Monday, May 31, 2021

उष:काल

 


उष:काल #सकाळ #या_जगण्यावर

अथांग समुद्राकडे शांतपणे पाहत उभं राहिलं की मनात काय येतं! निसर्गाचं अद्भुत रुप पाहून आपण स्तिमित होतो. त्याच्या विराटपणापुढे आपलं खुजेपण जाणवून मूक होतो. मग लक्ष जातं सागराच्या भरती- ओहोटीकडे. त्यात प्रतिबिंबीत होणार्या सूर्याच्या उदय-अस्ताकडे. द्वैताच्या जगाकडे. आपल्याकडे रात्र अवतरु लागली असली तरी दुसर्या बाजूला दिवस उजाडतो आहे या सत्याकडे. दृश्य बाजू हेच तात्कालिक सत्य वाटत असलं तरी तेव्हाही विरुद्ध बाजू अस्तित्वात असतेच. या दोन्ही बाजू एकमेकींना पूर्णत्व देतात. द्वैत हा निसर्गाचा स्वभाव आहे. विश्वाचा नियम आहे. त्यामुळेच विश्वाचा तोल सांभाळला जातो आहे.
खेळात सुद्धा एका पक्षाची हार ही विरोधी पक्षाची जीत असते. साधर्म्य म्हटले की वैधर्म्य आलेच. आजार आणि आरोग्य, कटूता आणि गोडवा, दु:ख आणि आनंद, भीती आणि निर्भयावस्था, निर्मोह आणि मोह, पानगळ आणि पालवी, झोप आणि जाग ते अगदी मृत्यु आणि जन्म असं हे द्वैताचं अफाट जग आहे. नाणं एकच, बाजू दोन. प्रेम आणि द्वेष, मीलन आणि विरह, नायक आणि खलनायक या द्वैतभावाचा प्रत्यय व्यावसायिक चित्रपट सुद्धा देतात. नाहीतर फक्त चांगल्या माणसांनी भरलेल्या जगात बिचार्या हीरोला करण्यासारखं काही कामच उरलं नसतं. 'द डार्क नाईट' या गाजलेल्या चित्रपटात एक प्रसंग आहे. नायक बॅटमॅन आणि खलनायक जोकरची निकराची झुंज सुरु असते. निर्णायक क्षणी जोकर म्हणतो," मी तुला कधीच संपवू शकत नाही कारण तू नसशील तर मी करु तरी काय! You complete me." जोकरचा हा प्रसिद्ध संवाद एक चिरंतन सत्य सांगतो. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. मग या दोन प्रवृत्ती दोन व्यक्तींमध्ये असोत की एकाच व्यक्तीच्या अंतरंगात. त्या एकमेकींविना अपूर्ण आहेत. एकीशिवाय दुसरीच्या अस्तित्वाला अर्थ नाही. जसा दु:खाशिवाय सुखाला नाही किंवा अपयशाशिवाय यशाला नाही.

जगभरात ही द्वैताची संकल्पना वेगवेगळ्या प्रतीकांद्वारे मांडली गेली आहे. अर्धनारीनटेश्वर हे भारतीय संस्कृतीतले प्रतीक. पुरुष आणि प्रकृती ही सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेतील दोन भिन्न पण परस्परपूरक तत्त्वं. यिन-यांग हे उर्जेचं वर्तुळ म्हणजे द्वैताचं चिनी प्रतीक. त्यांच्या मान्यतेनुसार यिन हा भाग नकारात्मकतेचं तर यांग हे सकारात्मकतेचं द्योतक. विश्वाचं वर्तुळ इंग्रजी एससारख्या रेषेने विभागलेलं असून एका वेळी यापैकी एका बाजूचं वर्चस्व असतं, विरुद्ध तरीही परस्परावलंबी अशा या दोन्ही बाजू मिळून विश्वाची लय सांभाळतात, संतुलन राखतात असं ते मानतात. यांग या सृजनाच्या, आशेच्या भागात विनाशाचं, निराशेचं तर यिन या विनाशाच्या भागात सृजनाचं, आशेचं एक सूक्ष्म बीज बिंदूरुपाने दर्शवलेलं असतं. अगदी अशीच प्रतिमा कुसुमाग्रजांच्या कवितेत रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल अशा तेजस्वी शब्दात सामोरी येते.
द्वैताचा पूर्णत्वाशी म्हणजेच अद्वैताशी असलेला हा संबंध जसजसा उलगडत जाईल तसतसं आपल्या आयुष्यातल्या उलथापालथींना आपण संयतपणे, अधिक समंजसपणे हाताळू शकू. भयभीत झालेल्या सभोवतालाला This too shall pass हे सांगू शकू. ज्या परिस्थितीला आपण बदलू शकत नाही तिचा स्वीकार करण्याचं आपल्याला बळ मिळो, जी परिस्थिती आपण बदलू शकतो ती बदलण्याचं धैर्य लाभो आणि या दोन्हीतला फरक समजून घेण्याची शहाणीव आपल्यात निर्माण होवो, ही चित्तशांती प्रार्थना आपल्या मनात रुजवू शकू. आपल्याला निवडीचा नसेल पण प्रयत्न करण्याचा अधिकार अवश्य आहे. पृथ्वीवर आपल्या बाजूला सध्या अंधार आहे, नंतर नियमानुसार प्रकाश येईलच, तो येतोच पण म्हणून वाट बघत न बसता माणसाने वीजेचा शोध लावलाच नं!
नाणं आत्ता आपल्याला हव्या त्या बाजूला पडलं नाही तरी द्वैताच्या जगाच्या संकेतानुसार 'अपना टाईम आयेगा' हे नक्की. त्यासाठी प्रयत्नवादाच्या हाताने नाणेफेक मात्र करत राहावी लागेल.

Monday, May 24, 2021

मनात घर करणारं घर

 


मे महिना म्हटलं की हमखास आजोळचं घर डोळ्यासमोर येतं. मामाने गाव बदललं. माया तीच असली तरी लहानपणच्या उन्हाळी दिवसांचा मनाला थंडावा देणारा आठव आजोळच्या, आता अस्तित्वातही नसलेल्या, जुन्या घरातच अजून अडकून पडला आहे. अंगाखांद्यावर अशा आठवणी खेळवणारी वास्तू कधी ना कधी थकते, खचते, संपते पण आयुष्यात कितीही स्थित्यंतरं झाली तरी मनात घर करुन कायम राहते. आजूबाजूच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जगाशी आपली नाळ जुळवून ठेवण्यासाठी, आपलं अवकाश शोधण्यासाठी आपण कधी हौसेने तर कधी नाईलाजाने घरं बदलत जातो. नोकरी, व्यवसाय, बदलतं सामाजिक स्थान, हिस्सेवाटे, बदली, विवाह, वार्धक्य, आपत्ती... ज्याची त्याची कारणं वेगळी असतात. स्वत:चं घर उभं करण्यात उमेदीची बरीच वर्ष निघून जातात. अखेर ते हाती येतं पण तोवर त्यातल्या पिल्लांना आपापल्या घरट्यांचे वेध लागलेले असतात.

नुकत्याच येऊन गेलेल्या वादळात कष्टाने उभे केलेल्या अनेक घरांचे पत्रे उडून गेले. जुजबी सामान सामावून घेणार्या नुसत्या चार भिंतींचे छपराविना उजाड फोटो बातमीसोबत होते. ते पाहून पोटात तुटलं. जग दुरावलं तरी घराचा आधार माणसाला आश्वस्त करत राहतो पण संकटाच्या थैमानाला बाहेर थोपवून धरणारं ते घरच कोलमडतं तेव्हा सावरणं कठीण होतं. गेल्या वर्षभरापासून आपला बहुतेक काळ घराच्या कुशीत व्यतीत होतो आहे. अशा विदारक परिस्थितीतही साथ देणारं घर, मग ते लहान- मोठं, टुमदार- अलिशान कसंही असो, त्याचं स्थान थेट आपल्या काळजात असतं. तिथे आपली वाट पाहणारं, आपलं यश साजरं करणारं, अपयशाच्या क्षणी जवळ घेणारं, कुणी तरी असतं. गंमत म्हणजे आपल्या राहत्या घरावर आपलं इतकं प्रेम असलं तरी आपलं स्वप्नातलं घर मात्र बर्याचदा वेगळच असतं. अगदी सरसकट वर्गीकरण नाही करता येणार पण गावातल्या बहुतेक लोकांना आटोपशीर अपार्ट्मेंटचं अप्रूप असतं तर शहरातल्या बहुतेकांना खेड्यामधले घर कौलारु साद घालत असतं. चंद्रमौळी घरांबद्दल त्यांच्या मनात एक रोमँटीसीझम असतो. पण चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या छपरातून चंद्र, चांदणं दिसतं, म्हणजेच ज्याचं छत फाटकं आहे असा अर्थ लक्षात येतो तेव्हा मनात चर्र होतं.
केरळमध्ये प्रवास करत असताना असंच एक स्वप्नातलं घर प्रत्यक्ष पाहिलं होतं. एखादं देखणं निसर्गचित्रं सजीव होऊन समोर यावं तसं. नदीला अगदी बिलगून असलेलं, आधुनिकतेचा स्पर्शही न झालेलं सताड उघड्या दाराचं सुबक खोपटं.
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ तुकडोजी महाराजांच्या या रचनेसारखं साधं, प्रसन्न, स्वागतशील.
हिरव्या रंगाच्या कितीतरी छटांनी वेढलेलं. फुलांनी डवरलेलं अंगण आणि त्या इवल्याशा घराला कवेत घेऊन आपल्या झावळ्यांनी थोपटणार्या नारळी फोफळी. अनिमिषपणे हे सारं पाहत असताना त्या घराला किती गैरसोयी, निसर्गाचे किती प्रकोप सहन करावे लागतात हे सांगून नावाड्याने आम्हाला जमिनीवर आणून सोडलं.
तसं पाहिलं तर घर म्हणजे दगड-विटा-मातीची एक निर्जीव वस्तू. पण त्यात राहणार्या माणसांची वृत्ती, भावना, विचार, परस्पर व्यवहार मिळून त्या घराचं व्यक्तिमत्व तयार होतं. त्याला चेहरा मिळतो. त्याच्यात प्राण फुंकला जातो. मग काही घरं सच्ची वाटतात तर काही दिखाऊ. काही उबदार वाटतात तर काही रुक्ष. काही हवीहवीशी तर काही टाळावीशी. आपलं घर नेमकं कसं आहे ! घर कसं असायला हवं हे हळूवारपणे सांगणारी 'घराचं मनोगत' नावाची एका अनाम कवीची मूळ इंग्लीश कविता मनाला स्पर्शून गेली.
या कवितेतलं घर म्हणतं -
" मला असं घर व्हायला आवडेल
जिथे मुलांच्या मित्रमंडळींना वाटेल अगदी घरच्यासारखं
जिथे ते निवांत पाय पसरुन बसू शकतील
आपल्या हाताने माठातून किंवा फ्रिजमधून
पाणी घेऊन पिऊ शकतील.. बिनदिक्कत
जिथे त्यांना कुणीही विचारणार नाही,
"तुझं 'आडनाव' काय?"...
असं घर.. जिथे त्यांना कोणी कशावरुनही जोखणार नाही
जे त्यांना स्वीकारेल सहजतेने, आपुलकीने
घरी, दारी, शाळा-कॉलेजमध्ये काहीही घडलं तरी
ते सांगायला जिथे त्यांना हक्काने धावत यावंसं वाटेल
मला असं घर व्हायला आवडेल... "
आपलं घर आहे का असं?

Monday, May 17, 2021

ऐकलंत का

 


#sakal #ya_jaganyavar #aiklat_ka

एका स्नेह्यांच्या मुलीची एका प्रख्यात चॅनेलवरच्या गाण्याच्या कार्यक्रमात निवड झाली. विशिष्ट गाणं आणि प्रशिक्षक मिळावा म्हणून सगळे पालक तिथल्या समन्वयकापाशी भुणभूण करायचे. निर्णय त्याच्या हातात नसला तरी हा समन्वयक सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा. चौकशा करणार्यांना ’बघून सांगतो हं’ आणि तक्रार करणार्यांना ’सांगून बघतो हं’ एवढी दोनच उत्तरं अगदी गोड हसून द्यायचा. त्याच्या चतुराईचा आणि गमतीचा भाग सोडला तर आपल्यालाही माहीत आहे की बर्याचदा बोलणार्याला फक्त त्या क्षणी आलेला राग, उद्वेग, किंवा नैराश्य व्यक्त करायचं असतं. प्रत्युत्तराऐवजी आपलं ऐकून घ्यावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपण मात्र अनेकदा एखादी व्यक्ती याच अपेक्षेने आपल्याला काही सांगू लागली की त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत " हे तर काहीच नाही.. आमच्याकडे तर ...." वगैरे बोलून, सांगणार्यावर नकळत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो.
’तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥’ पण सोशल मिडियाच्या कृपेने पृथ्वीतलावर बोलणार्यांची तोबा गर्दी झाली आहे. ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता मात्र मंदावली आहे. वाचन हे प्रकारचं श्रवणच. एकदा एकाने आपला केक खातानाचा फोटो सोशल मिडियावर टाकला आणि सोबत ’आज माझा वाढदिवस नाही, किती जण हे नीट वाचतात ते पाहण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे’ अशी पुस्ती जोडली. अपवाद वगळता बहुतेक प्रतिक्रिया ’वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देणार्याच होत्या. दुसर्या बाजूला, सध्याची विदारक परिस्थिती लक्षात घेता अनेक जण ’माझ्याशी केव्हाही मोकळेपणाने बोला’ असं आवाहन सोशल मिडियावर करताना दिसतात. त्यांचा हेतू उदात्त असतो पण भावनिक शेअरिंगसाठी आभासी जगापेक्षा प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा वेळ, लक्ष आणि सहस्पंदन अपेक्षित असतं. 'women don't have problem in speaking, they have problem in being heard' असं एका आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या ते याच अर्थाने. स्त्रियांच्या बाबतीत समाजपुरुष सोयीनुसार आणि बहुतेक वेळा, स्वत:ला हवं तेवढंच ऐकत आलेला आहे.
समोरचा माणूस कंटाळवाणं, निरर्थक बोलत असेल तर गोष्ट वेगळी, एरवी चांगला श्रोता ही आता दुर्मिळ प्रजाती होऊ लागली आहे. काही जण तर समोरचा बोलत असताना मोबाईल स्क्रोल करत त्याला ’तुमचं चालू द्या’ अशी खूण करतात. स्क्रीनमध्ये नजरा गाडलेली तरुणाई संवादकौशल्याला मुकण्याची भीती वाटते. नजरेला नजर देऊन ऐकणं हे त्यात आलंच. स्क्रीनवरच्या शब्दचित्रांच्या महापुरात वाचलेल्या, ऐकलेल्या एखाद्या विशेष मुद्द्यापाशी थबकून तो मनात मुरवत त्या आकलनाचा आनंद घेणं अवघड होत चाललं आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी हे जसे वाणीचे टप्पे आहेत तसे लक्षपूर्वक ऐकणं, बोलणार्याच्या भावनिक पातळीवर जाऊन श्रवण मग मनन हे ऐकण्याचे टप्पे. हे टप्पे समजून घेतले तर आपलं श्रवणकौशल्य विकसित होईल.
बरं, पण ते विकसित करून करायचं काय, याचं उत्तर ’व्हर्जिन’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन देतात. त्यांच्या आत्मिक आणि व्यावसायिक प्रगतीचं श्रेय ते स्वत:च्या श्रवणकौशल्याला देतात. ऐकून घेणार्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. फक्त व्याख्यातेच नव्हे, सफाई कामगारापासून उच्चपदस्थ अधिकार्यापर्यंत प्रत्येकाजवळ सांगण्यासारखं काही ना काही असतं. ते ऐकताना अनुभवाचं एक नवं विश्व आपल्यासमोर उलगडत जातं. वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो, अंतर्दृष्टी गवसते. केवळ यशस्वी होण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीही लक्षपूर्वक ऐकणं आणि त्यातलं मह्त्वाचं वाटेल त्याची नोंद घेत, शिकत, पुढे जात राहणं आवश्यक असतं. कान देऊन ऐकणारी व्यक्ती आयुष्यात कमी चुका करते आणि व्यवसायात तर या क्षमतेचा प्रचंड उपयोग होतो, असं ते म्हणतात.
तुम्हाला जर कुणाचंच ऐकण्यात रस नसेल तर तुमचं ऐकण्यात जगालाही रस वाटणार नाही इतकं हे साधं समीकरण आहे. ’(सिर्फ) मेरी आवाज सुनो’ च्या जगात इतरांचं जाऊ देत आपला आतला आवाज तरी आपण नीट ऐकतो आहोत का!

sakal -ya jaganyawar- May21