Monday, February 28, 2022

ह्म्पीगाथा- अंतिम भाग

Anjaneyadri
हम्पी निवांतपणे पाहायला अजून ३,४ दिवस हवेत हे लक्षात आलं होतं पण बदामी, पट्टदकल, ऐहोळे पाहून ह्म्पीला आल्याने आता इतके दिवस शिल्लक नव्हते. दुसर्‍या दिवशी भराभर ब्रेकफास्ट आटोपून निघालो ते थेट अंजनेयाद्री किंवा अंजनेय टेकडी चढायला. हनुमंताचे हे जन्मस्थान मानले जाते. हे नाव ऐकून मला ’अंजहनीहीच्या सुह्ता तुह्ला राहमाहाच वरदाहान’ हे महेंद्र कपूरचं गाणं आठवू लागलं. लहानपणी ते गाणं तसंच आहे असा माझा बरेच दिवस समज होह्ता. तर ते अहसो. खालून वाटले तितके उंच आणि तिरक्या ५७५ पायर्‍या चढणे सोपे नव्हते. एक मिलिटरी कलर कपड्यातला परदेशी तरुण
Stop after climbing 500 stairs  

तुरुतुरू उड्या मारत वर निघाला होता. गाईडने त्याला हटकून कोण-कुठला विचारल्यावर त्याने जर्मनीहून आल्याचे सांगितले. तो त्याची कॅरॅवान घेऊन जगात मनमुक्त प्रवास करत होता. दुबईहून मुंबईपर्यंत ती गाडी त्याने बोटीत घालुन आणली होती. इतके सांगून तो टुणटुण उड्या मारत वर जाऊन दिसेनासा झाला. आम्हालाही स्फुरण चढले. शाळेच्या ट्रीपला आलेली स्थानिक मुलंमुली खाली उतरताना श्रीराम आणि हनुमानाचा जयजयकार आणि कलकलाट करत आमचाही उत्साह नकळत वाढवत होती. वर पोचलो. आता दम लागल्याने ’कोरोनाबिरोना मरु दे’ म्हणत आम्ही मास्क काढून टाकले आणि मोकळा श्वास घेत माथ्यावरच्या मंदिरात प्रवेश केला. तिथे भाविकांची, पर्य़टकांची गर्दी आणि नारळांच्या ढिगासह एकूणच खूप पसारा होता.
Birdeye view from Anjaneyadri

रामसेतूमधला पाण्यावर तरंगणारा दगड बाजूला एका पेटीत (पाण्यात तरंगत) ठेवलेला होता. आत सगळं काही शेंदरी रंगात रंगवलेलं. स्पीकरवर गाणी, भजनं सुरु होती. हनुमंत आणि अंजनीमातेचं दर्शन घेऊन बाहेर रेलींगपाशी आलो. तिथून दिसणारं हम्पीचं विहंगम आणि विलोभनीय दृश्य पाहून चढून आल्याचे चीज झाले. लख्ख उन्हात पांढरट दिसणार्‍या शिळांच्या वेढ्यात तुंगभद्रेची निळसर रेष लवलवत होती. बदामी, राखाडी मंदिरांचे कळस पाहून हे काय असेल, ते काय असेल वगैरे चर्चा सुरु होती. दिशांचे माझे ज्ञान दिव्य असल्याने मी त्यात भर घालण्याचा मोह आवरुन फक्त नेत्रसुख घेतले.


तापलेल्या पठारावर बरंच भटकून खाली उतरलो. चेहर्‍यावर थंड पाण्याचे हबकारे मारताच उत्साह परत आला. पायथ्याशी माकडांना चुकवत पूजासामान, हनुमानमूर्ती विकणार्‍यांची गर्दी वाढली होती. किरकोळ विक्रेत्या बहुसंख्येने बायका होत्या.  

थोडे फ्रेश वाटताच पंपासरोवर आणि शबरी गुहा पाहायला गेलो. पंपासरोवर हे हिंदू धर्मातल्या पाच पवित्र मानल्या जाणार्‍या सरोवरांपैकी एक आहे. (मानसरोवर, बिंदू सरोवर, नारायण सरोवर, पुष्कर सरोवर आणि पंपा सरोवर) भागवत पुराणात तसा उल्लेख आहे. इथे शंकर तपश्चर्येला बसत असल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये असतो. हे सरोवर ह्म्पीजवळच कोप्पल जिल्ह्यात अनेगुंडी (अनागोंदी शब्दाचा उगम इथल्या तत्कालिन गोंधळ आणि दुरवस्थेतून झाला आहे असं वाचलंय) रस्त्यावर आहे. पंपासरोवराचे रिनोवेशन सुरु असल्याने आम्ही आत उतरलो नाही. तीर्थयात्रेची बस बाजूला उभी होती. कर्मचारी बसच्या डिकितून मोठी पातेली, बर्नर, पोती वगैर काढून यात्रेकरुंच्या स्वैपाकाची तयारी करत होते. खास पवित्र स्नानाला आलेल्या काही भाविक बायका नाराज होत तिथलं सिमेंटमिश्रीत पाणी बाटलीत भरून मनाचं समाधान करून घेत होत्या. 

Archived Pampa Sarovar photo before renovation
रामायणातल्या उल्लेखानुसार मातंग ऋषींची शिष्या रामभक्त शबरी पंपा सरोवरापाशी येऊन रामाचे स्मरण करत असे. तू लवकरच रामाला भेटशील, असे तिला मातंग ऋषींनी सांगितले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आश्रमात राहून रामाची वाट पाहता पाहता शबरी वृद्ध झाली. अखेर सीतेच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करत आलेल्या राम व लक्ष्मणाची पंपासरोवराजवळच्या गुहेत शबरीशी भेट झाली. आपल्याला माहित असलेली शबरीच्या बोरांची प्रसिद्ध कथा या गुहेतच श्रीनिवासने त्याच्या ढंगात ऐकवली. तिथल्या चिमुकल्या दगडी कोरीव पादुका रामाच्या म्हणून दाखवल्या. अजानुबाहू रामाचे पाय यात कसे मावणार वगैरे विचारून मी त्याचा उत्साहभंग केला नाही. तिथून आत एक थंड अंधारी घळी दिसत होती. त्यात शिरण्याचा मोह आवरला कारण ती किती काळॊखी आणि खोल असेल याचा अंदाज येत नव्हता. अशा अनेक कपारी, घळी, गुहा हम्पीला वेढणार्‍या शिळांमधून दडलेल्या आहेत. त्यातली एक एक सापडत जाते तसतसा मानवी इतिहासाचा एक एक पट त्याबरोबर संशोधनाअंती उलगडत जातो. 


Lush green rice fields
आता शेवटच्या टप्पा. लक्ष्मी नृसिंह मंदिर पाहायला निघालो. वाटेवर रस्त्याच्या दुतर्फा हिरवीकंच भातशेती, त्याच्यामागे आणि बांधावर डोलणार्‍या नारळी पोफळी, त्यांच्याही मागे राखाडी बदामी शिळांच्या रांगा आणि निरभ्र आकाश. (निरभ्र असते तेच आकाश, भरुन आलेले असते ते आभाळ ही दवणीय पोस्ट माहित असूनही द्विरुक्ती) असले दृश्य पाहून फोटोसाठी गाडीतून उडया टाकायचा मोह झाला नसता तरच नवल. श्रीनिवास बिचारा न कंटाळता म्हणू तितके ग्रुप फोटो काढून देत होता तेही कल्पकता वापरुन. आता मात्र ’उशीर होईल चला चला’ करत त्याने आम्हाला गाडीत घातले. मंदिराकडे चालत जाताना मुख्य चौकात कृष्णमंदिराजवळचा कृष्णा बाजार दिसला. हल्ली मोठ्या भाजी बाजारात गाळे असतात तशी एकमजली बिनभिंतींच्या खांबांची दगडी रचना ह्म्पीत अनेक ठिकाणी पाहिली. प्रत्येक मंदिराजवळचे हे तत्कालिन बाजार आहेत. आता भग्नावस्थेत आहेत. नृसिंह मंदिराकडे जाताना दगडी कालव्यातून पाण्याचा प्रवाह रस्त्याच्या समांतर खळाळत जात होता. त्याच्या काठाशी बसून स्थानिक कष्टकरी लोकांचा एक गट आपापल्या शिदोर्‍या उघडून गप्पाटप्पा करत खातपीत बसला होता. आपण एका जगविख्यात स्थानी आयुष्य घालवतो आहोत याची जाणीव त्यांच्या साध्या सावळ्याश्या चेहर्‍यांवर कुठेही नव्हती. 

Laksmi-Nrushiha

लक्ष्मी नृसिंह मंदिराला वेगळे आवार नाही. गाभार्‍यात फक्त उग्र नृसिंह आहे. मूळ मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी (ची मूर्ती) होती. आता तिचा हात तेवढा आहे. विध्वंसकांनी देवीलाही (स्त्री म्हणून !) सोडले नसावे. शेषनागावर बसलेल्या विष्णूची ही उग्र अवतारातील हम्पीतील सर्वात मोठी म्हणजे ६.७ मीटर उंच मूर्ती आहे. मोनोलिथ म्हणजे एकाच शिळेतून घडवलेली. कृष्णदेवराय यांच्या राजवटीत १५२८ मध्ये ही मूर्ती इथे स्थापण्यात आली असे म्हटले जाते. 

Badavi Shivling

लगतच बडावीलिंग किंवा शिवमंदिर आहे. बडवा म्हणजे "गरीब" आणि लिंग म्हणजे अर्थातच "शिव". याची स्थापना एका शेतकरी महिलेने केली होती असे म्हणतात. हे लिंग सुद्धा अखंड शिळेतून घडवले आहे. हे शिवलिंग अर्धवट पाण्यात बुडलेले असते. आत काळॊख असला तरी संपूर्ण मंदिर नेहमी दिवसाच्या प्रकाशाने उजळलेले असते. 

Ready to climb Hemakut

सूर्यास्त पाहायला इथून जवळच्या मातंग टेकडीवर जायचा विचार होता पण अंजनेय चढल्याने पुन्हा एवढे चढणे होईल का असे वाटू लागले. शेवटी श्रीनिवासने आम्हाला तुलनेने कमी उंचीच्या हेमकुटावरून सूर्यास्त पाह्ण्याचा सल्ला दिला.


हेमकुटा अगदी जवळ होते. तुकतुकीत राखाडी दगडाची सलग चढण चढून गेल्यावर एक प्रशस्त दगडी पठार लागते. तेच हेमाकुटा. यात प्रवेश करताच "सासिवेकालू" गणेशाचे दर्शन होते. सासिवेकालू याचा अर्थ मोहरीचे दाणे. हा एक विशाल 8-फूट उंच, अखंड गणेश आहे, त्याच्या पोटाभोवती साप आहे.
sasivikelu Ganesh

गणपतीला अन्न खूप आवडते, भोजनानंतर एके दिवशी त्याचे पोट फुटले. ते आवळून ठेवण्यासाठी त्यानी पोटाभोवती साप बांधला अशी आख्यायिका आहे. गणेशावर मोहरीच्या दाण्यांसारखे बारीक नक्षीकाम खूप सुंदर केले आहे. हेमकुटावर बाकी बहुतेक सगळी शिवमंदिरं आहेत. पम्पादेवीने (पार्वती) इथे शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या केल्याचा उल्लेख वर आला आहेच. पठाराच्या टोकाशी पोचलो तर लक्षात आले तिथून खाली जाणारा रस्ता थेट विरुपाक्ष मंदिराजवळ पोचतो आहे. इथे अनेक लोक पक्षीनिरिक्षणाला आणि
Virupaksha view from Hemakut

विशेषत: सूर्यास्त पाहायला येतात. मावळतीच्या प्रकाशात हेमकुटा चढताना मध्ये थांबून विस्तीर्ण दगडावर पाठ टेकून आम्ही निरुद्देश पहुडलो. संध्याकाळचा विरुपाक्ष मंदिराकडे वाहणारा गारसर वारा, निवलेल्या दगडाचा थेट आणि उबदार स्पर्श, थोडेसे ढगाळ आकाश, एकूणच निसर्गाची शांत सोबत. तुरळक लोक जात येत होते पण दगडावर शांतपणे पहुडलेल्या बायकांकडे कुणीही विचित्र नजरेने पाहत नव्हतं. आमच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त नवी प्रेक्षणीय जागा बघणं नसतं. नसावंच. बाईपणाचीच नाही जगण्यातली सगळी ओझी बाजूला ठेवून घेतलेल्या अशा अनेक अनुभवांचं संचित मनाच्या तळाशी साठत जातं. परल्यावर पुढचे कितीतरी दिवस हे इंधन पुरतं.

Sunset at Hemakuta

अजून वरच्या दगडी पठारावर गेलो. प्रत्येकीने निवांत सूर्यास्त बघता येईल अशी एकमेकींपासून लांब सोयीची जागा पकडली. निर्विचार मन, स्वच्छ शुद्ध नितळ शांतता, समोर ढगाच्या आत बाहेर करत अस्ताला जाणारा तेजोनिधी. मध्ये कुणाचाही अडसर नाही अगदी स्वसंवादाचा सुद्धा. शक्य असतं तर रात्री तिथेच मुक्काम करावा इतकं बरं वाटत होतं पण सूर्य बुडाला. माकडांचा उपद्रव सुरु झाला, तेव्हा मात्र निघावं लागलं.


हजारा राम मंदिर (इथे दुरुस्ती सुरु होती), सरस्वती मंदिर, वीरभद्र मंदिर, चंद्रमौलीश्वर मंदिर, अच्युतराय मंदिर अशी अनेक मंदिरं अजून बाकी होती. यातली काही माहितही नव्हती पण वेळ संपला होता. इतनी बडी दुनिया मे म्हणजे हम्पीमे कुछ न कुछ तो छुटनेवाला था ही! आमच्या ट्रीपचा सिंड्रॆला टाईम म्हणजे संपायचा दिवस जवळ आला होता. रात्री हॉटेलच्या झकास रेस्टॉरंटमध्ये आप्पे, अक्की रोटी असे तिथले प्रसिद्ध पदार्थ चाखत अंजूच्या वाढदिवसाचे मस्त सेलेब्रेशन कम डिनर झाले. (एक प्रकारचं तांदळाच्या पिठाचं भाज्या घालून केलेलं थालिपीठ) पुरुष प्रवास करतात तेव्हा तिथे काय खायचं हा त्या प्लॅनिंगमधला मह्त्वाचा भाग असतो. आमच्यासाठी तो भाग दुय्यम! त्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे(शब्दश:) बरेच पैसे वाचतात. ते आम्ही शॉपिंगवर खर्च करतो हा भाग अलाहिदा!
लॉबीत शांत बसून फोटो बघून झाले. दुसर्‍या दिवशी शनिवार. लॉकडाऊनमुळे बाहेर पडायला परवानगी

नव्हती. त्यामुळे आरामात कॉंटीनेंटल ब्रेकफास्ट केला. मग आमच्या ग्रीन टी शर्ट ड्रॆसकोडमध्ये तिथल्याच स्विमिंग पूलपाशी फोटोसेशन करून जेवून चेकआऊट केले. 


आंध्र प्रदेशातल्या जवळच्या अनंतपूरकडे आमची गाडी निघाली. राज्य ओलांडताना आमचे दोन्ही लसी घेतल्याचे पुरावे, आरटीपीसीआर वगैरे बघतील, अडवतील असे वाटले होते पण पोलिस अधिकार्‍याने बहुधा गाडीच्या खिडकीतून डोकावणारे आमचे गुणी बाळासारखे निरागस भाव आणलेले चेहरे पाहून गाडीला तसेच पुढे जाऊ दिले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या गावांमधला फरक अगदी जाणवेल असा होता. कर्नाटकी घरांचा टुमदारपणा, बर्‍यापैकी स्वच्छता, हिरवाई आंध्र मध्ये फारशी नव्हती. बकालपणा होता. 

Maligi Hotel Lobby

अनंतपूर रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये तळ ठोकला. आतली गर्दी पाहून ओमायक्रॉन नामक भानगडीला आता तोंड द्यायचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. अंजू इथून थेट पुण्याला जाणार होती. तिचा निरोप घेतला. आमची गाडी वेळेवर आली. फक्त भाग्यश्रीचा बर्थ आमच्यापासून लांब होता, तो ही शेजारच्या एका माणसाला विनंती करून त्याच्या जागी अ‍ॅडजस्ट करून घेतला. चवदार बिर्याणी खाऊन गप्पा मारत पथार्‍या पसरल्या. ट्रीप विनासायास झाल्याच्या आनंदात झोपलो. मध्यरात्री भाग्यश्रीने मला उठवून सांगितले की तिच्या बर्थचा मालक मुळात आधी वेगळ्या बर्थवरुन असाच कुणाच्या तरी विनंतीवरून इकडे आला होता. त्या बदली बर्थचा मूळ मालक आता जिथे आहे तिथे दुसरा प्रवासी त्याच नंबरवर आला असल्याने मूळ मालकाला हा माझा बर्थ द्यावा लागू शकतो. रात्री २ वाजता हे अजब कोडे सोडवणेच काय समजून घेणेही माझ्या मेंदूला शक्य नव्हते पण वेळ पडल्यास तिला भांडायला किंवा मूळ मालक शोधून अदलाबदली करायला कुमक हवी आहे एवढे मला कळले. मुकाट्याने तिच्या पाठीमागे गेले. नंतर नुकत्याच गाडीत चढलेल्या माणसाशी आणि तिथे गोंधळलेल्या चेहर्‍याने बसलेल्या मूळ बर्थ मालकाशी आम्ही जो काय असंबद्ध वार्तालाप केला तो ब्रह्मदेवच जाणे. शत्रूला गोंधळून टाकणे ही एक युद्धनीती असते. पण इथे मुदलात सगळ्याच पार्ट्या गोंधळलेल्या असल्याने ही युक्ती कुचकामी होती. 
अखेर काही तरी जादू होऊन माणशी एक बर्थ तर बरोबर आहे असा निष्कर्ष काढून आम्ही आपापल्या जागी जाऊन झोपलो आणि गाडी सुखरुप अकोल्याला पोचताच आपल्या कन्फर्म मूळ बर्थवर, जिथून कोणी उठवणार नाही तिथे म्हणजे घरी येऊन गुडुप झोपलो. 


तेव्हापासून आजवर ते संचित का काय मनात जरा जास्तच साठल्याने ह्म्पीतून आम्ही अद्यापही मनाने बाहेर आलेलो नाही. झाडांच्या हिरवाईनी आणि समुद्राच्या निळाईनी अनेकदा मोहिनी घातली आहे पण पाषाणही गारुड करू शकतात हा अनुभव सर्वस्वी नवा होता. जगाला देण्यासारखं आणि दाखवण्यासारखं आपल्या देशाकडे इतकं काही आहे याचं अनामिक समाधान वाटत होतं. प्रत्येक उत्पत्ती आणि निर्मितीला लयाचा शाप असतो. त्याआधी आपल्या माणसांना आणि पुढच्या अनेक पिढ्यांना हा अनुभव घेता यावा असं मनापासून वाटलं. काही शतकांनी हम्पीतली जागतिक वारसा म्हणून जतन केली गेलेली स्थळं राहतील न राहतील. मानवाच्या कलाकर्तृत्वाची पताका फडकत राहील न राहील, पाषाण मात्र चिरंतन सत्यासारखे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कायम राहतील.

--------------------

Hampi The city of victory A city of ruins -1 Previous part 

Pattadakal_Aihole Unesco heritage on our way to Hampi: Travelogue

Beautiful Badami : Travelogue

#Hampi #Badami #Pattadakal #Aihole #UNESCO_world_heritage 

1 comment:

  1. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम!

    ReplyDelete