Wednesday, January 8, 2025

तीर्थराज प्रयाग

बनारसच्या ’स्क्वेअर इन’ हॉटेलमध्ये जेवून सामान बांधून प्रयागराजला निघायचं होतं. बरेच जर्मन पर्यटक आल्याने हॉटेल गजबजलं होतं. आपापल्या पर्सेस जवळ ठेवायच्या आणि मोठ्या बॅग खोलीबाहेर काढून ठेवायच्या अशा स्पष्ट सूचना असूनही ईश्वरकाकांनी आपली महत्वाची सॅक मोठ्या बँगांवर ठेवून दिली. ती कोणत्या गाडीच्या डिकीत गेली हे शोधायला कासावीस झालेले ईश्वरकाका आणि त्यांना वैतागलेल्या शिलेदारांनी प्रयागच्या रस्त्यावर सुसाट निघालेल्या आमच्या दोन्ही गाडया थांबवून शोधमोहीम सुरु केली. 

हे कमी की काय म्हणून एका जर्मनबुवांची बॅगही हॉटेल क्रूच्या चुकीने आमच्या सामानात शिरली होती. सगळ्या बॅगांची उचकपाचक झाल्यावर जर्मन बुवांनी त्यांची बॅग व्हिडिओ कॉलवर शांतपणे ओळखली. ते विमानतळावर पोचले कि निघाले, मग तोवर ही बॅग पोचेल का आणि नाही पोचली तर त्यांचं भारताविषयी काय मत होईल याची मला चिंता पडली. इतक्यात हॉटेलचा मॅनेजर हमारे गाडी का पीछा करते हुए पोचला आणि एकदाची ती बॅग घेऊन गेला. झाले, एव्हाना प्रवासात ध्येय नसलेली काही मंडळी बॅग व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ होऊन ग्रुपवर सल्ले लिहू लागली. मध्येच एका काकांनी ’१ जानेवारी’ कसा ’आपला’ नववर्ष दिन नाही’ अशी असंबद्ध आणि बूमर्सच्या आवडीची पोस्ट टाकली. मिलींद त्यांना "एरवी ज्या कॅलेंडरनुसार जगता ते आता का म्हणून आपले नाही, आँ!’ टाईप प्रतिप्रश्न करू लागला. हा ट्रॅक सोडून काहीजण भलत्याच पोस्ट टाकू लागले. बॅग हरवेतो सगळं फारच सुरळीत सुरु असल्याने मला कसंसंच होत होतं. आता कशी ट्रीपला रंगत आली. एरवी रस्त्यावरचं वगैरे न खाणार्‍या आणि ’मॅन ऑफ फ्यु वर्ड्स’ असणार्‍या किंवा आमच्या (आदरार्थी एकवचन) वटवटीमुळे बोलायची संधी न मिळणार्‍या विवेकदादाने पण उत्साहित होऊन चक्क रस्त्यालगतच्या धूळभरल्या टपरीत सरसोंच्या तेलात तळली जाणारी मस्तपैकी अनहायजिनीक गरमागरम भजी विकत आणली. त्यांची चव काही और होती.

प्रयागराजच्या वाटेवर जी खेडी, लहान गावं लागली ती ’लापता लेडिज’ मधल्या नायिकेसारखी. साधी ,भोळी, नीटनेटकी पण स्वत:च वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण रूपडं असलेली. यूपी म्हणजे बकाल हा समज दूर करणारी. राजकारण्यांचे फलक मात्र जागोजागी त्यामानाने ब्रँडच्या जाहिराती अगदी कमी. दक्षिणेत दिसणारी हिरवाई मात्र इकडे फारशी नाही. 

प्रयागराज म्हणजे पूर्वीचं अलाहाबाद. इथल्या क्लाइव्ह रस्त्यावर अमिताभचं जन्मस्थान आणि हरिवंशरायजींचं कर्मस्थान. दिल्लीला जाईतो ८, १० वर्ष त्यांचं प्रयागला म्हणजे तेव्हाच्या अलाहाबादला वास्तव्य होतं हे वाचलं होतं. अमिताभ काहीच्या काही आवडत असल्याने उगाचच ते घर पाहायची इच्छा होती पण ते भाड्याचं होतं, आता तिथे काही खुणा नाहीत म्हणे. नेहरू घराण्याचं आनंद/ स्वराज भवन इंदिरा गांधींनी कॉंग्रेस पक्षाला देऊन टाकलंय. त्यामुळे प्रयागबद्दल उत्सुकता होती ती फक्त त्रिवेणी संगमाविषयी. शहराची रचना बरीचशी नागपूरसारखी वाटली. पुलावरून शहरात शिरताना आगामी कुंभमेळ्यासाठी नैनी भागात वसवलेली विस्तीर्ण टेंट सिटी दिसली. साध्या तंबूंपासून आयआरसीटीसीच्या दिवसाला तब्बल वीसहजार रू. चार्ज करणार्‍या राजेशाही तंबूंपर्यंत कित्येक निवास प्रकारांचा यात समावेश असणार. नजरेत भरेल अशी स्वच्छता होती. जागोजागी कुंभमेळ्याचं महत्व सांगणार्‍या, प्रयागला येण्याचं आवाहन करणार्‍या फलकांवर योगी-मोदी जोडीनं झळकत होते. एकूण कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु होती. 

’रामा कॉंटीनेंटल’ हॉटेलला पोचलो. विमानतळावर क्न्व्हेयर बेल्टकडे सगळे टक लावून पाहत उभे असतात तसं आम्ही पण मेरीवाली बॅगची प्रतीक्षा करत उभे होतो. आधी आपापल्या बॅग ताब्यात घेऊन चेक-इन केलं. हॉटेल बनारसपेक्षा बरंच मोठं आणि पॉश होतं. रिसेप्शनीस्ट इतकी चुणचुणीत आणि गोड होती की एखादी तक्रार करायला कुणी आलंच तर कशाला आलोय तेच विसरून जात असावं. थोडा आराम करून हाय-टी घेतला. खोडरबरासारखे लागणारे पनीरचे ठोकळे अळणी बेसनात बुडवून नुसतेच तळले होते. बाकी स्प्रेड चवदार असला तरी बनारसच्या स्क्वेअर इनचे फूड पहली पायदान वरच. 

थंडीचा जामानिमा करून ’अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क’ मध्ये गेलो. पार्कमधून आत शिरताना उजव्या भागात महापालिकेचे ४ मोठाले पेटारे ठेवले होते. जुनी पादत्राणे, वस्तू, कपडे इ. साठी हे वेगवेगळे पेटारे होते. हल्ली बर्‍याच गावात ’माणुसकीची भिंत’ असते तसा प्रकार. समोरच मिशीला पीळ देणार्‍या देखण्या आझादांचा पूर्णाकृती पुतळा होता. त्यांचा दुसरा हात पाठीमागे आहे आणि त्यात पिस्तुल आहे. मागे एक प्रचंड मोठं झाड आहे. प्रिन्स आल्फ्रेडने या शहराला भेट दिली होती याची आठवण म्हणून १८७० मध्ये हे उद्द्यान निर्माण करण्यात आलं. १९३१ मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान चंद्रशेखर आझाद ब्रिटीश पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्या हाती लागण्यापेक्षा त्यांनी इथे स्वत:वर गोळी झाडून आत्मबलिदानाचा मार्ग पत्करला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उत्तर प्रदेश सरकारने त्यांचं नाव या उद्द्यानाला दिलं आहे.
संधीप्रकाशात आझादांच्या आत्मबलिदानाची कथा त्यांच्या पुतळ्याच्या आणि त्या झाडाच्या साक्षीने पार्थकडून ऐकली. नेहरूंचं सहकार्य नसलं तरी कमला नेहरूंनी पुढाकार घेऊन आझादांचे विधीवत अंत्यसंस्कार करायला मदत केली ही पार्थकडून कळलेली माहिती विस्मयजनक वाटली. त्यांनी मुग्धा वैशंपायनसह तिथे ’वंदे मातरम्’ म्हणायचं आवाहन केलं. भारावलेल्या मनस्थितीत आझादांच्या पुतळ्याकडे पाहत एका सुरात ’वंदे मातरम्’ म्हणताना या सगळ्याच क्रांतीकारकांबद्द्ल फार फार कृतज्ञ वाटलं आणि स्वत:बद्द्ल फार खुजं देखील. 

पार्क मध्ये दिवेलागण झाली. देखाव्यासाठी केलेल्या पारदर्शक जनावरांच्या अंगातून फ्लुरोसंट लाईट सोडलेले असल्याने पार्क आकर्षक दिसत होतं. इथून आमची सगळी गाठोडी जवळच्या एका झकास हॉटेलला पोचवण्यात आली, इथे पार्थचं रामायण आणि मुग्धाचं गाणं असा कार्यक्रम होता तो ही लॉनवर, साडेसहा डिग्रीमध्ये. हीव भरल्याने ’सेहतू बाहांधा रेहे साहागरी’ असं गायची वेळ मुग्धावर येईल असं वाटलं पण ती न शहारता आरामात गात होती. 

दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शब्दामृतच्या भाषेत शुचिर्भूत होऊन आम्ही प्रयाग संगमासाठीनिघालो. गारठलेल्या अवस्थेत संगमाकडे निघण्य़ाआधी खाली शेगडी,त्यावर अ‍ॅल्युमिनीयमची किट्ली घेऊन फिरणारा चहावाला देवदूतासारखा भेटला. किटलीसारख्या तोंडून वाफा निघत होत्या.
पाण्यात पुठ्ठा बुडवल्यासारखा बेचव चहा पण गरम असल्याने हवासा वाटत होता. पार्किंगमध्ये तुरळक गर्दी होती तरीही आमचे शिलेदार नेहमीप्रमाणे पताका घेऊन पुढे चालत होते. कपड्यांचे चार पाच थर घालून आम्ही त्यांच्या मागे.


गाडी पार्किंगलगतच्या ’लेटे हुए हनुमानजीं’चं आधी दर्शन घेतलं. लंकेवर विजय मिळवल्यानंतर हनुमानजी थकले होते आणि त्यांनी इथे विश्रांती घेतली होती अशी मान्यता आहे. हे मंदिर किमान ६००-७०० वर्षे जुनं आहे. हनुमानजींची दक्षिणाभिमुख मूर्ती २० फूट लांब आहे. संगमस्नानाला या दर्शनाविना पूर्णत्व नाही असं म्हणतात. आम्ही गेलो तेव्हा बाहेर बराचसा अंधार पण आत प्रखर दिवे होते. गर्दी नव्हती. कुंभमेळ्यात हेच दर्शन गर्दीमुळे बहुसंख्य लोकांना दुरापास्त झालं होतं. 

संगमाकडे चालत निघालो. उजव्या हाताला भक्कम बांधणीचा भलाथोरला अलाहाबाद किंवा अकबर किल्ला आहे. त्याची दुसरी बाजू थेट यमुनेच्या किनार्‍यावर आहे. या जागेचं भू-राजकीय महत्व लक्षात घेऊन मुघल सम्राट अकबराने १५८३ मध्ये इथे हा किल्ला बांधला. बांधणीचा खर्च सव्वा सहा कोटी आला असं म्हणतात. इतिहासकार विलियम फिंचच्या नोंदीनुसार किल्ला पूर्ण व्हायला ४० वर्ष लागली. तोवर अकबर मृत्यु पावला. किल्ल्याच्या परिघावरून अकबराच्या तत्कालिन अफाट सांपत्तिक आणि राजकीय ताकदीचा अंदाज येतो. सलीम ऊर्फ जहांगीर १६०५ मध्ये मुघल सम्राट होण्यापूर्वी काही वर्ष इथे किल्ल्याचा सुभेदार म्हणून राहिला होता. १७६५ मध्ये किल्ला बंगालचा नवाब शुजा-उददौलाला विकण्यात आला. १७९८ मध्ये तह झाला आणि किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आला. स्वातंत्र्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आता त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून वर्गीकृत केलं आहे. 

या किल्ल्याच्या आत चांदी आणि तांब्याची नाणी पाडणारी टांकसाळ होती, जहाजबांधणी होत होती. किल्ल्यात जनानी महल, शाही हरम असे बरेच भाग होते. जतन व्हावा म्हणून आता थोडाच भाग पर्यटकांना बघायला खुला आहे. जेवढा बघता येतो त्या भिंतींना जाळी लावलेली असल्याने बदाम, बाण, I love you Sangita, जोडो के दर्द की दवा.. वगैरे मजकुर सुदैवाने नव्हता. किल्ल्याचा काही भाग भारतीय सैन्यासाठी राखीव आहे. इथे आता एक पाताळपुरी मंदिर आहे. मला ते काहीसं कृत्रिम आणि बटबटीत वाटलं. मंदिरातील काही प्राचीन मूर्ती ऑईलपेंटने रंगवल्याने कशाशाच दिसत होत्या. 

इथला ३०० वर्ष जुना, दहा मीटर घेराचा प्रसिद्ध ’अक्षय वट’ पाहिला. ह्युएनत्संगच्या प्रवास नोंदींमध्ये याचा उल्लेख आहे. पृथ्वी प्रलयात बुडाली तरी हा वृक्ष अक्षय राहतो. याच्या पानावर ईश्वर बालरूपात राहून सृष्टीचं पालन करतो अशी पौराणिक आख्यायिका तिथे लिहिलेली आहे. किल्ला परिसरात इतरत्रही बरीच  वडाची झाडं असली तरी अक्षयवटाला विशेष मह्त्व आहे. अंदमान जेलमधल्या लाईट-साऊंड शो मध्ये अशाच एका पुरातन वटवृक्षाने ’ओम पुरी’ च्या आवाजात स्वातंत्र्य-आंदोलनाची गाथा ऐकवली होती त्याची आठवण झाली. अक्षय वटाकडे सांगण्यासारखं किती असेल ! अकबराच्या काळापासून किती उलथापालथी या वृक्षाने पाहिल्या असतील! आता हे लिहीत असताना यंदाच्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेली दुर्घटना आठवली. असं काही पाहताना त्याला त्याच्या अक्षयत्वाचा गौरव न वाटता कदाचित ओझं वाटत असेल. 

“ग्रहाणां च यथा सूर्यो नक्षत्राणां यथा शशी। तीर्थानामुत्तमं तीर्थे प्रयागाख्यमनुत्तमम्।” असं श्रेष्ठत्व असलेल्या प्रयाग संगमाच्या किनार्‍यापाशी पोचलो. गंगा, यमुना आणि अदृश्य किंवा लुप्त झालेली सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेलं हे स्थान. धुक्यात वेढलेला रस्ता धूसर पण अगदी स्वच्छ दिसत होता. जागोजागी कचरापेट्या ठेवलेल्या होत्या. किनार्‍यावर वाळूच्या पोत्यांना एकमेकांजवळ घट्ट बांधून घाटपायरीवजा रचना केली होती. संगमापाशी घेऊन जाणारे नाविक तयारच होते. एका नावेत दहा जण असे बसलो. सकाळचे साडेपाच वाजले असतील. नदीच्या पाण्यावर चादर घालावी तसं पांढरट धुकं, लांबचे थरथरते दिवे थेंबांच्या फिसकटलेल्या रांगोळीसारखे. सोबतीला थंडगार वाऱ्याच्या झुळुकी. त्याची तमा न बाळगता वल्ही मारणारे दोघे नाविक. आकाश, पाणी सगळं एकाच राखाडी रंगाचं. गंगा-यमुनेच्या पाण्याच्या रंगांमधला फरक न उजाडलेल्या पहाटे दिसणं शक्य नव्हतं पण वेगातला फरक लक्षात आला. खळाळती गंगा आणि संथ वाहणारी यमुनामाई. मीलनरेषेवर नावांना दोर बांधून केलेल्या पाळण्यांसारख्या रचनेत बर्फासारख्या गार पाण्यात काही पुरूषाकृती डुबकी घेत पापक्षालन करवून घेताना दिसल्या. हाडं गोठवणार्‍या थंडीत खोल पाण्यातून रोज नवे प्रवासी वल्हवत आणणारे आणि संगमापाशी नाव थांबवून हे सगळं तटस्थपणे पाहणारे फक्त पोट असलेले नावाडी पाप-पुण्यापलीकडे होते.

सहा डिग्रीची कडाक्याची थंडी मी किंवा ही ही ही म्हणत असल्याने संगमाचं शांतवणारं ओंजळभर पाणी घेऊन काकडलेल्या बोटांनी फक्त डोळ्यांना लावलं. जिणं गंगौघाचं पाणी वगैरे असावं अशी मी कुणी नव्हे त्यामुळे पुण्याची मोजणी आणि पापाची टोचणी अपरिहार्य. पण हे सगळं इथे बोथट होऊन गेलं. बकेट लिस्ट मधली आणखी एक इच्छा किंवा संकल्प पूर्ण झाला याचं समाधान होतं की संगमाच्या नितळ पाण्याच्या स्पर्शाचा आनंद होता माहीत नाही पण तृप्त वाटलं. 

रेल्वे प्रवासात एखादा फेरीवाला बोगीजवळ यावा तसा एक नाविक छोटीशी बोट वल्हवत आमच्या नावेपाशी आला. त्याने ’ए चाय गर्र्म’ म्हणावं असं म्या आसक्त भौतिकवाद्याला वाटत होतं पण हे जग वेगळं होतं. इथल्या आस्था वेगळ्या होत्या. हे स्थान आणि पाणी पापक्षालनासाठी नक्कीच नाही. स्वत:चं खरं प्रतिबिंब बघण्यासाठी असावं. हा गंगाजल विक्रेता होता. ’इस जल को मट्टी नही लगी’ असं म्हणत होता. मट्टी म्हणजे मानवी शरीर, प्रेत. त्याचा स्पर्शही न झालेल्या पाण्याच्या पावित्र्याची तो खात्री देत होता.

तीर्थराज म्हटल्या गेलेल्या प्रयागराजच्या पावित्र्याचं , लाटांचं आणि वर उल्लेख केलेल्या अक्षयवटाचं वर्णन संत तुलसीदासांनी अद्भुत शब्दात केलं आहे. या शब्दांचा अर्थ हे तिन्ही स्वत: पाहिल्याने,अनुभवल्याने आता नीट कळतो आहे.

"संगमु सिंहासनु सुठि सोहा। छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा।। चवँर जमुन अरु गंग तरंगा। देखि होहिं दुख दारिद भंगा।“

गंगा यमुना सरस्वतीचा संगम हे तीर्थराज (प्रयागचं ) सिंहासन आहे, अक्षयवट वृक्ष त्यावर पाखर धरणारं छत्र आहे.एका बाजूने गंगा आणि दुसरीकडून यमुनेच्या लाटा तीर्थराजाला चवर्‍या ढाळीत आहेत, ज्याला पाहताच सारं दैन्य दुःख दूर होतं. 

|| नमामि गंगे  part 1 ||     बनारस       सारनाथ


#आजोळ_स्पेशल_ट्रिप 


Thursday, January 2, 2025

सारनाथ

१ जानेवारीला (आमच्यासह) तब्बल ८ लाख लोकांनी काशी विश्वनाथ/ गंगेला भेट दिल्याची बातमी वाचली. आपण १ जानेवारीला (आमच्यासह) तब्बल ८ लाख लोकांनी काशी विश्वनाथ/ गंगेला भेट दिल्याची बातमी वाचली. आपण लाखात एक आहोत याची मला कल्पना होती पण आता खात्रीच पटली :-) गंगामैयाच्या सहवासातली ती अद्भुत संध्याकाळ कायम लक्षात राहील. २०२५ ची, नववर्षाची पहिली सकाळ मात्र आम्ही सारनाथला घालवली. वाराणसीहून (’दोन्ही’ नैमिषारण्यांपेक्षा फारच ) जवळ म्हणजे १५ कि.मी वर असलेलं  ’सारनाथ’. आम्ही बारा जण आणि आमची ९७११ ट्रॅव्हलर. 

मावशी आमची व्याकरण दक्ष, संस्कृतप्रवीण टॅबधारिणी. (ग्रुपवर -हस्व दीर्घ पाहून लिहावं लागतं. ) रोज पहाटे इतक्या नियमितपणे स्टेटसला ज्ञानेश्वरीतले श्लोक टाकते की एखादे वेळी नसला तर रोज पाहणारे फोन करून तब्येतीची चौकशी करतात. नियमित पाहणार्‍यांनी पाहिलं नाही तर मावशीही त्यांची चौकशी करते. एकूण बहुपयोगी मिस्ड कॉल सारखा स्टेट्सचा खुशाली कळवणे हा नवा किंवा खरा उपयोग कळला. प्रवासात नेट मिळालं नाही तर हॉटस्पॉटची तजवीज करून भल्या पहाटे उठून तिचं हे काम खंड न पडता सुरू होतं. मावशीने ग्रुपवर शंकराचार्यांचे काशीपंचकम् , निर्वाणषटकम्, श्रीगंगास्तोत्रम् , कालभैरवाष्टकम्, श्रीविश्वनाथाष्टकम्, रावणलिखीत शिवतांडवस्तोत्रम् इ. पोस्ट करून ठेवली होती. तिच्या मुली पण फाडफाड संस्कृतवाल्या. प्रवासात गप्पा आणि खाण्यापिण्यातून तोंड मोकळं राहिलं तर या संस्कृततज्ञांसह मी ही उच्चारांशी कुस्ती खेळत स्तोत्रं म्हटली. 

सारनाथला पोचलो तर तिथेही गर्दी. पार्किंगची मारामार. बाकी स्वच्छता, प्रशासकीय सुविधा, सुरक्षा तपासणी मात्र अगदी व्यवस्थित. सारनाथ अशोकस्तंभामुळे सर्वपरिचित आहेच. गंगा वरूणा संगमानजीकचं सारंगनाथ म्हणजेच सारनाथ. ’हरणां’चा नाथ असा त्याचा अर्थ. एका बौद्ध आख्यायिकेनुसार मृगयेला इथे आलेल्या राजाला एका हरणाने आपल्या  हरिणीचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:ला अर्पण केलं. राजाला करूणा आणि त्यागाचं महत्व कळलं आणि त्याने हे हरणांचं अभयारण्य म्हणून घोषित केलं. इथला धामेक किंवा धामेख स्तूप हे बौद्धांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांपैकी एक. स्तूप म्हणजे भगवान बुद्धांच्या शरीराचे किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तूंचे अवशेष जतन करणारं घंटा किंवा घुमटाच्या आकाराचं स्मारक.


लुंबिनीना जन्मलेल्या, कुशीनगरला महानिर्वाण तर बोधगयेला ज्ञानप्राप्ती झालेल्या भगवान बुद्धांनी पाच शिष्यांना पहिला उपदेश दिला ते हे सारनाथ. त्यामुळे हे चौथं म्हत्वाचं स्थान. धम्मचक्रपरिवर्तनाची ही नांदी. नंद आणि मौर्य काळापर्यंत भरभराटीला पोचलेल्या सारनाथमधला बौद्ध मठ  ११९४ मध्ये मुहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने नष्ट केला. यामुळे बहुतांशी बौद्धांनी नेपाळ, तिबेटला स्थानांतरण केलं. या हल्ल्यात तिसर्‍या शतकात सम्राट अशोकाने स्थापित केलेल्या अशोकस्तंभाचाही विध्वंस झाला. काही भाग शाबूत राहिला. भारताचं हे राष्ट्रीय प्रतीक आता तिथल्या वस्तुसंग्रहालयाचं मुख्य आकर्षण आहे. 


गयेमधल्या बोधीवृक्षाच्या झाडाची फांदी कलम करून इथे लावल्याचं गाईडने सांगितलं. या पवित्र झाडाभोवती धातूच्या गोलाकारांची चौकोनी रचना आहे. ते गोल हाताने फिरवत प्रदक्षिणा पूर्ण केली की पापं धुतली जातात अशी मान्यता आहे. मी या प्रदक्षिणेला गेले तेव्हा माझ्या हातात मामीचा फोन राहून गेला. मी प्रदक्षिणा पूर्ण करून येईतो फोन हरवला असं समजून तिचं बीपी वाढलं होतं. मला फोनसह परत येताना पाहून तिचा जीव टण्ण आवाज करत भांड्यात पडला. नंतरही २,३ जणांचे फोन हरवले आणि सापडले तेव्हा असेच टण्ण आवाज आले. बनारसच्या संकटमोचन हनुमानाने मात्र एका गुजराथी काकूंना आयफोनच्या मोहजालातून कायमचं सोडवलं. तो पर्स कापून कुणीतरी मारला. त्या घटनेपासून सगळे थोड्या थोड्या वेळानं सतत आपले खिसे ,पर्स चाचपत ’आहे ना!.. हुश्श!" करत आपापला मोबाईल चेक करायच्या नादाला लागले. 

गर्दी असूनही इथे आरामात मोकळं फिरता येत होतं. हवेत मस्त गारवा होता. पाली, इंग्रजी, हिंदी भाषेत प्रत्येक ठिकाणी सविस्तर माहिती लिहिलेली होती. सारनाथला जन्मलेले ११ वे तीर्थंकर श्रेयंसनाथांचे (दिगंबर जैन) देखील मन्दिर धामेक स्तूपाजवळ आहे. १८२४ मध्ये बांधलेल्या या मंदिरामुळे सारनाथ हे जैन तीर्थक्षेत्र सुद्धा मानलं जातं. मंदिर स्वच्छ, सुबक आणि प्रशस्त आहे. आवारात कुठे कागदचा कपटाही नव्हता. नंतर Archaeological Survey of India चं वस्तूसंग्रहालय पाहिलं. तिसर्‍या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत उत्खननात सापडलेल्या अनेक गोष्टी इथे जतन केलेल्या आहेत. 
मौर्य /गुप्तकालीन शिल्प, सुवर्णवर्खी दागिने, तत्कालिन वापरातील वस्तूंपासून विख्यात अशोकस्तंभापर्यंत इथे बरंच काही पाहण्यासारखं आहे. बाहेर पडताना काही भेटवस्तू घेतल्या. आमच्या कामवाल्या मावशींसाठी बुद्धमूर्ती आणि भेटवस्तू घेतली. त्यांना आनंद झालाच पण त्यांनी ’मी केव्हाच जाऊन आलेय सारनाथला, माझं गया, कुशीनगर, सारनाथ आणि ते नेपाळचं पशुपतीनाथ सुद्धा पाहून झालंय’ असं सांगून माझीच विकेट घेतली. एकूण सगळं जग माझ्याआधी सगळीकडे जाऊन आलेलं आहे तर मी हे कुणासाठी लिहितेय देव जाणे. 
Sarnath

इथेही एक बनारसी साडीचं टुमदार दुकान होतं. मध्ये सवड मिळाली तर कुणाला सुगावा लागू न देता तिकडे जायचा शेरलॉक मामी आणि वॅटसन स्वातीवहिनीचा प्लॅन होता. पण त्यांचा प्लॅन यशस्वी न झाल्याने माझी तपस्या भंग होता होता राहिली. गाडीची वाट पाहत निवांत पर्यटकांचं आणि आधुनिक सारनाथ संकुलाचं निरिक्षण करता आलं. परदेशी पर्यटक सहज आकर्षित होतील असं इथलं वातावरण आणि रचना आहे.

सारनाथ हे ऐतिहासिक स्थळ म्हणजे भारताच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाची जिवंत साक्ष. बौद्ध आणि जैन धर्मिय इथे अहिंसा, करुणेचं तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक शांती अनुभवायला येतात पण आपल्यालाही इथे एका सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. 

Tuesday, December 31, 2024

नमामि गंगे - बनारस

बनारसच्या कँटोन्मेंट भागातल्या  ’स्क्वेअर इन’ हॉटेलला चेक इन करून फ्रेश होऊन मी, दादा, रोहिणीताई आणि जिजाजी गप्पा मारत बसलो. मग दुपारी पुण्याहून मामा, मामी, मावशी आणि मंडळी आली आणि आमचा कोरम फुल्ल झाला. संध्याकाळी हॉटेलमध्ये पार्थ बावस्कर आणि शब्दामृत शिलेदारांनी सर्व पर्यटकांचं स्वागत केलं. आमचे शिलेदार जरा वयस्कर पण तुडतुडीत होते. त्यांनी कसल्याशा विषयात पीएच डी केल्याचं कळलं. इतका भारी शिलेदार लाभल्याने आम्हाला बरं वाटलं. सर्वांचा परिचय झाला. आमची डझनाची गँग लक्षवेधी ठरली. पार्थने काशीविषयी थोडी माहिती दिली. 

"वारण आणि अस्सी या नद्यांच्या संगमामुळे वाराणसी नाव पडलं, बनारस हा अपभ्रंश. भारतातील किंबहुना जगातील हे सर्वात प्राचीन शहर असावं. १४ व्या शतकात भट्ट, मौनी, धर्माधिकारी आणि शेष अशी ४ मराठी मुलुखातली कुटुंब काशीत आली. भट्ट यांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली. पुढे औरंगजेबाने तोडून मशीद केली. तीच ज्ञानवापी." गागाभट्ट शिवराज्याभिषेकात मुख्य पुरोहित होते हे सर्वश्रुत आहे. पण ते या भट्टांचे नातू होते हे नवीन कळलं. पार्थची शैली रोचक आहे. नंतर त्यांनी वाल्मिकी रामायणाची प्रस्तावना केली. मुग्धा वैशंपायनने विषयानुरूप गीतरामायणातली काही गाणी सुरेख सादर केली. 

सोनलला (स्वातीची बहिण) भेटायला आजची संध्याकाळच हातात होती. ती एका मेसेजवर धावत आली. जवळच्या मॉलमधल्या कॅफेत आमच्या जुन्या आठवणी आणि बनारसबद्द्ल गप्पा झाल्या. तिचा बनारसमध्येच जन्मलेला सॉफ्टवेअर इंजिनीयर नवरा त्या गावाशी आणि गंगामैयाशी एवढा एकरूप आहे की जोवर इंडस्ट्रीयल वेस्ट आणि शहराचं सांडपाणी गंगेत सोडणं आणि तिचं प्रदूषण थांबत नाही तोवर गोड खाणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे. माणूस आपल्या भवतालाशी आतून किती जुळलेला असतो ! त्यातून काशीची महती काही वेगळीच. आता गंगा पूर्ण स्वच्छ झाली आहे या माझ्या गृहितकाला तिथे धक्का बसला. हे त्याने कुणा ’डिसिजन मेकर’ ला सांगितलं आहे का, तर नाही म्हणाली ती. गंगा स्वच्छ आहे ते हृषीकेश, हरिद्वारकडे. तरी आता कडक नियमांमुळे वाराणसीतली गंगा दिसते बरीच स्वच्छ. (मु. योगींनी तर पाणीच पिऊन दाखवलं कुंभमेळ्याच्या पूजनात) सोनलची सर्वांशी ओळख करून देऊन तिचा जेवणाचा आग्रह टाळून तिला निरोप दिला. 

पहिलवान लस्सी
सोनलने दिलेल्या लिंकमुळे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पुरूष मंडळीं खाद्यभ्रमंतीला गेली असताना महिला वर्गाला खरेदीला जाता आलं. बनारस हे जणू कचोर्‍यांचं गाव आहे. सरसरीत आलूभाजी बरोबर उडदाच्या डाळीचा खमंग मसाला भरलेली बेडमी पुरी, नेहमीची खस्ता कचोरी, राजकचोरी, प्याजकचोरी वगैरे वगैरे. लिट्टीचोखासारखे प्रकारही नाश्त्यात असल्याने टमाटर चाट सोडलं तर बरंचसं चाखता आलं. शब्दामृतने एकदा पार्थ-मुग्धाला ऐकताना ’मलैय्यो’ हा फेटलेल्या क्रीमसारखा लागणारा पदार्थही खिलवला. तो कॅटरिनासारखा निघाला. दिसायला सुंदर पण बाकी आनंद. त्याची हवाच फार.
खरपूस कलाकंद घातलेली दाट पहिलवान लस्सी तेवढी खायची कम प्यायची राहिली होती ,त्याचेही कुल्हड त्यांनी वाराणसी सोडताना हातात दिले होते.



बनारसी साड्या मात्र कशा ओळखायच्या ते नाही कळलं. खरेदी म्हटलं की मला मानसी आठवते. सेल्समन आणि आपल्यामध्ये साड्यांचा डोंगर करून ती अचानक ’नाही बाई ,पण याचा रंग जाईलच’ म्हणत सेल्समनच्या ’नाही जात हो’ अशा गयावयांकडे दुर्लक्ष करून संन्यस्त चेहर्‍याने उठून जाऊ शकते. मामी, रोहिणीताई, स्वातीवहिनी मात्र निम्मा डोंगर घरी घेऊन गेल्या. त्या लखनवी कपडे पाहत होत्या तोवर दादा आणि मी बाजूच्या सोनलने सुचवलेल्या दुकानात गेलो. माझे निरिच्छ भाव पाहून सेल्समननी पण उपचार म्हणून काही बाही दाखवले. तोवर या तिघी इकडे आल्या आणि त्यांनी जी काय तुफान खरेदी केली की आता अवघे दुकान आमच्याकडे सस्मित मुद्रेने पाहू लागले, चाय तो पीनीही पडेगी म्हणू लागले. तासाने ठरवलेले रिक्शावाले बाहेर घायकुतीला आले. त्यांना आम्हाला त्यांच्या कमिशनवाल्या बुनकर गल्लीत न्यायचे होते. दरम्यान दुकानाचा मालक दरवाजा उघडून मामीला बाय करायला स्वत: बाहेर आला. अनंत पिशव्या सांभाळत आम्ही हॉटेलला परतलो. चिन्मयच्या लग्नापासून २,३ वर्ष साडी घ्यायची नाही हा पण मी एवढा बनारसला जाऊनही निभावला या मिनिमलिझमबद्दल महेश कौतुक करेल म्हणावं तर त्याने ते पण केलं नाही. जाऊदे! जालिम दुनिया. जाताना आमच्या कॅबसदृश रिक्षावाल्याने, ’एवढ्या सुधारणा , विकास करूनही लोकसभेत मोदी इतक्या कमी मार्जिनने का निवडून आले ’यावर पानाचा मुखरस सांभाळत इत्यंभूत माहिती दिली होती. महामृत्युंजय मंदिराचे महंत मनीषजी विरोधी पक्षाच्या बाजूचे असल्याने बरीच मतं तिकडे गेली असा त्यांचा मुख्य मुद्दा होता. येताना मात्र बुनकर गल्ली प्लॅन रद्द झाल्याने ते जरा रुसले होते. 

पहिल्या दिवशी रात्री जेवून आम्ही काळभैरव उर्फ काशी का कोतवालच्या दर्शनाला गेलो. यांची परवानगी घेऊन मगच काशीविश्वेश्वराचे दर्शन घ्यायचे अशी प्रथा आहे. महादेवाच्या रूधिरापासून निर्मित काळभैरव काशीची सुरक्षा व्यवस्था पाह्तो अशी मान्यता आहे. हे मंदिर मध्यवस्तीत भरगर्दीत आहे. तुळशीबागेसारख्या चिंचोळ्या गल्लीत स्टेट बँकेत असतात तशा एस आकाराच्या लांबलचक दर्शनबारीत बराच वेळ उभं होतो. डावीकडे शेंदूर फासलेला काहीतरी आकार होता. तिथे "दर्शन लेकर अपने आपको महान समझे" असं लिहिलं होतं. काळभैरव दर्शन घेतलं. काशीचा प्रत्येक नवा प्रशासकीय अधिकारी इथे दर्शन घेऊन  मग कामकाजाला सुरुवात करतो असं ऐकलं आहे.

अगदी बारक्या बोळींमधून बाहेर पडलो. दुय्यम दर्जाच्या बनारसी साड्यांची लहानशी दुकानं खोबणीत बसवलेली होती. वाटेत पान बनारसवाला खाल्लं. प्रचंड गोड होतं. अकोल्याचा आमचा घराजवळचा पानवाला असा जबरदस्त काथ जमवतो त्यापुढे हे 'किस नागवेल की पत्ती' वाटलं. मघई पानाची अंगभूत चव एवढंच वेगळेपण, पण हे पान अमिताभने कौतुक केल्यामुळे अकल का ताला खोलण्यासाठी खाणं क्रमप्राप्त होतं. त्यात रंगीबिरंगी इतकं काय काय घातलं होतं की त्यावरूनच हा शेर असावा.. 
’ये इश्क़ भी कमबख्त बनारसी पान सा , एक ही पत्ते पर सजते है सारे जज़्बात”


३१ डिसेंबर म्हणजे वर्षाखेरीस सकाळी लवकर उठून ऐन थंडीत ४ वाजता काशीविश्वेश्वर दर्शनाला निघालो. रस्त्यावर सकाळी ११ वाजता असते तशी वर्दळ होती. फोन, चीजवस्तू शिलेदारबुवांकडे देऊन तपासण्या आटोपून आम्ही मंदिरात गेलो. चांगली गर्दी होती. आधुनिकीकरण झालेलं स्वच्छ प्रशस्त आवार पाहून बरं वाटलं. संथ स्वरातलं शिवमहिम्न स्तोत्र स्पीकरवर ऐकायला फार सुखद वाटत होतं. उत्तरेकडच्या भक्तीत जो एक कर्कशपणा आणि संगीताचा कल्लोळ जाणवतो तो इथे कुठेच नव्ह्ता. भट्ट यांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली हा उल्लेख वर आलाच आहे. परंतु ती पुनर्स्थापना आहे. ही विजीगिषु वृत्ती भारतीयत्वाचे केंद्र आहे.

ह्युएन त्सांगच्या म्हणण्यानुसार त्याच्या काळात काशीमध्ये शंभरएक मंदिरं होती, परंतु मुस्लिम आक्रमकांनी ती पाडून मशिदी बांधल्या.  इ.स.पूर्व ११ व्या शतकात राजा हरिश्चंद्रनी बांधलेल्या किंवा नूतनीकरण केलेल्या विश्वनाथ मंदिराचा सम्राट विक्रमादित्य यांनी जीर्णोद्धार केला होता. महंमद घोरीने ११९४ मध्ये लुटून ते पाडलं. ते पुन्हा बांधलं गेलं, परंतु जौनपूरच्या सुलतान महमूद शाहने १४४७ मध्ये पुन्हा नष्ट केलं. १५८५ मध्ये राजा तोडरमलच्या मदतीने पं. नारायण भट्ट यांनी या ठिकाणी पुन्हा भव्य मंदिर बांधलं. १६३२ मध्ये शहाजहानने हे पाडण्यासाठी सैन्य पाठवलं पण हिंदूंच्या तीव्र प्रतिकारामुळे तेव्हा ते शक्य झालं नाही. मात्र काशीतली इतर ६३ मंदिरं पाडण्यात आली.

१८ एप्रिल १६६९रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला.  कोलकाताच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये हा हुकूम सेव्ह्ड आहे असं बातम्यांमध्ये ऐकलं आहे. त्यानुसार मंदिर तोडून ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. पेशव्यांनी पुढे दिल्ली जिंकली तेव्हा काशीमुक्तीचाही प्रयत्न केला. नानासाहेब फडणवीसांच्या काळात म्हणजे १७८० मध्ये अहिल्याबाई होळकरांनी ते मंदिर पुन्हा उभं केलं. नंदी मात्र तिथे आधीपासून होता. तो मशिदीकडे तोंड करून बसला आहे. त्यावरून तत्कालिन शिवलिंगाचं स्थान सहज लक्षात येतं. आज ते नंदीच्या पाठीमागे आहे. घुमट सोडला तर मशिदीच्या भिंती आणि खांब हिंदू पद्धतीच्या आहेत. आम्हाला तिथे सर्वेक्षणात सापडलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेता आलं. बाकी न्यायालयीन वादातली मशीद अशी बंद करून ठेवली आहे की बाहेरून दिसतही नाही. मी नंतर जुने फोटो पाहिले तर त्यात मशीदीने बरीच जागा व्यापली खरं तर ढापली असून आजूबाजूची मंदिरं खेटून उभी दिसली. 

आम्ही विश्वेश्वराचे नंतर अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन आलो तेव्हा पायात मोजे असून थंड चटके लागत होते. तरूण मुलींचा एक समूह बर्फासारख्या फरशीवर स्थिर बसून स्तोत्र म्हणत होता. कुठेही गलबला नव्ह्ता. भगवी कफनी ,जटा, कमंडलूधारी साधू गाभार्‍याकडे शांतपणे जा ये करत होते. ’अंगारा चाहिए’ असं मी एका सुरक्षा अधिकार्‍याला दिव्य हिंदीत म्हणताच आधी दचकून मग ’अच्छा भभूती' असा बोध होऊन त्या भल्या माणसाने मला कागदी कपभर अंगारा आणून दिला. 

श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर
भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला तो काशीमध्ये, तीन तीर्थंकरांचा जन्म इथे, संस्कृतपीठं आणि नावाजलेली संगीत घराणी इथे, कबीरवाणीही इथूनच सगळीकडे पसरलेली.  तुलसीदासांनी रामचरितमानस रचलं ते ही इथेच. जेवून आराम करून श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर बघायला गेलो. इथे अख्खे रामचरित मानस खालपासून वरपर्यंत दुमजली मंदिराच्या भिंतीवर लिहिलेले आहे. १९६४ मध्ये मूळ लहानशा मंदिराच्या जागी सुरेका नामक व्यापार्‍यानी हे भव्य सुंदर मंदिर बांधलं. शांत, प्रसन्न वाटलं इथे. वरच्या मजल्यावर
आकर्षण म्हणून काही हलते देखावे केले आहेत. ते फारच बाळबोध बालगणेश मंडळांच्या सजावटीसारखे वाटले. 
नंतर बर्‍यापैकी दूर चालत जाऊन संकटमोचन हनुमानाच्या दर्शनाला गेलो. संत तुलसीदासांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीला अस्सी नदीकिनारी स्थापन केलेलं हे मंदिर पावणारं मानलं जात असावं कारण सगळीकडे गच्च गर्दी. तुलसी मानस मंदिराच्या दसपट गर्दी असण्यामागे ’संकटमोचन’ हे विशेषण कारणीभूत असावं. गाभार्‍याकडे जाणारी हनुमानाच्या शेपटीसारखी लांब रांग बघून मी आणि मामीने तिथूनच नमस्कार केला. भाग्यश्रीला तिच्या पायावर आधीच आलेलं संकट मोचन करणं गरजेचं असल्याने ती आणि राजश्रीताई बाहेर थांबल्या. परतताना मिलिंदने कबीरचौरा मठाची गल्ली दाखवली. तिथे जायलाही आवडलं असतं.

अशा प्रचंड गर्दीत जेव्हा जेव्हा आम्हाला गाडी घ्यायला येई तेव्हा भर चौकात आम्हाला घेऊन सटकण्याच्या ऐन क्षणी पोलिस येऊन गाडीचा चटकन फोटो काढून जाई. चालकाचा स्वगत संताप आणि शिलेदाराशी वाद सुरु होई कारण दंड लागू होई. 

बीएचयू म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यापीठ कल्पनेपेक्षा खूप विस्तीर्ण निघालं. पं. मदन मोहन मालवीयांनी स्थापलेलं तिथलं शिवमंदिर १२ वाजता थोडा वेळ बंद होतं, हे विसरून रमतगमत पोचल्याने माझी दर्शनाची संधी गेली. विवेकदादा, वहिनी वगैरे दाराशी थांबून राहिले त्यांना मात्र छान दर्शन घडलं. 

मिलींदच्या आग्रहामुळे पुढच्या सकाळी लवकर उठून काशी कॉरीडॉर बघायला निघालो. अपेक्षेपेक्षा वाराणसी स्वच्छ आणि सुबक वाटली. प्रत्येक गावात जसा जुना आणि नवा भाग असतो तसं इथे शरीराच्या नसांसारख्या वारणसी गलियाँ आहेत आणि जरासे आधुनिक रस्ते आणि ब्रँडची दुकानंही. कँटोन्मेंट भागात उत्तम हॉटेल्स आहेत त्यापैकी एकात आम्ही उतरलो होतो. 

घाटालगतच्या रस्त्यांवर दुतर्फा फुलांची दुकानं झेंडू, शेवंती आणि गुलाबांनी ओसंडली होती. टपरीवजा हॉटेल्समध्ये रस्त्यालगत कचोर्‍या तळल्या जात होत्या. जिलब्या पाकात पडत होत्या. पॉश नसलं तरी कचरा नव्हता. केशरी, भगव्या पताका फडकत होत्या. काशीविश्वनाथाची नि:शुल्क रांग नजर जाईल तिथवर दिसत होती. हातात पूजेची परडी घेऊन भांगात ठळक केशरी सिंदूर भरलेल्या, हातभर बांगड्या घातलेल्या बर्‍याच बायका शाली गुंडाळून रांगेत उभ्या होत्या. 

बॅरीकेड्स मधून वाट काढत कॉरीडॉरकडे जाताना वाटेत ’प्रेमगली अती सांकरी ज्या मे दो न समायी’ ची आठवण व्हावी एवढ्या चिंचोळ्या गल्ल्या लागल्या. टपरीवजा दुकानातून चहाचा वास दरवळत होता. एके ठिकाणी कढईत मलैयो करणं सुरू होतं. 

यातून वाट काढत आम्ही चुकून पोचलो थेट मणिकर्णिका घाटावर. १७९१ मध्ये मणिकर्णिका घाट अहिल्याबाईंनी नव्याने बांधला आहे. समोरचं दृश्य बघून थबकले. तिथे कुणा अनामिकाची एक चिता पेटलेली. त्यातून बारीक ठिणग्या उडत होत्या. लाकडं जागोजागी रचलेली. अध्येमध्ये राखेचे ढीग. मध्येच एक घडीव देऊळ. पलीकडे अथांग वाहणारी गंगा. याचसाठी केला होता अट्टाहास! तसे हे घाट काशीत शिरताना रेल्वे पुलावरून पाहिले होते आणि धुक्यात वेढलेली गंगाही. अगदी नजरेआड होईतो, पण ते दर्शन गंगा अप्राप्य वाटणारं होतं. आता काही फुटांवर ती वाहत होती. संथपणे. ज्या गंगाजलाचा तांब्याचा गडू अनेक वर्ष घरी माहेरच्या देवघरात पूजला जायचा, जिच्याशी एक अनाम नातं होतं ती गंगा अशी जिवंत समोर दुथडी भरून वाहताना पाहून वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण तिकडे जायला रस्ता दिसेना. इथे अंत्यसंस्कार केले तर मोक्ष मिळतो या मान्यतेमुळे लोक पूर्वी शब्दश: मरायला येत. गरिबांची प्रेतं केवळ चेहरा जाळून गंगेत सोडून दिली जात. निर्माल्य आणि पिंडदानाच्या कचर्‍याचे पायर्‍यांवर ढीग साठत. पूर्वी बनारस पाहिलेल्यांच्या अशाच आठवणी ऐकल्या होत्या.

आजची गंगा मात्र वेगळी आहे. घाट स्वच्छ आहेत. आजही मणिकर्णिकेवर एक तरी चिता सतत जळत असते. उत्पत्ती आहे तिथे लय असणारच. मिलींदने एलकुंचवारांचा एक लेख पाठवला होता. त्यात त्यांनी या भावस्थितीचं मनोज्ञ वर्णन केलं आहे- ’चिरनिद्रेची तहान बहुतेकांना लागते मात्र गंगातीरी. पुरे झाले आता. व्यापताप, मानअपमान, सुखदु:ख, थकला जीव. शिणला. आता विश्रांती हवी कायमची. जखमेवरची खपली गळून पडावी तसे आयुष्य इथेच गळून पडावे आता. ह्यासाठी ह्याहून योग्य जागा दुसरी कोणती ”


कॉरीडॉरकडे निघालो तर बहुतेक आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी
तारा लावलेल्या. एक हात आणि एक पाय तारेपलीकडे ठेवून मी मार्जरासन स्थितीत असतानाच पोलीसकाका दंडुका घेऊन आले, ’ओ मॅडमजी, लांघने के लिए तार नही लगाएँ है’ असे ते ओरडत होते, पण आता मी द्विशंकू अवस्थेत असल्याने, बाकीचे आधीच पलिकडे गेल्याने, तिकडे दुर्लक्ष करून 
घाईने तार ओलांडली. काशी विश्वनाथ मंदीराच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो. विशेष फिरता आलं नसलं तरी या गल्ल्या आणि गंगेचं दर्शन बनारसचं एक  मूक करणारं रूप दाखवून गेलं.  

 

आता उत्सुकता होती गंगाआरतीची. आम्ही वेळेत आटोपून दशाश्वमेध घाटाकडे निघालो तर अख्ख जग जणू तिकडेच निघालं होतं. लोक कशाला तडमडतात नव्या वर्षाला इथे, असं दादा म्हणत होता. जणू काही आम्ही एलियन असल्याने उडत्या तबकडीतून हे पाहत होतो. प्रचंड वाहतूक कोंडीतून रस्ता काढत पुढे साखळी करून एकदाचे नमो घाटावर पोचलो. आयटीनरीत लिहिल्याने दुमजली नावेला 'क्रूझ' म्हणत त्यात बसलो. बोचर्‍या थंडीत धुक्यात फिकुटलेला मंद सूर्यास्त पाहत गंगेत फेरी सुरू झाली. नाविक उर्फ केवट कम गाईड आम्हाला स्पष्ट वाचता येत असलेल्या घाटांची एक एक नावं जोरात वाचून दाखवत अद्भुत माहिती सांगितल्यासारखं करत होता. भोसले, पेशवे, अहिल्याबाई या सर्वांच्या नावे एक एक घाट होते. 

थंडी वाढू लागली. जर्किन, शालीचे थर वाढू लागले. अंगावर वारूळ चढलेल्या आणि फक्त डोळे उघडे असलेल्या ऋषी मुनींसारखे सगळे दिसू लागले. संधीप्रकाशात क्रूझ दशाश्वमेध घाटापाशी पोचले. आरतीआधी दहा रूपयात गंध लावायला छोटी मुलं नावेत चढून येत होती. एका काकूंनी त्यातल्या एकाला नुसतं शर्ट वर आलेलं पाहून स्वेटर घ्यायला पैसे दिले. बिचकत ते घेऊन तो खाली उतरला आणि थोडया वेळाने परत येऊन ’आहे माझ्याकडे स्वेटर’ म्हणत त्याने ते चक्क त्यांना परत केले. हे बनारसी तत्त्व होतं, त्या मुला-वडिलांपुरतं स्वाभिमानाचं कवच होतं , गंगाजलाचा गुण होता किंवा जे काय होतं, ते अद्भुत होतं.


दरम्यान एकसारखे रेशमी पोशाख घातलेले पुजारी रोषणाई केलेल्या कमानींखाली येऊन उभे राहिले. आधी स्तवन झाले. लगेच गंगा आरती सुरू झाली. सुरुवातीला हातात दिवट्या मग धूप मग पाच मजली दिव्यांची आरती. एका लयीत ओवाळत शंख आणि घंटांच्या तालासुरात गंगामैयाची आरती झाली. सगळं नेत्रसुखद होतं आणि श्रवणीयही. गार वारं, वाद्यांचा आसमंतात भरलेला निनाद आणि घाटपायर्‍यांवर, नावांमधून एकवटलेले दोन्ही हात उंचावून ’हर हर महादेव’ चा गजर करणारे आमच्यासारखे हजारो लोक. दादाने आईला व्हिडिओ कॉल केला होता त्यात तिला काही धूसर दिसलंही असेल पण हा सोहळा ती इथे येऊन बघू शकली नाही, कदाचित कधीच बघू शकणार नाही हे जाणवून डोळे भरून आले. निदान मावशी येऊ शकली या जाणीवेनं थोडं हलकं वाटलं.

गंगारतीने भारलेलं वातावरण हळूहळू निवळलं. ८४ पैकी पुढच्या आणखी काही घाटांवर चक्कर मारून नमो घाटावर पोचताना निर्विचार मौन, आत भरून राहिलेली शांतता आणि बाह्य संवेदना जाग्या ठेवणारी हुडहुडी अनुभवत होते. कुणीच काही बोलत नव्हतं. वल्ह्यांचा आवाज तेवढा येत होता. काठावरचे आणि आजूबाजूने ये जा करणार्‍या नावांमधले दिवे पाण्यावर प्रतिबिंबीत होऊन मधूनच लखलखत होते. 

Spiritual Tourism चा भाग असलेला, पर्यटकांसाठी खास कस्टमाईज्ड असला, काही तासांपुरता मर्यादित असला, आस्था, श्रद्धा, विरक्तीच्या जगाला केवळ एक प्रदक्षिणा घालणारा असला तरीही हा अनुभव विलक्षण होता तो कदाचित गंगेशी असलेल्या आपल्या सांस्कृतिक अनुबंधाने. या भावनेचं वर्णन एलकुंचवारांच्या शब्दांइतक्या नेमकेपणाने मी करू शकत नाही. "इथे पाप पाप राह्त नाही, पुण्य कवडीमोलाचे होते. आयुष्यातील इंद्रधनुष्य फिके पडते आणि मृत्यू बिनमहत्वाचा, तुच्छ वाटतो. नीति-अनीती, पाप-पुण्य, सुख-दु:ख, जीवन-मृत्यू-- ह्या सर्वांच्या पल्याडचे, चिरंतन, शाश्वत असे क्षमाशील वात्सल्य इथे जसे स्पष्ट जाणवते तसे इतरत्र कुठेही नाही. पार्थिव-अपार्थिवाला इतके चिकटून अशाश्वत शाश्वताला गळामिठी मारते ते इथे. ह्या अनुभवाची घनता इथे इतकी आहे की ती अगदी स्पर्शसंवेद्य होते." 

|| नमामि गंगे || २  #आजोळ_स्पेशल_ट्रिप 

नमामि गंगे        तीर्थराज प्रयाग        सारनाथ