बनारसच्या ’स्क्वेअर इन’ हॉटेलमध्ये जेवून सामान बांधून प्रयागराजला निघायचं होतं. बरेच जर्मन पर्यटक आल्याने हॉटेल गजबजलं होतं. आपापल्या पर्सेस जवळ ठेवायच्या आणि मोठ्या बॅग खोलीबाहेर काढून ठेवायच्या अशा स्पष्ट सूचना असूनही ईश्वरकाकांनी आपली महत्वाची सॅक मोठ्या बँगांवर ठेवून दिली. ती कोणत्या गाडीच्या डिकीत गेली हे शोधायला कासावीस झालेले ईश्वरकाका आणि त्यांना वैतागलेल्या शिलेदारांनी प्रयागच्या रस्त्यावर सुसाट निघालेल्या आमच्या दोन्ही गाडया थांबवून शोधमोहीम सुरु केली.
हे कमी की काय म्हणून एका जर्मनबुवांची बॅगही हॉटेल क्रूच्या चुकीने आमच्या सामानात शिरली होती. सगळ्या बॅगांची उचकपाचक झाल्यावर जर्मन बुवांनी त्यांची बॅग व्हिडिओ कॉलवर शांतपणे ओळखली. ते विमानतळावर पोचले कि निघाले, मग तोवर ही बॅग पोचेल का आणि नाही पोचली तर त्यांचं भारताविषयी काय मत होईल याची मला चिंता पडली. इतक्यात हॉटेलचा मॅनेजर हमारे गाडी का पीछा करते हुए पोचला आणि एकदाची ती बॅग घेऊन गेला. झाले, एव्हाना प्रवासात ध्येय नसलेली काही मंडळी बॅग व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ होऊन ग्रुपवर सल्ले लिहू लागली. मध्येच एका काकांनी ’१ जानेवारी’ कसा ’आपला’ नववर्ष दिन नाही’ अशी असंबद्ध आणि बूमर्सच्या आवडीची पोस्ट टाकली. मिलींद त्यांना "एरवी ज्या कॅलेंडरनुसार जगता ते आता का म्हणून आपले नाही, आँ!’ टाईप प्रतिप्रश्न करू लागला. हा ट्रॅक सोडून काहीजण भलत्याच पोस्ट टाकू लागले. बॅग हरवेतो सगळं फारच सुरळीत सुरु असल्याने मला कसंसंच होत होतं. आता कशी ट्रीपला रंगत आली. एरवी रस्त्यावरचं वगैरे न खाणार्या आणि ’मॅन ऑफ फ्यु वर्ड्स’ असणार्या किंवा आमच्या (आदरार्थी एकवचन) वटवटीमुळे बोलायची संधी न मिळणार्या विवेकदादाने पण उत्साहित होऊन चक्क रस्त्यालगतच्या धूळभरल्या टपरीत सरसोंच्या तेलात तळली जाणारी मस्तपैकी अनहायजिनीक गरमागरम भजी विकत आणली. त्यांची चव काही और होती.प्रयागराज म्हणजे पूर्वीचं अलाहाबाद. इथल्या क्लाइव्ह रस्त्यावर अमिताभचं जन्मस्थान आणि हरिवंशरायजींचं कर्मस्थान. दिल्लीला जाईतो ८, १० वर्ष त्यांचं प्रयागला म्हणजे तेव्हाच्या अलाहाबादला वास्तव्य होतं हे वाचलं होतं. अमिताभ काहीच्या काही आवडत असल्याने उगाचच ते घर पाहायची इच्छा होती पण ते भाड्याचं होतं, आता तिथे काही खुणा नाहीत म्हणे. नेहरू घराण्याचं आनंद/ स्वराज भवन इंदिरा गांधींनी कॉंग्रेस पक्षाला देऊन टाकलंय. त्यामुळे प्रयागबद्दल उत्सुकता होती ती फक्त त्रिवेणी संगमाविषयी. शहराची रचना बरीचशी नागपूरसारखी वाटली. पुलावरून शहरात शिरताना आगामी कुंभमेळ्यासाठी नैनी भागात वसवलेली विस्तीर्ण टेंट सिटी दिसली. साध्या तंबूंपासून आयआरसीटीसीच्या दिवसाला तब्बल वीसहजार रू. चार्ज करणार्या राजेशाही तंबूंपर्यंत कित्येक निवास प्रकारांचा यात समावेश असणार. नजरेत भरेल अशी स्वच्छता होती. जागोजागी कुंभमेळ्याचं महत्व सांगणार्या, प्रयागला येण्याचं आवाहन करणार्या फलकांवर योगी-मोदी जोडीनं झळकत होते. एकूण कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु होती.
’रामा कॉंटीनेंटल’ हॉटेलला पोचलो. विमानतळावर क्न्व्हेयर बेल्टकडे सगळे टक लावून पाहत उभे असतात तसं आम्ही पण मेरीवाली बॅगची प्रतीक्षा करत उभे होतो. आधी आपापल्या बॅग ताब्यात घेऊन चेक-इन केलं. हॉटेल बनारसपेक्षा बरंच मोठं आणि पॉश होतं. रिसेप्शनीस्ट इतकी चुणचुणीत आणि गोड होती की एखादी तक्रार करायला कुणी आलंच तर कशाला आलोय तेच विसरून जात असावं. थोडा आराम करून हाय-टी घेतला. खोडरबरासारखे लागणारे पनीरचे ठोकळे अळणी बेसनात बुडवून नुसतेच तळले होते. बाकी स्प्रेड चवदार असला तरी बनारसच्या स्क्वेअर इनचे फूड पहली पायदान वरच.
थंडीचा जामानिमा करून ’अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क’ मध्ये गेलो. पार्कमधून आत शिरताना उजव्या भागात महापालिकेचे ४ मोठाले पेटारे ठेवले होते. जुनी पादत्राणे, वस्तू, कपडे इ. साठी हे वेगवेगळे पेटारे होते. हल्ली बर्याच गावात ’माणुसकीची भिंत’ असते तसा प्रकार. समोरच मिशीला पीळ देणार्या देखण्या आझादांचा पूर्णाकृती पुतळा होता. त्यांचा दुसरा हात पाठीमागे आहे आणि त्यात पिस्तुल आहे. मागे एक प्रचंड मोठं झाड आहे. प्रिन्स आल्फ्रेडने या शहराला भेट दिली होती याची आठवण म्हणून १८७० मध्ये हे उद्द्यान निर्माण करण्यात आलं. १९३१ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान चंद्रशेखर आझाद ब्रिटीश पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्या हाती लागण्यापेक्षा त्यांनी इथे स्वत:वर गोळी झाडून आत्मबलिदानाचा मार्ग पत्करला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्तर प्रदेश सरकारने त्यांचं नाव या उद्द्यानाला दिलं आहे.“ग्रहाणां च यथा सूर्यो नक्षत्राणां यथा शशी। तीर्थानामुत्तमं तीर्थे प्रयागाख्यमनुत्तमम्।” असं श्रेष्ठत्व असलेल्या प्रयाग संगमाच्या किनार्यापाशी पोचलो. गंगा, यमुना आणि अदृश्य किंवा लुप्त झालेली सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेलं हे स्थान. धुक्यात वेढलेला रस्ता धूसर पण अगदी स्वच्छ दिसत होता. जागोजागी कचरापेट्या ठेवलेल्या होत्या. किनार्यावर वाळूच्या पोत्यांना एकमेकांजवळ घट्ट बांधून घाटपायरीवजा रचना केली होती. संगमापाशी घेऊन जाणारे नाविक तयारच होते. एका नावेत दहा जण असे बसलो. सकाळचे साडेपाच वाजले असतील. नदीच्या पाण्यावर चादर घालावी तसं पांढरट धुकं, लांबचे थरथरते दिवे थेंबांच्या फिसकटलेल्या रांगोळीसारखे. सोबतीला थंडगार वाऱ्याच्या झुळुकी. त्याची तमा न बाळगता वल्ही मारणारे दोघे नाविक. आकाश, पाणी सगळं एकाच राखाडी रंगाचं. गंगा-यमुनेच्या पाण्याच्या रंगांमधला फरक न उजाडलेल्या पहाटे दिसणं शक्य नव्हतं पण वेगातला फरक लक्षात आला. खळाळती गंगा आणि संथ वाहणारी यमुनामाई. मीलनरेषेवर नावांना दोर बांधून केलेल्या पाळण्यांसारख्या रचनेत बर्फासारख्या गार पाण्यात काही पुरूषाकृती डुबकी घेत पापक्षालन करवून घेताना दिसल्या. हाडं गोठवणार्या थंडीत खोल पाण्यातून रोज नवे प्रवासी वल्हवत आणणारे आणि संगमापाशी नाव थांबवून हे सगळं तटस्थपणे पाहणारे फक्त पोट असलेले नावाडी पाप-पुण्यापलीकडे होते.
"संगमु सिंहासनु सुठि सोहा। छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा।। चवँर जमुन अरु गंग तरंगा। देखि होहिं दुख दारिद भंगा।“
गंगा यमुना सरस्वतीचा संगम हे तीर्थराज (प्रयागचं ) सिंहासन आहे, अक्षयवट वृक्ष त्यावर पाखर धरणारं छत्र आहे.एका बाजूने गंगा आणि दुसरीकडून यमुनेच्या लाटा तीर्थराजाला चवर्या ढाळीत आहेत, ज्याला पाहताच सारं दैन्य दुःख दूर होतं.
|| नमामि गंगे part 1 || बनारस सारनाथ
#आजोळ_स्पेशल_ट्रिप
अतिशय सुरेख वर्णन! सर्व श्लोकांचा यथोचित वापर करून लिहिलेली बखरच जणू! बाकी नेहमीप्रमाणे खुसखुशीत शैलीत लिहिलेलं असल्याने अर्थातच लेख वाचनीय झालाय.
ReplyDelete