आजोळचं / मामाचं घर. मधल्या जिन्याने विभागलेली खाली वर मामांची दोन दोन घरं. आम्ही सात मावसभावंडं दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जमत असू. मी तर पडीकच असे. सर्व मोठी भावंडं बराचसा वेळ वरच्या कौलारू माळ्याखाली नाकाला पुस्तक लावून सतत वाचत असत. अधूनमधून सखाराम महाराज यात्रेला जाणे, कोयी चोखत आमरस खाणे, पॉट आणून आईस्क्रीम करणे, एकमेकांच्या पाठी जाऊन बर्फाचे खडे सोडणे, नदी का पहाड , अभ्र्यात पत्ते लपवून नाटेठोम (जे नॉट अॅट होम आहे हे दशकानंतर कळलं) झब्बू वगैरे खेळणे हे उद्योग चालत. मी सर्वात लहान त्यामुळे कच्चा लिंबू. मामाच्या मांडीवर बसून त्याने दिलेला पत्ता बदामसातच्या मोठ्या गोलाच्या मध्यभागी नेऊन टाकणे अशी कामं मला तेव्हा फार मह्त्वाची वाटत असत. एका सुट्टीत बसेरा का कोणत्या तरी सिनेमाला मला टाकून सगळे गेले, हे दु:ख बरेच दिवस माझ्या चिमुकल्या जीवनाला व्यापून उरलं होतं. गुणाची मोठी भावंडं सग्गळं खात असल्याने शिस्त म्हणून वांग्याची भाजी वगैरे मलाही साश्रूनयनांनी खावी लागे अशी काही उप दु:खही होती.
मामा, रोहिणीताई आणि जिजाजींनी अंदमान सहल शब्दामृतसह केली होती आणि त्यांचा अनुभव खूप चांगला होता. सगळ्यांच्या व्यापांमधून हो नाही करता करता चक्क शब्दामृतच्या जानेवारी २०२५ च्या ट्रीपबाबत (ज्याला मामा आधी यात्रा म्हणत असे) एकमत झालं. मामाची नातवंड लहान असल्याने अमू, अश्विनी आणि त्यांच्या जोडीदारांना आग्रह करू शकलो नाही. रोहिणीताईच्या आग्रहामुळे दादा व भाच्यांच्या आग्रहामुळे मामी तयार झाली. मामीशी तर इतक्या वाटाघाटी केल्या की तिला ’कशाचीही जबरदस्ती कोणीही करणार नाही’ असं फक्त स्टँपपेपरवर लिहून द्यायचं बाकी होतं. भाग्यश्री अचानक नाही म्हणेल अशी भीती होती. तिने एकदा ’नाही’ ठरवलं की सलमानसारखी वो अपने आप की भी नही सुनती. मग पराग किंवा ब्रह्मदेवही काही करू शकत नाहीत. खरं तर मावशी, मिलींद, राजश्रीताई आणि भाग्यश्रीची याच रूटची अर्धी सहल नुकतीच झालेली होती पण तरीही त्यांनी आमच्यासाठी ’मिशन एकत्र जाणे’ याला महत्व दिलं.
त्यांचं नैमिषारण्य आणि अयोध्या बाकी होतं. विमान,रेल्वे सोयीच्या वेळा, भाडी इ. खल सुरु झाला. अयोध्येपासून नैमिषारण्य अडीचशे किमी अंतरावर असल्याने तिथून येऊन संध्याकाळी परतीची गाडी पकडणं दादाला अवघड वाटलं. मी कंपनीच्या कार्यालयात फोन केला तर तिथल्या अनामिकाने नैमिषारण्य २५ च किमी अंतरावर असल्याचं ठासून सांगितलं. त्याच्या आत्मविश्वासाने दिपून जाऊन फोन ठेवला. दरम्यान मिलींदने अंतर २५० किमी असल्याची खात्री केली होती. मिलींद आमच्यासाठी गुगलचाही काका. त्यामुळे पुढच्या फोनवर हे सांगताच त्या विक्रमाने आपला हट्ट न सोडता एक दीर्घ श्वास घेऊन दोन नैमिषारण्य असून, एक २५ व दुसरे २५० किमीवर असल्याचा थक्क करणारा दावा केला. ऑईंग. आपला भूगोल बरा नशीन असं वाटून गुगल केलं तर दोन नैमिषारण्य कुठे दिसेनात. आता कंपनीच्या कुवतीवर शंका येऊन मला आपण त्यांनाच नीट माहित नसलेल्या किर्र नैमिषारण्यात पेट्रोल संपून अडकून पडलो आहोत असं वाटू लागलं. पहिले दहाहजार भरल्याने परतीचे दोर कापले गेले होते. पुढे जशी जायची तारीख जवळ आली तसं हे नैमिषारण्यच सहलीतून कटाप झालं, त्याची जागा खरोखरच जवळ असलेल्या सारनाथने घेतली. ना रहा बास ना बजी बाँसुरी, पण मंगला मावशी आणि तिच्या मुलांची आता २/३ यात्रा आमच्यापायी रिपीट होणार होती याचं शल्य वाटलं.
दरम्यान आमच्या या चर्चांनी प्रेरित होऊन ध्यानीमनी नसताना माझे दीर जाऊ, त्यांचे व्याही, माझे सासू सासरे, चुलतसासरे भुर्र्कन विमानाने जाऊन ही सेम ट्रीप चटदिशी करून आले सुद्धा. मला ज्याची स्टोरी त्यांना रंगवून सांगायची होती तो सिनेमा माझ्या आधीच्या शो ला पाहून टाकला, असं कुठे असतंय का! दादाला (दीर) जगात कुठेही एक तरी ओळखीचा माणूस सापडतो तसा बनारस की अयोध्येला सापडला आणि त्याने त्यांना वाहनाची सोय करून दिली. सासूबाई खरेदी शौकीन आणि दादाचे व्याही टेक्स्टाईल मधले दिग्गज. त्यांनी सासूबाईंना "ही एकही साडी या किमतीच्या लायक नाही, ओरिजीनल बनारसी घ्यायच्या तर लाखाच्या आहेत, घेता का त्या!" म्हणत त्यांचा मनसुबा हाणून पाडला. ’ये जीना भी कोई जीना है !’ म्हणत रिकाम्या हाती चुळबुळत परतल्याची ही सासूबाईंची एकमेव ट्रीप असेल.आता शब्दामृतचे ग्रुप तयार झाले. त्यावर काही सिनीयर सिटीझन व्हॉट्सअॅप व्हॉट्सअॅप खेळू लागले. जे प्रवाससूचीत दिलं आहे तेच नव्याने विचारू लागले. आपलं विमान उशीरा पोचणार असल्याचं एका काकूंनी नऊ वेळा इंग्र्जीत सांगितलं. मला वैदेहीच्या शाळेतलं ’इन द वारी ऑफ लॉर्ड विठ्ठ्ला द डीव्होटीज प्ले फुगडीज अॅंड डान्स ऑन पावली कॅरींग बेसिल वृंदावना ऑन हेड्स’ ऐकताना वाटलं तसं काहीतरी फीलींग आलं. कुंभमेळ्याच्या तयारीमुळे अयोध्येहून सुटणार्या परतीच्या गाड्या सुलतानपूरहून सुटणार होत्या. यामुळे एक ईश्वरकाका हवालदिल झाले होते. खरं तर ती माझीही समस्या होती पण तेव्हा तरी त्यावर उपाय नव्हता. कुणी कोणता खाऊ न्यायचा ही चर्चा आमच्यासाठी अधिक मह्त्वाची होती. शेवटी तो खाऊ एकमेकांना गिफ्ट देऊन संपवावा लागला ते वेगळं. तर अखेर ३ महिने चर्चा, गप्पा, हा हा ही ही केल्यावर तो दिवस उगवला.
सर्वात आधी रेल्वेवाली मंडळी म्हणजे ग्वाल्हेर(डबरा) वाले जिजाजी आणि ताई, बडोद्याहून दादा आणि भुसावळमार्गे मी, पोचलो. सुसाट धावणार्या गाड्या काशीपाशी येताच अडून बसल्या. डुगुडुगु करीत पोचल्या, तिकडे पुणेकर पण मुंबईमार्गे उडाले होते. अल्युमनी यात्रेकरू म्हणून मामाची वट असल्याने आम्हा १२ जणांना सगळीकडे जवळच्या रूम्स आणि स्वतंत्र टेम्पो ट्रॅव्हलर ९७११ मिळाली होती. त्यामुळे आम्ही हवं तेव्हा तळ्यात येऊन खाजगी ट्रीप आणि हवं तेव्हा मळ्यात जाऊन पब्लीक ट्रीपची मजा घेऊ शकत होतो.
काशी, बनारस , कँट आणि वाराणसी जंकशन अशी वेगवेगळी रेल्वे स्टेशन्स असतात हे नवं ज्ञान आम्हाला नुकतच प्राप्त झालं असलं तरी चालकांना नसावं. आमचं होटेल इथून (दोन्ही नैमिषारण्याइतकं) लांब नसल्याने मी निर्धास्त होते पण आम्हाला घ्यायला नेमकं कुठे यायचं याबद्दल चालकांचा घोळ होता. रोहिणीताई तर बनारस स्थानकावर उतरून उभी तरी चालकाचं म्हणणं ’वो वाराणसी जंक्शनही है’. अखेर तिथल्या कँटीनवाल्याचे साक्षीपुरावे केल्यावर तो एकदाचा स्टेशन शोधत त्यांना घ्यायला गेला. ईश्वरकाकांनी मला फेसबुकवर हेरून ठेवल्याने भुसावळला बरोबर शोधून काढले आणि पुढेही ते एकटे असल्याने आमच्या ग्रुपला बर्यापैकी चिकटून होते. आमचा चालक आणि मी वाराणसी जंक्शनच्या बाहेर खुणेच्या मारूतीच्या देवळापाशी एकमेकांशेजारी बसूनच एकमेकांना फोन करत शोधत होतो. मग दोघांनी हॅ हॅ हॅ केलं. आमची बहुप्रतीक्षित (बनारस । सारनाथ । प्रयागराज । अयोध्या ) वजा (मायनस) - नैमिषारण्य ट्रीप अखेर सुरु झाली होती.
Click here for बनारस | तीर्थराज प्रयाग | सारनाथ