Friday, January 30, 2015

जनरेशन गॅप - माध्यमं


सणाच्या दिवशी घरात आणलेला श्रीखंडाचा डबा उघडून त्याचा आस्वाद घेणार तोच त्या छोट्या मुलाला आई दटावते," तुला कितीदा सांगितलय, आधी फोटो काढायचा, अपलोड करायचा मग खायचं". हा बोचरा विनोद बहुतेकांनी ऐकला असेल. बुडत असलेल्या माणसाला वाचवायचं सोडून त्याचा व्हिडीओ काढणा‍र्‍या किंवा त्या पार्श्वभूमीवर ’सेल्फी’ काढणार्‍या महाभागाच व्यंगचित्र देखील पाहण्य़ात आलं असेल. ही काहीशी टोकाची परिस्थिती मानली तरी हे मात्र खरं की गेल्या पिढीत मिडीया अर्थात माध्यमांचं आयुष्यातलं स्थान हे जेवणातल्या चटणी कोशिंबीरीएवढं होतं.

आताच्या पिढीचं तर आयुष्यच माध्यमकेंद्री झालेलं आहे. माध्यमांच्या या विस्फोटामुळे माणूस माणसापासून दुरावला, वाचनसंस्कृती लोप पावली, सायबर गुन्हेगारी वाढली असे आरोप आजच्या पिढीवर होत आहेत. त्यात काही अंशी तथ्य असले तरी खरं तर ही दोन पिढ्यातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो, त्याची निष्पत्ती आहे. (उदाहरणार्थ एके काळी रेडिओ ऐकणारा तरुण ‘वाया गेलेला’ मानला जात असे हे आज हास्यास्पद वाटते.) तंत्रज्ञानाला नेमकं कसं सामोरं जावं, कसं हाताळावं, त्याचे भलेबुरे परिणाम काय हो ऊ शकतात हे कळायच्या आत ते वेगाने माध्यमांमार्फत आपल्यावर येऊन आदळलं हे या अपरिपक्वतेमागचं मूळ कारण लक्षात घ्यायला हवं.

१४५० साली गटेनबर्गने छपाईयंत्र बनवले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात दूरसंदेश(telegraph) दूरध्वनी (telephone) व छायाचित्र (photography) असे तीन महत्वाचे शोध लागले. ल्युमिए बंधूंनी बनवलेला कॅमेरा,जॉन लोगी बेअर्डने केलेले दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक ह्या महत्वाच्या घडामोडींमुळे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात नभोवाणी आणि दूरचित्रवाणी प्रस्थापित झाली. या सुमारास आपला देश स्वातंत्र्यलढ्य़ात गुंतलेला होता. साहजिक भारतात कोणतेही तंत्रज्ञान पोचायला बराच कालावधी जावा लागला त्यामुळे विकसित राष्ट्रे जशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने भौतिक प्रगती करत गेली तसे आपले झाले नाही. तंत्रज्ञान तयार मुलासारखे हातात दिल्याने त्याच्याशी आपली नाळ जुळलेली नाही, त्याच्याशी नाते जुळायला आणखी वेळ लागणार तोवर थोडॆफार सामाजिक आणि सांस्कॄतिक धक्के बसणार. माध्यमं आणि आजची पिढी एकमेकांसह जगायला अद्याप शिकत आहेत. खरा संवाद फक्त भेटल्यावरच होतो, असं आजची पिढी आता मानत नाही. कॉलेज, क्लासेस, नोकरी, व्यवसाय सांभाळण्य़ाच्या धावपळीत घर, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही जपायचं हा तोल सोपा नाही. मग व्हॉटसअॅप किंवा सोशल मिडीया हा आधारच नाही का. कधी गप्पा, कधी मस्करी, कधी चर्चा, इमोजी हे ’व्यक्त होणंच’ आहे. सोशल मिडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य व्यक्तीला व्यासपीठ मिळवून दिलं. याचा सकारात्मक वापर करून जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. पिकासा, फोटोबकेट सारख्या फोटो शेअरिंग साइट्सवरुन जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते. वेगवेगळ्य़ा विषयांवर ब्लॉग लेखन करण, लेखावर प्रतिक्रियेच्या द्वारे चर्चा करणं यातून उलट आजची पिढी अधिक संवादी हो ऊ लागली आहे.

 मागची पिढी अधिक वाचन करायची पण ती पिढी ’काय’ वाचायची हे ही पाहायला हवे. वाचन फक्त आजच्या पिढीने करावं अशी अपेक्षा करणारी मागची पिढी, टीव्हीला खिळल्याने आपलं वाचन कमी झाल्याची कबुली देत नाही. वाचनाच्या स्वरूपापेक्षा पुस्तकांशी संपर्क येणं हे जास्त महत्त्वाचं नाही का! मौखिक परंपरेपासून छापील पुस्तकांपर्यंत आणि आता ई बुक, ऑडीओ बुक, वर्तमानपत्रांचे अ‍ॅप्स किंवा किंडल पर्यंत माध्यम बदलत वाचन पुढे जातेच आहे. थोड्क्यात आज वाचनसंस्कॄती लोप पावत नसून बदलते आहे इतकेच. ई-साहित्य संमेलनांसारखे सुखद बदल होत आहेत. मात्र आजची पिढी ही सादरीकरणाकडे जितके लक्ष देते तितके आशयाला देत नाही. कार्यक्रमाची बौद्धिक पातळी कमी ठेवली की प्रेक्षकसंख्याही वाढते. बाईटस (त्वरित प्रतिक्रिया) देण्य़ाच्या नादात अविचारीपणे, अभ्यास न करता मते मांडण्य़ाचे खूळ लागते. यामुळे माध्यमे ‘पोकळ’ होऊ लागली आहेत. शिवाय त्यांच्यावर अभारतीय भांडवलशहांची मालकी असल्याने ’काय दाखवावे’ याची सूत्रे त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या (अ)नैतिकतेच्या व्याख्या भारतीयांवर सतत लादल्या जात आहेत. भारत हा ’देश’ म्हणून एकसंध राहण्य़ाऐवजी बाजारपेठ कसा बनून राहील यातच त्यांना जास्त रस आहे. या सगळ्य़ात आजच्या पिढीचा वैचारिक गोंधळ होतो आहे. त्याची परिणीती माध्यमांचा उपयोग अफवा, अंधश्रद्धा, अश्लीलता पसरवण्यासाठी किंवा अगदीच बाळबोध पणॆ करणार्‍यांची संख्या वाढण्यात होते आहे.

 ही समज खर तर ज्यांनी वाढवायची ती मागची पिढी आत्ता कुठे तंत्रज्ञान वापराचे धडे आजच्या पिढीकडून बिचकत बिचकत घेते आहे. त्यांचा यात दोष नाही पण मग तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित करणार कोण? त्यासाठी शालेय स्तरापासून प्रशिक्षण द्यायला हवे आहे. योग्य सायबर वापरासह, कायद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवायला हवी आहे. पारंपारिक माध्यमे आजही जगण्याला आशय आणि प्रेरणा देत आहेत, त्यांचे जतन होणे अतिशय महत्वाचे आहे. माध्यमांच्या झंझावातात मूल्ये उन्मळून पडायला लागली असतील तर ती जपण्याची आणि स्वानुभवावरून शहाणं होऊन भावी पिढीला माध्यमांसह जगण्याचा विवेक शिकवण्य़ाची जबाबदारी आता आजच्या पिढीची आहे. तरच या भरकटलेपणातून आपण हळूहळू सावरू शकू. मग माध्यमांनी हिरावून घेतलेले आपल्या आयुष्याचे सुकाणू पुन्हा आपल्या हातात येऊ शकेल.
 ------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment