Wednesday, January 8, 2025

तीर्थराज प्रयाग

बनारसच्या ’स्क्वेअर इन’ हॉटेलमध्ये जेवून सामान बांधून प्रयागराजला निघायचं होतं. बरेच जर्मन पर्यटक आल्याने हॉटेल गजबजलं होतं. आपापल्या पर्सेस जवळ ठेवायच्या आणि मोठ्या बॅग खोलीबाहेर काढून ठेवायच्या अशा स्पष्ट सूचना असूनही ईश्वरकाकांनी आपली महत्वाची सॅक मोठ्या बँगांवर ठेवून दिली. ती कोणत्या गाडीच्या डिकीत गेली हे शोधायला कासावीस झालेले ईश्वरकाका आणि त्यांना वैतागलेल्या शिलेदारांनी प्रयागच्या रस्त्यावर सुसाट निघालेल्या आमच्या दोन्ही गाडया थांबवून शोधमोहीम सुरु केली. 

हे कमी की काय म्हणून एका जर्मनबुवांची बॅगही हॉटेल क्रूच्या चुकीने आमच्या सामानात शिरली होती. सगळ्या बॅगांची उचकपाचक झाल्यावर जर्मन बुवांनी त्यांची बॅग व्हिडिओ कॉलवर शांतपणे ओळखली. ते विमानतळावर पोचले कि निघाले, मग तोवर ही बॅग पोचेल का आणि नाही पोचली तर त्यांचं भारताविषयी काय मत होईल याची मला चिंता पडली. इतक्यात हॉटेलचा मॅनेजर हमारे गाडी का पीछा करते हुए पोचला आणि एकदाची ती बॅग घेऊन गेला. झाले, एव्हाना प्रवासात ध्येय नसलेली काही मंडळी बॅग व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ होऊन ग्रुपवर सल्ले लिहू लागली. मध्येच एका काकांनी ’१ जानेवारी’ कसा ’आपला’ नववर्ष दिन नाही’ अशी असंबद्ध आणि बूमर्सच्या आवडीची पोस्ट टाकली. मिलींद त्यांना "एरवी ज्या कॅलेंडरनुसार जगता ते आता का म्हणून आपले नाही, आँ!’ टाईप प्रतिप्रश्न करू लागला. हा ट्रॅक सोडून काहीजण भलत्याच पोस्ट टाकू लागले. बॅग हरवेतो सगळं फारच सुरळीत सुरु असल्याने मला कसंसंच होत होतं. आता कशी ट्रीपला रंगत आली. एरवी रस्त्यावरचं वगैरे न खाणार्‍या आणि ’मॅन ऑफ फ्यु वर्ड्स’ असणार्‍या किंवा आमच्या (आदरार्थी एकवचन) वटवटीमुळे बोलायची संधी न मिळणार्‍या विवेकदादाने पण उत्साहित होऊन चक्क रस्त्यालगतच्या धूळभरल्या टपरीत सरसोंच्या तेलात तळली जाणारी मस्तपैकी अनहायजिनीक गरमागरम भजी विकत आणली. त्यांची चव काही और होती.

प्रयागराजच्या वाटेवर जी खेडी, लहान गावं लागली ती ’लापता लेडिज’ मधल्या नायिकेसारखी. साधी ,भोळी, नीटनेटकी पण स्वत:च वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण रूपडं असलेली. यूपी म्हणजे बकाल हा समज दूर करणारी. राजकारण्यांचे फलक मात्र जागोजागी त्यामानाने ब्रँडच्या जाहिराती अगदी कमी. दक्षिणेत दिसणारी हिरवाई मात्र इकडे फारशी नाही. 

प्रयागराज म्हणजे पूर्वीचं अलाहाबाद. इथल्या क्लाइव्ह रस्त्यावर अमिताभचं जन्मस्थान आणि हरिवंशरायजींचं कर्मस्थान. दिल्लीला जाईतो ८, १० वर्ष त्यांचं प्रयागला म्हणजे तेव्हाच्या अलाहाबादला वास्तव्य होतं हे वाचलं होतं. अमिताभ काहीच्या काही आवडत असल्याने उगाचच ते घर पाहायची इच्छा होती पण ते भाड्याचं होतं, आता तिथे काही खुणा नाहीत म्हणे. नेहरू घराण्याचं आनंद/ स्वराज भवन इंदिरा गांधींनी कॉंग्रेस पक्षाला देऊन टाकलंय. त्यामुळे प्रयागबद्दल उत्सुकता होती ती फक्त त्रिवेणी संगमाविषयी. शहराची रचना बरीचशी नागपूरसारखी वाटली. पुलावरून शहरात शिरताना आगामी कुंभमेळ्यासाठी नैनी भागात वसवलेली विस्तीर्ण टेंट सिटी दिसली. साध्या तंबूंपासून आयआरसीटीसीच्या दिवसाला तब्बल वीसहजार रू. चार्ज करणार्‍या राजेशाही तंबूंपर्यंत कित्येक निवास प्रकारांचा यात समावेश असणार. नजरेत भरेल अशी स्वच्छता होती. जागोजागी कुंभमेळ्याचं महत्व सांगणार्‍या, प्रयागला येण्याचं आवाहन करणार्‍या फलकांवर योगी-मोदी जोडीनं झळकत होते. एकूण कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु होती. 

’रामा कॉंटीनेंटल’ हॉटेलला पोचलो. विमानतळावर क्न्व्हेयर बेल्टकडे सगळे टक लावून पाहत उभे असतात तसं आम्ही पण मेरीवाली बॅगची प्रतीक्षा करत उभे होतो. आधी आपापल्या बॅग ताब्यात घेऊन चेक-इन केलं. हॉटेल बनारसपेक्षा बरंच मोठं आणि पॉश होतं. रिसेप्शनीस्ट इतकी चुणचुणीत आणि गोड होती की एखादी तक्रार करायला कुणी आलंच तर कशाला आलोय तेच विसरून जात असावं. थोडा आराम करून हाय-टी घेतला. खोडरबरासारखे लागणारे पनीरचे ठोकळे अळणी बेसनात बुडवून नुसतेच तळले होते. बाकी स्प्रेड चवदार असला तरी बनारसच्या स्क्वेअर इनचे फूड पहली पायदान वरच. 

थंडीचा जामानिमा करून ’अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क’ मध्ये गेलो. पार्कमधून आत शिरताना उजव्या भागात महापालिकेचे ४ मोठाले पेटारे ठेवले होते. जुनी पादत्राणे, वस्तू, कपडे इ. साठी हे वेगवेगळे पेटारे होते. हल्ली बर्‍याच गावात ’माणुसकीची भिंत’ असते तसा प्रकार. समोरच मिशीला पीळ देणार्‍या देखण्या आझादांचा पूर्णाकृती पुतळा होता. त्यांचा दुसरा हात पाठीमागे आहे आणि त्यात पिस्तुल आहे. मागे एक प्रचंड मोठं झाड आहे. प्रिन्स आल्फ्रेडने या शहराला भेट दिली होती याची आठवण म्हणून १८७० मध्ये हे उद्द्यान निर्माण करण्यात आलं. १९३१ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान चंद्रशेखर आझाद ब्रिटीश पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्या हाती लागण्यापेक्षा त्यांनी इथे स्वत:वर गोळी झाडून आत्मबलिदानाचा मार्ग पत्करला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्तर प्रदेश सरकारने त्यांचं नाव या उद्द्यानाला दिलं आहे.
संधीप्रकाशात आझादांच्या आत्मबलिदानाची कथा त्यांच्या पुतळ्याच्या आणि त्या झाडाच्या साक्षीने पार्थकडून ऐकली. नेहरूंचं सहकार्य नसलं तरी कमला नेहरूंनी पुढाकार घेऊन आझादांचे विधीवत अंत्यसंस्कार करायला मदत केली ही पार्थकडून कळलेली माहिती विस्मयजनक वाटली. त्यांनी मुग्धा वैशंपायनसह तिथे ’वंदे मातरम्’ म्हणायचं आवाहन केलं. भारावलेल्या मनस्थितीत आझादांच्या पुतळ्याकडे पाहत एका सुरात ’वंदे मातरम्’ म्हणताना या सगळ्याच क्रांतीकारकांबद्द्ल फार फार कृतज्ञ वाटलं आणि स्वत:बद्द्ल फार खुजं देखील. 

पार्क मध्ये दिवेलागण झाली. देखाव्यासाठी केलेल्या पारदर्शक जनावरांच्या अंगातून फ्लुरोसंट लाईट सोडलेले असल्याने पार्क आकर्षक दिसत होतं. इथून आमची सगळी गाठोडी जवळच्या एका झकास हॉटेलला पोचवण्यात आली, इथे पार्थचं रामायण आणि मुग्धाचं गाणं असा कार्यक्रम होता तो ही लॉनवर, साडेसहा डिग्रीमध्ये. हीव भरल्याने ’सेहतू बाहांधा रेहे साहागरी’ असं गायची वेळ मुग्धावर येईल असं वाटलं पण ती न शहारता आरामात गात होती. 

दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शब्दामृतच्या भाषेत शुचिर्भूत होऊन आम्ही प्रयाग संगमासाठीनिघालो. गारठलेल्या अवस्थेत संगमाकडे निघण्य़ाआधी खाली शेगडी,त्यावर अ‍ॅल्युमिनीयमची किट्ली घेऊन फिरणारा चहावाला देवदूतासारखा भेटला. किटलीसारख्या तोंडून वाफा निघत होत्या.
पाण्यात पुठ्ठा बुडवल्यासारखा बेचव चहा पण गरम असल्याने हवासा वाटत होता. पार्किंगमध्ये तुरळक गर्दी होती तरीही आमचे शिलेदार नेहमीप्रमाणे पताका घेऊन पुढे चालत होते. कपड्यांचे चार पाच थर घालून आम्ही त्यांच्या मागे.


गाडी पार्किंगलगतच्या ’लेटे हुए हनुमानजीं’चं आधी दर्शन घेतलं. लंकेवर विजय मिळवल्यानंतर हनुमानजी थकले होते आणि त्यांनी इथे विश्रांती घेतली होती अशी मान्यता आहे. हे मंदिर किमान ६००-७०० वर्षे जुनं आहे. हनुमानजींची दक्षिणाभिमुख मूर्ती २० फूट लांब आहे. संगमस्नानाला या दर्शनाविना पूर्णत्व नाही असं म्हणतात. आम्ही गेलो तेव्हा बाहेर बराचसा अंधार पण आत प्रखर दिवे होते. गर्दी नव्हती. कुंभमेळ्यात हेच दर्शन गर्दीमुळे बहुसंख्य लोकांना दुरापास्त झालं होतं. 

संगमाकडे चालत निघालो. उजव्या हाताला भक्कम बांधणीचा भलाथोरला अलाहाबाद किंवा अकबर किल्ला आहे. त्याची दुसरी बाजू थेट यमुनेच्या किनार्‍यावर आहे. या जागेचं भू-राजकीय महत्व लक्षात घेऊन मुघल सम्राट अकबराने १५८३ मध्ये इथे हा किल्ला बांधला. बांधणीचा खर्च सव्वा सहा कोटी आला असं म्हणतात. इतिहासकार विलियम फिंचच्या नोंदीनुसार किल्ला पूर्ण व्हायला ४० वर्ष लागली. तोवर अकबर मृत्यु पावला. किल्ल्याच्या परिघावरून अकबराच्या तत्कालिन अफाट सांपत्तिक आणि राजकीय ताकदीचा अंदाज येतो. सलीम ऊर्फ जहांगीर १६०५ मध्ये मुघल सम्राट होण्यापूर्वी काही वर्ष इथे किल्ल्याचा सुभेदार म्हणून राहिला होता. १७६५ मध्ये किल्ला बंगालचा नवाब शुजा-उददौलाला विकण्यात आला. १७९८ मध्ये तह झाला आणि किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आता त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून वर्गीकृत केलं आहे. 

या किल्ल्याच्या आत चांदी आणि तांब्याची नाणी पाडणारी टांकसाळ होती, जहाजबांधणी होत होती. किल्ल्यात जनानी महल, शाही हरम असे बरेच भाग होते. जतन व्हावा म्हणून आता थोडाच भाग पर्यटकांना बघायला खुला आहे. जेवढा बघता येतो त्या भिंतींना जाळी लावलेली असल्याने बदाम, बाण, I love you Sangita, जोडो के दर्द की दवा.. वगैरे मजकुर सुदैवाने नव्हता. किल्ल्याचा काही भाग भारतीय सैन्यासाठी राखीव आहे. इथे आता एक पाताळपुरी मंदिर आहे. मला ते काहीसं कृत्रिम आणि बटबटीत वाटलं. मंदिरातील काही प्राचीन मूर्ती ऑईलपेंटने रंगवल्याने कशाशाच दिसत होत्या. 

इथला ३०० वर्ष जुना, दहा मीटर घेराचा प्रसिद्ध ’अक्षय वट’ पाहिला. ह्युएनत्संगच्या प्रवास नोंदींमध्ये याचा उल्लेख आहे. पृथ्वी प्रलयात बुडाली तरी हा वृक्ष अक्षय राहतो. याच्या पानावर ईश्वर बालरूपात राहून सृष्टीचं पालन करतो अशी पौराणिक आख्यायिका तिथे लिहिलेली आहे. किल्ला परिसरात इतरत्रही बरीच  वडाची झाडं असली तरी अक्षयवटाला विशेष मह्त्व आहे. अंदमान जेलमधल्या लाईट-साऊंड शो मध्ये अशाच एका पुरातन वटवृक्षाने ’ओम पुरी’ च्या आवाजात स्वातंत्र्य-आंदोलनाची गाथा ऐकवली होती त्याची आठवण झाली. अक्षय वटाकडे सांगण्यासारखं किती असेल ! अकबराच्या काळापासून किती उलथापालथी या वृक्षाने पाहिल्या असतील! आता हे लिहीत असताना यंदाच्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेली दुर्घटना आठवली. असं काही पाहताना त्याला त्याच्या अक्षयत्वाचा गौरव न वाटता कदाचित ओझं वाटत असेल. 

“ग्रहाणां च यथा सूर्यो नक्षत्राणां यथा शशी। तीर्थानामुत्तमं तीर्थे प्रयागाख्यमनुत्तमम्।” असं श्रेष्ठत्व असलेल्या प्रयाग संगमाच्या किनार्‍यापाशी पोचलो. गंगा, यमुना आणि अदृश्य किंवा लुप्त झालेली सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेलं हे स्थान. धुक्यात वेढलेला रस्ता धूसर पण अगदी स्वच्छ दिसत होता. जागोजागी कचरापेट्या ठेवलेल्या होत्या. किनार्‍यावर वाळूच्या पोत्यांना एकमेकांजवळ घट्ट बांधून घाटपायरीवजा रचना केली होती. संगमापाशी घेऊन जाणारे नाविक तयारच होते. एका नावेत दहा जण असे बसलो. सकाळचे साडेपाच वाजले असतील. नदीच्या पाण्यावर चादर घालावी तसं पांढरट धुकं, लांबचे थरथरते दिवे थेंबांच्या फिसकटलेल्या रांगोळीसारखे. सोबतीला थंडगार वाऱ्याच्या झुळुकी. त्याची तमा न बाळगता वल्ही मारणारे दोघे नाविक. आकाश, पाणी सगळं एकाच राखाडी रंगाचं. गंगा-यमुनेच्या पाण्याच्या रंगांमधला फरक न उजाडलेल्या पहाटे दिसणं शक्य नव्हतं पण वेगातला फरक लक्षात आला. खळाळती गंगा आणि संथ वाहणारी यमुनामाई. मीलनरेषेवर नावांना दोर बांधून केलेल्या पाळण्यांसारख्या रचनेत बर्फासारख्या गार पाण्यात काही पुरूषाकृती डुबकी घेत पापक्षालन करवून घेताना दिसल्या. हाडं गोठवणार्‍या थंडीत खोल पाण्यातून रोज नवे प्रवासी वल्हवत आणणारे आणि संगमापाशी नाव थांबवून हे सगळं तटस्थपणे पाहणारे फक्त पोट असलेले नावाडी पाप-पुण्यापलीकडे होते.

सहा डिग्रीची कडाक्याची थंडी मी किंवा ही ही ही म्हणत असल्याने संगमाचं शांतवणारं ओंजळभर पाणी घेऊन काकडलेल्या बोटांनी फक्त डोळ्यांना लावलं. जिणं गंगौघाचं पाणी वगैरे असावं अशी मी कुणी नव्हे त्यामुळे पुण्याची मोजणी आणि पापाची टोचणी अपरिहार्य. पण हे सगळं इथे बोथट होऊन गेलं. बकेट लिस्ट मधली आणखी एक इच्छा किंवा संकल्प पूर्ण झाला याचं समाधान होतं की संगमाच्या नितळ पाण्याच्या स्पर्शाचा आनंद होता माहीत नाही पण तृप्त वाटलं. 

रेल्वे प्रवासात एखादा फेरीवाला बोगीजवळ यावा तसा एक नाविक छोटीशी बोट वल्हवत आमच्या नावेपाशी आला. त्याने ’ए चाय गर्र्म’ म्हणावं असं म्या आसक्त भौतिकवाद्याला वाटत होतं पण हे जग वेगळं होतं. इथल्या आस्था वेगळ्या होत्या. हे स्थान आणि पाणी पापक्षालनासाठी नक्कीच नाही. स्वत:चं खरं प्रतिबिंब बघण्यासाठी असावं. हा गंगाजल विक्रेता होता. ’इस जल को मट्टी नही लगी’ असं म्हणत होता. मट्टी म्हणजे मानवी शरीर, प्रेत. त्याचा स्पर्शही न झालेल्या पाण्याच्या पावित्र्याची तो खात्री देत होता.

तीर्थराज म्हटल्या गेलेल्या प्रयागराजच्या पावित्र्याचं , लाटांचं आणि वर उल्लेख केलेल्या अक्षयवटाचं वर्णन संत तुलसीदासांनी अद्भुत शब्दात केलं आहे. या शब्दांचा अर्थ हे तिन्ही स्वत: पाहिल्याने,अनुभवल्याने आता नीट कळतो आहे.

"संगमु सिंहासनु सुठि सोहा। छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा।। चवँर जमुन अरु गंग तरंगा। देखि होहिं दुख दारिद भंगा।“

गंगा यमुना सरस्वतीचा संगम हे तीर्थराज (प्रयागचं ) सिंहासन आहे, अक्षयवट वृक्ष त्यावर पाखर धरणारं छत्र आहे.एका बाजूने गंगा आणि दुसरीकडून यमुनेच्या लाटा तीर्थराजाला चवर्‍या ढाळीत आहेत, ज्याला पाहताच सारं दैन्य दुःख दूर होतं. 

|| नमामि गंगे  part 1 ||     बनारस       सारनाथ


#आजोळ_स्पेशल_ट्रिप 


1 comment:

  1. अतिशय सुरेख वर्णन! सर्व श्लोकांचा यथोचित वापर करून लिहिलेली बखरच जणू! बाकी नेहमीप्रमाणे खुसखुशीत शैलीत लिहिलेलं असल्याने अर्थातच लेख वाचनीय झालाय.

    ReplyDelete