#sakal #ya_jaganyavar #aiklat_ka
एका स्नेह्यांच्या मुलीची एका प्रख्यात चॅनेलवरच्या गाण्याच्या कार्यक्रमात निवड झाली. विशिष्ट गाणं आणि प्रशिक्षक मिळावा म्हणून सगळे पालक तिथल्या समन्वयकापाशी भुणभूण करायचे. निर्णय त्याच्या हातात नसला तरी हा समन्वयक सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा. चौकशा करणार्यांना ’बघून सांगतो हं’ आणि तक्रार करणार्यांना ’सांगून बघतो हं’ एवढी दोनच उत्तरं अगदी गोड हसून द्यायचा. त्याच्या चतुराईचा आणि गमतीचा भाग सोडला तर आपल्यालाही माहीत आहे की बर्याचदा बोलणार्याला फक्त त्या क्षणी आलेला राग, उद्वेग, किंवा नैराश्य व्यक्त करायचं असतं. प्रत्युत्तराऐवजी आपलं ऐकून घ्यावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपण मात्र अनेकदा एखादी व्यक्ती याच अपेक्षेने आपल्याला काही सांगू लागली की त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत " हे तर काहीच नाही.. आमच्याकडे तर ...." वगैरे बोलून, सांगणार्यावर नकळत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो.
’तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥’ पण सोशल मिडियाच्या कृपेने पृथ्वीतलावर बोलणार्यांची तोबा गर्दी झाली आहे. ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता मात्र मंदावली आहे. वाचन हे प्रकारचं श्रवणच. एकदा एकाने आपला केक खातानाचा फोटो सोशल मिडियावर टाकला आणि सोबत ’आज माझा वाढदिवस नाही, किती जण हे नीट वाचतात ते पाहण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे’ अशी पुस्ती जोडली. अपवाद वगळता बहुतेक प्रतिक्रिया ’वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देणार्याच होत्या. दुसर्या बाजूला, सध्याची विदारक परिस्थिती लक्षात घेता अनेक जण ’माझ्याशी केव्हाही मोकळेपणाने बोला’ असं आवाहन सोशल मिडियावर करताना दिसतात. त्यांचा हेतू उदात्त असतो पण भावनिक शेअरिंगसाठी आभासी जगापेक्षा प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा वेळ, लक्ष आणि सहस्पंदन अपेक्षित असतं. 'women don't have problem in speaking, they have problem in being heard' असं एका आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या ते याच अर्थाने. स्त्रियांच्या बाबतीत समाजपुरुष सोयीनुसार आणि बहुतेक वेळा, स्वत:ला हवं तेवढंच ऐकत आलेला आहे.
समोरचा माणूस कंटाळवाणं, निरर्थक बोलत असेल तर गोष्ट वेगळी, एरवी चांगला श्रोता ही आता दुर्मिळ प्रजाती होऊ लागली आहे. काही जण तर समोरचा बोलत असताना मोबाईल स्क्रोल करत त्याला ’तुमचं चालू द्या’ अशी खूण करतात. स्क्रीनमध्ये नजरा गाडलेली तरुणाई संवादकौशल्याला मुकण्याची भीती वाटते. नजरेला नजर देऊन ऐकणं हे त्यात आलंच. स्क्रीनवरच्या शब्दचित्रांच्या महापुरात वाचलेल्या, ऐकलेल्या एखाद्या विशेष मुद्द्यापाशी थबकून तो मनात मुरवत त्या आकलनाचा आनंद घेणं अवघड होत चाललं आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी हे जसे वाणीचे टप्पे आहेत तसे लक्षपूर्वक ऐकणं, बोलणार्याच्या भावनिक पातळीवर जाऊन श्रवण मग मनन हे ऐकण्याचे टप्पे. हे टप्पे समजून घेतले तर आपलं श्रवणकौशल्य विकसित होईल.
बरं, पण ते विकसित करून करायचं काय, याचं उत्तर ’व्हर्जिन’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन देतात. त्यांच्या आत्मिक आणि व्यावसायिक प्रगतीचं श्रेय ते स्वत:च्या श्रवणकौशल्याला देतात. ऐकून घेणार्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. फक्त व्याख्यातेच नव्हे, सफाई कामगारापासून उच्चपदस्थ अधिकार्यापर्यंत प्रत्येकाजवळ सांगण्यासारखं काही ना काही असतं. ते ऐकताना अनुभवाचं एक नवं विश्व आपल्यासमोर उलगडत जातं. वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो, अंतर्दृष्टी गवसते. केवळ यशस्वी होण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीही लक्षपूर्वक ऐकणं आणि त्यातलं मह्त्वाचं वाटेल त्याची नोंद घेत, शिकत, पुढे जात राहणं आवश्यक असतं. कान देऊन ऐकणारी व्यक्ती आयुष्यात कमी चुका करते आणि व्यवसायात तर या क्षमतेचा प्रचंड उपयोग होतो, असं ते म्हणतात.
तुम्हाला जर कुणाचंच ऐकण्यात रस नसेल तर तुमचं ऐकण्यात जगालाही रस वाटणार नाही इतकं हे साधं समीकरण आहे. ’(सिर्फ) मेरी आवाज सुनो’ च्या जगात इतरांचं जाऊ देत आपला आतला आवाज तरी आपण नीट ऐकतो आहोत का!
sakal -ya jaganyawar- May21
No comments:
Post a Comment