Saturday, April 10, 2021

The Great Indian Kitchen च्या निमित्ताने

"माझी बायको जेव्हा किचनमध्ये काम करते ना, ते तिच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं." आमचे एक स्नेही परवा कौतुकाने सांगत होते. ते आणि त्यांची बायको प्रथितयश डॉक्टर. कामाच्या व्यग्रतेमुळे रोजचा स्वैपाक, सगळं घरकाम करायला मदतनीस आहेत. कधीतरी बदल, छंद, मुलांची एखादी फर्माईश पुरी करायला म्हणून ती तिच्या अद्द्यावत किचनमध्ये जाते तेव्हा तिचं आनंदात असणं अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी मेनू ठरवणं, निगुतीने पूर्वतयारी करणं, मन लावून पदार्थ रांधणं, आपल्या माणसांना आग्रह करून प्रेमाने खाऊ घालणं यातला आनंद अगदी अपूर्व असतो.
एखाद्या पुरुषासाठीही असा बदल म्हणजे मेडिटेशन असू शकतं. परंतु या कामाची जोडी बाईशी लावायचं इतकं कंडिशनिंग झालंय की आपल्या नात्यातल्या स्त्रियांबद्दलच्या आपल्या आठवणी सुद्धा बहुतेक वेळा त्यांची खासियत असलेल्या विशिष्ट पदार्थांशी निगडीत असतात. जुन्या हिंदी सिनेमातल्या आयांना तर आपण कायम, अपने हाथोंसे बनाया हुआ गाजर का हलवा किंवा मूली के पराठे त्यांच्या मुलांना खाऊ घालताना पाहत आलो आहोत.
प्रत्यक्षात जेव्हा हे काम तुझंच म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो आणि त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो.

घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्या पुरुषांना त्यांचे काम करताना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. अपवाद वगळता बहुतेक पुरुष या संधीचा मनापासून लाभ घेतात.
A woman must have money and a room of her own if she is to write fiction या व्हर्जिनिया वुल्फच्या वाक्याकडे, हक्काचा अवकाश मिळाल्याशिवाय स्त्रियांना आवडीच्या क्षेत्रात आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर करता येत नाही, अशाही अर्थाने पाहता येईल. अशी मुभा स्त्रियांना क्वचित मिळते. मिळाली तरी तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, आम्ही तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. घरकामाच्या बाबतीत ’आता कुठे राहिलंय असं काही, उलट शेफ म्हणून पुरुषच जास्त दिसतात, आमचा मुलगा करतो सुनेला ’मदत’, शिवाय आता हवं ते विकत मिळतं, यंत्र असतातच हाताशी’ असं वाटणार्या मंडळींनी आपल्या पांढरपेशा खिडकीतून गगनचुंबी इमारतींपासून खेडोपाडी पसरलेल्या आपल्या महाकाय देशात कृपया नीट डोकावून पाहावं.
शेतावर मजुरी करुन खोपट्यात थकून परतलेले अशिक्षीत जोडपे असो किंवा आपापल्या ऑफीसमधून दमून घरी पोचलेले सुक्षिक्षित जोडपे, रात्रीच्या जेवणाचे आणि उद्याच्या डब्याचे काय करायचे याची चिंता आणि तजवीज करण्याची जबाबदारी आजही प्रामुख्याने बाईवर असते. बाईला बरेचदा वैताग येतो तो प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने तिला गृहित धरण्याचा. तिला तिचा अवकाश न मिळण्याचा. हे गृहित धरणं नंतर फक्त स्वैपाक किंवा घरकामापुरतं मर्यादित राहत नाही. याच वेदनेकडे Jeo Baby या दिग्दर्शकाला प्रेक्षकांचं लक्ष वेधायचं आहे.

ॅमेझॉन प्राईमवरील त्यांचा The great Indian kitchen हा मल्याळम सिनेमा व्यवस्थेपुढे मान तुकवू न शकणार्या एका संवेदनशील भारतीय स्त्रीची व्यथा उघड करुन दाखवतो. पार्श्वभूमी केरळची असल्याने यात सातत्याने दिसणारा आणि मग बोचणारा स्वैपाक, भवताल, केरळी पद्धतीचा असला तरी तपशीलात माफक बदल करुन ही कथा भारतातल्या कोणत्याही प्रांताला लागू होऊ शकते. त्यामुळे यातल्या नायिकेलाच काय कोणत्याही पात्राला नाव नाही. केरळी कुटुंबातली नवविवाहित स्त्री, तिचा नवरा, सासूसासरे यांच्याबरोबरच स्वयंपाक किंवा एकूणच घरकाम हे ही या सिनेमातलं एक महत्वाचं पात्र. ते पात्र चिरणे, कापणे, खवणे, सोलणे, तळणे, झाडणे, आवरणे, विसळणे, धुणे, पुसणे अशा न संपणार्या कृतींच्या त-हत-हेच्या आवाजातून सिनेमाभर सतत बोलत राहतं. या पात्राला सिनेमात इतकं फूटेज आहे की एका टप्प्यावर या अंतहीन कामामुळे त्या सुनेच्या दिनचर्येचा भाग असलेला वैताग आणि कंटाळा आपणही अनुभवायला लागतो. तरीही आपण तिची कथा खिळून पाहत राहतो कारण त्या क्षणापासून दिग्दर्शकाचा सिनेमा आपला सिनेमा झालेला असतो. त्याच्या कॅमेर्याची आणि आपली वेव्हलेंग्थ जुळलेली असते.

एक साधी सुशिक्षित नृत्यशिक्षिका तरुणी एका लहान गावातल्या शिक्षकाशी विधीवत लग्न करुन त्याच्या मोठ्या, सुखवस्तू पण जुन्या पद्धतीची रचना असलेल्या घरात येते. स्वयंपाक, घरकाम इतकंच नव्हे तर नवर्याला प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देणं, हे बाईचं प्राक्तन म्हणून स्वीकारलेल्या द्विपदवीधर सासूची तिला नव्या संसारात सुरुवातीला मदत होते. मुलीची प्रसूती जवळ आल्याने नाईलाजाने सासूला घराचा रामरगाडा नायिकेवर सोपवून जावं लागतं. तिची मुलगी (नायिकेची नणंद) निर्णय घेण्याचा हक्क असलेल्या मोजक्या स्त्रियांपैकी एक असल्याचे केवळ एका संवादातून, तिच्या देहबोलीतून सहज लक्षात येतं.
नायिकेच्या कामाला खंड नसतो. तिला बदली मदतनीस उपलब्ध असते ती केवळ ’त्या’ दिवसात. ती ही अर्थातच स्त्री. अंगण झाडले जाते, पडवी नियमित पुसली जाते, दिवे सवयीने घासले, पेटवले जातात, तव्यावर एकामागोमाग दोसे पसरवले जातात, सांबाराला फोडण्या दिल्या जातात, भात वैरला जातो, भाज्या चिरल्या जातात, बादली कचर्याने भरत जाते आणि कुपात रिकामी होत राहते. आपलं ताट उचलणं तर राहोच पण ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. चहा, नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण, पैपाहुणे... स्वैपाक तिन्हीत्रिकाळ शिजत राहतो आणि मूक होत गेलेल्या नायिकेला ’च’ पीडत राहतो. असे ’च’ घरोघरी असतात. कपडे हाताने धुणंच योग्य नाहीतर मशीनमुळे ते लवकर विरतात, आपल्याकडे सांबार आणि चटणी दोन्हीही लागतंच, ह्यांना चटणी पाट्यावरच वाटलेली आवडते, भात कुकरपेक्षा चुलीवरचाच चांगला लागतो. आणि हे सगळं असंच्च. रोज. अव्याहत.

हल्ली चुलीवरच्या स्मोकी चवीच्या स्वैपाकाचं अप्रूप आहे. चवीने जेवणार्याला वैविध्य हवंच असतं पण ही हौस पुरवायला चुलीपासून सुटका झालेल्या बायकांना पुन्हा चुलीकडेच जावं लागतं. जात्यावरच्या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं. आजही आपल्याकडे एखाद्या बाईच्या वाट्याला येणारं घरच्यांचं कौतुक हे तिच्या इतर क्षेत्रातल्या कर्तृत्वापेक्षा बहुतांशी तिच्या स्वयंपाक व घरकामाच्या गुणवत्तेवर जास्त अवलंबून असतं.. स्त्रीच्या अन्नपूर्णा या रुपाचं असं सोयीनुसार उदात्तीकरण केलं जातं. याविषयी एका लेखकाचा भावनाबंबाळ लेख समाजमाध्यमावर मध्यंतरी बराच फिरत होता.
ह्या लेखकाला त्यांच्या एका चाहत्या जोडप्याने घरी जेवायला बोलावले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य झाले. जेवणाचे बहुतेक पदार्थ दर्जेदार उपाहारगृहातून मागवण्यात आले होते. त्यांचा आस्वाद घेत जोडप्याने त्यांच्याशी अनेक विषयांवर मनापासून गप्पा मारल्या. लेखकरावांना असे तयार पदार्थ मागवणे अजिबात रुचले नाही. ही कसली संस्कृती, त्याऐवजी घरी केलेली साधी मुगाची खिचडी जरी खाऊ घातली असती तरी मला बरे वाटले असते अशी त्यांनी टिप्पणी केली. आता अशा मानसिकतेचे काय करावे! एक तर पाहुण्यांना बोलावले की कुणी फक्त मुगाची खिचडी करणार नाही. केलीच तर ती कुणी करायची अर्थात घरच्या बाईने. या बाईंना अन्नपूर्णेची नेहमीची भूमिका करण्याऐवजी आवर्जून आमंत्रित केलेल्या लेखकाबरोबर चर्चा करण्यात जास्त स्वारस्य होते हे स्वीकारणं लेखकाला एवढे अवघड का वाटावं! हळव्या, विचारी म्हणवणार्या सुबुद्ध लोकांच्या बायकांकडून इतक्या पठडीतल्या अपेक्षा असतील तर सर्वसामान्यांबद्दल काय बोलावं!

तर या सगळ्या ’च’ मुळे येणारा ताण, ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जाणं नायिकेच्या आत कुठेतरी धुमसू लागतं. नवर्याच्या दृष्टीने तुंबलेलं, गळणारं सिंक म्हणजे स्वैपाकघरातला अगदी क्षुल्लक प्रश्न. पण त्या सांडपाण्याच्या वासातून तिच्या मनाची सुटका होणं अवघड होतं. नवर्याबरोबर एकांतातही तो वास.. घरकाम नावाचं अदृश्य पात्र, तिच्या मेंदूत दबा धरून बसलेलं असतं. नुसत्या यांत्रिक क्रियेचा तिटकारा आल्याने त्याने आपल्या थकल्या जीवाला आधी किमान खुलवावं ही साधी अपेक्षा ती व्यक्त करते. ती पूर्ण होणं तर दूरच त्याला तिच्यात शेजे आणि पेजेच्या गरजेपलिकडे काही रस नाही हे तो स्पष्टपणे सांगतो. नायिका दुखावते. तिची घुसमट इथे थांबत नाही.
तिच्या नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला ठाम नकार, त्यातच मासिक पाळीचं स्तोम, शबरीमाला पार्श्वभूमीवर तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट डिलिट करण्याचा नवर्याचा आदेश, व्यवस्थेला शरण गेलेल्या तिच्या आईचीही तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एकामागोमाग घडणार्या अशा घटनांमुळे तिच्या मनात धुमसणार्या ठिणग्या पेट घेऊ लागतात आणि एका क्षणी याचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. तिथे आपण श्वास रोखून धरतो. सिनेमा फार ग्रेट नाही पण तो थेट भिडतो. Nimisha Sajayan आणि Suraj Venjaramoodu या मुख्य पात्रांचा जिवंत अभिनय, प्रत्ययकारी चित्रण, बांधीव पटकथा यामुळे तो आणखी प्रभावी ठरतो.

सिनेमा बघताना वाचल्याचं आठवलं, गेल्या पिढीचे लेखक जयवंत दळवी यांनी आपल्या आईचं अवघं आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात राब राब राबण्यात करपून गेल्याची कबुली एका लेखात दिली होती. हे गेल्या पिढीचे प्रातिनिधिक उदाहरण असले आणि आता परिस्थिती काही अंशी बदलली असली तरी या कामावरची ’दुय्यम’ आणि ’बायकी’ ही लेबल्स पुसली गेलेली नाहीत. "निवडणुकीच्या प्रचारातून वेळ मिळाला तर चेल्सीसाठी कुकीज बनवायला मला सर्वात जास्त आवडतं" हे हिलरी क्लिंटन यांचं वाक्य तेव्हाच्या काही अमेरिकन माध्यमांनी ’तर’च्या पुढच्या वाक्याची हेडलाईन करुन बाई शेवटी स्वैपाकघरातच रमू शकते, अशा पद्धतीने सादर केलं होतं. भारतीय समाजाला तर हे मनातून मान्यच आहे. ’किचन पॉलीटिक्स’ या एकमेव विषयाभोवती घुटमळणार्या सुमार मालिकांना मिळणारी अफाट लोकप्रियता त्याचे निदर्शक आहे.
काही उदार मंडळींची प्रगती ’बायको गेली माहेरी काम करी पीतांबरी’ या धर्तीवर ’अडायला नको म्हणून मुलाला जुजबी स्वैपाक आला पाहिजे’ इथपर्यंत झाली आहे. पण मुलीच्या जातीला मात्र तो व्यवस्थित आला’च’ पाहिजे याबाबत त्यांचे दुमत नाही.

मुळात स्वैपाक किंवा घरकाम हे केवळ जीवनावश्यक कर्तव्य नाही तर आयुष्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून सौंदर्य आणि अर्थ प्राप्त होतो त्यापैकी ती एक महत्वाची कृती आहे. उपलब्ध वेळ, आवड, कौशल्य आणि गरज याचा समन्वय साधून एकमेकांना हातभार लावत ती करणं ही घरातल्या प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमध्ये अचानक याची जाणीव झाल्याने जबाबदारी वगैरे म्हणणं जरा जास्त होईल, पण अनेक पुरुषांनी आपल्या घरातील स्त्रियांना स्वैपाकात, घरकामात ’मदत’ केली. काहींनी त्यावरून विनोद व्हायरल केले. बायकांना विनोदाचं वावडं नसतं पण पुरुषांनी हे काम करण्यात विनोद आहे असं अजूनही समाजाला वाटणं हाच मुळात एक विनोद आहे.
सामाजिक संस्थांच्या पाहणीनुसार अनलॉकबरोबर यातील बहुतेकांचा उत्साह मावळला आणि ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये कामाची व श्रमाची असमान विभागणी पूर्ववत झाली. या सिनेमाच्या नावात ’किचन’ असलं तरी सिनेमा सांगू पाहतोय ते व्यवस्थेबद्दल.
अशा मानसिकतेबद्दल. घरोघरच्या मातीच्या चुलींबद्दल. सिनेमापुरतं बोलायचं तर नायिकेने अमुक स्टँड घ्यायला हवा होता, तमुक करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया येत राहतील. आपण काय करायला हवं याचा विचार करायला मात्र हा सिनेमा आपल्याला भाग पाडतो.

published in Media Watch portal

Tuesday, February 9, 2021

लेका सांगे ब्रह्मज्ञान

 


"आमची मुलं अवांतर काही अजिबात वाचत नाहीत!" आजच्या बहुतेक पालकांची ही तक्रार असते. मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेल्या आपल्या मुलाच्या वयात शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला होता हे आठवून वैतागणार्‍या वडिलांना आपल्या वयाचे असताना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता हे ही आठवत असतं. तेव्हा मुलांनी खूप वाचावं अशी अपेक्षा करताना वाचनाच्या बाबतीत आपण किती पाण्यात आहोत, काय आणि किती वाचतो या्चा विचार पालकांनी करायला हवा. ’तुम्ही सध्या काय वाचता?’ या प्रश्नाला (अपवाद वगळता) बहुतेकांचं उत्तर ’हॅ हॅ हॅ, वेळच होत नाही हल्ली वाचाबिचायला’ हे असतं. नाही म्हणायला लॉकडाऊनमध्ये बर्‍याच जणांनी वाचनाकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न केला पण घरातली कामं बरीच वाढल्याने तो उत्साह हळूहळू मावळायला लागला. 


या पार्श्वभूमीवर एखादी ट्विंकल खन्ना लेकीसोबत रोज पंचवीस पानं वाचायचा संकल्प करुन त्या दोघींचा वाचतानाचा फोटो social media वर शेअर करते तेव्हा साधारणपणे पहिली प्रतिक्रिया उमटते -’तिच्याकडे छप्पन नोकर असतील कामाला मग काय वेळच वेळ!’ खरं तर ’मिसेस फनीबोन्स’ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारी ट्विंकल एक प्रसिद्ध लेखिका, ब्लॉगर, उत्तम वाचक आणि यशस्वी व्यावसायिक आहे. "पाहिलेलं किंवा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळेच मी अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले असले तरी लेखिका म्हणून यशस्वी ठरले आहे", असं ती म्हणते. वाचावंसं न वाटण्याचं किंवा वाचन कमी होण्यामागचं खरं कारण ’वेळ नाही’ हे नाही हे आपल्यालाही मनातून मान्य असतं. माहितीच्या महापुरात तग धरताना जग हळूहळू समजून घेण्याविषयीची कमी झालेली असोशी आणि वाचनातून मिळणार्‍या आनंदापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून विनासायास होणार्‍या रंजनाचे वाढते आकर्षण हे त्यामागचे कारण आहे. मुलांवर या माध्यमांचा पगडा पालकांपेक्षा जास्त असल्याने याचा परिणाम त्यांच्या वाचनावर होणार हे स्वाभाविकच. 

मग या अपराधी भावनेतून देण्याघेण्याच्या ब्लाउजपीससारख्या चार मोफत पीडीएफ इकडून तिकडे फॉरवर्ड केल्या म्हणजे आपली वाचनविषयक जबाबदारी संपत नाही. उलट त्यातून लेखक, प्रकाशकाच्या पोटावर पाय येण्याची शक्यता असते. बाहेर जेवायला हजारएक रुपये खर्च करणार्‍या पण दोनशे रुपयाचं पुस्तक विकत घेताना खळखळ करणार्‍या, ह्ल्ली ’चांगले’ लेखक सापडत नाहीत अशी ओरड करणार्‍या पालकांना आज एका क्लिकवर जागतिक साहित्य उपलब्ध आहे. अरविंद गुप्तांसारख्यांनी बालसाहित्याचा खजिना ऑनलाईन खुला केलेला आहे. मुळात आपण वाचन हे ज्ञान मिळवण्यासाठी, स्वत:चा विकास घडवण्यासाठी, स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी, अमुक तमुक अशा भव्यदिव्य कारणासाठी करण्याचा जितका प्रयत्न करतो तितके आपण वाचनापासून दूर जातो. वाचन निर्हेतूक असावं. असं वाचन आपच आत मुरत जातं. बाकी ज्ञानबिन, यशबिश मिळालंच तर ते त्याचे साईड इफेक्ट्स आहेत.अजिबात किंवा फारसं न वाचताही आयुष्यात आनंदी, समाधानी, यशस्वी असलेले लोक अर्थातच आहेत पण वाचन हे स्वत:साठी करायचं असतं हे कळलं आणि त्या प्रक्रियेतला निर्भेळ आनंद गवसला की वाचन आपसूक होत जातं. 

"काळ चंद्र सूर्यांच्या झांजा वाजवत पुढे चालला होता.." एका वाक्यात असं अद्भुत लिहिणार्‍या गेल्या पिढीतल्या ह.ना.आपटयांपासून, "discomfort is good. In discomfort we are real” असं रोखठोक लिहिणार्‍या गेल्या वर्षीच्या बुकरविजेत्या मारिएके रिज्नेवेल्डपर्यंत, काहीही निरुद्देश वाचताना जे धक्के, तरंग, विलक्षण क्षण अनुभवायला मिळतात ते अलौकिक असतात. त्यात अनेक उत्तरं नकळत सापडत जातात. ती आपली मालमत्ता असते. अर्थात काय वाचावं याबाबत मतभिन्नता असू शकते पण "तुम्ही जर चारचौघांसारखं चाकोरीतच वाचन केलं तर तुमचे विचारही चारचौंघांसारखेच राहतील" असं मुराकामी बजावतात. तेव्हा वाणसामान गुंडाळलेल्या कागदांपासून वेब कंटेंटपर्यंत सरसनिरस न ठरवता वाचत जाणं आणि एका ट्प्प्यावर आपला कल कळला की त्यानुसार निवडक वाचन करणं या वाचनाच्या पायर्‍या म्हणता येतील. प्रत्येक पायरीवरची मौज अनुभवत पालकांना पुढे जाता आलं तर त्यांना मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. तरुणपणी आपण उत्तम वाचक होतो म्हणणार्‍या अनेक मराठी पालकांच्या वाचनाच्या कल्पना त्याच पठडीत अडकून पडलेल्या दिसतात. ’श्यामची आई’ वाचताना आजची पिढी गहिवरुन येणार नाही, स्वामी-मृत्युंजय तिला कृत्रिम आणि भाबडं वाटू शकेल, अत्रे-पुलंचे विनोद काळ बदलल्यामुळे डोक्यावरुन जाऊ शकतील, बोरकर-कुसुमाग्रज फारच ’डिफिकल्ट’ वाटू शकतील, विद्रोही साहित्य एकसुरी वाटू शकेल. पालकांनी हे समजून घ्यावं. काय उत्तम ते सांगत राहावं परंतु मुलांचं वाचन जगाबरोबर बदलू द्यावं. पालक स्वत: छापील पुस्तकांना प्राधान्य देत असले तरी मुलांच्या वाचनाच्या पद्धती ई- बुक, ऑडिओ बुक, किंडल, व्लॉग (v-log) अशा बदलत जात आहेत, त्यांच्या वाचनाचं माध्यम मराठीच राहणार नाहीये हे ही त्यांनी स्वीकारावं. 

’फेरारी की सवारी’ या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. वडिल मुलाला पाठीमागे बसवून स्कूटरवरुन वेगाने जाताना घाईगडबडीत सिग्नल तोडतात. तो त्यांचा नेहमीचा रस्ता असल्याने परिचयाचा हवालदार त्यांना टोकत नाही. आपल्याकडून सिग्नल तोडला गेल्याचे लक्षात येताच वडिल परत फिरतात आणि हवालदाराला दंडाची पावती करायला सांगतात. हवालदार ’जाने दो साब, किसीने नही देखा’ असं म्हणतो. त्यावर वडिल म्हणतात,’लेकिन मेरे बच्चेने देखा ना! बच्चा जो देखेगा वही सिखेगा’ पालकत्वाचं सार कदाचित या वाक्यात आहे. वाचनही त्याला अपवाद नाही. थोडक्यात मुलांनी वाचायला हवं असेल तर नाक मुरडण्याऐवजी ट्विंकलकडून प्रेरणा घेऊन त्यांना पुस्तकांचं सान्निध्य द्यावं लागेल, वाचनातला आनंद आपल्याला त्यांच्या सोबतीने नव्याने शोधावा लागेल. 

(published in Divya Marathi - Madhurima - 9 feb 2021)

Tuesday, January 5, 2021

हाँ तो मै कहाँ थी...

धावतपळत मी जस्ट सुटलेली झेलम एक्सप्रेस पकडली. नोकरी करत असतानाचे अपडाऊनचे दिवस. नेहमी स्टेशनवर किंवा माझ्याच गाडीत किंवा परतीची गाडी पकडण्य़ासाठी बस स्टँडपासून स्टेशनकडे धावणार्‍या आम्हा सर्वांबरोबर दिसणार्‍या त्या टपोर्‍या डोळ्यांच्या ख्रिश्चन मुलीने मला शाहरुख स्टाईल हात देऊन आत ओढले. आम्ही एकमेकींना छान स्माईल दिलं. मग चेहर्‍यावर करुण भाव आणून नेहमीची आयडिया करुन एक बरी फॅमिली पाहून मी बसायला जागा पटकावली. तिलाही बोलावलं. शेजारी बसल्याने आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती माझ्याच शाळेत मला दोन वर्ष सिनीयर होती हे कळलं. मग जुन्या शिक्षक-शिक्षिकांचे, इतरही बरेच विषय निघाले. तिलाही माझ्याबद्दल खूप उत्सुकता होती. आपण तिला सुझी म्हणूया. बॉयकट, जरा सावळा वर्ण असलेल्या, स्कर्ट किंवा मॉडर्न पद्धतीचा पंजाबी ड्रॆस घालणार्‍या आणि लालचुटुक्क लिपस्टीक लावणार्‍या या सुझीची आणि माझी त्या प्रवासात जी भयंकर गट्टी जमली ती आजतागायत तश्शीच टिकून आहे. 

आता सकाळी स्टॆशनवर निघताना ती मला हाक मारायची. माझी कायम धांदल असायची. त्यात माझी शिस्तप्रिय आई, ’मोहिनी मागे फिर, तुझा चमचा विसळायचा राहिला आहे’ असं काहीतरी प्रचंड घाईत असताना सांगायची. ’अग माझे आई, माझी गाडी चुकेल नं’ म्हटलं तरी, ’चुकू दे, त्याशिवाय तुला सवय लागणार नाही’ असं शांतपणे म्हणायची. सुझी फाटकात उभी राहून आमचे हे संवाद ऐकत हसत असायची. ’तेरेको ये लिपस्टिक वगैरे लगानेको टाईम कैसे मिलता रे’, असं मग मी रस्त्याने धावता धावता तिला विचारायचे. तिची इंग्लीशमिश्रित बंबईया हिंदी खासच असायची. उदा: ’रास्ते मे साला ये गायलोग कही भी बैठते, घूमते है तो आय गेट फ्रायटन्ड इसलिए मै गाडीच नई चलाती’.  

तिला झोपेची देणगी आहे. ’मेरेको जहाँ कही भी होरिझॉंटल किया, वही मै सो जाती’ असा तिचा प्रकार होता. गाडीत, वेटिंग रुममध्ये ती अशीच पटकन जरा तिरकी झाली की झोपून जायची त्यामुळे ती कायम फ्रेश असे. आमची कंपनी वेगवेगळी असल्याने आणि कामाच्या लोडप्रमाणे आमच्या परतण्याच्या वेळा कधी कधी जुळत नसत. मग दुसर्‍या दिवशी सांगायला आमच्याकडे, काल काय झाले, पवन भोत लेट आई, कर्नाटक कैसे अचानक रुक गयी, बोगी मे क्या गडबड हुई, वो मनमाडका मुछ्छड टीसी फिरसे मेरेको बोला की ये पास नही चलेगा वगैरे ढीगभर किस्से असत. तिला सविस्तर आणि संगतवार सांगायला आवडे. उदा: - ५.१२ को मैने कॉम्प्युटर शटडाऊन किया और बस पर्स हाथ मे ली तो ये साला डेरिक आके बोलता है, इतना पेज अर्जंट बनानेका है. इधर नवजीवन का टाईम होयेला. मैने फटाफट बनाया. ५.१७ को उसको दिया तो उसको उसमे एक गलती मिला. उसको क्या रे, घर जाके पैर दीवाल को लगाके टीव्ही देखनेका रहता खाली, बीबी बनाती खाना. बच्चो की पढाई भी वो ही लेती. हाँ, तो मै कहाँ थी!’ मी- ’डेरिक के पास’. मग ५.४५ पर्यंतचे नवजीवन चुकली, मुश्कील से कुर्ला मिली, वो मोटे अंकल कैसे गिर गये जीनेपे, वगैरे वगैरे धावते समालोचन ऐकवायची.

 मी कंटाळून मध्येच काही पुढचे विचारले की ते तिला आवडत नसे. ’रुक तू, हाँ, तो मै कहाँ थी!’, ’वो आर्थर हॅले के बाजू मे’. (एक अपडाऊनवाला मुलगा आम्हाला कव्हर दिसेल अशी मुद्दाम धरुन जाड जाड इंग्लीश पुस्तके वाचायचा. त्याला आम्ही आर्थर हॅले म्हणत असू. ’समझता भी है के खाली स्टाईल मारता है’ अशी तिला शंका होती.)
रोज नवी गाडी, नवे प्रवासी, नवे अनुभव, धमाल यायची. तिच्या बॉयकट आणि शर्ट ट्राऊजर मुळे मागून तिला पुरुष समजून एकदा ट्रॆनच्या दुसर्‍या बाजूने चढणार्‍या एका बाईने तिला ’भैया जरा हाथ देना तो’ असे म्हणून एक गाठोडे हिच्या डोक्यावरच ठेवून दिले होते. पास संपलेला आहे याची ट्यूब पेटली आणि तेव्हाच नेमका टीसी आला तर आम्ही क्लुप्त्या लढवत असू पण तेव्हा खिदकन हसून सुझी आम्हाला तोंडघशी पाडत असे. दरम्यान आम्हा दोघींना माझी आणखी एक जवळची मैत्रिण जॉइन झाली होती. एव्हाना आम्हाला एकमेकींच्या घरची, कंपन्यांची, त्यातल्या आमच्या डिपार्ट्मेंटच्या लोकांची इतकेच नव्हे तर त्यांच्या खानदानाची सुद्धा इत्यंभूत माहिती झाली होती’.

रविवारी सुझी लवकर उठून लालचुटुक्क लिपस्टिक लावून संडॆ मासला न चुकता जात असे. येताना भाजी घेऊन, मला भेटून घरी जात असे. मग चिकन खानेका आणि सोनेका असा तिचा सोपा कार्यक्रम असायचा. प्रवासात सोबत नसेल तेव्हा वाचन बरं म्हणून मी जवळ कायम पुस्तक ठेवायचे, क्या करती तू इतना पढके, आजूबाजू देखकेही तो कितना पढनेको मिलता है, असं तिचं सोपं प्रिन्सिपल. पुरणपोळी तिला खूप आवडायची म्हणून घरी केली की तिच्यासाठी मी डबा न्यायचे. माझं ख्रिस्मस लंच इतर ख्रिश्चन मैत्रिणींसह तिच्याकडे असायचं. तिची आई अप्रतिम डोनट्स बनवायची. जेवण मग थोडं म्युझिक, डान्स वगैरे. मजा यायची. ख्रिश्चन लग्नाच्या रिसेप्शनला ती सोबत असली तरच मी जायचे. भेटवस्तू देताना नवरा-नवरीला हलका किस करण्य़ाची त्यांची पद्धत मला झेपायची नाही मग मी तिच्या मागे लपून लांब हात करून भेट देऊन सटकायचे. गावात धर्मांतरित ख्रिशचन भरपूर. एक कॉलोनी अँग्लोइंडियन्सची. यांची चर्चेस वेगळी. त्यातून मराठी ख्रिशचन्सची चर्चेस अजून वेगळी. त्यांचं सर्कल वेगळं. जो भेद नको म्हणून धर्मांतर झालेलं तो भेद शेवटी तसाच. सुझीचं कुटुंब कॅथोलिक. प्रेयरशिवाय जेवण नाही. अगदी कट्टर धार्मिक, वडील नव्हते. मोठी बहिण त्यांच्या जागेवर नोकरीला लागली होती. धाकटी बहिण एक जुजबी नोकरी करत होती. धाकटा भाऊ शिकत होता. तशातच तिच्या धाकट्या बहिणीने एका मूळ यूपीतल्या हिंदू मुलाशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना तो मोठा धक्का होता. पांढर्‍या सॅटीनच्या झालरवाल्या गाऊन मधल्या, हातात गुलाबांचा बुके घेतलेल्या ब्राईड ऐवजी त्यांना लालजर्द शालू, सोनेरी ओढणी, हातात चुडा, भांगात सिंदूर, हातभर मेहंदी, मोठठं कुंकू अशा वेशातल्या वधूच्या रुपात बहिणीला बघवेना. जेनी रडली, संतापली, वो सुखी नही रहेगी म्हणाली. हळूहळू ते निवळलं. (आता त्या बहिणीचं कुटुंब हिंदूच असलं तरी ख्रिश्चनांच्या वरताण त्यांच्यामध्ये मिसळून गेलंय)

आपल्याकडे ख्रिश्चन लोक सैल चारित्र्याचे असतात असा फार गैरसमज आहे. एकदा स्टुडिओत लग्नासाठी फोटो काढायला गेली असताना फोटोग्राफरने तिला निगरगट्टपणॆ आप लोगोमे इतना चलता है’ म्हणत काही ऑड पोझेस द्यायला सुचवल्या. तिने खिन्न होऊन मला हे सांगितल्रे तेव्हा मला अतिशय वाईट वाटले. सुझीला जी स्थळं यायची त्यात शिकलेली फार कमी. ख्रिश्चनांमध्ये उच्चशिक्षित (तेव्हा) फार कमी, दारु पिणे नॉर्मल. इंग्लीशच्या जोरावर नोकर्‍या मिळून जात. चंकीफंकी हेअर स्टाईल, हातात गिटार असे ’मुलांचे फोटो’ पाहून ती वैतागायची. ’इन मिथुन चक्रवर्तीयोंमेसेही कोई सिलेक्ट करना पडेगा क्योंकी किसिको पटाना अपने बस की बात नही’ असं म्हणायची. मग तिला एक चांगले मुंबईचे स्थळ आले. मुलाला जssरा टक्कल होते पण शिक्षण, नोकरी उत्तम. बाकी माहिती काढली, ते ही उत्तम. ’ये कितना टकला है मॅन ..कैसा लगेगा जोडा रिसेप्शन के फोटोमे’ अशी तिला काळजी पडली. मी तिची बरीच समजूत घातली की ’शादी के बाद घने बालोवाला भी टकला हुआ तो तू क्या उसे छोड देगी! शादी क्या सिर्फ रिसेप्शनके फोटो अचछे आने के लिए करतेहै क्या’ वगैरे. अखेर तिने त्याला होकार दिला. तिची निवड सार्थ ठरली. माझे लग्न ठरले तेव्हा महेश टकला नसल्याचे तिला हायसे वाटले.

ता सगळे फोनवर. व्हॉट्सअ‍ॅप वर संपर्कात असतोच. एकदोनदा ठरवून आणि एकदा योगायोगाने आम्ही भेटलो. एकमेकींच्या घरी मात्र अजून जाणं झालं नाही पण तिचा फोन आला नाही असा माझाच काय , मुलांचा वाढदिवसही जात नाही. फोन उचलला की सुझी सुरु होते, "कैसी है रे! मै तो बस दिनभर जॉब, बॉस, टार्गेट, सब्जी, बच्चे.. खाली सोने के लिए घर आती रे, इस्से अच्छा ऑफीसमे ही सो जानेका! कल की बात, ५.१५ को मै उठी, हजबंड के लिए चाय बनाई, वो भी बनाता रे मेरे लिए लेकिन इतनी टेरिबल बनाता की काडेके माफिक. पीही नही सकते. फिर बोलता आज मेरा ऑफ है, पहले बोलता तो मै आधा घंटा जादा नही सोती थी क्या, सोना तो मेरी जान है. बॉंबेमे इन्सान को कहाँ सोनेको मिलता रे, अपना अपडाऊन बहोत आसान था, ऐ अब तेरी साँस मम्मी के जैसा टॊकती क्या रे, मोहिनी मागे फिर, ही ही ही, हाँ तो मै कहाँ थी..!!!.’