Friday, August 25, 2017

ब्लॉग ’ती’ चा - अर्धे आकाश

मृण्मयी रानडे Mrinmayee Ranade आणि त्यांच्या https://mrinmayeeranade.blogspot.in/ या ब्लॉगबद्दल...

एका चिनी म्हणीनुसार अर्धे आकाश स्त्रियांचे, स्त्रियांसाठी असते. पत्रकारितेतील वेगवेगळ्य़ा क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या मृण्मयी रानडे यांच्या ब्लॉगचं हे नाव- अर्धे आकाश अर्थात mrinmayeeranade.blogspot.in "स्वत:कडे स्त्री म्हणून बघू लागलात की तुमच्यावर जे बरे वाईट प्रसंग येतात त्याचं तुम्ही भांडवल करत बसता. त्या ऐवजी स्वत:कडे माणूस म्हणून बघावं, त्या प्रसंगांशी कसा मुकाबला करावा हे बघावं आणि आपल्या जगण्यावर माणूसपणाची मोहोर उठवावी." कै. दुर्गा भागवत यांच्या या खणखणीत उक्तीचा प्रत्यय रानडे यांचा ब्लॉग वाचताना येतो. विशेषत: त्यांचे ’जेंडर’ विषयक विचार वाचताना आणि ’फिक्सर’ म्हणून काम करतानाचे आपल्याला चकित करणारे अनुभव वाचताना.
clip
मृण्मयी रानडे या सध्या दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा पुरवणीच्या संपादक आहेत. लिंग समभाव पत्रकारितेसाठीचा लाडली पुरस्कार गेल्या वर्षी त्यांच्या पुरवणीला मिळाला आहे. हक्काच्या अर्ध्या आकाशात गुंतून न पडता त्यांनी खरं तर स्वत:चच अख्खं आकाश निर्माण केलय. या स्वनिर्मित आकाशाचं प्रतिबिंब त्यांच्या ब्लॉगमध्ये उमटताना दिसतं. खटकणार्‍या गोष्टींबद्दल त्या स्पष्ट पण संतुलित भूमिका घेतात. त्यांच्या लेखनात प्रांजळपणा आहे. आत्मपरिक्षण आहे. मनात सहजपणे पक्क्या बसलेल्या काही जुनाट गृहीतकांबद्दल बोलताना एखाद्या लेखात त्या स्वत:चे सुद्धा उदाहरण देतात. उदा: "ती काळीसावळीच आहे, पण छान आहे,' असं एकदा म्हणाले होते तर लेकीने पटकन तोडलं. म्हणाली, "काळीसावळी आहे पण.. म्हणजे काय? तू पण पक्की रेसिस्ट आहेस."
या ब्लॉगमध्ये विषयानुसार कप्पे आहेत. त्यांना कधी ’दोडक्या’ सारख्या ग्लॅमर नसलेल्या पदार्थातलं वेगळेपण जाणवतं, कधी रोजच्या रेल्वे प्रवासात भेटलेल्या एखाद्या साध्या पण चमकदार व्यक्तीचा वाचकांशी परिचय करून द्यावासा वाटतो. तर कधी त्या आपल्याला जयपूर लिटफेस्टची (साहित्य संमेलन) सफर घडवतात. तिथल्या प्रत्येक चर्चासत्राचा त्यांनी घेतलेला आढावा मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वासारखाच हा ब्लॉग देखील बहुविध छटा लेऊन समोर येतो. काही कप्पे त्रोटक वाटतात, परंतु सर्वाधिक खिळवून ठेवणारा त्यातला कप्पा म्हणजे ’पत्रकारिता’. ते लेखन त्यांच्या अगदी आतून येत असावं कारण ते केवळ त्यांचं निरिक्षण नसून त्यांचे अस्सल अनुभव आहेत. हा कप्पा या ब्लॉगचा USP आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रिया, ही गोष्ट आता काही नवलाईची राहिलेली नाही. परंतु रानडे यांनी वर्णन केलेले ’फिक्सर’ म्हणून काम करण्याचे अनुभव केवळ भन्नाट. पत्रकारितेत डिप्लोमा मिळवल्यानंतर त्यांनी ’द डेली’ या इंग्रजी वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून करियरला सुरूवात केली. एका लेखात त्यांच्या पत्रकार सहकारी, अधिकार्‍यांबद्दलचे ’शिकाऊ दिवसातले’ किस्से आहेत. त्या लिहीतात, "मयंक भट हा माझा पहिला बॉस. काळेपांढरे केस, ज्याला इंग्रजीत सॉल्ट न पेपर लुक म्हणतात, दाढी, आकडेबाज मिशा असणारा मयंक नेहमी खादीचा कुडता घालायचा. एकदा मला भेटायला आलेल्या एका व्यक्तीला मी "What is your good name?' असं विचारल्याचं त्याने ऐकलंन. ती व्यक्ती गेल्यानंतर मला म्हणाला, 'What is a bad name?' पुन्हा कधी मी हा प्रश्न कोणालाही विचारला नाही."
या कप्प्यातल्या लेखांमध्ये ’एकाच कंपनीची लेकरं असली तरी सावत्र भावंडं असल्यासारखं वाटायचं’ अशी मनात कोणतीही अढी न ठेवता केलेली टाइम्स आणि म.टा. मधली तुलना आहे. नवशक्तीत वर्षभर काम केलं तिथले काही तापदायक अनुभव आहेत. मुंबईत आलेल्या भयप्रद पुराच्या पार्श्वभूमीवर २६ जुलैच्या रात्रीचा ऑफिसमधला चित्तथरारक अनुभव आहे आणि तशाही परिस्थितीत रात्री दीड वाजता वडापाव आणि चहा देणार्‍या कँटीनच्या मुलांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. दुसऱ्या दिवशी मुंबईत वितरित झालेला एक्स्प्रेस हा एकमेव पेपर असल्याचा अभिमानही त्यात व्यक्त झाला आहे.
त्या मोकळेपणे कबूल करतात, "एक्स्प्रेसमध्ये असताना माझ्या लक्षात आलं की, reporting is not my cup of tea! आता पत्रकारिता बदलली होती, 24X7 वृत्तवाहिन्यांमुळे बातम्यांची मागणी बदलली होती. यानंतर मी एका मैत्रिणीमुळे फिक्सर बनले. माणूस म्हणून मी या पाच वर्षांत सगळ्यात जास्त घडले, स्वत:ला प्रेमाने स्वीकारायला सुरुवात केली, हे नक्की." फिक्सर म्हणजे परदेशी पत्रकारांना अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरच्या बातम्या/लेख लिहिण्यासाठी किंवा रेडिओ वा टीव्ही कार्यक्रमांसाठी समन्वयक म्हणून मदत करणे. कॅनेडियन वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या डग्लस या वार्ताहरासोबत त्या वर्धा आणि यवतमाळच्या काही कुटुंबांना भेटल्या. ज्यांच्या घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केली होती अशी ती कुडाची किंवा मातीच्या भिंतींची घरं, आजूबाजूला रखरखाट, तिथलं दैन्य हे सारं त्यांच्या लेखणीतून उतरुन समोर उभं राहतं. ’दारू, कर्ज, मुलीचं लग्न, वारशानुसार मिळणारा प्रत्येक पिढीनुसार कमी होणारा शेताचा आकार, आधुनिकतेचा पूर्ण अभाव, कीटकनाशकांचा अतिवापर, उदरनिर्वाहासाठी शेती वगळता कोणतीच संधी नाही आणि स्थलांतराचे कमी प्रमाण’ या शब्दात त्यांनी मांडलेली, ’नापिकी’ पलीकडची शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा अगदी नेमकी आहे.
26/11च्या हल्ल्यानंतर, ’गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राच्या वार्ताहरासोबत फिक्सर म्हणून ताज हॉटेलच्या बाहेर उभं असताना "मुलीचा फोन आला घाबरलेल्या आवाजात. ‘आई, तू कुठे आहेस?’ म्हटलं, ‘काय ग?’ तर विचारते, ‘ताजच्या बाहेर ते टेररिस्ट हॉटेलच्या आतून बाँब फेकतायत. टीव्हीवर दाखवतायत. तू तिकडे नाहीयेस ना?’ यावर खरं बोलणं शक्यच नव्हतं." हे वाचताना आपण हादरतो आणि हेलावून जातो. ब्रिटनमधील ’चॅनल फोर’ला जगभरातील दहशतवाद या विषयावर माहितीपट करायचा होता. 2006मध्ये मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तीची, शक्यतो इंग्रजी बोलणारी आई शोधणं हे एक विचित्र पण आव्हानात्मक काम त्यांनी पार पाडलं. नॅटजिओच्या जर्मन आवृत्तीच्या कॉन्स्टन्झ किंडल या वार्ताहराबरोबर ’मुंबईतली घरगुती ब्युटी पार्लर्स’ या विषयावर काम करताना धारावीपासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत त्या हिंडल्या. पत्रकार लेखिका कॅथरिन बू आणि आयरिना वोडार या पत्रकारांच्या पुस्तक लेखनासाठी फिक्सर म्हणून काम केलं. प्रत्येक काम क्षितिज अधिकाधिक रुंदावणारं.
हे सारं त्या ब्लॉगवरील लेखांमधून मांडतात तेव्हा वाचकही एका नव्या विश्वाची ओळख करुन घेत समृद्ध होत जातो. पत्रकारिता म्हणजे केवळ बातमीदारी नव्हे. आव्हान स्वीकारुन, संदर्भांचा सखोल अभ्यास आणि शोधक नजर घेऊन स्वत:चं चौकटीतलं सुखवस्तू आयुष्य पणाला लावून केलेलं लखलखीत काम या लेखांमधून समोर येतं. त्यातलं थ्रील प्रेरणा देणारं आहे. मृण्मयी रानडे यांच्या अर्ध्या नव्हे तरअवघ्या आकाशाची व्याप्ती दर्शवणारं आहे.

Friday, August 18, 2017

ब्लॉग ’ती’चा - साडी आणि बरच काही

(sareesandotherstories.blog)
Link - http://www.readwhere.com/read/1323376/Akansha/akansha…

दोन मैत्रिणी भेटल्या की त्यांच्या गप्पांमध्ये साडी, दागिने, घराची सजावट आणि नुकताच केलेला प्रवास या चार गोष्टी हमखास येतात. अर्थात पुरुषांना आणि काही स्त्रियांना सुद्धा हे विषय ’बायकी’ किंवा ’जुनाट’ वाटू शकतात. पण सायली राजाध्यक्ष यांच्या ’साडी आणि बरच काही’ (sareesandotherstories.blog) हया ब्लॉगवर किंवा फेसबुक पेजवर हे (आणि बरेच) विषय अशा काही रंजक पद्धतीने आपल्यासमोर येतात की त्यांनाही ते चक्क आवडाय़ला लागतील यात शंका नाही. ’साडी हा पेहराव मला सगळ्यात ग्रेसफुल आणि आरामदायी वाटतो’ असं म्हणणार्‍या सायली स्वत: एथनिक साड्या नेसून, त्याला अनुरुप दागिने घालून त्यांचे फोटो पोस्ट करतात. त्यांचं फॅशन स्टेटमेंट ब्लॉगवाचकांना इतकं भावतं की त्या आता ’हटके’ साडयांची प्रदर्शनं भरवायला लागल्या आहेत. हे ’एथनिक’ म्हणजे नेमकं काय? त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ,"अभिजात, पारंपरिक, देशी असं काहीसं. ज्या प्रथा, परंपरा चांगल्या आहेत, ज्या काळानुसार बदलत गेलेल्या आहेत त्यांचा स्वीकार."
clip

’मी काही फॅशन तज्ज्ञ नाही’ असं त्या प्रांजळपणे म्हणत असल्या तरी त्यांचे परिधानांबद्दलचे लेख त्यांच्या ’ड्रेस सेन्स’ आणि ’पॅशन’ ची चुणूक दाखवतात. एका लेखात त्या म्हणतात, "प्रत्येक राज्यात किती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार होतात हे बघितलं तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. केरळमधली कसावू, तमिळनाडूमधली कांजीवरम – मैसूर सिल्क, आंध्रातली कलमकारी – पोचमपल्ली – धर्मावरम – गडवाल, महाराष्ट्रातली पैठणी, गुजरातमधली बांधणी, राजस्थानातली बागरू – सांगानेरी, पंजाबातली फुलकारी, छत्तीसगढ आणि झारखंडमधली कोसा, बिहारची भागलपुरी, मध्य प्रदेशातली चंदेरी – महेश्वरी, ओरिसातली बालुचेरी – संबलपुरी, आसामातली मुगा सिल्क, अरूणाचलची लेपचा, बंगालातली जामदानी, उत्तर प्रदेशातली लखनवी, हिमाचलची कुलू, काश्मिरची पश्मिना हे तर ढोबळ साड्यांचे प्रकार झाले. शिवाय रेशमांमध्येही टसर, रॉ, एरी, मलबेरी, मुगा, मटका असेही कितीतरी प्रकार आहेत."

मराठवाडा वृत्तपत्र, मुंबई आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वृत्तविभागात बराच काळ काम केल्याने सायली राजाध्यक्ष यांच्या ब्लॉगची भाषा अगदी सर्वसाधारण वाचकाला रुचेल-पचेल आणि व्यासंगी व्यक्तिलाही आनंद देईल अशी आहे. त्यांच्या सासूबाई म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांच्यावर लिहीलेला लेख हे त्यांचं पहिलं स्वतंत्र लेखन. २०१४ च्या अखेरीस ’अन्न हेच पूर्णब्रह्म’ या फेसबुक रेसिपी पेजला त्यांनी सुरुवात केली, त्याला अक्षरश: लाखो लाईक्स मिळतायत. (त्या ब्लॉगबद्दल पुन्हा कधी तरी !) नंतर ’डिजीटल दिवाळी अंक’ हेच भविष्य आहे हे ओळखून त्यांनी digitalkatta.com  सुरू केलं. यानंतर ’साडी आणि बरच काही’ सुरू झालं. ब्लॉगला हे आकर्षक नाव अगदी चतुराईने दिलय. एखाद्या बाईच्या पर्समध्ये ’ब्रम्हांड’ सापडू शकतं तसंच यातल्या विषयांचं आहे. कधी यात आयर्लंडचे गप्पिष्ट टॅक्सीवाले आणि लंडनचे चकार शब्द न बोलणारे घुमे टॅक्सीवाले यांच्यातली तुलना असते ,कधी ’फिडेलचा मृत्यू आणि साम्यवाद’ अशा गंभीर विषयावरचा लेख असतो. तर कधी ’उर्दू ही भारतात जन्मलेली भाषा. भारतात जे मुस्लिम आक्रमणकर्ते आले त्यांच्या काळात या भाषेचा जन्म झाला. या भाषेची मूळं संस्कृत आणि प्राकृत भाषेत आहेत. नंतर त्यात पर्शियन शब्दांची भर पडली’ अशी नावीन्यपूर्ण माहिती देणारा लेखही त्यात असतो.

परंतु मला वाटतं सायली सर्वात जास्त रमतात आणि आपल्याला भावतात, ते प्रवासवर्णनात. मीना प्रभू यांची प्रवासवर्णनं ही स्थळांबद्दल जास्त बोलतात, तिथल्या माणसांबद्दल कमी. सायली यांचे प्रवासावरचे लेख वाचताना, ’यात मी केलेल्या प्रवासाचं वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझंच वर्णन अधिक आहे’ या पुलंच्या मिश्कील वाक्याची प्रचिती येते. पण यामुळेच ते अधिक वाचनीय होतं, रसरशीत वाटतं. उदा: ’रस्किन बाँडचं लँडोर’ या त्यांच्या लेखात "एखाद्या गावात, जागेत असं काय असतं की माणसाला तिथेच परतावंसं वाटतं? आपलं गणगोत मागे सोडून यावंसं वाटतं? आपली भाषा, आपली संस्कृती सोडून परकी भाषा, संस्कृती आपलीशी कराविशी वाटते?" हा आपल्याही मनात दडलेला प्रश्न उमटतो. त्यांच्या ताज्या ’लंडन डायरी’ मधले लेख वाचताना आपणही त्यांच्या सोबत लंडन येथे मनमुराद भटकतो आहोत असं वाटतं. परदेशच नव्हे आसपासच्या गावात भ्रमंती करुन तिथली लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती या सगळ्य़ाच्या नोंदी त्यांच्या ’सह्याद्री प्रवास डायरी’ मध्ये आढळतात. त्यांच्या लेखांमधला ’मी’ आपल्यासारखाच एकातून दुसरा, दुसर्‍यातून तिसरा विचार करत बागडत जातो. ’धारवाड’ भेटीसंबंधी एका लेखात त्या लिहीतात, "परतताना आम्हा दोघींना जी. ए. कुलकर्णींचं घर बघायचं होतं. कडेमणी कंपाऊंड, माळमड्डी हा पत्ता पाठ होताच. गंमत म्हणजे जीए तिथे राहात होते हे फारसं कुणाला माहीत असल्याचं दिसलं नाही. मामांनी ३-४ ठिकाणी विचारल्यावर त्यांचं घर सापडलं. त्यांच्या कथांमधल्यासारखंच लाल मातीचं, कौलांनी शाकारलेलं घर. या घरात आता श्रीनिवासन नावाचं कुटुंब राहातं. त्या घराच्या बोळात शिरताना बुचाच्या फुलांचं झाड आहे. बुचाची फुलं इतकी सुंदर असतात पण मराठीत त्याला बूच असं अगदीच सामान्य नाव कुणी दिलं असेल? बुचाच्या फुलांना कानडीत गगनमल्लिगे असं सुंदर नाव आहे. जीएंनी गगनमल्लिगेचा आकाशमोगरा असा सुंदर अनुवाद केलाय."

कोणताही साहित्यिक, वैचारिक आव न आणता, स्वत:ला सिद्ध बिद्ध करायच्या भानगडीत न पडता केलेलं, सहजसुंदर लेखन हे या ब्लॉगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. गांधीवादी आजोबा आणि समाजवादी वडील (निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर) यांच्या वेगवेगळ्या विचारसरणी एकाच घरात नांद्ताना त्यांनी अनुभवलय. चपळगावकर आणि राजाध्यक्ष या दोन्ही कुटुंबांमुळे त्यांना मोठया सामाजिक वर्तुळात वावरायला मिळालं. या पार्श्वभूमीमुळे त्यांचं अनुभवविश्व समृद्ध झालं. परंतु ’आपल्याला काही लिहीता येत नाही’ या न्यूनगंडापासून सुरू झालेला प्रवास, सातत्याने रोचक लिहीत लाखोंच्या घरात चाहते मिळवण्यापर्यंत पोचवणं सोपं नाही. प्रतिभेला अथक मेहनतीची जोड लागतेच.
आचार्य अत्रे त्यांच्या आत्मवृत्तात लिहीतात," लहान मूल शाळेत जसे रमतगमत जाते ना, तसा मी जीवनातून रमतगमत चाललो आहे. खिडकी उघडी दिसली की मांजर जसे तिच्यात डोकावते तसे जीवनात डोकावण्याची मला फार हौस आहे." ’साडी आणि बरच काही’ हा ब्लॉग काहीसा तसाच आहे. वाचक म्हणून आपणही सायलीबरोबर जीवनातून रमतगमत चालण्याचा हा नितांतसुंदर अनुभव घेऊ शकतो. पण या खटाटोपातून त्यांना काय मिळत असावं? त्या म्हणतात, "या ब्लॉगमुळे मला देशोदेशीच्या मित्रमैत्रिणी मिळाल्या. सामाजिक भान वाढलं. आत्मविश्वास आला. अनेक गोष्टींकडे अधिक खुल्या मनाने, उदार दृष्टीने बघता यायला लागलं. माणूस म्हणून परिपक्व होण्य़ासाठी हे पुरेसं आहे, नाही का?"

*(वैयक्तिक संदर्भ - पूर्वपरवानगीसह- स्मितास्मृती विशेषांक २०१६)

Friday, August 11, 2017

ब्लॉग ’ती’चा - जलसखी

(आपल्याच मस्तीत वाहणार्‍या या नदीला ओंजळीत घ्यायचा माझा प्रयत्न  )
गेल्या वर्षी अगदी याच सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवरचा जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला होता. या दुर्घटनेवर माध्यमांमध्ये चर्चा सुरू असताना एक वेगळा चेहरा नजरेस पडला. कॉर्पोरेट लुक मधली ही जलतज्ज्ञ तरुणी अभ्यासपूर्ण बोलत, नेमक्या शब्दात मुद्दे मांडत होती. ती होती परिणीता दांडेकर - एक ’पाणीदार’ स्त्री. योगायोगाने तिच्या sandrpmarathi.wordpress.com
या ब्लॉगवरचा एक लेख नंतर माझ्यापर्यंत फॉरवर्ड होत होत आला. वाचला आणि वाटलं, जणू एखादी नदीच आपल्याशी बोलते आहे. कधी खळाळत, तुषार उडवत, कधी रोरावत, तर कधी संथ वाहत, गळ्य़ात हात घालून गूज सांगते आहे. त्याला कधी गांभीर्याची डूब तर कधी लाटांचं अवखळपण. नदी म्हटली की तिच्याबरोबरच काठाला रूजत आणि वाढत गेलेली मानवी संस्कृती, पाणी अर्थात ’जीवना’वरचं काव्य, पर्यावरणातले स्तिमित करणारे बदल, एक जितीजागती परिसंस्था, हे सारं आलच. या सगळ्याला सहजपणे कवेत घेणारं ब्लॉग तसच फेसबुकवरचं तिचं लेखनच नव्हे तर तिचं एकूणच व्यक्तिमत्व कवी श्‍याम बि‍हारी श्‍यामल यांच्या या ओळींची आठवण करून देतं.
"नदी ने जब-जब चाहा गीत गाना..रेत हुई , कंठ रीते धूल उड़ी...खेत हुई ,
चट्टानों से खूब लड़ी बढ़ती चली.. बहती गई, मगर वह ठहरी नदी... बाँधी गई.. साधी गई"

शेवटच्या ’बाँधी गई’ या ओळी मात्र परिणीताच्या लेखनाला अजिबात लागू होत नाहीत. ’ठहराव’ आहे पण तो तिच्या विचारांमध्ये. तिच्या शब्दांचं अनावर प्रवाहीपण चकित करणारं आहे. ’प्रवाह: नदीच्या सोबतीने वाहताना’ या तिच्या ब्लॉगवरील लेखनात जगभरातले भौगोलिक, सांस्कृतिक संदर्भ ओघाने आणि आवेगाने येत जातात. उदाहरण द्यायचं तर ’नद्यांचे वैविध्यपूर्ण रंग’ केंद्रस्थानी असलेल्या लेखामध्ये परिणीता लिहिते," नद्यांचे रंग मस्त असतात, पण ते त्यांचे नसतात, आभाळाचा निळा रंग पिऊन निळी होणारी निलाब, भरपूर चिखलात लोळलेल्या मुलासारखी मातीमुळे पिवळी होणारी Yellow River, minerals आणि algae मुळे हिरवी कंच झालेली कर्नाटकातील काली, लालभडक माती वाहावत लाल झालेली कोलोरॅडो... अमिता बाविस्कर एकदा म्हणाल्या होत्या, ’नदी जहाँसे बहती है, उस समाज को अपने रंग में ढालती है, और खुद उस रंग में रंगती है.’ गंगा गोरीपान- शंकराच्या चंद्र कोरी सारखी, तापी सूर्याची लेक म्हणून सोनेरी, यमुना सावळी-कृष्ण सावळा. हेमाद्रीच्या भविष्यपुराणात नद्यांचे रंग आहेत.. नर्मदा "नील", सिंधू "स्फटिकप्रभा" , महि "पीत". यमुना "श्यामलांगी", रात्र काळी, घागर काळी.." 
हे केवळ कल्पनारम्य शैलीदार ललित लेखन नाही. उपजत प्रतिभेबरोबरच पर्यावरण विज्ञानातलं पदव्युत्तर शिक्षण, जल व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास, देश-विदेशातली, विशेषत: उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत या भागातली भ्रमंती ह्या सगळ्या संदर्भांचा अर्क तिच्या लेखनात उत्कटपणे उतरताना दिसतो.
‘साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल’ म्हणजेच SANDRP या संस्थेशी परिणीता जुळलेली आहे. नद्या, धरणं आणि लोक यांचे आपसातील संबंध तसच त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम यासंदर्भात ही संस्था काम करते. या संस्थेचे कार्य वाचकांपर्यंत पोचवणार्‍या sandrp.wordpress.com
 या ब्लॉगवर परिणितासह इतरही जलतज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख उपलब्ध आहेत. २००५ चा महापूर आला. मुंबईच्या मिठी नदीचा प्रश्न चर्चेत आला आणि परिणीताच्या कामाची दिशा निश्चित झाली. एकीकडे आपण नदीला देवता मानतो तर दुसरीकडे जलप्रदूषण, प्रचंड रेती उत्खनन, निसर्गाशी खेळ करत नद्यांचे नाले करून टाकतो. नद्यांमुळे समृद्ध झालेला जीवनवारसा आपण खुंटवत आहोत का? पाण्य़ाच्या नैसर्गिक स्त्रोतांकडे आपण दुर्लक्ष करत आहोत का? वाहणे हा नदीचा धर्म, पण आज ’नदी वाहती नसणे’ हे आपण खूप सहज मान्य केले आहे का? अशा प्रश्नांनी कासावीस होणारी परिणीता मुक्तवाहिनी नद्या, शास्त्री, चिनाब , तापी, कावेरी, सारख्या विवाद्य नद्या, त्यासंबंधातील राजकीय-सामाजिक गुंते तिच्या लेखनातून मांडत जाते. नद्या आणि जैवविविधता वाचवण्यासाठी, ’जल, जंगल, जमीन’ याच्या अस्तित्वासाठी तिच्या परीने लढत राहते. क्वचित तिची भूमिका काहीशी एकांगी वाटते, त्याच वेळी अधिकांच्या अधिक सुखासाठी कुणाच्यातरी विस्थापित आयुष्यांवर भौतिक विकासाचे इमले उभारायच्या कल्पनेला तिने दिलेला ठाम नकार वाचकाला विचारप्रवृत्त करतो.

"सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर..तरी तिला आठवतो, जन्म दिलेला डोंगर" म्हणणारे कवी गदिमा, नदी शेवटी समुद्रालाच मिळते हा संकेत अधोरेखित करतात. याच ब्लॉगवरच्या एका लेखात, "अशाही काही नद्या आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.." हे सांगून परिणीता आपल्या गृहीतकाला धक्का देते. नदी आणि समुद्राचं मीलन या पारंपरिक रोमँटिक कल्पनेला छेद देताना ती सांगते "Okavango नदी... ज्याचा delta नाहीच मिळत समुद्राला. समुद्राला नाही मिळाली तर नदी ’धराशायी’ होते. धराशायी...पृथ्वीवर निजणारी. रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात...प्रत्येकीची आपली कथा. प्रत्येक झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं..स्फोट होतो सृजनाचा. धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट. वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी परत बरसतेच." कधी माहितीपूर्ण तर कधी लालित्यपूर्ण, कधी कवितेचे, कधी लोकगीतांचे संदर्भ देत तिचं लेखन वाचकांना जलविश्वाची एक अनोखी सफर घडवत जातं.
प्रवाहाची आणि नद्यांची फारकत धरणांपासून सुरु झाली हे स्पष्टपणे सांगत, आपल्या एकूणच ’Ecological Illiteracy’ बाबत ती म्हणते, अनेक बहाद्दर असे समजतात की कोणत्याही नदीचे पाणी समुद्रास मिळाले म्हणजे ते ’वाया’ गेले. दुर्दैवाची गोष्ट अशी की अनेक अभियंता जे धरणं बांधतात किंवा ती plan करतात त्यांची ही लाडकी समजूत आहे. नदी जेव्हा जेव्हा समुद्रास मिळते तेव्हा ते फक्त पाणी आणत नाही, तर अत्यंत महत्वाचा असा गाळ देखील आणते. या गाळानेच सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण होतात, नदीपात्र आणि त्या भवतीची शहरे घडतात. या गाळाच्या अभावाने बांगलादेश, सुंदरबन, गोदावरी आणि कृष्णेचा त्रिभुज हा अक्षरशः समुद्रात बुडतो आहे.
एखाद्या लेखात तिचे शब्द असे प्रपातासारखे ओसंडून येतात, प्रचंड अस्वस्थ करतात तर दुसर्‍या लेखात मनावर हळुवार तरंग उमटवत आपल्याला अंतर्मुख करून जातात, जेव्हा ही जलसखी परिणीता विचारते, "आपला समुद्र आत असतो. कधी शांत रात्री गाज ऐकू येते बघ?"