Sunday, December 18, 2011

आती क्या खंडाला

चेहर्‍यावरून स्कार्फ बांधलेली एक मुलगी बसस्टॉपवर उभी असते. बाईकवरून जाणारा एक पुरूष तिथे येऊन तिला म्हणतो " आती क्या खंडाला ?" त्यावर ती मुलगी उत्तरते " अहो पप्पा, मी आहे." हा बोचरा विनोद (!) सध्या प्रचलित आहे, पण त्याला एका कटू सामाजिक वास्तवाची धार आहे.
बहुतेक प्रत्येक महिलेला मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू वर्गातील असो वा अगदी तळागाळातील असो ,छेडछाड करणार्‍या पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा , शरम वाटावी अशा शेर्‍यांचा ,विखारी नजरांचा, हावभावांचा, विकृत स्पर्शाचा त्रास सहन करावा लागतो. हा ईव्ह टिझिंग किंवा महिलांची छेड काढण्याचा प्रकार समाजात सर्रास घडतो.एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बाजारात, बस स्टॉपवर, अगदी शाळा, कॉलेज किंवा ऑफीस मधे देखील गर्दीचा वा एकांताचा फायदा घेऊन स्त्रीचा विनयभंग केला जातो. अशा लैंगिक गैरवर्तनामुळे स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना तिच्या मनाला होतात. मुलगी जेव्हा तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा अशा घटनांमुळे तिच्या मनाची कुचंबणा होते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कमकुवत मनाच्या मुली मनातल्या मनात कुढत बसतात. अशा नकारात्मक अनुभवांमुळे स्त्रियांवर आत्मविश्वास गमावणे, सरसकट सगळ्याच पुरूषांकडे संशयी नजरेने पाहणे, कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे ,पुढील शिक्षण घेण्याची, करिअर करण्याची हिंमत खचणे असे खोलवर मानसिक परिणाम होऊ शकतात. भीती वा लाजेमुळे, अपमानित आणि विमनस्क मनस्थितीमुळे काही महिला आयुष्य संपवायच्या टोकाला देखील जातात.

सुदैवाने समाजात अजूनही चांगल्या पुरूषांचे प्रमाण जास्त आहे परंतु छेडछाडीतून विकृत आनंद मिळवणार्‍या पुरूषांचे प्रमाण वाढत चालले आहे. असे पुरूष समाजातल्या सगळ्या स्तरांमधले असतात. काही जण मूल्यशिक्षण, संस्कारांचा अभाव असलेल्या कुटुंबातून येतात, काही व्यसनाधीनतेतून नकळत अशा प्रकारांकडे वळतात. काही मानसिक वा लैंगिक विकृतीचे बळी असतात, कुणाला एखाद्या स्त्रीकडून वाईट अनुभव आला तर त्याचा बदला समस्त स्त्री जातीकडून घेण्याचा हा प्रयत्न असतो. लैंगिक गुन्हे घडण्यामागे माध्यमांचा परिणाम देखील कारणीभूत आहे. आयटम सॉंग म्हणून गाजलेली तथाकथित गाणी, द्वयर्थी जाहिराती आणि बाजारू चित्रपटांमधून "उपभोग्य वस्तू" अशी स्त्रीची प्रतिमा निर्माण होते. (यात सवंग प्रसिद्धीसाठी काहीही करायला असणार्‍या स्त्रियांचाही दोष आहे) अश्लील साहित्य, इंटरनेटवरील पॉर्न साईटस आणि लैंगिक शिक्षणाचा अभाव यामुळे मनातली लैंगिक अस्वस्थता महिलांना त्रास देऊन व्यक्त केली जाते. चांगल्या घरांतील काही उच्चशिक्षीत पुरूष देखील कधी कधी मजा म्हणून किंवा सहज,कुणी बघत नाही म्हणून महिलांची छेड काढतात. महिलेने खाली मान घातली, ती घाबरली की अशा पुरूषांचा अहंकार सुखावतो. काहींना त्यातून मिळणारा विकृत आत्मविश्वास हवा असतो. काही तरूणांना मित्रांनी आपल्याला बावळट समजू नये म्हणून महिलांना छेडणे हा पुरूषार्थ सिद्ध करण्याचा एक सोपा मार्ग वाटतो. सिनेमामधील नायक ज्या नायिकेशी छेडछाड करतो पुढे तीच नायिका त्याच्या प्रेमात पडते या मसाला कथानकातून पौगंडावस्थेतील मुले काही वेगळाच धडा घेतात. आपल्याही आई, बहिणीवर अशी वेळ येऊ शकते याचा त्यांना विसर पडतो. अनेक सुसंस्कृत तरूणांना आपल्या महाविद्यालयात घडणा‍र्‍या अशा घटनांची खंत वाटते पण ते एकट्याने विरोध करू शकत नाहीत. पुरुषप्रधान व्यवस्थेत अपवाद वगळता महिलांना बहुतांशी दुय्यमच वागणूक मिळते. तिच्यावर वचक ठेवण्याचे सर्वात सोपे हत्यार म्हणजे तिचे शील पण याचा अर्थ समाजाचा एक मोठा भाग आत्मसन्मान हरवलेल्या अवस्थेत जगतो आणि ही गंभीर गोष्ट आहे.

या गुन्ह्याविरूद्ध आवाज उठवणे हा गुन्हा करण्याइतके सोपे नाही. भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे महिलेला लज्जा उत्पन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर. असे करताना कुणी पकडले गेलेच तर त्या महिलेनेच प्रोत्साहन दिले, असा खुशाल कांगावा केला जातो. मुंबईतील आंबोली भागात आपल्या मैत्रिणींच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या किनन सॅण्टोस आणि रुबेन फर्नांडिस या दोन तरुणांचा गुंडाच्या टोळक्याने भररस्त्यावर खून केला तेव्हा प्रचंड खळबळ माजली होती.बहुतेक केसेसमधे पोलीस यंत्रणेवर पुरेसा विश्वास नसल्याने अशा गुन्ह्याचा साक्षीदार मिळणं अवघड असतं. बलात्काराच्या केसमधे "डी.एन.ए" चाचणीद्वारे गुन्हा सिद्ध करता येतो. विनयभंग सिद्ध करणं पुराव्याअभावी अवघड होतं.

एखाद्या स्त्रीने अशी घटना घरी सांगितली तर रस्ता बदल, दुर्लक्ष कर असेच साधारण सुचविले जाते. ऍड.जाई वैद्य या तज्ञ असे निरीक्षण नोंदवतात "एखादीने मनाचा हिय्या करून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविली तर फौजदारी कायद्यानुसार तिला जे प्रश्न विचारले जातात त्याची लाजीरवाणी उत्तरे देता देता तिचा धीर खचतो. छेड काढली म्हणजे नक्की काय केले हे सांगण्याइतकी हिंमत तक्रारदार महिलेजवळ असतेच असे नाही. यातून गुन्हा नोंदवला गेलाच तर संथ न्यायप्रक्रियेमुळे तिचे उरलेसुरले अवसान संपते. त्यापेक्षा अन्याय मुक पणाने सहन केलेला बरा असे तिला वाटते. मग असे गुन्हे एक तर नोंदले जात नाहीत, गेलेच तर दबावामुळे मधूनच केस मागे घेतली जाते. शिक्षेचे प्रमाण नगण्य असते." अर्थात याची दुसरी बाजु अशीही विचारात घेतली पाहिजे की वैयक्तिक आकसापोटी एखादी स्त्री खोटा आरोप तर करत नाही ना! सगळ्याच स्त्रिया सभ्य, सुशील, सुसंस्कृत असतात असे नाही. अशा आरोपांमुळे एखाद्या सच्छील पुरूषाच्या प्रतिष्टेचा बळी जाऊ शकतो कारण समाजाची सहानुभूती साहजिकच त्या स्त्रीला मिळते. प्रेमप्रकरण अंगाशी येते आहे असे पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी जोडीदारावरच लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणार्‍या मुली देखील आढळतात. तरीही केवळ स्वार्थापोटी किंवा सूडाच्या भावनेपोटी स्वत:चे नाव नाहक चर्चेत आणणार्‍या अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अजून तरी कमी आहे.

पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी १०० हा दूरध्वनी क्रमांक आहे. महिलांसाठी १०३ ही हेल्पलाइन आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला दक्षता समिती असते. तरीही छेडछाड करणाऱ्यांना जरब बसावी या दृष्टीने कायद्यात सुधारणा व्हायला हवी. केवळ कायद्याचा अंकुश या गुन्ह्याला पूर्ण आळा घालू शकत नाही त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. इतिहासात देखील स्त्रियांच्या वेदनांना महात्मा फुले, महर्षी कर्वे प्रभृतींनी वाचा फोडली. त्यांचा वारसा जपणारा पुरूषवर्ग आजही समाजात आहे. अशा प्रश्नांवर उपाय शोधताना त्यांची मदत होऊ शकते. मुलींच्या मनात आत्मगौरवाची भावना जागवणे आणि मुलींनी अशा घटनांना विरोध करण्याचे धाडस दाखवले तर त्यांना पाठिंबा देणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. छेडछाडीच्या बहुतेक घटना या तरुण मुलांकडून घडताना दिसतात त्यासाठी घराघरातून मुलांवर समानतेचे आणि स्त्रियांचा माणूस म्हणून आदर करण्याचे संस्कार केले गेले पाहिजेत.

मुलींनी देखील आपले वर्तन, पेहराव, देहबोली अनुचित नाही ना याचा विचार केला पाहिजे. एकटयाने विरोध करणं शक्य नसेल तिथे संघटनेचं बळ कामी येऊ शकेल. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षांच्या युवा संघटना असतात. मुलींच्या पाठीशी अशा संघटना उभ्या राहिल्या तर छेडछाडीचे प्रकार कितीतरी पटीने कमी होतील. 'मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अॅब्युज' ही संस्था मुंबईत वेगवेगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेते. त्यात लिंगभेद, छेडछाड, स्त्री भ्रूण हत्या इ. विषयांवर त्यांचं प्रबोधन केलं जातं. "आती क्या खंडाला? " विचारणार्‍या तरूणांच्या मनावर "स्त्रियाही तुमच्यासारख्या माणूस आहेत आणि समाजात सुरक्षितपणे वावरण्याचा त्यांनाही अधिकार आहे. तो त्यांना मिळायलाच हवा" हे ठसवणं हा यामागचा उद्देश आहे. आता गरज आहे ती समाजाने, विशेषत: तरूणांनी या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची !

Thursday, December 8, 2011

मुलांचे मित्र व्हा

matrubhumi 8 Dec 2011


एका चिमुकलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रंगात आला होता. रंगीबिरंगी फुगे, नटून थटून आलेल्या लहान मुलांची मस्ती, खेळ, त्यांची किलबिल असं मस्त वातावरण होतं. मग सीडी प्लेअर वर ’रा-वन’ मधलं "छम्मक छल्लो" गाणं वाजू लागलं आणि मुलं खेळ सोडून त्यावर थिरकायला लागली. त्यांचे आईबाप टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देऊ लागले. मुलांनी नाही तर कोणी नाचायचं, खरं आहे, पण त्या किंवा तशा प्रकारच्या गाण्यांचे शब्द, त्यावर मुलांचे वयाला न शोभणारे हावभाव याला दाद देताना आपलं काही चुकतं आहे असं त्यांच्या पालकांना जाणवूच नये? वाढदिवसच नव्हे गणेशोत्सवात, अगदी शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील फिल्मी गाण्यांवर नाचणे ही फॅशन झाली आहे. नाच आणि गाणी वाईट नसतात, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि मनोरंजनाचं ते एक सुंदर माध्यम आहे. छानसा ठेका असणारी सिनेमातील गाजलेली गाणी, लोकगीतं अगदी पाश्चात्य नृत्यप्रकार सुद्धा निवडायला हरकत नाही. अचकट विचकट हावभाव आणि ’मुन्नी बदनाम हुई’ स्वरूपाचे गाण्यांचे शब्द असतील तर ती मात्र टाळायला हवीत याचे भान शिक्षक आणि मुख्यत: पालकांना असायला हवे. माध्यमांचा विशेषत: टीव्हीचा आधीच मुलांच्या मनावर प्रचंड पगडा आहे. त्यावर काही चांगल्या वाहिन्या आणि चांगले कार्यक्रम देखील आहेत पण मुले टीव्हीवर काय पाहत आहेत, किती वेळ पाहत आहेत याचा किंवा मुलांसमोर टीव्हीवर स्वत: काय पाहावं याचा किती पालक विचार करतात? कार्टून पाहणे सगळ्याच लहान मुलांना आवडते पण सगळेच कार्टून आता मुलांच्या भावजीवनाशी जुळलेले राहिलेले नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे. कार्टून मधला "शिंचन" त्याच्या वडिलांना "ओहो, तो आप उस सेल्सगर्लपर लाईन मार रहे थे" असे म्हणतो, सात वर्षाचा नोबेटा म्हणे वर्गातल्या शिजुका वर "प्रेम करतो", तेव्हा देहभान हरपून ते पाहणार्‍या मुलांना मनोरंजनाबरोबर आणखी बरेच धडे नाजूक वयात नकळत दिले जातात. मुलांना "कुठे थांबवावं" हे आधी पालकांच्या लक्षात यायला हवं.


जागतिकीकरणाच्या युगात मुलं आता कार्यक्रमात पूर्वीसारखे श्लोक किंवा बडबडगीतं म्हणणार नाहीत हे मान्य, त्यांचे छंद, आवडी, विषय काळाप्रमाणे बदलत जाणार, आधुनिक होणारच पण शेवटी ती मुले आहेत हे सत्य विसरून आणि बदलून कसं चालेल? मुलांबाबतचे हे सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहे. त्यांच्यातली निरागसता जपायची असेल तर मुळात आपली वागणूक योग्य आहे ना याचा विचार पालकांनीही करायला हवा. वडिलांनी जर मुलाला म्हटलं ," तुझ्या वयाचा असताना जॉर्ज वॉशींग्टन शाळेत नेहमी पहिला येत असे" तर त्यावर आजच्या मुलाचं उत्तर असतं "तुमच्या वयाचे असताना ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्याचं काय !" यातला गमतीचा भाग सोडला तर पालकांनी स्वत:चा आदर्श मुलांपुढे असणार आहे याचा विचार नेहमीच करायला हवा. आई-वडील कसे राहतात, आपापसात कसे वागतात, इतरांबद्दल काय व कसे बोलतात या सगळ्याचा मुलांवर परिणाम होत असतो त्यामुळे पालकांनी मुलांसाठी आधी स्वत:ला घडवायला हवं. स्पर्धेचं युग आहे या नावाखाली मुलांना कितीतरी क्लासेस लावले जातात, त्याने नृत्य, खेळ, कुठल्या कुठल्या टॅलेंट परिक्षा द्यायच्या पुन्हा अभ्यासात पुढेच असायचं एवढ्या सगळ्या अपेक्षा त्या चिमुकल्याला झेपत नाहीत. पालक-पाल्यसंबंधातील तज्ञ समुपदेशक डॉ. आशिश देशपांडे म्हणतात " मूल जन्माला घातलं, म्हणजे त्यावर आपला हक्क प्रस्थापित झाला असं नाही. मुलांचे पालक व्हा ,मालक नको." मुलांवर आपली स्वप्न लादणं अयोग्य आहे. ती पूर्ण झाली नाहीत तर त्यांना रागवून उपयोग नाही. त्यापेक्षा हे ओझं कमी केलं, त्यांचा कल समजावून घेत वेळीच ठराविक शिस्त लावली, शहानिशा करून योग्य त्या गोष्टींनाच प्रोत्साहन दिलं तर प्रश्न सुटले नाहीत तरी सोपे होतील.


हल्ली घरोघरी एक, दोनच मुले असल्याने त्यांचे लाड होतात, वाटून घेणे त्यांना माहीत नसते. आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायात व्यस्त असले तर मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही या न्यूनगंडातून ते मुलांना कशालाही "नाही" म्हणू शकत नाही. त्यांच्या शिकवण्या, शाळा लांब अंतरावर असल्याने पालक त्यांना मोबाईल घेऊन देतात, त्यातले फंक्शन्स पालकांपेक्षा जास्त मुलांना माहीत असतात. मुलांना मोबाईल,व्हिडीओ गेम, संगणक सहजतेनं हाताळता येणं ही ’स्मार्ट’ असल्याची पावती समजली जाते. मुलांच्या तुलनेने पालकांना हे तंत्रज्ञान दूरचं वाटतं, त्यामुळे अशा ’स्मार्ट’ मुलांचं पालकांना साहजिकच कौतुक वाटतं. त्या नादात मुलं नक्की ते कसं वापरतायत यावर पालकांचा वचक राहणे अवघड झाले आहे.

नुकत्याच एका नामवंत शाळेमधे वर्गात अश्लील एमएमएस पाहणार्‍या मुलांना पालकांसमक्ष समज देण्यात आली. तेव्हा "आमची मुलं असं करणच शक्य नाही" अशी बहुतेक पालकांनी भूमिका घेतली. पालकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून मुलांवर लक्ष ठेवण्याच्या त्यातील युक्त्या शिकायला हव्या. असे करणे म्हणजे हेरगिरी नव्हे, नैतिक जबाबदारी आहे. शिवाय मुलांनी अशा उपकरणांचा वापर करण्याबाबत आधीपासूनच नियम आणि निकष ठेवायला हवेत. अकाली ’सुजाण’ (?) झालेली मुले लवकर वयात येत आहेत. लैंगिक शिक्षण शाळांमधून मिळावे, वैद्यकीय व्यावसायिकांकडून द्यावे की समुपदेशन करावे हे पालकांना समजेनासे होते. शिस्तीचा अतिरेक किंवा बेलगाम स्वातंत्र्य दोन्ही चूकच. लाड आणि नकार म्हटलं की वादविवाद होणारच आणि काही प्रमाणात असे वाद मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची वाढीसाठी आवश्यक आहेत विशेषत: पौगंडावस्थेत संवाद हा वादातूनच होतो ,असं या विषयातील तज्ञांचं मत आहे. आपलं घर, आपले आई-वडीलांपुरतच जग असणा-या मुलांचा नवनवीन गोष्टी, व्यक्ती, वस्तूंशी संबंध येत गेला की त्यांना स्वत:ची space आवडू लागते. आपल्या आई-वडिलांनी आपल्या प्रत्येक गोष्टींमधे केलेला हस्तक्षेप त्यांना नकोसा वाटतो. यावर रामबाण उपाय नसला तरीही संवादाचा पूलच पालक आणि मुलांमधली दरी सांधू शकेल.


केवळ तांत्रिक गोष्टी वापरता आल्या म्हणजे मुलं स्मार्ट झाली असं न मानता पाहणे, हाताळणे, निरीक्षण करणे, अनुभव घेणे अशा पायर्‍यांनी त्यांचं व्यवहारज्ञान वाढवणं आवश्यक आहे. अगदी निबंध किंवा पत्रलेखन सुद्धा शिक्षक मुलांना लिहून देतात आणि मुले ते पाठ करून परीक्षेत लिहीतात. मुले टीपकागदासारखी असतात त्यामुळे मुलांना त्यांच्या भाषेत लिहू द्यायला हवे. ते कसे व्यक्त होतात, जगाकडे कसे पाहतात, कसे अनुभव मांडतात हे समजून घ्यायचे असेल तर विषयाच्या चौकटीतून त्यांना मुक्त करायला हवे. "विचार कसा करावा हे शिकवतं ते खरं शिक्षण" असं आईनस्टाईनने म्हटलं आहे. पण बहुतेक शाळांत प्रात्यक्षिके होतच नाहीत. भारतातील काही प्रसिद्ध शाळांच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की नव्वदहून अधिक टक्के मिळवणार्‍या माध्यमिक वर्गातील अनेक मुलांना साध्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. मुले फक्त पुस्तकी विज्ञान शिकतात. प्रयोगांतून नव्हे. कदाचित त्यामुळे देशात संशोधकांचे प्रमाण डॉक्टर,इंजिनीअर यांच्या तुलनेने नगण्य आहे. शाळांमधील प्रकल्प असो वा हस्तकला, बहुतेक विद्यार्थ्यांचे पालकच सगळे करून देतात. मध्यंतरी परिचयातील एका मुलाने ’कडधान्याला मोड येणे’ या विषयावर लिहीलेला प्रयोग दाखवला, त्याभोवती त्याच्या आईने फुलांची वेलबुट्टी काढली होती, त्यापेक्षा तिने ’मोड कसे येतात’ हे प्रात्यक्षिक मुलाला का दाखवले नाही! या साचेबद्धतेतून शिक्षणाला मुक्त करणे पालकांच्या हातात नसले तरी मुलांचे आकलन प्रत्यक्ष निरीक्षणातून वाढविण्यासाठी ते निश्चीत प्रयत्न करू शकतात.


शिक्षणाच्या तीन पायर्‍या आहेत असं म्हटलं जातं.. माहिती (information), ज्ञान (knowledge) आणि शहाणीव (wisdom). माहिती अनेक माध्यमातून आपल्यावर आदळते आहे, केवळ माहिती जमवणं म्हणजे हुशारी नव्हे. त्याचे ज्ञानात रूपांतर करायचे कौशल्य मुलांमधे निर्माण करण्याची जबाबदारी सुज्ञ शिक्षकांची आहे, मात्र त्या ज्ञानाचा व्यावहारिक वापर, तौलनिक अभ्यास करता येण्याची शहाणीव मुलांमधे निर्माण करणे, शिस्तबद्ध संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यासाठी मुलांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणं, त्यांना अभ्यासाव्यतिरीक्त ज्यात रस वाटेल त्यात रमवणं, पर्यावरणाची ओळख करून देणं, चांगली पुस्तक आणणं-वाचून दाखवणं, महत्वाच्या घडामोडी ,बातम्या यावर त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. यामुळे त्या मुलांमध्ये आत्मविश्वास येईल. मुलांबरोबर पारदर्शक, मैत्रीपूर्ण संबंध जपले तर पालक-मुलांचे हृद्य नातं नक्कीच बहरेल.

Tuesday, November 29, 2011

आमिश


" निसर्ग बघायला म्हणून निघालो तर
गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती..."

आपल्या तथाकथित निसर्गप्रेमाला कवी अशोक नायगावकरांनी असा मिश्कील चिमटा घेतला आहे. आपण पर्यटनाला गेलोच तर निसर्गाला बघतो ते ही कॅमेर्‍याच्या भिंगातून. तिथे दूरचित्रवाणीशी संपर्क आला नाही तर आपण जगापासून तुटू की काय अशी भिती वाटू लागते. एकदाचा मोबाईल ’रेंज’ मधे आला की आपल्या जीवात जीव येतो. माणसाला शेवटी गरज असते फक्त चार हात जमिनीची, हे तत्वत: मान्य असलं तरी प्रत्यक्ष जगताना भौतिक साधनांशिवाय- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांशिवाय पान हालत नाही. म्हणूनच चंगळवादाचा मुकुटमणी असं ज्या अमेरिकेला म्हटलं जातं तिथे मात्र एक समूह-पंथ या सगळ्या पासून दूर निसर्गाच्या कुशीत निवांत आयुष्य जगतो आहे यावर विश्वास बसेना. आधुनिक जीवनशैलीच्या धकाधकीपासून अलिप्त असणार्‍या त्यांच्या प्रांतातून प्रत्यक्ष बग्गीतून फेरफटका मारल्यावर कुतूहल, आश्चर्य, आनंद, समाधान अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या. या समाजाचं-पंथाचं नाव आहे "आमिश"...जगण्याच्या सगळ्या आमिषांपासून मुक्त असलेल्या या आमिश मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विलक्षण आहे.

जेकब अमान (या नावावरूनच "आमिश" म्हटले जाऊ लागले) यांनी सुरू केलेल्या या आमिश चळवळीने युरोपात सन १६४४-१७२० च्या दरम्यान चांगलेच मूळ धरले. यातले बहुसंख्य लोक १७ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले. पेनसिल्व्हेनिया भागात त्यांचे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळी तत्वे अनुसरणारे गट (प्रोटेस्टंट, अनाबाप्टीस्ट इ.) त्यांच्यात निर्माण झाले असले तरी त्यांची जीवनपद्धती साधारण सारखीच आहे. जणू ते सगळे निसर्गपुत्र आहेत. पवनचक्की आणि केरोसिन, लाकूड, कोळसा अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ते त्यांची वीजेची माफक गरज भागवतात. (त्यामुळे भारनियमन हा ’सहिष्णू’ शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही) अमेरिकेत सर्रास आढळणारा दिव्यांचा लखलखाट त्यांना आवश्यक वाटत नाही. बहुतेक सगळे आमिश वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त टुमदार घोडागाडी वापरतात. काही कामासाठी आमिश शहरात जातात तेव्हा अद्यावत कार्सच्या बाजूला सिग्नलला थांबलेली त्यांची देखणी बग्गी (खिडकी असलेल्या पेटीसारखी दिसणारी) लक्ष वेधून घेते. प्रत्येक घरी बग्गीसाठी ऐटबाज घोडे तर शेतीसाठी खेचरं पाळली जातात. एका खोलीच्या शाळेत आठवीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यावर आमिश मुले शेतीचं शिक्षण घेतात. शेती व शेतीशी संबंधित उद्योग हेच त्यांच्या चरितार्थाचं साधन आहे.

समूहाच्या भौगोलिक मर्यादांमुळे असेल, बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवताही आमिश आरामात जगतायत, उलट त्यामुळे त्यांचे आपसातील संबंध (मोबाईल किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स न वापरताही) अधिक दृढ झाले आहेत आणि त्यांची संख्या गेल्या अर्धशतकात तिपटीने वाढली आहे असं त्यांच्या समाजप्रमुखांचं मत आहे. आमिश चर्चपरिवारातच त्यांचे विवाहसंबंध होतात. मोठं कुटुंब ही देवाची देणगी आहे असे ते मानतात. मुलांचं उत्तम संगोपन करणं, नाती जपणं याला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या कुटंबाचा अतिशय प्रभाव असतो. मुलांची मानसिक, शारिरीक आणि आध्यात्मिक प्रगती होते आहे ना याकडे कुटंबाचा कटाक्ष असतो. मुले वडिलांना शेती व इतर बाहेरील कामात मदत करतात तर मुली आईला गृहोद्योगात मदत करतात. कुटुंबाला हातभार लावणे हे प्रत्येक जण आपले कर्तव्य समजतो. वृद्ध माणसे शेवटपर्यंत कुटुंबाच्या आधारानेच जगतात. पाण्यापासून निर्माण होणारी उर्जा वापरून, डिझेल जनरेटरवर चालणार्‍या हत्यारांच्या सहाय्याने १००% लाकडी फर्निचर-घरे बनवण्याचे कौशल्य आमिश लोकांच्या प्रत्येक पिढीत आढळते. काही आमिश जर्मन भाषा बोलतात तर बहुसंख्य आमिश इंग्रजीचा वापर करतात. चर्चमधे जर्मन तर इतर ठिकाणी इंग्रजी गीते जुन्या पद्धतीनेच गायली जातात. फक्त खाजगी कार्यक्रमात वाद्ये वाजविली जातात, जाहीररित्या नाहीत. सण समारंभांना नातेवाईक-मित्र आवर्जून एकत्र येतात. सामाजिक एकोप्यामुळे आणि संयमी, सरळ, सोप्या जगण्यामुळे माध्यमातून रोरावत येणार्‍या "मनोरंजनाच्या" महापुरात ते वाहून जात नाहीत. माध्यमं त्यांच्या विश्वात शिरलेलीच नाहीत.


अमेरिकेतील मुक्त लैंगिक जीवन-पद्धतीच्या पार्श्वभूमीवर अमिश स्त्री-पुरूषांच्या सहजीवनातले वेगळेपण उठून दिसते. यांत्रिक जगातल्या ताणतणावांपासून, जीवघेण्या स्पर्धेपासून दूर असल्याने वैवाहिक तसेच कौटुंबिक आयुष्यात सौख्य आणि स्थैर्य आपसूक येते. रविवारी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर तरूण-तरूणींना एकमेकांसह वेळ घालवण्याची मुभा असते. मात्र त्यांना उघड्या टपाच्या बग्गीतून फिरायला जाणे बंधनकारक असते. जोमदार पीक झाल्यावर म्हणजे नोव्हेंबर महिन्यातले मंगळवार विवाहासाठी निश्चीत केले जातात. वधू निळा पोशाख घालते. माणसांमधे असूया, तणाव निर्माण करणार्‍या गोष्टी (उदा: दागदागिने) विवाहप्रसंगी देखील निषिद्ध असतात.(असे आपल्याकडे चुकून जरी घडले तर केवळ या विषयाला वाहिलेल्या मालिका माथी मारणार्‍या तमाम दूरचित्रवाणी वाहिन्या बंद पडतील..असो.) लग्नानंतर नवदांपत्य मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटण्यात काही दिवस घालवतात आणि मग संसाराला सुरूवात करतात. कपड्यातही बटन किंवा झिप ऐवजी हुकचा वापर केला जातो आणि ते घरी शिवले जातात. पांढरा शर्ट, काळी पँट,काळे जॅकेट-कोट व विशीष्ट प्रकारची हॅट असा साधारणपणे पुरूषांचा तर स्कार्फ, पायघोळ झगा, त्यावर ऍप्रन असा स्त्रियांचा पोशाख असतो. मुलांचे छोटेसे पोशाख सुद्धा अशाच स्वरूपाचे असतात, थंडीचा मोसम वगळता मुले चक्क अनवाणी चालताना आढळतात. स्त्रियांचे तपकिरी, सोनेरी लांब केस मागे अंबाड्यासारखे बांधलेले असतात. त्यावर बांधलेल्या "केप" वरून त्यांचे वय आणि वैवाहिक स्थिती कळते. विवाहित पुरूष चाळीशी नंतर मिशी नाही परंतु दाढी राखतात. या प्रतीकांमुळे अमेरिकन पद्धतीप्रमाणे विवाहाची अंगठी घालायची त्यांना गरज वाटत नाही. दागिने आणि कपड्याचा सोस हा मुद्दा एकूणच निकालात निघतो आणि तुलना, हेवा असे प्रश्नच निर्माण होत नाहीत.

भारतासारख्या देशात अनेक आदिवासी किंवा वनवासी थोड्याफार फरकाने याच पद्धतीने जगतात, असे वाटेल पण तसे नाही. त्यांच्या घराला जगाकडे उघडणारी खिडकीच नसल्याने आदिवासी लोक निसर्गपुत्र म्हणून नाईलाजाने जगतात, त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कार होत नाही, अंधश्रद्धेचा पगडा मनावर असतो. गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते. आमिश लोकांनी मात्र ही जीवनशैली स्वेच्छेने स्वीकारली आहे. ते स्वयंपूर्ण आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची "मन ,बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण" अशी व्याख्या केली आहे. या नजरेतून पाहिले तर आमिश सर्वार्थाने सुशिक्षीत आहेत. त्यांना बाहेरच्या बेभान जगापासून अलिप्त राहायचे आहे.

आमिश जीवनाबद्दल जाणून घेतल्यावर मनात आले, एखादा छंद, लेखन, संशोधन, व्यवसाय यासाठी स्वत:ला झोकून द्यावं किंवा खूप पैसा कमवावा, त्याचा उपभोग घ्यावा, जग पाहावं, नाव कमवावं अशा आकांक्षा आमिश तरूणाईमधे निर्माण होत नसतील का? निरीक्षणातून तरी असेच उत्तर मिळते की आमिश संस्कृतीच्या स्थैर्यासाठी, हितासाठी आणि भवितव्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षेला गौण स्थान दिलं जात असावं. काही समाजशास्त्रज्ञांना ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वाटते. मात्र प्रेम आणि त्यागाच्या पायावरच, ’जगा आणि जगू द्या’ म्हणत आमिश जीवन कणखरपणे उभे आहे. काही बंडखोर आमिश तरुणांनी व्यक्तिपेक्षा समूहाला महान ठरवणार्‍या या जीवनपद्धतीला नकार देण्यासाठी त्यातून पलायन करणे, सार्वजनिक स्थळी गोळीबार करणे असे विरोध दर्शवणारे मार्ग अवलंबले आहेत. पण अशा घटनांचे प्रमाण तुरळक असल्याचे कळले.आधुनिकीकरणाच्या प्रभावामुळे आमिश मंडळींमधे कट्टर विरूद्ध बदलांचा माफक प्रमाणात स्वीकार करणारे असे गट देखील पडू लागले असले तरीही "निसर्गाकडे चला" हा मूलमंत्र आमिश लोकांनी आजही जपला आहे.

माध्यमांचा अतिरेक, निसर्गाची लूट, व्यसने, व्यभिचार, हव्यास अशा आचार, विचार आणि विहारातील सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून लांब राहून मनमोकळा श्वास घेणारे आमिश आजच्या जगात वेगळे ठरतात ते यामुळेच. काही जणांना असं जगणं, वैज्ञानिक प्रगतीचा आस्वाद न घेणं हा मागासलेपणा, विचीत्रपणा वाटतो. यातलं तथ्य ज्यांना प्रश्न पडतायत त्यांनी शोधावं, आमिश आजही शांतपणे जगत या व्यवहारी जगाला केवळ कृतीनेच ठाम उत्तर देत आहेत.

Friday, November 25, 2011

देव


बर्‍याच व्यावसायिक चित्रपटांमधे हे दॄश्य हमखास असते. कोणतेतरी एक महत्वाचे पात्र मृत्युशय्येवर पहुडले आहे, डॉक्टरांनी ’अब सब कुछ उपरवाले के हाथ मे’ असल्याचं सांगून टाकलं आहे. नायक वा नायिका मंदीरात येऊन देवाला आळवत आहेत, वादळ सुरू झाले आहे, देवळात टांगलेल्या शे पाचशे(!) घंटा वेड्या-वाकड्या हलत जोरात वाजत आहेत. अचानक कुणी तरी येऊन ’वो होश मे आ गये’ असं सांगतं आणि टँग टँग सतार वाजू लागते. ’तेरा लाख लाख शुकर है भगवान’ असं ऐकत प्रेक्षकही सुटकेचा निश्वास टाकतो. या तद्दन फिल्मी ईश्वरभक्तीला छेद देत ’देव म्हणजे नक्की काय’ याचा शोध घेण्यास मराठीतील ‘देऊळ’ चित्रपट प्रवृत्त करतो. या चित्रपटाद्वारे उमेश व गिरीश कुलकर्णी या द्वयीने समाजमनातला देव शोधण्याचा धाडसी प्रयत्न नर्मविनोदी पण मार्मिक पद्धतीने केला आहे.

एका गुराख्याला (केशा) ’दत्त’ दिसल्याचा भास किंवा त्याच्या मते ’साक्षात्कार’ होतो. हा आधी चर्चेचा आणि मग राजकारणाचा विषय होतो. ठरलेल्या रूग्णालयाऐवजी दत्ताचे देऊळ बांधण्याला प्राधान्य दिले जाते. जनतेच्या धार्मिक भावनांचा फायदा घेऊन राजकारणी दत्तमंदीराच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली बेकायदा कामे सुरू करतात. गावातले संतुलित विचार करणारे कुलकर्णी अण्णा जेव्हा ही फसवणूक आहे असे म्हणतात तेव्हा त्यांना उत्तर मिळते "बेकायदा कामं आणि कायदा यांच्यामधे भक्तांची मोठी रांग उभी आहे, ती भेदून आमच्यापर्यंत कुणीही पोचू शकत नाही." हे सगळे पाहून विषण्ण झालेला केशा (गुराखी) देवळातली मूर्ती घेऊन पळून जातो तेव्हा दुसरी मूर्ती बसवून देवस्थानाच्या अवतीभवती असलेली बाजारपेठ सुरू ठेवली जाते. मना-मनातल्या ’देव’ या संकल्पनेला तपासून पाहायला हवे आहे याची जाणीव निर्माण करून चित्रपट संपतो..

तुमचा भविष्यावर विश्वास आहे काय? असे विचारले की बरेच जण होय म्हणत हात पुढे करतात आणि काही जण ’अजिबात नाही- क्योंकी तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नही होते’ असे म्हणतात (यातले बहुतेक जण नंतर हळूच ’राशीभविष्य’ वाचतात). तुमचा देवावर विश्वास आहे काय? या प्रश्नाचे काहीसे तसेच आहे. ठाम हो किंवा नाही असे उत्तर साधारणपणे मिळत नाही. ती व्यक्ती बुद्धीजीवी किंवा अल्प-अशिक्षीत, ग्रामीण किंवा शहरी, विचारी किंवा भाबडी, यशस्वी किंवा अयशस्वी यापैकी जशी असेल त्यानुसार स्पष्टीकरणासह उत्तर मिळते. विज्ञानाला अद्याप न सुटलेली काही कोडी निसर्गात आहेत आणि हाच ईश्वरी अस्तित्वाचा पुरावा आहे असे काही जण म्हणतात तर जगातली प्रत्येक घटना ही कोणत्यातरी वैज्ञानिक घटनेचीच परिणीती आहे असं काही जणांना वाटतं. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात "जीवनातील घटना आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, काही वेळा बाह्य परिस्थिती किंवा संभाव्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे घडत असतात त्यामागे कोणतीही पारलौकिक शक्ती नसते" तर ज्योतीर्भास्कर जयंत साळगावकर ’देव’ या संकल्पनेबाबात म्हणतात, "हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज रानावनात राहात असताना त्यांना कधी पशुपक्षांची, जनावरांची, वाऱ्यावादळाची, धरणीकंपाची तर कधी शत्रूंच्या टोळयांची भीती वाटत असली पाहिजे आणि त्यावेळी आपल्याला कोणत्या तरी गूढ शक्तीकडून सहकार्य मिळावे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असली पाहिजे. कदाचित एखादेवेळी लहान-मोठा प्रत्यय आला की यामागे सूत्र चालविणारी गूढ शक्ती असल्याची खात्री पटून तिच्याबद्दल वाटणारा आदर आणि आधार अधिक वाढला असला पाहिजे.अशा रीतीने ही संकल्पना मूर्त स्वरुप धारण करीत असताना देव या कल्पनेचा जन्म केव्हा तरी झाला असला पाहिजे".

जगातील बहुतेक धर्म देवाचे रूप अमूर्त आहे असे मानतात, देवाचा दूत असणार्‍या प्रेषिताला आदर्श मानतात, तर हिंदू धर्मात देवाला निर्गुण आणि सगुण दोन्ही रुपात पाहिले जाते. धर्म जगण्याची पद्धत ठरवतो. तो जन्माला चिकटून येतो आणि मग त्यानुसार देवाची व्याख्या स्वीकारुन माणूस जगत राहतो. वातावरण, संस्कार, विचारशक्तीनुसार प्रत्येक धर्मात कडवे, शक्य तोवर धार्मिक परंपरा पाळत राहणारे आणि नाकारणारे असे तीन गट तयार होत असतात. देवाचे अस्तित्व मानायचे वा नाही या संवेदनशील प्रश्नाबाबत मतभेद आहेत. स्टीफन हॉकिंगने तर ब्लॅक होल थिअरी द्वारे आस्तिक्यच नव्हे तर रिचर्ड डॉकिन्स सारख्या विचारवंतांनी स्वीकारलेली ’अज्ञेयवाद’ ही कल्पना सुद्धा मोडीत काढली. ते म्हणतात, "बिग बँग/स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता - त्यामुळे देवाकडे विश्व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार? हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. पृथ्वीच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाण्याचा मार्ग विचारण्या सारखा आहे.पृथ्वी गोल आहे. त्याला कडा नाहीत. सीमा नाहीत. तिथे जायचा मार्ग विचारणे हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. अर्थात प्रत्येकाला आपला विश्वास आणि श्रद्धा जपायचे स्वातंत्र्य आहेच - मला मत विचाराल तर मी म्हणेन की - देव नाही . देवाने विश्व निर्माण केलेले नाही . ईश्वर मार्गदाता नाही . ईश्वर प्रेमळ काळजीवाहू नाही . ईश्वर मुक्तिदाता नाही . कारण तो अस्तित्वातच नाही. यातून सरळ निष्कर्ष असा निघतो की , स्वर्ग खोटा , नरक असत्य आणि मरणोत्तर आयुष्य आत्मा हे सारे झूट आहे. आपल्याला हे एकच भौतिक आयुष्य , हे एकच वास्तव अस्तित्व आपल्याला लाभले आहे. विश्वाच्या अथांग निरंतर रचनेचा आस्वाद घ्यायला आणि ते शिकून घ्यायला हे जे आयुष्य मला लाभले आहे त्याबद्दल त्या विश्वरचनेचा मी ऋणी आहे."

परंतु नास्तिक्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या पेलण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य माणसांमध्ये नसते आणि त्यामुळे जगायला त्यांना देवाचा टेकू लागतोच.

गाडगेबाबा आणि एकूणच साधू-संतांनी मानवसेवेत ’ईश्वर’ शोधला, तशी शिकवणही समाजाला दिली. मात्र सामान्य माणसाचे प्रयत्न संपतात तिथून नकळत त्याच्या देवावरच्या विश्वासाची सुरूवात होते, ती देखील धार्मिक स्वरूपातच. हा विश्वास श्रद्धेच्या रूपाने व्यक्त होतो तेव्हा जगण्याचे बळ वाढते. पापपुण्याचा विधीनिषेध बाळगला जातो आणि अशी श्रद्धा माणसाला अधिकाधिक समाधानी, आश्वस्त करते. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फार नाजूक आहे. ती वेळीच ओळखता आली नाही तर हाच विश्वास अंधश्रद्धेचे रूप घेतो. योग्य-अयोग्य हा विवेक संपतो.
 "परमेश्वराची पूजा करा पण बेकायदा प्रार्थनास्थळे बांधू नका " अशी ताकीद नुकतीच उच्च न्यायालयाने सोसायटयांना दिली आहे. बुवाबाजी, गंडेदोरे याचा अतिरेक माणसामधला प्रयत्नवाद हिरावून घेतो, दैवावर सगळी भिस्त ठेवली जाते, देवाच्या नावाने बाजारीकरण केले जाते. भोळ्याभाबड्या जनतेच्या या विश्वासाचाही व्यापार केला जातो. आज आपण अनेक धार्मिक संस्थानांमधून देणगीच्या नावावर मिळालेल्या जनतेच्या पैशाची लूट बघतो, अध्यात्माच्या खास दूरचित्रवाणीवाहिन्यांवर यंत्र-ग्रहखड्यांच्या जाहिरातींचा मारा बघतो, देवळांमधून देवापेक्षा स्वत:चे स्तोम माजवणारे भोवतालचे बडवे बघतो, अनेक ठिकाणी तेला-दुधाने चिकट झालेले अस्वच्छ गाभारे बघतो, गणेशमिरवणुकीतले बीभत्स नाच बघतो, दर्शनासाठी देखील वेगवेगळ्या किमतीच्या रांगा बघतो, काळा पैसा चित्रपटनिर्मितीला वापरून आणि तो चित्रपट चांगला चालावा म्हणून देवालाच कौल लावणारे महाभाग बघतो, गावात मुलभूत सोयी नसल्या तरी गावातल्या देवळाचा कळस मात्र सोन्याच्या पत्र्याने मढवण्याचा अट्टाहास बघतो, आयुष्यात होरपळले गेलेले लोक तर्कबुद्धी गहाण टाकून बुवा-बाजीला लागलेले बघतो, भक्तांच्यातच गटातटाचे राजकारण बघतो, नवसाच्या नावाखाली देवालाच लाच देऊ करणारे भाबडे भक्त बघतो, धार्मिक ग्रंथांचे संदर्भच योग्य मानून केलं जाणारं स्त्रियांचं शोषण बघतो, आणि अशा अपप्रवृत्तींना कोणत्याच धर्माचे अनुयायी अपवाद नाही हे बघतो तेव्हा तेव्हा मन व्यथित होते.
समर्थांची उक्ती आठवते , 'जनाचा लालची स्वभाव। आरंभीच म्हणती देव। म्हणिजे मला कांही देव। ऐसी वासना।।
काहीच भक्ती केली नस्तां। आणी इच्छिती प्रसन्नता। जैसें काहीच सेवा न करितां। स्वामीस मागती।।'
इथे सेवा- भक्तीचा अर्थ प्रयत्न असावा. प्रयत्नांती परमेश्वर हे लाक्षणिक अर्थाने घ्यायला हवे.

माणसाची ’देव’ ही संकल्पना त्याच्यावरील संस्कारांनुसार, सभोवतालच्या परिस्थितीनुसार, त्याच्या आयुष्यातील अनुभवांप्रमाणे, सहवासातील व्यक्तींच्या-विचारपद्धतींच्या-संस्कृतीच्या प्रभावामुळे बदलत जाऊ शकते. गांधीजींच्या आस्तिकतेला धार्मिकतेपेक्षा सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरीण एकाच आयुष्यात या भूमिका बदलतानाही दिसतात पण त्यामागे सर्वंकष विचार, विशीष्ट अनुभूती असते. सुरूवातीला आपल्या कवितेतून
’तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन’
असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्त्वाबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्याच कवितेचे उत्तर असते..
’स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही |
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||’

मग वाटतं एखाद्याला इतकी आश्वस्त करणारी श्रद्धा, नाकारुन काय मिळणार आहे. केवळ नास्तिकतेच्या आग्रहाने जगाचे गाडे नीट चालू शकणार आहे का? त्याचा आंतरिक ओलावा टिकून राहील का? त्यापेक्षा मानू देत देवाला. कुणाला देव आपल्या पाठीशी दिसेल, कुणाला देव आपल्याच अंत:करणात सापडेल, कुणाला तीर्थयात्रेत, नामजपात, व्रतवैकल्यात, ध्यान-धारणेत सापडेल, कुणाला एखाद्या संशोधनात, प्रकल्पात, संगीतात किंवा एखाद्या सुंदर कलाकृतीत सापडेल तर कुणाला दुसर्‍याचे अश्रू पुसण्यात परमेश्वर गवसेल. एका बोधकथेत माणूस परमेश्वराला म्हणतो "तू जर माझ्याबरोबर चालतोस तर मग या वाळवंटात उमटलेली पाऊले दोनच कशी, चार का नाहीत?" परमेश्वर उत्तरतो "ती दोन पावले माझीच आहेत कारण वाळवंट पार करताना मी तुला उचलून घेतले होते". अंधश्रद्धेची वाट वगळता  देवाचा असा शोध घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असावे. त्याचा आदर व्हावा.  

Friday, November 11, 2011

स्त्रिया, पोशाख आणि समाज

परवा चित्रपटगृहात समोरच्या रांगेत एक तरूण फौज येऊन बसली. बहुतेकांनी चेहरा रूमालाने झाकला होता जणू तो त्यांच्या पोशाखाचाच एक भाग होता. चित्रपट सुरू होताच त्यांनी रूमाल बाजूला केले.. तेव्हा त्या कॉलेजकन्यका असल्याचा उलगडा झाला. आजूबाजूला काही ’जोड्याही’ येऊन बसल्या होत्या,त्यांचे रूमाल मात्र त्यांच्या चेहर्‍यावर तसेच होते. त्वचेचे संरक्षण हा साहजिकच त्या ’पडद्या’मागचा हेतू नव्हता. जगातील काही देश बुरखाबंदीसाठी चर्चा, वादविवाद करत असताना या मंडळींनी स्वेच्छेने हा ’बुरखा’ स्वीकारला आहे. धार्मिक कारणासाठी किंवा ऊन-वार्‍यापासून संरक्षण हा हेतू असेल तर अजिबात हरकत नाही पण काही मुलींना टवाळखोर मुलांपासून बचाव करण्यासाठी चेहरा झाकावा लागतो तर काही जण जगापासून आपले कृत्य दडवण्यासाठी रूमालाचा आडोसा वापरतात... ही मात्र समाजासाठी चिंतेची बाब आहे.

खरं तर पोशाख आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. आपण एखादया व्यक्तीला भेटल्यावर आपले त्या व्यक्तीबद्दल जे मत तयार होत असते ते त्या व्यक्तीचा पोशाख /पेहराव हयावरूनच. मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मुलींनी/स्त्रियांनी काय घालावे हे मात्र समाज ठरवत असतो. परदेशी स्त्रियांनी भारतात प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भातील वेबसाईटवर स्पष्ट सूचना आहेत "Women travellers in India should pay attention to local dress code for two reasons: to avoid sexual harassment and to avoid looking disrespectful" एका हिंदी सिनेमातील एक प्रसंग आठवतोय. तोकड्या कपड्यातली झीनत अमान एका सडकछाप मजनूला पकडून पोलीस अधिकारी असलेल्या अमिताभ बच्चनकडे घेऊन येते आणि तिला बघून त्या मजनूने शीटी वाजवली अशी तक्रार करते. यावर अमिताभ तिला सुनावतो "तुला अशा पोशाखात बघून लोक शीटी नाही तर काय देवळातली घंटा वाजवतील काय!" प्रेक्षक यावर मनापासून हसतात. म्हणजे असा पोशाख घातलेल्या मुलीला असाच प्रतिसाद मिळणार यात काही वावगं वाटत नाही. विद्यार्थिनींचे आखूड स्कर्ट हा सध्या ब्रिटनमधील शाळांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. शाळांनी मिनी स्कर्ट्सवर बंदी आणून ट्राउझर्स घालणे सक्तीचे केले आहे. ही समस्या एकट्या ब्रिटनमधील नाही . अमेरिका आणि युरोपीय देशांतही हा प्रश्न गंभीर बनला आहे . पण ' मिनी स्कर्ट्सवर बंदी ' हे त्याचे नेमके उत्तर नव्हे . शाळांच्या व्यवस्थापनांचा तसा दावाही नाही . एका गुंतागुंतीच्या प्रश्नावर शोधलेल्या उपायांपैकी हा एक छोटासा प्रयत्न आहे , असे त्यांचे म्हणणे आहे . आपल्या देशातही अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ड्रेसकोड हा वादाचा विषय झाला आहे . तो लागू झाल्यानंतर शिक्षणसंस्थांची डोकेदुखी थोडी तरी कमी झाली असावी असे वाटते.

विद्यार्थी विश्वासाठी हे रास्त आहे कारण शरीराबद्दलचे त्यांचे कुतूहल त्यांना अस्वस्थ करत असते. परंतु कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने मध्यंतरी ’आपल्यावरील अत्याचार टाळायचे असतील तर स्त्रियांनी सभ्य कपडे घालावेत’ असे विधान केले. या मानसिकतेला उत्तर म्हणून आणि ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच ,त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा मूर्ख स्त्रियांनी त्या मोर्चात मुद्दाम वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला, साहजिक त्या मोर्चाने समाजाला योग्य तो बोध न मिळता ’बेशरम मोर्चा’ म्हणून त्याची संभावना झाली. सामाजिक संकेतांपेक्षा वेगळा पोशाख करणे याचा अर्थ आमंत्रण देणे असा होतो हे नाईलाजाने स्वीकारुन त्यामुळे स्त्रीवरील अत्याचारांची शक्यता वाढू शकते हा वस्तुनिष्ठ विचार प्रत्येक सुजाण स्त्री करते पण मुळात हे प्रकरण ’संस्कृती सापेक्ष’ आहे. एकेकाळी पुण्य़ात सकच्छ की विकच्छ (पाचवारी साडी/ नऊवारी साडी) हा वाद रंगला होता. केरळ राज्यात तर काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी उत्तरीय वापरणे असभ्यपणाचे मानले जाई. यासाठी लढा देत कालांतराने उत्तरीय न वापरणॆ म्हणजे असभ्यपणा इथे आपण येऊन पोचलो आहोत, तर हा विचार अद्याप ज्या सामाजिक स्तरापर्यंत झिरपला नाही त्या आदिवासी समाजातील काही गटांमध्ये उत्तरीय आजही वापरले जात नाही. मग याला श्लील अश्लील परिमाण लावणारे आपण कोण? काळाच्या एका तुकड्यावर उभे राहून आपण हे कसं ठरवणार? आणि तो अधिकार आपल्याला दिला कुणी?

शिवाय स्त्रियांबाबत दुर्दैवी घटना केवळ त्या त्या काळानुसार किंवा सामाजिक चौकटीनुसार अनुचित मानल्या गेलेल्या पोशाखामुळे घडतात असे नाही कारण विकृतीला वय, नाते, रूप, रंग कळत नाही. तरूणीच नव्हे बालिका, नात्यातील गरजू परित्यक्त वृद्ध स्त्रिया, अगदी रस्त्यावरील बेवारस, मतीमंद स्त्रियांवर देखील अत्याचार होतात. पण मुलींच्या विनयभंगाचे किंवा बलात्काराचे प्रकार जेव्हा समाजात घडतात तेव्हा सर्वात आधी मुलींच्या कपड्यांविषयी , त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात .म्हणजे मुलांवर समाजस्वास्थ्याची काहीच जबाबदारी नसते का! त्यांनी ’सिक्स पॅक्स’ दाखवत फिरणे अयोग्य मानले जात नाही, त्यांच्या ड्रेसकोड बद्दल कुणाला आक्षेप नाही पण स्त्रियांच्या पेहरावाकडे मात्र समाजातील स्वयंघोषित पोलिस डोळ्यात तेल घालून पाहणार, असे का!

आपण चांगले दिसावे, आकर्षणाचे केंद्र असावे असे बहुतेक प्रत्येक मनुष्यप्राण्याला वाटते. स्त्रियांमधे ही भावना निसर्गत: अधिक प्रमाणात असते. पुरूषप्रधान समाजात या साध्या गोष्टीचा बाऊ केला जातो. उदा: एखाद्या पुरूषाची बायको निवर्तली तर त्याच्या राहणीत, पेहरावात फारसा फरक पडत नाही पण जोडीदार गमावलेल्या स्त्रीने चांगला पोशाख केला, दागिने घातले तर ती टीकेचा विषय ठरते आणि टीका करण्यात दुर्दैवाने इतर स्त्रियादेखील पुढे असतात. हे कितपत योग्य आहे!

पोशाख सभ्य असावा यात वादच नाही पण तो काय असावा हा मात्र वादाचा मुद्दा आहे. उदा: साडी हा भारतीय सभ्य पोशाख मानला जातो पण बर्‍याच चित्रपटांमधे साडीमधली ओलेती नायिका जे काय अंगविक्षेप करते किंवा सिनेमाचं जाऊ द्या ,काही स्त्रिया ज्या दिव्य तर्‍हेने साडी नेसतात ते पाहून साडीला सभ्य पोशाख म्हणायला जीभ रेटत नाही. त्यापेक्षा काही वेळा जीन्स वर व्यवस्थित टॉप हा देखील योग्य पोशाख असू शकतो. पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे सोयीचे आहे ना, ज्या समाजात आपण वावरतो तिथे तशा पोशाखाने काही औचित्यभंग तर होणार नाही ना एवढा विचार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य ते लैंगिक शिक्षण दिले गेले आणि मुळात स्त्रीकडे ’मादी’ म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून पाहण्याचा संस्कार रूजला तरच स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता मजबूत होईल. शरीर हाच खरं तर आत्म्याचा पोषाख आहे असं आपल्याच संस्कृतीत म्हटलं जातं. हे आपल्याला उमगलं, आंतरिक सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला आणि व्यक्तीस्वातंत्र्य व स्वैराचार यामधली सीमारेषा आपल्याला नीट कळली तर अशा लेखाचे प्रयोजनच उरणार नाही..नाही का !

published in matrubhumi 10-11-11

Friday, October 21, 2011

शाश्वत निधी

Published in Matrubhumi Thursday 20oct 2011

पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू

देवळात गेल्यावर दानपेटीत एक तरी नाणं टाकल्याशिवाय आपल्याला देवदर्शनाचं समाधान मिळत नाही. एखादा धार्मिक उत्सव, सप्ताह असेल, देवळाचा जीर्णोद्धार असेल तर आपण फूल ना फुलाची पाकळी देऊन आपले धार्मिक कर्तव्य पार पाडतो. कधी कधी सोन्या, चांदी,हिर्‍याने आपल्या दैवताला मढवतो देखील .. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याचवेळी समाजातील दुर्लक्षितांना आर्थिक मदत करताना मात्र आपण हात आखडता का घेतो! असं नसतं तर आनंदवनासारख्या ’माणुसकीच्या तीर्थक्षेत्राला’ आर्थिक विवंचनेनं कधीच ग्रासलं नसतं. निसर्गाने अन्याय केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलविणारे, त्यांच्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून जगण्याचे बळ देणारे बाबा आमटे यांचे आनंदवन आज आर्थिक संकटात आहे.

मदर तेरेसांच प्रसिद्ध वचन आहे, "समोर दिसणार्‍या जिवंत माणसावर जर आपण प्रेम करू शकत नसू तर अदृष्य परमेश्वरावर भक्तीरूपी प्रेम आपण कसे करणार!’
बाबा-साधनाताईंनी समाजातील अपंगांवर, व्याधीग्रस्तांवर फक्त प्रेमच केलं नाही तर त्यांच्या पुनर्वसनाचा वसा घेतला. कुष्ठरोगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही दूषित आहे. अगदी आधार कार्डाच्या नोंदणीचा देखील हक्क या बांधवांना झगडून मिळवावा लागतो यावरून त्यांचे एकूण आयुष्य सामान्य भारतीय नागरिकापेक्षा किती जिकीरीचे आहे याची कल्पना येते. बाबांचा लढा केवळ कुष्ठरोगाविरुद्ध नव्हता. जीवनात सगळी कुरूपता नष्ट व्हावी यासाठीच त्यांनी युद्ध आरंभिले होते. त्यांच्या वाटचालीत लक्षावधी उपेक्षितांच्या चेहर्‍यावर त्यांनी हास्य फुलवले. बाबा-साधनाताईंनी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कितीतरी प्रकल्प सुरू केले. डॉ. विकास आणि भारती तसेच डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांनी ती धुरा समर्थपणे वाहिली.. आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी डॉ.विकास यांनी सव्वाशेहून अधिक कुटिरोद्योगांची सुरूवात केली. कोलकात्यातून माशांची पिले आणून मत्स्यशेती सुरू केली, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड करवून घेतली. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंद्राद्वारे युवकांना रोजगार प्रशिक्षण मिळू लागले. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यात मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांच्या पर्यावरण संवर्धन केंद्रामुळे त्या परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत लक्षणीय प्रगती केली. याशिवाय आनंदवनात कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र, अंध-अपंग, कुष्ठरुग्ण यांच्या कलेचं ’स्वरानंदनवन' हे सादरीकरण यशस्वीरित्या काम करत आहेत.
बाबांची तिसरी पिढी- त्यांची तरूण नातवंडे उच्चशिक्षीत आहेत, शहरातील लखलखती दुनिया आणि लठ्ठ पगाराच्या नोकरीला न भुलता आमटे परिवाराचं स्वप्न मोठं करीत आहेत. दु:खाचा अंधार आजही आजूबाजूला सांडतच असतो, अशाच दु:खी आत्म्यांचा जत्था करून त्यांच्यावर सावली धरणारे बाबा आमटे आणि आता त्यांचा परिवार सूर्यप्रकाशाकडे तोंड करून आयुष्यभर उभे आहेत. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं पालकत्व पेलताना अनेक अडचणी समोर आहेत पण जिद्द अफाट आहे. ही केवळ पुनर्वसन केंद्रे नाहीत. अपंगांना समर्थ बनविण्याची आव्हाने यात आहेत. दु:ख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या त्या प्रार्थना आहेत.

कोणत्याही आश्रयार्थी व्याधीग्रस्ताला कधीही नाही म्हणायचे नाही हे आनंदवनाचे व्रत आहे त्यामुळे आनंदवनावर अवलंबून असणाऱ्या गरजूंची संख्या सतत वाढते आहे. प्रत्येक कुष्ठरुग्णामागे दर माणशी-दर दिवशी केवळ १५.५० रुपये एवढेच सरकारी अनुदान १२०० कुष्ठरुग्णांना मिळते. आजच्या गगनाला भिडणार्‍या महागाईत चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे, तिथे या विशाल परिवाराने तग कसा धरायचा. जगणे म्हणजे केवळ दोन वेळच्या अन्नाची, छप्पराची व कपडयाची सोय नाही तर निरंतर शिक्षण, मनुष्यत्वाचे सक्षमीकरण असायला हवे. पुनर्वसित इतर कुष्ठरुग्ण, अपंग, मूकबधिर, अंध अशा सर्वांचा विचार केल्यास आनंदवनाची लोकसंख्या अडीच हजारावर जाते. या सर्वांच्या किमान गरजा भागवणे जिकीरीचे होत आहे.

आजच्या स्वार्थी जगात समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करणार्‍या, रचनात्मक कार्यातून परिवर्तन घडवून आणणार्‍या संस्थांची संख्या नाममात्र आहे. आर्थिक संकटामुळे आनंदवनाचे कार्य झाकोळून गेले तर स्वत:ला या समाजाचा संवेदनशील घटक मानणार्‍या प्रत्येकाच्या माणूसपणाची ती हार असेल. अशा संस्थांचे कार्य थांबले तर त्याबरोबर समाजातल्या चांगुलपणावरची आपली श्रद्धा संपून जाईल. आपल्यातील अनेकांना सेवाभावी कार्य करावेसे वाटते पण त्यासाठी आयुष्य उधळून देण्याची आमटे परिवारासारखी जिगर आपल्याकडे नसते. त्यांचे हात बळकट करणे मात्र आपल्याला अशक्य नाही. वंचितांबद्दल मनात केवळ करूणा असून उपयोगाचे नाही ,त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी करुणेस कृतीची जोड द्यायला हवी, असे बाबा नेहमी म्हणायचे. या प्रामाणिक प्रयत्नांना हातभार लावताना देणगीचा विनीयोग योग्य प्रकारेच केला जाईल याची दात्याला खात्री असते. "माणूस एक वेळ बोटांशिवाय जगू शकेल पण स्वाभिमानाशिवाय जगू शकणार नाही" असं बाबा आमटयांनी म्हटलं आहे. स्वाभिमान निर्माण होतो स्वावलंबनातून.. आजवर लाखो दुर्लक्षित बांधव संस्थेच्या उपक्रमांमुळे स्वबळावर उभे राहू शकले.
अशा प्रकल्पांचा पाया असणारा आर्थिक डोलारा सांभाळण्यातच सगळी उर्जा खर्च होण्यापेक्षा एक कायमस्वरूपी निधी जमा व्हावा व त्यातून अधिक जोमदारपणे काम करता यावं ,नवी आव्हाने पेलता यावी असा आनंदवनाचा मानस आहे. त्यातून दरवर्षी होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांची संख्या १५०० वरून ९०००पर्यंत वाढवणे , अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाच्या जमिनींवरील जल व मृद संधारणाचे कार्य वर्षाला १०० वरून १२०० कुटुंबांपर्यंत विस्तारणे, युवाग्राम प्रकल्पात बेरोजगारांना मिळणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ १०० हून पाचपटीने वाढविणे, स्थानिक पातळीवर होणाऱ्या वाषिर्क श्रमसंस्कांर छावणीस राज्यव्यापी छावण्यांचे स्वरूप देणे असे अनेक उपक्रम पूर्णत्वाला नेण्याचे आनंदवनाचे स्वप्न आहे. यासाठी ५५ कोटी रूपयांचा शाश्वत ’समाज प्रगती सहयोग निधी’ उभारणे आवश्यक आहे. यापैकी २७.५ कोटी एवढ्या निधीस दिल्या जाणाऱ्या योगदानाला इन्कम टॅक्स विभागाकडून कलम ३५ एसी/ ८० जीजीए(२)(बी)(बी) अंतर्गत १०० टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु ३१ मार्च २०१२ पर्यंतच ही करसवलत लागू राहणार आहे. मदतीचे चेक महारोगी सेवा समिती, वरोरा या नावाने अपेक्षित आहेत. चेकच्या मागे आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, ई मेल आयडी आणि पॅन चा उल्लेख आवश्यक आहे. आपण चेक या पत्त्यावर पाठवू शकता :
सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा जि. चंदपूर, महाराष्ट्र. पिन: ४४२९०७
याशिवाय ऑनलाईन बॅंकींग द्वारे अर्थसहाय्य करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क (०७१७६) २८२०३४ आणि ९०११०९४६२३
इ-मेल : vikasamte@anandwan.in

"पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू"
अशी साद घालणार्‍या आनंदवनाच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी केवळ हा निधी आवश्यक नाही, या निमित्त्याने सहृदयतेचा..माणुसकीचा.. वारसा जपल्याचे समाधान आपण मिळवू शकू.

Monday, October 10, 2011

अॅपल



आपण जग बदलू शकतो- स्टीव्ह

'वेळ थोडा आहे. तुमचं मन सांगतं त्या रस्त्याने जा. मी ही तेच केलं' अस सांगणारा स्टीव्ह जॉब्ज अर्ध्या वाटेवरून निघून गेला. ३५० अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेली 'अॅपल’ कंपनी स्वकर्तृत्वावर उभी करणारा स्टीव्ह हा संगणक क्षेत्रातील असंख्य तरुणांचा आदर्श होता. या सार्‍यांच्या मनात चेतनेचा एक झरा हरविल्याची भावना स्टीव्हच्या निधनामुळे निर्माण झाली आहे. अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत स्टीव्ह ४२ व्या क्रमांकावर होता, पण त्याचं मोठेपण या यादीच्या पलीकडचं आहे. प्रत्येक माणूस स्वप्नाळू असतो, पण ती स्वप्नं आपोआप पूर्ण होत नाहीत. ’नापास’ चा शिक्का लागल्याने शिक्षण अर्धवट सोडणार्‍या स्टीव्हनं स्वप्नं बघणं सोडलं नाही. जिद्दीच्या जोरावर ती स्वप्नं त्याने पूर्णही केली. त्याच्या प्रत्येक प्रयोगाकडे कौतुकाने बघणार्‍या जगाला स्वप्नपूर्तीची आणि नवनिर्मितीची प्रेरणा स्टीव्हने दिली. यकृताचा गंभीर आजार झाल्याचे कळले तेव्हा न खचता त्याने या आजाराशी मैत्री केली, उलट तो नव्या उर्जेने कामाला लागला. उरलेले आयुष्य अधिक क्रियाशील, अधिक सुंदर करून कुटंबाच्या सान्निध्यात शांतपणे त्याने या जगाचा निरोप घेतला.

अरब वडील व अमेरिकन आईच्या पोटी २४ फेब्रुवारी १९५५ रोजी सॅनफ्रॅन्सिस्को येथे स्टीव्हचा जन्म झाला. अविवाहित असल्याने त्याच्या आईवडिलांनी क्लॅरा आणि पॉल जॉब्स या मध्यमवर्गीय अमेरिकन जोडप्याला स्टीव्हला दत्तक दिले. १९७२ मध्ये पदवीधर झाल्यानंतर स्टीव्हने पोर्टलँडमधील रीड कॉलेजमध्ये ' ऑडिटिंग ' अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पहिल्याच परीक्षेत नापास झाल्याने त्याला कॉलेजमधून काढण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे स्टीव्हवर त्या भागातील हरेकृष्ण मंदिरातील अन्नछत्रात जेवायची वेळ आली. आत्मिक शांततेच्या शोधात विशीतला स्टीव्ह मित्रासह भारतात देखील भटकला पण त्याला हवा मानवली नाही ,शिवाय लुबाडण्याचाही प्रयत्न झाला. जगभरातल्या बड्या कंपन्या भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहतात, कदाचित पूर्वानुभवामुळे स्टीव्हनी पुढेही भारतीय बाजारपेठेत रस घेतला नाही.

१९७६ मध्ये स्टीव्हने मित्राच्या सोबतीने ' अॅपल ' या जगप्रसिद्ध संगणक कंपनीची निमिर्ती केली. १९८४ मधे मॅकिन्टॉश हा स्वस्त आणि जलदगतीने काम करणारा तसेच डेस्कटॉप पब्लिशिंग (डीटीपी) सुविधा उपलब्ध करून देणारा कॉम्प्युटर बाजारात आणला. मात्र अंतर्गत वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे चक्क संस्थापकाला म्हणजे स्टीव्हलाच, कंपनीतून काढून टाकण्यात आले. या अवहेलनेमुळे निराश न होता स्टीव्हने १९८९ मधे 'नेक्स्ट कॉम्प्युटर' ची निमिर्ती केली पण बाजारात हे उत्पादन यशस्वी ठरले नाही. हार न मानता स्टीव्हने ' अॅनिमेशन क्षेत्रात ’पिक्सार' ची सुरूवात केली आणि ’टॉय स्टोरी’ सारख्या अॅनिमेशन पटांतून निर्विवाद यश मिळवले. आर्थिक संकटात सापडलेल्या ’अॅपल’ ने स्टीव्हला सल्लागार म्हणून सन्मानाने परत बोलावले. स्टीव्ह जिंकला पण त्या आनंदात गुरफटून न राहता त्याने ’अॅपल’ सह नव्याने झेप घेतली.

२००१ साली पहिला पोर्टेबल म्युझिक प्लेयर स्टीव्हने बनवला. २००३ साली आलेल्या आयट्युन्स, आयपॅडच्या माध्यमातून त्याने संगीत व्यवसायाला नवी दालनं उघडून दिली. एका आवडत्या गाण्यासाठी संपूर्ण अल्बमची सीडी घ्यावी लागणारा ग्राहक एका आयपॅडमध्ये आपल्या आवडीची हजारो गाणी सेव्ह करू लागला. आज आयपॅड शिवाय तरूणाईचे पान हलत नाही. अशा उत्पादनांमुळे स्टीव्ह घराघरात पोचला. २००७ साली मोबाइलच्या दुनियेतील अग्रणी स्मार्टफोन म्हणजेच आय-फोन स्टीव्हने जगाला दिला. अॅपल स्टोअरच्या माध्यमातून त्याने सॉफ्टवेअर वितरण अगदी सोपे केले. दोन वर्षांपूर्वी त्याने 'टॅबलेट पीसी 'ला जन्म दिला. शाळेतल्या पाटीच्या आकाराचे हे टॅबलेट आज तरुणांना आकर्षित करत आहेत.

अॅपलचे नवे सीईओ टीम कूक स्टीव्हला प्रेरणादायी मार्गदर्शक मानतात. बराक ओबामांना स्टीव्हचा ’आपण जग बदलू शकू’ हा आत्मविश्वास भावतो. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड त्याच्या कल्पकतेचं कौतुक करतात तर उद्योजक रतन टाटा त्याला आधुनिक युगातील एक प्रवर्तक मानतात. सामान्य माणसाला तंत्रज्ञान सोपं करून देण्याचं कौशल्य स्टीव्हकडे होतं, ट्विटर चे सीइओ लॅरी पेग म्हणतात "स्टीव्हमधे ग्राहकांचा अनुभव लक्षात घेऊन त्यानुसार बदल करण्याची वृत्ती होती". दूरदर्शी स्टीव्हनी ग्राहकांच्या उद्याच्या गरजा आजच ओळखल्या. उत्पादनांमधलं नावीन्य आणि सौंदर्यही जपलं. कोणत्याही व्यावसायिकासाठी स्टीव्ह म्हणजे एक विद्यापीठ होतं. आगामी काळात अद्यावत ’अॅपल’ टीव्ही बाजारात येईल, त्यानंतर प्रोजेक्टरची सोय असलेले आयपॅड, आयफोन आणि इ-पेपर शी संबंधित तंत्र येतील. ही सगळी डिझाईन्स स्टीव्हने अगोदरच तयार केली आहेत. शब्दश: तो काळाच्या चार पावले पुढे होता. त्यामुळे यानंतरही स्टीव्ह आपल्या सोबतच असेल मात्र तंत्रज्ञानाच्या रूपात !

(Image courtesy - Google -for noncommercial use)

Tuesday, September 20, 2011

न्याय

’अजब न्याय’

कन्नड सिनेक्षेत्रातील यशस्वी अभिनेता दर्शन हा सध्या (पंचतारांकित) तुरूंगात ,जामीनाच्या प्रतीक्षेत आहे. बायको-विजयालक्ष्मीला भीषण मारहाण केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता या कन्नड अभिनेत्रीशी त्याचे संबंध असल्याच्या चर्चेमुळे पती पत्नीत या विषयावरील वाद विकोपाला गेला व त्याने बायकोला अक्षरश: झोडपून काढले. एवढेच नव्हे, याआधीही काही ना काही कारणावरून दर्शनने बायकोचा प्रचंड छळ केला होता. विस्मयाची बाब म्हणजे दर्शनच्या सिनेक्षेत्रातील मित्रमंडळींच्या दडपणामुळे याच अगतिक विजयालक्ष्मीने ’बाथरूममधे पडल्याने मार लागला’ असा जबाब दिला. तो स्वीकारला गेला नाही हा भाग अलाहिदा!
या कहाणीची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक आहे. निकीता या कन्नड अभिनेत्रीवर दर्शनशी संबंध असल्याचा आरोप आहे. यामुळे दर्शनच्या वैवाहिक जीवनातली ’शांतता व सौख्य’ भंग करण्याचे ’पाप’ निकीताने केले आहे असा ’निष्कर्ष’ कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने काढला. याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तिच्यावर ३ वर्षाची बंदी घातली आहे. या काळात तिला काम मिळणार नाही याची ही संघटना खबरदारी घेईल. तसेच तिला कोणताही खुलासा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाढते विवाहबाह्य संबंध हा सामाजिक चिंतेचा विषय जरूर असावा, पण निदान सुशिक्षित, सुसंस्कृत वर्गात तरी त्यावर संबंधितांनी वैध मार्गाने तोडगा काढणे अपेक्षित असते. प्रेम, विवाह हा व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा भाग आहे, व्यावसायिक जीवनाचा नाही. दर्शनच्या आयुष्यातील किमान या दोन स्त्रियांचे उदाहरण बघितले तर बायकोवर नवर्‍याची हुकुमशाही लादली गेली आहे आणि निकीतावर समाजातील तथाकथित नैतिक पहारेकर्‍यांची दडपशाही. जर कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सला वैवाहिक सौहार्दाची एवढी कळकळ आहे तर दर्शनने याआधी बायकोवर केलेल्या अत्याचाराकडे डोळेझाक का केली गेली! निकीताशी त्याचे संबंध असलेच आणि हे गैर मानले तर तिच्याइतकाच दर्शनही दोषी आहे. मग त्याच्यावरही बंदी का घातली गेली नाही? मुळात असा एकांगी न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला?

संकुचित भारतीय मानसिकतेचा विचार करता दर्शनवर बायकोला ’फक्त’ मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे.. त्यामुळे लोक हा प्रसंग विसरून जातील. तुरूंगातून सुटल्यावर दर्शन नव्याने चित्रपट स्वीकारेल, व चर्चेत राहिल्यामुळे कदाचित अधिकच यशस्वी होईल. निकीता बंदीच्या काळात विस्मृतीत जाईल. विजयालक्ष्मीचे भवितव्य तर आता अंधारातच आहे कारण तिने नवर्‍याविरोधात तक्रार करण्याचे भलतेच धाडस केले आहे. उच्चभ्रू(!) समाजातील ही घटना एखाद्या आदिवासी पाड्यावर किंवा दुर्गम खेड्यात, जातपंचायतीने पुरूषी निकषांवर त्याचा निवाडा करावा, अशाच पद्धतीची आहे. पाड्यावरील स्त्रीपेक्षा ’सौभाग्यवती’ विजयालक्ष्मी आणि ’वलयांकित’ सिनेअभिनेत्री निकीता यांची अवस्था वेगळी नाही.
मध्ययुगीन मानसिकतेच्या पट्ट्याने करकचून आवळलेले आधुनिकतेचे ढोल ,पुरूषी हातांनी आपण आणखी किती काळ वाजवणार आहोत!

Sunday, September 11, 2011

जयू


केव्हाही फोनवर विचारलं- ‘कशी आहेस?’ की खळाळून हसत तिचं उत्तर येतं- ‘मज्जेत." या वेळी म्हणाली ,"सध्या .......  कॉलेजला सीएचबी वर अर्थशास्त्र शिकवतेय सिनीयर कॉलेजला. ........ मध्ये पण शिकवायला बोलावतायत. पण इथेच पर्मनंट व्हायचा प्रयत्न करतेय,". जयू आणि प्राध्यापिका? कल्पनाशक्तीला प्रचंड ताण दिला तरी हे दृश्य नजरेसमोर येत नाही. 

एकच शाळा आणि जवळच राहत असल्याने जयूची ओळख सहावी-सातवीत असताना झाली असली तरी त्याआधीही जयू आणि तिची बहीण तिच्या आजोबांसह शाळेत जाता-येताना दिसत असत. त्या दोघी टम्म फुगलेल्या पाणीपुरीसारख्या गोलमटोल! घट्ट वेण्या- वर रिबीन लावून बांधलेल्या! कधीतरी जातायेता बोललो आणि मग रोजच शाळेत बरोबर जायला लागलो. ती मला एक वर्ष सिनीयर. भन्नाट प्रकरण.
संध्याकाळी आम्ही मुलं-मुली दोन टीम करून खेळत असू. खेळताना भांडणं झाली तर जयू मुलांशीही बिनधास्त मारामारी करत असे. भांडण आटपून घरी जाताना वळून पाहत ती ‘जा रे भाजक्या वांग्या, ए कोबीगड्डय़ा’ अशी खास विशेषणं वापरत असे. मस्तमौला म्हणतात तसं हे प्रकरण होतं. अभ्यास वगैरे करण्यात आयुष्यातले अनमोल क्षण ती व्यर्थ दवडत नसे. वाचनाचा तर तिला प्रचंड कंटाळा. फॅन्टम, चाचा चौधरी वगरे कॉमिक्स मी ‘धडाम, फटॅक’ अशा ‘साऊंड इफेक्ट’सह वाचायचे आणि तिने फक्त चित्रे पाहायची. पण त्यातली एखादी चौकट सुटली तर मात्र ती लोडाला टेकून ‘हे राहिलंय’ म्हणून सांगायची.
कलाकुसरीच्या वस्तू ती सुंदर करायची आणि आईला मदतही. तिला सातवी-आठवीतच सगळा स्वयंपाक करता यायचा. तिची ताई असेल तिच्याहून तीनेक वर्षांनी मोठी. गरीब गाय. बाबा रेल्वेत ऑफिसर. अगदी कडक स्वभावाचे! पानातली पोळी गरम नसली तर ताडकन् उठून जाणारे! ती त्यांना नीट सांभाळून घेत असे. आईला रक्तदाबापासून अनेक विकार. त्यात सतत काळजी करण्याचं व्यसन. सकाळ झाली की ‘आज पाणी येणार की नाही,  ‘कामाला बाई येणार की नाही!" काळज्या सुरु. जयूला भाऊ नसल्याने आणि तिचे बाबा दिवसभर कामामुळे बाहेर असल्याने आम्हा मैत्रिणींचा अड्डा तिच्याच घरी असायचा. पत्ते, कॅरमपासून अंगणातल्या शिवाशिवीपर्यंत, डब्बापार्टीपासून एकत्र सर्कस, सिनेमा पाहण्याच्या प्लॅनपर्यंत सारे काही तिच्याचकडे होई. प्लॅन आखणे, ते सर्वाच्या गळी उतरवणे आणि त्याला लागणारे पैसे प्रत्येकीकडून विनासंकोच मागून घेणे, यांत ती तरबेज होती.
जयू सिनेमा फारच दंग होऊन पाहायची. ‘ये तो खुशी के आसू है पगले!’ यासारखे अपेक्षित डायलॉग ती स्वत:च जोरात खिदळत म्हणायची. परंतु मागून कोणी बोलत असेल तर त्यांना ‘अहो, आम्ही तुमचे डायलॉग ऐकायला नाही काढलं तिकीट!,’ असे खुशाल ओरडायची. 
रस्त्याने जाता-येता भेटणाऱ्या प्रत्येकाशी (सर्वाबद्दल ती ‘अपडेट’ असे!) हसून बोललेच पाहिजे, असा तिचा दंडक होता. शिवाय ती त्या- त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीप्रमाणे विषय काढत असे. उदा. संसारग्रस्त बायकांना- ‘काय काकू, झाले का पापड?’, तर लहान मुलीला- ‘ए मश्त आहे हं ड्रेश तुझा!’ आणखी मोठय़ा मुला/मुलीला ‘कधी आहे परीक्षा तुझी?’ अगदी डॉक्टरांनाही- ‘त्या अमक्याला अपघात झाल्याचं कळलं का? मुंबईला नेलंय!’अशी माहिती पुरवत असे. वय, जात,लिंग, दर्जा अशी कोणतीही गोष्ट तिच्या या संवादाआड येत नसे. या संवादकौशल्यामुळे ती कुणाही अनोळखी व्यक्तीचं अख्खं खानदान माहीत करून घेई. 

शेजारी वा ओळखीचे किल्ली त्यांच्याकडे ठेवून गावाला जात. ते परतायच्या दिवशी ही त्यांच्या घरी पाणी भरून ठेवी. कधी पोळ्याही करून ठेवी. गावाहून आल्यावर दमलेली असते बाई- याची तिला त्या वयातही जाण होती. (या तिच्या सवयीवर फिदा झालेलं एक घर आता तिचं सासर आहे. असो.) पुलंच्या ‘नारायण’सारखी ती मदत करी. पण ‘परोपकारी गंपू’सारखी निरपेक्ष नाही; तर तिला त्याची पावती कौतुकरूपाने हवी असायची. ‘त्यांनी नंतर तुला साधा चहाही विचारला नाही,’ म्हणून चिडवले की- ‘आपल्याला नसतेच अपेक्षा! पण पद्धत म्हणून काही असते की नाही?,’ म्हणत जयू फणफण करणार! शिवाय पुढच्या वेळेस- ‘चिकाची चव पण दिली नाहीत तुम्ही. या वेळेस मात्र विसरू नका,’ असं सरळ त्यांना सुनवायलाही ती कमी करायची नाही.
कॉलेजमध्येही ती गुटगुटीतच दिसे. त्यावरून ‘काय झालं, बाळ रडत होतं..’ असं ग्राईप वॉटरच्या जाहिरातीतल्यासारखं कुणी चिडवू लागलं की ‘एक कानाखाली दे त्याला,’ असं सणसणीत प्रत्युत्तर ती देत असे. पण त्यातल्याच एखाद्याशी नंतर तिला बोलताना किंवा नोट्सची देवाणघेवाण करताना पाहून मी थक्क होत असे. ‘एकटा मुलगा वाईट नसतो. पण ग्रुपमध्ये उगाचच तो असं वागतो,’ असं मानसशास्त्रीय कारण ती तेव्हा देई. रविवारी आम्ही तापीवर फिरायला जात असू तेव्हा ‘वाचलेल्या पुस्तकातल्या गोष्टी सांग,’ अशी तिची फर्माईश असे. तिला शेरलॉक होम्सच्या किंवा मतकरींच्या भयकथा आवडत. त्याच मग ती रंगवून इतरांना सांगे. रोजचा पेपरही ती वाचत नसे पण  एकदा तिच्या कॉलेजमधली मैत्रीण अद्याप मी पु.लं वाचलेच नाहीत म्हणाली, तेव्हा ही मला डोळा मारत तिला म्हणाली..."अय्याss तू पु.लं वाचले नाहीस, मग जगण्याला अर्थ काय तुझ्या!!"

आम्ही काही दिवस समितीची शाखा घेत असू. तेव्हा तिच्या नेतेगिरीला रंग चढे. ती गायचीही छान. आमचे समितीत जाणे पुढे जमेनासे झाले तरी एक काकू आम्हाला पकडून नेहमी काहीतरी गळ घालत. त्या येताना दिसल्या रे दिसल्या की ही ‘खतरा’ असं ओरडून मला ओढत दिसेल त्या घरात शिरे. आणि त्या दिसेनाशा होईपर्यंत त्या घरी गप्पा ठोकीत बसे. (ते घर अर्थातच तिच्या ओळखीचे असे.) सार्वजनिक गणपती आणि नवरात्रात ती घरी सापडत नसे. रांगोळी काढण्यापासून महाप्रसादात वाढण्यापर्यंत, काकडआरतीपासून दांडिया खेळण्यापर्यंत सगळ्यात ती पुढे. गुलालात माखून मुलांमध्ये ती बिनधास्तपणे वावरत असे. गणपती उत्सवातील एका फॅन्सी ड्रेस स्पध्रेत तिने ‘वेडी’ची भूमिका केली होती. गर्दीतून स्टेजवर तिने अशी काही एन्ट्री घेतली, की अर्ध्या प्रेक्षकांनी दचकून किंकाळ्या फोडल्या. निवडणुका आल्या की आमच्या प्रभागातल्या आवडत्या उमेदवाराचा अगदी हिरीरीने प्रचार करायची आणि तो निवडून आल्यानंतर त्याच्या विजयमिरवणुकीत गाडीच्या टपावर त्याच्या शेजारी बसून वगैरे v ची खूण करत असे. (प्रभागातल्या सगळ्यांची खरं म्हणजे त्या उमेदवारापेक्षाही तिच्याशी जास्त ओळख असावी) मी तिला गंभीरपणे यात करिअर कर असे सुचवित असे. त्यावर "जाऊ दे ग, आम्ही मागून सतरंज्या उचलण्यातच हुशार" असे ती म्हणे.

एकदा कशावरून तरी तिला प्रचंड हसू आलं म्हणून गल्लीच्या कोपऱ्यावर खुशाल पोट धरून गुडघे खाली टेकवून हसत बसली. वर बाजूने जाणाऱ्या स्कूटरवाल्याच्या चमत्कारिक चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, ‘जा- जा काका तुम्ही. मी अगदी नॉर्मल आहे.’ सामाजिक संकेत नावाच्या प्रकाराशी तिला घेणंदेणं नव्हतं. ज्या क्षणी जे करावंसं वाटेल ते ती बिनधास्त करी. मात्र, परीक्षेचा निकाल जवळ आला की ती मला चोरून गणपतीला प्रदक्षिणा घालत असे. एकदा तिला असं करताना पकडल्यावर ती उलट मला म्हणाली, ‘याने चांगला व्यायाम होतो." मी त्यावरून पुढे तिला खूपदा चिडवलं होतं. 
कधी मला पेरुची बर्फ़ी किंवा तत्सम नवा पदार्थ देई. ’दीड तास लागला आटवून करायला,"असे थकून म्हणे. मी तिला चिडवायला म्हणायचे ’या पेक्षा थेट नुसता गोड पेरूच का खाऊ नये...’ मग ती माझ्या अरसिकपणावर मला लेक्चर देई. कधी कुठल्यातरी ’चेन मार्केटिंग’ च्या जाळ्यात अडकून मला म्हणे ’ही पॉलिसी काढली ना तर आपल्याला अमुक जीबी जागा इंटरनेटवर फुकट मिळेल.’ मी विचारलं "बर, मग त्या जागेचं तू काय करणार? लोळणार की लोणचं घालणार?" की ती निरूत्तर होऊन कुरकूरत म्हणे ’मला वाटलंच तू टाचणी लावणार..." 
कुणाला मेंदी काढून दे, कुठले तरी मणी आणून वॉलपीस कर, टाकाऊचे टिकाऊ कर असं तिचं सतत सुरू असायचं. ’तुझ्या वाचनाने फक्त तुला आनंद मिळतो पण अशा वस्तूंमुळे करणार्‍या आणि पाहणार्‍या दोघांनाही आनंद मिळतो’ असा तिचा बिनतोड युक्तीवाद असायचा. मी पुढे शिकायला बाहेर गेले तरी संपर्क होताच, घरी आले की मी आधी तिच्याकडे धाव घेई. एरवी ती मला तिच्या सुंदर अक्षरात आमच्या ’कोड’ भाषेत (अगदी प्रत्येक व्यक्तीच्या टोपणनावाचा वापर करून) लांबलचक पत्रे लिहायची. त्यात,’ राजीव गांधी कित्ती स्मार्ट दिसतो,नाही! ” इथपासून कोणाकडे लग्न ठरलं, तिने केलेलं रुखवत कसं सगळयांना आवडलं इथपर्यंत किंवा बप्पी लाहिरी चे ’मामामिया पॉम पॉम’ ह्याला काय गाणं म्हणतात का, या संतापापासून ते तिच्या कॉलेजच्या निवडणुकीतील राजकारणापर्यंत ’anything under the sky', मजकूर नुसता गळत असे.

जयूच्या बाबांना प्रथम वर्गाचा रेल्वेचा पास मिळे. प्रवासात ते त्यांचा लाडका पामेरिअन कुत्राही सोबत घेऊन जात. एकदा ती, तिची आई, आजी आणि हे श्वानमहाशय असे चौघे तिच्या काकांकडे निघाले होते. या सर्वाचे पास होते, पण आजीचे तिकीट काढायचे राहिले होते. हे लक्षात येताच जयू पळत गेली. तोवर इकडे गाडी सुटली. धावत येऊन कशीबशी तिने गाडी पकडली खरी; पण फलाट संपताना तिला बाकीची मंडळी खालीच चक्रावलेल्या अवस्थेत उभी असलेली दिसली. झाले! तिने गाडीची साखळी ओढली. गाडी थांबताच खाली उडी टाकून ती फलाटाकडे धावली. टी. सी. आणि रेल्वे पोलिस तिच्या मागे. त्यांना तिने ‘मेरा कुत्ता नीचे रह गया था,’ असे कारण सांगताच त्यांनी ‘ट्रेन क्या तुम्हारे.. ’ म्हणून ओरडायला सुरुवात केली. हीऽऽ गर्दी जमली. काकांच्या (तिचे बाबा) ओळखीच्या अधिकाऱ्यांमुळे तिची यातून कशीबशी सुटका झाली. 

एके दिवशी रेल्वेस्टेशन कॅन्टीनवर भरदुपारी काही गुंडांनी हल्ला केला. कॅशच्या चाव्या देण्यास नकार दिल्याने जयूच्या बाबांना त्यांनी चांगलीच मारहाण केली. मुंबईला काही दिवस त्यांना उपचार घ्यावे लागले. शिवाय कोर्ट केस! तशात त्यांची बदली झाली! काकूंना आधीच बरेच आजार होते. या प्रसंगानंतर तर अतिताणामुळे त्या गेल्याच. अशातच ताईचे लग्न होऊन ती प्रसूतीसाठी माहेरी आलेली. काका आधीच धक्क्यात. मदतीला जवळचे कुणी नातेवाईक नाहीत. अशावेळी जयूच्या खंबीरपणाने आम्ही थक्क झालो. आम्ही मैत्रिणी आणि तिने मिळून घर सावरलं. आपल्या धाकटय़ा असण्याचा बाऊ न करता ती माय, मावशी सगळं काही झाली.  घरातल्या कामांप्रमाणेच ती बाहेरचं कोणतंही काम बोलक्या स्वभावामुळे आणि ओळखींमुळे सहज करून टाकी. काम होत नसेल तर आत शिरून थेट मुख्य साहेबांशी बोलायलाही ती भीत नसे. स्वत:बरोबर ‘लगे हाथ’ इतरांचीही कामं करू देई. अगदी पोस्टात जातानाही ती शेजारीपाजारी विचारी- ‘टाकायचंय का काही पत्र?’ मोलकरणीकडचे लग्न असो, कॉन्व्हेंट शाळेतील जुन्या मत्रिणी / रेल्वेतील ख्रिश्चन मंडळींची ख्रिसमस पार्टी असो वा एखाद्या घरचे कुळाचार, मावंद- ती घरचं कार्य असल्यासारखी आपुलकीने व सहजतेने वावरे.

काकांनी आता जयूसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. ते भारी स्थळे पाहत. तेव्हा जयू म्हणायची, ‘यांची मुलगी बीकॉम सेकंड क्लास आणि जावई शोधताएत लॉर्ड फॉकलंड! रेल्वेतला नवरा हा तिचा ‘मि. राईट’ होता. का, तर प्रवासाला वर्षातून तीन पास आणि सहा पीटीओ मिळतात म्हणून! एखाद्या मुलाच्या (स्थळाच्या) घरी गेल्यावर तिचे ‘गृहकृत्यदक्ष्यत्व’ ठसवायला काका चक्क तिलाच चहा करायला सांगायचे. ती (आयुष्यात प्रथमच पाय ठेवलेल्या त्या घरात) वैतागून चहा करायची. पण लाजण्याबिजण्याच्या भानगडीत न पडता उलट त्या मुलाकडच्यांचीच मुलाखत घ्यायची. जणू काही जयूच त्या मंडळींना ‘बघायला’ आली आहे.
नंतर मात्र जयूने एका मैत्रिणीच्या भावाशी (रेल्वेशी प्रतारणा करून) प्रेमविवाह केला. सासर घरालगत होतं, म्हणजे बाबांची काळजी नाही. ती त्यांच्या मुलाच्या भूमिकेत शिरली. ज्यांच्याशी जमलं नाही त्यांच्याबद्दलचा राग वा विषाद तिच्या शब्दांत चुकूनही कधी डोकावत नाही. लग्नानंतर तिने आपलं वजन उतरवलं. सटरफटर नोकऱ्याही केल्या. पुढे मुलगी झाल्यावर मुलीसाठी वेळ हवा म्हणून नोकरी हा विषय बाजूला सारला. नवऱ्याच्या प्रोत्साहनाने तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं ,अर्थशास्त्राची तासिका तत्त्वावर प्राध्यापिका झाली! परंतु कायम केलं नाही तर सरळ शिक्षिका होईन शाळेच्या मुलांमध्ये रमेन म्हणायची. विद्यार्थ्यांचा उत्तम फीडबॅक तिनं मिळवला. 
मधे फोनवर सांगत होती ’पी एच. डी करायच म्हणतेय.....’.तिने ग्रामीण बॅंकेपासून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपर्यंत कोणताही विषय घेतला तरी मला धक्का बसला नसता (त्यासाठी थेट ओबामाना भेटायलाही ती बिचकणार नाही. ती त्या मुलाखतीत विनोद करून त्यांना ’द्या टाळी’ सुद्धा म्हणेल आणि व्हाईट हाऊसच्या किचनमधे जाऊन चहा सुद्धा करून आणेल असे मी तिला गमतीने म्हणायचे. ’न्यूनगंड’ नावाचा शब्दच तिच्या डिक्शनरीत नाही.) मला आश्चर्य वाटतं ते याचं की तिचा हा कायापालट काही एका रात्रीत झालेला नाही, हे सगळ तिच्याआतच कुठेतरी विस्कळीत रूपात दडलेलं होतं पण तिला ते गवसत नव्हतं. अर्थात ही नवी ती मला जितकी भावते तेवढीच आधीची ती ही प्रिय होती...कारण आतून ती अजूनही तश्शीच आहे. ’परवाच्या अर्थसंकल्पावर मत काय मॅडम आपले?’ अशी मी चेष्टा करताच ’मी फक्त चॅनेल्सना ’बाईट’ देते’ असे म्हणत हसत होती. 

सगळ्या जगात मी तिला सर्वात जास्त ओळखते असे ती माझ्याबद्द्ल नेहमी सांगते. पण ती तिला स्वतःला तरी कुठे ओळखू शकली होती! मी बाहेरुन तिचा कोषातून बाहेर पडण्याचा प्रवास पाहिला, तिच्या आत मात्र एक निसर्गदत्त फुलपाखरु सतत भिरभिरताना दिसायचं.
कृत्रिम मुखवटय़ांच्या आजच्या जगात दुर्मीळ असलेलं जयूचं निखळ हास्य, ‘कोण काय म्हणेल?’ याचा निरर्थक विचार न करता संवादाच्या पुलाने, मदतीच्या हाताने जग जोडून.. खरं तर स्वत:कडे ओढून घेण्याच्या तिच्या स्वभावामुळे ती मला जास्त प्रिय आहे. तिच्यातल्या उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या उसळत्या कारंजात तिच्या सहवासातला प्रत्येकजण तसाच चिंब होऊन जातो. आजची एका मुलीची आई असलेली जयू.. आतून अजूनही तश्शीच आहे! प्रफुल्लित, पारदर्शक आणि कायम मज्जेत!! माझ्या मनातले बरेच ’जीबी’ तिने कायमचे व्यापलेत आणि (तिच्या परवानगीने) आमच्या मैत्रीच्या पॉलिसीमुळे,आज इंटरनेटवर हे काही ’के.बी’ तिच्यासाठी.......!! 
०८/०९/२०११
---------------------------
लोकसत्ता- लोकरंग ’सर्किट’ सदरात प्रसिद्ध झालेला लेख
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181045:2011-09-08-10-59-48&Itemid=1

---------------
वरचा लेख २०११ सालचा आहे. लोकसत्तेला याचं संपादित व्हर्शन पाठवण्याआधी तिला फोन केला. तुला आधी वाचायला पाठवू का, विचारलं. ती म्हणाली, "तू लिहिला आहेस नं, बस. मग आता थेट पेपरमध्येच वाचेन" मला नि:शब्द केलं तिनं. लेख प्रसिद्ध झाला त्यादिवशी काय काय प्रतिक्रिया आल्या ते नंतर मला फोनवर भरभरून सांगत होती.
दरम्यान आमची तशीच मस्ती, गप्पा कधी प्रत्यक्ष भेटीत, कधी फोनवर सुरु होत्या. 
१७ डिसेंबर २०१७ -  शाळेतले काही जण भेटणार होतो म्हणून एका वर्गमित्रासह आधी  जयूकडे गेले मग तिच्यासह आम्ही शाळेत गेलो. कॉलेजमध्ये सीएचबी शिकवायचा कंटाळा आल्याने जयूने आमचीच शाळा जॉइन केली होती. मुलं ख्रिसमसपूर्व स्पर्धांच्या तयारीत होती. जयूभोवती "मिस मिस प्लिज सी धीस" करत गराडा घालत होती. मी निघताना मला म्हणाली, "उन्हाळ्यात मुलांना घेऊन माहेरी जाणार असशील तर माझं आणि मुलीचंही रिझर्वेशन कर. काकूला सर्प्राईज देते." 
मी २०१८ च्या फेब्रुवारीच्या १ तारखेला म्हणजे दीडच महिन्यानी तिला फोन केला , रिझर्वेशन करतेय, करु नं तुमचंही. तर म्हणाली, "नको करूस. माझ्या सासूबाईंना बरं नाही, मलाही बरं नाही पण काळजीचं कारण नाही. किडनी स्टोनचंच आहे काहीतरी. औषध घेते आहे. पुढच्या वर्षी नक्की येईन" मी ट्रीटमेंटचं नीट विचारून नाराजीनेच फोन ठेवला. 
दोन दिवसांनी एका वर्गमित्राचा ,ज्याला जयू राखी बांधत असे, फोन आला - जयू गेली. विश्वास बसेना. आपली जयू ?
तो हो म्हणाला. मी ताबडतोब निघाले. पुढचं सगळं निरर्थक आहे. ती आता या जगात नाही एवढंच सत्य आहे. 



Friday, August 19, 2011

अण्णा

अण्णांच्या आंदोलनाने आपल्याला काय दिले !


(Photo coutesy : google)

अण्णा हजारेंच्या बाजूने आणि विरोधी भूमिका घेणारे असे दोन गट सध्या नागरी समाजात पडले आहेत.
अण्णा विरोधी गटातील काही लोक सध्या सरकारात असलेल्या पक्षाशी बांधिलकी असलेले, आहेत त्या कायद्यांची नीट अंमलबजावणी करायचे सोडून या नव्या विधेयकाची गरजच काय असे वाटणारे किंवा अण्णांचा हेतू उदात्त असला तरी ते मुळात एवढ्या मोठ्या आंदोलनाचे नेते होण्यास पुरेसे बौद्धिक सामर्थ्य त्यांच्यात आहे काय याबाबत साशंकता वाटणारे आहेत. तर त्यातील काहींना अण्णा ज्या पद्धतीने त्यांच्या समितीचे विधेयक पारित व्हावे म्हणून दबाव आणत आहेत ते लोकशाहीविरोधी वाटते आहे.
अण्णांच्या बाजूने असलेल्या गटात काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत तर बहुसंख्य समर्थकांचा साधारण रोख एक सभ्य, वयस्कर कार्यकर्ता पोटतिडकीने भ्रष्टाचाराला वेसण घालण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा त्यांना साथ देणे आपले नैतिक कर्तव्य आहे असा आहे. यात सगळेच धुतल्या तांदळाचे आहेत असेही नाही. काहींना सरकारी लोकपाल विधेयक वा अण्णांच्या समितीचे जनलोकपाल विधेयक यातील फरकाविषयी फारसे माहीत करून घेण्यात स्वारस्य नाही. त्यात काही राजकीय पोळ्याही भाजल्या जात आहेत.
लोकपाल विधेयकाबाबत सरकार आणि अण्णा गटात दुमत आहेच. पंतप्रधानपद लोकपाल कक्षेत आणावे काय? लोकपालमध्ये सात सदस्य असावेत की अकरा? त्यांची निवड कशी व्हावी? त्या पद्धतीवर सरकार, सत्तेमधील पक्षांचे वर्चस्व असायला हवे काय ? भ्रष्ट न्यायाधीशांविरोधात चौकशी करण्याचे अधिकार लोकपाल पदाला असावेत काय? तपासकार्यात सीबीआयचा समावेश असावा काय ? खुद्द लोकपालानेच भ्रष्टाचार केल्यास त्याला पदच्युत करता येईल काय ? या मुद्यांवर वादविवाद होत राहतील, आणि व्हावेत कारण ते निरोगी लोकशाहीचे एक वैशिष्टय आहे. सरकार झुकेल, सिब्बल नवे मुद्दे मांडतील, अण्णा पुन्हा आग्रही भूमिका घेतील, २४ तास बातमी देणार्‍या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा काही दिवसांचा प्रश्न मिटेल..

या सगळ्याच्या पलिकडे जाऊन अण्णांच्या आंदोलनामुळे बर्‍याच सकारात्मक गोष्टी घडत आहेत असे म्हणायला वाव आहे

प्रत्येक देशातील नागरी समाज हा त्या त्या देशाच्या समाजस्वास्थ्याचा निर्देशांक मानला जातो. भारतातील नागरी समाजात, विशेषत: तरूण वर्गात भारताबद्दल आज पराकोटीची अनास्था आणि औदासिन्य दिसून येते. याचे एक प्रमुख कारण आहे भ्रष्टाचार!
याला आळा घालण्यासाठी पहिले लोकपाल विधेयक १९६९ मध्ये म्हणजे ४२ वर्षांपूर्वीच राज्यसभेत मांडले गेले. ते मंजूर न झाल्याने १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले. राजकारण्यांना गैरसोयीचे असल्याने अद्यापही ते मंजूर झालेले नाही कारण आजवर एवढा जनाधार या विधेयकाला मिळालाच नाही. आज काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत हे निश्चीत स्वागतार्ह आहे. नवी क्रांती, दुसरे गांधी अशी अतिशयोक्तीपूर्ण विशेषणे टाळली तर हतबल झालेल्या भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात कायदा होऊ शकतो ही उमेद आज नागरी समाजात निर्माण झाली आहे यात शंका नाही.

याआधीचे लढे हे विवीध लोकांच्या मागण्या-हक्कांना वाचा फोडण्यासाठी होते. स्त्रीमुक्ती ,दलितमुक्ती चळवळींपासून जयप्रकाश नारायण यांचं ‘संपूर्ण क्रांती आंदोलन’,मेधा पाटकरांचं ‘नर्मदा बचाव’ आंदोलन किंवा सुंदरलाल बहुगुणांचं ‘चिपको’ आंदोलन असो वा शरद जोशी यांचं शेतकरी आंदोलन . सरकारचं लक्ष त्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यात ते कमीअधिक प्रमाणात यशस्वी ठरले पण यांनी संसदेच्या चौकटीला अण्णांच्या आंदोलनाप्रमाणे बोट लावलं नाही त्यामुळे काही लोकशाहीवादी बुद्धीजीवी अण्णांच्या आंदोलनावर नाराज आहेत. आपलं सरकार (आजचेच नव्हे, आजवरचे) हे कार्यक्षम आणि जबाबदार असतं, हे विधेयक वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलं नसतं तर ही वेळ आज आलीच नसती ही वस्तुस्थिती इथे स्वीकारणं भाग आहे. घटनेतील काही बाबी जर कालशरण असतील तर त्यात सर्वसामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी बदलाची अपेक्षा असणारच. गेल्या साठ-बासष्ट वर्षांत विविध संघटना, संस्था, कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या पदरात आजवर काय पडले! त्यांना बुलंद सामुदायिक ’आवाज’ मिळवून देण्याचं काम अण्णांच्या सर्वसमावेशक आंदोलनाने केलं आहे. संसद व सरकारला न्यायव्यवस्था सुधारू शकत नसली तरी सुस्त व्यवस्थेला गदागदा हलवण्याचं काम अण्णांच्या आंदोलनाने केलं आहे.

लिबीयाचे गडाफी किंवा इजिप्तचे मुबारक यांच्या विरोधातील आंदोलनांप्रमाणेच कोणत्याही पक्षाचा झेंडा न नाचवता कळीच्या प्रश्नांसाठी भारतीय जनता रस्त्यावर उतरू शकते, एवढेच नव्हे तर कोणताही विध्वंस न करता तरूणाई शक्तीप्रदर्शन करू शकते हा एक सकारात्मक संदेश या आंदोलनाच्या समर्थकांनी नकळत दिला आहे. आजवर क्रिकेट विश्वचषक जिंकला तरच तरूणाई देशभर सामूहिकरित्या रस्त्यावर येत होती. नागरी समाजात अमेरिकेच्या व्हिसा कडे डोळे लावून बसलेल्या तरूणांमधे देशाशी निगडीत प्रश्नाबद्द्ल व्यापक प्रमाणात संवेदनशीलता निर्माण झाली आहे. हा तात्कालिक प्रभाव असू शकतो पण पेरलेल्या काही बिया तरी त्यातून रूजतील. किरण बेदी, स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, कपिल देव, मनेका गांधी यांच्या सारख्या वलयांकित पण निस्पृह प्रतिमेच्या व्यक्तींच्या पाटिंब्यामुळे ह्या लढ्याला नागरी समाज विरूद्ध सरकार असा रंग देणे अनुचित आहे. सहावे वेतन आयोग उपभोगणार्‍या किंवा आयटी मधे चांगले ’पॅकेज’ असणार्‍या नागरी व्यक्तीला भ्रष्टाचाराची झळ बसतेच पण त्याहीपेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या विधवेला, सरकारी मदत म्हणून मिळणार्‍या हजार-पाचशे रूपयाच्या धनादेशासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते आणि धनादेश देऊ करणार्‍या साहेबाला त्याबदल्यात शंभर-दोनशे रूपये द्यावे लागतात. तेव्हा हा लढा नागरी समाज लढत असला तरी तो तिच्यासाठीही लढला जातो आहे.

राजकारणी आणि शासकीय कर्मचारी तेवढे भ्रष्ट आहेत आणि सामान्य माणूस साधाभोळा असे अजिबात नाही. सामान्य माणसालाही पैसा कोणत्या मार्गाने मिळवला याच्याशी घेणेदेणे नाही तर त्याच्या वाटपाच्या पद्धतीमधे रस आहे. काम झाले तर साहेबाला द्यायच्या भेटी, हुंडा, ’मता’चा मोबदला, आरक्षित डब्यात बसू द्यावे म्हणून दिलेली चिरीमिरी, वाहतूक पोलिसाच्या हातात सरकवलेली ’पत्ती’ अशा अनेक रूपांनी तो स्वत: भ्रष्टाचार करत नसला तरी त्याला नकळत खतपाणी घालत आलेला आहे. काळा पैसा हा केवळ स्वीस बॅंकेत नसून सामान्य माणसाच्या अशा नोंदविरहीत आर्थिक व्यवहारातून देशांतर्गत प्रवास करत असतो. या व्यवहारामागे बर्‍याचदा अगतिकता असते कारण याची पाळेमुळे शेवटी व्यवस्थेलाच जाऊन भिडतात. त्या व्यवस्थेला बदलण्याची सुरूवात स्वत:पासून व्हायला हवी आहे, निदान ही जाणीव-मानसिकता या निमित्त्याने माध्यमातून झडणार्‍या चर्चांमधून बर्‍याच प्रमाणात निर्माण झालेली आहे.

अण्णांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा ठेका घेतला आहे का असे विचारणार्‍यांनी तो ठेका स्वत:कडे घ्यावा, त्यांना कोणी रोखले आहे? इतर ही अधिक महत्वाचे प्रश्न आहेत असे वाटणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की अगदी स्त्री-भ्रूण हत्येच्या(गैरमार्गाने गर्भलिंगनिदान) समस्येपासून बेरोजगारी,दारिद्र्य अशा अनेक प्रश्नांचे मूळ भ्रष्टाचारातच सापडते.
अण्णा जादूगार नाहीत की हे आंदोलन म्हणजे पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले त्यानुसार, ’जादूची कांडी’ नाही. ’वित्तेषणा’ ही गरज जोवर मानवाला भासत राहिल तोवर भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन प्रत्यक्षात शक्य नाही, रातोरात तर नाहीच नाही, ही एका परिवर्तनाची केवळ नांदी आहे. हे विधेयक अगदी अण्णांच्या समितीच्या मतानुसार स्वीकृत झाले तरी ’who will watch the watchman' हा प्रश्न उरतोच, भ्रष्टाचार अमुक टक्के कह्यात येईल असे ठामपणे सांगणे भाबडेपणाचे ठरेल, पण त्यावर अंकुश बसेल, भ्रष्ट देशांच्या यादीत किमान पहिल्या शंभर देशांमधून (आज ८७ व्या क्रमांकावर असणार्‍या) भारताचे नाव वगळले जाईल, आजोबांच्या काळातील घोटाळ्यांचा-प्रकरणांचा निवाडा नातवाच्या काळात न होता निश्चीत कालमर्यादेत होईल हे ही तितकेच खरे. ’कुणीतरी काहीतरी केले पाहिजे’ अशा शिळोप्याच्या चर्चा करण्यापेक्षा थेट ’भ्रष्टाचार’ या विषयाला भिडून त्याला राष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आणण्याचे श्रेय अण्णांनाच जाते यात दुमत नसावे. निष्क्रीय होत चाललेल्या भारत देशात यानिमित्त्याने घडून येणारी सकारात्मक उलथापालथ हीच या आंदोलनाची फलश्रुती आहे.

Friday, July 15, 2011

साधनाताई


साधनाताई गेल्या.. अगदी आतून वाईट वाटले.

 मान्यवरांच्या हृद्य प्रतिक्रिया वाचल्या, माझा त्यांचा वैयक्तिक परिचय असावा अशी मी कोणीही नव्हे पण आपल्याला त्यांना निदान एकदा तरी भेटता, बघता आले आणि त्यांच्याशी बोलता आले याचे खूप समाधान वाटले. बोलता आले म्हणजे ऐकता आले कारण अशा व्यक्ती केवळ आपल्या भावनांचा आदर म्हणून आपल्यासारख्या सामान्यांशी बोलतात. त्याचा फायदा घेऊन त्यांना मुलाखत घेतल्यासारखे प्रश्न विचारणे मला तरी योग्य वाटत नाही. पण अशी स्थिती आम्हा सगळयाच मैत्रिणींची झाल्याने त्यांना बोलते करण्यापुरते मी काही तरी विचारले असेन. आनंदवनात (आणि हेमलकसा) आमच्या बुकक्लबचे जायचे ठरले, समिधा, नेगल, बाबांच्या कविता ,प्रकाश आमटयांचे लेख सगळ्या जणींनी वाचलेले.. आता ते सगळं फक्त प्रत्यक्ष बघायचं होतं आम्हाला. मला विशेषत: साधनाताईंना बघायचं होतं. पण त्या वेळ देतील का शंका होती.

आम्ही वेगळ्याच मनोवस्थेमधे पोचलो. समोर एका कुटीमधे आनंदवनाचा स्वागतकक्ष, स्वच्छ परिसर, वाफाळत्या चहाने स्वागत.. येण्यापूर्वी प्रभूकाकांशी फोनवर बोलणं झाल्याने सगळी व्यवस्था आधीच झालेली. खोलीत हात लावला तर मळेल की काय असे वाटावे इतका शुभ्र परीटघडीचा पलंगपोस, उश्या ,चादरी. लख्ख खोली, स्वच्छता सुगंधासारखी भरून राहिलेली. प्रभूकाकांनी एक सोबती दिला त्याच्याबरोबर आम्ही सगळा परिसर हिंडून आलो. वेगवेगळ्या वसाहतींमधे, संगणक कक्षात, लघुद्योग केंद्रात सगळे ’परित्यक्त’ लोक आपापल्या कामात मग्न होते, चार जणांसारखे जगत होते. याचक नव्हते. कलाकुसरीच्या वस्तू तर थक्क करणार्‍या होत्या..
एक अंध मुलगा झाडाखाली आपल्याच विश्वात बासरी वाजवत होता, तर एक मूकबधीर मुलगा विणत बसला होता. बाबांच्या-मुलांच्या एकूण प्रवासावर व का‍र्यावर आधारित ’अंधारातील प्रकाशवाटा’ ही चित्रफीत देखील पाहिली. सगळं भारावून टाकणारं होतं पण कुठेतरी हेच सगळं अपेक्षित देखील होतं. विकास व भारती आमटे अंध वाद्यवृंदासह दौर्‍यावर गेले होते.

अजून साधनाताई दिसल्याही नव्हत्या. संध्याकाळी त्या स्वागतकक्षात थोडावेळ बसतात असं कळल्यामुळे आम्ही सगळ्या तिथेच जाऊन बसलो. थोड्या वेळाने त्या निवासस्थानातून बाहेर पडल्या, अशक्त वाटल्या पण झपझप पावले टाकत आल्या. आत कुणाकुणाशी काही बोलत स्वागतकक्षात बाबांच्या फोटोखालच्या कोचावर बसल्या. सुती साडी, मोठं कुंकू आणि हसरा सात्विक प्रसन्न चेहरा! आम्हा सगळ्यांना जवळ बोलावलं आणि पाठीवर हात ठेवत खूप ओळख असावी अशा सहजतेने चौकशी करू लागल्या. त्यांच्या मनातली शांतता त्यांच्या शब्दात, डोळ्यात आणि स्पर्शातून जाणवत होती. आमच्याजवळ काहीच शब्द नव्हते, पण त्यांनी बोलावं म्हणून काहीकाही विषय काढले. आठवण म्हणून काढायच्या फोटोसाठी त्या ’अगं, शेजारी बसा की’ म्हणाल्या पण आमची तेवढी पात्रता असायला हवी ना! नक्षलवादी भागातून आम्ही मैत्रिणीच ५/६ तास प्रवास करून उद्या हेमलकशाला जाणार म्हटल्यावर त्यांनी तिथल्या सोयीसाठी आत लगेच सूचना दिल्या..जेवलात का? विचारलं. मला तर त्या वेळ देतील हेच जिथे अवघड वाटत होतं तिथे इतकी आपुलकी पण ओझं वाटायला लागली. त्या मग सहज काही अनुभव सांगू लागल्या..त्यात कुठेही मोठेपणाचा लवलेश नाही.. संध्याकाळच्या मंदावलेल्या प्रकाशातही त्या कक्षात उजेड भरून राहिल्यासारखं वाटत होतं
बाबांसारख्या, म्हटलं तर निस्संग सेवाव्रताची सहचारिणी म्हणून त्या जगल्याच पण स्वत:चा वेगळा ठसा उमटवत. पतीच्या अस्तित्वातच स्वत:ची आहुती दिली या अर्थाने त्या मला ’समिधा’ वाटत नाहीत कारण त्यांचा सेवायज्ञ बाबांबरोबर संपला नाही, मुलांच्या साथीने अव्याहत सुरू राहिला. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या मार्दवतेमुळेच
’वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली..
घाबरी करूणा जगाची ’लांबूनी’ चतकोर घाली...
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई..
दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही...’
असे काळीज चरचरून टाकणारे शब्द लिहीणार्‍या बाबांच्या हृदयातलं वादळ त्यांना पेलता आलं असावं. तडजोड म्हणून नाही तर वसा म्हणून. श्रद्धेच्या, विचारपद्धतीच्या, सहजीवनाच्या सर्वसामान्य परिभाषा बदलून स्वीकारलेला वसा. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं स्वीकारलेलं पालकत्व.. दलितमित्र, मिलेनीयम, मातोश्री, चतुरंग-जीवनगौरव सारख्या कित्येक पुरस्कारांचा वर्षाव आणि तरीही निगर्वी वृत्ती. पारितोषिक स्वीकारताना राष्ट्रपतींआधी ’हिचा’ उल्लेख करीन ही बाबांची अट त्यांच्यातल्या अनोख्या बंधाची जाहीर पावती म्हणायला हवी.

साधनाताई आस्थेने, मायेने बोलल्या आणि बाबांच्या समाधीकडे निघून गेल्या.

हेमलकशाला साधनाताईंच्या नवविवाहित नातसुनेने अगत्याने केलेली सोय, विचारपूस, रात्रीच्या जेवणानंतर शेकोटीभोवती झालेली डॉ. प्रकाश आणि मंदाताईंची भेट, त्यांच्या घराचा भाग झालेलं प्राणीविश्व, त्यांच्या सुना, मुलींसह आदिवासी स्त्रियांबरोबर अनुभवलेलं संक्रांतीच हळदीकुंकू, ’नेगल’कार मनोहर काकांनी साधलेला मन:पूत संवाद ,आमटे परिवाराचा कुठेही उदोउदो न करता सादर केलेला २६ जानेवारीचा भव्य, शिस्तबद्ध कार्यक्रम, सावळ्या,काटक आदिवासी मुलांची आत्मविश्वासपूर्ण भाषणं, सगळंच अविस्मरणीय !
बाबा-साधनाताईंच्याच मुशीतून घडलेली पुढची-त्याहीपुढची पिढी..

साधनाताई गेल्याची बातमी दूरचित्रवाणीवर बघताच हे सगळं अधोरेखित झालं.
आम्ही हेमलकशाला निघण्यापूर्वी प्रसन्न सकाळी आनंदवनातल्या बाबांच्या समाधीस्थळी गेलो होतो.. पहाटे तिथे साधनाताई दिवा ठेवून गेलेल्या असत. त्याच समाधीवर आता त्यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे... साधनाताई आता केवळ कार्यरूपाने उरल्यात.
या ओंजळभर सुवासिक स्मृती मात्र मनात कायम दरवळत राहतील.

Tuesday, April 12, 2011

सहजीवन

वैवाहिक सहजीवन : कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील

’शयनगृहाची खिडकी उघडी असेल तर जिला झोप येत नाही आणि तीच खिडकी बंद असेल तर ज्याला झोप येत नाही, अशा स्त्री-पुरूषाच्या युतीस विवाह असे म्हणतात.’ ’जॉर्ज बर्नार्ड शॉ’नी केलेली ही विवाहाची मार्मिक व्याख्या ! विवाहापूर्वीच्या स्वप्नरंजनात अशा रूक्ष गोष्टींचा विचार कोणी करत नाही त्यामुळे नंतरचे अपेक्षाभंग अपरिहार्य असतात, त्या धक्क्यांच्या तीव्रतेवर आणि स्वीकारावर संसाराची गाडी कशी धावणार ते अवलंबून असते. हल्ली शहरात तरी विवाहाचं वय पंचविशीपलिकडचे असते त्यामुळे सहजीवनाच्या कल्पना बालीश नक्कीच नसतात पण त्या परिपक्व असल्याचेही विशेष आढळून येत नाही कारण घटस्फोटांचे वाढते प्रमाण य़ाच भागात अधिक आहे. अर्थात घटस्फोटांची संख्या हे काही त्या त्या भागातील ’सहजीवनाच्या गुणवत्तेचे’ सरसकट मोजमाप असू शकत नाही पण ढोबळ अनुमान असू शकते.

’पुरूष जेव्हा स्त्री साठी गाडीचे दार उघडून धरतो तेव्हा एक तर ती गाडी तरी नवी असते नाही तर ती स्त्री तरी’ असे गमतीने म्हटले जाते. कल्पनेतला तो असे स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा असला तरी तो प्रत्यक्षातला तो तिची सामानाने जड झालेली पिशवी उचलेलच असे नाही. त्याच्या कल्पनेतील ती वाफाळत्या चहाने आणि टवटवीत चेहर्‍याने त्याचे स्वागत करत असली तरी प्रत्यक्षातील ती मोलकरणीने दांडी मारल्याने तिची किती पंचाईत झाली हे त्याला करवादत सांगत असते. तेव्हा तिचा अवतार आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतो. कल्पनेत ते दोघे सहलीला जाऊन विहरत घरी येतात, प्रत्यक्षात त्या दरम्यान नेमका गॅस सिलेंडरवाला येऊन जातो. एखादीच्या कल्पनेतला तो तिच्यासह कवितेत रमणारा वगैरे असतो ,प्रत्यक्षात तिची ’फर्स्ट लॅंग्वेज’ नेमकी त्याची ’थर्ड लॅंग्वेज’ असते. किंवा त्याला उत्तम शायरी अवगत असते आणि तिची आस्वादक्षमता ट्रकच्या मागे लिहिलेल्या चारोळ्यांपलिकडे जाणारी नसते.स्वप्नातल्या सुंदर शयनगृहात प्रत्यक्षात त्याचा स्नानानंतरचा ओला टॉवेल तस्साच रोज गादीवर पडलेला असतो आणि टापटीपीची आवड असणार्‍या त्याच्या जेवणात नेमका तिचा केस सापडतो. सामिष भोजन आवडणार्‍या एखाद्या त्याच्या प्रत्यक्षातल्या तिला अंड्याचा वासही सहन होत नाही, याउलट एखाद्या सुगरणीला नेमका ’जाणिजे यज्ञकर्म’ भावनेने खाणारा तो प्रत्यक्षात मिळतो.
साहित्य, कलेत रमणारी आणि उत्तम अभिरूची असणारी कल्पनेतील ती प्रत्यक्षात दागिने, साड्या आणि टीव्ही मालिकांबद्दल बोलायला लागते तेव्हा तो वैतागतो तर याउलट तिच्या शैक्षणिक,व्यावसायिक प्रगतीचा अभिमान असणारा कल्पनेतला एखादा तो प्रत्यक्षात खुशाल तिला चारजणात बावळट म्हणतो तेव्हा ती अवाक होते. द्विपदवीधर असलेल्या एखाद्या तिला साधा डीडी काढता येत नाही हे बघून तो थक्क होतो तर आधी रेस्टॉरंटमधे तिच्यासाठी खुर्ची सरकवून धरणारा तो नंतर स्वत:चा चहाचा कप देखील विसळत नाही हे पाहून ती हतबुद्ध होते.
प्रकल्पात बरोबरीने काम करणारा तो नवरा होताच घरी येताच वृत्तपत्र उघडून चहाची फर्माईश करतो आणि त्याच्याच बरोबर दमून आलेली ती चरफडत गॅस पेटवते. करिअरची स्वप्न बघणार्‍या तिने पुढे काय करायचे हे ती दोघं नव्हे तर तो आणि तिचे सासरचे ठरवतात तर कधी कल्पनेतली त्याची स्मार्ट सहचरी प्रत्यक्षात अगदी ’काकूबाई’ निघते..

इथवर अपवादाने सुरळीत पार पडले तरी अपत्याच्या आगमनानंतर बाळाच्या आजारपणात, संगोपनात (बहुतांशी) तिलाच जागावे लागते, तो निवांत झोपतो. जरा बदल म्हणून नाटक सिनेमाला गेले तर चरम बिंदूवर (बहुतांशी) त्यालाच बाळाचे रडे बाहेर नेऊन शांत करावे लागते, ती निवांत असते. पुढे मुलांचे वय आणि जबाबदार्‍या वाढत जातात तसतसे कल्पनेचे इमले कोसळायला लागतात. कलांचा आस्वाद घेत,करिअर घडवत, एकमेकांना जपत, आयुष्य फुलवूया या स्वप्नाला प्रत्येक अपेक्षाभंगाबरोबर तडे जाऊ लागतात आणि कल्पनेतले ते सुखी त्रिकोणी/चौकोनी कुटुंब प्रत्यक्षात फक्त फोटोमधे हसताना दिसते.

वरवर निरूपद्रवी वाटणारे हे चिमुकले अपेक्षाभंग असोत की शारिरीक, मानसिक शेअरिंगच्या परस्परविरोधी कल्पनांमुळे होणारे असह्य अपेक्षाभंग असोत, विसंवादाचे बीज रोवले जाते. संस्कृतीच्या किंवा सामाजिक दडपणांमुळे पुरूष आणि स्त्री हे वेगवेगळ्या (मानसिक) ग्रहांवरून आल्यामुळे ,त्यांच्या मेंदूंच्या रचनेतील फरकामुळे त्यांच्या विचार व कार्यपद्धतीत फरक असतो, पुरूषांना निमूट स्वीकार अपेक्षित असतो तर स्त्रीला सहानुभूती, हे सगळे समजावून सांगणारी अनेक पुस्तके बाजारात आहेत. पण सभा तीच असली तरी श्रोता म्हणून जाणे आणि वक्ता म्हणून जाणे यात फरक असणारच. कल्पनेतल्या सहजीवनातला पद्य भाग वस्तुस्थितीत नकळत गद्य होऊन जातो. ऍरिस्टॉटलने म्हटले आहे की प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगली नागरिक असतेच असे नाही, त्याच धर्तीवर पुढे म्हणता येईल की, प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगला पती वा पत्नी होऊ शकेलच असे नाही. उदा: काही लेखिकांनी नोंदवलेले अपेक्षाभंग. सोललेले सगळे डाळिंबाचे दाणे एकटयाने मटकावणार्‍या महाराष्ट्राच्या लाडक्या पुलंचा सुनीताबाईंच्या ’आहे मनोहर तरी’ मधला उल्लेख विस्मयकारक आहे. त्याही पेक्षा कवितेत लीलया चांदणं गुंफणार्‍या पाडगावकरांना भर उन्हात बायको मागून चालते आहे, तिच्या एका हातात जड पिशवी आणि दुसर्‍या हातात मूल आहे याची जाणीवही न झाल्याचा उल्लेख यशोदाबाईंच्या आत्मवृत्तात आहे. प्रिन्सेस डायना, हिलरी क्लिंटनचे किंवा ’तत्सम’ वलयांकित आत्मवृत्ते आणि त्यांचे सहजीवन हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
झोकून देऊन काम करणारी दांपत्य मात्र याला अपवाद असावीत. उदा: सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दांपत्य बंग किंवा आमटे. यांचं कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवन यात फारसा फरक नसावा असे त्यांच्या मुलाखती, लेखांमधून वाटते. "जीवनातली उदात्त ध्येय, समान मूल्य, असामान्य त्यागी वृती आणि परस्परांवरील निरपेक्ष प्रेम" हे याचं सूत्र असू शकेल.

 पण सर्वसामान्य दांपत्यांचं काय ! त्यांच्या कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवनात एवढी तफावत का !.

एक तर लग्न करतानाच्या निकषांमधेच याचं एक कारण दडलेलं आहे. ’many a men in love with a dimple, make the mistake of marrying the whole girl' या स्टीफन लेकॉक च्या मिस्कील विधानानुसार वधूची निवड केली जाते आणि ’२८, ५.९", MBA, ९ लाख’ अशा चमत्कारिक माहितीभोवती वर्तुळ काढून वराची ! नंतर चष्मा, मंगळ, मुलीला भाऊ आहे की नाही अशा ’महत्वपूर्ण’ माहितीला प्राधान्य असते. दिसणार्‍या गुण-अवगुणांपेक्षा मुळात ज्याची खात्री नाही त्या जन्मवेळेवरून केलेल्या पत्रिका अंतिम निर्णय देतात. courtship च्या वेळात तर सगळे स्वत:वर आणि एकूण जगावर एवढे खूष असतात की एकमेकांची सकारात्मक बाजूच दाखवली वा पाहिली जाते. असे नसते तर मग प्रत्येक प्रेमविवाह यशस्वी ठरला असता. थोड्क्यात ’परस्परपूरकता’ हा मुद्दा चर्चेला येतच नाही, एक दोन भेटीत माणूस कळणे कठीण असते पण निदान या चर्चेमुळे परस्परांच्या आकांक्षा, जीवनमूल्य कळली तर पुढच्या अपघातांच्या शक्यता निश्चीत कमी होऊ शकतात.

याशिवाय दोन वेगवेगळ्या आचार, विचार, संस्कृतीच्या कुटुंबात १/३ आयुष्य घालवलेली दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्या सहजीवनविषयक कल्पनांमधे फरक असणार हे गृहीत धरायला हवे. तो पचवायला एकमेकांना थोडा वेळ द्यायला हवा. मनोराज्यात अदृष्य असणारी ’सासू’ (दोन्हीकडच्या) नामक प्रधान व्यक्तिरेखा किंवा इतर नातेवाईकांचा प्रत्यक्षात हस्तक्षेप असतो. त्यावर कुरघोडी करण्यापेक्षा इतर शक्यता तपासायला हव्यात. अनपेक्षित आजारपणं, आर्थिक संकट असे कसोटीचे क्षण असतात त्यातल्या समंजस वर्तनावर सहजीवनाची मदार असते.
एका मुलाखतीत बायकोने, 'लग्नानंतर माणूस बदलतो हे खरं आहे' असं म्हणताच त्या नवर्‍याने 'नाहीतर मी माणूस आहे हे सिद्ध झालं नसतं म्हणूनच मी बदललो', असही प्रत्युत्तर दिलय. :-) यातला विनोदाचा भाग सोडला तरी हे सत्य आहे. या बदला मागे जागतिकीकरणामुळे होणार्‍या सामाजिक उलथापालथीमुळे एकूणच बदलत जाणार्‍या जीवनविषयक संकल्पना (उदा: सोशल नेटवर्किंग साईट्सचा, आभासी विश्वाचा प्रभाव,चौकोनापासून DINK(double income no kids) असा कुटुंबाचा संकोच.., यशस्वी होण्याची जीवघेणी स्पर्धा, स्त्रियांचे जागे झालेले आत्मभान आणि त्याचा दांपत्यजीवनावर होणारा परिणाम) कारणीभूत असावा. एकमेकांना धरून ठेवण्यासाठी प्रेम करण्याऐवजी प्रेम करण्यासाठी एकमेकांना धरून ठेवायची वेळ या धावपळीच्या आयुष्यामुळे आलेली आहे. या शारिरीक व मानसिक कुचंबणेची परिणीती कळत नकळत विवाहबाह्य संबंधांमधे होताना दिसून येते.

टोकाला गेलेले वैवाहिक संबंध वगळता बर्‍याच वेळेस समुपदेशनाची मदत घेऊन ताण कमी करता येऊ शकतो. दुर्दैवाने सुशिक्षीत वर्गातही (विवाहपूर्व तसेच विवाहोत्तर) समुपदेशन घेणे हे मनोचिकीत्सकाकडे (म्हणजे वेडयाच्या डॉक्टरकडे जाणे हा गैरसमज) जाण्यासारखेच निषीद्ध मानले जाते. "आमचे नाही का संसार झाले","हा पैसे देऊन गप्पा मारण्याचा आधुनिक आचरटपणा आहे" इ. टीकाही होते. पण बर्‍याचदा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागे ती स्वत: कारणीभूत नसून परिस्थिती कारण असते हे समुपदेशनातून कळायला मदत होते.
स्वत:च्या अहंभावाशी काडीमोड घेतला तर बरेच संसार सुरळीत चालतील. थोडे आत्मपरीक्षण केले आणि स्त्री/पुरूष या पलिकडे जाऊन एकमेकांचा खुल्या मनाने विचार केला तर कित्येक नाती नव्याने फुलतील.
 Time (एकमेकांसाठी वेळ) ,Trust(परस्परांवर विश्वास), Talk (आपसातला संवाद) आणि Touch (आश्वासक स्पर्श) या चार T मधे कल्पनेतील सहजीवन प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद आहे... मानवी मन आणि नातेसंबंधाची संपूर्ण उकल ही अवघड बाब आहे. अगदी भाबडा आशावाद ठेवला नाही तरीही हा गुंता कमी करण्याचा प्रयत्न या कारणांना आणि शक्यतांना समजून घेऊन केला गेला तर ’आणि ते सुखाने नांदू लागले’ हा शेवट परिकथेपुरता मर्यादित राहणार नाही ..ती एक नवी डोळस सुरूवात असेल.

(’विमेन्स नेटवर्क, पुणे’ आणि ’मिळून सार्‍याजणी’ तर्फे या विषयावर राज्यस्तरीय निबंधस्पर्धा होती..त्यांनी या निबंधाला प्रथम पुरस्कार दिला आहे.)

Saturday, April 2, 2011

रंगायन

रंगायन

सप्तरंग शोभे इंद्रधनुवर
तनामनावर रंगधुंदी
रंग केवळ संवेदना नेत्रांची
की प्रकाशाची नजरबंदी ! ॥


रौद्र रूपाचा शौर्याचा रंग लाल
आरक्तसे गाल प्रेमरंगी
पिवळे केशरी विरक्त वैरागी
जीव़न निस्संगी त्यक्त त्यागी ॥


हिरव्या सृजनाची गतीची हाक
निसर्गाची साद पानोपानी
नभाची नीलिमा निळाच सागर
मनातला मोर नीलवर्णी ॥


मंद शांत पारवा शीतल श्वेत
सदा शुचिर्भूत धवलता
फुलते अबोली, गुलबक्षी कळी
कुसुंबी जांभळी कोमलता ॥


वसंत पालवी पोपटी कोवळी
शेंदरी झळाळी ग्रीष्म रती
चिंब वर्षासवे रंगे ओली मेंदी
शुभ्र कौमुदी शारदराती ॥


शिशीर गात्री पानगळ पिवळी
हेमंत नव्हाळी रोमरोमी
उत्सवाचे ऋतु होळी बहुरंगी
अवघे एकरंगी कोण मी! ॥


शैशवाचा रंग नितळसे पाणी
मन आरस्पानी खुललेले
तारूण्य झळकते लख्ख सोनेरी
वार्धक्य चंदेरी पिकलेले ॥


करडा अंधार अशुभ चाहूली
काळी बाहुली कवाडावर
काळ्यातच रंग सारे सामावले
काळा तीळ खुले गालावर ॥


उगवता सूर्य बदलती संग
सरडयाचे रंग माणसाचे
नसे बहिरंग न सगेसोयरे
परि गोड गरे फणसाचे ॥


आत्मरंग दीन जिथे वर्णभेद
माणूस लेक काळ्या आईचा
कर्पूरगौर राधेचा कृष्ण निळा
विठ्ठल सावळा जनाईचा ॥


सप्तरंग सप्तसूर एकरूप
विश्व रंगरूप विवीधांगी
ईश्वरी कुंचला सृष्टीचा सोहळा
जीव रंगांधळा अंतरंगी ॥

Saturday, March 19, 2011

’लिन’


मैत्री सहवासातून फुलते हे खरं असलं तरी ती सहवासाच्या लांबीवर अवलंबून नसते. नाहीतर फक्त एका आठवडयात माझ्यात आणि लिनमधे हा अनोखा बंध निर्माण झाला नसता.

ग्रुप स्टडी एक्स्चेंज मधल्या अमेरिकेतील वास्तव्या्चे व एकूण कार्यक्रमाचे वेळापत्रक मला मिळाले, त्यातला पहिला आठवडा मला ’लिन' कडे राहायचे होते. पाठोपाठ मला लिन चा इ-मेल आला. मी शाकाहारी आहे की मांसाहारी, मला कशाची ऍलर्जी आहे का, पाळीव प्राणी आवडतात का, मी मद्य घेते का, असल्यास आवडता brand कोणता(!) ((असा मेल आपल्याला का आला नाही याचे आमच्या टीममधील एकाला फार दु:ख झाले..), माझ्या कुटुंबात कोण कोण असतं, माझे छंद.., मी नक्की काय करते अशी भलीमोठी प्रश्नावली होती त्यात. पूर्वग्रह ठेवून जायचे नाही असे ठरवूनही प्रत्यक्ष भेटीपूर्वीच माझे मत अनुकूल झाले तिच्याबद्द्ल कारण इतर होस्ट्सचे मेल अगदी औपचारिक होते. उत्तरात मी पण तिला छोटी प्रश्नावली पाठवली. त्यातून ती एमबीए असून तिचा घर ’आतून’ रंगवण्याचा व्यवसाय आहे (!), ती विवाहीत असून नवरा, दोन मुली (आणि कुत्री ऍबी) सह फिलाडेल्फियाजवळच्या एका गावात राहते एवढी माहिती मला मिळाली.

फिलाडेल्फियातील हॉटेलमधल्या आमच्या औपचारिक स्वागत कार्यक्रमात जांभळा टी शर्ट,काळा स्कर्ट घातलेली, साडेपाच फूट उंच, कपाळ झाकणारी बॉयकट असलेली, चाळीशी ओलांडलेली, तरतरीत नाकाची आणि चमकदार डोळ्यांची लिन मी आपोआप ओळखली ,तिनेही ’मोहानी ?’ एवढाच प्रश्न विचारून मला एकदम मिठी मारली. आपला एक आठवडा नक्की छान जाणार एवढे मला जाणवले. कार्यक्रमानंतर आम्हाला आपापल्या होस्टच्या सुपूर्द करण्यात आले. तिच्या कारने आम्ही सुसाट वेगाने घरी पोचलो.
ठराविक अमेरिकन पद्धतीचे राखाडी घर, शुभ्र दरवाजा...पण लॉनची निगा नीट राखलेली नाही, दाराशी आपोआप उगवलेली चारदोन रंगीबेरंगी ट्युलिप्स सोडली तर सगळे उजाड, दगडी पायर्‍या आणि जरा तिरकी झालेली ’चर्च’ लिहीलेली लाकडी पाटी. आत खालच्या मजल्यावर दिवाणखाना, स्वैपाकघर आणि जेवणाची खोली..वर दोन,तीन बेडरूम्स!.घरात प्रचंड पसारा, वस्तूच वस्तू, एकही टेबल रिकामे नाही. बरेच कॉफीचे मग, कागद, पुस्तकं...पण त्यामुळे मला एकदम हुश्श झाले. नीट आवरलेल्या घरात शिस्तीचे जे दडपण येते ते नव्हतेच इथे. तिने चीज आणि पीचच्या फोडी समोर आणून ठेवल्या. मी पहिला तुकडा उचलताच तळघरातून ऍबीच्या जोरदार भुंकण्याचा आवाज आला. मी कुत्र्यांना घाबरते असे कळवल्याने तिला तिकडे डांबले होते.तिचा तो निषेधाचा सूर असावा. ऍबीशी काहीतरी अनाकलनीय बोलत बोलत मला वर नेऊन तिने माझी खोली दाखवली, तिच्या टीनएजर मुलीला (क्लेअर) त्यासाठी धाकटीची(कॅल्सी) खोली शेअर करायला लागल्याचे मला लक्षात आले. ही खोली कशीबशी आवरलेली दिसत होती...लिन म्हणाली, "आज मला खालचं कार्पेट प्रथमच दिसतय."
"दोन्ही मुली होईपर्यंत पहिली चार वर्ष मी घरीच होते, नंतरची चार वर्ष नवरा चार्ली घरी होता (त्यांचं आधी ठरल्याप्रमाणे (काश !! :)-मी मनात)) आता दोघही काम करतो त्यामुळे आवरणं काही होत नाही" अशी त्या पसार्‍यामागची कहाणी तिने ऐकवली.

संध्याकाळी ती मला क्लबहाऊसला पूर्वनियोजित कार्यक्रमाला घेऊन गेली. मी सिल्क साडी नेसल्यावर वाटेने जाताना ’आता वाटतेस तू भारतीय, मला नेसवशील का एकदा साडी, ही सुटण्याची भिती नाही का वाटत, रोज नेसावी लागते का तिकडे साडी, तुझी सासू पण नेसते का, मुलगी नेसेल का, त्यांच्या छोटया साड्या मिळतात का, केवढ्याची असते ही" असा तिचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. सासू रोज नेसते, मी क्वचित, मुलगी लग्नात नेसेल बहुतेक, शंभर रू.पासून काही हजारांपर्यंतही मिळते इ. उत्तरे मी दिली. तेव्हा शिल्पा शेट्टीचं हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गीअर ने जाहीर कार्यक्रमात चुंबन घेतल्यामुळे भारतात बराच गदारोळ झाला होता. (ती रिचर्डची फॅन) तुमच्याकडे सिनेमात हे चालतं का? असेल तर मग प्रत्यक्षात केलं तर तिने का नाराज व्हावं असं मला लिनने विचारल.. व्यावसायिक नटी ही प्रत्यक्षात 'available' असते असा चुकीचा संदेश यातून जातो म्हणून ही निदर्शनं झाली असं मी तिला पटवून सांगितलं...आणि मग तेव्हा तरी शिल्पा शेट्टी आणि भारतीय संस्कृती याची सांगड मला घालावी लागली.

सकाळी उठून मी किचनमधे गेले, लिनचा कॉफी करताना फोटो काढला तेव्हा दचकून तिने ’बरं झालं देवा, मी मेकअप केला होता..’ (साडेसहाला !!)अशी अस्फुट किंकाळी फोडली. थोड्या वेळाने खाली उतरलेल्या तिचा नवरा चार्लीशी ओळख करून दिली, मी त्याला भेटीदाखल गांधींचं ’सत्याचे प्रयोग’ दिलं. (त्याची वाचनाची आवड तिने कळवली होती) त्याबद्द्ल आभार मानून त्याने लगेच मुलींचा डबा (पुन्हा काश!!!:)-मी मनात) म्हणजे पीनट बटर सॅंडविच करून फॉईलमधे गुंडाळलं, क्लेअर ते घेऊन आणि मला ’हाय’ व ’बाय’ करून गेली देखील. कॅल्सी काहीतरी चघळत लोळत टीव्ही पाहत होती (हिचे उच्चार काही मला आणि माझे तिला..शेवटपर्यंत समजले नाहीत पण ती फार गोड हसायची).मी तयार होऊनच खाली उतरले होते, लिन म्हणाली "चल, मी तुला तुझ्या आजच्या कार्यक्रमाला नेऊन पोचवते." तिने डिकीत रंगाचे डबे,बटणाने लांबी कमी जास्त होणारे ब्रश, घडीची शिडी असे काही बाही सामान टाकले, एक जुनी रंग सांडलेली हाफ पॅंट घातली आणि आम्ही निघालो. मला आमच्या ग्रुपमधे सोडून ती तिच्या रंगकामाला पसार झाली. आम्ही एक विद्यापीठ, कॅथेड्रल वगैरेंना दिवसभर भेटी देऊन डिनर करून परतलो तेव्हा लिन अप्रतिम पोषाखात हसर्‍य़ा चेहर्‍याने गाडीजवळ उभी होती, "दमलीस का?" म्हणत तिने जवळपास मला उचलूनच गाडीत ठेवले. खरं तर ती एक सबंध घर (आतून) रंगवून आली होती.. एमबीए केलयस मग हा विचीत्र व्यवसाय का निवडलास ,विचारलं तर म्हणाली "मला आवडतो म्हणून! पुढे बदलीन सुद्धा!"
रात्री मी खोलीत गेले तर टेबलवर एक चिट्ठी ’मला तू फार आवडलीस..तुझी लिन’. आपण अशी कबुली एखाद्या व्यक्तीला सहज नाही देऊ शकत, नाही का!

नंतर एकदा व्होकेशनल डे होता त्यामुळे नेटवर्कींग बघायला मी फिलाडेल्फियातल्या काही कंपन्यांमधे जाऊन आले, आमचे दुपारचे जेवण तर तिथल्या शाही क्लबमधे होते. चांदीचे काटे चमचे वगैरे.. संध्याकाळी लिनला मी त्याचं वर्णन सांगताना म्हटलं ’एखाद्या पिसांची हॅट घालून झगा फलकारत येणा‍र्‍या राणीचीच काय ती कमी होती’.(मग पुढच्या प्रत्येक जेवणाबद्दल लिन ’was it a 'queen coming’ luncheon?' असं हमखास विचारी). तिने मला झुम्पा लाहिरी लिखीत आणि तब्बू अभिनीत ’द नेमसेक’ पाहिल्याचे सांगितले. अमेरिकेतील वास्तव्यासाठी तडजोड करणार्‍या कुटुंबाची ती कथा आणि त्यातली सांस्कृतिक दुविधा व मुळांपासून दुरावण्याची व्यथा तिने इतक्या छान शब्दात मांडली की मी (पुलाव करता करता) ऐकतच राहिले. ती म्हणाली की अक्खी अमेरिका अशीच आहे, कुणी आयरिश कुणी इटालीयन कुणी मेक्सिकन but we say we are american.
रात्री आमच्या गप्पा उर्फ ’भारत को जानो’ कार्यक्रम सुरू असायचा. जाण्याआधी झालेल्या कार्यशाळेमुळे आमचे ’FAQ’ अगदी घोटून तयार होते तरी सांस्कृतिक फरकामुळे काही वेळेस समजावून सांगताना माझी ’फॅ फॅ’ उडायची :) उदा: जेवणाआधी त्या सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून एकत्र एक प्रार्थना म्हटली. मी ही नंतर हात जोडून ’वदनी कवळ’ म्हटले. लगेच त्यांनी अर्थ विचारला... मी सार नीटच सांगितले पण ’पूर्णब्रह्म’ वगैरे...! माझी पंचाईत होतेय हे लक्षात आलं की ती मिस्कील हसायची...आणि ’ok ok ,got the essence’ हा मग आमचा परवलीचा शब्द झाला.

चार्ली आपल्या राजकारणाबद्दल विचारायचा.. भारताशी संबंधित ’मुंबई, गांधी आणि नमस्ते’ हे तीनच शब्द त्यांना त्याआधी माहीत होते. आपल्याला मात्र त्यांच्या हॅलोविन पासून सबवे पर्यंत आणि बोस्टन टी पार्टी पासून मोनिका ल्युएन्स्कीपर्यंत सगळं कसं माहीत याचं त्यांना प्रचंड आश्चर्य वाटायचं.. ते दोघे पक्के डेमोक्रॅट. तेव्हा तिकडे ओबामा आणि हिलरी च्या जंगी प्रचारसभा सुरू होत्या. बुश सरकारला फक्त ओरबाडून खाणं माहीत होतं म्हणून अमेरिका समृद्ध असली तरी समाधानी नाही असं ती सांगायची. माझ्यासाठी ती ’इंडीया एब्रॉड’ वाचायला आणायची. वृत्तपत्रात एकाच वेळेला ऐश्वर्या-अभिषेकचं पंचतारांकित लग्नं आणि दुसरीकडे भारनियमनाच्या बातम्या.. How do you manage to live between extremeties? असं ती विचारी.

एकदा दिवसभराचे कार्यक्रम उरकून अगदी थकून मी घरी आले तर लिन मंद प्रकाशात रेड वाईनचे घुटके घेत सुदोकू सोडवत बसली होती. क्लेअर अजून आली नव्हती त्यावरून डेटींगचा विषय निघाला. लिन म्हणाली "मी तिला सांगीतलय की, कार तू आताही चालवू शकतेस पण सरकार परवाना देत नाही. कारण त्यासाठी हवी असलेली समज तुझ्याकडे नाही, अपघाताचा धोका जास्त, डेटींगचही तसच आहे." मग तिला तिचे डेटींगचे दिवस आठवले, दोघांचाही एक एक प्रेमभंग उर्फ अपघात झालेला मग चार्ली कसा भेटला...दर वेळेला लाल ऐवजी पिवळाच गुलाब कसा देत असे असे काही काही किस्से सांगताना तिला एकदम आपल्या ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीचे कोडे पडले. तू लग्नाआधी नवर्‍याला किती वेळा भेटलीस? मी म्हणाले ,'एकदोनदा'. मग ती म्हणाली "आणि लग्न करून या (एकदोनदाच भेटलेल्या) माणसाच्या तू थेट घरीच राहायला गेलीस?" मी म्हणाले "असच असतं आमच्यात :)" (ती बेशुद्ध पडू नये म्हणून मी तेव्हा घरात आजेसासू-सासरे यांच्यासह ९ माणसे राहत होती हे सांगितले नाही) ती माझ्याकडे अशी काही पाहत होती की मला आपण पानं गुंडाळलेली आदिवासी स्त्री आहोत असे वाटू लागले. मग मी तिला विचारले "तुम्ही पारखून घेऊन लग्न करता ना, मग तरी ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर का मोडतात. मला वाटतं, नाती आणि त्यांचा टिकाऊपणा या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत. कोणाची पद्धत योग्य आणि कोणाची अयोग्य हा मुद्दाच नाही, तुमचे विचार, विश्वास आणि शेवटी नशीब यावरच त्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं."

लिन कधी कधी तिच्या मुलींना कामाच्या जागी घेऊन जात असे.. take your kid to work at times म्हणजे त्यांना कष्टाची कदर होते असे तिचे म्हणणे. त्याआधी तिची धाकटी मुलगी ATM मधे विचारायची ’is there enough money in the 'wall' to buy this?'. मी ’आमिश ’खेड्याला भेट देऊन आल्यावर तर तिने त्यांची ’निसर्गाकडे नेणारी जीवनपद्धती’ मुलींना पुढे बसवून माझ्याकडून ऐकायला लावली. ते अमेरिकेत राहूनही कार न वापरता आणि TV न पाहता जगतात कसे याचे त्या मुलींना कोडे पडले होते.
माझी जुळी मुलं कशी वागतात, भारतीय पालकत्वाच्या कल्पना काय याबद्दल लिन विचारायची.. मी न सांगताही मला घरची, मुलांची आठवण येते आहे हे ओळखायची. मग मी तिला शिकवलेला इंडीयन टी(उकळून) करून आणायची अन नि:शब्द बसायची किंवा कधी मी तिला ५/७ मराठी वाक्य शिकवली होती ती भयंकर उच्चारात (बुक ल्हागली, दन्नावाद वगैरे) बोलून मला हसवायची. मग मला म्हणावं लागायचं ’ok ok ,got the essence’.

अक्रोड, मध वापरून केलेला गोड पिझ्झा ही तिची खासीयत.. मी निघायच्या आदल्या रात्री माझी भेट व्हावी म्हणून तिने सासूसासर्‍यांना जेवायला बोलावले होते... तिच्या सासूने तिच्या पहिल्या प्रसूतीनंतर बाळाला पाहण्याआधी माझी सून कशी आहे असं विचारलं होतं आणि लिनला कायमचं जिंकलं होतं. त्यांना काही दिवसांनी old age home मधे जावं लागेल याची तिला खंत वाटायची (पण त्यांच्यात तसच असतं.. आणि खरं तर अलिकडे आपल्यातही) आता तर ते खूपच थकलेत. त्यांच्याबद्दल तिने मधे एका मेल मधे लिहिलं होतं We are what is known as the Sandwich Generation - we are still raising our own kids, but we are trying to help, care for our parents.
तर ते येणार म्हणून मी तिला माझी साडी नेसवली. ब्लाऊज ऐवजी काळा स्लीव्हलेस टीशर्ट घालून, साडीचा पदर हातावर घेऊन ती राजकन्येच्या तोर्‍यात जिन्यावरून खाली उतरली. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. चार्लीने तिचं want to marry you again वगैरे म्हणत अमेरिकन पद्धतीने कौतुक केलं. आम्ही एकमेकांना भेटी दिल्या.

सकाळी निरोप घेताना चार्लीला मी राखी बांधली, त्याचा अर्थ सांगितला. त्यांचे घर सोडताना माझे डोळे पाणावले. लिन माझ्याकडे पाहतच नव्हती.. चार्लीनेच मला ठरल्या जागी पोचवले.
नंतर पुढचा प्रवास, अनुभव, वेगवेगळ्या होस्टसचं आतिथ्य, आम्ही पाहिलेली स्थळं (विद्यापीठाच्या गच्चीतून भव्य टेलीस्कोपमधून पाहिलेल्या ’शनी’ पासून कॅसिनोपर्यंत किंवा सर्वधर्मीय चर्चपासून एम्पायर स्टेट बिल्डींग पर्यंत) सगळं मी तिला फोनवर सांगायचे किंवा मेलमधे लिहायचे. माझी कार्यक्रम पत्रिका तिने किचनमधे डकवून ठेवली होती.
दौरा संपण्याच्या दिवशी निरोप समारंभ होता. दूरवरून गाडी चालवत लिन त्यासाठी आली. निरोपाचे भाषण बहुतेकांनी गंभीर तर मी हलकेफुलके केले पण आभाराच्या यादीत तिचे नाव उच्चारताच मात्र मला पुढे बोलवेना. इतका त्रास का घेतलास तू.. विचारलं तिला. तर ती अश्रू आवरत घट्ट मिठी मारून म्हणाली "कारण आता आयुष्यात आपण कदाचित कधीच प्रत्यक्ष भेटू शकणार नाही..."
प्रत्यक्ष भेटीचं माहीत नाही.. पण मी तिला आणि ती मला कधीच विसरू शकणार नाही. कधी खूप वरचेवर इ-मेल्स पाठवल्या जातात..कधी महिने उलटून जातात पण लिनच्या शब्दात सांगायचं तर "I especially remember the times we sat in the living room talking after Charlie and the girls went to bed. We learned so much about each other's lives and beliefs. It doesn't matter to me how long we go between returning emails....we are friends for life! "