मृण्मयी रानडे Mrinmayee Ranade आणि त्यांच्या https://mrinmayeeranade.blogspot.in/ या ब्लॉगबद्दल...
एका चिनी म्हणीनुसार अर्धे आकाश स्त्रियांचे, स्त्रियांसाठी असते. पत्रकारितेतील वेगवेगळ्य़ा क्षेत्रांचा प्रदीर्घ अनुभव असणार्या मृण्मयी रानडे यांच्या ब्लॉगचं हे नाव- अर्धे आकाश अर्थात mrinmayeeranade.blogspot.in "स्वत:कडे स्त्री म्हणून बघू लागलात की तुमच्यावर जे बरे वाईट प्रसंग येतात त्याचं तुम्ही भांडवल करत बसता. त्या ऐवजी स्वत:कडे माणूस म्हणून बघावं, त्या प्रसंगांशी कसा मुकाबला करावा हे बघावं आणि आपल्या जगण्यावर माणूसपणाची मोहोर उठवावी." कै. दुर्गा भागवत यांच्या या खणखणीत उक्तीचा प्रत्यय रानडे यांचा ब्लॉग वाचताना येतो. विशेषत: त्यांचे ’जेंडर’ विषयक विचार वाचताना आणि ’फिक्सर’ म्हणून काम करतानाचे आपल्याला चकित करणारे अनुभव वाचताना.
मृण्मयी रानडे या सध्या दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा पुरवणीच्या संपादक आहेत. लिंग समभाव पत्रकारितेसाठीचा लाडली पुरस्कार गेल्या वर्षी त्यांच्या पुरवणीला मिळाला आहे. हक्काच्या अर्ध्या आकाशात गुंतून न पडता त्यांनी खरं तर स्वत:चच अख्खं आकाश निर्माण केलय. या स्वनिर्मित आकाशाचं प्रतिबिंब त्यांच्या ब्लॉगमध्ये उमटताना दिसतं. खटकणार्या गोष्टींबद्दल त्या स्पष्ट पण संतुलित भूमिका घेतात. त्यांच्या लेखनात प्रांजळपणा आहे. आत्मपरिक्षण आहे. मनात सहजपणे पक्क्या बसलेल्या काही जुनाट गृहीतकांबद्दल बोलताना एखाद्या लेखात त्या स्वत:चे सुद्धा उदाहरण देतात. उदा: "ती काळीसावळीच आहे, पण छान आहे,' असं एकदा म्हणाले होते तर लेकीने पटकन तोडलं. म्हणाली, "काळीसावळी आहे पण.. म्हणजे काय? तू पण पक्की रेसिस्ट आहेस."
या ब्लॉगमध्ये विषयानुसार कप्पे आहेत. त्यांना कधी ’दोडक्या’ सारख्या ग्लॅमर नसलेल्या पदार्थातलं वेगळेपण जाणवतं, कधी रोजच्या रेल्वे प्रवासात भेटलेल्या एखाद्या साध्या पण चमकदार व्यक्तीचा वाचकांशी परिचय करून द्यावासा वाटतो. तर कधी त्या आपल्याला जयपूर लिटफेस्टची (साहित्य संमेलन) सफर घडवतात. तिथल्या प्रत्येक चर्चासत्राचा त्यांनी घेतलेला आढावा मुळातूनच वाचण्यासारखा आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वासारखाच हा ब्लॉग देखील बहुविध छटा लेऊन समोर येतो. काही कप्पे त्रोटक वाटतात, परंतु सर्वाधिक खिळवून ठेवणारा त्यातला कप्पा म्हणजे ’पत्रकारिता’. ते लेखन त्यांच्या अगदी आतून येत असावं कारण ते केवळ त्यांचं निरिक्षण नसून त्यांचे अस्सल अनुभव आहेत. हा कप्पा या ब्लॉगचा USP आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रिया, ही गोष्ट आता काही नवलाईची राहिलेली नाही. परंतु रानडे यांनी वर्णन केलेले ’फिक्सर’ म्हणून काम करण्याचे अनुभव केवळ भन्नाट. पत्रकारितेत डिप्लोमा मिळवल्यानंतर त्यांनी ’द डेली’ या इंग्रजी वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून करियरला सुरूवात केली. एका लेखात त्यांच्या पत्रकार सहकारी, अधिकार्यांबद्दलचे ’शिकाऊ दिवसातले’ किस्से आहेत. त्या लिहीतात, "मयंक भट हा माझा पहिला बॉस. काळेपांढरे केस, ज्याला इंग्रजीत सॉल्ट न पेपर लुक म्हणतात, दाढी, आकडेबाज मिशा असणारा मयंक नेहमी खादीचा कुडता घालायचा. एकदा मला भेटायला आलेल्या एका व्यक्तीला मी "What is your good name?' असं विचारल्याचं त्याने ऐकलंन. ती व्यक्ती गेल्यानंतर मला म्हणाला, 'What is a bad name?' पुन्हा कधी मी हा प्रश्न कोणालाही विचारला नाही."
या कप्प्यातल्या लेखांमध्ये ’एकाच कंपनीची लेकरं असली तरी सावत्र भावंडं असल्यासारखं वाटायचं’ अशी मनात कोणतीही अढी न ठेवता केलेली टाइम्स आणि म.टा. मधली तुलना आहे. नवशक्तीत वर्षभर काम केलं तिथले काही तापदायक अनुभव आहेत. मुंबईत आलेल्या भयप्रद पुराच्या पार्श्वभूमीवर २६ जुलैच्या रात्रीचा ऑफिसमधला चित्तथरारक अनुभव आहे आणि तशाही परिस्थितीत रात्री दीड वाजता वडापाव आणि चहा देणार्या कँटीनच्या मुलांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. दुसऱ्या दिवशी मुंबईत वितरित झालेला एक्स्प्रेस हा एकमेव पेपर असल्याचा अभिमानही त्यात व्यक्त झाला आहे.
त्या मोकळेपणे कबूल करतात, "एक्स्प्रेसमध्ये असताना माझ्या लक्षात आलं की, reporting is not my cup of tea! आता पत्रकारिता बदलली होती, 24X7 वृत्तवाहिन्यांमुळे बातम्यांची मागणी बदलली होती. यानंतर मी एका मैत्रिणीमुळे फिक्सर बनले. माणूस म्हणून मी या पाच वर्षांत सगळ्यात जास्त घडले, स्वत:ला प्रेमाने स्वीकारायला सुरुवात केली, हे नक्की." फिक्सर म्हणजे परदेशी पत्रकारांना अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरच्या बातम्या/लेख लिहिण्यासाठी किंवा रेडिओ वा टीव्ही कार्यक्रमांसाठी समन्वयक म्हणून मदत करणे. कॅनेडियन वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या डग्लस या वार्ताहरासोबत त्या वर्धा आणि यवतमाळच्या काही कुटुंबांना भेटल्या. ज्यांच्या घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केली होती अशी ती कुडाची किंवा मातीच्या भिंतींची घरं, आजूबाजूला रखरखाट, तिथलं दैन्य हे सारं त्यांच्या लेखणीतून उतरुन समोर उभं राहतं. ’दारू, कर्ज, मुलीचं लग्न, वारशानुसार मिळणारा प्रत्येक पिढीनुसार कमी होणारा शेताचा आकार, आधुनिकतेचा पूर्ण अभाव, कीटकनाशकांचा अतिवापर, उदरनिर्वाहासाठी शेती वगळता कोणतीच संधी नाही आणि स्थलांतराचे कमी प्रमाण’ या शब्दात त्यांनी मांडलेली, ’नापिकी’ पलीकडची शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा अगदी नेमकी आहे.
26/11च्या हल्ल्यानंतर, ’गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राच्या वार्ताहरासोबत फिक्सर म्हणून ताज हॉटेलच्या बाहेर उभं असताना "मुलीचा फोन आला घाबरलेल्या आवाजात. ‘आई, तू कुठे आहेस?’ म्हटलं, ‘काय ग?’ तर विचारते, ‘ताजच्या बाहेर ते टेररिस्ट हॉटेलच्या आतून बाँब फेकतायत. टीव्हीवर दाखवतायत. तू तिकडे नाहीयेस ना?’ यावर खरं बोलणं शक्यच नव्हतं." हे वाचताना आपण हादरतो आणि हेलावून जातो. ब्रिटनमधील ’चॅनल फोर’ला जगभरातील दहशतवाद या विषयावर माहितीपट करायचा होता. 2006मध्ये मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तीची, शक्यतो इंग्रजी बोलणारी आई शोधणं हे एक विचित्र पण आव्हानात्मक काम त्यांनी पार पाडलं. नॅटजिओच्या जर्मन आवृत्तीच्या कॉन्स्टन्झ किंडल या वार्ताहराबरोबर ’मुंबईतली घरगुती ब्युटी पार्लर्स’ या विषयावर काम करताना धारावीपासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत त्या हिंडल्या. पत्रकार लेखिका कॅथरिन बू आणि आयरिना वोडार या पत्रकारांच्या पुस्तक लेखनासाठी फिक्सर म्हणून काम केलं. प्रत्येक काम क्षितिज अधिकाधिक रुंदावणारं.
हे सारं त्या ब्लॉगवरील लेखांमधून मांडतात तेव्हा वाचकही एका नव्या विश्वाची ओळख करुन घेत समृद्ध होत जातो. पत्रकारिता म्हणजे केवळ बातमीदारी नव्हे. आव्हान स्वीकारुन, संदर्भांचा सखोल अभ्यास आणि शोधक नजर घेऊन स्वत:चं चौकटीतलं सुखवस्तू आयुष्य पणाला लावून केलेलं लखलखीत काम या लेखांमधून समोर येतं. त्यातलं थ्रील प्रेरणा देणारं आहे. मृण्मयी रानडे यांच्या अर्ध्या नव्हे तरअवघ्या आकाशाची व्याप्ती दर्शवणारं आहे.