Friday, November 3, 2023

इंटरनेटवरचे शिष्टाचार


 शिष्टाचार (एटिकेट्स) हा प्रकार बराचसा पाश्चात्य देशातून आपल्याकडे आला आहे. चौदाव्या लुईच्या काळात फ्रान्स हा देश जणू जगाचा केंद्रबिंदू होता. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बरेच फ्रेंच उमराव आपल्या रीतीभातींसह इंग्लंडमध्ये स्थानांतरित झाले. नंतर इंग्रजांच्या मार्फत सार्वजनिक जागी कसे खावे-प्यावे ,बोलावे, वागावे याचे संकेत त्यांच्या अंमलाखालील देशांमध्ये रूजले. आपल्या भारतीय संस्कृतीतही शिष्टाचार होते. त्यात जेत्यांचे पाश्चात्य शिष्टाचार अधिक मिसळल्याने ’सॉरी’ आणि ’थँक्यू’शिवाय आपले पान हालत नाही.

तंत्रज्ञानाने जग जोडले गेले तसे इथेही ’नेटीकेट्स’ ((इंटर)नेटवरील एटिकेट्स ) #Netiquette तयार झाले. इथल्या विवेकी लोकांनी ते रूढ केले. घरून ऑनलाईन काम करण्याच्या नव्या पद्धतीमुळे तर आभासी जगातली वर्तणूकच आपली प्रतिमा ठरू लागली. आता तर अगदी लग्न जुळवताना, नोकरी देताना, व्यावसायिक संबंध निर्माण करताना लोक नेटवरील प्रोफाईल, प्रतिक्रियांवरून एखाद्याचे व्यक्तिमत्व जोखू लागले आहेत. यामुळे इंटरनेटचा वापर कोणत्याही उद्देशाने करायचा असला तरी नेटीकेट्सची जाण अत्यंत गरजेची ठरली आहे.
असे असले तरी समाजात मनात येईल तसे वागणारे वीर असतातच. ’हम जहा खडे होते है लाईन वही से शुरु होती है’ असा त्यांचा बाणा असतो. स्वत:च फोन लावून हे समोरच्याला ’हॅलो कोण?’ विचारतात. समोरचा माणूस रिकामटेकडा आहे असे गृहित धरून फोनवर बोलायला सुरुवात करतात. हे निवेदक असतील तर वक्त्यापेक्षा जास्त बोलतात. संस्थाध्यक्ष असतील तर प्रमुखाच्या खुर्चीवर जाऊन बसतात. दिलेली वेळ पाळत नाहीत. कशीही शरीरभाषा वापरतात.
इंटरनेटवर वावरतानाही ते आपले गुणधर्म सोडत नाहीत. अशा लोकांचे तिथे हसे होते. ते सहसा यशस्वी होत नाहीत. एकटे पडतात. प्रसंगी त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागू शकते. एकूण सायबर विश्वातील सभ्यतेच्या संकेतांचा विचार करूनच तिथे वावरणे योग्य. काय आहेत हे संकेत !
इंटरनेटवर कोणताही इंग्लीश मजकूर किंवा इ-मेल पूर्ण कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिणे म्हणजे डिजिटली किंचाळणे किंवा आरडाओरडा मानला जातो. आपल्या परिचयातल्या एखाद्या कर्कश्य आवाजात बोलणार्या व्यक्तीकडे जसे आपण वैतागून पाहतो तसे हा संदेश वाचणारा आपल्याकडे पाहत असतो. त्यामुळे आवश्यक तेवढी कॅपिटल अक्षरे वगळता एरवी लोअरकेस टायपिंग करावे.
व्यावसायिक इ-मेलला त्वरित, किमान चोवीस तासात प्रतिसाद देणे अपेक्षित असते. असे न केल्यास एखादी संधी हातची जाऊ शकते, प्रतिमा डागाळू शकते. मुळात आलेले इ-मेल स्वत: नियमित पाहावेत. नाहीतर अनेकांना मेल केल्याचा पुन्हा मेसेज करावा लागतो किंवा ’मेल पाहा ओ’ असे फोन करून सांगावे लागते. ’मिस्ड कॉल’ नामक मोफत आणि गमतीदार संदेशसेवा कल्पकतेने वापरण्यात तरबेज असलेल्या आपल्या भारतीयांना एका इ-मेलसाठी अशी २, ३ पद्धतीने आठवण करून द्यावी लागणे हा विरोधाभास नाही का !
इ-मेल वरचा 'रिप्लाय ऑल' टॅब ही काळजीपूर्वक वापरायची गोष्ट आहे. एखाद्याने १०० जणांना एकच मेल पाठवला असेल आणि उत्तर वैयक्तिक /वेगवेगळे अपेक्षित असेल तर ’रिप्लाय ऑल’ वापरून बिनकामाच्या ९९ इ-मेलची भर इंटरनेटवरच्या गर्दीत का घालायची ! इ-मेलवर व्यावसायिक किंवा महत्वाचे कारण नसताना सी सी वापरून इतरांचे मेलआयडी जगजाहीर करायचे नसतात. बी सी सी म्हणजे ब्लाईंड कार्बन कॉपी हा पर्याय शक्यतो वापरावा कारण यातले मेल आयडी एकमेकांना दिसत नाहीत
औपचारिक व्हिडिओ मिटिंग मध्ये अकारण उशीरा जॉइन होणे, उगाच मायक्रोफोन सुरू ठेवून इतरांना आपल्या घरातील कुकर, मिक्सरचे किंवा बडबडीचे आवाज ऐकवणे, घरच्या कपड्यात, वेडेवाकडे बसून खात पीत व्हिडिओ चालू ठेवणे, परवानगीशिवाय मध्ये बोलणे, आपसात चॅट करणे या गोष्टी चुकीच्या आहेत. अशा वागणुकीचा करियरवर, प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
इमोजींचा अतिरेक म्हणजे विदुषकी चाळे मानले जातात. इमोजी शब्दांच्या पलीकडची भाषा लीलया बोलू शकतात पण संदेशात इमोजींची आगगाडी असेल तर वाचणार्याची अवस्था ’भाई, कहना क्या चाहते हो’ अशी होणारच. अशा वेळी संदेश नीट पोचण्याऐवजी आपटण्याची शक्यता जास्त. आपल्या सगळ्याच्या सगळ्या भावना इमोजींवर लादून एकाच संदेशात कोंबून मुख्य आशयाला गुदमरून टाकण्याची गरज नसते. शक्य तिथे चपखल शब्द वापरावेत, आवश्यक असले तर इमोजी दो या तीनही अच्छे.
एखाद्याशी चॅट सुरु असताना मधूनच अंतर्धान पावण्याचा अनेकांना छंद असतो. उदा: समोरच्याला ताटकळत ठेवून आपण मध्येच सोशल मिडियावर फिरून किंवा दुसरे काम करून यायचे आणि त्याने तसेच केले की त्याला मात्र ’??????????????’ अशी चिन्हे पाठवायची ! संभाषण रटाळ असेल किंवा सहज गप्पा सुरु असतील तर ठीक पण व्यावसायिक संभाषणादरम्यान असे करणे अयोग्य ठरते. एक तर लगेच प्रतिसाद द्यावा किंवा आपण व्यग्र असल्यास समोरच्याला तसे नम्रपणे सांगावे असा हा साधा नियम आहे.
चॅट किंवा प्रतिक्रियेची भाषा योग्य व संयत असावी, राग आलाच तर फेसबुक/ट्वीटरवर न काढता मनात आकडे मोजावे. आपली बुद्धीमत्ता दाखवताना उपरोधिक, अवमानकारक बोलणे आवश्यक नसते. तोंडून गेलेल्या चुकीच्या शब्दाबद्दल ’आपण असे बोललोच नाही’ म्हणून लोक कानावर हात ठेवतात. इंटरनेट मात्र काहीही विसरत नाही. त्यावरचे लेखन डिजिटली नोंदले जाते. कधीही स्क्रीनशॉटच्या रूपाने दत्त म्हणून समोर उभे राहू शकते. तेव्हा ’आभासी’ माध्यमात कुणाला काय कळतंय , या भ्रमात न राहता खबरदारी घेतलेली उत्तम.
’थ्री इडीयट’ सिनेमामध्ये लग्नाच्या जेवणावळीत घुसणारे तीन हिरो आठवतायत ! न विचारता एखाद्याला टॅग करणार्या मंडळींकडे अशाच नजरेने पाहिले जाते. आपण कष्टाने जमवलेल्या फ्रेंडलिस्ट उर्फ मित्रपरिवारात स्वत:ची पोस्ट फुकटात व आगंतुकपणे घुसवणारी ही मंडळी एक तर महाचतुर असतात किंवा भाबडी. मधल्या फळीच्या राजकीय नेत्यांच्या प्रचारासाठी तर सर्व संकेत झुगारून टॅगींगचा तुफान वापर केला जातो. त्यांनी आडगाव बुद्रुकला केलेले हातपंपाचे लोकार्पण आणि रूग्णालयातील फळवाटप अवघ्या जगाला त्याशिवाय कळणार कसे!
संबंधितांना टॅग करणे चूक नाही. उलट लोकांनी एकमेकांना टॅग करत सुटावे अशी तमाम सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सची इच्छा असते. प्रश्न आहे परवानगीचा किंवा हेतूचा. अन्यथा आपल्याला आपल्या मैत्रिणीच्या मावसभावाच्या बायकोच्या ऑफीसमधल्या नवरात्र सेलेब्रेशनचे किंवा परगावच्या भावाच्या वरच्या मजल्यावरच्या घरातल्यांच्या नव्या कुत्र्याचे फोटो, हतबलतेने पाहत बसावे लागतात. यात आपला वेळ आणि उर्जा वाया जाते शिवाय नोटीफिकेशन डोके पिकवतात ते वेगळेच.
काही स्वघोषित मास्तर इथे सदैव हातात डीजिटल छडी घेऊन बसलेले असतात. गमतीने त्यांना ’ग्रामर नाझी’ म्हटले जाते. एखाद्याने लिहिलेल्या भल्या बुर्या पोस्टवर त्याविषयी चार शब्द लिहिणे अपेक्षित असते. ते सोडून त्या लेखनातली एखाद दुसरी चूक जणू जेवणात केस सापडावा तशी चिमटीत धरून ही मंडळी फक्त त्यावरच कॉमेंट करतात. पदार्थ कसा झालाय ते सांगतच नाहीत. एखादे वेळी ती ऑटो करेक्टने केलेली गडबड असू शकते. संदर्भातली किंवा जवळच्या व्यक्तीची चूक दुरूस्त करणे वेगळे आणि दिसेल त्याला छडी लगावणे वेगळे. एकूण जरा क्षमाशील होण्याचा प्रयत्न करायला हवा.
इंटरनेटवर ’एंटर’ बटण दाबण्यापूर्वी मुळात आपण लिहिलेला मजकूर निर्दोष व संदर्भासहित असल्याची खात्री केली तर संभाव्य गोंधळ टळतील. ते शक्य नसल्यास पोस्ट करण्याची खुमखुमी आवरावी.
सोशल मिडियावर ग्रुप फोटो पोस्ट करताना तो फोटो सार्वजनिक करण्यायोग्य आहे का हे पाहायला हवे. हे सापेक्ष असले तरी ग्रुपमधील मंडळींची परवानगी घ्यायला हवी. आपला वैयक्तिक फोटो पोस्ट करताना त्यात एखादी अनोळखी व्यक्ती स्पष्ट दिसत असेल तर तिचा चेहरा स्टीकरने झाकावा किंवा ब्लर करावा. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत ही काळजी अवश्य घ्यावी.
आपली पोस्ट करण्याची हौस इतरांच्या डाटापॅक, बँडविड्थ व मेमरी स्पेसच्या जीवावर पुरवू नये. एकावेळी ढिगाने फोटो अपलोड करून, अनेक फॉरवर्ड्स एकामागोमाग पाठवून स्वीकारणार्याच्या कपाळावर आठ्या आणणे टाळावे.
व्हिडिओ पोस्ट करताना तो कशाबद्दल आहे हे एका ओळीत न लिहिता बहुतेक लोक गुपित ठेवतात. त्यात गाझा प्रश्नापासून गच्चीवरील बागेपर्यंत किंवा ’पप्पांनी गंपती आनला’ पर्यंत काहीही असू शकते. त्या विषयात रस नसलेल्या किंवा पुनरावृत्ती नको असलेल्या लोकांचा तो डाऊनलोड व नंतर डिलिट करण्यातला वेळ आणि मेमरी स्पेस या कॅप्शनमुळे वाचते.
एखाद्याची पोस्ट शेअर केल्यास लिहिणार्याला त्याचे श्रेय कां कूं न करता द्यावे. लेखक माहित नसल्यास तसे स्पष्ट लिहावे. उल्लेख न केल्यास ती चोरी ठरते. काही थोर लोक अपण पोस्टमन नसून ती आपलीच पोस्ट असल्यासारखे कौतुकाच्या प्रतिक्रियांवर बदाम देत खुशाल आभार मानून मोकळे होतात.
पोस्ट न वाचताच लाईक ठोकणे, निरर्थक प्रश्न विचारणे टाळायला हवे.
जास्त पोहोच असलेल्या दुसर्याच्या पोस्टवर विषयानुरूप न बोलता आपल्या ट्यूशन क्लासेसची, केशतेलाची, घरपोच फराळ देण्याची, पत्रिका पाह्ण्याची वगैरे असंबद्ध जाहिरात फुकटात करू नये. असे प्रकार सवंग मानले जातात.
आपले प्रोफाईल लॉक करून दुसर्याला मित्र विनंती पाठवू नये. तसे करणे म्हणजे स्वत: लपून दुसर्याला शुकशुक करण्यासारखे आहे.
नेटीकेट्सच्या या यादीत तुम्हीही भर घालू शकता. इंटरनेट किंवा कुठलेही माध्यम नवीन असताना चुका होणारच. एकदा त्या माध्यमाला सरावल्यानंतर या ग्लोबल खेड्याचा एक चांगला नागरिक होण्याची इच्छा हवी. त्यासाठी ’नेटीकेट्स’ पाळून म्हणजे इंटरनेटवर आपल्याशी इतरांनी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण इतरांशी वागायला हवे. अन्यथा ... पेराल ते उगवेल.

#netiquettes #Punyanagari

Saturday, October 28, 2023

’ओटीटी’ ची दुसरी बाजू

 ’कभी कभी लगता है साला अपुनीच भगवान है’ ,’ रिस्क है तो इश्क है’, ’जेब मे मनी हो तो कुंडली मे शनी होनेसे कोई फर्क नही पडता’", काही गाजलेल्या वेब सिरिज मधले हे प्रसिद्ध डायलॉग. ’कितने आदमी थे’, मोगॅम्बो खुश हुआ’ वगैरे हिंदी सिनेमातले डायलॉग पोरकट वाटावे इतके रियलॅस्टिक चित्रण ही वेब सीरीजची जमेची बाजू. त्यातले वैविध्यपूर्ण कंटेंट कल्पनेपलीकडचं जग अशा काही ताकदीने प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उलगडत असतात की त्याने प्रेक्षक अक्षरश: भारून जातात. माध्यमांचा प्रभाव नेहमीच तरूण वर्गावर सर्वाधिक पडतो पण ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मची अफाट पोच आणि प्रभाव आजच्या तरुण प्रेक्षकांच्या वर्तनावर आणि मूल्यधारणांवर लक्षणीय परिणाम करतो आहे.  इथल्या अनियंत्रित आणि आकर्षक कंटेंटमुळे कोवळे तरुण इकडे सहज आकर्षिले जातात. 

अपवाद वगळता शिवराळ भाषा, हिंसा, कामुक दृश्यांचा प्रचंड वापर इथल्या बहुतेक सादरीकरणात प्रामुख्याने केलेला दिसतो. स्री व पुरूष यांच्यातील संबंध अनैसर्गिक वाटावे इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे विविध  लैंगिक भावांच्या कल्लोळाला फूटेज दिलेले दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या राजकीय आणि सैद्धांतिक भूमिकेला सोयीची कथानके रचून नवे नॅरेटीव्ह रचण्याचे प्रकारही इथे वाढू लागले आहेत. भूमिकेची गरज या वेष्टनाखाली ड्र्ग्ज, ड्रिंक्स, सिगारेट्सचे सेवन इथे जेवण करण्याइतके सहजपणे घडत असते. जगात काहीच नॉर्मल घडत नाही की काय असे वाटावे इतकी काही कथानके सातत्याने येथे बीभत्स रस आळवताना दिसतात. 

पॉर्न तर पूर्वीपासूनच नव्हे जगाच्या उत्पत्तीपासून उपलब्ध होते मग ओटीटीवर याच्या प्रसाराचा  आरोप का असे इथले निर्माते प्रत्युत्तरादाखल विचारतात. याचे उत्तर सोपे आहे. क दर्जाच्या स्वस्तातील पॉर्न कलाकारांपेक्षा अ दर्जाच्या कलाकारांद्वारे उपलब्ध होणारे उच्चभ्रू पॉर्न इथल्या प्रेक्षकांना भुरळ घालते आहे असे चित्र दिसते. आम्ही वास्तव दाखवतो वास्तव दाखवतो म्हणत ज्या गोष्टी सूचकतेने दाखवणे शक्य आहे त्या टीआरपीचे गणित डोक्यात ठेवून नको इतक्या उघडपणे दाखवल्या जात आहेत. तथाकथित आधुनिक लोक याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कौतुक करतात तेव्हा याच्या सामाजिक परिणामांबद्दल बोलायचे मात्र सोयीस्करपणे टाळतात. इंटरनेटने एका क्लिकवर आणून ठेवलेले पॉर्न चोरून पाहिले जात असल्याने त्याला काही टक्के निर्बंध लागू होत होते. ओटीटीने हे पॉर्न शर्करावगुंठित करून लोकांच्या दिवाणखान्यात आणून ठेवले आहे. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यातील पॉर्न कॉंटेंटला किती महत्व द्यायचे याची जाण मात्र प्रेक्षकांमध्ये वाढलेली नाही. हे पाहून चळलेले काही विकृत मानसिकतेचे लोक हाती लागेल त्या लहान मुलांना आणि स्त्रियांना लक्ष्य करू लागले आहेत. बलात्कार व बालकांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांमागे पॉर्नचे ओटीटीने केलेले नॉर्मलायझेशन काही अंशी निश्चितपणे जबाबदार आहे. 

एकूण अशा सवंग कंटेंटला लाल गालिचा अंथरण्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या बाजारशरण धोरणामुळे युवा वर्गात असंवेदनशीलता वाढते आहे.  वास्तवाविषयीची त्यांची  धारणा  विकृतीकडे झुकते आहे. यात शेवटी सामाजिक मूल्यांची झीज होते आहे. अनैतिकता समाजात काही प्रमाणात असतेच हे सत्य मान्य केले आणि समाज कधीच काळा किंवा पांढरा नसून करडा असतो हे स्वीकारले तरीही अनैतिकतेचे  उदात्तीकरण करणारे कंटेंट पाहणारे ,त्याच विचारसरणीसह मोठे होणारे तरुण उद्याचे नागरिक म्हणून देशासाठी धोक्याचे ठरले तर याला जबाबदार कोण!  यशस्वी, सशक्त आणि चांगल्या समाजाचे स्वप्न यामुळे धुळीस मिळण्याची शक्यता आहे. वेळीच याला लगाम घातला नाही तर संभाव्य परिणामांसाठी आपल्याला तयार राहावे लागेल. 

 या माध्यमाने प्रेक्षकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे केवळ उल्लंघनच केलेले  नाही तर मिळवलेल्या माहितीचा गैरवापर होण्याची भीती इथे आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात वापरकर्त्यांचा डेटा गोळा करतात. त्याच्या कंटेंटविषयक सवयी, प्राधान्यक्रम आणि त्याची वैयक्तिक माहिती यात समाविष्ट असते.  जरी हा डेटा वापरकर्त्याला आवडीनुसार कंटेंट उपलब्ध करून देण्याचा नावाखाली गोळा केला जात असला तरी यातून वापरकर्त्याच्या डेटा सुरक्षा आणि संरक्षणाबाबत प्रश्न निर्माण होतात.

ओटीटीला प्रेक्षक म्हणून भौगोलिक मर्यादा नाहीत. त्याची पोच जागतिक पातळीपर्यंत असल्याने नकळत स्थानिक घटकांना इथे दुय्यम स्थान मिळते.  या प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय उत्पादनांचे वर्चस्व वाढत असल्याने, स्थानिक आणि प्रादेशिक उत्पादनांना आव्हान निर्माण झाले आहे. 

बिंज वॉचींग म्हणजेच सलग एखाद्या मालिकेचे सगळे भाग पाह्त सुटणे. रात्र रात्र जागून केलेले बिंज वॉचींग हे एक नवे व्यसन ठरले आहे. या व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. जास्त वेळ स्क्रीन पाहत राहिल्याने व बैठया जीवनशैलीमुळे तरूण धड झोप घेत नाहीत. त्यांचा सामाजिक संवाद कमी झाल्याने एकटेपणा आणि एकाकीपणाची भावना त्यांच्यात वाढते आहे.  माणूस हा सामाजिक प्राणी आहे. एकटेपणाचा त्याच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मानसिक आरोग्याशी संबंधित आजार आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे.

या प्लॅटफॉर्मचे सभासदत्व घेण्यासाठी काही वार्षिक शुल्क द्यावे लागते. ते टाळण्यासाठी इथले कंटेंट चोरून प्रसारित करण्याचे प्रमाण वाढले आहे. नकळतपणे कॉपीराइट उल्लंघन आणि पायरसीमध्ये वाढ झाली आहे.  याचा तोटा केवळ कंटेंट तयार करणारे, निर्माते आणि वितरक यांनाच होतो असे नाही. बौद्धिक संपदा अधिकाराविषयीचे नवे प्रश्न या चोरीतून उभे राहत आहेत. 

ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजन उद्योगात क्रांती घडवून आणली आहे आणि प्रेक्षकांना अभूतपूर्व सोयी आणि निवडीचा हक्क दिला आहे.  परंतु त्याची अतिरेकी पोच आणि तुलनेने शिथिल नियमन कायदयाला आव्हान देते आहे. यावर गांभीर्याने विचार आणि संवाद आवश्यक आहे. ओटीटीने स्वत:चा विकास साधताना  नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा बळी देता कामा नये एवढी अपेक्षा पूर्ण होत नसल्याने सुजाण नागरिकांनी व देशाच्या माहिती व प्रसारण खात्याने या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.  

Friday, October 20, 2023

सजन रे झूठ मत बोलो

 
’आज रात्री २ वाजता कॉस्मॉस किरणे पृथ्वीवर येणार असून त्यामुळे अमुक तमुक दुष्परिणाम होणार आहेत’ अशी पोस्ट तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा सोशल मिडियावर सुरूवातीच्या काळात एकदा तरी नासाच्या नावानं आली असेल. ’थंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे’ नावाची एक भन्नाट पोस्ट विकास आमटे यांना जास्त आश्चर्यचकित करत त्यांच्या नावानं फिरत असे.

अशा कित्येक असंबद्ध , कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट्स बरेच जण खर्या समजत. सामाजिक जबाबदारी म्हणून कॉस्मॉस किरणं येण्याच्या आत लगबगीने फॉरवर्ड करत. पोस्टखाली नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील यांच्यापासून थेट स्वामी विवेकानंद, आईन्स्टाईन अशी भारी भक्कम नावं वाचल्यावर पोस्टच्या सत्यते आणि गुणवत्तेविषयी त्यांना विश्वास दाटून येत असे.
सोशल मिडीयाच्या उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यावर नवशिक्या मंडळींकडून असं घडणं हे थंड केलेल्या लिंबाच्या उपयोगांइतकं आश्चर्यकारक नसलं तरी स्वाभाविक होतं.
कालांतराने पाटेकरांनी ’तो मी नव्हेच’ हे स्वत: स्पष्ट केलं. आईन्स्टाईनने सुद्धा संशोधन सोडून असले उद्योग केले नसतील हे जनतेच्या लक्षात आलं. या पोस्ट्स व्हॉट्सअॅप विद्यापीठात स्वत:च्याच मार्गदर्शनाखाली पीएचडी करणार्या शब्दप्रभूंनी फावल्या वेळात लिहिलेल्या असतात इतपत ज्ञान सगळ्यांना झालं. हे प्रकार कमी झाले पण दुसर्या टप्प्यावर ’माझा नंबर पहिला’ चढाओढीत सामील काही जण एखादी प्रसिद्ध व्यक्ती आजारी असल्याचं कळताच ऐकीव माहितीवर त्यांना श्रद्धांजली वाहणार्या पोस्ट्स पाठवू लागले. ब्रेकिंग न्यूजच्या चुरशीत अगदी प्रख्यात माध्यमांनीही असे घोळ केले. याशिवाय खर्या भासतील अशा पण निराधार पोस्ट्स ’fowarded as received' (थोडक्यात ’तुमचं तुम्ही काय ते पाहून घ्या, मी तो हमाल भारवाही’ ) अशा तळटीपेसह धडाक्यात फॉरवर्ड होऊ लागल्या. बायका आळशी होतील या भयाने, फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेत भूत अवतरत असल्याच्या चित्तचक्षुचमत्कारिक पोस्ट, कॅन्सरवरचे रामबाण उपाय, तमुक नामवंत कंपनीत नोकरीच्या संधी आणि भलतेच फोन नं, अबक कंपनीच्या पिठातल्या भेसळीचे व्हिडिओ, एखाद्या वलयांकित व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल छातीठोकपणे केलेले दावे, मोफत भेटवस्तू देणार्या वेबसाईटच्या लिंक्स इ. मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागलं.
स्पर्धक कंपन्यांची डिजिटल टीम, प्रसिद्ध व्यक्तीचे राजकीय किंवा व्यावसायिक चमचे अथवा शत्रू, , व्हॅलेंटाईन डे ला थेट विरोध न करता भगतसिंगांना अकारण मध्ये आणणारी संस्कृतीदक्ष चतुर मंडळी, पोळी विरूद्ध भाकरी -आयुर्वेद विरूद्ध अॅलोपॅथी- नास्तिक विरूद्ध आस्तिक इ. गटांचे कडवे कार्यकर्ते वगैरे यामागचे सूत्रधार म्हणून कार्य करू लागले.
वर उल्लेख केलेल्या कारणांशिवाय असल्या पोस्ट्स किंवा यूट्यूब व्हिडीओज शहानिशा न करता फॉरवर्ड करण्यामागे केवळ विरंगुळा, गंमत, नाती घट्ट करायचं साधन, आपल्या माणसांची वा संस्कृतीच्या -हासाविषयी काळजी असेही हेतू असतात. FOMO किंवा कंटाळवाण्या आयुष्यात सनसनाटी निर्माण व्हावी म्हणून केलेला उद्योग हे ही कारण त्यामागे असू शकतं. मुळात गजाली म्हणजे गॉसीप, सांगोवांगीच्या गोष्टी माणसाला मनापासून आवडतात. समोरच्याने थक्क होऊन ’काय सांगता !’ म्हटलं की पोस्ट पाठवणार्याचा उर भरून येऊन त्याच्या या श्रमाचं चीज होत असावं.
गॉसीप किंवा आंधळेपणाने केलेल्या फॉरवर्डमागचे हेतू थंड केलेल्या लिंबाइतपत निरुपद्रवी असतात तोवर यामुळे होणार्या सामाजिक परिणामांना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या खुलाशाच्या पोस्ट्स किंवा व्हिडीओद्वारे काही प्रमाणात अटकाव करता येतो. परंतु नकारात्त्मक , विकृत हेतू ठेवून अशा पोस्ट्स/बनावट व्हिडिओ तयार करणं किंवा ठरवून व्हायरल करणं अतिशय गंभीर कृती आहे. हा तिसरा टप्पा समाजासाठी, देशासाठीच नव्हे तर अवघ्या विश्वासाठी धोकेदायक ठरला आहे.
हे आजचं नाही.
२००० वर्षांपूर्वी रोमन रिपब्लिकच्या गृहयुद्धात मार्क अँटनी विरुद्ध लढताना ऑक्टाव्हियनने मार्कचे इजिप्शियन राणीशी प्रेमसंबंध असल्याने व तो व्यसनी असल्याने पदास लायक नसल्याच्या कंड्या पिकवून प्रजेला गोंधळात टाकलं होतं. इ.स १७०० च्या सुमारास आयर्लंडचा राजा जॉर्ज द्वितीय याला नामोहरम करण्यासाठी ग्रेट ब्रिटनमध्ये राजा आजारी असल्याची खोटी बातमी प्रसृत करण्यात आली होती.
पुलित्झरचे ’न्यूयॉर्क वर्ल्ड’ आणि हर्स्टचे ’न्यूयॉर्क जर्नल’ यांच्यातील स्पर्धा १८९५ ते १८९८ मध्ये टोकाला पोचली होती. दोन्ही वृत्तपत्रं इरेस पेटून एकाहून एक खळबळजनक बातम्या छापत सुटली होती. इतिहासातील या घडामोडींचे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम त्या त्या भूभागापर्यंत मर्यादित होते. इंटरनेटवरच्या अफवा मात्र कोविडने केलं नसेल इतकं जगाचं नुकसान करत आहेत.
खोटे संदेश तयार करून, फोटो मॉर्फ (हवे तसे बदल) करून, त्यावरून गोलमाल व्हिडीओ तयार करून किंवा चिथावणीखोर मजकूर अधिक भडकवून फॉरवर्ड केल्याने अफवा पसरतात. यामुळे जाती जमातींमध्ये दहशत निर्माण होते तर कधी प्रचंड आर्थिक नुकसान. एखाद्या नेत्याला विरोध म्हणून चांगल्या राजकीय प्रकल्पात खोडा घातला जातो किंवा एखाद्याचा सूड घेण्यासाठी, त्याचं प्रतिमाभंजन करण्यासाठी हे मुद्दाम केलं जातं.
या वर्षी मे महिन्यात सोशल मिडियावरील भडकाऊ संदेशांमुळे अकोल्यात मोठी आंतरधर्मीय दंगल उसळली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचे संदेश व्हायरल झाले होते. नाशिकजवळ प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरूणाला आणि नंतर दोन ब्लँकेटविक्रेत्यांना तसंच सांगलीत काही साधूंना या अफवेच्या पार्श्वभूमीवर संशयावरून स्थानिकांनी बेदम मारहाण केली होती. ज्या लसीमुळे आज कित्येक भारतीय सुखरूप आहेत त्या लसीविरोधात कोविडकाळात सोशल मिडियाद्वारे हेतूपुसस्सर संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं.
फेक न्यूज पसरवण्याच्या शर्यतीत कोणताही देश मागे नाही. अमेरिकेत चक्रीवादळ येत असल्याच्या बातम्या व्हायरल करून घबराट पसरवण्याचा समाजकंटकांचा उद्देश सफल झाला होता. २०१६ म्हणजेच निवडणूक काळात अमेरिकेत ’पिझ्झागेट’ नावाने एक षडयंत्र रचण्यात आलं. क्लिंटन दांपत्याविषयी गंभीर स्वरूपाच्या बातम्या वणव्यासारख्या पसरवल्या गेल्या. पिझ्झा रेस्टॉरंट चालविण्याच्या नावाखाली ते बाल लैंगिक तस्करी करत असल्याचा खोटा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. रेस्टॉरंटच्या तळघराचे आणि तिथे डांबलेल्या मुलांचे म्हणून वेगळेच फोटो पुरावे म्हणून शेअर केले जात होते. संतापून नागरिकांनी निदर्शनं करायला सुरुवात केली परंतु लवकरच हे फेक असल्याचं सिद्ध झालं. अन्यथा या घटनेनं त्यांना आयुष्यातून किंवा राजकारणातून कायमचं उठवलं असतं. बलाढ्य विरोधी गटाने हे घडवून आणलं होतं.
जगातल्या दोन महासत्तांद्वारे सोशल मिडियाचा वापर हव्या त्या बातम्या बेमालूम पेरून राजकीय उलथापालथी घडवण्यासाठी व मतपेट्यांची गणितं बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत होताच. आता तर ऑक्सफर्ड रिसर्च ग्रुपच्या माहितीनुसार इस्रायल -हमास युद्धाबाबत दोन्ही बाजूंचे समर्थक व विरोधक मिळून तब्बल ८१ देश खोट्या प्रचार मोहिमा राबवत आहेत. या युद्धाच्या परिणामांच्या नावाखाली भूतकाळातील अन्य युद्धांचे फोटो बिनदिक्कत शेअर करण्यात येत आहेत. बॉट्सचा वापर, बनावट खाती व हॅकिंगची मदत घेऊन जनमत बदलण्यासाठी तर कुठे दिशाभूल करण्यासाठी तर कुठे सत्य दडपण्यासाठी हे सगळं खालच्या पातळीवर सुरु आहे.
कोरोनानंतर सुरू झालेली कित्येक क दर्जाची वेब पोर्ट्ल आपलं दुकान चालावं म्हणून अनेक खोट्या बातम्या/व्हिडीओ सवंग पद्धतीने सादर करतात. बेकार पीत पत्रकार पैशासाठी त्यांना हे रचून देतात. लिंक दिली आहे म्हणजे हे खरंच असलं पाहिजे असं वाटून तंत्रज्ञानाच्या वापराचं जुजबी ज्ञान असलेला सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्ता अशा वेळी गोंधळून जातो. मात्र सत्यापर्यंत पोचणं अशक्य नाही.

मुळात सत्यशोधन करायला विवेक जागृत असायला हवा. संदर्भ द्यायला /विचारायला हवेत. गुगलवरील रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने फोटो खरा आहे की बनावट हे शोधता यायला हवं.
विश्वासार्ह स्रोतांनी दुजोरा दिल्याशिवाय आणि असला तरी आवश्यकता असल्याशिवाय कोणतीही माहिती पुढे पाठवण्याचा मोह टाळायला हवा.
तरीही चूक झाल्याचं कुणी लक्षात आणून दिलं तर ती मान्य करून दुरूस्त करून संबंधितांना ते कळवण्याचा मोठेपणाही दाखवायला हवा. एकूण माध्यमशिक्षित व्हायला हवं.
याशिवाय वस्तुथितीची खातरजमा करण्यासाठी अनेक वेबसाईट्स आहेत त्यांचा वापर करायला हवा. या वेबसाईट्स इंटरनेटवरील माहितीच्या महापुरात सूर मारून आपल्या हाती असलेली माहिती कितपत विश्वसनीय आहे हे संदर्भ तपासून सांगू शकतात.
factcheck.org, politifact.com, washingtonpost.com/news/fact-checker, bbc.com/news/reality_check या साईट्स व्यतिरिक्त
भारतातील altnews.in , boomlive.in , thequint.com/webqoof किंवा विविध भारतीय वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवरचे फॅक्टचेक विभाग या साठी उपलब्ध आहेत.
आता हे करणं जरा वेळखाऊ आहे खरं पण आपला एक चुकीचा फॉरवर्ड कुणाच्या जीवावर बेतणार असेल, कुणाचं थोडंसंही नुकसान करणार असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून सेंड बटण दाबण्याआधी एवढे कष्ट आपण घ्यायलाच हवेत. ती तयारी नसेल तर फॉरवर्ड करण्याची उबळ आवरण्यासाठी 'थँक यू फॉर डूइंग नथिंग’ असा संदेश असलेली एका चॉकलेटची जाहिरात आठवत थंड केलेल्या लिंबाचं सरबत घेत शांत बसणं हा उपाय आपल्याकडे आहेच.

पुण्यनगरी सदर - माध्यमतंत्र #fakenews