Thursday, June 19, 2014

मीपण फोडिता फुटेना


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

उसळणाऱ्या लाटांचे रौद्र रूप पाहात एखाद्या महासागराच्या तीरावर किंवा खळाळत कोसळणाऱ्या एखाद्या महाकाय प्रपातासमोर आपण उभे असलो तर निसर्गाचे हे विराट रूप पाहून आपण स्तिमित होतो, स्तब्ध होतो. आपल्या आयुष्याची पत आणि प्रत काहीही असली तरी या भव्यतेपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याला आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. एका अर्थी ' मी ' आपल्यापासून बाजूला होतो. परंतु ही भावना बऱ्याचदा क्षणभंगुर असते.
' जीवन त्यांना कळले हो। मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो।। ' असे कवी बा. भ. बोरकर सांगून जातात. दासबोधात सांगितलेले ' मी पणा ' चे हे परिणामदेखील आपल्याला उमजत असतात. ' मीपणे मीत्री तुटे। मीपणे प्रीती आटे। मीपणे लगटे। अभिमान अंगी।। मीपणे विकल्प उठे। मीपणे कलह सुटे। मीपणे संमोह फुटे। ऐक्यतेचा।। ' आपल्याला हेदेखील मान्य असते... ' मीपण कोणासिच न साहे। ते भगवंती कैसेनि साहे। म्हणौनि मीपण सांडूनि राहे। तोचि समाधानी।। ' मात्र भल्याभल्यांचा ' मी ' पणा सुटत नाही, तिथे आपल्यासारख्यांचं काय! आपण रोजच्या आयुष्याकडे वळताच, दूर नेऊन सोडून दिलेल्या मांजराच्या पिल्लासारखा, हा ' मी ' पुन्हा मूळ जागी परत येतो. समर्थ रामदास म्हणतात, ' मीपण शस्त्रे तुटेना। मीपण फोडिता फुटेना। मीपण सोडिता सुटेना। काही केल्या।। '

मग ' मी या सगुण-निर्गुणाचाच एक सूक्ष्मतम अंश आहे ' या दृष्टीने ' मी ' कडे पाहिले तर कदाचित त्याचा सकारात्मक स्वीकार करणे शक्य होईल. जपानी भाषेमधे ' वाताशी ' या शब्दाचा अर्थ ' मी ' असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ' वाताशी ' या शब्दाचा उपयोग करतात. जिथे ' मी ' आवश्यक असतो तिथेही ' वाताशी ' शिवायच क्रियापद वापरता येते, असे निरीक्षण लेखिका सानिया नोंदवतात. ' मी ' पासून ' आम्ही ' पर्यंतचा प्रवास हेच तर जपानच्या प्रगतीचे मर्म नसावे? मात्र हे वैयक्तिक स्तरावर सोपे नाही. ' मी पणा ' सोडणं दूरच, ' मी ' शोधायचा प्रयत्न केला तरी ' बुरा जो देखन मै चला बुरा न मिलया कोय। दिल खोजा जो मै अपना मुझसे बुरा न कोय।। ' या संत कबीरांच्या दोह्यातून त्याचे खरे रूप दिसते. ' मी ' शोधावासा वाटणं ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी असावी आणि ' मी पणा ' सुटणं ही अंतिम.

रात्रीच्या सुमारास एक मित्र दुसऱ्या मित्राला घ्यायला रेल्वे स्थानकावर आला. घरी जाताना सिग्नलचा लाल दिवा पाहताच त्याने गाडी थांबवली. चौकात चिटपाखरूही नव्हते. मित्र म्हणाला, ' कोणीच पाहत नाहीये, चल की! ' तेव्हा तो म्हणाला, ' अरे, आपण तर पाहत आहोत ना? '
 ' मी ' सुटला नाही, पण ' जागा ' असला तर हेही नसे थोडके.

No comments:

Post a Comment