Friday, December 22, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - वेगळ्या जागेवरून पाहताना

पूर्वी किंवा अगदी आतापर्यंत मराठी साहित्य रसिकांचे-वाचकांचे ढोबळ गट करायचे झाले तर ते ’पुलंचं लेखन आवडणारे आणि न आवडणारे’ असे करता येत. आज मराठी इ-वाचकांमध्ये असे गट करायचे झाले तर ते ’कविता महाजन यांचं लेखन आवडणारे आणि न आवडणारे’ असे होऊ शकतात. वाचनाच्या एका टप्प्यावर ’कोसला’ कंपलसरी वाचले जाते तसे ’ब्र’ किंवा ’भिन्न’ या कविता महाजनांच्या कादंबर्‍यांबाबत म्हणता येईल. 

गोळीबंद शब्दयोजना, अस्वीकार्य गोष्टींना- दडपणांना चिरून टाकणारी धारदार भाषा आणि भारतीय स्त्रीजीवनाचा सखोल अभ्यास ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं. त्या म्हणतात "मराठी स्त्री-साहित्यात काही विषयांवर बायका लिहीतच नाहीत, काहींवर धूसर लिहितात. लोकसाहित्यात कुणा एका बार्इचं नाव येण्याचं कारण नसतं. त्यामुळे तिथं मात्र मोकळेपणानं अनुभवांची, विचारांची मांडणी झालेली दिसते." आज हे करु धजावणार्‍या मोजक्या लेखिकांमध्ये त्या आहेत. समाजाची पुरुषप्रधान मानसिकता अधोरेखित करताना अनेकदा त्यांचं नकारात्मकतेकडे झुकणारं, स्त्रीच्या लैंगिक जाणीवा थेटपणे, बोल्ड पद्धतीने मांडणारं लेखन, त्यातला गूढभाव हे सारं शहारे आणतं, कधी एकांगी वाटतं. त्याच वेळेस त्यांचं इतर लेखन माणसातल्या विकृती बरोबरच प्रकृती आणि संस्कृतीबद्दलही सांगत असतं, वाचकांवर शब्दांचं गारुड करत असतं. कधी त्यात ’कुहू’ सारखे काळाच्या पुढे जाणारे तर कधी ’समुद्रच आहे एक विशाल जाळं’या दीर्घकवितेसारखे प्रयोग होतात. ’मी स्त्रीवादाचा टप्पा केव्हाच ओलांडून पुढे गेले आहे’ हे त्यांनी स्पष्ट करुनही त्यांच्यावरचा ’बंडखोर स्त्रीवादी लेखिका’ हा शिक्का मात्र तसाच आहे.

दुसर्‍या बाजूला त्यांच्या सातत्यपूर्ण, दर्जेदार इ-लेखनाकडे बहुसंख्य इ-वाचकवर्ग आकृष्ट होतो आहे. सोशल मिडीयावर व्यक्त होणं असो वा ब्लॉगिंग, दोन्ही लेखनप्रकार तंत्रमैत्रीमुळे आणि ताकदीने हाताळणार्‍या मराठीतल्या त्या मह्त्वाच्या लेखिका आहेत. ’पांडित्य आणि काठिण्य या दोन्ही गोष्टी कायम एकमेकांशी जोडून ठेवण्याची गरज नाही’ असं म्हणत त्या सोप्या पद्धतीने लिहितात. ’चालू वर्तमानकाळ’ हा सभोवताली घडणार्‍या घटनांचे परखड विश्लेषण करणारा त्यांचा ब्लॉग http://abpmajha.abplive.in/blog  गाजतो आहे. फेकन्यूज, 'न्यूड' चित्रपट, समाजाची दांभिकता, बाल लैंगिक अत्याचार अशा विषयांची त्यातली त्यांची प्रखर मांडणी सुन्न करून जाते. "जग तुझ्या बापाचं आहे की माझ्या बापाचं, हा मुद्दा फारच घिसापीटा झाला. ते माझ्या आईचं किंवा तुझ्या आईचंही असू शकतं… असतं अनेकदा… हे कधी कळणार रे?" असा परखड सवाल करणार्‍या कविता महाजन, त्यांच्यावरच्या शिक्क्यापलिकडे जाऊन समजून घ्यायच्या असतील तर मात्र त्यांच्या आणखी २ ब्लॉग्ज बद्दल बोलायला हवं. एखादा कातळ फोडावा आणि त्याखाली झुळझुळ वाहणारं पाणी आढळावं तसं हे ब्लॉग्ज वाचताना वाटतं.

त्यापैकी एक आहे, लाखाहून अधिक हिट्स असलेला https://kavitamahajan.wordpress.com  यामागची भूमिका त्यांच्याच शब्दात सांगायची तर "माझ्यात कधी आत्मचरित्र लिहिण्याचं बळ येईल असं मला वाटत नाही; पण आता हे अशा अनुभवांचे काही तुकडे लिहून काढावेत असं मात्र वाटतं आहे. हे सारे व्यक्तिगतच आहेत असं नाही, त्यांना सामाजिक संदर्भ आहेत". 
या ब्लॉगवर काय नाही, कथा, ललितलेखन, वाचकाला नि:शब्द करणार्‍या विविध भाषेतल्या भारतीय लेखिकांच्या पुस्तकांबद्दलचं मनोगत आणि खुसखुशीत भाषेतली बदलापूरची बखरही. त्या स्वत: चित्रकार असल्याने केलेलं चित्रकलेबाबतचं साक्षेपी लेखन आहे. प्रभावीपणे अनुवाद केलेल्या बहुतेक कविता अर्थातच त्यांच्या राजकीय भूमिकेला अनुकूल आहेत. वृत्तपत्रीय धोरणांच्या बंधनांच्या पलीकडे जाण्य़ाची इथे मुभा असतेच. यातला ’स-अवकाश लेखन’ हा विभाग तर प्रत्येक नव्या लेखकाने, नवकवीने आणि ’मी ना हल्ली फेसबुकवर लिहिते/लिहितो’ गटातल्या मंडळींनीं आवर्जून वाचावा असा. ब्लॉगवरचं मृत्युविषयक चिंतन, मुक्तचिंतन वाचताना त्यामागचं जीवनशोधाचं प्रयोजन उलगडत जातं. इथल्याच एका अंतर्मुख करणार्‍या कवितेत त्या लिहितात,
नाटक संपलंय..
पडदा टाक... मी खुणावलं
तर त्या जख्ख हातांना
खेचता येत नव्हता.. पडद्याचा दोर
मग भूमिका टाकून.. मी गेले
त्याला हात द्यायला..

त्यांचा तिसरा (सचित्र) ब्लॉग म्हणजे ’एबीपी माझा’ वरचाच ’घुमक्कडी’. गोष्टीवेल्हाळ कविता महाजन याच्या प्रस्तावनेत म्हणतात, "न आखलेले, परतीचं तिकीट न काढता केलेले प्रवास मला फार आवडतात. अनावश्यक माहिती मेंदूत भरून त्याला बधिर करून ठेवलं जातंय. त्या भंगारातून वाट काढत, गोष्टींचे थांबे घेत. अनुभवलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या, सुचलेल्या गोष्टींचा हा प्रवास. " या ब्लॉगवरच्या ’वेगळ्या जागेवरून पाहताना’ या लेखात ’फाईंडिंग निमो’ या चित्रपटाचा उल्लेख आहे. त्यात दोन कॅमेरा अँगल आहेत. एक -मोठ्या समुद्रात पळून गेलेल्या निमो नावाच्या माशाच्या पिल्लाकडे पाहणारा आणि दुसरा ,निमो जेव्हा जाळ्य़ात पकडला जाऊन एका अ‍ॅक्वेरियम मध्ये बंदिस्त होतो तेव्हा निमोच्या नजरेतून काचेबाहेरच्या जगाकडे म्हणजे आपल्याकडे पाहणारा. सर्वसामान्य नजरेला न जाणवणारे अनेक विरोधाभास, अनेक भोंगळ व्याख्या याला छेद देणारी कविता महाजन यांची भाषा, त्यांचं द्र्ष्टेपण, त्यांची साहित्यिक समज वाचकाला जगाकडे आणि जगाच्या नजरेतून स्वत:कडे पाहण्य़ाची एक नवी दृष्टी देतात.

कविता महाजन यांची कन्या दिशा महाजन नव्या पिढीची ब्लॉगर आहे. तिचा https://dishascaravan.wordpress.com 
 हा ब्लॉग वाचताना पुन्हा मला ’निमो’ आठवला. दिशाला दिसणारं जग आणि तिच्या आईला दिसणारं जग, त्या ’वेगळ्या जागेवरुन’ जगाकडे पाहत असल्याने भिन्न आहेत, त्यांचे विषय, भाषा भिन्न आहेत. दिशाच्या अनुभवांचा पोतही वेगळा आहे. सकस ब्लॉगलेखन एकाच वेळी करणारी अशी मायलेकींची जोडी दुर्मिळ आहे. आजच्या मध्यमवर्गीय शहरी तरुणाईचं दर्शन दिशाच्या ब्लॉगमधून घडतं. साहजिक तिच्या शब्दांमध्ये चैतन्य आणि ताजेपणा आहे. पर्यटन आणि माध्यम या विषयातलं तिचं शिक्षण लक्षात घेता ब्लॉगचं नाव चपखल आहे. आईच्या लेखिका म्हणून असलेल्या स्थानाचं कोणतही दडपण तिच्या लेखनावर दिसत नाही. ब्लॉगच्या केंद्रस्थानी पर्यटन, मनोरंजन माध्यमं आणि आजची जीवनशैली आहे. तुरळक लेख मराठीत आणि बहुतेक लेख इंग्लीश मध्ये आहेत.
नोकरीसाठी मुंबईला गेलेल्या आजच्या तरुणीमधले अंतस्थ बदल टिपणारी डायरी ’मृगजळ’ तसच ’मृत्युपत्र’ हे यातले विभाग फारशी पकड घेत नाहीत. पुस्तक परिक्षण विभागात द्रौपदीचं वेगळं रुप दाखवणार्‍या ’द पॅलेस ऑफ इल्यूजन्स’ या पुस्तकाचा दिशाने अतिशय नेटका परिचय करुन दिला आहे. सिडने शेल्ड्न च्या कादंबरीतल्या कथानकाऐवजीपेक्षा ती त्यातले उत्कट प्रणयप्रसंग आणि नेटवर सहज उपलब्ध असलेलं बीभत्स पॉर्न यातला नेमका फरक धीटपणे सांगते. केवळ त्यामुळेच शेल्डन गेली ४ दशकं वाचकांच्या मनावर राज्य करत असल्याचा तिचा निष्कर्ष मात्र पटत नाही. तिचे पर्यटन आणि विशेषत: मनोरंजन-माध्यम विभागातले लेख अतिशय वाचनीय आहेत. ’फ्रेंड्स’ या गाजलेल्या मालिकेवरचे लेख असो वा चित्रपट परिक्षण, ती समीक्षकाच्या पुस्तकी शब्दात नव्हे तर सर्वसामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून सहजपणे लिहिते. जर या देशावरचा आणि इथल्या व्यवस्थेवरचा तुमचा विश्वास डळमळीत झाला असेल तर ’अ बिलियन कलर स्टोरी’ सिनेमा तुम्ही पाहायलाच हवा, असं ती त्यावरच्या पोस्ट मध्ये नमूद करते तेव्हा त्याचे लेखक-दिग्दर्शक पद्मकुमार नरसिंहमुर्ती सुद्धा तिच्या रिव्ह्यूला दाद देतात.


’फ्रॉम गीत टू शायरा’..हा तिचा लेख अप्रतिम. १४ व्या वर्षी ’जब वी मेट’ मधील दिलखुलास, पारदर्शक वृत्तीची, बिनधास्त निर्णय घेणारी कलरफुल गीत ही तिची रोल मॉडेल, लवकरच तिला कळून चुकतं की गीतचं मनस्वीपण समजून घेणारा आदित्य फक्त पडद्यावरच असतो. आज ९ वर्षांनंतर तिची रोल मॉडेल आहे ’बेफिक्रे’ मधली शायरा ..वडिलांच्या रेस्तरॉं मध्ये काम करण्यात कमीपणा न मानणारी, पुढॆ पॅरिस मध्ये अपार्ट्मेंट घेणं परवडेल इतका उत्तम जॉब धडाडीने मिळवणारी, निराशेच्या क्षणी खचून न जाणारी, स्पष्टवक्ती, बोल्ड पण मित्र आणि प्रियकर यातला फरक परिपक्वतेने समजून घेणारी. ’गीत चूक होती असं नव्हे पण ती माझा इतिहास आहे तर शायरा माझं वर्तमान’ असं म्हणणार्‍या दिशाच्या, स्वत:च स्वत:चे रोलमॉडेल बनण्याच्या प्रवासाला तिचा ब्लॉग साक्ष असेल. मायलेकींच्या ब्लॉगकडे पाहण्य़ाच्या दृष्टीकोनाबाबत साम्य शोधायचं तर कविता महाजन यांच्याच एका कवितेततल्या ओळी इथे लागू होतील...
सगळया जगापासून तुटून
स्वत:च्या नाळेशी जोडली जाते मी इथं ! 

Friday, December 15, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - जपत किनारा शीड सोडणे नामंजूर

’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा सिनेमा आठवतोय? आपल्या अस्तित्वाचा अर्थ उमगल्याने पाणावलेल्या डोळ्य़ांनी पाण्य़ाबाहेर येत भवतालच्या अफाट निसर्गाकडे नि:शब्द होत पाहत राहणारा हृतिक रोशन... भौतिक सुखांमागे धावणार्‍या माणसाला खरा आनंद कुठे आणि कसा गवसतो हे सांगणारं ते झकास दृष्य! अर्थात हे सिनेमात ठीकय, एरवी असं मनात येईल तेव्हा भटकायला पैसे कोण देईल? मात्र ’वसुधैव कुटुम्बकम्’ चा अर्थ थेट जगण्य़ात उतरवणारी शिव्व्या नाथ ही ट्रॅव्हल ब्लॉगर तरुणी गेल्या ७ वर्षांपासून असं आयुष्य भरभरुन जगतेय. वयाच्या २३व्या वर्षी तिने सिंगापूर टुरिझम मधली नोकरी सोडली, असेल नसेल ते चक्क विकून टाकलं आणि जगभ्रमंतीचं स्वप्नं पाठीवरच्या पिशवीत घेऊन ती निघाली. ती म्हणते, "आता माझं घर म्हणजे माझी ब्लॉग-साईट कारण तिथे तुम्हाला माझा ठावाठिकाणा नक्की सापडेल. मित्रांनो, आपल्या उबदार कोषाच्या बाहेर पडून एक स्वच्छंदी आयुष्य जगून तर पाहा, याल माझ्याबरोबर पुढच्या प्रवासाला?" जर तुम्हाला खरच तिच्यासह प्रवास करायची, तिला जाणून घ्यायची इच्छा असेल तर गाठा तिला https://the-shooting-star.com/
 वर जिथे ती म्हणते, "तुम्ही कविता लिहू शकत नसाल पण तुमच्या जगणच एक कविता असेल तर !"


य़ा क्षणी शिव्व्या मालदीव मध्ये आहे, मग ती ओमान ला जाणार आहे. आतापर्यंत तिने भारतासह आफ्रिका, युरोप, आशिया, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका आणि कॉकेशस प्रदेश पालथे घातले आहेत. यासाठी लागणारे पैसे? ते ती तिच्या ’ट्रॅव्हल ब्लॉगींग’ द्वारे कमावते. असे पैसे कुणीही कमावू शकतं? नाही, त्यासाठी झपाटलेपण हवं. २०१३ ची ती सर्वोत्तम भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर असून नंतरही अनेक सन्मान तिने प्राप्त केले आहेत. airbnb सह जगभरातल्या नामवंत प्रवासी कंपन्या, देशांचे पर्यटन विभाग तिचे प्रायोजकत्व स्वीकारतात. हटके प्रवास, अनोखे अनुभव आणि ते ओघवत्या इंग्लीशमधून मांडण्य़ाची भन्नाट शैली या त्रिचक्रीवर शिव्व्या विहरते आहे. बीबीसी ट्रॅव्हल्स, नॅशनल जिओग्राफिक्स, टाईम्स ऑफ इंडिया, द हिंदू, TEDx सारख्या माध्यमांवर तिच्या प्रवासगाथा झळकत असतात. मुळात ती हे पैशासाठी करत नाही कारण पैसा तिला तिच्या नोकरीत मिळतच होता. ती निरर्थक खरेदीत वेळ आणि पैसा घालवत नाही. आगामी महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी पैसे जमवते कारण प्रायोजक ताबडतोब मिळतातच असे नाही. त्यामुळे ’प्रवासात पैसे कसे वाचवावेत’, ’प्रवास करता करता पैसे कसे कमवावेत’, ’गाठीशी पैसे नसतानाही प्रवासाची स्वप्नं पाहावीत काय’, असे तिचे रोचक आणि प्रॅक्टिकल लेख या ब्लॉगवर आहेत.
डेहराडून मधल्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या शिव्व्याला तिथल्या पर्वतराजी कायम साद घालत. आज ती अवघं विश्व कवेत घेते आहे. काहीही अडचण नसली तरी चांगल्या पदवीधर बायकोला माहेरुन ’घ्यायला’ जाणारे नवरे किंवा बहिणीला सासरी ’पोचवणारे’ भाऊ किंवा ’सातच्या आत घरात’ टाईप मंडळी हे शिव्व्या नावाचं रसायन कदाचित पचवू शकणार नाहीत. शिव्व्या ’रमता जोगी’ आहे. तिला पर्यटकांच्या कलकलाटात हरवलेली प्रसिद्ध स्थळं टाळून नवनव्या जागा हुडकायला आवडतं, मिळेल त्या वाहतुकीच्या साधनांनी ती प्रवास करते. मिनरल वॉटर ऐवजी तिथलच पाणी पिते. तिथलंच अन्न खाते. (गेल्या काही वर्षांपासून ती व्हेगन- प्राणीजन्य पदार्थ न खाणारी, आहे) शक्य तिथे हॉटेल्स ऐवजी ती स्थानिक घरात राहून तिथली संस्कृती समजवून घेण्याचा प्रयत्न करते. ब्लॉगवरच्या तिच्या लेखांची नावंच तिची रेंज दाखवतात. उदा: मॉरीशसचा नीलमण्य़ासारखा लकाकणारा समुद्र, एका कोळ्य़ाचं धाडसी समुद्री जीवन, सेशेल्स बेटांचं पहिलं दर्शन, साऊथ आफ्रिकेतल्या मामेलोडी वसाहतीतली नवलाई, इंडोनेशियामधल्या निकोई बेटावरची धमाल, मलेशियातलं गिरिभ्रमण, फिलिपाईन्स मधल्या टेगेटे शहरातला फेरफटका, सिंगापूरमध्ये अनुभवलेला चिनी लग्नसोहळा, बंगी जंपींगचा थरार, श्रीलंका कसा पहावा, पुन्हा एकदा थायलंड, इस्तंबूलमधला रोमांचक दिवस, तुर्कस्तानच्या काळ्य़ा समुद्राच्या सोबतीने घालवलेले क्षण, व्हिएतनाममधे निवासस्थान शोधण्य़ाचा किस्सा, युरोपातली अपरिचित खेडी, क्रोएशिया भेटीनंतर माझ्या ब्लॉगींगमध्ये झालेला बदल, स्पेनमधल्या ग्रामीण निसर्गसौंदर्याच्या प्रेमात, इटलीत कलाकारांसह घालवलेले दिवस, फ्रान्समधलं तळ्य़ांचं शहर, फ्रँकफर्ट कसं बघावं, जर्मनीतला नाताळ बाजार, कोस्टारिकातली चॉकोलेट कथा, इक्वाडोरमध्ये मला गवसलेली मी, मेक्सिकोतल्या क्रेटर लेक वरचं सायकलिंग, निकाराग्वातले अनाम रस्ते.’
प्रत्येक लेख, त्यातलं वैचित्र्य, ताजेपणा आणि त्यातील सुरेख फोटो वाचकाला एका नव्या दुनियेत घेऊन जातात. ब्लॉग आणि त्याची सोशल माध्यमाद्वारे लिंक शेअर केल्याने तिचे थक्क करणारे अनुभव वाचकांपर्यंत पोहोचतात आणि त्या त्या विभागाच्या पर्यटन-व्यवसायाला चालना मिळते. सिनेमातील चित्रिकरणामुळे युरोपला जाणार्‍या भारतीय पर्यटकांमध्ये वाढ झालीय तसेच काहीसे. फरक हा की पर्य़टन आणि प्रवास या वेगळ्या गोष्टी. ज्याला ’ऑफबीट’ म्हटलं जात अशाच स्थानांबद्दल शिव्व्या ब्लॉगवर लिहिते आणि त्या स्थानांबद्दल निर्माण झालेली उत्सुकता भटक्यांना तिथवर खेचून नेते. उदा: #NotJustBeer- ’मला जर्मनीला पुन्हा पुन्हा का जावंसं वाटतं’ या लेखात तिने केलेल्या -हाईन व्हॅलीतल्या ’द्राक्ष-संस्कृती’च्या वर्णनामुळे तिथलं पर्यटन वाढलं आहे.

’रूद्राक्ष संस्कृती’ ची तिला तितकीच ओढ आहे. ’गंगेशी माझं नातं, दार्जिलिंगची चढण, शाही हिमालय, दारंग-चहाच्या कपात सामावलेलं जीवन, लडाखी नन च्या नजरेतून, कूर्ग मधलं कॉफी आणि बरच काही, देवभूमी केरळ, प्राचीन प्रेमनगरी-खजुराहो, कान्हा-कथा, ताडोबा सफर, गुजरात विशेष, पंजाबी सरसों के खेत, राजस्थानातला नजारा, या गंगटोकला, गोव्यावरचा- सप्टेंबर संपला की मला जागं करा’ हे भारतावरचे लेख तर खिळवून ठेवतात. ती निवांतपणे प्रवास करते. मन रमतय तोवर राहते, मग पुढे निघते. अमुक वाजता सनसेट पॉईंट पाहून तमुक वाजता जेवण अशा प्रवासी कंपन्यांच्या वेळापत्रकाच्या ती पलिकडे आहे. ’जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा.. न कुठले नकाशे न अनुमान काही’ या खरेंच्या ओळींसारखं भटकता भटकता अचानक वाट बदलून रुमानियातली उत्तरेकडची खेडी तिने पालथी घातलीयत, ग्वाटेमालामधल्या मेयन समुदायासमवेत मुक्काम केला आहे, कॅनडाजवळच्या विस्तीर्ण वाळवंटाच्या कडेने रेल्वेप्रवास केला आहे, मलेशियाच्या पूर्व किनार्‍यानजीक शार्क असतानाही पोहण्यातला चित्तथरारक अनुभव घेतला आहे.

बहुतेक प्रवास ती एकटयाने, क्वचित मित्रांबरोबर करते. ती म्हणते, "आपल्या भारतात सुद्धा एकटं फिरणं तितकंसं अवघड नाही. आतून एक बारका घाबरा आवाज ओरडत असतो, अगं तू वेडी आहेस का.. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन मी झेप घेते, सहप्रवाशांशी मैत्री करते, स्थानिक सवंगडी मिळवते, सोशल मिडीया आहेच, शिवाय माझी सर्वात जवळची मैत्रिण मी स्वत:च आहे, स्वसंवादाची धुंदी काही और असते, तो सूर सच्चा असतो, स्वत:ची जबाबदारी घेत स्वातंत्र्य उपभोगण्याची, स्वत:च्या अटींवर जगण्याची एक आगळीच मजा असते, मग एकटं वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे!" ’एकट्याने प्रवास करताना आलेले धमाल अनुभव’, ’एकट्याने प्रवास करायचा असेल तर पालकांना कसे समजवावे’,’प्रवासातल्या एकटेपणावर मात करण्याचे ८ झकास उपाय’ हे या ब्लॉगवरचे तिचे लेखही मस्त आहेत. अवघ्या जगण्याचाच प्रवास एकट्याने करणार्‍यांनी तर ते आवर्जून वाचावेत. ती म्हणते, "या प्रवासाने मला खूप काही शिकवलं, बदलवलं, समृद्ध केलं, मी खूप लांबचा पल्ला गाठला पण त्यातून रुजलेली शहाणीव माझे पाय कायम जमिनीवर ठेवते."

देशांमधल्या सीमारेषा तिने कधीच ओलांडल्यात, काही वर्षांनी भटकंती कमी करुन ती स्थिरावेलही पण तोवर तिची वैश्विक नजर ज्या उंचीवर पोचेल तिथून तिला माणसांमधल्या भिंतीसुद्धा दिसेनाशा झालेल्या असतील.

Friday, December 8, 2017

ब्लॉग ’ती’ चा - वेटलॉस तमाशा


पांढर्‍याशुभ्र लुसलुशीत वाफाळत्या उकडीच्या मोदकावर किंवा गरम खरपूस पुरणपोळीवर ताज्या कढवलेल्या साजूक तुपाची धार धरली आणि डोळे मिटून त्याचा घास घेतला की जे काही वाटतं त्याला ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतात. ’ऋणं कृत्वा घृतं पिबेत्.. यावत् जिवेत सुखम् जिवेत’ असं चार्वाकाचं वचन आहेच. कर्ज काढा पण तूप खा, थोडक्यात जीओ जी भरके. हं, मात्र दुसर्‍याच घासाला कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅट्स सारखे भयंकर शब्द, जिमची भरलेली फी वगैरे आठवू लागतं. परंतु ’साजूक तूप अवश्य खावं’ असं चक्क भारतातली एक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सांगत असेल तर! 
’५-१० वर्षांनी पाश्चात्य देशांनी साजूक तुपाचं महत्व मान्य केलं की मगच तुम्हाला हे पटणार आहे का? पचनशक्ती चांगली राखण्य़ासाठी, शरीराचं वंगण म्हणून, तुकतुकीत कांतीसाठी, कित्येक विकारांवर गुणकारी असलेलं साजूक तूप दररोज खायला हवं.’ ४ लाखांहून अधिक चाहते असणारी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर #RujutaDiwekar सोशल माध्यमांवर आणि तिच्या http://rujutadiwekar.blogspot.in
 (Rutuja's gyan) या ब्लॉगवर हे आवर्जून सांगते. विमेन अॅण्ड वेटलॉस तमाशा, डोंट लूज योर माइंड लूज युवर वेट यासारखी आहारशास्त्रावरची विक्रमी खपाची पुस्तकं तिच्या नावावर आहेत.

ऋजुता अनेक उच्चपदस्थ व्यक्तींची आहारविषयक सल्लागार, वेलनेस प्रशिक्षक असली तरी ती चर्चेचा विषय झाली ते करिना कपूरच्या ’साईझ झीरो’ #SizeZero प्रकरणापासून. परंतु या ब्लॉगवर ऋजुता लिहिते, "करिना साईझ झीरो झाली नव्हतीच, माझा आहारविषयक सल्ला मनापासून अमलात आणल्यामुळे आधीपेक्षा खुटखुटीत, चपळ झाली इतकच. शिवाय त्या चित्रपटाची, तिची, ती व्यावसायिक गरज होती. अमेरिकन व्याख्येनुसार साईझ झीरो म्हणजे 5’4” हून कमी उंचीची 32-24-32 मापातली स्त्री. शरीरसौष्ठवाच्या परकीय कल्पना भारतीय स्त्रीच्या शरीरयष्टीला मानवणार्‍या नाहीत तरीही त्यापायी प्रसंगी उपासमार सोसून साईझ झीरोच्या मागे लागणार्‍या मुलींना म्हणावे तरी काय!" ’वजन कमी करणं आणि ते आटोक्यात ठेवणं ही माझ्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे’ असं एखादी तरुण, उच्चशिक्षित, सक्षम स्त्री सांगते तेव्हा ऋजुताला अतिशय वाईट वाटतं. सगळं जगणं व्यापून टाकण्य़ाइतकं हे महत्वाचं आहे का! वजन नियंत्रणात असायलाच हवं पण ते आरोग्यासाठी, चांगल्या दर्जाचं आयुष्य जगता यावं म्हणून परंतु बहुतेक मुलींना वजन कमी करायचं असतं ते केवळ सुंदर दिसण्यासाठी.

ऋजुता सोशल मिडीयावर/ ब्लॉगवरच्या लेखातून तिच्या मनातली ही खंत मांडते," एकीकडे या मूर्ख मुली तर दुसरीकडे स्त्रियांना दुय्यम लेखण्याच्या मानसिकतेच्या बळी ठरलेल्या दुर्दैवी स्त्रिया. मुला-मुलींना घरी जशी वागणूक दिली जाते त्यानुसार त्यांची मानसिक घडण होते. मुलांमधली स्वामित्वाची आणि मुलींमधली दुय्यमत्वाची भावना प्रबळ होत जाते. याची परिणती ’मी नवर्‍याचं जेवण झाल्याशिवाय कशी जेवू’ या वरवर प्रेमळ भासणार्‍या विचारापासून ’रात्रीबेरात्री प्रवास करणारी मुलगी स्वत:हून अत्याचाराला निमंत्रण देते, त्यात मुलांचा काय दोष’ अशा विकृत टोकापर्यंत होऊ शकते. या मानसिकतेचा संबंध शारीरिक पोषणाशी आणि सुदृढ जीवनशैलीशी आहे. मुलींना ती नाकारली गेली आहे. खरं तर आपल्याला त्यांच्या ’साईझ झीरो’ची काळजी करायला हवी आहे. त्यांच्या निकोप वाढीसाठी शिक्षणाबरोबरच मुलभूत सुविधा द्यायला हव्यात. कोवळ्या वयात होणारी लग्नं आणि पाठोपाठ येणारं गरोदरपण रोखायला हवं. मन:शक्ती वाढवण्याबरोबरच त्यांना पुरेसं आणि सकस अन्न वेळेवर मिळतय का याकडे लक्ष द्यायला हवं."

आहारनियमनाच्या खुळचट कल्पनांबद्दल एका लेखात ऋजुता लिहिते," सूप सलाड खाऊन जीवाच्या आकांताने वजन कमी करणारे कायम जगावर वैतागलेले असतात त्यापेक्षा जे आवडतं तेच पण योग्य प्रमाणात खा. ’तांदुळाच्या नियमित सेवनामुळे तामिळनाडूत मधुमेही रुग्णांच्या प्रमाणात वाढ ?’ अशी काहीतरी बातमी वाचनात येते. ती पूर्ण न वाचताच, मधुमेहींनी किंबहुना सर्वांनीच भात खाणे अयोग्य हे गणित आपण डोक्यात पक्के करतो. खरं तर वरण/सार/आमटी/दही-भात, खिचडी हा अस्सल देशी पदार्थ आहे. आपल्या खाद्यजीवनातलं हे पहिलं प्रेम असतं. चार दिवस परदेशी फिरुन या, कधी एकदा तूप घालून लिंबू पिळून घरचा मस्त गरमागरम वरण-भात खातोय असं होतं पण आपण हा साधा सोपा रुचकर आणि पौष्टिक पदार्थ डाएटिंगच्या फॅड मुळे अकारण नाकारतो आणि सुखाचा जीव दु:खात घालतो." (खिचडी हा आपला राष्ट्रीय पदार्थ म्हणून घोषित झाल्याची मध्यंतरी चर्चा होती, असो वा नसो, खाद्यदिनाला खिचडी पकलीच. ऋजुता म्हणते म्हणून तरी तो खायला सरकारविरोधकांची हरकत नसावी )

मध्यंतरी एका गाजलेल्या टीव्ही मालिकेत पंजाबी ’प्राठा’प्रेमी लठ्ठ नायकाची काळजी घेणारी सालस बायको त्याचं वजन नियंत्रणात राहावं म्हणून त्याला पालकाचं सूप, फळांच्या फोडी असा डबा पाठवायला सुरूवात करते. यावर ऋजुता ’टीव्ही डाएट’ या लेखात तिला विचारते," फळं-भाज्यांचा सरफेस एरिया वाढला (फळ कापणं किंवा रस काढणं) की त्यातली पोषणमूल्य हरवतात हे तू शाळेत कधी शिकली नाहीस काय गो!" गोठवलेले हवाबंद डब्यातले पदार्थ, कॉर्नफ्लेक्स खाणं हे उच्च दर्जाच्या जीवनशैलीचं उदाहरण म्हणून जाहिरातींमधून भाबड्य़ा प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं जातं. बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यामध्ये तर एकाच वेळी तत्त्वचिंतक, इतिहासतज्ज्ञ आणि एक आहारतज्ज्ञ दडलेला असतो. जे या तज्ज्ञांमध्ये मोडत नाहीत त्यांची भलतीच पंचाईत होते. आहाराचा रोजच्या जगण्याशी संबंध असल्याने त्याविषयी परस्परविरोधी पोस्ट्स वाचून ते बिचारे गोंधळून जातात. उदा: ’पोळी नको भाकरी खा’, ही पोस्ट वाचून होत नाही तोच ’अंकुरित गव्हाचे फायदे’ नावाची पोस्ट येऊन पडते. गंमत म्हणजे बरेचदा ’सुख दु:खे समे कृत्वा..’ वृत्तीची एकच व्यक्ती या दोन्ही पोस्ट्स पाठवते. हे वाचल्यावर आणि जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले पदार्थ, भाज्या जर त्यांना सहज उपलब्ध होत नसतील तर आपण पालक म्हणून भलतेच बॅकवर्ड आहोत काय, आपल्या मुलांना चांगला आहार देत नाही की काय, या गंडाने ते पछाडले जातात....

अशा वेळी काय करावं! ऋजुताचा ब्लॉग किंवा सोशल लिंक्स उघडाव्या. त्यावरच्या या टिप्स मनातल्या बहुतेक प्रश्नांची नेमकी उत्तरं देतात. "ओट्स सारखे पदार्थ आपल्या मातीतले नाहीत, शिवाय ते बेचव आहेत. भारतीय हवामानाला ते पूरक नाहीत. केवळ फॅशन म्हणून खाद्यसंस्कृती का बदलायची? बदल म्हणून एखादेवेळी ठीक आहे एरवी पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर हा भारतीय चौरस आहार सर्वात उत्तम. शुगरफ्री पेक्षा प्रमाणात साखर खाणे योग्य. सणासुदीला थोडेफार जिभेचे चोचले पुरवायला काहीच हरकत नाही. डाएट करणे म्हणजे दुधी- कारल्याचा रस पिणे, काहीतरी नीरस, बेचव खाणे हा विचार डोकयातून काढा. दर दोन तासांनी थोडं थोडं खा. कमी खाण्यापेक्षा योग्य आहार घेणं महत्वाचं. राजासारखी न्याहारी, राणीसारखं भोजन आणि चाकरासारखं रात्रीचं जेवण म्हणजेच आदर्श आहारपद्धत असं नाही. आहार ज्याच्यात्याच्या शरीर प्रकृतीनुसार असावा. ऋतुमानानुसार तो बदला. सलग एका जागी ३० मि. हून अधिक बसणं टाळा. आठवड्यातून किमान १५० मिनिट व्यायाम करा."

असं म्हणतात आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसतं. काय खावं काय टाळावं याचा संबंध जितका आहारशास्त्राशी आहे तितकाच ’कॉमन सेन्स’ शी आहे. ऋजुता म्हणते तसं, वजनाचा काटा विकत घेण्यापेक्षा स्वत:च्या आहार-विहाराबद्दल स्वत:ला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. वाढत्या ताणाचा वजनावर परिणाम होतो. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉरवर्ड (पोस्ट्स नव्हे ) ही त्रिसूत्री वापरली तर बरेचसे ताण कमी होतील. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत:च्या शरीरासकट स्वत:चा मनापासून स्वीकार करा... (आणि हे सारं हलक्याफुलक्या शैलीत सांगणार्‍या ऋजुताचा इंग्लीश-हिंग्लीश ब्लॉग/पोस्ट्स खिचडीवर थोडी लसणीची चरचरीत फोडणी घालून (लसणाने चरबी कमी होते), कुरकुरीत पापडासह खात खात अवश्य वाचत राहा)