Friday, October 15, 2021

ते आणि आपण : US | India

 गेल्या काही लेखांमध्ये अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया परिसरातली स्थळं आणि घटनांचं धावतं वर्णन होतं. आज मात्र फक्त काही तुलनात्मक नोंदींबद्दल.

दरम्यान एक सुंदर कॅथेड्रल पाहिले होते. गाभारा म्हणता येईल असा मुख्य भाग भव्य होता, छत मान दुखेल इतके उंच, सुरेख आरस्पानी कोरीव काम. तिथली प्रकाशयोजना तर खिळवून ठेवणारी होती. तळघरात Bishop धर्मगुरुंचे बाप्तीस्मा, लग्न, अंत्यविधी इ. प्रसंगानुसार वेगवेगळे पोशाख काचेच्या कपाटात टांगलेले दिसत होते. जवळच महिला प्रसाधनगृह होते. तिथे चक्क सॅनिटरी नॅपकीन्स ठेवलेले होते. कॅथेड्रलमध्ये !! मासिक धर्म व धर्म याची गल्लत न करता त्याचा इतका शांतपणे स्वीकार आपल्याकडे होईल का! गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर ’अशा’ महिलांनी प्रवेश करु नये, असे स्पष्ट लिहिले आहे. अनेक धार्मिक ठिकाणी असे लिहिलेले असते किंवा अध्याहृत असते. जिला त्रास होतो, आराम हवा आहे ती अशा वेळी मंदिरात काय कुठेच जाणार नाही, जाऊही नये पण जी खास तिथे दर्शनाला आली आहे तिला या कारणाने दर्शन नाकारणे मग ते ’देवी’चे देऊळ असले तरी, हे सगळे अतार्किक तर आहेच पण दुर्दैवी आहे. ती सूचना वाचताना मला हे कॅथेड्रल पुन्हा आठवले होते.

मी आता सौ चिकन खाके शाकाहारी झालेली बिल्ली असल्याने रोजचे जेवण ही एक दिव्य परिक्षा असे. आपल्याकडे पाहुण्याला तो हात आडवा धरुन गयावया करेतो आग्रह केला तरच आपण चांगले यजमान असल्याचं सिद्ध होतं असं आपण मानतो, त्यात अर्थात भारतीय आतिथ्यशीलतेचा भाग असतो हे खरंय तसंच वाढत्या वयाबरोबर आपल्याकडच्या आग्रहाची भीती वाटू लागते हे ही. इकडे आम्हाला किचनमध्ये कुठे काय आहे ते होस्ट दाखवून देत. स्वागताची मेजवानी आटोपली की त्यांचे कर्तव्य संपे. गोदरेज कपाटाहून मोठ्या फ्रीजमध्ये दूध, लोणी, जॅम, चीज, भाज्या, ज्यूसेस आणि सॉसेस हे किमान असायचेच. घरात पाव आणि तांदूळ असत. त्यामुळे पोळी जरी मिळत नसली तरी आम्ही संशोधन करुन बरेच इंडोवेस्टर्न खाद्यप्रकार शोधून काढले. बाहेर गेलो की मात्र आमची विशेषत: माझी पंचाईत होई. मोठ्या क्लब मिटिंग असल्या की आपल्या अ‍ॅवॉर्ड फंक्शन सारखी गोल टेबलांची रचना असे. बोके आणि मांजरींना सुटाबुटात बसवले तर जसे दिसेल तशी मंडळी आजूबाजूला असत. ते खात असलेले पदार्थ अनोळखी असत. एकदा व्हेज प्लॅटर मागवली तर बशीत हे माँ माताजी!! उकडलेली भेंडी आणि परतलेली अळणी पानकोबी आली. बरं हॉटेलमधला मेनू पण इतक्या फॅशनेबल शब्दात लिहिलेला असे की त्यावरुन आत काय घातलंय याचा अंदाज येत नसे. धिप्पाड सहा फुटी वेटरशी एकमेकांना समजेल अशा इंग्लीशमधली चर्चा निष्फळ ठरली तर ज्यूस मदतीला येई. हॉटेलमध्ये आपल्याकडच्यासारखं पाणी आणून ठेवलेलं नसे. कोणतंही पेय इतकं काठोकाठ भरुन देत की आम्ही ’खाली ग्लास’ मागवून ते शेअर करत असू पण पानात काही टाकत नसू. त्यांना हे विचित्र वाटे कारण तिकडे सहसा आई पण मुलाचे उष्टे खात नाही. एकंदर ’टाकणे’ हा प्रकार तिकडे अगदी सर्वसामान्य आहे. टाकणं हा अन्नब्रह्माचा अपमान आहे मग बिल कुणी का देईना हे आम्ही त्यांना समजावून सांगत असू.आपल्याकडे सुद्धा अन्न टाकणे प्रकार असतोच पण अमेरिकेत दिवसभरात जितकी अन्नाची नासाडी दिसते त्यात एक विकसीनशील देश त्या दिवसापुरते पोट भरू शकेल असे वाटते. 

व्हिक्टर्स कॅफे नामक १०० वर्षांची परंपरा असलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपाहारगृहात आम्ही गेलो होतो. आम्ही व फिली क्लबचे ५,६ जण मिळून. चपळ हालचाली करणारे चुणचुणीत वेटर आणि वेट्रेस अगदी तरुण विद्यार्थी असावेत असं वाटत होतं. अचानक घंटा घणघणली. दरवाज्यात उभ्या असलेल्या वेट्रेसने खड्या आवाजात एक छोटीशी कथा सांगितली. फ्रेंच राजकन्या आणि तिचं दुभंगलेलं हृदय असं काही त्यात होतं. हे सांगून होताच आम्ही दचकलो इतक्या तार स्वरात ती गाऊ लागली. आपल्या संगीतनाटकांमधल्या पदांसारखा हा ओपेरावजा गायनप्रकार होता. ती वेट्रेस त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत होती असे कळले. असे अनेक होतकरु कलाकार तिथे गायक कम वेटर म्हणून काम करतात आणि आपली कला सादर करतात. हेच या कॅफेचं वैशिष्ट्य. इथला अनुभव म्हणे त्यांच्या कलाविश्वातील करियरमधला मह्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंही तिथे कामाचा आणि खानदान की इज्जतचा काही संबंध नसतो. एका उच्चभ्रू जोडप्याने तर आम्हाला त्यांची मुलगी सकाळचं कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी जिथे वेट्रेस म्हणून काम करायची त्या रेस्टॉरंटला आवर्जून जेवायला नेलं होतं. (तर हे गायन प्रकरण आटोपल्यावर आमच्या ग्रुपमधल्या एकाचा वाढदिवस केक मागवून आम्ही साजरा केला आणि ’बार बार दिन ये आये’ हे आपलं युगानुयुगाचं कंपलसरी बड्डेसॉंग कोरस मध्ये म्हटलं. उपस्थितांसाठी अगम्य असणार्‍या या गाण्यात शेवटी ’हॅपी बर्थडे टू यू’ हा भाग इंग्लीशमध्ये असल्याने सर्वांना कळला आणि अख्ख्या हॉटेलमधल्या मंडळींनी टाळ्या पिटून ग्लासेस उंचावून त्याला विश केलं.) कोणत्याही कामाला कमी न लेखणे हा अमेरिकेचा मला सर्वात आवडलेला गुण.

एका ग्रामपंचायतीला (नाव टाळते आहे) भेट दिली असताना तिथल्या समुपदेशिकेला गावातल्या सोयी आणि समस्यांबद्द्ल विचारले. एक तर अशी पोस्ट तिथे असणं हे मला नवलाईचं वाटलं. आपल्याकडच्या पंचायत समिती किंवा तत्सम कचेर्‍यात गेल्यावर आपण अगदी अडाणी असल्याचं फीलिंग येतं. इकडे व्यवस्थित पाट्या, हसरी देखणी स्वागतिका. छताला झुलणारं एकही जाळं नाही, मध्ययुगीन काळातले वाटणारे निराशावादी पंखे नाहीत. फायलींवर धूळ असायला फायलीच नाहीत कारण सगळीकडे चकचकीत कपाटं. हा, तर त्या समुपदेशिकेला त्या पोस्टींगचं कारण विचारलं. ती म्हणाली, १२-१३ वर्षांच्या कुमारी माता ज्याला ते किड्स प्रेग्नंसी म्हणतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मोठ्या हॉस्पीटलमध्ये प्रसूतीचा खर्च प्रचंड. शाळेतल्या मुलींना लैंगिक शिक्षण देण्याऐवजी गर्भनिरोधक वाटावी लागणं, शाळेत सोबत कोणी हत्यार, बंदूक आणलेली नाही ना हे तपासण्यासाठी मेटल डिटेक्टर बसवावे लागणं ही तिथली शोकांतिका ऐकून धस्स झालं. योग्य अयोग्य याची निवड करण्याची समज वाढवण्याऐवजी ते तात्पुरती मलमपट्टी करतायत असं जाणवलं. नंतर सॅल्व्हेशन आर्मी (पुनर्वसन) केंद्र पाहिलं. तारवटलेल्या लालसर डोळ्यांचे, भकास चेहर्‍याचे गर्दुल्ले किंवा पियक्कड तिथे टीव्हीवर चमत्कारिक सिनेमा पाहत कसेही वेडेवाकडे बसले होते. कर्कश्य संगीत सुरु होतं. चित्रविचित्र कपडे, पिळापिळाच्या केशरचना, बहुतेक सगळे ब्लॅक. संसार टिकण्याचं प्रमाण कमी, पोरांचं लेंढार सांभाळत एकटं राहिलेल्या नशेच्या आहारी गेलेल्या, डिप्रेशनमधल्या जंकफूडच्या अतिसेवनाने लठ्ठ झालेल्या बायका, अशा एकल पालकांची भणंग बेकार अल्पशिक्षित मुलं. हे सुद्धा चकाकत्या अमेरिकेचं विदारक रुप आहे. आपल्याकडेही आता या समस्या खूप वाढत असल्या तरी याबाबतीत आपण त्यांच्यापेक्षा थोडे मागासलेले आहोत.

एका होस्टच्या मित्राला आम्हाला काही ठिकाणं दाखवायची जबाबदारी दिली होती. रस्त्यात मध्येच गाडी थांबवून त्याने आम्हाला एका घराशी नेलं. घर अगदी टिपिकल अमेरिकन पद्धतीचं. एका बाजूला गॅरेज, हिरवंगार लॉन, घराची पांढरी आणि राखाडी पण टवटवीत रंगयोजना. घर बंद होतं. मागच्या खिडकीत एक वेगळाच शोपीस लटकत होता. त्याने त्यावरुन हात फिरवला. ’अजूनही हा इथंच आहे’ म्हणत हसला. आम्हाला काही कळेना. मग त्याने सांगितलं की तो आणि त्याची आधीची बायको इथे ५ वर्ष राहत होते. मग आम्ही हं म्हणणार तर तो पुढे म्हणाला की हे घर त्या बायकोच्या आधीच्या नवर्‍याचं आहे. आम्ही ’जोड्या लावा’ खेळत होतो तोच तो म्हणाला की त्याच्या बायकोचा (ह्याच्या) आधीचा नवरा म्हणजे घराचा मूळ मालक आणि त्या नवर्‍याची आताची बायको सध्या तिथे राहतात पण ते नेमके कुठेतरी गेलेले दिसतायत. हे घर आतून खूप सुंदर आहे आणि वाटेवरच होतं म्हणून तुम्हाला जस्ट दाखवायला आणलं होतं. हे सगळं ऐकून आम्हाला घेरी यायची बाकी होती. या क्षेत्रात भारतीय फारसे मागे नसले तरी त्यात अद्याप तरी इतकी चक्रवाढ व्याजाची गुंतागुंत निर्माण झालेली नाही. आपलं ८ वं लग्न (चुभू देणेघेणे)  आपल्याच पहिल्या नवर्‍याशी पुन्हा करणारी एलिझाबेथ टॆलर आठवली. आम्हा सर्वांचे आधीचे आणि आत्ताचे नवरे व बायका तेच असल्याबद्दल आम्हाला एकदम हायसे वाटू लागले. :-)  

शेवटी एक नोंद राजकारणाबद्दल. गांधीजी ही तेव्हा बहुतेक मध्यमवर्गीय अमेरिकनांना माहित असणारी महत्वाची एकमेव भारतीय व्यक्ती होती. वॉशींग्टनला भारतीय वकिलातीसमोर त्यांचा पुतळा आहे. आपल्याइकडे मात्र अमेरिकेच्या राजकारणावर तावातावाने चर्चा होते. आपल्याला नुसते त्यांचे राष्ट्राध्यक्षच नव्हे तर मोनिका ल्युएन्स्कीपासून मिशेल ओबामापर्यंत, रिपब्लिक डेमोक्रॅट पक्षांबद्दल बरच काही माहित असतं. त्यांना आपली बीजेपी, कॉंग्रेस वगैरे काहीही माहित नसायचं (तेव्हा तरी) लिंबूटिंबू पक्ष तर जाऊच द्या. कारण अमेरिका हेच त्यांचं जग आहे. मार्क ट्वेनने उपरोधाने म्हटलं होतं, अमेरिकेला भूगोल कळावा म्हणून बहुतेक जगात युद्ध होत असावीत. तर तेव्हा ओबामा आणि हिलरीपैकी कुणाला तिकिट मिळेल याची चर्चा होती. माजी अध्यक्षाची बायको म्हटल्यावर ती जास्त प्रसिद्ध असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात या महासत्तेची अध्यक्ष एक स्त्री कधीच होऊ शकत नाही हेच जनतेचं साधारण मत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आजही कमला हॅरिस उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. आपल्याकडे एका दशकाहून जास्त इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ममता, जया, मायावती, सुषमा स्वराज यांच्यासारख्या भिन्न मतप्रवाहाच्या, विवाद्य पण पंतप्रधानपद सांभाळण्याचं पोटेन्शिअल असलेल्या आणि अत्यंत यशस्वी राजकीय कारकीर्द करणार्‍या महिला आठवून मला जरा बरं वाटू लागलं.

आज इतकंच.  ☺

Tip- The context is Year 2007

Sunday, August 8, 2021

जेता

 कुठून येते ही उर्जा?


ज्या लक्ष्यपूर्तीसाठी कित्येक वर्षे तहान भूक हरपून मेहनत करायची, तो सुवर्णक्षण पुढ्यात असताना प्रतिक्रियांची पर्वा न करता अत्युच्च त्याग करायचा, ही जोखीम मोठीच. खेळाडूंमध्ये कुठून येत असेल हा अदम्य विश्वास? या कृतीमागे आंतरिक कौल असतो, की समयोचित तत्परता? देशातील कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर डोक्यावर सांभाळत अशी कृती करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही असतात असे काही जीव, जे जीवापाड परिश्रमांसमोरही मनाच्या प्रामाणिकतेशी सलगी करतात. एखादा सामना हरताना त्यांनी क्षणार्धात जगाला जिंकून घेतलेले असते. त्यागमूर्तींची यादी संपत नाही. आत्मबळ पेरणारी अशी व्यक्तिमत्वे देशाचाच गौरव वाढवितात. निवडक दाखल्यांचा उजाळा माणुसकीच्या उद्घोषाला प्रेरक ठरेल.

१९८८ चे सेउल ऑलिंपिक. कॅनडाचा लॉरेन्स लेमिक्स अटीतटीच्या नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेला होता. स्पर्धा सुरु असताना दुसर्‍या एका शर्यतीतली नाव उलटलेली पाहून तो चक्क आपली शर्यत सोडून नौकेसह त्यांच्या मदतीला धावला. या गोंधळामुळे स्पर्धा संपली तेव्हा तो २२ व्या स्थानावर होता पण त्याला विशेष पदक देऊन गौरवण्यात आले. 

१९९८ चे हिवाळी ऑलिंपिक. नॉर्वेचा बिजॉर्न डेहेल पुरुषांची क्रॉस कंट्री स्कीइंग स्पर्धा जिंकला. केनियाने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. केनियाच्या फिलिप बॉईटसाठी जिंकणे तर दूरच, १० किमी अंतर पार करणे हेच मुळात मोठे आव्हान होते. बिजॉर्नने आपला पदकग्रहण सोहळा फिलिप्स अंतिम रेषा ओलांडेतो थांबवला. त्याचे स्वागत केले आणि मगच पदक स्वीकारले.

२०१६ चे रिओ ऑलिंपिक. न्युझीलंडची निकि हॅम्ब्लेन आणि अमेरिकेची अ‍ॅबे अगोस्तीनो महिलांच्या ५००० किमी रॅलीच्या पात्रता फेरीतच एकमेकींना अडकून पडल्या. अ‍ॅबेला चांगलीच दुखापत झाली होती पण दोघींनी एकमेकींना आधार, प्रोत्साहन देत कसेबसे पण पूर्ण अंतर पार केले. शेवटी पोचूनही त्यांची निवड करण्यात आली. 

२०२१ चे टोकोयो ऑलिंपिक. उंच उडीच्या अंतिम स्पर्धेत इटलीचा जिअनमार्को तंबेरी आणि कतारचा मुताझ इसा बरशीम यांच्यात सुवर्णपदकासाठी स्पर्धा सुरु होती. दोघांनीही सारखीच उंची गाठली त्यामुळे टायब्रेक झाला. पुढच्या ३ संधींबाबत असेच घडले. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारचे सुवर्णपदक निश्चित होते तरीही त्याने सुवर्णपदक जिअनमार्कोशसह वाटून घेतले.  

’जो जीता वोही सिकंदर’ हेच जगाचे खेळाकडे पाहण्याचे साधारण सूत्र आहे. या पार्श्वभूमीवर ही सगळी उदाहरणे वेगळेच काही सांगत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवून कर्णधार अजिंक्य राहणे त्यांच्या घरी पोचला. अतिउत्साही क्रिकेट चाहते हे यश साजरे करण्यासाठी ’कांगारु’चे प्रतीक असलेला केक घेऊन गेले. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे तेव्हा हा केक कापून मी त्यांचा अनादर करणार नाही असे अजिंक्यने नम्रपणे स्पष्ट केले. खेळाच्या गाभ्याशी इतक्या निखळ, सच्च्या प्रेरणा असू शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशी आज परिस्थिती आहे. 

खेळात अधिकाधिक अर्थकारण गुंतल्यापासून बहुतेक खेळाडूंना जिंकायचे आहे ते आर्थिक लाभासाठी. विशेषत: लीग स्वरुपाच्या खेळात तर खेळाडूंवर बोली लावली जाते त्यामुळे कसे जिंकावे यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. उत्तेजक द्रव्यांची मदत घेतली जाते. मॅच फिक्सींगपासून अनेक नियमबाह्य प्रकार सर्रास केले जातात. ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामत याने मध्यंतरी एका ऑनलाइन चॅरिटी सामन्यादरम्यान बुद्धीबळातील माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता. नंतर कामतला आपण संगणकाच्या मदतीने फसवणूक केल्याची कबुली द्यावी लागली. खेळात कायम जिंकावे असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातून मिळणारी प्रचंड प्रसिद्धी हे यावरून लक्षात येईल. 

जिंकायलाच हवे असे वाटण्यामागचे तिसरे आणि सर्वाधिक भावनाप्रधान कारण आहे राष्ट्रप्रेम. क्रिकेट जणू धर्म असलेल्या आपल्या देशात क्रिकेटखेळाडूंना जवळपास देव मानून मनात त्यांची प्रतिष्ठापना करणारे चाहते सामना हरल्यावर त्याच खेळाडूंचे पुतळे करून जाळायला मागेपुढे पाहात नाही. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तर जणू मैदानावरचे युद्ध मानले जाते. तिथली हार-जीत ही संघाची नव्हे तर देशाची हार-जीत मानली जाते. देशाची अब्रू खेळाच्या मैदानावर जणू पणाला लागते. ऑलिंपिकमधल्या एकेका पदकाच्या प्राप्तीकडे तर अवघा देश डोळे लावून बसलेला असतो. खेळाडू तिथे देशाचे प्रतिनिधी म्हणूनच जात असतात. मीराबाई चानूने कास्यपदक मिळवले तरी ते फक्त तिचे पदक नसते. देशाच्या आकांक्षांच्या पूर्ततेचे ते प्रतीक असते. खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ईर्षा असणे, विजिगीषु वृत्ती असणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु पदक मिळवायच्या, जिंकायच्या दडपणामुळे जिंकण्याच्या मार्गापेक्षा आणि खेळापेक्षा मह्त्व मिळते ते फक्त ’जिंकण्याला’. कोणताही देश याला अपवाद नाही. उदा: खोर्‍याने पदके मिळवणार्‍या चीनमध्ये यशस्वी खेळाडू ’निर्माण’ करणार्‍या राष्ट्रीय क्रीडासंस्थांमध्ये परतीचा मार्ग बंद झालेली अनेक बालपणं भरडली जातात कारण ’जिंकण्याला’ पर्याय नसतो.

या सगळ्या चौकटीला छेद देणारे काही असे काही प्रसंग घडतात जिथे कुणीच हरत नाही फक्त ’खेळ’ जिंकतो. केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई 2012 मधील स्पेन क्रॉस कन्ट्री स्पर्धेच्या शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेच्या जवळ आला होता. त्याने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. अचानक अंतिम रेषा समजून तो एक मीटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या हे लक्षात येताच त्याने आधी ओरडून नंतर सरळ ढकलुन त्याला अंतिम रेषेपर्यंत पोचविले. पहिला येण्याची संधी ’घालवली’ असे इव्हानला वाटले नाही कारण अबेल पहिला आलेलाच होता. त्याच्या गोंधळाचा फायदा घेऊन सुवर्णपदक पटकावणे इव्हानला शक्य होते पण त्याने तसे न करता आपली हार स्वीकारली. इथे खरे तर तो माणूस म्हणून जिंकला. अशा खेळाडूंमुळे ते ज्या देशाचे प्रतिनीधीत्व करतात तो देश पदकतालिकेवर कोणत्याही क्रमांकावर असला तरी जेताच असतो. पूर्ण प्रयत्नांती खेळाडू जिंकला की हरला याइतकेच त्याच्यातला ’माणूस’ जिंकला हे आपण महत्वाचे मानायला हवे. या ऑलिंपिकमधील बॅडमिंटनच्या सामन्यात सिंधूच्या हातून रजतपदक गेल्यानंतर लगेच ’तिने आता निवृत्त व्हावे’ अशी टीका काही जणांनी सुरु केली. याच सिंधूने मागील ऑलिंपिकमध्ये कॅरोलिना मरिनकडून पराभव झाल्यानंतर तिने आनंदाच्या भरात फेकलेली रॅकेट विचलीत न होता शांतपणे उचलून तिच्या हतात दिली होती. सगळे क्रीडाजगत तिच्या या समंजस कृतीकडे कौतुकाने पाहत होते. अथक मेहनतीनंतरही केवळ तिने मिळवलेल्या पदकाचा रंग बदलला म्हणून तिच्या या उमदेपणाचा आपल्याला विसर पडू नये. खेळाडूंच्या मनाची मशागत इतक्या नेमकेपणाने  झाली असेल तर प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज जिंकतो आणि पर्यायाने राष्ट्र जिंकते. राष्ट्र ही सामूहिक संकल्पना आहे पण राष्ट्रप्रेम ज्यातून सिद्ध होते ती कृती मात्र वैयक्तिक असते. जिंकण्याची ही आगळीवेगळी व्याख्या आणि खिलाडूवृत्ती अशा मोजक्या खेळाडूंपर्यंतच मर्यादित न राहता नागरिकांपर्यंत झिरपायला हवी. 

क्रीडामानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम खेळाडूंची मानसिकता ओळखून त्यानुसार कोणते बदल उपकारक ठरतील याचा सतत अभ्यास करत असत. शारिरिक प्रशिक्षणाइतकेच महत्व ते मानसिक प्रशिक्षणाला देत असत. इतरांचं अगदी विरुद्ध पक्षाचं सुद्धा जे चांगलं असेल ते स्वीकारणं आणि त्यांचा अनुभव, मत, ज्ञान यांचा आदर करणं आपण शिकलो तरच वैयक्तिक आणि गटाचा विकास शक्य आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते म्हणत ,"चुरशीची स्‍पर्धा असतांना मैत्र आणि नाती ही प्रेमाने आणि संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्‍सर, शत्रूत्‍व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्‍हणजे मग आयुष्‍य ख-या अर्थाने संपन्‍न होत असते. हे सारेच स्‍पर्धात्‍मक खेळांतून शिकता येते. ते पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांनीही शिकून घेऊन आपल्‍या वागण्‍याने पुढच्‍या पिढीवर संस्‍कार करायचे असतात." 

हे शिकता आले, आचरणात आले, तर 'सहनाववतु' म्हणजेच आमचा कुटुंब म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आणि अंतिमतः विश्व म्हणून एकत्रित विकास होवो, या प्रार्थनेला अर्थ लाभेल. आपण 'हे विश्वची माझे घर' असे मनाच्या तळाशी स्वीकारलेले असते; परंतु ही भावना तिथेच राहते. ती व्यवहारात येत नाही. तसे असते, तर प्रत्येक देशाला विकासकामांपेक्षा जास्त खर्च संरक्षण व्यवस्थेवर करावा लागला नसता. परंतु खेळ इथे दुवा म्हणून काम करु शकेल. ज्यातून संवादाची संधी निर्माण होऊ शकेल. वैश्विक शांतता निर्माण व्हावी आणि देशांमध्ये परस्पर सामंजस्य वाढावे, हेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट्य असते. खेळात जिंकण्याची मौज काही वेगळीच; पण माणूसपणाची सरशी तितकीच महत्त्वाची आहे. ते भान रुजवणे, हेच खेळाचे साध्य आहे. यासाठी अगदी सोपा नियम मार्क ट्वेन त्यांच्या मार्मिक शैलीत सांगून गेले आहेत. "It's good sportsmanship to not pick up lost golf balls while they are still rolling". कतारच्या बरशीमने सुवर्ण पदकात इटलीच्या तंबेरीला वाटा देत घेतलेली उंच उडी, स्टेडियम पार करून कित्येकांच्या मनापर्यंत पोचली. अशी अद्भूत उर्जेची उदाहरणे पाहता 'नहीं जिता वो भी सिकंदर' म्हणायला हवे कारण तो जगातील मानसिक परिपक्वतेचा, विवेकाचा विजय ठरतो. 

published in महाराष्ट्र टाईम्स- संवाद पुरवणी -8 Aug 2021

Thursday, July 22, 2021

बाकीबाब


एखाद्या कवीची एखादी कविता आवडते. एखाद्या कवीच्या कवितेतला एखादा चमकदार शब्द आवडतो पण एखादा कवी अख्खाच्या अख्खा आवडतो. त्या कवीची प्रत्येक कविता आणि त्यातला प्रत्येक शब्द झपाटून टाकतो, असं तुमचं कुणाच्या बाबतीत होतं का? माझं असं #बाकीबाब म्हणजे बा.भ.बोरकरांच्या बाबतीत होतं. त्यांच्या कविता आरपार शिरतात. अर्थाचे कंगोरे वगैरे शोधत बसायचं दडपण नसल्याने, कवीला नेमकं काय म्हणायचंय बॉ! असले प्रश्न पडत नसल्याने, त्यांची कविता शब्दश: भेटते. ती वाचायची चीज नसून जगायची, भोगायची, अनुभवायची चीज आहे हे लख्ख कळतं. 

’माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे..  

कड्या कपारीमधूनी घट फुटती दुधाचे’ 

वाचलं तेव्हा गोव्याला जाण्याआधीच मी गोवा ’पाहिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष गेले तेव्हा बहुतेक अनुभव म्हणजे ’देजावू’ मोमेंट होते. आधीच कुठेतरी ’पाहिलेले’.

’कुठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे.. 

एक त्यातले लुचे आईला सटीक कांती गोरे गोरे’ 

असं काही चित्रवाही ते कवितेतून रेखाटतात तेव्हा त्या कड्यावर चढून बकरीच्या शुभ्र गोजिरवाण्या पिलाच्या मऊशार अंगाला आपण केव्हाच स्पर्श केलेला असतो.  

इकडे कुणाला कोसळत्या, खळाळत्या पावसाचा अनुभव नाही, पण 

’लक्ष आचळांनी दुभे निळी आकाशाची गाय

थिजल्या तृप्तीवरी दाटे संतोषाची साय’ 

असा निळाईत रंगलेला पाऊस त्यांच्या नुसत्या शब्दांमधून चिंब करतो.

सौंदर्यपूजक, प्रकाशपूजक बोरकर तमाचे स्त्रोत्र लिहितानाही सृजनाशी नातं जोडतात.  

’घटका घटका काळोखातच बसून असतो असा

उरातला गोंजारत नवख्या शब्दांचा कवडसा’ 

त्यांच्या या ओळी वाचाव्यात आणि स्वत:सह स्तब्ध बसून राहावं.

’मध्यरात्री नभघुमटाखाली शांतीशिरी तम चवर्‍या ढाळी

त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती..’ 

असं काही वाचल्यावर यावर काही लिहू नये, त्याने मनावर पाण्यावरच्या तरंगासारखा उमटलेला अलवार भाव डहुळेल, त्यावर ओरखडे पडतील असं वाटतं.

स्त्री-सौंदर्याची आसक्ती जेव्हा त्यांच्या शब्दातून ओसंडून वाहते तेव्हा आपण त्यातल्या प्रियकराचे डोळे झालेलो असतो. इतका हळूवार रोमँटिक, चितारी मराठीत दुसरा नसावा.

’पाठमोरी मूर्ती तुझी पाहिली मी कौतुके.. 

वाटले त्वत्कुंतली गे गुंतली सारी सुखे’ 

किंवा

’नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय 

नको गोठवू ओठात दाट अमृताची साय’ 

किंवा 

’तव नयनांचे दल हलले गं

 पानावरच्या जलबिंदूंपरी 

त्रिभुवन हे डळमळले गं’ (थेट त्रिभुवन, अधलं-मधलं काहीच नाही !!) 

किंवा

’केशी तुझिया फुले उगवतील.. तुला कशाला वेणी’ किंवा... पुरे.

बोरकरांचे अर्थगर्भी शब्द नुसते वाचावे, रिचवावे, समीक्षा वगैरे करुन चावून चोथा करु नये. मग मिटल्या डोळयांना ’ती’ दिसते.

अनुरक्तीतल्या सौंदर्यात आणि विरक्तीतल्या देखणेपणात नेमका काय फरक असतो हे सुद्धा हा कवी काय ताकदीने दाखवतो!

’ओळखतील जे मला आणि मज दावितील मम यथार्थ ओळख, 

कणकण माझ्या देतील किंवा अवघ्या ब्रह्मांडाची पारख’ 

किंवा

’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती 

वाळवंटातूनही जी स्वस्तिपद्मे रेखती’ 

असं अंतर्बाह्य देखणेपण जगाला लाभेल तेव्हा लाभो पण आपल्याला निदान ती नजर तरी लाभेल का! 

 

बोरकरांची कविता वैयक्तिक अनुभवापासून वैश्विक अनुभूतीपर्यंत कमाल वेगाने झेपावते. मूक करते.  

’या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे, 

अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे...

तेथ जाया वेग-वेडी पारजाची वाट आहे, 

शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे.’ 

निर्व्याज भावनांच्या पखाली वाहणार्‍या या शब्दप्रभूला ’नाही पुण्य़ाची मोजणी नाही पापाची टोचणी’ म्हणत स्थितप्रज्ञ होणं सहजसाध्य असलं तरी ’अनंता तुला कोण पाहू शके’ अशी अमूर्ताची ओढ आहेच. 

जगण्यातले सगळे विभ्रम त्यांच्या उत्कट शब्दांच्या रुपातून असे आपल्या आत, बाहेर सगळीकडे विखुरलेले असताना, त्यांच्या कवितांचा ’दिडदा दिडदा’ नाद मनात सतत निनादत असताना त्यांच्या वेगळ्या स्मृती जागवायच्या तरी कशा!



Friday, July 9, 2021

आनंदाचा शोध -The pursuit of Happyness

 

धावतपळत आल्याने घामेजलेला चेहरा, घरगुती कपडे, त्यावर कसंबसं अडकवलेलं जॅकेट, त्यावर रंगाचे शिंतोडे, अशा काहीशाe विचित्र अवतारातला एक तरुण. मुलाखतीसाठी त्याला कॅबीनमध्ये बोलावलं जातं. मनातली अस्वस्थता लपवत तो हसतमुखाने सर्वांना अभिवादन करतो. त्याच्याकडे पाहून कुणी काही विचारायच्या आत तो स्वत:च स्पष्ट सांगतो. "माझ्या या अवतारामागचं कारण तुम्हाला पटावं अशी कोणती कथा रचून सांगावी याचा मी बाहेर बसून विचार करत होतो पण त्यापेक्षा खरं तेच सांगतो. पार्किंगच्या चुकीचा दंड भरला नाही म्हणून मी रात्रभर तुरुंगात होतो. तिथून सुटका होताच धावत मी थेट इथे आलो आहे." अधिकारी क्षणभर अवाक् होतात. नंतर ते त्याची शैक्षणिक प्रगती, कामातली हुशारी, जिद्द याबद्दल प्रश्न विचारतात. अखेर प्रश्नांच्या फैरीला थांबवत तो म्हणतो, "एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर वेळ मारुन नेण्यापेक्षा ’मला माहित नाही’ असं मी मोकळेपणे सांगेन पण त्याचवेळी ते उत्तर कसं, कुठे सापडू शकेल याचा विचार माझ्या डोक्यात सुरु झालेला असतो आणि मग मी ते शोधल्याशिवाय राहत नाही." एव्हाना पॅनेल त्याच्या बोलण्याने प्रभावित झालेलं असतं. एक अधिकारी आता शेवटचा प्रश्न विचारतात," अंगावर धड formal शर्टही न घालता मुलाखतीला आलेल्या माणसाची मी नेमणूक केली तर त्यावर तू काय म्हणशील?" हा तरुण उत्तरतो, "त्याची पँट नक्कीच झकास असेल." इतक्या चमत्कारिक परिस्थितीतही त्याने दिलेल्या या खेळकर आणि मार्मिक उत्तरावर सगळे अधिकारी खळखळून हसतात. प्रचंड धडपडीनंतर अखेर इंटर्न म्हणून नामांकित ब्रोकर फर्ममध्ये त्याचा प्रवेश झालेला असतो. 

हे यश फार भव्यदिव्य आहे का! नसेलही, पण ते आपसूक ओंजळीत पडलेलं नाही. त्याच्या निरलस परिश्रमाचं ते सार्थक आहे त्यामुळे त्याचं मोल होऊ शकत नाही. प्रेक्षकांना हसू आणि आसू अशा संमिश्र मनोवस्थेत घेऊन जाणार्‍या The pursuit of Happyness या चित्रपटातले असे अनेक प्रसंग अभिनेता विल स्मिथने अक्षरश: जिवंत केले आहेत. प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या संघर्षकाळावर बेतलेला हा नितांतसुंदर चित्रपट. 

या कष्टाळू, हरहुन्नरी, प्रांजळ माणसाचं यशाच्या अथक पाठलागातही तग धरुन राहिलेलं पारदर्शी, उमदं व्यक्तिमत्व अक्षरश: काळजाला भिडतं. चित्रपटाच्या नावाचा संबंध, ’सुखाकांक्षेच्या पूर्तीचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे, त्याने तो वापरावा’ हे सांगणार्‍या अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याशी आहे. ख्रिसच्या मुलाच्या पाळणाघराबाहेर चितारलेल्या म्युरलमधल्या स्पेलिंगमधली गडबड तशीच ठेवून चित्रपटाच्या नावात Happiness (स्थिती) ऐवजी Happyness चा (वृत्ती या अर्थाने) जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे.

सेल्समन म्हणून काम करताना सातत्याने आलेलं अपयश, परिस्थितीशी झगडताना कंटाळून बायकोने हात सोडलेला, त्यातच चिमुकल्या मुलाची स्वेच्छेने घेतलेली जबाबदारी. पण हताश न होता मुलाच्या निष्पाप, बोलक्या डोळ्यात लुकलुकणार्‍या चांदण्यांच्या प्रकाशात जिद्दीने पुढे जात राहणार्‍या प्रयत्नवादी आणि स्वाभिमानी तरुणाची ही कहाणी. ख्रिस गार्डनर यांच्या पुढील यशस्वी व्यावसायिक जीवनात याहून अधिक रोमहर्षक घटना नक्कीच घडल्या असतील तरीही ह्याच भागाची निवड चित्रपटासाठी करावी असं गॅब्रिएल म्युकिनो ह्या इटालीयन दिग्दर्शकाला का वाटलं असावं! ’माझ्या आजच्या स्थानावरुन माझी योग्यता ठरवू नका, मी इथवर कसा आणि कुठून पोचलो यावरुन ठरवा’ हेच कदाचित दिग्दर्शकाला ख्रिसच्या वतीने सांगायचं असावं. कथानक पुढे सरकत जातं तसा हा चित्रपट आपल्या डोक्यात एका वैश्विक प्रश्नाचा भुंगा सोडून देतो, ’माणूस जगतो कशासाठी!’ आणि तो संपतो तेव्हा आपल्याला जे उत्तर सापडतं ते म्हणजे- ’आनंदाचा शोध घेण्यासाठी.’ 

अर्थात यातला ख्रिस स्वप्नाळूपणे सुखी होण्याकडे डोळे लावून बसत नाही तर आपल्या बछड्याला कवटाळून विजिगिषु मानसिकतेने आयुष्याशी दोन हात करत राहतो. पडतो. पुन्हा उभा राहतो. आपणही केव्हाच त्या बेघर बापलेकांच्या मायेच्या धाग्याने गुंफलेल्या भावविश्वाचा भाग होऊन गेलेलो असतो. मिळेल त्या निवार्‍यात त्यांनी वेचलेले आनंदाचे इवले, गोड क्षण बघताना आपल्या मनातल्या आनंदाच्या व्याख्या आपण नकळत तपासून पाहतो. 
आनंद म्हणजे स्थैर्य, समृद्धी, प्रतिष्ठा, साफल्य!! की आनंद म्हणजे स्वप्नपूर्ती, सन्मानपूर्वक जगणं, जीवलगांच्या सान्निध्यात असणं की आनंद म्हणजे काही वेगळंच!! सुजाण ख्रिस आणि त्याच्या अजाण मुलाच्या आनंदाच्या व्याख्या काही जगावेगळ्या नाहीत किंबहुना त्या अमेरिकन धाटणीच्याच आहेत पण ते दोघं मात्र जगावेगळे आहेत. कुणीही मनाने कोलमडून जाईल अशा स्थितीत देखील हा बाप ठाम उभा असतो. बापमाणूस हा शब्द आपण जितक्या अर्थच्छटांनी वापरतो त्या सगळ्य़ा लागू व्हाव्यात असा यातला बाप ’विल स्मिथ’ जगला आहे. 'The wound is the place where the light enters you' हे रुमीचं वाक्य त्याला बघताना आठवत राहतं. हट्ट करण्याच्या वयातलं त्याचं समजूतदार लेकरु आपले कोवळे हात बापाच्या मानेभोवती गुंफून तो त्याच्यासाठी या जगातला सगळ्यात खास माणूस असल्याची ग्वाही देत राहतं. विल स्मिथचा रिअल मुलगा जेडन हाच रील मध्ये आहे, कदाचित त्यामुळे त्यांच्यातला बंध अजूनच अस्सल वाटतो. त्या दोघांमधले हलकेफुलके पण डोळे पाणावणारे संवाद हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. ममता हा शब्दच नव्हे, कृतीही ’स्त्री’शी जोडली गेलेली आहे. या चित्रपटात दिसणारी स्त्रीपात्रं मात्र कोरडी, व्यवहारी आहेत. ती तशी का आहेत याची कारणमीमांसा कथेत आली आहे. इथे ममतेचं दुसरं नाव बाप आहे.ख्रिस आहे. 

चित्रपट २००६ सालचा आहे. माणसाचा आनंदाचा शोध , आनंद मिळवण्याची धडपड संपलेली नाही. कधी संपणारही नाही त्यामुळे हा चित्रपट कालातीत आहे. आनंद कुठेतरी पोचण्यात नसतो, तो त्या शोधाच्या प्रवासातच दडलेला असतो हे सांगणारा हा चित्रपट म्हणजे एक समृद्ध अनुभव आहे. त्यात उमेदीच्या प्रत्येक क्षणाला पियानोचे सूर ऐकू येतात. आनंदाला स्वर असता तर तो असाच असता असं वाटणारे सूर. बापाचं बोट धरुन रोज नव्या उत्साहाने, आशेने त्याच्याबरोबर बागडत, चिवचिवत जाणारा निरागस लेक चित्रपटातल्या अनेक दृश्यांमध्ये दिसतो. ते खरं तर माणसाने धरून ठेवलेलं, मधूनच सुटून जाणारं, पुन्हा मुठीत येणारं आनंदाचं बोट असावं. 


- मोहिनी मोडक

-------------------------------------

प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ख्रिस गार्डनर यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या संघर्षकाळावर बेतलेला नितांतसुंदर चित्रपट म्हणजे The pursuit of Happyness. होय, Happiness नव्हे Happyness. प्रेक्षकांना हसू आणि आसू अशा संमिश्र मनोवस्थेत घेऊन जाणार्‍या या चित्रपटातल्या बापमाणसाची भूमिका अभिनेता ’विल स्मिथ’ अक्षरश: जगला आहे. कुणीही मनाने कोलमडून जाईल अशा स्थितीत देखील हा ठाम उभा असलेला बाप आणि आपले कोवळे हात त्याच्या मानेभोवती गुंफून तो त्याच्यासाठी जगातला सगळ्यात खास माणूस असल्याची ग्वाही देत राहणारं त्याचं समजूतदार लेकरु यांचं भावविश्व प्रत्यक्ष अनुभवायला हवं. या बापलेकांच्या सुखाच्या शोधाची कहाणी सांगणारा  ब्लॉग मी Swayam साठी गेस्ट ब्लॉगर म्हणून लिहिला आहे. 

https://swayamtalks.org/blog-the-pursuit-of-happyness/

Tuesday, June 15, 2021

अमेरिका डायरी - chester जनजीवन 2

 

Mohini -Giving presentation

 एका क्लबमधलं प्रेझेंटेशन आटोपून लगेच चेस्टर या गावात सुमारे १०० एकरात वसलेल्या देखण्या वाईडनर विद्यापीठाला भेट द्यायला गेलो होतो. ४० हून अधिक पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे पर्याय तिथे होते. भव्य प्रशस्त इमारत, हिरवंगार लॉन याचं आता विशेष वाटेनासं झालं होतं.
Widner University

इकडच्या कॉलेजेसच्या हिरवळींवर दिसणारं अजब दृश्य म्हणजे आपापले लॅपटॉप समोर उघडून काही विद्यार्थी अगदी नौकासन पोझमध्ये लोळत अभ्यास किंवा वाचन किंवा जे काय ते करत असतात. कुणी एकटे, कुणी ग्रुपने. इथे खात पीत बिनधास्त पहुडलेल्या विद्यर्थिनी बघून मला आजूबाजूच्या मुलांकडे दुर्लक्ष करत हनुवटी गळ्याला चिकटवून खालमानेने चालणार्‍या माझ्या काही कॉलेजमधल्या मैत्रिणी आठवून हसू यायचे. या विद्यापीठातली दालनं, विभाग, वाचनालयं बघायला बरच चालावं लागू नये म्हणून आवारात मिनी बसेस सतत फिरत असायच्या. 



Watching Saturn- Golden moment 
या गावात मॉल, कॅसिनो, एक स्टेडियम वगैरे पाहिलं पण आवर्जून लक्षात राहिलं ते हे विद्यापीठ. ते ही एका विशेष घटनेसाठी. इथल्या खगोलशास्त्राच्या प्राध्यापकांनी आम्हाला रात्री विद्यापीठाच्या गच्चीवरील त्यांच्या महाकाय टेलीस्कोपमधून अवकाशाचा नजारा बघायचे आमंत्रण दिले होते. आम्ही जेवण उरकून पटापट तयार होऊन पोचलो तर त्यानी सगळे सज्ज करुन ठेवले होते. गच्चीवरून सभोवताली लुकलुकणारे चेस्टर गावातले दिवे बघणं हा सुंदर अनुभव होताच पण तिथून आकाश केवळ अद्भुत दिसत होते. प्राध्यापकांनी आम्हाला त्या टेलीस्कोपच्या क्षमतेबद्दल सांगितले. त्याला डोळा लावला आणि मी जवळपास अत्यानंदाने ओरडायचीच बाकी होते कारण केवळ पुस्तकात, चित्रात पाहिलेला, प्रत्यक्षात १.३४ अब्ज किमी अंतरावर असलेला ’शनी’ म्हणजेच सॅटर्न अगदी जवळ, हाताच्या अंतरावर दिसत होता. त्याच्याभोवतीची रुपेरी कडी अगदी चमचमत होती. मुलांची त्या क्षणाला वेड्यासारखी आठवण आली. त्यांना त्या वयात शनीबिनी काही कळलं नसतं पण हे त्यांनी बघायलाच हवं होतं असं वाटलं. आम्ही सगळेच त्या अनुभवाने इतके भारावून गेलो होतो की नंतर सगळे मूक झाले. अनंत अवकाशातल्या अनेक आकाशगंगांपैकी एकीच्या अनेक सौरमालांपैकी एका सौरमालेचा भाग असलेला तो महाकाय पण आता अगदी चेंडूएवढा दिसणारा ’शनी’. त्या सौरमालेतल्या एका य:कश्चित ग्रहावरच्या अब्जावधी माणसांपैकी एक आपण. कदाचित आपले इतके नगण्य असणे जाणवल्याने कुणीच कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

At state capitol with a senator

पुढची विशेष भेट होती हॅरिसबर्गमधल्या स्टेट कॅपिटल इमारतीला म्हणजेच विधानभवनाला. (पेनसिल्व्हेनिया राज्याची जनरल असेंब्ली) विधिमंडळात Senate चे ५० आणि House of Representatives चे २०३ असे एकूण २५३ सदस्य असतात. फेडरल पद्धतीमुळे तिथली राज्ये स्वायत्त असल्यासारखे काम करु शकतात. राज्याचा गव्हर्नर हा सर्वेसर्वा. आपल्याइतके केंद्राचे नियंत्रण त्यावर नसते. त्यातून पेन्सिल्व्हेनिया राज्य म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्यचळवळीचा केंद्रबिंदू होते त्यामुळे त्याला विशेष मानाचे स्थान आहे. तर विधीमंडळाचे दैनंदिन कामकाज गॅलरीत बसून पाहण्याची आम्हाला संधी मिळाली. आत प्रवेश करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आमची कडक तपासणी झाली (म्हणजे कमरेच्या पट्ट्यापासून सगळे स्कॅनिंग ट्रे मध्ये टाकून) त्यामुळे आपला ट्रे बाहेर येईतो आमचे सर दोन्ही हातांनी पँट घट्ट पकडून उभे राहत. गॅलरीतून आम्ही त्यांचे कामकाज पाहिले. अगदी सौजन्यसप्ताह असावा तसे नम्रपणे त्यांचे बोलणे सुरु होते. शिरा ताणून आरडाओरडा नसेल, बेंच बडवणं नसेल आज या ठिकाणी तर याला काय अर्थ आहे का अध्यक्षमहोदय! अगदीच कोमट राजकारणी!
Senator's bench in the Main hall 

यांना एकदा आपल्या विधानसभेतली धमाल आणि रस्त्यावरची गॉगलधारी पोस्टरबाजी दाखवली की कळेल राजकारण किती खमंग प्रकार असतो. अर्थात तिकडचे राजकारणीही एकमेकांच्या उरावर बसतात पण सॉफिस्टिकेटेड पद्धतीने. असो. कामाचा तास संपल्यावर या भेटीसाठी आमंत्रित करणारे सिनेटर आमचे उत्सुक चेहरे पाहून आम्हाला गॅलरीतून मुख्य हॉलमध्ये घेऊन आले. काही जणांशी परिचय करुन दिला. तिथली

नेत्रदीपक झुंबरं, दिव्यांची आकर्षक रचना, सिव्हिल वॉरची प्रचंड तैलचित्रं विधानभवनाच्या रुबाबात भर घालत होती. आता हे सगळे लाईव्ह सेशन जॉईन करुन किंवा आभासी सहलीच्या माध्यमातून घरबसल्याही सहज बघता येते. http://www.pacapitol.com/keystone-classroom/legislature.cfm


’अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ या गाण्यावर आपल्या पिढीतल्या बहुतेक प्रत्येकाने आलटून पालटून एक हात कमरेवर आणि दुसर्‍या हाताच्या कुयर्‍या डॊलवत नाच केलेला असतो. हा बंगला चक्क प्रत्यक्ष पाहायला मिळाला तो हर्शेज चॉकलेटच्या भल्यामोठ्या फॅक्टरीमध्ये. स्वागतकक्षात चॉकलेटचे असंख्य प्रकार. आत गेल्यावर एका छोट्या गाडीत बसून आम्हाला त्या चॉकलेटनगरीची झलक दाखवण्यात आली. चिमुकला धबधबा, त्याजवळून वाहणारी नदी, काठावरची फुलं सगळं काही चॉकलेटचं. अध्येमध्ये चॉकलेटची कार्टून्स. अगदी मायानगरीत विहार केल्याचा अनुभव होता तो. या सगळ्यामधून गाडी हळूच पास होई तेव्हा ते मधाळ रंगाचं वाहतं चॉकलेट ओंजळीत उचलून घ्यावसं वाटे. सफर संपली. दर फार नसल्याने इथून आम्ही मुलांसाठी, नातलगांना भेट देण्यासाठी भरपूर चॉकलेट्सची खरेदी केली.


तिकडून दौरा होता सफरचंदाच्या बागेत. अगदी जमिनीला टेकायला आलेले लालचुटूक रसरशीत सफरचंदांचे घोस मी याआधी कधीच पाहिले नव्हते. तिथे बसून ज्युस घेतला. बाजूला एक सुंदर तळं आणि काठावर मासेमारी करत सुटटी घालवणारे हौशी. मागे इटुकलं फार्महाऊस. स्वप्नातलं घर. दुसर्‍या
with network admin of Newmann college

दिवशी न्यूमन कॉलेजचे कॉम्प्युटर नेटवर्क बघण्याची आणि शिकण्याची मला संधी मिळाली. व्यावसायिक ठिकाणी एकट्याने जावे लागे. तिथली अ‍ॅडमीन एक स्मार्ट मुलगी होती, तिने हातचं न राखता सगळी माहिती दिली, मला सिस्टीम ऑपरेटही करु दिली.


याच आठवड्यात एक मोठे हॉस्पीटल, तिमजली जिम आणि वावा या फूड कंपनीचा सबंध प्लांट आतून बघता आला. एका संध्याकाळी खास भारतीय पोशाखात चीज अ‍ॅंड वाईन पार्टीला हजर राहून आम्ही एक बॅले कम नृत्यनाट्य बघायला गेलो. प्रेमाचा त्रिकोण हे जगभरातलं सर्वाधिक आवडतं कथानक असलेल्या या बॅलेतील कलाकारांचा पदन्यास, तांत्रिक सफाई, पेहराव, नेपथ्य खिळवून टाकणारं होतं. तिकडून आम्ही एका भारतीय उपाहारगृहात डिनरला गेलो. खूप दिवसांनी वाफाळत्या पंजाबी डीशेस आणि तंदूर ’रोटी’ बघून मला एकदम कभी खुशी कभी गममधल्या काजोलसारखं देशप्रेमाचं भरतं आलं. आमच्यासोबत असलेले परदेशी पाहुणे पापड काट्याने तोडून खाताना पाहून आमची हसून पुरेवाट झाली.

Dinner at Indian Restaurant with host families


मग त्यांना आपले पदार्थ हाताने कसे खायचे ते प्रात्यक्षिक करुन दाखवलं. जेवणानंतर जरा दूरवर पार्क केलेल्या गाड्यांच्या दिशेने आम्ही निघालो. मी सिल्क साडी नेसलेली आणि स्लीव्हलेस ब्लाउज. आत हीटर्स असल्याने जाणवलं नाही पण बाहेर थंडीची जीवघेणी लाट आतून गेली. माझे दातच वाजू लागले. पाऊल टाकणं अवघड झालं. काकडल्याने श्वास घेता येईना. एका क्षणी तर मी आता कोसळते असं वाटलं. डॉ. श्रीयाने तिचा स्टोल माझ्याभोवती गुंडाळून मला खेचतच गाडीपाशी नेऊन आत ढकललं. माझे हात चोळले. आतल्या उबेने हळूहळू जीवात जीव आला. त्या क्षणी सियाचेन सारख्या ठिकाणी आपले सैनिक कसे जगत असतील याचा मी जगाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या चेस्टर गावात बसून विचार करत होते. 

--------------

https://mohinimodak.blogspot.com/2020/10/blog-post.html

अमेरिका डायरी- प्रयाण

https://mohinimodak.blogspot.com/2011/03/blog-post.html

भाग २ : लिनकडच्या वास्तव्याबद्दलचा लेख वरच्या लिंकवर :-)

https://mohinimodak.blogspot.com/2020/05/blog-post.html

अमेरिका डायरी - दुसरा आठवडा - जनजीवन १

Monday, May 31, 2021

उष:काल

 


उष:काल #सकाळ #या_जगण्यावर

अथांग समुद्राकडे शांतपणे पाहत उभं राहिलं की मनात काय येतं! निसर्गाचं अद्भुत रुप पाहून आपण स्तिमित होतो. त्याच्या विराटपणापुढे आपलं खुजेपण जाणवून मूक होतो. मग लक्ष जातं सागराच्या भरती- ओहोटीकडे. त्यात प्रतिबिंबीत होणार्या सूर्याच्या उदय-अस्ताकडे. द्वैताच्या जगाकडे. आपल्याकडे रात्र अवतरु लागली असली तरी दुसर्या बाजूला दिवस उजाडतो आहे या सत्याकडे. दृश्य बाजू हेच तात्कालिक सत्य वाटत असलं तरी तेव्हाही विरुद्ध बाजू अस्तित्वात असतेच. या दोन्ही बाजू एकमेकींना पूर्णत्व देतात. द्वैत हा निसर्गाचा स्वभाव आहे. विश्वाचा नियम आहे. त्यामुळेच विश्वाचा तोल सांभाळला जातो आहे.
खेळात सुद्धा एका पक्षाची हार ही विरोधी पक्षाची जीत असते. साधर्म्य म्हटले की वैधर्म्य आलेच. आजार आणि आरोग्य, कटूता आणि गोडवा, दु:ख आणि आनंद, भीती आणि निर्भयावस्था, निर्मोह आणि मोह, पानगळ आणि पालवी, झोप आणि जाग ते अगदी मृत्यु आणि जन्म असं हे द्वैताचं अफाट जग आहे. नाणं एकच, बाजू दोन. प्रेम आणि द्वेष, मीलन आणि विरह, नायक आणि खलनायक या द्वैतभावाचा प्रत्यय व्यावसायिक चित्रपट सुद्धा देतात. नाहीतर फक्त चांगल्या माणसांनी भरलेल्या जगात बिचार्या हीरोला करण्यासारखं काही कामच उरलं नसतं. 'द डार्क नाईट' या गाजलेल्या चित्रपटात एक प्रसंग आहे. नायक बॅटमॅन आणि खलनायक जोकरची निकराची झुंज सुरु असते. निर्णायक क्षणी जोकर म्हणतो," मी तुला कधीच संपवू शकत नाही कारण तू नसशील तर मी करु तरी काय! You complete me." जोकरचा हा प्रसिद्ध संवाद एक चिरंतन सत्य सांगतो. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. मग या दोन प्रवृत्ती दोन व्यक्तींमध्ये असोत की एकाच व्यक्तीच्या अंतरंगात. त्या एकमेकींविना अपूर्ण आहेत. एकीशिवाय दुसरीच्या अस्तित्वाला अर्थ नाही. जसा दु:खाशिवाय सुखाला नाही किंवा अपयशाशिवाय यशाला नाही.

जगभरात ही द्वैताची संकल्पना वेगवेगळ्या प्रतीकांद्वारे मांडली गेली आहे. अर्धनारीनटेश्वर हे भारतीय संस्कृतीतले प्रतीक. पुरुष आणि प्रकृती ही सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेतील दोन भिन्न पण परस्परपूरक तत्त्वं. यिन-यांग हे उर्जेचं वर्तुळ म्हणजे द्वैताचं चिनी प्रतीक. त्यांच्या मान्यतेनुसार यिन हा भाग नकारात्मकतेचं तर यांग हे सकारात्मकतेचं द्योतक. विश्वाचं वर्तुळ इंग्रजी एससारख्या रेषेने विभागलेलं असून एका वेळी यापैकी एका बाजूचं वर्चस्व असतं, विरुद्ध तरीही परस्परावलंबी अशा या दोन्ही बाजू मिळून विश्वाची लय सांभाळतात, संतुलन राखतात असं ते मानतात. यांग या सृजनाच्या, आशेच्या भागात विनाशाचं, निराशेचं तर यिन या विनाशाच्या भागात सृजनाचं, आशेचं एक सूक्ष्म बीज बिंदूरुपाने दर्शवलेलं असतं. अगदी अशीच प्रतिमा कुसुमाग्रजांच्या कवितेत रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल अशा तेजस्वी शब्दात सामोरी येते.
द्वैताचा पूर्णत्वाशी म्हणजेच अद्वैताशी असलेला हा संबंध जसजसा उलगडत जाईल तसतसं आपल्या आयुष्यातल्या उलथापालथींना आपण संयतपणे, अधिक समंजसपणे हाताळू शकू. भयभीत झालेल्या सभोवतालाला This too shall pass हे सांगू शकू. ज्या परिस्थितीला आपण बदलू शकत नाही तिचा स्वीकार करण्याचं आपल्याला बळ मिळो, जी परिस्थिती आपण बदलू शकतो ती बदलण्याचं धैर्य लाभो आणि या दोन्हीतला फरक समजून घेण्याची शहाणीव आपल्यात निर्माण होवो, ही चित्तशांती प्रार्थना आपल्या मनात रुजवू शकू. आपल्याला निवडीचा नसेल पण प्रयत्न करण्याचा अधिकार अवश्य आहे. पृथ्वीवर आपल्या बाजूला सध्या अंधार आहे, नंतर नियमानुसार प्रकाश येईलच, तो येतोच पण म्हणून वाट बघत न बसता माणसाने वीजेचा शोध लावलाच नं!
नाणं आत्ता आपल्याला हव्या त्या बाजूला पडलं नाही तरी द्वैताच्या जगाच्या संकेतानुसार 'अपना टाईम आयेगा' हे नक्की. त्यासाठी प्रयत्नवादाच्या हाताने नाणेफेक मात्र करत राहावी लागेल.

Monday, May 24, 2021

मनात घर करणारं घर

 


मे महिना म्हटलं की हमखास आजोळचं घर डोळ्यासमोर येतं. मामाने गाव बदललं. माया तीच असली तरी लहानपणच्या उन्हाळी दिवसांचा मनाला थंडावा देणारा आठव आजोळच्या, आता अस्तित्वातही नसलेल्या, जुन्या घरातच अजून अडकून पडला आहे. अंगाखांद्यावर अशा आठवणी खेळवणारी वास्तू कधी ना कधी थकते, खचते, संपते पण आयुष्यात कितीही स्थित्यंतरं झाली तरी मनात घर करुन कायम राहते. आजूबाजूच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जगाशी आपली नाळ जुळवून ठेवण्यासाठी, आपलं अवकाश शोधण्यासाठी आपण कधी हौसेने तर कधी नाईलाजाने घरं बदलत जातो. नोकरी, व्यवसाय, बदलतं सामाजिक स्थान, हिस्सेवाटे, बदली, विवाह, वार्धक्य, आपत्ती... ज्याची त्याची कारणं वेगळी असतात. स्वत:चं घर उभं करण्यात उमेदीची बरीच वर्ष निघून जातात. अखेर ते हाती येतं पण तोवर त्यातल्या पिल्लांना आपापल्या घरट्यांचे वेध लागलेले असतात.

नुकत्याच येऊन गेलेल्या वादळात कष्टाने उभे केलेल्या अनेक घरांचे पत्रे उडून गेले. जुजबी सामान सामावून घेणार्या नुसत्या चार भिंतींचे छपराविना उजाड फोटो बातमीसोबत होते. ते पाहून पोटात तुटलं. जग दुरावलं तरी घराचा आधार माणसाला आश्वस्त करत राहतो पण संकटाच्या थैमानाला बाहेर थोपवून धरणारं ते घरच कोलमडतं तेव्हा सावरणं कठीण होतं. गेल्या वर्षभरापासून आपला बहुतेक काळ घराच्या कुशीत व्यतीत होतो आहे. अशा विदारक परिस्थितीतही साथ देणारं घर, मग ते लहान- मोठं, टुमदार- अलिशान कसंही असो, त्याचं स्थान थेट आपल्या काळजात असतं. तिथे आपली वाट पाहणारं, आपलं यश साजरं करणारं, अपयशाच्या क्षणी जवळ घेणारं, कुणी तरी असतं. गंमत म्हणजे आपल्या राहत्या घरावर आपलं इतकं प्रेम असलं तरी आपलं स्वप्नातलं घर मात्र बर्याचदा वेगळच असतं. अगदी सरसकट वर्गीकरण नाही करता येणार पण गावातल्या बहुतेक लोकांना आटोपशीर अपार्ट्मेंटचं अप्रूप असतं तर शहरातल्या बहुतेकांना खेड्यामधले घर कौलारु साद घालत असतं. चंद्रमौळी घरांबद्दल त्यांच्या मनात एक रोमँटीसीझम असतो. पण चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या छपरातून चंद्र, चांदणं दिसतं, म्हणजेच ज्याचं छत फाटकं आहे असा अर्थ लक्षात येतो तेव्हा मनात चर्र होतं.
केरळमध्ये प्रवास करत असताना असंच एक स्वप्नातलं घर प्रत्यक्ष पाहिलं होतं. एखादं देखणं निसर्गचित्रं सजीव होऊन समोर यावं तसं. नदीला अगदी बिलगून असलेलं, आधुनिकतेचा स्पर्शही न झालेलं सताड उघड्या दाराचं सुबक खोपटं.
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ तुकडोजी महाराजांच्या या रचनेसारखं साधं, प्रसन्न, स्वागतशील.
हिरव्या रंगाच्या कितीतरी छटांनी वेढलेलं. फुलांनी डवरलेलं अंगण आणि त्या इवल्याशा घराला कवेत घेऊन आपल्या झावळ्यांनी थोपटणार्या नारळी फोफळी. अनिमिषपणे हे सारं पाहत असताना त्या घराला किती गैरसोयी, निसर्गाचे किती प्रकोप सहन करावे लागतात हे सांगून नावाड्याने आम्हाला जमिनीवर आणून सोडलं.
तसं पाहिलं तर घर म्हणजे दगड-विटा-मातीची एक निर्जीव वस्तू. पण त्यात राहणार्या माणसांची वृत्ती, भावना, विचार, परस्पर व्यवहार मिळून त्या घराचं व्यक्तिमत्व तयार होतं. त्याला चेहरा मिळतो. त्याच्यात प्राण फुंकला जातो. मग काही घरं सच्ची वाटतात तर काही दिखाऊ. काही उबदार वाटतात तर काही रुक्ष. काही हवीहवीशी तर काही टाळावीशी. आपलं घर नेमकं कसं आहे ! घर कसं असायला हवं हे हळूवारपणे सांगणारी 'घराचं मनोगत' नावाची एका अनाम कवीची मूळ इंग्लीश कविता मनाला स्पर्शून गेली.
या कवितेतलं घर म्हणतं -
" मला असं घर व्हायला आवडेल
जिथे मुलांच्या मित्रमंडळींना वाटेल अगदी घरच्यासारखं
जिथे ते निवांत पाय पसरुन बसू शकतील
आपल्या हाताने माठातून किंवा फ्रिजमधून
पाणी घेऊन पिऊ शकतील.. बिनदिक्कत
जिथे त्यांना कुणीही विचारणार नाही,
"तुझं 'आडनाव' काय?"...
असं घर.. जिथे त्यांना कोणी कशावरुनही जोखणार नाही
जे त्यांना स्वीकारेल सहजतेने, आपुलकीने
घरी, दारी, शाळा-कॉलेजमध्ये काहीही घडलं तरी
ते सांगायला जिथे त्यांना हक्काने धावत यावंसं वाटेल
मला असं घर व्हायला आवडेल... "
आपलं घर आहे का असं?

Monday, May 17, 2021

ऐकलंत का

 


#sakal #ya_jaganyavar #aiklat_ka

एका स्नेह्यांच्या मुलीची एका प्रख्यात चॅनेलवरच्या गाण्याच्या कार्यक्रमात निवड झाली. विशिष्ट गाणं आणि प्रशिक्षक मिळावा म्हणून सगळे पालक तिथल्या समन्वयकापाशी भुणभूण करायचे. निर्णय त्याच्या हातात नसला तरी हा समन्वयक सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा. चौकशा करणार्यांना ’बघून सांगतो हं’ आणि तक्रार करणार्यांना ’सांगून बघतो हं’ एवढी दोनच उत्तरं अगदी गोड हसून द्यायचा. त्याच्या चतुराईचा आणि गमतीचा भाग सोडला तर आपल्यालाही माहीत आहे की बर्याचदा बोलणार्याला फक्त त्या क्षणी आलेला राग, उद्वेग, किंवा नैराश्य व्यक्त करायचं असतं. प्रत्युत्तराऐवजी आपलं ऐकून घ्यावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपण मात्र अनेकदा एखादी व्यक्ती याच अपेक्षेने आपल्याला काही सांगू लागली की त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत " हे तर काहीच नाही.. आमच्याकडे तर ...." वगैरे बोलून, सांगणार्यावर नकळत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो.
’तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥’ पण सोशल मिडियाच्या कृपेने पृथ्वीतलावर बोलणार्यांची तोबा गर्दी झाली आहे. ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता मात्र मंदावली आहे. वाचन हे प्रकारचं श्रवणच. एकदा एकाने आपला केक खातानाचा फोटो सोशल मिडियावर टाकला आणि सोबत ’आज माझा वाढदिवस नाही, किती जण हे नीट वाचतात ते पाहण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे’ अशी पुस्ती जोडली. अपवाद वगळता बहुतेक प्रतिक्रिया ’वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देणार्याच होत्या. दुसर्या बाजूला, सध्याची विदारक परिस्थिती लक्षात घेता अनेक जण ’माझ्याशी केव्हाही मोकळेपणाने बोला’ असं आवाहन सोशल मिडियावर करताना दिसतात. त्यांचा हेतू उदात्त असतो पण भावनिक शेअरिंगसाठी आभासी जगापेक्षा प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा वेळ, लक्ष आणि सहस्पंदन अपेक्षित असतं. 'women don't have problem in speaking, they have problem in being heard' असं एका आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या ते याच अर्थाने. स्त्रियांच्या बाबतीत समाजपुरुष सोयीनुसार आणि बहुतेक वेळा, स्वत:ला हवं तेवढंच ऐकत आलेला आहे.
समोरचा माणूस कंटाळवाणं, निरर्थक बोलत असेल तर गोष्ट वेगळी, एरवी चांगला श्रोता ही आता दुर्मिळ प्रजाती होऊ लागली आहे. काही जण तर समोरचा बोलत असताना मोबाईल स्क्रोल करत त्याला ’तुमचं चालू द्या’ अशी खूण करतात. स्क्रीनमध्ये नजरा गाडलेली तरुणाई संवादकौशल्याला मुकण्याची भीती वाटते. नजरेला नजर देऊन ऐकणं हे त्यात आलंच. स्क्रीनवरच्या शब्दचित्रांच्या महापुरात वाचलेल्या, ऐकलेल्या एखाद्या विशेष मुद्द्यापाशी थबकून तो मनात मुरवत त्या आकलनाचा आनंद घेणं अवघड होत चाललं आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी हे जसे वाणीचे टप्पे आहेत तसे लक्षपूर्वक ऐकणं, बोलणार्याच्या भावनिक पातळीवर जाऊन श्रवण मग मनन हे ऐकण्याचे टप्पे. हे टप्पे समजून घेतले तर आपलं श्रवणकौशल्य विकसित होईल.
बरं, पण ते विकसित करून करायचं काय, याचं उत्तर ’व्हर्जिन’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन देतात. त्यांच्या आत्मिक आणि व्यावसायिक प्रगतीचं श्रेय ते स्वत:च्या श्रवणकौशल्याला देतात. ऐकून घेणार्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. फक्त व्याख्यातेच नव्हे, सफाई कामगारापासून उच्चपदस्थ अधिकार्यापर्यंत प्रत्येकाजवळ सांगण्यासारखं काही ना काही असतं. ते ऐकताना अनुभवाचं एक नवं विश्व आपल्यासमोर उलगडत जातं. वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो, अंतर्दृष्टी गवसते. केवळ यशस्वी होण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीही लक्षपूर्वक ऐकणं आणि त्यातलं मह्त्वाचं वाटेल त्याची नोंद घेत, शिकत, पुढे जात राहणं आवश्यक असतं. कान देऊन ऐकणारी व्यक्ती आयुष्यात कमी चुका करते आणि व्यवसायात तर या क्षमतेचा प्रचंड उपयोग होतो, असं ते म्हणतात.
तुम्हाला जर कुणाचंच ऐकण्यात रस नसेल तर तुमचं ऐकण्यात जगालाही रस वाटणार नाही इतकं हे साधं समीकरण आहे. ’(सिर्फ) मेरी आवाज सुनो’ च्या जगात इतरांचं जाऊ देत आपला आतला आवाज तरी आपण नीट ऐकतो आहोत का!

sakal -ya jaganyawar- May21

Saturday, May 15, 2021

पुस्तक ते पडदा - प्रवास ’परिणीता’चा


लाईट- साउंड -कॅमेरा- अ‍ॅक्शन... आणि आपण एका दुसर्‍याच जगात प्रवेश केलेला असतो. अर्थात सिनेमा या कलाप्रकाराचे दर्शनी रुप ही चतु:सूत्री ठरवत असली तरी सिनेमाचा आत्मा असतो त्याचा आशय, त्याची पटकथा. ती जर सशक्त असेल तर त्यावर उभा राहणारा सिनेमा एखाद्या मनोर्‍यासारखा लक्षवेधी असतो, पिढ्यानपिढ्या चर्चेत राहतो नाहीतर भुईसपाट होतो. साहित्य शब्दांच्या माध्यमातून अविष्कृत होते तर सिनेमा बोलतो ते कॅमेर्‍याच्या माध्यमातून. गाजलेल्या साहित्यावर आधारित सिनेमे म्हणजे दोन लोकप्रिय कलाप्रकारांचे मीलन. यामुळे अभिजन वर्गापर्यंत मर्यादित राहिलेले साहित्य  जनसामान्यांपर्यंत पोचणे सोपे होते. वाचक आणि प्रेक्षक या दोघांचे रुपांतर ’रसिका’मध्ये होते. सिनेमा हा जणू धर्म असलेल्या आपल्या भारतीयांसाठी साहित्य आणि सिनेमा यांचे दृढ नाते परिचयाचे आहे ते अगदी 
दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय सिनेमापासून. 

भारतीय कलाविश्वात दोन वैचारिक परंपरा मानल्या जातात. रामायण परंपरेत मांगल्य, सौंदर्य, आदर्शवादाचे चित्रण केले जाते तर महाभारत परंपरेत मानवी विकार, लालसा, क्रौर्य, हिंसा, विकृती, विखार यांचे चित्रण परखडपणे केले जाते. ओटीटी वाहिन्यांचे प्राबल्य असलेल्या आजच्या काळात प्रेक्षकांचा कल पाहून बहुसंख्य नव्या सिनेमांनी किंवा वेबमालिकांनी आपला मोहरा महाभारत परंपरेकडे वळवल्याचे दिसून येते. याउलट रामायण परंपरेचे पाईक म्हणता येतील असे सिद्धहस्त लेखक शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या ’परिणीता’ या साहित्यकृतीवर आधारित याच नावाचा हिंदी सिनेमा ओटीटी वाहिन्यांच्या प्रेक्षकांसाठीही आकर्षणाचा विषय ठरतो आहे हे विशेष. प्रदीप सरकार दिग्दर्शित हा ’परिणीता’ सिनेमा २००५ सालचा. त्या आधी १९५३ मध्ये याच कादंबरीवर आधारित बिमल रॉय दिग्दर्शित हिंदी आणि १९६९ मध्ये अजॉय कर दिग्दर्शित बंगाली ’परिणीता’ येऊन गेला असला तरी कथेच्या आशयघनतेमुळे ही कलाकृती कालातीत ठरते. मूळ कादंबरी १९१४ मध्ये म्हणजे अगदी पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी लिहिली गेली असली तरी त्यातली प्रेमाची अभिव्यक्ती आधुनिकच नव्हे तर काळाच्या कितीतरी पुढची आहे. कदाचित त्यामुळेच आज शतक उलटले तरी ’परिणीता’ची जादू कायम आहे. 


'परिणीता' ही एक प्रेमकथा आहे त्याचबरोबर सामाजिक चालीरिती आणि त्यांचे उतरंडीच्या रचनेनुसार होणारे परिणाम यात भरडलेल्या जीवांची ही कहाणी आहे. नायक, नायिका आणि प्रेमाचा त्रिकोण देखील यात आहे परंतु या कादंबरीतले प्रेम पठडीतले नाही. ते अपारंपारिक आहे, तो भावनांचा अनेकपदरी गोफ आहे. ललिता ही 13 वर्षाची सालस आणि गुणी मुलगी. आपल्या मात्यापित्यांना गमावल्यामुळे ती आपल्या मामाकडे राहत असते. तिचे मामा गुरुचरण हे बँकेत लिपीक असतात. त्यांना पाचवी मुलगी झाल्याची वार्ता कळते तेव्हा ते खचून जातात. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी अगोदरच वडिलोपार्जित घर गहाण ठेवलेले असते. परिस्थितीची जाणीव असलेली ललिता मूकपणे मामा मामीला हातभार लावत असते. मामाच्या शेजारी राहणार्‍या धनाढ्य नवीनचंद्र राय यांचा मुलगा शेखर म्हणजे ललिताचा बालमित्र. ती आठ वर्षांची असल्यापासून या शेखरभैय्याकडे येत असते. तो तिला लिहावाचायला शिकवे, ललिताही त्याची लहानमोठी कामे आपुलकीने करी. शेखरला विचारल्याशिवाय ललिता काहीही करत नसे. अधूनमधून हातखर्चासाठी थेट त्याच्या कपाटातून पैसे घेण्याचीही तिला मुभा असे.  


जाणत्या वयात या लोभस मैत्रीचे रुपांतर नकळत अव्यक्त प्रीतीमध्ये होऊ लागते. वडील आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत याची शेखरला खात्री असते. यामुळे तिचे इतरत्र लग्न होईल याची त्याला भीती वाटू लागते. एके दिवशी ललिता सहज गमतीने अभावितपणे त्याच्या गळ्यात माळ घालते. शेखर मात्र तिच्यावरील गाढ प्रेम उमजून तीच माळ तिच्या गळ्यात घालतो. अचानक घडलेल्या या परिणय सोहळ्याला साक्षी असते ते फक्त त्या दोघांमधले मुग्ध प्रेम आणि योगायोगाने याचवेळी शेजारच्या घरी सुरु असलेल्या लग्नसोहळ्यातले मंत्रोच्चार. दरम्यान पाहुणे म्हणून आलेले शेजारच्या चारुबालाचे मामा गिरिंद्र ललिताकडे आकर्षित होऊ लागतात. तिच्या कुटुंबियांना मदत म्हणून ते गुरुचरण यांना कर्जमुक्त करतात इतकेच नव्हे तर ते आजारी पडल्यावर हवापालटासाठी त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जातात. दुर्दैवाने गुरुचरण तिथेच शेवटचा श्वास घेतात. शेखर-ललिताच्या नात्याबद्दल अनभिज्ञ असलेले गुरुचरण ललिताची जबाबदारी आणि हात गिरींद्रच्या हाती सोपवून इहलोकाचा निरोप घेतात. शेखरला पती म्हणून मनानेच नव्हे तर कृतीनेही वरणारी आणि त्यामुळे स्वत:ला परिणीता मानणारी ललिता स्वत:ऐवजी आपल्या धाकट्या मामेबहिणीशी गिरींद्रचा विवाह घडवून आणते. गिरिंद्रचे देखणे रुप, श्रीमंती आणि एक सुरक्षित भविष्य यातले काहीही ललिताच्या पतीनिष्ठेच्या आड येत नाही. तिच्या अंतर्मनातील या उत्कट भावनेचे कादंबरीतले स्थान कृष्णासाठी मोरपिसाचे असावे तसे अलौकिक आहे. ललिताच्या दृष्टीने आपल्या दोघातील बंधन अतूट आहे, जणू विवाह-संस्काराच्या दर्जाचे आहे हे शेखरला अंत:करणातून जाणवते. ललिता आणि गिरींद्रबाबत झालेला त्याचा गैरसमज दूर होतो आणि दुसर्‍याच मुलीशी होऊ घातलेल्या लग्नाची तयारी शेखर थांबवतो. ललितावर नेहमीच माया करणारी शेखरची आई भुवनेश्वरी ललिताचा सून म्हणून अत्यानंदाने स्वीकार करते. अनुरक्तीच्या पल्याड जाऊन सर्वस्व झोकून देणार्‍या प्रेमाची ही हृद्य कहाणी, ती ही शरदबाबूंच्या प्रतिभ लेखणीतून उतरलेली.

एखाद्या प्रसिद्ध साहित्यकृतीवर सिनेमा बेतला असेल तर तो यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यातून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी कथेत जे जे हवे ते सारे या कथानकात आहे त्यामुळे ’परिणीता’ची निवड या सिनेमांच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी केली असावी. शरच्चंद्रांच्या १५-२० साहित्यकृतींवर हिंदी चित्रपट निघाले आहेत. ‘अपने-पराए’, ‘छोटी बहू’, ‘खुशबू’,‘स्वामी’ हे त्यातील काही मह्त्वाचे. त्यांच्या ‘देवदास’ची मोहिनी तर अजूनही उतरलेली नाही. सैगल, दिलीप कुमार, शाहरुख खानच्या कादंबरीशी बर्‍यापैकी प्रामाणिक असणार्‍या ’देवदास’पासून अभय देओलच्या देव-डी मधल्या आधुनिक देवदासपर्यंत याची अनेक रुपे सिनेसृष्टीत गाजली. शब्दातून निर्मिलेली कथा पडद्यावर यावी आणि प्रत्येक पिढीतील रसिक त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेत राहावे हे भाग्य अशा काही मोजक्याच साहित्यिकांना लाभते. विश्वस्तरावर प्रख्यात असलेल्या बंगाली साहित्यिकांचे उदाहरण द्यायचे झाले तर रवींद्रनाथ टागोर (‘चोखेर बाली’, ‘काबुलीवाला’, ‘तीन कन्या’, ‘उपहार’,’चारुलता’ इ.), विभूतिभूषण बंदोपाध्याय, सत्यजित रे ही नावे अग्रक्रमाने घ्यायला हवी. सत्यजित रे हे स्वत: जागतिक कीर्तिचे दिग्दर्शक असल्याने आपल्या किंवा इतरांच्या साहित्याला पडद्यावर अचूक साकारत. त्यांचे प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ’शतरंज के खिलाडी’चे व्यावहारिक गणित मात्र जमून आले नाही. कथेचा किंवा कवितेचा जीव लहान असल्याने ती फुलवणे कठीण होत असावे. मराठीतल्या महानोरांच्या ’अजिंठा’लाही ते आव्हान पेलले नाही. एकंदर सिनेमा निर्मितीसाठी कादंबरीला प्राधान्य मिळण्यामागे हेच कारण असावे.  

निर्माते - दिग्दर्शकांसाठी दर्जाशी तडजोड न करता साहित्यावर आधारित सिनेमा तयार करणे हे कायम एक आव्हान राहिले आहे. माध्यमांतर करताना बदल करणे अपरिहार्य असते. साहित्य हे बहुतेक वेळा आत्मविष्कारातून मिळणार्‍या आनंदासाठी निर्माण केले जाते. सिनेमाच्या बाबतीत मात्र अर्थकारण विसरुन चालत नाही. या ताणाचा परिणाम सिनेमावर होतो. अनेकदा तो कथेशी प्रतारणा करत रसिकानुययी होतो तर कधी भरकटतो. उदा: भंसालींच्या ’देवदास’मधल्या भपकेबाज आणि अतिविशाल सेट्च्या आवाक्यासमोर मूळ कथेतील प्रेमाची भव्यता खुजी ठरली. अशा अनुभवांमुळे जातीचे साहित्यप्रेमी सिनेमाला दुय्यम लेखतात. चिंतन, तत्त्वज्ञानाशी संबंध नसलेला सवंग कलाप्रकार मानतात. सिनेमाकडे प्रेक्षकाऐवजी कायम ’टीका’काराच्या भूमिकेतून पाहतात. त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी देखील दिग्दर्शकावर असते. परिणीताच्या बाबतीत दिग्दर्शकांनी दोन्हीचे उत्तम संतुलन साधले आहे.  

प्रदीप सरकार यांनी मूळ कादंबरीत केवळ करडी छटा असलेल्या नवीनचंद्र राय (शेखरचे वडील ) यांच्या पात्राला पूर्ण काळ्या रंगात रंगवले आहे. ललिताच्या मामांच्या वाड्याचा ताबा मिळवून त्यांना बेघर करुन त्या वाड्याचे तारांकित हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनसुबा ललिता ओळखते. गिरिंद्रने (इथे गिरिश) वेळीच केलेल्या आर्थिक मदतीमुळे तो धुळीला मिळतो. यामुळे संतापलेले नवीनचंद्र, शेखरच्या अनुपस्थितीत ललिताचा अपमान करुन तिला नोकरीवरून काढून टाकतात. दोन्ही घरांमध्ये रातोरात भिंत उभी करतात. तिने शेखरचा हवा तेव्हा वापर करुन घेतला आणि आता गिरिशला स्वत:ला विकले आहे असा ते शेखरचा समज करुन देतात. २००५ च्या काळात अपेक्षित असलेले धारदार नाट्य मूळ कादंबरीत नाही असे वाटल्याने त्यांनी हे बदल केले असावे. चोखंदळ प्रेक्षकांना ते कदाचित खटकतील परंतु सर्वसामान्य भावनाप्रधान भारतीय प्रेक्षकाला त्याच्या जातकुळीची वेदना, त्याचं शोषण पडद्यावर दिसल्याने तो सिनेमाशी घट्ट जोडला जातो आणि कादंबरीतून साकारलेली ’परिणीता’ सिनेमातूनही तितक्याच ताकदीने समोर येते. ललिताच्या मुख्य भूमिकेतील मीनाकुमारी (१९५३) आणि विद्या बालन (२००५) यांच्या सोज्ज्वळ सौंदर्य आणि परिणामकारक अभिनयाला यशाचे बरेचसे श्रेय जाते. मीनाकुमारी तर कसलेली कलावंत होती पण विद्द्याचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे कुठेही जाणवत नाही. 

माध्यमांतर होताना कितीही काळजी घेतली तरी काही गोंधळ होतात. विद्या बालन, सैफ अलीखान, संजय दत्त अभिनीत ’परिणीता’ मधला एक प्रसंग. त्यात काळ दाखवला आहे १९६० चा. तपशीलातील बारकाव्यांमुळे वाफेच्या इंजिनांपासून व्हिंटेज कारपर्यंत यातली प्रत्येक गोष्ट नेमकी. प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जाणारी. त्यातले एक स्त्रीपात्रं शिवणमशीनवर काम करताना दाखवले आहे. ते आधुनिक ’उषा’मशीन मात्र तोवर बाजारात आलेच नव्हते. अर्थात अशा चिमुकल्या गडबडीमुळे सिनेमाचा दर्जा कुठेही उणावत नाही पण माध्यमांतर करून एखाद्या साहित्यकृतीला पड्द्यावर दाखवण्याचे शिवधनुष्य़ पेलणे हे केवढे अवघड काम आहे याची कल्पना त्यावरून येते. ’परिणीता’च्या बाबतीत लेखक आणि सगळे दिग्दर्शक बंगाली असल्याने हे अधिक सहजपणे होऊ शकले असावे. साड्या नेसण्याच्या बंगाली पद्धतीपासून दुर्गापूजेपर्यंत बंगाली संस्कृतीचे असंख्य ताणेबाणे सिनेमाच्या दृक्श्राव्य अनुभवाला एक नवे परिमाण देतात.


समाजात काळानुसार घडणार्‍या सांस्कृतिक, नैतिक उलथापालथींचा विचारही सिनेमा सादर करताना करावा लागतो. कादंबरी प्रकाशित झाली त्या काळात म्हणजे ऐन इंग्रजी राजवटीत, १९१४ मध्ये भारतीय स्त्री-पुरुषाची मैत्री ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. १९५३ च्या काळातील स्वतंत्र भारतात बदलाचे वारे वाहू लागले असले तरीही भारतीय आचारविचार कायम होते. त्यामुळे तेव्हाच्या पडद्यावरच्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना केवळ हार घातल्याने, तो ही काहीशा गमतीच्या नादात, कुणी कुणाला थेट आयुष्याचा जोडीदार मानावे हे पचणारे होते. त्यातली नायिका खालमानेने बोलते, या मानलेल्या पतीला वाकून नमस्कार करते, नायक-नायिका एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. ती अंतर्मनाने त्याची होते. २००५ च्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना आधी थट्टेत मग गंभीरपणे माळा घातल्यानंतर भावनिक आवेगात ते शरीराने एकरुप होतात. मूळ कादंबरीत असे काही घडते तर कदाचित कादंबरीवर बहिष्कार टाकला गेला असता. २००५ च्या सादरीकरणात तिने अंतर्बाह्य त्याची होणे, असे न घडते तर त्यांच्या प्रेमाची उत्कटता आणि नात्याचे गांभीर्य कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोचले नसते. दोन्ही सिनेमात सामाईक गोष्ट म्हणजे या प्रसंगी ऐकू येणारे शेजारघरच्या लग्नातले मंत्रोच्चार आणि त्यामुळे या गुप्त नात्याला नकळत लाभलेले धार्मिक अधिष्ठान. त्यामुळे सामाजिक चौकटी मान्य असणार्‍या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनातून या नात्यावर आपसूक नैतिकतेची मोहोर उमटवली जाते. जागतिकीकरणानंतरच्या लिव्ह-इनच्या दिशेने पावले टाकणार्‍या पिढीला अशी अपघाताने घडलेली कृती म्हणजे जन्मभराचे लग्नबंधन ही गोष्ट स्वीकारार्ह वाटते किंवा पटू शकते ते केवळ एकाच कारणाने, कथेचा प्राण ज्याभोवती गुंफला आहे ते अलांच्छित, निरपेक्ष आणि नि:शंक प्रेम. पिढ्या बदलल्या, परिणयाच्या आणि सहजीवनाच्या संकल्पना बदलल्या तरी असे प्रेम जीवनाच्या गाभ्याशी होते, आहे आणि राहील. ते प्रेम जोवर तितक्याच आर्ततेने पडद्यावर साकारले जाते आहे तोवर ते प्रेक्षकांच्या मनात झिरपत, काळजात उतरत राहील आणि ’परिणीता’ एक सिनेमा म्हणूनही त्या त्या आवृत्तीत यशस्वी होत राहील.

कादंबरीचे यश हे लेखकाचे एकट्याचे असते. (हल्ली ते बरेचसे विपणन कौशल्यावरही अवलंबून असते हा भाग अलाहिदा) परंतु सिनेमाचे यश हे नेहमीच सांघिक कौशल्यावर अवलंबून असते. नाही म्हणायला विशाल भारद्वाजसारखे कसलेले दिग्दर्शक पटकथेपासून संगीतसंयोजनापर्यंत बहुतेक कामांचा भार एकट्याच्या शिरावर घेऊन थेट शेक्सपियरच्या कलाकृतींचे देखणे माध्यमांतर करून दाखवतात. (ऑथेल्लोवरुन ओंकारा, हॅम्लेटवरुन हैदर, मॅकबेथवरुन मकबूल इ.) त्यांनी तर ही कथानकं भारतीय मातीत अशी काही घोळवली आहेत की ते परकीय साहित्यावर बेतल्याचे प्रेक्षक पार विसरुन जातो. साहित्य असो वा सिनेमा दोन्हीचा ’रंजकपणे कथा सांगणे’ हाच मुख्य उद्देश असतो. सादरीकरणाच्या पद्धती आणि साधनं काळानुरुप बदलत जातात पण त्या कथेद्वारे वाचक/ प्रेक्षकांना एका उत्तम कलाप्रकाराचा आस्वाद घेता यावा आणि त्यांचे बौद्धिक उन्नयन व्हावे हा हेतू बदलत नाही. ‘उत्तम कलाकृती त्याला म्हणतात जी आपली आयुष्यविषयक जाण वाढवते.’ कोणत्याही कलाकृतीच्या गुणवत्तेच्या मापनाचा विजय तेंडुलकरांनी सांगितलेला हा चपखल निकष. ’परिणीता’बाबत बोलायचे तर स्थळ, काळ, दृश्य, ध्वनी आणि अभिव्यक्ती या सगळ्या कसोटींवर बंगालीसह दोन्ही हिंदी चित्रपट चोख ठरले आहेत. शरच्चंद्रांसारख्या प्रतिभावंताच्या कथेमुळे आशयाबद्द्ल बोलायलाच नको. याशिवाय कलाकारांचा दर्जेदार अभिनय, कथेला पुढे नेणारी श्रवणीय, अर्थपूर्ण, सुरेल गाणी, सिनेमाच्या तरलतेला पोषक संगीत, कॅमेर्‍याने दिलेली नेमकी नजर आणि दिग्दर्शकाला सापडलेली प्रेक्षकांची नस या सर्व घटकांच्या बळावर शरच्चंद्रांच्या ’परिणीता’ला सिनेमातूनही न्याय मिळाला आहे असे नक्कीच म्हणता येईल. 

(Published in Dault-Lekhani magazine - Cinema and Literature special edition)

Monday, May 10, 2021

ठहराव

 


#या_जगण्यावर #सकाळ #ठहराव

आजवर आपण खूप धावलो. साहजिकच आपली प्रवासाची साधनं, आपली संवादाची साधनं, आपल्याला लागणारी यंत्र फक्त वेगाची ’सबसे तेज’ भाषा बोलत होती. आपल्याला लागणार्या रोजच्या वस्तू सुद्धा ’झटपट आराम’, ’बस दो मिनट मे तैयार’, ’बंटी, तुझा साबण स्लो आहे का’ असं म्हणत आपल्या बरोबरीने पळत होत्या. ’फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट’ हे जमलं तरच या जगात ’हॉट सीट’ मिळते रे बाबा, हे सांगत आपण मुलांनाही धावायला शिकवत होतो. कोरोनाआपत्तीने या शर्यतीला करकचून ब्रेक लावला आहे किंवा खरं तर लादला आहे. चढावर अचानक ब्रेक लावला की आपण आपोआप घरंगळत मागे येतो. तसे मागे येताना आपण आपल्याच जगण्याकडे नवलाईने बघायला लागलो आहोत. मग जाणवतं की वर चढण्याच्या धावपळीत वाटेतले अनेक सुंदर थांबे बघायचे राहून गेले. निगुतीने करायच्या बर्याच गोष्टी राहून गेल्या. कितीतरी छंद अपूर्ण राहिले. मोठ्या सुखाच्या शोधात आयुष्यात येऊन गेलेल्या किंवा अजूनही भोवताली असलेल्या लहान लहान सुखांकडे आपलं दुर्लक्ष होत गेलं.
एक लोककथा आहे. गळ्यात लोखंडी साखळी घालून एक माणूस परीस शोधायला निघाला. वाटेतला प्रत्येक दगड त्या साखळीला लावून ती सोन्याची होते का हे बघत आणि नसेल तर तो दगड फेकत भराभर पुढे जात राहिला. त्या नादात ती साखळी केव्हा आणि कोणत्या दगडामुळे सोन्याची झाली हे त्याला कळलंच नाही. त्याच्यासारखीच आपल्याला घाई होती, इतकी की आपण श्वास सुद्धा पुरेसा दीर्घ घेत नव्हतो. १९८० च्या सुमारास सुरु झालेली स्लो फूड चळवळ आतापर्यंत फारशी महत्वाची वाटत नव्हती. भौतिक समृद्धी आणि आंतरिक समाधानाचा समन्वय साधण्याऐवजी भव्यदिव्य यश म्हणजे सुख हे जणू आपण ठरवून टाकलं होतं. त्या टप्प्यावर पोचेतो आपली ’भव्यदिव्य’ची व्याख्या पुन्हा बदलत होती त्यामुळे नेमकं कुठे थांबायचं हे कळेनासं झालं होतं. आता मागे येता येता आपण नोंद न घेतलेले सुखाचे चिमुकले स्त्रोत लख्ख दिसू लागले आहेत. एखाद्या कलेच्या अद्वितीय अविष्कारापासून नि:शब्द शांततेपर्यंत, विज्ञानातल्या एखाद्या रहस्याचा स्वत:ला उलगडा होण्यापासून एखाद्या अनामिक पक्षाची शीळ ऐकण्यापर्यंत, एखाद्या पुस्तकातल्या शब्दाने, विचाराने झपाटून जाण्यापासून हळव्या स्पर्शापर्यंत, मृद्गंधाच्या दरवळापासून बाळाच्या निरागस हास्यापर्यंत, मदतीसाठी पुढे केलेल्या हातापासून टाळीसाठी पुढे केलेल्या हातापर्यंत ते कुठेही विखुरलेले असू शकतात. याचे निकष प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे वेगळे असतात आणि ते वेगळे असण्यातच मजा आहे पण शोधण्याची असोशी मात्र तीच आहे. अशी छोटी सुखं खिसा भरलेला किंवा हलका असला तरी तितकीच तृप्ती देतात पण केव्हा! तो अनुभव, तल्लीनतेमधलं ते सौंदर्य मनातल्या अवकाशात मुरवत त्याचा तब्येतीने आस्वाद घ्यायला वेळ असेल तरच. स्वच्छ, शांत मन आणि अशा रुपेरी क्षणांच्या स्वागतासाठी सताड उघडं ठेवलेलं त्याचं दार, एवढं यासाठी पुरेसं आहे. याने जग वगैरे बदलत नाही पण आपण जगण्याच्या प्रेमात नक्कीच पडतो.
एका प्रसिद्ध सिनेमातलं दृश्य आहे. नायक नायिका एका पर्यटन स्थळावर गेले आहेत. कडयावर निवांत बसून ती त्याच्या साक्षीने सूर्यास्त बघते आहे. त्याच्या हातात तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची यादी आहे. त्याचं म्हणणं असतं- सूर्यास्त सगळीकडे सारखाच तर दिसतो, त्यात किती वेळ घालवायचा, अंधार पडेल मग बाकीची स्थळं बघणं राहून जाईल, चल निघूया. त्याच्या हातातल्या यादीचे तुकडे करुन दरीत भिरकावत ती म्हणते, "लाईफमें कुछ ना कुछ तो छुटेगाँही, तो जहाँ है, वही का मजा लेते है." जिथे आहोत तिथेच भिरभिरणारी सुखाची इवलीशी फुलपाखरं बघायला हवी असलेली उसंत आता आपल्याला मिळालीय. अर्थात हा ब्रेक आहे. आकाशातल्या चंद्राच्या कला बघण्यात आणि तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारण्यात कितीही मौज वाटत असली तरी शेवटी भाकरीच्या चंद्रामागे प्रत्येकाला अपरिहार्यपणे धावावंच लागणार आहे पण आधीसारखं उर फाटेस्तो नाही, एवढं एव्हाना आपल्याला कळलंय. गती हवीच पण किती! तोल राखता येईल आणि जगण्यात कुतूहलाने डोकावत रमतगमत पुढे जाता येईल एवढीच.

sakal-ya jagnyavar -May 21

Monday, May 3, 2021

प्रेरणा


 #Sakal #या_जगण्यावर #ध्यासपंथ

वांगणी रेल्वे स्थानकाच्या दिशेने एक गाडी धडाडत येते. अंध आईचा हात धरुन चालणारं एक मूल अचानक फलाटावरुन रुळावर पडतं. तेवढ्यात त्या रुळांवरुन मयूर शेळके धावत येतो. झपकन त्या मुलाला उचलून फलाटावर टाकतो आणि त्याचा जीव वाचवतो. हे कमी की काय म्हणून रेल्वे प्रशासनाने दिलेल्या ५०,००० रु.च्या बक्षीसातले निम्मे पैसे तो त्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देतो. नॅन्सी मिस्त्री ही सुरतची परिचारिका कोरोनाबाधिंताच्या सेवेच्या आड आपले गरोदरपण येऊ देत नाही. मागच्या लाटेत पोटचा पोर गमावलेले अहमदाबादचे मेहता मुलाची १५ लाखांची एफडी इतर रुग्णांच्या उपचारासाठी वापरतात. नागपूरचे ८५ वर्षांचे दाभाडकर तर ’आपलं जगून झालंय, इतरांचं सगळं बाकी आहे’ या समर्पण भावाने रुग्णालयातला स्वत:चा बेड देऊन टाकतात आणि अनंतात विलीन होतात. किती उदाहरणं द्यावी! यांच्या दर्शनाने विझू लागलेलं समाजमन उजळून निघतं. जगाला समपातळीवर आणणार्‍या या आपत्तीने आपलं बरंच काही हिरावून नेलं असलं तरी आपल्याजवळही देण्यासारखं खूप काही शिल्लक आहे हे जाणवू लागतं. 

कोरोनाच्या तडाख्यामुळे मनावर चरे उमटत असतानाही जगणं थांबलेलं नाही. धावत सुटलेल्या जगाला या आपत्तीने स्वल्पविराम मात्र दिला. अंतर्मुख केलं. आपल्या खर्‍या गरजा किती, खरी नाती कोणती आणि आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काय याचा विचार करायला भाग पाडलं. निसर्गचक्र मंदावलं नाही. भुई भेगाळली तरी पळसाला नेहमीसारखाच लालबुंद फुलोरा आला. नियमांच्या बंधनात का होईना विवाहासारखी मंगलकार्य, इवल्या जीवांचं आगमन सगळं अव्याहत सुरु राहिलं. वठलेल्या खोडातून बाहेर डोकावणार्‍या कोवळ्या पोपटी पालवीसारखी माणसाची जीवनेच्छा टिकून राहिली. कुणासाठी ती केवळ तग धरुन राहिली तर कुणासाठी ती पुन्हा तरारुन वर आली. बहरत राहिली. काय वेगळेपण असावं या दुसर्‍या प्रकारच्या माणसांचं! सिग्मंड फ्रॉइडने म्हटलं होतं, "वेगवेगळ्या विचारांच्या, कुवतीच्या काही माणसांना एकत्र करा आणि उपाशी राहायला लावा. भुकेच्या वाढत्या तीव्रतेबरोबर सगळे आव, भेद गळून पडतील, माणसं एका स्तरावर येतील आणि उरेल फक्त भूक!!" याउलट स्वतःवर विश्वास असलेली, खर्‍या अर्थाने सुजाण असणारी, जगण्याचा उद्देश गवसलेली माणसं अत्यंत प्रतिकूल स्थितीतही सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहू शकतात, मार्ग शोधू शकतात, स्थिरचित्तपणे निर्णय घेऊ शकतात हे ’लोगोथेरपी’चे जनक डॉक्टर फ्रँकल यांनी दाखवून दिलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या अमानुष छळछावणीतून बाहेर पडल्यावर अशी माणसं निराशेच्या गर्तेत तर गेली नाहीच, त्यांनी अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. 

गीतेतल्या ’कर्मयोग्या’च्या व्याख्येत चपखल बसणार्‍या अशा नि:शंक लोकांमुळे आपली जगण्यावरची श्रद्धा अबाधित राहते. ही माणसं स्वतःच स्वतःची प्रेरणा असतात, ती इतरांना नकळत बळ देतात, दिशा देतात. उसवलेलं जग माणुसकीच्या धाग्याने सांधत जातात. त्यांची नावं सोनू सूदपासून रतन टाटांपर्यंत काहीही असू शकतात. कधी ही माणसं निनावी असतात. त्यांच्या बातम्या येत नाहीत. वैद्यकीय, वित्तीय, सुरक्षा विभागातले जिगरबाज कोरोना योद्धे, प्रयोगशील शिक्षक, जेवणाची सुट्टी न घेता ऑक्सीजन रिफील करणारे कामगार, हाडाचे संशोधक, तळमळीचे समुपदेशक, प्रेक्षकांचं मन रमवणारे सर्जनशील कलाकार, धडपडे क्रियाशील उद्यमी, निरपेक्ष समाजसेवक, अपरात्री देखील ओ देणारे मित्र, हतबल न होता कोंड्याचा मांडा करणार्‍या गृहिणी अशा कोणत्याही रुपात ती भेटतात. त्यांच्या परिघात येणार्‍यांना लागण होते पण ती उर्जेची. 

आपापलं उद्दिष्ट्य शोधून या मांदियाळीत प्रत्येक जण आपल्या परीने सामील होऊ शकतो. स्वत:च्या क्षमता तपासून एकमेकांच्या जगण्याला उमेदीचं तोरण लावण्याची संधी कोरोनाच्या संकटातही दार ठोठावते आहे. तिचं स्वागत करुया.


- मोहिनी

सकाळ सदर - या जगण्यावर May2021

लेख १