मे महिना म्हटलं की हमखास आजोळचं घर डोळ्यासमोर येतं. मामाने गाव बदललं. माया तीच असली तरी लहानपणच्या उन्हाळी दिवसांचा मनाला थंडावा देणारा आठव आजोळच्या, आता अस्तित्वातही नसलेल्या, जुन्या घरातच अजून अडकून पडला आहे. अंगाखांद्यावर अशा आठवणी खेळवणारी वास्तू कधी ना कधी थकते, खचते, संपते पण आयुष्यात कितीही स्थित्यंतरं झाली तरी मनात घर करुन कायम राहते. आजूबाजूच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जगाशी आपली नाळ जुळवून ठेवण्यासाठी, आपलं अवकाश शोधण्यासाठी आपण कधी हौसेने तर कधी नाईलाजाने घरं बदलत जातो. नोकरी, व्यवसाय, बदलतं सामाजिक स्थान, हिस्सेवाटे, बदली, विवाह, वार्धक्य, आपत्ती... ज्याची त्याची कारणं वेगळी असतात. स्वत:चं घर उभं करण्यात उमेदीची बरीच वर्ष निघून जातात. अखेर ते हाती येतं पण तोवर त्यातल्या पिल्लांना आपापल्या घरट्यांचे वेध लागलेले असतात.
नुकत्याच येऊन गेलेल्या वादळात कष्टाने उभे केलेल्या अनेक घरांचे पत्रे उडून गेले. जुजबी सामान सामावून घेणार्या नुसत्या चार भिंतींचे छपराविना उजाड फोटो बातमीसोबत होते. ते पाहून पोटात तुटलं. जग दुरावलं तरी घराचा आधार माणसाला आश्वस्त करत राहतो पण संकटाच्या थैमानाला बाहेर थोपवून धरणारं ते घरच कोलमडतं तेव्हा सावरणं कठीण होतं. गेल्या वर्षभरापासून आपला बहुतेक काळ घराच्या कुशीत व्यतीत होतो आहे. अशा विदारक परिस्थितीतही साथ देणारं घर, मग ते लहान- मोठं, टुमदार- अलिशान कसंही असो, त्याचं स्थान थेट आपल्या काळजात असतं. तिथे आपली वाट पाहणारं, आपलं यश साजरं करणारं, अपयशाच्या क्षणी जवळ घेणारं, कुणी तरी असतं. गंमत म्हणजे आपल्या राहत्या घरावर आपलं इतकं प्रेम असलं तरी आपलं स्वप्नातलं घर मात्र बर्याचदा वेगळच असतं. अगदी सरसकट वर्गीकरण नाही करता येणार पण गावातल्या बहुतेक लोकांना आटोपशीर अपार्ट्मेंटचं अप्रूप असतं तर शहरातल्या बहुतेकांना खेड्यामधले घर कौलारु साद घालत असतं. चंद्रमौळी घरांबद्दल त्यांच्या मनात एक रोमँटीसीझम असतो. पण चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या छपरातून चंद्र, चांदणं दिसतं, म्हणजेच ज्याचं छत फाटकं आहे असा अर्थ लक्षात येतो तेव्हा मनात चर्र होतं.
केरळमध्ये प्रवास करत असताना असंच एक स्वप्नातलं घर प्रत्यक्ष पाहिलं होतं. एखादं देखणं निसर्गचित्रं सजीव होऊन समोर यावं तसं. नदीला अगदी बिलगून असलेलं, आधुनिकतेचा स्पर्शही न झालेलं सताड उघड्या दाराचं सुबक खोपटं.
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ तुकडोजी महाराजांच्या या रचनेसारखं साधं, प्रसन्न, स्वागतशील.
हिरव्या रंगाच्या कितीतरी छटांनी वेढलेलं. फुलांनी डवरलेलं अंगण आणि त्या इवल्याशा घराला कवेत घेऊन आपल्या झावळ्यांनी थोपटणार्या नारळी फोफळी. अनिमिषपणे हे सारं पाहत असताना त्या घराला किती गैरसोयी, निसर्गाचे किती प्रकोप सहन करावे लागतात हे सांगून नावाड्याने आम्हाला जमिनीवर आणून सोडलं.
तसं पाहिलं तर घर म्हणजे दगड-विटा-मातीची एक निर्जीव वस्तू. पण त्यात राहणार्या माणसांची वृत्ती, भावना, विचार, परस्पर व्यवहार मिळून त्या घराचं व्यक्तिमत्व तयार होतं. त्याला चेहरा मिळतो. त्याच्यात प्राण फुंकला जातो. मग काही घरं सच्ची वाटतात तर काही दिखाऊ. काही उबदार वाटतात तर काही रुक्ष. काही हवीहवीशी तर काही टाळावीशी. आपलं घर नेमकं कसं आहे ! घर कसं असायला हवं हे हळूवारपणे सांगणारी 'घराचं मनोगत' नावाची एका अनाम कवीची मूळ इंग्लीश कविता मनाला स्पर्शून गेली.
या कवितेतलं घर म्हणतं -
" मला असं घर व्हायला आवडेल
जिथे मुलांच्या मित्रमंडळींना वाटेल अगदी घरच्यासारखं
जिथे ते निवांत पाय पसरुन बसू शकतील
आपल्या हाताने माठातून किंवा फ्रिजमधून
पाणी घेऊन पिऊ शकतील.. बिनदिक्कत
जिथे त्यांना कुणीही विचारणार नाही,
"तुझं 'आडनाव' काय?"...
असं घर.. जिथे त्यांना कोणी कशावरुनही जोखणार नाही
जे त्यांना स्वीकारेल सहजतेने, आपुलकीने
घरी, दारी, शाळा-कॉलेजमध्ये काहीही घडलं तरी
ते सांगायला जिथे त्यांना हक्काने धावत यावंसं वाटेल
मला असं घर व्हायला आवडेल... "
आपलं घर आहे का असं?
No comments:
Post a Comment