शिष्टाचार (एटिकेट्स) हा प्रकार बराचसा पाश्चात्य देशातून आपल्याकडे आला आहे. चौदाव्या लुईच्या काळात फ्रान्स हा देश जणू जगाचा केंद्रबिंदू होता. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बरेच फ्रेंच उमराव आपल्या रीतीभातींसह इंग्लंडमध्ये स्थानांतरित झाले. नंतर इंग्रजांच्या मार्फत सार्वजनिक जागी कसे खावे-प्यावे ,बोलावे, वागावे याचे संकेत त्यांच्या अंमलाखालील देशांमध्ये रूजले. आपल्या भारतीय संस्कृतीतही शिष्टाचार होते. त्यात जेत्यांचे पाश्चात्य शिष्टाचार अधिक मिसळल्याने ’सॉरी’ आणि ’थँक्यू’शिवाय आपले पान हालत नाही.
तंत्रज्ञानाने जग जोडले गेले तसे इथेही ’नेटीकेट्स’ ((इंटर)नेटवरील एटिकेट्स ) #Netiquette तयार झाले. इथल्या विवेकी लोकांनी ते रूढ केले. घरून ऑनलाईन काम करण्याच्या नव्या पद्धतीमुळे तर आभासी जगातली वर्तणूकच आपली प्रतिमा ठरू लागली. आता तर अगदी लग्न जुळवताना, नोकरी देताना, व्यावसायिक संबंध निर्माण करताना लोक नेटवरील प्रोफाईल, प्रतिक्रियांवरून एखाद्याचे व्यक्तिमत्व जोखू लागले आहेत. यामुळे इंटरनेटचा वापर कोणत्याही उद्देशाने करायचा असला तरी नेटीकेट्सची जाण अत्यंत गरजेची ठरली आहे.
असे असले तरी समाजात मनात येईल तसे वागणारे वीर असतातच. ’हम जहा खडे होते है लाईन वही से शुरु होती है’ असा त्यांचा बाणा असतो. स्वत:च फोन लावून हे समोरच्याला ’हॅलो कोण?’ विचारतात. समोरचा माणूस रिकामटेकडा आहे असे गृहित धरून फोनवर बोलायला सुरुवात करतात. हे निवेदक असतील तर वक्त्यापेक्षा जास्त बोलतात. संस्थाध्यक्ष असतील तर प्रमुखाच्या खुर्चीवर जाऊन बसतात. दिलेली वेळ पाळत नाहीत. कशीही शरीरभाषा वापरतात.
इंटरनेटवर वावरतानाही ते आपले गुणधर्म सोडत नाहीत. अशा लोकांचे तिथे हसे होते. ते सहसा यशस्वी होत नाहीत. एकटे पडतात. प्रसंगी त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागू शकते. एकूण सायबर विश्वातील सभ्यतेच्या संकेतांचा विचार करूनच तिथे वावरणे योग्य. काय आहेत हे संकेत !
इंटरनेटवर कोणताही इंग्लीश मजकूर किंवा इ-मेल पूर्ण कॅपिटल अक्षरांमध्ये लिहिणे म्हणजे डिजिटली किंचाळणे किंवा आरडाओरडा मानला जातो. आपल्या परिचयातल्या एखाद्या कर्कश्य आवाजात बोलणार्या व्यक्तीकडे जसे आपण वैतागून पाहतो तसे हा संदेश वाचणारा आपल्याकडे पाहत असतो. त्यामुळे आवश्यक तेवढी कॅपिटल अक्षरे वगळता एरवी लोअरकेस टायपिंग करावे.
व्यावसायिक इ-मेलला त्वरित, किमान चोवीस तासात प्रतिसाद देणे अपेक्षित असते. असे न केल्यास एखादी संधी हातची जाऊ शकते, प्रतिमा डागाळू शकते. मुळात आलेले इ-मेल स्वत: नियमित पाहावेत. नाहीतर अनेकांना मेल केल्याचा पुन्हा मेसेज करावा लागतो किंवा ’मेल पाहा ओ’ असे फोन करून सांगावे लागते. ’मिस्ड कॉल’ नामक मोफत आणि गमतीदार संदेशसेवा कल्पकतेने वापरण्यात तरबेज असलेल्या आपल्या भारतीयांना एका इ-मेलसाठी अशी २, ३ पद्धतीने आठवण करून द्यावी लागणे हा विरोधाभास नाही का !
इ-मेल वरचा 'रिप्लाय ऑल' टॅब ही काळजीपूर्वक वापरायची गोष्ट आहे. एखाद्याने १०० जणांना एकच मेल पाठवला असेल आणि उत्तर वैयक्तिक /वेगवेगळे अपेक्षित असेल तर ’रिप्लाय ऑल’ वापरून बिनकामाच्या ९९ इ-मेलची भर इंटरनेटवरच्या गर्दीत का घालायची ! इ-मेलवर व्यावसायिक किंवा महत्वाचे कारण नसताना सी सी वापरून इतरांचे मेलआयडी जगजाहीर करायचे नसतात. बी सी सी म्हणजे ब्लाईंड कार्बन कॉपी हा पर्याय शक्यतो वापरावा कारण यातले मेल आयडी एकमेकांना दिसत नाहीत
औपचारिक व्हिडिओ मिटिंग मध्ये अकारण उशीरा जॉइन होणे, उगाच मायक्रोफोन सुरू ठेवून इतरांना आपल्या घरातील कुकर, मिक्सरचे किंवा बडबडीचे आवाज ऐकवणे, घरच्या कपड्यात, वेडेवाकडे बसून खात पीत व्हिडिओ चालू ठेवणे, परवानगीशिवाय मध्ये बोलणे, आपसात चॅट करणे या गोष्टी चुकीच्या आहेत. अशा वागणुकीचा करियरवर, प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
इमोजींचा अतिरेक म्हणजे विदुषकी चाळे मानले जातात. इमोजी शब्दांच्या पलीकडची भाषा लीलया बोलू शकतात पण संदेशात इमोजींची आगगाडी असेल तर वाचणार्याची अवस्था ’भाई, कहना क्या चाहते हो’ अशी होणारच. अशा वेळी संदेश नीट पोचण्याऐवजी आपटण्याची शक्यता जास्त. आपल्या सगळ्याच्या सगळ्या भावना इमोजींवर लादून एकाच संदेशात कोंबून मुख्य आशयाला गुदमरून टाकण्याची गरज नसते. शक्य तिथे चपखल शब्द वापरावेत, आवश्यक असले तर इमोजी दो या तीनही अच्छे.
एखाद्याशी चॅट सुरु असताना मधूनच अंतर्धान पावण्याचा अनेकांना छंद असतो. उदा: समोरच्याला ताटकळत ठेवून आपण मध्येच सोशल मिडियावर फिरून किंवा दुसरे काम करून यायचे आणि त्याने तसेच केले की त्याला मात्र ’??????????????’ अशी चिन्हे पाठवायची ! संभाषण रटाळ असेल किंवा सहज गप्पा सुरु असतील तर ठीक पण व्यावसायिक संभाषणादरम्यान असे करणे अयोग्य ठरते. एक तर लगेच प्रतिसाद द्यावा किंवा आपण व्यग्र असल्यास समोरच्याला तसे नम्रपणे सांगावे असा हा साधा नियम आहे.
चॅट किंवा प्रतिक्रियेची भाषा योग्य व संयत असावी, राग आलाच तर फेसबुक/ट्वीटरवर न काढता मनात आकडे मोजावे. आपली बुद्धीमत्ता दाखवताना उपरोधिक, अवमानकारक बोलणे आवश्यक नसते. तोंडून गेलेल्या चुकीच्या शब्दाबद्दल ’आपण असे बोललोच नाही’ म्हणून लोक कानावर हात ठेवतात. इंटरनेट मात्र काहीही विसरत नाही. त्यावरचे लेखन डिजिटली नोंदले जाते. कधीही स्क्रीनशॉटच्या रूपाने दत्त म्हणून समोर उभे राहू शकते. तेव्हा ’आभासी’ माध्यमात कुणाला काय कळतंय , या भ्रमात न राहता खबरदारी घेतलेली उत्तम.
’थ्री इडीयट’ सिनेमामध्ये लग्नाच्या जेवणावळीत घुसणारे तीन हिरो आठवतायत ! न विचारता एखाद्याला टॅग करणार्या मंडळींकडे अशाच नजरेने पाहिले जाते. आपण कष्टाने जमवलेल्या फ्रेंडलिस्ट उर्फ मित्रपरिवारात स्वत:ची पोस्ट फुकटात व आगंतुकपणे घुसवणारी ही मंडळी एक तर महाचतुर असतात किंवा भाबडी. मधल्या फळीच्या राजकीय नेत्यांच्या प्रचारासाठी तर सर्व संकेत झुगारून टॅगींगचा तुफान वापर केला जातो. त्यांनी आडगाव बुद्रुकला केलेले हातपंपाचे लोकार्पण आणि रूग्णालयातील फळवाटप अवघ्या जगाला त्याशिवाय कळणार कसे!
संबंधितांना टॅग करणे चूक नाही. उलट लोकांनी एकमेकांना टॅग करत सुटावे अशी तमाम सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सची इच्छा असते. प्रश्न आहे परवानगीचा किंवा हेतूचा. अन्यथा आपल्याला आपल्या मैत्रिणीच्या मावसभावाच्या बायकोच्या ऑफीसमधल्या नवरात्र सेलेब्रेशनचे किंवा परगावच्या भावाच्या वरच्या मजल्यावरच्या घरातल्यांच्या नव्या कुत्र्याचे फोटो, हतबलतेने पाहत बसावे लागतात. यात आपला वेळ आणि उर्जा वाया जाते शिवाय नोटीफिकेशन डोके पिकवतात ते वेगळेच.
काही स्वघोषित मास्तर इथे सदैव हातात डीजिटल छडी घेऊन बसलेले असतात. गमतीने त्यांना ’ग्रामर नाझी’ म्हटले जाते. एखाद्याने लिहिलेल्या भल्या बुर्या पोस्टवर त्याविषयी चार शब्द लिहिणे अपेक्षित असते. ते सोडून त्या लेखनातली एखाद दुसरी चूक जणू जेवणात केस सापडावा तशी चिमटीत धरून ही मंडळी फक्त त्यावरच कॉमेंट करतात. पदार्थ कसा झालाय ते सांगतच नाहीत. एखादे वेळी ती ऑटो करेक्टने केलेली गडबड असू शकते. संदर्भातली किंवा जवळच्या व्यक्तीची चूक दुरूस्त करणे वेगळे आणि दिसेल त्याला छडी लगावणे वेगळे. एकूण जरा क्षमाशील होण्याचा प्रयत्न करायला हवा.
इंटरनेटवर ’एंटर’ बटण दाबण्यापूर्वी मुळात आपण लिहिलेला मजकूर निर्दोष व संदर्भासहित असल्याची खात्री केली तर संभाव्य गोंधळ टळतील. ते शक्य नसल्यास पोस्ट करण्याची खुमखुमी आवरावी.
सोशल मिडियावर ग्रुप फोटो पोस्ट करताना तो फोटो सार्वजनिक करण्यायोग्य आहे का हे पाहायला हवे. हे सापेक्ष असले तरी ग्रुपमधील मंडळींची परवानगी घ्यायला हवी. आपला वैयक्तिक फोटो पोस्ट करताना त्यात एखादी अनोळखी व्यक्ती स्पष्ट दिसत असेल तर तिचा चेहरा स्टीकरने झाकावा किंवा ब्लर करावा. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत ही काळजी अवश्य घ्यावी.
आपली पोस्ट करण्याची हौस इतरांच्या डाटापॅक, बँडविड्थ व मेमरी स्पेसच्या जीवावर पुरवू नये. एकावेळी ढिगाने फोटो अपलोड करून, अनेक फॉरवर्ड्स एकामागोमाग पाठवून स्वीकारणार्याच्या कपाळावर आठ्या आणणे टाळावे.
व्हिडिओ पोस्ट करताना तो कशाबद्दल आहे हे एका ओळीत न लिहिता बहुतेक लोक गुपित ठेवतात. त्यात गाझा प्रश्नापासून गच्चीवरील बागेपर्यंत किंवा ’पप्पांनी गंपती आनला’ पर्यंत काहीही असू शकते. त्या विषयात रस नसलेल्या किंवा पुनरावृत्ती नको असलेल्या लोकांचा तो डाऊनलोड व नंतर डिलिट करण्यातला वेळ आणि मेमरी स्पेस या कॅप्शनमुळे वाचते.
एखाद्याची पोस्ट शेअर केल्यास लिहिणार्याला त्याचे श्रेय कां कूं न करता द्यावे. लेखक माहित नसल्यास तसे स्पष्ट लिहावे. उल्लेख न केल्यास ती चोरी ठरते. काही थोर लोक अपण पोस्टमन नसून ती आपलीच पोस्ट असल्यासारखे कौतुकाच्या प्रतिक्रियांवर बदाम देत खुशाल आभार मानून मोकळे होतात.
पोस्ट न वाचताच लाईक ठोकणे, निरर्थक प्रश्न विचारणे टाळायला हवे.
जास्त पोहोच असलेल्या दुसर्याच्या पोस्टवर विषयानुरूप न बोलता आपल्या ट्यूशन क्लासेसची, केशतेलाची, घरपोच फराळ देण्याची, पत्रिका पाह्ण्याची वगैरे असंबद्ध जाहिरात फुकटात करू नये. असे प्रकार सवंग मानले जातात.
आपले प्रोफाईल लॉक करून दुसर्याला मित्र विनंती पाठवू नये. तसे करणे म्हणजे स्वत: लपून दुसर्याला शुकशुक करण्यासारखे आहे.
नेटीकेट्सच्या या यादीत तुम्हीही भर घालू शकता. इंटरनेट किंवा कुठलेही माध्यम नवीन असताना चुका होणारच. एकदा त्या माध्यमाला सरावल्यानंतर या ग्लोबल खेड्याचा एक चांगला नागरिक होण्याची इच्छा हवी. त्यासाठी ’नेटीकेट्स’ पाळून म्हणजे इंटरनेटवर आपल्याशी इतरांनी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण इतरांशी वागायला हवे. अन्यथा ... पेराल ते उगवेल.
#netiquettes #Punyanagari
No comments:
Post a Comment