Friday, November 17, 2017

ब्लॉग ’ती’ चा - मेघनाचा एको पॉईंट

‘रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात. एकाच वेळी इतक्या आत्ममग्नतेने आणि बेधडकपणे जगण्याकडे खरच पाहता येतं का! येतं, http://meghanabhuskute.blogspot.in/ हा ’मित्रांना’ उद्देशून लिहिलेला ब्लॉग वाचताना हे अद्भुत रसायन अनुभवता येतं. 
आपण प्रचंड ’रसिक, सुजाण’ वगैरे आहोत, 'संस्कृतीच्या जपणुकीची धुरा आपल्यालाच वाहायची आहे', अशी चौकटीत जगणार्‍या वर्गाची ठाम समजूत असते. मेघना भुस्कुटेचा ब्लॉग वाचताना अशा बर्‍याच इमल्यांना धक्के बसतात, कधी थेट भगदाडं पडतात. मेघना मात्र तिच्या ब्लॉगलेखनाकडे ’जगातलं शक्य तितकं शोषून-चाखून बघण्याच्या माझ्या शैलीत मांडलेले, वागताना होत जाणारे आपले असंख्य प्रामाणिक तुकडे’ या नजरेने पाहते. माध्यमांच्या आणि एकूणच आयुष्य़ाच्या गदारोळातही तिच्या लेखनात ब्लॉगपूर्व काळातला ’धीमेपणा, अखंडपणा, शांतता’ आहे. यात स्वगतं, स्वसंवाद आहे. विलक्षण शब्दकळेमुळे जखडून ठेवणार्‍या कविता आहेत, अनेक विषयांवरची निर्भिड, विचारात पाडणारी, कधी दचकवणारी, तर कधी मनात रुंजी घालणारी मनोगतं आहेत, मौज-साधना सारख्या दिवाळी अंकांची, उत्तम पुस्तकांची खिळवून ठेवणारी परिक्षणं आहेत.
भाषेवर तिचं नितांत प्रेम असेल हे ओघाने आलंच. परंतु (10 वर्षांपासून) ’हाडाची ब्लॉगर’, जर्मन भाषांतरकार मेघना यातल्या एका भाषाविषयक लेखात स्वच्छपणे म्हणते, "प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस. याच भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात आणि मनःपूत प्रेम करता येतं. घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. म्हणून हे प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मांडणं... प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे." मेघना reshakashare.com नामक अनियतकालिकही चालवते. पुस्तकं, चित्रपट, नाटक, प्रमाणलेखन, मुद्रितशोधन आणि संपादन हे तिचे काही रसविषय.
"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..." असं कळवळून सांगणार्‍या मित्राला मेघना ब्लॉगवर सवाल करते, " म्हणजे नक्की काय रे? अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण किंवा अमुक इतके पैसे कमवले किंवा जगातल्या अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? खरं सांगू? मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस आणि जगाच्या लेखी क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते. माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे... It matters..या व्याख्या आपल्या आपण ठरवायच्या. आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा."
’कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार’ असं म्हणत अलिप्त राहू पाहणारी मेघना माणसांमध्ये कमी रमते. काही जणांबाबत तिच्या शब्दात सांगायचं तर ’एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता’ उरतेच. तरीही माणसांपेक्षा मेघना पुस्तकांमध्ये जास्त गुंतते. त्यांच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपांवर तिचं अंतर्बाह्य प्रेम आहे. एखाद्या पुस्तकाच्या उल्लेखाने पिसं लागून ते पुस्तक मिळवायचा आटापिटा करण्यातली नशा तिला मोह घालते. एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेताना त्याच्याशी एकरूप होण्याचं वरदान तिला लाभलं आहे. त्या तादात्म्यभावाला ती ’त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं’ म्हणते. ज्यातून तिच्या कविता उमटतात. परिक्षणं लिहिली जातात.

यात नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र, विजया मेहतांवरचं ’बाई’ इ. पुस्तकांची पठडी सोडून लिहिलेली परिक्षणं आहेत. वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगू पाहणारं पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार असं ती स्पष्टपणे म्हणते. शुभांगी गोखलेंचं ’रावा’ तिला ’जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे पण फार जवळचं, आत्मीय’ वाटतं. हॅरी पॉटर कथा-मालिकेच्या अतिसामान्य शेवटाबद्दल लिहिते," छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला. बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं. अखेर हॅरीला पूर्ण भाग गेलाच. फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो."
इंग्रज लोक ’नेटीव्हां’कडे पाहत तसं बहुतेक नास्तिक लोक आस्तिकांकडे पाहतात. कर्मकांडांना स्वत:पुरता ठाम नकार देत मेघना म्हणते," श्राद्ध ! जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय? म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी." तर एका लेखात सहजपणे म्हणते, "कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली."
मेघना तिच्या लेखांमधून अनेक मुद्दे खणखणीतपणे मांडते. "बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान, प्रगतिशील ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?"
परंतु याच धर्तीवर असं म्हणावसं वाटतं, केवळ सांस्कृतिक धक्के देतो म्हणून मेघनाने लिहिलेला ’फॅनफिक्शन, स्लॅश-पॉर्न आणि मी (!)’ हा सचित्र लेख महान ठरत नाही. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकरांनी म्हटल्याचा दाखला यात मेघना देते. हे खरय की माणसाच्या काही आदिम अंत:प्रेरणा या लेखातून मुक्तपणे व्यक्त होतात परंतु गूढ अंतर्विश्वात त्याला खेचून नेणारा, अतिशय अभ्यासपूर्ण लेख असूनही तो ’अनावश्यक’ जस्टीफिकेशन देत पुढे जातोय असे वाटत राहते. तिच्या शब्दात सांगायचं तर तिचं ’कोस्टल-एलिमेंटीय-एकारान्तत्व’ तिने कितीही झुगारून दिलं असलं तरी त्याचा सूक्ष्म ताण आल्याने असेल, इतर लेखनकृतींमध्ये घेते तशी ठाम भूमिका मेघना इथे घेऊ शकत नाही. तिचा ’पॉर्न ओके प्लीज’ विशेषांकासाठी लिहिलेला, ’लावणीचं होऊ घातलेलं पॉर्नीकरण टाळायचं असेल, तर जनांनाच मार्मिक व्हावं लागेल..’ हे आवाहन करणारा लेख मात्र तिच्या साक्षेपी लेखनाचा उत्तम नमुना आहे.
"कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद..” एखाद्या लेखाला सुरूवात करताना काय वाटतं हे असं मेघनाइतकं नेमकेपणाने कुणी सांगितलेलं नाही. तिच्या आणि आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे याचा सोलीव अनुभव देणार्‍या तिच्या कवितांबद्दल खरं तर लिहूच नये, त्या अनुभवाव्यात. वाचनात कधीतरी तिच्या एका कवितेचा हा तुकडा आला आणि हे भन्नाट रसायन काय आहे ते समजून घेण्याची अनिवार इच्छा झाली.
"टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर....
फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर... "

No comments:

Post a Comment