Friday, December 25, 2015

जनरेशन गॅप- रस्सीखेच


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी या विषयावरील ’रस्सीखेच’ हे सदर सरत्या वर्षाबरोबर आपलाही निरोप घेतं आहे. या विषयाशी निगडीत पिढ्यांमधील वैचारिक तफावत, सामाजिक, कौटुंबिक, राहणीमानातील बदल, पालकत्वाकडे पाहण्यात झालेला फरक, स्त्रियांकडे बघण्य़ाचे कालचे आणि आजचे दृष्टीकोन, वाचनाच्या बदललेल्या पद्धती, जुनी आणि नवी शैक्षणिक मूल्ये, अभिव्यक्तीची बदलत गेलेली शैली, तंत्रज्ञानामुळे रूंदावलेली दरी यासारख्या अनेक मुद्द्यांचा परामर्ष या सदरात घेतला गेला. इ-मेल वर बर्‍याच वाचकांनी आपले अभिप्राय दिले. वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं हा एक अतिशय आनंदाचा अनुभव होता. जगाचा विचार केला तर दोन पिढ्यांमधील अंतराची- जनरेशन गॅपची- कल्पना आक्रसते आहे. वीस ते पंचवीस वर्षांनी पिढी बदलते, असे साधारणपणे मानले जाते. आता जगभरातली दोन पिढ्यांमधील अंतराची कल्पना जेमतेम सहा वर्षांवर येऊन पोचली आहे

काही बाबतीत मात्र भारतीय पिढ्यांमधे जनरेशन गॅप नाहीच की काय असं वाटायला लागतं. सन्माननीय अपवाद वगळता जुन्या मंडळींच्या कल्पना इतक्या पक्क्या झालेल्या असतात की, नवं सगळं त्यांना वाईट, अयोग्य, असभ्य वगैरे वाटत राहतं. नुकत्याच घडलेल्या शबरीमला मंदीरातील महिलांच्या स्कॅनिंग विषयीच्या विचाराचं उदाहरण घेतलं तर वरवर यावर नाराजी प्रकट करणार्‍या बहुसंख्य महिला सुद्धा मनातून मासिक धर्माला पिढ्या न पिढ्य़ा अपवित्रच मानत आल्या आहेत. शिवाय ते इतकं ठासून बिंबवलं जातं की आजच्या पिढीच्या देखील कित्येक तरूणी त्या बाबतीत विज्ञाननिष्ठ विचार करायला धजावत नाहीत. त्याच वेळेला दुसरीकडे भारतीय पिढ्यांमधे प्रचंड जनरेशन गॅप आढळून येते, उदा. द्यायचे तर आपणच कौतुकाने इंग्रजी माध्यमात घातलेला मुलगा किती सहजतेने संगणक, मोबाईल वापरतो, फाडफाड इंग्लिश बोलतो आणि आपण किती अडाणी आहोत, अशा न्यूनगंडाने अनेक पालक आज ग्रासलेले आहेत.

प्रत्येक मागच्या पिढीजवळ नव्या पिढीच्या तुलनेने संयम, आदर, त्यागी वृत्ती असते तर नव्या पिढीजवळ उमेद, बंडखोरी आणि ’मला काय हवय’ या बाबतीत स्पष्टपणा असतो. वेगाने धावू पाहणारी पिढी आर्थिकदृष्ट्या बऱ्याच लवकर सक्षम होत आहे. वडिलांनी निवृत्तीच्या वेळेतो केली तेवढी कमाई मुलं वर्षात करतात. त्यातून आत्मविश्वास वाढतो पण काहीसा अहंकार ही निर्माण होतो. यात समन्वय साधायचा तर मागच्या पिढीने दिलेल्या संस्कारांचे दोर बळकट हवेत. संस्कार म्हणजे फक्त ’शुभंकरोति’ म्हणणे नव्हे, माणूस घडवणे. कुठलीही असली तरी पौगंडावस्थेतील पिढी नेहमीच सैरभैर अवस्थेत असते. संस्कृतीतून, इतिहासामधून नेमकं काय घ्यायला हवं हे त्यांना समजत नसतं. परंतु सभोवतालातून, आजूबाजूच्या व्यक्तींमधून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांकडून ते अभावितपणे खूप काही घेत असतात. नैतिक अधिकार प्रत्यक्ष कृतीतूनच कमवावा लागतो हे निश्चित. मुलं आपलं सतत निरीक्षण करत असतात. त्यामुळे पुढच्या पिढीने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण आपल्या मागच्या पिढीशी वागायला हवं.

पिढ्यांमधलं अंतर आवर्जून कमी करायचं तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांच्या जागी उभे राहून परिस्थितीकडे पाहिलं तर कदाचित एकमेकांच्या वागण्य़ाचा कार्यकारणभाव समजणं सोपं जाईल. नव्या पिढीचे जगण्याचे मार्ग वेगळे असतील पण ते अयोग्य नसतील असा विश्वास निर्माण होईल आणि मागची पिढी तरूणाई ला ’आऊटडेटेड’ वाटणार नाही.

जुनं ते सोनं हे बहुतांशी खरं असलं तरी सर्वच जुनं ते सोनं नाही. सरसकट एखाद्या पिढीला दोष देण्य़ापेक्षा जुन्यातलं आजही काय लागू होतं किंवा ते नव्या रूपात लागू करता ये ईल का याचा विचार करणं आणि काळानुसार बदलणं खरच इतकं अवघड आहे का! आल्फ्रेड नोबेल यांनी डायनॅमाईट सारख्या विनाशकाचा शोध लावला होता. असं म्हटलं जातं की एकीकडे संशोधनातून जगाला विध्वंसाची साधने उपलब्ध करून देणारे नोबेल आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून हादरले, बदलले, इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल पारितोषिक..विशेषत: शांततेसाठी, जगविख्यात आहे. म्हणजे माणसात अगदी आमूलाग्र बदल होणं सुद्धा अशक्य नसतं. बदलाच्या लाटांमुळे थोडी खळबळ होईलही पण अथांग काळाबरोबर वाहत चाललेलं माणूसपणाचं तारू भरकटणार नाही एवढं नक्की. असा विचार केला तर जगणं सुखकर आणि आयुष्य सुंदर होईल. त्यासाठी मागच्या ,आजच्या आणि सळसळत्या वयातल्या उद्याच्या पिढीनही एकमेकांना इतकच सांगावं, ’कुछ तुम चलो, कुछ हम चले, दूरियां यों मिटाते चलें’.

Friday, November 20, 2015

जनरेशन गॅप - परदेश


’आजीबाई आजीबाई थकलात का? नेटवर नातवाला भेटलात का?
मुलांना शिकवून केला गुन्हा (!), परदेशी गेल्या लेकी सुना
नातवा नातवा येऊन जा, आजीच्या प्रेमात न्हाऊन जा
नातवाने वाचला नन्नाचा पाढा, रिकामा राहिला आजीचा वाडा’
या विषादपूर्ण ओळी व्हॉट्स ऍप वर वाचल्या. सहानुभूती साहजिक आजीच्या वाट्याला जाते आणि आजची पिढी- मुलं, सुना, नातवंडं दुष्ट ठरतात. खरं तर कुठलीच पिढी सरसकट काळी किंवा पांढर्‍या रंगाची नसते. मागच्या पिढीला येथेच सोडून परदेशी गेलेले सगळेच निष्ठूर, कृतघ्न वगैरे नसतात.

एका स्नेह्यांचा मुलगा उच्चशिक्षणासाठी म्हणून परदेशी गेला, संशोधन केले आणि पुढे लग्न करून तेथेच स्थायिक झाला. सुरूवातीला ते मुलाच्या प्रगतीचे गोडवे गाताना थकत नसत कारण मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होताना बघणे हेच प्रत्येक पालकाप्रमाणे त्यांच्याही आयुष्याचे ध्येय होते. त्यातले अप्रूप आणि नावीन्य ओसरल्यावर आणि विशेषत: पत्नी निवर्तल्यावर त्यांना एकटे वाटू लागले. मुलाने तिकडे राहण्यास बोलावले परंतु तिथले हवामान, तिथली संस्कृती याच्याशी जुळवून न घेऊ शकल्याने ते भारतात परतले आणि एकटे राहू लागले. काही नातलगांनी ’एवढं शिकवलं मुलाला पण संस्कार तेवढे करायचे राहिले, आता घ्या’, ’आपल्या देशासाठी काही करायला नको, नुसती डॉलरची हाव!" वगैरे मुक्ताफळे उधळली. अशा नातलगांपैकी कित्येकांना परदेशी गेलेल्यांबद्दल असूया असते, आपल्याही मुलांनी परदेशी जावं असं स्वप्न असतं आणि नाहीच जमलं तर त्यांना एकदम ’देशप्रेम’ वगैरे आठवतं. आपल्याकडेही स्वेच्छेने किंवा नाईलाजाने गावी राहणारे आईबाप आणि शहरात स्थायिक झालेली पुढची पिढी हे चित्र काहीसे असेच नाही का! भारतात राहणारे सगळेच आपल्या देशासाठी काही महान कार्य वगैरे करतात का? कित्येक जण इथेच आयुष्य घालवूनही मॉल संस्कृतीचे गुणगान करीत येथील प्रत्येक गोष्टीला नाके मुरडत असतात. आजच्या काळात नवनवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, वैश्विक अनुभव घेण्यासाठी परदेशी जाणे म्हणजे पाप नाही. अर्थात आजन्म तिथे राहून स्वत:ला अकारण श्रेष्ट समजणे आणि स्वदेशाला नावे ठेवणे नक्कीच गैर आहे.

 'फॉर हिअर ऑर टु गो' या पुस्तकात अपर्णा वेलणकर यांनी मांडलेले एक निरिक्षण फारच महत्वाचे आहे. विदेशात व्यावसायिक यश मिळवून झाल्यावर परत आलेले अनेक जण भारतातील लाल फीतीच्या कारभाराला, भ्रष्टाचाराला कंटाळून पुन्हा परदेशी जातात. आपल्या समाजात अनेक रुढी,परंपरा यांचे जोखड स्त्रियांच्याच मानेवर अधिक असते त्यामुळे काहींच्या पत्नीचा परत येण्याला विरोध असतो. तिकडे जाऊन लोक संस्कृती विसरतात असाही एक आक्षेप घेतला जातो. ते तिकडे पूर्ण समरस होऊ शकत नाहीत आणि इकडे पुन्हा स्वीकारले जात नाहीत. एक अनुभव वाचनात आला, त्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका स्त्रीला तिच्या भारतातल्या आईने सुचवलं, "दोन्ही दगडांवर पाय ठेवून राहशील तर फरपट होईल. वाहत्या पाण्यात बेटं करुन बसलीस तर कधीच आनंदाने जगणार नाहीस." त्यातल्या त्यात तिथे भारतीय सणवार एकत्र येऊन साजरे करून भारतात नसल्याची उणीव भरून काढण्याचा ते आपल्या परीने प्रयत्न करतात. भारतीय कार्यक्रमांचे, कलाकारांचे तिकडे आवर्जून स्वागत करतात. इंटरनेटच्या माध्यमातून आपली नाळ देशाशी जोडून ठेवतात. आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीत त्यांच्यामुळे भर पडत राहते. अनेक परदेशस्थ भारतीयांनी येथील अनेक सामाजिक प्रकल्पांना भरघोस मदत दिलेली आहे. ती घ्यायला आणि त्यांच्यातल्या कुणाला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला की लगेच ते ’भारतीय वंशाचे’ आहेत म्हणून श्रेय घ्यायला मात्र आपण तयार असतो.

थोडक्यात परदेशी गेलेल्या सगळ्यांना एक तर नायक नाहीतर खलनायक ठरवण्याची टोकाची मानसिकता आपण बदलायला हवी. मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न उरतोच की आपण आपल्या देशाचे काही देणे लागतो की नाही! निश्चितच. विशेषत: येथील आयआयएम, आयआयटी सारख्या अनेक नामांकित शिक्षणसंस्थातील विद्यार्थी त्या संस्थांचा शिडीसारखा उपयोग करतात आणि परदेशी निघून जातात. या पिढीने हे विसरता कामा नये की येथील सवलतींचा फायदा घेऊन मिळवलेल्या विशेष ज्ञानाचा देशाला उपयोग करून देणे त्यांचेही कर्तव्य आहे. ते त्यांनी इथे राहून पार पाडावे अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने तिथून. आजच्या पिढीत हे भान जपणार्‍यांची संख्या हळूहळू वाढते आहे ही फार आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे. ब्रेनड्रेनच्या प्रश्नाचा सुवर्णमध्य साधणार्‍यांची, परदेशात जाऊन उच्चशिक्षण आणि अनुभव घेऊन, जगाच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देऊ शकतील असे फॅशन, वैद्यकीय क्षेत्रा पासून सौर उर्जेपर्यंत अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्प भारतात सुरू करण्यासाठी परतणार्‍यांची संख्या वाढते आहे. (संदर्भ: इकॉ. टाईम्स २४-१-१५) ’स्नॅपडील’ या वेबसाईटद्वारा येथील रोजगारनिर्मितीत भर घालणार्‍या रोहित बन्सल आणि कुणाल बहल सारखे, अनेक परदेशस्थ भारतीय तरूण विवीध उद्योगधंद्यांच्या विस्तारासाठी मायदेशाची निवड करू लागले आहेत. स्वदेशाबद्दलची बांधीलकी केवळ देशात राहूनच जपता येते आणि तरच देशप्रेम सिद्ध होते असे नाही तर देशासाठी असे काही तरी केल्यामुळे सिद्ध होते.

प्रत्येक दोन पिढ्यांमधला हा संघर्ष आता पंचक्रोशी किंवा प्रांत ओलांडण्यापुरता उरला नाही तर सातासमुद्रापार पोचला आहे. वेलणकरांनी म्हटल्यानुसार जागतिकीकरणाची अपरिहार्यता म्हणून पुढच्या पिढीच्या रूपाने स्वदेश-परदेशाच्या निवडीचा संघर्ष तुमच्याही आयुष्यात रोरावत येईल तेव्हा मूल्यसंस्कारांची मुळे घट्ट रोवून त्याला आनंदाने आणि खुल्या मनाने सामोरे जायला हवे. 

Friday, October 16, 2015

जनरेशन गॅप -वाचन


’वाचनाने मला काय दिले’ या विषयावर खास पालकांसाठी आयोजित एका निबंध स्पर्धेचे परिक्षण करण्याची मला संधी मिळाली. सगळ्या निबंधांमधे एक समान धागा होता तो म्हणजे आजची पिढी पुस्तकांशिवाय ’घडते’ (!) आहे याबद्दलची खंत आणि अस्वस्थता. कवी गुलजार हीच खंत व्यक्त करताना म्हणतात..
 "जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी,
लेकिन .....
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "
एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय.

यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. हे खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही. पुस्तकातल्या माहितीचा ज्ञानात आणि ज्ञानाचा ’शहाणीवेत’ हळूहळू रूपांतरित होत जाणारा सुंदर प्रवास, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली अनुभवता येत नाही. आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. त्यात दोन धोके आहेत, मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. यावर जर पालक नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले तर या माध्यमांच्या मदतीने कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो.

 आजीआजोबांनी मुलांना गोष्टी सांगण्याची प्रथा विभक्त कुटुंबांबरोबर कमी होत गेली आहे. एकत्र कुटुंबांमधेही आजीआजोबांना आता टीव्ही मालिका पाहायच्या असतात. ज्या आजीआजोबांना आजही नातवंडाच्या बौद्धिक विकासासाठी काही करावसं वाटतं त्यांच्यात आणि नातवंडांमधे तंत्रज्ञानाच्या मार्‍यामुळे खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून आपोआप येणारे वाक्प्रचार, म्हणी, जुने शब्द याला नातवंड मुकतायत. शब्दकोडी सोडवणं, वर्डगेम्स अशा प्रयोगातून शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर त्या शब्दातून उमटणार्‍या चित्रांवर, गीतांवर, निसर्गावर, पर्यावरणावर प्रेम करायला मुलं आपोआप शिकतील. मात्र त्यांच्या बालसुलभ कुतुहलाला आपण संवादातून प्रोत्साहन द्यायला हवं.

 परंतु आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलांशी बोलायचं केव्हा! ती सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात. या संदर्भात जेनेल हॉफमन या अमेरिकन आईचं उदाहरण वाचनात आलं. मुलाला तिने मोबाईल बरोबर एक १८ कलमी नियमावली दिली. मुलांनी फोन कसा, किती, कुठे, का वापरावा याची ती जणू आचारसंहिताच होती. अशी काळजी घेतली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे पुढे उद्भवणारे प्रश्न आधीच निकाली निघून त्याचा सकारात्मक वापर होण्याच्या शक्यता वाढतील. मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांच्या तंत्रप्रेमाचा उपयोग करून त्यांना ई-बुक्स, ऑडीओ बुक्स ची ओळख करून द्यायला हवी. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्‍या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. awesomelibrary.org ह्या साईटवर इंग्रजी तर मराठी आणि हिंदीत हा खजिना उपलब्ध आहे arvindguptatoys.com या साईटवर. भारतीय पात्र असणा-या कथांसाठी pitara.com ही साईट उत्तम आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवर http://www.britishcouncil.org/kids हा वाचनिय आणि माहितीपूर्ण बालविभाग आहे. (संदर्भ:पालकनीती) पण हे सगळं घडून यायचं असेल तर पालकांनी आधी स्वत: तंत्रज्ञानाशी मैत्री करायला हवी. तंत्रज्ञान आणि मुलं ही जोडी फोडणं आता अवघड आहे पण पालकांना त्यांच्यामधला दुवा म्हणून काम करणं प्रयत्नांती शक्य आहे. डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफीक सारख्या वाहिन्यांवरचे साहित्यातही न सापडणार्‍या अनेक विषयांवरचे दर्जेदार माहितीपट मुलांसह पालकांनी आवर्जून बघावेत. वाचनापासून दुरावलेल्या मुलांच्या वैचारिक कक्षा रूंदावण्याचे इतर पर्याय शोधणे आता भाग आहे. ’आमचा मुलगा अजिबात वाचत नाही हो’ अशी तक्रार करणार्‍या पालकांनी स्वत:ला विचारावं की ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी त्यांना एक महिन्याने पुन्हा बोलावले आणि मग त्या मुलाला गोड खाणे बंद कर असे समजावून सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की हे तुम्ही तेव्हाच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली आणि मग त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला". मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी पालकांनी स्वत:ला विचारावं, आपलं वाचन whatsapp च्या मेसेजेस पुरतं मर्यादित आहे, पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! घरातील वातावरण वाचनाला पोषक असेल तर मुलं आपोआप पुस्तकांकडे वळतील. मात्र त्यातूनही ती वाचत नसतील तर किमान त्यांना वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या वाचायचा आग्रह करायला हवा. ते ही होत नसेल तर आपण त्यांना त्यातल्या महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, त्यावर मुलांसमोर सोप्या भाषेत चर्चा करू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो.

 आईने मुलाला झोपवताना गोधडी पांघरली काय आणि ब्लॅंकेट पांघरलं काय, खरी उब त्या पांघरूणापेक्षाही तिच्या स्पर्शात असते. मुलांच्या वाचनाच्या प्रश्नाकडे, वाचनाच्या बदलत्या माध्यमांकडे आता आपण याच दृष्टीने पाहायला हवं. जगातलं उत्तमोत्तम साहित्य डिजीटल स्वरूपात उपलब्ध होऊ लागलं आहे. भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा पुस्तक वाचनाचा खरा हेतू तर निखळ आनंद हा त्याचा आणखी एक फायदा. छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक सारखं डिजीटल माध्यम (अर्थात अतिरेक टाळून) त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो मुलांपर्यंत पोचला म्हणजे झालं. -

Friday, October 2, 2015

भारतीय सौंदर्याला ओहोटी ??


तुम्हाला आदिती आर्या कोण हे माहीत आहे? तिने या वर्षीचा मिस इंडीय़ा किताब पटकावला आहे. बरं, गेल्या वर्षीची विजेती ,कोयल राणा आठवत असेल. ती ही नाही? तुम्हाला ऐश्वर्या, सुश्मिता, प्रियांका, लारा मात्र अजूनही लगेच आठवतात. लकाकते मुकुट घातलेले त्यांचे रूपवान चेहरे, त्यांचे निकाल ऐकून विस्फारलेले चमकदार डोळे आजही तुमच्या नजरेसमोर आहेत, मग या आजच्या सुंदरी तुम्हाला का आठवत नाहीत? कारण सोपं आहे, या आजच्या मुली फक्त भारतसुंदरी आहेत, त्या जगतसुंदरी किंवा विश्वसुंदरी होऊ शकलेल्या नाहीत. ९० च्या दशकानंतर कुणीही भारतीय सुंदरी विश्वसुंदरी ठरलेली नाही.

अचानक असे काय झाले की जागतिक पातळीवर पोचलेल्या भारतीय सौंदर्याला पार ओहोटी लागली? कारण सोपे आहे, ते जागतिकीकरणाचे दशक होते. भारतातील नव्या मध्यमवर्गाचे रूपांतर ग्राहकामधे करण्याचा, या स्पर्धांचे प्रायोजक म्हणून मिरवणार्‍य़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मनसुबा या सहस्त्रकाच्या आगमनापावेतो सफल झाला.

आज भारतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतरच्या सुधारणांतून तयार झालेल्या या मध्यमवर्गाची लोकसंख्या सुमारे 30 कोटीहून अधिक आहे. सौंदर्याचे अभारतीय मापदंड स्वीकारून त्यानुसार आधुनिक(!) जीवनशैली घडवण्य़ाची अहमहमिका तेव्हा पासूनच मध्यमवर्गात लागली. जागतिकीकरणामुळे निम्नमध्यमवर्गाचीही राहणी बदलू लागली. त्या विशिष्ट जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या तमाम उत्पादनांच्या खपात प्रचंड वाढ झाली. एसटी चा जेथे थांबा देखील नाही अशा दुर्गम खेड्य़ातही शाम्पूचे पाऊच, कोकाकोला सहज पोचू लागले. सौंदर्याची ही अद्भुत दुनिया सिनेमा, टीव्ही आणि सोशल नेटवर्क वरील वेगवेगळ्या जाहिराती व कार्यक्रमांच्या माध्यमातून, चकचकीत चित्रणाच्या मदतीने दररोज आपल्या समोर अवतरते आहे. त्यामुळे ९० च्या दशकात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हेतुपुरस्सर घडवलेला भारत नावाचा ’बाजार’ एव्हाना स्थिरावलाच नाही तर वेगाने वाढतो आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला एकदा अशा उत्पादनांची चटक लावल्यानंतर या सार्‍या घातचक्राचे केंद्र असलेल्या जागतिक सौंदर्यस्पर्धांच्या विजेतेपदावर भारतीय नावे कोरण्यातले बहुराष्ट्रीय कंपन्यांचे स्वारस्य संपले असेल तर यात नवल काय!

१९३४ मध्ये डी मिले ने दिग्दर्शित केलेला ‘क्लिओपात्रा’ हा सिनेमा व त्याच्या निर्मितीची कथा यादृष्टीने लक्षात घेण्याजोगी आहे. त्यात कलेचा भागही होता पण अमेरिकन उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची निर्मिती हा अंतस्थ हेतू होता. जबरदस्त जाहिरातीमुळे या चित्रपटाने जगभरात जोरदार धंदा केला. मुख्य भूमिकेतली क्लाउडेटी कोलबर्ट ही अमेरिकन अभिनेत्री युरोपियन प्रेक्षकांना भुरळ घालणारी होती. मूळ युरोपियन संस्कृतीत अमेरिकन उत्पादनांविषयीचे आकर्षण रूजले. चित्रपट संस्थांशी जोडलेल्या साखळी-दुकानांतून पिनांपासून कपड्य़ांपर्यंत अनेक ’क्लिओपात्रा उत्पादने’ विक्रीस आली. लक्स साबणापासून ओल्ड गोल्ड सिगारेट पर्यंत अनेक कंपन्यांशी व्यावसायिक संधान बांधले गेले. (संदर्भ: मेरी हमर) कपडे किंवा वस्तूच नव्हे तर दृष्टिकोन, विचार, मूल्ये, श्रध्दा सगळ्यांचेच अमेरिकीकरण करण्याची ताकद हॉलिवूडच्या चित्रप्रदर्शनात होती आणि आहे. ९० च्या दशकात हीच क्लॄप्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय मानसिकतेला व राहणीला बदलवण्य़ासाठी सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून वापरली.

तसे पाहता भारतीय स्त्री विश्वसुंदरी होण्यात गैर काय, असे मनात येते. (प्रख्यात वृत्तपत्रांनी सुद्धा त्या यशाचे वार्तांकन ’world's envy, India's pride' असे केले होते). त्यासाठी या स्पर्धांची परिणीती लक्षात घ्यायला हवी. प्राचीन काळी मुस्लिम राजांच्या ऐरेममध्ये राण्यांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये सौंदर्यस्पर्धांविषयी माहिती आढळते. यूरोपमध्ये ट्रॉय या शहरामध्ये सौंदर्यस्पर्धा ह्या मनोरंजना-साठी होत होत्या. या स्पर्धांचे परीक्षक हे कलाकार, कवी, बुद्धिवंत, आणि सेनापती असत. (संदर्भ- विश्वकोश) १९५४ मध्ये ‘मिस् अमेरिका’ ही सौंदर्यस्पर्धा तेथील दूरचित्र-वाणीवर प्रसारित झाली आणि मग हे लोण जगभर पसरत गेले. जागतिकीकरणानंतर एकाएकी या स्पर्धा भारतीय सुंदरी जिंकू लागल्या, मग निदान यातून भारतीय स्त्रीचे सामाजिक स्थान वगैरे बदलले का! नाही. नव्वदच्या दशकानंतर तमाम मध्यम -उच्चमध्यमवर्गीय पालकांना आपली मुलगी जागतिक व्यासपीठावर चमकत असल्याची दिवास्वप्ने मात्र पडू लागली होती. असे निरिक्षण संतोष देसाई हे जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ नोंदवतात.

म्हणायला या स्पर्धांमधे बुद्धीचातुर्याचा समावेश होता परंतु प्रत्यक्षात स्त्रीने कसे दिसावे, बोलावे, चालावे, बसावे किंवा वावरावे याचे निकष यातून ठरू लागले. या बिरूदांमधे भारतीयत्वाचा सन्मान नव्हताच उलट आंतरराष्ट्रीय मानका नुसार चेहरा-३० टक्के, बांधा-२० टक्के, चाल-२० टक्के, व्यक्तिमत्व-२० टक्के आणि हजरजबाबीपणा-१० टक्के अशी चक्क विभागणी करून सौंदर्यवती(!) घडवण्य़ासाठी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. बाईची कचकड्याची बाहुली झाली, पण हे इथेच थांबले नाही.

कार्ल मार्क्सच्या उक्तीनुसार, उत्पादनं आणि देवाणघेवाणीची इतकी प्रचंड साधनं तयार केली गेली आहेत की आता त्याची परिस्थिती एका गोष्टीतल्या जादूगारासारखी झाली आहे. त्याने जगावर राज्य करण्य़ासाठी आपल्या जादूटोण्याने इतकी भुतं निर्माण केली की त्यांच्यावर ताबा ठेवण्याला आता त्याची स्वत:ची शक्ती अपुरी पडू लागली आहे. या साधनांच्या धुंदीमधे सौंदर्याचे सारे संदर्भ बदलू लागले. भारतीय स्त्री सौंदर्य किंवा शरीरसौष्ठवाच्या व्याख्या राजा रविवर्मा किंवा दीनानाथ दलालांच्या चित्रांमधे अडकून पडणं शक्य नव्हतं, त्या कालानुरूप नैसर्गिकपणॆ बदलत गेल्या असत्या. मात्र सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून पाश्चात्य जगाने त्यांच्या व्याख्या भारतीयांवर लादल्या आहेत. भारतीय सिनेअभिनेत्रीच नव्हे तर सर्वसामान्य स्त्रियादेखील त्या व्याख्येला अनुरूप होण्य़ासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. भारतीय आहारशास्त्राला अव्हेरणारे ’झीरो फिगरचे’ खूळ त्यातूनच निर्माण झाले. कुपोषित मॉडेल्सच्या फौजा रॅम्पवर चालू लागल्या. यातून झालेली रोजगारनिर्मिती काही अंशी फायद्याची मानली तरी या ग्लॅमरजगातली स्पर्धा आणि त्यातून जगाला स्त्री शोषणाचा मिळालेला नवा मार्ग हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ग्लॅमरचे वेड आणि दिखाऊपणाच्या नादात आजची तरूणाई सोशल नेटवर्किंगच्या आभासी जगात आणि स्वप्रतिमेत गुरफटत गेली आहे. जगण्य़ातली साधी सोपी मूल्य झाकोळून गेली. सौंदर्यस्पर्धा किंवा फॅशन शोकरिता अनेक मॉडेल बोटॉक्स उपचार करून घेत. पण आता मात्र लहान मोठ्या समारंभाला जाण्यासाठी केवळ तीन-चार माहिनेच परिणाम टिकणार्‍या अशा उपचारांना तरुणी प्राधान्य देत आहेत. मानसोपचारतजज्ज्ञ म्हणतात, त्याच्या अतिवापराने चेहरा निर्विकार होतो. कित्येकदा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया फसतात, तसे झाल्यास ती तरुणी नैराश्याने ग्रासली जाण्याचीही शक्यता असते. सध्या भारतात चरबी काढण्य़ासाठी होणार्‍या लिपोसक्शन शस्त्रक्रियेला जास्त मागणी आहे. याचा खर्च दोन लाखांपर्यंत असतो. पुरूषही यात मागे नाहीत. आत्तापर्यंत स्त्रियांच्या जगणय़ाभोवती असलेल्या कृत्रिमतेच्या विळख्यात पुरूषही सापडले आहेत.

गोर्‍या रंगाचे आकर्षण भारतात ब्रिटीश राजवटीपासून रूजले, जेत्यांचा रंग आपल्यालाही लाभावा यासाठीच्या आकांताला सौंदर्यस्पर्धांमधल्या विजेत्या युवतींनी जाहिरातींमधून खतपाणी घातले.  ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपयांवर वर होता ,तो दरवर्षी १८ % इतक्या वेगाने वाढतो आहे. प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री भक्कम मानधन घेऊन अशा जाहिराती करत असताना अभिनेत्री नंदिता दासने मात्र ’सौंदर्य आणि यश हे गोरेपणावर अवलंबून असते,’ या समजुतीला आव्हान दिले आहे.’ डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेची प्रचारकर्ती नंदिता दास म्हणते, आपण जसे, ज्या वर्णाचे आहोत तसेच स्वत:ला स्वीकारा, त्वचेच्या रंगापेक्षा महत्वाचे आयुष्यात खूप काही आहे, त्याचा शोध घ्या. आपण सुंदर, आकर्षक दिसावे, आपली छाप पडावी  ही साधी सहज मानवी भावना आहे. त्यात काहीही गैर नाही पण ही भावना आयुष्य व्यापून टाकेल इतकी मह्त्त्वाची आहे का! कर्तृत्वाचे, विचारांचे सौंदर्य वाढवण्य़ाचा विचार आपल्या मनांमधे कधी डोकावणार की नाही !

तुलनेने इतर देश आता या संदर्भात बदलू लागले आहेत. नीना दावुलुरी ही भारतीय वंशाची उच्चविद्याविभूषित सावळी तरूणी दोन वषापूर्वी ’मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. त्यावर अनेक भारतीय अमेरिकनांनी, ही मुलगी भारतातल्या सौंदर्यस्पर्धात कधीच यशस्वी ठरू शकली नसती अशी प्रतिक्रिया दिली. पुरूषसत्ताक समाजाने निर्माण केलेली ही स्पर्धा आहे या भावनेतून आजच्या सुविद्य मुली यापासून काहीशा दूर राहायला लागल्या आहेत. मिस ग्रेट ब्रिटन साठी गेल्या वर्षी फक्त एका भारतीय वंशाच्या मुलीची प्रवेशिका आली होती. तरूणाईने दर्जेदार व्यक्तिमत्व स्पर्धा जरूर गाजवाव्यात परंतु तथाकथित सौंदर्याच्या छोट्य़ा आणि कोत्या व्याख्यांपलीकडे जाऊन स्वत:ची रेघ मोठी करावी. संस्कॄतीतल्या उत्तम मूल्यांशी तडजोड न करता आधुनिकतेशी त्याची सांगड घालण्य़ाचे आव्हान पेलायला हवे. भारतीय स्त्रीने खुज्या आणि तकलादू स्पर्धांच्या पलीकडे जाऊन आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या आंतरिक सौंदर्याची मोहोर जगावर उमटवता येईल इतकी उंची गाठायला हवी.

('दिव्य मराठी' मध्ये कॅन्व्हास पानावर प्रसिद्ध झालेला लेख )

Sunday, September 6, 2015

विनोबांचं कारागृहातलं साहित्य

(पोर्ट ब्लेअर- अंदमान येथे ५-६ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनातील ’कारागृहातील साहित्य’ या परिसंवादातील माझा सहभाग - त्यात मी विनोबांच्या कारागृहातील साहित्यावर मांडलेले विचार. विनोबांच्या पुस्तकांशिवाय काही संदर्भांसाठी vinobabhave.org)

या परिसंवादाचा विषय ऐकल्यावर मनात येतं कारागृहातलं साहित्य किंवा प्रिझन लिटरेचर याचं नेमकं वेगळेपण काय ? याच विषयावरचं रिव्काह झिम या आयरिश लेखिकेचं ’consolations of writing' हे पुस्तक या जानेवारीत प्रकाशित झालं. यात तिने अ‍ॅन फ्रॅंक, ओ हेन्री, ऑस्कर वाईल्ड यासारख्या लेखकांच्या कारगृहातील साहित्याचा परामर्श घेतला आहे. लेखक कोणत्या परिस्थितीत लिहीतो याने साहित्याच्या आस्वादात फरक पडतो का, तळ्याकाठी-घरी-कार्यालयात बसून लिहीणे आणि कारागृहात लिहीणे यात नेमका काय फरक असतो? स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने लेखकाच्या मांडणी, शैली, भाषेला अधिक धार चढते का अशा प्रश्नांची चर्चा तिने या पुस्तकात केली आहे. बहुतेक प्रश्नांची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असली तरी बंदिवासात लिहीलेलं साहित्य आणि जीवन हे एकमेकांच्या जास्त जवळ असतात, हे यातलं समान सूत्र आहे.

vinoba bhave साठी इमेज परिणाम
(photo : google- not for commercial purpose)

भारतात विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात कारागॄहात असताना अनेक मान्यवरांनी उत्तम लेखन केलेलं आहे त्याचा धांडोळा इतर वक्ते घेतीलच. परंतु वैदिक परंपरेचे आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते विनोबा म्हणजेच विनायक नरहरी भावे यांच्या बाबतीत त्यांनी एरवी केलें लेखन आणि कारागृहात केलेलं लेखन यात दर्जात्मक भावनात्मक फरक नाही असं मला वाटतं. त्यांची शैली कधीच परिस्थितीनुसार निर्मम, बोचरी नव्हती, कायम मॄदु होती. लेखकाचं दैनंदिन आयुष्य आणि कारागृहातलं आयुष्य़ यात तफावत असेल तर त्यानुसार साहित्याचं आकलन बदलतं. विनोबांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांच आश्रमातलं साधं शुचिर्भूत सश्रम जीवन आणि कारगृहातलं जीवन यात फारसं अंतर नव्हतं. गरजा कमी म्हणजे इतक्या कमी की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. तरीही विनोबा म्हणत , तुरूंगाशिवाय इतकं आत्मपरिक्षण, इतकी अध्यात्मिक साधना झाली नसती. तुरूंगालाच तपोभूमी मानून त्यांनी साहित्यसेवा केलेली आहे. लेखणी आणि वाणीच नव्हे तर हा देहच सेवेचे एक साधन आहे अशी त्यांची भूमिका होती.

विनोबा म्हटले की सर्वप्रथम आठवते ती गीताई, आपल्या आईला सहज आकलन व्हावे या हेतूने सुलभ मायमराठीत श्रीमद्भगवद्गीतेचा विनोबांनी केलेला ओघवता अनुवाद. मुळात सर्वात आधी गीतेनेच तीन वर्णांच्या बंदिवासात अडकलेलं वेदोपनिषदातील ज्ञान मानवजातीला खुलं केलं. तरीही संस्कृत भाषेचा अडसर होताच. १२ व्या शतकात प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून माऊलीने तोही दूर केला. ज्ञान समाजाच्या केवळ एका घटकापुरते सीमित न राहता, ते सर्वांपर्यंत पोहोचावे, हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे सूत्र विनोबांनी आचरणात आणले, आणि भाषक भिन्नतेमुळॆ अवरूद्ध झालेली ज्ञानगंगा विनोबांनी मराठीत आणली, ती देखील इतक्या ममत्वाने की गीतेची गीताई झाली. तांत्रिकदृष्टया विनोबांनी गीताई कारावासात असताना लिहीलेली नाही. ते धुळ्याच्या कारागृहात असताना १९३२ साली ती प्रसिद्ध झाली. गीताईचं लेखन हे वर्ध्याच्या महिलाश्रमात ऑक्टोबर १९३० ते फेब्रुवारी १९३१ या कालावधीत झालेलं आहे. मग त्यांच कारागृहातलं लेखन नेमकं कोणतं! झेंडा सत्याग्रहानंतर नागपूरच्या कारागृहात असताना त्यांनी ईशावास्य वृत्ती हे पुस्तक लिहीलं. शिवणीच्या कारागृहात त्यांनी स्थितप्रज्ञ लक्षणांवर व्याख्यानं दिली. ब्रिटीशांविरूद्ध केलेल्या निदर्शनांमुळे ते धुळयाच्या कारागृहात गेले तेव्हा त्यांनी गीतेवर अद्भुत अशी प्रवचनं दिली ही दोन्ही प्रवचनं पुढे पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली, त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. अर्थात गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार, पहिले सत्याग्रही, अहिंसा आणि मानवतावादाचे पुरस्कर्ते म्हणून भारतीयांच्या आदराला पात्र झालेल्या विनोबांच्या इतर साहित्याला मात्र गीताई इतका सन्मान लाभला नाही. मुळात विनोबांचा सर्वसंगपरित्यागाचा आनंद भोगणारा आत्मा जिवंतपणीच इतका मुक्त होता की त्यांना हा देह म्हणजेच एक प्रकारचा तुरूंग भासत असावा. या अर्थाने विनोबांचं सगळच साहित्य हे कारागृहातलं साहित्य म्हणायला हवं.

आज पांडूरंगाच्या ओढीने पंढरीला निघालेली एखादी सात्विक वारी सोडली तर सभोवताली दिसतो तो फक्त अध्यात्माचा तमाशा. अमकेतमके बुवा- बापू, राधे माँ सारखे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू पाहून जाणवतं की अध्यात्म ही उन्नत मनोवस्था वगैरे राहिली नसून एक बाजारशरण उत्पादन झालेलं आहे. भंपक उच्चभ्रू अध्यात्मवाद्यांची ’असा मी असामी’ मधे उडवलेली रेवडी आठवून आजही गंमत वाटते. त्यातली ती who are you, who is he, he is the who of the you in the eye of the he अशी अनाकलनीय प्रवचनं आणि आजचे बाबांचे दरबार यात काही फरक नाही. जगण्य़ातल्या प्रश्नांची उत्तरं या थोतांडात नाही हे माझ्यासारख्या सामान्य पण विज्ञानवादी व्यक्तीला कळतं, ही उत्तरं वेद उपनिषदात गीतेत दडली आहेत हे नक्की, पण ती सोप्या भाषेत समाजावून सांगणार तरी कोण, याचं खणखणीत उत्तर म्हणजे विनोबा.

दोन मित्र होते. एक इतिहासप्रेमी तर दुसरे संतसाहित्याचे अभ्यासक. दोघांचा व्यासंग दांडगा. इतिहासकार म्हणाले मी इतिहासावर व्याख्यानं देत जाईन, तुम्ही संतसाहित्याचं निरूपण करा, आपण दौरे करून उभा महाराष्ट्र हलवून टाकू. दुसरे मित्र हसून म्हणाले," तुमचं ठीक आहे हो, राणा प्रताप च्या शौर्याचं वर्णन करताना तुम्हाला स्वत:ला तलवार चालवता येत नसली तरी चालतं. ज्ञानेश्वरीतला अमृताचा डोह जनतेला दाखवायचा तर आधी माझ्या जगण्यात, माझ्य प्रत्येक कृतीत त्याचे थेंब तरी असायला हवेत ना!", आणि हेच विनोबांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या साहित्यात आणि जगण्यात एकवाक्यता होती.

त्यांनी नागपूरच्या कारागृहात असताना लिहीलेलं ईशावास्य वृत्ती हे पुस्तक म्हणजे जगावं कसं याचा एक वस्तुपाठच आहे. जीवनशास्त्र खच्चून भरलेल्या ईशावास्य उपनिषदातील १८ मंत्रांची सहज उकल या पुस्तकात आहे. पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी शेष पूर्णच राहतं या शांतिमंत्राचा ते किती सोपा दाखला या पुस्तकात देतात पाहा. कुंभार मातीचा घडा बनवतो, मुळात तो घडा त्या मातीतच लपलेला असतो. चित्तशुद्धी म्हणजे काय हे सांगताना विनोबा अधिक सोपी उपमा देतात. ते म्हणतात पानकोबीला जशी पानांची एकावर एक अनेक आवरणे असतात तसे मनावरचे एक एक थर भेदत आत जाता आले तरच आत्मदर्शन होईल. यातले ९ ते ११ हे मंत्र बुद्धीच्या शुद्धीबद्दल आहेत. अविद्या आणि विद्या यातला फरक समजावून सांगणारे. आजच्या भाषेत prospective learning आणि cognitive learning. दोघी असल्या तरच आत्मविकास, एकेकट्य़ा असल्या तर! तर विनोबा म्हणतात मग अविद्या बरी, एकटी विद्या म्हणजे अहंकाराला जागा जास्त. एका वाक्यात सांगायचं तर आपल्यात ’शहाणीव’ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं.

’स्थितप्रज्ञ दर्शन’ हे विनोबांचं कारागृहातलं आणखी एक महत्वाचं साहित्य. शिवणी कारागृहात दिलेल्या प्रवचनांचं हे संकलन. या पुस्तकाने आजच्या चंगळवादी जीवनामुळे सैरभैर झालेली मनं निश्चितच निवतील.या परिसंवादाच्या निमित्त्याने पुन्हा हे पुस्तक चाळत असताना माझ्या मुलाने स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ विचारला. त्याचं वय बघता मी त्याला ,तटस्थ असा अर्थ सांगितला. त्यावर तो म्हणाला, म्हणजे आत्ता पुरस्कारावरून जो वाद झाला त्यात त्या कुणा कर्त्या माणसाने घेतलेली भूमिका म्हणजे स्थितप्रज्ञ का ! स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धी. गीतेतील आदर्श पुरूष विशेष. या पुस्तकात विनोबा म्हणतात ,बुद्धी तीन प्रकारच्या असतात. सांख्यबुद्धी- जीवनाचं ज्ञान, मग योगबुद्धी- जीवनाची कला आणि तिसरी स्थिरबुद्धी. मात्र माझ्या बालबुद्धीला हे कळले नव्हते की जगातल्या रूप रस गंधाचा आनंद लुटायचा सोडून अलिप्त का आणि कसं राहायचं या सार्‍य़ापासून! त्याचं उत्तर विनोबा देतात, ते ही माऊलींचा दृष्टांत देऊन, ’आपणचि विऊनी दुहिता...न मम म्हणे पिता.’ विनोबा इंद्रियदमन करा असं म्हणतच नाहीत. ते इंद्रीयनिग्रहाबद्दल बोलतात. गुजराथीत एक म्हण आहे, माणसनी परिक्षा ..खाटले न पाट्ले. कितीही संतुलित माणूस असला तरी जेवण आणि आजार हे दोन प्रसंग असे आहेत ज्यात आतला खरा माणूस बाहेर येतो. तेव्हा इद्रियनिग्रह कसा, तर संकटसमयी कासव कवचाखाली अंग चोरून घेतं तसा.
घेइ ओढूनि संपूर्ण विषया तील इंद्रिये,
जैसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली
एकूण विनोबांच्या साहित्याचा आत्मा आणि त्यांचा श्वास सुद्धा गीताच आहे. एकेश्वरवाद्यांनाही ज्ञान देण्य़ाचं सामर्थ्य असलेली, वैश्विक तत्त्वज्ञान कवेत घेणारी गीता विनोबांचा प्राण आहे

धुळयाच्या कारागृहात असताना विनोबांनी गीतेवर अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषॆत प्रवचने दिली आणि सानेगुरूजींसारख्या सिद्धहस्त व्यक्तीने ती टीपून घेतली, त्याचेच पुस्तक म्हणजे गीता प्रवचने. याचे श्रोते म्हणजे संतमहंतांबरोबरच कारागृहातले सेवक आणि इतर कैदी देखील. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दोन आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'साठी आणि एक आणा विनोबांच्या कार्यासाठी.' हे भाग्य किती लेखकांना लाभते? याचं कारण उपनिषदांचे उपनिषद असलेली गीता सांगताना त्यांचा श्रमपरिहार करण्य़ाची, आत्मपरिक्षणाला भाग पाडण्याची शक्ती विनोबांच्या निरूपणात आणि गीतेत होती.
गीतेमध्ये केवळ आध्यात्मिक नाही तर व्यावहारिक मार्गदर्शन आहे अशी त्यांची श्रद्धा. गीतेच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत गेल्याने अपार शांती मिळते असा त्यांना अनुभव येत गेला. म्हणून सर्वसामान्य जनतेची निष्ठा गीतेवर स्थिर व्हावी हाच त्यांच्या साहित्यकृतींचा हेतू होता.
गीतेचं आणि त्यांचं नात त्यांच्या शब्दात सांगायचं तर
’गीताई माझी माऊली मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनि कडेवरी’. 

गीतारहस्याचं विवेचन ऐकल्यावर लक्षात येतं की टिळकांचा गीतेकडॆ पाहण्य़ाचा दृष्टीकोन तर्कनिष्ठ होता. तर विनोबा म्हणत, तर्काला छाटून श्रद्धा आणि प्रयोगाचे पंख लावून मी गीतेच्या अस्मानात भरार्‍या मारत असतो. विनोबांचं तब्बल १४ भाषांवर प्रभुत्व होते. कुराण मुळातून नीट समजावे म्हणून ते थेट अरबी भाषा शिकले, बायबल मधले कोणते वचन कितव्या पानावर आहे हे ही त्यांना मुखोद्गत होते मग गीतेचा त्यांचा व्यासंग किती प्रगाढ असेल! परंतु ते म्हणत ज्या तात्विक चर्चेचा जीवनाशी संबंध नाही, त्याचा उहापोह माझ्या गीताप्रवचनात नाही. ज्यातून श्रमिकाला सांत्वना मिळते, थांबलेल्याला प्रेरणा मिळते तीच माझी गीताई. टिळकांच्या मते गीता हा कर्मयोगावर आधारित युद्धोपदेश होता तर विनोबांनी गीता ही भगवंताची उक्ती आहे हा शंकराचार्यांचा दृष्टीकोन स्वीकारला होता. गांधीच्या आणि विनोबांच्या गीता विवेचनानुसार , गीता हा नुसता धार्मिक ग्रंथ नसून आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं ते एक कविकल्पितरूपक आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर धृतराष्ट्र जेव्हा संजयला विचारतो,
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ||
गीताई मधला याचा सहज अनुवाद
त्या पवित्र कुरु-क्षेत्रीं पांडूचे आणि आमुचे ..युद्धार्थ जमले तेव्हां वर्तलें काय संजया ||
आणि यावर विनोबांची प्रवचनातली सुरेख टिप्पणी -
मानवी शरीरातच एक सनातन- देवासुर्-संग्राम चालल्याचे उपनिषदात वर्णन आहे. तामसी कर्मासक्त कौरव म्हणजे आपली आसुरी वृत्ती आणि  प्रज्ञावान पांडव म्हणजे आपली सात्त्विक बुद्धी असे ह्या युद्धाचे गीतेत दुहेरी स्वरुप आहे.

गीतेचं सार आकळल्यानेच कदाचित चंबळ खोर्‍यातल्या ११ डाकूंचं हृदयपरिवर्तन करणयाची किमया विनोबा करू शकले. गीतेच्या प्रेरणेमुळेच विनोबांचा वैयक्तिक मोक्ष भारताच्या राजकीय आणि सामाजिक मोक्षाशी समव्याप्त झाला होता असं ग.प्र.प्रधान नोंदवून ठेवतात. त्यांच्या भूदान, ग्रामदान, सर्वोदय या सार्‍य़ा योजनांच्या मुळाशी गीतेतून उपजलेलं मानवजातीचं कल्याण हीच निखळ भावना होती. अर्थात विनोबांच्या काही मर्यादा होत्या. even homer nods, होमर लाही कधीतरी डुलकी येते या उक्तीप्रमाणे त्यांनी आणीबाणीच्या काळ्या पर्वाचा उल्लेख अनुशासन पर्व असा केला. ज्या पुलंनी विनोबांवर ’एक शून्य मी’ पुस्तकात स्तुतीपर लेख लिहीला त्यांनीच मग उद्वेगाने ’आम्ही सूक्ष्मात जातो’ हे विडंबनही लिहीलं. आजही नायपॉल सारखे लेखक विनोबांना भाबडे ठरवतात, १३ वर्ष भारत पालथा घालून मिळवलेल्या भूदानात काहींनी नापिक जमीन देऊन केलेली फसवणूक किंवा जमिनीचे वाटप करताना आलेल्या त्रुटी या सार्‍य़ामुळॆ ते रॅशनॅलिझम पासून दूर असल्याचा आरोपही केला गेला. ’सब भूमी गोपालकी’ मानणार्‍य़ा या आकाशपुत्राला साध्या संसारी माणसांचे संयुक्त महाराष्ट्रासारखे प्रश्न निरर्थक वाटले त्यामुळे अत्र्यांनीही विनोबांवर टीका केली. विनोबांची गीताई हेच सांगते की एक परमेश्वर सोडून कुणीही निर्दोष नाही. मानवी जीवन विणलं गेलं आहे ते अशा काळ्या पांढर्‍या तंतूंनी.
एक मात्र खरं की गीता उपदेशात ज्या सत्यनिष्ठेचा आग्रह धरला गेला आहे त्याबाबतीत विनोबांचे विरोधक देखील विनोबांपुढॆ नम्र होतात. सर्वात मी आहे, माझ्यात सर्व आहेत, मग सत्य लपवायचे ते कुणापासून इतकी त्यांची सत्यनिष्ठा प्रखर आणि स्पष्ट होती.

आजच्या कॉर्पोरेट युगात डॆल कार्नेगी-रॉबीन शर्मा सारखे मॅनेजमेंट गुरू माणसं कशी हाताळावीत याच्या टिप्स देतात. उच्च पदावरील अधिकार्‍य़ांना nervous break down होऊ नयेत म्हणून SQ म्हणजेच spiritual quotient कसा वाढवावा याचं हल्ली विशेष प्रशिक्षण दिलं जातं. खर तर जीवनशास्त्र शिकवणार्‍य़ा विनोबांच्या साहित्यात हे सगळं सुगमपणे मांडलेलं आहे. सततच्या नापिकीने बेजार होऊन आत्महत्येच्या टोकाला पोचलेला एखादा शेतकरी असो , सेल्फीच्या आत्मप्रेमात बुडून सैरभैर झालेला एखादा मध्यमवर्गीय असो, सतत यशस्वी होण्य़ाच्या दडपणाने नैराश्यग्रस्त झालेला  एखादा आयटी इंजिनीयर असो.. या सार्‍य़ांना कवेत घेऊन, त्यांच्या अस्तित्वाचं प्रयोजन समजावून सांगण्य़ाची ताकद मातृहॄद्यी विनोबांच्या गीतेवर आधारलेल्या साहित्यात आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानेच विश्वकल्याण साधता येईल आणि साहित्य हे त्या दोघांना जोडणारं सूत्र आहे, ही या आधुनिक संताची भूमिका होती. या विश्वमानवाबद्दल कवी वसंत बापटांनी किती चपखल लिहिलंय..

सूर्यवीर्य शशिशांती, भ्रांती वार्‍याची भिनली अंगी
समिधेपरि वरि शुष्क असुनि, अंतरंग नित रसरंगी
नित्य नव्या यज्ञाचे दीक्षित, विस्मरला अपसव्य तुम्ही
मातीहुनि तुम्ही माती असुनि हिमालयाहुनि भव्य तुम्ही

Friday, August 21, 2015

जनरेशन गॅप - अपरात्री ऑनलाईन


"हे ’ऑनलाईन’ म्हणजे नेमकं काय असतं ग?" नात्यातल्या एका वयस्कर बाईंनी अचानक विचारलं. "ऑनलाईन म्हणजे ’आपण आत्ता नेटवर्क वापरत आहोत’ याची खूण. का हो काकू!" "काही नाही, त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या नातीचं ठरलेलं लग्न मोडलं. आपला होणारा नवरा रात्रीबेरात्री ऑनलाईन असतो का हे तपासायला तिची नात स्वत: ऑनलाईन गेली म्हणे, झालं भलतच, इतक्या रात्री ऑनलाईन असणारी मुलगी ’चांगली’ नसणार या कारणाने त्या मुलाने लग्नाला चक्क नकार दिला" "अरेच्चा, पण मग तो मुलगा स्वत: अपरात्री ऑनलाईन होता त्याचं काय!" "खरय, पण शेवटी ’मुलीच्या जातीला’ कळायला पाहिजे नं !" इति काकू.

 पिढ्या बदलल्या तरी एक गोष्ट फार संथ गतीने बदलते आहे, ती म्हणजे समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची नजर. मुळात महत्वाचे काम असल्याशिवाय अपरात्री मोबाईल वापरणे योग्य नाही, मग वापरकर्ता कुणीही असो. परंतु ’बाईच्या जातीने’ मोबाईल वापरला की पारंपरिक विचारसरणीच्या मंडळींच्या कपाळावर आठी पडते. मागे उ.प्रदेश चे एक खासदार सैनी यांनी मुक्ताफळे उधळली होती, "मुलींना मोबाईल वापरू देऊ नका. आमच्या आईबहिणींनी मोबाईल वापरला नाही, त्यांचे कुठे काय बिघडले!" बाघपत पंचायतीने तर मोबाईलमुळे मुली पळून जाऊन लग्न करतात तसेच त्यांचे संसारातले लक्ष उडते ,त्यामुळे ’४० वर्षांखालील स्त्रियांनी मोबाईल वापरू नये’ असा अचाट फतवा काढला होता. त्यानंतर म.प्र तील एक खासदार रघुनंदन शर्मा म्हणाले होते, "लग्नाआधी मुलींना मोबाईल दिला तर त्या मर्यादा ओलांडतात. हे मोबाइल म्हणजे कर्णपिशाच्च आहे." माध्यमातून टीका झाल्यावर या मंडळींनी मग सारवासारव केली हा भाग वेगळा. मुळात मुली लग्न करायला एकट्या तर पळून जाऊ शकत नाहीत म्हणजेच या सगळ्या उदाहरणात त्या मुलींसह ’मर्यादा’ वगैरे ओलांडणारी मुले ही आहेत. ती मात्र या मोबाईलबंदी पासून मुक्त आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वेडापायी तरूण पिढी वेळेचा अपव्यय करते आहे,

मानवी तासांचा हिशेब केला तर देशाचाही वेळ अनुत्पादक कामात वाया घालवते आहे. त्यातून शारिरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या देखील वाढत आहेत हे सारे खरे असले तरी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. जेनेल हॉफमन या अमेरिकन आईने आपल्या टीनएजर मुलाला मोबाईल देताना तो कसा, केव्हा, कुठे आणि किती वापरावा याबद्दल एक आचारसंहिताच करून दिली होती. असे काही उपाय करायचे सोडून सगळ्या समस्यांचे खापर फक्त मुलींच्या मोबाईल वापरावर फोडणे कितपत योग्य आहे? ’तिखट झाला चहा आणि कालवण झालं गोड सासू म्हणते सुनेला तुझ्या ’व्हॉट्सअप’ ला उठू दे फोड’ अशा अर्थाच्या थोड्या खोचक, थोड्या मिश्कील ओळी सध्या मोबाईलवर फिरत आहेत. खरं तर लग्नानंतर संसाराच्या चक्रात अडकलेल्या स्त्रियांना या मोबाईलमुळे थोडा मोकळा श्वास घेता येतो आहे. शाळा-महाविद्यालयामधलं दुरावलेलं मैत्र पुन्हा जोडता येतं आहे. घरची-बाहेरची कामं, पैपाहुणा, सणवार, मुलं, त्यांच्या activities, स्वत:चं लहानमोठं करियर या सगळ्याशी ती आजही ’कनेक्टेड’ आहे, उलट या चाकोरीतही एक नावीन्य, चैतन्य, आत्मविश्वास तिला जाणवतो. मुलांच्या प्रश्नांना पटकन मोबाईलमधे पाहून उत्तर देणारी स्मार्ट आई आता जाहिरातींमधून दिसते. मोबाईलच्या नादात डाळ करपावी किंवा कामे विसरून जावी एवढी ती बावळट नक्कीच नाही. ’आमच्या वेळी नव्ह्तं असलं काही फॅड’ असं तिला म्हणणारी मागची पिढी आज स्वत: मात्र टीव्हीला खिळून बसलेली असते. त्यांच्या काळी या गोष्टी उपलब्धच नव्ह्त्या तर त्यात त्यांच्या संयमाची परीक्षा आली कुठे? आजच्या पुरूषांच्या बाबतीत तर, गोष्टीतल्या जादूगाराचा प्राण जसा पोपटात असायचा तसा त्यांचा मोबाईलमधे असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मोबाईल विना जगू शकणारे पुरूष अपवादात्मक तसेच मोबाईलच्या अगदीच आहारी गेलेल्या स्त्रियाही अपवादात्मक. स्त्रिया तंत्रज्ञानाचा, विशेषत: मोबाईलचा वापर करतात तेव्हा संपर्काचे, माहिती मिळवण्याचे, माणसांशी जोडले जाण्याचे, सुरक्षिततेचे आणि काही अंशी आत्मनिर्भर होण्याचे जणू आयुध त्यांना लाभते.

परंतु स्त्रीचं स्वत:चं विश्व असणं ही कल्पनाच मुळात समाजाच्या पचनी पडत नाही. बहुतेक स्त्रिया नवर्‍याने नवा मोबाईल घेतला की त्याचा जुना मोबाईल वापरताना दिसतात, अर्थात तिने कायम त्यागमूर्ती, वात्सल्यमूर्ती, संसाराचा कणा असणं हेच अपेक्षित असतं. असावं ना! पण तिला स्वत:चीही स्पेस असायला हवी की नको! मोबाईलमुळे स्त्रीचे संपर्कक्षेत्र वाढते, तिचे पतीवरील अवलंबित्व बरेचसे कमी होते याने काही पुरूषांचा अहंकार दुखावतो. वरवर स्त्रियांच्या प्रगतीच्या वल्गना केल्या तरी समाजाला मनातून ’जात्यावर बसून ओवी गाणारी नऊवारीतली सात्विक स्त्री’ ही प्रतिमा सर्वात जास्त भावते. अशा वृत्तीबाबत ना.ग.गोरे म्हणत, "या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं". एकूणच या चित्राला तडा जायला लागला की बर्‍याच घरातून तिच्या मोबाईल वापरावर तिरकस टीका होऊ लागते, समाजातले स्वघोषित नैतिक पहारेकरी स्त्रियांवरील मोबाईलबंदी सारखे आचरट उपाय शोधू लागतात.

 फ़ोक्सवॅगन ची एक सामाजिक जाहिरात आहे. जाहिरात सुरू होते ती सिनेमागृहात प्रेक्षक येऊन बसत असतानाच्या दृश्यासह. पड्द्यावर सिनेमा आधीची जाहिरात सुरू होते, त्यात फ़ोक्सवॅगन चालवणारे स्टिअरिंगवरचे हात तेवढे दिसतात, प्रेक्षक श्वास रोखून बघू लागतात, गाडीचा वेग वाढतो, आता गाडी नुसतीच सुसाट पुढे जात राहते. एव्हाना कंटाळलेले प्रेक्षक चुळबूळ करू लागतात. आपापला मोबाईल काढून सगळे त्यात डोकावू लागतात आणि अचानक जोरात आवाज येतो, पड्द्यावरील गाडीचा अपघात झालेला असतो. खाली मेसेज येतो, ’वाहन चालविताना मोबाईल वापरणे धोक्याचे आहे.’ खरं तर वाहन चालवतानाच नव्हे, आपल्या उद्देशांकडे, सुंदर जगण्याकडे, उत्तम पालकत्वाकडे आपला प्रवास सुरू असताना देखील मोबाईलचा अतिवापर हितकारक नाही हे सांगणारी ही जाहिरात सर्वांनाच लागू होते. फक्त स्त्रियांना नव्हे. -

Friday, July 24, 2015

जनरेशन गॅप - पोशाख


"डोईचा पदर आला खांद्यावरी.. भरल्या बाजारी जाईन मी.." असं म्हणणार्‍या संत जनाबाईंनी तत्कालीन समाजातील स्त्रीच्या पेहरावाबद्दलच नव्हे तर तिच्या एकूण वर्तनाबद्दल असलेल्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिलं. अर्थात यामुळे परिस्थिती फारशी बदलली नाही. पाश्चात्य पोषाख घालायचा नाही ही नवर्‍याची अट कटाक्षाने पाळण्याच्या बदल्यात पहिल्या महिला डॉक्टर, आनंदीबाई जोशींना तर अमेरिकेतील थंडी असह्य होऊन क्षयरोगामुळे स्वत:चा जीव गमवावा लागला. आता असे जाचक नियम काहीसे शिथील झाले असले तरी अजूनही मुलींच्या/स्त्रियांच्या पेहरावाकडे मागच्या पिढीचेच नव्हे तर सबंध समाजाचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते.

 निर्भयावरील बीबीसी ने केलेल्या वादग्रस्त माहितीपटात आरोपीच्या वकिलानी जी काही मुक्ताफळे उधळली त्यात त्यानी आजच्या मुलींच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतीवर आणि राहणीवर आक्षेप घेतला होता. त्याने आरोपीचे समर्थन करताना म्हटले होते की समाजाने घालून दिलेली चौकट ओलांडणार्‍या मुलीच अत्याचाराच्या घटनांना जबाबदार आहेत. त्या वकिलाच्या मानसिकतेचा वरवर जोरदार निषेध होत असला तरी आतून कुठेतरी बहुसंख्य लोकांचे तेच मत आहे. अशा स्वरूपाचे विधान दोन वर्षापूर्वी कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने देखील केले होते. या मध्ययुगीन काळातील विचारांना विरोध करण्यासाठी, ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच, त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले होते. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा स्त्रियांनी त्या मोर्चात वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला. आपल्याही समाजात व्यक्तीस्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक न समजलेल्या काही मूर्ख प्रसिद्धीलोलुप स्त्रियांमुळे, संस्कृती आणि अब्रू जपण्याच्या भितीने समाज सरसकट सर्वच स्त्रियांच्या पेहरावावर अंकुश ठेवू पाहतो. या बाबतीत पुरोगामी राहायचे की प्रतिगामी ह्याबाबत भारतीय समाज गोंधळलेला आहे. उदा: सानिया मिर्झाने टेनिस खेळताना शॉर्ट्स घालणेच योग्य आहे, जलद हालचालींसाठी तोच पोशाख सोयिस्कर आहे हे भारतीय मनाला एव्हाना पटले आहे. (अर्थात तिलाही मौलवींच्या टीकेला आणि विरोधाला सामोरे जावेच लागले होते) पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात पर्यटनाला आलेल्या परदेशी तरूणींनी सुटसुटीतपणा या निकषाखाली तसा पोशाख घातला तर त्यांचा हेतू ’शरीरप्रदर्शन’ असा मानला जातो. (आठवा ’अतिथी देवो भव!’च्या सरकारी जाहिराती)

मग निदान ’भारतीय पोशाखातील’ मुलींना तरी बिनधोकपणे संचार करता यायला हवा, पण ते तसेही नाही. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ बराच गाजतो आहे. त्यात एक भारतीय वेशातील तरूणी दिल्लीमधील गर्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकटी चालत जाते. नंतरच्या क्लिप मधे तीच तरूणी पाश्चात्य पोशाखात त्याच ठिकाणांवरून चालत जाते. दोन्ही केसेस मधे छुप्या कॅमेर्‍याने टिपलेल्या, तिच्याकडे बघणार्‍या नजरा, शेरेबाजी यात फारसा काही फरक नसतो. अभारतीय पोशाखामुळे स्त्रिया आपल्याकडे लक्ष वेधून घेतात आणि अत्याचाराला बळी पडतात या समजुतीला छेद देणारा हा व्हिडीओ आहे.

 मध्यंतरी एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यांना त्यांच्या इंजिनीयर मुलीसाठी एक चांगलेसे स्थळ कळले होते आणि मुलामुलीने एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा कार्यक्रम दोन दिवसावर येऊन ठेपला होता. तिचे वडील म्हणत होते, निदान त्या दिवशी तरी साडी नेस. मुलीचे म्हणणे होते, लग्न ठरले तर लग्नात पारंपरिक विधी करताना नक्की नेसेन मी साडी. एरवी मी जशी असते आणि जशी दिसते तसच त्यांनी मला स्वीकारावं, त्या प्रसंगापुरते स्वत:ला उगाच कृत्रिम रूपात दाखवणे ही उलट त्यांची फसवणूक नाही का! मग आई पुढे आली, "अगं, साडी कशी भारदस्त दिसते, भारताच्या मंगळमोहिमेतील अनेक शास्त्रज्ञ स्त्रियांचे फोटो जगभर झळकले, साडीच नेसलेली होती ना त्यांनी. तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या कितीतरी उच्चपदस्थ स्त्रिया आवर्जून साडी नेसतात." मुलगी उत्तरली, " माझा विरोध साडीला नसून साडी नेसण्याच्या सक्तीला आहे. काळानुरूप गैरसोयीचे म्हणून पुरूषांनी धोतर केव्हाच टाकून दिले. साडी तर त्याहून लांबलचक आहे. बहुसंख्य भारतीय स्त्रियांची जीवनपद्धती अतिशय कष्टाची आहे आणि त्यांच्यासाठी साडी हा पोशाख गैरसोयीचा आहे, त्या नाईलाजातून त्याची सवय करून घेतात. त्यातूनही काही स्त्रियांना असेल आवड तर त्यांनी नेसावी, पण ते त्यांनी ठरवावं, इतरांनी नव्हे." आता मात्र तिच्या आजीला राहवले नाही, त्या म्हणाल्या, "ते काहीही असलं तरी साडी हा भारतीय संस्कृतीतला सर्वात सभ्य पोशाख आहे, त्यातच बाई शोभून दिसते" यावर नात म्हणाली," आजी, पुण्यात शंभर वर्षांपूर्वी सकच्छ (कासोटा घालून नऊवारी) आणी विकच्छ (आजची पाचवारी साडी) असा वाद रंगला होता तेव्हा आज ज्या साडीला तू सभ्य वगैरे म्हणतेयस ना, तेव्हाच्या समाजाने हीच पाचवारी साडी नेसणार्‍या स्त्रियांना उच्छृंखल, कुळबुडव्या, वाया गेलेल्या वगैरे म्हटलं होतं. आता ते किती हास्यास्पद वाटतं!

कशाला सभ्य आणि कशाला अयोग्य म्हणायचं हे शेवटी काळाच्या कोणत्या तुकड्यावर उभे राहून आपण त्या गोष्टीकडे पाहतो ना यावर अवलंबून असतं." याचा अर्थ मुलींनी सर्रास तोकडे कपडे घालून फिरावे असा मुळीच नाही, तर त्या त्या परिस्थितीनुसार सोयीचा, सुखकर आणि आरामदायी पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असावे. अर्थात करियर करताना, मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, सामाजिक समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण त्या व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. मात्र पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे योग्य आहे ना, ज्या पार्श्वभूमीवर आपण तो पोशाख घातला आहे त्याने काही औचित्यभंग तर होणार नाही ना याचे भान स्त्री असो वा पुरूष दोघांनाही असायला हवे. समाजस्वास्थ्याची जबाबदारी स्त्री इतकीच पुरूषांची देखील आहे.

Friday, June 12, 2015

जनरेशन गॅप - वानप्रस्थाश्रम


’पुलं आजोबा’ हा प्रख्यात लेखक पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृती आजच्या पिढीपर्यंत पोचवणारा नवा कार्यक्रम. अलिबागला तो नुकताच पाहून आलेली मैत्रिण अगदी भारावून गेली होती. वाचनाच्या वाटेला फारसं न जाणार्‍या आजच्या पिढीला पुलंचा निखळ विनोद, त्यांनी निर्माण केलेली पात्र अनुभवता येतील याचा आनंद तिच्या शब्दांतून ओसंडत होता. आजच्या पिढीपर्यंत पोचण्याचं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होण्याचं भाग्य पुलंना लाभलं याचं श्रेय त्यांच्यातल्या दर्जेदार साहित्यिका बरोबरच त्यांच्या चिरतरूण वृत्तीलाही द्यायला हवं. पुलं आज हयात नाहीत. त्यांनी १९७९ साली त्यांच्या एका स्नेह्याला स्वत:च्या एकसष्टीच्या निमित्त्याने पत्र लिहीलं होतं. ’उतारवयात देखील जगाकडे किती उत्फुल्ल मनाने पाहातं येतं’ याचीच ग्वाही हे पत्र देतं.

 कालपरत्वे शरीर कुरकुरू लागणार पण त्याचा परिणाम नात्यांवर होता कामा नये याचं भान असलेले पुलं त्या पत्रात म्हणतात, " पिको हे मस्तक.. दुखोत गुडघे...मैतरीचे धागे..जैसे थे...’ त्यांच्या मिश्कील शैलीत ते पुढे म्हणतात ,"वयाबियाचे हिशेब इतिहास संशोधकांनी ठेवावेत, आपण नव्हे. ’हल्लीची पिढी बिघडली आहे, आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही’ अशी रडगाणी काय कामाची. खरं तर हल्लीच्या मोगर्‍यालाही, आपले नाक चोंदलेले नसल्यास, कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍या इतकाच छान वास येतो. उन्हे उतरत चालली म्हणून त्यातले सोने बघणे टाळायची गरज नाही."

 अपवाद वगळता किती ज्येष्ठांना हा मोगर्‍याचा सुवास घ्यावासा वाटतो! उन्हातले सोने शोधण्याची नजर असते! आपण चार पावसाळे जास्त पाहिलेत एवढ्या भांडवलावर आजच्या पिढीला नाके मुरडण्यातच कित्येकांचा वेळ वाया जातो. अनुभवाची व्याप्ती कालसापेक्ष असली तरी त्याची खोली व्यक्तीसापेक्ष असते हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही. “आमच्या काळात नव्हती ही थेरं” हा अनेकांचा परवलीचा शब्द असतो. आज जगण्याचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. प्रत्येक पिढीची एक आगळीवेगळी लय असते. ती ज्येष्ठांनी समजून घ्यायला हवी. प्रत्येक पिढीची एक बंडखोरी असते. ती उमजायला हवी. खरं तर आजच्या पिढीला स्मार्टफोनचे जितके आकर्षण आहे तितकेच त्या पिढीला रेडिओचे होते.

सैगलचा ’देवदास’ पाहिलेली पिढी दिलीपकुमारच्या ’देवदास’ला नावे ठेवत होती. दिलीपकुमारचा ’देवदास’ पाहिलेली पिढी मधली पिढी शाहरूख खानच्या ’देवदास’कडे पाहून डोक्याला हात लावते. त्यापुढची पिढी अभय देओल च्या ’देव डी’ च्या माध्यमातून देवदासचे आधुनिक रूप पाहते. बदलत्या काळानुसार प्रत्येक पिढीची आस्वादक्षमता आणि योग्य, अयोग्य हे निकष बदलत जातात. आजच्या तरूणाईची वेगवान जीवनशैली आणि मागच्या पिढीचे काहीसे संथ आयुष्य काही सामाईकता राहत नाही आणि पिढीमधील अंतराचे पीळ वाढत जातात. यावर उपाय म्हणजे या अंतराची अपरिहार्यता समजून घेणे आणि काळानुसार स्वत:ला बदलवणे. मात्र हे सोपे नसते. निवृत्त झाल्यावर देखील अनेक ज्येष्ठांच्या डोक्यातून पदाचा रूबाब जात नाही. मग ते घरच्या ज्युनिअर मंडळींना हुकूम सोडू लागतात. कित्येक ज्येष्ट स्त्रियांना स्वयंपाकघराचा ताबा सोडवत नाही. हात पूजेत पण मन मात्र संसारातच गुंतलेलं असतं. राजकारणा सारख्या क्षेत्रात तर निवृत्तीचे अधिकृत वय नाही. त्यामुळे कितीतरी जुनी खोडे तरूण कार्यर्त्यांना संधी द्यायला अजिबात तयार नसतात. कित्येक संस्थांचे प्रमुख वयोवृद्ध झाले तरी संस्थेवरची आपली पकड आणि पद सोडायला तयार नसतात, नवीन पिढीच्या वेगाशी जुळवून तर घेता येत नसते. मग संस्था डबघाईला जाऊ लागतात. अशा ज्येष्ठांचे खरे तर हसे होत असते. ’कुठे थांबावे’ हे आजच्या पिढीला कळत नाहीये असा आरोप करताना ते जुन्या पिढीला तरी नीटसे कळले का याचा त्यांनी विचार करावा.

या ’थांब्या’ बद्दल पांडुरंगशास्त्री आठवले म्हणत, "परिवार आणि समाजाचा 'सांधा' म्हणजे वानप्रस्थाश्रम. ' वन ' शब्दाचा अर्थ आहे ' वन्यते सेव्यते इति वनम्। ' वृक्षांचे वन असते. वृक्ष सेवेची दीक्षा देतो. वृक्ष शिकवतो की स्वत: मोठे व्हायचे असते आणि दुसऱ्यासाठी पण काम करायचे असते. माझे अस्तित्वसुद्धा दुसऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वृक्ष स्वत: मोठा होतो, व्यापक होतो आणि नंतर नि:स्वार्थ भावाने लोकांना छाया देतो, फळे देतो. केवळ शांती नव्हे विश्वशांती देतो म्हणून वृक्ष हा सेवेचा आदर्श आहे. वृक्षाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणसाने वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे." या संदर्भात इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे उदाहरण आठवल्याशिवाय राहत नाही. आयटी सर्व्हिसेसमधली, आज जगात पंधराव्या क्रमांकावर असलेली कंपनी स्वकर्तृत्त्वावर उभी करणार्‍या मूर्ती यांनी विशाल सिक्का यांच्या नेतृत्त्वाखाली एक उत्तम टीम तयार केली. गतवर्षी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, सारा मानमरातब सोडून, सारी सूत्रे नव्या टीमच्या हाती सोपवली. इन्फोसिस फाऊंडेशनचे काम बघणार्‍या, सेवाभावी वृत्तीच्या ’सुधा’ या पत्नीसह नातींच्या सहवासात मूर्ती रमले आहेत. भारतीय संस्कृतीतील वानप्रस्थाश्रमाची व्याख्या आज खर्‍या अर्थाने जगत आहेत.

असे घडते तेव्हा
 ’पाव सुखे हुए पत्तो पे अदब से रखना.. धूप में मांगी थी तुमने पनाह इनसे कभी..’
 ही जाणीव अशा ज्येष्टांबाबत नवीन पिढीमधे सहज रूजते. त्यांना सन्मान मागावा लागत नाही, आपसूकच मिळतो.

Friday, May 22, 2015

जनरेशन गॅप - काळजी


‘ह्या विश्‍वाचा पसारा केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ असं कवी केशवसुत म्हणाले होते. मुलांपलीकडे जणू दुसरे जगच नसलेले आजचे बहुसंख्य पालक पाहून म्हणावेसे वाटते, ह्या विश्वाचा पसारा आपापल्या मुलांपुरता कारण मुलं हेच पालकांचं विश्व. स्टेशनवर एका आठवड्याच्या उन्हाळी शिबीरासाठी निघालेली १०-१२ वर्ष वयोगटातील तीसचाळीस मुलं, त्यांना निरोप देण्यासाठी आलेले त्यांचे आईवडील आणि आयोजकांची टीम असा मोठ्ठा घोळका जमला होता. कुणाचे तरी वडील मुलाच्या बुटाच्या नाड्या नीट बांधून देत होते. एक आई मुलाला समजावत होती," एनर्जी बार दिलेत, जेवण आवडलं नाही तर सरळ ते खा हं". दुसरी तिच्या मुलाचे हात सारखे सॅनिटायझर लावून पुसत होती. बहुतेक आईवडील मुलांना कुरवाळत सतत सूचना देत होते, आयोजकांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. गाडी हलल्यावर धास्तावलेल्या मनाने पालक पांगले. मुलं शिबीरस्थानी पोचल्यावर अनेक पालक "मुलांशी फोनवर बोलू द्या" म्हणून आयोजकांपाशी हट्ट धरत होते.

 खरं तर ’घराच्या सुरक्षित कोषाबाहेरच जग’ मुलांना समजावं, त्यांना निसर्ग अनुभवता यावा, नवे मित्र मिळावे, स्वत:ची काम स्वत: करायला शिकता यावी, ’शेअरिंग’ म्हणके काय ते कळावं, त्यांच्यातले सुप्त कलागुण त्यांना जाणवावे यासाठी ही शिबीरं असतात. आईवडिलांनी मुलांचं बोट सोडलच नाही तर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता या मुलांमधे कशी निर्माण होणार? मुलांबद्दल प्रेम असणं, काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण त्याचा अतिरेक मुलांचं मोकळेपण, बालपण हिरावून तर घेत नाही ना! पाल्यांचे अती लाड त्यांच्या धोका पत्करणाच्या मूलभूत क्षमतेला मारक तर ठरत नाहीयेत ना!.
 आजोळी सुट्टी घालवणार्‍या मागच्या पिढीतील बहुतेक घरे अभावग्रस्त असायची तर काही समृद्ध, कित्येक वडिलांना आपलं मूल नक्की कोणत्या इयत्तेत शिकतं हे देखील माहीत नसायचं. हे जरी समर्थनीय नसलं तरी तेव्हा समाधानाच्या कल्पना बर्‍याचशा सारख्या असत त्यामुळे त्या पिढीला खेळत बागडत बालपण मनमुराद उपभोगता आलं. उन्हाळी सुट्ट्या लागल्या की मिळेल त्या वस्तूचं खेळण्यात रूपांतर करणं, धडपडत सायकल शिकणं, आमरसाचा एकत्र आनंद घेणं, पुस्तकं वाचणं, रात्री पत्त्यांचे डाव मांडणं आणि अनायासे लॉजिक शिकणं, गच्चीत बिछाने पसरून चांदणं भरल्या आकाशाकडे पाहात पाहात दमून डोळे मिटणं यातल्या सुखाला आजच्या पिढी पारखी झाली आहे. यात त्यांचा दोष नाही, शेवटी काळ आणि ’सुखाची व्याख्या’ या दोन्ही बदलत जाणार्‍या गोष्टी आहेत. परंतु मूल्य तर शाश्वत असायला हवीत. मुलांच्या निकोप वाढीला आजच्या पालकांनी त्यांच्यावर लादलेली जीवनपद्धती आणि घातलेले सुरक्षाकवच मारक तर ठरत नाहीये ना !

मुलांच्या बाह्यव्यक्तिमत्व विकासासाठी पंचतारांकित शिबीरांबरोबरच आंतरिक विकास आणि व्यक्ती ’घडवण्यावर’ भर देणारी सेवांकुर, निर्माण यासारखी किंवा संघासारख्या संस्थांची बालशिबीरे याचाही पालकांनी विचार करायला हवा. यातून मुलांची वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे व्यक्तिमत्व परिपक्व व्हायला खरी मदत होईल. एका कार्यक्रमात येथील एक प्रसिद्ध उद्योजक सांगत होते, "सध्या माझी मुलं महाविद्यालयात शिकतायत. मला व्यवसायात थोडी मदत देखील करतात. सहसा आम्ही ए.सी. प्रथम वर्गाशिवाय प्रवास करत नाही परंतु आकस्मिक कारण उद्भवल्यास किंवा आवश्यकतेनुसार मी त्यांना तिसर्‍या वर्गाने देखील लांबचे प्रवास करायला लावतो. त्यांचे त्या प्रवासात खरे समाजशिक्षण होते. सुखसोयींची किंमत, कष्टाचे महत्व, गरज आणि चैन यातला फरक समजतो, ’माणसं’ कळतात, समाजात जगण्याचे किती स्तर आहेत ते कळतात, संवेदनशीलता वाढते".
 "पण मुलं एखाद्या वेळेस अडचणीत सापडतील याची भीती नाही वाटत का", असे विचारताच ते म्हणाले," आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना भीती कसली. उलट मुलं स्मार्ट होतात. स्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रांडेड कपडे किंवा सफाईदार इंग्रजी नाही. स्मार्टनेस म्हणजे निर्णयक्षमता, समयसूचकता, व्यवहारकुशलता. मुळात मुलांना चुका करण्याची संधीच आपण दिली नाही तर त्यांचे निर्णयकौशल्य वाढेल कसे! मग ती आपली म्हणजे पालकांची चूक ठरेल. या सगळ्यामुळे उद्या मोठं झाल्यावर, जगताना, स्वतंत्रपणे व्यवसाय करताना ज्या अडचणी आणि आव्हानं समोर येतील त्याला तोंड देण्यासाठी मुलं तयार होतील." 

Friday, May 8, 2015

जनरेशन गॅप - विज्ञान


"भगवान की लीला" सांगणारा एक मेसेज आला, त्यात हा मेसेज अमुक जणांना पुढे पाठवला तर माझी कशी भरभराट होईल आणि नाही पाठवला तर माझं कसं वाईट होईल असही लिहीलं होतं. खंत याची वाटली की मेसेज पाठवणारा महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासात हुशार, स्मार्टफोन आणि त्यावरील वेगवेगळे अ‍ॅप्स सहजपणे वापरणारा. भक्ती हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे मात्र असे शाप(!) देणारे मेसेज अंधश्रद्धेला खतपाणी घालतात हे समजण्याइतका विवेक त्याच्या जवळ का नसावा. "ग्रहण होतं म्हणून इंटरव्ह्यूला नको जाऊस असं आई म्हणाली" असं एखादी पदव्युत्तर पदवी घेणारी विद्यार्थिनी सांगते तेव्हा काय बोलावं कळेनासं होतं. आजची पिढी स्मार्ट किंवा आधुनिक आहे असं आपण म्हणतो ते त्यांच्या स्टाईलिश राहणीवरून, चटपटीत वागण्य़ावरून, तंत्रज्ञान सहजतेने वापरण्य़ावरून. वृत्ती आणि विचारांनी देखील ही पिढी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोन बाळगणारी असती तरच त्यांना खर्‍या अर्थाने स्मार्ट म्हणता आले असते. अपवाद वगळता तसं झालेलं दिसत नाही. त्यांच्यावर बुद्धीवादाचे संस्कार करताना मागची पिढी कुठेतरी कमी पडली असावी का!

 आपल्याकडे विज्ञानाची कास धरणे म्हणजे अध्यात्मापासून दुरावणे असा एक अपसमज आहे. जिथे प्रेम, सहवेदना, मानवता, करुणा, त्याग अशी मूल्य मानली आणि जोपासली जातात ते खरे अध्यात्म. मग ते विज्ञानाच्या वाटेत आडवे येईलच कसे. ते सहप्रवासी का होऊ नयेत! चिकीत्सेची भिती असते ती फक्त अंधश्रद्धेला, खर्‍या अध्यात्माला नव्हे. आपल्या पाल्यावर धार्मिक संस्कार करताना त्यातील ’उत्कट भव्य तेचि घ्यावे मळमळीत अवघे टाकावे ’ याचा विचार पालक फारसा करत नाही. श्रद्धेचा निकष ज्ञान असाय़ला हवा. श्रद्धा तपासायला हव्यात, कालबाह्य श्रद्धांचा त्याग करायला हवा. पाकिस्तानसारख्या देशात तर धार्मिक कडवेपण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे इतके झिरपत गेले आहे की त्याची परिणीती जिहादी तरूणांच्या दहशतवादी संघटनांमधल्या वाढ्त्या संख्येत होताना दिसून येते आहे. त्याने देशाच्या आणि धर्माच्याही प्रगतीला खीळ बसते आहे. आपणदेखील आपल्या गौरवशाली इतिहासाच्या साखरझोपेतून बाहेर पडून जगाकडे उघडणा‍र्‍या खिडकीतून बाहेर बघायला फारसे उत्सुक नाही.

 या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईत झालेल्या अखिल भारतीय सायन्स कॉंग्रेसच्या एका परिसंवादात राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी सुमारे तीन हजार वर्षापूर्वी भारतात विमानं उडत होती, ती आजच्या विमानांपेक्षा आधुनिक होती, असे दावे केले गेले. त्यासाठी वेद-पुराणातील दाखले दिले गेले. भारताने आज स्वबळावर यशस्वी केलेल्या चांद्रयान आणि मंगळ मोहिमेऐवजी पुराणांची चर्चा झाली. पुराणकाळातील विमानाचे अवशेष कुठल्याही उत्खननात सापडलेले नाहीत. विज्ञानात, कोणत्याही संशोधनात प्रमाण किंवा पुरावे असावे लागतात. असे दावे विज्ञान परिषदेत स्वीकारले जाऊ शकत नाहीत. शिवाय भारताप्रमाणेच बहुतेक देशांमधे वेगवेगळ्या पुराणकथा आहेत आणि त्यातही अशा स्वरूपाच्या हकिकती आहेत. ‘अपोलो’ पासून ते आताच्या ‘ओरॅकल’ या अत्याधुनिक वाटणाऱ्या नावांचे मूळ ग्रीक व रोमन पुराणकथांमध्ये आहे. आपल्याकडे ध्रुव तार्‍याची पुराणकथा प्रसिद्ध असेल तर चिनी पुराणकथांमधे २७ ऐवजी २८ नक्षत्रांची कहाणी आहे. जपानमधे ’सप्तर्षी’बद्दलची कथा एका अस्वला संदर्भात प्रसिद्ध आहे. अशा दाव्यांना सत्य मानायचे असेल तर जगासमोर ते संशोधन करून सिद्ध करावे लागतील. पुराणकथांचा बोधकथा म्हणून प्रतीकात्मक वापर करायला काहीच हरकत नाही. ते न करता आणि आपण पुराणकाळी किती प्रगत होतो या आनंदात मश्गूल राहण्य़ापेक्षा आपण आज का मागे पडतो आहोत हे समजून घेणे, मूळ भारतीय शोधांचे तर्कशुद्ध संशोधन करून त्याचे पेटंट इतर देशांनी बळकावू नये याची काळजी घेणे देशासाठी जास्त महत्वाचे आहे.

त्यासाठी तरूणांमधे वैज्ञानिक दॄष्टीकोन विकसित करायला हवा. भर समुद्रात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्राला प्रसन्न करण्य़ासाठी नारळांचे ढीग जरी अर्पण केले, नवस केले, मंत्र म्हटले तरी तो समुद्र प्रवांशासह त्या नावेस बुडविल्यावाचून राहत नाही, असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ स्वा. सावरकर. आज सोशल नेटवर्किंग वर बहुतेक पुराणकथांची विज्ञानाशी जबरदस्ती सांगड घालण्य़ाचा तरूणाईचा आटापिटा पाहिला की सावरकरांचा "खरा सनातन धर्म कोणता,' हा निबंध आठवतो. त्यात ते नमूद करतात, "हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. आज अवगत आहेसे वाटते, ते विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियमांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित पडेल. तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.'

 भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ जीडीपी च्या वाढत्या दरावर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोनावर ही अवलंबून आहे. आजच्या पालकांनी विज्ञानाची महती, मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य केले आणि नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता येत्या पिढीत निर्माण केली तर ती सुद्धा एक देशसेवाच ठरेल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणारी, गैरसोयीचे किंवा कठिण असले तरी सतत प्रश्न विचारणारी भावी पिढी निर्माण करणे आणि त्यांची उत्तरे शोधण्य़ासाठी प्रयत्नशील राहणे हे आजच्या पालकांनी केलं तरच इतिहासासारखे आपले भविष्य देखील अभिमान बाळगावा असे घडेल. 

Friday, April 24, 2015

जनरेशन गॅप - अलिया आणि आयक्यू


आजच्या पिढीची स्मार्ट सिनेतारका, ’अलिया भट्ट’ वरून केलेला विनोद कुणीतरी आपल्याला (आणि साधारणपणे आपणही कुणालातरी) पाठवल्याशिवाय सध्या कित्येकांचा दिवस मावळत नाही. एक बरय की हे विनोद निखळ असतात, अश्लील नसतात, फक्त तिच्या बुद्धूपणाची खिल्ली उडवणारे असतात. या विनोदांना हसताना आपला बुद्ध्यांक तिच्यापेक्षा किती बरं उच्च आहे हे जाणवून वाचणारा आतून खूष होतो. मुळात ही आजची अभिनेत्री विनोदाचा विषय ठरली ते एका वाहिनीवरील ’कॉफी विथ करण’ या शोमुळे. यात प्रश्नांच्या फैरीला उत्तर देताना, पृथ्वीराज चव्हाण यांना देशाचे राष्ट्रपती घोषित करून तिने तिच्या अचाट 'सामान्य ज्ञाना'ची झलक दाखवली होती. तिच्यावर ’मूर्खशिरोमणि’ असा शिक्का बसायला हे निमित्त झाले. आता किमान देशाच्या राष्ट्रपतींचं नाव तिला माहीत असायला हवं होतं हे निर्विवाद. मात्र केवळ स्मरणशक्ती म्हणजे बुद्धीमत्ता नाही आणि 'टीका सकारात्मकपणे, खिलाडूवृत्तीनेही घेता येते' हे दाखवून देण्यासाठी आलियाने तिच्यावर हसणा-यांना प्रत्युत्तर देणारा ’जीनीयस ऑफ द इयर’ हा एक झकास व्हिडिओ पोस्ट केला आहे. ’ब्रेन जिम’ च्या मदतीने ती तिचं सामान्यज्ञान चांगलच वाढवते हे यात अगदी गमतीदार पद्धतीने दाखवलय. तरीही ’तिला माहीत नाही’ असं काहीतरी या जगात शिल्लक राहतच असा या व्हिडीओचा मार्मिक शेवट, बुद्ध्यांकाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीवर शब्दांवाचून भाष्य करतो.

आयुष्य़ प्रसन्न मनाने जगण्यासाठी त्यात थोडा विनोद हवाच परंतु अलियावरच्या विनोदांच्या निमित्त्याने आपला बुद्ध्यांक किती आहे हे विशेषत: आजच्या पिढीने तपासून पाहायला हवं. स्मरणशक्तीला कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, प्रतिभा आणि विवेक यांची जोड असेल तरच ती सर्वंकष बुद्धीमत्ता. ह्याची जाणीव नसलेली मुलं केवळ घोकंपट्टी करून उत्तम गुण मिळवतात आणि पालकांसह समाजही त्यांना बुद्धीमान मानू लागतो. इतर चार पैलूंचे ज्ञान नसले तर ही मुलं यशाचं सातत्य राखू शकत नाहीत. आजच्या शिक्षणपद्धतीत केवळ विश्‍लेषण कौशल्य (ऍनॅलॅटिकल स्किल्स) विकसित करण्यावर भर असतो. एकाग्रतेचे कौशल्य (अटेन्शन स्किल्स), सर्जनशीलता वाढवणे, चिंतन-मननाची कौशल्ये याकडे लक्ष दिले जात नाही. या कौशल्यांशिवाय व्यवहाराचा आणि यशापयशासह जगण्याचा तोल सावरता येणे कठीणच.

 मध्यंतरी एका स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा योग आला. मुलं निमशहरी भागातली पण चुणचुणीत वाटली. त्यांना काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले. बहुतेक उत्तरं मुलांनी अचूक आणि त्वरित दिली. बरे वाटले, मग सहज त्यांना विचारले,’ ’नक्षलवाद’ म्हणजे काय?’ एकदम शांतता पसरली. जेमतेम एकदोन मुलांनी ’सरकार अन्याय करतं त्याला विरोध’ अशी ढोबळ उत्तरं दिली. उद्या करियर करताना या मुलांना चर्चा, मुलाखती, ग्रुप डिस्कशन्स याला सामोरे जावे लागेल. तिथे बाजी मारण्यासाठी स्मरणशक्ती पुरेशी नाही तिथे खर्‍या बुद्धीमत्तेचा कस लागेल तेव्हा रोजचे वर्तमानपत्र देखील वाचायचा कंटाळा असलेली ही मुलं त्याला कसं तोंड देणार ! मोबाईलचे नवनवे मॉडेल्स आणि ऍप्स सहजतेने हाताळणार्‍या तरूणाईला बरेचदा अनेक मुलभूत गोष्टी माहीत नसतात. ’पेपरमधे छापून आलय ना! मग ते खरच असलं पाहिजे’ असा मागच्या पिढीचा भाबडा समज असायचा. आजच्या पिढीतील अनेकांचा ’इंटरनेट वर असलेलं सगळं शंभर टक्के अचूक असतं’ असा समज आहे. सर्च इंजिन हा फक्त माहिती पर्यंत पोचवणारा दुवा आहे हे लक्षात घेतलं जात नाही. ’गुगल’ वापरून सामान्यज्ञान उत्तम असण्याचा आभास
म्हणजे चांगला बुद्ध्यांक नव्हे. गुगल किंवा एकूणच तंत्रज्ञानाची मदत घेण्यात गैर काहीच नाही परंतु त्याला व्यासंगाचा, विचारांचा पाया हवा. अन्यथा ही मुलं बरेचदा वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात अयशस्वी ठरतात, वैफल्यग्रस्त होतात. ह्याला जबाबदार आहे ’हुशारी’ ची तोकडी व्याख्या.

 मेंदूचा उजवा भाग हा भावनिक, कलात्मक तर डावा भाग तर्क बुद्धीशी निगडित असतो असे मानले जाते. तरीही मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांच्या साह्याने काम करतात, हे आता सिद्ध झाले आहे. कलेच्या निर्मितीसाठी भावनात्मक उजव्या मेंदूला डाव्याची मदत होते त्याचप्रमाणे विज्ञानातील शोध नुसत्या तर्कबुद्धीने लागत नाहीत. त्याला ऊर्मीची, म्हणजे उजव्या मेंदूची गरज लागते असे या क्षेत्रातले एक तज्ञ डॉ. आनंद जोशी सांगतात. सखोल वाचन, बहुश्रुतता, पर्यटन, वेगवेगळ्या कलांचा आस्वाद, विशेष प्रशिक्षण अशा अनेक मार्गांनी या दोन्ही मेंदूंना चालना दिली जाऊ शकते. हे सगळे केवळ व्यावसायिक यशासाठी करायचे नसून निखळ बौद्धिक आनंदासाठी आणि जगणं सुंदर करण्यासाठी करायचे आहे. तेव्हा विनोदांवर हसता हसता, आपल्यातही एक ’अलिया भट्ट’ लपलेली असते, तिला शोधून काढून तिचा बुद्ध्यांक वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू करायला हरकत नाही.

Friday, March 27, 2015

जनरेशन गॅप - अभिरूची


एका संगीतविषयक कार्यक्रमात प्रसिद्ध सिंथेसायझर वादक सत्यजीत प्रभू मागील पिढ्यांपासून आजच्या पिढीपर्यंत संगीतात होत गेलेल्या बदलाबद्दल बोलत होते. सहवादकाने त्यांना म्हटलं, "मेलडी हरवत चाललीय, हल्लीच्या कित्येक गाण्यांचा ’राग’ कोणता हे देखील ओळखता येत नाही, आता ’लुंगी डान्स’ चा राग कुणाला ओळखता तरी येतो का? त्यावर प्रभूंचं उत्तर होत, "मला येतो ना! ....राग ’अनावर’ ". यातला गमतीचा भाग सोडला तरीही आजच्या पिढीच्या कलेबाबतच्या..विशेषत: जनमानस व्यापणार्‍या संगीतकलेबाबतच्या अभिरूचीवरचं प्रश्नचिन्ह कायम राहतं.

 असं म्हणतात की साहिर लुधियानवी चित्रपटासाठी गीतलेखन करताना संगीतकारापेक्षा एक रूपया जास्त मानधन घेत असत. गाण्यात सुरांइतकच किंवा त्याही पेक्षा शब्दांचं महत्व अधिक असं त्यांना वाटत असायचं. सिनेगीतातल्या ’काव्या’ला इतकी किंमत असण्याचा तो काळ केव्हाच मागे पडला. आता शब्दांवर सुरांचं केवळ आक्रमणच झालेलं नाही तर अतिक्रमण झालेलं आहे. हिंदी सिनेसंगीतात पंजाबी, इंग्रजी शब्दांच्या मधे आणि वाद्यांच्या दणदणाटात त्यातल्या काव्याला अगदी खालचं स्थान असतं. टॉलस्टॉयच्या मते कला माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा. कलाकृतीचे आकलन सहज व्हायला हवे, जी कलाकृती सर्वसामान्यांना कळत नाही ती कसली आलीय चांगली कलाकृती, असे त्यांचे मत होते. हा निकष अनेक टीकाकारांना मान्य नव्ह्ता. आजही तो संगीताच्या बाबतीत मान्य करायचा तर केवळ ठेक्यामुळे सर्वसामान्यांना (मासेस) चटकन भावणारी हिंदीत धुमाकूळ घालणारी ’मुन्नी, फेविकॉल, शीला’ वगैरे प्रकरणं आणि मराठीतली त्याची ’कोंबडी, रिक्षावाला’ वगैरे रूपं महान कलाकृती म्हणून गणली गेली असती. या विरोधी टीकाकारांच्या मते कलाकृती व्यवस्थित कळायला आस्वादकाची तेवढी पात्रता व तयारी असायला हवी आणि म्हणूनच खालावलेल्या अभिरूचीबद्दल फक्त आजच्या पिढीला दोष देता येणार नाही.

आजच्या पिढीचा ’कान’ आणि ’डोळे’ तयार करण्याची जबाबदारी या आधीच्या पिढीची होती. परंतु ८० च्या दशकापासून ’उमराव जान, बाजार’ सारख्या चित्रपटांचे अपवाद सोडले तर सिनेसंगीताचा दर्जा उतरणीला लागला. संगीत नाटकं जवळपास बंद झाली, शास्त्रीय संगीताची समज आणि रसिकांची टक्केवारी अधिकच उणावली. जागतिकीकरणानंतर वाढत गेलेल्या चंगळवादाचा परिणाम संगीतावरही झाला. बाजाराची मागणी तसा पुरवठा करण्याच्या नादात भाषेचा दर्जाही खालावत गेला. आज सोशल नेटवर्किंगवर कित्येकदा अगदी सुमार दर्जाच्या, ट ला ट जुळवणार्‍या कविता शेअर केल्या जातात, त्याला हजारो लाईक्स मिळतात. त्याचीच पुढे ’गाणी’ होतात. ती ’गाजतात’. आशयघन साहित्य म्हणजे काय, हे समजून घेण्याइतका वेळ आजच्या धावपळीच्या जगात आहे कुणाला! मैफिलींचा श्रोता म्हणून आनंद लुटण्याइतका निवांतपणा कुणाजवळ फारसा नाही. शिवाय आजच्या ’सबकुछ इन्स्टंट’ पिढीला लगेच ’बोssssर होतं’. कलेमधे गुणवत्तेपेक्षा, रियाजापेक्षा सादरीकरणाला अवास्तव महत्व आलं आहे. क्वचित एखादं उत्तम गाणं गायक उत्कटपणे सादर करत असतो आणि अचानक विंगेतून वेगाने एक नर्तकांची फौज येते आणि गायकाला घेरून नाचू लागते, रंगीबिरंगी दिव्यांची जोरात उघडझाप सुरू होते आणि या गदारोळात ते गाणं कुठेतरी हरवून जातं.

 पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये असा आग्रह धरणार्‍या क्रोचे या इटालियन तत्वज्ञाने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. थकल्या भागल्या सामान्य माणसाच्या मनोरंजनासाठी न-नैतिक कलाप्रकार वापरले जात. पूर्वीचे वग, तमाशा, नौटंकी ही त्याची उदाहरणं. हल्ली त्याची जागा सवंग ’आयटम सॉंग’ ने घेतली आहे. हे कलाप्रकार केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असा संकेत होता. दुर्दैवाने या कला(!) प्रकाराने आयुष्यातला सर्वच काळ व्यापायला सुरूवात केली आहे, ’नाही रे’ गटाने नव्हे तर गटनेत्यांनी ’आहे रे’ गटाच्या अभिरुचीच्या व्याख्यांना आव्हान द्यायला सुरूवात केली आहे. खरं तर एखादी कला जीवनाला जितक्या गंभीरपणे भिडते, सामोरी जाते तितकी तिच्यातली नैतिक बाजू आणि पर्यायाने गुणवत्ता महत्त्वाची होत जाते. या पार्श्वभूमीवर आजही जेव्हा एखादा अभिजीत पोहनकर ’पिया बावरी..’ सारखी दर्जेदार फ्यूजन कलाकृती निर्माण करतो, एखादे काळजाला हात घालणारे सूफी गीत कानावर पडते, ’बिलनच्या नागीनी; पलिकडे जाऊन आनंद शिंदे ’चल ग सखे पंढरीला’ म्हणतात, बालगंधर्व मधली ’चिन्मया सकल हृदया..’ सारखी रिंगटोन एखाद्या विशीतल्या मुलाच्या मोबाईलवर वाजते, विवीध वाहिन्यांवरचे लिटील चॅम्प्स तयारीने गातात, गुलजार, जावेद अख्तर सारख्यांच्या रचना, अमिताभ भट्टाचार्यचे ’रे कबीरा ....’ सारखे अर्थगर्भ गीत मनाचा ठाव घेते तेव्हा जाणवतं..सगळच काही संपलेलं नाही. अल्प प्रमाणात का होईना पण संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत आणि माध्यमांच्या मदतीने ते वेगाने सर्वदूर पोचत आहेत. पिढी बदलते आहे, आस्वादक्षमता बदलते आहे. ती जोपासायला हवी.

साधारणपणे आपल्यावर कलेचे जसे संस्कार झाले असतील तशा आपल्या आवडीनिवडी घडत जातात. सिनेसंगीत सतत ऐकले गेले तर ते आवडू लागते, गझल किंवा नाटयसंगीताचा संस्कार झाला तर ते मनाला भिडते, सिंफनी किंवा पाश्चिमात्य सुरावटी ऐकत राहिल्या तर त्या आवडू लागतात. या वैविध्यातून कान तयार होतो आणि सरसनिरस ठरविण्याचे कौशल्य निर्माण होते. लोकप्रियता आणि गुणवत्तेचा समन्वय साधला जाऊ शकतो. तेव्हा गरज आहे ती उमद्या कलाकारांना प्रोत्साहन आणि कलेतील प्रयोगांना दाद देण्याची, नवतेचा स्वीकार करण्याची आणि वैविध्यपूर्ण संगीतकलेचे संस्कार आजच्या पिढीवर करण्याची.

Friday, March 13, 2015

जनरेशन गॅप - कुटुंब


’उन उन खिचडी साजूक तूप.. वेगळं व्हायचं भारीच सुख’ अशी विसूभाऊ बापट यांची एक कविता आहे. विभक्त कुटुंबात हवं तसं जगता येतं असं ध्वनित करणारी. "हल्लीच्या पिढीला माणसं नकोत, आमच्या वेळी पंधरा वीस माणसं घरात असायची, आम्ही केलच ना सार्‍य़ांचं..., यांना मात्र कसलीच जबाबदारी नको, नुसतं स्वातंत्र्य हवं.. "असा काहीसा तक्रारीचा सूर मागच्या पिढीचा असतो. आजही कुटुंबसंस्था हा भारतीय जीवनपद्धतीचा कणा आहे त्यामुळे एकत्र कुटूंबाचं रूपांतर विभक्त कुटूंबांमधे होत जाणं हा समाजाच्या दॄष्टीने अतिशय संवेदनशील मुद्दा आहे.

 ग्रीक आणि भारतीय संस्कॄती काहीशा समकालीन पण ग्रीक संस्कृती लयाला गेली. याची कारणं शोधताना तेथील संशोधकांना असे आढळले की, कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली म्हणून ग्रीक संस्कृतीचा -हास झाला. म्हणजेच भारतीय संस्कृती टिकण्य़ामागे आपली कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे. अमेरिका आणि इंग्लंडमधे अनेक वंशांचे लोक राहतात. या लोकांमध्ये भारतीय लोक सर्वात समाधानी आणि संतुलित असल्याचे आणि त्याचे कारण देखील भारतीय कुटुंब व्यवस्थेमधेच दडले असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. एकूण तेथील वाढ्त्या एकल पालकत्वापेक्षा विभक्त (न्यूक्लीअर) का होईना पण कुटुंब असायलाच हवे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातले सर्वजण एकोप्याने जवळ राहत.फक्त सणासुदीला किंवा काही उत्सवाच्या निमित्ताने एकत्र न येता, दु:ख, संकटे, अडचणीत एकमेकांना साथ देत. आर्थिक बचत होई. वाटून घेण्य़ाची सवय होई, मुख्य म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होत असे बरेच फायदे सांगता येतील. पूर्वी शेतीप्रधान जीवनपद्धती असताना आणि माणसांची पोच पंचक्रोशीपर्यंत असताना हे सारे सहजसाध्य होते.

त्याच वेळी या कुटुंबपद्धतीचे अनेक तोटेही होते. या सगळ्य़ात अनेक जणांना वैयक्तिक महत्वाकांक्षांचा बळी द्यावा लागे, घरातल्या वडीलधार्‍या किंवा सर्वाधिक उत्पन्न असणार्‍या व्यक्तीच्या हातात सर्व सूत्रे असत. कमी उत्पन्न मिळवणार्‍यांना, किंवा स्वभावाने गरीब असणार्‍यांना मिंधे आयुष्य जगावे लागे, स्त्रियांचा मानसिक कोंडमारा होई. स्वत:च्याच नवर्‍या-मुलांसह मोकळेपणे वेळ घालवणे अशक्य असे. एकत्र कुटुंबासाठी धूरभरल्या अंधार्‍या स्वयंपाकघरात किलोकिलोच्या पोळ्य़ा करण्य़ात आपल्या आईचे आयुष्य करपून गेल्याची खंत लेखक जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. ती प्रातिनीधीक आहे. ’करियर’ हा शब्द व्यवहारात आल्यावर यानंतरच्या पिढीत भल्यामोठ्या कुटुंबांची आपोआपच लहान कुटुंब झाली. तेव्हाही दोन पिढ्यांमधे अशीच रस्सीखेच घडून आली.

आता तर ही लहान कुटुंबे अजून लहान होत चौकोनी किंवा त्रिकोणी झाली आहेत. साधारणपणे या स्थित्यंतरासाठी सरसकट आजच्या पिढीला जबाबदार धरलं जातं, त्यांना स्वार्थी, आत्मकेंद्री अशी दूषणं दिली जातात. खरच आजची पिढी अशी आहे का! या बदलाची बहुतेक कारणं परिस्थितीजन्य आहेत, वास्तव आहेत. कामापुरतं आईबापाला वापरून घेऊन मग त्यांच्याकडे पाठ फिरवणार्‍या, उतारवयात त्यांना वार्‍य़ावर सोडणा‍र्‍या काही कॄतघ्न मुलांच्या कहाण्य़ा बातम्यातून आपल्या समोर येतात, क्वचित आजूबाजूला दिसतात. मात्र अशी मुलं मागच्या पिढीत नव्हतीच का! तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातलं इतर कुणीतरी त्यांची जबाबदारी स्वेचछेने अगर नाईलाजाने घेत असे ,त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची राहत असे इतकच. मला वाटतं, माणसं प्रत्येक पिढीत तशीच असतात, चांगली आणि वाईट दोन्ही. बदल होतो तो दॄष्टीकोनात आणि परिस्थितीत. आता आर्थिक रेषेखाली जगणारी कुटुंबे कच्च्याबच्च्यांसह हातावर पोट घेऊन जमेल तसे आणि जमेल तिथे जगत असतात. धनिक वर्गात बहुतेक वेळा इस्टॆटीच्या वादामधून कुटुंब विभक्त होतात. मध्यमवर्गातले पालक मुलांना उच्चशिक्षण देऊन मग करियरसाठी परदेशात किमान महानगरात पाठवतात. इथून पुढे त्यांचे एकत्र राहणे अवघड होत जाते. भौगोलिक, सांस्कॄतिक फरक, जागेची अडचण, व्यक्तीस्वातंत्र्याच्या बदलत्या कल्पना, जगण्य़ाची वेगवेगळी उद्दिष्ट्य़ अशी अनेक कारणं यामागे असतात. याशिवाय हेकेखोरपणा, आपली मते लादणे, संशयी, संतापी किंवा विचित्र स्वभाव असे स्वभावदोष सुद्धा संबंधांमधे वितुष्ट आणतात. असे प्रश्न किंवा दोष कोणा एकाच पिढीमधे नाही तर व्यक्तीसापेक्ष असतात, असे असताना फक्त आजच्या पिढीला खलनायक का ठरवले जाते! त्यापेक्षा यावर उपाय शोधले जावेत.

शहरांमधून काही सहनिवास खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधले गेले आहेत, वयस्कर मंडळींसाठी सुद्धा डॆ केअर सेंटर सुरू करण्य़ात आले आहेत. या सोयी नेहमीच परवडतील आणि रूचतील असे नाही, अशांना समवयीन गट करून एका जागी राहता ये ईल, आवडणार्‍या किंवा सामाजिक उपक्रमाला वाहून घेता ये ईल. ’वसुधैव कुटुंबकम’ हे सूत्र स्वीकारून आपला परीघ वाढवता येईल. आपल्या घरात, मुला-नातवंडात आनंदाने जगण्य़ाला सुख म्हणायचे की या बदलांना, हे त्या व्यक्तिच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मात्र पटॊ ना पटॊ, ही जीवनशैली येत्या काळाची अपरिहार्यता असणार आहे. पाळणाघरांच्या प्रमाणात वृद्धाश्रम पण वाढणारच हे एक कटू सत्य आहे. आज घरोघरी एक-दोनच मुले, ती आकांक्षांचे पंख लावून उडून गेली की रिकाम्या घरट्यात उरलेल्या दांपत्याला जगण्य़ाचे वेगवेगळे पर्याय खंत न करता खुल्या मनाने, उमदेपणाने स्वीकारता आले पाहिजे. अर्थात परिस्थिती अजून तरी टोकाला गेलेली नाही. शादी डॉट कॉमने केलेल्या सव्‍‌र्हेमध्ये असे दिसून आले आहे की समाजाच्या विविध स्तरांतल्या, विविध कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या सुमारे ५४ टक्के मुली आणि ५३ टक्के मुलांना एकत्र कुटुंबात म्हणजेच सासू सासरे किंवा आईवडीलांसह राहण्य़ाची इच्छा आहे. आजच्या काळातल्या मुलींना नोकरी करायची असते, वाढते खर्च बघता मुलांनाही बायकोने नोकरी करणे आवश्यक वाटते. मग या सुनांना आणखी जबाबदाऱ्या सांभाळणे शक्य नसते. लग्नानंतर मुलांना सांभाळणं हा मुद्दाही असतोच. अशी अनेक कारणं या निर्णया मागे असतील. सुनेकडून पारंपरिक अपेक्षा पूर्ण होणार नाहीत पण पालकांनाही आपल्या माणसात राहिल्याचा आनंद मिळेल, आधार मिळेल. तडजोडीच्या पार्श्वभूमीवर का असेना हे सर्वेक्षण दिलासादायक आहे.

 भावी पिढीच्या मनस्वास्थ्यासाठी तरी कुटुंबसंस्था टिकवायलाच हवी. हे आव्हान पेलतानाच एक लक्षात घ्यायला हवे की कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणं नव्हे. कुटुंब म्हणजे एकत्र नांदणं. एकाच घरातल्या माणसांच्या मनांमधलं अंतर जर खूप असेल तर त्या एकत्र कुटुंबाला विभक्त मानायला हवं, याउलट भौगोलिक अंतर जास्त असूनही मनं जोडलेली असतील तर ते खरं एकत्र कुटुंबच. नाही का!

Friday, February 27, 2015

जनरेशन गॅप - फुलपाखरू


’चालत जायचं ????’ मिनू जवळ जवळ किंचाळलीच. काही कारणामुळे आज तिचे नेहमीचे रिक्षावाले येऊ शकणार नव्हते. बाबा-दादा आपापल्या कामाला आणि आईची गाडी दुरूस्तीला. त्यामुळे आई म्हणाली, "शाळा फार लांब नाहीये तशी, जा एक दिवस पायी. त्यातही मजा असते." पायी जाणे हा पर्याय असू शकतो हे मिनूच्याच नव्हे तर आजच्या पिढीच्या गावी नाही. अर्थात काही खेड्य़ातून आजही अनेक मुलं शाळेसाठी बरीच पायपीट करतात. त्यामुळे शाळा गळतीचं प्रमाण काहीसं वाढत असलं तरी या प्रवासात मुलांचं नकळत जीवनशिक्षण आणि निसर्गशिक्षण घडतं. मात्र शहरी-निमशहरी भागातल्या आणि लगतच्या खेड्यातल्यादेखील जीवनपद्धतीतल्या बदलामुळे ही मुलं आता पूर्वीसारखी रमतगमत शाळा कॉलेजात जाऊ शकत नाहीत. वाहतुकीच्या सोयी असताना त्यांनी तसं करावं अशा अपेक्षाही नाहीत पण य़ा बदलांमुळे आणि एकूणच मुक्कामाला पोचण्य़ाच्या घाईमुळे अशा छोट्या प्रवासाबरोबरच जगण्याच्या प्रवासातल्या आनंदाला सुद्धा आजची पिढी मुकते आहे.

 आजच्या पिढीपाशी वेळ नाही. पूर्वीसारख्या तासंतास चालणार्‍या मैफली, वन्समोअर घेणारी संगीत नाटके या ऐवजी ऑडीओ क्लिप्स आल्या. क्रिकेटचे कसोटी सामने पाहायलासुद्धा वेळ नाही त्याचे २०-२० झाले, बातम्या सुपरफास्ट झाल्या, अन्नाचं फास्ट फूड झालं. यात त्यांचा दोष नाही, स्पर्धेत धावायचे म्हणजे वेळ दवडून कसे चालेल? कॉर्पोरेट क्षेत्रात ठराविक काळात दिलेलं उद्दिष्ट साध्य करणं बंधनकारकच नाही तर अनिवार्य असतं. यामध्ये त्या प्रक्रियेपेक्षा साध्यावरच सर्व भर दिला जातो. यातून शारीरिक, मानसिक तणाव निर्माण होतात. एक उद्दिष्ट साध्य होते परंतु ते यश क्षणभंगुर ठरते कारण तोवर व्यवस्थापनाने दुसरे उद्दिष्ट दिलेले असते. हे चक्र संपत नाही. या सगळ्य़ात वेळेअभावी जगण्याचा दर्जा खालावत जातो, कलेची अभिजातता काहीशी कमी होऊ लागते. रिअ‍ॅलिटी शो च्या चकचकाटात कलेची खरी ओळख करून देणारे गुरू, कलेची साधना, रियाज, त्यातल्या सौंदर्याचा शोध, त्यासह होणारे सादरीकरण, त्यातून मिळणारा आनंद आणि वाढणारा सांस्कॄतिक दर्जा असे टप्पे पार करण्य़ाइतका वेळ ,उत्साह आणि समज फार कमी होत चालली आहे. या पायर्‍य़ांना कुणी यश मानायलाच तयार नाही. कला आणि क्रीडेच्या क्षेत्रासारखीच परिस्थिती शिक्षणक्षेत्रात आहे. विद्यार्थी गुणवत्तेच्या नव्हे तर गुणांच्या मागे लागले आहेत. कोणताही प्रकल्प करायचा तो झोकून देऊन नवे काही शिकण्यासाठी नाही, तर ग्रेड मिळवण्य़ासाठी. शिकण्याच्या आनंदापेक्षा महत्त्वाचे त्याचे उपयोजित मूल्य. यश म्हणजे जिंकणॆ, यश म्हणजे चषक, यश म्हणजे विजेत्याला मिळणारा अमुक रकमेचा धनादेश.

आजच्या पिढीची यशाची व्याख्या जगण्य़ापेक्षा बाजाराशी नाते सांगते.
’आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक
हाती येताच म्हणतो दाणा, नेऊन मला विक’ याला काही अंशी मागची पिढी जबाबदार आहे. मुलांनी सतत शिखरावर राहावे हा पालकांचा अट्टाहास याला कारणीभूत आहे. त्यांच्या हे लक्षात यायला हवं की शिखरावर सर्वांनाच जागा मिळत नाही. खाली राहणाऱ्यांची संख्या नेहमी जास्त असते आणि तोच समाजाचा मुख्य भाग असतो. समाज जर निकोप घडवायचा असेल तर वैयक्तिक यशाइतकेच किंबहुना अधिक महत्व सामुहिक आनंदाला देता आले पाहिजे. सतत यशस्वी होण्य़ाच्या वेगवान शर्यतीपेक्षा जगणं समृद्ध असणं जास्त आवश्यक आहे. ‘कामात तल्लीन होणे’ हे सुदृढ मनाचं लक्षण आहे, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. (संदर्भ- पालकनीती) मग ते काम कोणतही असो. उत्तम श्रोता असणं, चांगला वाचक असणं, कलेचा रसिकतेने आस्वाद घेता येणं, निसर्गात रमता येणं, सामाजिक बदलांची जाण असणं, शिखरावर पोचलेल्या लोकांबद्दल निखळ भावना जपता येणं, खिलाडू वृत्तीने कौतुक करता येणं, स्वत:च्या क्षमता ओळखून आणि मर्यादा स्वीकारून मुक्त मनाने जगता येणं हे सुद्धा आयुष्याचं उद्दिष्ट्य असू शकतं, हे आजच्या पिढीला पालकांनी सांगायला हवं.

प्रसिद्ध लेखक प्र.के. अत्रे म्हणत, मी जीवनाच्या जत्रेत रमणारा माणूस आहे. जगण्यातलं वैचित्र्य टिपत, वेगळेपण अनुभवत, आजूबाजूच्या गमतीजमती पाहत, वेगवेगळे प्रयोग करत, कधी स्वत:त मश्गूल होत तर कधी कुणाची सोबत करत मजेत जगता येतं हे अशी माणसं त्यांच्या निर्मितीतून आपल्याला सांगून जातात. इतरांचही जगणं समृद्ध करून जातात. एका मुलाला अंगणात फुलपाखराचा कोश दिसतो. त्यातला सुरवंट बाहेर पडण्य़ाची धडपड करताना दिसतो तेव्हा ते न पाहवून आणि त्याचं लवकर फुलपाखरू व्हावं या आशेने मुलगा कोश कापून टाकतो. सुरवंट बाहेर तर पडतो पण त्याचे पंख खुरटलेलेच राहतात. तो उडू शकत नाही. त्याची कोशाबाहेर पडण्याची धडपड ही त्या सुरवंटाची शक्ती वाढवण्य़ासाठी आवश्यक होती, तो टप्पा अनुभवताच न आल्याने त्याचं खर्‍य़ा अर्थाने फुलपाखरू झालच नाही. जगण्यातला टप्प्यांचा आनंद घेऊ न देता, घडण्य़ातली अनुभूती जाणवू न देता जेव्हा आजच्या पिढीला आपण स्पर्धेच्या नादात लवकर फुलपाखरू होण्य़ासाठी भाग पाडतो तेव्हा ती खरं तर खुरट्या पंखांची कीटकं होतात. त्या पंखांना स्वत:चे रंग लेवून विहरण्य़ातला आनंद आपण आता तरी देणार का?
 ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, February 13, 2015

जनरेशन गॅप - प्रेम म्हणजे


" किताबोसे जो जाती राबता था..आज टूट गया है.. लेकिन ..किताबे गिरने उठाने.. के बहाने जो रिश्ते बनते थे .. उनका क्या होगा.." कवी गुलजार सहज शब्दात एक वस्तुस्थिती सांगून जातात. आजच्या इंटरनेट युगात पुस्तकं आपल्याला दुरावलीत, साहजिक त्यांच्यामुळे जुळणारी नाजूक नातीही संपली. अर्थात ती नाती सोशल नेटवर्किंग, कॉलेजमधलं गॅदरिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून जुळत असतात पण पुस्तकांनी दिलेला भक्कम वैचारिक पाया या नात्याला कुठून मिळणार! कालच्या पिढीतल्या कित्येकांचं समंजस प्रेम नैतिक दडपणामुळे अव्यक्त राहिलेलं तर कित्येकांचं आर्थिक, सामाजिक तफावतींमुळे वडीलधार्‍यांनी अस्वीकृत केलेलं.

आजची पिढी या बाबतीत बिनधास्त आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड ,ब्रेकअप हे शब्द सर्रास वापरणारी. मात्र आजच्या पिढीला खरच ’प्रेम’ या शब्दाची उंची, खोली आणि व्याप्ती धड कळते तरी आहे का! प्रेमातला गोडवा, त्यातली हुरहूर, त्यातली असोशी आणि त्याचं गांभीर्य....यातलं किती झिरपतय आजच्या पिढीपर्यंत! ’प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच आमचं सेम असतं’ असं कवी पाडगावकर म्हणतात. प्रत्येक पिढीची ’प्रेम’ ही भावना, गाभ्यामधे ’सेम’ असेलही पण प्रेमाकडे पाहण्याची पिढीनुसार बदलणारी मानसिकता समजून घ्यायची असेल तर चित्रपटगीतं ऐकावीत. ’छोड दो आचल, जमाना क्या कहेगा’ अशी तेव्हा धीट पण आता मर्यादशील वाटणारी प्रेमगीतं केव्हाच कालबाह्य झाली. ’बाहोमे आ सोणीये बस एक रात के लिये..तू मेरा हीरो’ अशी आजची गाणी आहेत. ’जनम जनम का साथ ’ वरून ’बस एक रात’ म्हणजेच ’चले तो चांद तक..नही तो शाम तक’ इथपर्यंत प्रेम या संकल्पनेची व्याख्या ठिसूळ होत जाताना दिसतेय. बॉयफ्रेंडने फेसबुक वरील त्याचे ’कमिटेड’ हे स्टेटस बदलून ’सिंगल’ असे केले. हा ’धक्का’(!) सहन न होऊन अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीने मध्यंतरी आत्महत्या केली. आपण अपलोड केलेल्या फोटोला मिळणारे लाईक्स आणि ’कमेंट’ हा आता मुलांसाठी जणू जीवनमरणा इतका महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. एकतर्फी प्रेमातून घडणार्‍या हल्ल्यांच्या, मैत्रिणीच्या नकळत तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिला अंकित करायचे एक शस्त्र म्हणून तो वापरल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत.

या सगळ्यामागे कारण एकच.. प्रेम, मैत्री आणि शारिरीक आकर्षण या शब्दांमधल्या सीमारेषा अपरिपक्व वयातील मुलांना स्पष्ट समजलेल्या नाहीत. ते नातं तुटलं की त्याचे परिणाम अभ्यास, करियर, घर यावर तर होतातच पण त्या व्यक्तीला आयुष्यभर भोगावे लागतात. आजच्या पिढीला सांगायला हवंय की ’प्रेमात पडणं’ ही आयुष्यातली अत्यंत सुंदर आणि महत्वाची घडामोड असली तरी प्रेम म्हणजेच आयुष्य नव्हे. कवी संदीप खरे दोन ओळीत  प्रेमाचे सार सांगून जातात..
’प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी’
प्रेमाची पहिली पायरी त्यागाची असते. आयुष्यातल्या प्राथमिकता ओळखून मनाला जीवनाशी जोडण्याचे जे नैसर्गिक नियम असतात ते पाळले गेले तर ते खरे प्रेम. जिथे नकारात्मकता असते, प्रेम दूर जाण्याची सतत भिती असते, स्वत:मधल्या त्रुटी स्वीकारून नकार पचवण्याची ताकद नसते, ते प्रेम नाहीच असे अभ्यासक म्हणतात. मुलांनी स्वत:लाच प्रश्न विचारावा, हे फक्त आकर्षण तर नाही? यात आपला स्वार्थ आणि अहंकार तर दडलेला नाही ना? प्रतिसादाचा अट्टाहास तर नाही? कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांना साथ देऊ शकू का? नसाल तर पुढचं पाऊल टाकू नका कारण तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे अजून समजलेलं नाही.

 दोष फक्त तरूणाईचा नाही. प्रेम या कल्पनेभोवती माध्यमातील जाहिरातींच अर्थकारण केंद्रित झालं आहे. प्रेमाच्या वेष्टनात गुंडाळून जर एखादं उत्पादन बाजारात आलं तर ते हातोहात खपतं. साहजिकच आजच्या पिढीला आपल्या आजूबाजूला फक्त प्रेमाचं फास्टफूडसारखं ’इन्स्टंट’ स्वरूप दिसतय. पालकांनी मुद्दाम वेळ काढून माध्यमांवरून कोसळणार्‍या माहितीतून नेमके काय घ्यायचे, कुठे थांबायचे हे मुलांना सांगायला हवे. पौगंडावस्थेतील मुलांशी लैंगिक शिक्षणाबाबत बोलायला संकोच वाटत असेल तर kidshealth.org सारख्या अनेक संकेतस्थळांची, वैद्यकीय तज्ञांची, समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. बाहेरून चुकीची माहिती मिळण्यापेक्षा योग्य ती माहिती मुलांना योग्य पद्धतीने दिली तर ’धोक्याची वळणं’ नीट पार करता येतील. मुलांमधे या वयात साठून राहिलेली प्रचंड उर्जा एखाद्या चांगल्या उद्देशाकडे, छानशा छंदाकडे वळवता आली तर बसता उठता प्रेमात पडण्यापेक्षा अधिक उदात्त ध्येय त्यांच्या आयुष्याला लाभेल. त्यातूनही प्रेमात पडलीच तर निदान ही मुलं या भावनेला पुरेशा गांभीर्याने समजू शकतील, कारण प्रेम नावाचं वादळ आयुष्यात काही परवानगी घेऊन येत नाही. मात्र त्यांना हे कळेल..की फक्त whatsapp वर एकमेकांना गुलाब पाठवण्याइतकं प्रेम सोपं नाही, उठसूट ’लव्ह यू, हेट यू’ म्हणण्याइतकं बालीश नक्कीच नाही.

प्रेम म्हणजे अनावर ओढ हे तर खरच पण तेवढच नाही, प्रेम एकमेकांचा आदर, प्रेम म्हणजे सन्मान, प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे एकमेकांच्या साथीने रूजणं आणि वाढणं, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे तपस्या.. आयुष्यातल्या एकेका अनुभवाबरोबर ही व्याख्या प्रगल्भ होत, बदलत जाते, त्याची अंतिम व्याख्या होऊ शकत नाही कारण ही भावनाच मुळी शब्दांच्या पलीकडली आहे.

Friday, January 30, 2015

जनरेशन गॅप - माध्यमं


सणाच्या दिवशी घरात आणलेला श्रीखंडाचा डबा उघडून त्याचा आस्वाद घेणार तोच त्या छोट्या मुलाला आई दटावते," तुला कितीदा सांगितलय, आधी फोटो काढायचा, अपलोड करायचा मग खायचं". हा बोचरा विनोद बहुतेकांनी ऐकला असेल. बुडत असलेल्या माणसाला वाचवायचं सोडून त्याचा व्हिडीओ काढणा‍र्‍या किंवा त्या पार्श्वभूमीवर ’सेल्फी’ काढणार्‍या महाभागाच व्यंगचित्र देखील पाहण्य़ात आलं असेल. ही काहीशी टोकाची परिस्थिती मानली तरी हे मात्र खरं की गेल्या पिढीत मिडीया अर्थात माध्यमांचं आयुष्यातलं स्थान हे जेवणातल्या चटणी कोशिंबीरीएवढं होतं.

आताच्या पिढीचं तर आयुष्यच माध्यमकेंद्री झालेलं आहे. माध्यमांच्या या विस्फोटामुळे माणूस माणसापासून दुरावला, वाचनसंस्कृती लोप पावली, सायबर गुन्हेगारी वाढली असे आरोप आजच्या पिढीवर होत आहेत. त्यात काही अंशी तथ्य असले तरी खरं तर ही दोन पिढ्यातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो, त्याची निष्पत्ती आहे. (उदाहरणार्थ एके काळी रेडिओ ऐकणारा तरुण ‘वाया गेलेला’ मानला जात असे हे आज हास्यास्पद वाटते.) तंत्रज्ञानाला नेमकं कसं सामोरं जावं, कसं हाताळावं, त्याचे भलेबुरे परिणाम काय हो ऊ शकतात हे कळायच्या आत ते वेगाने माध्यमांमार्फत आपल्यावर येऊन आदळलं हे या अपरिपक्वतेमागचं मूळ कारण लक्षात घ्यायला हवं.

१४५० साली गटेनबर्गने छपाईयंत्र बनवले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात दूरसंदेश(telegraph) दूरध्वनी (telephone) व छायाचित्र (photography) असे तीन महत्वाचे शोध लागले. ल्युमिए बंधूंनी बनवलेला कॅमेरा,जॉन लोगी बेअर्डने केलेले दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक ह्या महत्वाच्या घडामोडींमुळे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात नभोवाणी आणि दूरचित्रवाणी प्रस्थापित झाली. या सुमारास आपला देश स्वातंत्र्यलढ्य़ात गुंतलेला होता. साहजिक भारतात कोणतेही तंत्रज्ञान पोचायला बराच कालावधी जावा लागला त्यामुळे विकसित राष्ट्रे जशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने भौतिक प्रगती करत गेली तसे आपले झाले नाही. तंत्रज्ञान तयार मुलासारखे हातात दिल्याने त्याच्याशी आपली नाळ जुळलेली नाही, त्याच्याशी नाते जुळायला आणखी वेळ लागणार तोवर थोडॆफार सामाजिक आणि सांस्कॄतिक धक्के बसणार. माध्यमं आणि आजची पिढी एकमेकांसह जगायला अद्याप शिकत आहेत. खरा संवाद फक्त भेटल्यावरच होतो, असं आजची पिढी आता मानत नाही. कॉलेज, क्लासेस, नोकरी, व्यवसाय सांभाळण्य़ाच्या धावपळीत घर, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही जपायचं हा तोल सोपा नाही. मग व्हॉटसअॅप किंवा सोशल मिडीया हा आधारच नाही का. कधी गप्पा, कधी मस्करी, कधी चर्चा, इमोजी हे ’व्यक्त होणंच’ आहे. सोशल मिडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य व्यक्तीला व्यासपीठ मिळवून दिलं. याचा सकारात्मक वापर करून जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. पिकासा, फोटोबकेट सारख्या फोटो शेअरिंग साइट्सवरुन जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते. वेगवेगळ्य़ा विषयांवर ब्लॉग लेखन करण, लेखावर प्रतिक्रियेच्या द्वारे चर्चा करणं यातून उलट आजची पिढी अधिक संवादी हो ऊ लागली आहे.

 मागची पिढी अधिक वाचन करायची पण ती पिढी ’काय’ वाचायची हे ही पाहायला हवे. वाचन फक्त आजच्या पिढीने करावं अशी अपेक्षा करणारी मागची पिढी, टीव्हीला खिळल्याने आपलं वाचन कमी झाल्याची कबुली देत नाही. वाचनाच्या स्वरूपापेक्षा पुस्तकांशी संपर्क येणं हे जास्त महत्त्वाचं नाही का! मौखिक परंपरेपासून छापील पुस्तकांपर्यंत आणि आता ई बुक, ऑडीओ बुक, वर्तमानपत्रांचे अ‍ॅप्स किंवा किंडल पर्यंत माध्यम बदलत वाचन पुढे जातेच आहे. थोड्क्यात आज वाचनसंस्कॄती लोप पावत नसून बदलते आहे इतकेच. ई-साहित्य संमेलनांसारखे सुखद बदल होत आहेत. मात्र आजची पिढी ही सादरीकरणाकडे जितके लक्ष देते तितके आशयाला देत नाही. कार्यक्रमाची बौद्धिक पातळी कमी ठेवली की प्रेक्षकसंख्याही वाढते. बाईटस (त्वरित प्रतिक्रिया) देण्य़ाच्या नादात अविचारीपणे, अभ्यास न करता मते मांडण्य़ाचे खूळ लागते. यामुळे माध्यमे ‘पोकळ’ होऊ लागली आहेत. शिवाय त्यांच्यावर अभारतीय भांडवलशहांची मालकी असल्याने ’काय दाखवावे’ याची सूत्रे त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या (अ)नैतिकतेच्या व्याख्या भारतीयांवर सतत लादल्या जात आहेत. भारत हा ’देश’ म्हणून एकसंध राहण्य़ाऐवजी बाजारपेठ कसा बनून राहील यातच त्यांना जास्त रस आहे. या सगळ्य़ात आजच्या पिढीचा वैचारिक गोंधळ होतो आहे. त्याची परिणीती माध्यमांचा उपयोग अफवा, अंधश्रद्धा, अश्लीलता पसरवण्यासाठी किंवा अगदीच बाळबोध पणॆ करणार्‍यांची संख्या वाढण्यात होते आहे.

 ही समज खर तर ज्यांनी वाढवायची ती मागची पिढी आत्ता कुठे तंत्रज्ञान वापराचे धडे आजच्या पिढीकडून बिचकत बिचकत घेते आहे. त्यांचा यात दोष नाही पण मग तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित करणार कोण? त्यासाठी शालेय स्तरापासून प्रशिक्षण द्यायला हवे आहे. योग्य सायबर वापरासह, कायद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवायला हवी आहे. पारंपारिक माध्यमे आजही जगण्याला आशय आणि प्रेरणा देत आहेत, त्यांचे जतन होणे अतिशय महत्वाचे आहे. माध्यमांच्या झंझावातात मूल्ये उन्मळून पडायला लागली असतील तर ती जपण्याची आणि स्वानुभवावरून शहाणं होऊन भावी पिढीला माध्यमांसह जगण्याचा विवेक शिकवण्य़ाची जबाबदारी आता आजच्या पिढीची आहे. तरच या भरकटलेपणातून आपण हळूहळू सावरू शकू. मग माध्यमांनी हिरावून घेतलेले आपल्या आयुष्याचे सुकाणू पुन्हा आपल्या हातात येऊ शकेल.
 ------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, January 16, 2015

जनरेशन गॅप - करियर


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी यावर आधारित हा स्तंभ लिहीता लिहीता जाणवले, एकाच व्यक्तीच्या मनात देखील स्वत:च्या जीवनातल्या ट्प्प्यांबाबत अशी दरी असते. वयपरत्वे अनुभवांती आपल्या सवयी, आवडीनिवडी , आचार-विचार अगदी मूल्य आणि श्रद्धा देखील बदलत जाताना दिसतात. मग जर स्वत:तले बदल आपण सहजतेने स्वीकारत पुढे जातो तर पिढ्यांमधील अंतराकडे आपण सहज वृत्तीने का पाहू शकत नाही. पालक होतेवेळेस आपली जी काय वैचारिक- मानसिक घडण झालेली असते ,त्याच मुशीत आपण मुलांना बसवू पाहतो. खर तर कालांतराने आपण पुन्हा बदलतो आणि मागे वळून पाहताना ’तेव्हा आपलं जरा चुकलच’ असं वाटू लागतं, तोवर उशीर झालेला असतो.

 मुलांचं करियर हा आजच्या पालकांच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील मुद्दा. स्वातंत्र्योत्तर पिढीला विनासायास नोकर्‍या मिळाल्या. पुलं च्या भाषेत सांगायचे तर, लोक एकदा का बँकेतल्या किंवा पोस्टातल्या नोकरीला चिकटले की तिथेच जन्म काढून मुलाला ’ग्रॅज्युएट’ करून आणि मुलीला ’उजवून’ घराला ’श्रमसाफल्य’ वगैरे नाव देणॆ हीच आयुष्य़ाची इतिकर्तव्यता मानत असत. मधल्या पिढीला त्यामानाने थोडा संघर्ष करावा लागला परंतु तोवर करियर हा शब्द अपवादानेच वापरला जायचा. आता मात्र तो परवलीचा शब्द झाला आहे. करियरची खरी व्याख्या, ’आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करणॆ’ अशी आहे. व्यवहारात मात्र ’लठ्ठ पगाराची नोकरी किंवा भरपूर नफा देणारा व्यवसाय’ म्हणजे करियर असे गृहीत धरले जाते. "पैसा कमावणे हे ध्येय असू नये असे नाही, उलट ते अतिशय महत्वाचे आहे पण ते एकमेव ध्येय नसावे. आयुष्यात नाती, छंद, कला, वाचन, सामाजिक भान, पर्यटन एकूणच जीवनानुभवांना मह्त्व नसले तर माणसात आणि यंत्रमानवात फरक तो काय" असे सांगणार्‍या पोस्ट्स पालक वाचतात, फक्त फॉरवर्ड करतात. जावई निवडताना मात्र तो शक्यतो ’आयटी’ तला असावा याची ते काळजी घेतात आणि मुलगा भलत्याच क्षेत्रात जाऊ नये याचीही. त्यासाठी ते खूप कष्ट घेतात. त्या बदल्यात, दहावीपर्यंत मुलाने अबॅकस पासून स्केटींग पर्यंत सर्व क्लासेस करावे, शिवाय भरपूर मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेज मधे प्रवेश मिळवावा, मग एकामागून दुसर्‍या ट्य़ूशन ला धावावे शिवाय आय आय टी किंवा तत्सम परिक्षांची तयारी करावी, बारावीला त्याहून चांगले गुण मिळवून इंजिनीयर वा डॉक्टर व्हावे (आणि स्कॉलरशीप वर परदेशी जाता आले तर मग गंगेत घोडॆ न्हाले.) अशा त्यांच्या ’सामान्य’ अपेक्षा असतात. पालकांच्या दृष्टीने यात चूक काय! चूक एकच, मुलाची कुवत समजून न घेणे. या अपेक्षा पूर्ण न करू शकलेली एक खंतावलेल्या मनाची पिढीच्या पिढी त्यातून घडते आहे. इतर अनेक कला कौशल्ये या मुलांमधे असू शकतात पण साचेबद्ध अपेक्षांच्या चक्रात प्रवाहाविरूद्ध काही करण्य़ाचे त्यांना भय वाटू लागते. अशी ’हरलेल्या मनाची’ मुले मूठभर जिंकलेल्या(!) मुलांकडॆ असूयेने पाहत जमेल ते काम करत आयुष्य रेटत राहतात.

हे बदलायचे तर करियरच्या वेगवेगळ्य़ा पर्यायांचा पालकांनी मनमोकळा स्वीकार केला पाहिजे. आंतरिक सुख आणि भौतिक गरजा यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न मुलांच्या हातात हात घालून केला पाहिजे. प्रख्यात विचारवंत जे. कृष्णमूर्ती पालकत्वाकडे अतिशय उंचावरून पाहतात. ते विचारतात की, आपल्याला मुले कशासाठी हवीत हा प्रश्न आई-वडील स्वत:ला कधी विचारतात का. आपले नाव पुढे चालावे, आपल्या इस्टेटीस वारस लाभावा एवढ्यासाठीच बहुतेकांना मुले हवी असतात. आपल्या समाधानाचे, आपली भावनात्मक गरज भागवण्याचे एक साधन अशीच मुलाकडे बघण्याची आपली दृष्टी असते. आपण मुलाकडे आपल्या स्वप्नपूर्तीचं अवजार म्हणून पाहाणं आधी बंद करू या. मुलाला समजावून घ्यायचे तर त्यात धिक्काराचा भाग त्यात येता कामा नये. त्या नात्यातही सन्मानच असायला हवा. कृष्णमूर्ती म्हणतात, पालक ज्याला प्रेम म्हणतात ते मालकी हक्काचेच दुसरे नाव आहे. आपल्या मुलावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे मन समजावून घेणे, ज्यायोगे त्यांची मने संवेदनशील होतील असे शिक्षण त्यांना देणे, त्यांच्या व्यक्तित्वात सुसंवाद होईल अशी जीवनदृष्टी त्यांना देणे. त्या आधी ती पालक म्हणून स्वत:त निर्माण करणे. त्यांचे विचार वाचल्यावर लक्षात येते की, आपल्या संस्कार, प्रेमाच्या कक्षा किती सीमित आहेत.

अब्राहम लिंकन यांनी गुरूजींना लिहीलेल्या पत्रात फक्त क्रमिक नव्हे तर जीवन शिक्षण देण्याचं आवाहन केलं आहे. या पातळीवर आपण आपल्या मुलातील परिवर्तन कधी बघतच नाही. जगात प्रेम, सद्भाव निर्माण करण्याची त्याचीही जबाबदारी आहे, समाजाप्रती त्याला उत्तम बांधीलकी जपता यायला हवी, साहित्य कलेतही त्यानं रमावं, भरभरून जगावं इतका उदात्त विचार आपण ’पॅकेज’ या शब्दात अडकल्यामुळे करूच शकत नाही. आपण केवळ आजच्या समाजमान्य प्रतिष्ठित पदांवरच मुलांनी जावे यासाठी धडपडत असतो. तुम्ही म्हणाल हे तत्त्वज्ञान मान्य असलं तरी शेवटी समाज ,’तुमचा मुलगा काय करतो’ हेच विचारणार ,’तुमचा मुलगा कसा आहे’ हे नव्हे, त्याचं काय? खरय, अशा वेळी पालक म्हणून आपण करायचं याचं उत्तर खलिल जिब्रानने त्यांच्या एका कवितेतून दिलं आहे...
 "तुम्ही सांभाळा मुलांचं शारीर अस्तित्व पण अधिराज्य नका गाजवू त्यांच्या आत्म्यावर
तुम्ही आहात केवळ एक धनुष्य ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेनं
तो धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा वाका आनंदानं ! बस इतकच !"

Friday, January 2, 2015

जनरेशन गॅप - आदर


’जनरेशन गॅप’ बद्दल विचार करणारं माझं सदर ’रस्सीखेच’. दिव्य मराठी मधुरिमा मधे २०१५ जाने ते डिसें या कालावधीसाठी. त्यातील लेख...

 हॅपी संक्रांत’ असे म्हणून शेजारच्या चिमुरडीने मला नमस्काराऐवजी शेकहँड केला आणि मी दिलेली तिळगुळाची वडी घेऊन ती पळाली. अशा वेळी गंमत वाटते. ’कसा का होईना’ पण सणाचा संदर्भ आजची पिढी जपते आहे म्हणून हसावं की अशा विचित्र पद्धतीने शुभेच्छा देते आहे म्हणून रडावं, असा प्रश्न पडतो. मला वाटतं ’वेष्टना’पेक्षा गाभा मह्त्वाचा हेच याचं उत्तर असायला हवं.

मोठ्यांचा आदर करावा, हे प्रत्येक पिढीला लहानपणापासून शिकवलं जातं. जगातला कुठलही देश याला अपवाद नाही. त्यातून आपली संस्कृती माता, पिता आणि गुरूजनांबरोबरच ’अतिथी देवो भव!’ सुद्धा म्हणणारी. साहजिकच आपल्या देशात आणि संस्कृतीत ज्येष्ठांविषयी आदर व्यक्त करणं हे आजवर अंगभूत कर्तव्य असायचं. कुटुंब प्रमुखांचा निर्णय अंतिम असायचा. वडीलकीच्या नात्याने त्यांनी घालून दिलेले नियम पाळले जायचे. त्यात चूक झाली तर शिक्षा केली जायची. ही शिक्षा देखील शिस्तीचा भाग असे, ती प्रसंगी कठोर असली तरी त्या बाबतीत मधे पडायची कुणाची बिशाद नसे. शेवटी आई किंवा आजीचा मायेचा हात अंगावरून फिरला की बांध फुटत असे आणि त्यात सारे दु:ख लोप पावत असे. या सगळ्यातून शिस्तीचं महत्व, संयम, सहनशीलता असं बरच काही शिकायला मिळायचं. पुढच्या आयुष्यात ही पुंजी कामी यायची. अर्थात आईवडिलांबद्दल किंवा एकूणच वडीलधार्‍यांबद्दल वाटणार्‍या ’आदर’ या शब्दाखाली, बर्‍याच प्रमाणात ’भीती’ दडली होती. या भीतीने कित्येक बालपणं काळवंडून गेली, अनादर नको म्हणून न पटणारे निर्णय खालच्या मानेने स्वीकारणारी कित्येक व्यक्तिमत्व फुलायच्या आधीच कोमेजून गेली, हे नाकारता येत नाही. तरीही काळाबरोबर हा धाक आणि त्याच बरोबर ’आदर’ही उणावतो आहे ह्याची आजच्या पालकांना फारच काळजी वाटते आहे.

या संदर्भात नुकताच वाचनात आलेला, साठ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग सांगावासा वाटतो. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा मुलगा दिनकर कर्वे यांच्या घरी काहीतरी समारंभ होता. दिनकर कर्वे यांचे मोठे बंधू शंकर कर्वे त्यासाठी आफ्रिकेहून पुण्याला आले होते. घरात पाहुणेमंडळी गप्पा मारत होती. साठीच्या वयाचे शंकर कर्वे गप्पा मारताना एकीकडे धूम्रपान करत होते. अचानक ते उठले आणि त्यांनी चटकन सिगरेट विझवली आणि घाईघाईने ऍश ट्रे मधे टाकून दिली. ’काय झाले’ असे त्यांना कुणीतरी विचारले त्यावर त्यांनी दाराकडे इशारा केला. नव्वदीला पोचलेले अण्णासाहेब दारातून आत येत होते. आधीच्या पिढीच्या दृष्टीने ही कृती अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि आदर्श मानली गेली असती. आजची पिढी या प्रसंगाकडे काहीशा वेगळ्या दृष्टीने पाहते. आदर म्हणून मुळात त्यांनी वडिलांना न रूचणारी गोष्ट करणं (म्हणजेच उदा: सिगारेट पिणं,) बंद केलं का? नाही. मग फक्त तोंडदेखला आदर दाखवणं हा दांभिकपणा नव्हे काय? हल्ली बरीच मुलं वडिलांना ’ए बाबा’ म्हणू लागली आहेत. आईला ’अगं आई’ म्हणण्यामागे अधिक जवळीक आणि आत्मीयता असते असे म्हटले जायचे. मग वडील-मुलांच्या नात्यातला पूर्वीचा ताण जाऊन, ते नाते एकेरी उल्लेखाने अधिक मोकळे होत असेल तर त्याला अनादर न मानता केवळ संबोधनात्मक बदल म्हणून सहज स्वीकारायला हवे. मात्र डेल लॅपटॉप च्या जाहीरातीतील मुलगी बापाला चक्क ’ट्यूबलाईट’ म्हणते. (पूर्वीच्या तीर्थरूपांनी कानाखाली आवाज काढला असता) तेव्हा मोकळेपणा आणि उद्धटपणा यातला फरक पालकांनी मुलांना नीट सांगायलाच हवा.

 आजच्या पिढीच्या वागण्यातली बेफिकीरी, ’हू केअर्स’ असे चेहर्‍यावरील ’उर्मट’ भाव घरातल्या वडीलधार्‍या मंडळींना असह्य होतात. कुणालाही अरे तुरे करणे, आपल्या शिक्षकांचा एकेरी उल्लेख करणे, ’टीचर आली, ती म्हणाली’ हे ऐकताना कससच वाटतं. पण त्यात अपमानाचा हेतू नसून बर्‍याचदा भाषेचा गोंधळ असतो. (पालकांनीही प्रामाणिकपणे आठवून पाहावे की आपल्या शाळेच्या दिवसात आपण शिक्षकांना काय काय ’विशेष’ नावे ठेवली होती आणि आपापसात आपण त्या नावांचा सांकेतिक वापर करत काय धमाल करत असू.) शिवाय ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे शिक्षक आता खरोखरच किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे. त्यामागे सामाजिक कारणेही असतील परंतु बहुसंख्य शिक्षक आता ’पोटार्थी’ झाले आहेत. अजूनही ज्या शिक्षकांचे आपापल्या विषयांवर प्रभुत्व असते आणि शिकवण्याची आच असते त्यांना विद्यार्थीप्रियता आणि सन्मान नक्कीच लाभतो.
 सणसमारंभात भेटणार्‍या, घरी पाहुणे म्हणून आलेल्या ज्येष्ठांना मुलं योग्य तो सन्मान देत नाहीत, त्यांच्याशी नीट बोलत नाहीत, तसे बजावले तर त्यांना लगेच ’बोsssर होतं’, असे आरोप देखील आजच्या पिढीवर होत आहेत.
खरं आहे. परंतु काही पालक वृद्ध मंडळींसमोर उसनं हसून मग त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल पाठीमागे नकारात्मक बोलत असतील तर तो खोटा आदर तरी काय कामाचा!

आजच्या पिढीची आदराची अभिव्यक्ती बदलली आहे. परवाच एका चित्रपटगृहात पाहिलं, टीनएजर मुलांचा गट तिथल्या बाकांवर बसून आधीचा सिनेमा संपण्याची वाट पाहत गप्पा मारत होता. काही वयस्कर स्त्रिया तिथे आल्या, एकही बाक रिकामा नव्हता, पण त्यांना पाहून त्या मुलांनी न सांगता चटकन आपले बाक रिकामे केले. आदर वाकूनच व्यक्त होतो असे नाही, साध्या सोप्या देहबोलीतूनही व्यक्त होतो. वाढत्या वयाबरोबर परिपक्वता येते, त्या अनुभवाच्या बोलांचा आजच्या पिढीने उपयोग करून घेतला पाहिजे. दुसरीकडे थरथरत्या वृद्ध हातांना आधार द्यायला तरूणाईची काठी आवश्यक आहे. मात्र श्रेष्ठत्व वयावर अवलंबून असावं की विचारांवर आणि कर्तृत्वावर? आजची मुलं म्हणतात, "तुम्ही केवळ आमच्या आधी जन्माला आलात म्हणून तुम्ही थोर झालात का?"

खर तर सामान्य व्यक्तीच्या आतला ’माणूस’ मोठा असला तर त्याचा आपसूक सन्मान होतो. एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन अद्वितीय कामगिरी करणार्‍यांना समाजाच्या सगळ्या स्तरातून मान मिळतो. मूल्य स्वीकारणं, समजून घेणं आणि ती मुलांसमोर स्वत:च्या कृतीतून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. ती पालकांना ,गुरूजनांना ,वडिलधार्‍यांना कष्टपूर्वक साध्य करायला हवी तरच त्यांचा आदरयुक्त धाक वाटेल. आजच्या पिढीची धारणा हीच आहे की ’आदर हा कमवायचा असतो, ती केवळ वंशपरंपरेने, वयपरत्वे किंवा मागून मिळणारी गोष्ट नाही आणि नसावी...’