’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या माझ्या तरुण भारत- आकांक्षा मधील स्तंभातला आजचा लेख
गोव्यातल्या कुंकळ्ळीसारख्या छोट्या गावातून आलेल्या शेफाली वैद्य आज स्टार ब्लॉगर आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी आणि आंतरजालावरच्या विविध क्षेत्रांत त्या काम करतायत.
हजारो चाहत्यांना भावणारा, त्यांचा आत्मविश्वास जागवणारा शेफाली यांचा लेखनप्रवास विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोमाने आणि डौलात सुरू आहे. त्यातल्या वाटा, वळणांचा वेध घेणार्या त्यांच्या ब्लॉगबद्दल....
गोव्यातल्या कुंकळ्ळीसारख्या छोट्या गावातून आलेल्या शेफाली वैद्य आज स्टार ब्लॉगर आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी आणि आंतरजालावरच्या विविध क्षेत्रांत त्या काम करतायत.
हजारो चाहत्यांना भावणारा, त्यांचा आत्मविश्वास जागवणारा शेफाली यांचा लेखनप्रवास विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोमाने आणि डौलात सुरू आहे. त्यातल्या वाटा, वळणांचा वेध घेणार्या त्यांच्या ब्लॉगबद्दल....
मीच माझा मोर - शेफाली वैद्य #ShefaliVaidya
समस्त भारतीय मूढ असून त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आपल्याच शिरावर असल्याच्या भ्रमात असलेल्या दोन्ही टोकाच्या मंडळींमध्ये एक सरळमार्गी गट समाजात मोठय़ा प्रमाणावर असतो. जगातल्या इतर देशांप्रमाणे भारतातही प्रचंड चांगल्या- वाईट उलथापालथी होत आहेत. परंतु फक्त नकारात्मक घटनांना अधोरेखित करून इतकी अस्वस्थता पसरवली जातेय की आपण भारतीय आहोत याचा त्याला न्यूनगंडच वाटू लागतो. अशा वेळी शेफाली वैद्य यांच्या http://mahamtb.com/authors/shefali_vaidya.html
जुन्यातलं कालबाह्य ते त्यागून, नव्यातलं योग्य ते निवडून आणि दोहोंचा समन्वय साधून आनंदाने जगता येऊ शकतं हा विश्वास देणार्या आणि कदाचित त्यामुळेच सोशल माध्यमांवर तब्बल ऐशी ते नव्वदहजार फॉलोअर्स (ज्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे) असलेल्या स्टार ब्लॉगर, पुण्याच्या शेफाली वैद्य. संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शेफाली मराठी, इंग्लीश आणि कोंकणीतूनही तितक्याच सफाईने रंजक पण परखड लेखन करतात. राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच पालकत्व, प्रवास, शिल्पकला आणि साडी या त्यांच्या आवडत्या वस्त्रप्रकाराबद्दल त्या सातत्याने उत्तम लिहितात. तरीही भारतीय अस्मिता जागृत ठेवणारं प्रखर लिखाण ही त्यांची खरी ओळख आहे.
पुरोगामी म्हणजे समाजाचं भलं चिंतणारा सुधारणावादी. परंतु या बिरूदाखाली केवळ द्वेषाचं राजकारण करणार्या अनेक स्वघोषित विचारवंतांचा समाचार घेत शेफाली घणाघाती लेखन करतात," 'मंगळसूत्र घालणं ही मानसिक गुलामगिरी आहे' म्हणणारे हेच लोक 'बुरखा घालणं हा मुसलमान स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे' हे ही तितक्याच जोरकसपणे सांगत असतात. दिवाळीला इतका खर्च करण्य़ाची गरज काय हा सामाजिक प्रबोधनपर संदेश स्वत: सीसीडीत अडीचशे रुपयांची कॉफी पीत आपल्या आय-फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. काही प्रथांमध्ये अनावश्यक फाफटपसारा आलाय हे खरय. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक मूल्यपद्धतीप्रमाणे सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका."
तथाकथित पुरोगामींना 'लव्ह जिहाद' ही संकल्पनाच अमान्य आहे तर अंध प्रतिगामींना प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा 'लव्ह जिहाद' वाटतो. शेफाली वैद्य यांचे या विषयावरील संतुलित आणि अभ्यासपूर्ण लिखाण या ब्लॉगवर आहे. त्या लिहितात, "भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. ही पद्धत टाळून बिगरमुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद'. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरूनच एनआयएला चौकशीचा आदेश दिला आहे. घटनेनुसार आपला जोडीदार निवडायचा अधिकार कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला असायलाच हवा, पण धर्मांतर म्हणजे काय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अश्या विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते आहे का? तलाक देऊन हाकलून दिले तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही."
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यमं. परंतु समर्थन किंवा विरोध हे एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर मुद्द्यावर अवलंबून असावे हे भान विसरलेल्या बहुसंख्य माध्यमांचंही आज ध्रुवीकरण झालेलं दिसतय. अशा वेळेस तुम्हाला मिळणारी बातमी ही त्या त्या माध्यमाच्या धोरणानुसार ’मोल्ड’ होऊन आलेली असते. नुकतीच मुंबईत रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली. पुलाच्या बाहेर उभा असलेला एक पुरुष आत अडकलेल्या एका बाईला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता, या पाच सेकंदांच्या क्लिपच्या आधारावर काहीही शहानिशा न करता 'मरणाच्या दारात असलेल्या बाईचाही मुंबईत विनयभंग होतो' अशा स्वरूपाची सनसनाटी बातमी प्रतिष्ठित वृत्तपत्र म्हणवणाऱ्या मीडिया कंपनीने प्रसिद्ध केली. "भारत हा देश स्त्रियांसाठी सुरक्षित नाही असे चित्र जगभरात पसरवणे हे असल्या कुटिरोद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांचे प्रमुख काम. तो पुरूष त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे उघड झाल्यावर ती बातमी मागे घेण्याची नामुष्की त्या वृत्तपत्रावर ओढवली." अशा सडेतोड शब्दात टीआरपीच्या हव्यासापोटी केलेला उद्योग शेफाली सप्रमाण उघड करतात. भारताबाबत खोटी बढाई मारणार्या माध्यमांचे तसेच प्रतिगाम्यांचे कान धरताना मात्र त्या फारशा आढळत नाहीत. तसे घडल्यास उलट त्यांच्या लोकप्रिय लिखाणाची विश्वासार्हता अधिक वाढेल.
गुरमेहेरचं काय करायचं?, गोरक्षक, सत्य आणि मीडियाचा विपर्यास, उरी बसलेला घाव, शहाबुद्दीन के शोले, स्वतःची शोभा करून घेणारी डे- अशा अनेक खणखणीत लेखांतून शेफाली यांची लेखणी तळपली आहे. वर्मावर बोट ठेवल्याने दुखावलेल्या विरोधकांनी शेफाली या मोदीसरकारच्या ट्रोल आहेत असा आरोप करत दुसर्या बाजूला स्वत: शेफालीविरोधातही ट्रोलिंगच केले आहे. त्यामुळे असेल, किंवा स्वत:चे आनंदनिधान असणार्या क्षेत्रांशी वाचकांचा परिचय करुन देण्य़ासाठी असेल, शेफाली इतर विषयातील लेखनातही अधिक रस घेऊ लागल्याचे जाणवते.
’एक धागा सुखाचा’ या सदरात त्या लिहितात, "काही माणसं कशी जुनी नाणी जमवतात, पेंटिंग्स, मूर्ती, शिल्पांचा संग्रह करतात, तशी मी साड्या जमवते. माझ्या लहानपणीची खास आठवण...आईने तिचं कपाट उघडलं की जुन्या रंगीबेरंगी रेशमी साड्यांचा, वाळ्याचा, कापराचा सुंदर, संमिश्र दरवळ खोलीभर पसरायचा. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेयस नात्यांचे ताणेबाणे मला तिच्या साड्यांमधून उकलले." या सदरातील इतर लेखांतून त्या लिनन, मुगा सिल्क, शिबोरी अशा विविध साड्यांमधली कलाकारी, त्या साड्या परिधान केलेल्या स्वत:च्या देखण्या फोटोंसह विस्ताराने उलगडतात. शिल्पकथा सदरात त्या ’मध्य प्रदेशातल्या उदयगिरी गुंफांमध्ये कोरलेल्या गजाननाच्या मूर्ती पासून कांचिपुरमचे किरातार्जुनीयम, उदयगिरीचा शेषशायी नारायण, देवीची विविध शिल्प याबाबत सचित्र माहिती देत साद्यंत वर्णन करतात.
श्रीदेवीचे पुनरागमन असलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात तिने चाळीशीतली, घरातल्या सगळ्यांनी गृहीत धरलेली मध्यमवर्गीय गृहिणी, लाडू करण्याचा घरगुती उद्योग चालवणारी छोटी उद्योजिका रंगवली आहे. ’आत्मभान’ या लेखात शेफाली लिहितात, "एकजण म्हणाली- त्या सिनेमासारखा माझ्या आयुष्यात थोडाच कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस येणार आहे आता, जो मला आत्मभान मिळवून द्यायला मदत करेल? मी हसले, म्हटलं, 'तूच बन की तो फ्रेंच माणूस’". पु. शि. रेगेंच्या सावित्री ह्या पुस्तकातली राजम्मा एक गोष्ट सांगते. त्यातल्या छोट्या लच्छीला मोर सतत आपल्या अंगणात नाचावा असं वाटत असतं. पण मोर स्वच्छंदी असतो. तो अट घालतो की त्यासाठी लच्छीने स्वतः आधी आनंदाने नाचायला हवं. शेवटी मोराची वाट बघणं हे कारणच गळून पडतं आणि लच्छी स्वतःच मोर बनून आनंदविभोर होते." तारणहाराची वाट पाहण्यापेक्षा ’मीच माझा मोर’ हे शेफाली यांचं लेखन वाचत गेलं की नीटच कळतं.
No comments:
Post a Comment