Friday, December 8, 2017

ब्लॉग ’ती’ चा - वेटलॉस तमाशा


पांढर्‍याशुभ्र लुसलुशीत वाफाळत्या उकडीच्या मोदकावर किंवा गरम खरपूस पुरणपोळीवर ताज्या कढवलेल्या साजूक तुपाची धार धरली आणि डोळे मिटून त्याचा घास घेतला की जे काही वाटतं त्याला ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतात. ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्.. यावत् जिवेत सुखम् जिवेत’ असं चार्वाकाचं वचन आहेच. कर्ज काढा पण तूप खा, थोडक्यात जीओ जी भरके. हं, मात्र दुसर्‍याच घासाला कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅट्स सारखे भयंकर शब्द, जिमची भरलेली फी वगैरे आठवू लागतं. परंतु ’साजूक तूप अवश्य खावं’ असं चक्क भारतातली एक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सांगत असेल तर! 
’५-१० वर्षांनी पाश्चात्य देशांनी साजूक तुपाचं महत्व मान्य केलं की मगच तुम्हाला हे पटणार आहे का? पचनशक्ती चांगली राखण्य़ासाठी, शरीराचं वंगण म्हणून, तुकतुकीत कांतीसाठी, कित्येक विकारांवर गुणकारी असलेलं साजूक तूप दररोज खायला हवं.’ ४ लाखांहून अधिक चाहते असणारी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर #RujutaDiwekar सोशल माध्यमांवर आणि तिच्या http://rujutadiwekar.blogspot.in
 (Rutuja's gyan) या ब्लॉगवर हे आवर्जून सांगते. विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा, डोंट लूज योर माइंड लूज युवर वेट यासारखी आहारशास्त्रावरची विक्रमी खपाची पुस्तकं तिच्या नावावर आहेत.

ऋजुता अनेक उच्चपदस्थ व्यक्तींची आहारविषयक सल्लागार, वेलनेस प्रशिक्षक असली तरी ती चर्चेचा विषय झाली ते करिना कपूरच्या ’साईझ झीरो’ #SizeZero प्रकरणापासून. परंतु या ब्लॉगवर ऋजुता लिहिते, "करिना साईझ झीरो झाली नव्हतीच, माझा आहारविषयक सल्ला मनापासून अमलात आणल्यामुळे आधीपेक्षा खुटखुटीत, चपळ झाली इतकच. शिवाय त्या चित्रपटाची, तिची, ती व्यावसायिक गरज होती. अमेरिकन व्याख्येनुसार साईझ झीरो म्हणजे 5’4” हून कमी उंचीची 32-24-32 मापातली स्त्री. शरीरसौष्ठवाच्या परकीय कल्पना भारतीय स्त्रीच्या शरीरयष्टीला मानवणार्‍या नाहीत तरीही त्यापायी प्रसंगी उपासमार सोसून साईझ झीरोच्या मागे लागणार्‍या मुलींना म्हणावे तरी काय!" ’वजन कमी करणं आणि ते आटोक्यात ठेवणं ही माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे’ असं एखादी तरुण, उच्चशिक्षित, सक्षम स्त्री सांगते तेव्हा ऋजुताला अतिशय वाईट वाटतं. सगळं जगणं व्यापून टाकण्य़ाइतकं हे महत्वाचं आहे का! वजन नियंत्रणात असायलाच हवं पण ते आरोग्यासाठी, चांगल्या दर्जाचं आयुष्य जगता यावं म्हणून परंतु बहुतेक मुलींना वजन कमी करायचं असतं ते केवळ सुंदर दिसण्यासाठी.

ऋजुता सोशल मिडीयावर/ ब्लॉगवरच्या लेखातून तिच्या मनातली ही खंत मांडते," एकीकडे या मूर्ख मुली तर दुसरीकडे स्त्रियांना दुय्यम लेखण्याच्या मानसिकतेच्या बळी ठरलेल्या दुर्दैवी स्त्रिया. मुला-मुलींना घरी जशी वागणूक दिली जाते त्यानुसार त्यांची मानसिक घडण होते. मुलांमधली स्वामित्वाची आणि मुलींमधली दुय्यमत्वाची भावना प्रबळ होत जाते. याची परिणती ’मी नवर्‍याचं जेवण झाल्याशिवाय कशी जेवू’ या वरवर प्रेमळ भासणार्‍या विचारापासून ’रात्रीबेरात्री प्रवास करणारी मुलगी स्वत:हून अत्याचाराला निमंत्रण देते, त्यात मुलांचा काय दोष’ अशा विकृत टोकापर्यंत होऊ शकते. या मानसिकतेचा संबंध शारीरिक पोषणाशी आणि सुदृढ जीवनशैलीशी आहे. मुलींना ती नाकारली गेली आहे. खरं तर आपल्याला त्यांच्या ’साईझ झीरो’ची काळजी करायला हवी आहे. त्यांच्या निकोप वाढीसाठी शिक्षणाबरोबरच मुलभूत सुविधा द्यायला हव्यात. कोवळ्या वयात होणारी लग्नं आणि पाठोपाठ येणारं गरोदरपण रोखायला हवं. मन:शक्ती वाढवण्याबरोबरच त्यांना पुरेसं आणि सकस अन्न वेळेवर मिळतय का याकडे लक्ष द्यायला हवं."

आहारनियमनाच्या खुळचट कल्पनांबद्दल एका लेखात ऋजुता लिहिते," सूप सलाड खाऊन जीवाच्या आकांताने वजन कमी करणारे कायम जगावर वैतागलेले असतात त्यापेक्षा जे आवडतं तेच पण योग्य प्रमाणात खा. ’तांदुळाच्या नियमित सेवनामुळे तामिळनाडूत मधुमेही रुग्णांच्या प्रमाणात वाढ ?’ अशी काहीतरी बातमी वाचनात येते. ती पूर्ण न वाचताच, मधुमेहींनी किंबहुना सर्वांनीच भात खाणे अयोग्य हे गणित आपण डोक्यात पक्के करतो. खरं तर वरण/सार/आमटी/दही-भात, खिचडी हा अस्सल देशी पदार्थ आहे. आपल्या खाद्यजीवनातलं हे पहिलं प्रेम असतं. चार दिवस परदेशी फिरुन या, कधी एकदा तूप घालून लिंबू पिळून घरचा मस्त गरमागरम वरण-भात खातोय असं होतं पण आपण हा साधा सोपा रुचकर आणि पौष्टिक पदार्थ डाएटिंगच्या फॅड मुळे अकारण नाकारतो आणि सुखाचा जीव दु:खात घालतो." (खिचडी हा आपला राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित झाल्याची मध्यंतरी चर्चा होती, असो वा नसो, खाद्यदिनाला खिचडी पकलीच. ऋजुता म्हणते म्हणून तरी तो खायला सरकारविरोधकांची हरकत नसावी )

मध्यंतरी एका गाजलेल्या टीव्ही मालिकेत पंजाबी ’प्राठा’प्रेमी लठ्ठ नायकाची काळजी घेणारी सालस बायको त्याचं वजन नियंत्रणात राहावं म्हणून त्याला पालकाचं सूप, फळांच्या फोडी असा डबा पाठवायला सुरूवात करते. यावर ऋजुता ’टीव्ही डाएट’ या लेखात तिला विचारते," फळं-भाज्यांचा सरफेस एरिया वाढला (फळ कापणं किंवा रस काढणं) की त्यातली पोषणमूल्य हरवतात हे तू शाळेत कधी शिकली नाहीस काय गो!" गोठवलेले हवाबंद डब्यातले पदार्थ, कॉर्नफ्लेक्स खाणं हे उच्च दर्जाच्या जीवनशैलीचं उदाहरण म्हणून जाहिरातींमधून भाबड्य़ा प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं जातं. बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यामध्ये तर एकाच वेळी तत्त्वचिंतक, इतिहासतज्ज्ञ आणि एक आहारतज्ज्ञ दडलेला असतो. जे या तज्ज्ञांमध्ये मोडत नाहीत त्यांची भलतीच पंचाईत होते. आहाराचा रोजच्या जगण्याशी संबंध असल्याने त्याविषयी परस्परविरोधी पोस्ट्स वाचून ते बिचारे गोंधळून जातात. उदा: ’पोळी नको भाकरी खा’, ही पोस्ट वाचून होत नाही तोच ’अंकुरित गव्हाचे फायदे’ नावाची पोस्ट येऊन पडते. गंमत म्हणजे बरेचदा ’सुख दु:खे समे कृत्वा..’ वृत्तीची एकच व्यक्ती या दोन्ही पोस्ट्स पाठवते. हे वाचल्यावर आणि जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले पदार्थ, भाज्या जर त्यांना सहज उपलब्ध होत नसतील तर आपण पालक म्हणून भलतेच बॅकवर्ड आहोत काय, आपल्या मुलांना चांगला आहार देत नाही की काय, या गंडाने ते पछाडले जातात....

अशा वेळी काय करावं! ऋजुताचा ब्लॉग किंवा सोशल लिंक्स उघडाव्या. त्यावरच्या या टिप्स मनातल्या बहुतेक प्रश्नांची नेमकी उत्तरं देतात. "ओट्स सारखे पदार्थ आपल्या मातीतले नाहीत, शिवाय ते बेचव आहेत. भारतीय हवामानाला ते पूरक नाहीत. केवळ फॅशन म्हणून खाद्यसंस्कृती का बदलायची? बदल म्हणून एखादेवेळी ठीक आहे एरवी पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर हा भारतीय चौरस आहार सर्वात उत्तम. शुगरफ्री पेक्षा प्रमाणात साखर खाणे योग्य. सणासुदीला थोडेफार जिभेचे चोचले पुरवायला काहीच हरकत नाही. डाएट करणे म्हणजे दुधी- कारल्याचा रस पिणे, काहीतरी नीरस, बेचव खाणे हा विचार डोकयातून काढा. दर दोन तासांनी थोडं थोडं खा. कमी खाण्यापेक्षा योग्य आहार घेणं महत्वाचं. राजासारखी न्याहारी, राणीसारखं भोजन आणि चाकरासारखं रात्रीचं जेवण म्हणजेच आदर्श आहारपद्धत असं नाही. आहार ज्याच्यात्याच्या शरीर प्रकृतीनुसार असावा. ऋतुमानानुसार तो बदला. सलग एका जागी ३० मि. हून अधिक बसणं टाळा. आठवड्यातून किमान १५० मिनिट व्यायाम करा."

असं म्हणतात आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसतं. काय खावं काय टाळावं याचा संबंध जितका आहारशास्त्राशी आहे तितकाच ’कॉमन सेन्स’ शी आहे. ऋजुता म्हणते तसं, वजनाचा काटा विकत घेण्यापेक्षा स्वत:च्या आहार-विहाराबद्दल स्वत:ला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. वाढत्या ताणाचा वजनावर परिणाम होतो. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉरवर्ड (पोस्ट्स नव्हे ) ही त्रिसूत्री वापरली तर बरेचसे ताण कमी होतील. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:च्या शरीरासकट स्वत:चा मनापासून स्वीकार करा... (आणि हे सारं हलक्याफुलक्या शैलीत सांगणार्‍या ऋजुताचा इंग्लीश-हिंग्लीश ब्लॉग/पोस्ट्स खिचडीवर थोडी लसणीची चरचरीत फोडणी घालून (लसणाने चरबी कमी होते), कुरकुरीत पापडासह खात खात अवश्य वाचत राहा)

No comments:

Post a Comment