’उन उन खिचडी साजूक तूप.. वेगळं व्हायचं भारीच सुख’ अशी विसूभाऊ बापट यांची एक कविता आहे. विभक्त कुटुंबात हवं तसं जगता येतं असं ध्वनित करणारी. "हल्लीच्या पिढीला माणसं नकोत, आमच्या वेळी पंधरा वीस माणसं घरात असायची, आम्ही केलच ना सार्य़ांचं..., यांना मात्र कसलीच जबाबदारी नको, नुसतं स्वातंत्र्य हवं.. "असा काहीसा तक्रारीचा सूर मागच्या पिढीचा असतो. आजही कुटुंबसंस्था हा भारतीय जीवनपद्धतीचा कणा आहे त्यामुळे एकत्र कुटूंबाचं रूपांतर विभक्त कुटूंबांमधे होत जाणं हा समाजाच्या दॄष्टीने अतिशय संवेदनशील मुद्दा आहे.
ग्रीक आणि भारतीय संस्कॄती काहीशा समकालीन पण ग्रीक संस्कृती लयाला गेली. याची कारणं शोधताना तेथील संशोधकांना असे आढळले की, कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली म्हणून ग्रीक संस्कृतीचा -हास झाला. म्हणजेच भारतीय संस्कृती टिकण्य़ामागे आपली कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे. अमेरिका आणि इंग्लंडमधे अनेक वंशांचे लोक राहतात. या लोकांमध्ये भारतीय लोक सर्वात समाधानी आणि संतुलित असल्याचे आणि त्याचे कारण देखील भारतीय कुटुंब व्यवस्थेमधेच दडले असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. एकूण तेथील वाढ्त्या एकल पालकत्वापेक्षा विभक्त (न्यूक्लीअर) का होईना पण कुटुंब असायलाच हवे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातले सर्वजण एकोप्याने जवळ राहत.फक्त सणासुदीला किंवा काही उत्सवाच्या निमित्ताने एकत्र न येता, दु:ख, संकटे, अडचणीत एकमेकांना साथ देत. आर्थिक बचत होई. वाटून घेण्य़ाची सवय होई, मुख्य म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होत असे बरेच फायदे सांगता येतील. पूर्वी शेतीप्रधान जीवनपद्धती असताना आणि माणसांची पोच पंचक्रोशीपर्यंत असताना हे सारे सहजसाध्य होते.
त्याच वेळी या कुटुंबपद्धतीचे अनेक तोटेही होते. या सगळ्य़ात अनेक जणांना वैयक्तिक महत्वाकांक्षांचा बळी द्यावा लागे, घरातल्या वडीलधार्या किंवा सर्वाधिक उत्पन्न असणार्या व्यक्तीच्या हातात सर्व सूत्रे असत. कमी उत्पन्न मिळवणार्यांना, किंवा स्वभावाने गरीब असणार्यांना मिंधे आयुष्य जगावे लागे, स्त्रियांचा मानसिक कोंडमारा होई. स्वत:च्याच नवर्या-मुलांसह मोकळेपणे वेळ घालवणे अशक्य असे. एकत्र कुटुंबासाठी धूरभरल्या अंधार्या स्वयंपाकघरात किलोकिलोच्या पोळ्य़ा करण्य़ात आपल्या आईचे आयुष्य करपून गेल्याची खंत लेखक जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. ती प्रातिनीधीक आहे. ’करियर’ हा शब्द व्यवहारात आल्यावर यानंतरच्या पिढीत भल्यामोठ्या कुटुंबांची आपोआपच लहान कुटुंब झाली. तेव्हाही दोन पिढ्यांमधे अशीच रस्सीखेच घडून आली.
आता तर ही लहान कुटुंबे अजून लहान होत चौकोनी किंवा त्रिकोणी झाली आहेत. साधारणपणे या स्थित्यंतरासाठी सरसकट आजच्या पिढीला जबाबदार धरलं जातं, त्यांना स्वार्थी, आत्मकेंद्री अशी दूषणं दिली जातात. खरच आजची पिढी अशी आहे का! या बदलाची बहुतेक कारणं परिस्थितीजन्य आहेत, वास्तव आहेत. कामापुरतं आईबापाला वापरून घेऊन मग त्यांच्याकडे पाठ फिरवणार्या, उतारवयात त्यांना वार्य़ावर सोडणार्या काही कॄतघ्न मुलांच्या कहाण्य़ा बातम्यातून आपल्या समोर येतात, क्वचित आजूबाजूला दिसतात. मात्र अशी मुलं मागच्या पिढीत नव्हतीच का! तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातलं इतर कुणीतरी त्यांची जबाबदारी स्वेचछेने अगर नाईलाजाने घेत असे ,त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची राहत असे इतकच. मला वाटतं, माणसं प्रत्येक पिढीत तशीच असतात, चांगली आणि वाईट दोन्ही. बदल होतो तो दॄष्टीकोनात आणि परिस्थितीत. आता आर्थिक रेषेखाली जगणारी कुटुंबे कच्च्याबच्च्यांसह हातावर पोट घेऊन जमेल तसे आणि जमेल तिथे जगत असतात. धनिक वर्गात बहुतेक वेळा इस्टॆटीच्या वादामधून कुटुंब विभक्त होतात. मध्यमवर्गातले पालक मुलांना उच्चशिक्षण देऊन मग करियरसाठी परदेशात किमान महानगरात पाठवतात. इथून पुढे त्यांचे एकत्र राहणे अवघड होत जाते. भौगोलिक, सांस्कॄतिक फरक, जागेची अडचण, व्यक्तीस्वातंत्र्याच्या बदलत्या कल्पना, जगण्य़ाची वेगवेगळी उद्दिष्ट्य़ अशी अनेक कारणं यामागे असतात. याशिवाय हेकेखोरपणा, आपली मते लादणे, संशयी, संतापी किंवा विचित्र स्वभाव असे स्वभावदोष सुद्धा संबंधांमधे वितुष्ट आणतात. असे प्रश्न किंवा दोष कोणा एकाच पिढीमधे नाही तर व्यक्तीसापेक्ष असतात, असे असताना फक्त आजच्या पिढीला खलनायक का ठरवले जाते! त्यापेक्षा यावर उपाय शोधले जावेत.
शहरांमधून काही सहनिवास खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधले गेले आहेत, वयस्कर मंडळींसाठी सुद्धा डॆ केअर सेंटर सुरू करण्य़ात आले आहेत. या सोयी नेहमीच परवडतील आणि रूचतील असे नाही, अशांना समवयीन गट करून एका जागी राहता ये ईल, आवडणार्या किंवा सामाजिक उपक्रमाला वाहून घेता ये ईल. ’वसुधैव कुटुंबकम’ हे सूत्र स्वीकारून आपला परीघ वाढवता येईल. आपल्या घरात, मुला-नातवंडात आनंदाने जगण्य़ाला सुख म्हणायचे की या बदलांना, हे त्या व्यक्तिच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मात्र पटॊ ना पटॊ, ही जीवनशैली येत्या काळाची अपरिहार्यता असणार आहे. पाळणाघरांच्या प्रमाणात वृद्धाश्रम पण वाढणारच हे एक कटू सत्य आहे. आज घरोघरी एक-दोनच मुले, ती आकांक्षांचे पंख लावून उडून गेली की रिकाम्या घरट्यात उरलेल्या दांपत्याला जगण्य़ाचे वेगवेगळे पर्याय खंत न करता खुल्या मनाने, उमदेपणाने स्वीकारता आले पाहिजे. अर्थात परिस्थिती अजून तरी टोकाला गेलेली नाही. शादी डॉट कॉमने केलेल्या सव्र्हेमध्ये असे दिसून आले आहे की समाजाच्या विविध स्तरांतल्या, विविध कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या सुमारे ५४ टक्के मुली आणि ५३ टक्के मुलांना एकत्र कुटुंबात म्हणजेच सासू सासरे किंवा आईवडीलांसह राहण्य़ाची इच्छा आहे. आजच्या काळातल्या मुलींना नोकरी करायची असते, वाढते खर्च बघता मुलांनाही बायकोने नोकरी करणे आवश्यक वाटते. मग या सुनांना आणखी जबाबदाऱ्या सांभाळणे शक्य नसते. लग्नानंतर मुलांना सांभाळणं हा मुद्दाही असतोच. अशी अनेक कारणं या निर्णया मागे असतील. सुनेकडून पारंपरिक अपेक्षा पूर्ण होणार नाहीत पण पालकांनाही आपल्या माणसात राहिल्याचा आनंद मिळेल, आधार मिळेल. तडजोडीच्या पार्श्वभूमीवर का असेना हे सर्वेक्षण दिलासादायक आहे.
भावी पिढीच्या मनस्वास्थ्यासाठी तरी कुटुंबसंस्था टिकवायलाच हवी. हे आव्हान पेलतानाच एक लक्षात घ्यायला हवे की कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणं नव्हे. कुटुंब म्हणजे एकत्र नांदणं. एकाच घरातल्या माणसांच्या मनांमधलं अंतर जर खूप असेल तर त्या एकत्र कुटुंबाला विभक्त मानायला हवं, याउलट भौगोलिक अंतर जास्त असूनही मनं जोडलेली असतील तर ते खरं एकत्र कुटुंबच. नाही का!
No comments:
Post a Comment