matrubhumi 8 Dec 2011
एका चिमुकलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रंगात आला होता. रंगीबिरंगी फुगे, नटून थटून आलेल्या लहान मुलांची मस्ती, खेळ, त्यांची किलबिल असं मस्त वातावरण होतं. मग सीडी प्लेअर वर ’रा-वन’ मधलं "छम्मक छल्लो" गाणं वाजू लागलं आणि मुलं खेळ सोडून त्यावर थिरकायला लागली. त्यांचे आईबाप टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देऊ लागले. मुलांनी नाही तर कोणी नाचायचं, खरं आहे, पण त्या किंवा तशा प्रकारच्या गाण्यांचे शब्द, त्यावर मुलांचे वयाला न शोभणारे हावभाव याला दाद देताना आपलं काही चुकतं आहे असं त्यांच्या पालकांना जाणवूच नये? वाढदिवसच नव्हे गणेशोत्सवात, अगदी शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील फिल्मी गाण्यांवर नाचणे ही फॅशन झाली आहे. नाच आणि गाणी वाईट नसतात, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि मनोरंजनाचं ते एक सुंदर माध्यम आहे. छानसा ठेका असणारी सिनेमातील गाजलेली गाणी, लोकगीतं अगदी पाश्चात्य नृत्यप्रकार सुद्धा निवडायला हरकत नाही. अचकट विचकट हावभाव आणि ’मुन्नी बदनाम हुई’ स्वरूपाचे गाण्यांचे शब्द असतील तर ती मात्र टाळायला हवीत याचे भान शिक्षक आणि मुख्यत: पालकांना असायला हवे. माध्यमांचा विशेषत: टीव्हीचा आधीच मुलांच्या मनावर प्रचंड पगडा आहे. त्यावर काही चांगल्या वाहिन्या आणि चांगले कार्यक्रम देखील आहेत पण मुले टीव्हीवर काय पाहत आहेत, किती वेळ पाहत आहेत याचा किंवा मुलांसमोर टीव्हीवर स्वत: काय पाहावं याचा किती पालक विचार करतात? कार्टून पाहणे सगळ्याच लहान मुलांना आवडते पण सगळेच कार्टून आता मुलांच्या भावजीवनाशी जुळलेले राहिलेले नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे. कार्टून मधला "शिंचन" त्याच्या वडिलांना "ओहो, तो आप उस सेल्सगर्लपर लाईन मार रहे थे" असे म्हणतो, सात वर्षाचा नोबेटा म्हणे वर्गातल्या शिजुका वर "प्रेम करतो", तेव्हा देहभान हरपून ते पाहणार्या मुलांना मनोरंजनाबरोबर आणखी बरेच धडे नाजूक वयात नकळत दिले जातात. मुलांना "कुठे थांबवावं" हे आधी पालकांच्या लक्षात यायला हवं.
जागतिकीकरणाच्या युगात मुलं आता कार्यक्रमात पूर्वीसारखे श्लोक किंवा बडबडगीतं म्हणणार नाहीत हे मान्य, त्यांचे छंद, आवडी, विषय काळाप्रमाणे बदलत जाणार, आधुनिक होणारच पण शेवटी ती मुले आहेत हे सत्य विसरून आणि बदलून कसं चालेल? मुलांबाबतचे हे सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहे. त्यांच्यातली निरागसता जपायची असेल तर मुळात आपली वागणूक योग्य आहे ना याचा विचार पालकांनीही करायला हवा. वडिलांनी जर मुलाला म्हटलं ," तुझ्या वयाचा असताना जॉर्ज वॉशींग्टन शाळेत नेहमी पहिला येत असे" तर त्यावर आजच्या मुलाचं उत्तर असतं "तुमच्या वयाचे असताना ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्याचं काय !" यातला गमतीचा भाग सोडला तर पालकांनी स्वत:चा आदर्श मुलांपुढे असणार आहे याचा विचार नेहमीच करायला हवा. आई-वडील कसे राहतात, आपापसात कसे वागतात, इतरांबद्दल काय व कसे बोलतात या सगळ्याचा मुलांवर परिणाम होत असतो त्यामुळे पालकांनी मुलांसाठी आधी स्वत:ला घडवायला हवं. स्पर्धेचं युग आहे या नावाखाली मुलांना कितीतरी क्लासेस लावले जातात, त्याने नृत्य, खेळ, कुठल्या कुठल्या टॅलेंट परिक्षा द्यायच्या पुन्हा अभ्यासात पुढेच असायचं एवढ्या सगळ्या अपेक्षा त्या चिमुकल्याला झेपत नाहीत. पालक-पाल्यसंबंधातील तज्ञ समुपदेशक डॉ. आशिश देशपांडे म्हणतात " मूल जन्माला घातलं, म्हणजे त्यावर आपला हक्क प्रस्थापित झाला असं नाही. मुलांचे पालक व्हा ,मालक नको." मुलांवर आपली स्वप्न लादणं अयोग्य आहे. ती पूर्ण झाली नाहीत तर त्यांना रागवून उपयोग नाही. त्यापेक्षा हे ओझं कमी केलं, त्यांचा कल समजावून घेत वेळीच ठराविक शिस्त लावली, शहानिशा करून योग्य त्या गोष्टींनाच प्रोत्साहन दिलं तर प्रश्न सुटले नाहीत तरी सोपे होतील.
हल्ली घरोघरी एक, दोनच मुले असल्याने त्यांचे लाड होतात, वाटून घेणे त्यांना माहीत नसते. आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायात व्यस्त असले तर मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही या न्यूनगंडातून ते मुलांना कशालाही "नाही" म्हणू शकत नाही. त्यांच्या शिकवण्या, शाळा लांब अंतरावर असल्याने पालक त्यांना मोबाईल घेऊन देतात, त्यातले फंक्शन्स पालकांपेक्षा जास्त मुलांना माहीत असतात. मुलांना मोबाईल,व्हिडीओ गेम, संगणक सहजतेनं हाताळता येणं ही ’स्मार्ट’ असल्याची पावती समजली जाते. मुलांच्या तुलनेने पालकांना हे तंत्रज्ञान दूरचं वाटतं, त्यामुळे अशा ’स्मार्ट’ मुलांचं पालकांना साहजिकच कौतुक वाटतं. त्या नादात मुलं नक्की ते कसं वापरतायत यावर पालकांचा वचक राहणे अवघड झाले आहे.
नुकत्याच एका नामवंत शाळेमधे वर्गात अश्लील एमएमएस पाहणार्या मुलांना पालकांसमक्ष समज देण्यात आली. तेव्हा "आमची मुलं असं करणच शक्य नाही" अशी बहुतेक पालकांनी भूमिका घेतली. पालकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून मुलांवर लक्ष ठेवण्याच्या त्यातील युक्त्या शिकायला हव्या. असे करणे म्हणजे हेरगिरी नव्हे, नैतिक जबाबदारी आहे. शिवाय मुलांनी अशा उपकरणांचा वापर करण्याबाबत आधीपासूनच नियम आणि निकष ठेवायला हवेत. अकाली ’सुजाण’ (?) झालेली मुले लवकर वयात येत आहेत. लैंगिक शिक्षण शाळांमधून मिळावे, वैद्यकीय व्यावसायिकांकडून द्यावे की समुपदेशन करावे हे पालकांना समजेनासे होते. शिस्तीचा अतिरेक किंवा बेलगाम स्वातंत्र्य दोन्ही चूकच. लाड आणि नकार म्हटलं की वादविवाद होणारच आणि काही प्रमाणात असे वाद मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची वाढीसाठी आवश्यक आहेत विशेषत: पौगंडावस्थेत संवाद हा वादातूनच होतो ,असं या विषयातील तज्ञांचं मत आहे. आपलं घर, आपले आई-वडीलांपुरतच जग असणा-या मुलांचा नवनवीन गोष्टी, व्यक्ती, वस्तूंशी संबंध येत गेला की त्यांना स्वत:ची space आवडू लागते. आपल्या आई-वडिलांनी आपल्या प्रत्येक गोष्टींमधे केलेला हस्तक्षेप त्यांना नकोसा वाटतो. यावर रामबाण उपाय नसला तरीही संवादाचा पूलच पालक आणि मुलांमधली दरी सांधू शकेल.
केवळ तांत्रिक गोष्टी वापरता आल्या म्हणजे मुलं स्मार्ट झाली असं न मानता पाहणे, हाताळणे, निरीक्षण करणे, अनुभव घेणे अशा पायर्यांनी त्यांचं व्यवहारज्ञान वाढवणं आवश्यक आहे. अगदी निबंध किंवा पत्रलेखन सुद्धा शिक्षक मुलांना लिहून देतात आणि मुले ते पाठ करून परीक्षेत लिहीतात. मुले टीपकागदासारखी असतात त्यामुळे मुलांना त्यांच्या भाषेत लिहू द्यायला हवे. ते कसे व्यक्त होतात, जगाकडे कसे पाहतात, कसे अनुभव मांडतात हे समजून घ्यायचे असेल तर विषयाच्या चौकटीतून त्यांना मुक्त करायला हवे. "विचार कसा करावा हे शिकवतं ते खरं शिक्षण" असं आईनस्टाईनने म्हटलं आहे. पण बहुतेक शाळांत प्रात्यक्षिके होतच नाहीत. भारतातील काही प्रसिद्ध शाळांच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की नव्वदहून अधिक टक्के मिळवणार्या माध्यमिक वर्गातील अनेक मुलांना साध्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. मुले फक्त पुस्तकी विज्ञान शिकतात. प्रयोगांतून नव्हे. कदाचित त्यामुळे देशात संशोधकांचे प्रमाण डॉक्टर,इंजिनीअर यांच्या तुलनेने नगण्य आहे. शाळांमधील प्रकल्प असो वा हस्तकला, बहुतेक विद्यार्थ्यांचे पालकच सगळे करून देतात. मध्यंतरी परिचयातील एका मुलाने ’कडधान्याला मोड येणे’ या विषयावर लिहीलेला प्रयोग दाखवला, त्याभोवती त्याच्या आईने फुलांची वेलबुट्टी काढली होती, त्यापेक्षा तिने ’मोड कसे येतात’ हे प्रात्यक्षिक मुलाला का दाखवले नाही! या साचेबद्धतेतून शिक्षणाला मुक्त करणे पालकांच्या हातात नसले तरी मुलांचे आकलन प्रत्यक्ष निरीक्षणातून वाढविण्यासाठी ते निश्चीत प्रयत्न करू शकतात.
शिक्षणाच्या तीन पायर्या आहेत असं म्हटलं जातं.. माहिती (information), ज्ञान (knowledge) आणि शहाणीव (wisdom). माहिती अनेक माध्यमातून आपल्यावर आदळते आहे, केवळ माहिती जमवणं म्हणजे हुशारी नव्हे. त्याचे ज्ञानात रूपांतर करायचे कौशल्य मुलांमधे निर्माण करण्याची जबाबदारी सुज्ञ शिक्षकांची आहे, मात्र त्या ज्ञानाचा व्यावहारिक वापर, तौलनिक अभ्यास करता येण्याची शहाणीव मुलांमधे निर्माण करणे, शिस्तबद्ध संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यासाठी मुलांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणं, त्यांना अभ्यासाव्यतिरीक्त ज्यात रस वाटेल त्यात रमवणं, पर्यावरणाची ओळख करून देणं, चांगली पुस्तक आणणं-वाचून दाखवणं, महत्वाच्या घडामोडी ,बातम्या यावर त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. यामुळे त्या मुलांमध्ये आत्मविश्वास येईल. मुलांबरोबर पारदर्शक, मैत्रीपूर्ण संबंध जपले तर पालक-मुलांचे हृद्य नातं नक्कीच बहरेल.
एका चिमुकलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रंगात आला होता. रंगीबिरंगी फुगे, नटून थटून आलेल्या लहान मुलांची मस्ती, खेळ, त्यांची किलबिल असं मस्त वातावरण होतं. मग सीडी प्लेअर वर ’रा-वन’ मधलं "छम्मक छल्लो" गाणं वाजू लागलं आणि मुलं खेळ सोडून त्यावर थिरकायला लागली. त्यांचे आईबाप टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देऊ लागले. मुलांनी नाही तर कोणी नाचायचं, खरं आहे, पण त्या किंवा तशा प्रकारच्या गाण्यांचे शब्द, त्यावर मुलांचे वयाला न शोभणारे हावभाव याला दाद देताना आपलं काही चुकतं आहे असं त्यांच्या पालकांना जाणवूच नये? वाढदिवसच नव्हे गणेशोत्सवात, अगदी शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील फिल्मी गाण्यांवर नाचणे ही फॅशन झाली आहे. नाच आणि गाणी वाईट नसतात, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि मनोरंजनाचं ते एक सुंदर माध्यम आहे. छानसा ठेका असणारी सिनेमातील गाजलेली गाणी, लोकगीतं अगदी पाश्चात्य नृत्यप्रकार सुद्धा निवडायला हरकत नाही. अचकट विचकट हावभाव आणि ’मुन्नी बदनाम हुई’ स्वरूपाचे गाण्यांचे शब्द असतील तर ती मात्र टाळायला हवीत याचे भान शिक्षक आणि मुख्यत: पालकांना असायला हवे. माध्यमांचा विशेषत: टीव्हीचा आधीच मुलांच्या मनावर प्रचंड पगडा आहे. त्यावर काही चांगल्या वाहिन्या आणि चांगले कार्यक्रम देखील आहेत पण मुले टीव्हीवर काय पाहत आहेत, किती वेळ पाहत आहेत याचा किंवा मुलांसमोर टीव्हीवर स्वत: काय पाहावं याचा किती पालक विचार करतात? कार्टून पाहणे सगळ्याच लहान मुलांना आवडते पण सगळेच कार्टून आता मुलांच्या भावजीवनाशी जुळलेले राहिलेले नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे. कार्टून मधला "शिंचन" त्याच्या वडिलांना "ओहो, तो आप उस सेल्सगर्लपर लाईन मार रहे थे" असे म्हणतो, सात वर्षाचा नोबेटा म्हणे वर्गातल्या शिजुका वर "प्रेम करतो", तेव्हा देहभान हरपून ते पाहणार्या मुलांना मनोरंजनाबरोबर आणखी बरेच धडे नाजूक वयात नकळत दिले जातात. मुलांना "कुठे थांबवावं" हे आधी पालकांच्या लक्षात यायला हवं.
जागतिकीकरणाच्या युगात मुलं आता कार्यक्रमात पूर्वीसारखे श्लोक किंवा बडबडगीतं म्हणणार नाहीत हे मान्य, त्यांचे छंद, आवडी, विषय काळाप्रमाणे बदलत जाणार, आधुनिक होणारच पण शेवटी ती मुले आहेत हे सत्य विसरून आणि बदलून कसं चालेल? मुलांबाबतचे हे सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहे. त्यांच्यातली निरागसता जपायची असेल तर मुळात आपली वागणूक योग्य आहे ना याचा विचार पालकांनीही करायला हवा. वडिलांनी जर मुलाला म्हटलं ," तुझ्या वयाचा असताना जॉर्ज वॉशींग्टन शाळेत नेहमी पहिला येत असे" तर त्यावर आजच्या मुलाचं उत्तर असतं "तुमच्या वयाचे असताना ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्याचं काय !" यातला गमतीचा भाग सोडला तर पालकांनी स्वत:चा आदर्श मुलांपुढे असणार आहे याचा विचार नेहमीच करायला हवा. आई-वडील कसे राहतात, आपापसात कसे वागतात, इतरांबद्दल काय व कसे बोलतात या सगळ्याचा मुलांवर परिणाम होत असतो त्यामुळे पालकांनी मुलांसाठी आधी स्वत:ला घडवायला हवं. स्पर्धेचं युग आहे या नावाखाली मुलांना कितीतरी क्लासेस लावले जातात, त्याने नृत्य, खेळ, कुठल्या कुठल्या टॅलेंट परिक्षा द्यायच्या पुन्हा अभ्यासात पुढेच असायचं एवढ्या सगळ्या अपेक्षा त्या चिमुकल्याला झेपत नाहीत. पालक-पाल्यसंबंधातील तज्ञ समुपदेशक डॉ. आशिश देशपांडे म्हणतात " मूल जन्माला घातलं, म्हणजे त्यावर आपला हक्क प्रस्थापित झाला असं नाही. मुलांचे पालक व्हा ,मालक नको." मुलांवर आपली स्वप्न लादणं अयोग्य आहे. ती पूर्ण झाली नाहीत तर त्यांना रागवून उपयोग नाही. त्यापेक्षा हे ओझं कमी केलं, त्यांचा कल समजावून घेत वेळीच ठराविक शिस्त लावली, शहानिशा करून योग्य त्या गोष्टींनाच प्रोत्साहन दिलं तर प्रश्न सुटले नाहीत तरी सोपे होतील.
हल्ली घरोघरी एक, दोनच मुले असल्याने त्यांचे लाड होतात, वाटून घेणे त्यांना माहीत नसते. आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायात व्यस्त असले तर मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही या न्यूनगंडातून ते मुलांना कशालाही "नाही" म्हणू शकत नाही. त्यांच्या शिकवण्या, शाळा लांब अंतरावर असल्याने पालक त्यांना मोबाईल घेऊन देतात, त्यातले फंक्शन्स पालकांपेक्षा जास्त मुलांना माहीत असतात. मुलांना मोबाईल,व्हिडीओ गेम, संगणक सहजतेनं हाताळता येणं ही ’स्मार्ट’ असल्याची पावती समजली जाते. मुलांच्या तुलनेने पालकांना हे तंत्रज्ञान दूरचं वाटतं, त्यामुळे अशा ’स्मार्ट’ मुलांचं पालकांना साहजिकच कौतुक वाटतं. त्या नादात मुलं नक्की ते कसं वापरतायत यावर पालकांचा वचक राहणे अवघड झाले आहे.
नुकत्याच एका नामवंत शाळेमधे वर्गात अश्लील एमएमएस पाहणार्या मुलांना पालकांसमक्ष समज देण्यात आली. तेव्हा "आमची मुलं असं करणच शक्य नाही" अशी बहुतेक पालकांनी भूमिका घेतली. पालकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून मुलांवर लक्ष ठेवण्याच्या त्यातील युक्त्या शिकायला हव्या. असे करणे म्हणजे हेरगिरी नव्हे, नैतिक जबाबदारी आहे. शिवाय मुलांनी अशा उपकरणांचा वापर करण्याबाबत आधीपासूनच नियम आणि निकष ठेवायला हवेत. अकाली ’सुजाण’ (?) झालेली मुले लवकर वयात येत आहेत. लैंगिक शिक्षण शाळांमधून मिळावे, वैद्यकीय व्यावसायिकांकडून द्यावे की समुपदेशन करावे हे पालकांना समजेनासे होते. शिस्तीचा अतिरेक किंवा बेलगाम स्वातंत्र्य दोन्ही चूकच. लाड आणि नकार म्हटलं की वादविवाद होणारच आणि काही प्रमाणात असे वाद मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची वाढीसाठी आवश्यक आहेत विशेषत: पौगंडावस्थेत संवाद हा वादातूनच होतो ,असं या विषयातील तज्ञांचं मत आहे. आपलं घर, आपले आई-वडीलांपुरतच जग असणा-या मुलांचा नवनवीन गोष्टी, व्यक्ती, वस्तूंशी संबंध येत गेला की त्यांना स्वत:ची space आवडू लागते. आपल्या आई-वडिलांनी आपल्या प्रत्येक गोष्टींमधे केलेला हस्तक्षेप त्यांना नकोसा वाटतो. यावर रामबाण उपाय नसला तरीही संवादाचा पूलच पालक आणि मुलांमधली दरी सांधू शकेल.
केवळ तांत्रिक गोष्टी वापरता आल्या म्हणजे मुलं स्मार्ट झाली असं न मानता पाहणे, हाताळणे, निरीक्षण करणे, अनुभव घेणे अशा पायर्यांनी त्यांचं व्यवहारज्ञान वाढवणं आवश्यक आहे. अगदी निबंध किंवा पत्रलेखन सुद्धा शिक्षक मुलांना लिहून देतात आणि मुले ते पाठ करून परीक्षेत लिहीतात. मुले टीपकागदासारखी असतात त्यामुळे मुलांना त्यांच्या भाषेत लिहू द्यायला हवे. ते कसे व्यक्त होतात, जगाकडे कसे पाहतात, कसे अनुभव मांडतात हे समजून घ्यायचे असेल तर विषयाच्या चौकटीतून त्यांना मुक्त करायला हवे. "विचार कसा करावा हे शिकवतं ते खरं शिक्षण" असं आईनस्टाईनने म्हटलं आहे. पण बहुतेक शाळांत प्रात्यक्षिके होतच नाहीत. भारतातील काही प्रसिद्ध शाळांच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की नव्वदहून अधिक टक्के मिळवणार्या माध्यमिक वर्गातील अनेक मुलांना साध्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. मुले फक्त पुस्तकी विज्ञान शिकतात. प्रयोगांतून नव्हे. कदाचित त्यामुळे देशात संशोधकांचे प्रमाण डॉक्टर,इंजिनीअर यांच्या तुलनेने नगण्य आहे. शाळांमधील प्रकल्प असो वा हस्तकला, बहुतेक विद्यार्थ्यांचे पालकच सगळे करून देतात. मध्यंतरी परिचयातील एका मुलाने ’कडधान्याला मोड येणे’ या विषयावर लिहीलेला प्रयोग दाखवला, त्याभोवती त्याच्या आईने फुलांची वेलबुट्टी काढली होती, त्यापेक्षा तिने ’मोड कसे येतात’ हे प्रात्यक्षिक मुलाला का दाखवले नाही! या साचेबद्धतेतून शिक्षणाला मुक्त करणे पालकांच्या हातात नसले तरी मुलांचे आकलन प्रत्यक्ष निरीक्षणातून वाढविण्यासाठी ते निश्चीत प्रयत्न करू शकतात.
शिक्षणाच्या तीन पायर्या आहेत असं म्हटलं जातं.. माहिती (information), ज्ञान (knowledge) आणि शहाणीव (wisdom). माहिती अनेक माध्यमातून आपल्यावर आदळते आहे, केवळ माहिती जमवणं म्हणजे हुशारी नव्हे. त्याचे ज्ञानात रूपांतर करायचे कौशल्य मुलांमधे निर्माण करण्याची जबाबदारी सुज्ञ शिक्षकांची आहे, मात्र त्या ज्ञानाचा व्यावहारिक वापर, तौलनिक अभ्यास करता येण्याची शहाणीव मुलांमधे निर्माण करणे, शिस्तबद्ध संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यासाठी मुलांशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणं, त्यांना अभ्यासाव्यतिरीक्त ज्यात रस वाटेल त्यात रमवणं, पर्यावरणाची ओळख करून देणं, चांगली पुस्तक आणणं-वाचून दाखवणं, महत्वाच्या घडामोडी ,बातम्या यावर त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. यामुळे त्या मुलांमध्ये आत्मविश्वास येईल. मुलांबरोबर पारदर्शक, मैत्रीपूर्ण संबंध जपले तर पालक-मुलांचे हृद्य नातं नक्कीच बहरेल.
No comments:
Post a Comment