Saturday, August 25, 2012

बापाचं नाव आणि एकाकी मातृत्व

"कायद्याने ज्‍याला बाप म्हणून सिद्ध करायची वेळ आली, त्‍याच्‍याकडून आता काय मागायचे," ही रोहित शेखरच्या आईच्या जखमी मनाची प्रतिक्रिया. एका आईची वेदना आणि बापाने आपले पितृत्व स्वीकारले नाही तरी किमान जगासमोर मान्य करावे यासाठी एका मुलाने दिलेली झुंज असा हा दुहेरी लढा ५ वर्षे चालला. गेल्या पंधरवड्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे (डी.एन.ए चाचणीच्या मुख्य पुराव्यानुसार) रोहित शेखर हा ज्येष्ट राजकीय नेते (माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल) एन. डी. तिवारी यांचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले. "एकल पालकत्व" अशा निभावणार्‍या कित्येक सामान्य स्त्रियांना मात्र आपल्या मुला/मुलीला "औरस" अपत्य म्हणून अशी ओळख देता येत नाही कारण त्यांच्या बापाला जगासमोर आणण्यासाठी झगडण्याइतका वेळ, पैसा आणि हिंमत त्यांच्याजवळ असतेच असे नाही. प्रश्न आहे तो मायबापाच्या दोन्ही भूमिका जर आईने सक्षमपणे पार पाडल्या असतील तरीही जगाला "बाप दाखवण्याची" गरज मुळात का भासते हा!

कोणतेही प्राथमिक वर्गाचे शालेय पुस्तक उघडा, त्यात एक तरी चौकोनी कुटुंबाचे चित्र असते. मुलांची आदर्श कुटुंबाची व्याख्या अशा चित्रातून तयार होत जाते. निकोप कौंटुंबिक नात्यासाठी घरात पित्याचे असणे आवश्यक असते हे कित्येक संशोधनातून सिद्ध झाले आहे. वडील हेच कित्येक मुलांचे "रोल मॉडेल" असतात, तर मुलगी भावी पतीमधे पित्याचे भावलेले गुण शोधत असते. तर अशा चित्रात "गायब असलेल्या" वडीलांबद्दल समाज जेव्हा त्या मुलांना वेडेवाकडे प्रश्न विचारू लागतो आणि मग हेच प्रश्न मुलं आईला विचारू लागतात तेव्हा अखेर ती स्त्री खचते, तिच्या या अवस्थेला तिच्याइतकाच जबाबदार असणारा पुरूष मात्र केवळ निसर्गाच्या कृपेने उजळ माथ्याने समाजात खुलेपणाने वावरत असतो. ही कुमारी माता किंवा टाकलेली बाई, म्हणून कुत्सीतपणे बोट दाखवणारा समाज "हा बिनलग्नाचा किंवा टाकलेला बाप" म्हणून कधी कुठल्या पुरूषाच्या वाटेला जातो काय?
भारतीय स्त्रिया "सिंड्रेला सिंड्रोम" मधे जगतात असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजेच त्या एका स्वप्नाळू जगात वावरत असतात ज्यात कुणी एक राजपुत्र येऊन तिला घेऊन जातो आणि मग दोघे सुखाने नांदू लागतात वगैरे. प्रत्यक्षात असं क्वचित घडतं. मुलीला दिवस गेले की बहुतेक वेळा हे तथाकथित "राजपुत्र" अंतर्धान पावतात. पोलिसी खाक्यामुळे नाईलाजाने "प्रकटले" तरी "तो मी नव्हेच" म्हणून हात झटकतात. आपल्याजवळ पुरेसे शिक्षण, कामाचा अनुभव एवढेच नव्हे तर साधे व्यवहारज्ञानही नाही एवढी अक्कल त्या मुलींना येईतो उशीर झालेला असतो. (याला दुसरी बाजू देखील आहे, चैनीची चटक लागलेल्या काही महिला पैशासाठी पुरूषांचा वापर करून घेतात, त्यामुळे अशा वर्तनाच्या महिलेला अपत्य झाल्यास ते स्वीकारणार कोण! परंतु अशा महिलांचे प्रमाण पीडीत महिलांच्या तुलनेने बरेच कमी आहे.)

लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण केले जाणे याकडे समाज अजूनही गांभीर्याने पाहत नाही. मुलीची त्यात एका अर्थी संमती होतीच ना, आता मनासारखे झाले नाही म्हणून हा कांगावा, असे म्हणताना हे सोयीस्करपणे का विसरले जाते की या संबंधांत पुरूष तितकाच दोषी असूनही होणार्‍या अपत्याच्या आयुष्याची थेट जबाबदारी फक्त स्त्रीवर येते? मग स्त्रीने स्वयंनिर्णयाने असो वा नाईलाजाने, अखेर एकटीने अपत्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर त्या स्त्रिच्या मुलांनी अशा "नाकर्त्या" बापाचे नाव लावलेच पाहिजे हा समाजाचा अट्टाहास का? कुलमाहात्म्य जपण्यासाठी आणि वारसाहक्कासाठी ? पण अशा नात्यात तर दोन्ही मिळणार नसते.

खरं तर स्त्री-पुरूषाचं नातं नैतिक असो वा अनैतिक, त्या नात्यातून जगात येणारा निष्पाप जीव कसा अपवित्र असू शकेल? अभिनेत्री नीना गुप्ताने याच प्रश्नाचे उत्तर मसाबा या मुलीला जन्माला घालण्याचा निर्णय घेऊन शोधले आणि ती वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू- व्हिवीअन रिचर्ड्सची मुलगी असल्याचे जगाला (कोणतेही पुरावे न देता) स्पष्टपणे सांगितले. रवीना टंडन, सुश्मिता सेन यांनी तर स्वयंनिर्णयातून मुली दत्तक घेऊन एकल मातृत्व स्वीकारले आहे. संजय ’लीला’ भन्साली या सिनेदिग्दर्शकाने आईच्या कष्टांना आदरांजली म्हणून तिचे नाव मधे लावले आहे. उच्चभ्रू आयुष्यातील प्रायव्हसीच्या कल्पनांमुळे भारतीय समाज ग्लॅमरजगतातील अशा घटनांकडे मात्र अलिप्तपणे पाहतो. (अर्थात समाजाचे प्रतिबिंब मानले जाणारे (!) मागील काही दशकातील कित्येक हिंदी सिनेमे बघा, त्यातल्या "मा" काबाडकष्ट करून मुलाला वाढवतात पण मुलगा उर्फ हीरो सिनेमाभर त्याच्या परागंदा बापाला शोधत असतो.)

सिनेमाचं सोडा, सर्वसामान्य स्त्रियांसाठी "एकाकी मातृत्व" निभावणे म्हणजे सामाजिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या आगीशी खेळ असतो. विधवांच्या बाबतीत वरवर तरी हळहळणारा (आणि मागे बर्‍याचदा खमंग चर्चा करणारा) समाज त्यांच्यासह परित्यक्ता-घटस्फोटीत महिला आणि त्यांच्या अपत्यांकडे शंकेखोरपणे पाहत असतो. अगदी शाळेतल्या प्रवेशापासून या प्रश्नाची धग जाणवायला सुरूवात होते. आता शाळांमधून आईचेही नाव लिहीणे अनिवार्य झाले असले तरी मुलाची ओळख त्याच्या वडिलांच्या नावाशिवाय अपूर्ण असते हे कठोर सामाजिक वास्तव आहे. सामाजिक चळवळीतले काही कार्यकर्ते (आणि "कोल्हाट्याचं पोर" हे आत्मवृत्त लिहून आपली वेदना जगासमोर मांडणारे कै. डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्यासारखे अपवाद) तेवढे न कचरता आईचे नाव लावतात.

मग पुरूषांना अकारण जाळ्यात अडकवणार्‍या, चोरट्या संबंधातून जन्माला आलेल्या पोटच्या नवजात अर्भकांना कचराकुंडीचा रस्ता दाखवणार्‍या पाषाणहृदयी स्त्रिया समाजात आढळून येत नाहीत का? येतात. घटस्फोटामुळे मूल नाईलाजाने आईच्या ताब्यात द्यावं लागून त्याचा विरह आजन्म सोसणारे दुर्दैवी बाप नसतात का? असतात. पण सर्वसाधारणपणे एकल मातृत्व जिद्दीने निभावण्याचा प्रयत्न करणार्‍या स्त्रियांचं प्रमाण पुरूषांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. बापाने अपत्याची जबाबदारीच नव्हे तर बाप असल्याचच नाकारल्याची कित्येक उदाहरणे आढळून येतात.

अनैतिक संबंधांचे समर्थन समाजाने करावे असे येथे अजिबात म्हणायचे नाही पण त्यातून जन्माला आलेल्या निरागस जीवांना "एक माणूस" म्हणून जगण्याचा अधिकार समाज कधी देणार? "बाई" चुकू शकते पण "आई" ही नेहमीच पवित्र असते, हे सत्य समजून घेण्याइतका आपला समाज कधी प्रगल्भ होणार? केलेल्या कृत्याची जबाबदारी न घेण्याचा भेकडपणा दाखवणारे बाप नाहीतरी असून नसून सारखेच तरीही असे किती रोहित समाजाला "बाप दाखवण्यासाठी" स्वत:च्या "भावनांचे श्राद्ध" घालत राहणार? निदान, जिने त्या जीवाची जबाबदारी स्वीकारण्याची धमक दाखवली तिचेच नाव लावणे ही त्या अपत्याची "खरी आणि पुरेशी" ओळख आहे हे समाज कधी मान्य करणार?

No comments:

Post a Comment