Monday, December 30, 2024

नमामि गंगे

आजोळचं / मामाचं घर. मधल्या जिन्याने विभागलेली खाली वर मामांची दोन दोन घरं. आम्ही सात मावसभावंडं दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे जमत असू. मी तर पडीकच असे. सर्व मोठी भावंडं बराचसा वेळ वरच्या कौलारू माळ्याखाली नाकाला पुस्तक लावून सतत वाचत असत. अधूनमधून सखाराम महाराज यात्रेला जाणे, कोयी चोखत आमरस खाणे, पॉट आणून आईस्क्रीम करणे, एकमेकांच्या पाठी जाऊन बर्फाचे खडे सोडणे, नदी का पहाड , अभ्र्यात पत्ते लपवून नाटेठोम (जे नॉट अ‍ॅट होम आहे हे दशकानंतर कळलं) झब्बू वगैरे खेळणे हे उद्योग चालत. मी सर्वात लहान त्यामुळे कच्चा लिंबू. मामाच्या मांडीवर बसून त्याने दिलेला पत्ता बदामसातच्या मोठ्या गोलाच्या मध्यभागी नेऊन टाकणे अशी कामं मला तेव्हा फार मह्त्वाची वाटत असत. एका सुट्टीत बसेरा का कोणत्या तरी सिनेमाला मला टाकून सगळे गेले, हे दु:ख बरेच दिवस माझ्या चिमुकल्या जीवनाला व्यापून उरलं होतं. गुणाची मोठी भावंडं सग्गळं खात असल्याने शिस्त म्हणून वांग्याची भाजी वगैरे मलाही साश्रूनयनांनी खावी लागे अशी काही उप दु:खही होती. 

आजीला दया येऊन मला कधी कधी थोडा गुळंबा वगैरे मिळे. लाडही होत. तव्यावर वाळू घालून रव्याचा केक वगैरे आजी भन्नाट करायचीच पण मामी आल्यावर तिच्या हातचे पदार्थ हे ही एक आकर्षण मामाकडे जाण्याशी जोडलं गेलं. आजीच्या गॅस पेटवायच्या पोस्ट कार्डच्या पट्ट्या, रद्दी पेपरचे चिवडा खायला कापून ठेवलेले चौकोन, लाडवाचा पितळी गोल डबा अशा वस्तूंबरोबर मागच्या लाकडी जिन्याच्या पायर्‍यांवर उन्ह खात विहीरीकडे पाहत काहीच न करता घालवलेल्या दुपार याही आठवणींच्या सांदीकोपर्‍यात कुठेतरी आहेत.  

प्रत्येकाच्या दहावी-बारावीनंतर एक एक जण गळत जाऊन सुट्टीत जमणार्‍या भावंडांची संख्या रोडावू लागली. सगळे कामाधंद्याला लागले. शिरस्त्याप्रमाणे पुण्यात राहू लागले. लग्नकार्याला जमू लागले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बोलू लागले पण उन्हाळी सुट्टीतलं एकत्र जमणं बंदच झालं. आपण सगळे एकत्र कुठे तरी जाऊया अशी चर्चा सुरु राहिली आणि अखेर एकदाचा तो अमृतयोग खरं तर शब्दामृतयोग आला. 

मामा, रोहिणीताई आणि जिजाजींनी अंदमान सहल शब्दामृतसह केली होती आणि त्यांचा अनुभव खूप चांगला होता. सगळ्यांच्या व्यापांमधून हो नाही करता करता चक्क शब्दामृतच्या जानेवारी २०२५ च्या ट्रीपबाबत (ज्याला मामा आधी यात्रा म्हणत असे) एकमत झालं. मामाची नातवंड लहान असल्याने अमू, अश्विनी आणि त्यांच्या जोडीदारांना आग्रह करू शकलो नाही. रोहिणीताईच्या आग्रहामुळे दादा व भाच्यांच्या आग्रहामुळे मामी तयार झाली. मामीशी तर इतक्या वाटाघाटी केल्या की तिला ’कशाचीही जबरदस्ती कोणीही करणार नाही’ असं फक्त स्टँपपेपरवर लिहून द्यायचं बाकी होतं. भाग्यश्री अचानक नाही म्हणेल अशी भीती होती. तिने एकदा ’नाही’ ठरवलं की सलमानसारखी वो अपने आप की भी नही सुनती. मग पराग किंवा ब्रह्मदेवही काही करू शकत नाहीत. खरं तर मावशी, मिलींद, राजश्रीताई आणि भाग्यश्रीची याच रूटची अर्धी सहल नुकतीच झालेली होती पण तरीही त्यांनी आमच्यासाठी ’मिशन एकत्र जाणे’ याला महत्व दिलं. 

त्यांचं नैमिषारण्य आणि अयोध्या बाकी होतं. विमान,रेल्वे सोयीच्या वेळा, भाडी इ. खल सुरु झाला. अयोध्येपासून नैमिषारण्य अडीचशे किमी अंतरावर असल्याने तिथून येऊन संध्याकाळी परतीची गाडी पकडणं दादाला अवघड वाटलं. मी कंपनीच्या कार्यालयात फोन केला तर तिथल्या अनामिकाने नैमिषारण्य २५ च किमी अंतरावर असल्याचं ठासून सांगितलं. त्याच्या आत्मविश्वासाने दिपून जाऊन फोन ठेवला. दरम्यान मिलींदने अंतर २५० किमी असल्याची खात्री केली होती. मिलींद आमच्यासाठी गुगलचाही काका. त्यामुळे पुढच्या फोनवर हे सांगताच त्या विक्रमाने आपला हट्ट न सोडता एक दीर्घ श्वास घेऊन दोन नैमिषारण्य असून, एक २५ व दुसरे २५० किमीवर असल्याचा थक्क करणारा दावा केला. ऑईंग. आपला भूगोल बरा नशीन असं वाटून गुगल केलं तर दोन नैमिषारण्य कुठे दिसेनात. आता कंपनीच्या कुवतीवर शंका येऊन मला आपण त्यांनाच नीट माहित नसलेल्या किर्र नैमिषारण्यात पेट्रोल संपून अडकून पडलो आहोत असं वाटू लागलं. पहिले दहाहजार भरल्याने परतीचे दोर कापले गेले होते. पुढे जशी जायची तारीख जवळ आली तसं हे नैमिषारण्यच सहलीतून कटाप झालं, त्याची जागा खरोखरच जवळ असलेल्या सारनाथने घेतली. ना रहा बास ना बजी बाँसुरी, पण मंगला मावशी आणि तिच्या मुलांची आता २/३ यात्रा आमच्यापायी रिपीट होणार होती याचं शल्य वाटलं. 

दरम्यान आमच्या या चर्चांनी प्रेरित होऊन ध्यानीमनी नसताना माझे दीर जाऊ, त्यांचे व्याही, माझे सासू सासरे, चुलतसासरे भुर्र्कन विमानाने जाऊन ही सेम ट्रीप चटदिशी करून आले सुद्धा. मला ज्याची स्टोरी त्यांना रंगवून सांगायची होती तो सिनेमा माझ्या आधीच्या शो ला पाहून टाकला, असं कुठे असतंय का! दादाला (दीर) जगात कुठेही एक तरी ओळखीचा माणूस सापडतो तसा बनारस की अयोध्येला सापडला आणि त्याने त्यांना वाहनाची सोय करून दिली. सासूबाई खरेदी शौकीन आणि दादाचे व्याही टेक्स्टाईल मधले दिग्गज. त्यांनी सासूबाईंना "ही एकही साडी या किमतीच्या लायक नाही, ओरिजीनल बनारसी घ्यायच्या तर लाखाच्या आहेत, घेता का त्या!" म्हणत त्यांचा मनसुबा हाणून पाडला. ’ये जीना भी कोई जीना है !’ म्हणत रिकाम्या हाती चुळबुळत परतल्याची ही सासूबाईंची एकमेव ट्रीप असेल.

आता शब्दामृतचे ग्रुप तयार झाले. त्यावर काही सिनीयर सिटीझन व्हॉट्सअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप खेळू लागले. जे प्रवाससूचीत दिलं आहे तेच नव्याने विचारू लागले. आपलं विमान उशीरा पोचणार असल्याचं एका काकूंनी नऊ वेळा इंग्र्जीत सांगितलं. मला वैदेहीच्या शाळेतलं ’इन द वारी ऑफ लॉर्ड विठ्ठ्ला द डीव्होटीज प्ले फुगडीज अ‍ॅंड डान्स ऑन पावली कॅरींग बेसिल वृंदावना ऑन हेड्स’ ऐकताना वाटलं तसं काहीतरी फीलींग आलं. कुंभमेळ्याच्या तयारीमुळे अयोध्येहून सुटणार्‍या परतीच्या गाड्या सुलतानपूरहून सुटणार होत्या. यामुळे एक ईश्वरकाका हवालदिल झाले होते. खरं तर ती माझीही समस्या होती पण तेव्हा तरी त्यावर उपाय नव्हता. कुणी कोणता खाऊ न्यायचा ही चर्चा आमच्यासाठी अधिक मह्त्वाची होती. शेवटी तो खाऊ एकमेकांना गिफ्ट देऊन संपवावा लागला ते वेगळं. तर अखेर ३ महिने चर्चा, गप्पा, हा हा ही ही केल्यावर तो दिवस उगवला. 

सर्वात आधी रेल्वेवाली मंडळी म्हणजे ग्वाल्हेर(डबरा) वाले जिजाजी आणि ताई, बडोद्याहून दादा आणि भुसावळमार्गे मी, पोचलो. सुसाट धावणार्‍या गाड्या काशीपाशी येताच अडून बसल्या. डुगुडुगु करीत पोचल्या, तिकडे पुणेकर पण मुंबईमार्गे उडाले होते. अल्युमनी यात्रेकरू म्हणून मामाची वट असल्याने आम्हा १२ जणांना सगळीकडे जवळच्या रूम्स आणि स्वतंत्र टेम्पो ट्रॅव्हलर ९७११ मिळाली होती. त्यामुळे आम्ही हवं तेव्हा तळ्यात येऊन खाजगी ट्रीप आणि हवं तेव्हा मळ्यात जाऊन पब्लीक ट्रीपची मजा घेऊ शकत होतो.  


काशी, बनारस , कँट आणि वाराणसी जंकशन अशी वेगवेगळी रेल्वे स्टेशन्स असतात हे नवं ज्ञान आम्हाला नुकतच प्राप्त झालं असलं तरी चालकांना नसावं. आमचं होटेल इथून (दोन्ही नैमिषारण्याइतकं) लांब नसल्याने मी निर्धास्त होते पण आम्हाला घ्यायला नेमकं कुठे यायचं याबद्दल चालकांचा घोळ होता. रोहिणीताई तर बनारस स्थानकावर उतरून उभी तरी चालकाचं म्हणणं ’वो वाराणसी जंक्शनही है’. अखेर तिथल्या कँटीनवाल्याचे साक्षीपुरावे केल्यावर तो एकदाचा स्टेशन शोधत त्यांना घ्यायला गेला. ईश्वरकाकांनी मला फेसबुकवर हेरून ठेवल्याने भुसावळला बरोबर शोधून काढले आणि पुढेही ते एकटे असल्याने आमच्या ग्रुपला बर्‍यापैकी चिकटून होते. आमचा चालक आणि मी वाराणसी जंक्शनच्या बाहेर खुणेच्या मारूतीच्या देवळापाशी एकमेकांशेजारी बसूनच एकमेकांना फोन करत शोधत होतो. मग दोघांनी हॅ हॅ हॅ केलं. आमची बहुप्रतीक्षित (बनारस । सारनाथ । प्रयागराज । अयोध्या ) वजा (मायनस) - नैमिषारण्य ट्रीप अखेर सुरु झाली होती. 

Click here for   बनारस  |  तीर्थराज प्रयाग  |  सारनाथ


Thursday, August 1, 2024

पंचायत - निखळ देशी करमणूक

तांत्रिक सफाई असलेले सुस्पष्ट पण बटबटीत चित्रण, खणखणीत अभिनय पण वास्तव दाखविण्याच्या नावाखाली शिव्या पेरलेले रासवट संवाद, उत्तम कथानक पण त्यात कामुक दृश्यांचा भडिमार. हा आहे हल्लीच्या ओटीटीवरील वेबमालिकांचा ल.सा.वि. 
"पोहण्याच्या तलावावर बिकीनी नाही घालायची तर काय साडी नेसायची का?" असा अगदी तर्कसंगत प्रश्न विचारणार्‍या तथाकथित बोल्ड नायिका त्या प्रसंगात पोहण्याचा तलाव मुदलात आवश्यक होता का हे मात्र विचारत नाहीत. ’मागणी तसा पुरवठा’ म्हणत भारतीय प्रेक्षकांची अभिरूची अधिक सुमार करण्याला ही सगळी मंडळी हातभार लावत आहेत. स्वघोषित पुरोगामी मंडळी ’वास्तव बिस्तव- कला बिला- अभिव्यक्ती-फलाणा’ वगैरे झेंडे घेऊन याची भलावण करत आहेत.

या सार्‍यांना सणसणीत चपराक लगावली आहे ती ’पंचायत’ या अमेझॉन प्राईमवरील वेबमालिकेने. वरच्या यादीतील कोणतेही मसाले नसूनही अतिशय रूचकर लागणार्‍या या पाककृतीला ओटीटीवरील सर्व स्तरातल्या प्रेक्षकांनी एकमुखाने पसंतीची पावती दिली आहे. काय वेगळेपण आहे या मालिकेचं! यात कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण नाही, चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आहे. कोणताही चकचकाट, अश्लीलतेचा आधार न घेताही नर्मविनोदी संवाद, बांधीव पटकथा, समयोचित पार्श्वसंगीत, पारदर्शक पात्रं आणि मातीचा गंध असलेला अस्सल उत्तर भारतीय  ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे ही मालिका. सतत काहीतरी हॅपनींग पाहण्याची, ट्वीस्ट आणि धक्के बसायला हवेत अशी अपेक्षा असणार्‍या बेचैन वृत्तीच्या प्रेक्षकांनी मात्र या मालिकेच्या वाटेला जाऊ नये. पडद्यावरचा सुकून अनुभवायला तो आधी मनातही हवा तरच या मालिकेशी तार जुळते.

उपदेशाचा कोणताही आव न आणता प्रेक्षकाला मूक करण्याची, आत्मपरिक्षण करायला भाग पाडणारी अनोखी दिग्दर्शकीय शैली हे ’टीव्हीएफ’चं वैशिष्ट्य इथेही आहे. या मालिकेचे तीनही सीझन लोकप्रिय ठरले आहेत. कुटुंबासह बसून मजेत पाहू शकू असं काही ओटीटीवर दुर्मिळ होत असताना "पंचायत" किंवा "गुल्लक" सारख्या मालिका सुखद झुळूक होऊन येतात. 

’पंचायत’ ची कथा अभिषेक त्रिपाठी (जितेंद्रकुमार) नावाच्या शहरी तरूणाभोवती फिरत असली तरी तो नायक नाही. यातील इतर पात्रं कथेत तितक्याच ताकदीने उभी आहेत. 

अभिषेकला अभियंता झाल्यावर अपेक्षित पॅकेजची नोकरी मिळत नाही. चांगल्या कॉलेजमधून एम.बी.ए करून मनासारखी नोकरी मिळवायची हे त्याचं स्वप्न असतं. प्रवेशपरिक्षेचा अभ्यास करताना रिकामं बसण्यापेक्षा हातात आलेली ग्रामपंचायत सचिवाची जेमतेम वीस हजाराची नोकरी स्वीकारून अभिषेक ’फुलेरा’ या खेडेगावात येतो. नाईलाजाने पदरी पडलेला तो गाव, तिथला हातपंप, पाण्याची टाकी, तिथले लोकांचे नमुने हळूहळू त्याला आपले वाटू लागतात.

गावची प्रधान मंजुदेवी (नीना गुप्ता), प्रत्यक्षात तिच्या ऐवजी कारभार सांभाळणारा तिचा प्रधानजी नवरा (रघुबीर यादव), उपप्रधान प्रल्हाद (फैसल मलिक), सहसचिव (चंदन रॉय) व  विधायक (पंकज झा) सारख्या दमदार कलाकारांनी आपापल्या भूमिकेत बहार उडवून दिली आहे. स्टँड-अप कॉमेडीने हल्ली बोचरा विनोद लोकप्रिय केला आहे पण यातला अंगभूत विनोद गावकर्‍यांसारखाच निर्मळ आहे. पिझ्झा टॉपींगसारखा पेरलेला नाही. काही समीक्षक त्याला "डंब अँड डंबर" ची सौम्य किंवा वास्तववादी आवृत्ती म्हणतात. "पंचायत" हा लाइफ कॉमेडीचा एक भाग आहे, उत्तर प्रदेशात (खरं तर मध्यप्रदेश, बिहार, किंवा उत्तर भारतात कुठेही आणि स्वभाववैशिष्ट्यांचा विचार केला तर अख्ख्या भारतात कुठेही) जशी माणसं खऱ्या आयुष्यात भेटली असती तशीच आपल्याला ‘पंचायत’ मालिकेतही भेटतात. काही सरळ आहेत तर काही बेरकी पण ती सच्ची आहेत. त्यांच्यात काहीही टोकाचे किंवा वाईट घडत नाही. नाही म्हणायला सीझन ३ च्या शेवटी काही डोकी फुटतात, परंतु ते देखील ’चला, आता तुफान हाणामारी दाखवू’ या अभिनिवेशाने नाही तर कथेचा सहज भाग म्हणून. 

अनेक हलकेफुलके पण गाभ्याशी गंभीर असलेले प्रसंग यात खुबीने दर्शवले आहेत. उदा: झपाटलेल्या झाडाची कथा पहिल्या सीझन मध्ये आहे. झपाटलेले झाड ही फक्त अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करायला सचिव विकासला भर रात्री डबलसीट घेऊन जातो. सहसचिव विकास घाबरून बायकोला सांगून जातो, "खुसबू... जर आम्ही परतलो नाही तर दुसरं लग्न कर. आपला सहवास एवढाच लिहिलेला होता. वरच्या खोलीत बाबांच्या डब्यात त्यांनी दिलेली चांदीची काही नाणी ठेवली आहेत. त्यात तीन ते चार महिन्यांचा खर्च भागेल." घटना, नातेसंबंध, खटकेबाज संवाद आणि त्यातून पात्रनिर्मिती ही पंचायतची खास शैली. गावात एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा सारं गाव मिळून भावी जावयाचे नखरे कसं सहन करतं हा भागही मार्मिक. पंचायत कचेरीतून कॉम्प्युटर मॉनिटर चोरीला गेल्याची घटनाही धमाल आहे. शेवटी चोर तो मॉनीटर दाराशी आणून ठेवून देतात. तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते. त्यात लिहिलेलं असतं "आम्हाला वाटलं की तो टीव्ही आहे, कृपया माफ करा." मॉनीटरचा उपयोग करण्याचीही क्षमता नसलेलं किंवा उपयोग माहित नसलेलं चिमुकलं साधं गाव, हे आहे खेडोपाडी विस्तारलेल्या भारताचं वास्तव. ते कळायला शहरी भारतीयांना ’ओटीटी’चं माध्यम लागतं इतकंच. आपल्या मातीतल्या गमती विनासायास बघताना परदेशस्थ भारतीय प्रेक्षकही रंगून जातो आहे.

एका प्रसंगात सचिव(जी)अभिषेकचा मित्र प्रतीक, दोन्ही हातात शॉपिंग बॅग घेऊन चकाचक मॉलमध्ये एस्केलेटरवरून उतरताना अभिषेकला साध्या जीवनाचे महत्व सांगतो. बर्‍याच शहरी लोकांना ग्रामीण जीवनात डोकावून आपल्या ’रूट्स’ चा परिचय मुलाबाळांना करून देण्याची एक फॅशनेबल ओढ असते. एवढे उरकले की ते आपल्या अत्याधुनिक जगात परतायला मोकळे होतात. प्रतीक यांचा प्रतिनीधी. तो अभिषेकला न उपभोगता येणार्‍या शहरी जीवनशैलीच्या बदल्यात किती गुणवत्तापूर्ण अनुभव मिळतायत हे सांगून मित्राचं सांत्वन करतो. "तुला स्वदेसमधला मोहन भार्गव बनण्याची संधी मिळते आहे. मातीचा गंध सोडून माझ्यासारख्या कॉर्पोरेट उंदरांच्या शर्यतीत तुला का अडकायचे आहे?" वगैरे ऐकल्यावर अभिषेकचाही सल जरा कमी होतो. प्रधान की बेटी रिंकी (सान्विका) भेटते तेव्हा त्याला गावात राहणं जरा आवडू लागतं. रिंकीला अचानक कचेरीकडे येताना पाहून सचिवजींची तारांबळ उडण्याचा प्रसंग चुरचुरीत झाला आहे. तालुक्याच्या गावच्या मोहन भांडारचे समोसे खाणं ही त्यांच्या ’एंजॉयमेंट’ची एक भाबडी पद्धत आहे. रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलत गेलेलं अदमुरं रोमँटिक नातं साधं, प्रांजळ पण फार गोड आहे. त्यांचे अनेक रील्स आज व्हायरल आहेत.

ज्या कच्च्या रस्त्यावर धडपडत बाईक चालवत त्याने पहिल्या सीझनच्या पहिल्या पर्वात फुलेरा गाठलेलं असतं तो रस्ता सीझन ३ मध्ये मोठा प्रश्न होऊन पुढे आलेला दिसतो. खंतावलेल्या मनाने या रस्त्याने गावात दाखल झालेला सचिव मात्र त्याच्या ग्रामीण मित्रांच्या सहजीवनात त्याच्याही नकळत विरघळून जातो. सुरुवातीला पंचायत कचेरीत पाऊल न टाकणारी मंजुदेवी आता राजकारणात बिनधास्तपणे उतरते. हा बदलही सचिवामुळे होतो. भूषणने (दुर्गेश कुमार) आपल्या पत्नीला (सुनीता राजवार) मंजुदेवीसमोर प्रबळ विरोधी उमेदवार म्हणून आणलं आहे. 

नसलेले प्रश्न वाढवण्यात किरकिरा भूषण हुशार आहे. ’किजिए मिटिंग मिटिंग, खेलिए मिटींग मिटींग’, ’देख रहा है बिनोद’ यासारखे भूषणचे संवाद लोकप्रिय झाले आहेत. प्रधान पती तर फारच निरागस माणूस आहे. पद हातून निसटू नये या नादात कधी चुका करतो त्यामुळे कधी अस्वस्थ होतो तर कधी खमकेपणे योग्य बाजूने उभा असतो. शहरी सुविधांऐवजी अभावात जगत तडजोड करणार्‍या सचिवाबद्दल याच्या मनात कळवळा आहे आणि त्यातून फुललेली मैत्री तर धमाल आहे. एका ’हाय’ या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वर ही मंडळी बियर प्यायला एकत्र जमतात, सुखदु:ख वाटून घेतात, हसतात, रागावतात, एकमेकांची टर उडवतात आणि पाठीशीही उभी राहतात. यात बियर हे केवळ माध्यम आहे, गंतव्य नाही म्हणूनच कदाचित इथे ’दारू पिणे स्वास्थ्यासाठी अहितकारक’ असल्याचा संदेश किंवा मालिकेला दिलेलं १६ + वयाचं प्रमाणपत्र अनावश्यक वाटतं.

प्रधानमंत्री गरीब आवास किंवा हर घर शौचालय योजनेपासून विधायकाच्या बेमुर्वतखोरपणापर्यंत ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू इथे आरशात प्रतिबिंब दिसावं तसे उमटतात. विधायकाचं गावाकडे ’गर्दी म्हणजे ताकद’ या भूमिकेतून पाहणं, कोणतीही पातळी गाठणं,सगळं कसं आपल्या भारतीयांच्या अगदी परिचयाचं. पार्श्वभूमीवर अत्यंत लोकप्रिय झालेलं ’राजाजी ’ गाणं तर भारतीय राजकारणाला चांगले चिमटे काढत रंगत जातं. ४ थ्या सीझनची वाट पाहायला भाग पाडतं. 

अनेक जीवनविषयक सूत्र या बहुअस्तरी मालिकेच्या आत दडलेली आहेत. ती शोधावी लागत नाहीत, गवसत जातात, खिन्न करतात, गालात हसवतात, स्वत:लाच प्रश्न विचारायला लावतात. ३ रा सीझन कथानकात जरा गंडला आहे, काही ठिकाणी जास्तच संथ झाला आहे पण त्याची भरपाई संवाद, अभिनयातून पुरेपूर झाली आहे. 

भारतीय ओटीटी प्रेक्षकाला पुन्हा एकदा निखळ आणि अस्सल देशी मनोरंजनाकडे वळवणार्‍या ’टीव्हीएफ’चे आणि दिग्दर्शक दीपककुमार मिश्रांचे आभारच मानायला हवेत. पंचायत गाजू लागल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते," दरअसल मुझे सबकुछ बीस चाहिए, कही भी उन्नीस नही चलता " 

 #पंचायत - निखळ देशी करमणूक Published in ओटीटी कट्टा (#daut_lekhani)  


Tuesday, July 16, 2024

रोबोच्या ’अंतर्मना’त


महाराष्ट्र टाईम्स मध्ये संपादकीय पानावरील लेख -रोबोच्या ’अंतर्मना’त !#Artificial_Intelligence_Appreciation_Day #July16
दक्षिण कोरियातील सायबोर्ग नावाच्या रोबोने ९ तास ड्युटीच्या बहुधा अतिश्रमाला वैतागून ’आत्महत्या’ (!) केल्याच्या बातम्या देशविदेशातील वर्तमानपत्रातून झळकल्या. दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी या रोबोचा ’मृत्यू’ झाला. त्याने पायऱ्यांवरून साडेसहा फूट खाली उडी मारून आत्महत्या (!) केल्याचे सांगितले जात आहे. मृत रोबोची ऑगस्ट २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम रोबोकडे पहिल्यंदाच सोपवण्यात आले होते. त्याला लिफ्टचा वापर करता येई. कॅलिफोर्नियाच्या बीअर रोबोटीक्स या कंपनीने हा रोबो विकसित केला होता. रोबोंचा प्रभावीपणे वापर करणार्या देशांच्या यादीत दक्षिण कोरिया बराच वर आहे. International Federation of Robotics नुसार दर १० कर्मचार्यांमागे तिथे एक रोबो काम करतो.
आत्महत्येच्या (!) घटनेच्या वेळी काही साक्षीदारांच्या मते त्यांनी सायबोर्गला जागीच गरगरताना आणि मग स्वत:ला झोकून देताना पाहिले. रोबो खाली कोसळताना त्याचे तुकडे झाले. या तुकड्यांचे कंपनीद्वारे यथावकाश विश्लेषण केले जाईल. एखादे यंत्र कायमचे नादुरूस्त होते किंवा बंद पडते तेव्हा आपण ते यंत्र ’कामातून गेले’ म्हणतो. इंग्रजीत ’डेड’ म्हणत असल्याने ’मृत’ शब्द वापरला गेला हे आपण समजू शकतो पण ही ’आत्महत्या’ असल्याचा उल्लेख बातम्यांमध्ये आहे.
मुळात रोबो ’आत्महत्या’ करू शकेल का!
’तेरी बातोंने ऐसा उलझा दिया’ या चित्रपटातली नायिका सिफ्रा (क्रिती सनॉन) एक आधुनिक गृहकृत्यदक्ष युवती रोबो असते. तिला पहिल्यांदा साडी नेसलेली पाहून तिच्या सौंदर्याची स्तुती करताना नायकाची आत्या म्हणते,"आज तो तुम पुरे शहर में आग लगा दोगी". सिफ्रा विचारते, "क्या आप चाहती है मै पूरे शहर में आग लगा दूँ ?" नायक घाईघाईने तिला सांगतो, "अरे,ये मजाक कर रही है!" यावर ’ओह ! जोक!" असे म्हणत सिफ्रा यांत्रिक (अमानवी) पद्धतीने ही ही ही करते. सिनेमातल्या या गमतीदार प्रसंगात कथा फुलविण्यासाठी थोडे स्वातंत्र्य घेतले गेले असले तरी असे रोबो केवळ ’प्रतिसाद’ देऊ शकतात व ते ही त्यांना जसे ’प्रोग्राम’ किंवा डिझाईन केले आहे त्यानुसार, हे या दृश्यावरून स्पष्ट होईल.

मदतनीस किंवा सेवा देणारे रोबो माणसासारखा संवाद कसा काय साधतात याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे.
यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या ए-आयच्या एका शाखेचा उपयोग केला जातो. मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे हे तिचे कार्य आहे. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषा निर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामासाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते. पण माणूस आपल्या दहा टक्के भावना शब्दातून व्यक्त करतो आणि बाकी त्याच्या हावभाव आणि शरीरभाषेतून. म्हणजे मानवी भाषाच नव्हे तर मानवी चर्येवरचे भाव आणि देहबोली सुद्धा या मदतनीस रोबोंना समजायला हवी. तरच ते अचूक संवाद साधू शकतील.
यावरही संशोधन झाले आहे.
चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृत्रिम बुद्धीमत्ता परिषद २०२४ मध्ये फुदन विद्यापीठाने ’ग्युआनघुआ क्र. १’ या नावाचा भावनाशील ह्युमनॉईड सादर केला. याला चेहर्यावर राग, खिन्नता, दु:ख, आनंद व उल्हास यासारखे भाव प्रतिसाद स्वरूपात दर्शवता येतात. १६५ सेंमी उंची व ६२ किलोग्रॅम वजन असलेल्या या ह्युमनॉईडमध्ये ४५ कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित सांधे बसवले आहेत. यामुळे तो ’कठपुतळी’ सारख्या कडक हालचाली न करता माणसासारख्या सहजतेने हालचाली करू शकतो व माणसासारखी उठबस करू शकतो. चीनमधल्या वृद्धांना मदत व्हावी या हेतूने या ह्युमनॉईडची निर्मिती करण्यात आली आहे. आवश्यक ते वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष देऊन प्रेमाने त्यांची काळजी घेऊ शकेल अशी त्याची ’इमोशनली इंटेलिजंट’ रचना आहे. तरीही माणसाचे रूप त्याला कसे येणार !

लवकरच येणार. जपानमध्ये मानवी त्वचेसारख्या प्रतीचे रासायनिक आवरणाचे रोपण रोबोवर करण्याचे प्रयोग सुरु आहेत. जसे हसताना माणसाची जबड्याची त्वचा ताणली जाते, वैतागल्यावर कपाळावर आठ्या पडतात तसे या कृत्रिम त्वचेचा वापर करून रोबोच्या चेहर्यावर घडताना दिसले तर त्याच्या आणि माणसाच्या दिसण्यातले आणि वागण्यातले अंतर हळूहळू नाहीसे होत जाईल.
आता त्याच्यात आणि माणसात फरक राहीला तो समानुभूतीचा आणि त्यायोगे होणार्या भावनानिर्मितीचा. समानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पावून तिला समजून घेणे, तिचे विचार, भावना, वृत्ती जाणून घेणे.
सादरीकरण प्रभावी असेल तर नाटक / सिनेमातल्या पात्रांना दु:ख झालेलं बघून आपल्यालाही वाईट वाटते. त्यांना आनंद झालेला पाहून आनंद होतो. समोर जे दिसते आहे ते वास्तव नाही याची कल्पना असूनही हे घडते. जित्याजागत्या माणसांबाबत तर आपण अधिकच संवेदनशील असतो. द्वेष, मत्सर, राग, प्रेम, आकर्षण या सगळ्या भावना आतून निर्माण होतात.

तंत्रहृदयी ए-आय किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेला संवेदना नाहीत त्यामुळे तिला सहानुभूती कळत नाही आणि समानुभूती घेता येत नाही. अनुभूती राहो, कसलाही ’अनुभव’ घेता येत नाही. त्यांच्या डिझाइननुसार ते वस्तुनिष्ठ चिन्हांच्या आधारे समोरच्या माणसाच्या भावना ओळखून शब्दातून किंवा स्पर्शातून सहानुभूती व समानुभूती जाणवल्याचा भास निर्माण करू शकतात. मानवी वर्तनाचे अनुकरण करून त्यासाठी आवश्यक त्या हालचाली ,कृती, संवाद करू शकतात. परंतु भावनिक दृष्ट्या समरस न झाल्याने त्यायोगे कोणतेही भाव त्यांच्यात आपसूक निर्माण होत नाहीत.
मुन्नाभाई एमबीबीएस- या चित्रपटात एका बधीरावस्थेतल्या पेशंटला मॉडेलसारखे वापरून एक डॉक्टर प्रशिक्षण देताना दिसतात. ते त्या पेशंटचा उल्लेख सतत 'ऑब्जेक्ट' असा करत असतात. मुन्नाभाई त्यावर चिडून म्हणतो, ये ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट क्या लगा रखा है , इनका कोई नाम तो होगा". हा मानवी भाव रोबोमध्ये येऊ शकणार नाही कारण त्यांच्यासाठी सारे मानव हे फक्त 'ऑब्जेक्ट' आहेत.

इसापनीतीत प्राण्यांचे मानवीकरण केले आहे तसे माणसाने रोबोचे मानवीकरण केल्याने त्याची कार्य करण्याची क्षमता संपणे या द. कोरियातील घटनेला माणसाने ’आत्महत्या’ नाव दिले आहे. मुळात आत्महत्येआधी मानवी मनात जी प्रचंड उलथापालथ व मेंदूत ज्या घडामोडी होत असतील त्या रोबोमध्ये होणे शक्य नाही कारण त्याला ’मन’ नाही. आत्महत्या करण्याइतक्या नैराश्याच्या टोकाला जाण्यासाठी आधी ’स्व’ची जाणीव हवी. अद्याप जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाकडे ’स्व’ विकसित करण्याची प्रणाली उपलब्ध नाही. म्हणजेच हा रोबो एक यंत्र म्हणून ’मृत’ झाला आहे
तरीही अशा मदतनीस रोबोंची गरज माणसाला भावनिक पातळीवर का वाटते ! तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट सॅन मार्कोस (कॅलिफोर्निया) हे रियल बॉटिक्स कंपनी चालवतात. त्याद्वारे डिजिटल बाहुल्यांची (रोबो) निर्मिती करताना २०१७ मध्ये त्यांनी एक प्रयोग केला होता. रोबो मदतनीसांबाबत माणसाच्या प्रतिक्रिया त्यांना आजमावून पाहायच्या होत्या. त्यांनी काही रूग्णांना प्रत्यक्ष डॉक्टरांशी बोलायला सांगितले आणि काही रूग्णांना डॉक्टरांच्या डिजिटल ’अवतारा’शी बोलायला सांगितले. पेशंटच्या मते ते डिजिटल अवताराशी जास्त सहजपणे बोलू शकले कारण तो आपल्याला ’जज’ करत नाही.
सॅन यांच्या मते यातून अशीही शक्यता आहे की भावनाप्रधान माणसे या निरपेक्ष पण निर्विकार म्हणजेच यंत्रहृदयी बाहुल्यांच्या (रोबोंच्या) प्रेमातही पडतील. काही त्यांच्या इतके आहारी जातील की त्यांच्यावाचून माणसाचे जगणे अवघड होईल. यातून मानसिक आरोग्याचे नवे प्रश्न उपस्थित होतील. म्हणूनच सॅन म्हणतात, "सजीव आणि रोबो सखी किंवा माणूस आणि रोबो मदतनीस यांची बलस्थाने व मर्यादा ओळखता यायला हव्यात. अन्यथा आपण बाहुलीच्या हातचे बाहुले होऊ. "
आज म्हणजेच १६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ए-आयचे म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या भल्याबुर्या परिणामांचे विश्लेषण करण्याचा आणि त्याविषयी नव्या घडामोडी जाणून घेण्याचा दिवस. IRCAI आणि UNESCO चा हा संयुक्त उपक्रम आहे. ए-आयने दिलेल्या अगणित सुविधांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ए-आय मुळेच उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याचा हा दिवस आहे.

कार्यक्षमता व उत्पादकता वाढावी या हेतूने माणसाऐवजी रोबो अधिकार्यांवर प्रचंड काम सोपवल्याने होणार्या परिणामांचा विचार करण्याची वेळ द.कोरियावरच नव्हे तर जगावर आली आहे. मुळात अतिताणामुळे मृत पावण्याइतपत म्हणजेच दुरूस्त होऊ शकणार नाही इतके बिघडण्याइतपत काम यंत्र असले तरी त्यावर लादणे योग्य किंवा नैतिक आहे का यास्वरूपाच्या चर्चा या घटनेनंतर सुरू झाल्या आहेत.
रोबोने माणसाचे काम हलके करणे अपेक्षित आहे की माणसाऐवजी काम करणे अपेक्षित आहे ! आवश्यक तिथे मजूर, परिचारक म्हणून किंवा माणसासाठी धोकेदायक अशा ठिकाणी रोबोचा वापर होतो तेवढे पुरेसे नाही का!
या संदर्भात एक मार्मिक व्यंगचित्र बघण्यात आले. त्यात एक आधुनिक महिला म्हणते आहे," ए-आय ने माझी सर्जनशील कामे करावी म्हणजे मला घरकामाला पुरेसा वेळ मिळेल हे मला नकोय. उलट ए-आय ने मला घरकामात मदत करावी म्हणजे मला माझ्या आवडीची सर्जनशील कामे करायला पुरेसा वेळ मिळेल."

तूर्त गुमी सिटी कौन्सीलने मृत सायबोर्गच्या जागी दुसरा रोबो नियुक्त करायचा विचार सध्या स्थगित केला आहे.
लक्षावधी वाहनचालकांना बेरोजगार करणार्या स्वयंचलित गाड्यांना मी भारतात प्रवेश करू देण्याच्या विरोधात आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. ए-आय मुळे करियरच्या अनेक संधी निर्माण होत असल्या आणि जगणे सुकर होत असले तरीही त्या त्या देशातील धुरीणांनी नव्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराचा व त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ठाम भूमिका घेणे आता आवश्यक आहे.

माणूस दिवसेंदिवस यांत्रिक आणि रोबो ह्युमनॉईड होत चाललेला असताना या दोघांच्या मधली पुसट होत चाललेली सीमारेषा वेळीच ठळक करायला हवी आहे.
#robotics #AI