Friday, August 11, 2017

ब्लॉग ’ती’चा - जलसखी

(आपल्याच मस्तीत वाहणार्‍या या नदीला ओंजळीत घ्यायचा माझा प्रयत्न  )
गेल्या वर्षी अगदी याच सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवरचा जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला होता. या दुर्घटनेवर माध्यमांमध्ये चर्चा सुरू असताना एक वेगळा चेहरा नजरेस पडला. कॉर्पोरेट लुक मधली ही जलतज्ज्ञ तरुणी अभ्यासपूर्ण बोलत, नेमक्या शब्दात मुद्दे मांडत होती. ती होती परिणीता दांडेकर - एक ’पाणीदार’ स्त्री. योगायोगाने तिच्या sandrpmarathi.wordpress.com
या ब्लॉगवरचा एक लेख नंतर माझ्यापर्यंत फॉरवर्ड होत होत आला. वाचला आणि वाटलं, जणू एखादी नदीच आपल्याशी बोलते आहे. कधी खळाळत, तुषार उडवत, कधी रोरावत, तर कधी संथ वाहत, गळ्य़ात हात घालून गूज सांगते आहे. त्याला कधी गांभीर्याची डूब तर कधी लाटांचं अवखळपण. नदी म्हटली की तिच्याबरोबरच काठाला रूजत आणि वाढत गेलेली मानवी संस्कृती, पाणी अर्थात ’जीवना’वरचं काव्य, पर्यावरणातले स्तिमित करणारे बदल, एक जितीजागती परिसंस्था, हे सारं आलच. या सगळ्याला सहजपणे कवेत घेणारं ब्लॉग तसच फेसबुकवरचं तिचं लेखनच नव्हे तर तिचं एकूणच व्यक्तिमत्व कवी श्‍याम बि‍हारी श्‍यामल यांच्या या ओळींची आठवण करून देतं.
"नदी ने जब-जब चाहा गीत गाना..रेत हुई , कंठ रीते धूल उड़ी...खेत हुई ,
चट्टानों से खूब लड़ी बढ़ती चली.. बहती गई, मगर वह ठहरी नदी... बाँधी गई.. साधी गई"

शेवटच्या ’बाँधी गई’ या ओळी मात्र परिणीताच्या लेखनाला अजिबात लागू होत नाहीत. ’ठहराव’ आहे पण तो तिच्या विचारांमध्ये. तिच्या शब्दांचं अनावर प्रवाहीपण चकित करणारं आहे. ’प्रवाह: नदीच्या सोबतीने वाहताना’ या तिच्या ब्लॉगवरील लेखनात जगभरातले भौगोलिक, सांस्कृतिक संदर्भ ओघाने आणि आवेगाने येत जातात. उदाहरण द्यायचं तर ’नद्यांचे वैविध्यपूर्ण रंग’ केंद्रस्थानी असलेल्या लेखामध्ये परिणीता लिहिते," नद्यांचे रंग मस्त असतात, पण ते त्यांचे नसतात, आभाळाचा निळा रंग पिऊन निळी होणारी निलाब, भरपूर चिखलात लोळलेल्या मुलासारखी मातीमुळे पिवळी होणारी Yellow River, minerals आणि algae मुळे हिरवी कंच झालेली कर्नाटकातील काली, लालभडक माती वाहावत लाल झालेली कोलोरॅडो... अमिता बाविस्कर एकदा म्हणाल्या होत्या, ’नदी जहाँसे बहती है, उस समाज को अपने रंग में ढालती है, और खुद उस रंग में रंगती है.’ गंगा गोरीपान- शंकराच्या चंद्र कोरी सारखी, तापी सूर्याची लेक म्हणून सोनेरी, यमुना सावळी-कृष्ण सावळा. हेमाद्रीच्या भविष्यपुराणात नद्यांचे रंग आहेत.. नर्मदा "नील", सिंधू "स्फटिकप्रभा" , महि "पीत". यमुना "श्यामलांगी", रात्र काळी, घागर काळी.." 
हे केवळ कल्पनारम्य शैलीदार ललित लेखन नाही. उपजत प्रतिभेबरोबरच पर्यावरण विज्ञानातलं पदव्युत्तर शिक्षण, जल व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास, देश-विदेशातली, विशेषत: उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ईशान्य भारत या भागातली भ्रमंती ह्या सगळ्या संदर्भांचा अर्क तिच्या लेखनात उत्कटपणे उतरताना दिसतो.
‘साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल’ म्हणजेच SANDRP या संस्थेशी परिणीता जुळलेली आहे. नद्या, धरणं आणि लोक यांचे आपसातील संबंध तसच त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम यासंदर्भात ही संस्था काम करते. या संस्थेचे कार्य वाचकांपर्यंत पोचवणार्‍या sandrp.wordpress.com
 या ब्लॉगवर परिणितासह इतरही जलतज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख उपलब्ध आहेत. २००५ चा महापूर आला. मुंबईच्या मिठी नदीचा प्रश्न चर्चेत आला आणि परिणीताच्या कामाची दिशा निश्चित झाली. एकीकडे आपण नदीला देवता मानतो तर दुसरीकडे जलप्रदूषण, प्रचंड रेती उत्खनन, निसर्गाशी खेळ करत नद्यांचे नाले करून टाकतो. नद्यांमुळे समृद्ध झालेला जीवनवारसा आपण खुंटवत आहोत का? पाण्य़ाच्या नैसर्गिक स्त्रोतांकडे आपण दुर्लक्ष करत आहोत का? वाहणे हा नदीचा धर्म, पण आज ’नदी वाहती नसणे’ हे आपण खूप सहज मान्य केले आहे का? अशा प्रश्नांनी कासावीस होणारी परिणीता मुक्तवाहिनी नद्या, शास्त्री, चिनाब , तापी, कावेरी, सारख्या विवाद्य नद्या, त्यासंबंधातील राजकीय-सामाजिक गुंते तिच्या लेखनातून मांडत जाते. नद्या आणि जैवविविधता वाचवण्यासाठी, ’जल, जंगल, जमीन’ याच्या अस्तित्वासाठी तिच्या परीने लढत राहते. क्वचित तिची भूमिका काहीशी एकांगी वाटते, त्याच वेळी अधिकांच्या अधिक सुखासाठी कुणाच्यातरी विस्थापित आयुष्यांवर भौतिक विकासाचे इमले उभारायच्या कल्पनेला तिने दिलेला ठाम नकार वाचकाला विचारप्रवृत्त करतो.

"सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर..तरी तिला आठवतो, जन्म दिलेला डोंगर" म्हणणारे कवी गदिमा, नदी शेवटी समुद्रालाच मिळते हा संकेत अधोरेखित करतात. याच ब्लॉगवरच्या एका लेखात, "अशाही काही नद्या आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.." हे सांगून परिणीता आपल्या गृहीतकाला धक्का देते. नदी आणि समुद्राचं मीलन या पारंपरिक रोमँटिक कल्पनेला छेद देताना ती सांगते "Okavango नदी... ज्याचा delta नाहीच मिळत समुद्राला. समुद्राला नाही मिळाली तर नदी ’धराशायी’ होते. धराशायी...पृथ्वीवर निजणारी. रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात...प्रत्येकीची आपली कथा. प्रत्येक झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं..स्फोट होतो सृजनाचा. धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट. वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी परत बरसतेच." कधी माहितीपूर्ण तर कधी लालित्यपूर्ण, कधी कवितेचे, कधी लोकगीतांचे संदर्भ देत तिचं लेखन वाचकांना जलविश्वाची एक अनोखी सफर घडवत जातं.
प्रवाहाची आणि नद्यांची फारकत धरणांपासून सुरु झाली हे स्पष्टपणे सांगत, आपल्या एकूणच ’Ecological Illiteracy’ बाबत ती म्हणते, अनेक बहाद्दर असे समजतात की कोणत्याही नदीचे पाणी समुद्रास मिळाले म्हणजे ते ’वाया’ गेले. दुर्दैवाची गोष्ट अशी की अनेक अभियंता जे धरणं बांधतात किंवा ती plan करतात त्यांची ही लाडकी समजूत आहे. नदी जेव्हा जेव्हा समुद्रास मिळते तेव्हा ते फक्त पाणी आणत नाही, तर अत्यंत महत्वाचा असा गाळ देखील आणते. या गाळानेच सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण होतात, नदीपात्र आणि त्या भवतीची शहरे घडतात. या गाळाच्या अभावाने बांगलादेश, सुंदरबन, गोदावरी आणि कृष्णेचा त्रिभुज हा अक्षरशः समुद्रात बुडतो आहे.
एखाद्या लेखात तिचे शब्द असे प्रपातासारखे ओसंडून येतात, प्रचंड अस्वस्थ करतात तर दुसर्‍या लेखात मनावर हळुवार तरंग उमटवत आपल्याला अंतर्मुख करून जातात, जेव्हा ही जलसखी परिणीता विचारते, "आपला समुद्र आत असतो. कधी शांत रात्री गाज ऐकू येते बघ?"

No comments:

Post a Comment