Friday, November 24, 2017

’ब्लॉग ’ती’ चा - यूथ करी

हा ब्लॉग आणि पुढे तिचं एकूणच लेखन तरूणाई डोक्यावर घेईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. ’ब्लॉग सुरू केलाय- कसा वाटला ते सांगा’, असं तिने फक्त दोन जिवलग मैत्रिणींना सांगितलं होतं. अर्थात ’मी जे काही करते ते अगदी प्राणपणाने’ असं ती म्हणते. ’ती’ म्हणजे ’स्टे हंगरी स्टे फूलीश’ #StayHungryStayFoolish या ३ लाखांहून अधिक प्रतींचा खप असलेल्या, ८ भारतीय भाषांमधून अनुवाद झालेल्या प्रसिद्ध पुस्तकाची लेखिका रश्मी बंसल. IIM अहमदाबाद मधून एमबीए झालेल्या २५ जणांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या सोडून देऊन उद्योजक होण्याचा ध्यास घेतला. त्यांचा खाचखळग्यांनी भरलेला पण अद्भुत प्रवास मांडणारं हे पुस्तक. यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यातली ज्ञानपिपासा कायम प्रज्वलित असायला हवी, हा या पुस्तकातला मूलमंत्र. तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेली रश्मी स्वत: देखील IIM ची एमबीए आहे. सोशल मिडीया आणि http://youthcurry.blogspot.in/
या ब्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जुळलेली आहे. युवाविश्वाला आपली वाटेल अशी उत्फुल्ल आणि चुरचुरीत हिंग्लीश भाषा, चपखल केस स्टडीज आणि उद्योग जगताची खोलवर जाण या त्रिसूत्रीवर तिचं लेखन बहरतय. ब्लॉगलेखन हा आता केवळ तिचा छंद राहिलेला नाही. जुन्या वाचकांना गुंतवून ठेवण्याची आणि वाचक नसलेल्यांना तिच्या लेखनाकडे आकर्षित करण्य़ाची ती एक डिजिटल मार्केटिंगची #DigitalMarketing क्लृप्ती आहे.


आपण आवडीचं काम करताना, स्वैपाक करताना किंवा स्नान करताना गुणगुणतो ते काही कुणी आपला म्युझिक अल्बम काढणारेय म्हणून नाही. तुम्ही जे काही करता ते इतकं मनापासून असेल, त्यातला आनंद तुम्हाला गवसला असेल तर पुढचं सगळं आपोआप घडतं. ’द इंडिपेंडंट’ आणि टाईम्स मध्ये पत्रकारिता केलेल्या रश्मीने लेखन हीच आपली पॅशन असल्याचं ओळखलं. ’गॉड्स ओन किचन’ या ताज्या पुस्तकासह तिच्या इतर ६ पुस्तकांचा खप देखील तडाखेबंद आहे. JAM – #JustAnotherMagazine या प्रसिद्ध नियतकालिकाची ती प्रणेती आहे. या सार्‍यात ब्लॉगवरील ताज्या लेखांची संख्या रोडावत चालली असली तरी एकूण ब्लॉग्जची संख्या आणि गुणवत्ता जबरदस्त आहे.

एका उद्योजक स्त्रीच्या वाटेत येणारे काचेरी अडसर केव्हाच भेदून पलीकडे गेलेल्या रश्मीची ब्लॉगवरच्या विषयांची निवड तिचा प्रचंड आवाका दाखवणारी आणि अवाक करणारी आहे. उद्योगक्षेत्रातल्या चालू घडामोडींवर दृष्टीक्षेप आहे. करियरबद्दल टिप्स आहेत. पालकत्व आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य़ आहे. प्रवासवर्णनं आहेत. लोकप्रिय परदेशी आणि देशी टीव्ही शो, नामांकित हिंदी-इंग्लीश चित्रपट, गाजलेली पुस्तकं या सार्‍यांचं परिक्षण यात आहे. बहुतेक लेख आटोपशीर, मोबाईलच्या एका स्क्रीनवर मावणारे कारण रश्मीचं कॉर्पोरेट गणित अगदी पक्कं आहे.
इंजिनीयर झालेल्या वा होऊ घातलेल्या तमाम मुलींनी ’बन्नो तेरा बी-टेक लागे सेक्सी’ हा रश्मीचा लेख अवश्य वाचावा. एनआरआय मुलगा पटकवायला सोपं जावं म्हणून, समाजात पत वाढविण्यासाठी, केवळ करियर करण्य़ासाठी की इतर पदवीधरांपेक्षा वेगळी तांत्रिक समज आणि उंची गाठावी म्हणून! नक्की कशासाठी आपण ही पदवी घेत आहोत याचं आत्मपरिक्षण केलं तरच करिअरच्या गगनाला गवसणी घालता येते हे रश्मी या लेखात सडेतोड पण खुसखुशीत शब्दात सांगते.

बर्‍याच लेखातून तिचे बी-स्कूल चे अनुभव समोर येतात. केबीसी शो मागचं अर्थकारण ती मांडते. पदव्या खिरापतीसारख्या वाटणार्‍या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढताना ती पदवीपलीकडच्या जीवनशिक्षणावर भर देत लिहिते, "कायम पहिलं येणं म्हणजेच यश नव्हे. दुसरं येणं ही त्याआधीची महत्वाची पायरी आहे हे समजून घेऊन पुढच्या संधीसाठी तुम्ही स्वत:ला अधिक सक्षम करणार की नाही!". मास्टरशेफ या मूळ ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रमाचं उदाहरण या संदर्भात देत ती लिहिते," सामान्यांना त्यांच्यातलं असामान्यत्व शोधायला उद्युक्त करणं हे या शो चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. मर्यादित साधनांमध्ये, ठराविक वेळेत ध्येय गाठण्यासाठी ज्या विजीगिषु पद्धतीने स्पर्धक आव्हान स्वीकारतात, चुकतात, थकतात, पुन्हा प्रयत्न करतात, धडपडतात आणि अंतिमत: खोलवर लपलेला आत्मविश्वास खेचून बाहेर काढतात तो आत्मशोधाचा क्षण म्हणजेच परिपूर्ती नाही का! मग तुम्ही ती स्पर्धा जिंकता की नाही हे तितकसं महत्वाचं नाही. तुम्ही जिंकलेलेच असता. यशस्वी व्हायचं तर पदव्या आणि प्रमाणपत्राच्या पलीकडे जाऊन आयुष्यात काय काय करायला लागतं त्याची ही एक सुरेख झलक आहे."

फ्लिपकार्ट #Flipkart आणि मैंत्रा या कंपन्या मर्ज झाल्या. दोन्ही कंपन्यांचे मालक बंसलच. या पार्श्वभूमीवर आऊटलुकसाठी लिहिलेला ’बी फॉर बफे, बी फॉर बंसल’ हा तिचा लेख धमाल आहे. विशेषत: नवलेखकांनी तिच्या पुस्तकांच्या जन्मकथा वाचायलाच हव्यात. तिची पुस्तक परिक्षणे म्हणजे ’व्यामिश्र अनुभूती’ टाईप शब्दातली समीक्षा नसून गप्पाटप्पा आहेत. ती ओड टू इंडिया हे विडंबन काव्य लिहिते. नेमक्या शब्दात प्रवासाबद्दल लिहिते. उदा: केरळ काय चीज आहे हे तिच्या या ४ ओळीतून कळतं. "इतकं सुंदर आणि स्वच्छ बॅकवॉटर, मग स्थानिक लोक त्यांचा कचरा कुठे बरं टाकत असावेत. आपण उर्वरित प्लास्टिकबॅग प्रेमी भारतीय चार बर्‍या गोष्टी केरळकडून आजवर का शिकलो नाही?, केळं वाफवून, काचर्‍या तळून किंवा परतून कसंही खा. उत्तम लागतं, केरळ म्हणजे सोनं, सोनं, आणखी सोनं, केरळमधल्या बसेसना काचेच्या खिडक्या नाहीत! सदानकदा आंदोलन करणार्‍यांनी त्या शिल्लक ठेवल्या नसाव्यात."
एनसीपीए ला पाहिलेल्या वुडहाऊसच्या पात्रांवरचं नाटक, लिलेट दुबे, नसीरुद्दीन शाह सारख्यांची चर्चेतली नाटकं याबरोबरच स्पॉटलाईट, लिंकन, शेफ असे बरेच हॉलिवूड सिनेमे किंवा दंगल, भाग मिल्खा भाग या सारखे भारतीय मातीतले चित्रपट, अशा कितीतरी कलाकृतींवर इथे झकास लेख आहेत. रश्मी म्हणते, "भारतीय प्रेक्षकांना स्वयंप्रकाशी काजव्यासारख्या सत्यापेक्षा त्याचं भव्यदिव्य सादरीकरण जास्त भावतं. ’कहानी मे ट्विस्ट’ तर असलाच पाहिजे. मग मुळात अंतिम शर्यतीत कधीही मागे वळून बिळून न पाहिलेल्या मिल्खा सिंगला त्याची हार सुद्धा ’हटके’ वाटावी म्हणून पडद्यावर तसं करावं लागतं. मेरी कोमच्या बॉक्सींग विश्वस्पर्धेच्या वेळी प्रत्यक्षात घराच्या अंगणात मजेत बागडणार्‍या तिच्या मुलाला, पडद्यावर मात्र त्याची आई जगज्जेतेपदासाठी झुंज देत असताना कंपल्सरी गंभीर आजारी पडून प्राणांशी झुंज द्यावी लागते. काय सांगता यापेक्षा कसं सांगता हेच मह्त्वाचे." पुढे रश्मी मिस्कीलपणे लिहिते," मलाही कधी कधी माझ्या पुस्तकातल्या लहान मोठ्य़ा उद्योजकांना थेट सुपरमॅन बनवून टाकावसं वाटतं. पण मंडळी कल्पनाराज्यातला विहार अल्पजीवी असतो. स्वत:ची जमीन निर्माण करून त्यावर स्वत:ची मोहोर उमटवण्यातलं थ्रील उमगणं हे खरं जगणं."

रश्मी मोकळेपणाने सांगते," मी मध्यमवर्गातून आले आहे. मध्यमवर्ग म्हणजे मूल्य जपणं, चौकटीत जगणं आणि जपून खर्च. आज माझी राहणी तितकीशी साधी नाही. जीवनमान बदललय. मला भरपूर पैसा हवा आहे पण तो योग्य तिथेच खर्च व्हावा याचं भान मला आहे कारण मूल्यबैठक तीच आहे. मी आता एका नव्या मध्यमवर्गाची प्रतिनीधी आहे याचा मला अभिमान वाटतो."
रश्मी यशस्वी लोकांची उदाहरणं खूप देते पण उद्योगविश्वातल्या, आस्थापनेपासून उत्पादन निर्मितीपर्यंत आणि दर्जा तपासणीपासून विपणनापर्यंतच्या प्रवासात येणार्‍या दैनंदिन समस्या कशा पद्धतीने सोडवायला हव्यात याबद्दल रश्मीच्या लेखनातून फार काही हाती लागत नाही असा आक्षेप तिचे टीकाकार घेतात. रश्मी त्यावर म्हणते, "हे अडथळे स्थळ-काळ-व्यक्तीपरत्वे बदलतात. तेव्हा दृष्टीकोन बदला. सकारात्मक व्हा. फक्त उद्याच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातमीत नाव झळकावं म्हणून धडपडण्यापेक्षा असं काही तरी करा की इतिहासातलं एक तरी पान तुमच्या नावे लिहिलं जाईल."

Friday, November 17, 2017

ब्लॉग ’ती’ चा - मेघनाचा एको पॉईंट

‘रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात. एकाच वेळी इतक्या आत्ममग्नतेने आणि बेधडकपणे जगण्याकडे खरच पाहता येतं का! येतं, http://meghanabhuskute.blogspot.in/ हा ’मित्रांना’ उद्देशून लिहिलेला ब्लॉग वाचताना हे अद्भुत रसायन अनुभवता येतं. 
आपण प्रचंड ’रसिक, सुजाण’ वगैरे आहोत, 'संस्कृतीच्या जपणुकीची धुरा आपल्यालाच वाहायची आहे', अशी चौकटीत जगणार्‍या वर्गाची ठाम समजूत असते. मेघना भुस्कुटेचा ब्लॉग वाचताना अशा बर्‍याच इमल्यांना धक्के बसतात, कधी थेट भगदाडं पडतात. मेघना मात्र तिच्या ब्लॉगलेखनाकडे ’जगातलं शक्य तितकं शोषून-चाखून बघण्याच्या माझ्या शैलीत मांडलेले, वागताना होत जाणारे आपले असंख्य प्रामाणिक तुकडे’ या नजरेने पाहते. माध्यमांच्या आणि एकूणच आयुष्य़ाच्या गदारोळातही तिच्या लेखनात ब्लॉगपूर्व काळातला ’धीमेपणा, अखंडपणा, शांतता’ आहे. यात स्वगतं, स्वसंवाद आहे. विलक्षण शब्दकळेमुळे जखडून ठेवणार्‍या कविता आहेत, अनेक विषयांवरची निर्भिड, विचारात पाडणारी, कधी दचकवणारी, तर कधी मनात रुंजी घालणारी मनोगतं आहेत, मौज-साधना सारख्या दिवाळी अंकांची, उत्तम पुस्तकांची खिळवून ठेवणारी परिक्षणं आहेत.
भाषेवर तिचं नितांत प्रेम असेल हे ओघाने आलंच. परंतु (10 वर्षांपासून) ’हाडाची ब्लॉगर’, जर्मन भाषांतरकार मेघना यातल्या एका भाषाविषयक लेखात स्वच्छपणे म्हणते, "प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस. याच भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात आणि मनःपूत प्रेम करता येतं. घरात हक्कानं पाय पसरून बसल्यासारखं वाटतं. मनातले सैरावैरा बेशिस्त विचार नीट ओळीत लावताना, ही भाषा माझ्या मेंदूशी नीट जुळवून घेते. म्हणून हे प्रमाण-अप्रमाण भाषेबद्दलचे नि नियमांबद्दलचे वाद घालणं, कोश हुडकणं, ते अद्ययावत व्हावेत म्हणून खटपटणं. पाण्यानं उताराकडे धाव घ्यावी तसं आपोआप गोष्टी भोगणं, शोषणं, अनुभवणं, मांडणं... प्रश्न प्रेमाचा नाही, अस्तित्वाचाच आहे." मेघना reshakashare.com नामक अनियतकालिकही चालवते. पुस्तकं, चित्रपट, नाटक, प्रमाणलेखन, मुद्रितशोधन आणि संपादन हे तिचे काही रसविषय.
"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..." असं कळवळून सांगणार्‍या मित्राला मेघना ब्लॉगवर सवाल करते, " म्हणजे नक्की काय रे? अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण किंवा अमुक इतके पैसे कमवले किंवा जगातल्या अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? खरं सांगू? मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस आणि जगाच्या लेखी क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते. माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे... It matters..या व्याख्या आपल्या आपण ठरवायच्या. आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा."
’कष्टानं उभी केलीय सगळी तटबंदी. आता कुणाला इतक्या सहज सुरुंग नाही लावू देणार’ असं म्हणत अलिप्त राहू पाहणारी मेघना माणसांमध्ये कमी रमते. काही जणांबाबत तिच्या शब्दात सांगायचं तर ’एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता’ उरतेच. तरीही माणसांपेक्षा मेघना पुस्तकांमध्ये जास्त गुंतते. त्यांच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही स्वरूपांवर तिचं अंतर्बाह्य प्रेम आहे. एखाद्या पुस्तकाच्या उल्लेखाने पिसं लागून ते पुस्तक मिळवायचा आटापिटा करण्यातली नशा तिला मोह घालते. एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेताना त्याच्याशी एकरूप होण्याचं वरदान तिला लाभलं आहे. त्या तादात्म्यभावाला ती ’त्यातून माझ्याही आयुष्यात उद्दाम प्रदीर्घ बहरत गेलेली सूर्यफुलांची शेतं’ म्हणते. ज्यातून तिच्या कविता उमटतात. परिक्षणं लिहिली जातात.

यात नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र, विजया मेहतांवरचं ’बाई’ इ. पुस्तकांची पठडी सोडून लिहिलेली परिक्षणं आहेत. वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगू पाहणारं पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार असं ती स्पष्टपणे म्हणते. शुभांगी गोखलेंचं ’रावा’ तिला ’जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे पण फार जवळचं, आत्मीय’ वाटतं. हॅरी पॉटर कथा-मालिकेच्या अतिसामान्य शेवटाबद्दल लिहिते," छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला. बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं. अखेर हॅरीला पूर्ण भाग गेलाच. फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो."
इंग्रज लोक ’नेटीव्हां’कडे पाहत तसं बहुतेक नास्तिक लोक आस्तिकांकडे पाहतात. कर्मकांडांना स्वत:पुरता ठाम नकार देत मेघना म्हणते," श्राद्ध ! जाणाऱ्याच्या अभावानं उभी राहिलेली राक्षसी पोकळी कशी स्वीकारायची त्यांनी? कुठल्या ठाम दगडावर टाच रोवून स्थिर करायचे कापणारे पाय? म्हणूनच असत असली पाहिजेत कर्मकांडं. दु:खाची कधीही न पुसता येणारी लाखबंद मोहर कपाळी उमटवण्यासाठी." तर एका लेखात सहजपणे म्हणते, "कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली."
मेघना तिच्या लेखांमधून अनेक मुद्दे खणखणीतपणे मांडते. "बायका फक्त बायका आहेत म्हणून त्या करतील ते ते आपोआपच महान, प्रगतिशील ठरतं; या गृहितकाची जिम्मा मी तरी अल्पसंख्याकांचं नेहमीच बरोबर आणि ते कायमच सहानुभूतीस लायक, दलित साहित्य चाकोरीबाहेरचं असल्यामुळे थोर, योनी या निषिद्ध शब्दाभोवती फिरणारं नाटक केलं म्हणून ते आपोआपच चांगलं - असल्या समीकरणांमधेच करते. मग महिलादिनाचं आणि ’त्या होत्या म्हणून आम्ही आहोत’चं प्रयोजन काय?"
परंतु याच धर्तीवर असं म्हणावसं वाटतं, केवळ सांस्कृतिक धक्के देतो म्हणून मेघनाने लिहिलेला ’फॅनफिक्शन, स्लॅश-पॉर्न आणि मी (!)’ हा सचित्र लेख महान ठरत नाही. जे जे अनावश्यक, ते ते अश्लील, असं तेंडुलकरांनी म्हटल्याचा दाखला यात मेघना देते. हे खरय की माणसाच्या काही आदिम अंत:प्रेरणा या लेखातून मुक्तपणे व्यक्त होतात परंतु गूढ अंतर्विश्वात त्याला खेचून नेणारा, अतिशय अभ्यासपूर्ण लेख असूनही तो ’अनावश्यक’ जस्टीफिकेशन देत पुढे जातोय असे वाटत राहते. तिच्या शब्दात सांगायचं तर तिचं ’कोस्टल-एलिमेंटीय-एकारान्तत्व’ तिने कितीही झुगारून दिलं असलं तरी त्याचा सूक्ष्म ताण आल्याने असेल, इतर लेखनकृतींमध्ये घेते तशी ठाम भूमिका मेघना इथे घेऊ शकत नाही. तिचा ’पॉर्न ओके प्लीज’ विशेषांकासाठी लिहिलेला, ’लावणीचं होऊ घातलेलं पॉर्नीकरण टाळायचं असेल, तर जनांनाच मार्मिक व्हावं लागेल..’ हे आवाहन करणारा लेख मात्र तिच्या साक्षेपी लेखनाचा उत्तम नमुना आहे.
"कोर्‌या कॅनव्हाससमोर उभ्या राहिलेल्या चित्रकाराला किंवा सोत्कंठ प्रेक्षागारासमोर उभ्या ठाकलेल्या एकाकी नटाला नेमकं काय वाटत असेल याचा शतांशानं का होईना, पण अनुभव देऊन जातो हा कोरा कागद..” एखाद्या लेखाला सुरूवात करताना काय वाटतं हे असं मेघनाइतकं नेमकेपणाने कुणी सांगितलेलं नाही. तिच्या आणि आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे याचा सोलीव अनुभव देणार्‍या तिच्या कवितांबद्दल खरं तर लिहूच नये, त्या अनुभवाव्यात. वाचनात कधीतरी तिच्या एका कवितेचा हा तुकडा आला आणि हे भन्नाट रसायन काय आहे ते समजून घेण्याची अनिवार इच्छा झाली.
"टोक काढल्या जाणार्‍या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर....
फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर... "

Friday, November 10, 2017

ब्लॉग ’ती’ चा - इंद्रधनु


समविचारी सख्यांचा समूहब्लॉग- इंद्रधनु

'सुखदुःखांचे, हळवे, कातर, हसरे, दुखरे, क्षण जपलेले.
श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे.
प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु.
त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू...'
असं म्हणत एकत्र आलेल्या मैत्रिणींना समूह-ब्लॉग लिहावासा वाटणं आणि ’स्त्री’ म्हणून आपल्या जाणीव-नेणीवांचे पदर उलगडत तो तब्बल ८ वर्ष लिहिता-वाहता ठेवणं हे मला विशेष महत्वाचं वाटतं. स्त्रीवादी पवित्रा न घेताही स्वत:चा शोध घेणारा हा ब्लॉग आजच्या सुशिक्षित मध्यमवयीन शहरी स्त्रीच्या मनोव्यापारांची नोंद घेतो. विद्या कुळकर्णी, अश्विनी केळकर, दीपश्री मुद्गल, वैशाली भिडे, स्मिता पाटकर, आशा कुलकर्णी, आणि वाचक यांचा मिळून हा ’ब्लॉग माझा २०१२’ पुरस्कारप्राप्त ब्लॉग ’इंद्रधनु’ http://asvvad.blogspot.in/ 
 या लिंकवर उपलब्ध आहे.

या पुण्यात राहणार्‍या मैत्रिणी सुखवस्तू आणि उच्चशिक्षित आहेत. अशा स्थानावरून कुणी स्त्री व्यक्त होत असेल तर त्याकडे ’काही नाही, सुख दुखतय यांना’ असं पाहणारे असले तरी त्या ’लोकेशन’पलिकडे जाऊन माणूस म्हणून तिला संवेदनशीलपणे समजून घेणारेही असतात. या ब्लॉगवर सर्वाधिक लेख लिहिणारी विद्या म्हणते," माझं लेखन हे माझं वय, माझं घडणं, माझी जात- वर्ग- वर्ण, मी ज्याचा भाग आहे तो आजूबाजूचा समाज, त्यातलं माझं स्थान, तिथून मला दिसणारं जग, याला तोडून नसणार आहे. माझ्या बिंदूवरून शक्यतो सगळीकडे पाहायचा प्रयत्न करीत मी लिहिते आहे. बाईला आत्मसन्मानाने जगायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे."
या ’ब्लॉगवर अनेक स्त्रीकेंद्री विषयांचा परामर्ष घेतलेला आढळतो. ’सांभाळण्यासाठी मने, माझे गिळावे मीपण.. ’ अशी इंदिरा संतांच्या शब्दातली खंत इथे नाही. पुरूषविरोधी सूर कुठेही नाही. ’दरवेळी भाजतंच असं नाही..पण धग असतेच आसपास’ हा कल्पना दुधाळ यांच्या शब्दातला वास्तवाचा स्वीकार मात्र आहे. तरीही ’मी पण’ अबाधित राखून या आजच्या स्त्रिया स्वत:कडे, नातेसंबंधांकडे आणि एकूणच भवतालाकडे नव्या स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतायत. हे सारं अतिशय मृदुपणे, कटूता टाळून, अनलंकृत शब्दातून, संवादी पद्धतीने समोर येतं.
काही लेखांमधून या मैत्रिणी बघण्य़ात आलेले हटके सिनेमे, नाटक यातलं वेगळेपण मांडतात, आपली सौंदर्याची तसच स्वातंत्र्याची व्याख्या तपासतात. आशा लिहिते, "प्रत्येक स्त्रीलाच ‘झाशीची राणी’ किंवा ‘किरण बेदी’ बनणे कदाचित आवडणारही नाही. काही स्त्रिया आवडीने आपल्या कर्तृत्वासाठी पारंपारिक क्षेत्रच निवडतील/निवडतात. पण निवडीचे स्वातंत्र्य/आधिकार स्त्री ला हवा हे महत्त्वाचे!" अर्थात आपण एखाद्या स्त्रीचं तिच्या आयुष्याबाबतचं स्वातंत्र्य मान्य करतो का हा प्रश्न ’लंच बॉक्स’ या चित्रपटाबद्दल दीपश्रीने लिहिलेल्या लेखातून उपस्थित होतो. ती लिहिते, "गृहिणी म्हणून समाजाच्या असलेल्या मर्यादा संभाळणा-या, जोडीदाराकडून अपेक्षित असणा-या भावनिक समाधान देणा-या गोष्टी दुस-या कोणा पुरुषाकडून मिळवणा-या, अश्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व इला ही व्यक्तिरेखा करते. सिनेमाची कथा म्हणून आपल्याला हे पटेलही, आवडेल सुद्धा. पण प्रत्यक्षात एखादी स्त्री आपल्या अवतीभोवती अशी असेल तर याकडे आपण कसे बघतो ते महत्वाचे. नाही का ?"
घरातल्या भांड्यांकुंड्यांवर सुद्धा कायम घरातल्या कर्त्या पुरूषाचच नाव घालायच्या प्रथेत आता होऊ लागलेला बदल वैशालीने एका लेखात टिपला आहे. अंगात येणं, देवधर्म-व्रत वैकल्य यावर या ब्लॉगवर स्पष्टपणे मत मांडलेली आहेत. वैशाली लिहिते, "एखाद्या बाईच्या अंगात येणं म्हणजे जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच." विद्या लिहिते, "आपण आपल्या सणवाराच्या, साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात. त्यात गंमत, मजा ही तर हवीच पण हे सारं समतेच्या पायावर उभं असायला हवं. परंतु आपल्या समाजातील समता कशी आहे? बायका पौरोहित्य करायला लागल्या. त्याने समाज पुढे गेला का? नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे. बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे त्यासाठी आदर्श बदलले पाहिजेत."
स्वयंपाक, स्त्री चं कमावणं, जगण्याच्या प्रवासात लक्षात राहिलेल्या बायका याविषयीची मनोगतंही या ब्लॉगवर लिहिलेली आहेत. एखाद्या लेखात स्वत:चा मन:पूत स्वीकार करायला शिकवणार्‍या आणि जगण्य़ातलं शहाणपण ओंजळीत टाकणार्‍या, ’यू कॅन हील युवर लाईफ’ ची लेखिका लुईस बद्दल विद्या कृतज्ञभावाने लिहिते. स्त्री-पुरूष मैत्रीबाबत आणखी एका लेखात मत मांडते, "जिवलग मित्र असण्याचा एक फायदा आहे की नवर्‍याला किंवा इतर पुरूषांना समजून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. अनुभवाचं वर्तूळ वाढवता येऊ शकतं. परंतु आपल्याकडे स्त्री-पुरूष मैत्रीचा काय इतिहास आहे? कृष्ण-द्रौपदी वगळता मला अशी मैत्री दिसत नाही."
दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयांपासून बलात्काराची भीती, बाल-लैंगिक अत्याचारापर्यंत, मनाच्या तळाशी गाडलेले अनेक ’का?’ इथे खुलेपणाने चर्चिले जातात. बालपणी जाणवले, साहिले त्यावर या माध्यमातून व्यक्त होऊन या सख्या मोकळा श्वास घेतात. अश्विनी तिच्या ताज्या लेखात दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशातल्या एका रेसॉर्ट वर भेटलेल्या परदेशी तरुणीबद्दल लिहिते. दिवसभर निवांतपणे भटकून रात्री काळोखात निर्भयपणे परत येणारी ही एकटी तरुणी पाहून अश्विनी विचार करतेय.. "असं खुल्या दिलानं, आजुबाजूच्या जगावर विश्वास टाकून, मोकळं होऊन एकटं हिंडणं आपल्याला यापुढेतरी कधी जमेल?"

स्मिताच्या लेखातून अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला जातो, "आजच्या आपल्या पिढीत पूर्वीपेक्षा बाईपणाची ओझी बरीच कमी झाली आहेत. आपली ती झुगारून द्यायची क्षमता पण वाढली आहे. पण त्यामुळे नवी ओझी तर निर्माण होत नाही आहेत ना? साधं मासिक पाळीचं उदाहरण घेऊ या, ५०% समाजाची ही दर महिन्याची शारीरिक अवस्था आहे तर त्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे असं आपण का वागतो?"
विद्या लिहिते," विवाहितेपेक्षा प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं ओझं जास्त असतं. कायम शरीराचं भान ठेवायचं, आपण एकातरी मुलाला जन्म दिला पाहिजे याचं, अगदी वॉशरूमला जाऊन येण्याचा कार्यक्रम बाहेर कसा पार पाडायचा याचं बायकांना ओझं असतं. कधी माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना या खोलवरच्या भीतीचं एक ओझं घेऊन बायकांना जगायला लागतं."
परंतु पुरूष म्हणूनही जगतानाही अनेक ओझी वाहावी लागतात याची जाण त्यांना आहे. या ब्लॉगचा वाचक सचिन लिहितो, शालेय जीवनात मी पुरूष आहे; किंबहूना मी ‘बायल्या‘ नाही, हे सिद्ध करण्याचं खूप मोठे ओझे घेऊन मी जगलो, अजून एक ओझं ‘कर्ता‘ असण्याचं."
नीरज लिहितो, "पुरुषासारखा पुरुष, आणि घाबरतोस काय" हे ही नक्कीच एक ओझं आहे. तर मिलिंद लिहितो, मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच जे शोषित/वंचित आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे."
एकूणच ही चर्चा म्हणजे सर्वंकष विचार कसा करावा याचा सुरेख नमुना आहे.
अर्थात या ब्लॉगवर अनेक महत्वाचे विषय अद्याप यायला हवे आहेत, स्वानुभवाचं सच्चेपण असलं तरी ती अनेकदा लेखाची मर्यादा ठरते. नवरात्रात नऊ रंग वापरण्य़ाच्या नव्या प्रथेवरची टीका किंवा काही आक्षेप वाचताना प्रत्येक कृती व्यक्तीस्वातंत्र्याच्या तागडीत घालून मोजण्याने त्यातला निखळ आनंद गमावला जात नाही का असंही वाटतं. त्याचबरोबर विद्या म्हणते तसं, विचारांच्या गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार याचं नेमकं भान हा ब्लॉग देतो. यावर उद्धृत केलेल्या जावेद अख्तर यांच्या कवितेतून आपली जगण्याविषयीची समजूतही वाढवतो.
" हे जग पुरूषांचं नाही की बाईचं नाही,
दोघांचं मिळून आहे...
हे जाणणार्‍या पुरूषा.......
तू खरा मर्द आहेस!"

Friday, November 3, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - मीच माझा मोर

’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या माझ्या तरुण भारत- आकांक्षा मधील स्तंभातला आजचा लेख
गोव्यातल्या कुंकळ्ळीसारख्या छोट्या गावातून आलेल्या शेफाली वैद्य आज स्टार ब्लॉगर आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी आणि आंतरजालावरच्या विविध क्षेत्रांत त्या काम करतायत.
हजारो चाहत्यांना भावणारा, त्यांचा आत्मविश्वास जागवणारा शेफाली यांचा लेखनप्रवास विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोमाने आणि डौलात सुरू आहे. त्यातल्या वाटा, वळणांचा वेध घेणार्‍या त्यांच्या ब्लॉगबद्दल....
मीच माझा मोर - शेफाली वैद्य #ShefaliVaidya
समस्त भारतीय मूढ असून त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आपल्याच शिरावर असल्याच्या भ्रमात असलेल्या दोन्ही टोकाच्या मंडळींमध्ये एक सरळमार्गी गट समाजात मोठय़ा प्रमाणावर असतो. जगातल्या इतर देशांप्रमाणे भारतातही प्रचंड चांगल्या- वाईट उलथापालथी होत आहेत. परंतु फक्त नकारात्मक घटनांना अधोरेखित करून इतकी अस्वस्थता पसरवली जातेय की आपण भारतीय आहोत याचा त्याला न्यूनगंडच वाटू लागतो. अशा वेळी शेफाली वैद्य यांच्या http://mahamtb.com/authors/shefali_vaidya.html
 या ब्लॉगवरचा एखादा सणसणीत, चैतन्यदायी लेख ’तू चाल पुढं.. तुला रं गड्या भीती कुणाची’ म्हणत समोर येतो आणि कोणत्याही एका ध्रुवाला शरण न जाताही त्याला मोकळा श्वास घेता येतो.

जुन्यातलं कालबाह्य ते त्यागून, नव्यातलं योग्य ते निवडून आणि दोहोंचा समन्वय साधून आनंदाने जगता येऊ शकतं हा विश्वास देणार्‍या आणि कदाचित त्यामुळेच सोशल माध्यमांवर तब्बल ऐशी ते नव्वदहजार फॉलोअर्स (ज्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे) असलेल्या स्टार ब्लॉगर, पुण्याच्या शेफाली वैद्य. संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शेफाली मराठी, इंग्लीश आणि कोंकणीतूनही तितक्याच सफाईने रंजक पण परखड लेखन करतात. राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच पालकत्व, प्रवास, शिल्पकला आणि साडी या त्यांच्या आवडत्या वस्त्रप्रकाराबद्दल त्या सातत्याने उत्तम लिहितात. तरीही भारतीय अस्मिता जागृत ठेवणारं प्रखर लिखाण ही त्यांची खरी ओळख आहे.
पुरोगामी म्हणजे समाजाचं भलं चिंतणारा सुधारणावादी. परंतु या बिरूदाखाली केवळ द्वेषाचं राजकारण करणार्‍या अनेक स्वघोषित विचारवंतांचा समाचार घेत शेफाली घणाघाती लेखन करतात," 'मंगळसूत्र घालणं ही मानसिक गुलामगिरी आहे' म्हणणारे हेच लोक 'बुरखा घालणं हा मुसलमान स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे' हे ही तितक्याच जोरकसपणे सांगत असतात. दिवाळीला इतका खर्च करण्य़ाची गरज काय हा सामाजिक प्रबोधनपर संदेश स्वत: सीसीडीत अडीचशे रुपयांची कॉफी पीत आपल्या आय-फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. काही प्रथांमध्ये अनावश्यक फाफटपसारा आलाय हे खरय. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक मूल्यपद्धतीप्रमाणे सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका."
तथाकथित पुरोगामींना 'लव्ह जिहाद' ही संकल्पनाच अमान्य आहे तर अंध प्रतिगामींना प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा 'लव्ह जिहाद' वाटतो. शेफाली वैद्य यांचे या विषयावरील संतुलित आणि अभ्यासपूर्ण लिखाण या ब्लॉगवर आहे. त्या लिहितात, "भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. ही पद्धत टाळून बिगरमुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद'. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरूनच एनआयएला चौकशीचा आदेश दिला आहे. घटनेनुसार आपला जोडीदार निवडायचा अधिकार कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला असायलाच हवा, पण धर्मांतर म्हणजे काय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अश्या विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते आहे का? तलाक देऊन हाकलून दिले तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही."
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यमं. परंतु समर्थन किंवा विरोध हे एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर मुद्द्यावर अवलंबून असावे हे भान विसरलेल्या बहुसंख्य माध्यमांचंही आज ध्रुवीकरण झालेलं दिसतय. अशा वेळेस तुम्हाला मिळणारी बातमी ही त्या त्या माध्यमाच्या धोरणानुसार ’मोल्ड’ होऊन आलेली असते. नुकतीच मुंबईत रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली. पुलाच्या बाहेर उभा असलेला एक पुरुष आत अडकलेल्या एका बाईला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता, या पाच सेकंदांच्या क्लिपच्या आधारावर काहीही शहानिशा न करता 'मरणाच्या दारात असलेल्या बाईचाही मुंबईत विनयभंग होतो' अशा स्वरूपाची सनसनाटी बातमी प्रतिष्ठित वृत्तपत्र म्हणवणाऱ्या मीडिया कंपनीने प्रसिद्ध केली. "भारत हा देश स्त्रियांसाठी सुरक्षित नाही असे चित्र जगभरात पसरवणे हे असल्या कुटिरोद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांचे प्रमुख काम. तो पुरूष त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे उघड झाल्यावर ती बातमी मागे घेण्याची नामुष्की त्या वृत्तपत्रावर ओढवली." अशा सडेतोड शब्दात टीआरपीच्या हव्यासापोटी केलेला उद्योग शेफाली सप्रमाण उघड करतात. भारताबाबत खोटी बढाई मारणार्‍या माध्यमांचे तसेच प्रतिगाम्यांचे कान धरताना मात्र त्या फारशा आढळत नाहीत. तसे घडल्यास उलट त्यांच्या लोकप्रिय लिखाणाची विश्वासार्हता अधिक वाढेल.
गुरमेहेरचं काय करायचं?, गोरक्षक, सत्य आणि मीडियाचा विपर्यास, उरी बसलेला घाव, शहाबुद्दीन के शोले, स्वतःची शोभा करून घेणारी डे- अशा अनेक खणखणीत लेखांतून शेफाली यांची लेखणी तळपली आहे. वर्मावर बोट ठेवल्याने दुखावलेल्या विरोधकांनी शेफाली या मोदीसरकारच्या ट्रोल आहेत असा आरोप करत दुसर्‍या बाजूला स्वत: शेफालीविरोधातही ट्रोलिंगच केले आहे. त्यामुळे असेल, किंवा स्वत:चे आनंदनिधान असणार्‍या क्षेत्रांशी वाचकांचा परिचय करुन देण्य़ासाठी असेल, शेफाली इतर विषयातील लेखनातही अधिक रस घेऊ लागल्याचे जाणवते.
’एक धागा सुखाचा’ या सदरात त्या लिहितात, "काही माणसं कशी जुनी नाणी जमवतात, पेंटिंग्स, मूर्ती, शिल्पांचा संग्रह करतात, तशी मी साड्या जमवते. माझ्या लहानपणीची खास आठवण...आईने तिचं कपाट उघडलं की जुन्या रंगीबेरंगी रेशमी साड्यांचा, वाळ्याचा, कापराचा सुंदर, संमिश्र दरवळ खोलीभर पसरायचा. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेयस नात्यांचे ताणेबाणे मला तिच्या साड्यांमधून उकलले." या सदरातील इतर लेखांतून त्या लिनन, मुगा सिल्क, शिबोरी अशा विविध साड्यांमधली कलाकारी, त्या साड्या परिधान केलेल्या स्वत:च्या देखण्या फोटोंसह विस्ताराने उलगडतात. शिल्पकथा सदरात त्या ’मध्य प्रदेशातल्या उदयगिरी गुंफांमध्ये कोरलेल्या गजाननाच्या मूर्ती पासून कांचिपुरमचे किरातार्जुनीयम, उदयगिरीचा शेषशायी नारायण, देवीची विविध शिल्प याबाबत सचित्र माहिती देत साद्यंत वर्णन करतात.
श्रीदेवीचे पुनरागमन असलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात तिने चाळीशीतली, घरातल्या सगळ्यांनी गृहीत धरलेली मध्यमवर्गीय गृहिणी, लाडू करण्याचा घरगुती उद्योग चालवणारी छोटी उद्योजिका रंगवली आहे. ’आत्मभान’ या लेखात शेफाली लिहितात, "एकजण म्हणाली- त्या सिनेमासारखा माझ्या आयुष्यात थोडाच कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस येणार आहे आता, जो मला आत्मभान मिळवून द्यायला मदत करेल? मी हसले, म्हटलं, 'तूच बन की तो फ्रेंच माणूस’". पु. शि. रेगेंच्या सावित्री ह्या पुस्तकातली राजम्मा एक गोष्ट सांगते. त्यातल्या छोट्या लच्छीला मोर सतत आपल्या अंगणात नाचावा असं वाटत असतं. पण मोर स्वच्छंदी असतो. तो अट घालतो की त्यासाठी लच्छीने स्वतः आधी आनंदाने नाचायला हवं. शेवटी मोराची वाट बघणं हे कारणच गळून पडतं आणि लच्छी स्वतःच मोर बनून आनंदविभोर होते." तारणहाराची वाट पाहण्यापेक्षा ’मीच माझा मोर’ हे शेफाली यांचं लेखन वाचत गेलं की नीटच कळतं.