Saturday, March 15, 2025

सावध ऐका पुढल्या हाका

’ऑनलाईन’ शिकणार्‍या शाळकरी मुलांना सुद्धा सायबर सुरक्षेचे बेसिक नियम एव्हाना माहित झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जनहितार्थ केलेल्या जाहिरातीतून अमिताभ बच्चन ते नियम आपल्याला कळकळीने सांगत असतात. १) आपले पासवर्ड परक्या व्यक्तीला कधीही कळू देऊ नका २) इंटरनेटवर जर आर्थिक व्यवहार करीत असाल तर आपला ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड कुणाला सांगू नका आणि ३) आपली वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुणालाही देऊ नका. खरे तर आपल्याला हे इतके पक्के पाठ झाले आहे मग तरीही सायबर गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर का घडत असावेत! विशेषत: कोविड काळात आपल्या भारतात सायबर गुन्हेगारीत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची दोन कारणे आहेत. आपली फसवणूक होत असल्याचा क्षण अगदी व्यवहारचतुर लोकांना देखील सहजपणे ओळखता येत नाही. नजर हटी दुर्घटना घटी. दुसरे कारण आहे सायबर जगाच्या अंडरवर्ल्डबद्दल, अंधार्‍या कोपर्‍यांबद्दल, नव्या धोक्यांबद्दल जनतेची अनभिज्ञता. (लेखाच्या शेवटच्या भागात आपण याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया)

सायबर गुन्हेगारांना आपली माहिती मिळते कुठून ?

जॉर्ज ऑरवेल या प्रसिद्ध लेखकाने ’१९८४’ या पुस्तकातून साम्यवादी सत्तेच्या विळख्यात स्वातंत्र्य आणि समतेची भाबडी स्वप्ने पाहणार्‍या जनतेला ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ ही जाणीव करुन दिली होती. आज ’बिग ब्रदर’ची जागा गुगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुकसारख्या बलाढ्य अशा सायबर कंपन्यांनी घेतली आहे. आपण कुठे राहतो, काय करतो, आपल्या कुटुंबात कोण कोण आहेत, आपण काय खातो, काय पितो, कुठे जातो, कोणत्या वस्तू वापरतो, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपण कोणाशी बोलतो, इतकेच नव्हे तर काय बोलतो, इंटरनेटवर काय सर्च करतो हे सगळे या बिग ब्रदर्सना माहित असते. अगदी नवराबायको किंवा घरातली माणसे जितकी एकमेकांना ओळखत नसतील तितक्या या सायबर कंपन्या आपल्याला ’ओळखून’ असतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण इंटरनेटरवर जेव्हा ’फ्री’ म्हणून काही वापरत असतो तेव्हा आपण त्याचा असा मोबदला नकळत देत असतो. कोणतेही मोफत अ‍ॅप इन्स्टॉल करतेवेळी आपण ’आय अ‍ॅग्री’ यावर जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण त्या अ‍ॅपला आपले फोनबुक, गॅलरी, मोबाईलमधल्या फाईल्स वापरण्याची स्वत:च परवानगी देत असतो. बहुतेक जणांना सोशल मीडियावर व्यक्त व्हायला आवडते, सोशल मीडियाचा उद्देशच तो आहे. पण याचा अतिरेक होऊन आपल्या आयुष्यात खुट्ट जरी वाजले तरी त्यांना ते जगाला ओरडून सांगायचे असते. त्यामुळे ’हॅविंग पिझ्झा विथ अमुकतमुक’ किंवा ’ट्रॅव्हलिंग टू बंगलोर’ अशी पोस्ट टाकून सतत आपले अपडेट जगाला देण्याच्या सवयीतूनही ही माहिती सायबर जगात पोहचत असते. म्हणजे एका अर्थी या नव्या बिग ब्रदरच्या नजरकैदेत आपण स्वखुशीने उडी मारत असतो. 

ही सर्व माहिती म्हणजेच ज्याला डेटा असे म्हटले जाते, त्यात दोन गटांना स्वारस्य असते. एक म्हणजे मार्केटिंग कंपन्या, त्यांच्यासाठी आपण केवळ ग्राहक असतो आणि फक्त नफा कमावणे हा त्यांचा उद्देश असतो. दुसरा गट आहे, तो सायबर गुन्हेगारांचा, त्यांना सावज शोधण्यासाठी ह्या माहितीचा  उपयोग होतो. मग ह्यावर उपाय काय? हे सगळे वापरायचेच नाही! अर्थातच नाही.  कधीतरी अपघात होईल म्हणून जसे आपण प्रवास करणे थांबवत नाही. तसेच इंटरनेट वापरणे आपण थांबवायचे नाही. कारण इंटरनेटविना जगणे म्हणजे प्रगतीच्या वाटा स्वत:हून बंद करणे. इंटरनेटचा वापर अधिकाधिक स्मार्ट पद्धतीने करणे आणि सावधगिरी बाळगणे हाच यावर उपाय आहे. 

सायबर गुन्हेगार कोण असतात!

हे अतिशय उच्चशिक्षित असतात, त्यांना हॅकिंगचे उच्च तंत्रज्ञान अवगत असते असे बहुतेकांना वाटते परंतु बरेचदा हे गुन्हेगार जुजबी तांत्रिक ज्ञानाच्या साहाय्याने सावजाला हेरतात आणि लुबाडतात. गुन्हेगारी वृत्ती याच्या मुळाशी असते. झारखंडमधले जमताडा, राजस्थानमधले भरतपूर किंवा दिल्लीजवळचे नोएडा ही सगळी गावे सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. भारतात होणार्‍या एकूण सायबर गुन्हेगारीमध्ये 98% सायबर गुन्हे हे भारतीयांनीच केलेले असून 96% सायबर गुन्हे पुरुषांनी केलेले असतात. हे सायबर गुन्हेगार आपल्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात. समाजविघातक वृत्तीचे लोक, व्यवसायातील स्पर्धक, काढून टाकल्यामुळे राग किंवा डूख धरलेले माजी कर्मचारी, कुतूहल किंवा गंमत म्हणून हॅंकिंग करून पाहणारे विद्यार्थी, प्रेमप्रकरणातून किंवा दुखावले गेल्याने सूड उगवण्यासाठी देखील गुन्हेगारी मनोवृत्तीचे लोक असे गुन्हे करत असतात. मुखवटे धारण करणे आभासी जगात अतिशय सोपे असल्याने गुन्हेगारांचे फावते. 

सायबर गुन्हेगारीचे आर्थिक फसवणुकीपलिकडे कोणते प्रकार असतात!

लव्हबग 2000 किंवा वॉनाक्राय 2017 असे सायबर अ‍ॅटॅकस् (रॅनसम वेअर) जगभर गाजले आहेत. मोठमोठ्या वित्तसंस्था, कॉर्पोरेट्सची गोपनीय माहिती एन्क्रिप्ट करुन/ चोरुन ती डिक्रिप्ट करण्याच्या बदल्यात बिटकॉईनसारख्या डिजिटल चलनात खंडणी वसूल करणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप असते. हॉलीवूडच्या सिनेमातून आपण याची झलक पाहतो मात्र इथे आपण सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या सायबर धोक्याबद्दल बोलत आहोत. असे गुन्हे मुख्यत: तीन प्रकारचे असतात. १) आर्थिक लुबाडणूक जी हॅकिंग किंवा फिशिंगद्वारे केली जाते. २) मानसिक छळ, जो ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंगद्वारा केला जातो. आणि ३) लैंगिक शोषण, जे फोटो मार्फिंग किंवा वैयक्तिक माहिती चोरून ब्लॅकमेलिंग पद्धतीने केले जाते. अगदी ड्रग रॅकेटमध्ये ओढण्यात त्याचे पर्यावसान होऊ शकते. 

सायबर धोके टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी! 

दुसर्‍याच्या मोबाईल किंवा संगणकावरून सोशल मीडिया किंवा बँक अकाउंट वापरणे टाळायला हवे आणि वापरलेच तर ताबडतोब लॉग आऊट करावे. कुणीही सहज ओळखेल असा पासवर्ड नसावा. साधारणत: बायकांना आपल्या नवर्‍याचे किंवा मुलांची नावे पासवर्ड म्हणून वापरण्याची हौस असते. पुरुष बरेचदा त्यांच्या आवडत्या स्त्रीचे नाव वापरतात. त्यांना ओळखणार्‍या व्यक्ती किंवा हॅकर्स ते गेस करू शकतात आणि तुमचे अकाउंट भलत्याच व्यक्तीच्या ताब्यात जाते. याला हॅकिंग म्हणतात. बहुतेक लोक आपल्या पोस्टचे सेटिंग कायम पब्लिक ठेवतात. गुन्हेगार त्याचा वापर करून प्रोफाईल व इतर फोटो कॉपी करून त्यासारखेच दिसणारे डुप्लिकेट अकाउंट तयार करतात. याला क्लोनिंग म्हणतात. मूळ अकाउंटवरील मित्रांची नावे पाहून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग त्यांना ’मी अपघातात सापडलो आहे, मला मदत करा’ यास्वरुपाचे खोटे मेसेज पाठवले जातात. जेव्हा कुणी पैशाची मागणी करत असतो तेव्हा आपले कान टवकारलेच गेले पाहिजेत. अशा वेळी शहानिशा केल्याशिवाय कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत.

लैंगिक शोषण करणारे गुन्हेगार फोटो मॉर्फिंगचा वापर करतात. परंतु मुळात त्यांना हे फोटो उपलब्ध कसे होतात? बहुतेक महिला किंवा मुली आपल्या फोटोंचे प्रोफाईल सेटिंग हे पब्लिक राहू देतात. त्यामुळे ते कुणीही डाऊनलोड करू शकतो. त्याचा दुरुपयोग करू शकतो. खात्री न करता स्वीकारलेली फ्रेंड रिक्वेस्ट अनेकदा गुन्ह्याचे मूळ ठरते. 

सुशिक्षित लोक सायबर गुन्ह्यांना कसे बळी पडतात! 

सायबर गुन्हेगार सावजाच्या मानसिक स्थितीचा व्यवस्थित अभ्यास करतात. 11 ते17 वर्षे या वयोगटातल्या मुला-मुलींना इंस्टाग्राम किंवा डेटिंग अ‍ॅप्सवर, तरुण मुलींना साधारणत: विवाह नोंदणी स्थळांच्या वेबसाईटवर तर मध्यमवयीन महिला तसेच पुरुषांनासुद्धा फेसबुकच्या माध्यमातून फेक मित्र बनून जाळ्यात ओढले जाते. सोशल मिडीयावर महिलांशी संवाद साधताना त्यांच्या संवेदनशीलतेचा, मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेतला जातो. हार्मोनल त्रासामुळे किंवा आयुष्यातल्या ताणतणावांमुळे कुणी आपल्याशी थोडेसे सहानुभूतीने बोलले किंवा प्रशंसा केली की नकळत त्या मोकळेपणाने बोलू लागतात. विश्‍वास संपादन केल्यावर हे संभाषण पुढे अत्यंत खाजगी स्तरावर नेले जाते. कालांतराने ही माहिती उघड करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले जाते तर कधी परदेशातून भेटवस्तू पाठवल्याचे सांगून ती सोडवून घेण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या खात्यांमध्ये रकमा भरायला सांगितल्या जातात. विवाहविषयक वेबसाईटवर आपण उच्चशिक्षित सुस्थापित एनआरआय आहोत असे भासवून आधी लग्न ठरवणे आणि गोड बोलून पैशाची मागणी करणे असे प्रकार अनेकदा घडतात. पुरुषांनाही महिलांच्या नावाने मित्र विनंती पाठवून लुबाडले गेल्याच्या अनेक घटना घडत असतात. मध्यमवयीन लोक फारसे तंत्रस्नेही नसतात, त्यांना मुलाचा मित्र वगैरे असल्याचे सांगून गोंधळात टाकून घाईने पासवर्ड किंवा ओटीपी विचारला जातो. त्यामुळे सायबर जगात वावरताना आपला मेंदू हा सतत सजग राहिला पाहिेजे.

‘फ्री’ ह्या शब्दाबद्दल असलेले आकर्षण हे आर्थिक फसवणूक होण्यामागचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. फ्री भेटवस्तू घ्यायला कोणत्याही लिंकवर जाणे, फ्री वायफाय वापरणे टाळायला हवे. वेबसाईटवर आर्थिक व्यवहार करताना वेबसाईटच्या नावाआधी https/लॉकची खूण बघायला हवी. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर मेन्यूकार्डवरचे सगळे पदार्थ आपण खात नाही. आवडेल तेवढेच निवडतो. दुर्दैवाने इंटरनेट किंवा सोशल मीडियावरती आपण अशी निवड करत नाही. केवळ क्षणिक आनंदासाठी 80 व्या वर्षी आपण कसे दिसू, किंवा मागच्या जन्मी आपण कोण होतो अशी तथ्यहीन माहिती देणारे अ‍ॅप त्याचे रेटिंग न पाहता इन्स्टॉल करून घेऊन सायबर धोक्याची पातळी आपण स्वत:च वाढवत असतो. अँटिव्हायरस सारख्या सुरक्षेच्या उपायांवर खर्च करायला बरेच जण तयार नसतात, याकडे गांभीर्याने पाहायला हवे. 

डार्क वेब आणि सायबर अंडरवर्ल्ड

हिमनगाचा जेमतेम 1/3 भाग आपल्याला पाण्याच्या वर दिसतो. तसेच आपण वापरतो, वावरतो ते सरफेस वेब हे फक्त 4% आहे. इंटरनेटचा उरलेला 96% भाग म्हणजे डीप वेब. इथपर्यंत सर्च इंजिन पोहोचू शकत नाही. या डीपवेबच्या अगदी तळाशी आहे सायबर जगाचे अंडरवर्ल्ड म्हणजेच डार्क वेब. पूर्वी जगाचे राजकारण किंवा समाजकारण हे तेलाभोवती केंद्रित असायचे. जगात जी काही युद्धे होतात ती बरेचदा ’तेल’ ह्या प्रश्‍नामुळे निर्माण झालेली असतात. आता जगाचे जे काही राजकारण, समाजकारण आहे ते डेटाभोवती गुंफलेले आहे. येत्या काळातील युद्ध ही सायबर वॉर असतील आणि ती या डार्कवेबच्या माध्यमातून होतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

पुढच्या जगाचे जाऊ द्या, सायबर वापरकर्ता म्हणून विचार केला तर आपल्याला विशेष महत्त्वाची न वाटणारी आपली माहिती या वेब अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड किंमतीला विकली जाते. म्हणजे आपले नाव, गाव, पत्ता, आधारकार्ड, पॅननंबर अशी माहिती 10 ते 20 रुपयाला. आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डचा नंबर आणि नाव सुमारे 200 रुपयांना. कार्डची एक्स्पायरी डेटसारखी माहिती अजून जास्त किमतीला तर पासपोर्टसारखे दस्तावेज तब्बल 10000-15000 रुपये प्रति व्यक्ती विकले जातात. हे दर गरजेनुसार वाढत जातात. इंटरनॅशनल शॉपिंग वेबसाईटवरती बर्‍याचदा ओटीपी विचारला जात नाही, अशा ठिकाणी या माहितीचा गैरवापर केला जातो. सावधगिरी म्हणून इंटरनॅशनल कार्डवर स्पेंडिंग मर्यादा कमीत कमी ठेवणे, इंटरनॅशनल व्यवहाराचे सेटिंग एरवी ऑफ ठेवणे एवढे मात्र आपण नक्की करु शकतो.

‘डिपफेक’- सायबर जगातला एक नवा, भयावह धोका 

यूट्युबवर बीबीसाचा ओबामांवरील एक व्हिडिओ आहे. यात ओबामा आपल्याशी संवाद साधताना दिसतात. व्हिडिओत शेवटी सांगण्यात येते की तुम्ही ज्यांचे बोलणे ऐकले त्यांची देहबोली, त्यांची बोलण्याची लकब, त्यांचा आवाज, त्यांचा चेहरा जरी ओबामांसारखा असला तरी ते ’सिंथेटिक’ ओबामा होते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी विविध व्हिडिओंमधून ओबामांचे चौदा तासांचे फुटेज घेऊन त्याच्यातून ओबामांची उच्चार करण्याची पद्धत, त्यांचे हावभाव, आवाज ह्याचे नमुने घेऊन व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या मदतीने हे सिंथेटिक ओबामा तयार केलेत. थोडक्यात याचिं देही याचिं डोळा पाहिलेला व्हिडिओही खोटा, नकली असू शकतो. वलयांकित प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात या तंत्राचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात वापर होणार असल्याची शक्यता असल्याने संशोधकांनी त्याबाबत सावध करण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. व्हिडिओतील व्यक्ती खरी की सिंथेटिक हे ओळखण्याचे सध्यातरी केवळ ब्लिंक आय टेक्नॉलॉजी हे एकच तंत्रज्ञान आहे आणि तेही हा फरक अद्याप शंभर टक्के अचूकतेने शोधू शकलेले नाही. फोटो मॉर्फिंगची ही पुढची पायरी आहे. फोटो मॉर्फिंगमध्ये बरेचदा एका व्यक्तीचे अर्धनग्न शरीर आणि दुसर्‍या व्यक्तीचा चेहरा मर्ज केला जातो. या बाबतीत रिव्हर्स इमेज चेकिंगचा वापर करून फोटो बनावट असल्याचे ओळखता येऊ शकते पण डिपफेक मध्ये हे मिक्सिंग अतिशय बेमालूमपणे केले जाते. 

सायबर गुन्हेगारांनी ह्या डिपफेकचा वापर कोविड काळात केल्याची नोंद आहे. काही जवळच्या व्यक्तींचे आवाज आपण अगदी झोपेतही ओळखू शकतो. न्यूयॉर्क टाईम्समधील एका बातमीनुसार सीइओच्या आवाजात कंपनीच्या एका महत्वाच्या अधिकार्‍याला फोन करण्यात आला आणि प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार करायला सांगण्यात आले. बोलणार्‍या व्यक्तीचा आवाज, शैली अत्यंत परिचयाची असल्याने संशयाला जागा नव्हती, व्यवहार केले गेले आणि नंतर ’तो मी नव्हेच’ हे सीइओ ने स्पष्ट केल्यावर फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. आजवर लांब कुठेतरी घडणारे हे गुन्हे आपण ग्लोबल खेड्याचा भाग असल्याने आपल्याही उंबरठ्याशी येऊन पोचले आहेत. याची नोंद आपण वेळीच घेणे निकडीचे आहे.  

सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. सायबर जग त्याला अपवाद नाही. इथले गुन्ह्यांचे प्रकार आणि सावज हेरण्याच्या क्लृप्त्या तंत्रज्ञानाइतक्याच वेगाने वाढत आणि बदलत जाणार आहेत. आपण स्वत:ला सुजाण आणि जबाबदार नागरिक समजत असू तर डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार व्हायला आपले सायबर साक्षर असणे पुरेसे नाही. सायबरधोक्यांबाबत सावध असणे तितकेच महत्वाचे आहे. विवेकी मन, तर्कशुद्ध विचार करणारा चाणाक्ष मेंदू आणि या दोहोंच्या ताब्यात असलेले प्रत्यक्ष क्लिक करणारे मनगट या त्रयीवरच सायबर जगातला आपला निर्धोक आणि आत्मविश्वासपूर्ण वावर अवलंबून आहे. 


Tuesday, February 25, 2025

अयोध्या

बनारस-प्रयागला जायची इच्छा होती पण अयोध्येला तर जायचं होतं. शेकडो वेळा अवमानित झालेल्या ज्या विशाल  हिंदू संस्कृतीचा आपण एक अंश आहोत त्या संस्कृतीच्या हृदयातल्या आस्थाविषयाची सन्मानपूर्वक झालेली पुनर्स्थापना डोळ्यांनी बघायची होती. रामकथा फक्त वाल्मिकींनी सांगितलेली नाही ,रामायणाची अनेक versions आहेत. त्यातलं कोणतं खरं! त्यातही किती भाग खरा, किती प्रक्षिप्त हे प्रश्न मनात येणारच. कोणतं रामायण स्वीकारायचं, त्यातलं काय स्वीकारायचं, काय नाकारायचं, मुळात रामाला दैवत म्हणून दशावतारातील एक मानायचं की  केवळ मर्यादा पुरुषोत्तम मानायचं हे कोणत्या वैचारिक दृष्टिकोनातून आपण या सगळ्याकडे पाहतो यावर अवलंबून आहे. ’लोकसाहित्यातला राम’ हे काकडे सरांचं व्याख्यान आणि सातपुड्याच्या कपारींमधल्या भटक्या जमातींच्या आयुष्याचा भाग असलेल्या रामायणावरचं त्यांचं संशोधन स्क्रीनवर बघताना एक जाणवलं की रामायणाचं या जमातींचंही एक version आहे आणि ते बारशापासून अंत्यसंस्कारापर्यंत तुकड्या तुकड्यात लोकगीतांच्या माध्यमातून त्यांच्यात सामावलेलं आहे. उत्तरेकडची रामलीला असो वा रामानंद सागरचं दूरदर्शनवरचं ’बाणाला बाण जुळून त्यातला एक खाली पडेतो विकट हसणार्‍या राक्षसांचं’ गमतीदार भाबडं रामायण.  या सगळ्यामध्ये सामाईक काय आहे तर रामायणातली आदर्श भारतीय मूल्य आणि त्याभोवती रूजून फुलत गेलेली संस्कृती. 

जम्मूच्या रघुनाथंदिरापासून रामेश्वरम् पर्यंतचे उभे आणि सोमनाथ ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंगांचे आडवे असे श्रद्धेचे धागे एकत्र गुंफून भारत नावाचं महावस्त्र विणलं गेलं आहे अशा अर्थाचं एक वाक्य वाचलेलं आठवतंय. बनारस -प्रयागराज- अयोध्या प्रवासामुळे त्यातल्याच एका जरतारी धाग्याला स्पर्श करता आला. 

आवरून चेक आऊट करून आम्ही १२ आणि आमची लाडकी ९७११ अयोध्येकडे निघालो. आमचा भडकू चालक एव्हाना आम्हाला आणि आम्ही त्याला सरावलो आणि एकत्र नांदू लागलो होतो. मस्तपैकी अंताक्षरी खेळलो. (त्याच्याबरोबर नव्हे) ह आल्यावर मावशी ’हरीच्या घरी एक रंगीत काठी’ वगैरे म्हणणार आणि मी उषा उत्थुपचं ’हरी ओम हरी’ असा विजोड प्रकार होऊ नये म्हणून श्लोक बिक चालणार नाही ही अट घातली. जिथे ’ शिवतांडव स्तोत्रं’ वगैरे म्हटली तिथे बिचार्‍या मावशीला ’अखियोंसे गोली मारे लडकी कमाल रे’ वगैरे ऐकून मनात ’शिव शिव’ म्हणावं लागत असणार. जिजाजी मधूनच ठेवणीतली जुनी गाणी काढत होते. मामी, रोहिणीताई, स्वातीवहिनी तयारीत होत्या.आम्हा मर्त्य जीवांकडे दयार्द्र कटाक्ष टाकून दादा स्वप्ननगरीत गेला होता. मामा ठरलेलं अक्षर विसरून भलतीच गाणी सुचवत असला तरी पक्का खेळाडू होता. मिलींदला जगात एकच चाल येत असल्याने त्याने कोणतंही गाणं सुचवलं तर आधी ते गाणं ओळखून मग मूळ चालीत गायचं अशी सर्कस करत भेंड्या लावायला मजा आली. गाणी, गप्पा आणि खाणं यात केव्हा अयोध्येत शिरलो कळलंच नाही. 

अयोध्या गाव लहानसं वाटलं. इमारती, रस्ते, हॉटेल्स, टुमदार घरं सगळं स्वच्छ, चकाचक आणि नव्याने वसवलेलं वाटत होतं. मनुनिर्मित नगरी आता मोदीनिर्मित नगरी झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. अर्थात प्रयागराजला जागोजागी झळकणारे मोदी-योगी इथे एकाही फलकावर दिसले नाहीत. 

शब्दामृतने ’पंचशील’ या हॉटेलला बुकींग केलं होतं. सवयीने हॉटेलची वेबसाईट लॅपटॉपवर पाहिली. त्यात पंचशील स्पेलिंगचा शेवटचा एल बहुतेक फॉन्ट साईज अ‍ॅडजस्ट न झाल्याने एकटाच तिसर्‍या ओळीत लटकताना पाहून हॉटेलचा एकूण आनंद असणार असं वाटलं होतं. पण हॉटेल एकदम मस्त लग्झरियस निघालं. इथलं जेवण सुद्धा उत्तम होतं अर्थात बनारसला खाण्याचा जो उत्साह होता तो सतत कचोर्‍या, छोले, पनीर, नान, सूप, ज्यूस, लस्सी पाहून कमी झाला होता आणि 'उदरभरण नोहे..' वर गाडी आली होती. इकिगाईने एका वेळेला भुकेच्या ८० % च खावं असं सांगितल्याचंही आता आठवू लागलं होतं. तर समोर वाढलं ते खानपान आटोपून शरयूतीरी निघालो. 

हंपीचा अपवाद वगळला तर फिरायला जाण्य़ापूर्वी तिथे नदी, तळं, समुद्र असा काहीतरी जलस्रोत आहे ना याची नेहमीच खात्री करते. इथे  तर गंगा-यमुना आणि आता शरयू नदी. You never touch the same river again असं म्हणतात या अर्थाने रामस्पर्श झालेली शरयू आज नसणार पण रामाचं सान्निध्य लाभलेली शरयू तर तीच आहे. ज्येष्ठ स्नेही श्रीपादजी कोठे यांच्या 'नदी' कवितेतल्या काही आवडलेल्या ओळी, रामायणातल्या उलथापालथींना साक्ष असलेल्या शरयूचीच रूपं आहेत असं वाटतं. 

किती खेळली इथे पाऊले किती नांदली इथे राऊळे 

किती पिढ्यांची किती युगांची इथे दाटली किती वादळे

कधी नर्मदा कधी गोदा तू कधी तू कृष्णा, सरस्वती तू 

भगीरथाच्या कर्तृत्वाची शिव जटेतील गंगाही तू

कृष्णसख्याची होते यमुना रामासाठी शरयू जीवन 

विठ्ठलपायी गिरकी घेता भीमा होते पतीत पावन

कुठे आरती मानसपूजा कुठे भक्तीची पवित्र धारा 

कुठे तुझ्यातच मिळून जातो काजळकाळा कृतघ्नपारा

सांजघडीची पायवाट तू चराचराचा आर्त नाद तू 

देवाघरची भाग्यशलाका पृथ्वीवरली सार्थकता तू

शरयूतीरी आम्ही पोचलो तेव्हा आरतीची तयारी सुरू होती. गंगाआरतीसारखीच यथासांग आणि नेत्रदीपक आरती झाली. रोषणाई केलेल्या कमानींखाली रेशमी पिवळ्या,केशरी पोशाखात उभ्या असलेल्या पुजार्‍यांच्या हस्ते. झगमगत्या दीपमाळा उंचावत लयबद्ध तालबद्ध. गंगाआरतीचा थाट, तशी अफाट गर्दी मात्र इथे अजिबात नव्हती आणि पात्रातून आरती अनुभवण्याची सोयही. तरीही त्या गार वार्‍यात, अंधारात चमचमणार्‍या ज्योतींनी ओवाळली जाणारी शरयूमाता बघत राहावी असं वाटलं. हे ’इव्हेंट’ पर्यटनाला चालना देण्यासाठी असले तरी फार सुंदर सादर केले जातायत. स्वच्छ काठावरच्या स्वच्छतागृहांपैकी एकावर ’for Transgenders only' अशी पाटी पाहून ’भारत बदल रहा है’ याची चुणूक दिसली. 

बाहेर पडताना रंगीत प्रकाशझोतांमध्ये न्हाऊन निघालेल्या ’रामजी की पैडी’ चं सुंदर दृश्य दिसलं. श्रीराम इथूनच शरयूस्नानासाठी जात या मान्यतेनुसार शरयूतीरावरच्या घाटांच्या रांगेला ’रामजी की पैडी’ नाव दिलेलं आहे. सगळे एकत्र जमेतो पैडीवरची वर्दळ बघत राहिले.  

इ-रिक्शांनी परत निघालो. प्रशस्त ’धर्ममार्ग’ पार करताना दुतर्फा रामायणातल्या मह्त्वाच्या घटनांवर आधारित म्युरल्स चितारलेली दिसली. आपल्याकडे भिंती, फ्लायओव्हर खाली जी बटबटीत चित्रं काढतात त्या तुलनेने ही फारच दर्जेदार आहेत. वाटेत ’भारतरत्न लता मंगेशकर’ चौकात सरस्वतीच्या वीणेची प्रतिकृती स्थापन केलेली दिसली. 

’पंचशील’ मध्ये सुग्रास जेवून (80 %) आपापल्या खोलीकडे निघणार तोच आयोजकांनी एका व्याख्यानाची घोषणा करत श्री, व सौ. आफळे यांना मंचावर आमंत्रित केलं. मऊ गादी बोलावत असल्याने क्षणभर वैताग आला, त्यात परतीच्या रेल्वेचं काही खरं दिसत नसल्याने मिलींदच्या मदतीने हवाईमार्गाचे पर्याय शोधायचे होते. पण आफळयांकडून ’राम मंदिर निर्माणाचा प्रवास’ ऐकल्यावर अयोध्या ट्रीप सार्थकी लागली असं वाटलं. मटेरियल मॅनेजमेंटचे आयआयटीयन पुण्याचे डॉ. जगदीश आफळे श्रीराम जन्मभूमी न्यासाने नियुक्त केलेले प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांची पत्नी माधुरी यादेखील मंदिर शिल्पकलातज्ञ आहेत. सध्या त्या मंदिराचा ’देणगी विभाग’ सांभाळतात. या आधी तीन वर्ष हे दांपत्य अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तारक म्हणून कार्यरत होतं. आफळे यांना देश-परदेशातील मोठ्या बांधकाम प्रकल्प उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे. 

आता हा पावणेतीन एकरात पसरलेला विशाल प्रकल्प.  ३६० फूट उंच आणि २६५ फूट रूंद श्रीराममंदिर तर साकार झालं. संकल्पित योजनेनुसार मंदिराचे ३९४ खांब, १२ दरवाजे. गूढ मंडप, रंगमंडप, नृत्य मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप, सीता व अन्य देवतांची मंदिरे त्यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वाला जात आहेत. प्रत्येक खांबावर १२ ते १६ मूर्ती आहेत आणि एक मूर्ती घडवायला कारागिरांना १५ दिवस लागतात. हजार वर्ष टिकेल या गुणवत्तेचं व दर्जाचं मंदिर तयार करण्याचा संकल्प असल्याने  या सगळ्यासाठी किमान अडीच वर्ष अजून लागणार आहेत. मंदिर उभारणीला एल अ‍ॅंड टी सारख्या कंपन्या, सीबीआरआय, एनजीआरआय सारख्या संस्था, अनेक आयआयटीयन्सनी मोलाची मदत केल्याचं त्यांनी नम्रपणे सांगितलं. रामलल्लाच्या प्रकाशतिलकामागची lens ची वैज्ञानिक करामत उलगडली. निर्माण कार्यात आलेल्या अडचणी कशा सोडवत गेले ते ही सांगितलं. पहिल्याच पावसात मंदिर गळत असल्याच्या बिनबुडाच्या आरोपाचाही संयतपणे समाचार घेतला. ’मी’ आणि ’मोदीजी’ किंवा मी आणि ’योगीजी’ किंवा माझे कर्तृत्व असा उल्लेख त्यांनी एकदाही केला नाही. 

मातीत हात घातल्याशिवाय शेतीवर बोलू नये पण आफळे १९९२ च्या कारसेवेत स्वत: सहभागी होते. साहजिक १६ व्या शतका्त बाबराने केलेल्या रामजन्मभूमी विध्वंसापासून न्याय्य मार्गाने मंदिरनिर्मितीपर्यंतचा प्रवास त्यांनी भावुकपणे कथन केला. मुघल आक्रमकांकडून जन्मभूमी परत मिळवण्यासाठी हिंदूंनी लढलेली अनेक लहानमोठी युद्ध, संघर्ष, हिंदू धर्म टिकवण्यात शिखांनी दिलेलं योगदान याचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. कंबोडिया, थायलंड, त्रिनिनाद ते इस्लामाबाद जवळच्या सैदपूर पर्यंत पसरलेली राममंदिरं ’रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणार्‍यांना किमान ’राम’ ही संकल्पना अस्तित्वात असल्याचा आणि प्राचीन असल्याचा पुरावा देतात. तरीही रामाचा जन्म अयोध्येतच झाला याचा आजच्या कायद्याच्या चौकटीतला पुरावा उपलब्ध नाही. परंतु धार्मिक ग्रंथातले अनेक संदर्भ व मुख्यत:  गुरुनानकजींनी रामजन्मभूमी दर्शनासाठी १५१०-११ मध्ये अयोध्या यात्रा केल्याचा उल्लेख यावरून तिथे रामजन्मभूमी मानल्या जाणार्‍या स्थळाचं अस्तित्व न्यायालयाने मान्य केलं. 

आफळे यांना ऐकताना ५०० वर्ष  देशभराने आस्थेचं प्रतीक मानलेला श्रीराम आपल्याच जन्मभूमीत कसा निर्वासितासारखा राहिला याची तीव्रता जाणवली. त्याच्या स्वगृही प्रतिष्ठापनेसाठी जीवाच्या आकांताने वर्षानुवर्षे धडपडणार्‍या कार्यकर्त्यांना-कारसेवकांना खच्ची करणार्‍यांना, ’मंदिर वही बनायेंगे’ ची टर उडवणार्‍यांना रामजन्मभूमी खटल्यात संवैधानिक मार्गाने मिळालेला न्याय ही खरी चपराक आहे.

आफळे बोलणं थांबवून ’प्रश्न विचारु शकता’ म्हणाले. अद्भुत काही अनुभवल्यानंतर एक तर बोलून तो अनुभव डहळवू नये. बोलायचंच असेल तर त्याला वर्ख लावता यावा. पण काही जणांनी ’मंदिरात जायला गेटपासून किती वेळ लागेल’ असले वर्‍हाडी भाषेत ’मॅटावानी’ प्रश्न विचारायला सुरूवात केल्यावर आफळे यांना भेटायची इच्छा असूनही आम्ही उठलो. शिवाय पहाटे उठून रामलल्लाचं दर्शन घ्यायचं होतं. मामेभाऊ कौस्तुभ तिथे मंदिर लोकार्पणापर्यंत गाभारा प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याच्याशी मामाचं बोलणं झाल्याने त्याने आम्हाला सकाळी सहा वाजेच्या शृंगार आरतीला उपस्थित राहण्याची दुर्लभ संधी सहज मिळवून दिली. 

पहाटे शुचिर्भूत होऊन आम्ही मंदिराकडे निघालो. आमच्या चालकाने आम्हाला मंदिराजवळच्या रिक्षास्थानकापाशी सोडलं. एकच रिक्षा असल्याने पुन्हा लहान होत अक्षरश: मामाच्या मांडीवर बसून मंदिरापाशी पोचले. इथले बहुसंख्य रिक्षाचालक मुस्लीम आहेत. हिंदूंबरोबरच अनेक स्थानिक मुस्लीमांच्या हाताला राममंदिरामुळे काम मिळालं आहे.

सकाळचे सव्वापाच वाजले असतील. उतरून पाहते तो साधेसे प्रवेशद्वार, सुरक्षारक्षक, कर्मचार्‍यांची गडबड. लख्ख स्वच्छता. रस्त्यावर लहान लहान पक्की दुकानं दिवे लावून विक्रीच्या तयारीत असलेली. रीतीप्रमाणे श्रीरामाचा तिलक लावून घेतला. प्रशस्त ऑफीसमध्ये मोबाईल जमा केले. मावशीसाठी व्हीलचेअर ठरवली. अडीचशेपैकी दर ५० मीटरवरच्या तंबूत आमच्या आरती पास, आधारकार्ड वगैरे कागदपत्रांची तपासणी होत होती. आमच्या आग्रहामुळे व्हीलचेअरवर (भयंकर संकोचून) बसलेली मावशी ’एवढं मी सहज चालले असते’ असं पुन्हा पुन्हा  म्हणत होती. मामा, मामी, ताई, दादा वेगळ्या मार्गाने पुढे सरकत होते. मावशीसकट व्हीलचेअर ढकलणारा व त्याच्यामुळे मी मधल्या अंतरात धावत होतो. वेगामुळे हलकं वाटत असणार आणि लवकर पोचलो तर पुढची फेरी मिळायची आशा असणार. एकीकडे मी त्याची शब्दश: धावती मुलाखत घेत होते. त्याने आय-कार्ड लावलं असूनही तुम्हारा नाम क्या है बसंती, रोज सरासरी किती दर्शनार्थी येतात, तुम्ही किती फेर्‍या करता, आधी काय करायचे वगैरे. मंदिराजवळ चपला काढल्या, हरवलो तर तिथे भेटू इ. ठरवलं होतं. स्वच्छ मार्गिका आणि चोख बंदोबस्त होता. यहा परिंदा भी पर नही मार सकता म्हणावे इतका.

आता मुख्य मंदिर दृष्टीपथात आलं. टीव्हीवर लोकार्पण सोहळ्यात पाहिलं होतं तसंच बदामी रंगाचं, रेखीव, कोरीव, सुघड आणि भव्य. रँपवरून धावत आम्ही गाभार्‍याकडे गेलो. आत अन्य दर्शनार्थी आरतीची प्रतीक्षा करत उभे होते. जातीचा उल्लेख गरजेचा नसलेले, हिंदू या एकाच नात्याने जोडलेले. भारताच्या किंवा जगाच्याही कानाकोपर्‍यातून आलेले. सगळे शांतपणे उभे होते. योग्य जागा पकडून मंदिराचे कोरीव खांब, अप्रतिम छत, प्रकाशरचना बघेतो सहा वाजले. गाभार्‍याचा रेशमी पडदा हळूहळू सरकला आणि हसर्‍या राजस सावळ्या रामचंद्राचे दर्शन होताच हात जोडून सर्वांनी एकमुखाने ’जय श्रीराम’ म्हटलं. मूर्तीच्या पायथ्याशी आजवर तंबूत ठेवलेल्या मूळ मूर्ती स्थापित आहेत. दर्शन घेताना स्वत:च्याही नकळत डोळ्यात पाणी आलं. कुणाचं कारण धार्मिक असेल, कुणाचं भावनिक, कुणाला कारसेवेची परिणती पाहून भरून आलं असेल तर कुणाच्या डोळ्यात पराभूत मानसिकतेतून बाहेर येऊन सन्मानाचं प्रतीक पाह्ण्यातला आनंद झरत असेल. मावशी ओल्या डोळ्यांनी स्तोत्र म्हणत होती.

वाद्याच्या गजरात आरती सुरु झाली. दोन पुजारी दोन्ही बाजूनी चवर्‍या ढाळत होते. षोडशोपचारे पूजा, आरती होताच तीर्थ प्रसाद वाटण्यात आला. आरती फिरवली. पुन्हा रामनामाचा गजर झाला आणि मूर्तीकडे पुन्हा पुन्हा पाहत आम्ही बाहेर पडलो. आरतीचं शूटींग दररोज दूरदर्शनवर प्रक्षेपित होत असल्याने उद्याच्या दर्शनयादीत असलेल्या आमच्या टीममधल्या अर्ध्या मंडळींना मामा मामीचा फोटो कौस्तुभकडून आधीच पोचला होता. 

बाकी सगळे वेगळ्या मार्गाने बाहेर पडणार असल्याने प्रसाद खिडकीशी जाऊन मी सगळ्यांसाठी प्रसाद मागितला तेव्हा तिथला कर्मचारी म्हणाला ,’अपने हाथोंसे ले तो ही वो प्रशाद है’ पण मग दिला त्याने. पंचशीलला उतरताना आमच्या मुस्लीम चालकाने वेळेवर मंदिरालगत पोचवल्याबद्दल त्याला धन्यवाद देताना मावशी मनापासून म्हणाली, ’अल्ला तुमको बहुत आशीर्वाद देगा’.

अयोध्या रक्षणासाठी हनुमानाचे इथे वास्तव्य होते अशी मान्यता असलेल्या हनुमानगढीला मला जाता येणार नव्हते. कनकभवन यादीत नव्हतं. राणी कैकेयीने सीतेला, रामाशी विवाह झाल्यानंतर हे भवन भेट दिलं असं मानलं जातं. बाकी मंडळी नंतर हनुमानगढीला गेली पण प्रचंड गर्दीमुळे बाहेरूनच नमस्कार करून त्यांना परतावं लागलं. आता संध्याकाळी सूर्यकुंड आणि तिथला लेझर शो पाहायचा होता पण अयोध्या-अहमदाबाद विमानाचं ऐनवेळी तिकिट मिळालं त्याची वेळ आधीची असल्याने ते शक्य झालं नाही. 

Ayodya Airport

अयोध्या विमानतळ छोटंसं टुमदार, बदामी रंगाचं. रचना बाहेरून एखाद्या मंदिरासारखीच. चेक इनच्या रांगेत दादा व माझ्यामागे एक कमंडलूवाले साधुबुवा, एक भगवं पागोटेवाले काका, त्यांच्यामागे एक मुस्लीम कुटुंब ,एक सेना अधिकारी, एक आठ्यायुक्त स्कर्टबाला. जिकडे तिकडे चिकार गर्दी. फारच घरगुती वातावरण होतं. आधुनिक एसटी स्थानकच. विमान सुटायची वेळ आली तरी लोक कुठेही हिंडत होते. तरूण चटपटीत क्रू पुकारा करून करून थकून जात होता.  

आफळे म्हणाले त्यानुसार सगळं मंदिर संकुल अडीच वर्षात पूर्ण होईल. तेव्हा मुलं आणि महेशसह पुन्हा यायचा विचार टेक ऑफ आधी बकेट लिस्टमध्ये टाकला. भारत म्हणजे बैरागी, गारूडी, हत्तींचा गचाळ देश ही प्रतिमा अस्पष्ट झाली असली तरी नष्ट नाही. या कात टाकलेल्या स्पिरिच्युअल टुरिझम मुळे मात्र ती बरीचशी पुसली जाईल. मंदिर लोकार्पणाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतल्या अफाट आगामी प्रकल्पांबद्दल वाचलं. हॉस्पीटलपासून मनोरंजन नगरी ते विद्यापीठापर्यंत त्यात इतकं काही आहे की धार्मिक आस्था आणि अस्मितेबरोबरच किंवा त्यापलिकडे 'राममंदिर हवं कशाला' याचं उत्तर शोधलं तर सहज मिळेल. तरीही काही आपपरभाव मनात उरत असेल तर रामलल्लाचं दर्शन घ्यावं आणि त्या निर्व्याज हास्यात किंतुपरंतु विरून जाण्याची प्रचिती घ्यावी

Wednesday, January 8, 2025

तीर्थराज प्रयाग

बनारसच्या ’स्क्वेअर इन’ हॉटेलमध्ये जेवून सामान बांधून प्रयागराजला निघायचं होतं. बरेच जर्मन पर्यटक आल्याने हॉटेल गजबजलं होतं. आपापल्या पर्सेस जवळ ठेवायच्या आणि मोठ्या बॅग खोलीबाहेर काढून ठेवायच्या अशा स्पष्ट सूचना असूनही ईश्वरकाकांनी आपली महत्वाची सॅक मोठ्या बँगांवर ठेवून दिली. ती कोणत्या गाडीच्या डिकीत गेली हे शोधायला कासावीस झालेले ईश्वरकाका आणि त्यांना वैतागलेल्या शिलेदारांनी प्रयागच्या रस्त्यावर सुसाट निघालेल्या आमच्या दोन्ही गाडया थांबवून शोधमोहीम सुरु केली. 

हे कमी की काय म्हणून एका जर्मनबुवांची बॅगही हॉटेल क्रूच्या चुकीने आमच्या सामानात शिरली होती. सगळ्या बॅगांची उचकपाचक झाल्यावर जर्मन बुवांनी त्यांची बॅग व्हिडिओ कॉलवर शांतपणे ओळखली. ते विमानतळावर पोचले कि निघाले, मग तोवर ही बॅग पोचेल का आणि नाही पोचली तर त्यांचं भारताविषयी काय मत होईल याची मला चिंता पडली. इतक्यात हॉटेलचा मॅनेजर हमारे गाडी का पीछा करते हुए पोचला आणि एकदाची ती बॅग घेऊन गेला. झाले, एव्हाना प्रवासात ध्येय नसलेली काही मंडळी बॅग व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ होऊन ग्रुपवर सल्ले लिहू लागली. मध्येच एका काकांनी ’१ जानेवारी’ कसा ’आपला’ नववर्ष दिन नाही’ अशी असंबद्ध आणि बूमर्सच्या आवडीची पोस्ट टाकली. मिलींद त्यांना "एरवी ज्या कॅलेंडरनुसार जगता ते आता का म्हणून आपले नाही, आँ!’ टाईप प्रतिप्रश्न करू लागला. हा ट्रॅक सोडून काहीजण भलत्याच पोस्ट टाकू लागले. बॅग हरवेतो सगळं फारच सुरळीत सुरु असल्याने मला कसंसंच होत होतं. आता कशी ट्रीपला रंगत आली. एरवी रस्त्यावरचं वगैरे न खाणार्‍या आणि ’मॅन ऑफ फ्यु वर्ड्स’ असणार्‍या किंवा आमच्या (आदरार्थी एकवचन) वटवटीमुळे बोलायची संधी न मिळणार्‍या विवेकदादाने पण उत्साहित होऊन चक्क रस्त्यालगतच्या धूळभरल्या टपरीत सरसोंच्या तेलात तळली जाणारी मस्तपैकी अनहायजिनीक गरमागरम भजी विकत आणली. त्यांची चव काही और होती.

प्रयागराजच्या वाटेवर जी खेडी, लहान गावं लागली ती ’लापता लेडिज’ मधल्या नायिकेसारखी. साधी ,भोळी, नीटनेटकी पण स्वत:च वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण रूपडं असलेली. यूपी म्हणजे बकाल हा समज दूर करणारी. राजकारण्यांचे फलक मात्र जागोजागी त्यामानाने ब्रँडच्या जाहिराती अगदी कमी. दक्षिणेत दिसणारी हिरवाई मात्र इकडे फारशी नाही. 

प्रयागराज म्हणजे पूर्वीचं अलाहाबाद. इथल्या क्लाइव्ह रस्त्यावर अमिताभचं जन्मस्थान आणि हरिवंशरायजींचं कर्मस्थान. दिल्लीला जाईतो ८, १० वर्ष त्यांचं प्रयागला म्हणजे तेव्हाच्या अलाहाबादला वास्तव्य होतं हे वाचलं होतं. अमिताभ काहीच्या काही आवडत असल्याने उगाचच ते घर पाहायची इच्छा होती पण ते भाड्याचं होतं, आता तिथे काही खुणा नाहीत म्हणे. नेहरू घराण्याचं आनंद/ स्वराज भवन इंदिरा गांधींनी कॉंग्रेस पक्षाला देऊन टाकलंय. त्यामुळे प्रयागबद्दल उत्सुकता होती ती फक्त त्रिवेणी संगमाविषयी. शहराची रचना बरीचशी नागपूरसारखी वाटली. पुलावरून शहरात शिरताना आगामी कुंभमेळ्यासाठी नैनी भागात वसवलेली विस्तीर्ण टेंट सिटी दिसली. साध्या तंबूंपासून आयआरसीटीसीच्या दिवसाला तब्बल वीसहजार रू. चार्ज करणार्‍या राजेशाही तंबूंपर्यंत कित्येक निवास प्रकारांचा यात समावेश असणार. नजरेत भरेल अशी स्वच्छता होती. जागोजागी कुंभमेळ्याचं महत्व सांगणार्‍या, प्रयागला येण्याचं आवाहन करणार्‍या फलकांवर योगी-मोदी जोडीनं झळकत होते. एकूण कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु होती. 

’रामा कॉंटीनेंटल’ हॉटेलला पोचलो. विमानतळावर क्न्व्हेयर बेल्टकडे सगळे टक लावून पाहत उभे असतात तसं आम्ही पण मेरीवाली बॅगची प्रतीक्षा करत उभे होतो. आधी आपापल्या बॅग ताब्यात घेऊन चेक-इन केलं. हॉटेल बनारसपेक्षा बरंच मोठं आणि पॉश होतं. रिसेप्शनीस्ट इतकी चुणचुणीत आणि गोड होती की एखादी तक्रार करायला कुणी आलंच तर कशाला आलोय तेच विसरून जात असावं. थोडा आराम करून हाय-टी घेतला. खोडरबरासारखे लागणारे पनीरचे ठोकळे अळणी बेसनात बुडवून नुसतेच तळले होते. बाकी स्प्रेड चवदार असला तरी बनारसच्या स्क्वेअर इनचे फूड पहली पायदान वरच. 

थंडीचा जामानिमा करून ’अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क’ मध्ये गेलो. पार्कमधून आत शिरताना उजव्या भागात महापालिकेचे ४ मोठाले पेटारे ठेवले होते. जुनी पादत्राणे, वस्तू, कपडे इ. साठी हे वेगवेगळे पेटारे होते. हल्ली बर्‍याच गावात ’माणुसकीची भिंत’ असते तसा प्रकार. समोरच मिशीला पीळ देणार्‍या देखण्या आझादांचा पूर्णाकृती पुतळा होता. त्यांचा दुसरा हात पाठीमागे आहे आणि त्यात पिस्तुल आहे. मागे एक प्रचंड मोठं झाड आहे. प्रिन्स आल्फ्रेडने या शहराला भेट दिली होती याची आठवण म्हणून १८७० मध्ये हे उद्द्यान निर्माण करण्यात आलं. १९३१ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान चंद्रशेखर आझाद ब्रिटीश पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्या हाती लागण्यापेक्षा त्यांनी इथे स्वत:वर गोळी झाडून आत्मबलिदानाचा मार्ग पत्करला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्तर प्रदेश सरकारने त्यांचं नाव या उद्द्यानाला दिलं आहे.
संधीप्रकाशात आझादांच्या आत्मबलिदानाची कथा त्यांच्या पुतळ्याच्या आणि त्या झाडाच्या साक्षीने पार्थकडून ऐकली. नेहरूंचं सहकार्य नसलं तरी कमला नेहरूंनी पुढाकार घेऊन आझादांचे विधीवत अंत्यसंस्कार करायला मदत केली ही पार्थकडून कळलेली माहिती विस्मयजनक वाटली. त्यांनी मुग्धा वैशंपायनसह तिथे ’वंदे मातरम्’ म्हणायचं आवाहन केलं. भारावलेल्या मनस्थितीत आझादांच्या पुतळ्याकडे पाहत एका सुरात ’वंदे मातरम्’ म्हणताना या सगळ्याच क्रांतीकारकांबद्द्ल फार फार कृतज्ञ वाटलं आणि स्वत:बद्द्ल फार खुजं देखील. 

पार्क मध्ये दिवेलागण झाली. देखाव्यासाठी केलेल्या पारदर्शक जनावरांच्या अंगातून फ्लुरोसंट लाईट सोडलेले असल्याने पार्क आकर्षक दिसत होतं. इथून आमची सगळी गाठोडी जवळच्या एका झकास हॉटेलला पोचवण्यात आली, इथे पार्थचं रामायण आणि मुग्धाचं गाणं असा कार्यक्रम होता तो ही लॉनवर, साडेसहा डिग्रीमध्ये. हीव भरल्याने ’सेहतू बाहांधा रेहे साहागरी’ असं गायची वेळ मुग्धावर येईल असं वाटलं पण ती न शहारता आरामात गात होती. 

दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शब्दामृतच्या भाषेत शुचिर्भूत होऊन आम्ही प्रयाग संगमासाठीनिघालो. गारठलेल्या अवस्थेत संगमाकडे निघण्य़ाआधी खाली शेगडी,त्यावर अ‍ॅल्युमिनीयमची किट्ली घेऊन फिरणारा चहावाला देवदूतासारखा भेटला. किटलीसारख्या तोंडून वाफा निघत होत्या.
पाण्यात पुठ्ठा बुडवल्यासारखा बेचव चहा पण गरम असल्याने हवासा वाटत होता. पार्किंगमध्ये तुरळक गर्दी होती तरीही आमचे शिलेदार नेहमीप्रमाणे पताका घेऊन पुढे चालत होते. कपड्यांचे चार पाच थर घालून आम्ही त्यांच्या मागे.


गाडी पार्किंगलगतच्या ’लेटे हुए हनुमानजीं’चं आधी दर्शन घेतलं. लंकेवर विजय मिळवल्यानंतर हनुमानजी थकले होते आणि त्यांनी इथे विश्रांती घेतली होती अशी मान्यता आहे. हे मंदिर किमान ६००-७०० वर्षे जुनं आहे. हनुमानजींची दक्षिणाभिमुख मूर्ती २० फूट लांब आहे. संगमस्नानाला या दर्शनाविना पूर्णत्व नाही असं म्हणतात. आम्ही गेलो तेव्हा बाहेर बराचसा अंधार पण आत प्रखर दिवे होते. गर्दी नव्हती. कुंभमेळ्यात हेच दर्शन गर्दीमुळे बहुसंख्य लोकांना दुरापास्त झालं होतं. 

संगमाकडे चालत निघालो. उजव्या हाताला भक्कम बांधणीचा भलाथोरला अलाहाबाद किंवा अकबर किल्ला आहे. त्याची दुसरी बाजू थेट यमुनेच्या किनार्‍यावर आहे. या जागेचं भू-राजकीय महत्व लक्षात घेऊन मुघल सम्राट अकबराने १५८३ मध्ये इथे हा किल्ला बांधला. बांधणीचा खर्च सव्वा सहा कोटी आला असं म्हणतात. इतिहासकार विलियम फिंचच्या नोंदीनुसार किल्ला पूर्ण व्हायला ४० वर्ष लागली. तोवर अकबर मृत्यु पावला. किल्ल्याच्या परिघावरून अकबराच्या तत्कालिन अफाट सांपत्तिक आणि राजकीय ताकदीचा अंदाज येतो. सलीम ऊर्फ जहांगीर १६०५ मध्ये मुघल सम्राट होण्यापूर्वी काही वर्ष इथे किल्ल्याचा सुभेदार म्हणून राहिला होता. १७६५ मध्ये किल्ला बंगालचा नवाब शुजा-उददौलाला विकण्यात आला. १७९८ मध्ये तह झाला आणि किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आता त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून वर्गीकृत केलं आहे. 

या किल्ल्याच्या आत चांदी आणि तांब्याची नाणी पाडणारी टांकसाळ होती, जहाजबांधणी होत होती. किल्ल्यात जनानी महल, शाही हरम असे बरेच भाग होते. जतन व्हावा म्हणून आता थोडाच भाग पर्यटकांना बघायला खुला आहे. जेवढा बघता येतो त्या भिंतींना जाळी लावलेली असल्याने बदाम, बाण, I love you Sangita, जोडो के दर्द की दवा.. वगैरे मजकुर सुदैवाने नव्हता. किल्ल्याचा काही भाग भारतीय सैन्यासाठी राखीव आहे. इथे आता एक पाताळपुरी मंदिर आहे. मला ते काहीसं कृत्रिम आणि बटबटीत वाटलं. मंदिरातील काही प्राचीन मूर्ती ऑईलपेंटने रंगवल्याने कशाशाच दिसत होत्या. 

इथला ३०० वर्ष जुना, दहा मीटर घेराचा प्रसिद्ध ’अक्षय वट’ पाहिला. ह्युएनत्संगच्या प्रवास नोंदींमध्ये याचा उल्लेख आहे. पृथ्वी प्रलयात बुडाली तरी हा वृक्ष अक्षय राहतो. याच्या पानावर ईश्वर बालरूपात राहून सृष्टीचं पालन करतो अशी पौराणिक आख्यायिका तिथे लिहिलेली आहे. किल्ला परिसरात इतरत्रही बरीच  वडाची झाडं असली तरी अक्षयवटाला विशेष मह्त्व आहे. अंदमान जेलमधल्या लाईट-साऊंड शो मध्ये अशाच एका पुरातन वटवृक्षाने ’ओम पुरी’ च्या आवाजात स्वातंत्र्य-आंदोलनाची गाथा ऐकवली होती त्याची आठवण झाली. अक्षय वटाकडे सांगण्यासारखं किती असेल ! अकबराच्या काळापासून किती उलथापालथी या वृक्षाने पाहिल्या असतील! आता हे लिहीत असताना यंदाच्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेली दुर्घटना आठवली. असं काही पाहताना त्याला त्याच्या अक्षयत्वाचा गौरव न वाटता कदाचित ओझं वाटत असेल. 

“ग्रहाणां च यथा सूर्यो नक्षत्राणां यथा शशी। तीर्थानामुत्तमं तीर्थे प्रयागाख्यमनुत्तमम्।” असं श्रेष्ठत्व असलेल्या प्रयाग संगमाच्या किनार्‍यापाशी पोचलो. गंगा, यमुना आणि अदृश्य किंवा लुप्त झालेली सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेलं हे स्थान. धुक्यात वेढलेला रस्ता धूसर पण अगदी स्वच्छ दिसत होता. जागोजागी कचरापेट्या ठेवलेल्या होत्या. किनार्‍यावर वाळूच्या पोत्यांना एकमेकांजवळ घट्ट बांधून घाटपायरीवजा रचना केली होती. संगमापाशी घेऊन जाणारे नाविक तयारच होते. एका नावेत दहा जण असे बसलो. सकाळचे साडेपाच वाजले असतील. नदीच्या पाण्यावर चादर घालावी तसं पांढरट धुकं, लांबचे थरथरते दिवे थेंबांच्या फिसकटलेल्या रांगोळीसारखे. सोबतीला थंडगार वाऱ्याच्या झुळुकी. त्याची तमा न बाळगता वल्ही मारणारे दोघे नाविक. आकाश, पाणी सगळं एकाच राखाडी रंगाचं. गंगा-यमुनेच्या पाण्याच्या रंगांमधला फरक न उजाडलेल्या पहाटे दिसणं शक्य नव्हतं पण वेगातला फरक लक्षात आला. खळाळती गंगा आणि संथ वाहणारी यमुनामाई. मीलनरेषेवर नावांना दोर बांधून केलेल्या पाळण्यांसारख्या रचनेत बर्फासारख्या गार पाण्यात काही पुरूषाकृती डुबकी घेत पापक्षालन करवून घेताना दिसल्या. हाडं गोठवणार्‍या थंडीत खोल पाण्यातून रोज नवे प्रवासी वल्हवत आणणारे आणि संगमापाशी नाव थांबवून हे सगळं तटस्थपणे पाहणारे फक्त पोट असलेले नावाडी पाप-पुण्यापलीकडे होते.

सहा डिग्रीची कडाक्याची थंडी मी किंवा ही ही ही म्हणत असल्याने संगमाचं शांतवणारं ओंजळभर पाणी घेऊन काकडलेल्या बोटांनी फक्त डोळ्यांना लावलं. जिणं गंगौघाचं पाणी वगैरे असावं अशी मी कुणी नव्हे त्यामुळे पुण्याची मोजणी आणि पापाची टोचणी अपरिहार्य. पण हे सगळं इथे बोथट होऊन गेलं. बकेट लिस्ट मधली आणखी एक इच्छा किंवा संकल्प पूर्ण झाला याचं समाधान होतं की संगमाच्या नितळ पाण्याच्या स्पर्शाचा आनंद होता माहीत नाही पण तृप्त वाटलं. 

रेल्वे प्रवासात एखादा फेरीवाला बोगीजवळ यावा तसा एक नाविक छोटीशी बोट वल्हवत आमच्या नावेपाशी आला. त्याने ’ए चाय गर्र्म’ म्हणावं असं म्या आसक्त भौतिकवाद्याला वाटत होतं पण हे जग वेगळं होतं. इथल्या आस्था वेगळ्या होत्या. हे स्थान आणि पाणी पापक्षालनासाठी नक्कीच नाही. स्वत:चं खरं प्रतिबिंब बघण्यासाठी असावं. हा गंगाजल विक्रेता होता. ’इस जल को मट्टी नही लगी’ असं म्हणत होता. मट्टी म्हणजे मानवी शरीर, प्रेत. त्याचा स्पर्शही न झालेल्या पाण्याच्या पावित्र्याची तो खात्री देत होता.

तीर्थराज म्हटल्या गेलेल्या प्रयागराजच्या पावित्र्याचं , लाटांचं आणि वर उल्लेख केलेल्या अक्षयवटाचं वर्णन संत तुलसीदासांनी अद्भुत शब्दात केलं आहे. या शब्दांचा अर्थ हे तिन्ही स्वत: पाहिल्याने,अनुभवल्याने आता नीट कळतो आहे.

"संगमु सिंहासनु सुठि सोहा। छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा।। चवँर जमुन अरु गंग तरंगा। देखि होहिं दुख दारिद भंगा।“

गंगा यमुना सरस्वतीचा संगम हे तीर्थराज (प्रयागचं ) सिंहासन आहे, अक्षयवट वृक्ष त्यावर पाखर धरणारं छत्र आहे.एका बाजूने गंगा आणि दुसरीकडून यमुनेच्या लाटा तीर्थराजाला चवर्‍या ढाळीत आहेत, ज्याला पाहताच सारं दैन्य दुःख दूर होतं. 

|| नमामि गंगे  part 1 ||     बनारस       सारनाथ


#आजोळ_स्पेशल_ट्रिप