहे. खाडीलकरांच्या विद्या हरण व मानापमान या नाटकातील पदे लोकप्रिय झाल्यानंतर त्यातील शब्दरचनेचा अप्रयोजकपणा व तानाबाजीचा अतिरेक माधवराव जोशी यांना खुपला. त्यांच्या थट्टेखोरपणाला जाग आली आणि त्यांनी विनोद या नाटकात खाडिलकारी पदांची विडंबनेच पदे म्हणून घातली. उदाहरणार्थ- ’माता दिसली समरी विहरत’ या सुप्रसिद्ध पदाचे”माता बसली स्वगृही रखडत,  घाशीत ताट तव्यासी पळशी’ हे त्यांचे विडंबन उत्कृष्ट उतरले आहे पण यात सर्वात खळबळ उडवून देणारी झेंडूची फुले उमलली आणि मग महाराष्ट्रात विडंबन गीतांचे पीकच आले अर्थात त्यातही दाण्यापेक्षा तणच उदंड होते.  

त्याच अस झाल : १९२० सालाच्या सुमारास काव्याकाशातले गोविंदाग्रज- बालकवींसारखे तेजस्वी तारे निखळून पडले. काही काळ अंधारल्यागत झाले, त्त्यातून काही रवि-किरण एकमेका साह्य करीत काव्याचा सुपंथ धरून पुढे सरसावले, मग काव्यक्षेत्रात सामुदायिक शेतीसारखा प्रयोग सुरू झाला. मराठीत खंडकाव्ये नाहीत ? लिहा खंडकाव्ये. गझला नाहीत ? लिहा गझला. सुनीते नाहीत ? खरडा सुनीते. बिलापिका नाहीत ? काढा गळे ! पुन्हा यांच्यातलेच टीकाकार या प्रयोगाची प्रशंसा करून पत-पुरवठा करीत होते. असा मोठा विचित्र फड सजला ! पण हे खुद्द आ० अत्र्यांनींच नेटके लिहून ठेवले आहे, ते त्यांच्याच शब्दांत देणे बरेः

"... काव्यांत क्रांति घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रांत परस्पर-प्रशंसा-संघ स्थापन झाले. तेव्हां त्यांचे ते नियम, तीं ध्येयें, त्या मंडळाच्या साप्ताहिक बैठका, तो नावि- न्याचा व वैशिष्ट्टयाचा पुरस्कार…एकीकडे संस्कृतप्रचुर जडजंबाल शब्दालंकार घेऊन सोवळी मंडळी सिद्धः तर दुसरीकडे फारसी जडजवाहीर घेऊन ओवळी मंडळी सज्ज |

काव्यदेवतेची ही विचित्र कुचंबणा पाहून अत्र्यांची जन्मजात विनोदबुद्धी जागृत झाली आणि आपल्या काव्यदैवतांच्या अवमूल्यनाच्या चिडीतून त्यांची टीकाबुद्धी उफाळून आली. या दोहोंचा जोड जमून जी अजोड साहित्यकृती पैदा झाली, तीच 'झेंडूची फुले'!

एक उदाहरणपाहूया , काळ लक्षात घ्या १३ एप्रिल १९५२ ची ही कविता आहे. श्री. राजगोपालाचारियर मद्रासचे मुख्यप्रधान म्हणजे आताचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रतिक्रियेदाखल लिहिलेली ही कविता

म्हातारा इतुका न- अवघे पाऊणशे वयमान

म्हातारा इतुका न, परि हा बनला फिरुनि जवान,  दिल्ली सोडुनि गल्लीचा हा झाला पंतप्रधान !

चष्मा काळा शोभे डोळां डोइस टक्कल छान , हातीं सोटा पंडित मोठा बृहस्पतीवर ताण !

संन्यासाचें सत्रा वेळां आणी हा अवसान , वैराग्याची वस्त्रे हातीं, संसारावर ध्यान !

सीतेसाठीं जसा धांवला लंकेला हनुमान,  मद्रासेला तसा करी हा दिल्लीहुन उड्डाण !

गांधीजींचा व्याही होता जीनांचा मेहमान , सुपीक मेंदूतून निघालें ह्याच्या पाकिस्तान !

सत्य-अहिंसा-मंत्राने हा करितो कारस्थान ,ह्या चाणक्यापासुन राखीं भारतास भगवान्

विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतीची स्मृती ताबडतोब मनात जागी होणे ही त्याच्या यशस्वितेची प्राथमिक कसोटी. अर्थात त्यासाठी मूळ कृतीही सर्वप्रसिद्ध असावी लागते. मूळ कविता आणि तिची अनुकृती यांतल्या ओळी समांतर रीतीने समोरासमोर उभ्या राहतात व तुलनेतून त्यांच्या आशयातली विसंगती जाणवून हसू येते. विडंबनाचे रोपटे असे परोपजीवी आहे. दुसऱ्या कोणत्या तरी कवितेवर कलम केल्यावाचून ते जीव धरीत नाही.

शां. शं. रेग्यांचा 'एक विडी आहे माझ्या खोल खिशात दडून' हा चरण ऐकला की 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून' हा मंगेश पाडगावकरांचा चरण जरूर आठवतो. केशवकुमारांची 'परिटा, येशिल कधी परतून ?' ही ओळ ऐकली की, रे. टिळकांची 'पांखरा, येशिल का परतून !' ही ओळ आठवते.  'पाखरा' कवितेचं विडंबन - 

परिटास-

परिटा येशिल कधी परतून ? 

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून ! उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून !

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून ! सदऱ्यांची या इस्तरिनें तव चाळण पार करून !

खमिसांचीं हीं धिरडीं खरपुस भट्टिमधे परतून ! तिच्या भरजरी पैठणिची या मच्छरदाणि करून !

गांत्रांतिल कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून ! रुमाल जरिचे आणि उपरणीं महिनाभर नेसून ! 

सणासुदीला मात्र वाढणें घेइ तुझें चोपून ! परिटा येशिल कधी परतून 

कवी थोडे, कवडे फार' हा प्रकार कोठल्याही काळी खराच असतो. त्यामुळे बांडगूळवजा निरर्थक संकेतांची भरमसाट वाढ होऊन मूळचा काव्यवृक्ष वthण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा रीतीने संकेता- तिरेक झाला की विडंबनकाराला खाद्य मिळते. साहित्यक्षेत्रातील प्रथितयश लेखक फाजील आत्मविश्वासामुळे किंवा दुर्लक्ष, घाई वा निष्काळजीपणा यांमुळे दोषास्पद बनतात, तर नवशिके अतिउत्साहीपणे नव्याचे भाट बनतात. या प्रतिगामी आणि पुरोगामी प्रवृत्तींना योग्यगामी वास्तवाची जाण विडंबनकार आणतो. 

केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांने लिहिलेली  ‘आम्ही कोण?’ ही कविता विख्यात आहे. यात त्यांनी स्वत:विषयी किंवा एकूणच कवीविषयीचा दृष्टिकोन केवढ्याआत्मविश्वासाने प्रकट केलाय पाहा. 

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥

विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।

दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।

आता याचं तितक्याच ताकदीने अत्र्यांनी केलेंलं विडंबन पाहू. 'क-हेचे पाणी' या आत्मचरित्रात अत्रे म्हणतात, “आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.” त्यातूनच झेंडूच्या फुलांची निर्मिती झाली आहे. 

आम्ही कोण  - या कवितेत केशवसुत प्रतिभावंत कवीबद्दल बोलतायत तर अत्रे  यमक्या कवीबद्दल बोलतायत. आजच्या फेसबुकवरच्या काही कुडमुड्या कवींनाही हे लागू होईल. 

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।

फोटो, मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥

किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।

चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥

ते आम्ही – परवाङ्मयातिल करूं चोरून भाषांतरे, ।

ते आम्ही – न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! ॥

डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी! ।

त्याचे वाग्धन वापरून लपवूं ही आमुची लक्तरे! ॥ २ ॥

---------------

केशवकुमारांनी म्हणजेच अत्र्यांनी 'रसिकांना चेतवणी' देताना, माझ्या फुलांचे काहीही करा; रागाने चुरगळलीत तरी हरकत नाही, पण 'तळींचे खोबरे' खायला मात्र विसरू नको, असे म्हटले आहे. 'हे तळीचे खोबरे' म्हणजे जन्मजात विनोदबुद्धीचा विलास. विनोदबुद्धीच्या विलासामुळेच 'झेंडूची फुलें' एकमेवा- द्वितीय ठरलेली आहेत. विडंबनाची निमित्ते कालांतराने विसरली जातात, ती आस्वाद्य राहात नाहीत; पण हे 'तळीचे खोबरे' म्हणजेच विनोदबुद्धी त्याला स्वतंत्र मूल्य प्राप्त करून देते. असं झेंडूची फुलेंच्या ४ ऑगस्ट १९७२ मध्ये लिहिलेल्या प्र्स्तावनेत स. गं. मालशे म्हणतात. अत्र्यांचे मन:पूत कौतुक केल्यावर ते हे ही म्हणतात की -

"नवलेखकांना दहशत वाटावी असा दरारा केशवकुमार म्हणजे अत्र्यानंतर कोणी निर्माण केला असेल तर पुलंनी-  आणखी एक रस, अंगु स्थान विद्यापीठ यासारख्या त्यांच्या लेखनात गद्यशैलीची अचूक अनुकरणे असून समीक्षेचा पडीकपणा आणि एकूण साहित्य क्षेत्रातील सांकेतिकतेत याचा मार्मिक उपहार केलेले आहे. पुलं हे कवी नव्हते याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी कविता लिहिली नाही पण विडंबन पाहता त्यांच्यातल्या काव्यप्रतिभेची चुणूक सहजपणे दिसते. "

एक भन्नाट उदाहरण म्हणजे कवी मंगेश पाडगांवकरांच्या एका कवितेचं पुलंनी केलेलं विडंबन. पाडगावकर बरीच वर्षं 'लिज्जत पापड' कंपनीच्या जाहिरातींसाठी कविता लिहीत असत. कवितांचा पापडांशी किंवा त्या कंपनीशी काही संबंध नसे, मात्र कवितेच्या निमित्तानी लोक जाहिरातही वाचतील, या अपेक्षेनी कंपनीनी हे धोरण राबवलं होतं.. तर, १९७८ सालच्या 'ललित' नियतकालिकाच्या जून महिन्याच्या अंकात "आनंदाचा घनू" ही त्यांची कविता छापून आली :

आनंदाचा घनू...

बरसला अंगावरी  आज आनंदाचा घनू...

आज मन गगनात आणि गगन मनात    माझे प्राण इंद्रधनू...

रंग श्रवणासि आले         सूर सुवासिक झाले    झाली बासरीच तनू...

नभ झाले मनभोर      मनभर निळे मोर        आणि आतुरल्या धेनू...

कोसळला प्राणभर     सावळा हा अनावर     जैसा देवकीनंदनू...

याचं पु.ल.देशपांडेंनी विडंबन केलं, ते 'ललित'च्याच जुलैच्या अंकात, ललितने मूळ कविता पान २८वर, अन् विडंबन पान २९वर छापलं..

"पाऊसू पापडू आणि एकू गीतू"

{कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांना त्याच्या 'लिज्जत' पुरस्कृत "आनंदाचा घनू" या वर्षा(सन) गीताला 'सलाम' करून}

भूमिका : चुलीवर भाजत टाकलेला पापड आणि वहीवर जुळवत टाकलेली कविता ह्या, महिला गृहउद्योग व काव्योपासना अशा द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीच्या पापडाची आणि कवितेची अवस्था काय झाली, ते टिपण्याचा एक नम्र प्रयत्न.

येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू

आले माझिया मनात आपणही गीत पाडू !

साला बादचा शिरस्ता पाळतात कविजनू

येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू !

शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू...

- घनू, इंद्रधनू, प्राणू, मोरू, देवकीनंदनू,

मनू, गगनू, श्रवणू आणि बासरीची तनू

शब्द टप्पोरे टप्पोरे बोंडे कापसाची जणू !

पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू,

स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू?

घनू गरजो, बरसो, भरो विहिरी गटारू

दिसो घनघोर घटा, गळो छप्परू टप्परू !

हाती धरिताचि पेनू गळे शाईतुनी गीतू...

- गीतातल्या पावसाशी माझी जडलीसे प्रीतू !

झरे कवितेची ओळू, होते गीताचीच शाई !

- सॉरी, शाईचेच गीत - किंवा कशाचे काहीही !

हंबरत्या धेनूबिनू, पंख पिसारून मोरू

मेघूबिघू यथासांग, रांग धरूनिया तरू...

- आणि अचानक कैसा धूर कोंदला खोलीतू !

राही अधुरे अयाई माझे पावसाचे गीतू...

आली जाग एकाएकी नाकी शिरताचि घाणू -

करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू !

कसा वाटोळा वाटोळा स्वर्णवर्णाचा लिज्जतू...

झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू !

- झड पावसाची आली, इथे गीतही भिज्जतू,

आता कुणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू ?

(कवयित्री - सौ.तरंगिणी ठिपके)

प्रिय संपादक महाराज,

अलीकडेच क-हाड - पुणे एष्टीत आम्हाला ही कविता लिहिलेला कागद सापडला. कवयित्रींच्या क-हाड कवयित्री संमेलनात पावसामुळे भिजलेल्या -आणि काव्यगायनाचा चान्स न मिळाल्यामुळे भाजलेल्याही- भावना ध्यानात घेऊन ही कविता आपल्या लोकप्रिय मासिकात छापावी अशी विनंती आहे. 

...आणखीही अश्या ब-याच कवितांचे कागद त्याच एष्टीत सापडले आहेत; पाठवू का ?

आपला नम्र

पु. ल. देशपांडे

-------------------------------------------

पण मंगेश पाडगावकरांनी स्वत:सुद्धा विडंबनं केली आहेत. 

१७ व्या शतकातले संत समर्थ रामदास यांचा दासबोध आपल्याला माहित आहेच. मंगेश पाडगावकरींनी त्या धर्तीवर म्हणजेच विडंबनरुपात लिहिलेल्या 'उदास'बोधात पाडगावकर काय म्हणतात पाहा.

आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास ।

अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे ।

त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥

या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ?

लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥

-------------

वात्रटिका हा ही या जातकुळीचा काव्य प्रकार ,हे एखाद्या प्रसिद्ध कवितेचं विडंबन नसून एखाद्या घटनेवरचं उपरोधिक किंवा मार्मिक भाष्य़ असतं. तुम्हाला नक्कीच रामदास फुटाणे यांचं नाव आठवलं असेल. राजकीय उपहासपर असलेलं एकूणच काव्यलेखन फार सजगतेनं समजून घ्यावं लागतं. फ. मु. शिंदे त्यंच्याविषयी म्हणतात- आडात नुस्तं वाकून पाहिल्यानं फार तर पारवे उडतील; तळाचा ठाव लागणार नाही. तळात नेऊन सोडणं हे फुटाणे यांच्या विडंबनलेखनाचं ध्येय आहे. लोकजीवन रसातळाला नेणारं राजकारण 'पदोपदी' खेळलं जात आहे. तो 'खेळ' आणि त्यानं होणारा खेळखंडोबा दाखवण्यासाठी गारुड्याच्या भूमिकेनं डमरू वाजवावं लागतं. 

म्हणूनच फुटाणे यांची रचना प्रासंगिक अथवा तात्कालिक नसून ती वर्तमानाच्या विरूपाची लोकरचना आहे. वर्तमान सांगणं ही प्रेरणा मानली तर वर्तमानातलं सांगणं ही प्रतिज्ञा असते. फुटाणे यांची, त्या प्रतिज्ञेची लोकरचना आहे ! 

रामदास फुटाणे यांच्या लोकरचना विडंबनाच्या, विनोदाच्या, व्यंगाच्या अंगानं येणं स्वाभाविक आहे. कृतिविडंबन, रूपविडंबन तसंच शैलीविडंबन अशा त्रिधारा इथं एकाच प्रवाहानं खळाळताना दिसतील. 

महानोर यांच्या गीताच्या अंगानं त्यांनी एका घटनेचं फार चांगलं विडंबन साधलं आहे. शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ट्रान्सपोर्टचा संप घडला. जकात रद्द करून संप संपवला. कधी रद्द केल्यानं तर कधी परस्पर फस्त केल्यानं ज'कात' नेहमीच गुप्त गळून पडत आलेली आहे.

शंकर बनात सचिवालयात प्रत्येकाची मान हलली 

म्युनिसिपालिटीची ही नार, डोळे मोडीत चालली 

"मी रात टाकली मी कात टाकली, मी लक्ष लक्ष रुपयांची जकात टाकली"

मूल्यांची पडझड तशी चालूच असते. तथापि 'चालू' गोष्ट मूल्यवान करण्याचं राजकारण घडू लागलं की विनोद आणि विचार एक होऊन, एकवटून दंभस्फोट घडवून आणतात. मर्मभेदाचं भाष्य त्यातून व्यक्त होत जातं. याचं उदाहरण आपल्याला 'वर्षा ' या  कवितेत दिसतं. 

एकमेकांना ढकलण्याची मनामनात ईर्षा आहे 

वर्षावर्षाला बदलतो म्हणून बंगला सुद्धा 'वर्षा' आहे !

रामदास फुटाणे यांच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या साध्या आणि सुगम भाषेत आहे. फुटाणे यांची व्यंगभावाची कविता ही भाष्यकविता आहे. रयतेच्या अंगानं ते भाष्य कवी मांडत असतो म्हणून तो जनहितदक्ष असतो. प्रत्येक सरकारची काही तरी 'स्कीम' येते आणि जनताच 'स्लीम' होत जाते. गल्ल्यावरचे मात्र गल्लेलठ्ठ होतात हे भाकरीच्या पापडालाही कळतं !

"झुणका म्हणाला भाकरीला- "अॅरोबीक करतेस ? फारच स्लीम दिसतेस."

भाकरी म्हणाली- "महागाईचा तवा रोजच माझ्या उशाला, 

टी.बी. च्या पेशंटला अॅरोबीक कशाला ?"

समाज आणि राजकारण, राजकारण आणि सत्ता, सत्ता आणि नीती, नीती आणि विवेक, विवेक आणि विचार, विचार आणि व्यवहार, व्यवहार आणि व्यतिरेक, व्यतिरेक आणि अन्वय, यांची रूपं रामायणातल्या ठिपक्याच्या सोनेरी हरिणासारखी इतकी झपाट्यानं पालटताना दिसतात की मती मूढ व्हावी.  ती रूपं बघा कवितेत कशी येतात

मतपेटी

येता निवडणूक जवळ । नेता दिसे शुभ्र धवल । हवे बहुजन बळ। जिंकण्यासाठी ॥ 

हा ह्या जातीचा नेता। तो त्या जातीचा नेता। सर्वांना हाती घेता। यश दारी ॥ 

हा तळातील बीसी। तो गाळातील ओबीसी । खेळती लेझीम ते दारासी। आनंदाने ।। 

मंत्रिमंडळात मात्र। बी. सी. ओबीसी. अपात्र। तेथे पन्नास टक्के पात्र। असू नये ॥ 

राखीव जागा ज्यांना दिल्या। त्यांना होती हो गुदगुल्या। मिळतील त्यांच्या फुल्या। मतपेटीत ॥ 

ज्यांचा गुंता नाही सुटत। जे जे प्रश्न असती बिकट । ते ते ठेवावे भिजत। कुजविण्या ।।

रुपातल्या विरूपाचे बारकावे टिपणं तरलतेनंच घडू शकतं. त्या तरलतेचा प्रत्यय देणं हे फुटाणे यांच्या व्यंगदृष्टीचं वैशिष्ट्य आहे असं फ. मु. शिंदे ’भारत कधी कधी माझा देश आहे’ या नावापासूनच अतरंगी वाटणार्‍या फुटाणॆ यांच्या काव्यसंग्रहाच्या प्र्स्तावनेत आवर्जून सांगतात. 

'वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या कवितेचं पाणी खोल आहे' अस पु. ल. देशपांडे म्हणतात तेव्हा त्यंनी भाष्याच्या सखोलतेवर बोट ठेवलेलं असतं.  खोलात शिरायचं असेल तर किनारे सोडले पाह्यजे; तरच विरूपाच्या लोकरचनेचा तळ गाठता येतो. याचा दाखला त्यांची सुप्रसिद्ध कविता देते - भारत कधी कधी माझा देश आहे. 

भेदाभेदांनी पोखरलेल्या देशाचं अंतिमतः काय होत असतं हे इतिहासानं कित्येकदा दाखवून दिलेलं आहे. तरीही वेदनामय वर्तमान बदलत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, राष्ट्रप्रेम ही मूल्यं दांभिकतेत दग्ध होतात तेव्हा, त्या सर्व प्रवृत्तींचा दंभस्फोट करणारा नवा उपहास शब्दांकित होतो. त्या उपहासाचे अनेक पदर इथं सापडतात. उपरोधाचा तीव्र स्वर त्यातूनच उमटत राहातो. देशाशी काहीच देणंघेणं नसलेल्यांच्या राष्ट्रभक्तीतला खोटेपणा हेरणं ही प्रस्तुत व्यंगभावातली अर्थपूर्णता आहे.

भारत कधी कधी माझा देश आहे 

आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत 

माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही 

त्यामुळे अन्य जाती-धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही 

माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे 

माझा देश माझा खाऊ आहे खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांताप्रांताची जुंपणार आहे 

जुंपल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील 

पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील 

पुन्हा नव्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी नवे टिळक नवे गांधी होतील

त्यांचेही पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील खुर्चीवर बगळे बसतील 

पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गाऊ

'हम सब एक है हिंदु-मुस्लिम भाई भाई हिंदु-सीख भाई भाई हिंदु-इसाई भाई भाई

मराठीचं माहेरघर असलेली ही नगरी. मराठीच्या वैभवाची अनेक सांस्कृतिक प्रतीकं अभिमानानं जतन करून ठेवणारी पुण्यनगरी. तिचा वर्तमान दंगलग्रस्त, तिची संस्कृती जमीनदोस्त, ही खंत इथं आहे. इथली ज्ञानाची परंपरा भाटगिरीत भव्यता मानू लागल्यानं, सत्तेचं राजकारण वरचढ होऊन बसलं. उत्सव आणि दंगल सत्तेला सारखेच प्रिय असतात, हा केवढा विरोधाभास !

म्हणूनच पुणे या कवितेत फुटाणे लिहितात 

ज्ञानी सत्तेचे भाट झाले ,पहिलवान बारमध्ये शिरले 

लक्ष्मीच्या आक्रमणापुढे, सरस्वतीचे दास हरले ।।

एकावर एक फ्लॅट उभे, वाडे पायाखाली पुरले 

उत्सव किंवा दंगलीसाठी, गणपतीपुरतेच पुणे उरले ।।

---------------------------------------------------------

विडंनबकाव्याचा प्रवास नव्या विडंबनकारांनी सुरु ठेवला पण मूळ कवितेच्या, कवीच्या शैलीच्या विडंबनाऐवजी आपल्या मनातल्या भावना मूळ कवितेतल्या मुख्य शब्दांच्या आजूबाजूला पेरून विडंबन कविता करण्याचं पेव फुटलं. दिवस तुझे हे फुलायचे ...च्या जागी दिवस तुझे हे फुगायचे हे विकसनशील महिला वर्गाला म्हणण्यात आलं. किंवा मराठी भाषेची वंचना कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा आधार घेऊन मांडण्यात आली. त्याचंच मायबोली.कॉमवर विशाखा कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेलं एक उदाहरण पाहूया.

ओळखतंय का कुणी मला ? विचारतीय मायबोली 

दीन झालीय वाणी तिची मान होती खाली ॥

थोडं ऐका सांगते काही कंठ आला दाटून 

हरवलंय ते वैभव कोणी देता का रे शोधून ॥

शब्द, अक्षरे, गमभन साधी बोली ही विसरले 

दूध वाघिणीचे मात्र, सारे घटाघटा प्यायले ॥

दिवस सरले, वर्षे गेली  'ती'ची जादू टिकली 

सहज मग जाईल कशी ओठी प्रत्येकाच्या रुळली ॥

चार मायेच्या माणसांमुळे अजून आहे टिकून 

अस्तित्वाच्या लढाईसाठी ‌द्यायचे आता झोकून ॥

खचले नाही हरले कधी वाटते एकच खंत

माझ्याकरिता थोडं कधी व्हाल का हो व्यक्त ॥

अंतर आपले वाढले तरी, जागवा मराठी बाणा

 हात हाती घेऊन फक्त 'मायबोलीसाठी' लढ म्हणा ॥

-------------------

यात आशय उत्तम आहे. मूळ कवितेच्या गण व मात्रांच्या नियमांशी , वृत्ताशी , नादाशी आणि खटक्याशी  प्रतारणा होऊ नये याचा प्रयत्न आहे पण झेंडूच्या फुलांच्या दर्जाच्या जवळपास जाणार्‍या या कविता नाहीत.  

ब्लॉगर प्रसाद शिरगावकरांनी मात्र त्यांच्या साधंसोपं.कॉम वर प्रकाशित केलेल्या ’नाच रे चोरा’ या ऑनलाईन विडंबन संग्रहात काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची चपखल बसणारी विडंबनं सादर करतात. बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या काळातली आहेत. विडंबित गीतातही व्यक्तिगत चिखलफेक टाळावी असं ते म्हणतात. हा प्रमाद अत्र्यांकडून माधव ज्यूलियन यांच्याबाबत घडला होता. त्यनंतर त्यंनाच अपराधी वाटले व त्यांनी आपल्या एका कार्यक्रमात माधव ज्यूलियन यांना सन्मानाने बोलावले.  मात्र राखून ठेवलेल्या सीटवर नेमका एका स्न्हेह्यांचा मुलगा येउन बसल्याने आपल्याला जागा नाही हे पाहून ते अधिकच रागावून निघून गेले आणि विडंबनकाव्यामुळे निर्माण झालेली दरी तशीच राहिली. 

शिरगावकर म्हणतात, काव्याचा हेतु जर नवनिर्मिती आणि व्यक्तिगत अनुभवाची अभिव्यक्ती हा आहे, तर तोच हेतु विडंबनाचाही असावा. या हेतूने त्यांनी लिहिलेल्या विडंबनगीतांपैकी हे एक . मध्यमवर्गीय दांपत्याच्या संसारातली भातुकली कधीच संपत नाही हे सांगणारं गाणं.

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना

त्या राजाचा उडतो गोंधळ कामाला जाताना

रोज रोजची सुरूच आहे त्यांची अशी कहाणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राजाला कळते आता आपली धडगत नाही

कर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही

स्टेशन वरती उरून जाते एक उदास विराणी

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

-----------------------

 सखी बैल आला मारका

आता तरी पळशील का? पळशील का? अशा स्वरूपाच्या त्यांच्या गमतीदार रचना आहेत पण प्रतिभेने स्तब्ध व्हावं असा सध्याचा एकमेव विडंबनकार म्हणजे तंबी दुराई या नावाने म.टा मध्ये दीड दमडी हे मिश्कील सदर लिहिणारे श्रीकांत बोजेवार. विदर्भात दिग्रस इथे जन्मलेल्या आता मुंबईकर असणार्‍या बोजेवार यांनी संत एकनाथ महाराजांच्या ‘नवरा नको गं बाई, मला दादला नको गं बाई’ या भारुडाला आजच्या राजकीय गोंधळाची दिलेली स्वैर फोडणी ऐकूया.

आरा आरा आरा! 

काय झालं रं मतदारा?

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

काल फलाणीकडं आज बिस्तानीकडं

परवा काशीबाईकडं, तेरवा मस्तानीकडं

मागचं झाकलं का, पुढचं पडतंय उघडं

या हेकडीच्याचं सगळंच वाकडं तिकडं

याला कुठं धरावा, या  ... ला टोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

काल म्हणं कुणाचं तरी घड्याळ फुटलं

एका काट्यानं दुसऱ्या काट्याला लुटलं

तिसऱ्यानं चवथ्याला शब्दानं पार कुटलं

याच्या घरी झोपलं आन् त्याच्या घरी उठलं

याला कुठं टांगावा, सदऱ्याला भोकंच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई...

कोण कुणाचा कुणाकडे गेला पत्ता नाही

सगळेच बिगरीतले एकालाही यत्ता नाही

जनमनाच्या खुर्चीवर काडीची सत्ता नाही

अन् लोकसेवेची कवडीची माल मत्ता नाही

एका जनार्दनी सांगतो, कुणाला लाजच नाही

हा कॅन्डिडेट नको गं बाई

मला हा उमेदवार नको गं बाई... 

असे विडंबनकार सध्या दुर्मिळ झाले आहेत. मुळात चांगले कवीच दुर्मिळ झाले आहेत. 

स्त्री म्हटली की आक्रोश, वेदना, पाऊस म्हटला की नक्षी पक्षी अशा ठराविक प्रतिमा , त्यांना मिळणारे लाईक्स , या नार्सिसिझममध्ये गुतंतल्याने अभ्यासोनि प्रकटावे हेअपवाद वगळता आता दिसत नाही. 

सोशल मिडियामुळेसाहित्यक्षेत्रातली सुमारांची सद्दी वाढली आहे. आपण ही वाचक म्हणून परिघापलिकडे जाऊन वाचतो का हे स्वत:ला विचारायला हवं आहे. या पार्श्वभूमीवर विडंबन कशाला म्हणू नये हे ही आपल्याला कळावं यासाठी ’एका अनामिकाने ’खोडसाळ’ या नावाने झेंडूच्या फुलांऐवजी ’तेंदूची पाने’ नाव घेऊन मनोगत या वेबसाईटवर एक जबरदस्त उदाहरण दिले आहे. या उदाहरणानेच ’झेंडूच्या फुलांपासून  सुरू केलेला विडंबनकाव्याचा प्रवास तेंदूच्या पानावर पोचला आहे.

'स्वयंवर झाले सीतेचे' या गदिमांच्या रामायणातील गीताची इथे फक्त  चाल वापरली आहे. ते त्याचे विडंबन नाही हे लक्षात घ्या. तर या गीतात खोडसाळ म्हणतात. 

साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे

पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे

उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही

नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही

फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही

तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई

कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा

अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा

अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?

कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता

साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

विडंबन झाले कवितेचे॥धृ॥

---------

आता इतकी चर्चा विडंबनावर केल्यावर मलाही स्फुरण चढले होते त्यात आषाढी एकादशी आली आणि सुमार अभंगांना उत आला. टाळ चिपळया खेळ मेळ तीच प्रतीके घातलेले साचेबद्ध अभंग. लोहा लोहे को काटता है या न्यायाने या दरवर्षीच्या वैतागाला मी दिलेले हे अभंगोत्तर 

आज सारे कवी अभंगात दंग  | बघे पांडुरंग वैतागुनि

शब्द पंढरीत तुकडे शोधिती  | यमक साधिती एकदाचे

विठ्ठलाचा टिळा गुगलाचा मॅप | लोणकढी थाप  मारुनिया 

देऊळ राऊळ तन मन धन | रचती मोजून शब्दविटा

शब्दांच्या राशीत सापडेना भाव  | तरी त्याला नाव अभंगाचे

तरीही येईना अभंगाला गोडी | वरई, खिचडी  खाई कवी

सजविण्या रूप  घाली कॅलिग्राफी  | एआय फोटोग्राफी  फेसबुकी

लाईक ऐवजी   हा हा हा चुकुनी | केल्याने मोहिनी   ब्लॉक झाली


Monday, June 22, 2026

नर्मदे हर - अमरकंटक

 

’भारतीय साहित्य की मूलदृष्टी एवं समकालीन वैचारिक परिदृश्य’ हा अभ्यास वर्ग जूनमध्ये अमरकंटकला ठरला. इतक्या दूर जावं की नं जावं विचारत पडले पण अनायासे नवीन शिकण्याची आणि बघण्याची संधी गमवायची नव्हती. महेशला सुट्टी असल्याने घरची काळजी नव्हती. निकिताची कंपनीही होती पण एकाही गाडीचं आरक्षण उपलब्ध नाही. शिवाय थेट गाडी नाही. गुगल करून आकडेमोड केली आणि म्हटलं ’देख लेंगे’. काळजी करायला ही काही कुटुंबाची ट्रीप नव्हती. केळकर सरांनी नागपूरहून अमरकंटकला कारने जाऊया म्हटल्यावर निदान जाण्याचा प्रश्न सुटला. बरोबर सँडविच, ठेपले घेतले होते. जंगलातल्या डोंगरावर असलेल्या या स्थळाच्या माथ्यावर पोचायचं होतं. हजारएक मीटर उंचीवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर मैकल, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात कुठेशी अमरकंटक वसलेलं आहे,  ते भारतातलं अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं एवढीच माहिती या स्थानाबद्दल होती. त्याचं एक कारण तिथलं नर्मदानदीचं उगमस्थान. तर निघालो. 

नागपूरच्यापुढे पेंच अभयारण्य पार करून जबलपूरमार्गे घटीया, बिछीया अशी याकारांत गावं ओलांडत कार जात होती. मध्यप्रदेशातली खेडी अपेक्षेपेक्षा स्वच्छ, बरीच घरं पांढर्‍या रंगात रंगवलेली अशी नेटकी पाहून आश्चर्य वाटलं. जसजसं अमरकंटक जवळ येऊ लागलं, तसतसं परिसरातली घनदाट वनराई , वनराई नसून जंगल आणि मोहक वाटणार्‍या डोंगररांगा गूढ वाटू लागल्या. रस्त्यातून सुर्र्कन जाणारे ससे आणि लांबून चमकणारे कोल्ह्याच्या पिल्लांचे डोळे दिसू लागले. समोरुन दहा-पंधरा मिनीटांनी एखादीच गाडी येत होती. मागे एकही दिसत नव्हती. इथे गाडी बंद पडली तर ! पुन्हा मनात.. ’देख लेंगे’

नऊ साडेनऊ तासांनी अभ्यासवर्गाच्या जागी म्हणजे अमरकंटकजवळच्या भव्य इंदिरा गांधी जनजातीय विश्वविद्यालयात पोचलो. सोय उत्तम होती. शुद्ध गोड हिंदी बोलणार्‍या आयोजकांनी स्वागत केलं. गरमागरम जेवलो. एक एक गाड्या येऊ लागल्या होत्या. दमल्याने अनौपचारिक काव्य संमेलनात श्रोता म्हणून सहभागी व्हायचंही त्राण उरलं नाही. गाडी घ्यायला येईतो बरं दिसणार नाही म्हणून दोन तीन कविता ऐकल्या. इंदोरच्या वाणीने (महिला) स्वत: गाऊन सुंदर स्वरचित शारदास्तवन सादर केलं. मग एका प्राध्यापकांनी एक न-कविता सादर केली. ’आदमी दौ कौडीका’ असं ध्रुवपद आलं की ते 'आदमी?' म्हणत आणि आम्ही कोरसमध्ये ’दो कौडीका’ म्हणायचो. ती कविता संपल्यावर मनोमन हुश्श् केलं. केळकर सरांनी झकास वात्रटिका आणि निकिताने एक जोशपूर्ण कविता गाऊन सादर केली. दरम्यान न-कवितावाले ’एक और नज्म’ का काहीतरी म्हणत पुन्हा सरसावले तेव्हा ’देख लेंगे’ चा धोका न पत्करता मी चतुराईने गाडीत जाऊन बसले.  

भव्य विद्यापीठ परिसरातल्या तिमजली ट्रान्झिट क्वार्टरमध्ये राहण्याची व्यवस्थित सोय केलेली होती पण आम्ही दोघी म्हणजे एकूण चार कौड्या तिथे पोचेतो वीज गेलेली. साहजिक लिफ्ट बंद. एक बेडूक उडी मारून अंगावर. मग आमचा कलकलाट. टॉर्च लावायचा तर मोबाईलपण एका काडीवर आलेला. पुन्हा एकदा मनात ’देख लेंगे’ म्हटलं. पण काय देखणार कारण अंधार गुडुप. तेवढ्यात वीज आली . ट्न्न आवाज करुन जीव भांड्यात पडला. हलका पाऊस पडून गेल्याने  हवेत रात्री गारवा होता त्यामुळे शांत झोप लागली. 

सकाळी ठरल्या वेळी कुलदीप घ्यायला आला. न्याहारी करून अभ्यासवर्गाच्या सभागृहात पोचलो. देशभरातून सत्तरेक लोक आले होते. महिला कमी होत्या. बीजभाषण उत्तम झाले. पाठोपाठ एक एक सत्र सुरू झाली. उत्तम हिंदीतून सगळे वक्ते अभ्यासपूर्ण बोलत होते. निकीताला इतकी हिंदी ऐकायची सवय नसल्याने एका सूचनेचा तिने अर्थ विचारला. ’वॉशरूम इज अपस्टेअर्स’ हा अर्थ ऐकताच ती हसत बसली. 

’भारतीय साहित्य की मूलदृष्टी’, ’भारतीय साहित्यपर वैश्विक प्रभाव’, ’समकालीन वैचारिक परिदृश्य’ इ, विषयांवर सविस्तर आणि दीर्घ उद्बोधन व नंतर प्रश्नोत्तरं होत होती. (अभ्यासवर्गाचा दर्जेदार आशय हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) भोजनव्यवस्था चांगली होती पण मेसचं असल्याने असेल सगळ्या मसाल्यांची चव एकसारखी होती. कोफ्ता करी असो वा आलूवडा वा दाल, डोळे मिटले तर काय खातोय हे ओळखू यायचं नाही त्यामुळे आपण फारच आध्यात्मिक झालो काय असं वाटू लागलं. खरं तर हा प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नव्हतं, तर साहित्य, निसर्ग, अध्यात्म आणि शांतता याचा एकजिनसी अनुभव होता. (कदाचित म्हणूनच पदार्थांची चव एकसारखी लागत असावी 😊 ) 

रविवारी कितीतरी दिवसांनी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. न्याहारी करून पुन्हा सत्रांना सुरुवात झाली. कालच्या विषयांचे उर्वरित मुद्दे व सारांश असं आजचं स्वरूप होतं. प्रत्येक सत्राआधी विस्तृत पुस्तक परिचय होता. बंगालच्या ’आनंदमठ’ पासून आंध्रातील प्रख्यात ’पोतन्ना’ भागवतापर्यंत विविध पुस्तकं जवळून कळली. तेलंगणाच्या एका विद्वानांनी पोतन्ना भागवत त्यातल्या वृत्तबद्ध रचनांच्या उदाहरणासह त्यांच्या द. भारतीय हेलातल्या हिंदीमध्ये इतकं भन्नाट सादर केलं की तेलुगुतले काही संदर्भ समजत नसूनही सगळे दंग होऊन ऐकत राहिले. 

समारोपीय सत्र संपताच एकमेकांचे संपर्क नोंदवून, जेवून, सामान डिकित टाकून सर्वांचा निरोप घेतला. 

------------

रात्री एक वाजता बिलासपूरहून ट्रेन होती. तिथे पोचायला साडेआठला पेंड्रा रोड नामक स्टेशनपासून गाडी होती. मधल्या वेळात अमरकंटक दर्शन करायचं ठरलं. गीतांजलीचं आरक्षण अद्याप वेटिंग होतं. ती काळजी दर्शवताच सोबतचे दिनेशजी म्हणाले, "मोहिनीजी, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते." त्यामुळे ’देख लेंगे’ म्हणत विद्यापीठ सोडलं. वाटेत दोन तीन मंदिरामध्ये दर्शन घेतलं. जलेश्वर महादेव हे मंदिर बारावं ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करत होतं. एक भाग छत्तीसगडमधला लागे तर पुढचा भाग म. प्रदेशातला त्यामुळे आता नेमकं कोणत्या राज्यात आहोत हे पाहणं सोडून दिलं. एक गोष्ट कॉमन होती. निसर्गाची समृद्धी. दर्शनार्थी टिपीकल उत्तर भारतीय. भांगात सिंदूर भरलेल्या आणि ब्रोकेडच्या चकचकीत साड्यांमधल्या बायका. हाताशी लागतील ते कपडे घातलेले पुरूष. स्वस्त फिल्मी कपड्यातल्या सावळ्या तरूण मुली. भडक रंगवलेल्या मंदिरांच्या परिसरात जिकडे तिकडे लाल चुनरींच्या गाठी बांधलेल्या. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल फोन आणि देवाला पार्श्वभूमीवर ठेवून सेल्फी काढायची धडपड. एक माणूस तर डोकं पिंडीवर टेकलेलं आणि बुबुळ फोटो काढणार्‍याकडे फिरवलेलं अशा चमत्कारिक स्थितीत बराच वेळ होता. बटबटीत सजावट, भक्तांचं मोठमोठ्याने बोलणं, घंटा बडवणं, बाहेर खेळणी, जांभळं, पूजेचं सामान विकणार्‍यांचा कोलाहल यामुळे प्रसन्न वाटेना. 

अनुपपूर जिल्ह्यातल्या अमरकंटकमध्ये प्रवेश करताना मात्र पर्यटनातून आलेली समृद्धी आणि वेगळीच शांतता जाणवू लागली. टोकदार डोंगरांच्या माथ्यावरचं ईश्वरी आलय या अर्थाने अमरकंटक नाव पडल्याचं सांगतात. कालिदासाच्या साहित्यात याचा ’अमरकुटा’ असा उल्लेख आहे, ज्याचा अमरकंटक अपभ्रंश झाला असंही ऐकलं. शिव-पार्वतीने इथे तपस्या केली होती असं मानतात त्यामुळे याला तीर्थराज मानलं जातं. नर्मदेबरोबरच हे सोन आणि जोहिला या नद्यांचंही उगमस्थान असल्याचं तिथे गेल्यावर कळलं. यातली जोहिला बघण्याचा काही योग आला नाही. या नद्यांविषयी एक आख्यायिका कळली ती थोडक्यात -

अमरकंटक नावाच्या राजाला नर्मदा नावाची सुस्वरूप मुलगी होती. राजाने तिचा विवाह शोण ‍(सोन !) राजाशी ठरवला. विवाहाच्या वेळीच त्यांची प्रत्यक्ष भेट होणार होती. परंतु आपला मृत्यू जवळ आल्याची राजाला जाणीव झाल्याने त्याने घाईघाईने नर्मदेला राज्याभिषेक करून राज्यकारभार तिच्या हाती सोपवला. राजा निवर्तला. कालांतराने आधीच ठरलेला विवाह पार पडावा म्हणून प्रतीकात्मक आपली अंगठी झोला (जोहिला !) नावाच्या दासीबरोबर तिने शोण राजाकडे पाठवली. झोला दासीच नर्मदा आहे असं समजून त्यानं तिचं प्रेमाने स्वागत केलं. झोला धूर्त होती. संधीचा फायदा घेऊन तिने विवाह उरकून घेतला. इकडे वाट पाहून नर्मदेने शोण राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. झोलाने तिची ओळख नाकारली. खिन्न मनाने नर्मदा तिथून निघाली पण परत न जाता मैकल पर्वतावर ध्यानस्थ बसून शंकराला प्रार्थना केली. त्या समाधीत नर्मदा देहरूपाने विरघळली आणि पाण्याच्या रूपाने खाली वाहू लागली. नर्मदा नदी झाली.. भारतातील सर्वात प्राचीन नदी. चंद्रवंशातल्या पुरुखा राजाने तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न केले. त्याने मागितलेल्या वराप्रमाणे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठवले. अशीही तिच्या उत्पत्तीविषयी आणखी एक कथा ऐकली. 

नर्मदेवरच पीएचडी केलेल्या दिनेशजींचं वाक्य आठवलं- गंगा धर्म का, जमुना प्रेम का, नर्मदा भक्ती का, गोदावरी तप का प्रतीक है. 

Pataleshwar Temple | Sonmuda

साहजिक अमरकंटकचं मुख्य आकर्षण म्हणजे नर्मदा उगम कुंड पण केळकर सरांच्या ताईच्या ओळखीतून सोबत आलेल्या वाटाड्याच्या सूचनेनुसार आधी युनेस्को हेरिटेजच्या अंतर्गत आलेल्या कलचुरी काळातील पाताळेश्वर मंदिरात गेलो. हे तत्कालिन शंकराचार्यांनी ११ व्या शतकात राजाच्या साहाय्याने वसवलेलं मंदिर. दहाव्या शतकात हा प्रदेश चेदी शासकाच्या ताब्यात होता. आजही त्या काळातली मंदिरं आणि इतर भग्नावशेष दृष्टीस पडतात. 

या परिसरातलं कुंड हेच मूळ उगमस्थान असं काही स्थानिक म्हणतात पण त्याला मान्यता नाही असं वाटाड्या म्हणाला. या मंदिरांची वास्तुकला पाहण्यासारखी आहे. सुबक दगडी बांधकाम, कोरीव शिल्पं पण आत दिवे नसल्याने गडद अंधार्‍या गाभार्‍याच्या जाळीला डोळे लावून विष्णू आणि शिवलिंगाचं दर्शन घेतलं. 

परिसरातच एका भल्या मोठ्या पिंपळपारावर मोबाईल चार्जिंगला लावून बसलेल्या साधूबुवाशेजारी बसून कॉफी घेतली. 'नदीष्ट' मध्ये लेखकाला भेटणार्‍या माणसांसारखी अनेक माणसं इथे वावरत असणार. त्यात ही तर नर्मदामैय्या. या माणसांसाठी ही नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती पोषणकर्ती आहे, सोबती आहे. काहींसाठी  गुरू आहे, कुणासाठी साधना आहे तर कुणासाठी उपजीविकेचं साधन. 

रस्ता ओलांडून शुभ्र कमानीतून समोरच्या नर्मदा मंदिर परिसरात प्रवेश केला. सर्वत्र घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण होतं. डावीकडे धर्मशाळा, उजवीकडे उगम-परिसर. हे देवीचं ३९वं शक्तीपीठ असून त्याला ‘चंद्रिकापीठ’ म्हणतात. कमानीपाशी दोन मध्यमवयीन, देखण्या, केशरी वस्त्रातल्या, तेजस्वी म्हणता येतील अशा बायका दिसल्या. केस अगदी बारीक कापलेले. जवळ एकेक काठी आणि पिशवी होती. 'वॉल्डन' लिहिणार्‍या थोरोचा ’simplify, simplify’ हा मंत्र आचरत निसर्गाशी तादात्म्य पावल्या असाव्यात, इतक्या निश्चिंत, प्रसन्न दिसत होत्या.  

Narmadamaiya udgam mandir | Kund | ShreeYantra  

काही थकलेले पण चेहर्‍यावर अतीव समाधान असलेले परिक्रमावासी दिसत होते. त्यांच्यासाठी कुणी उलट जाऊ नये म्हणून एका रेषेच्या पलीकडे वेगळॆ प्रवेशद्वार व निर्गमन स्थान होते कारण परिक्रमा करताना नर्मदा नदी नेहमी परिक्रमावासीयाच्या उजव्या हाताला असावी असा नियम आहे. नर्मदा ही भारतातील एकमेव अशी नदी आहे जिची पूर्ण परिक्रमा केली जाते. अमरकंटकच्या या उगमापासून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपरिक नियम आहे. 

हा कुंड परिसर पूर्ण पांढर्‍या संगमरवरात बांधलेला आहे. पण पाण्यात टाकलेल्या चढावामुळे पाणी गढूळ दिसत होतं. तेच काही जण बाटल्यात भरून घेत होते. मी फक्त पाण्याला स्पर्श करुन डोळ्याला लावलं आणि नमस्कार करून मैयाच्या दर्शनाला

गाभार्‍यात गेले. बाहेर एक छोटा दगडी हत्ती आहे. त्याखालून गेलं की पापं नष्ट होतात असा समज आहे. अभ्यासवर्गात दिल्ली विद्यापीठाच्या एका प्राध्यापिकेनं ती कशी त्याखालून जाऊ शकली वगैरे वर्णन केलं असल्याने उत्सुकता होती. बारीक माणसाची आणि लहान मुलांची पापं लगेच नष्ट होत होती तर जाड किंवा वयस्कर माणसं मध्येच अडकून पापासकट परतत होती. काहींना तर नातेवाईक ओढून काढत होते. एकूण स्थिती पाहून आम्ही पापं तशीच ठेवायचा निर्णय घेतला. प्रसाद विकत घेतला , निकिता आणि मी एका भिंतीवर लिहिलेलं नर्मदाष्टक चालीत म्हटलं आणि बाहेर आलो. अभ्यासवर्गातली आणखी काही मंडळी बाहेर भेटली. 

लगतच भीमाने वनवासात असताना बांधलेलं कमळाचं तळं होतं. किनारा अस्वच्छ , जलपर्णी वाढलेली पण तळं मात्र सुंदर होतं. नाव इंद्रदमन. ते इंद्रियदमन असावं असं मी मनाशी ठरवून टाकलं.   

वेळेअभावी कपिलधारा दूधधारा धबधबा पाहण्याचा विचार एकमताने रद्द केला. (हॅ, मग काय पाहिलं !) ४० वर्षांपासून (हे जरा अतीच वाटलं) निर्माण स्थितीत असलेल्या श्रीयंत्राला भेट दिली. त्याचं प्रवेशद्वार हा आता अमरकंटकचा आयकॉन झालं आहे. त्याचा टॉप व्ह्यू सुरेख होता. अजूनही ते अपूर्ण आहे. पुढे गर्द झाडीतून प्रवास करत सोनमूडा इथे पोचलो. 

इथून सोन नदीचा उगम पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. डोंगरांच्या कुशीतून उगम पावणाऱ्या या नदीचं दृश्य देखणं होतं पण नदीचा प्रवाह उन्हाने आटून अधेमध्ये बारीक धाराच दिसत होत्या. माकडांना चुकवत शंभर फूट खाली व्ह्यू पॉईंटला जाऊन पाहिलं तर अफाट पसरलेलं विविध हिरव्या छटा ल्यालेलं अफाट जंगल आणि त्यातच विलीन होत चाललेला सूर्याचा केशरी गोल. पुन्हा वर चढून कमानीबाहेर आलो. वाटाड्याच्या भावाचं समोरच विविध वस्तू भांडार होतं. त्याची पुतणी धावत येऊन काकाला बिलगली. गल्ल्यावर निवांत बसलेल्या तिच्या आईने जेठजींकडे लक्ष जाताच घाईने डोक्यावर पल्लू ओढला. 

पुढच्या वळणावर 'माई की बगिया' हे रमणीय ठिकाण वाटाड्याने दाखवलं. स्थानिक श्रद्धेनुसार नर्मदामैया इथे खेळायला येई. फुलझाडं, औषधी वनस्पती आणि हिरवाईने नटलेला हा परिसर अतिशय शांत होता. गर्दीही कमी होती. 

------------

एव्हाना आमचा सिंड्रेला टाईम झाल्याने वाटेत ठरल्या ठिकाणी वाटाड्याला सोडलं. विस्तीर्ण पठारावर लांब एक कार दिसत होती. तिथून डावीकडे वळलात की खाली पेंड्रा रोड रेल्वे स्थानकाकडे जाता येईल असं सांगून ’नर्मदे हर’ म्हणत तो उतरला. पठार संपले पण रस्त्याचा अंदाज येईना. ’देख लेंगे’ म्हणत डावीकडे वळलो आणि रस्ता लागला. डोंगररस्त्यांमधून जाताना पुन्हा एकदा जंगलाचं मनोहारी दर्शन घडलं. साग, साल, बांबू आणि अनामिक..बहुधा औषधी वनस्पतींची (असं वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणतात ) उभी झाडं दाटीने दिसत होती. वळणाचा रस्ता संपतच नव्हता. बरोबर जातोय का हे पाहावं तर जंगलात इंटरनेटने आणि मग बॅटरीने केव्हाच साथ सोडलेली. आगे भी जाने ना तू - पीछे भी जाने ना तू अशी भुलभुलैया गत झालेली. निकिता बहुतेक हनुमान चालीसा किंवा भीमरूपी... काही तरी पुटपुटत होती. माहित नाही का, पण मी निश्चिंत होते. परिक्रमा म्हणजे केवळ धार्मिक प्रवास नसून आत्मशोध आणि अहंकार गळून पडण्याचा प्रवास आहे असं म्हणतात. परिक्रमा न करताच, आत्मशोध वगैरे नाही पण आमचा अहंकार थोड्या वेळासाठी गळून पडला असावा. मग परिक्रमेचा अनुभव काय असेल ! पादचारी परिक्रमावासींना तर दंडवतच !

एकदाची एक गाडी समोरून आली आणि त्या चालकाने बहुधा रस्ता योग्य असल्याची खात्री दिली पण त्याच्या गालात तोबरा असल्याने आम्हाला पुन्हा शंका आली. रस्त्यात अधूनमधून माकडांचे कळप, वळणावळणाचे घाटरस्ते दिसत होते. हिरवीगार झाडं आता अंधारामुळे काळपट दिसू लागली. चुकून एखादा माणूसप्राणी किंवा गाडी दिसताच थांबून टाळ्या पिटून आम्ही 'ओ भैया.. इधर इधर.. पेंड्रा ? पेंड्रा?' ओरडायचो व तो ’बरोबर’ अशी खूण करायचा, अखेर गाडी पेंड्रा रोड स्टेशनला पोचली. 

हे जेमतेम एका प्लॅटफॉर्मचं, एखादी चुकार गाडी येणारं, एखादे रामूकाका बसलेलं ,इवलं पत्र्याचं छत असलेलं स्टेशन असणार असं समजून केळकर सरांचा निरोप घेऊन आत शिरलो तर ते चक्क आधुनिक स्टेशन निघालं. kiosk वर तिकिट काढलं तोवर बाकी मंडळी पण अशीच वाटचाल करत येऊन पोचली. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर दिल्लीला जाणारी मंडळी होती. एकमेकांना हात हलवून आम्ही 'कल हम कहा तुम कहा' भावनेने दोन्ही तीरांवरून ओरडून माफक गप्पा मारल्या. दरम्यान आमची गाडी आली. आरक्षण नव्हतं. पुन्हा ’देख लेंगे’. टीटीई येताच मी अपडाऊन अनुभवातले विनम्र भाव चेहर्‍यावर आणून काय ते खरं सांगितलं. त्याने बरं असा हात केला. पुढच्या गीतांजलीचं आरक्षण अजूनही वेटिंग होतं. मला मी गीतांजलीच्या दारातल्या पॅसेजमध्ये उकीडवी बसलेली दिसू लागले. ती काळजी दर्शवताच दिनेशजी पुन्हा म्हणाले, "कहाँ ना, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते." ”वो ’आगे’ अभी पास मे आ गया ना", हे शब्द मी गिळले.

काळोखामुळे बाहेरचं काही दिसत नव्हतं. आता उस्लापूर नामक अगम्य स्टेशनला पोचलो. तिथून बिलासपूरला जायचं होतं. सांगली-मिरजेसारखं हे जुळं प्रकरण होतं. रिक्शात फिल्मी गाणी ऐकत दिनेशजी, पांडेजी, मी आणि निकिता बिलासपूरला पोचलो. नागपूरसारखं मोठं शहर आहे ते. भव्य स्टेशन पाहून तर सीएसटीची आठवण झाली. कँटीनला मिळेल ते जेवलो आणि वेटिंग रूमला आराम करत गीतांजलीची वाट पाहू लागलो. गाडी दोन तास उशीरा आल्याने झोपेने वटारलेल्या डोळ्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान आरक्षण कन्फर्म झालं होतं. खरं आहे, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते. नर्मदे हर !


Tuesday, February 10, 2026

थोडं ’अ‍ॅनालॉग’ पण जगूया

 मुलांच्या आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निबंध माझ्याकडे परीक्षणाला आले होते. गंमत म्हणजे ९ स्पर्धकांपैकी ५ जणांचे बरेचसे मुद्दे सारखे. कारण ही होती ’ए-आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची कमाल. चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अन्य एखाद्या जनरेटीव्ह ए-आयला विषय द्यायचा, उत्तर कॉपी पेस्ट करायचं की झालं. हाय काय नाय काय !

नुकतंच वकीलांच्या एका अनौपचारिक सभेत एक ज्येष्ठ वकील महोदय भाषण देत होते. खरं तर वाचून दाखवत होते. पहिलं वाक्य संपताच ते अनवधानाने म्हणाले ’फुलस्टॉप’ आणि त्यांनी जीभ चावली. सगळे हसू लागले. भाषण ए-आयकडून लिहून घेतलं होतं हे उघड झालं होतं. एका उच्चपदस्थ व्यक्तीची ही स्थिती मग तुम्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल ! 

अर्थात तुमच्यासारख्या काही मुलांना  ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कुठे करायचा हे समजलं आहे. चेन्नईच्या कार्तिकला ए-आयच्या मदतीने बुद्धिबळात आणखी पुढे जाता आलं. वेगळ्या पद्धतीने खेळाकडे पाहता आलं. कोल्हापूरची ईशा गोष्टी लिहिते. ए-आयने तिला गोष्टीची सुरूवात आणि शेवट करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया दिल्या. नागपूरच्या स्मिताला गणिताची भीती वाटायची. ए-आय आधारित अ‍ॅपने तिची भीती गेली, उलट तिला गणित शिकताना मजा वाटू लागली. जळगावचा अतुल तर ए-आयच्या मदतीने जर्मनचे धडे शालेय वयापासूनच स्वत:चे स्वत:  गिरवतो आहे. 

अनेक शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ए-आय आधारित प्रकल्प सादर केले आहेत. बेंगळुरूचा अर्जुन पाण्याची बचत करणारा प्रकल्प घेऊन पुढे आला, तसंच काही विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि शेतीविषयक प्रश्नांवर ए-आय आधारित उपाय सुचवले आहेत. एका विद्यार्थिनीने मुलींच्या सुरक्षेसाठी एक अलार्म फीचर ए-आय अ‍ॅपसाठी सुचवलं. बातम्यांमध्ये हे प्रकल्प पाहून असं जाणवतं की भारतीय मुलं केवळ तंत्रज्ञान वापरत नाहीत, तर ए-आय च्या मदतीने समाजातल्या विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

AI म्हणजे एक प्रकारचा संगणकीय मेंदू जो माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून शिकतो. जसं आपण चुका करत शिकत जातो तसंच ए-आय देखील अनुभवातून शिकत अधिक अचूक होत जातो. जगभरातील  मुलं नकळत ए-आय सोबत मोठी होत आहेत. तुम्ही ज्या जगात वाढत आहात ते जग तुमच्या आई-वडिलांच्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागत होती; चार पुस्तकातून संदर्भ मिळवावे लागत होते. आज मात्र ए-आयला एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर तो सोप्या भाषेत समजावून सांगतो. . ए-आय शेफ नामक मशीनमध्ये पदार्थ घाला, मेनू निवडा आणि स्वयंपाक तयार. ऑनलाइन शिक्षण, प्रोजेक्ट्स, त्रुटी शोधणं, गृहपाठ करणं, माहिती शोधणं, भाषा शिकणं, लेखन करणं, संवाद लिहिणं, मोठ्या ग्रंथाचा गोषवारा काढणं, ग्राफिक्स, व्हिडिओ, चित्रकला, संगीत, कोडिंग, रोबोटिक्स हे सगळं या तंत्रज्ञानामुळे सहजसाध्य झालं आहे. 

इथपर्यंत ठीक आहे पण आईबाबांना वेळ नसतो किंवा काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत तेव्हा गप्पा सुद्धा मारता येतात त्याच्याशी.  तुम्हाला वाटतं, ए-आय किती छान आहे. तो माझी वर्गात पहिला येणार्‍या मुलाशी तुलना करत नाही, एखादे वेळी कमी मार्क मिळाले म्हणून माझ्यावर रागावत नाही. मी किती हुशार आहे, चांगला आहे याबद्द्ल उलट माझं कौतुक करतो. मग मी का करू नको त्याच्याशी मैत्री ? 

उत्तर सोपं आहे. 

त्याला भावना नाहीत. त्याला तुमचं भलं कशात आहे ते समजत नाही. आजी आजोबा, दादा ताई, आईबाबांसारखं तुमच्यावर त्याचं प्रेम नाही. वॉशींग मशीनचं काम काय असतं, कपडे धुणं. त्याच्याशी आपण गप्पा मारतो का, मैत्री करतो का? नाही, कारण ते केवळ यंत्र आहे. ए-आयला भाषेची समज असल्याने, सखोल ट्रेनिंग दिलेलं असल्याने त्याला तुमच्याशी माणसासारखं बोलता येतं पण शेवटी ते ही एक प्रकारे यंत्रच आहे. अलेक्सा ,सीरी या व्यक्ती नाहीत, ती यंत्रांची नावं आहेत. ए-आय मैत्रीचा आभास निर्माण करू शकतं, तुमच्या भावना ओळखून तुम्हाला आवडेल असा प्रतिसाद देऊ शकतं पण त्यात वैयक्तिक भावनांचा ओलावा नसतो, मायेचा स्पर्श नसतो, काळजी नसते. त्याची उत्तरं किंवा कृती म्हणजे फक्त एक तांत्रिक क्रिया असते. त्यामुळे त्याच्याशी मैत्री बित्री करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.  

ए-आयचा फक्त वापर करावा. तो ही योग्य पद्धतीने आणि मर्यादेत. 

२०२४–२५ मध्ये अनेक राज्य सरकारांनी डिजिटल आणि ए-आय आधारित शिक्षण पद्धतींचा प्रयोग सुरू केला. काही शाळांमध्ये तो शिक्षकांना मदत करणाऱ्या साधनासारखा वापरला जाऊ लागला आहे. शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओ, आराखडे, प्रेझेंटेशन, उदाहरणं मॅजिकस्कूल सारख्या विविध ए-आय टूल्सच्या मदतीने शिक्षक तयार करू लागले आहेत. मुलांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. मात्र  काही पालक आणि शिक्षकांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ए-आय तयार आणि त्वरित उत्तरं देत असल्याने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती कमी होऊ लागली आहे कारण मेंदूला काम करायची सवयच राहत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी ए-आय कडून तयार केलेला मजकूर जसाच्या तसा सादर केल्याचं दिसू लागलं. 

समजा तुम्हाला एक कागद आणि पेन्सील देऊन एखादा सीन काढायला सांगितला, तर? डोळे मिटा ,विचार करा ,काढा चित्र... 

९० % मुलं काय चित्र काढतील? डोंगर, सूर्य, उडते पक्षी, खाली नदी, बाजूला झोपडी. हो नं? वेगळं काही नाही. असं का, कारण चौकटीबाहेरचा विचार करण्याची आपली क्षमता ए-आय आणि मोबाईल सारख्या गॅजेट्सच्या अती वापराने कमी होत चालली आहे. 

भारतीय भाषांमध्ये AI उपलब्ध होणं ही खूप मह्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. मराठीत, हिंदीत किंवा इतर भाषांत प्रश्न विचारता येत असल्याने तुम्हाला शिकणं सोपं झालं आहे. मात्र काही ए-आय साधनांमध्ये ती माहिती अपुरी किंवा चुकीची असते. वाक्यरचना, व्याकरण विचित्र असतं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की ए-आय ने दिलेली माहिती तपासून पाहण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. पुस्तकं, शिक्षक आणि ए-आय — या तिन्हींचा संगम असेल, तरच शिकणं परिपूर्ण ठरेल. कल्पना, भावना आणि अनुभव मुलांचे असतील, ए-आय फक्त साधन म्हणून काम करेल कारण संपूर्ण काम त्याला करायला लावलं तर सर्जनशीलतेला मर्यादा येऊ शकतात. 

ए-आय वापरायचं आहे ते आपला मदतनीस म्हणून , मालक म्हणून नव्हे, केवळ कॉपी पेस्ट साठी नव्हे,  

त्यासाठी कोणत्या वयात कोणतं तंत्रज्ञान योग्य- हे आधी समजून घेऊया. 

१०–१२ वर्षं :   शाळेतल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अ‍ॅप्स, गृहपाठासाठी जनरेटीव्ह ए-आय, शैक्षणिक व्हिडिओ, काही मजेदार गेम्स मर्यादित प्रमाणात.

१३–१५ वर्षं :  अभ्यास, कौशल्य शिकणं, भाषा शिकणं, थोडं मनोरंजन (मर्यादेत), वेळेचं भान महत्त्वाचं.

या वयापर्यंत पालकांसह, आईबाबांबरोबर बसून हे सगळं शिकणं, समजून घेणं, ते तंत्रस्नेही नसतील तर त्यांना सांगून त्यांच्यासमवेत हे करण्ं अपेक्षित आहे.  

१६–१८ वर्षं :  व्यावसायिक कौशल्य शिकणं, जबाबदारीनं वापर करण्यासाठी स्वतः नियम ठरवणं, करिअरसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अभिप्रेत आहे.

वय वाढतं तसं स्वातंत्र्य वाढतं पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. 

हे नीट माहीत असलेली मुलं सुद्धा ए-आय आणि गॅजेट्सच्या आहारी जातात. कारण..

* FOMO ( fear of missing out) - हे वापरलं नाही तर या आधुनिक जगातल्या घडामोडी मला कळणार नाहीत. मी मागे पडेन अशी भीती वाटू लागते.

* ’बोर होतंय’ म्हणणार्‍या मुलांना फोन, टॅब हातात घ्यायला सोपा. क्षणात एक नवं ,मोहक, वेड लावणारं विश्व समोर उभं राहतं. 

* सोशल मिडियावरच्या “लाईक”, “कमेंट”, “शेअर” यामुळे आपण कुणीतरी विशेष आहोत असं भासू लागतं. 

यामुळे ए-आय फीचर वापरून तयार केलेले फोटो, पोस्ट शाळकरी मुलं, मुली सोशल मिडियावर ट्रेंडच्या नावाखाली टाकतात. सायबर गुन्हेगार त्यांना हेरतात. संवाद वाढवून विश्वास संपादन करतात आणि मग त्या फोटो, माहितीचा गैरवापर होतो. कधी सेक्सटिंगसाठी, कधी धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तर कधी भुरळ घालून लैंगिक शोषणासाठी. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण खाजगी डाटा अनोळखी व्यक्तीला कधीही द्यायचा नाही, खोट्या इंप्रेशनसाठी अनोळखी मित्र विनंती स्वीकारायची नाही, फोटो पब्लिक शेअर करायचे नाहीत हे तुम्ही सुद्धा समजून घेणं ही आजची गरज आहे. 

ए-आय आधारित ऑनलाईन गेमिंगचं वेड आणि वरच्या लेव्हलवर जायचा नाद, त्यासाठी लागणारे पैसे आणि त्यातून चक्क आपल्याच घरात मुलांनी केलेल्या चोर्‍या अशा गुन्ह्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. 

काही अ‍ॅप्स मुलांकडून माहिती गोळा करतात, हे लक्षात आल्यानंतर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. 

ए-आयच्या अतिरेकी वापरामुळे प्रत्येक देशाचं सरकार मुलांच्या डिजिटल सेफ्टीवर गांभीर्याने विचार करू लागलं आहे. फ्रान्सने १५ वर्षांखालील सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे. चीनने विद्यार्थ्यांना गेमिंग अ‍ॅप्स वापरण्याला ठराविक तासच परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील शासनाने विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापराविषयी कडक नियम पारित केले आहेत. सगळे युरोपियन देश स्क्रीन टाइम मर्यादा, डेटा सुरक्षाविषयी सजग झाले आहेत. कारण सगळ्यांना कळलंय — स्क्रोल करण्यात वेळ घालवला तर मुलांचं भविष्य कधीही घडणार नाही. उद्या तुम्हीच विचाराल, ही स्थिती येईतो तुम्ही काय केलंत ? 

भारतामध्येही काही महत्त्वाचे नियम आहेत—  मुलांसाठी अयोग्य अससेल्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी IT Rules २०२१ आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा २०२३ अद्यावत करण्यात आला आहे. मुलांनो, हे कायदे, या चर्चा तुमच्याविरुद्ध नाहीत, तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आहेत.

ए-आय चा एक गंभीर सामाजिक दुरूपयोग म्हणजे चुकीची माहिती आणि बनावट सामग्री. ए-आय वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओ आणि आवाज (डीपफेक) याचं प्रमाण वाढतं आहे. पंतप्रधान  मोदींचे गरबा खेळतानाचे, ट्रम्प बरोबर नाचतानाचे डीपफेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते बनावट असल्याचं ओळखायला शिकलं पाहिजे. कितीही मज्जा वाटली तरी ते शेअर करण्याचा मोह टाळला पाहिजे. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे दिसतं आहे ते अधिकृत सोर्सकडून आलं आहे का, हे अस्सल वाटत असलं तरी बनावट (डीप फेक) तर नाही नं, ही शंका कायम मनात आली पाहिजे. फॅक्ट चेक साठी अल्ट न्यूजसारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून माहितीची सत्यता तपासता येईल. 

ए-आयची नकारात्मक बाजू बातम्यांमधून जास्त दिसत असल्यामुळे पालक घाबरून जातात, गॅजेटच्या अतिवापरावरून घरात वादविवाद सुरु होतात. तुम्हाला काही चुकीची माहिती तर मिळणार नाही, फसवणूक तर होणार नाही, सायबर गुन्हेगारांचं तुम्ही सावज तर ठरणार नाही याची त्यांना सतत भीती असते. त्यांना तुमचं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. बाहेर खेळायला जाणं कमी झाल्याने तुमच्या वाढत्या वजनाची चिंता वाटते. वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे  तुमचे थकलेले डोळे , सतत स्क्रीनवर येणार्‍या माहितीच्या महापुराने शिणलेला मेंदू ,अपुरी झोप यामुळे त्यांना तुमच्याविषयी चिंता वाटते.  

अमेरिकेतल्या जेनेल हॉफमन नावाच्या आईने यावर एक उपाय शोधला होता. आपल्या १३ वर्षाच्या मुलाला मोबाईल फोन देताना तिने त्याला काही अटी लिहिलेलं पत्र दिलं होतं. त्या अटी आजच्या ए-आय जगातल्या तुम्हा मुलांनी समजून घ्याव्यात. 

* हा फोन तुला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून काही काळासाठी दिलेला आहे. तुझं वागणं अयोग्य वाटलं तर तुझ्याशी चर्चा करून आम्ही तो परत घेऊ.

* ऑनलाईन काही चुकीचं दिसलं तर तू लगेच आम्हाला सांगायला हवंस. तुझे पासवर्ड आम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 

* फोन लांब ठेवून मित्रांना प्रत्यक्ष भेटणं, मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंगला जाणं, सहलीला जाणं, निसर्गात, पुस्तकात रमणं, आमच्याशी गप्पा मारणं, हसणं, एखादी कला शिकणं जगण्यासाठी करियर इतकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात डिजिटल जगातून वेळ काढून थोडं ’अ‍ॅनालॉग’ही जगता आलं पाहिजे. 

भारतीय संस्कृतीत ज्ञानासोबत विवेक, संयम आणि दायित्व यांना महत्त्व आहे. ए-आय वापरताना ही मूल्यं अधिकच महत्त्वाची ठरतात. तंत्रज्ञान माणसाला वेगवान करू शकतं, पण त्याला दिशा माणसालाच द्यावी लागते. तुम्ही वयाच्या अशा वळणावर आहात जिथे संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. ए-आय ने करियरची नवी दालनं उघडली आहेत, पण त्याचबरोबर विचारपूर्वक वापराची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचं वय कुतूहलापोटी नको ते करून पाहण्याचं आहे. ते अगदी स्वाभाविक आहे पण इथेच तोल सावरायचा आहे. 

त्यासाठी काही तांत्रिक बंधनं स्वत:वर घालून घ्या किंवा तुमच्या आईबाबांना नेट नॅनी, कॅनोपी सारखे पॅरंटल कंट्रोल अ‍ॅप्स, वॉचर सारखे डिव्हाईस मॉनीटरींग अ‍ॅप वापरायला सांगा. चॅट-जीपीटी मध्ये तुमचा मेल आयडी कौटुंबिक खात्याशी जोडता येतो, तुमच्या चॅटवर यामुळे आईबाबांचे नियंत्रण राहील. फॅमिली लिंक अ‍ॅपद्वारे तुमचा जेमिनाय अ‍ॅक्सेस त्यांना मर्यादित करता येईल. यामागे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा हेतू नसून ही तुमची जपणूक आहे हे लक्षात घ्या.

योग्य मार्गदर्शन, प्रश्न विचारण्याची सवय आणि मूल्यांची जाण असेल, तर ए-आय तुमच्यासाठी केवळ तंत्रज्ञान न राहता उज्ज्वल भविष्याकडे नेणारा महामार्ग ठरू शकतो.

ए-आयसह चालताना डोळे उघडे ठेवणारी, मन जिज्ञासू ठेवणारी आणि माणुसकी जपणारी पिढीच खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडवेल. पटतंय का ! 

यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे. लेखाच्या सुरुवातीच्या उदाहरणातले वकील महोदय चुकून ’फुलस्टॉप’ म्हणाले होते. ए-आय वापरताना कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नवोदितांना शिकवायचं आहे.     

#AIEthics #ResponibleNetizen

- Published in February 2026 in #Mulanche_Masik

Monday, January 26, 2026

महिलोन्नती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन


संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती किंवा अध्यात्म नव्हे. समाजप्रबोधन हा त्याचा गाभा असतो. ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग माणसाच्या अंतरात्म्यापासून सुरू होतो हे महाराष्ट्रातली संतपरंपरा कायम सांगत आली आहे. तुकडोजी महाराज त्यापुढे जाऊन म्हणतात, ’कशास फिरतो व्यर्थ, तुझे गावच नव्हे का तीर्थ!’ 

गावाची उन्नती, गावकर्‍यांच कल्याण यातच त्यांचं अध्यात्म सामावलेलं होतं. ते राष्ट्रसंत ठरले कारण त्यांनी व्यक्ती पासून समष्टीपर्यंत जाताना गाव, समाज, राष्ट्र आणि माणूसपण अशा सर्व पातळ्यांवर विचार मांडला. त्यांच्या साहित्याने आणि वाणीने समाजाला सतत एक प्रश्न विचारला —आपण माणूस म्हणून, समाज म्हणून खरंच पुढे चाललो आहोत का?”** इथेच ते थांबले नाहीत तर  त्यांनी समाजाला परिवर्तनाचा मार्गही दाखवला आहे.

खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी भारतभर राष्ट्रधर्माचा विचार पेरला. केवळ प्रबोधनच केलं नाही तर १९४२ च्या ब्रिटीशांविरूद्ध झालेल्या क्रांती आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 'देश हा देवची पवित्र । कायदा त्याचे व्यवस्था सूत्र' यावर भर दिला. इतका व्यापक विचार करणार्‍या राष्ट्रसंतांच्या नजरेतून देशाचा अर्धा भाग असलेल्या महिलांची उन्नती हा मुद्दा सुटला असता तरच नवल! म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात - 

'महिलेविण विश्व न झाले, काय होते पुरुषाने केले' 

राष्ट्रसंतांना हे स्पष्ट दिसत होतं की, ज्या समाजात स्त्री दुर्लक्षित, अशिक्षित, परावलंबी आहे, तो समाज कितीही प्रगतीची भाषा बोलत असला तरी आतून पोकळ असतो. त्यासाठी त्यांनी आपल्या साहित्यातून महिलोन्नतीची वाट दाखवली. ग्रामगीतेत या नावाचा एक स्वतंत्र अध्याय लिहीला.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर स्त्रियांनी कसं वागावं हेच समाज सांगत आलेला आहे  पण तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून समाजपुरुषाला खणखणीत शब्दात सांगितलं आहे की स्त्रियांशी कसं वागावं, तिच्याविषयी नेमका काय विचार करायला हवा, तिला कसं वागवायला हवं. हेच  त्यांच्या साहित्याचं वेगळेपण आहे. 

-------------

१९७५ साल हे युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. ८ मार्च हा महिला दिन निश्चित झाला आणि महिलांच्या प्रश्नांकडे जगाचं आणि आपल्या देशाचंही लक्ष वेधलं गेलं. मला नवल वाटतं की या घडामोडींच्या कितीतरी आधी १९६८ साली देह सोडून गेलेल्या तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून हे प्रश्न मांडले होते आणि ते ही उत्तरांसकट. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे शब्द कुठेही न वापरता स्त्रीशक्ती काय आहे हे त्यांना कळलं होतं, तिचं सामर्थ्य आणि जगाला जन्माला घालणारा आणि त्याची जोपासना करणारा तिच्यातला मातृभाव कळला होता. इतक्या जवळून की तुकडोजी महाराजही भावनाविवश होऊन म्हणतात-  

तिच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने 

आणि म्हणूनच या जगातलं मांगल्य, सौंदर्य जिच्या अस्तित्वामुळे आहे त्या स्त्रीची उन्नती म्हणजे समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची  उन्नती असं मुलभूत चिंतन राष्ट्रसंतांनी मांडलं. 

संती माऊलीचे रूप दिले , तरीच ते देवपणासी पावले ....       पण माउली तिथेच राहिली . 

स्त्री जर अज्ञानात, भीतीत आणि बंधनांत अडकलेली असेल, तर तिच्या हातून घडणारी पुढची पिढीही त्याच मर्यादांत अडकते. ते लिहितात

देवाने निर्मिली ही क्षिती,  तिचे उदरी खाणी किती 

परि माऊली जैसी प्रेमळ दीप्ती,  कोठेच नाही 

महाराज म्हणतात. ती घरातल्या संस्कारांची शिल्पकार आहे. 

'गर्भापासून तिचे संस्कार, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. '

इथे पुत्रीची घडण लिहिलं नाहीये. पुत्राची. पुत्राला जर तिने चांगला पुरूष व्हायला शिकवलं तर समाजातल्या कितीतरी स्त्रीविषयक समस्या कमी होतील. आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणार्‍या स्त्रीशी कसं वागायचं हे पुरूषांना कळत नाही. एकमेकांना मदत करण्यात कमीपणा नाही, तिलाही तिचा अवकाश आणि पंख मिळाले पाहिजेत हे एका आईनेच आज मुलाला सांगणं आवश्यक आहे. मुळात बायकांमध्ये एक उपजत शहाणपण होतं. फक्त हे शहाणपण दाखवायला त्यांना बाहेर वाव मिळाला नाही. मिळाला तर एक स्त्री कमाल करू शकते हे त्यांनी जाणलं होतं. 

प्रल्हादाची कयाधू , छत्रपती शिवरायांची चे जिजाई, श्रीरामांची कौसल्या, श्रीकृष्णाची देवकी यांनी अक्षरश: युगपुरूष घडवले आहेत ही एका स्त्रीची ताकद आहे. आजच्या सायबर पालकत्वाची आव्हानं पेलणं तिला सहज शक्य आहे. 

------------

परंतु तिच्या ताकदीची जाणीव तिला स्वत:ला आणि समाजाला म्हणावी तशी नाही आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, त्या अर्थाने आज साक्षरता बरीच वाढली आहे पण शिक्षण म्हणजे विचारांची मशागत. माणसाची बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण अशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. हाच विचार राष्ट्रसंत सोप्या भाषेत मांडताना म्हणतात - स्त्रीने शिकावं, विचार करावा,  प्रश्न विचारावे, अंधपरंपरेला आव्हान द्यावे, त्याज्य गोष्टी नाकाराव्या, योग्य-अयोग्याचा विवेक ठेवावा

शिक्षणामुळे स्त्रीला —स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, आपले हक्क समजतात, आपल्यावर अन्याय झाला आहे, हे ओळखण्याची दृष्टी मिळते. अन्यथा वो जानतेही नही की वो जानते नही , और इस ना जानने को उम्रभर जिये जाते है 

काही जणांना वाटतं की वैदिक काळात होत्याच की स्त्रिया उच्चशिक्षित. ते गार्गी मैत्रेयीचे दाखले देतात. हो नक्कीच होत्या पण इस. पाचशे ते हजार मध्ये भारतावर सातत्याने होणार्‍या बाह्यआक्रमणांमुळे तिचं विवाहाचं वय कमी झालं, शिक्षणाची दारं बंद झाली आणि स्त्री माजघराकडे वळली. सुरक्षेच्या आणि योनीशुचितेच्या काळजीपोटी तिच्यावर बंधनं आली. बाईच्या जातीने कसं वागावं याचे नियम समाजापुरूषाने ठरवले. म्हणूनच ’द सेकण्ड सेक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकात लेखिका सीमान द बोव्हा म्हणते स्त्री कधी जन्माला येत नाही ती स्त्री म्हणून घडवली जाते. अगदी घरातल्या आईचंही मुलगा कसा वाढतो आहे इकडे फार लक्ष नसतं पण मुलीच्या जातीने कसं वागलं पाहिजे यावर तिचा कटाक्ष असतो. परिणामी प्रश्न तसेच राहतात. 

--------------------

आता कुठे राहिलंय तसं काही,  केवळ विशीतली सहर शेख  मोबाईल च्या स्क्रीनवर ’कैसा हराया’ म्हणताना दिसते. दुसरीकडे सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसतात. स्त्रिया सायकलपासून विमानच काय अगदी युद्धनौकाही चालवतात मग अजून काय समानता बाकी आहे , कोणती प्रगती शिल्लक आहे ? 

याचंच उत्तर शोधण्यासाठी पेटीएम या कंपनीने मध्यंतरी एक प्रयोग केला होता. 

एका मोठ्या खोलीत मध्यभागी एक रेषा आखून त्यावर तीस ते पन्नास वयोगटातल्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांना त्यांनी उभं केलं. त्यांना सांगितलं तुम्हाला स्पीकरवर प्रश्न ऐकू येईल , उत्तर हो असेल तर एक पाऊल पुढे जायचं, नाही असेल तर एक पाऊल मागे जायचं. मग प्रश्न सुरू झाले आणि ते पुढे मागे जाऊ लागले. सुरूवातीचे प्रश्न साधारण असे होते - वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी तुम्ही दुचाकी चालवायला शिकलात का, महाविद्यालयापर्यंत तुम्ही एक तरी खेळ नियमित खेळलात का , तुमचे कपडे तुम्हाला इस्त्री करता येतात का, घरातली बिलं तुम्ही भरता का, तुमचं स्वत:चं नेट्बँकिंग अकाऊंट आहे कां,  सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला तुमचं पोट भरण्यापुरता स्वतःसाठी दोन वेळेचा स्वयंपाक करता येतो का ? 

इथपर्यंत स्त्री-पुरूषांमध्ये फार अंतर नव्हतं मग पुढचे प्रश्न आले, तुमचं वाहून तुम्ही स्वतः खरेदी केलं आहे का, वेळ पडल्यास स्वत: दुरूस्त करता का? काही खरेदी करायचं असल्यास तुम्ही कधी एकट्याने निर्णय घेता का ? एकट्याने बाहेरगावी जाता का? स्वत: नियोजन करून तुमचे तिकीट तुम्ही काढता/मॅनेज करता का? तुमच्या घराच्या पाटीवर तुमचं नाव आहे का? इ. इ.

अंतर वाढलं असेल की कमी झालं असेल याचं उत्तर सहज लक्षात येईल. म्हणजेच मोठे बदल झाले असले तरी खूप लहान लहान मुलभूत बदल अजून बाकी आहेत. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. 

---------------

स्त्रियांनी आपल्या कक्षा रुंदाव्यात हे सांगताना आणखी एक मह्त्वाचा विचार राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून मांडला तो म्हणजे ग्रामजीवनात स्त्रीचा सक्रिय सहभाग. याचा अर्थ कागदावर महिला सरपंच आणि खुर्चीवर तिचा पती असा सहभाग नव्हे. ** राष्ट्रसंतांचं साहित्य हे केवळ वैचारिक नाही, तर अत्यंत कृतीशील आहे. त्यातून त्यांनी स्त्रियांना —  ग्रामसभेत सहभागी होण्याचं , स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यामध्ये पुढाकार घेण्याचं, स्वयंशिस्त आणि स्वावलंबन विकसित करण्याचं आवाहन केलं आहे. .त्यांच्या मते, स्त्रीला निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवून खरा ग्रामविकास होऊच शकत नाही.आज आपण पंचायतराज, महिला आरक्षण याबद्दल बोलतो; पण राष्ट्रसंतांनी हे बीज अनेक दशकांपूर्वी पेरलं होतं. 

त्यांनी लिहिलं आहे, स्त्रियांच्या संघटना असाव्यात. तीळगूळ समारंभ, हळदी कुंकू, शारदोत्सव, संमेलन सभा कीर्तन कथा व्हाव्यात. हल्ली सामूहिक स्वरूपाचे असे काही कार्यक्रम राजकीय पक्ष किंवा मनोरंजन वाहिन्या घेतात. त्यात कुणी सेलेब्रिटी कलाकार असतात. त्यांनी येऊन नाचायचं, बायकांनी येऊन गाण्यांवर नाचायचं, आयोजकांनी त्यांना अत्यंत सुमार प्रश्न विचारायचे. अजूनही उखाणे स्पर्धा, थाळी सजवणे, मॅचिंग स्पर्धा यातून हे कार्यक्रम बाहेर न पडल्याने यातून कवडीचंही सक्षमीकरण होत नाही. यापेक्षा कलाधारित स्पर्धा, दर्जेदार सादरीकरण, बचतगटांचे स्टॉल्स, चांगली भाषणं यावर भर द्यावा.

याची कल्पना असल्यासारखं महाराजांनी पुढे लिहीलं आहे- स्त्रियांनी बाहेर पडावं, एकत्र यावं, आत्मभान वाढवावं, त्यासाठी वाचनालयात महिला विभाग सुरू व्हावेत. 

राष्ट्रसंत तिला कधीच “बिचारी स्त्री” म्हणत नाहीत. ते म्हणतात —स्त्री सक्षम आहे, फक्त तिच्या क्षमतेवर समाजाने विश्वास ठेवायला हवा. सन्मान हा तिचा अधिकार आहे. सन्मान म्हणजे महिला दिनाला ;तू दुर्गा तू लक्ष्मी’ असल्या पोस्ट फॉरवर्ड करणे नव्हे , सन्मान म्हणजे — तिचं मत ऐकणं,  तिच्या श्रमांना किंमत असणं, तिच्या निर्णयांना विचारात घेणं. परप्रकाशी चंद्रापेक्षा तिला स्वयंप्रकाशी काजवा होऊ देणं. तिला तिचा हक्काचा वाटा देणं.  

 शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी आठवतात इथे. एका सभेत भेगाळलेल्या पायांच्या , रापलेल्या हातांच्या, डोळ्यात भीती आणि कुतूहल घेऊन बसलेल्या शेतकरी स्त्रियांना त्यांनी विचारलं, " बाईच्या जन्माला आलो याचा कधी आनंद झाला का ?" त्यावर एका बाईने अचानक एक ओळ म्हणून दाखवली "बाईच्या जल्मा नको घालू शिरीहारी , रात अन दिस परायाची ताबेदारी"  

यावरूनच जोशींनी  शेतकरी संघटनेच्या ’स्वातंत्र्याच्या कक्षा’ या संकल्पनेचा पाया घातला.  त्यानंतरच्या चांदवड अधिवेशनानंतर स्त्रियांमध्ये इतकी उमेद आली की एकीनं आपला अनुभव सांगितला- मालक म्हनलं आंगुळीचं पानी काड. म्या म्हनलं तुमचं तुमी काडा , हातचं काम टाकून मी काय बी करनार न्हाई" यातून पुढचं पाऊल नव्वदच्या दशकातलं ’ लक्ष्मी मुक्ती ’ आंदोलन . यात दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी जिचा एका चमच्यावरही अधिकार नव्हता त्या आपल्या पत्नीच्या नावे जमिनीचा सातबारा करून दिला. 

याच धर्तीवर अविकसित समाजातील स्त्रियांना विकासापर्यंत त्यांना न्यायचं तर त्यांना आधी त्यांच्या परिस्थितीची , हक्कांची जाणीव करून द्यायला हवी हे भान तुकडोजी महाराजांना होतं.

-----------

अंधश्रद्धा आणि जुनाट रूढींचे स्त्रीच्या उन्नतीतील मोठे अडथळे दूर व्हावेत हे राष्ट्रसंतांनी ठामपणे मांडलं आहे. त्यांना ठाऊक होतं की, स्त्रीच्या पायात बेड्या घालणारी वृत्ती बहुतेक वेळा धर्माच्या आडून येते, पण ती धर्म नसते — ती अज्ञान असते.ज्या रूढी — स्त्रीला दुय्यम वागणूक देतात,  तिला पाप-पुण्याची भीती दाखवतात,  तिच्या प्रश्नांना “मर्यादाभंग” ठरवतात त्यांना ते विरोध करतात. त्यांच्या लेखनात वारंवार जाणवतं जिथे जिथे धर्म काही रूढींमुळे माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल, तिथे तिथे त्यांची चिकित्सा आवश्यक आहे. स्त्रीच्या बाबतीत तर त्यांचा हा विचार आणि स्वर अधिक तीव्र होतो. 

बहुतेक धर्मग्रंथात स्त्रीच्या दुय्यमत्वाचा कधी स्पष्ट तर कधी नकळत उल्लेख येतो. 

अगदी राजकारणातही सर्वत्र "आम्ही बांगड्या भरल्या नाहीत". "मर्द असशील तर माझ्याशी लढ"  अशी भाषा आपण ऐकतो. लोक शिव्या देताना सर्रास आई बहिणीचा उद्धार करतात. सोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्त्रीच्या, अभिनेत्रीच्या, स्त्री खेळाडूच्या किंवा राजकारणातील स्त्रीच्या पोस्ट खालच्या किंवा बातमी खालच्या कॉमेंटचा दर्जा पाहिला तर आपला सर्व साधारण समाज स्त्रियांकडे आजही कशा नजरेने पाहतो ते सहज कळेल. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांचा महिलोन्नतीचा विचार दुर्दैवाने आजही तितकाच गरजेचा आहे. त्यांचं साहित्य आपल्याला जाणवून देतं की 

* स्त्री उन्नती ही तात्पुरती योजना नाही, ती मानसिकता आहे जी मातांना आपल्या मुलांमध्ये पेरायची आहे. 

* ती कायद्याने नाही, तर संस्कारांनी रुजते तसे संस्कार द्यायचे आहेत.

* ती केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीनेच  साकार होऊ शकते, हे स्व:त:च्या वार्तनातून ठसवायचं आहे.

----------------

व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन , असं हल्लीच्या आधुनिक मुली विचारतात. महाराजांनी तर हे त्याआधीच लिहून ठेवले आहे - "जे जे सुख असेल पुरुषांना महिलांचेही ते असावे अभिन्नपणे ". महाराज पुढे म्हणतात - रथाची दोन्ही चाके मजबूत करावी. माता अशा आदर्श असल्या तर त्यांच्या पोटी येणारे आदर्श संतान भारताचा वैकुंठ घडवतील.... 

शेवटी ते स्त्रीपासून स्त्रीतत्वापर्यंत जात हे ही सांगून जातात

जिकडे जातील तिकडे, स्त्रीच आहे मागेपुढे, अंतरी बाहेरी प्रकृतीचे वेढे,  जिवापाडे पडले हे 

पुरूष आणि प्रकृतीरूपी स्त्रीचं हे चिरंतन नातं समानतेचा नव्हे परस्परपूरकतेचा संदेश देतं आहे. हाच आभाळाएवढा संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून दिला, भजन कीर्तनातून त्याचा पुनरुचार केला. स्वत:चा उल्लेख करताना मात्र ते विनम्रतेने स्वत:विषयी लिहितात ’तुकड्या म्हणे’ 



 ----------------------------


परिसंवाद - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, अकोला,  जानेवारी २०२६

Thursday, January 1, 2026

मुलाखत - मा. तारा भवाळकर


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रख्यात त्रैमासिक ’दौत लेखणी’ साठी मी घेतलेली , ज्येष्ठ सहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत. 

( डॉ. तारा भवाळकर या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक. त्यांनी नाट्यविषयक संशोधन, लेखन तसंच स्त्री जाणिवांचा वेध घेणारंही विपुल लेखन केलं आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन हा त्यांचा ध्यास आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश तसंच मराठी ग्रंथकोश या कार्यात त्यांचं विशेष योगदान आहे. )
पूर्वअनुमती घेऊन ताराताईंशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांनी मोकळेपणाने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

------------------------------------------ 

प्रश्न : अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बहुतेक वेळी वादग्रस्त ठरते. सोशल मिडियावर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. तुम्ही लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहात. बहुविध क्षेत्रात तुम्ही मौलिक संशोधन आणि लेखन कार्य केलेलं आहे. साहित्यक्षेत्रात तुम्हाला सन्मानाचं स्थान आहे. या पातळीवरून बघताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं ? 

मा. तारा भवाळकर : पूर्वी संमेलनाध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक पद्धत होती. इच्छुक लोकांनी अर्ज करायचे आणि मग साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ज्याला अधिक मतं मिळतील त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करत. नंतर अशी राजकीय पद्धतीने निवडणूक घेण्याऐवजी अध्यक्षांची निवड सन्मानाने व्हावी व जाणकार लोकांनी ती करावी हा विचार पुढे आला. साहित्य महामंडळाने, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी एकत्र येऊन अध्यक्ष निश्चित करायचा अशी पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. माझ्या मते ही पद्धत जास्त योग्य आहे. इंग्रजीत सांगायचे तर ’इलेक्शन पेक्षा सिलेक्शन’ किंवा ’निवडणुकीपेक्षा निवड’ ही अधिक सन्मानाची आहे कारण मागून मिळवणं हे कलावंत किंवा साहित्यिकाच्या दृष्टीने फारसं स्पृहणीय नाही. 

तशी प्रक्रिया सुरू झाली म्हणून मी अध्यक्ष होऊ शकले. निवडणुकीला उभं राहून मत मागायची पद्धत असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते कारण साहित्यिकांनी /कलावंतांनी अर्ज करून काही मिळवणं, याच्या मी विरोधात आहे. 

माझी निवड झाल्यानंतर विरोधाचे सूर माझ्यापर्यंत तरी पोचलेले नाहीत. साहित्य महामंडळासह, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांच्या पाठिंब्याने माझी एकमताने निवड झाली , त्यांच्या अध्यक्षांची मला रीतसर पत्र आली त्यामुळे मी ते अध्यक्षपद स्वीकारलं. माझ्यासाठी हा आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावरचा एक अपघात होता. 😊

मला हे अनपेक्षित होतं कारण मी कोणत्याही गटातटात नव्हते. ती माझी प्रवृत्ती नाही आणि मला तेवढी उसंतही मिळाली नाही. अध्यक्षपद मिळाल्याने अगदी आनंदाने उड्या माराव्या असं  वाटलं नाही पण खोटं का बोला, आयुष्याच्या या टोकाला आल्यावर एवढे लोक आपल्याला लक्षात ठेवतायत याचं मला समाधान नक्कीच वाटलं. त्याबद्दल मी या क्षेत्राची कृतज्ञ आहे.  

-------------------------------------------

प्रश्न :  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात तुमच्यासह अवघ्या सहा लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामागे काय कारण असावं? ताकदीने लिहिणार्‍या लेखिका कमी आहेत की हा भेदभाव आहे की हे नकळतपणे, निर्हेतुकपणे घडलं असावं ! 

मा. तारा भवाळकर : 

आपली सगळी व्यवस्था पुरूषप्रधान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ’मेल डॉमीनेटींग सोसायटी’ आहे. स्त्रियांचं साहित्यक्षेत्रातलं काम मुळीच कमी नाही , मी तर म्हणेन अगदी लोकपरंपरेतल्या स्त्रिया सुद्धा अधिक सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या होत्या, आहेत आणि त्याच्याबद्दल मी पुष्कळदा बोलले आहे, लिहिलं आहे. त्यामुळे स्त्रिया कमी पडतात असं नाही, त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदच काय, मला कोणत्याही गावातून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची पत्रिका आली की त्यात हेच दिसतं म्हणजे अगदी स्त्रियांच्याच संस्था वगळल्या तर एकूणच औषधाला आपली एखादी स्त्री असते. ते ही नाव सगळ्यात शेवटी, प्रतिनिधी म्हणून. कुटुंबव्यवस्थेत सुद्धा स्त्रियांचा निर्मितीत मोठा सहभाग असतो पण त्यांना पदं देताना ही प्रवृत्ती दिसते. बायका शिकल्या सवरल्यात त्यामुळे एखादं तरी नाव असायला हवं म्हणून असतं, फारतर सल्लागार समितीत एखाददुसरं नाव असतं. स्त्रियांकडे गौणत्वाने पाहाणं इतकं नेहमीचं आहे. त्या काही बरं करू शकतात हे स्वीकारणं अवघड असल्याने अध्यक्षपदीही स्त्रियांची नावं कमीच दिसतात. बायका आपल्या नावाचा आपणहून आग्रह धरत नाहीत.

आता इंदिरा संतांचंच उदाहरण घ्या. त्यावेळी निवडणूक पद्धत होती. त्या काही स्वत: अर्ज भरणार्‍यांपैकी नव्हत्या. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी अर्ज भरला पण ऐनवेळी त्यांना डावललं गेलं. बोलेल त्यांचे चणे विकले जातात, न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही. स्वत:हून पुढे येऊन एकतर स्त्रिया बोलत नाहीत आणि बोलल्याच तरी त्यांची बर्‍याचदा उपेक्षा केली जाते. 

प्रश्न : मग आता लायक लेखिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळी अ.भा. संमेलनं असावीत का? किंवा काय पर्याय असावा? 

मा. तारा भवाळकर : 

वेगळी संमेलनं तर मला अजिबात मान्य नाहीत. अशा संमेलनांना मी हळदीकुंकवाचे कार्यक्रम म्हणते. राजकीय पक्षांच्या स्त्री संघटनांचे कार्यक्रम म्हणजे साड्या वाटणं, पैसे वाटणं, ते संमेलन नाही. अर्थात स्त्रियांची स्वत:ची भगिनी मंडळं, महिला मंडळं साहित्यविषयक असे काही कार्यक्रम घेत असत ,घेतात पण अ. भा. स्तरावर महिलांची वेगळी आघाडी असावी हे मला मान्य नाही. आपला समाज जर लोकशाहीवादी असेल तर त्यात प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतंत्र स्थान आणि अधिकार आहे, त्यासाठी स्त्री ही व्यक्ती आहे हे आधी मान्य केलं पाहिजे. सरस नीरस ठरवण्याच्या स्पर्धेत तिला स्थान असावं पण राखीव जागा नको. अर्थात हे माझं मत आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतर कुणाचं मत वेगळं असूच शकतं.

--------------------------------------

प्रश्न : तुम्ही अध्यक्षपदी असलेल्या साहित्य संमेलनाच्या तुमच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख नव्हता यावर काहींनी टीका केली. भाषणातल्या काही मुद्द्यांची  प्रशंसा झाली. — या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं पाहाता? 

मा. तारा भवाळकर : 

तटस्थपणे, कारण समाजामध्ये सर्व गोष्टी सर्वांना कायम मान्य होतातच असं नाही. मी कुणाचाही अवमान केला नाही. त्यांच्या पदांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. भारताचे सन्माननीय पंतप्रधान /राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. माझं भाषण माझ्या शब्दात यूट्यूब वर पण आहे आणि लिखित स्वरूपात संमेलनात ते प्रसिद्ध झालं आले तेव्हा कोणीही हे शब्द तिथे बघू शकतात. राज्याचे सांकृतिक प्रतिनीधी म्हणून आलेल्या पूर्वपरिचयातील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ही टीका झाली असावी. लोकभाषेत सांगायचं तर लोक रस्त्याच्या मधून चाललं तरी नावं ठेवतात आणि कडेकडेने चाललं तरी नाव ठेवतात. सरळ चाललं तर धट, वाकडं चाललं तर अवलक्षण. मी सरळ चालणारी आहे. शिवाय तिथे भाषण करायचंय याची मला कल्पना नव्हती, ८७ वर्षाच्या बाईकडून जो उल्लेख झाला ,खरं तर सन्मानपूर्वकच, कारण जाणीवपूर्वक नावाचा उल्लेख करणं किंवा न करणं हे मनातही नव्हतं, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तरीही समाजात सर्व प्रकारची माणसं असतात, कुणाला काही गोष्टी पटल्या असतील कुणाला नसतील, त्यांचं ते स्वातंत्र्य मी मान्य केलंय. प्रशंसेबद्दल स्वाभाविकपणे आनंद वाटला. समाधान वाटलं. 

----------------------------

प्रश्न : साहित्य संमेलनाध्यक्षाची भूमिका तुमच्या मते नेमकी काय असते? त्यांच्याकडून साहित्यक्षेत्रातून सर्जनशील नेतृत्वाचीही अपेक्षा असते का? हे पद फक्त अडीच दिवसाचं उत्सवमूर्तीपद म्हणजेच औपचारिक प्रतिष्ठेचं आहे की त्यात खऱ्या अर्थाने काही बदल घडवण्याची क्षमता असते?

मा. तारा भवाळकर : 

साहित्य संमेलनाध्यक्षाला कुठलेही वैधानिक म्हणजे कायदेशीर अधिकार नाहीत. साहित्य संमेलनात कार्यक्रम काय ठेवावे, समजा एखादा परिसंवाद ठेवायचा झाला तर कुठल्या विषयावर ठेवावा,  कुठल्या वक्त्यांना ,कवींना बोलवावं हे अधिकार अध्यक्षाला नाहीत. आता हे ही अधिकार नसतील तर एका वर्षाच्या कारकीर्दीत तो काय काय करणार ! बरं, यासाठी कोणतंही बजेट किंवा अर्थसाहाय्य नसतं. अर्थात संमेलनासाठी त्यांनी माझी व्यवस्था केली, अगदी सन्मानाने केली. मुळात साहित्यक्षेत्रात पन्नास साठ वर्ष घालवलेल्या माणसाने त्या एका वर्षात काय करावं ! 

परंतु साहित्यविषयक आस्था निर्माण होईल असं वातावरण त्या काळामध्ये नक्कीच निर्माण होतं. चार माणसांच्या गाठीभेटी होतात. भाषणं होतात, मुलाखती होतात. यानिमित्ताने माझी भूमिका मला मांडता आली. वयोमान आणि प्रकृतीमुळे माझ्याच्याने प्रवास फार झाला नाही पण ज्यांना आस्था वाटली ते लोक माझ्या घरी आले, माध्यमांनी मुलाखती घेतल्या, विविध संस्थांनी भाई वैद्य, विखे पाटील असे मोठमोठे पुरस्कार घरी येऊन दिले. हा सन्मान मराठी साहित्य विश्वाने मला दिला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य माणसांनी दिला. याबद्दल कृतज्ञ आहे. 

आमच्या भागातील सर्व, अगदी सर्व, राजकीय, सामाजिक विचारधारांची मंडळी माझ्या घरी येऊन आदरपूर्वक भेटून गेली. समाजाच्या सर्व स्तरांमधल्या मंडळींनी, आमच्याकडच्या शेतकरी आणि कामगार संघटना, रोटरी सारख्या संस्था, वाचनालयं, प्रशासकीय संस्था, स्वच्छता कामगारांपासून कलेक्टर आणि आमचे पालकमंत्री सगळ्यांनी येऊन भेट घेतली. आत्ताच अबुधाबीच्या लोकांनी माझा व्हिडिओ केला कारण राज्यातच नव्हे देशविदेशात माझं भाषण पोचलं आहे. लंडनहून माझ्यासाठी एक काम आलं आहे, अमेरिकेहून फोन येऊन गेला. माध्यमांमुळे जगाच्या पाठीवर पोचता आलं. 

मी प्राथमिक स्तरापासून परदेशी विद्यापीठापर्यंत शिकवण्याचं काम केलेली एक शिक्षिका आहे. नोकरीच्या काळात पदं येतात आणि जातात पण मुळात मी मास्तर आहे, आता तुझ्यासमोरही मी मास्तरकीच करतेय 😊 

अनेक लायक व्यक्ती आहेत, होऊन गेल्यात याची जाणीव आहे. मी ज्यांना मानते ते लक्ष्मणशास्त्री जोशी. तेव्हा आजची माध्यमं नव्हती पण त्यांच्या ग्रंथांमधून ती माणसं आजही मार्गदर्शन करत असतात. 

-----------------------

प्रश्न - अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या अध्यक्ष म्हणून संमेलनाचं सूप वाजल्यापासूनचा प्रवास तुम्ही सांगितलात. याशिवाय एकूण प्रवास कसा होता !

मा. तारा भवाळकर : 

मी आयुष्यात काहीही ठरवून केलं नाही. किंवा तो आळस असेल. आयुष्याला प्रामाणिकपणे सामोरी गेले, अध्यक्षपदाला सुद्धा. लेखनही मी ठरवून केलं नाही. त्या त्या वेळेला लेखनात काही विषयात रमले, जेव्हा रमावंसं वाटलं नाही तेव्हा सोडून दिलं, मग मागे वळून पाहिलं नाही. उदा: लोकांनी मला लोकसाहित्याच्या गाठोड्यात बांधलं आहे पण माझा प्रेमाचा ,आस्थेचा विषय आहे नाटक. नाट्यविषयक वाचन, नाटक शिकवणं, १४ वर्ष अभिनय केला, पुरस्कार मिळवले, नाट्यसंस्था स्थापली, नाटकं बसवली, चर्चा केल्या, नाट्यलेखन केलं, नाट्यस्पर्धा घेतल्या. भालबा केळकरांच्या पीडीए च्या चालीवर सांगलीला एडीए स्थापन केली.अजूनही कार्यकर्ते त्याचं काम करतात. त्यात मी कृतीशील कार्य केलं, सर्व स्तरांवर. तेव्हा मी प्राध्यापक होते, प्राध्यापकाच्या आयुष्यात पीएचडी नावाचं प्रकरण येतं. सांगलीत होते. त्यानिमित्ताने विष्णुदास भावे पहिले नाटककार, त्यांनी नाटक केलं म्हणजे काय केलं या कुतूहलातून मी वाचत गेले. लोकांशी बोलत गेले. तेव्हा यांच्या नाटकांवर बरेच आक्षेप होते, ते यक्षगानातून आलं, गोव्यातून आलं इ..... शोधत गेले. 

७५ मध्ये अभिनयाचं रौप्यपदक मिळाल्यावर मी नाटक सोडलं, सूत्र सोपवली. कार्यकर्ते आजही संपर्कात आहेत पण त्यांच्यात ढवळाढवळ करत नाही. सहसा खुर्च्या सोडवत नाहीत पण मला खुर्चीत बसायला आवडत नाही. शिकवणं ..खडू, फळा, विद्यार्थी हा माझा आनंदाचा भाग होता. पदाची अपेक्षा नव्हती. म्हणून प्राचार्यपद नाकारलं. आता पाठ दुखते म्हणून खुर्ची लागते 😊

सुरूवातीला लागले ती शारीरिक शिक्षणाची शिक्षिका म्हणून. हा कोर्स केला होता त्यामुळे हल्लीच्या भाषेत पीटी टीचर म्हणून नोकरी करत करत बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून महाविद्यालयाच्या परीक्षा देत होते. पदव्या बदलत गेल्या त्यानुसार नोकरी बदलत गेली. त्यामुळे शब्दश: ग्राऊंड लेव्हलपासून एम ए पीएचडी मार्गदर्शक पदापर्यंत सर्व स्तरावर शिकवत गेले. एरिझोना स्टेट विद्यापीठातही गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवलं. या सगळ्याची अपूर्वाई न वाटता कर्तव्याचा भाग वाटला. 

विष्णुदासांच्या, संशोधनाच्या निमित्ताने बराच प्रवास केला, दक्षिण हिंडले. कोकणात दशावतार, कर्नाटकात यक्षगान, भोसल्यांची नाटकं... उसना बॉक्स कॅमेरा घेऊन तिकीट काढून हिंडत दक्षिणेत सर्व लोककलांचा अभ्यास केला. आताच्या भाषेत प्रयोगसिद्ध लोककलेचा. त्यातून अभिजात नाटक घडत गेलं आहे. माझा जन्म ऐशी वर्षापूर्वीच्या शेतकरी कुटुंबात, खेडयातल्या एकत्र कुटुंबात त्यामुळे ग्रामीण संस्कृती,दळण, कांडण, गाणी हे लोकजीवन जवळून पाहिलं. यातून मी घडत आले. 

मोठेपणी आपण सैद्धांतिक अभ्यास करतो तेव्हा ही जी सामग्री जमा झालेली असते त्याचे अर्थ लागतात. प्रॅक्टीकल आधी मग थेअरी. नाटकाच्या उगमाची मीमांसा हा माझ्या प्रबंधाचा विषय, त्याला मिळालेला पुरस्कार, माझं संशोधन हे सगळं नाटकाशी संबंधित आहे. नाट्य हा संस्कृतीचा मोठा भाग आहे, लोकसंकृती ही काही वेगळी आहे असं मला वाटत नाही, नाटकातून मी त्याचा सैद्धांतिक अभ्यास केला. त्यासाठी चांगलं अनौपचारिक मार्गदर्शक मिळत गेलं.

--------------------------------

प्रश्न : संमेलनाध्यक्षपदावरून तुम्ही साहित्यिक स्वायत्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी याकडे कसं पाहता ? साहित्यामध्ये समाजकारण असतंच. साहित्यात राजकारण असावं का? 

मा. तारा भवाळकर : 

समाजात अनेक विचारधारांची माणसं, संघटना असतात. एखाद्या संघटनेला वाटेल हे पूरक आहे,  एखाद्या संघटनेला वाटेल हे विरोधी आहे. हे कायम होत असतं. राजकारणाशी साहित्यिकाचा संबंध असू नये असं मी म्हणणार नाही पण माणूस म्हटल्यावर त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती असते. माणूस ज्या परिसरात, वातावरणात वाढला असेल त्या आचार विचारांचे संस्कार त्याच्यावर घडत जातात. त्यातून ती व्यक्ती लिहीत जाते, वाचत जाते. त्यामुळे साहित्यिकांच्यामध्ये राजकीय विचारधारा असू शकते. प्रश्न असा आहे, त्याच्या साहित्यामध्ये आणि साहित्यिक आचरणामध्ये तिने ढवळाढवळ करावी की नाही. 

साहित्यात राजकारण करू नये असं मला वाटतं, कारण तो एक संस्कृतीचा भाग आहे.  संस्कृतीचं लक्षण सर्वसमावेशकता आणि समाजाला उन्नतीकडे नेणं आहे, अवनतीकडे नेणं नाही. जसा कला हा संस्कृतीचा भाग आहे तसा भाषा हा संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. भाषेमुळॆ संस्कृतीचा विकास होतो किंवा ती टिकते आहे. साहित्य हा संस्कृतीचाच भाग आहे त्यामुळे साहित्यक्षेत्र निर्लेप असावं असं मला वाटतं.

-----------------------

प्रश्न : भाषेचा उल्लेख तुम्ही केलात. मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावरून गदारोळ झाला.  शासनाला आपला निर्णय स्थगित करावा लागला. कोवळ्या वयात मुलं अनेक भाषा व्याकरणाशिवाय सहज शिकू शकतात असं समर्थकांचं मत होतं तर काहींना ते मुलांवरचं ओझं वाटलं. याविषयी तुमची भूमिका काय आहे?  

मा. तारा भवाळकर : 

एक मास्तर म्हणून आणि प्राथमिक स्तरावरही मी शिकवलेलं असल्याने मला वाटतं इतक्या लहान वयात ही सक्ती मुळीच नसावी. पहिलीतलं मूल पाच-सहा वर्षाचं असतं. त्याला ४/५ तास एका जागी मुळात बसवून ठेवणं, त्याचं अवधान केंद्रित करणं, त्याची शारीरिक,मानसिक,बौद्धिक वाढ करणं हे सोपं आहे का! शाळा, दप्तर, पुस्तक, पेन्सील या सगळ्या गोष्टी त्याला नव्या असताना त्याच्यावर भाषा लादणं हा शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने त्याच्यावर अत्याचार आहे. मूल दहा वर्षाचं होईतो मातृभाषेशिवाय कुठल्याही भाषेतून संवादही होऊ नये.  

लहान वयात मुलं भाषा शिकू/ बोलू शकतात म्हणजे काय तर त्यांना व्यवहारातली जुजबी भाषा बोलता येते, मुलभूत असं काहीही त्यांना कळण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो. पाचवीनंतर त्यांना इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवाव्या. शिवाय शिकवायच्याच असल्या तर त्यांना शेजारभाषा का शिकवू नये !

सांगली मिरजकडची माणसं दोन्ही भाषा बोलतात. नागपूरचे लोक कितीतरी हिंदी शब्द वापरतात. दोन प्रदेशांच्या सीमारेषेवरचा भाग हा द्वैभाषिक असतो. अधिकृतपणे आहे. अनेक ठिकाणी म्हणजे कर्नाटक,. महाराष्ट्रात आहे, बडोद्याला आहे म्हणजे तिथे मराठी माध्यमाचीही शाळा आहे आणि गुजराथी आहे. कर्नाटकामध्ये आमच्या बेळगाव धारवाड या भागांमध्ये , सांगलीमध्ये कन्नड मिडीयमच्या शाळा होत्या आजही एखादी आहे. 

आपण मध्यमवर्गीय चिमटीएवढे लोक आपल्या दृष्टीने विचार करतो पण समाज निरनिराळ्या स्तरात विभागलेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने ,कामासाठी माणसं स्थलांतरित होत असतात. श्रमकरी माणसं, बांधकाम करणारी माणसं यांच्या पोरांनी काय करायचं ! दहा-बारा वर्षापर्यंत कन्नड मध्ये बोलणारी मुलं महाराष्ट्रात आली तर त्यांनी मराठी भाषा कशी शिकायची. शेजारभाषेचा मुद्दा उचलला गेला होता पण अडचण कुठे येते तर शिक्षक नेमणं, त्यांचं पगारपाणी याची. तो मोठा मुद्दा आहे.

दुसरी गोष्ट, ज्यांना ठराविक भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी ती ती भाषा शिकवणार्‍या संस्था आहेत. भाषाच काय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात गणिताच्या परीक्षा देता येतात. सगळ्या पोरांवर सब घोडे बारा टक्के म्हणत सगळं न लादता त्यांना निवडीची संधी द्यावी. या भाषांचे स्वतंत्र वर्ग असतात, पुस्तकं असतात, परीक्षाप्रणाली असते. मी हिंदी प्रबोध, प्रवीण, पंडीत, अनुवाद पंडीत सगळ्या परिक्षा दिल्या. त्यातून हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’चं भाषांतर मी केलं. बिहारमधल्या एखादया कलेक्टरची महाराष्ट्रात नेमणूक झाली तर त्याला मराठी अभ्यासक्रम शिकावा लागतो. महाराष्ट्रातल्या माणसाला जर प्रशासकीय पदावर बंगालमध्ये जायचे असेल तर त्याला बंगालीचा अभ्यासक्रम करावा लागतो. 

तेव्हा अभ्यासक्रमाच्या मुक्त व्यवस्था असलेल्या संस्थांना आधी सहकार्य करा मग वरच्या स्तरावर जा. 

उलट काय होतंय , मराठी शाळा बंद करायच्या, शाळांच्या इमारती पाडून संकुलं करायची, मास्तरांचे पगार वेळेवर होत नाहीत, अनुदान नाहीत, ६६ हजार मराठी शाळा गेल्या पाच वर्षात बंद झाल्या, यातून विकास होतो का? अभिजात वगैरे दर्जा मिळाला हे सगळं ठीक आहे पण निष्पन्न काय ! 

------------------

प्रश्न : यातून निष्पन्न काय हा विचार करताना भाषेपासून काहीसा दुरावलेला आजचा युवक डोळ्यासमोर येतो आहे. तो फारसा वाचत नाही असं दिसतं किंवा मी म्हणीन तो प्राधान्याने बरंच (पॉडकास्ट) ऐकतो आणि (व्हिडिओ) बघतो. वेगवेगळे विचारप्रवाह याच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचतात. हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य, पुरेसं  आहे की काळाबरोबर होणारे अपरिहार्य बदल म्हणून ते स्वीकारावं की त्याने पुन्हा वाचनाकडे वळावं म्हणून प्रयत्न, प्रयोग करायला हवेत ?

मा. तारा भवाळकर : 

वाचन कशासाठी करायचं? काहीतरी नवीन माहिती व्हावी म्हणून किंवा ज्ञान व्हावं म्हणून. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान केव्हा होतं, त्या माहितीवर स्वतंत्र विचार केला तर. हे एकदा लक्षात आलं की मुलं ते करतात. माझ्या संपर्कात जी तरूण मुलं आहेत ती तंत्रज्ञान वापरून ऐकतात, बघतात पण त्यांना स्वत:ला तिथे काही सादर करावंसं वाटतं. माझा विभाग (अकाउंट) तिथे असावा, असं त्यांना वाटतं. मग त्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो. बोलावं लागतं. आता बोलताना ते कुठली भाषा वापरणार तर ते खिचडी भाषा वापरतात. मग माझ्यासारखा मास्तर त्याला म्हणतो की ही कोणती भाषा आहे. तर तो म्हणतो, ही आमच्या जनरेशनची भाषा आहे. मग त्याला मी म्हणते की तुझ्या जनरेशनला आता तूच शिकव की चांगली भाषा कशी हवी. तुला इंग्रजीत बोलायचंय का, मग त्यावर प्रभुत्व हवं, मराठी असेल तर त्यावर. माझ्या कक्षेतल्या मुलांना हे पटतंय आणि ती मुलं हे करतायत. 

शेवटी हे आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. ते ब्लॉग लिहीतात, पॉडकास्ट करतात. माध्यमं बदलत राहतात. राहणार. केवळ पाठांतर हेच माध्यम होतं एके काळी. लिपी नंतर आली, सगळ्यांना ती लिपी शिकायची सोय केव्हा उपलब्ध झाली? शाई-कागद केव्हा उपलब्ध झाले?  ज्ञानेश्वरांच्या काळात कागद दुर्मिळ होता. इसवीसनाच्या सहाव्या शतकात हॅन्डमेड पेपर म्हणजे हाताने तयार करायचा जाड  कागद उपलब्ध झाला. मुद्रणकला किती उशीरा आली. साहेब आल्यावर ! पोर्तुगीज आल्यावर! नुसतं लेखन वाचन आपण म्हटलं तरी त्यासाठी लागणार्‍या साहित्याचा आपण विचार करतो का! मुद्रणसाहित्यानंतर दृकश्राव्य साधनं आली. एकूण लिहिण्यावाचण्याची माध्यमं बदलत राहणार. 

माणूस हा आळशी प्राणी आहे 😊 आता हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा त्याला ऐकणं बरं वाटतं. 

------------------

प्रश्न : पुन्हा एकदा साहित्य संमेलनाकडे वळते. याचा एक आराखडा असतो, त्यात कोणते नवे प्रवाह यावेत असं तुम्हाला वाटतं?  तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कार्यक्रमांविषयी विचारणा झाली नाही असं तुम्ही म्हणालात सुरूवातीलाच पण विचारलं असतं तर तुम्ही कोणते विषय निवडले असते ? आगामी संमेलनातील विषयांबाबत तुम्हाला काही विचारणा झाली आहे का ?

मा. तारा भवाळकर : 

नाही, यंत्रणा ऐकत नाहीत असा अनुभव आहे. शिवाय विषय, गरजा काळानुसार बदलत असतात. संयोजकांना जेव्हा वाटेल की काही नवीन द्यावं तेव्हा ते देतील  नवे विषय, लोकांनी सुचवायला हवं ते. नुसता अध्यक्ष फार काही करू शकत नाही. माझ्याच काळात मला विषय विचारण्यात आले नव्हते तर आता पुढच्या काळात कसे विचारतील! 😊

------------------------------

प्रश्न : तुम्ही ठरवून काही करत नसलात तरी तुमची चाळीसहून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आपण मुलाखत निश्चित करत असताना तुमची व्यग्रता लक्षात आली. आजवर इतक्या उर्जेने काम करत आलात ,तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं?  सध्या काही नवे लेखनप्रकल्प सुरु आहेत का? 

मा. तारा भवाळकर : 

नवे प्रकल्प करण्याइतकी ताकद आता माझ्यात नाही. मी मघाशी सांगितलं तसं आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर मला हे अध्यक्षपद मिळालं आहे. साहित्यक्षेत्रात बरीच वर्ष काम केलं आहे. या वर्षभर मला सगळ्यांनी इतकं गुंतवून ठेवलंय की आता मी सर्व पातळ्यांवर थकले आहे 😊

शेवटी एकच सांगते, आता माझ्याकडून किंवा आमच्या पिढीकडून अपेक्षा करू नका, तुम्ही तरूण मंडळी काहीतरी नवीन निर्माण करा. 

------------------

मुलाखतकार - मोहिनी महेश मोडक