Saturday, August 1, 2020

’गीतारहस्य’कार लो. टिळक

मंडालेच्या तुरुंगात असताना पत्नीच्या निधनाचे वृत्त कळले तेव्हा ८ जून १९१२ रोजी आपल्या भाच्याला लिहिलेल्या पत्रात लोकमान्य टिळक विकल होऊन म्हणतात, "माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला". त्याच वेळी अशा दु:खद प्रसंगी आपण मुलांजवळ नाही हे जाणवून ते पुढे असेही लिहितात," मुलांना अवश्य सांगा की, या दु:खामुळे विद्द्येची हानी होऊ देऊ नका. दु:ख करीत बसून कोणीही कालाचा दुरुपयोग करु नये." देशभक्ताचे मन समस्थितीतच राहिले पाहिजे हे सांगणारे टिळक श्रीमद्भगवद्गीतेने सांगितलेला कर्मयोग शब्दश: जगले याचा हा जणू पुरावाच. त्यांची विलक्षण बुद्धीमत्ता, व्यासंग, तब्बल वीसहून अधिक वर्षे आत्म्यात मुरलेला चिंतनविषय आणि त्यांनी अंगीकृत केलेली समस्थिती याचा परिपाक म्हणजे त्यांनी मंडालेच्या कारावासात सिद्ध केलेला ’गीतारहस्य’ हा ग्रंथ. एकांतवासाला आणि प्रतिकूल हवामानाला त्रासून किंवा नैराश्याने ग्रासून जिथे सर्वसामान्य कैदी आयुष्य संपवण्याचा विचार करत अशा ठिकाणी या कर्मयोग्याने भारतालाच नव्हे तर शतकाला भूषण व्हावा असा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. राजबंदी असले तरीही लेखनासाठी आवश्यक असलेले संदर्भग्रंथ सरकारी परवानगीचे सोपस्कार पार पाडून मागवणे, लेखनसामग्री उपलब्ध होईल तसतसे वाचन-मनन-चिंतन करुन व्यासंग व स्मरणशक्तीच्या बळावर, नुसत्या शिसपेन्सिलीने भव्यदिव्य स्वरुपाचे ग्रंथलेखन मधुमेहाच्या विकाराशी लढा देत करणे हे केवळ टिळकच करु जाणे.

कुमारवयापासून टिळकांनी भगवद्गीतेवरील अनेक भाष्ये वाचली होती. गीता पलायनवादाचा, संन्यासमार्गाचा पुरस्कार करीत नसून ’निष्काम भावनेने कर्म करा, आपले कर्तव्य पार पाडा, कर्ते व्हा’ हेच गीतेचे सार आहे, तेव्हा यावर भाष्य करावे अशी टिळकांची मनीषा होती. प्रत्येक संप्रदाय त्यांच्या विचारपद्धतीला अनुकूल असा गीतेचा अर्थ काढतो यावर टिळकांचा आक्षेप होता. टिळक भगवद्गीतेबद्दल असे म्हणतात की, ’गीतेमध्ये ज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे’. फळाची आशा न ठेवता कर्म करायचे तरी कशाला या संसारी मनुष्याच्या प्रश्नाला टिळक उत्तर देतात की,”फलाशा ठेवायची नाही म्हणजे फळाचा त्याग करायचा असे अजिबात नाही परंतु फळ मिळावे अशी आसक्ती धरायची नाही. कारण या आसक्तीमध्येच सर्व दु:खाचे मूळ आहे.’
युद्ध करण्याबाबत द्विधा मनस्थितीत असलेल्या अर्जुनाच्या मनातील सर्व शंकांचे तर्कशुद्ध निरसन करुन भगवंत आपला गीतोपदेश संपवतात. ज्या भ्रान्त कल्पनेमुळे अर्जुन आपल्या क्षात्र धर्माविरुद्ध आचरण करण्यास तो निघाला होता, ती भ्रान्त कल्पना नष्ट होऊन स्वधर्माची व स्वकर्तव्याची त्याला जाणीव होते. तो संशयातीत होतो. ’तुझ्या सांगण्याप्रमाणे मी युद्धाला सिद्ध होतो’ अशी भगवंतांना कबुली देतो. गीतेच्या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर ’द्विधा मनस्थिती ते नि:शंक समस्थिती हे दोन बिंदू सापडले की गणितशास्त्राच्या नियमाप्रमाणे मधली सरळ रेषा काढण्यास कठीण पडत नाही’ असे टिळकांनी नागपूर येथील मॉरीस महाविद्यालयात दिलेल्या व्याख्यानात म्हटले होते. 

गीतारहस्य हा व्यावहारिक नीतीशास्त्राचा अध्यात्मज्ञानावर आधारलेला ग्रंथ आहे असे प्रतिपादन टिळक लेखनपूर्तीनंतरच्या त्यांच्या पत्रात करतात. ‘भगवद्गीता’ हा भारतीय अध्यात्माचा पायाभूत ग्रंथ मानला जातो मात्र एकूणच आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास निवृत्तीनंतर करायचा असतो, इतकेच नव्हे तर गीता ही निवृत्तिमार्ग सांगणारी आहे, अशी समाजधारणा आहे. सांसारिक कर्मे गौण मानून त्याकडे पाठ फिरवणाराच खरा ज्ञानी अशा चुकीच्या दृष्टिकोनामुळे समाजाचे, भारतीय संस्कृतीचे नुकसान होते आहे हे लक्षात घेऊन अशा विचारांचे खंडन करण्यासाठी ’संसारशास्त्र’ आणि निष्काम कर्मयोग शिकविणारा, ’वागावे कसे’ याचे मार्गदर्शन करणारा ’गीतारहस्य’ किंवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ टिळकांनी लिहिला. संसारात राहूनच कौशल्यपूर्वक कर्मे कशी करावी याची शिकवण, हेच गीतेचे रहस्य व महात्म्य असल्याचे लो. टिळकांनी जगभरातील तत्त्वचिंतनाशी तुलना करुन सोदाहरण सिद्ध केले आहे. एका अर्थी त्यांनी पश्चिमी तत्त्वज्ञानाला या लेखनाद्वारे आव्हान दिले आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळक लिहितात, "प्रत्येकाने सर्व मानवज्ञातीच्या हितार्थ झटणे हीच काय ती नीतीची पराकाष्ठा किंवा कसोटी असे जे मिल्ल,स्पेन्सर, काँट इ.अधिभौतिकवाद्यांचे म्हणणॆ, त्याचाही गीतेतील स्थितप्रज्ञाच्या बाह्यलक्षणात संग्रह झालेला असून गीतेत यापेक्षा काही जास्त नसते तरी ती सर्वमान्य झाली असती परंतु एवढ्यावरच न थांबता ज्ञान, संन्यास, कर्मव भक्ति यांच्या योग्य  मिलाफाने इहलोकी आयुष्यक्रमणाचा कोणता मार्ग मनुष्याने पत्करावा याचाही गीतेत निर्णय केला आहे." अनेक शास्त्रग्रंथांना कवेत घेणार्‍या या ग्रंथाचे परमोच्च वैशिष्ट्य म्हणजे त्याची पांडित्यपूर्ण, तर्कसंगत, सूक्ष्म आणि सखोल मांडणी. ’गीतारहस्य’ची अनुक्रमणिकाच ग्रंथाचा आवाका स्पष्ट करते. विषयप्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, अधिभौतिक सुखवाद, सुखदु:खविवेक, अधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, कापिलसांख्यशास्त्र, विश्वाची उभारणी व संहारणी, अध्यात्म, कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, संन्यास व कर्मयोग, सिद्धावस्था व व्यवहार, भक्तिमार्ग, गीताध्यायसंगति, उपसंहार अशी पंधरा प्रकरणे यात आहेत. त्यानंतरच्या परिशिष्टातून गीतेचे महाभारत, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भागवत धर्म, बौद्ध ग्रंथ व ख्रिस्ती बायबल इ. संदर्भातील विवेचन अशी या ग्रंथाची विशाल व्याप्ती आहे. 

गीतारहस्य या ग्रंथाला अद्वितीय मानले जाण्यामागे टिळकांची विद्वत्ता हे सर्वाधिक महत्वाचे कारण तर आहेच पण त्याचबरोबर त्यातील कर्मयोग टिळकांनी आचरणात आणला म्हणून त्याचे विवेचन अधिक अस्सल उतरले आहे असे म्हणता येईल. या संदर्भात एक उदाहरण लेखाच्या सुरुवातीसच दिले आहे. पुढील दोन उदाहरणे हेच अधोरेखित करतात. मंडाले येथे टिळकांना कुलकर्णी नावाचे बंदी स्वैपाकी म्हणून दिले गेले होते. त्यांना एकदा बराच ताप असताना ते त्याही अवस्थेत स्वैपाक करत होते. टिळकांनी त्यावेळी त्यांना आराम करण्यास सांगून स्वैपाकाची जबाबदारी घेतली तेव्हा ’तुमच्या लेखनात व्यत्यय येईल’, असे कुलकर्णी म्हणाले. त्यावर टिळक म्हणाले होते, " तुम्हाला आजारी स्थितीत सोडून मी लेखन केले तर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगण्याचा खटाटोप व्यर्थच केला असे म्हणावे लागेल." कुलकर्णी यांनी अशा काही आठवणी नोंदवून ठेवल्या आहेत. पुढे मंडालेहून अखेर सुटका झाली. पुण्यास येऊन अनेक दिवस उलटले तरीही हस्तलिखिताच्या वह्या इंग्रज सरकारकडून परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. त्यावर टिळक म्हणाले होते, "वह्या सरकारच्या कब्ज्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, मी तो जसाच्या तसा लिहून काढीन." प्रवृत्तिपर प्रयत्नवाद आणखी काय वेगळा असतो! समर्थांच्या शब्दात सांगायचे तर 
आधी ते करावे कर्म । कर्ममार्गे उपासना ॥ उपासका सापडे ज्ञान । ज्ञाने मोक्षची पावणे ॥

स्वातंत्र्यपूर्व काळात निद्रिस्त झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम या ग्रंथाने केले. आज कोविड प्रादुर्भावामुळे जगभरात आर्थिक, मानसिक, राजकीय, वैचारिक स्तरावर प्रचंड उलथापालथ झाली आहे. सैरभैर झालेल्या समाजाला स्थिरचित्त होण्यासाठी, निष्काम कर्मयोग आणि कर्तव्याभिमुख होण्याचे भान समाजात रुजवून नवचेतना देण्यासाठी ‘गीतारहस्य’ सारख्या ग्रंथाचीच आवश्यकता आहे.
कोणीतरी त्राता येईल आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढेल अशा पिचलेल्या मनोवस्थेला समाज पोचतो आहे अशा वेळी त्याला ’गीतारहस्य’च तारु शकेल. या विद्वत्तापूर्ण ग्रंथाची अनेक भाषांतरे झाल्याने हा ज्ञानप्रवाह मराठी बरोबरच अन्य भाषकांनाही खुला झालेला आहे. मूळ ग्रंथ मराठीत का लिहिला याचे उत्तर देताना टिळक म्हणाले होते की, "मला गीतेचा कर्मयोग आधी माझ्या लोकांना शिकवायचा आहे. त्यांना कर्मयोगाचा विसर पडला आहे. त्याखेरीज उत्कर्ष होणे नाही, हेच मला त्यांना सांगायचे आहे."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#गीतारहस्य #लोकमान्यटिळक #मंडाले #कर्मयोग
#Geetarahasya #LokmanyaTilak #Karmayog
( संदर्भ -श्रीमद्भगवद्गीतारहस्य - बाळ गंगाधर टिळक, लो. टिळक दर्शन- भा.द.खेर ) 
Published in e-Vidarbha Hunkar dated 1/8/2020

7 comments:

  1. अतिशय अभ्यासपूर्ण लेख
    गीताराहास्याचा सखोल अर्थ आणि मर्म छान पद्धतीने मंडलस

    ReplyDelete
  2. खूप सुंदर तत्वदर्शक विवेचन.

    ReplyDelete
  3. अभ्यासपूर्ण विवेचन

    ReplyDelete
  4. अभ्यास पूर्ण लेख🙏🙏

    ReplyDelete
  5. आभास पूर्ण🙏🙏

    ReplyDelete
  6. फारच उत्तम लेख
    अभिनंदन

    ReplyDelete