'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन...
चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें..'
या तरल ओळी वाचताना ’I wandered lonely as a cloud..’ ही वर्ड्सवर्थची कविता आठवते. त्यातला ढग होऊन आपण बालकवींनी शब्दांच्या कुंचल्याने रेखाटलेलं विहंगम निसर्गदृष्य प्रत्यक्ष पाहत तरंगत आहोत असं काहीसं वाटतं. झर्याचा निळासावळा तर शेतांचा हिरवागार, अशा झळझळीत रंगांनी आपली नजर निवते. बालकवींच्या प्रासादिक शब्दांमधला नाद ऐकता येतो. निसर्गगंधच नव्हे तर हिरवळीचा मऊ आणि झर्याचा शीतल स्पर्श अनुभवता येतो.
दुसरीकडे हा अनुभवांच्या बेटांमधून वळसे घेत वाहत चाललेला जीवनाचा प्रवाह असल्याचं जाणवतं. कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवाह !
'पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे'
चिमुकली कौलारु घरं, उंच टेकडी, अडवीतिडवी पायवाट अशा सार्या निसर्गाच्या रेषा ठळक दिसत असतानाच रंगरेषातून साकारलेला सगुण निसर्ग हळूहळू एका गूढ प्रवासाला निघतो.. काळ्या डॊहाकडे. इथे काळा डोह हे मला जीवनाच्या प्रवाहाच्या शेवटाचं प्रतीक वाटतं. पहिल्या कडव्यातले रंग आता नाहीत. शेवटच्या टप्प्याकडे जाणारी वाट कितीही पांढरी असली तरी अंतिमत: काळ्या डोहात समर्पित होणारी.
बालकवींच्या ’श्रावणमासी’ कवितेसारखा हर्ष या कवितेत मनात दाटून येत नाही. त्यांच्या ’फुलराणी’ कवितेत होणारा प्रेमोत्सुक आनंद सोहळा इथे नाही. बालकवी आणि साने गुरुजी यांच्यात मला काही साम्यस्थळं दिसतात. दोघांच्याही शब्दांचा पोत तलम आहे, साहित्यातून उमटणार्या भावना अतिशय मृदु आणि निरागस आहेत. जगरहाटीमध्ये दोघांच्याही प्रतिभेची घुसमट झाली आहे. संवेदनशीलतेला औदासिन्याचा शाप असतो असं म्हणतात. त्याच औदासिन्याचा काळिमा या डोहाला झाकोळून टाकतो आहे.
’झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’
या औदुंबराच्या प्रतिमेइतकी चकित करणारी शब्दकळा आणि चेतनगुणोक्ती अलंकाराचे दुसरे सुंदर उदाहरण नाही. ज्या पाण्याला आपण जीवन म्हणतो त्यातच आता त्या काठाला रुजलेल्या औदुंबराची मुळं पसरलेली आहेत. ज्या वाक्याशी आपण शेवटी खिळून राहतो त्यात वर्णन केलेला काळ्य़ा, गूढ डोहाचं सत्य उमगलेला औंदुबर मात्र निराश नाही. तो काळिमा ’शेवटचा दिस गोड व्हावा’ या अपेक्षेप्रमाणे बालकवींना गोड वाटतो आहे. हा गोडवा आत मुरवलेला औंदुबर निर्विकार आहे. सुरुवातीला हसर्या, सतेज रंगांकडून - मग शुभ्र पायवाटेवरुन अखेरीस काळ्य़ा डोहाकडे जाणार्या आयुष्याच्या प्रवासाकडे, निळ्या प्रवाहाकडे तो स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहतो आहे.
They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
या वर्ड्स्वर्थच्या शब्दांप्रमाणे ’औदुंबर’ ही मला ध्यानानंतरची आनंदमयी समाधी अवस्था निर्माण करणारी प्रतिमा वाटते. ’नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला’ असा मोद अनुभवणारी. कदाचित त्यामुळे बालकवींच्या या कवितेचं गारुड शंभर वर्षांनंतरही कायम असावं.
त्यांच्याच शब्दांच्या आधारे सांगायचं तर ’सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे..’ म्हणता म्हणता
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून’ याचे भान या कवितेच्या अखेरीस येते.
हे भान आपल्याला देणारा औदुंबर जगण्याशी नातं नं तोडता, जळात पाय टाकून तरीही
निर्लेप होऊन निश्चल बसलेला आहे.
-मोहिनी
No comments:
Post a Comment