Saturday, December 27, 2014

उंची (भावानुवाद)


उंची


(भारतरत्न अटलबिहरी वाजपेयी यांच्या ’ऊँचाई’ या हिंदी कवितेच्या भावानुवादाचा माझा प्रयत्न)

उंच सुळक्यांवर, अत्युच्च्य शिखरांवर
झाडं उगवत नाहीत.. डोलत नाहीत..इवली तृणपाती
त्यावर साचतात फक्त हिमकणांचे थर....
प्रेतावर घातलेल्या चादरीसारखे पांढरेफेक आणि मृत्युसमान थंडगार...
अन पायथ्याशी वाहणार्‍या अवखळ नदीत वितळत जातात ते
तिच्या अनावर अश्रूंचे थेंब होऊन ...

अशा उंचीच अपार कौतुक वाटतं..
जेव्हा तिच्या नुसत्या स्पर्शाने ..
पाण्याचा गोठून हिमनग होतो..
जिच्या भव्य दर्शनाने वाटू लागते..खुजे..अधिकच खुजे
जिला सर करण्याचे आव्हान गिर्यारोहकांना पेलावेसे वाटते...
निधड्या छातीने ..
जेव्हा रोवले जातात विजयाचे ध्वज..
पण.. इतक्या जीवघेण्या उंचीवर ..
एखादी चिमुकली चिमणी.. नाही बांधू शकत घरटं..
घटकाभर विसावा देखील घेऊ शकत नाही.. कुणी पांथस्थ

हेच सत्य आहे ..केवळ उंची पुरेशी नाही..
सर्वांपासून निर्दयतेने तोडून एकाकी करणारी..
आपल्याच जीवाभावाच्या लोकांपासून अलिप्त व्हायला लावणारी..
उंची म्हणजे पर्वतशिखराचा गौरव नव्हे..
ते आहे त्याचे विषण्ण करणारे प्राक्तन ..त्याचा निरूपाय..

जमीन अस्मानचे अंतर आहे..खोली आणि उंचीमधे
जो जितका उंच तितकाच एकटा..
सगळे भार स्वत:च मूकपणे पेलताना..
चेहर्‍यावरच्या खोट्या हास्यामागे..
आसवांना दडवणारा..
खरं तर उंचीबरोबरच व्हायला हवा विस्तारही....
परमोच्च स्थानावर पोचलेला माणूस
जनसामान्यातही मिसळावा..
त्याने त्यांना साथ द्यावी..आणि सहजपणे घ्यावे त्यांनाही सोबतीला....

माणसांमधे मिसळून जाणे, आठवणीत हरवून जाणे,
स्वत:लाच विसरून जाणे..
ह्यातच सामावला आहे मानवी अस्तित्वाचा अर्थ..
आणि आयुष्याचा अर्क..
धरणीमातेला खुज्या माणसांची नाही..
क्षितीजे पादाक्रांत करणार्‍यांची गरज आहे..
ज्यांनी घालावी गवसणी गगनाला..
शोधावी नवनवी नक्षत्रे.. रूजवावी प्रतिभा..
पालथ्या घालाव्या नव्या दिशा..
परंतु ती उंची इतकी नसावी..
की जाणवू नये... पायाखालची हिरवळ मखमली
टोचू नये..एखादा अलवार काटाही
जिथे उमलू नये.. एखादी कळी
जिथे नसेल वसंत ऋतुचा आल्हाद..
नसेल शिशीरातला गोड शहारा..
फक्त उरेल उंचावरचा मिट्ट काळोख
..आणि सुन्न करणारा एकटेपणा..

नको मला इतक्या अफाट उंचीच वरदान..
जिथे मी कुणाला कवेत घेऊ शकणार नाही..
अशी रूक्ष.. एकलकोंडी.. वैराण उंची..
कधीही न लाभो मला.. परमेश्वरा..!

------------------------------------------------------------------------
English version by Mohini

Height


On mountain peaks..Trees do not grow

plants do not flurish..Neither shines a lush grass

the only thing that accumulates there..is ice

like the white shroud..and chilled like .. a demise..

which melts down in the river below ..

with each drip ..over it's fate..the river cries..



Such a sublime is a matter of pride

When it's midas like touch freezes the water into a lustrous iceberg..

Such a height..

makes one spellbound ..makes one feel so inferior..

It may invite and ignite a passionate alpinist

It can be broached with victory flags...hoisting higher and higher

But.. can a tiny sparrow..build it's nest there !

can a traveller

blink a quick wink in it's shade! never..!



The truth is....

Just being tall is never enough

It ends up in a lonely emptiness....

it's an isolation from the lively surroundings

It's a feeling of getting severed from the intimates..

thus standing desolate in a void..

Height..is not an accomplishment for a huge hill..  

It's just a gloomy compulsion..



Height and depth.. live apart like the sky and soil.. 

more the height, more the loneliness

forced to haul the load on shoulders on your own

with smiling masks.. crying within


Height ..must be complimented by breadth..

The extension saves one from standing like a needle tree

rather helps one to Jowl with others

Take someone along,..

walk with Someone ..get an assistance

Getting lost in the crowd ..getting immersed in memories..

Forget oneself..

adds meaning to existence

explores aroma in the life..



The world doesn't need dwarfs

It needs tall people...always on the top of the world

for whom sky is the limit..

Those who can sow the seeds of talents ..can locate distant sparks 

with their enchanting elevation...

But not so tall...

that they won't feel the tenderness of the  grass under the feet

never get hurt by a thorn in their way..

that they don't cherish the breeze of the spring nor they watch an autumn fall

They simply reside in  the gloom at the top

and get numbed by the lonely silence in the shell of solitude..



My Lord ..

Do not grant me such haughty aloofness..

do not ever let me be so tall..

that i won't be able to bend and..

embrace another human at all....

-------------------------------------------

मूळ कविता..

ऊँचाई

ऊँचे पहाड़ पर,
पेड़ नहीं लगते,
पौधे नहीं उगते,
न घास ही जमती है।
जमती है सिर्फ बर्फ,
जो, कफन की तरह सफेद और,
मौत की तरह ठंडी होती है।
खेलती, खिल-खिलाती नदी,
जिसका रूप धारण कर,
अपने भाग्य पर बूंद-बूंद रोती है।
ऐसी ऊँचाई,
जिसका परस
पानी को पत्थर कर दे,
ऐसी ऊँचाई
जिसका दरस हीन भाव भर दे,
अभिनन्दन की अधिकारी है,
आरोहियों के लिये आमंत्रण है,
उस पर झंडे गाड़े जा सकते हैं,
किन्तु कोई गौरैया,
वहाँ नीड़ नहीं बना सकती,
ना कोई थका-मांदा बटोही,
उसकी छांव में पलभर पलक ही झपका सकता है।
सच्चाई यह है कि
केवल ऊँचाई ही काफी नहीं होती,
सबसे अलग-थलग,
परिवेश से पृथक,
अपनों से कटा-बंटा,
शून्य में अकेला खड़ा होना,
पहाड़ की महानता नहीं,
मजबूरी है।
ऊँचाई और गहराई में
आकाश-पाताल की दूरी है।
जो जितना ऊँचा,
उतना एकाकी होता है,
हर भार को स्वयं ढोता है,
चेहरे पर मुस्कानें चिपका,
मन ही मन रोता है।
जरूरी यह है कि
ऊँचाई के साथ विस्तार भी हो,
जिससे मनुष्य,
ठूंट सा खड़ा न रहे,
औरों से घुले-मिले,
किसी को साथ ले,
किसी के संग चले।
भीड़ में खो जाना,
यादों में डूब जाना,
स्वयं को भूल जाना,
अस्तित्व को अर्थ,
जीवन को सुगंध देता है।
धरती को बौनों की नहीं,
ऊँचे कद के इन्सानों की जरूरत है।
इतने ऊँचे कि आसमान छू लें,
नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें,
किन्तु इतने ऊँचे भी नहीं,
कि पाँव तले दूब ही न जमे,
कोई कांटा न चुभे,
कोई कलि न खिले। न वसंत हो, न पतझड़,
हों सिर्फ ऊँचाई का अंधड़,
मात्र अकेलापन का सन्नाटा।
मेरे प्रभु!
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
गैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।

-अटलबिहारी वाजपेयी

Thursday, June 19, 2014

वैश्विक नजर

'रोव्हर'च्या माध्यमातून मंगळावरून घेतलेले पृथ्वीचे प्रकाशचित्र वृत्तपत्रातून नुकतेच झळकले. अनेक आकाशगंगांपैकी एकीचा सूक्ष्मतम भाग असलेली पृथ्वी त्यात एखाद्या खसखशीच्या दाण्याएवढी दिसत होती. या पार्श्वभूमीवर माणसाचं अस्तित्व विश्वाच्या खिजगणतीतही नाही ही वस्तुस्थिती आहे. काळ धावतोय असे आपल्याला वाटते, खरं तर आपण धावत आहोत. काळ अनादि अनंत आहे. त्यामुळे आपली समज फक्त काही हजार वर्ष मागे आणि येत्या शेकडो वर्षांपर्यंत मर्यादित आहे. आपल्या आकलनापलिकडे असलेल्या अनेक गोष्टींच आपल्याला ज्ञान नाही.
माणसाने स्वत:चा 'अहं' अनाकलनीय असलेल्या ब्रह्मांडापेक्षा मोठा मानला आहे. त्या खसखशीच्या दाण्याकडे पाहतानाच नव्हे तर एखाद्या प्रपाताकडे, क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडे पाहतानाही हे विचार मनात येतात. याने खुजं वाटून घेण्यापेक्षा लीन व्हायला हवं. स्वत:त डोकावून पाहायला हवं.

सुरुवात धर्मापासून करुया. 'जगा आणि जगू द्या' हे सांगणारे धर्म खरं तर माणसानेच निर्माण केले, धर्माचा अर्थ 'जगण्याची एक सुगम पद्धत' असा मानला तर एकमेकांच्या पद्धतीवर आक्षेप घेण्याचं कारणच काय? परंतु धर्म व्यक्तीनिष्ठ होत गेले आणि व्यक्ती धर्मांध. देशाभिमान-धर्माभिमान ही मूल्यं नक्कीच महत्त्वाची, पण माझाच विचार योग्य, माझाच धर्म श्रेष्ठ, माझाच देव खरा, मी करेन तेच रास्त अशा अनेक पैलूंनी ह्या अहंकाराचे रूपांतर आचारविचारातल्या भ्रष्टाचारात होऊ लागले आहे. कूपमंडूक माणसांनी जातीपातीची झापडंच अजून काढली नाहीत, तर जगाकडे उघडणारी कवाडं त्यांना दिसणार तरी कशी ? एकीकडे माणसाने मंगळावर झेप घेतली, दुसरीकडे त्याचं खुजेपण वाढत चाललं आहे. या विरोधाभासाने विकल झालेल्या पृथ्वीची मनस्थिती कुसुमाग्रज नेमक्या शब्दात मांडतात..
’सूर्यमालेतील सारे ग्रह म्हणाले, 'वाहवा! हे धरे, तू धन्य झालीस निर्मुनीया मानवा'
ती वदे, 'हा मान मोठा-येथली पण संस्कृती(!)मंगळावर ते अमंगळ ना रिघावे केधवा..'

हे दुष्टचक्र भेदायचे तर जगाकडे विशाल वैश्विक नजरेतून पाहायला हवे. माणसांना आनंद देणारा धर्म हवाय, जगणं सोपं करणारा धर्म हवाय. मात्र धर्माचं स्वरूप गूढ आणि कर्मठ असंच राहिलं आहे. मानवाचा माणूस व्हावा हेच धर्माचे उद्दिष्ट असायला हवे. 'येक नाना प्रतिमा। दुसरा अवतार महिमा। तिसरा तो अंतरात्मा। चौथा तो निर्विकारी।' ईश्वर या संकल्पनेबद्दल समर्थांनी सांगितलेल्या आकलनाच्या या पायऱ्या चढता चढता माणसाला ही वैश्विक दृष्टी मिळू शकेल. ती मिळाली तर धर्मग्रंथातील उपदेश आणि आचरण यातली दरी कमी होऊ शकेल.
अध्यात्म जीवनोपयोगी नसेल, तर पुलं थेट म्हणतात, 'शस्त्रक्रियेच्या वेदना कमी करणारा, हुंगरी (अॅनेस्थेशिया)चा शोध हा मला कुठल्याही अध्यात्मिक सूत्रांपेक्षा श्रेष्ठ वाटतो.'

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल, त्याला सगुण पूजावे की निर्गुण 'जाणावे', यावर वितंडवाद घालण्याऐवजी जगातील सर्वोत्तम मूल्यांचा समुच्चय म्हणजेच 'ईश्वर' असे मानले तर? 'लिव्ह धीस प्लॅनेट बेटर दॅन यू फाऊंड इट' असे एका उद्योगसमूहाचे घोषवाक्य आहे. प्रत्येकाने किमान एवढा प्रयत्न केला तरी 'विश्वस्वधर्म सूर्ये पाहो' म्हणत, समाजाची उपेक्षा पचवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनी शतकांपूर्वीच मागितलेले 'विश्वकल्याणाचे' पसायदान साकार होऊ शकेल.



(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)


यशस्वी नात्याचे आधारस्तंभ...


नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया. नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे. जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, 'टु बी इज टु बी रिलेटेड अँड टु बी रिलेटेड इज टु बी इन कॉन्फ्लीक्ट.' दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच. मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं; कारण ते निरपेक्ष नसतं.
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं. सगळं अनुकूल असेल तरच ते टिकून राहतं. अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही.

ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच; माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं. 'त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.'
निरीश्वरवादीदेखील चराचराशी नातं जोडतात. ईश्वर मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात. हे नातं निरपेक्ष असतं. कदाचित म्हणूनच या नात्याची असोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो. या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो. या नात्याला अनेक पदर असू शकतात. जगाच्या पसाऱ्यात आपण कुठेही हरवलो, तरी ज्या भूमीशी आपली नाळ जुळलेली असते तिची ओढ तशीच राहते, त्याला आपण माझं गाव, माझा देश अशी नावं देतो.
संतांना 'वृक्षवल्ली सोयरी' वाटू लागते. 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' भासू लागते. कितीतरी माणसं निसर्गाशी नातं जोडतात. एखाद्या रोपाचं रूजणं, फुलणं, तारकांनी खच्चून भरलेलं आकाश, वाऱ्याची झुळूक, खळाळत वाहणारं पाणी, यात कित्येकजण रमतात. कुणी विज्ञानातल्या कुतूहलांची उकल करण्याच्या पाशात स्वेच्छेने अडकतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही... साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' असा तो अनोखा, अनामिक बंध असतो. या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं; कारण यामागे अपार श्रद्धा असते. या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.

माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा आणि आश्वासक स्पर्श हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात. नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का? हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव. तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो. वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो. मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो. अवघं जगणं सुंदर होतं. आरती प्रभूंच्या शब्दात दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो.
 'अशी पांखरून छाया, लावोनिया माया। आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.'

महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख