Friday, November 10, 2017

ब्लॉग ’ती’ चा - इंद्रधनु


समविचारी सख्यांचा समूहब्लॉग- इंद्रधनु

'सुखदुःखांचे, हळवे, कातर, हसरे, दुखरे, क्षण जपलेले.
श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे.
प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु.
त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू...'
असं म्हणत एकत्र आलेल्या मैत्रिणींना समूह-ब्लॉग लिहावासा वाटणं आणि ’स्त्री’ म्हणून आपल्या जाणीव-नेणीवांचे पदर उलगडत तो तब्बल ८ वर्ष लिहिता-वाहता ठेवणं हे मला विशेष महत्वाचं वाटतं. स्त्रीवादी पवित्रा न घेताही स्वत:चा शोध घेणारा हा ब्लॉग आजच्या सुशिक्षित मध्यमवयीन शहरी स्त्रीच्या मनोव्यापारांची नोंद घेतो. विद्या कुळकर्णी, अश्विनी केळकर, दीपश्री मुद्गल, वैशाली भिडे, स्मिता पाटकर, आशा कुलकर्णी, आणि वाचक यांचा मिळून हा ’ब्लॉग माझा २०१२’ पुरस्कारप्राप्त ब्लॉग ’इंद्रधनु’ http://asvvad.blogspot.in/ 
 या लिंकवर उपलब्ध आहे.

या पुण्यात राहणार्‍या मैत्रिणी सुखवस्तू आणि उच्चशिक्षित आहेत. अशा स्थानावरून कुणी स्त्री व्यक्त होत असेल तर त्याकडे ’काही नाही, सुख दुखतय यांना’ असं पाहणारे असले तरी त्या ’लोकेशन’पलिकडे जाऊन माणूस म्हणून तिला संवेदनशीलपणे समजून घेणारेही असतात. या ब्लॉगवर सर्वाधिक लेख लिहिणारी विद्या म्हणते," माझं लेखन हे माझं वय, माझं घडणं, माझी जात- वर्ग- वर्ण, मी ज्याचा भाग आहे तो आजूबाजूचा समाज, त्यातलं माझं स्थान, तिथून मला दिसणारं जग, याला तोडून नसणार आहे. माझ्या बिंदूवरून शक्यतो सगळीकडे पाहायचा प्रयत्न करीत मी लिहिते आहे. बाईला आत्मसन्मानाने जगायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे."
या ’ब्लॉगवर अनेक स्त्रीकेंद्री विषयांचा परामर्ष घेतलेला आढळतो. ’सांभाळण्यासाठी मने, माझे गिळावे मीपण.. ’ अशी इंदिरा संतांच्या शब्दातली खंत इथे नाही. पुरूषविरोधी सूर कुठेही नाही. ’दरवेळी भाजतंच असं नाही..पण धग असतेच आसपास’ हा कल्पना दुधाळ यांच्या शब्दातला वास्तवाचा स्वीकार मात्र आहे. तरीही ’मी पण’ अबाधित राखून या आजच्या स्त्रिया स्वत:कडे, नातेसंबंधांकडे आणि एकूणच भवतालाकडे नव्या स्वतंत्र दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतायत. हे सारं अतिशय मृदुपणे, कटूता टाळून, अनलंकृत शब्दातून, संवादी पद्धतीने समोर येतं.
काही लेखांमधून या मैत्रिणी बघण्य़ात आलेले हटके सिनेमे, नाटक यातलं वेगळेपण मांडतात, आपली सौंदर्याची तसच स्वातंत्र्याची व्याख्या तपासतात. आशा लिहिते, "प्रत्येक स्त्रीलाच ‘झाशीची राणी’ किंवा ‘किरण बेदी’ बनणे कदाचित आवडणारही नाही. काही स्त्रिया आवडीने आपल्या कर्तृत्वासाठी पारंपारिक क्षेत्रच निवडतील/निवडतात. पण निवडीचे स्वातंत्र्य/आधिकार स्त्री ला हवा हे महत्त्वाचे!" अर्थात आपण एखाद्या स्त्रीचं तिच्या आयुष्याबाबतचं स्वातंत्र्य मान्य करतो का हा प्रश्न ’लंच बॉक्स’ या चित्रपटाबद्दल दीपश्रीने लिहिलेल्या लेखातून उपस्थित होतो. ती लिहिते, "गृहिणी म्हणून समाजाच्या असलेल्या मर्यादा संभाळणा-या, जोडीदाराकडून अपेक्षित असणा-या भावनिक समाधान देणा-या गोष्टी दुस-या कोणा पुरुषाकडून मिळवणा-या, अश्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व इला ही व्यक्तिरेखा करते. सिनेमाची कथा म्हणून आपल्याला हे पटेलही, आवडेल सुद्धा. पण प्रत्यक्षात एखादी स्त्री आपल्या अवतीभोवती अशी असेल तर याकडे आपण कसे बघतो ते महत्वाचे. नाही का ?"
घरातल्या भांड्यांकुंड्यांवर सुद्धा कायम घरातल्या कर्त्या पुरूषाचच नाव घालायच्या प्रथेत आता होऊ लागलेला बदल वैशालीने एका लेखात टिपला आहे. अंगात येणं, देवधर्म-व्रत वैकल्य यावर या ब्लॉगवर स्पष्टपणे मत मांडलेली आहेत. वैशाली लिहिते, "एखाद्या बाईच्या अंगात येणं म्हणजे जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच." विद्या लिहिते, "आपण आपल्या सणवाराच्या, साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात. त्यात गंमत, मजा ही तर हवीच पण हे सारं समतेच्या पायावर उभं असायला हवं. परंतु आपल्या समाजातील समता कशी आहे? बायका पौरोहित्य करायला लागल्या. त्याने समाज पुढे गेला का? नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे. बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे त्यासाठी आदर्श बदलले पाहिजेत."
स्वयंपाक, स्त्री चं कमावणं, जगण्याच्या प्रवासात लक्षात राहिलेल्या बायका याविषयीची मनोगतंही या ब्लॉगवर लिहिलेली आहेत. एखाद्या लेखात स्वत:चा मन:पूत स्वीकार करायला शिकवणार्‍या आणि जगण्य़ातलं शहाणपण ओंजळीत टाकणार्‍या, ’यू कॅन हील युवर लाईफ’ ची लेखिका लुईस बद्दल विद्या कृतज्ञभावाने लिहिते. स्त्री-पुरूष मैत्रीबाबत आणखी एका लेखात मत मांडते, "जिवलग मित्र असण्याचा एक फायदा आहे की नवर्‍याला किंवा इतर पुरूषांना समजून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. अनुभवाचं वर्तूळ वाढवता येऊ शकतं. परंतु आपल्याकडे स्त्री-पुरूष मैत्रीचा काय इतिहास आहे? कृष्ण-द्रौपदी वगळता मला अशी मैत्री दिसत नाही."
दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयांपासून बलात्काराची भीती, बाल-लैंगिक अत्याचारापर्यंत, मनाच्या तळाशी गाडलेले अनेक ’का?’ इथे खुलेपणाने चर्चिले जातात. बालपणी जाणवले, साहिले त्यावर या माध्यमातून व्यक्त होऊन या सख्या मोकळा श्वास घेतात. अश्विनी तिच्या ताज्या लेखात दक्षिण गोव्यातल्या अनवट प्रदेशातल्या एका रेसॉर्ट वर भेटलेल्या परदेशी तरुणीबद्दल लिहिते. दिवसभर निवांतपणे भटकून रात्री काळोखात निर्भयपणे परत येणारी ही एकटी तरुणी पाहून अश्विनी विचार करतेय.. "असं खुल्या दिलानं, आजुबाजूच्या जगावर विश्वास टाकून, मोकळं होऊन एकटं हिंडणं आपल्याला यापुढेतरी कधी जमेल?"

स्मिताच्या लेखातून अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला जातो, "आजच्या आपल्या पिढीत पूर्वीपेक्षा बाईपणाची ओझी बरीच कमी झाली आहेत. आपली ती झुगारून द्यायची क्षमता पण वाढली आहे. पण त्यामुळे नवी ओझी तर निर्माण होत नाही आहेत ना? साधं मासिक पाळीचं उदाहरण घेऊ या, ५०% समाजाची ही दर महिन्याची शारीरिक अवस्था आहे तर त्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे असं आपण का वागतो?"
विद्या लिहिते," विवाहितेपेक्षा प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं ओझं जास्त असतं. कायम शरीराचं भान ठेवायचं, आपण एकातरी मुलाला जन्म दिला पाहिजे याचं, अगदी वॉशरूमला जाऊन येण्याचा कार्यक्रम बाहेर कसा पार पाडायचा याचं बायकांना ओझं असतं. कधी माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना या खोलवरच्या भीतीचं एक ओझं घेऊन बायकांना जगायला लागतं."
परंतु पुरूष म्हणूनही जगतानाही अनेक ओझी वाहावी लागतात याची जाण त्यांना आहे. या ब्लॉगचा वाचक सचिन लिहितो, शालेय जीवनात मी पुरूष आहे; किंबहूना मी ‘बायल्या‘ नाही, हे सिद्ध करण्याचं खूप मोठे ओझे घेऊन मी जगलो, अजून एक ओझं ‘कर्ता‘ असण्याचं."
नीरज लिहितो, "पुरुषासारखा पुरुष, आणि घाबरतोस काय" हे ही नक्कीच एक ओझं आहे. तर मिलिंद लिहितो, मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच जे शोषित/वंचित आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे."
एकूणच ही चर्चा म्हणजे सर्वंकष विचार कसा करावा याचा सुरेख नमुना आहे.
अर्थात या ब्लॉगवर अनेक महत्वाचे विषय अद्याप यायला हवे आहेत, स्वानुभवाचं सच्चेपण असलं तरी ती अनेकदा लेखाची मर्यादा ठरते. नवरात्रात नऊ रंग वापरण्य़ाच्या नव्या प्रथेवरची टीका किंवा काही आक्षेप वाचताना प्रत्येक कृती व्यक्तीस्वातंत्र्याच्या तागडीत घालून मोजण्याने त्यातला निखळ आनंद गमावला जात नाही का असंही वाटतं. त्याचबरोबर विद्या म्हणते तसं, विचारांच्या गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार याचं नेमकं भान हा ब्लॉग देतो. यावर उद्धृत केलेल्या जावेद अख्तर यांच्या कवितेतून आपली जगण्याविषयीची समजूतही वाढवतो.
" हे जग पुरूषांचं नाही की बाईचं नाही,
दोघांचं मिळून आहे...
हे जाणणार्‍या पुरूषा.......
तू खरा मर्द आहेस!"

Friday, November 3, 2017

’ब्लॉग ’ती’ चा’ - मीच माझा मोर

’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या माझ्या तरुण भारत- आकांक्षा मधील स्तंभातला आजचा लेख
गोव्यातल्या कुंकळ्ळीसारख्या छोट्या गावातून आलेल्या शेफाली वैद्य आज स्टार ब्लॉगर आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी आणि आंतरजालावरच्या विविध क्षेत्रांत त्या काम करतायत.
हजारो चाहत्यांना भावणारा, त्यांचा आत्मविश्वास जागवणारा शेफाली यांचा लेखनप्रवास विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोमाने आणि डौलात सुरू आहे. त्यातल्या वाटा, वळणांचा वेध घेणार्‍या त्यांच्या ब्लॉगबद्दल....
मीच माझा मोर - शेफाली वैद्य #ShefaliVaidya
समस्त भारतीय मूढ असून त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आपल्याच शिरावर असल्याच्या भ्रमात असलेल्या दोन्ही टोकाच्या मंडळींमध्ये एक सरळमार्गी गट समाजात मोठय़ा प्रमाणावर असतो. जगातल्या इतर देशांप्रमाणे भारतातही प्रचंड चांगल्या- वाईट उलथापालथी होत आहेत. परंतु फक्त नकारात्मक घटनांना अधोरेखित करून इतकी अस्वस्थता पसरवली जातेय की आपण भारतीय आहोत याचा त्याला न्यूनगंडच वाटू लागतो. अशा वेळी शेफाली वैद्य यांच्या http://mahamtb.com/authors/shefali_vaidya.html
 या ब्लॉगवरचा एखादा सणसणीत, चैतन्यदायी लेख ’तू चाल पुढं.. तुला रं गड्या भीती कुणाची’ म्हणत समोर येतो आणि कोणत्याही एका ध्रुवाला शरण न जाताही त्याला मोकळा श्वास घेता येतो.

जुन्यातलं कालबाह्य ते त्यागून, नव्यातलं योग्य ते निवडून आणि दोहोंचा समन्वय साधून आनंदाने जगता येऊ शकतं हा विश्वास देणार्‍या आणि कदाचित त्यामुळेच सोशल माध्यमांवर तब्बल ऐशी ते नव्वदहजार फॉलोअर्स (ज्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे) असलेल्या स्टार ब्लॉगर, पुण्याच्या शेफाली वैद्य. संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शेफाली मराठी, इंग्लीश आणि कोंकणीतूनही तितक्याच सफाईने रंजक पण परखड लेखन करतात. राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच पालकत्व, प्रवास, शिल्पकला आणि साडी या त्यांच्या आवडत्या वस्त्रप्रकाराबद्दल त्या सातत्याने उत्तम लिहितात. तरीही भारतीय अस्मिता जागृत ठेवणारं प्रखर लिखाण ही त्यांची खरी ओळख आहे.
पुरोगामी म्हणजे समाजाचं भलं चिंतणारा सुधारणावादी. परंतु या बिरूदाखाली केवळ द्वेषाचं राजकारण करणार्‍या अनेक स्वघोषित विचारवंतांचा समाचार घेत शेफाली घणाघाती लेखन करतात," 'मंगळसूत्र घालणं ही मानसिक गुलामगिरी आहे' म्हणणारे हेच लोक 'बुरखा घालणं हा मुसलमान स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे' हे ही तितक्याच जोरकसपणे सांगत असतात. दिवाळीला इतका खर्च करण्य़ाची गरज काय हा सामाजिक प्रबोधनपर संदेश स्वत: सीसीडीत अडीचशे रुपयांची कॉफी पीत आपल्या आय-फोनवरून टाईप करत असतात हे विशेष. काही प्रथांमध्ये अनावश्यक फाफटपसारा आलाय हे खरय. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक मूल्यपद्धतीप्रमाणे सण साजरे करायची पद्धत जरूर बदला पण सण साजरे करूच नका कारण ते वाईट आहेत असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर ते मुळीच ऐकून घेऊ नका."
तथाकथित पुरोगामींना 'लव्ह जिहाद' ही संकल्पनाच अमान्य आहे तर अंध प्रतिगामींना प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा 'लव्ह जिहाद' वाटतो. शेफाली वैद्य यांचे या विषयावरील संतुलित आणि अभ्यासपूर्ण लिखाण या ब्लॉगवर आहे. त्या लिहितात, "भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. ही पद्धत टाळून बिगरमुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद'. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा युक्तिवाद ग्राह्य धरूनच एनआयएला चौकशीचा आदेश दिला आहे. घटनेनुसार आपला जोडीदार निवडायचा अधिकार कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला असायलाच हवा, पण धर्मांतर म्हणजे काय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अश्या विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते आहे का? तलाक देऊन हाकलून दिले तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही."
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यमं. परंतु समर्थन किंवा विरोध हे एखाद्या व्यक्तीवर नव्हे तर मुद्द्यावर अवलंबून असावे हे भान विसरलेल्या बहुसंख्य माध्यमांचंही आज ध्रुवीकरण झालेलं दिसतय. अशा वेळेस तुम्हाला मिळणारी बातमी ही त्या त्या माध्यमाच्या धोरणानुसार ’मोल्ड’ होऊन आलेली असते. नुकतीच मुंबईत रेल्वेपुलावर चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली. पुलाच्या बाहेर उभा असलेला एक पुरुष आत अडकलेल्या एका बाईला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता, या पाच सेकंदांच्या क्लिपच्या आधारावर काहीही शहानिशा न करता 'मरणाच्या दारात असलेल्या बाईचाही मुंबईत विनयभंग होतो' अशा स्वरूपाची सनसनाटी बातमी प्रतिष्ठित वृत्तपत्र म्हणवणाऱ्या मीडिया कंपनीने प्रसिद्ध केली. "भारत हा देश स्त्रियांसाठी सुरक्षित नाही असे चित्र जगभरात पसरवणे हे असल्या कुटिरोद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांचे प्रमुख काम. तो पुरूष त्या बाईला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे उघड झाल्यावर ती बातमी मागे घेण्याची नामुष्की त्या वृत्तपत्रावर ओढवली." अशा सडेतोड शब्दात टीआरपीच्या हव्यासापोटी केलेला उद्योग शेफाली सप्रमाण उघड करतात. भारताबाबत खोटी बढाई मारणार्‍या माध्यमांचे तसेच प्रतिगाम्यांचे कान धरताना मात्र त्या फारशा आढळत नाहीत. तसे घडल्यास उलट त्यांच्या लोकप्रिय लिखाणाची विश्वासार्हता अधिक वाढेल.
गुरमेहेरचं काय करायचं?, गोरक्षक, सत्य आणि मीडियाचा विपर्यास, उरी बसलेला घाव, शहाबुद्दीन के शोले, स्वतःची शोभा करून घेणारी डे- अशा अनेक खणखणीत लेखांतून शेफाली यांची लेखणी तळपली आहे. वर्मावर बोट ठेवल्याने दुखावलेल्या विरोधकांनी शेफाली या मोदीसरकारच्या ट्रोल आहेत असा आरोप करत दुसर्‍या बाजूला स्वत: शेफालीविरोधातही ट्रोलिंगच केले आहे. त्यामुळे असेल, किंवा स्वत:चे आनंदनिधान असणार्‍या क्षेत्रांशी वाचकांचा परिचय करुन देण्य़ासाठी असेल, शेफाली इतर विषयातील लेखनातही अधिक रस घेऊ लागल्याचे जाणवते.
’एक धागा सुखाचा’ या सदरात त्या लिहितात, "काही माणसं कशी जुनी नाणी जमवतात, पेंटिंग्स, मूर्ती, शिल्पांचा संग्रह करतात, तशी मी साड्या जमवते. माझ्या लहानपणीची खास आठवण...आईने तिचं कपाट उघडलं की जुन्या रंगीबेरंगी रेशमी साड्यांचा, वाळ्याचा, कापराचा सुंदर, संमिश्र दरवळ खोलीभर पसरायचा. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेयस नात्यांचे ताणेबाणे मला तिच्या साड्यांमधून उकलले." या सदरातील इतर लेखांतून त्या लिनन, मुगा सिल्क, शिबोरी अशा विविध साड्यांमधली कलाकारी, त्या साड्या परिधान केलेल्या स्वत:च्या देखण्या फोटोंसह विस्ताराने उलगडतात. शिल्पकथा सदरात त्या ’मध्य प्रदेशातल्या उदयगिरी गुंफांमध्ये कोरलेल्या गजाननाच्या मूर्ती पासून कांचिपुरमचे किरातार्जुनीयम, उदयगिरीचा शेषशायी नारायण, देवीची विविध शिल्प याबाबत सचित्र माहिती देत साद्यंत वर्णन करतात.
श्रीदेवीचे पुनरागमन असलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात तिने चाळीशीतली, घरातल्या सगळ्यांनी गृहीत धरलेली मध्यमवर्गीय गृहिणी, लाडू करण्याचा घरगुती उद्योग चालवणारी छोटी उद्योजिका रंगवली आहे. ’आत्मभान’ या लेखात शेफाली लिहितात, "एकजण म्हणाली- त्या सिनेमासारखा माझ्या आयुष्यात थोडाच कुणी देखणा, समजूतदार फ्रेंच माणूस येणार आहे आता, जो मला आत्मभान मिळवून द्यायला मदत करेल? मी हसले, म्हटलं, 'तूच बन की तो फ्रेंच माणूस’". पु. शि. रेगेंच्या सावित्री ह्या पुस्तकातली राजम्मा एक गोष्ट सांगते. त्यातल्या छोट्या लच्छीला मोर सतत आपल्या अंगणात नाचावा असं वाटत असतं. पण मोर स्वच्छंदी असतो. तो अट घालतो की त्यासाठी लच्छीने स्वतः आधी आनंदाने नाचायला हवं. शेवटी मोराची वाट बघणं हे कारणच गळून पडतं आणि लच्छी स्वतःच मोर बनून आनंदविभोर होते." तारणहाराची वाट पाहण्यापेक्षा ’मीच माझा मोर’ हे शेफाली यांचं लेखन वाचत गेलं की नीटच कळतं.

Friday, October 27, 2017

ब्लॉग ’ती’ चा- मिसेस फनीबोन्स

मिसेस फनीबोन्स - ब्लॉग ट्विंकल खन्नाचा

"अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर तुमची नजर आणि कान तीक्ष्ण हवेत. दृकश्राव्य माध्यमातून तुम्ही जे टिपता ते आत झिरपतं आणि उमटतं. माझ्या बाबतीत मात्र पाहिलेलं वा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळे मी लेखिका म्हणून यशस्वी परंतु अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले. पण मला त्याची खंत वाटत नाही कारण त्या क्षेत्रात काही काळ का होईना, वावरल्यामुळेच माझ्या अनुभवांची व्याप्ती वाढली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला माझा आयुष्य़ाचा जोडीदार (अक्षयकुमार) मिळाला". माजी सिनेअभिनेत्री ट्विंकल खन्ना फर्स्टपोस्ट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अशी प्रांजळ कबुली देते. डिझाईनिंग बरोबरच इंग्रजी लेखनाच्या क्षेत्रात जिचं नाव झळकतंय अशी ही ’मिसेस फनीबोन्स’. मला स्वत:ला शोधता आलं. विवंचना विसरता आल्या, ते केवळ मी लेखनात रमल्यामुळेच, असं म्हणणारी ट्विंकल तिच्या ट्वीट्स बरोबरच (https://blogs.timesofindia.indiatimes.com/mrsfunnybones या लिंकवर) ब्लॉगलेखिका म्हणूनही गाजते आहे.

काही दमदार अभिनेत्रींचा अपवाद वगळता व्यावसायिक हिंदी सिनेमातल्या नायिका म्हणजे सुंदर, कचकड्य़ाच्या बाहुल्या, त्यांना मेंदू नावाचा अवयवच नसतो असा सार्वत्रिक समज आहे. साहजिकच ही माजी अभिनेत्री जेव्हा ब्लॉगर- लेखिका म्हणून प्रसिद्ध होऊ लागली तेव्हा लिहिता हात दुसर्‍याच कुणाचा असावा असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. परंतु ती घोस्ट रायटर वापरत नाही हे लवकरच सिद्ध झालं. ती फार तर सिने-गॉसीप्स लिहू शकेल हा कयास देखील तिने अनेक विषय लीलया हाताळून खोटा ठरवला. ती म्हणते," मी वर्गातली सर्वात लठ्ठ मुलगी होते. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार कवितेवरून ’लाईक अ ’टी पॉट’ इन द स्काय’ अशी माझी कुचेष्टा होत असे. त्या न्यूनगंडातून बाहेर पडायला मला पुस्तकांनी मदत केली, आधार दिला." माणसातल्या गुणदोषांचं आणि वास्तवाचं दर्शन निखळ विनोदातून घडविणारे पी.जी वुडहाउस हे तिचे सर्वात आवडते लेखक. त्यांच्या प्रभावामुळे असेल, हलक्याफुलक्या शब्दातली तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ मांडणी हे तिच्या लेखनाचं वैशिष्ट्य ठरलं.

कलकत्त्याच्या एका नामांकित संस्थेने प्रसिद्ध ब्लॉगर-लेखिका म्हणून एका कार्यक्रमात ट्विंकलला आमंत्रित केले होते. तिच्या खुसखुशीत शैलीबाबत बोलताना ती म्हणाली," विनोद हा अत्तरासारखा असतो. माणसाच्या जीवनात सर्वात निर्मळ आणि नितळ गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे हास्य." साहजिक तिच्या प्रत्येक लेखाचा विषय गंभीर असला तरी ती तो खोचक पण खेळकर पद्धतीने मांडते. उदा: एखाद्या लेखात पंतप्रधानांच्या आश्वासनांच्या खैरातीकडे लक्ष वेधत ती त्यांना सांताक्लॉजची उपमा देते तर दुसर्‍या लेखात तृतीयपानी चमको स्त्रियांना it is books over botox अशा कानपिचक्या देते. आपण आहोत तिथेच (तसेच) राहण्यासाठी घाम गाळत वेगाने पण जागीच सायकल चालवतो या विसंगतीवर लिहिते तर कधी राम रहीम सारख्या लोकात आपण सूर्य शोधतो आणि फसतो, ही आपलीच चूक असल्याचं ती लिहिते. स्त्रियांच्या मासिकधर्माबद्दलचे गैरसमज, पूर्वग्रह लयाला जावेत आणि त्याबाबत मोकळा संवाद सुरू व्हावा असं ती कळकळीने लिहिते.  ’Two-legged animals on the loose’ हा स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी करणार्‍या जनतेच्या मानसिकतेबाबत लिहिलेला लेख असो किंवा दर वर्षाच्या जानेवारी महिन्यात उत्साहाने संकल्प करणार्‍या, स्वत:सकट समस्त आरंभशूर व्यक्तींची खिल्ली उडवणारा Ze way I learn ow to speak French हा लेख असो, तिची लेखणी वाचकांना गुंतवून ठॆवते.

भारताने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी अवश्य करावे असे काही ’जुगाड’ ती एका विडंबनपर लेखात सांगते. थाळीफेक ऐवजी मुखरसाची लांबवर पिचकारी टाकण्याची स्पर्धा घ्यावी. ट्रॅकवर धावण्य़ाच्या स्पर्धेपेक्षा भरपूर खड्डे असलेल्या रस्त्यांवर अडथळ्याची शर्यत ठेवावी. बालपणापासून ही कौशल्ये अंगी बाणवलेले भारतीय अशा स्पर्धा नक्कीच जिंकतील- अशा उपहासगर्भ शब्दात ती वस्तुस्थिती मांडते. अथेन्स ऑलिंपिक मधल्या कास्यपदक विजेत्या सीता साहूला जर आज पाणीपुरी विकून गुजराण करण्याची वेळ येत असेल तर कोणते पालक स्वेच्छेने आपल्या मुलांना क्रीडाक्षेत्रात ’ढकलतील’, असा परखड सवाल ती या लेखात करते. एकाच कालखंडात अमेरिकेने पटकावलेल्या ९७६ सुवर्णपदकांची भारताने मिळवलेल्या हाताच्या बोटावर मोजण्य़ाइतक्या सुवर्णपदकांशी तुलना करत ती खेळाकडे पाहण्याच्या भारतीय आणि सरकारी मानसिकतेवर नर्मविनोदी भाष्य़ करते.

ट्विंकल एक सजग आणि संवेदनशील आई आहे. ब्लु व्हेल गेम चे परिणाम पाहून इतर कोणत्याही पालकांसारखी ती ही धास्तावलेली आहे. त्यावर तिने लिहिलेला मुलाशी झालेल्या संवादावर आधारित विनोदी तरीही कातर करणारा लेख आजच्या शहरी टीनएजर मुलांची विचारपद्धती आणि पालकांचा भाबडेपणा यातल्या विरोधाभासाकडे निर्देश करतो. मुलीशी सापशिडीचा खेळ खेळताना मुलांच्या आयुष्य़ातल्या चढउतारांबद्दल, आणि एकूणच पालकत्वाबाबत तिने व्यक्त केलेले परिपक्व विचार या लेखात मुळातून वाचायला हवेत.

विवाहानंतर बहुतेक स्त्रिया नव्या आडनावाने नव्या जगण्य़ाला सुरूवात करतात. ट्विंकल मात्र अक्षयकुमारच्या भाटिया या आडनावाऐवजी खन्ना हे माहेरचेच आडनाव वापरते. या संदर्भात तिला अनेकांनी टोकलं. प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या #MarriedNotBranded हे तिच्या लेखाचं शीर्षकच खरं तर या मंडळींना उत्तर द्यायला पुरेसं आहे. यात ती लिहिते, शहरं, रस्ते यांच्यासारखं स्त्रियांचंही नामांतर होतं. त्या आपलं पुर्वायुष्य़, आपली ओळख जणू पुसून टाकतात. हरकत नाही पण हा निर्णय़ त्या स्त्रीचा असावा. तिच्यावर थोपवलेला नसावा. माझी लेक सध्या आईवडिलांची अशी दोन्ही आडनावं लावते. जाणती झाल्यावर तिने ठरवावं यापैकी कुठलं आडनाव लावायचं, दोन्ही लावायची, इतर कुठलं लावायचं की कोणतच लावायचं नाही.

मध्यंतरी आपल्या देशात पॉर्न संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावर ’पिंग पॉर्न पाँग’ या लेखात तिने अनेक अर्धवटरावांची रेवडी उडवली आहे. पॉर्नकडे बघण्याचा काही भारतीयांचा गोंधळलेला तर बहुसंख्य जनतेचा दुटप्पी दृष्टीकोन ट्विंकल धमाल शब्दांमधून मांडते. हेतू योग्य असला तरी बंदीबाबतच्या तांत्रिक मर्यादांचे भान आल्यावर यातला फोलपणा शासनाच्या लक्षात आला असावा. ती लिहिते," ही बंदी घोषित झाली आणि देशात हाहा:कार माजला. सुमारे साडेबारा कोटी पुरूष आणि पन्नास एक स्त्रिया किंचाळत, विव्हळत निराशेच्या गर्तेत कोसळल्या. परंतु लवकरच ही बंदी मागे घेण्यात आली आणि कुणाला आजवर फारशा माहित नसलेल्या ८५७ तथाकथित पॉर्न कम इनोदी, बंदी फेम वेबसाईट्स उलट अधिकच प्रसिद्ध झाल्या."

मात्र ट्विंकलच्या लेखांमध्ये विनोदाच्या आवरणाखाली बरेचदा नकारात्मकता लपलेली आढळते. एखाद्या गुंतागुंतीच्या प्रकल्पावर टीका करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास न करता एकांगी मतप्रदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील ऐकीव समस्यांबद्दल तिला आस्था आहे पण तिथल्या उमेद वाढवणार्‍या विकासकामांबद्दल ती लिहित नाही. एकंदर ’जीपीएस’च्या कक्षेत येतील त्याच विषयांबद्दल ती लिहू शकते अशी टीकाही तिच्या काही चाहत्यांनी तिच्याच शैलीत केली आहे. The fascination of shooting as a sport depends almost wholly on whether you are at the right or wrong end of the gun हे ट्विंकलच्या लाडक्या वुडहाऊस यांचं मार्मिक विधान. तिने वाचकानुनय करावा असं नव्हे पण जगण्य़ातली विसंगती अधोरेखित करणं आणि आत्मपरिक्षण करायला वाचकाला भाग पाडणं हे जर तिच्या लेखनाचं उद्दिष्ट्य असेल तर हे विधान तिने लक्षात घ्यावं आणि एकूण प्रतिक्रियांकडे गांभीर्याने पाहावं. सामाजिक विसंगतीवरचे विनोद आणि त्याविषयी काळजातून उठणारी वेदना सारख्याच सामर्थ्याने व्यक्त करता आली तरच ते लेखन करमणुकी पलिकडे जातं आणि वाचकांना भिडतं. तसं झालं तर आपल्या ’फनीबोन’ला स्पर्श करणारं ’मिसेस फनीबोन्स’चं क्रिस्पी, दिलखुलास लिखाण आपल्या हृदयालाही नक्कीच स्पर्शून जाईल.