महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख
Tuesday, March 1, 2022
'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख
महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख
Monday, February 28, 2022
ह्म्पीगाथा- अंतिम भाग
Anjaneyadri |
Stop after climbing 500 stairs |
तुरुतुरू उड्या मारत वर निघाला होता. गाईडने त्याला हटकून कोण-कुठला विचारल्यावर त्याने जर्मनीहून आल्याचे सांगितले. तो त्याची कॅरॅवान घेऊन जगात मनमुक्त प्रवास करत होता. दुबईहून मुंबईपर्यंत ती गाडी त्याने बोटीत घालुन आणली होती. इतके सांगून तो टुणटुण उड्या मारत वर जाऊन दिसेनासा झाला. आम्हालाही स्फुरण चढले. शाळेच्या ट्रीपला आलेली स्थानिक मुलंमुली खाली उतरताना श्रीराम आणि हनुमानाचा जयजयकार आणि कलकलाट करत आमचाही उत्साह नकळत वाढवत होती. वर पोचलो. आता दम लागल्याने ’कोरोनाबिरोना मरु दे’ म्हणत आम्ही मास्क काढून टाकले आणि मोकळा श्वास घेत माथ्यावरच्या मंदिरात प्रवेश केला. तिथे भाविकांची, पर्य़टकांची गर्दी आणि नारळांच्या ढिगासह एकूणच खूप पसारा होता.
Birdeye view from Anjaneyadri |
रामसेतूमधला पाण्यावर तरंगणारा दगड बाजूला एका पेटीत (पाण्यात तरंगत) ठेवलेला होता. आत सगळं काही शेंदरी रंगात रंगवलेलं. स्पीकरवर गाणी, भजनं सुरु होती. हनुमंत आणि अंजनीमातेचं दर्शन घेऊन बाहेर रेलींगपाशी आलो. तिथून दिसणारं हम्पीचं विहंगम आणि विलोभनीय दृश्य पाहून चढून आल्याचे चीज झाले. लख्ख उन्हात पांढरट दिसणार्या शिळांच्या वेढ्यात तुंगभद्रेची निळसर रेष लवलवत होती. बदामी, राखाडी मंदिरांचे कळस पाहून हे काय असेल, ते काय असेल वगैरे चर्चा सुरु होती. दिशांचे माझे ज्ञान दिव्य असल्याने मी त्यात भर घालण्याचा मोह आवरुन फक्त नेत्रसुख घेतले.
तापलेल्या पठारावर बरंच भटकून खाली उतरलो. चेहर्यावर थंड पाण्याचे हबकारे मारताच उत्साह परत आला. पायथ्याशी माकडांना चुकवत पूजासामान, हनुमानमूर्ती विकणार्यांची गर्दी वाढली होती. किरकोळ विक्रेत्या बहुसंख्येने बायका होत्या.
थोडे फ्रेश वाटताच पंपासरोवर आणि शबरी गुहा पाहायला गेलो. पंपासरोवर हे हिंदू धर्मातल्या पाच पवित्र मानल्या जाणार्या सरोवरांपैकी एक आहे. (मानसरोवर, बिंदू सरोवर, नारायण सरोवर, पुष्कर सरोवर आणि पंपा सरोवर) भागवत पुराणात तसा उल्लेख आहे. इथे शंकर तपश्चर्येला बसत असल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये असतो. हे सरोवर ह्म्पीजवळच कोप्पल जिल्ह्यात अनेगुंडी (अनागोंदी शब्दाचा उगम इथल्या तत्कालिन गोंधळ आणि दुरवस्थेतून झाला आहे असं वाचलंय) रस्त्यावर आहे. पंपासरोवराचे रिनोवेशन सुरु असल्याने आम्ही आत उतरलो नाही. तीर्थयात्रेची बस बाजूला उभी होती. कर्मचारी बसच्या डिकितून मोठी पातेली, बर्नर, पोती वगैर काढून यात्रेकरुंच्या स्वैपाकाची तयारी करत होते. खास पवित्र स्नानाला आलेल्या काही भाविक बायका नाराज होत तिथलं सिमेंटमिश्रीत पाणी बाटलीत भरून मनाचं समाधान करून घेत होत्या.
Archived Pampa Sarovar photo before renovation |
Lush green rice fields |
Laksmi-Nrushiha |
लक्ष्मी नृसिंह मंदिराला वेगळे आवार नाही. गाभार्यात फक्त उग्र नृसिंह आहे. मूळ मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी (ची मूर्ती) होती. आता तिचा हात तेवढा आहे. विध्वंसकांनी देवीलाही (स्त्री म्हणून !) सोडले नसावे. शेषनागावर बसलेल्या विष्णूची ही उग्र अवतारातील हम्पीतील सर्वात मोठी म्हणजे ६.७ मीटर उंच मूर्ती आहे. मोनोलिथ म्हणजे एकाच शिळेतून घडवलेली. कृष्णदेवराय यांच्या राजवटीत १५२८ मध्ये ही मूर्ती इथे स्थापण्यात आली असे म्हटले जाते.
Badavi Shivling |
लगतच बडावीलिंग किंवा शिवमंदिर आहे. बडवा म्हणजे "गरीब" आणि लिंग म्हणजे अर्थातच "शिव". याची स्थापना एका शेतकरी महिलेने केली होती असे म्हणतात. हे लिंग सुद्धा अखंड शिळेतून घडवले आहे. हे शिवलिंग अर्धवट पाण्यात बुडलेले असते. आत काळॊख असला तरी संपूर्ण मंदिर नेहमी दिवसाच्या प्रकाशाने उजळलेले असते.
Ready to climb Hemakut |
सूर्यास्त पाहायला इथून जवळच्या मातंग टेकडीवर जायचा विचार होता पण अंजनेय चढल्याने पुन्हा एवढे चढणे होईल का असे वाटू लागले. शेवटी श्रीनिवासने आम्हाला तुलनेने कमी उंचीच्या हेमकुटावरून सूर्यास्त पाह्ण्याचा सल्ला दिला.
हेमकुटा अगदी जवळ होते. तुकतुकीत राखाडी दगडाची सलग चढण चढून गेल्यावर एक प्रशस्त दगडी पठार लागते. तेच हेमाकुटा. यात प्रवेश करताच "सासिवेकालू" गणेशाचे दर्शन होते. सासिवेकालू याचा अर्थ मोहरीचे दाणे. हा एक विशाल 8-फूट उंच, अखंड गणेश आहे, त्याच्या पोटाभोवती साप आहे.
sasivikelu Ganesh |
गणपतीला अन्न खूप आवडते, भोजनानंतर एके दिवशी त्याचे पोट फुटले. ते आवळून ठेवण्यासाठी त्यानी पोटाभोवती साप बांधला अशी आख्यायिका आहे. गणेशावर मोहरीच्या दाण्यांसारखे बारीक नक्षीकाम खूप सुंदर केले आहे. हेमकुटावर बाकी बहुतेक सगळी शिवमंदिरं आहेत. पम्पादेवीने (पार्वती) इथे शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या केल्याचा उल्लेख वर आला आहेच. पठाराच्या टोकाशी पोचलो तर लक्षात आले तिथून खाली जाणारा रस्ता थेट विरुपाक्ष मंदिराजवळ पोचतो आहे. इथे अनेक लोक पक्षीनिरिक्षणाला आणि
Virupaksha view from Hemakut |
विशेषत: सूर्यास्त पाहायला येतात. मावळतीच्या प्रकाशात हेमकुटा चढताना मध्ये थांबून विस्तीर्ण दगडावर पाठ टेकून आम्ही निरुद्देश पहुडलो. संध्याकाळचा विरुपाक्ष मंदिराकडे वाहणारा गारसर वारा, निवलेल्या दगडाचा थेट आणि उबदार स्पर्श, थोडेसे ढगाळ आकाश, एकूणच निसर्गाची शांत सोबत. तुरळक लोक जात येत होते पण दगडावर शांतपणे पहुडलेल्या बायकांकडे कुणीही विचित्र नजरेने पाहत नव्हतं. आमच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त नवी प्रेक्षणीय जागा बघणं नसतं. नसावंच. बाईपणाचीच नाही जगण्यातली सगळी ओझी बाजूला ठेवून घेतलेल्या अशा अनेक अनुभवांचं संचित मनाच्या तळाशी साठत जातं. परल्यावर पुढचे कितीतरी दिवस हे इंधन पुरतं.
Sunset at Hemakuta |
अजून वरच्या दगडी पठारावर गेलो. प्रत्येकीने निवांत सूर्यास्त बघता येईल अशी एकमेकींपासून लांब सोयीची जागा पकडली. निर्विचार मन, स्वच्छ शुद्ध नितळ शांतता, समोर ढगाच्या आत बाहेर करत अस्ताला जाणारा तेजोनिधी. मध्ये कुणाचाही अडसर नाही अगदी स्वसंवादाचा सुद्धा. शक्य असतं तर रात्री तिथेच मुक्काम करावा इतकं बरं वाटत होतं पण सूर्य बुडाला. माकडांचा उपद्रव सुरु झाला, तेव्हा मात्र निघावं लागलं.
हजारा राम मंदिर (इथे दुरुस्ती सुरु होती), सरस्वती मंदिर, वीरभद्र मंदिर, चंद्रमौलीश्वर मंदिर, अच्युतराय मंदिर अशी अनेक मंदिरं अजून बाकी होती. यातली काही माहितही नव्हती पण वेळ संपला होता. इतनी बडी दुनिया मे म्हणजे हम्पीमे कुछ न कुछ तो छुटनेवाला था ही! आमच्या ट्रीपचा सिंड्रॆला टाईम म्हणजे संपायचा दिवस जवळ आला होता. रात्री हॉटेलच्या झकास रेस्टॉरंटमध्ये आप्पे, अक्की रोटी असे तिथले प्रसिद्ध पदार्थ चाखत अंजूच्या वाढदिवसाचे मस्त सेलेब्रेशन कम डिनर झाले. (एक प्रकारचं तांदळाच्या पिठाचं भाज्या घालून केलेलं थालिपीठ) पुरुष प्रवास करतात तेव्हा तिथे काय खायचं हा त्या प्लॅनिंगमधला मह्त्वाचा भाग असतो. आमच्यासाठी तो भाग दुय्यम! त्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे(शब्दश:) बरेच पैसे वाचतात. ते आम्ही शॉपिंगवर खर्च करतो हा भाग अलाहिदा!
नव्हती. त्यामुळे आरामात कॉंटीनेंटल ब्रेकफास्ट केला. मग आमच्या ग्रीन टी शर्ट ड्रॆसकोडमध्ये तिथल्याच स्विमिंग पूलपाशी फोटोसेशन करून जेवून चेकआऊट केले.
आंध्र प्रदेशातल्या जवळच्या अनंतपूरकडे आमची गाडी निघाली. राज्य ओलांडताना आमचे दोन्ही लसी घेतल्याचे पुरावे, आरटीपीसीआर वगैरे बघतील, अडवतील असे वाटले होते पण पोलिस अधिकार्याने बहुधा गाडीच्या खिडकीतून डोकावणारे आमचे गुणी बाळासारखे निरागस भाव आणलेले चेहरे पाहून गाडीला तसेच पुढे जाऊ दिले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या गावांमधला फरक अगदी जाणवेल असा होता. कर्नाटकी घरांचा टुमदारपणा, बर्यापैकी स्वच्छता, हिरवाई आंध्र मध्ये फारशी नव्हती. बकालपणा होता.
Maligi Hotel Lobby |
अनंतपूर रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये तळ ठोकला. आतली गर्दी पाहून ओमायक्रॉन नामक भानगडीला आता तोंड द्यायचे आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. अंजू इथून थेट पुण्याला जाणार होती. तिचा निरोप घेतला. आमची गाडी वेळेवर आली. फक्त भाग्यश्रीचा बर्थ आमच्यापासून लांब होता, तो ही शेजारच्या एका माणसाला विनंती करून त्याच्या जागी अॅडजस्ट करून घेतला. चवदार बिर्याणी खाऊन गप्पा मारत पथार्या पसरल्या. ट्रीप विनासायास झाल्याच्या आनंदात झोपलो. मध्यरात्री भाग्यश्रीने मला उठवून सांगितले की तिच्या बर्थचा मालक मुळात आधी वेगळ्या बर्थवरुन असाच कुणाच्या तरी विनंतीवरून इकडे आला होता. त्या बदली बर्थचा मूळ मालक आता जिथे आहे तिथे दुसरा प्रवासी त्याच नंबरवर आला असल्याने मूळ मालकाला हा माझा बर्थ द्यावा लागू शकतो. रात्री २ वाजता हे अजब कोडे सोडवणेच काय समजून घेणेही माझ्या मेंदूला शक्य नव्हते पण वेळ पडल्यास तिला भांडायला किंवा मूळ मालक शोधून अदलाबदली करायला कुमक हवी आहे एवढे मला कळले. मुकाट्याने तिच्या पाठीमागे गेले. नंतर नुकत्याच गाडीत चढलेल्या माणसाशी आणि तिथे गोंधळलेल्या चेहर्याने बसलेल्या मूळ बर्थ मालकाशी आम्ही जो काय असंबद्ध वार्तालाप केला तो ब्रह्मदेवच जाणे. शत्रूला गोंधळून टाकणे ही एक युद्धनीती असते. पण इथे मुदलात सगळ्याच पार्ट्या गोंधळलेल्या असल्याने ही युक्ती कुचकामी होती.
तेव्हापासून आजवर ते संचित का काय मनात जरा जास्तच साठल्याने ह्म्पीतून आम्ही अद्यापही मनाने बाहेर आलेलो नाही. झाडांच्या हिरवाईनी आणि समुद्राच्या निळाईनी अनेकदा मोहिनी घातली आहे पण पाषाणही गारुड करू शकतात हा अनुभव सर्वस्वी नवा होता. जगाला देण्यासारखं आणि दाखवण्यासारखं आपल्या देशाकडे इतकं काही आहे याचं अनामिक समाधान वाटत होतं. प्रत्येक उत्पत्ती आणि निर्मितीला लयाचा शाप असतो. त्याआधी आपल्या माणसांना आणि पुढच्या अनेक पिढ्यांना हा अनुभव घेता यावा असं मनापासून वाटलं. काही शतकांनी हम्पीतली जागतिक वारसा म्हणून जतन केली गेलेली स्थळं राहतील न राहतील. मानवाच्या कलाकर्तृत्वाची पताका फडकत राहील न राहील, पाषाण मात्र चिरंतन सत्यासारखे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कायम राहतील.
--------------------
Hampi The city of victory A city of ruins -1 Previous part
Pattadakal_Aihole Unesco heritage on our way to Hampi: Travelogue
#Hampi #Badami #Pattadakal #Aihole #UNESCO_world_heritage
Tuesday, February 15, 2022
भारुन टाकणारं ह्म्पी The city of victory. A city of ruins -1
Unicorn type sculpture in Vijay Vitthal Mandir |
१४, १५ व्या शतकात आणि १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे किमान २०० वर्षे कर्नाटकातलं ’ह्म्पी’ समृद्ध स्थापत्यकलेचा ’आयकॉन’ होतं. याचे पुरावे देखण्या अवशेषांच्या स्वरुपात आम्हाला जागोजागी बघता आले. इथे आम्हाला श्रीनिवास म्हणून कुशल गाईड भेटला तरीही काही दुवे सुटल्यासारखे वाटत होते, काही प्रश्न अनुत्तरित राहिले होते. John Fritz आणि George Michell या दोन पुरातत्वतज्ञांनी ह्म्पी किमान वीस वेळा पालथं घातलं आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय चमूने इथे उत्खनन, संशोधन, अवशेषांचं परिक्षण आणि दस्तावेजीकरणाचं अत्यंत महत्वाचं काम केलंय. या दोघांनी लिहिलेलं ’ह्म्पी’ हे पुस्तक वाचल्यावर सुटलेले अनेक दुवे जुळले. तत्कालिन कॉस्मोपॉलिटन ’ह्म्पी’ अधिक वस्तुनिष्ठपणे समजून घेता आलं.
Hampi Entrance |
दक्षिण भारतातील या सर्वात श्रीमंत राजधानीविषयी या पुस्तकात समाविष्ट असलेल्या तत्कालीन विदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या नोंदी बघितल्या तर तेव्हाच्या समाजव्यवस्थेची, जीवनशैलीची कल्पना येते.
१५०१ मध्ये पहिल्या पोर्तुगीज आरमाराबरोबर भारतात आलेला बार्बोसा हा गोवामार्गे विजयनगरात दाखल झाला. त्याने या शहराचा उल्लेख Bisnagua असा केला आहे. इथे कुणालाही येण्याजाण्याची व आपापल्या समूहानुसार प्रेम करण्याची मुभा आहे मग तुम्ही ख्रिस्ती, ज्यू, मूर (मुस्लीम) किंवा हेदन (हिंदू) कुणीही असा, असे तो नोंदवतो. व्यापारी आणि श्रीमंत माणसांनी गजबजलेल्या या शहरातल्या बाजारपेठेचे वर्णन करताना बार्बोसा लिहितो. "इथे हिर्याच्या खाणी आहेत. पेगू(बर्मा), सीलम (सिलोन) इथून येथे विक्रीसाठी रत्न येतात. चीनमधून आलेले दुय्यम प्रतीचे ब्रोकेड, (Chinese material is known for it's inferior quality since then , it seems) धातू, विशेषत: तांबे, चांदी, याशिवाय केशर, गुलाबजल, चंदन, सुगंधी द्रव्ये आणि केरळमधून गाढवांवर लादून विक्रिला आलेले मिर्यांसारखे मसाले यांचा इथे मोठा व्यापार होतो. व्यवहारात वापरल्या जाणार्या सुवर्णमुद्रा विशिष्ट ठिकाणी तयार होतात, एकीतही खोट आढळत नाही."
तत्कालिन जीवनशैलीबद्दल बार्बोसाच्या नोंदी रंजक आहेत. "राजाचे(राय) वास्तव्य बहुतांशी या शहरातच असते. इथले नागरिक हेदन (हिंदू) आहेत. पुरुष उंच आहेत. त्यांचे केस लांब आणि काळे आहेत. स्त्रिया देखण्या आणि धीट आहेत. त्या तलम, सुती किंवा गडद रंगाचे रेशमी कपडे वापरतात. कमरेभोवती (निर्या) व छातीवर (पदर) हे वस्त्र त्या अशा पद्धतीने गुंडाळतात ज्यात त्यांचा एक हात आणि तो खांदा उघडा राहील. डोक्यावर आच्छादन नसते. त्या केसांचा अंबाडा घालतात. त्यावर गजरे माळतात. त्यांच्या नाकात रत्न किंवा मोत्याची सुंकली असते. तसेच गळ्यात, कानात, हातात सोन्याचांदीचे दागिने असतात. चामड्याची सुशोभित पादत्राणॆ त्या वापरतात. (बार्बोसाने केलेले पुरुषांच्या पोशाखाचे वर्णन धोतराशी जुळणारे आहे.) डोक्यावर पगडी, टोपीसारखे प्रकार पुरुष वापरतात. विशेष प्रसंगी ते खांद्यापासून पायघोळ कपड्यात दिसतात. ते देखील रत्न, मोत्यांच्या दागिन्यांचा आणि सुगंधी द्रव्यांचा मुबलक वापर करतात.
Krishnadevaraya Coronation mandap in the left |
इथल्या स्त्रियांना नृत्य, गायन, वादन इ. कला लहानपणापासून शिकवल्या जातात. श्रीमंत पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करतात. राजालाही अनेक राण्या व दासी आहेत. राजा कामकाजासाठी नियमित दरबार भरवतो. अपराध्यास कठोर शासन तसेच आर्थिक दंड केला जातो. राजाजवळ सुमारे ९०० हत्ती आणि २०००० घोडे आहेत. सरदार, मनसबदारांनाही हुद्द्यानुसार घोडे दिले जातात. इथले स्थानिक घोडे फार जगत नसल्याने चांगल्या प्रतीचे उमदे घोडे आयात केले जातात. हत्तीघोड्यांबरोबरच राजा सैन्याची आणि पाच ते सहा हजार स्त्रियांचीही (zenana) देखभाल करतो. या कलाकुशल स्त्रिया त्याच्या मिरवणुकीत सहभागी होतात. सैनिकांना युद्धावर जाताना त्यांच्या रंजनासाठी यातील निवडक स्त्रिया सोबत दिल्या जातात."
लुडोविको द वर्थेमा हा १५०९ च्या सुमारास येथे आलेला इटालीयन प्रवासी तर या शहराचे ’मी पाहिलेला स्वर्ग’ अशा शब्दात वर्णन करतो. राजाकडची अलोट संपत्ती, हजारोंचे घोडदळ, रत्नखचित पोषाख ,दागिने याचे कौतुक करताना इतका श्रीमंत राजा मी जगात पाहिला नाही, असेही लिहितो.
---------
आजचे ’हम्पी’ तुंगभद्रा नदीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. एका बाजूला मंदिरे, आणि पूर्वीच्या विजयनगर शहराचे अवशेष आहेत तर दुसऱ्या बाजूला लहान हट्स व कॅफे आहेत. हा भाग हिप्पी लँड म्हणून ओळखला जातो परंतु कोरोनाकाळात काही दुरुस्ती काम सुरु केल्याने आम्हाला तो बघता आला नाही.
Geological Background
हम्पीतली प्रमुख स्थळं ज्यात बहुतांशी मंदिरच आहेत, त्यांच्या बांधकामात ग्रॅनाइट आणि मऊ शिस्ट रॉकचा वापर केला गेला आहे. एकेकाळी जमिनीच्या पोटात असलेले हे पहाड भूकंपासारखी उलथापालथ होऊन वर आले आणि सुमारे ३ अब्ज वर्ष उन्ह, वारा, पावसाचे तडाखे सोसून दगडांच्या विविध आकारांच्या राशीत रुपांतरित झाले. हे दगड अलंकारिक बारीक कोरीव कामासाठी उपयुक्त असतात. यांचा वापर करून रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांपासून प्रेरित असलेल्या गाथा हम्पीमधल्या मंदिरांमध्ये सभामंडप, खांब, छत आणि भिंतींवर अशा सर्वत्र कोरलेल्या आढळून येतात.
Mythological Background
रामायणात वर्णिलेल्या किष्किंधा नगरीचा परिसर तो हाच. लोकप्रिय रामायणानुसार सीतेच्या शोधात असलेले राम आणि लक्ष्मण इथे पोचले. इथेच त्यांची भक्त हनुमानाशी प्रथम भेट झाली. हनुमानाने त्यांची सुग्रीवाशी भेट घडवली. वाली-सुग्रीवांच्यातील संघर्षाबद्दल सांगितले. सीतेला आकाशमार्गे रावण पळवून नेत असताना सुग्रीवाने पाहिले होते. राम व सुग्रीवाने एकमेकांना मदत करायचे ठरवले. रामाने वालीचा वध करुन सुग्रीवाला पुन्हा गादीवर बसवले तर सीतेला अशोकवनातून सोडवण्यासाठी सुग्रीवाने आपली वानरसेना रामाच्या मदतीला दिली. (आजही या परिसरात खूप माकडं आहेत.)
Historical Background
ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहायची झाली तर दिल्ली सुलतानाच्या आक्रमणापासून बचावलेल्या या भागात सुरुवातीला स्थानिक हुक्का (हरीहर १३३६-५६) आणि बुक्का(१३५६-७७) यांचे अधिपत्य होते. हा भूभाग त्यांना बहामनींच्या दहशतीमुळे फारसा वाढवता आला नाही. नंतर गादीवर आलेल्या संगम घराण्याच्या देवराय पहिला (१४०६-२२) दुसरा (१४२४-४६) यांनी मात्र आपले राज्य पार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारले. पुढे कृष्णदेवराय (१५०९-२९) आणि अच्युतराय (१५२९-४२) यांनी यावर कळस चढवून राज्य अत्यंत भरभराटीला नेले. यानंतर सदाशिव व रामराय कारभार पाहू लागले.
पुढच्या घटनांचे चटका लावणारे वर्णन सीझर फ्रेड्रिक या इटालियन प्रवाशाने (इ.स. १५६७) केले आहे. " १५६५ मध्ये तलिकोटा ची लढाई हरल्याची बातमी पोचताच रामराय व त्याच्या बंधूंच्या कुटुंबियांनी जीव मुठीत धरून शहरातून पलायन केले. पाठोपाठ बेरार, विजापूर, गोवळकोंडा व अहमदनगरच्या सुलतानांनी बेझेनगर (विजयनगर) काबीज केले. पुढील सहा महिने त्यांनी घराघरात शिरून लूट केली. आपल्या मूळ प्रदेशापासून दूर असलेले हे शहर सांभाळणे शक्य न झाल्याने ते आपापल्या प्रांतात निघून गेले. ते जाताच अड्यार घराण्यातील तिरुमला व वारसदारांनी ते शहर पुन्हा वसवून गतवैभव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पण शहरातला बराच भाग भग्न, उद्ध्वस्त झाला होता. घरे ओस पडली होती. त्यात चक्क जंगली श्वापदे वसतीला आली होती. अखेर हे साम्राज्य हळूहळू लयाला गेले"
पुढे १७-१८ व्या शतकात हैद्राबादचा निजाम, हैदर अली, टिपू सुलतान आणि मराठ्यांनीही विजयनगरावर स्वामित्वाचा दावा केला. १७९९ च्या अॅंग्लो-म्हैसूर युद्धानंतर हा भाग ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला. आज कर्नाटक सरकार आणि पुरातत्त्वविभागाच्या प्रयासाने गतकालीन वैभवाची साक्ष देणारं ह्म्पी शक्य तितकं रिस्टोअर करून जागतिक वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात आलंय.
Vijay Vitthal mandir |
इथे सर्वप्रथम आम्ही गेलो ते विजय विठ्ठल मंदिर संकुलात. पार्किंगपासून आतपर्यंत जायला बॅटरीकार होत्या. स्थानिक प्रशिक्षित महिलाच या कार चालवतात. देवराय द्वितीयच्या कारकीर्दीत (१४२२-१४४६) निर्मिलेल्या या मंदिरातील विष्णूचे कानडा ओ विठ्ठ्लू रुप तो मूळचा कर्नाटकूच असल्याची साक्ष देते. पौराणिक कथांनुसार, हे त्याचे विश्रांतीस्थान होते. गोपुरातून आत शिरताच मंदिराच्या सौंदर्याने स्तिमित व्हायला होतं.
The Garuda (shrine) chariot in in Vijay Vitthal Mandir |
विठ्ठ्लासमोर गरुडदेवाचा अप्रतिम कोरीवकला दर्शवणारा रथ आहे. आपल्या ५० रु.च्या नोटेवर याची प्रतिकृती आहे. मुळात रथाला घोडे जोडले होते. नूतनीकरणानंतर आता तिथे हत्ती दिसतात. इथले ५६ संगीतस्तंभ हे तर एक आश्चर्यच आहे. चंदनाच्या काठीने एकेकावर ह्लका प्रहार करताच वेगवेगळा सूर ऐकता येतो. या स्तंभाच्या आत धातू असल्याशिवाय संगीतमय ध्वनी निर्माण होणार नाही असे इंग्रजांना वाटले. त्यामुळे त्यांनी दोन स्तंभ पाडले. परंतु स्तंभाच्या आत असे काही आढळले नाही. पर्यटकांनीही हे खांब बडवून पाहिल्याने आता आत प्रवेश करायला मनाई आहे.
Kalnyanam Mandap Roof |
बाजूला कल्याणम् (लग्न) मंडप आहे. इथे विवाह होत असत. मला इथे ’आमच्यात विवाहाला वाट्टोळम् म्हणतात’ हा भाऊ कदमचा इनोद आठवला. हा विनोद बरा पण इथे शूट केलेले राउडी राठोडमधले गाणे भयंकर. एक कडवे इथे तर दुसरे थेट जर्मनीत शूट केलेल्या या टुकार आचरट गाण्याला ह्म्पीच्या पार्श्वभूमीमुळे कोणता असा फायदा झाला विठ्ठ्लच जाणे. गर्दी फारशी नव्हती. एक परदेशी गोरा बाबा, देशी सावळी आई आणि बाबांचं बोट धरून दुडदुडणारं त्यांचं धोती घातलेलं कुरळ्या केसांचं गोड टोपलं मात्र आम्हाला सारखं क्रॉस होत होतं.
Lotus Mahal in the Zenana enclosue |
तिथून पोचलो -जनाना उर्फ राणीमहल, कमल महल आणि भव्य हत्तीशाळा - हे एकाच प्रांगणात आहे त्या अर्थी हा राणीमहालच नसून सरदार निवास असावा. या महालाचा आकार कमळासारखा आहे. हा महाल दोन मजली असून त्याचे बांधकाम दगडांऐवजी चुना आणि वीट वापरून केलेले आहे.
Zenana Enclosure Entrance |
या महालाच्या बांधकामाची शैली हि इंडो- अरेबिक आहे बहामनींच्या मुस्लिम स्थापत्यकलेचा प्रभाव या तीनही स्थळांच्या रचनेवर असावा. विशेषत: कमानी आणि घुमट. कमलमहल मध्ये नृत्य केले जाई, राण्या विश्राम करत असं गाईड म्हणाला पण पुस्तकानुसार इथे महत्वाच्या राजकीय बैठका होत.
Elephant stable near Lotus mahal |
भव्य हत्तीशाळा पाहून हत्तींची किती काळजी घेतली जाई हे लक्षात येतं. यानंतर गेलो ते होते राणी बाथ म्हणजे एक आकर्षक दगडी चौकोनी पायर्यांचा तलाव, नैसर्गिक उतार वापरून यात दगडी कालव्यांमधून आणलेलं पाणी सोडलं जाई. हे सुद्धा सरदार, मनसबदारांच्या बायकांच्या स्नान, विश्रामासाठी बांधलं होतं.
Queen's bathe showing balconies and pool |
शाही स्त्रियांची विशेष काळजी घेतली जाई हा उल्लेख वर आला आहेच. पहिला देव’राय’ गादीवर बसला त्याच सुमारास हम्पीला पोचलेला इटालियन प्रवासी निकोलो कोन्टी. तो लिहितो ,"राजाच्या मिरवणुकीत हजारो स्त्रिया त्याच्या विजयरथासह चालत जात असत. (त्या सगळ्या राण्या किंवा राणीवशातील स्त्रिया असत) धार्मिक समारंभात रथ ओढले जात त्यापुढे नागरिक स्वत:ला झोकून देत असत." ही त्यांची आपल्या दैवताबद्द्ल श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याची काहीशी चमत्कारिक पद्धत असावी.
Mahanavmi Platform |
यानंतर बघितला महानवमी (डिब्बा) मंच- कृष्णदेवरायनी उदयगिरी ( ओरिसा ) जिंकल्यावर विजयाचं प्रतीक म्हणून हा आयताकृती विशाल मंच बांधला. रामाने रावणाशी होऊ घातलेल्या युद्धात विजय मिळावा म्हणून दुर्गेची पूजा केली. याच तत्त्वाने पावसाळा संपल्यावर म्हणजे पीक पाणी आटोपले की सैन्याच्या मोहिमा सुरु होण्याआधी या मंचासमोर दरवर्षी दुर्गापूजा आणि महानवमी उत्सव साजरा होऊ लागला. ’बाहुबली’ सिनेमातील एका प्रसंगामध्ये अशा प्रकरचा डिब्बा (मंच) वापरला आहे. महानवमी उत्सवाला व्यापारी संबंध असलेल्या देशातील पाहुणे व कलाकार येत. तुर्की नृत्यकलाकारांच्या प्रतिमा मंचाच्या बाजूने कोरलेल्या दिसतात. १४४३ मध्ये म्हणजे देवराय द्वितीयच्या कार्यकाळात राजकीय दौर्यावर आलेला पर्शियन सरदार अब्दुल रझाक. या उत्सवाचे वर्णन करताना तो लिहितो, "मी जगात कुठेही इतकं अद्भुत शहर पाहिलेलं नाही. अर्धे जमिनीत गाडलेले पुरुषभर उंचीचे चिरे एकमेकांना आणि एकमेकांवर जोडल्याने इथल्या किल्ल्यांची तटबंदी इतकी अभेद्य झाली आहे की ती पार करणे सैनिकालाच काय एखाद्या दमदार घोड्यालाही अशक्य आहे."
Royal hunters carved on Mahanavmi platform walls |
मेघडंबरी, छत्रचामरे व सर्व लवाजमा घेऊन महानवमी उत्सवात आगमन केलेला राजा मंचावरील अधिकारी व पाहुण्यांसमोर आपल्या वैभवाचे व सैन्याचे शक्तीप्रदर्शन करत असे. सरदार, मनसबदारांसह हजारो हत्ती त्याला सलामी देत. राजा रत्नखचित सुवर्णसिंहासनावर बसत असे. मंचासमोर कुशल कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करत असत. मल्ल कुस्ती खेळत. तलवारबाजी होई." परदेशी पाहुण्यांमार्फत जगभरात या शक्तीप्रदर्शनातून योग्य तो ’संदेश’ पोचत असावा. हे सगळे वाचताना मला आपली २६ जानेवारीची परदेशी पाहुण्यांसमोर सादर केली जाणारी परेड आठवली.
आम्ही मंचाच्या शेवटच्या प्रतलावर जाऊन सभोवतालचे ह्म्पी डोळे भरुन पाहिले. तिथे एकटे फिरणारे एक चिपकू टूरिस्ट आजोबा आमच्याशी उगाचच कारणं काढून बोलत होते. त्यांना कटवून आम्ही मागच्या बाजूने खाली उतरलो. मंचाच्या भिंतीवरची कारागिरी पाहत प्रदक्षिणा घातली.
Stepped tank in the Royal centre- Pushkarani |
महानवमी मंचालगत एक आकर्षक पायर्या पायर्यांची पुष्करणी होती. पार जमिनीखाली गेलेली ही पुष्करणी 1980 च्या दशकात पुरातत्त्वविभागाला सापडली मग पूर्ण खोदकाम करून रिस्टोअर करण्यात आली. तुंगभद्रा नदीचेच पाणी यात खेळवले जात असे. नदीपासून काढलेला चिरेबंदी कालवा लगतच होता.
सैनिकांच्या भोजनासाठी, खळगे केलेल्या भल्यामोठ्या दगडी थाळ्यांची रांग त्याला लागून होती. पुढे पायर्यांच्या विहीरीसारखे काही होते. आत पाहिले तर खाली एका भुयाराचे बंद दार दिसत होते. ते भुयार कुठे उघडते हे राजघराण्यातील निवडक व्यक्तिंनाच माहित असायचे असे श्रीनिवास सांगत होता. मी तरी अशी खोल लांब भुयारं फक्त सिनेमा आणि magnificient century type वेबसिरीजमध्येच पाहिली होती. आत्यंतिक समृद्धी असल्याने सतत आक्रमणाच्या भीतीच्या छायेखाली वावरत असलेल्या राज्यात सुरक्षिततेसाठी अशा गुप्त जागांची आवश्यकता असणारच.
१५२० च्या सुमारास म्हणजे कृष्णदेवरायाच्या काळात विजयनगरात आलेला पोर्तुगीज घोडेव्यापारी दोमिंगो पेसने तत्कालिन स्थितीचे सर्वात प्रदीर्घ वर्णन केले आहे. "पर्वतांनी आणि दगडांच्या राशींनी वेढलेल्या या शहरात प्रवेश करताना उतारापासून आतपर्यंत भातशेती आणि अनेक भाज्या, फळांची लागवड केलेली आहे. मी आत आलो ते भक्कम तटबंदी असलेल्या गोव्याच्या बाजूकडील प्रवेशद्वारातून. सिंचनासाठी तयार केलेल्या एक भव्य तळ्याचा बांध काही ना काही कारणाने फुटून जाई म्हणून पुरोहितांच्या सल्ल्यानुसार राजाने काही पशुंसह नरबळी दिले होते. जवळच राजाने लाडकी राणी तिरुमलादेवीसाठी नगर वसवले (आजचे होस्पेट) या मार्गावर राजाने अनेक झाडे लावून घेतली व मंदिरांची निर्मितीही केली. राजा पहाटे उठून तूप प्राशन करत असे आणि अंगालाही तुपाचे मर्दन करून ते जिरेपर्यंत युद्धकलेचा सराव करत असे. नंतर सुस्नात होऊन राजा दरबारी कामकाजासाठी (लिस्बनच्या राजवाड्यापेक्षाही भव्य) प्रासादात जात असे. बैलांवर माल लादलेल्या बाजारपेठात व्यापार्यांची गर्दी असे. इथे धान्य, भाजीपाल्याबरोबर पशु-पक्ष्यांचीही भरपूर विक्री होत असे. शहराला लागून सुंदर आणि विशाल देवस्थाने होती. (विरुपाक्ष मंदिर, विठ्ठ्ल मंदिर इ.चे यात सविस्तर वर्णन आहे) नदीपल्याड अनागोंदी गाव होते जी यापुर्वीची राजधानी होती असे लोक म्हणत. एका वेळी १५-२० माणसे तर कधी घोडे किंवा बैल घेऊन देखील बांबूच्या टोपलीसारख्या नावांमधून (कोरॅकल) तिकडे जाता येई."
Tungabhadra |
आम्ही देखील या कोरॅकल राईडचा भन्नाट अनुभव घेतला. विविध आकाराच्या निश्चल शिळांनी वेढलेल्या, तुंगभद्रेच्या चिंचोळ्या पण खोल पात्रातून आमची ही तबकडी पुढे जात होती. मावळतीचा केशरट उजेड पसरला होता. आकाशाचा आणि पाण्याचा रंग सारखाच दिसत होता. वाटेवर खडकालगत एक छोटेसे दगडी मंदिर होते. नाव पार्क करुन त्यात शिरलेले एक नवविवाहीत जोडपे इन्स्टा लाईव्ह करत असावे. थोडे थ्रिल म्हणून किनारा आणि एका मोठ्या खडकाच्या मधल्या फटीतून नावाड्याने आमची नाव आत घातली. मध्यावर आल्यावर एकदा वेगाने गोल गोल फिरवली. लाईफ जॅकेट होते पण भीती वाटू नये म्हणून डोळे मिटले तरी भोवतालचा अद्भुत निसर्ग ते उघडायला भाग पाडत होता. परतलो तेव्हा अस्ताला चाललेल्या सूर्याची किरणं पाण्यावर पसरली होती. बाजूच्या खडकांवर मुकाट बसून राहिलेला माकडांचा जथ्था होता. आम्ही नि:शब्द झालो होतो.
Coracle ride |
Entrance gopura at Virupaksha Mandir |
लांबून दिसणारे मंदिराचे मनोहर १०५ फुटी गोपूर केरळच्या पद्मनाभम् मंदिराच्या गोपुराची आठवण करून देत होते. जैन आणि हिंदू अशी संमिश्र स्थापत्यकला झळकवणार्या या मंदिराच्या प्रांगणात 12 व्या शतकातली लहान मंदिरेही आहेत. कर्नाटकातल्या अनेक पट्टदकल (म्हणजे जिथे राज्याभिषेक सोहळे घडत) मंदिरांपैकी हे एक पण विशेष विख्यात. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर 7 व्या शतकात दक्षिण भारतीय शैलीच्या वास्तुकलेनुसार बदामीच्या चालुक्यांनी बांधले. मंदिराच्या भिंतींवर कोरीवकामातून शिव आणि विष्णूसंबंधी गाथा साकारलेल्या आहेत. प्रवेशद्वाराशी विष्णूचा वराहअवतार कोरलेला आहे. मुस्लिमांमध्ये डुक्कर हराम असल्याने आक्रमणकर्ते इथून परत फिरले म्हणून विरुपाक्ष मंदिर टिकून राहिले असे म्हणतात. ह्म्पी हे पूर्वी पंपाक्षेत्र म्हणून ओळखले जाई. पुराणानुसार पंपा ही ब्रह्मदेवाची मानसकन्या. शंकर प्रसन्न व्हावा म्हणून तिने हेमकुटावर तपश्चर्या केली आणि त्याला प्राप्त केले. विरुपाक्ष म्हणजे या पंपापती शिवाचे मंदिर. त्याचा तिसरा डॊळा म्हणून विरुप-अक्ष. इथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात विरुपाक्ष आणि पम्पा यांचा लग्नाचा समारंभ आयोजित केला जातो तसेच विरुपाक्ष देवाचा वार्षिक रथोत्सव फेब्रुवारी महिन्यात असतो.
मंदिराचे गोपुर आणि आतली लहानशी मंदिरं दिवेलागणीमुळे उजळून निघाली होती. आतमध्ये दहा रुपयाची नोट दिली तरच सोंडेने आशीर्वाद देणार्या हत्तीभोवती पर्यट्क, दर्शनाला आलेली जोडपी आणि इतर भक्तांची गर्दी होती. मुख्य सभामंडपाच्या छतावरची नैसर्गिक रंगाचा वापर करून केलेली कलाकारी शब्दश: मान मोडून पाहत राहिलो. बाजूच्या पंपादेवी आणि भुवनेश्वरीचे दर्शन घेतले. दक्षिणेच्या अपेक्षेने असेल आतले पुजारी कुणी दर्शनाला आले की मोठ्याने श्लोक म्हणून गजर करु लागत.
Virupaksha Mandir Mandap and Yadnyavedi |
अंधारु लागल्याने बाहेर निघायला हवं होतं. मुख्य सभामंडपात लाल काठांची शुभ्र कांजीवरम नेसलेली, दागिन्यांनी मढलेली आणि खूप मेकअप केलेली एक स्थूल गोरटेली बाई दुय्यम ब्रोकेडच्या चकचकीत साड्यांधल्या सावळ्या बायकांसह पोझ देऊन उभी होती. लाईट- कॅमेरे पाहून आम्हाला आधी ते सिनेमाचे शुटींग वाटले. ती बाई आम्हाला बघताच धावत मंडपाच्या कडेशी आली आणि इंग्लीशमधून आम्ही कोण कुठल्या विचारु लागली. मोदीजींवर पंजाबमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलो असून तुम्ही पण २ मि. आमच्यासह बाईट द्यायला या, असा आग्रह करु लागली. स्थानिक राजकीय पक्षाची ती महिला आघाडी प्रमुख वगैरे असावी पण तिचा सगळा कृत्रिम अवतार पाहून आम्ही नकार दिला आणि मंदिरासमोरच्या ह्म्पी मार्केटकडे मोर्चा वळवला.
Dinner at Mango Tree Restaurant |
चिकार दमून मल्लिगी हॉटेलला पोचलो. अंजूचा दुसर्या दिवशी वाढदिवस. तिला सर्प्राईज द्यायचे होते म्हणून रात्री १२ पर्यंत एका रुममध्ये जमून पत्ते खेळलो. १२ वाजता दुसर्या रुममध्ये तयार ठेवलेली पेस्ट्री, तिच्यासाठी आधीच घेतलेले गिफ्ट्स आणि जल्लोष करत वाढदिवस साजरा झाला. early to bed वाल्या तांबारलेल्या डोळ्यांनी झोपायला धावल्या.