१ जानेवारीला (आमच्यासह) तब्बल ८ लाख लोकांनी काशी विश्वनाथ/ गंगेला भेट दिल्याची बातमी वाचली. आपण १ जानेवारीला (आमच्यासह) तब्बल ८ लाख लोकांनी काशी विश्वनाथ/ गंगेला भेट दिल्याची बातमी वाचली. आपण लाखात एक आहोत याची मला कल्पना होती पण आता खात्रीच पटली :-) गंगामैयाच्या सहवासातली ती अद्भुत संध्याकाळ कायम लक्षात राहील. २०२५ ची, नववर्षाची पहिली सकाळ मात्र आम्ही सारनाथला घालवली. वाराणसीहून (’दोन्ही’ नैमिषारण्यांपेक्षा फारच ) जवळ म्हणजे १५ कि.मी वर असलेलं ’सारनाथ’. आम्ही बारा जण आणि आमची ९७११ ट्रॅव्हलर.
मावशी आमची व्याकरण दक्ष, संस्कृतप्रवीण टॅबधारिणी. (ग्रुपवर -हस्व दीर्घ पाहून लिहावं लागतं. ) रोज पहाटे इतक्या नियमितपणे स्टेटसला ज्ञानेश्वरीतले श्लोक टाकते की एखादे वेळी नसला तर रोज पाहणारे फोन करून तब्येतीची चौकशी करतात. नियमित पाहणार्यांनी पाहिलं नाही तर मावशीही त्यांची चौकशी करते. एकूण बहुपयोगी मिस्ड कॉल सारखा स्टेट्सचा खुशाली कळवणे हा नवा किंवा खरा उपयोग कळला. प्रवासात नेट मिळालं नाही तर हॉटस्पॉटची तजवीज करून भल्या पहाटे उठून तिचं हे काम खंड न पडता सुरू होतं. मावशीने ग्रुपवर शंकराचार्यांचे काशीपंचकम् , निर्वाणषटकम्, श्रीगंगास्तोत्रम् , कालभैरवाष्टकम्, श्रीविश्वनाथाष्टकम्, रावणलिखीत शिवतांडवस्तोत्रम् इ. पोस्ट करून ठेवली होती. तिच्या मुली पण फाडफाड संस्कृतवाल्या. प्रवासात गप्पा आणि खाण्यापिण्यातून तोंड मोकळं राहिलं तर या संस्कृततज्ञांसह मी ही उच्चारांशी कुस्ती खेळत स्तोत्रं म्हटली.
सारनाथला पोचलो तर तिथेही गर्दी. पार्किंगची मारामार. बाकी स्वच्छता, प्रशासकीय सुविधा, सुरक्षा तपासणी मात्र अगदी व्यवस्थित. सारनाथ अशोकस्तंभामुळे सर्वपरिचित आहेच. गंगा वरूणा संगमानजीकचं सारंगनाथ म्हणजेच सारनाथ. ’हरणां’चा नाथ असा त्याचा अर्थ. एका बौद्ध आख्यायिकेनुसार मृगयेला इथे आलेल्या राजाला एका हरणाने आपल्या हरिणीचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:ला अर्पण केलं. राजाला करूणा आणि त्यागाचं महत्व कळलं आणि त्याने हे हरणांचं अभयारण्य म्हणून घोषित केलं. इथला धामेक किंवा धामेख स्तूप हे बौद्धांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांपैकी एक. स्तूप म्हणजे भगवान बुद्धांच्या शरीराचे किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे अवशेष जतन करणारं घंटा किंवा घुमटाच्या आकाराचं स्मारक.
लुंबिनीना जन्मलेल्या, कुशीनगरला महानिर्वाण तर बोधगयेला ज्ञानप्राप्ती झालेल्या भगवान बुद्धांनी पाच शिष्यांना पहिला उपदेश दिला ते हे सारनाथ. त्यामुळे हे चौथं म्हत्वाचं स्थान. धम्मचक्रपरिवर्तनाची ही नांदी. नंद आणि मौर्य काळापर्यंत भरभराटीला पोचलेल्या सारनाथमधला बौद्ध मठ ११९४ मध्ये मुहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने नष्ट केला. यामुळे बहुतांशी बौद्धांनी नेपाळ, तिबेटला स्थानांतरण केलं. या हल्ल्यात तिसर्या शतकात सम्राट अशोकाने स्थापित केलेल्या अशोकस्तंभाचाही विध्वंस झाला. काही भाग शाबूत राहिला. भारताचं हे राष्ट्रीय प्रतीक आता तिथल्या वस्तुसंग्रहालयाचं मुख्य आकर्षण आहे.
गयेमधल्या बोधीवृक्षाच्या झाडाची फांदी कलम करून इथे लावल्याचं गाईडने सांगितलं. या पवित्र झाडाभोवती धातूच्या गोलाकारांची चौकोनी रचना आहे. ते गोल हाताने फिरवत प्रदक्षिणा पूर्ण केली की पापं धुतली जातात अशी मान्यता आहे. मी या प्रदक्षिणेला गेले तेव्हा माझ्या हातात मामीचा फोन राहून गेला. मी प्रदक्षिणा पूर्ण करून येईतो फोन हरवला असं समजून तिचं बीपी वाढलं होतं. मला फोनसह परत येताना पाहून तिचा जीव टण्ण आवाज करत भांड्यात पडला. नंतरही २,३ जणांचे फोन हरवले आणि सापडले तेव्हा असेच टण्ण आवाज आले. बनारसच्या संकटमोचन हनुमानाने मात्र एका गुजराथी काकूंना आयफोनच्या मोहजालातून कायमचं सोडवलं. तो पर्स कापून कुणीतरी मारला. त्या घटनेपासून सगळे थोड्या थोड्या वेळानं सतत आपले खिसे ,पर्स चाचपत ’आहे ना!.. हुश्श!" करत आपापला मोबाईल चेक करायच्या नादाला लागले.
Sarnath |
No comments:
Post a Comment