Friday, August 21, 2015

जनरेशन गॅप - अपरात्री ऑनलाईन


"हे ’ऑनलाईन’ म्हणजे नेमकं काय असतं ग?" नात्यातल्या एका वयस्कर बाईंनी अचानक विचारलं. "ऑनलाईन म्हणजे ’आपण आत्ता नेटवर्क वापरत आहोत’ याची खूण. का हो काकू!" "काही नाही, त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या नातीचं ठरलेलं लग्न मोडलं. आपला होणारा नवरा रात्रीबेरात्री ऑनलाईन असतो का हे तपासायला तिची नात स्वत: ऑनलाईन गेली म्हणे, झालं भलतच, इतक्या रात्री ऑनलाईन असणारी मुलगी ’चांगली’ नसणार या कारणाने त्या मुलाने लग्नाला चक्क नकार दिला" "अरेच्चा, पण मग तो मुलगा स्वत: अपरात्री ऑनलाईन होता त्याचं काय!" "खरय, पण शेवटी ’मुलीच्या जातीला’ कळायला पाहिजे नं !" इति काकू.

 पिढ्या बदलल्या तरी एक गोष्ट फार संथ गतीने बदलते आहे, ती म्हणजे समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची नजर. मुळात महत्वाचे काम असल्याशिवाय अपरात्री मोबाईल वापरणे योग्य नाही, मग वापरकर्ता कुणीही असो. परंतु ’बाईच्या जातीने’ मोबाईल वापरला की पारंपरिक विचारसरणीच्या मंडळींच्या कपाळावर आठी पडते. मागे उ.प्रदेश चे एक खासदार सैनी यांनी मुक्ताफळे उधळली होती, "मुलींना मोबाईल वापरू देऊ नका. आमच्या आईबहिणींनी मोबाईल वापरला नाही, त्यांचे कुठे काय बिघडले!" बाघपत पंचायतीने तर मोबाईलमुळे मुली पळून जाऊन लग्न करतात तसेच त्यांचे संसारातले लक्ष उडते ,त्यामुळे ’४० वर्षांखालील स्त्रियांनी मोबाईल वापरू नये’ असा अचाट फतवा काढला होता. त्यानंतर म.प्र तील एक खासदार रघुनंदन शर्मा म्हणाले होते, "लग्नाआधी मुलींना मोबाईल दिला तर त्या मर्यादा ओलांडतात. हे मोबाइल म्हणजे कर्णपिशाच्च आहे." माध्यमातून टीका झाल्यावर या मंडळींनी मग सारवासारव केली हा भाग वेगळा. मुळात मुली लग्न करायला एकट्या तर पळून जाऊ शकत नाहीत म्हणजेच या सगळ्या उदाहरणात त्या मुलींसह ’मर्यादा’ वगैरे ओलांडणारी मुले ही आहेत. ती मात्र या मोबाईलबंदी पासून मुक्त आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वेडापायी तरूण पिढी वेळेचा अपव्यय करते आहे,

मानवी तासांचा हिशेब केला तर देशाचाही वेळ अनुत्पादक कामात वाया घालवते आहे. त्यातून शारिरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या देखील वाढत आहेत हे सारे खरे असले तरी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. जेनेल हॉफमन या अमेरिकन आईने आपल्या टीनएजर मुलाला मोबाईल देताना तो कसा, केव्हा, कुठे आणि किती वापरावा याबद्दल एक आचारसंहिताच करून दिली होती. असे काही उपाय करायचे सोडून सगळ्या समस्यांचे खापर फक्त मुलींच्या मोबाईल वापरावर फोडणे कितपत योग्य आहे? ’तिखट झाला चहा आणि कालवण झालं गोड सासू म्हणते सुनेला तुझ्या ’व्हॉट्सअप’ ला उठू दे फोड’ अशा अर्थाच्या थोड्या खोचक, थोड्या मिश्कील ओळी सध्या मोबाईलवर फिरत आहेत. खरं तर लग्नानंतर संसाराच्या चक्रात अडकलेल्या स्त्रियांना या मोबाईलमुळे थोडा मोकळा श्वास घेता येतो आहे. शाळा-महाविद्यालयामधलं दुरावलेलं मैत्र पुन्हा जोडता येतं आहे. घरची-बाहेरची कामं, पैपाहुणा, सणवार, मुलं, त्यांच्या activities, स्वत:चं लहानमोठं करियर या सगळ्याशी ती आजही ’कनेक्टेड’ आहे, उलट या चाकोरीतही एक नावीन्य, चैतन्य, आत्मविश्वास तिला जाणवतो. मुलांच्या प्रश्नांना पटकन मोबाईलमधे पाहून उत्तर देणारी स्मार्ट आई आता जाहिरातींमधून दिसते. मोबाईलच्या नादात डाळ करपावी किंवा कामे विसरून जावी एवढी ती बावळट नक्कीच नाही. ’आमच्या वेळी नव्ह्तं असलं काही फॅड’ असं तिला म्हणणारी मागची पिढी आज स्वत: मात्र टीव्हीला खिळून बसलेली असते. त्यांच्या काळी या गोष्टी उपलब्धच नव्ह्त्या तर त्यात त्यांच्या संयमाची परीक्षा आली कुठे? आजच्या पुरूषांच्या बाबतीत तर, गोष्टीतल्या जादूगाराचा प्राण जसा पोपटात असायचा तसा त्यांचा मोबाईलमधे असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मोबाईल विना जगू शकणारे पुरूष अपवादात्मक तसेच मोबाईलच्या अगदीच आहारी गेलेल्या स्त्रियाही अपवादात्मक. स्त्रिया तंत्रज्ञानाचा, विशेषत: मोबाईलचा वापर करतात तेव्हा संपर्काचे, माहिती मिळवण्याचे, माणसांशी जोडले जाण्याचे, सुरक्षिततेचे आणि काही अंशी आत्मनिर्भर होण्याचे जणू आयुध त्यांना लाभते.

परंतु स्त्रीचं स्वत:चं विश्व असणं ही कल्पनाच मुळात समाजाच्या पचनी पडत नाही. बहुतेक स्त्रिया नवर्‍याने नवा मोबाईल घेतला की त्याचा जुना मोबाईल वापरताना दिसतात, अर्थात तिने कायम त्यागमूर्ती, वात्सल्यमूर्ती, संसाराचा कणा असणं हेच अपेक्षित असतं. असावं ना! पण तिला स्वत:चीही स्पेस असायला हवी की नको! मोबाईलमुळे स्त्रीचे संपर्कक्षेत्र वाढते, तिचे पतीवरील अवलंबित्व बरेचसे कमी होते याने काही पुरूषांचा अहंकार दुखावतो. वरवर स्त्रियांच्या प्रगतीच्या वल्गना केल्या तरी समाजाला मनातून ’जात्यावर बसून ओवी गाणारी नऊवारीतली सात्विक स्त्री’ ही प्रतिमा सर्वात जास्त भावते. अशा वृत्तीबाबत ना.ग.गोरे म्हणत, "या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं". एकूणच या चित्राला तडा जायला लागला की बर्‍याच घरातून तिच्या मोबाईल वापरावर तिरकस टीका होऊ लागते, समाजातले स्वघोषित नैतिक पहारेकरी स्त्रियांवरील मोबाईलबंदी सारखे आचरट उपाय शोधू लागतात.

 फ़ोक्सवॅगन ची एक सामाजिक जाहिरात आहे. जाहिरात सुरू होते ती सिनेमागृहात प्रेक्षक येऊन बसत असतानाच्या दृश्यासह. पड्द्यावर सिनेमा आधीची जाहिरात सुरू होते, त्यात फ़ोक्सवॅगन चालवणारे स्टिअरिंगवरचे हात तेवढे दिसतात, प्रेक्षक श्वास रोखून बघू लागतात, गाडीचा वेग वाढतो, आता गाडी नुसतीच सुसाट पुढे जात राहते. एव्हाना कंटाळलेले प्रेक्षक चुळबूळ करू लागतात. आपापला मोबाईल काढून सगळे त्यात डोकावू लागतात आणि अचानक जोरात आवाज येतो, पड्द्यावरील गाडीचा अपघात झालेला असतो. खाली मेसेज येतो, ’वाहन चालविताना मोबाईल वापरणे धोक्याचे आहे.’ खरं तर वाहन चालवतानाच नव्हे, आपल्या उद्देशांकडे, सुंदर जगण्याकडे, उत्तम पालकत्वाकडे आपला प्रवास सुरू असताना देखील मोबाईलचा अतिवापर हितकारक नाही हे सांगणारी ही जाहिरात सर्वांनाच लागू होते. फक्त स्त्रियांना नव्हे. -

Friday, July 24, 2015

जनरेशन गॅप - पोशाख


"डोईचा पदर आला खांद्यावरी.. भरल्या बाजारी जाईन मी.." असं म्हणणार्‍या संत जनाबाईंनी तत्कालीन समाजातील स्त्रीच्या पेहरावाबद्दलच नव्हे तर तिच्या एकूण वर्तनाबद्दल असलेल्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिलं. अर्थात यामुळे परिस्थिती फारशी बदलली नाही. पाश्चात्य पोषाख घालायचा नाही ही नवर्‍याची अट कटाक्षाने पाळण्याच्या बदल्यात पहिल्या महिला डॉक्टर, आनंदीबाई जोशींना तर अमेरिकेतील थंडी असह्य होऊन क्षयरोगामुळे स्वत:चा जीव गमवावा लागला. आता असे जाचक नियम काहीसे शिथील झाले असले तरी अजूनही मुलींच्या/स्त्रियांच्या पेहरावाकडे मागच्या पिढीचेच नव्हे तर सबंध समाजाचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते.

 निर्भयावरील बीबीसी ने केलेल्या वादग्रस्त माहितीपटात आरोपीच्या वकिलानी जी काही मुक्ताफळे उधळली त्यात त्यानी आजच्या मुलींच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतीवर आणि राहणीवर आक्षेप घेतला होता. त्याने आरोपीचे समर्थन करताना म्हटले होते की समाजाने घालून दिलेली चौकट ओलांडणार्‍या मुलीच अत्याचाराच्या घटनांना जबाबदार आहेत. त्या वकिलाच्या मानसिकतेचा वरवर जोरदार निषेध होत असला तरी आतून कुठेतरी बहुसंख्य लोकांचे तेच मत आहे. अशा स्वरूपाचे विधान दोन वर्षापूर्वी कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने देखील केले होते. या मध्ययुगीन काळातील विचारांना विरोध करण्यासाठी, ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच, त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले होते. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा स्त्रियांनी त्या मोर्चात वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला. आपल्याही समाजात व्यक्तीस्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक न समजलेल्या काही मूर्ख प्रसिद्धीलोलुप स्त्रियांमुळे, संस्कृती आणि अब्रू जपण्याच्या भितीने समाज सरसकट सर्वच स्त्रियांच्या पेहरावावर अंकुश ठेवू पाहतो. या बाबतीत पुरोगामी राहायचे की प्रतिगामी ह्याबाबत भारतीय समाज गोंधळलेला आहे. उदा: सानिया मिर्झाने टेनिस खेळताना शॉर्ट्स घालणेच योग्य आहे, जलद हालचालींसाठी तोच पोशाख सोयिस्कर आहे हे भारतीय मनाला एव्हाना पटले आहे. (अर्थात तिलाही मौलवींच्या टीकेला आणि विरोधाला सामोरे जावेच लागले होते) पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात पर्यटनाला आलेल्या परदेशी तरूणींनी सुटसुटीतपणा या निकषाखाली तसा पोशाख घातला तर त्यांचा हेतू ’शरीरप्रदर्शन’ असा मानला जातो. (आठवा ’अतिथी देवो भव!’च्या सरकारी जाहिराती)

मग निदान ’भारतीय पोशाखातील’ मुलींना तरी बिनधोकपणे संचार करता यायला हवा, पण ते तसेही नाही. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ बराच गाजतो आहे. त्यात एक भारतीय वेशातील तरूणी दिल्लीमधील गर्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकटी चालत जाते. नंतरच्या क्लिप मधे तीच तरूणी पाश्चात्य पोशाखात त्याच ठिकाणांवरून चालत जाते. दोन्ही केसेस मधे छुप्या कॅमेर्‍याने टिपलेल्या, तिच्याकडे बघणार्‍या नजरा, शेरेबाजी यात फारसा काही फरक नसतो. अभारतीय पोशाखामुळे स्त्रिया आपल्याकडे लक्ष वेधून घेतात आणि अत्याचाराला बळी पडतात या समजुतीला छेद देणारा हा व्हिडीओ आहे.

 मध्यंतरी एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यांना त्यांच्या इंजिनीयर मुलीसाठी एक चांगलेसे स्थळ कळले होते आणि मुलामुलीने एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा कार्यक्रम दोन दिवसावर येऊन ठेपला होता. तिचे वडील म्हणत होते, निदान त्या दिवशी तरी साडी नेस. मुलीचे म्हणणे होते, लग्न ठरले तर लग्नात पारंपरिक विधी करताना नक्की नेसेन मी साडी. एरवी मी जशी असते आणि जशी दिसते तसच त्यांनी मला स्वीकारावं, त्या प्रसंगापुरते स्वत:ला उगाच कृत्रिम रूपात दाखवणे ही उलट त्यांची फसवणूक नाही का! मग आई पुढे आली, "अगं, साडी कशी भारदस्त दिसते, भारताच्या मंगळमोहिमेतील अनेक शास्त्रज्ञ स्त्रियांचे फोटो जगभर झळकले, साडीच नेसलेली होती ना त्यांनी. तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या कितीतरी उच्चपदस्थ स्त्रिया आवर्जून साडी नेसतात." मुलगी उत्तरली, " माझा विरोध साडीला नसून साडी नेसण्याच्या सक्तीला आहे. काळानुरूप गैरसोयीचे म्हणून पुरूषांनी धोतर केव्हाच टाकून दिले. साडी तर त्याहून लांबलचक आहे. बहुसंख्य भारतीय स्त्रियांची जीवनपद्धती अतिशय कष्टाची आहे आणि त्यांच्यासाठी साडी हा पोशाख गैरसोयीचा आहे, त्या नाईलाजातून त्याची सवय करून घेतात. त्यातूनही काही स्त्रियांना असेल आवड तर त्यांनी नेसावी, पण ते त्यांनी ठरवावं, इतरांनी नव्हे." आता मात्र तिच्या आजीला राहवले नाही, त्या म्हणाल्या, "ते काहीही असलं तरी साडी हा भारतीय संस्कृतीतला सर्वात सभ्य पोशाख आहे, त्यातच बाई शोभून दिसते" यावर नात म्हणाली," आजी, पुण्यात शंभर वर्षांपूर्वी सकच्छ (कासोटा घालून नऊवारी) आणी विकच्छ (आजची पाचवारी साडी) असा वाद रंगला होता तेव्हा आज ज्या साडीला तू सभ्य वगैरे म्हणतेयस ना, तेव्हाच्या समाजाने हीच पाचवारी साडी नेसणार्‍या स्त्रियांना उच्छृंखल, कुळबुडव्या, वाया गेलेल्या वगैरे म्हटलं होतं. आता ते किती हास्यास्पद वाटतं!

कशाला सभ्य आणि कशाला अयोग्य म्हणायचं हे शेवटी काळाच्या कोणत्या तुकड्यावर उभे राहून आपण त्या गोष्टीकडे पाहतो ना यावर अवलंबून असतं." याचा अर्थ मुलींनी सर्रास तोकडे कपडे घालून फिरावे असा मुळीच नाही, तर त्या त्या परिस्थितीनुसार सोयीचा, सुखकर आणि आरामदायी पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असावे. अर्थात करियर करताना, मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, सामाजिक समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण त्या व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. मात्र पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे योग्य आहे ना, ज्या पार्श्वभूमीवर आपण तो पोशाख घातला आहे त्याने काही औचित्यभंग तर होणार नाही ना याचे भान स्त्री असो वा पुरूष दोघांनाही असायला हवे. समाजस्वास्थ्याची जबाबदारी स्त्री इतकीच पुरूषांची देखील आहे.

Friday, June 12, 2015

जनरेशन गॅप - वानप्रस्थाश्रम


’पुलं आजोबा’ हा प्रख्यात लेखक पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृती आजच्या पिढीपर्यंत पोचवणारा नवा कार्यक्रम. अलिबागला तो नुकताच पाहून आलेली मैत्रिण अगदी भारावून गेली होती. वाचनाच्या वाटेला फारसं न जाणार्‍या आजच्या पिढीला पुलंचा निखळ विनोद, त्यांनी निर्माण केलेली पात्र अनुभवता येतील याचा आनंद तिच्या शब्दांतून ओसंडत होता. आजच्या पिढीपर्यंत पोचण्याचं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होण्याचं भाग्य पुलंना लाभलं याचं श्रेय त्यांच्यातल्या दर्जेदार साहित्यिका बरोबरच त्यांच्या चिरतरूण वृत्तीलाही द्यायला हवं. पुलं आज हयात नाहीत. त्यांनी १९७९ साली त्यांच्या एका स्नेह्याला स्वत:च्या एकसष्टीच्या निमित्त्याने पत्र लिहीलं होतं. ’उतारवयात देखील जगाकडे किती उत्फुल्ल मनाने पाहातं येतं’ याचीच ग्वाही हे पत्र देतं.

 कालपरत्वे शरीर कुरकुरू लागणार पण त्याचा परिणाम नात्यांवर होता कामा नये याचं भान असलेले पुलं त्या पत्रात म्हणतात, " पिको हे मस्तक.. दुखोत गुडघे...मैतरीचे धागे..जैसे थे...’ त्यांच्या मिश्कील शैलीत ते पुढे म्हणतात ,"वयाबियाचे हिशेब इतिहास संशोधकांनी ठेवावेत, आपण नव्हे. ’हल्लीची पिढी बिघडली आहे, आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही’ अशी रडगाणी काय कामाची. खरं तर हल्लीच्या मोगर्‍यालाही, आपले नाक चोंदलेले नसल्यास, कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍या इतकाच छान वास येतो. उन्हे उतरत चालली म्हणून त्यातले सोने बघणे टाळायची गरज नाही."

 अपवाद वगळता किती ज्येष्ठांना हा मोगर्‍याचा सुवास घ्यावासा वाटतो! उन्हातले सोने शोधण्याची नजर असते! आपण चार पावसाळे जास्त पाहिलेत एवढ्या भांडवलावर आजच्या पिढीला नाके मुरडण्यातच कित्येकांचा वेळ वाया जातो. अनुभवाची व्याप्ती कालसापेक्ष असली तरी त्याची खोली व्यक्तीसापेक्ष असते हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही. “आमच्या काळात नव्हती ही थेरं” हा अनेकांचा परवलीचा शब्द असतो. आज जगण्याचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. प्रत्येक पिढीची एक आगळीवेगळी लय असते. ती ज्येष्ठांनी समजून घ्यायला हवी. प्रत्येक पिढीची एक बंडखोरी असते. ती उमजायला हवी. खरं तर आजच्या पिढीला स्मार्टफोनचे जितके आकर्षण आहे तितकेच त्या पिढीला रेडिओचे होते.

सैगलचा ’देवदास’ पाहिलेली पिढी दिलीपकुमारच्या ’देवदास’ला नावे ठेवत होती. दिलीपकुमारचा ’देवदास’ पाहिलेली पिढी मधली पिढी शाहरूख खानच्या ’देवदास’कडे पाहून डोक्याला हात लावते. त्यापुढची पिढी अभय देओल च्या ’देव डी’ च्या माध्यमातून देवदासचे आधुनिक रूप पाहते. बदलत्या काळानुसार प्रत्येक पिढीची आस्वादक्षमता आणि योग्य, अयोग्य हे निकष बदलत जातात. आजच्या तरूणाईची वेगवान जीवनशैली आणि मागच्या पिढीचे काहीसे संथ आयुष्य काही सामाईकता राहत नाही आणि पिढीमधील अंतराचे पीळ वाढत जातात. यावर उपाय म्हणजे या अंतराची अपरिहार्यता समजून घेणे आणि काळानुसार स्वत:ला बदलवणे. मात्र हे सोपे नसते. निवृत्त झाल्यावर देखील अनेक ज्येष्ठांच्या डोक्यातून पदाचा रूबाब जात नाही. मग ते घरच्या ज्युनिअर मंडळींना हुकूम सोडू लागतात. कित्येक ज्येष्ट स्त्रियांना स्वयंपाकघराचा ताबा सोडवत नाही. हात पूजेत पण मन मात्र संसारातच गुंतलेलं असतं. राजकारणा सारख्या क्षेत्रात तर निवृत्तीचे अधिकृत वय नाही. त्यामुळे कितीतरी जुनी खोडे तरूण कार्यर्त्यांना संधी द्यायला अजिबात तयार नसतात. कित्येक संस्थांचे प्रमुख वयोवृद्ध झाले तरी संस्थेवरची आपली पकड आणि पद सोडायला तयार नसतात, नवीन पिढीच्या वेगाशी जुळवून तर घेता येत नसते. मग संस्था डबघाईला जाऊ लागतात. अशा ज्येष्ठांचे खरे तर हसे होत असते. ’कुठे थांबावे’ हे आजच्या पिढीला कळत नाहीये असा आरोप करताना ते जुन्या पिढीला तरी नीटसे कळले का याचा त्यांनी विचार करावा.

या ’थांब्या’ बद्दल पांडुरंगशास्त्री आठवले म्हणत, "परिवार आणि समाजाचा 'सांधा' म्हणजे वानप्रस्थाश्रम. ' वन ' शब्दाचा अर्थ आहे ' वन्यते सेव्यते इति वनम्। ' वृक्षांचे वन असते. वृक्ष सेवेची दीक्षा देतो. वृक्ष शिकवतो की स्वत: मोठे व्हायचे असते आणि दुसऱ्यासाठी पण काम करायचे असते. माझे अस्तित्वसुद्धा दुसऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वृक्ष स्वत: मोठा होतो, व्यापक होतो आणि नंतर नि:स्वार्थ भावाने लोकांना छाया देतो, फळे देतो. केवळ शांती नव्हे विश्वशांती देतो म्हणून वृक्ष हा सेवेचा आदर्श आहे. वृक्षाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणसाने वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे." या संदर्भात इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे उदाहरण आठवल्याशिवाय राहत नाही. आयटी सर्व्हिसेसमधली, आज जगात पंधराव्या क्रमांकावर असलेली कंपनी स्वकर्तृत्त्वावर उभी करणार्‍या मूर्ती यांनी विशाल सिक्का यांच्या नेतृत्त्वाखाली एक उत्तम टीम तयार केली. गतवर्षी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, सारा मानमरातब सोडून, सारी सूत्रे नव्या टीमच्या हाती सोपवली. इन्फोसिस फाऊंडेशनचे काम बघणार्‍या, सेवाभावी वृत्तीच्या ’सुधा’ या पत्नीसह नातींच्या सहवासात मूर्ती रमले आहेत. भारतीय संस्कृतीतील वानप्रस्थाश्रमाची व्याख्या आज खर्‍या अर्थाने जगत आहेत.

असे घडते तेव्हा
 ’पाव सुखे हुए पत्तो पे अदब से रखना.. धूप में मांगी थी तुमने पनाह इनसे कभी..’
 ही जाणीव अशा ज्येष्टांबाबत नवीन पिढीमधे सहज रूजते. त्यांना सन्मान मागावा लागत नाही, आपसूकच मिळतो.