Monday, May 24, 2021

मनात घर करणारं घर

 


मे महिना म्हटलं की हमखास आजोळचं घर डोळ्यासमोर येतं. मामाने गाव बदललं. माया तीच असली तरी लहानपणच्या उन्हाळी दिवसांचा मनाला थंडावा देणारा आठव आजोळच्या, आता अस्तित्वातही नसलेल्या, जुन्या घरातच अजून अडकून पडला आहे. अंगाखांद्यावर अशा आठवणी खेळवणारी वास्तू कधी ना कधी थकते, खचते, संपते पण आयुष्यात कितीही स्थित्यंतरं झाली तरी मनात घर करुन कायम राहते. आजूबाजूच्या झपाट्याने बदलत चाललेल्या जगाशी आपली नाळ जुळवून ठेवण्यासाठी, आपलं अवकाश शोधण्यासाठी आपण कधी हौसेने तर कधी नाईलाजाने घरं बदलत जातो. नोकरी, व्यवसाय, बदलतं सामाजिक स्थान, हिस्सेवाटे, बदली, विवाह, वार्धक्य, आपत्ती... ज्याची त्याची कारणं वेगळी असतात. स्वत:चं घर उभं करण्यात उमेदीची बरीच वर्ष निघून जातात. अखेर ते हाती येतं पण तोवर त्यातल्या पिल्लांना आपापल्या घरट्यांचे वेध लागलेले असतात.

नुकत्याच येऊन गेलेल्या वादळात कष्टाने उभे केलेल्या अनेक घरांचे पत्रे उडून गेले. जुजबी सामान सामावून घेणार्या नुसत्या चार भिंतींचे छपराविना उजाड फोटो बातमीसोबत होते. ते पाहून पोटात तुटलं. जग दुरावलं तरी घराचा आधार माणसाला आश्वस्त करत राहतो पण संकटाच्या थैमानाला बाहेर थोपवून धरणारं ते घरच कोलमडतं तेव्हा सावरणं कठीण होतं. गेल्या वर्षभरापासून आपला बहुतेक काळ घराच्या कुशीत व्यतीत होतो आहे. अशा विदारक परिस्थितीतही साथ देणारं घर, मग ते लहान- मोठं, टुमदार- अलिशान कसंही असो, त्याचं स्थान थेट आपल्या काळजात असतं. तिथे आपली वाट पाहणारं, आपलं यश साजरं करणारं, अपयशाच्या क्षणी जवळ घेणारं, कुणी तरी असतं. गंमत म्हणजे आपल्या राहत्या घरावर आपलं इतकं प्रेम असलं तरी आपलं स्वप्नातलं घर मात्र बर्याचदा वेगळच असतं. अगदी सरसकट वर्गीकरण नाही करता येणार पण गावातल्या बहुतेक लोकांना आटोपशीर अपार्ट्मेंटचं अप्रूप असतं तर शहरातल्या बहुतेकांना खेड्यामधले घर कौलारु साद घालत असतं. चंद्रमौळी घरांबद्दल त्यांच्या मनात एक रोमँटीसीझम असतो. पण चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या छपरातून चंद्र, चांदणं दिसतं, म्हणजेच ज्याचं छत फाटकं आहे असा अर्थ लक्षात येतो तेव्हा मनात चर्र होतं.
केरळमध्ये प्रवास करत असताना असंच एक स्वप्नातलं घर प्रत्यक्ष पाहिलं होतं. एखादं देखणं निसर्गचित्रं सजीव होऊन समोर यावं तसं. नदीला अगदी बिलगून असलेलं, आधुनिकतेचा स्पर्शही न झालेलं सताड उघड्या दाराचं सुबक खोपटं.
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा ।
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥ तुकडोजी महाराजांच्या या रचनेसारखं साधं, प्रसन्न, स्वागतशील.
हिरव्या रंगाच्या कितीतरी छटांनी वेढलेलं. फुलांनी डवरलेलं अंगण आणि त्या इवल्याशा घराला कवेत घेऊन आपल्या झावळ्यांनी थोपटणार्या नारळी फोफळी. अनिमिषपणे हे सारं पाहत असताना त्या घराला किती गैरसोयी, निसर्गाचे किती प्रकोप सहन करावे लागतात हे सांगून नावाड्याने आम्हाला जमिनीवर आणून सोडलं.
तसं पाहिलं तर घर म्हणजे दगड-विटा-मातीची एक निर्जीव वस्तू. पण त्यात राहणार्या माणसांची वृत्ती, भावना, विचार, परस्पर व्यवहार मिळून त्या घराचं व्यक्तिमत्व तयार होतं. त्याला चेहरा मिळतो. त्याच्यात प्राण फुंकला जातो. मग काही घरं सच्ची वाटतात तर काही दिखाऊ. काही उबदार वाटतात तर काही रुक्ष. काही हवीहवीशी तर काही टाळावीशी. आपलं घर नेमकं कसं आहे ! घर कसं असायला हवं हे हळूवारपणे सांगणारी 'घराचं मनोगत' नावाची एका अनाम कवीची मूळ इंग्लीश कविता मनाला स्पर्शून गेली.
या कवितेतलं घर म्हणतं -
" मला असं घर व्हायला आवडेल
जिथे मुलांच्या मित्रमंडळींना वाटेल अगदी घरच्यासारखं
जिथे ते निवांत पाय पसरुन बसू शकतील
आपल्या हाताने माठातून किंवा फ्रिजमधून
पाणी घेऊन पिऊ शकतील.. बिनदिक्कत
जिथे त्यांना कुणीही विचारणार नाही,
"तुझं 'आडनाव' काय?"...
असं घर.. जिथे त्यांना कोणी कशावरुनही जोखणार नाही
जे त्यांना स्वीकारेल सहजतेने, आपुलकीने
घरी, दारी, शाळा-कॉलेजमध्ये काहीही घडलं तरी
ते सांगायला जिथे त्यांना हक्काने धावत यावंसं वाटेल
मला असं घर व्हायला आवडेल... "
आपलं घर आहे का असं?

Monday, May 17, 2021

ऐकलंत का

 


#sakal #ya_jaganyavar #aiklat_ka

एका स्नेह्यांच्या मुलीची एका प्रख्यात चॅनेलवरच्या गाण्याच्या कार्यक्रमात निवड झाली. विशिष्ट गाणं आणि प्रशिक्षक मिळावा म्हणून सगळे पालक तिथल्या समन्वयकापाशी भुणभूण करायचे. निर्णय त्याच्या हातात नसला तरी हा समन्वयक सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा. चौकशा करणार्यांना ’बघून सांगतो हं’ आणि तक्रार करणार्यांना ’सांगून बघतो हं’ एवढी दोनच उत्तरं अगदी गोड हसून द्यायचा. त्याच्या चतुराईचा आणि गमतीचा भाग सोडला तर आपल्यालाही माहीत आहे की बर्याचदा बोलणार्याला फक्त त्या क्षणी आलेला राग, उद्वेग, किंवा नैराश्य व्यक्त करायचं असतं. प्रत्युत्तराऐवजी आपलं ऐकून घ्यावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपण मात्र अनेकदा एखादी व्यक्ती याच अपेक्षेने आपल्याला काही सांगू लागली की त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत " हे तर काहीच नाही.. आमच्याकडे तर ...." वगैरे बोलून, सांगणार्यावर नकळत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो.
’तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥’ पण सोशल मिडियाच्या कृपेने पृथ्वीतलावर बोलणार्यांची तोबा गर्दी झाली आहे. ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता मात्र मंदावली आहे. वाचन हे प्रकारचं श्रवणच. एकदा एकाने आपला केक खातानाचा फोटो सोशल मिडियावर टाकला आणि सोबत ’आज माझा वाढदिवस नाही, किती जण हे नीट वाचतात ते पाहण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे’ अशी पुस्ती जोडली. अपवाद वगळता बहुतेक प्रतिक्रिया ’वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देणार्याच होत्या. दुसर्या बाजूला, सध्याची विदारक परिस्थिती लक्षात घेता अनेक जण ’माझ्याशी केव्हाही मोकळेपणाने बोला’ असं आवाहन सोशल मिडियावर करताना दिसतात. त्यांचा हेतू उदात्त असतो पण भावनिक शेअरिंगसाठी आभासी जगापेक्षा प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा वेळ, लक्ष आणि सहस्पंदन अपेक्षित असतं. 'women don't have problem in speaking, they have problem in being heard' असं एका आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या ते याच अर्थाने. स्त्रियांच्या बाबतीत समाजपुरुष सोयीनुसार आणि बहुतेक वेळा, स्वत:ला हवं तेवढंच ऐकत आलेला आहे.
समोरचा माणूस कंटाळवाणं, निरर्थक बोलत असेल तर गोष्ट वेगळी, एरवी चांगला श्रोता ही आता दुर्मिळ प्रजाती होऊ लागली आहे. काही जण तर समोरचा बोलत असताना मोबाईल स्क्रोल करत त्याला ’तुमचं चालू द्या’ अशी खूण करतात. स्क्रीनमध्ये नजरा गाडलेली तरुणाई संवादकौशल्याला मुकण्याची भीती वाटते. नजरेला नजर देऊन ऐकणं हे त्यात आलंच. स्क्रीनवरच्या शब्दचित्रांच्या महापुरात वाचलेल्या, ऐकलेल्या एखाद्या विशेष मुद्द्यापाशी थबकून तो मनात मुरवत त्या आकलनाचा आनंद घेणं अवघड होत चाललं आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी हे जसे वाणीचे टप्पे आहेत तसे लक्षपूर्वक ऐकणं, बोलणार्याच्या भावनिक पातळीवर जाऊन श्रवण मग मनन हे ऐकण्याचे टप्पे. हे टप्पे समजून घेतले तर आपलं श्रवणकौशल्य विकसित होईल.
बरं, पण ते विकसित करून करायचं काय, याचं उत्तर ’व्हर्जिन’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन देतात. त्यांच्या आत्मिक आणि व्यावसायिक प्रगतीचं श्रेय ते स्वत:च्या श्रवणकौशल्याला देतात. ऐकून घेणार्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. फक्त व्याख्यातेच नव्हे, सफाई कामगारापासून उच्चपदस्थ अधिकार्यापर्यंत प्रत्येकाजवळ सांगण्यासारखं काही ना काही असतं. ते ऐकताना अनुभवाचं एक नवं विश्व आपल्यासमोर उलगडत जातं. वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो, अंतर्दृष्टी गवसते. केवळ यशस्वी होण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीही लक्षपूर्वक ऐकणं आणि त्यातलं मह्त्वाचं वाटेल त्याची नोंद घेत, शिकत, पुढे जात राहणं आवश्यक असतं. कान देऊन ऐकणारी व्यक्ती आयुष्यात कमी चुका करते आणि व्यवसायात तर या क्षमतेचा प्रचंड उपयोग होतो, असं ते म्हणतात.
तुम्हाला जर कुणाचंच ऐकण्यात रस नसेल तर तुमचं ऐकण्यात जगालाही रस वाटणार नाही इतकं हे साधं समीकरण आहे. ’(सिर्फ) मेरी आवाज सुनो’ च्या जगात इतरांचं जाऊ देत आपला आतला आवाज तरी आपण नीट ऐकतो आहोत का!

sakal -ya jaganyawar- May21

Saturday, May 15, 2021

पुस्तक ते पडदा - प्रवास ’परिणीता’चा


लाईट- साउंड -कॅमेरा- अ‍ॅक्शन... आणि आपण एका दुसर्‍याच जगात प्रवेश केलेला असतो. अर्थात सिनेमा या कलाप्रकाराचे दर्शनी रुप ही चतु:सूत्री ठरवत असली तरी सिनेमाचा आत्मा असतो त्याचा आशय, त्याची पटकथा. ती जर सशक्त असेल तर त्यावर उभा राहणारा सिनेमा एखाद्या मनोर्‍यासारखा लक्षवेधी असतो, पिढ्यानपिढ्या चर्चेत राहतो नाहीतर भुईसपाट होतो. साहित्य शब्दांच्या माध्यमातून अविष्कृत होते तर सिनेमा बोलतो ते कॅमेर्‍याच्या माध्यमातून. गाजलेल्या साहित्यावर आधारित सिनेमे म्हणजे दोन लोकप्रिय कलाप्रकारांचे मीलन. यामुळे अभिजन वर्गापर्यंत मर्यादित राहिलेले साहित्य  जनसामान्यांपर्यंत पोचणे सोपे होते. वाचक आणि प्रेक्षक या दोघांचे रुपांतर ’रसिका’मध्ये होते. सिनेमा हा जणू धर्म असलेल्या आपल्या भारतीयांसाठी साहित्य आणि सिनेमा यांचे दृढ नाते परिचयाचे आहे ते अगदी 
दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय सिनेमापासून. 

भारतीय कलाविश्वात दोन वैचारिक परंपरा मानल्या जातात. रामायण परंपरेत मांगल्य, सौंदर्य, आदर्शवादाचे चित्रण केले जाते तर महाभारत परंपरेत मानवी विकार, लालसा, क्रौर्य, हिंसा, विकृती, विखार यांचे चित्रण परखडपणे केले जाते. ओटीटी वाहिन्यांचे प्राबल्य असलेल्या आजच्या काळात प्रेक्षकांचा कल पाहून बहुसंख्य नव्या सिनेमांनी किंवा वेबमालिकांनी आपला मोहरा महाभारत परंपरेकडे वळवल्याचे दिसून येते. याउलट रामायण परंपरेचे पाईक म्हणता येतील असे सिद्धहस्त लेखक शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या ’परिणीता’ या साहित्यकृतीवर आधारित याच नावाचा हिंदी सिनेमा ओटीटी वाहिन्यांच्या प्रेक्षकांसाठीही आकर्षणाचा विषय ठरतो आहे हे विशेष. प्रदीप सरकार दिग्दर्शित हा ’परिणीता’ सिनेमा २००५ सालचा. त्या आधी १९५३ मध्ये याच कादंबरीवर आधारित बिमल रॉय दिग्दर्शित हिंदी आणि १९६९ मध्ये अजॉय कर दिग्दर्शित बंगाली ’परिणीता’ येऊन गेला असला तरी कथेच्या आशयघनतेमुळे ही कलाकृती कालातीत ठरते. मूळ कादंबरी १९१४ मध्ये म्हणजे अगदी पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी लिहिली गेली असली तरी त्यातली प्रेमाची अभिव्यक्ती आधुनिकच नव्हे तर काळाच्या कितीतरी पुढची आहे. कदाचित त्यामुळेच आज शतक उलटले तरी ’परिणीता’ची जादू कायम आहे. 


'परिणीता' ही एक प्रेमकथा आहे त्याचबरोबर सामाजिक चालीरिती आणि त्यांचे उतरंडीच्या रचनेनुसार होणारे परिणाम यात भरडलेल्या जीवांची ही कहाणी आहे. नायक, नायिका आणि प्रेमाचा त्रिकोण देखील यात आहे परंतु या कादंबरीतले प्रेम पठडीतले नाही. ते अपारंपारिक आहे, तो भावनांचा अनेकपदरी गोफ आहे. ललिता ही 13 वर्षाची सालस आणि गुणी मुलगी. आपल्या मात्यापित्यांना गमावल्यामुळे ती आपल्या मामाकडे राहत असते. तिचे मामा गुरुचरण हे बँकेत लिपीक असतात. त्यांना पाचवी मुलगी झाल्याची वार्ता कळते तेव्हा ते खचून जातात. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी अगोदरच वडिलोपार्जित घर गहाण ठेवलेले असते. परिस्थितीची जाणीव असलेली ललिता मूकपणे मामा मामीला हातभार लावत असते. मामाच्या शेजारी राहणार्‍या धनाढ्य नवीनचंद्र राय यांचा मुलगा शेखर म्हणजे ललिताचा बालमित्र. ती आठ वर्षांची असल्यापासून या शेखरभैय्याकडे येत असते. तो तिला लिहावाचायला शिकवे, ललिताही त्याची लहानमोठी कामे आपुलकीने करी. शेखरला विचारल्याशिवाय ललिता काहीही करत नसे. अधूनमधून हातखर्चासाठी थेट त्याच्या कपाटातून पैसे घेण्याचीही तिला मुभा असे.  


जाणत्या वयात या लोभस मैत्रीचे रुपांतर नकळत अव्यक्त प्रीतीमध्ये होऊ लागते. वडील आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत याची शेखरला खात्री असते. यामुळे तिचे इतरत्र लग्न होईल याची त्याला भीती वाटू लागते. एके दिवशी ललिता सहज गमतीने अभावितपणे त्याच्या गळ्यात माळ घालते. शेखर मात्र तिच्यावरील गाढ प्रेम उमजून तीच माळ तिच्या गळ्यात घालतो. अचानक घडलेल्या या परिणय सोहळ्याला साक्षी असते ते फक्त त्या दोघांमधले मुग्ध प्रेम आणि योगायोगाने याचवेळी शेजारच्या घरी सुरु असलेल्या लग्नसोहळ्यातले मंत्रोच्चार. दरम्यान पाहुणे म्हणून आलेले शेजारच्या चारुबालाचे मामा गिरिंद्र ललिताकडे आकर्षित होऊ लागतात. तिच्या कुटुंबियांना मदत म्हणून ते गुरुचरण यांना कर्जमुक्त करतात इतकेच नव्हे तर ते आजारी पडल्यावर हवापालटासाठी त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जातात. दुर्दैवाने गुरुचरण तिथेच शेवटचा श्वास घेतात. शेखर-ललिताच्या नात्याबद्दल अनभिज्ञ असलेले गुरुचरण ललिताची जबाबदारी आणि हात गिरींद्रच्या हाती सोपवून इहलोकाचा निरोप घेतात. शेखरला पती म्हणून मनानेच नव्हे तर कृतीनेही वरणारी आणि त्यामुळे स्वत:ला परिणीता मानणारी ललिता स्वत:ऐवजी आपल्या धाकट्या मामेबहिणीशी गिरींद्रचा विवाह घडवून आणते. गिरिंद्रचे देखणे रुप, श्रीमंती आणि एक सुरक्षित भविष्य यातले काहीही ललिताच्या पतीनिष्ठेच्या आड येत नाही. तिच्या अंतर्मनातील या उत्कट भावनेचे कादंबरीतले स्थान कृष्णासाठी मोरपिसाचे असावे तसे अलौकिक आहे. ललिताच्या दृष्टीने आपल्या दोघातील बंधन अतूट आहे, जणू विवाह-संस्काराच्या दर्जाचे आहे हे शेखरला अंत:करणातून जाणवते. ललिता आणि गिरींद्रबाबत झालेला त्याचा गैरसमज दूर होतो आणि दुसर्‍याच मुलीशी होऊ घातलेल्या लग्नाची तयारी शेखर थांबवतो. ललितावर नेहमीच माया करणारी शेखरची आई भुवनेश्वरी ललिताचा सून म्हणून अत्यानंदाने स्वीकार करते. अनुरक्तीच्या पल्याड जाऊन सर्वस्व झोकून देणार्‍या प्रेमाची ही हृद्य कहाणी, ती ही शरदबाबूंच्या प्रतिभ लेखणीतून उतरलेली.

एखाद्या प्रसिद्ध साहित्यकृतीवर सिनेमा बेतला असेल तर तो यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यातून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी कथेत जे जे हवे ते सारे या कथानकात आहे त्यामुळे ’परिणीता’ची निवड या सिनेमांच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी केली असावी. शरच्चंद्रांच्या १५-२० साहित्यकृतींवर हिंदी चित्रपट निघाले आहेत. ‘अपने-पराए’, ‘छोटी बहू’, ‘खुशबू’,‘स्वामी’ हे त्यातील काही मह्त्वाचे. त्यांच्या ‘देवदास’ची मोहिनी तर अजूनही उतरलेली नाही. सैगल, दिलीप कुमार, शाहरुख खानच्या कादंबरीशी बर्‍यापैकी प्रामाणिक असणार्‍या ’देवदास’पासून अभय देओलच्या देव-डी मधल्या आधुनिक देवदासपर्यंत याची अनेक रुपे सिनेसृष्टीत गाजली. शब्दातून निर्मिलेली कथा पडद्यावर यावी आणि प्रत्येक पिढीतील रसिक त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेत राहावे हे भाग्य अशा काही मोजक्याच साहित्यिकांना लाभते. विश्वस्तरावर प्रख्यात असलेल्या बंगाली साहित्यिकांचे उदाहरण द्यायचे झाले तर रवींद्रनाथ टागोर (‘चोखेर बाली’, ‘काबुलीवाला’, ‘तीन कन्या’, ‘उपहार’,’चारुलता’ इ.), विभूतिभूषण बंदोपाध्याय, सत्यजित रे ही नावे अग्रक्रमाने घ्यायला हवी. सत्यजित रे हे स्वत: जागतिक कीर्तिचे दिग्दर्शक असल्याने आपल्या किंवा इतरांच्या साहित्याला पडद्यावर अचूक साकारत. त्यांचे प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ’शतरंज के खिलाडी’चे व्यावहारिक गणित मात्र जमून आले नाही. कथेचा किंवा कवितेचा जीव लहान असल्याने ती फुलवणे कठीण होत असावे. मराठीतल्या महानोरांच्या ’अजिंठा’लाही ते आव्हान पेलले नाही. एकंदर सिनेमा निर्मितीसाठी कादंबरीला प्राधान्य मिळण्यामागे हेच कारण असावे.  

निर्माते - दिग्दर्शकांसाठी दर्जाशी तडजोड न करता साहित्यावर आधारित सिनेमा तयार करणे हे कायम एक आव्हान राहिले आहे. माध्यमांतर करताना बदल करणे अपरिहार्य असते. साहित्य हे बहुतेक वेळा आत्मविष्कारातून मिळणार्‍या आनंदासाठी निर्माण केले जाते. सिनेमाच्या बाबतीत मात्र अर्थकारण विसरुन चालत नाही. या ताणाचा परिणाम सिनेमावर होतो. अनेकदा तो कथेशी प्रतारणा करत रसिकानुययी होतो तर कधी भरकटतो. उदा: भंसालींच्या ’देवदास’मधल्या भपकेबाज आणि अतिविशाल सेट्च्या आवाक्यासमोर मूळ कथेतील प्रेमाची भव्यता खुजी ठरली. अशा अनुभवांमुळे जातीचे साहित्यप्रेमी सिनेमाला दुय्यम लेखतात. चिंतन, तत्त्वज्ञानाशी संबंध नसलेला सवंग कलाप्रकार मानतात. सिनेमाकडे प्रेक्षकाऐवजी कायम ’टीका’काराच्या भूमिकेतून पाहतात. त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी देखील दिग्दर्शकावर असते. परिणीताच्या बाबतीत दिग्दर्शकांनी दोन्हीचे उत्तम संतुलन साधले आहे.  

प्रदीप सरकार यांनी मूळ कादंबरीत केवळ करडी छटा असलेल्या नवीनचंद्र राय (शेखरचे वडील ) यांच्या पात्राला पूर्ण काळ्या रंगात रंगवले आहे. ललिताच्या मामांच्या वाड्याचा ताबा मिळवून त्यांना बेघर करुन त्या वाड्याचे तारांकित हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनसुबा ललिता ओळखते. गिरिंद्रने (इथे गिरिश) वेळीच केलेल्या आर्थिक मदतीमुळे तो धुळीला मिळतो. यामुळे संतापलेले नवीनचंद्र, शेखरच्या अनुपस्थितीत ललिताचा अपमान करुन तिला नोकरीवरून काढून टाकतात. दोन्ही घरांमध्ये रातोरात भिंत उभी करतात. तिने शेखरचा हवा तेव्हा वापर करुन घेतला आणि आता गिरिशला स्वत:ला विकले आहे असा ते शेखरचा समज करुन देतात. २००५ च्या काळात अपेक्षित असलेले धारदार नाट्य मूळ कादंबरीत नाही असे वाटल्याने त्यांनी हे बदल केले असावे. चोखंदळ प्रेक्षकांना ते कदाचित खटकतील परंतु सर्वसामान्य भावनाप्रधान भारतीय प्रेक्षकाला त्याच्या जातकुळीची वेदना, त्याचं शोषण पडद्यावर दिसल्याने तो सिनेमाशी घट्ट जोडला जातो आणि कादंबरीतून साकारलेली ’परिणीता’ सिनेमातूनही तितक्याच ताकदीने समोर येते. ललिताच्या मुख्य भूमिकेतील मीनाकुमारी (१९५३) आणि विद्या बालन (२००५) यांच्या सोज्ज्वळ सौंदर्य आणि परिणामकारक अभिनयाला यशाचे बरेचसे श्रेय जाते. मीनाकुमारी तर कसलेली कलावंत होती पण विद्द्याचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे कुठेही जाणवत नाही. 

माध्यमांतर होताना कितीही काळजी घेतली तरी काही गोंधळ होतात. विद्या बालन, सैफ अलीखान, संजय दत्त अभिनीत ’परिणीता’ मधला एक प्रसंग. त्यात काळ दाखवला आहे १९६० चा. तपशीलातील बारकाव्यांमुळे वाफेच्या इंजिनांपासून व्हिंटेज कारपर्यंत यातली प्रत्येक गोष्ट नेमकी. प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जाणारी. त्यातले एक स्त्रीपात्रं शिवणमशीनवर काम करताना दाखवले आहे. ते आधुनिक ’उषा’मशीन मात्र तोवर बाजारात आलेच नव्हते. अर्थात अशा चिमुकल्या गडबडीमुळे सिनेमाचा दर्जा कुठेही उणावत नाही पण माध्यमांतर करून एखाद्या साहित्यकृतीला पड्द्यावर दाखवण्याचे शिवधनुष्य़ पेलणे हे केवढे अवघड काम आहे याची कल्पना त्यावरून येते. ’परिणीता’च्या बाबतीत लेखक आणि सगळे दिग्दर्शक बंगाली असल्याने हे अधिक सहजपणे होऊ शकले असावे. साड्या नेसण्याच्या बंगाली पद्धतीपासून दुर्गापूजेपर्यंत बंगाली संस्कृतीचे असंख्य ताणेबाणे सिनेमाच्या दृक्श्राव्य अनुभवाला एक नवे परिमाण देतात.


समाजात काळानुसार घडणार्‍या सांस्कृतिक, नैतिक उलथापालथींचा विचारही सिनेमा सादर करताना करावा लागतो. कादंबरी प्रकाशित झाली त्या काळात म्हणजे ऐन इंग्रजी राजवटीत, १९१४ मध्ये भारतीय स्त्री-पुरुषाची मैत्री ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. १९५३ च्या काळातील स्वतंत्र भारतात बदलाचे वारे वाहू लागले असले तरीही भारतीय आचारविचार कायम होते. त्यामुळे तेव्हाच्या पडद्यावरच्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना केवळ हार घातल्याने, तो ही काहीशा गमतीच्या नादात, कुणी कुणाला थेट आयुष्याचा जोडीदार मानावे हे पचणारे होते. त्यातली नायिका खालमानेने बोलते, या मानलेल्या पतीला वाकून नमस्कार करते, नायक-नायिका एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. ती अंतर्मनाने त्याची होते. २००५ च्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना आधी थट्टेत मग गंभीरपणे माळा घातल्यानंतर भावनिक आवेगात ते शरीराने एकरुप होतात. मूळ कादंबरीत असे काही घडते तर कदाचित कादंबरीवर बहिष्कार टाकला गेला असता. २००५ च्या सादरीकरणात तिने अंतर्बाह्य त्याची होणे, असे न घडते तर त्यांच्या प्रेमाची उत्कटता आणि नात्याचे गांभीर्य कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोचले नसते. दोन्ही सिनेमात सामाईक गोष्ट म्हणजे या प्रसंगी ऐकू येणारे शेजारघरच्या लग्नातले मंत्रोच्चार आणि त्यामुळे या गुप्त नात्याला नकळत लाभलेले धार्मिक अधिष्ठान. त्यामुळे सामाजिक चौकटी मान्य असणार्‍या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनातून या नात्यावर आपसूक नैतिकतेची मोहोर उमटवली जाते. जागतिकीकरणानंतरच्या लिव्ह-इनच्या दिशेने पावले टाकणार्‍या पिढीला अशी अपघाताने घडलेली कृती म्हणजे जन्मभराचे लग्नबंधन ही गोष्ट स्वीकारार्ह वाटते किंवा पटू शकते ते केवळ एकाच कारणाने, कथेचा प्राण ज्याभोवती गुंफला आहे ते अलांच्छित, निरपेक्ष आणि नि:शंक प्रेम. पिढ्या बदलल्या, परिणयाच्या आणि सहजीवनाच्या संकल्पना बदलल्या तरी असे प्रेम जीवनाच्या गाभ्याशी होते, आहे आणि राहील. ते प्रेम जोवर तितक्याच आर्ततेने पडद्यावर साकारले जाते आहे तोवर ते प्रेक्षकांच्या मनात झिरपत, काळजात उतरत राहील आणि ’परिणीता’ एक सिनेमा म्हणूनही त्या त्या आवृत्तीत यशस्वी होत राहील.

कादंबरीचे यश हे लेखकाचे एकट्याचे असते. (हल्ली ते बरेचसे विपणन कौशल्यावरही अवलंबून असते हा भाग अलाहिदा) परंतु सिनेमाचे यश हे नेहमीच सांघिक कौशल्यावर अवलंबून असते. नाही म्हणायला विशाल भारद्वाजसारखे कसलेले दिग्दर्शक पटकथेपासून संगीतसंयोजनापर्यंत बहुतेक कामांचा भार एकट्याच्या शिरावर घेऊन थेट शेक्सपियरच्या कलाकृतींचे देखणे माध्यमांतर करून दाखवतात. (ऑथेल्लोवरुन ओंकारा, हॅम्लेटवरुन हैदर, मॅकबेथवरुन मकबूल इ.) त्यांनी तर ही कथानकं भारतीय मातीत अशी काही घोळवली आहेत की ते परकीय साहित्यावर बेतल्याचे प्रेक्षक पार विसरुन जातो. साहित्य असो वा सिनेमा दोन्हीचा ’रंजकपणे कथा सांगणे’ हाच मुख्य उद्देश असतो. सादरीकरणाच्या पद्धती आणि साधनं काळानुरुप बदलत जातात पण त्या कथेद्वारे वाचक/ प्रेक्षकांना एका उत्तम कलाप्रकाराचा आस्वाद घेता यावा आणि त्यांचे बौद्धिक उन्नयन व्हावे हा हेतू बदलत नाही. ‘उत्तम कलाकृती त्याला म्हणतात जी आपली आयुष्यविषयक जाण वाढवते.’ कोणत्याही कलाकृतीच्या गुणवत्तेच्या मापनाचा विजय तेंडुलकरांनी सांगितलेला हा चपखल निकष. ’परिणीता’बाबत बोलायचे तर स्थळ, काळ, दृश्य, ध्वनी आणि अभिव्यक्ती या सगळ्या कसोटींवर बंगालीसह दोन्ही हिंदी चित्रपट चोख ठरले आहेत. शरच्चंद्रांसारख्या प्रतिभावंताच्या कथेमुळे आशयाबद्द्ल बोलायलाच नको. याशिवाय कलाकारांचा दर्जेदार अभिनय, कथेला पुढे नेणारी श्रवणीय, अर्थपूर्ण, सुरेल गाणी, सिनेमाच्या तरलतेला पोषक संगीत, कॅमेर्‍याने दिलेली नेमकी नजर आणि दिग्दर्शकाला सापडलेली प्रेक्षकांची नस या सर्व घटकांच्या बळावर शरच्चंद्रांच्या ’परिणीता’ला सिनेमातूनही न्याय मिळाला आहे असे नक्कीच म्हणता येईल. 

(Published in Dault-Lekhani magazine - Cinema and Literature special edition)