Saturday, May 5, 2012

मैं ’माधुरी दीक्षित’ बनना चाहती हूँ

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. शहाण्याने कलाक्षेत्राची पायरी चढतानाही दहादा विचार करावा."मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ" या नावाचा कलाक्षेत्रातील "स्ट्रगलर्स" च्या आयुष्याची आणि स्वप्नांची चित्तरकथा सांगणारा एक सिनेमा मागे येऊन गेला. त्यातल्या मुख्य भूमिकेतील अंतरा माळीचं नाव सुद्धा कित्येकांना आज आठवत नसेल. नवोदित कलाकार पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवून एक-दोन चित्रपट, मालिकांमधे चमकून कायमचे पडद्याआड जातात. त्यांच्या जागी पुन्हा नवे चेहरे दिसू लागतात. कलाक्षेत्रातील धडपडीला "स्ट्रगल" म्हटले जाते. आज नावारूपाला आलेल्या कोणत्याही कलाकाराला तो चुकलेला नाही. शाहरूख खानचे दिल्लीमधे एक छोटेसे घड्याळाचे दुकान होते, अक्षय कुमार एक आचारी होता तर विद्या बालन लहानमोठ्या जाहिरातींमधून काम करत होती. पण प्रत्यक्षात या क्षेत्रात धडपडणार्‍यांपैकी जेमतेम ५ टक्के यशस्वी होतात. बाकीचे व्यथित जिणे जगत राहतात.

पूर्वी ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका नकारात्मक होता की कलाक्षेत्रात जाणे म्हणजे वाया जाणे मानले जाई. नाटकात काम करायचे म्हणजे घरातून पळून वगैरे जायला लागायचे. तुलनेने आता या क्षेत्राला प्रचंड वलय लाभले आहे. प्रसिद्धीचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, रातोरात स्टार बनवणार्‍या या जादुई कलानगरीने तरूणाईला भुरळ घातली नाही तरच नवल. या वलयामागे दूरचित्रवाणी आणि त्यावरील "रीऍलिटी शो" चा मोठा हात आहे. त्यातील स्पर्धकांना परिक्षकांच्या "माईंड ब्लोईंग, फॅंटास्टिक, आपने तो ओरिजनल से भी अच्छा परफॉर्म किया" अशा कॉमेंट्समुळे स्वर्ग दोन बोटे उरतो. त्यांचे आईवडील भरून पावतात.
याचा अर्थ अशा स्पर्धांमधे भाग घेऊ नये असे नव्हे, या निमित्त्याने "गॉडफादर" नसणार्‍या गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पण कलाक्षेत्रातील प्रवासाची ही केवळ सुरूवात आहे हे आधी समजून घ्यायला हवे. प्रत्यक्षात असे क्वचित होते. प्रेक्षकांसाठी ते फक्त दोन घटकेचे मनोरंजन असते आणि कलाकारांसाठी थेट आयुष्याचा प्रश्न. लता-आशा यांनी कलेसाठी आयुष्य झोकून दिले आणि त्या अजरामर झाल्या. तेवढी चिकाटी या स्पर्धकांकडे नसते आणि असली तरी या क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की तुमच्यात काही अभूतपूर्व गुण असतील तरच एखादी सुनिधी चौहान किंवा श्रेया घोषाल बनू शकते. नाहीतर पहिला इंडीयन आयडॉल अभिजीत सावंत सध्या काय करतोय? नंतरच्या इंडीयन आयडॉल्सची तर नावेही आठवत नाहीत.
नाट्यक्षेत्रातून अनेक उत्तम कलाकार पुढे आले. चरित्र अभिनेते म्हणून त्यांनी नाव कमावले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या त्यातले किती यशस्वी झाले? प्रसिद्धीचे परमोच्च शिखर पाहिलेल्या बालगंधर्वांसारख्या थोर कलावंतांनाही शेवटी उपेक्षेचे जिणे वाट्याला आले. काही अपवाद सोडले तर मधल्या पिढीतल्या बहुतेक नाट्यकलाकारांनी हिंदी चित्रपटातून फुटकळ भूमिका करत तडजोडी केल्या. मराठी चित्रपटात नायक म्हणवणार्‍या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या गुणी नटांनीही हिंदीमधे मिळतील त्या नगण्य भूमिका केल्या.

अमिताभ बच्चन यांना सुद्धा मधल्या काळात अपयशाने झोडपून काढले पण उत्तम अभिनयगुण, संस्कार, परिश्रम आणि जिद्द यांच्या आधारे त्यांनी तोल ढळू न देता महानायकपद पुन्हा खेचून आणले. परंतु हा अपवाद, त्या वेळचे तथाकथित सुपरस्टार राजेश खन्ना, विनोद खन्ना आज कुठे आहेत! शाहरूखसारखा सहज अभिनय किंवा आमीर खानसारखा परिपूर्णतेचा ध्यास नसलेल्या नव्या अभिनेत्यांना(अगदी स्टारपुत्रांना देखील) त्यांच्या भवितव्याची खात्री नाही. नुसते गॉगल उलटसुलट करून अमाप लोकप्रियता मिळवणार्‍या रजनीकांतसारखे, दैव सगळ्यांवर फिदा नसते (शिवाय अशा भूमिकांमधून "कलेचे समाधान" वगैरे मिळण्याचा काही संबंध नाही)
अभिनेत्रींची अवस्था तर अधिकच वाईट होते. नायिकाप्रधान चित्रपट आधीच कमी, त्यात आपल्याकडे विवाहित अभिनेत्रीला प्रेक्षक नाकारतात. त्या भितीने त्यांचे विवाहाचे वय लांबणीवर पडते. "झाडामागून पळण्याचे" वय संपले की करियरच्या उतारावर त्या एकेकाळच्या आपल्याच नायकांच्या आई-बहिणीच्या भूमिका करतात किंवा एखाद्या बड्या हस्तीशी लग्न करून कायमच्या पडद्याआड जातात नाहीतर वैफल्यग्रस्त होतात. हॉलीवूडमधेच नव्हे अगदी मराठी चित्रसृष्टीत देखील कित्येक नायिकांच्या शोकांतिका त्यांच्या आत्मचरित्रातून उमटल्या आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका करून आजही स्वत:ची छाप पाडणारी शबाना आझमी किंवा नृत्यकला आणि सौंदर्याचे वलय जतन करणारी हेमामालिनी एखाददुसरीच. नव्या इनिंगसाठी भारतात परतलेल्या माधुरीने आता सशक्त भूमिका स्वीकारल्या नाहीत तर तिला देखील "मैं कभी माधुरी दिक्षित थी" असेच म्हणावे लागेल.
नवीन अभिनेत्रींची स्थिती याहून अवघड आहे. खुद्द हेमामालिनीच्या मुलीलाही अखेर चित्रसृष्टीला रामराम ठोकावा लागला. केवळ दिसायला बरी आहे म्हणून काही मुलींना मॉडेलिंगचे अल्पजीवी जग खुणावायला लागते आणि चित्रपटक्षेत्र तर जणू आपली वाटच पाहत थांबलं आहे असं त्यांना वाटू लागतं. सौंदर्यस्पर्धांमधून अभिनेत्री होऊ पाहणार्‍यांचे नवे लोंढे येतच राहतात. "भूमिकेची गरज" या नावाखाली त्या अंगप्रदर्शन करायलाही तयार होतात. त्यातल्या ५ टक्के कॅटरिना, प्रियंका किंवा करीना कपूर बनू शकल्या तरी उरलेल्या ९५% जणींच भवितव्य काय? या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही हे यश टिकवून ठेवण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागतात तेवढी तयारी आणि कास्टींग काऊचला तोंड देण्याची क्षमता किती जणींमधे असते?

तात्कालिक यश मिळाले तरी त्यामागून येणारे अपेक्षांचे ओझे पेलण्याइतकी प्रतिभा आणि मायानगरीतील अस्थिरतेला स्वीकारण्याची मानसिक कणखरता ज्यांच्यात नाही त्यांनी कलाक्षेत्राच्या वाटेला जाऊ नये. याचा अर्थ कुणी कलाकार होऊच नये का? आर्थिक समृद्धी हेच कलाकाराच्या यशाचं माप असावं का? हाडाच्या कलावंताची तडफड फक्त त्यालाच कळते. गुरू ठाकूर यांनी ही वेदना परिणामकारक शब्दात "नटरंग" मधे मांडली आहे.
" ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला, थोर उपकार...
तुज चरणी लागली वरणी, कशी ही करणी करू साकार
एकला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग...
 नटरंग उभा, ललकारी नभा, स्वर ताल जाहले दंग "

पण जगण्यासाठी शेवटी व्यावसायिक तडजोड करावीच लागत असेल तर मग कलेच्या प्रेमाचा उरबडवेपणा कशाला! कलाकार म्हणून यशस्वी होण्यासाठी उपजत उत्तम कलागुण तर हवेतच. पण त्याला व्यासंगाची-वाचनाची-अभ्यासाची-रियाजाची डूब आणि व्यावहारिकतेची जाण असायला हवी. शाळा-महाविद्यालयातील एखाद्या नाट्यस्पर्धेत, गायनस्पर्धेत बक्षिस मिळाले म्हणजे आता कला हेच माझं करियर असा "चला मुरारी हीरो बनने" छापाचा स्वप्नाळू विचार न करता या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला हवं. आपल्या व्यक्तिमत्वासमोर वस्तुस्थितीचा आरसा धरला तर सगळी खरी उत्तरे मिळतात. कलाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी रंगमंचावर किंवा पडद्यावर आपला मुखडाच झळकला पाहिजे हा अट्टाहास सोडला तर या क्षेत्रात करण्यासारखं खूप आहे. नवे प्रयोग होत आहेत. गायन-वादन-अभिनय क्षेत्रात तांत्रिक बाजूंचे महत्त्व वाढले आहे. छायाचित्रीकरण, लेखन, संपादन, दिग्दर्शन, नेपथ्य, ग्राफीक्स, ध्वनीमुद्रण, पेहराव-दागिने डिझाईनींग, मेकअप कला, आहार-फिट्नेस सल्ला, स्वर-साथ, कार्यक्रमांचे आरेखन, इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये प्रचंड नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यासाठी आवश्यक असणारं व्यावसायिक, तांत्रिक प्रशिक्षण घेऊन त्याला अंगभूत कलेची जोड दिली तर आर्थिक यशाबरोबरच निर्मितीचं आणि आवडीच्या क्षेत्रामधे काम करण्याचं समाधान मिळेल. सच्च्या कलाकाराला अशा स्वानंदापेक्षा आणखी काय हवं!

No comments:

Post a Comment