Friday, May 8, 2015

जनरेशन गॅप - विज्ञान


"भगवान की लीला" सांगणारा एक मेसेज आला, त्यात हा मेसेज अमुक जणांना पुढे पाठवला तर माझी कशी भरभराट होईल आणि नाही पाठवला तर माझं कसं वाईट होईल असही लिहीलं होतं. खंत याची वाटली की मेसेज पाठवणारा महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासात हुशार, स्मार्टफोन आणि त्यावरील वेगवेगळे अ‍ॅप्स सहजपणे वापरणारा. भक्ती हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे मात्र असे शाप(!) देणारे मेसेज अंधश्रद्धेला खतपाणी घालतात हे समजण्याइतका विवेक त्याच्या जवळ का नसावा. "ग्रहण होतं म्हणून इंटरव्ह्यूला नको जाऊस असं आई म्हणाली" असं एखादी पदव्युत्तर पदवी घेणारी विद्यार्थिनी सांगते तेव्हा काय बोलावं कळेनासं होतं. आजची पिढी स्मार्ट किंवा आधुनिक आहे असं आपण म्हणतो ते त्यांच्या स्टाईलिश राहणीवरून, चटपटीत वागण्य़ावरून, तंत्रज्ञान सहजतेने वापरण्य़ावरून. वृत्ती आणि विचारांनी देखील ही पिढी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोन बाळगणारी असती तरच त्यांना खर्‍या अर्थाने स्मार्ट म्हणता आले असते. अपवाद वगळता तसं झालेलं दिसत नाही. त्यांच्यावर बुद्धीवादाचे संस्कार करताना मागची पिढी कुठेतरी कमी पडली असावी का!

 आपल्याकडे विज्ञानाची कास धरणे म्हणजे अध्यात्मापासून दुरावणे असा एक अपसमज आहे. जिथे प्रेम, सहवेदना, मानवता, करुणा, त्याग अशी मूल्य मानली आणि जोपासली जातात ते खरे अध्यात्म. मग ते विज्ञानाच्या वाटेत आडवे येईलच कसे. ते सहप्रवासी का होऊ नयेत! चिकीत्सेची भिती असते ती फक्त अंधश्रद्धेला, खर्‍या अध्यात्माला नव्हे. आपल्या पाल्यावर धार्मिक संस्कार करताना त्यातील ’उत्कट भव्य तेचि घ्यावे मळमळीत अवघे टाकावे ’ याचा विचार पालक फारसा करत नाही. श्रद्धेचा निकष ज्ञान असाय़ला हवा. श्रद्धा तपासायला हव्यात, कालबाह्य श्रद्धांचा त्याग करायला हवा. पाकिस्तानसारख्या देशात तर धार्मिक कडवेपण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे इतके झिरपत गेले आहे की त्याची परिणीती जिहादी तरूणांच्या दहशतवादी संघटनांमधल्या वाढ्त्या संख्येत होताना दिसून येते आहे. त्याने देशाच्या आणि धर्माच्याही प्रगतीला खीळ बसते आहे. आपणदेखील आपल्या गौरवशाली इतिहासाच्या साखरझोपेतून बाहेर पडून जगाकडे उघडणा‍र्‍या खिडकीतून बाहेर बघायला फारसे उत्सुक नाही.

 या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईत झालेल्या अखिल भारतीय सायन्स कॉंग्रेसच्या एका परिसंवादात राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी सुमारे तीन हजार वर्षापूर्वी भारतात विमानं उडत होती, ती आजच्या विमानांपेक्षा आधुनिक होती, असे दावे केले गेले. त्यासाठी वेद-पुराणातील दाखले दिले गेले. भारताने आज स्वबळावर यशस्वी केलेल्या चांद्रयान आणि मंगळ मोहिमेऐवजी पुराणांची चर्चा झाली. पुराणकाळातील विमानाचे अवशेष कुठल्याही उत्खननात सापडलेले नाहीत. विज्ञानात, कोणत्याही संशोधनात प्रमाण किंवा पुरावे असावे लागतात. असे दावे विज्ञान परिषदेत स्वीकारले जाऊ शकत नाहीत. शिवाय भारताप्रमाणेच बहुतेक देशांमधे वेगवेगळ्या पुराणकथा आहेत आणि त्यातही अशा स्वरूपाच्या हकिकती आहेत. ‘अपोलो’ पासून ते आताच्या ‘ओरॅकल’ या अत्याधुनिक वाटणाऱ्या नावांचे मूळ ग्रीक व रोमन पुराणकथांमध्ये आहे. आपल्याकडे ध्रुव तार्‍याची पुराणकथा प्रसिद्ध असेल तर चिनी पुराणकथांमधे २७ ऐवजी २८ नक्षत्रांची कहाणी आहे. जपानमधे ’सप्तर्षी’बद्दलची कथा एका अस्वला संदर्भात प्रसिद्ध आहे. अशा दाव्यांना सत्य मानायचे असेल तर जगासमोर ते संशोधन करून सिद्ध करावे लागतील. पुराणकथांचा बोधकथा म्हणून प्रतीकात्मक वापर करायला काहीच हरकत नाही. ते न करता आणि आपण पुराणकाळी किती प्रगत होतो या आनंदात मश्गूल राहण्य़ापेक्षा आपण आज का मागे पडतो आहोत हे समजून घेणे, मूळ भारतीय शोधांचे तर्कशुद्ध संशोधन करून त्याचे पेटंट इतर देशांनी बळकावू नये याची काळजी घेणे देशासाठी जास्त महत्वाचे आहे.

त्यासाठी तरूणांमधे वैज्ञानिक दॄष्टीकोन विकसित करायला हवा. भर समुद्रात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्राला प्रसन्न करण्य़ासाठी नारळांचे ढीग जरी अर्पण केले, नवस केले, मंत्र म्हटले तरी तो समुद्र प्रवांशासह त्या नावेस बुडविल्यावाचून राहत नाही, असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ स्वा. सावरकर. आज सोशल नेटवर्किंग वर बहुतेक पुराणकथांची विज्ञानाशी जबरदस्ती सांगड घालण्य़ाचा तरूणाईचा आटापिटा पाहिला की सावरकरांचा "खरा सनातन धर्म कोणता,' हा निबंध आठवतो. त्यात ते नमूद करतात, "हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. आज अवगत आहेसे वाटते, ते विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियमांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित पडेल. तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.'

 भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ जीडीपी च्या वाढत्या दरावर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोनावर ही अवलंबून आहे. आजच्या पालकांनी विज्ञानाची महती, मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य केले आणि नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता येत्या पिढीत निर्माण केली तर ती सुद्धा एक देशसेवाच ठरेल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणारी, गैरसोयीचे किंवा कठिण असले तरी सतत प्रश्न विचारणारी भावी पिढी निर्माण करणे आणि त्यांची उत्तरे शोधण्य़ासाठी प्रयत्नशील राहणे हे आजच्या पालकांनी केलं तरच इतिहासासारखे आपले भविष्य देखील अभिमान बाळगावा असे घडेल. 

No comments:

Post a Comment