Friday, November 10, 2017

ब्लॉग ’ती’ चा - इंद्रधनु


समविचारी सख्यांचा समूहब्लॉग- इंद्रधनु

'सुखदुःखांचे, हळवे, कातर, हसरे, दुखरे, क्षण जपलेले.
श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे.
प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु.
त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू...'
असं म्हणत एकत्र आलेल्या मैत्रिणींना समूह-ब्लॉग लिहावासा वाटणं आणि ’स्त्री’ म्हणून आपल्या जाणीव-नेणीवांचे पदर उलगडत तो तब्बल ८ वर्ष लिहिता-वाहता ठेवणं हे मला विशेष महत्वाचं वाटतं. स्त्रीवादी पवित्रा न घेताही स्वत:चा शोध घेणारा हा ब्लॉग आजच्या सुशिक्षित मध्यमवयीन शहरी स्त्रीच्या मनोव्यापारांची नोंद घेतो. विद्या कुळकर्णी, अश्विनी केळकर, दीपश्री मुद्गल, वैशाली भिडे, स्मिता पाटकर, आशा कुलकर्णी, आणि वाचक यांचा मिळून हा ’ब्लॉग माझा २०१२’ पुरस्कारप्राप्त ब्लॉग ’इंद्रधनु’ http://asvvad.blogspot.in/ 
 या लिंकवर उपलब्ध आहे.

या पुण्यात राहणार्‍या मैत्रिणी सुखवस्तू आणि उच्चशिक्षित आहेत. अशा स्थानावरून कुणी स्त्री व्यक्त होत असेल तर त्याकडे ’काही नाही, सुख दुखतय यांना’ असं पाहणारे असले तरी त्या ’लोकेशन’पलिकडे जाऊन माणूस म्हणून तिला संवेदनशीलपणे समजून घेणारेही असतात. या ब्लॉगवर सर्वाधिक लेख लिहिणारी विद्या म्हणते," माझं लेखन हे माझं वय, माझं घडणं, माझी जात- वर्ग- वर्ण, मी ज्याचा भाग आहे तो आजूबाजूचा समाज, त्यातलं माझं स्थान, तिथून मला दिसणारं जग, याला तोडून नसणार आहे. माझ्या बिंदूवरून शक्यतो सगळीकडे पाहायचा प्रयत्न करीत मी लिहिते आहे. बाईला आत्मसन्मानाने जगायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे."
या ’ब्लॉगवर अनेक स्त्रीकेंद्री विषयांचा परामर्ष घेतलेला आढळतो. ’सांभाळण्यासाठी मने, माझे गिळावे मीपण.. ’ अशी इंदिरा संतांच्या शब्दातली खंत इथे नाही. पुरूषविरोधी सूर कुठेही नाही. ’दरवेळी भाजतंच असं नाही..पण धग असतेच आसपास’ हा कल्पना दुधाळ यांच्या शब्दातला वास्तवाचा स्वीकार मात्र आहे. तरीही ’मी पण’ अबाधित राखून या आजच्या स्त्रिया स्वत:कडे, नातेसंबंधांकडे आणि एकूणच भवतालाकडे नव्या स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतायत. हे सारं अतिशय मृदुपणे, कटूता टाळून, अनलंकृत शब्दातून, संवादी पद्धतीने समोर येतं.
काही लेखांमधून या मैत्रिणी बघण्य़ात आलेले हटके सिनेमे, नाटक यातलं वेगळेपण मांडतात, आपली सौंदर्याची तसच स्वातंत्र्याची व्याख्या तपासतात. आशा लिहिते, "प्रत्येक स्त्रीलाच ‘झाशीची राणी’ किंवा ‘किरण बेदी’ बनणे कदाचित आवडणारही नाही. काही स्त्रिया आवडीने आपल्या कर्तृत्वासाठी पारंपारिक क्षेत्रच निवडतील/निवडतात. पण निवडीचे स्वातंत्र्य/आधिकार स्त्री ला हवा हे महत्त्वाचे!" अर्थात आपण एखाद्या स्त्रीचं तिच्या आयुष्याबाबतचं स्वातंत्र्य मान्य करतो का हा प्रश्न ’लंच बॉक्स’ या चित्रपटाबद्दल दीपश्रीने लिहिलेल्या लेखातून उपस्थित होतो. ती लिहिते, "गृहिणी म्हणून समाजाच्या असलेल्या मर्यादा संभाळणा-या, जोडीदाराकडून अपेक्षित असणा-या भावनिक समाधान देणा-या गोष्टी दुस-या कोणा पुरुषाकडून मिळवणा-या, अश्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व इला ही व्यक्तिरेखा करते. सिनेमाची कथा म्हणून आपल्याला हे पटेलही, आवडेल सुद्धा. पण प्रत्यक्षात एखादी स्त्री आपल्या अवतीभोवती अशी असेल तर याकडे आपण कसे बघतो ते महत्वाचे. नाही का ?"
घरातल्या भांड्यांकुंड्यांवर सुद्धा कायम घरातल्या कर्त्या पुरूषाचच नाव घालायच्या प्रथेत आता होऊ लागलेला बदल वैशालीने एका लेखात टिपला आहे. अंगात येणं, देवधर्म-व्रत वैकल्य यावर या ब्लॉगवर स्पष्टपणे मत मांडलेली आहेत. वैशाली लिहिते, "एखाद्या बाईच्या अंगात येणं म्हणजे जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच." विद्या लिहिते, "आपण आपल्या सणवाराच्या, साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात. त्यात गंमत, मजा ही तर हवीच पण हे सारं समतेच्या पायावर उभं असायला हवं. परंतु आपल्या समाजातील समता कशी आहे? बायका पौरोहित्य करायला लागल्या. त्याने समाज पुढे गेला का? नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे. बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे त्यासाठी आदर्श बदलले पाहिजेत."
स्वयंपाक, स्त्री चं कमावणं, जगण्याच्या प्रवासात लक्षात राहिलेल्या बायका याविषयीची मनोगतंही या ब्लॉगवर लिहिलेली आहेत. एखाद्या लेखात स्वत:चा मन:पूत स्वीकार करायला शिकवणार्‍या आणि जगण्य़ातलं शहाणपण ओंजळीत टाकणार्‍या, ’यू कॅन हील युवर लाईफ’ ची लेखिका लुईस बद्दल विद्या कृतज्ञभावाने लिहिते. स्त्री-पुरूष मैत्रीबाबत आणखी एका लेखात मत मांडते, "जिवलग मित्र असण्याचा एक फायदा आहे की नवर्‍याला किंवा इतर पुरूषांना समजून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. अनुभवाचं वर्तूळ वाढवता येऊ शकतं. परंतु आपल्याकडे स्त्री-पुरूष मैत्रीचा काय इतिहास आहे? कृष्ण-द्रौपदी वगळता मला अशी मैत्री दिसत नाही."
दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयांपासून बलात्काराची भीती, बाल-लैंगिक अत्याचारापर्यंत, मनाच्या तळाशी गाडलेले अनेक ’का?’ इथे खुलेपणाने चर्चिले जातात. बालपणी जाणवले, साहिले त्यावर या माध्यमातून व्यक्त होऊन या सख्या मोकळा श्वास घेतात. अश्विनी तिच्या ताज्या लेखात दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशातल्या एका रेसॉर्ट वर भेटलेल्या परदेशी तरुणीबद्दल लिहिते. दिवसभर निवांतपणे भटकून रात्री काळोखात निर्भयपणे परत येणारी ही एकटी तरुणी पाहून अश्विनी विचार करतेय.. "असं खुल्या दिलानं, आजुबाजूच्या जगावर विश्वास टाकून, मोकळं होऊन एकटं हिंडणं आपल्याला यापुढेतरी कधी जमेल?"

स्मिताच्या लेखातून अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला जातो, "आजच्या आपल्या पिढीत पूर्वीपेक्षा बाईपणाची ओझी बरीच कमी झाली आहेत. आपली ती झुगारून द्यायची क्षमता पण वाढली आहे. पण त्यामुळे नवी ओझी तर निर्माण होत नाही आहेत ना? साधं मासिक पाळीचं उदाहरण घेऊ या, ५०% समाजाची ही दर महिन्याची शारीरिक अवस्था आहे तर त्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे असं आपण का वागतो?"
विद्या लिहिते," विवाहितेपेक्षा प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं ओझं जास्त असतं. कायम शरीराचं भान ठेवायचं, आपण एकातरी मुलाला जन्म दिला पाहिजे याचं, अगदी वॉशरूमला जाऊन येण्याचा कार्यक्रम बाहेर कसा पार पाडायचा याचं बायकांना ओझं असतं. कधी माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना या खोलवरच्या भीतीचं एक ओझं घेऊन बायकांना जगायला लागतं."
परंतु पुरूष म्हणूनही जगतानाही अनेक ओझी वाहावी लागतात याची जाण त्यांना आहे. या ब्लॉगचा वाचक सचिन लिहितो, शालेय जीवनात मी पुरूष आहे; किंबहूना मी ‘बायल्या‘ नाही, हे सिद्ध करण्याचं खूप मोठे ओझे घेऊन मी जगलो, अजून एक ओझं ‘कर्ता‘ असण्याचं."
नीरज लिहितो, "पुरुषासारखा पुरुष, आणि घाबरतोस काय" हे ही नक्कीच एक ओझं आहे. तर मिलिंद लिहितो, मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच जे शोषित/वंचित आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे."
एकूणच ही चर्चा म्हणजे सर्वंकष विचार कसा करावा याचा सुरेख नमुना आहे.
अर्थात या ब्लॉगवर अनेक महत्वाचे विषय अद्याप यायला हवे आहेत, स्वानुभवाचं सच्चेपण असलं तरी ती अनेकदा लेखाची मर्यादा ठरते. नवरात्रात नऊ रंग वापरण्य़ाच्या नव्या प्रथेवरची टीका किंवा काही आक्षेप वाचताना प्रत्येक कृती व्यक्तीस्वातंत्र्याच्या तागडीत घालून मोजण्याने त्यातला निखळ आनंद गमावला जात नाही का असंही वाटतं. त्याचबरोबर विद्या म्हणते तसं, विचारांच्या गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार याचं नेमकं भान हा ब्लॉग देतो. यावर उद्धृत केलेल्या जावेद अख्तर यांच्या कवितेतून आपली जगण्याविषयीची समजूतही वाढवतो.
" हे जग पुरूषांचं नाही की बाईचं नाही,
दोघांचं मिळून आहे...
हे जाणणार्‍या पुरूषा.......
तू खरा मर्द आहेस!"

No comments:

Post a Comment